Monthly Archives: June 2008

हसण्यासाठी जन्म आपला!

रेडवूड सिटी

मला एकदम हसू आलं. कारण काही नाही. सोनियाची आठवण झाली आणि
तिची हसरी मूर्ती डोळ्यांसमोर आली. हसण्यासाठी तिला विशेष कारण
लागत नाही. आणि म्हणूनच तिचे हसणे इतकं गोड असावे. सोनिया अवघी दोन
अडीच वर्षांची. सोनियाला हसताना पाहणे ह्यापरते दुसरे सुख नाही,
भाग्य नाही. सोनिया हसू लागली की–खरं म्हणजे कोणतेही लहान मूल हसू
लागले की-प्रकाश जास्त उजळतो, पक्षी अंगणात येतात, झाडे डोलू लागतात,
वारा फ़ुलांचा सुगंध घेऊन येतो, बाल-निर्झर हसत-खेळत झुळुझुळ वाहत
येतो, काळज्या मिटून जातात, खेद-खंत मावळतात, राग-लोभ पळून जातात;
सारे जग हसू लागते.

हसवणारा सगळ्यांनाच आवडतो. मग तो विनोदी लेखक,कवि, वक्ता, विनोदी
कलाकार, नट-नटी, विदूषक, व्यंग चित्रकार,गोष्टीवेल्हाळ कोणीही असो,
तो सर्वप्रियच होतो.विनोद,चुटके, किस्से, आठवणी, गप्पा म्हणजे रोज येणाऱ्या
आनंदाच्या सरीच! त्यांत भिजणे कुणाला आवडत नाही?

हसणे आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. नव्हे ते आयुष्यवर्धक संजीवक आहे
असे डॉक्टरही म्हणतात.कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा युनिव्हर्सिटीच्या
हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या आणि ह्रुदयविकाराच्या रुग्णांना “आय लव्ह ल्युसी”
सारखे विनोदी कार्यक्रम रोज दाखवतात. ते पहाताना रोगी आपले दुखणे विसरून
हसत असतात. ह्यामुळे शरीरातील टी-सेल्स वाढून त्यांची प्रतिकारशक्ती
वाढल्याचे आढळून आले.

“सॅटर्डे रिव्ह्यू” ह्या प्रख्यात मासिकाचा संपादक नॉर्मन कझीन हा मणक्यांच्या
विकाराने अंथरुणात पडून होता. त्यावेळी तो मार्क्स ब्रदर्सचे विनोदी चित्रपट
पहात असे. आठ दिवसात पूर्ण बरा होऊन तो चालू लागला.हे पाहून डॉक्टरही
चकित झाले.

नाटकातील, कथा-कादंबऱ्यातील संवादात कुणी हसला किंवा हसणे हे हा:
हा: ; ही ही; हो हो; असे लिहून दर्शवतात.इंग्रजी आणि इतर भाषांतही असे
ह-च्या बाराखडीतून “हसणे” सुचवतात.स्वराच्या मागे ह हे व्यंजन
वापरलेले असते. आपण श्वासोश्वास घेतानाही “ह” असाच काहीसा आवाज होत
असतो. म्हणजे श्वासोश्वासा इतकेच हसणेही आपल्या जीवनाशी किती निगडित
आहे पहा! इतर भाषांत ’हसणे’ यासाठी जे शब्द आहेत त्या शब्दांची सुरवात
’ह’ या व्यंजनाने होत नाही; उदा. इंग्रजीत ’लाफ”लाफ्टर’; पण मराठीत मात्र
’हसणे’ ’हास्य’ हे शब्द ’ह’नेच सुरू होतात! आपल्या मराठीचे हे एक खास
वैशिष्ठ्य आहे.

कुणी”हसून हसून बेजार होतो” पण हसल्यने तो आजारी पडल्याचे
कोणी ऐकले नाही. “हसून हसून आपले पोट दुखले” असेही कुणी सांगतो पण
हसण्याने कधी तब्येत बिघडल्याचे आपल्याला माहित नाही. प्रख्यात इंग्रजी
लेखक आणि निबंधकार मॅक्स बीरभॉमने म्हटल्याप्रमाणे, ह्या पृथ्वीतळावर
आपल्यापूर्वी आणि आजपर्यंत इतके लोक हो़ऊन गेले पण हसण्यामुळे, हसून
हसून कोणी दगावला आहे अशी इतिहासात कुठेही नोंद नाही.
बायबलच्या जुन्या करारातील जेनेसिस[विश्वोत्पत्ती संबधीचा भाग]मधील एक
प्रसंग लक्षात घेण्यासारखा,गमतीचा आहे.:- आणि देव ऍब्रॅहमला
म्हणाला,”मी तुझ्यावर आणि तुझ्या बायकोवर प्रसन्न झालो आहे. माझ्या
आशीर्वादाने तुम्हाला मुलगा होईल!” हे ऐकून ऍब्रॅहम पोट धर धरून हसू
लागला.अगदी जमिनीला डोके टेकेपर्यंत हसत होता. त्याला वाटले, माझी
म्हाताऱ्याची देव किती थट्टा करतोय!”
ही देववाणी ऐकून ऍब्रॅहमची बायको-सेरा-सुद्धा हसायला लागली. ह्या
वयात-त्यावेळी ती नव्वद वर्षांची होती- आपल्याला मूल होणार ह्या नुसत्या
कल्पनेनेही तिला हसू लोटलं. देव आपली गंमत करतोय असे तिला वाटले.
देवाने त्या मुलाचे नावही ठरवले होते. देव पुढे म्हणाला,”तुमच्या मुलाचे
नाव आयझॅक असेल.” खरी गंमत पुढेच आहे–’आयझॅकचा अर्थही,’हसरा’ ’तो
हसेल’ ’हसणारा’ असा आहे!

आपले मूळ स्वरूप आनंदच आहे असे आपल्या अध्यात्मिक तत्वज्ञानातही म्हटले
आहे. ही आनंद साधना करणे ह्यात आपल्या आयुष्याचे सार्थक आहे असे आपले
संत, ज्ञानी पुरूषही सांगतात.

आपले हसणे, हास्य म्हणजे आनंदाचा प्रकट आविष्कार. आनंदाचे मूर्त स्वरूप
म्हणजे हसणे, हास्य! इजिप्तमध्ये सापडलेल्या, इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या
शतकातील एका कागदपत्रात म्हटले आहे: “जेव्हा देव मोठ्या आनंदाने
पहिल्यांदा हसला तेव्हा प्रकाश निर्माण झाला…..दुसऱ्यांदा मोठ्याने हसला
तेव्हा पाणी निर्माण झाले…. आणि जेव्हा देव सातव्यांदा [सात मजली?] हसला
तेव्हा मानव, मनुष्य प्राणी निर्माण झाला!” परमेश्वराच्या आनंदाच्या
परमोच्च क्षणी आपला जन्म झाला ही कल्पना किती रम्य आहे!

हे सगळं हसण्यावारीच जाण्याची शक्यता आहे.हसण्यासंबंधी इतके
वाचल्यावर तुम्ही, हे म्हणजे अगदी, “अति झालं आणि हसू आलं” असे म्हणून
हसाल.हरकत नाही. तुम्ही असे हसण्यातही मजा आहे!

पोस्टमन

परवा बाळासाहेबांचे पत्र आले.आजही हाताने पत्र लिहून पोष्टाने
पाठवणारी थोडी माणसे असतील त्यापैकी बाळासाहेब आहेत.पाकिटावरील
सुंदर हस्ताक्षरावरूनच समजलो की बाळासाहेबांचे पत्र! सुंदर
अक्षराबरोबरच ते, पाकिटही वेलबुट्टीनी तर कधी फुलांच्या नक्षीने
सजवतात. आजच्या पाकिटावर पत्रं घेऊन लगबगीने निघालेल्या पोस्टमनचे
लहानसे चित्र चिकटवले होते.पत्रावर आपले चित्र पाहून पोष्टमनही खूष
झाला होता. पाकिट माझ्या हातात देताना तो हसत होता त्यावरूनच ते दिसत
होते.इतके समर्पक चित्र पाहून मलाही त्यांचे कौतूक वाटले.पत्रासाठी
कोणीतरी घराघरात, कार्यालयात, वाट पहात असेल हे जाणून असलेला तो
पोस्टमन किती लगबगीने निघाला आहे!

आपल्या प्रियकराचे पत्र आज यॆईल म्हणून अधिरतेने सारखे आत बाहेर करत,
शिवाय ते दुसऱ्या कोणाच्या हातात पडू नये ह्यासाठीही,मधेच खिडकीतून
दूर टक लावून पोस्टमन दिसतोय का याची उत्सुकतेने वाट पहात असलेली तरूणी
असेल; किंवा”इतके दिवस झाले अजून तिचे पत्र कसे नाही”म्हणून थोडा चिडलेला,
थोड्या चिंतेत असलेला पण तितक्याच आतुरतेने आपल्या प्रियतमेच्या पत्राची
येरझाऱ्या घालत वाट पहाणारा “घायाळ” प्रियकर असेल; तर “माहेरी गेली की
विसरली मला”असे गेले चार दिवस घोकणारा,नुकतेच लग्न झालेला तरूण
नवरा विरह कष्टाने सहन करत, सर्वच बाबतीत सध्या उताविळ असलेला तो
नवरा पोस्टमनची तितक्याच उताविळपणे वाट पहात असेल; तर एखादी
पहिल्यांदाच माहेरी आलेली तरूण माहेरवाशीण”ह्यांचे पत्र कसले येते!

बसले असतील हॉटेलात मित्रांच्या बरोबर चहा ढोसत,हसत खिदळत.कशाला
आठवण येतेय त्यांना!” असे मनातल्या मनात म्हणत पण चेहऱ्यावर मात्र आज
नक्की यॆईल पत्र असा हर्षभाव असलेली, आपल्या धाकट्या भावा-बहिणींना
पोस्टमनकडे लक्ष ठेवा रे असे सांगत स्वत:च दाराबाहेर दोन चार वेळ येऊन त्या
मेघदूताची वाट पहात असेल.

एखादी माऊली, घर सोडून पहिल्यांदाच लांबच्या गावाला शिकायला/
नोकरीला गेलेल्या मुलाच्या साध्या खुशालीच्या पत्राची प्राण डोळ्यात
साठवून वाट पहात असेल तर दूर गावी शिकायला, नोकरीच्या
खटपटीसाठी गेलेला मुलगा आपल्या वडिलांच्या “गोष्टी घराकडील”
पत्राची वाट पहात गहिवरून उभा असेल.किंवा एखादा तरूण इंटरव्ह्यू अथवा
नेमणूकीच्या पत्राची, मान मोडून दुखायला लागली तरी आशेने पोस्टमनची
वाट पहात असेल; कुणी नवखा लेखक संपादकाच्या”तुमची कथा दिवाळी
अंकासाठी स्वीकारली आहे” अशा भाग्योदयी पत्राची डोळ्यांत दिवाळीच्या
चंद्रज्योतीचा प्रकाश घेऊन धडधडत्या अंत:करणानी वाट पहात असेल.उपवर
मुलीचे आईबाप “मुलगी पसंत आहे, मुहूर्त नक्की करण्यासाठी या”अशा
पसंतीची मोहर असलेल्या पत्राची, उत्सुकता आणि काळजीने दाटलेल्या
डोळ्यांनी पोस्टमनची रोज वाट पहात असतील!

पोस्टमन ना नात्याचा ना गोत्याचा. पत्र आणल्या दिवशी मात्र प्रत्येकाचा!
असा इतका बाहेरचा असूनही सगळ्यांच्या ह्रुदयातला झालेला त्याच्या
सारखा समरस सेवक दुसरा नाही!

खऱ्याखुऱ्या अर्थाने सर्वांचा ’पत्रमित्रच’ तो. सगळ्यांचे ज्याच्या
वाटेकडे डोळे लागलेले असतात तो पोस्टमन!

पण हे सगळे पत्रपुराण ४५-४६ वर्षापूर्वीच्या काळाला लागू पडणारे आहे.

आज दूरध्वनी,संगणक, ई-मेल, व्हॉइस-मेल,एसएमएस,टेक्स्ट मेसेज,सर्वसंचारी
दूरध्वनी इत्यादी आधुनिक सोयींची रेलचेल झाली आहे की हस्ताक्षरातील
पत्रेच गेली.ती आता “एन्डेंजर्ड स्पेसीज” झाली आहेत.पत्रेच नाहीत तर
पोस्टमनची वाट कोण पाहिल?

छापील कचरा वाटप करण्याचे काम फक्त त्याला आता राहिले आहे.तोही
बिचारा आता कोरडेपणाने काम करतोय ह्यात त्याचा काय दोष?

पूर्वीचा पोस्टमन “कुणा’रावसाहेब!’बोले बघून। कुणा’भाऊ!’नाना!’म्हणे तो
हसून॥ अशी नावे पुकारून पत्र टाकताना किंवा हातात देताना पत्राच्या
अक्षरा रूपावरून त्यातील भावना हसून, डोळ्यांनी, भुवयांनी आनंद,
आश्चर्य व्यक्त करत जात असे.

कोण कोणत्या पत्राची वाट पहातात हे अनुभवी पोस्टमनला सरावाने माहित असे.
“वकीलसाहेब, मुलासाठी बऱ्याच पत्रिका-फोटो आलेले दिसताहेत!”असे अदबीने
म्हणत त्यांना पत्रे दॆईल तर भोसले मधुला,”चहा-चिवडा तरी पाहिजे नोकरी
लागल्याचा”असे म्हणून सरकारी पत्त्याच्या पाकिटाकडे पहात लांब पाकिट
दॆईल. “श्री”आणि कसलाही मायना नसलेले दोन-तीन ओळीचे कार्ड खाली मान
घालून न बोलता शेजारच्या लाटकरांच्या घरात हळूच सरकवून झटकन
पुढे जाईल.

काळाच्या झपाट्यात हे सर्व संपले.आणि त्यात काही नवल नाही. असे होणारच.

पोट खपाटी गेलेला शेतकरी जसा पावसाच्या ढगाची, आकाशाकडे खोल
गेलेल्या डोळ्यांनी काकुळतीने वाट पाहात असतो त्याप्रमाणे एखाद्या खेड्यातील
कुणी गरीब आई-बाप पोराच्या मनीऑर्डरसाठी आजही पोस्टमनची काकुळतीने
वाट पहात असतील म्हणा.

आणि आपला पोस्टमनही, ती मनी-ऑर्डर देण्यासाठी लगबगीने निघालाही
असेल!

परिस मिळाल्यावर……!

रेडवूड सिटी ४ जून, २००८

नेहमीप्रमाणे बाळासाहेबांचे पत्र आले. नेहमीप्रमाणे पत्र वाचून आनंदही झाला. पण त्यांच्या अलिकडील काही पत्रातून,”कुणाशी बोलावे,चार गोष्टी कराव्यात तर तसे कोणी आसपास दिसत नाहीत. कोणी फारसे भेटत नाहीत. आवडीने बोलावे, थट्टामस्करी, प्रसंगी थोडासा वात्रटपणा करावा असे शेजारी जवळपास भेटत नाहीत.कुणाकडे जावे तर असे तडक जाताही येत नाही.” अश्या थोडाश्या निराश तक्रारीचा सूर जाणवत होता.मला वाटले ते परदेशात असल्यामुळे त्यांची अशी मन:स्थिती झाली असावी.

सध्या परदेशातच नव्हे तर आपल्या येथेही वारंवार एकमेकांकडे जाणे येणे कुठे होते? आले मनात की गेलो मित्रांकडे,नातेवाईकांकडे,असे घडत नाही. इतकेच काय शेजाऱ्यांकडे जाऊन गप्पा-टप्पा,थट्टा-मस्करी, पत्ते कुटणे होत नाही. कारणे अनेक असतील पण थोडक्यात सांगायचे तर बदललेली, रोज बदलत असलेली परिस्थिती हेच मुख्य कारण होय.

माणसे भेटावीत,आपण जाऊन त्यांना भेटावेत असे सर्वांनाच वाटते.काही काळापूर्वी म्हणजे घरांचे दरवाजे उघडे असण्याच्या काळात हे शक्य होते. बोलावून, न बोलावता, शेजारी, जवळपासचे असे भेटत असत.भेटीगाठी सहज होत.

हुंकाराला शब्दांचा अंकुर फुटण्यापूर्वी, आवाजाला शब्दांची पालवी बहरण्यापूर्वी; दळणवळणाची साधने येण्यापूर्वी माणूस एकमेकांना कसा भेटत असेल,कसाबोलत असेल! आपला प्रतिध्वनी ऐकू आला तरी त्याला कोणी भेटल्याचा, कोणाशी बोलल्याचा आनंद झाला असेल!

माणूस बोलयला लिहायला लागल्यावर तो पक्ष्यांमार्फत चिठ्यांतून संदेश पाठवू लागला. भेटता येत नाही,गपा मारता येत नाहीत यावर माणसाने शोधून काढलेला उपाय म्हणजे पत्र.असे म्हणतात की, परमेश्वराला एकाच वेळी सगळीकडे,सगळ्यांकडे जाता/पाहता यॆईना म्हणून त्याने ’आई’ निर्माण केली.माणसाने ’पत्र’ शोधून काढले! पत्रं लिहायला सुरूवात केली.पत्रातून भेटी गाठी हॊऊ लागल्या,होत आहेत आणि पुढेही होतील.काळाप्रमाणे पत्र आपले रूप बदलेल.

नळ-दमयंतीचे पत्र हंस होते.कालिदासाने तर कमाल केली. त्याच्या यक्षाने मेघालाच आपले पत्र केले.’न देखे रवि,ते देखे कवि’अशा प्रतिभावान कवींनी चंद्रालाही पत्र केले– साजण आपल्याला विसरला अशी त्याच्या भेटीसाठी तळमळत असलेली प्रेयसी ’चंदा देस पियाके जा’आणि त्याला समजावून परत घेऊन ये अशी चंद्राला विनवणी करते.तर माहेरच्या आठवणीने मन भरून आलेली सासुरवाशीण, अंगणात आलेल्या पाखराला ’माझिया माहेरा जा’, तुझ्या सोबतीला माझे आतुरलेले मन देते आणि माहेरची वाट दाखवायला भोळी आठवणही देते,असे म्हणत पाखराला आपले पत्र करते. तुरुंगात बंदीवान झालेला क्रांतिकारक तर आपल्या श्वासांना पत्र करून आपल्या ह्रुदयातील खंत मातृभूमीला कळवतो!

पत्रांतून माणूस आपले विचार, मतं कळवतो.मनातल्या गोष्टी, ह्रुदयातील गोड गुपित सांगतो, मन मोकळे करतो. पत्रातून माणसे एकमेकांना भेटतात ही कवि-कल्पना वाटेल किंवा भाषालंकार. पण भेटत असली पाहिजेत. काहींना तर ती दिसतातही! असावीत; कुणी सांगावे? तसे नसते तर उगीच का कुणी एखादे पत्र ओठांना लावून ह्रुदयाशी घट्ट धरतो? का कुणी हातात पत्र फडफडवत हसत हसत सगळ्यांना दाखवत घरभर फिरतो? का कोणी आराम खुर्चीतून उठून,नाकावर घसरलेला चष्मा सावरत,”पाहिलस का…आपला…काय म्हणतोय” म्हणत कौतूकभरल्या डोळ्यांनी ते पत्र दुसऱ्या चष्म्याला देतो! पत्र वाचल्यावर आपल्याला आनंद होतो,आपण तरंगतो,बुडून जातो,थोडेसे चकित होतो, सुखावतो, काळजीतही पडतो. सगळे कसे कोणी भेटल्यावर बोलल्यावर वाटते तसेच पत्र वाचून होते यात शंका नाही.कवींचे मेघ, चंद्र, हंस, पाखरू, श्वास हे वरवर पहाता पत्र-दूत वाटतील, पण ती त्यांची पत्रेच आहेत.

सध्याच्या अतिशय वेगवान काळात एकमेकांना भेटणे, गप्पा गोष्टी करणे पत्रं लिहिणे शक्य होत नाही.पण शब्दसृष्टीच्या परतिभावंतांने लिहिलेल्या शब्दांतूनही मणसे भेटवण्याची दिसताहेत अशी भावना निर्माण केली त्याचप्रमाणे प्रतिभाशाली वैज्ञानिकांनी त्याहीपेक्षा सोयीचे,उपाय शोधून आपल्या हातात दिले. दूरध्वनी, बिनतारी संदेश,आणि ह्यांचीच आजची बदलली विविध रूपे पाहिली की आपण थक्क होतो.परिसाचा एक लहानसा तुकडा सर्व लोखंडाचे सोने करतो. तसे आजच्या विज्ञानयुगातील लहानशा परिसाने-मायक्रोप्रोसेसर चिपने[लघुतम क्रियाप्रक्रियाकारी ?]सर्व विश्व आपल्या घरात आणून ठेवले! संगणकावरून आपल्या अनेक मित्रांशी एकाच वेळी बोलता येते.संगणकातून पत्र लिहिले तर ते पोचायला एक क्षणही लागत नाही. दूरध्वनी वरून बोलताना समोरचा आपल्याला समोर दिसतो! व्हिडिओ कॉन्फ़रन्सिंगने[चित्रफितिमुळे]चार मित्रांची झकास गप्पाष्टकेही रंगू शकतात.आणि हे सर्व, मनात आले की क्षणार्धात घडून येते! चाळी-वाड्यांतील घरांची दारे उघडी असण्याच्या काळात जसे सहज होत असे तशाच आता ह्या मायक्रोप्रोसेसरच्या ’परिसा”मुळे हे सर्व साधते.भाषाप्रभू शब्द आणि कल्पना सृष्टीचे निर्माते तर विज्ञानप्रभू सत्याभास सृष्टीचे जनक.ह्या किमयागारांनी आणि त्यांच्या “परिसाने” प्रत्यक्ष आणि कल्पित, सत्य आणि मिथ्य, वास्तव आणि भास यामधील सीमारेषा इतकी पुसट,अंधुक केली आहे की भासाची चाहूलही लागत नाही! ही खरी किमया! पुन्हा कवींच्या शब्दातच म्हणावेसे वाटते ’प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर’!

हा नव्या मनुचा नवा परिस हाताशी असल्यावर पूर्वीची ती पत्रे, त्या भेटीगाठी,त्या गप्पा नाहीत, ’गेले ते दिन गेले’ ही खंत कशाला? परिस हातात असल्यावर जुन्या सोन्याच्या खाणी उजाड झाल्या ह्याची चिंता कोण करेल? आणि का करावी?