Monthly Archives: May 2019

महाभारताची थोरवी

महाभारताच्या (पहिल्या) आदिपर्वातील अनुक्रमिणी ह्या पहिल्या अध्यायातच ऋषी लोमहर्षण सौती महाभारताचा संक्षिप्त रूपांत आढावा घेत सारांश सांगतो. तो सांगून झाल्यावर तो महामुनि महाभारताची थोरवी सांगतो ती ऐकण्यासारखी आहे. हे तो ३५ते ३९ व नंतरच्या ३८९-३९६ ह्या काही श्लोकांतून स्पष्ट करतो.महाभारताची ती महति, श्रेष्ठत्व ऐकू या:

मोक्षप्राप्तीची इच्छा करणारे(मुमुक्षु) वैराग्याचा आश्रय करतात त्याप्रमाणे योग्य अर्थवाही शब्दांतून व त्यांच्या रमणीय अर्थाने परिपूर्ण असलेल्या, अनेक आचारांचे वर्णन असलेल्या ह्या आख्यानाच्या अभ्यासातील (जिज्ञासेमुळे जाणीवपूर्वक वाचन) आनंदात अनेक बुद्धिमान लोक मग्न असतात.

जाणून घेण्याच्या (ज्ञेय) वस्तूंमध्ये आत्मा श्रेष्ठ ज्ञेय आहे, स्पृहणीय गोष्टींमध्ये आपले जीवित श्रेष्ठ असते त्याप्रमाणे सर्व शास्त्रांत सर्वांपेक्षा मोठा आशय व्यक्त करणारा हा भारत नावाचा ग्रंथ अग्रगण्य आहे.

अन्नपाण्यावाचून शरीराचे पोषण व धारणा होऊ शकत नाही त्याप्रमाणे भारत नावाच्या आख्यानाचा आश्रय घेतल्यावाचून कोणतीही कथा अस्तित्वात येऊ शकत नाही .

आपली उन्नती व्हावी, उत्कर्ष व्हावा म्हणून सेवक चांगल्या कुळातील प्रतिष्ठित व्यक्तींकडे काम करतात त्याप्रमाणे कविही आपल्या अभ्युदयासाठी भारताचे चांगले अध्ययन करतात. ( कविनांही भारतातील आख्याने आणि वर्णने ह्यांच्यापासून स्फूर्ति मिळते.)

जगातील दैनंदिन व्यवहार आणि वेदवित्या( सर्व विषय व शास्त्रांच्या विद्येची माहिती व ज्ञान) ह्यांचा सर्वाधार असलेली वाणी ज्याप्रमाणे स्वर व व्यंजने ह्यांच्यामध्येच पूर्ण सामावलेली आहे त्याप्रमाणे महाभारत नावाच्या सर्वश्रेष्ठ इतिहासात सर्व उत्कृष्ठ ज्ञान सामावलेले आहे.


ह्यापुढचे सांगणे महत्वाचे आहे:
जगामध्ये कोणताही विषय असा नाही किंवा मानवी स्वभावाचे पैलू नाहीत की जे महाभारतात आले नाहीत. किंबहुना महाभारत म्हणजे मानवी स्वभाव व वर्तणुकीचा स्वच्छ आरसा आहे.
महाभारताची थोरवी, त्याचे विशाल व्यापक तितकेच सखोल रूप हे दृष्टान्त रुपकातून सांगताना त्याचे भाष्यकार पुढे म्हणतात:

वेद वेदांग आणि उपनिषदे ह्यांचे ज्याने विचारपूर्वक अध्ययन केले पण पण त्याने महाभारताचा सखोल अभ्यास केला नसेल तर तो ‘प्रज्ञावंत’ ह्या पदवीला पात्र नाही असे समजावे!
ह्या महाभारतात काय नाही? ह्यामध्ये श्रेष्ठ धर्मशास्त्र आहे. अर्थशास्त्र आहे. इतकेच नव्हे तर कामशास्त्रही (सर्व वासनांचा समावेश काम ह्या शब्दांत होतो) आहे.

कोकिळेचे कूजन ऐकल्यावर कावळ्यांची काव काव कोणी ऐकेल का? ती ऐकायला कुणाला आवडेल! तसेच महाभारताचे हे आख्यान ऐकल्या-वाचल्यावर दुसरे आख्यान, साहित्य ऐकायला,वाचायला आवडणार नाही.

जरायुज( वारेतून जन्मणारे पशु. मनुष्य वगैरे), अंडज(अंड्यातून जन्मणारे पक्षी, साप, पाली वगैरे), स्वेदज(घामातून जन्मणारे ढेकूण, पिसवावगैरे), उदभिज( मातीतून ) ,फोडून वर येणारे वनस्पति वगैरे), अशी चारही प्रकारची सृष्टी पंचमहाभूतांपासून व अंतरिक्षावर अवलंबून असते त्याप्रमाणे महाभारतावर पुराणे अवलंबून आहेत.


पुढे अध्यात्मिक तत्वज्ञानाची उपमा देताना सर्व इंद्रियांकडून होणारी क्रिया कर्मे ज्याप्रमाणे मनांतील विविध विचार विकारांवर अवलंबून असतात त्याप्रमाणे ह्या जगातील सर्व विचार हे महाभारतावर अवलंबून आहेत असे मोठ्या गौरवाने ते म्हणतात.

अथांग सागरातून तरून जाणे नावेच्या मदतीने सोपे होते तसे ह्या अतिशय उत्कृष्ठ व गहन आशयाने भरलेल्या महाभारत नामक आख्यानाचे विचारपूर्वक वाचन किंवा श्रवण केले असता व्यवहाराच्या गुंतागुंतीत योग्य तऱ्हेने वाागणे सोपे होते.