Category Archives: Real Life Stories

हद्दपार ते नोबेल विजेता – २

मॅरिएटा

“ माझी मानवप्राण्यात तरी गणना कुणी केली? मी माणूस आहे ही मान्यता कुणी दिली?” ब्रॅाडस्कीने हे प्रश्नातून दिलेले उत्तर ऐकून सरकारी वकील व न्यायाधीश गप्प झाले.

“ हे तू कुठे शिकलास? “ न्यायाधिशानी विचारले.

“ हे म्हणजे ?” ब्रॅ्डस्कीने प्रतिप्रश्न केला. त्यावर न्यायाधीश बोलू लागले,” हे म्हणजे ह्या कविता- बिविता करणे… तू तर शाळाही धड पूर्ण नाही केलीस ! तिथे…”

“ शाळाकॅालेजात शिकवित नाहीत. आणि मला वाटते तुम्ही जे ‘हे’ म्हणालात ते कोणी कुणाला शिकवणेही शक्य नाही.मला .. मला तुमचे ‘हे’ देवानी दिले असावे.” इतके सांगून ब्रॅीडस्की थांबला.

त्

त्याला, जणू ठरवलेच होते त्याप्रमाणे सायबेरियाच्या एका भागात सक्तमजुरीची पाच वर्षाची शिक्षा दिली.

त्या आधीही त्याला वेळोवेळी पोलिस चौकीत चौकशीला जावे लागत होते. बरेच वेळा कोठडीची हवाही खावी लागे. पण ही सक्तमजुरी म्हणजे अत्यंत कठोर शिक्षा होती. .

नामवंत रशियन आणि इतर युरोपियन देशांतील कवि, विचारवंतांनी ब्रॅाडस्कीला दिलेल्या शिक्षेविरुद्ध जेव्हा आवाज उठवला तेव्हा त्याची शिक्षा कमी करून सुटका केली. पण त्याला १९७२ साली हद्दपार केले.

हद्दपार होऊन कोणत्याही देशाचा नागरिक नसलेला,अधांतरी

हद्दपार झालेल्या ब्रॅाडस्कीला प्रख्यात कवि W. H. Auden ने खूप मदत केली. ब्रॅाडस्की अमेरिकेत आला. त्यावेळी त्याने ‘साल १९७२’ नावाची कविता लिहिली. कुणालाही आपले गाव, राज्य, देश सोडताना,तेही शिक्षा म्हणून, जे दुःख होते; आठवणींची गर्दी होते तसे ब्रॅाडस्कीलाही झालेच असणार.

आपली प्रेयसी, सहचरी मरिना बास्मानोव्हा हिला आणि तिच्यापासून झालेल्या आपल्या अवघ्या पाच वर्षाच्या लहान मुलाला लेनिनग्राद मध्येच सोडून यायचे त्या ताटातुटीचे दुःख वेगळेच. लहान मुलाचे भवितव्य तरी सुरक्षिततेचे असावे म्हणून त्याचे आडनावही बदलावे लागले. आईचेच आडनाव त्याला लावले. ब्रॅाडस्कीच्या अनेक प्रेम कविता जणू तिच्यासाठीच , तिलाच उद्देशून लिहिल्या आहेत. त्याची बायको मरिना उत्तम चित्रकार होती. पोर्ट्रेट करण्यात प्रविण होती.

ब्रॅडस्की अमेरिकेत आला. पण त्याची उदास किंवा ‘आता काय राहिले जगण्यासाठी’ अशी भावना प्रबळ होऊ लागली असावी. म्हणून तो नंतर येणारे म्हातारपण डोळ्यासमोर आणून म्हणतो,” मरण जवळ येतेय्, त्याची पूर्व तयारीही सुरु होईल. लवकरच केस गळतील, दात पडतील, डोळ्यांच्या खाचा होतील!” – पण हाडाचा कवि असल्यामुळे ह्याच मालिकेत तो—“ क्रियापदे,उपपदे, प्रत्ययही गळून पडू लागतील ! “असे सुस्कारा टाकून म्हणतो. त्याचे खरे दुःख हे असावे.

पण ह्या नैराश्यातून तो लगेच बाहेरही आला. पुन्हा लिहू लागला. कविता रशियन भाषेतून करू लागला. इतर लिखाण इंग्रजीत लिहू लागला. भाषेची उपजत आवड असल्यामुळे त्याने इंग्रजीही चांगले आत्मसात केले.

१९७३ मध्ये ब्रॅाडस्कीच्या कवितांचा Selected Poems प्रसिद्ध झाला. कवितांचे भाषांतर जॅार्ज एल. क्लाईन ह्यांनी केले होते. आणि प्रख्यात कवि डब्ल्यु एच ॲाडेन यांनी मार्मिक प्रस्तावना लिहिली होती. त्यानंतर १९८० साली त्याचा आणखी एक काव्यसंग्रह Part of Speech प्रकाशित झाला. हा संग्रह त्याची विशेष ओळख म्हणून गणला जातो. ब्रॅाडस्की ह्या कविता-संग्रहामुळे खूप नावाजला जाऊ लागला. त्यामुळे त्याला इंग्रजी बोलल्या जाणाऱ्या इंग्लंड अमेरिका आणि युरोपसह अनेक देशात प्रसिद्धी मिळाली. तो प्रख्यात झाला. ब्रॅाडस्कीने त्याच्या कवितांतून, कवितेची भाषाच बदलली असे समीक्षक, जाणते रसिक म्हणू लागले.

त्याचे History of Twentieth Century हे १९८६ साली प्रसिद्ध झाले. त्यात फारशा न झोंबणाऱ्या पण डिवचणाऱ्या, बारिक चिमटे काढणाऱ्या कविता आहेत. त्याच बरोबरीने उपहासात्मक, विडंबन कवितांचाही समावेश आहे.,

ब्रॅाडस्की हा साहित्याचा भोक्ता होता. उत्तम वाचक होता. मोलमजुरी, मदतनीस, हरकाम्या अशी विविध तऱ्हेची कामे करत असतांनाही तो कविता करीत असे. त्याच बरोबरीने त्याचे वाचनही चालूच असे.

ब्रॅाडस्कीवर १३-१४ व्या शतकातील इटालियन कवि आणि तत्वज्ञ डान्टे , इंग्लिश कवि जॅान डन आणि त्यांच्या काळापासून डब्ल्यु एच ॲाडेन पर्यंतच्या आधुनिक कवींचा प्रभाव होता. अमेरिकन कवि रॅाबर्ट फ्रॅास्टचा तो मोठा चाहता होता. वेस्ट इंडिज बेटातील कवि डेरेक वॅालकॅाट त्याचा मित्र होता. त्याच्या मित्रांमध्ये कवि, वक्ता, लेखक, नाटककार Seamus Heaney सुद्धा होता. ब्रॅाडस्कीच्या स्वभावाच्या सर्व कंगोऱ्यांना सांभाळून घेणारा त्याचा चाहता, शेमिस हिनी स्वतः उत्तम कवि व लेखक होता. श्रेष्ठ रशियन साहित्यिक, कवि,नाटककार, आणि कादंबरीकार पुश्किन आणि दुसरा नामवंत रशियन साहित्यिक व नोबेल विजेता (1958) बोरेस पॅस्टरनॅक ह्यांच्या परंपरेतील ब्रॅाडस्की मानला जातो.

काळ माणसाला कसा घडवत असतो हेच वाड•मय सांगत असते. ब्रॅाडस्कीचे वाड•मयही ह्याला अपवाद नाही. पण प्रतिभावंत,बुद्धिमान आणि विचारी कवि,लेखक ज्या शैलीने आणि ज्या शब्दांतून सांगतो त्या मुळेच तो थोर म्हटला जातो. ब्रॅाडस्की त्यापैकी एक आहे.

ब्रॅाडस्की हा प्रथम कवि आहे. तो कवितेचा अभिमानी आहे. आणि त्याने उत्कट प्रेमही केले होते. कविता आणि प्रेम ह्या विषयी तो जास्त बोलणार सांगणार हे ओघाने आलेच. मागच्या लेखात, त्याने एके ठिकाणी “प्रेमाला पर्याय कविता होय.” म्हटल्याचा उल्लेख केला. तर त्याचे ‘दैवत’ असलेला कवि,मॅन्डलस्टॅम , (सत्ताधाऱ्यांच्या विरोधी मताच्या किंवा ज्यांच्या पासून सत्ताधीशांना धोका आहे ह्या नुसत्या संशयानेही त्यांना छळवणुकीच्या ,सक्त मजुरीच्या छावण्यांत (‘गुलाग’) शिक्षा म्हणून पाठवले जात असे) त्या ‘गुलाग’ मध्ये शिक्षा भोगत असताना थंडी आणि उपासमारीने मेला. त्या बंडखोर, शहीद कवि मॅन्डलस्टॅम ची विधवा Nadezhda Mandelstam हिने तिचा नवरा मॅन्डलस्टॅम मेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी लिहिलेल्या, अप्रतिम आत्मचरित्राविषयी ब्रॅाडस्कीने एक लेख लिहिला. त्या लेखात तो म्हणतो , “जर प्रेमाला पर्याय असेलच तर स्मृति, आठवणी हाच असेल.” कवितेला तो भाषेचे अंतिम परिपक्व फळ.” म्हणतो. “भाषेची अभिव्यक्ति कविताच होय !” असे म्हणताना पुढे तो लिहितो की “कविता ही जीवनाचीच अभिव्यक्ति आहे !”

“जे न देखे रवि ते देखे कवि” ह्या वचनाने आपणही कवितेचे श्रेष्ठत्व आणि वेगळेपण मान्य करतो. केशवसुत ,” आम्ही कोण म्हणुनि काय पुससी?” असे विचारत कवीचा आणि पर्यायाने कवितेचे मोठेपण सांगतात. त्यांची थोरवी ही त्यांच्या कवितेमुळेच आहे. कविता नसेल तर आकाशातील तारांगणेही निष्प्रभ वाटू लागतील असे ते म्हणतात.क्रौचवध झालेला पाहताच कवि वाल्मिकींच्या मुखातून “ मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वतौ समा: ….” हा काव्याचा श्लोकच बाहेर पडला. सांगायचे इतकेच ब्रॅाडस्की कवितेला इतके मानतो ते योग्यच वाटते. कवितेचे सर्वांना माहित असलेले वैशिष्ठ्य म्हणजे ती थोडक्या शब्दांत मोठा आशय सांगून जाते.

ब्रॅाडस्की हा श्रेष्ठ समीक्षकही होता. तसेच प्रतिभावान लेखकही होता. त्याने व त्याच्या दोन कविमित्रांनी (वर उल्लेख केलेले डेरेक वॅालकॅाट , Seamus Heaney) मिळून अमेरिकन कवि रॅाबर्ट फ्रॅास्टला आदरांजली वाहिली त्या पुस्तकात( Homage to Robert Frost) रॅाबर्ट फ्रॅास्टची व्यक्ति आणि कवि व त्याची कविता ह्या विषयी तिघांनीही लिहिले आहे. तिघांचेही लेख वाचनीय आहेतच. त्यांमधून ब्रॅाडस्कीचे वाचन, अभ्यास, चिंतन ह्याचे दर्शन होते. ज्या ब्रॅाडस्कीवर प्रभाव पडला त्या रॅाबर्ट फ्रॅास्टविषयी त्याने सखोल चिंतनात्मक व वाचनीय लेख लिहिला आहे.

हे तिघेही नामवंत लेखक आणि तिघेही वाड•मयाचे नोबेल पारितोषिक विजेते ! साहित्यातील तीन दिग्गजांनी वाचकांना रॅाबर्ट फ्रॅास्टची पुन्हा नव्याने ओळख करून दिली ! फ्रॅास्टला हा मान मिळाला तसा फार थोड्यांना असा ‘त्रिवेणी’ सन्मान मिळतो!

ब्रॅाडस्कीचा अमेरिकेतील रशियन समाजाशी निकटचा संबंध होता. रशियातून येणाऱ्या लोकांना तो बरीच मदत करीत असे. त्याला अमेरिका आणि युरोपियन साहित्य क्षेत्रांत सर्व सन्मान मिळाले. त्याचे सभा वश करणारे वक्तृत्व, परिणामकारक कविता वाचन, आणि त्याचा वाड•मयाचा , त्यातही अभिजात वाड•मयाचा सखोल अभ्यास ह्यामुळे तो प्रख्यात झाला.

अनेक समीक्षकांनी ब्रॅाडस्कीने कवितेला नवीन भाषा दिली असे म्हटले आहे. कवितेचे रुप रंग बदलले. आपल्याकडेही असे कवि झाले आहेत. केशवसुतांनी जसे मराठी कवितेचे स्वरूप आमुलाग्र बदलले तसेच त्यांच्या नंतरच्या काळात, ज्यांचा ‘ दुसरे केशवसुत.’ असा यथार्थ गौरव होतो ते बा. सी. मर्ढेकर, त्याही नंतरच्या काळातील कवि ग्रेस, कवि आरती प्रभु (चिं.त्र्यं . खानोलकर), ‘ माझे विद्यापीठ’ लिहिणारे कविवर्य नारायण सुर्वे , आपल्या मातीत रुजलेल्या कविता लिहिणारे लोककवि अण्णाभाऊ साठे, आपल्या कवितेतून मग ती प्रेमगीत असो की ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली…’ हे सांगत आपल्या गझल आणि कवितेच्या मशाली पेटवून मराठी कवितेला वेगळाच रंग देणारे कविवर्य सुरेश भट; अशी काही नावे सांगता येतील.

ब्रॅाडस्कीच्या जातिवंत दर्जेदार कवितांचीच नव्हे तर साहित्य समीक्षेची, लेख, निबंधासहित -( उदाः- Less Than One ; —हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. ) — त्याच्या संपूर्ण वाड•मयाची नोबेल पारितोषिक समितीने दखल घेतली; आणि १९८७ सालचे वाड•मयाचे नोबेल पारितोषिक देऊन ब्रॅाडस्कीचा सन्मान केला. त्यामुळे ब्रॅाडस्की जगविख्यात झाला. कवितेला निराळी भाषा, निराळा रंग आणि रूप देणारा कवि ब्रॅाडस्की, केवळ शब्दांचा कसबी, कुशल कारागीर नव्हता तर भाषाप्रभु होता. त्यावेळी,साहित्याचे नोबेल पारितोषक मिळालेल्यांमध्ये ब्रॅाडस्की हा वयाने सर्वात लहान होता. वयाच्या ४७ वर्षी त्याला नोबेल पारितोषिक मिळाले.

ब्रॅाडस्की हा संभाषणपटू होता. चर्चा असो वाद असो,नेहमीच्या काव्यशास्त्रविनोदांची गप्पाष्टके असोत, तो आला की बैठकीत रंग भरत असे. चैतन्य सळसळत असे. असे त्याचा कविमित्र लेखक व नोबेल विजेता मित्र शिमस हेनी याने म्हटले आहे.

त्याच्या ठिकाणी पूर्व आणि पश्चिम ( पुर्व युरोप व पश्चिम युरोप व अमेरिका ) संस्कृतीचा, विचारांचा, परिस्थितीचा सुरेख संगम झाला होता . श्रेष्ठ रशियन कवि Osip Mandelstam आणिAnna Akhmatova हे दोघे त्याची प्रेरणास्थाने होती. डान्टे, जॅान डन, ॲाडेन, रॅाबर्ट फ्रॅास्ट ह्या इंग्लंड अमेरिकेतील कवींचा त्याच्यावर प्रभाव होता.

कवि ॲाडेन हा ब्रॅाडस्कीपेक्षा निःसंशय श्रेष्ठ होता. तो खरा नोबेल पारितोषकाचा मानकरी होता. त्याला नोबेल पारितोषिक मिळायला हवे होते. पण मिळाले नाही. ब्रॅाड्स्कीला ह्या गोष्टीची खंत वाटत असे. आणि नोबेल पारितोषिक स्वीकारताना केलेल्या भाषणात त्याने ती बोलून दाखवली. आपल्यापेक्षा नोबेल पारितोषकावर माझ्यापेक्षा इतर अनेक साहित्यिकांचा कवींचा हक्क आहे हे सांगतांना त्याने प्रामुख्याने डब्ल्यु एच. ॲाडेनचा गौरवाने उल्लेख केला.

पण कोणीही शंभर टक्के पूर्ण नसतो. सर्वांमध्ये चांगल्या वाईटाचे थोडेफार मिश्रण असते. ब्रॅाडस्कीही अपवाद नव्हता . तो अहंवृत्तीचा होता असे म्हटले जाते. ‘मीच बरोबर’, ‘ माझेच खरे’ अशा अहं पद्धतीने बोलायचा . मग त्या मित्रमंडळीच्या बरोबर चाललेल्या गप्पा, चर्चा असोत. त्याच्या मित्रमंडळात कवि, लेखक प्राध्यापक अशी विद्वान मंडळी असत. तो म्हणे इंग्लिश कवींपेक्षा मला त्यांच्या कवितेतील यमक वृत्त छंदोरचना यांचे जास्त ज्ञान आहे. पण इतरांना हे माहित होते की हे फक्त त्याला वाटते ! तो त्याचा स्वकेंद्रित स्वभावाचा दोष होता.

इतके असूनही शिमस हेनी ब्रॅाडस्कीच्या गुण दोषांसह त्याचा चाहता आणि मित्र राहिला. वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी ब्रॅाडस्कीचे निधन झाले. हेनीने त्याच्यावर न्युयॅार्क टाईम्समध्ये लेख लिहिला. दोन ठिकाणी भाषणेही दिली. त्या लेखात ब्रॅाडस्कीचे गुण गाताना तो लिहितो, “कालपरवा आपल्यात असणाऱ्या ब्रॅाडस्कीविषयी बोलता-लिहिताना भूतकाळाळाची क्रियापदे वापरावी लागतात ह्यापरते दुःख नाही. पण तो (हेनी) “होता, ‘म्हणत असे,’ ‘तो हसायचा,’ ‘कवितेची ओळ अशा तऱ्हेने म्हणायचा की लोक काही वेळ स्तब्ध होत) -तो पुढे म्हणतो, असे भूतकाळ वापरून लिहिणे म्हणजे आपण व्याकरणाचा उपमर्द करतो असे वाटते.”

कविता,काव्यावर प्रेम करणारा, कविता वाचताना श्रोत्यांना आपल्यासमोर प्रत्यक्ष कविताच उभी आहे, असे वाटावयास लावणारा , स्टालिनच्या काळात, कवि आणि त्याच्या कविता हा समाजाला मोठा धोका आहे. तो लोकांचा शत्रु आहे ह्या विचारसरणीमुळे वारंवार पोलिसी चौकशीला सामोरे जावे लागून , तुरुंगवास भोगावा लागलेला, बर्फाळ प्रदेशात छळ-छावणीत सक्त मजुरीची शिक्षा भोगणारा, आणि आपली प्रेयसी, मुलगा, आणि थकत आलेल्या आई वडिलांपासून तोडला गेलेला, तिशीतील तरूण प्रतिभावान कवि जोसेफ ब्रॅाडस्कीला अखेर हद्दपार होऊन अमेरिकेत जावे लागले ! तिथे त्याच्या प्रतिभेचे, बुद्धिमत्तेचे,आणि विचारांचे स्वागत झाले. मोठे मान सन्मानही प्राप्त झाले. आणि ह्या सर्वांवर मानाचा शिरपेच असलेले साहित्याचे नोबेल पारितोषिकही त्याला मिळाले.

जगाच्या उघड्या विद्यापीठात आयुष्याचा अर्थ समजून घेतलेल्या ब्रॅाडस्कीचे १९९६ साली निधन झाले.

ब्रॅाडस्कीचे दैवत,हिरो असलेला,जुलमी राजवटीविरुद्ध आपल्या कवितेतून आवाज उठवणारा कवि मॅन्डलस्टॅम खोचकपणे पण विषादाने म्हणतो,” रशियामध्ये कवितेचा जेव्हढा सन्मान होतो तितका इतरत्र कुठेही होत नाही….. म्हणूनच त्यासाठी अनेकांचे प्राणही घेतले जातात !” रशियातून हद्दपार झालेला, जगाच्या उघड्या विद्यापीठात आयुष्याचा अर्थ समजून घेतलेल्या जोसेफ ब्रॅाडस्कीचे १९९६ साली अमेरिकेत निधन झाले.

सतराव्या शतकाचील फ्रेंच तत्वज्ञानी डेकार्टचे “ I think therefore I am “ हे वचन प्रख्यात आहे . त्याच्या पावलावर पाउल ठेवत विसाव्या शतकात साहित्यप्रेमी ब्रॅाडस्कीने माणसाचे मुल्यांकन करताना डेकार्टच्या वचनाला जणू आणखी विचारसमृद्ध केले आहे. ते वाचण्यासारखे आहे. तो म्हणतो “Man is what he reads !”

फॅहरनहाईट ४५१ कादंबरीतील, जिथे कुठे पुस्तके असतील ती शोधून जाळून टाकण्याच्या ‘अग्निवर्धक’ दलातील एक ‘आगलावा’ त्याला आपण हे काय करतोय ह्याची जाणीव झाल्यावर पश्चात्तापाने म्हणतो , “एकेक पुस्तक जाळताना मी एकेका माणसालाच जाळत होतो ! “ त्याही पुढे जाऊन ब्रॅाडस्की म्हणतो, “ पुस्तके जाळणे हा गुन्हा आहेच पण त्यापेक्षाही पुस्तके न वाचणे हा मोठा गुन्हा आहे.”

जॅार्ज ब्रॅाडस्की असो किंवा त्याच्या आधी होऊन गेलेले तसेच त्याच्या काळातील अनेक थोर साहित्यिकांचे ग्रंथ हेच त्यांचे अमरत्व आहे !

जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे

स्वातंत्र्यवीर सावरकर हे कवि लेखक साहित्यिक होते. विज्ञानवादी होते. उत्कृष्ट वक्ते होते.मात्र लोकांच्या मनांत ते जाज्वल्य देशभक्त रुपानेच विराजमान आहेत. मराठी वाचकांना सावरकरांची ‘ ने मजसी ने परत मातृभुमीला। सागरा प्राण तळमळला” ही कविता माहित आहे. ह्याचे कारण ती शाळेच्या क्रमिक पुस्तकातही होती. त्यांची


जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे


ही देशाला स्वातंत्र्य मिळावे ह्या तळमळीतून स्वतंत्रतेलाच दैवी रूप देऊन तिची स्तुति गाणारी कविता आहे. बहुधा १९५९-६० साली ही कविता आकाशवाणीचे संगीतकार मधुकर गोळवलकर ह्यांनी ‘महिन्याचे गीत’ ह्या कार्यक्रमातून सादर केली. तेव्हापासून वीर सावरकरांची ही कविता प्रकाशात आली. त्यामुळे ती हजारो लोकांपर्यंत पोचली.अलिकडच्या शालेय पुस्तकात ही कविता घेतली आहे.


कवितेची सुरुवात ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे।। ह्या संस्कृत श्लोकाने होते. सावरकरांनी बाजी प्रभु देशपांडे ह्या पराक्रमी वीराच्या पोवाड्याची सुरुवातही ह्याच श्लोकाने केली आहे.


स्वातंत्र्य, स्वतंत्रता ह्या अमूर्त संकल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिले. आपला देश परकीयांच्या ताब्यात आहे. परके लोक आपल्यावर राज्य करतात. त्यांच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी; स्वातंत्र्यासाठी चाललेल्या लढ्यात यश मिळावे ह्यासाठी स्वतंत्रतेलाच देवी मानून कवि तिची स्तुति करतो. स्वराज्यदेवतेचे हे स्तोत्र देशभक्त कवि गात आहे.


प्रारंभीच्या श्लोकात स्वातंत्र्यदेवीचे वर्णन करताना, कवि म्हणतो,” हे महान मंगलकारी,पवित्र, आणि सर्वांचे कल्याण करणाऱ्या आणि आम्हाला यश मिळवून देणाऱ्या स्वतंत्रते भगवतिदेवी तुझा जयजयकार असो. स्वातंत्र्याची देवी भगवति, तू राष्ट्राचे मुर्तिमंत चैतन्य आहेस.तेच स्वातंत्र्य्याचे चैतन्य आमच्यातही सळसळते राहो. सर्व सदगुण आणि नीतिमत्ता तुझ्यात एकवटली असल्यामुळे तू त्यांची सम्राज्ञी आहेस. पारतंत्र्याच्या काळोख्या अंधाऱ्या रा्त्री आकाशात तू तेजस्वी ताऱ्याप्रमाणे लखलखत आहेस.


अथवा (भगवति ! स्वातंत्र्याचा तेजस्वी तारा पारतंत्र्याचा काळोख दूर करो. किंवा तुझा लखलखता तारा चमकू लागला की देशावर पसरलेला गुलामीचा अंधार नाहीसा होईल.)


पुढे नाजुक शब्दांचा सुंदर खेळ करीत कवि स्वातंत्रयदेवीचा गौरव करताना म्हणतो, फुलांचे सौदर्य आणि कोमलता तूच आहेसआणि सूर्याचे तेज आणि समुद्राची गंभीरताही तूच आहेस. त्या पुढच्या ‘अन्यथा ग्रहण नष्ट तेचि’ ह्या शब्दांतून ते स्वातंत्र्याचे सामर्थ्य व महत्व स्पष्ट करताना म्हणतात तू नसताीस तर (पारतंत्र्याच्या) ग्रहणाने ते सौदर्य, तेज आणि सखोल गंभीरता सर्व फिके पडले असते.


विद्वान योगी मुनी ज्याला मुक्ति मोक्ष श्रेष्ठ परब्रम्ह म्हणतात तीही, हे स्वतंत्रते, तुझीच रूपे आहेत. जे काही सर्वश्रेष्ठ, उदार थोर आणि सर्वोच्च आहे ते सर्व तुझे साथी सोबती आहेत. (तेही नेहमी तुझ्या बरोबरच असतात.)


शत्रंचा संहार करताना, त्याच्या रक्ताने रंगलेल्या चेहऱ्याने अधिकच सुशोभित दिसणाऱ्या स्वातंत्र्यदेवते, सर्व चांगले सज्जन लोक तुझीच पूजा करतात; तुझ्यासाठी लढता लढता आलेले मरण हेच खरे जगणे; जन्माला आल्याचे ते सार्थक आहे. हे स्वतंत्रते तू नसलीस ( देश स्वतंत्र नसला तर) तर ते कसले जिणे? ते मरणाहून मरणे होय ! स्वातंत्र्य हेच जीवन, पारतंत्र्य हेच मरण! निर्माण झालेले सर्व काही, सकल प्राणीमात्र तुलाच शरण येते. ह्या भावनेतूनच कवि तळमळीने विचारतो,”तू आमच्या देशाला कधी जवळ करशील? आम्हा देशवासीयांना हे स्वतंत्रते, ममतेने कधी हृदयाशी धरशील? “
पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकलेल्या हिमालयाच्या मोहातून शंकरही सुटला नाही. हिमालयाला त्याने आपले घरच मानले. मग तू इथे का रमत नाहीस? अप्सराही इथल्याच गंगेच्या, चंद्रप्रकाशा सारख्या रुपेरी पाण्याच्या आरशात पाहून स्वत:ला नीट नेटके करतात.मग स्वातंत्र्यदेवी तुला आमच्या देशात का करमत नाही? आमच्या देशाचा तू का त्याग केलास? पाहिजे असेल तर तुझ्या वेणीत घालायला तुला इथे रोज ‘कोहिनूर’ चे ताजे फुलही आहे. ह्या सुवर्णभूमीत तुला कशाचीही कमतरता पडणार नाही.


आमची भारतमाता सर्व समृद्धीने भरली असता,तू तिला का दूर लोटलेस? कुठे गेली तुझी पुर्वीची माया ममता ? तू तिला परक्यांची दासी केलेस. माझा जीव तळमळतो आहे. यशाने युक्त असलेल्या स्वातंत्र्यदेवते! तुला वंदन करून मी हेच विचारतो की तू आमचा त्याग का केलास? आमच्या देशाला तुझ्यापासून का दूर लोटलेस? हे स्वतंत्रते! ह्याचे उत्तर दे.

वाचनालय विद्यापीठाचा पीएचडी

दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. युरोपमध्ये कित्येक इमारतींतून कोंदलेल्या धुराचे लोटअद्यापही बाहेर येत होते. शहरे उध्वस्त झाली होती. ग्रंथालयांच्या इमारतीसुद्धा अपवाद नव्हत्या. त्यांचीही पडधड झाली होती. आगी आतल्या आत धुमसत होत्या. जळालेल्या पुस्तकांची राख पसरली होती. ह्याच सुमारास …..


…..ह्याच सुमारास लॅास एन्जलिस मध्ये रे ब्रॅडबरीच्या डोक्यात एक पुस्तक घोळत होते. त्याचे नावही त्याने ठरवले होते. The Fireman. हा फायरमन आग विझवणारा नाही. ज्याला आगवाला आपण म्हणतो तसा Fireman. आगगाडीच्या इंजिनमध्ये कोळसे टाकणारा, किंवा कारखान्यात भट्टी पेटती ठेवणारा तशा प्रकारचा. . .. एका अर्थी आगलाव्याच !


रे ब्रॅडबरी लॅास एन्जलिस मध्ये वाढला होता. १९३८ मध्ये तो बारावी पास झाला. काळ फार मोठ्या मंदीचा होता. त्यामुळे व घरच्या परिस्थितीमुळे कॅालेजमध्ये जाणे त्याला शक्यच नव्हते. त्याला वाचनाची आवड होती. तो चांगल्या गोष्टीही लिहायचा. विशेषत: विज्ञान कथा. त्याही विज्ञानातील अदभुत गूढरम्य कथा. त्याच्या गोष्टी Amazing Stories, Imagination, Super Science Stories ह्या सारख्या मासिकांत प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या.


ह्यामागे त्याची प्रतिभा आणि वाचनाची आवड व ती भागवणारी लायब्ररी ह्यांचाही मोठा सहभाग होता. कॅालेजमध्ये जाणे शक्य नाही ही खात्री असल्यामुळे तो लायब्ररीत जाऊ लागला. त्याचे सर्वात आवडते ग्रंथालय म्हणजे ‘ लॅास एन्जलिस पब्लिक सेन्ट्रल लायब्ररी’. सतत तेरा वर्षे ह्या ग्रंथालयात जात होता. प्रत्येक विभागात त्याचा संचार होता. त्या प्रत्येक विभागातली सर्व पुस्तके वाचून काढली. त्या लायब्ररीचा एकूण एक काना कोपरा त्याला माहित होता. रे ब्रॅडबरी म्हणतो की,” ह्या लायब्ररीतल्या प्रत्येक खोलीत मी बसलो. प्रत्येक खोलीतली सर्व पुस्तके मी वाचली.” त्याने काय वाचले नाही? जगातल्या सर्व कविता वाचल्या. नाटके वाचली.रहस्यकथा, भयकथा, सर्व निबंध संग्रह वाचले. तत्वज्ञान,इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, कादंबऱ्या,चरित्रे आत्मचरित्रे सगळी पुस्तके वाचून काढली. सुरवातीला गरज म्हणून ग्रंथालयात जात असे. पण नंतर ग्रंथालय हे त्याचे प्रेम प्रकरण झाले ! पक्ष्याला जसे घरटे; तसे ब्रॅडबरीला ग्रंथालय हे त्याचे घर,महाल, राजवाडा होता. तो म्हणतो, “मी तिथेच जन्मलो,तिथेच वाढलो.” उगीच तो स्वत:ला अभिमानाने ‘ Library Educated ‘ म्हणवून घेत नसे!


लॅास एन्जलिसची ही मुख्य लायब्ररी १९८६ साली प्रचंड आगीच्या भक्षस्थानी पडली तेव्हा रे ब्रॅडबरीला—सच्च्या पुस्तकप्रेमी वाचकाला—काय झाले असेल! Fiction विभागातील A to L पर्यंतची सर्व पुस्तके जळून गेली. ही सर्व पुस्तके ब्रॅडबरीने वाचून काढली होती!


रे ब्रॅडबरीने आपले पुस्तक The Fireman लिहिण्याचे मध्येच थांबवले. कारण माहित नाही. चार पाच वर्षांनी सिनेटर जोसेफ मॅकार्थीने जेव्हा,”परराष्ट्र खात्यात कम्युनिष्टांची भरती आहे. त्यांची अमेरिकेविषयी निष्ठा संशयास्पद आहे.” म्हणत त्या खात्यातील व इतरही क्षेत्रातील अशा अनेक संशयितांची शोध घेण्याची मोहिम उघडली तेव्हा त्याला ,” हे काही चांगले चिन्ह नाही. परिस्थिती कसे वळण घेईल नेम नाही !” असे वाटल्याने त्याने आपली The Fireman कादंबरी पूर्ण करायची ठरवले.


रे ब्रॅडबरीचे घर लहान. घरात दोन मुले होती. बाहेर खोली भाड्याने घेणेसुद्धा परवडत नव्हते. पण त्याला लॅास एन्जल्सची बहुतेक वाचनालये माहित होती. एलए विद्यापीठाच्या पॅावेल लायब्ररीच्या तळघरात टाईपरायटर्स होते. अर्ध्या तासाला दहा सेंट भाडे होते. तिथे बसून त्याने फायरमन पुस्तक लिहून पूर्ण केले. ९ डॅालर्स ८० सेंट खर्चून नऊ दिवसात त्याने ते पूर्ण केले! पुस्तकांनी भरलेल्या ग्रंथालयात बसून पुस्तके जाळण्यासंबंधीचे पुस्तक लिहावे हा चमत्कारिक योगायोग म्हणावा लागेल !


पुस्तक लिहून झाले पण रे ब्रॅडबरीला ‘फायरमन’हे नाव योग्य वाटेना. त्याला दुसरे नावही सुचत नव्हते. एके दिवशी जणू झटका आल्याप्रमाणे त्याने लॅास एन्जलिसच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखालाच फोन करून ,” कोणत्या तापमानाला पुस्तके जळून खाक होतात?” विचारले. त्यावर त्या मुख्याधिकाऱ्याने सांगितले तेच ब्रॅडबरीने आपल्या पुस्तकाचे नाव ठेवले, Fahrenheit 451.


रे ब्रॅडबरीचा जन्म १९२० साली झाला. ९१ वर्षाचे दीर्घायुष्य अनुभवुन व जगून तो २०१२ साली वारला. आयुष्यभर तो लेखन करत होता. त्याला आपण लेखक व्हावे ही स्फूर्ती कशी झाली ती घटनाही मोठी गमतीची आहे. १९३२ साली घडलेला हा प्रसंग आहे. त्यावेळी गावात मोठा उत्सव होत असे. त्या उत्सवी जत्रेत अनेक करमणुकीचे कार्यक्रम, खेळ, संगीत ह्या नेहमीच्या रंजक गोष्टी असत.


त्यावर्षी प्रख्यात Mr. Electrico नावाचा विद्युत शक्तीचा वापर करून जादूचे व इतर खेळ करणारा जादुगारही आला होता. प्रयोगातील अखेरीच्या खेळात Mr. Elctrico ने त्याच्या खेळात ‘जम्बुरे ऽऽ’ झालेल्या बारा वर्षाच्या लहान रे ब्रॅडबरीच्या डोक्यावर निळ्या प्रकाशाची तलवार ठेवून जणू भाकित केल्याप्रमाणे तो मोठ्याने , “Live Forever!” असे ओरडून म्हणाला! मि. इलेक्ट्रिकोच्या ह्या वरदानाने रे खूष झाला. “ त्या दिवसापासून मी नेमाने लिहू लागलो.” असे ब्रॅडबरी म्हणतो. त्याने ठरवले की आपण लिहायचे,लेखक व्हायचे. आयुष्यभर त्याने लेखन केले. त्याने पाचशेच्यावर कथा लिहिल्या. त्यातील जास्त विज्ञान-अदभुत कथा आहेत. कविता लिहिल्या. कादंबऱ्या,नाटके, नाटिका, सिनेमाच्या कथा पटकथा लिहिल्या. TV मालिकाही लिहिल्या. त्यात Alfred Hitchcock Presents मालिकेतील बरेच भाग त्याने सादर केले होते.


साहित्याच्या सर्व प्रकारात त्याची प्रतिभा व लेखणी सहजतेने संचार करत होती. पण वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी, आपण लेखक होऊन आपल्या पुस्तक रूपाने अजरामर होऊ असे वाटणे हे किती कौतुकाचे आणि तितकेच विस्मयकारक आहे!
रे ब्रॅडबरीने काय लिहिले नाही? त्याने विज्ञान-कल्पनारम्य कथा लिहिल्या. अदभुत कथा, भयकथा, रहस्यकथा लिहिल्या. कल्पना आणि वास्तव ह्यांचे बेमालूम मिश्रंण असलेल्या -ज्याला जादुई वास्तव म्हणले जाते- कथाही लिहिल्या. नाटके, पटकथा लिहिल्या. वाड•मयातील सर्व प्रकारांचे लेखन केले. पण तो प्रामुख्याने ओळखला जातो ते त्याच्या दोन तीन पुस्तकांमुळे. ती म्हणजे Fahrenheit 451, Martian Chronicles आणि The illustrated Man ह्या पुस्तकांमुळे. Fahrenheit 451 विषयी लिहायचे तर तो स्वतंत्र लेख होईल.


वरील पुस्तकांबरोबर त्याच्या निबंधांच्या पुस्तकांचाही उल्लेख करावा लागेल. त्या पुस्तकात त्याने वाचलेल्या पुस्तकांसंबंधी, त्याच्या आवडत्या लेखकांविषयीही लिहिले आहे. तसेच लिहावे कसे हेसुद्धा सांगितले आहे. पण बहुतेक निबंधातून त्याचा लिहिण्याविषयीचा दृष्टिकोन आढळतो. मुख्य सुत्र हेच की,” लिहिणे हा आनंदोत्सव आहे!” त्याने लिहायचे म्हणून कधी लिहिले नाही. त्याने कधीही ‘कर्तव्य’ भावनेने लिहिले नाही.


रे ब्रॅडबरीला भविष्याची वेध घेण्याची प्रतिभा होती. दृष्टी होती. आगामी काळात बॅंकेत टेलर येतील. ते इलेकट्रॅानिक असतील. म्हणजे आजच्या एटीमचे पुर्वरूप त्याच्या कथातून आले आहे. तसेच त्याच्या फॅरनहाईट ४५१ मध्ये प्रा. फेबर्स कानात लपणारे radio telephone वापरतो. त्याला तो ear thimble म्हणतो. हेच आज Bluetooth headphones, EarPods म्हणून ओळखले जातात. ब्रॅडबरीने त्याचे १९४९-५० मध्ये भविष्य केले होते. त्याने त्याचे कधी Cacophonus असेही वर्णन केले आहे.


इतक्या विज्ञान कथा लिहिणाऱ्या रे ब्रॅडबरीने आयुष्यात कम्प्युटर कधी वापरला नाही. त्याने आपले लिखाण टाईपरायटरवरच केले. तसेच त्याने कधी मोटारही चालवली नाही. लायसन्स काढण्याचा प्रश्नच नव्हता. ह्याचे कारण तो दृष्टीने अधू होता. बरेच वेळा प्रख्यात नटी कॅथरीन हेपबर्नने त्याला आपल्या मोटारीतून नेले व परत त्याच्या ॲाफिसमध्ये आणून सोडले आहे. तो सायकल किंवा टॅक्सीने ये जा करायचा. तो सायकलवरून जात असताना दुसरी प्रसिद्ध नटी डोरिस डे सायकलवरून जात असली तर ती हसत हसत त्याला हात करून मगच पुढे जाई.


रे ब्रॅडबरीच्या पुस्तकाने अक्षरश: अंतराळ प्रवास केला आहे. नासाचे मंगळावर जाणाऱ्या फिनिक्स यानातून रे ब्रॅडबरीचे Martian Chronicles हे पुस्तक मंगळावर पोचवले. तसेच नासाने मंगळावरील एका विवराला त्याच्या एका कादंबरीचे Dandelion Wines नाव दिले आहे. रे ब्रॅडबरीच्या मृत्युनंतर दोन अडीच महिन्यांनी नासाचे Curiosity Rover मंगळावर जिथे उतरले त्या तळाला Bradbury Landing हे नाव त्याच्या स्मरणार्थ देऊन त्याचे नाव व आठवण जतन केली आहे.


भविष्याचा वेध घेणाऱ्या, विज्ञानाची जाण असणाऱ्या त्याच बरोबर वाड•मयीन प्रतिभा असणाऱ्या रे ब्रॅडबरीविषयी सध्या इतकेच पुरे.

पारले-जी

माझ्या कमावत्या काळात सगळ्यांत जास्त संबंध दोनच गोष्टींशी आला. एसटीची तांबडी बस आणि ग्लुकोजची बिस्किटे. नुसती ग्लुकोजची म्हटले तरी ती पारलेचीच हे सर्वांना माहित आहे. कारण ग्लुकोजची बिस्किटे म्हणजेच पारले व पारले म्हटलेकी ग्लुकोजची बिस्किटे ही समीकरणे लोकांच्या डोक्यांतच नव्हे तर मनांतही ठसली आहेत. ग्लुकोजची बिस्किटे जगात पारलेशिवाय कुणालाही करता येत नाहीत ह्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. संपूर्ण देशात ह्या एकाच गोष्टीवर मतभेद नाहीत.


१९५६ सालची गोष्ट असेल. दादर किंवा चर्चगेटहून मालाडला यायला निघालो की पेंगुळलेल्या डोळ्यांना जाग यावी किंवा मुंबईचा वास नाहीसा होऊन खऱ्या अर्थाने मधुर चवीचा वास येऊ लागला की डब्यातली सर्व गर्दीही ताजीतवानी व्हायची. पारले स्टेशन आले ह्याची खात्री पटायची. विलेपारलेच्या पूर्वेला राहणारे प्रवासीही घरी जाताना पारलेच्या ग्लुकोज बिस्किटाच्या फॅक्टरी कडे आत्मीयतेने पाहात, दिवसभराचे श्रम विसरून,ताज्या ताज्या ग्लुकोज बिस्किटांचा मधुर चवीचा वास पोट भरून घरी न्यायचे.आम्ही पुढे जाणारेही तो चविष्ट सुगंध एकदोन स्टेशने जाईपर्यंत साठवत असू.पार्ले बिस्किटांची ही प्रत्यक्ष ओळख अशी झाली.


फिरतीची नोकरी. जिल्ह्याच्या गावी आणि,तालुक्या तालुक्यातूनच नव्हे तर लहान मोठ्या गावांनाही जावे लागे. एसटीतून उतरल्यावर लगेच लहान मोठ्या थांब्यावरच्या कॅंटीन उर्फ काहीही म्हणता येईल अशा हाॅटेलात जायचे. गरम वडे किंवा भजी तळून परातीत पडत असत. शेजारी पातेल्यात तेलात वाफवलेल्या अख्ख्या मिरच्या असत. मालक किंवा पोऱ्या वर्तमानपत्राच्या कागदात एक पासून चार चार वडे किंवा भजी आणि मिरच्यांचे तुळशीपत्र टाकून पटापट गिऱ्हाईकी करत असायचे. गरमागरम भज्या वड्यांचा मोह टाळता येत नसे. तो खाल्ला की गरम व मसालेदार वड्यांनी हुळहुळलेल्या जिभेचे आणखी लाड करण्यासाठी एक हाप किंवा कट किंवा तसले प्रकार नसलेल्या गाडीवर एक चहा आणि पारले जी चा दोन रुपयाचा पुडा घेऊन त्या केवळ पोटभरू नव्हे तर कुरकुरीत व खुसखुशीत गोड बिस्किटांची मजा लुटायला सुरवात करायची!


भले पारले जी पोटभरू असतील. पण त्याहीपेक्षा आणखी काहीतरी नक्कीच होती. चविष्ट गोड असायची. दोन खाऊन कुणालाच समाधान होत नसे. तो लहानसा पुडा चहाबरोबर कधी संपला ते ग्लुकोज बिस्किटांच्या तल्लीनतेत समजत नसे.


मला पारले-जीची ओळख व्हायला पंचावन्न -छपन्न साल का उजाडावे लागले? त्या आधी बिस्किटे खाणे हे सर्रास नव्हते. बरे मिळत होती ती हंट्ले पामरची मोठी चौकोनी तळहाताएव्हढी. पापुद्रे असायचे पण मुंबईच्या बेकरीतील खाऱ्या बिस्किटांसारखे अंगावर पडायचे नाहीत. फक्त जाणीव होत असे खातांना. पण साहेबी थाटाची, चहा बरोबर तुकडा तोंडात मोडून खायची. त्यामुळे ती उच्चभ्रू वर्गासाठीच असावीत असा गैरसमज होता. पण खरे कारण म्हणजे ‘पाव बटेर’ पुढे बिस्किटांची गरजही भासत नसे. बरे बेकरीत तयार होणारी नानकटाई लोकांच्या आवडीची होती.

बेकरीची गोल, चौकोनी बिस्किटेही खपत होती. पण तीही रोज कोणी आणत नसे. शिवाय बिस्किटे हा मधल्या वेळच्या खाण्याचा किंवा येता जाता तोंडात टाकायचा रोजचा पदार्थ झाला नव्हता. बिस्किटे चहाबरोबरच खायची अशी पद्धत होती. खाण्याचे पदार्थ म्हणजे शेव,भजी, चिवडा, भाजलेले किंवा खारे दाणे, फुटाणे आणि डाळे चुरमुर. हे ब्लाॅक बस्टर होते.


डाळे चुरमुऱ्यांचीही गंमत आहे. आगरकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला हे प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या बरोबरीचे व नंतरची मोठी झालेली माणसेही रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करत होतो हे लिहू लागले. रस्त्यावरच्या दिव्याप्रमाणे माधुकरी मागून शिक्षण केले हा गरीबीतून कसे वर आलो सांगण्याचा प्रघात होऊ लागला. पण सर्वांना, गरीबांना तर होताच होता, गरीबी सांगण्यासाठी ‘“ कित्येक दिवस तर नुसत्या डाळंचुरमुऱ्यांवर काढले” असे म्हणणे प्रचलित होते. सांगायची गोष्ट अशी की डाळे चुरमुरेही सर्वप्रिय होते. येव्हढ्या गर्दीत बिस्किटांचा सहज प्रवेश होणे सोपे नव्हते.


खाल्लीच बिस्किटे तर लोक बेकरीत मिळणारी खात असत. त्यातही मध्यंतरी आणखी एक पद्धत प्रचलित झाली होती. आपण बेकरीला रवा पीठ तूप साखर द्यायची व बेकरी तुम्हाला बिस्किटे बनवून देत.त्यासाठी ते करणावळही अर्थातच घेत. तरीही ही बिस्किटे स्वस्त पडत. ह्याचे कारण ती भरपूर वाटत. गरम बिस्किटांचा आपलाच पत्र्याचा डबा घरी घेऊन जाताना फार उत्साह असे. आणि ‘ इऽऽऽतकीऽऽऽ बिस्किटे’ खायला मिळाणार ह्या आनंदाचा बोनसही मिळे!
त्या व नंतरचा काही काळ साठे बिस्किट कं.जोरात होती. त्यांची श्र्युजबेरी बिस्किटे प्रसिद्ध होती. पण पारले बिस्किट कंपनी आली आणि चित्र बदलले. स्वातंत्र्य मिळाले होते. त्या अगोदरच पारले कं.सुरु झाली होती. पण इंग्लिश कंपन्यांपुढे अजून तिचा जम बसत नव्हता. पण विक्रीची जोरदार मोहिम, विक्रेत्यांचे जाळे वाढवत नेणे आणि जाहिरातींचा मारा व स्वस्त किंमत ह्यामुळे नंतर नंतर पारलेने जम बसवला.


पारलेला प्रतिस्पर्धी पुष्कळ निर्माण झाले. त्यातला सर्वात मोठा म्हणजे ब्रिटानिया. त्यांनी पारले ग्लुकोजला तोड म्हणून टायगर ब्रॅन्ड आणला पण पारले जी पुढे त्या वाघाची शेळी झाली. स्पर्धेला तोंड देताना पारलेने व्यापारी क्लृप्त्याही वापरल्या. महागाईतही कमी किंमत कायम ठेवण्यासाठी पुड्यांतील बिस्किटांचे वजन कमी करणे,बिस्किटांचा आकार लहान करणे हे केलेच. त्यामुळे आजही दोन रुपये,पाच व दहा रुपयांची पाकीटे मिळतात. परवडतात. पूर्वी पारलेच्या बिस्किटांचा आयताकारी चौकोन मोठा होता. आता बराच लहान केला आहे.तरीही आजही ग्लुकोज म्हणजे पारले-जी च ! काही असो पारलेजी! तुम्ही लोकांसाठी आहात , लोकांचेच राहा.


पारलेने,पाकीटबंद बिस्किटे ही उच्चवर्गीयांसाठीच असतात ही कल्पना लोकांच्या मनातून काढून टाकली! कोणीही बिस्किट खाऊ शकतो हे पारलेने दाखवले.. त्यामुळे कमी किंमतीची लहान पाकीटे पारलेनेच आणली. दोन रुपयाचे पारले-जीचे बिस्किटांचे पाकीट गरीबही घेऊ लागला. चहा बरोबर बिस्किट खाऊ लागला! ‘चहा साखर पोहे ’ या बरोबरच पारले-जी चा पुडाही किराण्याच्या यादीत येऊन बसला. तर ‘धेले की चायपत्ती धेले की शक्कर’बरोबरच गोरगरीब मजूरही पारले-जी का पाकेट’ मागू लागले. दुकान किराण्याचे,दूध पाव अंड्यांचे असो,की पानपट्टीचे, जनरल स्टोअर किंवा स्टेशनरीचे असो पारले ग्लुकोजची बिस्कीटे तिथे दिसतीलच.तसेच हाॅटेल उडप्याचे असो की कुणाचे, कॅन्टीन,हातगाडी,टपरी काहीही असो जिथे चहा तिथे पारले-जी असलेच पाहिजे.


पॅकींगवर कंपनीने ग्लुको लिहिले असले तरी सगळेजण बिस्किटाला ग्लुकोजच म्हणतात! सर्व देशात प्रचंड प्रमाणात आवडीने खाल्ला जाणारा एकच पदार्थ आहे पारले-जी. मग भले अमूल आपले’ दूध इंडिया पिता है’म्हणो की ‘इंडियाज टेस्ट’ असे स्वत:चे वर्णन करो; देशातल्या जनतेची एकमेव पसंती पारले- जी ची ग्लुकोज बिस्किटे! गरीबालाही श्रीमंती देणारी ही बिस्किटे आहेत.


चहाचा दोस्त आणि भुकेला आधार असे डबल डेकर पारले ग्लुकोज बिस्किट आहे. म्हणूनच मी तीस चौतीस वर्षाच्या नोकरीच्या काळात एसटीतून उतरलो की चहा आणि पारलेचा एक पुडा संपवायचो. एक पुडा कामाच्या बॅगेत टाकायचो. दिवस मस्त जायचा. अपवाद फक्त उन्हाळ्याचा. उन्हाळ्यात ,”लोकहो विचार करा चहापेक्षा रस बरा” ह्या सुभाषिताचे मी एकनिष्ठेने पालन करायचो. तरीही पारलेची ग्लुकोज सोडली नाहीत. ती नुसती खाण्यातही मजा आहे!


आजही मुले माझ्यासाठी, बाजारातून येताना आठवणीने पारले- जी ग्लुकोज बिस्किटे आणतात. ह्या पेक्षा दुसरा आनंद कोणता असेल!

संत कान्होपात्रा

पंढरपुरपासून मंगळवेढा १४-१५ मैलावर आहे. म्हणजे जवळच आहे. आपल्याला मंगळवेढे, दुष्काळात उपासमारीने गांजलेल्यांसाठी बादशहाचे धान्याचे गोदाम ज्यानी स्वत:च्या जबाबदारीवर खुले केले; अनेकांचे प्राण वाचवले त्या भक्त दामाजीमुळे माहित आहे. दामाजीचे मंगळवेढे अशी त्याची ओळख झाली.

त्याच मंगळवेढ्यात श्यामा नावाची सुंदर वेश्या राहात होती.तिला एक मुलगी होती. ती आपल्या आईपेक्षाच नव्हे तर अप्सरेपेक्षाही लावण्यवती होती. तिचे नाव कान्होपात्रा होते.

व्यवसायासाठी श्यामाने आपल्या ह्या सौदर्यखनी कान्होपात्रेला गाणे आणि नाचणे दोन्ही कला शिकवल्या. नृत्यकलेत आणि गायनातही ती चांगली तयार झाली. सौदर्यवती असली तरी समाजात गणिकेला काही स्थान नव्हते.

पण श्यामाला मात्र आपली मुलगी राजवाड्यात राहण्याच्याच योग्यतेची आहे असे वाटायचे. राजाची राणी होणे कान्होपात्रेला अशक्य नाही ह्याची तिला खात्री होती. तिला राजदरबारी घेऊन जाण्याचे तिने ठरवले. कान्होपात्रेला ती म्हणाली, “ अगं लाखात देखणी अशी तू माझी लेक आहेस. तुला राजाची राणी करण्यासाठी आपण राजदरबारात जाणार आहोत. तयारी कर.” त्यावर कान्होपात्रा म्हणाली, “ आई, माझ्याहून राजबिंडा आणि तितकाच गुणवान असणाऱ्या पुरुषालाच मी वरेन. पण मला तर माझ्या योग्यतेचा तसा पुरुष कोणी दिसत नाही.” थोडक्यात कान्होपात्रेने आईच्या विचारांना विरोध केला.

काही दिवस गेले. एके दिवशी कान्होपात्रेच्या घरावरून वारकऱ्यांची दिंडी, आपली निशाणे पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या तालावर, विठ्ठलाचे भजन करीत चालले होते. तीही त्या तालावर ठेका धरून डोलत होती.तिने वारकऱ्यांना विचारले, “ तुम्ही कुठे निधाले आहात? इतक्या आनंदाने आणि तल्लीन होऊन कुणाचे भजन करताहात?”

“ माय! पुंडलिकाच्या भेटी जो पंढरीला आला, आणि इथलाच
झाला त्या सावळ्या सुंदर, राजीव मनोहर अशा रूपसुंदर वैकुंठीचा राणा त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी चाललो आहोत!”
वारकरी कान्होपात्रेला सांगत होते. त्यांनी केलेल्या विठ्ठ्लाचे रूपगुणांचे वर्णन ऐकून कान्होपात्रेने त्यांना काहीशा संकोचानेच विचारले,” अहो,तुम्ही वर्णन केलेला हृषिकेषी माझ्यासारखीचा अंगिकार करेल का?” हे ऐकल्यावर वारकी तिला मोठ्या उत्साहाने सांगू लागले,” का नाही? कंसाची कुरूप विरूप दासी कुब्जेला ज्याने आपले म्हटले तो तुझ्यासारख्या शालीन आणि उत्सुक सुंदरीला दूर का लोटेल? आमचा विठोबा तुझाही अंगिकार निश्चित करेल ! तू कसलीही शंका मनी आणू नकोस. तू एकदा का त्याला पाहिलेस की तू स्वत:ला विसरून जाशील. तू त्याचीच होशील !”

वारकऱ्यांचे हे विश्वासाचे बोलणे ऐकल्यावर कान्होपात्रा घरात गेली. आईला म्हणाली,” आई! आई! मी पंढरपुराला जाते.”
हिने हे काय खूळ काढले आता? अशा विचारात श्यामा पडली. कान्होपात्रेला ती समजावून सांगू लागली.पण कान्होपात्रा आता कुणाचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. केव्हा एकदा पंढरपूरला पोचते आणि पांडुरंगाला पाहते असे तिला झाले.

कान्होपात्रा धावत पळत निघाली. दिंडी गाठली. आणि रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।। म्हणत आणि वारकऱ्यांच्या पाठोपाठ ते म्हणत असलेले अभंग भजने आपल्या गोड आवाजात म्हणू लागली.तिचा गोड आवाज ऐकल्यावर एकाने आपली वीणाच तिच्या हातात दिली !

वारकऱ्य्ंबरोबर कान्होपात्रा पंढरीला आली. विठठ्लाच्या देवळाकडे निघाली.महाद्वारापशी आल्याबरोबर हरिपांडुरंगाला लोटांगण घातले.राऊळात गेल्यावर तिला जे विठोबाचे दर्शन झाले तेव्हा ती स्वत:ला पूर्णपणे विसरली.तिच्यात काय बदल झाला ते तिला समजले नाही. पण ती पंढरपुरातच राहिली.

कान्होपात्रा रोज पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर महाद्वारापाशी कीर्तन करू लागली.दिवस असे जात असताना एका दुर्बिद्धीने बेदरच्या बागशाहाला कान्होपात्रेच्या अप्रतिम लावण्याचे मीठ मसाला घालून वर्णन केले. बादशहाने दूत पाठवून तिला घेऊन यायला सांगितले.

बादशहाचे शिपाई पंढरपुरात आले तेव्हा कान्होपात्रा कीर्तन करत होती. तिच्या सौदर्याला आता भक्तीचा उजाळा आला होता.बादशहाचे शिपाई तिला पाहिल्यावर आपण कशासाठी आलो हे विसरून कान्होपात्रेकडे पाहातच राहिले.नंतर भानावर येऊन तिला जोरात म्हणाले,” बादशहाने तुला बोलावले आहे.चल आमच्या बरोबर. कान्होपात्रा घाबरली.शिराई तिला पुढे म्हणाले,” निमुटपणे चल नाहीतर तुला जबरदस्तीने न्यावे लागेल.” ती दरडावणी ऐकल्यावर कान्होपात्रेला तिच्या विठोबाशिवाय कुणाची आठवण येणार? ती शिपायांना काकुळतीने म्हणाली,” थोडा वेळ थांबा. मी माझ्या विठ्ठ्लाचे दर्शन घेऊन येते.” कान्होपात्रा तडक राऊळात गेली आणि विठोबाच्या चरणी डोके टेकवून त्याचा धावा करू लागली.भक्त दुसरे काय करू ऱ्शकणार?

“पांडुरंगा, तू चोखा मेळ्याचे रक्षण केलेस मग माझे रक्षण तू का करत नाहीस? एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून तू गोपींचे गोपाळांचे, गायी वासरांचे संपूर्ण गावाचे प्रलयकारी पावसापासून रक्षण केलेस आणि मला का तू मोकलतो आहेस? विठ्ठ्ला, माझ्या मायबापा! अरे मी तुला एकदा वरले, तुझी झाले आणि आता मला दुसऱ्या कुणी हात लावला तर कुणाला कमीपणा येईल? विठ्ठला तुलाच कमीपणा येईल. बादशहाने मला पळवून नेले तर सर्व साधुसंत तर तुला हसतीलच पण सामान्यांचा तुझ्यावरच निश्वास उडेल. ती धावा करू लागली. “नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे।। तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी। धाव हे जननी विठाबाई।। पांडुरंगा, माी सर्व आशा,वासना कधीच सोडल्या आहेत. आता तरी “घेई कान्होपात्रेस हृदयात” ही कान्होपात्रेची तळमळून केलेली विनवणी फळाला आली. कान्होपात्रेचे चैतन्य हरपले. विठ्ठलाच्या पायावर ठेवलेले डोके तिने वर उचललेच नाही. विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला !

देवळातल्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर त्यांनी लगेच देवळाच्या आवारात दक्षिणदारी कान्होपात्रेला घाईगडबडीने पुरले.आणि काय चमत्कार! लगेच तिथे तरटीचे झाड उगवले.

बाहेर बादशहाचे शिपाई कान्होपात्रेची वाट पाहात ताटकळले.त्यांनी पुजाऱ्यांना आवाज दिला. भेदरलेले पुजारी धावत आले.त्यांनी शिपायांना कान्होपात्रा गेली. आम्ही तिचे प्रेत पुरले. लगेच तिथे झाडही उगवले!” हे ऐकल्यावर शिपाई संतापाने ओरडले, “ हरामजादों ! तुम्हीच तिला लपवून ठेवले. आणि मेली काय, लगोलग पुरली काय आणि वर झाड उगवले म्हणता? सरासर झूट.” असे म्हणत त्यांनी पुजाऱ्यांना पकडून बादशहाकडे निघाले. तेव्हढ्यात एक पुजारी सटकला. देवळाकडे जाऊ लागला. त्याच्या मागे शिपाई धावले.कुठे पळतोस म्हणत त्याच्या पाठीवर दोन कोरडे ओढले. पुजारी म्हणाला,” बादशहासाठी प्रसाद आणायला चाललो होतो” हे ऐकल्यावर शिपाई ओरडले,” तू भी अंदर जाके मर जायेगा! आणि तिथेच बाभळीचे झाड उगवले म्हणून तुझेच हे ऱ्भाईबंद सांगतील.” पण शेवटी गयावया करून तो पुजारी आत गेला. नारळ बुक्का फुले घेऊन आला.

पुजाऱ्यांना राजापुढे उभे केले.पुजाऱ्यानी आदबीने बादशहापुढे प्रसाद ठेवला. शिपायांनी घडलेली हकीकत सांगितली. ती ऐकून बादशहा जास्तच भडकला. “ काय भाकडकथा सांगताय तुम्ही. कान्होपात्रा अशी कोण आहे? एक नाचीज् तवायफ! आणि तुम्ही सांगता तुमच्या देवाच्या पायावर डोके ठेवले और मर गयी?” वर तरटीका पेड भी आया बोलता?” असे म्हणत त्याने प्रसादाचा नारळ हातात घेतला. त्याला त्यावर कुरळ्या केसांची एक सुंदर बट दिसली. “ये क्या है? किसका इतना हसीन बाल है?” म्हणूनओरडला; पण शेवटच्या तीन चार शब्दांवर त्याचा आवाज हळू झाला होता. पुजारी गडबडले. काय सांगायचे सुचेना. कान्होपात्रेचा तर नसेल? असला तरी सांगायचे कसे? शेवटी विठोबाच त्यांच्या कामी आला. ते चाचरत म्हणू लागले,” खा-खाविंद! वो वो तो आमच्या पांडुरंगाची बट है !” शाहा संतापला.” अरे अकलमंदो! दगडी देवाला कुठले आले केस? क्या बकवाज करते हो?!” पुजारी पुन्हा तेच सांगू लागल्यावर बादशहाने फर्मान सोडले.ताबडतोब पंढरपुरला जायचे. केसाच्या बटेची शहानिशा करायची. पुजाऱ्यांच्या पोटात गोळाच उठला.पण करतात काय!

बादशहाचा लवाजमा निघाला.दोरखंड बाधलेले पुजारी भीतीने थरथर कापत चालले होते. जस जसे पंढरपुर जवळ आले तशी पुजाऱ्यांनी विठ्ठलाची जास्तच आळवणी विनवणी सुरू केली.देऊळ आले.पुजाऱ्यांचे प्राण कंठाशी आले होते. राजा सभामंडपातून थेट मूर्तीपाशी गेला.आता काय होईल ह्या भीतीने पुजारी मटकन खालीच बसले.

राजाने ती सावळी सुंदर हसरी मुर्ती पाहिली.विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकुट प्रकाशाने झळाळू लागला. त्यातूनच विठ्ठलाच्या केसांचा रूळत असलेला संभार दिसू लागला! पांडुरंगाचे दर्शन इतके विलोभनीय आणि मोहक होते की बादशहाच्या तोंडून,” या खुदा! कमाल है! बहोत खूब! बहोत खूब! “ असे खुषीत येऊन बादशहा म्हणाल्यावर पुजारीही विस्फारलेल्या डोळ्यांनी पंढरीनाथमहाराजांकडे पाहू लागले. त्यांचा विश्वास बसेना.डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.

बादशहाने कान्होपात्रेचे तरटीचे झाड पाहिले.ते पाहिल्यावर कान्होपात्रेची योग्यता त्याच्या लक्षात आली. त्याच बरोबर त्याने प्रत्यक्ष जे पाहिले त्यामुळे त्याला मोठे समाधान आणि आनंदही झाला होता.

अतिशय सुंदर असली तरी कान्होपात्रा समाजातील खालच्या थरातली होती.सौदर्य हाच तिचा मानसन्मान होता.प्रतिष्ठा राहू द्या पण समाजात तसे काही स्थान नव्हते.सौदर्य हीच काय ती तिची प्रतिष्ठा होती! अशी ही सामान्य थरातली कान्होपात्रा अनन्यभक्तीमुळे विठ्ठलमय झाली होती. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात तसे तिच्या ‘ध्यानी मनी पांडुरंग होता तर ‘हरि दिसे जनी वनी’ अशी तिची अवस्था होती.

कान्होपात्रेच्या आईला तिची कान्होपात्रा राजाची राणी व्हावी अशी इच्छा होती. पण आमची सामान्य, साधी कान्होपात्रा वारकरी हरिभक्तांची सम्राज्ञी झाली. संत कान्होपात्रा झाली!

पंढरपुरच्या विठोबाच्या देवळाच्या परिसरात आजही तिथे तरटीचे झाड आहे.प्रत्यक्ष विठ्ठलाच्या सान्निध्यात, देवळाच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकाच संताची समाधी आहे— ती आहे संत कान्होपात्रेची !

पहिले पाढे

प्रत्येक पहिली गोष्ट रोमांचक असते. अविस्मरणीय असते. शाळेचा पहिला दिवसही विसरु म्हणता विसरला जात नाही. तशीच पहिली शाळासुद्धा आपण विसरत नाही. त्यातही ती मुन्शीपाल्टीची असली तर विचारुच नका. काळ्या दगडावरच्या रेघेसारखी तहहयात ती आपल्या बरोबर असते.

आमच्या शाळेचे नाव पाच नंबरची शाळा. शाळा अकरा वाजता सुरू व्हायची. मधल्या सुट्टीपर्यंत थोडे फार शिक्षण होई. बेरजा, वजाबाकी, मराठीच्या पुस्तकातील धडा. शुद्धलेखन; मग पुन्हा मास्तर बेरजेची कधी वजाबाकीची गणिते घालायचे. सोडवून झाली की “तोंडे फिरवून पाटी पालथी टाका ” ही बसल्या जागी कवायत करायची. लवकर पाटी पालथी टाकणारी दोनच प्रकारची पोरं होती. हुशार आणि ढ. बाकीची सगळी डाव्या हाताची बोटं मुडपून मुडपून ती तुटेपर्यंत कशाची मोजदाद करत ते अजूनही मला आणि त्यांनाही समजले नाही. कधी भेटलेच ते तर ह्या बोटे दुमडण्याच्या आठवणीतच भेट संपते! पाटी पुन्हा पुन्हा पुसण्यात, पाणी किंवा ओले फडके चाळीस पोरांत एक दोघांकडेच असायचे. ते कशाला देतील दुसऱ्याला. मग बोटे जिभेवरून फिरवून किंवा पाटी तोंडाजवळ नेऊन चक्क पटकन थुंकी लावून पुसायची.

ह्या कर्मकांडांत ही मधली पोरे व्यग्र असत. तोपर्यंत मास्तर शेजारच्या वर्गातील मास्तरांशी सुपारीच्या खांडाची किंवा एकाच पानाच्या विड्याची देवाण घेवाण करत. तोपर्यंत सगळी पोरे तोंडे फिरवून पाट्या पालथ्या टाकून आपापासात सुरवातीला हळू, मग भीड चेपली की ‘अबे!काय बे’ची द्वंद्व युद्धे सुरू व्हायची. त्याची “ आता तुला मधल्या सुट्टीत बघतो! तू बघच बे” ह्याने सांगता व्हायची. मधल्या सुट्टीत तरटाच्या रस्साीखेची झाल्या की मग भांडणाला सुरुवात व्हायची. त्याचीही सांगता “शाळा सुटल्यावर कुठं जाशील बे?” मंग बघ; न्हाई दाताड मोडलं तर ..” ह्या वीररसाच्या संवादाने व्हायची. शाळा सुटल्यावर त्या दोघा चौघांचे दोस्त मिळून दहा बारांची जुंपायची. जास्त करून शाब्दिक किंवा फार तर ढकला ढकलीने जुंपायची. “ अबे जातो कुठं बे तू?आं? उद्या शाळेत येशीलच की साल्या! मग बघ काय होतं त्ये!” हे भरतवाक्य होऊन दिवसभराच्या शाळेवर पडदा पडायचा. ही त्यावेळची त्रिकाळ संध्या होती! तिन्ही वेळेला सौम्य ते किंचित तिखट फुल्यांचा मारा होत असे. पण त्यामुळे तिन्ही खेळातील संवाद खटकेबाज आणि चटकदार होत. ह्या तिन्ही युद्धात माझ्या सारख्याची भूमिका दिग्दर्शकाची किंवा साऊंड इफेक्ट वाढवायची होती.

ह्या चकमकी, लढायांची कारणेही महत्वाची असत. कुणी कुणाची शाईची दौत सांडली- तीही दप्तर किंवा चड्डीवर – मग तर विचारूच नका-हे म्हणजे महायुद्धाचे कारण होते- कोणी कुणाची पाटीवरची पेन्सिल तोडली, तोडून तुकडा घेतला, कुण्या तत्वनिष्ठाने म्हणजे खडूसने सोडवलेली वजाबाकी दाखवली नाही. ही ह्या दैनिक लढायांची कारणे असत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सोडवलेली बेरीज कुणी कुणाला दाखवलीच पाहिजे अशी सक्ती नव्हती. ते कायमच्या तहातील एक कलम होते!

मधली सुट्टी संपली की मास्तरांसकट पोरेसुद्धा जरा आळसावल्यासारखी होत. पुजारी मास्तरांची एक डुलकी झाल्यावर मला पाणी आणायला सांगत. आव्वाचे घर समोरच होते. तेव्हढ्या वेळात मी आणखी स्वत:चा वेळ घ्यायचो. पाण्याचा तांब्या, वर तिरक्या टोपीसारखा ठेवलेल्या पेल्यासह, आणून मास्तरांना दिल्यावर सगळी पोरे रोज क्षणभर -क्षणभरच- मला दबून असत. मास्तरांचे पुन्हा शेजारच्या वर्गातील मोरे किंवा पवार मास्तरांच्या बरोबर जलपान आणि सुपारीच्या खांडांची अदलाबदल झाली की पुजारी मास्तर गोष्ट सांगत. झकास सांगत. ती झाली की मग शहराच्या भूगोलाचा धडा. तो लवकर आटपायचा. मग पाढे म्हणायला सुरुवात. पहिल्यांदा मास्तर “बें एकें बें” ह्या नांदीने सुरुवात करीत. त्यांच्या मागोमाग चाळीस पोरे आपापल्या स्वतंत्र गायकीत म्हणत. असे तीन चार पाढे झाले की शाळेत पुन्हा जीव यायचा. कारण कमी जास्त प्रमाणात साथीच्या रोगाप्रमाणे बहुतेक वर्गांत पाढे सुरू झालेले असत.

पाढे म्हणणे सोपे नाही.एक मुलगा बेचा पाढा म्हणतांना ‘ बे एके बेअे’ इतके सफाईने व झटक्यात म्हणायचा की त्याच्या पुढचा मुलगा ‘तीन एके तीऽनं’ची मनात सुरुवातही करायचा. पण बे दुणे आले की हा पुन्हा क्षणभराने ‘बे दोनी’ निराळ्या आवाजात म्हणायचा. असे हे ‘बे दोनी’ तीन वेळा झाले की मग हा निराळा सुर लावून पुन्हा ‘ बे दोन्ही’ निराळ्या ढंगाने म्हणू लागायचा. त्याच्या पुढचा मुलाच्या मनातल्या मनातले ‘तीन एकं तीनं’ कधीच थांबले असत. ह्या ‘बे दोनी’ कडे सगळा वर्ग आनंदाने तल्लीन होऊन पाहात,ऐकत राही. मास्तर मात्र “अरे पुढे” पुढे काय?” असे टेबलावर छडी आपटत विचारायचे. पण ह्याची निरनिराळ्या ढंगाने,अंगाने अर्धा तास “बाबुल मोरा”म्हणणाऱ्या कुण्या बडे खाॅंसारखे ‘ बे दुणे,बे दोनी,बे दोन्ही’ चालूच राही! पुजारी मास्तर झाले तरी त्यांच्या सहनशक्तीलाही मर्यादा होतीच की. ते पुढच्या मुलाला म्हणायचे “हां, तू म्हण रे पुढे ; “बे दोनी? “ हा भाऊ त्याच्या तीनच्या पाढ्यात गुंग झालेला. तो सहज म्हणू लागला,”बे दोनी साहा!” बे त्रिक नऊ “ फटकन छडी बसली तेव्हा पुढचे ‘बे चोक बारा’ कळवळण्यातच विरून जायचे.

रोज असे व्हायचे. त्यामुळे काही दिवस आमच्या वर्गाला कविता ओरडायला मिळाल्या नाहीत. तेव्हा लच्छ्या शिंदेनीच सांगितले,”मास्तर त्या तोतऱ्याला शेवटी ठेवा. म्हणजे नंतर आम्हाला कविता तरी म्हणता येतील.” मास्तरांनाही पटले.

काही वेळा संपूर्ण वर्गाला एकसाथ पाढे म्हणायला लावत मास्तर. हे बऱ्याच जणांना फायद्याचे होते. काहीजणांच्या दुधात ह्यांचे पाणी बेमालूम मिसळून जाई. त्यातही एक लई खारबेळं होतं. कुठलाही पाढा असला तरी हा नेहमी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव करत पंच्याण्णव पासून घाई करत ‘धावर पूज्य शंऽऽभर “ म्हणत मांडी ठोकायचा. पुढच्या वर्गात गेला की “धा एक्के धा करत ‘धाही धाही शंभर” हाच पाढा घाई घाईत म्हणायचा. त्याही पुढच्या वर्गात पुन्हा हा “वीसेके वीस” करीत वीस धाय दोनशे” म्हणत उडी मारायचा. त्याने असे “ तीस धाय तीनशे” पर्यंत मजल मारली होती! ह्यानेच पुढे “पाढे मेड ईझी” हे पुस्तक लिहिले! का लिहिले तर तो नंतर खरंच एका लघु उद्योगाचा का होईना मालक झाला होता.

आमच्या पाढ्यांची आणखीन एक खासीयत होती.सुरुवातीला सगळी मुले “एक्कोण चाळीस, एक्कूण चाळीस पर्यंत व्यवस्थित म्हणत. पण एके चाळीस ची गणती सुरू झाली की सगळा वर्ग ‘एकेचाळ’ , बेऽचाळ… , स्हेचाळ,… अठ्ठेचाळ असेच म्हणत. मग त्यात शिंदे, कोठे,जाधव, रशीदसह पट्या,गुंड्या,उंड्या,सोहनी,सावकार, देशपांडे हे सुद्धा आले!

शेवटच्या तासाला खरी शाळा सुरु होई! सगळ्या गावाला समजे की इथे शाळा भरते. कारण कविता म्हणायला सुरुवात झालेली असे. “पाखरांची शाळा भरे …” ही कविता वर्गाला असो नसो पण कुठलेही दोन तीन वर्ग ह्या कवितेतच हमखास ओरडत असत. त्यानंतर दुसरी हिट कविता म्हणजे “धरू नका ही बरे, फुलांवर उडती फुलपाखरे!”

कविता म्हणायला सगळी मुले एका पायावर तयार असत. एरव्ही मुकी बहिरी असणारी मुलेही कवितेच्या आवाजात आपला आवाज बिनदिक्कत मिसळत. मोर्चा, मिरवणुकीत भित्राही शूर होतो त्याप्रमाणे ही मुखदुबळी मुलेही कवि होत काव्यगायन करू लागायचे. बरं, चाल एकच असली तरी म्हणणारा ‘आयडाॅल’ आपल्या पट्टीत थाटात म्हणणार. त्यामुळे ‘धरू नका ही बरे’ ह्या ओळीपासूनच कुणाच्या गळ्यामानेच्या तर कुणाच्या कानशीलापासल्या शिरा फुगलेल्या असत! निरनिराळ्या वर्गातून काही त्याच तर काही वेगळ्या कवितांचा कोलाहल ऐकू येत असे.

कवितेमुळे शाळेत निराळेच वारे भरले जायचे! शाळाही आताच भरल्यासारखी वाटायची. शाळा भरूच नये असे शाळेला जाताना वाटायचे. पण शाळा सुटूच नये असे फक्त ह्या शेवटच्या तासाला वाटायचे.

पाढ्यांवरून सुरवात झाली पण शेवट आम्ही ‘ पोरे भारी कवितेचा गोंगाट करी” ह्या ओळीच्या गोंगाटातच करावा म्हणतो !

संत सेना न्हावी

विठ्ठलाने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी निरनिराळ्या रूपाने मदत केली. ते पाहिले म्हणजे तो खरा ‘बहुरूपी’ होता हे पटते.दामाजीसाठी महाराचे रूप घेऊन विठ्ठलाने सरकारी रकमेचा भरणा केला.त्याने संत जनाबाईसाठी लुगडी धुतली.संत सखूसाठी दळण कांडण केले. संत तुकारामाच्या कीर्तीला बट्टा लागू नये म्हणून हजारो शिवाजींच्या रूपाने यवनी सैन्यात मोठा गोंधळ उडवून दिला. चोखोबाच्या घरी झोपडी बाहेर जेवत असता पुजाऱ्यांनी थोबाडीत मारली चोखोबाला, पण गाल सुजून काळा निळा पडला विठोबाचा!
नामदेव लहान असल्यापासून विठोबा त्याने दिलेला नैवेद्य हा आपल्या ‘भक्ताचाच कृपाप्रसाद’ या भावनेने रोज खात असे. पण देव इथेच थांबला नाही. त्याने नामदेवाचा सगुण भक्तीमार्ग हा ज्ञान आणि योगमार्गा इतकाच श्रेष्ठ आहे हे
तीर्थयात्रेत खुद्द ज्ञानेश्वरांना सिद्ध करून दाखवले !

अनेक रूपे घेऊन आपल्या भक्तांना संकटातून सोडवणाऱ्या विठ्ठलाच्या आणखी एका रूपाची गोष्ट ऐकण्यासारखी आहे.

सेना न्हावी यवनी बादशहाच्या नगरात राहात होता.तो बादशहाचा न्हावी होता. बादशहाचे बोलावणे आले की समोरचे काम सोडून त्याला पळत जावे लागे. विशेषत: सेना पूजेला बसला की नेमके बादशहाचा निरोप यायचा.

आता हे फारच झाले हे जाणून, बादशहाचा निरोप आला की ,” सेना घरी नाही; बाहेर गेला” म्हणून सांगत जा असे बायकोला बजावून ठेवले. असे तीन चार वेळा घडले. आपण बोलावले की सेना बाहेर कसा गेलेला असतो? असा प्रश्न बादशहाला पडला असता एकदा शेजारीपाजाऱ्यांनी,” “खाविंद ! सेना खोटे बोलता है. वो घरीच देवपूजा करते बैठा असतो!” हे समजल्यावर बादशहाने सेनाला पकडून आणण्यासाठी शिपाई पाठवले.

पांडुरंगाला ही खबर न लागली तरच नवल ! तो लगोलग उठला. क्षणार्धात त्याने आपले किरीट,कुंडले, कौस्तुभमणि उतरून ठेवले. सेनासारखाच वेष केला.सेनासारखेच बिनगुंड्याचे बिन बाह्यांचे काळे तोकडे जाकीट घातले. गुडघ्या पर्यंत येणारे धुतलेले स्वच्छ धोतर नेसला. पांढरा रूमाल डोक्याला बांधला. सेनाच्या घरी आला. खुंटीवरची सेनाची धोपटी खांद्याला अडकवली. आणि ‘ झाला नाभिक पंढरीनाथ’ बादशहाचे शिपाई निघण्या आधीच राजाकडे आलाही !

सेना आलेला पाहून बादशहाचा राग निवळला. सेनाने आपले कसबी काम सुरू केले.बादशहाने मध्येच एखादे वेळी “स्स्स” केले की तिथे गुलाबपाणी लावायचा.वस्तरा पिंडरीवर चटपट चटपट करून धार लावायचा. बादशहाची हजामत करून झाली.

अभ्यंगस्नानासाठी राजेशाही हमामखान्या जवळच बादशहासाठी चांदीचे चांदतारे बसवलेला चंदनाचा मोठा चौरंग मांडला. रत्नजडीत भांड्यात सुगंधी मोगरेल ओतले. राजाच्या पाठीमागे उभा राहून सेनारूपी जगजेठी बादशहाच्या डोक्याला मोगरेलाने मालिश करू लागला. सेनाचा हात फिरू लागला तसा बादशहा सुखावला.त्याचे डोळे अर्धवट मिटू लागले. सेनाजगदीशने मस्तकावरून हात नेत त्याची वरच्यावर टाळी वाजली की राजा डोळे उघडे. त्याने मोगरेल तेलाच्या भांड्यात पाहिले आणि त्याला देदीप्यमान अशा विठ्ठलाचे मनोहर रूप दिसले. विस्मयचकित होऊन बादशहा मागे पाहायचा तर त्याला आपला नेहमीचाच सेना दिसे. असे दोन तीनदा झाले. ते दिव्य रूप पाहून बादशहा चकित झाला.सेना डोक्याला पाठीला मालिश करे त्याने तो सुखावला. सेना न्हाव्यावर खूष होऊन बादशहाने त्याला ओंजळभर सोन्याच्या मोहरा दिल्या.
सेनाजगन्नायक बादशहाला कुर्निसात करून निरोप घेऊन जाऊ लागला. पण बादशहा त्याला सोडेचना. इथेच राहा असा आग्रह करू लागला. पण “ मी घरी जातो; आणि लगेच येतो”
असे सांगून तो भक्तवत्सल, सर्वव्यापी पांडुरंग, सोन्याची नाणी धोपटीत टाकून निघाला.

सेनाच्या घरी जागच्या जागी धोपटी खुंटीला अडकवून पांडुरंग वैकुंठी गेलाही! दोन दिवस झाले आता येतो असे सांगून गेलेला सेना हजाम अभीतक आया नही ? असं स्वत:लाच विचारत बादशहाने सेनाला आणण्यासाठी शिपाई पाठवले. एकदम पाच सहा शिपाई आल्याचे बायकोकडून समजल्यावर सेना मुंडासे बांधत बाहेर आला.धोपटी अडकवण्या अगोदर वस्तरा आरसा वगैरे आहे ना हे पाहण्यासाठी धोपटीत हात घातला तर हातात सोन्याच्या मोहरा आल्या. सेना मनात दचकला. चमकला! आपल्याला अडकवण्यासाठी हा कसला डाव तर नाही ना ? अशी शंका त्याला आली. इकडे शिपाई दरडावून घाई करू लागले.

सेना बादशहाकडे पोचला. परवापासून बादशहा सेनावर खूष होताच. आजही त्याने सेनाचे हसून स्वागत केले. सेनाने कामाला सुरुवात केली. तेल मालिशची वेळ आली. चौरंगावर बसल्यावर राजा म्हणाला, “सेना, दो दिन पहले जैसा मालिश किया वैसाही करना.” “ आज भी हम तुझे सोनेकी अशर्फी देंगे.” सेना पुन्हा बुचकळ्यात पडला. पण त्याने आपले काम सुरू केले. थोडा वेळ गेल्यावर बादशहाने विचारले, “ सेना आज तुझे क्या हुआ है? परसों जैसा तुम्हारा हात नही चल रहा. क्या बात है?” हे विचारत असताना राजा रत्नजडीत पात्रात पाहात होता.

हळू हळू सेनाच्या डोक्यात प्रकाश पडू लागला. त्याचा गळा दाटून आला. “ अरे त्या परम दयाळू विठोबाने माझ्यासाठी रूप घेऊन हजामाचे काम केले. बादशहाच्या रोषातून मला वाचवले .” ह्या विचाराने त्याला रडू आले. हात जोडून तो म्हणाला,” जहाॅंपन्हाॅं! त्या दिवशी मी आलो नव्हतो. मुझे बचाने माझा विठोबा आया. तुमची सेवा करून गेला ! माझ्या पांडुरंगाने माझी लाज राखली, बादशाहा !” असे म्हणत खाली बसून गुडघ्यात मान घालून रडू लागला. गदगदून रडू लागला.

बादशहाने पुन्हा त्या मोगरेल तेलात पाहिले; आणि त्याला पुन्हा परवाचे “ सुंदर साजिरे रूप सावळे “ असा जगजेठी पांडुरंग दिसला! काय झाले असावे ते बादशहाच्या लक्षात आले. शिपायांना खुणेनेच सेनाच्या पाठीवर हात फिरवून त्याला उठवायला सांगितले.

सेना उठला पण विठ्ठलाची कृपा आठवून आठवून पुन्हा पुन्हा सदगदित होऊन स्फुंदत होताच. बादशहाला मुजरा करून परत जाण्यासाठी त्याची इजाजत मागू लागला. बादशहाने परवानगी दिली. सेना निघाला तेव्हा तो म्हणाला, “ सेना मेने भी तुम्हारे विठोबाको परसों देखा. मनमें कुछ अजीबसा होता था. बहोतही प्यारा और खुबसुरत है वो !” “ और देखो, कभी भी अपने भगवान को इतनी तकलीफ मत देना.उससे दुॲा मांगो. हमारे लिये भी !” हमारे लिये भी!”

माझी पहिली कमाई

दोस्त प्रभाकर जोशीने मला सांगितले, “ चल, माझ्या बरोबर.” दोस्ताने चल म्हटल्यावर कोणता मित्र निघणार नाही? मी आणि जोशी निघालो. जोशीला त्याच्या न्यू हायस्कूल मधले सगळे मित्र लाल्या म्हणत.मी हरिभाईचा. माझी आणि जोशीची मैत्री काॅलेज मध्ये झाली. मी कसा त्याला लाल्या म्हणणार? मी त्याला जोशीच म्हणत असे.

मी आणि हा जोशी नाॅर्थकोट हायस्कूल मध्ये आलो. तिथे त्यावेळच्या व्ह.फा. ची म्हणजे प्राथमिक शाळेचे शेवटचे वर्ष सातवीचे याची वार्षिक परीक्षा होती. त्या काळी प्राथमिक शाळेत व्ह.फालाही मॅट्रिक सारखेच महत्व होते. तो एका साहेबांशी बोलला. माझी ओळख करून दिली. साहेब म्हणाले,” या तुम्ही उद्या सकाळी १०:०० वाजता.” मी आणि जोशी बाहेर आलो. मी त्याला विचारले,”काम कसले आहे? काय करायचे असते?” “ अरे,व्ह.फा.ची परीक्षा आहे.आपण पेपर लिहित असतो त्यावेळेस सुपरव्हायझर करतो तेच आपणही करायचे!”

दुसरे दिवशी सकाळी मी ९:३० लाच नाॅर्थकोटशाळेच्या ॲाफिसमध्ये गेलो. बरीच गडबड दिसत होती. आज साहेबांच्या जागी बाई होत्या. त्यांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर मी नमस्कार करून माझे नाव पत्ता सांगितला. त्यांनी तो तपासून पाहिला. मग म्हणाल्या,” कामतकर तुम्ही ह्या वर्गावर जायचे. बाहेर व्हरांड्यात पाण्याचा डेरा भरलेला आहे का ते पाहायचे. मला त्यांनी एक उत्तरपत्रिका दिली.ती कशी भरायची व मुलांनी कशी भरायची त्या सूचना सांगितल्या. ह्या सूचना विद्यार्थ्यांना द्यायच्या हेही सांगितले. पेपर संपताना दिल्या जाणाऱ्या घंटा, त्यांचा अर्थ काय व काय करायचे तेही सांगितले. मी वर्गाकडे निघणार तेव्हढ्यात जोशीही आला. त्याचेही त्यांच्याशी बोलणे झाले. मधून ते दोघेही माझ्याकडे पाहात. जोशी मला त्याच्या वर्गावर जातो,पेपर संपल्यावर भेटू असे सांगून गेला. मीही निघालो. बाईं तेव्हढ्यात मला म्हणाल्या,” आणि एक मात्र अजिबात विसरू नका. मुलांना उत्तरे सांगणे, हे चुकले तसे लिही, अशी कसलीही मदत करू नका. मुलांना पास व्हायचे आहे हे विसरू नका!” म्हणजे माझा शैक्षणिक आलेख जोशांनी बाईंना सांगितला वाटते!त्याला मनातल्या मनात प्रभ्या,जोश्या,लाल्या सा… आणि फुल्या फुल्या म्हणत वर्गाकडे निघालो.त्यानेच मला हे काम मिळवून दिले हे इतक्यातच विसरलो. हे लक्षात आले आणि माझा मलाच राग आला. चूक लक्षात आली.

वर्गात आलो. सगळीकडे पाहिले. “व्ह.फा”ची मुलं मुली होत्या.हिरव्या पानांच्या गर्दीत काही कळ्या दिसाव्यात तशा डेस्कांच्या प्रत्येक रांगेत एक दोन मुली बसल्या होत्या. त्या सर्वांबरोबरच मलाही परिक्षेचे tension आले होते. कोण काॅपी करेल कशी करेल त्या सर्व कृल्प्त्या आठवत होतो. सगळ्यांचे हात बाह्या वर करून पाहिले. कुणाजवळ वही पुस्तक वगैरे नाही ह्याची डेस्काच्या खालच्या कप्प्यात डोकावून हात फिरवून खात्री करून घेतली. इतक्यात कुणा शिक्षकाने माझ्याजवळ उत्तरपत्रिकांचा गठ्ठा दिला. घंटा झाली. मी त्या प्रत्येकाला दिल्या. मुलांना मी वरचा भाग कसा भरायचा ते सांगू लागलो. कुणीही लक्ष देत नव्हते. त्यांचे ते भरत होते. त्यांना माहित झाले होते कसे भरायची ती उत्तरपत्रिका. तेव्हढ्यात दुसरे शिक्षक आले. त्यांनी मला प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा दिला. घंटा झाल्याशिवाय वाटू नका असे बजावून गेले. प्रश्नपत्रिका म्हटल्यावर मला माझ्या परिक्षा आठवल्या व घाम फुटला. पोरं ढिम्म होती. त्यांना,परीक्षा कुणाची आणि मला का घाम फुटला ते समजेना. एका धीट पोराने विचारलेच, “ सर, तुम्ही काॅपी केली होती का?” इतर पोरंपोरी हसू लागल्या. घंटा झाली! मी प्रश्नपत्रिका वाटल्या. पोरे ती वाचू लागली. काहीजण लगेच तर काही थोड्या वेळाने पेपर लिहू लागले.

मी रांगे रांगेतून हिंडू लागलो. टेबलाजवळ येऊन वर्गाकडे बारकाईने पाहू लागलो. पंधरा वीस मिनिटात कोण काॅपी करायला सुरवात करतोय ह्या विचाराने निश्चिंत होऊन पुन्हा फेऱ्या मारू लागलो. थोड्या वेळाने त्या वरिष्ठ बाई चष्म्यावरून पाहात माझ्या वर्गात आल्या. पोरं मान खाली घालून लिहित होती. काही विचारात पडली होती. तोंडात बोट घालून शून्यात पाहात होती. बाई आलेल्या पाहून ‘आता आणखीन काय’ह्या विचाराने मीच घाबरून गेलो. बाईंनी जमतेय ना विचारले. मनात म्हणालो ह्यात काय जमायचे? मी हो म्हणालो. बाई “कुणालाही उत्तरासाठी मदत करायची नाही” हे पुन्हा बजावून गेल्या. नोकरी एक दिवसाची असली तरी तिच्यातही अपमान होतोच हे लक्षात आले. पण माझी शैक्षणिक प्रगति आठवून बाईंना मुलांच्या निकालाची काळजी वाटणारच हे मी समजून घेतले!

अर्धा पाऊण तास झाला . मीही सरावलो होतो. रांगांतून फिरता फिरता मुलांच्या पेपरात डोकावू लागलो. प्रश्न ‘संधी आणि समास ह्यातील फरक स्पष्ट करा” असावा. एकाने लिहिले होते, “ संधी ची सुरवात अनुस्वाराने होते. समासाची होत नाही.” दुसऱ्याचा पेपर पाहिला त्यात त्याने जास्त खुलासेवार लिहिले होते,”आधी संधी आणि जोडाक्षरांतील फरक पाहिला पाहिजे. मी मनात विचारले,”का रे बाबा?” त्याने पुढे स्पष्ट केले होते,” जोडाक्षरात दोन अक्षरे एकत्र येतात. उदा. ‘आणि’ तर संधीमध्ये दोन शब्द एकत्र येतात. उदा. दिवसरात्र. समासातही दोन शब्द एकत्र येतात. उदा. दिनरात.” हे अफाट ज्ञान वाचून माझा चेहरा उदगार चिन्हासारखा झाला. पुढे गेलो. मुलगी हुषार असावी. तिने लिहिले होते,” संधी म्हणजे सोडणे व साधणे ह्यांचे नाम आहे.”तिने पुढे लिहिले होते की ‘ संधी सोडायची नसते आणि समास हा सोडवायचा असतो. दोघात हा स्पष्ट फरक आहे.” मी टाळ्या वाजवणार होतो पण आवरले स्वत:ला. दुसऱ्या रांगेतील एका मुलाने प्रश्न फार सहज व सोपा करून टाकला होता. त्याने लिहिले होते,”सं+धी ही दोन अक्षरे मिळून संधी होतो तर समास ह्या शब्दात दोन स मध्ये मा हे अक्षर येते. त्यात कुठेही धी नाही. हा स्पष्ट फरक आहे.” मला माझ्या उत्तरांची आठवण झाली! खिडकी जवळच्या रांगेतील एका मुलीने अत्यंत व्यावहारिक उत्तर लिहिले होते. तिने लिहिले होते की,” संधी चा संबंध वेळेशी जोडला आहे. आणि लिहिताना समास हा सोडावाच लागतो. दोन्हीतील हा फरक स्पष्ट आहें” एकाने लिहिले होते,” संधी व साधु हे दोन वेगळे शब्द आहेत पण संधीसाधु हा एकच शब्द आहे. संधी आणि समास मध्येही असाच स्पष्ट फरक आहे.”

माझा पहिला दिवस पार पडला. उद्याचा शेवटचा दिवस होता. मला बाईंनी उद्याही बोलावले. पेपर सुरू झाला. आज इतिहासाचा पेपर होता. लिहिणे खूप असते. थोरवी व योग्यता हा प्रश्न तर हमखास असतोच. तसा आजही होता. वर्गात फेऱ्या घालताना उद्याचा इतिहास आजच निर्माण करणारे हे आधारस्तंभ काय लिहितात हे पाहावे म्हणून डोकावू लागलो. एकीने झाशीच्या राणीविषयी लिहिताना, पहिलेच वाक्य ,”झाशीची राणी ही एक थोर पुरूष होऊन गेली.” लिहिलेले पाहून थक्क झालो. पण बऱ्याच मुलांमुलींनी तसेच लिहिले बोते.सवयीचा परिणाम. अहिल्याबाई होळकरांसंबंधी लिहितानाही “त्या एक थोर पुरुष होऊन गेल्या” असेच लिहिलं होते. झाशीची राणी असो की अहिल्यादेवी होळकर असो, दुसरे वाक्य “त्यांची योग्यता मोठी होती.” असेच बहुतेकांनी लिहिले होते. झाले उत्तर! सम्राट अशोकांनी कारकीर्दीत काय केले व शेरशहांनी काय सुधारणा केल्या ह्यांच्या दोन्ही उत्तरात रस्ते बांधले, दुतर्फा झाडे लावलीआणि विहिरी खोदल्या हेच साचेबंद उत्तर सगळ्यांनी लिहिले होते! माझ्या मदतीची कुणालाही गरज नव्हती !

व्ह.फा.च्या परीक्षेतील शेवटचे दोनच दिवस मला सुपरव्हायझिंगचे काम मिळाले. माझ्या आयुष्यातील ही पहिली नोकरी किंवा मोबदला मिळालेले पहिलेच काम होते. मित्र प्रभाकर जोशींनी “चल रे” म्हणून नेले हा त्याचा मोठेपणा! बारा चौदाच रुपये मिळाले असतील.पण मला ती फार मोठी रक्कम वाटली ह्यात आश्चर्य नाही. त्याबरोबरच मुलांची उत्तरे वाचताना ज्ञानात आणि करमणुकीत जी भर पडली त्याचे मोल कसे करणार?

वृद्ध कलाकार- वास्तवात आणि भूमिकेतही !

आता पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये अवतार किशन हनगल ह्यांचा १९१४ साली जन्म झाला. अवतार किशन वगैरे नावावरून काही बोध होणार नाही.,ए. के हनगल म्हटल्यावर लगेच लक्षात येईल. हिंदी सिनेमात शाळा मास्तर,प्रोफेसर, डाॅक्टर, कर्नल, शंभूनाथ, रामशरण किंवा रहिमचाचा अशा सर्वसामान्य नावाच्या व माणसाच्या भूमिका हातखंडा उत्तम करणारे ए.के. हनगल ह्यानी स्वातंत्र्य लढ्यात मोठा भाग घेतला. बरेच वेळा ते तुरुंगातही गेले. पोलिसांच्या लाठ्या दंडुकेही पुष्कळ खाल्ल्या.
भगतसिंगाना तुरुंगात टाकले तो दिवस व त्यांना फाशी दिली तो दिवस त्यांना कायम आठवत असे. भगतसिंगाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यातून ते साम्यवादी विचारांकडे वळले. जालियनवालाबागचे हत्याकांड आणि भगतसिंगला फाशी दिली त्या दिवशी पठाण (North West Frontier मधील) आणि पंजाब रडत होता अशी आठवण ते सांगत.


कराचीत असतांना त्यांच्या ब्रिटीश विरोधी स्वातंत्र्य चळवळीतील कामामुळे त्यांना तीन वर्षे तुरुंगात डांबले होते.फाळणी झाल्यावर ते हिंदुस्थानात आले.,
ते पूर्वीच शिवणकाम शिकले होते. वयाच्या विसाव्या वर्षापासून ते रंगभूमीवर काम करीत होते. १९४९ साली मुंबईत आल्यावर प्रथम ते शिंपी कामच करू लागले. त्याचबरोबर IPTA ह्या संस्थेच्या नाटकात भूमिका करू लागले.वर्तमानपत्रांतही काम करू लागले.


१९६७साली त्यांनी शशधर मुखर्जीच्या ‘शागीर्द सिनेमात मध्ये काम केले. वयाच्या पन्नाशीत सिनेमात आले. आयुष्याची माध्यान्ह उलटता उलटता सिनेमात आले. वयाला अनुरुप भूमिका मिळाल्या आणि त्या ते करू लागले. जागृती,आंधी,नमक हराम, मेरे अपने, गुड्डी, बावर्ची, आनंद, तिसरी कसम (राजकपूरच्या थोरल्या भावाची भूमिका), गरम हवा, सत्यम शिवम सुंदरम् अशा एकूण २२७ सिनेमात त्यांनी काम केले होते. राजेश खन्नाच्या १६ चित्रपटात त्यांनी त्याच्या बरोबर काम केले होते. शोले मधला त्यांच्या इमामसाबचा”इतना सन्नाटा क्यों है” हा संवाद अनेकांच्या लक्षात असेल. अर्थातच तो “कितनेऽ आदमी थे” इतका गाजलेला नाही. पण बऱ्याच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला असेल. त्यांचा अखेर अखेरीचा सिनेमा अमीर खानचा ‘लगान’.


त्यांच्या दत्तुभाऊ, गजानन देसाई, मि. जोशी, सिंधी शिक्षक, इमाम साब, शंभूकाका अशा सामान्य नावांच्या सर्वसाधारण भूमिकेपेक्षा अगदी वेगळी भूमिका त्यांनी “शौकीन” ह्या सिनेमात रंगवली होती. त्यांच्या परिचित प्रतिमेपेक्षा अगदी निराळी होती. त्या सिनेमात अशोक कुमार, प्रख्यात बंगाली नट उत्तमकुमार सारखे नट होते. पण लोकांच्या लक्षात एके हनगलनी रंगवलेला स्त्रीलंपट म्हातारा लक्षात राहिला.


एकदा दिल्लीत हनगल पंचतारांकित हाॅटेलमध्ये कुठल्याश्या पार्टीला गेले होते. हनगलना आपल्या मित्राकडे जायचे होते. त्यांना तिकडे सोडण्यासाठी सोबत वीस बावीस वर्षाच्या तरुणीला जायला सांगितले होते. पण त्या मुलीने मॅनेजरला हळूच सांगितले,” मी जाणार नाही. मी ह्यांचा “शौकीन” पाहिला आहे!” मग दुसऱ्या पुरुषाला पाठवावे लागले!


बाळासाहेब ठाकरेंनी हनगलवर ते देशविरोधी आहेत असा आरोप केला होता. बहुतेक ही १९९२-९३ ची घटना असावी. कारण काय तर ते पाकिस्तानच्या काॅन्सल जनरलने आयोजित केलेल्या त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला हजर होते. प्रत्येक देशाची वकिलात किंवा काॅन्सल जनरल आपल्या कार्यालयात आपल्या देशाचे स्वातंत्र्यदिन साजरे करतात.तसेच पाकिस्तानची वकिलातही करते. त्यात विशेष काही नाही. हनगलांवर मग ‘बाॅलिवुडनेही अघोषित बहिष्कार घातला होता. वर्ष दोन वर्षे कुणीही त्यांना काम देईना. शिवसेनेच्या धाकामुळे हनगल काम करीत असलेले सिनेमेही थिएटरमधून हळूच काढून घेतले जाऊ लागले. तरी बरे हनगल काही धर्मेंद्र, सलमान खान,आमिर खान,शाहरुख खानसारखे स्टार नव्हते. त्यांना आर्थिक झळ तर बसलीच. हनगल श्रीमंत कधीच नव्हते. तशात हा बहिष्कार. IPTAची नाटकेही अशी कितीशी चालत असणार? हनगल पाकिस्तानच्या काॅन्सलमध्ये त्यादिवशी व्हिसाच्या कामासाठी गेले होते! आपल्या सियालकोट ह्या मूळगावी जाण्यासाठी! नंतर बाळासाहेबांनी,” मी एकेंवर कसलीही बंदी घातली नव्हती” असे जाहीर केल्यावर त्यांना पुन्हा कामे मिळू लागली.


ए.के. हनगल इप्टामध्ये काम करीत असता त्यांच्याबरोबर बलराज साहनी, कैफी आझमी सारखी मंडळीही होती.एकेंनी संजीवकुमारला इप्टामध्ये नाटकात भूमिका मिळवून दिल्या.हीआणि सयाजी शिंदे राजकपूर आणि इतर बरेच नट वा नट्या अतिशय सहज वाटेल असा उत्तम अभिनय करत व संवाद म्हणत त्याचे कारण ते प्रथम रंगभूमीवरचे कसलेले कलाकार होते.


ए. के. हनगल एकदा एका शिष्टमंडळा बरोबर रशियाच्या दौऱ्यावरून परत येत असता त्यांचे विमान तांत्रिक अडचणींमुळे पाकिस्तानातील विमानतळावर उतरावे लागले. तिथे हनगलांना पाहिल्यावर अनेक पाकिस्तानी त्यांच्या भोवती जमले. ते हिंदी सिनेमा, नट नट्या, गाणी,संगीत आणि संगीतकार ह्यांच्याविषयी इतके विचारू, बोलू लागले की हनगलांना दम खायलाही वेळ मिळत नव्हता. ते पुढे सांगतात की तिथे जमलेल्या पाकिस्तानी लोकांना त्यांचा राष्ट्राध्यक्ष महम्मद झिया हुल हक त्याच दिवशी विमान अपघातात ठार झाला ह्याचेही त्यांना भान राहिले नाही! जणू ते आजुबाजूचे जग, सर्व काही विसरून गेले होते!


ए.के हनगल पं नेहरूंचे नातेवाईक होते. हनगलची आई आणि पं नेहरूंची पत्नी कमला नेहरू ह्या चुलत/ मामे किंवा मावस किंवा आते बहिणी होत्या.
ए. के. हनगल ह्यांचे अखेरची काही वर्षे हलाख्याची गेली.२००५ साली त्यांनी अमोल पालेकरच्या सिनेमात काम केले. त्या अगोदर सात आठ महिने आजारपणामुळे घराबाहेर पडले नव्हते. पण सिनेमात कॅमेऱ्यापुढे उभे राहिले की तब्येतीची पर्वा न करता त्यांच्यातील नट बाहेर येई.
त्यांचा मुलगा विजय हा बाॅलीवुड मध्ये कॅमेरामन होता. पण त्यालाही काम मिळेनासे झाले. हनगलांच्या औषधपाण्याचा खर्च परवडत नव्हता. मुलगा विजय हा ७५ वर्षाचा.त्यालाही पाठीचे दुखणे.कुणाला काम नाही. पैसे नाहीत. राज ठाकरेंनी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी थोडी मदत केली. वर्तमानपत्रातून हनगलांच्या परिस्थितीची बातमी आली.त्यावेळच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही मदत केली.


ए. के. हनगल ह्यांना पद्मभूषण देऊन सरकारनेही गौरवले.
२०१२ साली मधुबाला-एक इश्क और जुनुन ह्या TV मालिकेत काम करायला ९७ वर्षाचे ए. के. हनगल व्हील चेअरवरून आले. त्यांना स्वत:लाही आपण काम करू शकू ह्याची खात्री नव्हती. पण “अॅक्शन टेक …” हे ऐकले आणि ए.के. हनगल पुन्हा नट झाले!
आपणा सर्व मराठी लोकांना हनगलांविषयी विशेष आस्था,जवळीक वाटावी व आनंद देणारी गोष्ट म्हणजे त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतला होता! हे त्यांनी, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना देशविरोधी म्हटल्यावर काही वर्षांनी सांगितले!


नऊ-दहा वर्षांपूर्वी पुणे महापालिकेच्या काही कामगार संघटना व पुण्यातील इतर अन्य श्रमिक संघटनांनी ए. के. हनगलांचा सत्कार समारंभ केला. त्या समारंभास मीही गेलो होतो.(आणखी एक कारण म्हणजे समारंभाचे अध्यक्ष माझ्या ओळखीचे औरंगाबादचे डाॅ. भालचंद्र कानगो हे होते. त्यानांही भेटता आले.) लालबुंद गोऱ्या वर्णाच्या ह्या पंजाबी वृद्ध कलाकाराने छोटेसे पण चांगले भाषण केले.


ए. के. हनगलांना ‘ह्या जगण्यावर’ खूप प्रेम होते. दीर्घायुषी असावे असे वाटत असे. सांताक्रुझला एका सामान्य फ्लॅटमध्ये मुलाबरोबर राहात होते. खूप वर्षे जगावे ही त्यांची इच्छा पुरी झाली. २०१२ साली त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्डाचे नूतनीकरण करून घेतले होते. सिनेसृष्टीत पन्नाशी उलटल्यावर येऊन बहुसंख्य भूमिका म्हाताऱ्याच्याच करणारा हा दीर्घायुषी वास्तवात व भूमिकेतीही ‘वृद्ध कलावंत’ २०१२ साली वयाच्या ९८ व्या वर्षी जगाच्या रंगभूमीवरून पडद्याआड गेला!

François-Marie Arouet (व्हाॅल्टेअर)

व्हाॅल्टेअरचे खरे नाव François-Marie Arouet. पण त्याने आपले नाव लेखनासाठी व्हाॅल्टेअर असे घेतले. आणि तो आजही जगभर ह्याच नावाने तो ओळखला जातो. व्हाॅल्टेअरचा जन्म १६९४ साली पॅरिसमध्ये झाला. त्याला उत्तम शिक्षण मिळाले. त्याने साहित्यिक व्हायचे ठरवले. त्याने नाटके लिहायला घेतली. त्याची अनेक नाटके खूपच यशस्वी झाली. पण त्याच सुमारास व्हाॅल्टेअरचा राजाच्या जवळच्या आणि मर्जीतल्या एका माणसाशी तंटा झाला. त्यामुळे व्हाॅल्टेअरला हद्दपार केले. ही १७२७ सालची घटना.

हद्दपार झाल्यामुळे तो इंग्लंडला आला. इंग्लंडमध्ये आल्यावर त्याला एका निराळ्या जगाची ओळख झाली. इंग्लंडमधील सार्वजनिक, खाजगी, सरकारी संस्था ह्या फ्रान्समधील संस्थांपेक्षा जास्त स्वतंत्र आहेत. त्या आपले धोरण,निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात हे व्हाॅल्टेअरच्या लक्षात आले.तसेच चर्चा वादविवाद ह्यावरही फारशी बंधने नव्हती. फ्रान्सपेक्षा येथील वातावरण खूपच मोकळे आहे हे त्याला जाणवले. ह्यामुळे इंग्लंडविषयी त्याचे मत खूपच अनुकूल झाले. इथे विज्ञानाचा अभ्यास खूपच पुढे गेला आहे हे सुद्धा लक्षात आले. व्हाॅल्टेअरवर न्यूटनचा खूपच प्रभाव होता. इंग्लंडमधील वास्तव्याचा आणखी एक चांगला परिणाम म्हणजे व्हाॅल्टेअरचा विज्ञानवादी दृष्टिकोन जास्त दृढ झाला. त्याचप्रमाणे शेक्सपिअरचाही तो चाहता झाला. इंग्लंडमधील ह्या सर्व आधुनिक विचारांचे तो नेहमी गुण गात असे. ह्यामुळेच तो जेव्हा फ्रान्समध्ये परत आला तेव्हा त्याने संस्थांचे स्वातंत्र्य, भाषणाचे स्वातंत्र्य,ह्यावर बरेच लिहायला सुरुवात केली.धर्माच्या अधिकाऱ्यांवर, चर्चवर, खुळचट प्रथांना,श्रद्धेच्या आवरणाखाली लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुंतवून ठेवणे,तिला उत्तेजन देणे ह्याबद्दल धारेवर धरले. तसेच राजसत्तेने व चर्चनेही सहिष्णूतेचे धोरण स्वीकारावे ह्यासाठी एकप्रकारे व्हाॅल्टेअरने चळवळी सुरू केल्या.

व्हाॅल्टेअर हा इतिहासकार आणि इतिहासाचे तत्वज्ञान ह्यातील विद्वान म्हणून ओळखला जातो. त्याने लिहिलेल्या इतिहास विषयक पुस्तकांमुळे इतिहास कसा लिहावा ह्याचे धडे देणाराही मानला जातो. सर्व बाबतीत स्वतंत्रतेचा व सहिष्णूतेचा त्याने पुरस्कार केला. धर्म,राजकारभार ह्यांनी घातलेले निर्बंध काढावेत, विचार व उच्चार स्वातंत्र्य असावे; धर्म, राजसत्ता, राज्यकारभार ह्यापासून पूर्णपणे वेगळा असावा, त्यांचे परस्पर संबंध नकोत ह्या विचारांचा पुरस्कार करणारा म्हणून व्हाॅल्टेअर प्रसिद्ध होता. ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात याव्यात ह्यासाठी त्याने चळवळी केल्या. लेख तर हजारो लिहिले. व्हाॅल्टेअरने लिहिलेले History Of Charles XII(१७३१), The Age of Louis XIV(१७५१)आणि त्याचा Essay on the Customs and Spirit of the Nations(१७५६) ही इतिहासाची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. पूर्वीच्या इतिहासकारांप्रमाणे त्याने लष्करी कारवाया, लढाया, तह वाटाघाटी ह्यावरच भर न देता,त्या काळच्या सामाजिक परिस्थिती ती तशी का झाली, त्यावेळी विज्ञान, साहित्य, कला ह्यांत काय घडत होते ह्यासंबंधात जास्त लिहिले आहे. त्याच्या Essay on Customs…ह्या पुस्तकात त्याने संस्कृतीचा प्रवास आणि प्रगती ह्यांचा,फक्त देश समोर न ठेवता, जगाचा संदर्भ घेत मागोवा घेतला आहे. त्यामुळे केवळ एका राष्ट्राचा विशिष्ट संस्कृतीचा विचार येत नाही.किंबहुना राष्ट्राच्या संस्कृतीविषयी लिहूनही त्याने राष्ट्रवाद बाजूला ठेवूनच त्याने इतिहास, संस्कृति विज्ञान ह्या विषयी लिहिले आहे. हे सगळे लिहित असताना त्याने ज्ञात असलेल्या पुराव्यांची, संदर्भांची पुरेपुर छाननी करून व बुद्धिला प्रमाण मानून लिहिले आहे असे अनेक समीक्षकांचे मत आहे. वर अगोदर म्हटल्याप्रमाणे त्याने चर्चवर, त्यांचे इतर पंथ आणि धर्मासंबंधात जे असहिष्णूतेचे, वेळी क्रूरपणाचे वागणे होते; लोकांमध्ये श्रद्धेच्या आवरणाखाली अंधश्रद्धा जोपासण्याचे काम चालत असे, तसेच फसवणूकीचे वर्तन असे त्यावर कोरडे ओढले आहेत.

विशेषत: कॅथलिकांवर. राजसत्तेचे वाढते नियंत्रण घालण्याचे, विरोधी विचार मते ह्यांना दाबून टाकण्याचे, राज्यकारभारात चर्चचाही सहभाग असणे ह्या सर्वांवर त्याने पुस्तके, लेख लिहून तसेच आपल्या पत्रव्यवहारातूनही धारदार टीका केली आहे. ह्यामुळेच तो मत-विचार-भाषण-धर्म स्वातंत्र्याचा मुख्य पुरस्कर्त्यांपैकी मोठा मानला जातो. त्याच्या ह्या विचारांचा दूरगामी परिणाम झाला आहे. राजसत्तेच्या धोरणांमुळे इतरांप्रमाणे खुद्द व्हाॅल्टेअरलाही त्याचे चटके बसले आहेत. त्याचीही पुस्तके जाळली गेली.त्यालाही पोलिसांचा पाठलाग चुकला नव्हता.व्हाॅल्टेअरने आपली ही मते त्याच्या Treatise On Toleranc मध्येही चांगल्या प्रकारे व्यक्त केली आहेत. व्हाॅल्टेअर इंग्लंडमधून परत फ्रान्समध्ये आल्यावर काही वर्षांने त्याने बाजारात पैसे गुंतवायला सुरूवात केली. त्यातून त्याने खूप संपत्ती मिळवली. त्याकाळी तो सर्वात श्रीमंत साहित्यिक होता. पैशाची सुबत्ता येण्यास राजा पंधरावा लुईची रखेल मादाम पाॅम्पिदूॅंशी असलेली त्याची मैत्रीही उपयोगी पडली असावी.

राजाच्या योजनांची माहिती ती व्हाॅल्टेअरला देत असे. पण मादाम पाॅंम्पिदूॅं किंवा दरबारातील मानाच्या वरिष्ठ पदावर असणाऱ्या काहीजणांशी असलेल्या मैत्रीचा व्हाॅल्टेअरला फार फायदा करून घेता आला नाही. ह्याचे कारण त्याची धारदार वाणी आणि लेखणी. उपरोधिक विनोदाच्या वेष्टणातून बोलणे; उपहास विडंबनात्मक किंवा उपरोधिक लिहिणे ही त्याची वैशिष्ट्ये होती. पण सत्ता हाती असलेला राजा किंवा दरबारी माणसे त्यांच्यावरील टीका किती काळ सहन करतील! एकदा त्याने Le Encyclopedie मध्ये जिनिव्हा संबंधी लिहून त्यात स्विस लोकांचा अपमान केला. त्याचा उत्तम मित्र स्वत:ला व्हाॅल्टेअरचा विद्यार्थी मानणारा प्रशियाचा सम्राट फ्रेडरिक द ग्रेट बरोबरही व्हाॅल्टेअरने झगडा केला. त्यामुळे फ्रान्सचेच नव्हे तर स्वित्झर्लॅंडचे, जर्मनीचे पोलिसही त्याचा पिच्छा पुरवीत. एकदा म्हणण्यापेक्षा त्याला जास्तवेळा तुरुंगवासही घडला आहे. अशातच मादाम पाॅम्पिदूॅंचाही मृत्यु झाला. त्यामुळे फ्रेंच राजापाशी त्याची रदबदली करणारे बाजू घेणारे कोणी राहिले नाही.

सर्व अडचणी संकटे एकदम येतात तशी आली. त्यातली बरीच त्याने आपल्या स्वतंत्र विचार व धारदार लेखणी आणि वाणीने ओढवून घेतली होती. पण ह्या परिस्थितीतही व्हाॅल्टेअरने आपल्या चतुराईने व संपत्तीच्या बळावर मात केली. स्वित्झर्लॅंड व फ्रान्सच्या एकमेकांशी लागूनच असलेल्या सरहद्दीवर स्वित्झर्लॅंडच्या हद्दीत फर्नी येथे त्याने मोठा जमीन जुमला आणि घर घेतले. आणि दुसरे प्रचंड घरदार फ्रान्सच्या हद्दीत पण फर्नीला लागूनच टर्नी गावात घेतले. फ्रान्सचे पोलिस अधिकारी चौकशीला आले की हा,” माफ करा! मी दुसऱ्या परकी देशात राहात आहे.”असे सांगायचा. हेच उत्तर स्विस पोलिस अधिकाऱी आले की हा पटकन उंबरा ओलांडून ,” मी माझ्या देशात आहे.” असे खणखणीतपणे सांगायचा. त्याचा हा दोन्ही देशांतील सरकारांशी “तळ्यात की मळ्यात”खेळ चालू होता. व्हाॅल्टेअर त्याच्या अलिकडच्या व पलिकडच्या उंबरठ्यांच्या दोन्ही गावातील व आजूबाजूच्या गावातील सामान्य आणि गोरगरीबांसाठी, शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जायचा.फक्त लेख लिहून पत्रकांच्या द्वारेच नव्हे तर प्रत्यक्ष कोर्टकचेऱ्यांत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवायचा. कोर्टात जाऊन उघड उघड अन्यायकारक व पक्षपाती निकालांविरुद्ध दाद मागून त्या निर्णयांवर पुन्हा विचार करायला भाग पाडायचा.गोरगरीबांना जाचक ठरणारे, भरडून काढणाऱ्या न्यायाधीशांची हकालपट्टी करवून घेतली.सामान्य लोक व गरीब माणसे व्हाॅल्टेअरच्या पाठीशी असत. जुलुम करणारे लहानांना छळतात. मोठे त्यांना दाद देत नाहीत किंवा सापडत नाहीत. हा नियम व्हाॅल्टेअर व सामान्यांनाही माहित होता. हे लोक वेळप्रसंगी व्हाॅलटेअरच्या बाजूने उभे राहात.

व्हाॅल्टेअरची ही दोन्ही घरे मोठी होती. व्हाॅल्टेअरची ख्यातीही दूरवर पसरली होती. त्याला भेटायला देशोदेशीचे विद्वान विचारवंत साहित्यिक येत असत. जवळपास वीस वर्षे व्हाॅल्टेअर फर्नी येथे एखाद्या संस्थानिकासारखा राहात होता. त्याचे घर “विचारवंतांचे माहेर”च झाले होते. आणि तो “बुद्धीमंतांचा राजा” अशा थाटात तिथे राहिला. बरेच वेळा पन्नास पन्नास नामवंत पाहुणे त्याच्या घरी पाहुणचार घेत असत! त्यांच्याशी व्यक्ति स्वातंत्र्य, धर्म, सहिष्णूता, तिच्याबरोबर येणारी बंधुता, साहित्य काव्य ह्यावर व्हाॅल्टेअरचे चर्चा सत्र, मता मतांतरातील वादविवाद सुरू असत.पाहुणचारासह अशा बौद्धिक मेजवान्याही झडत! अशीच चर्चा चालू असताना एकदा व्हाॅल्टेअर जे म्हणाला त्याची नोंद सर्व जगात आजही घेतली जाते. प्रत्येकाला आपले मत,विचार मांडण्याचा मूलभूत हक्क आहे ह्या तत्वावर तो किती ठाम होता त्यासंबंधीचा एक प्रसंग इतिहासात कायम नोंदला गेला आहे. एकजण बराच वेळ आपली बाजू मांडत आपल्या मताचे समर्थन करत होता. त्याचे सांगून झाल्यावर व्हाॅल्टेअर म्हणाला,” महाशय, तुम्ही मांडलेली मते व त्यासाठी केलेला युक्तिवाद बिनबुडाचा आहे. तो कुठेही टिकणारा नाही. मी तुमच्या विचारांशी सहमत नाही.” “ पण”, (पुढचे ऐका) व्हाॅलटेअर पुढे म्हणतो, “पण तुम्हाला तुमची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुमचा तो हक्क कायम राहावा ह्यासाठी मात्र मी शेवटपर्यंत लढत राहीन.”

व्हाॅल्टेअर चांगला साहित्यिकही होता. त्याची सुरवातीची नाटके अत्यंत यशस्वी झाली होती. तो कविही होता. त्याच्या लेखनाची सुरवातही कवितेनेच झाली. त्याने एक मोठे दीर्घकाव्य लिहिले. त्याचे नाव Henriade. त्यानंतर तसेच एक Maid of Orleans हे आणखी एक काव्य लिहिले. आधुनिक काळात Henriade कुणी वाचणार नाही खरे. ते कंटाळवाणे वाटेल. पण त्याच्या काळात त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली होती. अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात त्याच्या एकूण पासष्ठ आवृत्या प्रसिद्ध झाल्या होत्या! फ्रेंच राजा चौथ्या हेन्रीवर ह्या काव्याचा खूप प्रभाव पडला. त्याच्यात मोठा बदल घडून आला असे तो म्हणतो. त्या काव्यातील सहिष्णूता व उदारमतवाद ह्यांचा चौथ्या हेन्रीवर चांगला परिणाम झाला होता. त्याने आपल्या कारभाराचे धोरण ह्या तत्वावर आखले होते. त्याचे प्रतिबिंब त्याच्या Edict of Nantes ह्या आज्ञापत्रात पहायला मिळते! साहित्याचा परिणाम समाजावर फारसा कधी होत नाही किंवा साहित्याने क्रांति घडून येत नाही ह्या मताला हेन्रीच्या राज्यकारभाराचे धोरण ठरवणाऱ्या त्याच्या ह्या मार्गदर्शक राजाज्ञेतून उत्तर मिळते! ह्या बरोबरच व्हाॅल्टेअर धार्मिक स्वातंत्र्याचा, धर्म व राजसत्ता ही पूरणपणे वेगळी असावीत, विचार व उच्चार स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे ह्या बाबतीत तो लेखन व चर्चा करीत असे.

हा नागरी हक्कांचाही पुरस्कर्ता होता. त्यामध्ये सर्वांना समान न्याय हवा, जे दुबळे गरीब आहेत त्यांच्या बाबतीत तर तो कोर्ट कचेऱ्यात त्यांचे खटले स्पष्टपणे न्याय्य पद्धतीने चालून योग्य न्याय मिळावा ह्यासाठी झगडत होता. तसेच करपद्धतीत जी विषमता होती त्यात बदल व्हावा ह्यासाठीही तो सत्ताधाऱ्यांना सुनावत होता. फर्नी येथे असताना व्हाॅल्टेअरने आपली जगप्रसिद्ध Candide ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी म्हणजे त्या वेळी फार चर्चिल्या व मोठे पाठबळ मिळालेल्या आदर्श अशा आशावादाची चलती होती. आशावादाचे तत्वज्ञान सांगते की विश्वातील वेगवेगळ्या जगामध्ये हे आपले जग सर्वांत चांगले आहे आणि इथे सर्व काही आपल्या चांगल्यासाठीच होते. हे तत्वज्ञान लोकप्रिय होते आणि त्याच काळात व्हाॅल्टेअरवर अनेक संकटे आली. संकटांना व इतर अडचणींना तो तोंड देत जगत होता. म्हणजे आशावादाने सांगितलेल्या विरूद्ध स्थितीत व्हाॅलटेअर दिवस काढत होता! म्हणून काही अंशी त्याची Candide कादंबरी ह्या आशावादी तत्वज्ञानाला व काही अंशी व्हाॅल्टेअरच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून लिहिली गेली.

कॅन्डाईडCandide हा राजपुत्र सिद्धार्थाप्रमाणेच सर्व प्रकारच्या सुखातच वाढला. त्याच्या राजवाड्यासारखाच ह्याचाही प्रासाद. आईवडील प्रेमळ,चांगले. डाॅ.पॅनग्लाॅस हे सुद्धा त्याहून चांगले. त्यानींच कॅन्डाईडला हे जग चांगले; ह्यातील सर्व काही चांगले; घडते ते आपल्यासाठी चांगलेच अशी सगळी चांगली शिकवण दिली. आणि इथूनच महाभयंकर घटनांना सुरुवात होते.कॅन्डाईडवर लेखक व्हाॅल्टेअर इतके भयानक घोर-अघोरी प्रसंग आणतो. पण कॅन्डाईडचा चांगल्यावरचा विश्वास ढळत नाही. पण जवळचे सर्व काही गमावल्यावर अखेर तो एका बेटाला लागतो व तिथे तो व्हाॅल्टेअरच्या शब्दांत- “तिथे तो आपली बाग फुलवत राहतो”! आशावादी तत्वज्ञान उदयाला आले. सतत चर्चेत राहिले त्याच वेळेस व्हाॅल्टेअर विपरित प्रतिकूल परिस्थितीतून जात होता. त्यामुळेच त्याने प्रतिक्रिया म्हणून ही कादंबरी लिहिली. पण कादंबरीत त्याने आशावादाचे समर्थन केले नाही किंवा निराशवादाला उचलून धरले नाही. चांगले आणि वाईट दोन्ही लिहिले आहे.तटस्थपणे वस्तुस्थिती काय असू शकते हे लिहिले आहे. आजूबाजूचे भान ठेवून ज्याचे त्याने आपले नंदनवन फुलवावे असे म्हणत त्याने काय ठरवायचे ते वाचकांवरच सोपवले आहे. व्हाॅल्टेअरने वीस हजार पत्रे लिहिली, दोन हजार पुस्तके, पुस्तिका,लेख लिहिले. नाटके कविता सर्व लिहिले. पण आजही टिकून आहेत ती त्याची पत्रे व Candide! ही कादंबरी! त्यानेआपले इतर सर्व व्याप सांभाळत असताही, फक्त चारआठवड्यात ती लिहिली ! कथानक अतिशय वेगवान आहे. वाचायला घेतलीत तर दोन अडीच तासांत वाचून संपवालही. पण कित्येक दिवस विचार करत राहाल अशी आहे. वाचकासाठी हाच उत्कृष्ट वा•डमयकृतीचा हा बोनस असतो!

इतके सर्व चांगले होत असूनही प्रत्येक मोठ्या माणसाला टीकाकार असतातच. स्वत: व्हाॅल्टेअरने रूसाॅंवर बरेच वेळा टीका केली. त्याच्या कादंबऱ्य्वर उपरोधपूरण टीका केली. पण व्हाॅल्टेअर रूसाॅंचे साहित्य वैचारिक निबंध काळजीपूर्वक वाचत असे. रूसाॅंची वीस पंचवीस पुस्तके त्याच्या लायब्ररीत होती. त्यातील सर्व महत्वाच्या पुस्तकांत व्हाॅल्टेअरने केलेल्या टीपा टिपणीही आढळतात. रूसाॅंनेही व्हाल्टेअरवर तो ज्या सहिष्णुतेचा इतका डंका वाजवतो ती त्याने जिन्हिव्हाच्या संसदसभासदांबाबत का दाखवली नाही? असा प्रश्न विचारून सहिष्णुता बाळगणे व्हाॅल्टेअरलाच आवश्यक आहे असा टोला मारला आहे. तर व्हाॅल्टेअरने रूसाॅंच्या Discourse on the Origin of Inequality वर टीका करताना, “हे म्हणजे आता सगळ्यांनी चार पायांवर चालावे असे सांगण्यासारखे आहे; मी साठ वर्षाचा असल्यामुळे मला ती जुनी सवय पुन्हा अमलात आणणे शक्य नाही!” अशी खवचट टीका केली होती. इंग्लंडचा तत्वज्ञानी व इतिहासकार व्हाॅल्टेअरच्या इतिहासलेखन व मतांविषयी टीका करताना म्हणतो की त्याने इतिहास विषयाला इतिहासाला वाहून घेतलेले नव्हते; व लिहिले ते जास्त करून कॅथलिकांविषयीच्या विरोधामुळे लिहिले असे वाटते.

व्हिक्टर ह्युगो म्हणतो की ,”अठरावे शतक म्हणजे व्हाॅल्टेअर!” रूसाॅं हा जवळपास त्याचा समकालीन. तोही व्हाॅल्टेअरसारखाच प्रतिभावान. दोघांचेही कीर्तिसूर्य तळपत होते. पण डेव्हिड ह्यूमच्या मते काही काळ असा होती की रूसाॅंने व्हाॅल्टेअरला पूर्ण झाकले होते. आपल्यासाठी अर्थ इतकाच की दोघेही थोर होते. त्यासाठी फ्रान्स व जिन्हिव्हाने दोघांसाठी कृतज्ञता कशी व्यक्त केली ते सांगतो. ज्या Ferney येथे व्हाॅल्टेअरने वीस वर्षे वास्तव्य करून फर्नेला मोठे केले त्या फर्नीचे नाव फ्रान्सने व्हाल्टेअरच्या जन्मशताब्दीला कृतज्ञतेने ‘व्हाॅल्टेअरचे फर्नी’Ferney-Voltaire असे केले! तसेच अखेरच्या वर्षांत ज्या अर्मनव्हिल येथे रूसाॅं राहात होता तिथल्या सुंदर पार्कला रूसाॅंचे नाव दिले आहे. आणि जिनिव्हाने तिथल्या सरोवराकाठी रूसाॅंचा पुतळा उभा केला आहे. १९४४ साली दुसऱ्या महायुद्धात जेव्हा नाझींच्या ताब्यात गेलेल्या फ्रान्सची मुक्तता झाली त्यानंतर फ्रान्सने आणि रशियातही व्हाॅल्टेअरची २५० वी जयंती साजरी केली. त्यावेळी रशियाने म्हटले होते की व्हाॅल्टे्अरचे नावच नाझी फॅसिस्टांचा थरकाप उडवित असे! व्हाॅल्टेअर “, नागरी हक्क,विचार स्वातंत्र्य, न्याय ह्यांचे प्रतिक होता.” रशियाची सम्राज्ञी कॅथरिन द ग्रेट म्हणाली,की “ती सोळा वर्षाची असल्यापासून व्हाल्टेअरचे विचार वाचत असे.” व्हाॅल्टेअरच्या अखेरच्या वर्षांत तिचा त्याच्याबरोबर पत्रव्यवहारही चालू होता. तिच्या पत्रातून ती विद्यार्थिनीच्या भूमिकेतून लिहिते असे दिसते.

व्हाॅल्टेअर गेल्यावर त्याचा सर्व ग्रंथ संग्रहालय तिने विकत घेतला. त्यानंतर तो आता रशियाच्या राष्ट्रीय संग्राहालयात पीटस्बर्गमध्ये आहे. व्हाॅलटेअर जसा प्रतिभावंत साहित्यिक होता तितकाच बुद्धिमान विचारवंत होता. साहित्यिक व्हाॅलटेअरवर फ्रान्सचा उपरोधिक विनोदी लिहिणारा नाटककार मोलिअे, शेक्सपिअर, स्पॅनिश कादंबरीकार सर्व्हॅंटिस, महाकवि होमर, वैज्ञानिक न्यूटन ह्यांचा प्रभाव होता. तत्वज्ञानी व्हाॅल्टेअरवर फ्रान्सिस बेकन,जाॅन लाॅक,व धर्म संस्थापक झरतुष्ट्र ह्यांचा प्रभाव होता. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रेंच राज्यक्रांति, अमेरिकेतील क्रांति, मार्क्स, फ्रेडरिक द ग्रेट, नेपोलियन, कॅथरिन द ग्रेट आणि तीनशे वर्षानंतर आजही ह्या ना त्या रूपात दिसतो. त्या विचारांची चांगली फळेही आपण उपभोगत आहोत, हे विसरता येणार नाही.