Monthly Archives: August 2013

साहित्यिक सम्राट

रोमन साम्राज्याच्या सम्राटांची , त्यांचे पराक्रम , त्यांची
प्रेम-प्रकरणे किंवा त्यांचा विक्षिप्तपणा इतकीच ओळख आपल्याला ज्युलियस,
ऑगस्टस , निरो किंवा क्लोडियस या सीझर राजांची आहे.

शेक्स्पिअर पासून ते अलीकडच्या अल्बर्ट कामू या आधुनिक नाटककारापार्यंत
अनेक नाटककारांनी रोमन सम्राटांवर नाटके लिहिली.

साहित्याचे विषय हे राजे झाले पण खुद्द ह्यांच्यापैकी बरीच सीझर मंडळी
साहित्यिक होती याची आपल्याला फारशी माहिती नाही.
अनेक वर्षे , पिढ्यान पिढ्या, पाश्चिमात्य विद्यार्थ्यांना लाटिनची ओळख
रोमन सम्राट ज्युलियस सीझरची आणि त्याच्या Conquest of Gaul या
पुस्तकापासूनच व्हायची!

ज्युलियस सीझरची (इ.स. पूर्व १०० ते इ.स पूर्व ४४ ) एवढ्यावरच लेखक
म्हणून ओळख संपत नाही. त्याने नाटके लिहिली आणि कविताही केल्या. आपल्या
रोम आणि स्पेनच्या चोवीस दिवसांच्या सफरीची The Journey या दीर्घ काव्यात
वर्णने केली . पण हा काव्य खंड हरवला ! आल्पस पर्वत ओलांडून केलेल्या
प्रवासाचेही ज्युलियस सीझरने काव्यातच वर्णन केले आहे . ज्युलियस
सीझरच्या भाषाशैलीची त्याच्या समकालीन लेखकांनीही वाखाणणी केली आहे.

सिसेरोने तर (सिसेरो हा इ.स.पूर्व १०६ ते इ.स. पूर्व ४३ या काळातला रोमन
तत्वज्ञानी , उत्तम वक्ता, कायदेपंडित आणि घटनाकार होऊन गेला.)सीझरच्या
शब्दसंपत्तीची आणि एकूणच त्याच्या राजेशाही भाषाशैलीची उदात्त या शब्दात
गौरव केला आहे . ज्युलियस सीझरनंतर झालेल्या ऑगस्टस सीझरच्या काळात (इ.स.
पूर्व ६३-इ.स.पूर्व १४ ) साहित्य वांग्मयाला चांगलाच बहर आला होता.

ऑगस्टसच्या दरबारी वर्जिल , होरेस आणि ऑविद सारखे चतुरस्त्र साहित्यिक
होते . ऑगस्टसला साहित्याची उत्तम जाण होती . वरील सर्व साहित्यिकांनी
आपापापल्या ग्रंथातून ऑगस्टसची स्तुतीच केलेई आहे. अशा प्रतिभावान
साहित्यिकांच्या प्रभावळीत. ऑगस्टस सीझरने आपले लिखाण फाडून नष्ट केले
किंवा आपले सीसिली काव्य हरवले याची खंतही बाळगली नाही यात नवल काय? पण
ह्या सम्राटाने १३ खंडात लिहिलेले आपले आत्मचरित्र आणि आपल्या
कार्याविषयी लिहिलेला ग्रंथ टिकून राहिला. पण त्याचे उत्तम म्हणून गणले
जाणारे Encouragement to Study of Philosophy हे मात्र काळाच्या ओघात
नाहीसे झाले!

टायबेरियस सीझर नंतर केलीग्युला या टोपण नावानेच जास्त माहित असलेला सीझर
झाला (इ.स. पू १२-इ.स. पू ४१ ) ह्याला साहित्याची काही फारशी जाण
नव्हती पण इतर विद्वान, साहित्यिक यांच्याविषयी अत्यंत कोती मते आणि
वृत्ती होती. त्याने Atellan या विनोदी लेखक-कलावंताचे नुसते लिखाणच
नव्हे तर त्या विनोदी लेखकालाही जाळून टाकले ! इतकी (च) त्याची “ज्वलंत
साहित्य सेवा !”

ह्या केलीग्युला नंतर त्याचा काका क्लोडियस हा गादीवर आला. ह्याचीही एक
वेगळीच तऱ्हा ! तिला स्वतंत्र वृत्ती म्हणायचे का नाही ते आपण ठरवायचे .
क्लोडियस सीझरच्या मनात लाटिन भाषेत नवीन मुळाक्षरांची भर घालण्याचे मनात
आले. त्याने तीन नवीन वर्णाक्षरांची भर घातली . आपल्या सम्राटाने संशोधन
करून काढलेली मुळाक्षरे म्हटल्यावर राजा बोले दळ हाले या न्यायाने
राजपत्रात आणि सरकारी खात्यात वापरायला सुरवात झाली . तुघलकी हुकमाने
संपूर्ण राजधानी हलवली गेली तसाच हा प्रकार. पण Claudius मेल्यानंतर
त्याची हीं तीन मुळाक्षरेही त्याच्याबरोबरच गेली!

पण ह्या क्लोडियस सीझरचे लिखाण फार प्रचंड होते . ह्यामध्येही त्याचा
स्वतंत्र बाणा दिसून येतो . त्याने Etruscan ह्या इतिहासाचे वीस खंड आणि
Carthaginian इतिहासाचे आठ खंड आपल्या लाटिन भाषेत न लिहिता ग्रीक भाषेत
लिहिले!

त्याने आणखी लिहिलेल्या पुस्तकांची गर्दी इतकी अफाट झाली म्हणता की
अलेक्स्झांड्रिया लायब्ररीची इमारत वाढवावी लागली . Claudiyan नावाची
नवीन इमारत मूळ इमारतीला जोडून बांधावी लागली!

रोमन सम्राट नीरो तर त्याच्या स्वत:विषयीच्या अवास्तव कल्पना, विक्षिप्त
आणि विचित्र वागणूक यामुळे कुप्रसिद्ध झाला. त्याचे क्लोडियस पॉलियो वरील
जहरी टीकेने भरलेले The One Eyed Man हे पुस्तक नीरोबरोबरच नष्ट झाले.

आपल्याकडेही काळाच्या प्रवाहात साहित्यिक राजे महाराजे होऊन गेले.
काहींचा भविष्य पुराणासारख्या इतर पुराणांत उल्लेख आढळतो . काहींच्या
बाबतीत तो राजा होता की कवी? किंवा एकाच नावाचे दोन असू शकतील असे वाद
आढळतात ; उदा . भर्तृहरीच्या बाबतीत असे वाद झाले. पण तो राजाही होता
आणि कवीही होता असेच आता मानले जाते .पण जे राजे निर्विवाद लेखक आणि
राजेहि होते त्यापैकी दोन ठळक नावे समोर येतात ती म्हणजे राजा शूद्रक आणि
राजा हर्षवर्धन!

राजा शुद्रकाचा काळ इ.स. पूर्वी २ रे शतक ते इ.सनाचे ५वे शतक यामधील
असावा असे समजले जाते . शुद्रकाचे सर्वांना माहित असलेले सदाबहार नाटक
‘म्रुच्छकटिक ‘ . चारुदत्त आणि वसंतसेना यांचे प्रेम आणि त्यातील वेगळाच
असा खलनायक शकार , आणि नाटकातील नाट्यमय घटना यांना कोण विसरेल? नाटककार
देवल यांनी याचे मराठीत सुरेख नाट्यपूर्ण रुपांतर केले आहे .

इ.स. ते ६४७ मध्ये नर्मदेच्या उत्तरेकडील बहुतेक सर्व भूप्रदेश ज्याच्या
ताब्यात होता तो पराक्रमी तितकाच सुसंस्कृत , रसिक, साहित्यिक राजा
हर्षवर्धन ! याने रत्नावली आणि प्रियदर्शी अशी दोन सुखान्त नाटके
लिहिली. ह्याच्या दरबारी त्याकाळचे प्रख्यात तत्वज्ञानी, कवी ,नाटककार
होते. हर्षचरितम लिहिणारा आणि ‘कादंबरी’ लिहिणारा कवि बाण उर्फ बाणभट्ट
हा त्याच्या दरबारी कवि होता.

इ.स. १६व्या शतकाच्या आगे-मागे बरेच जगन्नाथ पंडित होउन गेले. त्यापैकी
एक जगन्नाथ पंडित राजा होता. तो साहित्यिक होता की नाही याचा उल्लेख
आदळत नाही. पण तो कुशाग्र बुद्धीचा गणिती होता.त्याने भूमितीवर ग्रंथ
लिहिला आहे .

सीझरच्या सम्राटांची साहित्यिक संपदा पाहिल्यावर आपल्या तंजावरच्या
मराठी राजे सरफोजी भोसले या राजांच्या मराठी नाटकांची, संस्कृत
साहित्याची आठवण होते . या भोसले घराण्यातील राजांनी यक्षगान पद्धतीत
सुधारणा करून लिहिलेली स्वतंत्र अशी बावीस मराठी नाटके तसेच त्यांचे इतर
वांग्मयही आजही तंजावर येथे शाबूत आहे , उपलब्ध आहे . राजा शुद्रकाची
नाटके , भर्तृहरीच्या शतकत्रयीतील नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक हे
तीनीही काव्ये आजही आपल्याला वाचायला मिळतात. तुलनेने ही सर्व पुस्तके
रोमन काळाच्या मानाने अलीकडची आहेत हे खरे . पण तरीही ती फार जुन्या
काळातील आहेत हे नि:संशय. ह्या बाबतीत आपण आतापर्यंत तरी भाग्यवान आहोत
हे काय कमी समाधान आहे?

ऱोमन सम्राट ज्युलियस, ऑगस्टस आणि क्लॉडियस सीझर हे साहित्यिक होते .
ज्युलियस सीझर तर शैलीदार लेखक म्हणून नावाजला गेला . पण दुर्दैव असे की
त्यांची ही सर्व ग्रंथ संपत्ती त्यांच्या रोमन साम्राज्या बरोबरच लयास
गेली!

कालाय तस्मै नम: ।

महाकादंबरीचे बारसेही बारा वेळा तेरा काळ!

नाशिक रोडला असताना शनिवार रविवारी देवळाली कॅम्पला जात असे. बहुतेक वेळा हडपसरकर बरोबर असायचाच. एखादे वेळेस एम. जी. कुक असायचे. कुक म्हणजे कुलकर्णी. कॅम्पमध्ये भटकणे, मग अडल्फी किंवा कॅथी मध्ये इंग्रजी सिनेमा पाहणे. हॉटेलात जाणे. असा कार्यक्रम असे.

देवळाली कॅम्प मध्येच Brothers Karamazov पाहिल्याचे आठवते. त्या वर्षा -दोन वर्षात चर्चेत असलेला युल ब्रायनर त्यात होता. सिनेमा डोस्टोयव्ह्स्कीच्या त्याच नावाच्या अतिशय प्रख्यात कादंबरीवर होता. त्यामुळे कथा जबरदस्त प्रभावी असणार ह्यात शंकाच नव्हती. त्या आधी काही वर्षांपूर्वीच डोस्टोयव्हस्कीच्या The Idiot , Crime and Punishment या कादंबऱ्याही मी वाचल्या होत्या.

डोस्टोयव्हस्किच्या कादंबऱ्या, कथा वाचताना मध्येच पुस्तक मिटून शांत बसावे असे वाटे. पुस्तक संपवल्यावरही असेच व्हायचे. काही न बोलता थोडा वेळ शांत बसून, असे का व्हावे , असे व्हायला नको होते असे विचार येउन एखादा दुसरा प्रसंग, घटना पुन्हा समोर यायचे. मन खिन्न व्हायचे. काही दिवस ते पुस्तक डोक्यात सतत घोळत असे. ब्रदर्स कारामाझोव सिनेमा पाहून बाहेर आल्यावरही थोडा वेळ आमचे असेच झाले. आम्ही गप्पच होतो. हॉटेलात आल्यावर मग हळू हळू सिनेमाविषयी बोलणे सुरु झाले. गप्पाही झाल्या. केवळ रशियातीलच नव्हे, पाश्चात्य युरोपीय देशातच नव्हे, जगातील वाचकावर डोस्टोयव्हस्कीचा मोठा प्रभाव आहे . आणि त्यामुळेच जगातील थोर लेखकांत डोस्टोयव्हस्कीची गणना होते.

साहित्यिक, कादंबरीकार, डोस्टोयव्हस्कीच्या संकल्पित महाकादंबरीची वेळोवेळी रूपे बदलली पण प्रत्यक्षात ती कधी जन्मालाच आली नाही; ती एका अप्रतिम कादंबरीत मात्र विलीन होत गेली. परंतु त्या अखेरच्या अप्रतिम कादंबरीचा डोस्टोयव्हस्कीने योजलेला दुसरा भागही प्रकट झाला नाही. ही सर्व हकीकत ऐकण्यापूर्वी डोस्टोय्व्हयवस्कीच्या जीवनाची, झारच्या सत्तेखाली असलेल्या रशियात होऊ पाहणाऱ्या स्थित्यंतराची थोडीशी माहिती होणे आवश्यक आहे.

डोस्टोयव्हस्कीचा जन्म इ.स. १८२१ साली रशियात झाला . तिथेच तो लहानाचा मोठा झाला . रशिया आणि रशियन माणसातूनच, त्यांच्याविषयी त्याने आपली लघुकथा कादंबऱ्या लिहिल्या . तो कादंबरीकार म्हणूनच जास्त ओळखला जातो . पण त्याच्या साहित्याने जागतिक वाङ्गमयावर आपला कायमचा ठसा उमटवला आहे. डोस्टोयव्हस्कीचे वडील गरीबांसाठी असलेल्या एका मोठ्या रुग्णालयात काम करत. रुग्णालयाच्या आवारातच ते कुटुंब रहात असे. ह्या रुग्णालयात अनेक रोग-व्याधींनी, आजारांनी गांजलेले रुग्ण असत. ह्यात विशेष काही नाही . पण तिथेच वेड्यांसाठीही सोय होती. वेडे झालेले रोगीही तिथेच असत.त्यामध्येच एक अनाथालयही होते. आणि हे सर्व कमी म्हणून की काय त्या आवारातच दफनभूमीही होती! अशा ‘आरोग्यपूर्ण’ वातावरणातच आपले आई- वडील, बहिण भावांसह डोस्टोयव्हस्की वाढला. राजपुत्र सिद्धार्थाच्या थेट विरुद्ध परिस्थितीत फेडोर डोस्टोयवस्की वाढला!

वयाच्या नवव्या वर्षी त्याला अपस्माराचा- Epilepsy- त्रास सुरु झाला. पुढे डोस्टोयव्हस्की सायबेरियात हद्दपारीची शिक्षा भोगत होता त्यावेळीही त्याला ह्या आजाराचाही थोडा त्रास भोगावा लागला. अपस्माराच्या अनुभवाचा उपयोग त्यानंतर त्याने आपल्या साहित्यातही केला आहे.

सोळाव्या वर्षी डोस्टोयव्हस्की आपल्या भावाबरोबर लष्कराच्या इंजिनीअरिंग विद्यालयात गेला. तेथून बाहेर पडल्यावर तो काही काळ सैन्यात सेकंड लेफ़्टनंट पदावर होता. ह्यानंतर तो लिहू लागला. पश्चिम युरोपातील क्रांतीचे वैचारिक पडसाद रशियातील बुद्धिवंतांमध्ये पडत होते. अशा नवविचारांच्या लोकांमध्ये डोस्टोयव्हस्कीची उठ बस होऊ लागली आणि त्याच वेळी त्याची Poor Folks ही कादंबरी प्रसिद्ध झाली.

रशियन साहित्य जगात ह्या कादंबरीने खळबळ उडवून दिली . त्या काळचा प्रख्यात समीक्षक बेलीन्स्कीलाही ही कादंबरी आवडली. त्याने अनुकूल अभिप्राय लिहिला. बेलीन्स्कीने चांगले म्हटल्यावर रशियात तो लेखक एकदम नावाजला जाई इतके महत्व बेलीन्स्कीच्या मताला त्यावेळी होते. डोस्टोयव्हस्की प्रकाशझोतात आला तेव्हा तो बेलीन्स्कीच्या जहाल विचारांचा समर्थक होता . १८४९ साली झारच्या राजसत्तेने डोस्टोयव्हस्कीला गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा ठोठावली. त्याला गोळीबाराच्या पथकासमोर उभे करण्यात आले. पण अचानक चक्रे फिरली. डोस्टोय्व्हस्कीला त्याऐवजी चार वर्षे सायबेरियात हद्दपार केले आणि परत आल्यावर चार वर्षे सैन्यात नोकरी करण्याची सक्तीही झाली.

सायबेरियात हकालपट्टी म्हणजे दुसरे मरणच. पण डोस्टोय्व्हस्की त्यातून धडपणे बाहेर आला. सायबेरियातील काळात त्याच्या विचारांत फार बदल झाला. मुळात त्याचा धर्माकडे असलेला कल पुन्हा तिकडे वळला. पूर्वीच्या विचारांचा प्रभाव हळू हळू वाढला.

इतके सगळे घडूनही डोस्टोयव्हस्की हा हाडाचा, प्रतिभावंत लेखकच राहिला. त्याच्या कादंबऱ्या आणि इतर लेखन वाचले की प्रकर्षाने जाणवते ते त्याचे मनुष्य स्वभावाचे , माणसाचे , आजूबाजूच्या परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण . माणसाच्या मनातील गुंतागुंतीच्या विचारांचे त्या त्या व्यक्तिरेखेनुसार विश्लेषण, त्याच्या कादंबरीच्या पात्रांमध्ये, मग ती धार्मिक असो की गुन्हेगारी वृत्तीची, ईश्वरवादी किंवा निरीश्वरवादी, अराजकी किंवा विवेकी त्यांच्या मुळाशी काही आदर्श, श्रद्धा तत्वनिष्ठा, काही ठाम विचार होते. त्याच्या सायबेरियाच्या काळापूर्वीच्या आणि त्या नंतरच्या मतांतराचा एकत्रित प्रतिभाविलास त्याच्या गाजलेल्या कादंबऱ्यात आढळतो. त्याच्या मूळ स्वाभाविक विचारांमुळे, मते बदलली, विचार बदलले तरी तो खरा लेखक असल्यामुळेच Crime and Punishment ,The Idiot , The gambler, The Brothers Karamazov सारख्या चिरकाल कीर्ति मिळवणाऱ्या कादंबऱ्या लिहू शकला.

डोस्टोयव्हस्कीने आणि त्याच्या भावाने Time नावाचे मासिक काढले. त्यात त्याने सायबेरियातील अनुभवावरील कादंबरी प्रकरणाश: प्रसिद्ध केली . हे सरकारने बंद केले. त्यानंतर दोघांनी Epoch मासिक चालू केले . थोड्याच दिवसात डोस्टोय्व्हस्कीचा भाऊ मरण पावला. पैशाचा तुटवडा होताच त्यातच पैशांची आघाडी सांभाळणारा भाऊ गेला. त्याच्या बायको मुलांची जबाबदारी डोस्टोयव्हस्कीवर आली. कसलाही विधिनिषेध नसलेल्या प्रकाशकाच्या कर्जात आणि त्याने बांधून घेतलेल्या कराराच्या तावडीत डोस्तोयव्हस्की सापडला . कर्ज फेडून प्रकाशकाच्या हातून आपल्या पूर्वीच्या आणि भविष्यातीलही लेखनाचे ‘सर्व हक्क स्वाधीन’ Copy Right सोडवून घ्यायचे होते!

सेक्रेटरीला दररोज तोंडी सांगून डोस्टोयव्हस्कीने आपली The Gambler ही कादंबरी लिहून संपवली. प्रकाशकाला देऊन टाकली . ह्या सेक्रेटरीशीच त्याने लग्न केले. पैसा जमवून युरोपात जाण्याचे ठरवले. पैसे जमवण्यासाठी त्याने The Drunkard कादंबरी लिहिली . क्रमश: प्रसिद्ध करण्यासाठी त्याने त्या काळचे तीन हजार रुबल्स मागितले. पण कोणी दिले नाहीत. पण डोस्टोयव्हस्की कसला मागे हटतो? Drunkards मधले मार्मडोव्ह हे मुख्य पात्र थोडाफार बदल करून तो लिहित असलेल्या Crime and Punishment कादंबरीत समाविष्ट केले.

डोस्टोयव्हस्की आपल्या बायकोबरोबर युरोपात आला. ह्या देशातून त्या देशात भ्रमंती करत होता. तिथे त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हतीच . त्यातच त्याला जुगाराचे व्यसन लागले. जुगार खेळण्यात त्याचा वेळ जाऊ लागला. अशा परिस्थितीतही त्याच्या डोक्यात एक महाकादंबरी घोळत होती. १८६८ मध्ये त्या काळात कादंबरीचे नाव Atheism असे ठरविले होते. “एका चाळीस वर्षाच्या सनदी नोकरच देवावरचा विश्वास उडतो. अनेक धर्मोपदेशक , भिक्षु, तरुणांच्या , युरोपियन रशियन कट्टर धर्मनिष्ठांच्या सहवासात तो राहतो . पण त्याचा देवाधर्माचा तिटकारा कायम राहतो . पण पोलिश जेझुइटांच्या सहवासात मात्र त्याच्यात अमुलाग्र बदल होतो. धर्मावरची आणि येशुवरची श्रद्धा आणि रशियावरचे त्याचे प्रेम पुन्हा दृढ होते.” असा आराखडाही तयार होतो.

Atheism हि महा कादंबरी त्याच्या हातून कधीच लिहून झाली नाही. आपण डोस्टोयव्हस्कीच्या संकल्पित कादंबरीला मुकलो . पण ह्या महाकादन्बरीतील काही कल्पना, घटना The Devils मध्ये आढळतात. महाकादंबरी लिहिली गेली नाही पण या कादंबरीचे नाव मात्र वेळोवेळी बदलत गेले. पुन्हा तिचे बारसे होऊन ती आता The Life of A Great Sinner झाली . ही तीन किंवा पाच कादंबरीका अशा स्वरुपात लिहायची तो ठरवतो. पण ह्या नवीन नावाने येणाऱ्या कादंबरीचेही अनेक वेळा बारसे होऊन तिला विष्णुसहस्त्र नामासारखी अनेक नावे मिळाली. उदा. The Forties , A Russian Candidate , A Book of Christ , वगैरे. इतक्या वेळा महाबारशी होऊनही ती कादंबरी लिहिली गेली नाही . पण ह्या संकल्पित कादंबरीकांचा बऱ्याच प्रमाणात The Brothers Karamazov ह्या कादंबरीतील समावेश झाला आहे. म्हणूनच ती इतकी गाजली असावी! ह्यातील संत वृत्तीचा भाऊ Alyosha मठात राहत असतो. डोस्टोयव्हस्की ह्या कादंबरीचाही दुसरा भाग लिहिणार होता . तसे त्याने तिच्या प्रस्तावनेत म्हटलेही आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे दुसरा भागच जास्त महत्वाचा. पण दुर्दैवने हा महत्वाचा दुसरा भागही त्याच्या हातून पूर्ण होऊ शकला नाही!

डोस्टोय्व्हस्की एकदा म्हणाला होता की “दुसऱ्या भागात हा संत-स्वभावाचा Alyosha मठ सोडून जाईल. अराजकवादी बनेल. आणि हाच सत्प्रवृत्त Alyosha झारची हत्या करेल. डोस्टोयव्हस्की २८ जानेवारी १८८१ रोजी वारला. आणि योगायोग म्हणायचा की डोस्टोयव्हस्कीचे भाकित म्हणायचे ! १८८१च्या फेब्रुवारीत झार दुसरा अलेक्स्झांडर याची कुणा
मारेकऱ्याने हत्या केली !

अनेक उत्कृष्ट कादंबऱ्या लिहून दिगंत कीर्ती मिळवलेल्या डोस्टोयव्हस्कीला, थोर विचारवंत लेखक, इतकेच काय तत्वज्ञानीही मानणारे अनेक होते.पण तो श्रेष्ठ कादंबरीकार म्हणूनच जगभराच्या वाचकांत ओळखला जातो. प्रख्यात रशियन लेखक पुश्किन. तत्वज्ञानी, साहित्यिक नित्श्झे आणि जेन पॉल सार्त्र यांच्यावरही डोस्टोय्वहस्कीच मोठा प्रभाव आहे. नोबेल पारितोषिक विजेता अर्नेस्ट हेमिंग्वेही त्याचा मोठा चाहता होता. त्याची स्तुती करणाऱ्यांबरोबर त्याच्यावर टीका करणारेही होते.

डोस्टोयव्हस्की आणि लिओ Tolstoy हे रशियाचे कीर्तिमान लेखक. Tolstoyने डोस्टोयव्हस्कीच्य Crime and Punishment विषयी फार ‘ओह हो! वा!’ असे उद्गार कधी काढले नाहीत. उलट तो एकदा म्हणाला होता, ‘मी त्याची Crime and Punishment वाचायला घेतली पण पहिल्या चार पाच पानातच तिचा शेवट समजला.” पण ते दोघेही एकमेकांना खूप मानत असत. डोस्टोयव्हस्की वारल्याचे जेव्हा टोल्स्टोयला समजले तेव्हा तो रडला!

कै. पुस्तके: आवृत्त्यांची कहाणी

इब्न हशिम इ.स. ८३३ मध्ये बगदाद येथे वारला. तो व्याकरणकार आणि विद्वान होता. त्याच्यापुढे एक मोठे जिकिरीचे काम आले. साठ वर्षांपूर्वी एक थोर विद्वान इब्न इश्क़्ने लिहिलेल्या प्रेषित मुहम्मद पैगंबराचे सिरत रसूल अल्लाह या चरित्राची शुद्ध प्रत तयार करण्याचे ऐतिहासिक महत्वाचे काम त्याला पूर्ण करायचे होते. .

इब्न हशिमनॆ हे काम मनापासून केले. पण दुर्दैवाने, त्याने, इब्न इश्क़्ने लिहिलेल्या ‘सिरत रसूल अल्लाहची” -या चरित्राची- मूळ प्रत मात्र नष्ट करून टाकली !

मुहम्मद पैगंबर हा क्वुरैश जमातीचा . तो व्यवसायाने व्यापारी होता. मुहम्मद एकदा मक्केच्या बाहेर निवांत जागी शांतपणे डोळे मिटून बसला होता. असा ध्यानस्थ बसला असताना देवदूत जिब्राऐल त्याला दिसला. डोळे उघडून पाहतो तेव्हा त्याला सगळीकडे जिब्राऐलच दिसत होता . आकाशापासून जमिनीपर्यंत सर्वत्र एक जिब्राआईलच भरून राहिला होता.

“म्हण, म्हणायला सुरवात कर.” जिब्राऐलने मुहम्मदाला आदेश दिला. पहिल्यांदा चाचरत, अडखळत मुहम्मदाने म्हणायला सुरुवात केली. नंतर मात्र तो नीट, सरळ म्हणत राहिला. आणि तो म्हणतच राहिला. अशा तऱ्हेने मुह्म्मदाने संपूर्ण कुराण रचले!

जेव्हा मुह्म्मदाला सगळीकडे जिथे पाहावे तिथे जिब्राऐल दिसत होता आणि, “म्हण, सुरू कर पठण” हे त्याचे शब्द ऐकू आले आणि हळू हळू पठण करत मुहम्मदाकडून संपूर्ण कुराण रचून झाले त्यावेळी प्रेषित मुहम्मद इतका घाबरला होता की आपण जीव द्यावा असे त्याला वाटत होते; असे इतिहासकार अल ताबरीने नमूद केले आहे.

पुढील वीस वर्षे मुहम्मद पैगंबर कुराणातील सुरा आणि आयता लोकांना सांगत होता. कुराणाची शिकवण देत होता . कुरण सांगताना मुहम्मद पैगंबर निराळ्याच अवस्थेत जात असे. परमेश्वरानेच-अल्लाहनेच- आपल्याकडून कुरण रचून घेतले ही मुह्म्मदाची खात्री अधिकाधिक दृढ होत चालली.

व्यापाराच्या निमित्ताने क्वुरैश /क्वुरायिश (आपल्याकडे कुरेशी/क्वुरेशी आहेत ते हेच क्वुरायीश असावेत) लोकांचा ज्यू आणि ख्रिश्चन लोकांशी संबंध यायचा. त्या लोकांना हे क्वुरैश ‘पुस्तकी’, ‘पुस्तकी धर्माचे’ म्हणत. त्याला कारण टेस्टमेंट आणि बायबल हे ग्रंथ. हे ‘पुस्तकी’ लोक क्वुरैशीना आपल्या धर्माच्या देवानी कसे चमत्कार केले ते वर्णन करून सांगत.

आपल्याकडे का असे चमत्कार नाहीत, आपल्यातले कोणी का चमत्कार करत नाहीत असा प्रश्न क्वुरैशिना पडे. आणि ते मुहम्मद पैगम्बराला तसे विचारतही.
“तुला का चमत्कार करता येत नाहीत?” असे त्याला विचारल्यावर मुहम्मद म्हणे,” आपले कुराण हाच एक मोठा चमत्कार आहे. ह्यापेक्षा दुसरा काय चमत्कार असू शकतो? कुराणाप्रमाणे वागा. मग चमत्कारच चमत्कार होतील. चमत्कारांना महत्व देऊ नका, ” असे तो उत्तर देई.

मुहम्मद पैगम्बारामुळे कुराण हा पवित्र ग्रंथ मुसलमानांना मिळाला. त्यामधूनच त्यांना एकच देव आहे,देव एकच तो म्हणजे अल्लाह,याची खात्री पटली.

क्वुरैश जमातीतील मुहम्मद आणि त्याच्यामुळे मुस्लिम धर्म स्थापन झाला आणि त्याचा विस्तारही झाला. पण त्याचीही एक पूर्वपिठीका आहे. ज्यू आणि ख्रिश्चनांना
आपला देव अब्राहमचा मुलगा आयझाक /इस्साक मार्फतच मिळाला. ऐझाकमुळे ज्यू आणि त्यातून पुढे ख्रिश्चन हे धर्म स्थापन झाले.
पण अब्राहमला आयझाक /इसाक शिवाय एक थोरला मुलगा होता. त्याचे नाव इस्माईल. हा अनौरस पुत्र. इस्माईल आणि त्याची इजिप्शियन आई हगार Hagar ह्या दोघांनाही अब्राहमची राणी सेरा Sara हिने देशाबाहेर घालवून दिले होते. त्यावेळी देवाने त्यांना वर दिला. “आयझाक/इस्साक प्रमाणेच इस्माईलसुद्धा एक मोठा देश वसवेल व त्याचीही प्रजा खूप वाढेल.”

कुराणातही क्वुरायिश जमात ही इब्राहिमी वंशाची जमात असाच उल्लेख आढळतो.
जस जसा मुहम्मद पैगंबराने स्थापन केलेला एकेश्वरी धर्म फोफावू लागला तसे अनेक लोक कुराणातील वचने,अध्यायचे अध्याय तोंडपाठ करू लागले. म्हणू लागले. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यात अनेक पाठभेद होण्याची शक्यता वाढली.

मुहम्मद पैगंबराच्या निर्याणानंतर झालेल्या पहिल्या दोन खलिफांनी–हे दोघेही पैगंबराचे सासरेच-अबू बक्र आणि उमर– सर्वांच्या तोंडी असलेले, अनेक पाठभेद झालेले कुरण एकत्र लिहून काढले. त्यानंतर आलेल्या तिसऱ्या खलीफाने काही पाठभेद वगळून काही शुद्ध करून एक प्रमाणित प्रत तयार केली. पण इथेही जुने पाठभेद कायम असलेले,पहिल्या दोन खलिफांनी एकत्र केलेले कुराण ह्या तिसऱ्या खलिफाने उतत्तेमान याने नष्ट केले!

ह्याच वेळी,प्रेषित मुह्म्मदाविषयी, त्याच्या संबंधीच्या अनेक प्रसंग, आख्यायिका, सगळीकडे प्रचलित हॊत्या. एक थोर विद्वान मुहम्मद इब्न इश्क़ने (इ. स. ७०४-इ.स. ७६७) ह्या सर्व आख्यायिका, घटना यांचे तपशीलवार संशोधन केले. त्यानंतर, मुहम्मद पैगंबराची निरुपणे, वचने आणि त्याच्या जीवनाशी निगडित असलेले प्रसंग घटना या सर्वांची नोंद असलेला संग्रह(इस्नाद) तयार केला.

इब्न इश्क़्च्या इस्नादमधील सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या मुह्म्मदाच्या, कुराणातील मूळ शिकवणीशी विसंगत नाहीत ना हे अभ्यायासाचे काम साथ वर्षानंतर इब्न हश्मीकडे आले होते. शिरत रसूल अल्लाहच्या संपादनाचे हश्मने मनावर घेतले होते . मुस्लिम परंपरेने मान्य क लेल्या वचनांची, प्रसंगांची त्याने भरही घातली. आणि इब्न इश्क़ ह्या विद्वानाने लिहिलेला मुहम्मद पैगंबराचा सिरत रसूल अल्लाह हा चरित्र ग्रंथ प्रमा
णित झाला. पण, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे
त्याने इब्न इश्क़्ने लिहिलेली मूळ प्रत नाहीशी करून टाकली!

सिरत रसूल अल्लाह हे मुहम्मद पैगंबराचे चरित्र. त्याला देवत्वाच्या जवळ नेउन ठेवणारे असले तरी त्यामध्ये त्याचे माणूसपण कायम ठेवले आहे. त्याला देव बनविले नाही. ह्या चरित्रातील पैगंबर आपल्यासारखा हसतो, गप्पा-गोष्टी करतो. रागावतो, चिडतो आणि घाबरतोही. तो आपल्यासारखीच दु:खे सहन करतो. अडचणी सोसतो. आणि संकटांना तोंड देतो. तसाच तो दयाळूही आहे. त्यालाही मुले आवडतात.

एकदा एका माणसाच्या हातून काही अपराध होतो. तो अपराधी गरीब होता. त्याला पैगंबरापुढे आणले. पैगंबराने त्याला,”तू गरीबांना दान दे. दान धर्म कर.” असे सांगितले. तो गरीब अपराधी म्हणाला,” माझ्याजवळ काही नाही तर मी दुसऱ्यांना काय देणार?”
मुहम्मद पैगंबराने त्याला ओंजळ भरून खजूर दिला आणि म्हणाला, “हा घे खजूर. तुझ्यापेक्षा गरीब असलेल्या कुणाला तरी हा दे.’ ह्यावर तो अपराधी म्हणाला,” अल्लाह रहेम करे. सरकार! हुजूर ! माझ्यापेक्षा कुणीही गरीब नाही!”

मुहम्मद पैगंबराला खूप हसू आले. हसता हसताच तो म्हणाला,”प्रायश्चित्त म्हणून तूच हा खजूर खाऊन टाक, जा.”

कै. पुस्तके: महाकाव्याचे महाभारत

अरबांनी पर्शिया जिंकून घेतल्यावर अहमद -अद -दक़िकीने (इ.स. ७३२-७७६) आपले झोराष्ट्रीयन(पारशी धर्माचे ) नाव बदलून अबू मन्सूर मुहम्मद असे मुसलमानी नाव घेतले. तरीही परंपरेने तो झोराष्ट्रीयनच-झरतुष्ट्रीच – राहिला असे मानले जाते.

आनंद आणि सुखासाठी फक्त “डाळिंबी ओठ, बासरीचे मधुर सूर आणि झरतुष्ट्रावरची श्रद्धा” अकेवळ ह्या गोष्टीच आवश्यक आहेत असे अहमद-अद -दक़िक़ी म्हणत असे. चारशे वर्षानंतर झालेल्या उमर खय्यामच्या साधारणत: याच अर्थाची रुबाया सर्वांना माहीत आहे.

अहमद-अद -दक़िक़ी हा बगदादचा राजकवी होता. सर्वोत्कृष्टचा समानार्थी म्हणजे अहमद -अद -दक़िक़ी इतकी त्याची ख्याती होती. त्याची स्तुती करणे म्हणजे “ह्झरला खजूर पाठवण्यासारखे आहे ” असे अनेक विद्वान समीक्षक म्हणतात. ह्या वरून “To bring Coal to New Castle” हा इंग्रजी वाक्प्रचार आपल्याला आठवला. तर नवल नाही.

इतके यश, नावलौकिक मिळूनसुद्धा त्याच्या डोक्यात यशाचे वारे शिरले नव्हते. तो म्हणायचा, “माझे सर्व आयुष्य धीराचे, धीर धरण्यातच गेले. ह्याचे सुंदर रसाळ फळ उपभोगण्यासाठी मला पुढचे आयुष्य मिळावे.” जणू काही “धीर धरी रे धीरापोटी असती मोठी फळे गोमटी ” या काव्य वचनाचे त्याने पालन केले!

त्याच्या गझला आणि चतुष्पदीमुळे तो लोकप्रिय होता. राजाने त्याला महाकाव्य रचण्यास सांगितले. अद्द्कीने ते लिहायला घेतले. हजार एक ओळी लिहूनही झाल्या. पण … इराणचा हा नामवंत कवि महाकवि होण्यापूर्वीच अहमद अद्दकीला त्याच्या तुर्की नोकराने सुऱ्याने भोसकून ठार मारले! वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी हा नामवंत कवि जग सोडून गेला!!

त्याचा समकालीन कवि रुदाकीच्या कूलीला आणि दिमना ह्या काव्याप्रमाणेच अहमद अद्द्कीच्या हजार काव्यपंक्तीसुद्धा काळाच्या उदरात गडप झाल्या असत्या. पण तरुण कवि फिरदौसीमुळे (इ,स. ९४०-१०२०) त्या भावी पिढ्यांना मिळाल्या.

अहमद -अद्दक़िक़ीच्या अपूर्ण महाकाव्यातील हजार काव्यपंक्तीत इराणचे राजे गुस्तास्प (गुश्ताफ) पासून अरजास्प (अरजाफ) पर्यंतच्या राजांच्या गोष्टी आहेत. पण त्यातही त्याने त्याच्या अंतर्यामी असलेल्या झरतुष्ट्राचे कार्य आणि थोरवी गुंफली आहे.

फिरदौसीने अद्द्कीचे हे काव्य घरी आणले त्याच रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात, अद्द्की एका रम्य उद्यानात, हातात मदिरेचा प्याला घेऊन बसला होता. त्याने फिरदौसीला,” इराणच्या इतिहासाचे हे महाकाव्य पुढे लिहायला घे. त्यामध्ये माझ्या (अद्द्कीकीच्या ) काव्यपंक्तींचाही समावेश करायला त्याने परवानगी दिली. त्यामुळे माझे (अद्द्कीचे) नावही राहील” असे म्हणता म्हणता ते स्वप्न संपले.

फिरदौसीने आपले महाकाव्य लिहायला सुरुवात केली. त्या महाकाव्याचे महाभारतही ऐकण्यासारखे आहे.
फिरदौसीला हे महाकाव्य पूर्ण करायला थोडी थोडकी नाहीत तर पुरे पूर पस्तीस वर्षे लागली! तेच हे फिरदौसीचे सर्वज्ञात ‘शाह -ए-नामा ‘ ! पण दु:खाची, वाईट वाटण्यासारखी बाब अशी की अहमद-अद -दक़िक़ीला त्याने फारसा मोठेपणा दिला नाही की त्याच्याविषयी आदरही दाखवला नाही. उलट तो अद्द्क़िक़ीच्य हजार काव्य-पंक्तीतील बारीक सारीक दोषच दाखवत होता. इराणच्या इतिहासाचे त्याने वास्तव दाखवले नाही असे म्हणू लागला. पण जेव्हा त्याची ही शेरेबाजी अजूनही हयात असलेल्या राजपुरुषांच्या दिशेनेही होऊ लागली तेव्हा फिरदौसीला भयंकर परिणामांची जाणीव होऊ लागली!

सुलतान महमद गझनवीने फिरदौसीला आपण प्रत्येक कडव्याला एक सोन्याची मोहर देऊ असे सांगितले होते. पण फिरदौसीचे हे साठ हजार कडव्यांचे महाकाव्य पूर्ण झाले तेव्हा तेव्हा महमद गझनवीला एका कडव्याला एक सोन्याची मोहर कबूल केली ही आपण मोठी चूक केली असे वाटले. अविचाराने उतावळेपणाने निर्णय घेतला असेच त्याला वाटले असणार. त्याने सोन्याच्या नाण्याऐवजी साठ हजार चांदीच्या मोहरा फिरदौसीला दिल्या. फिरदौसी आतून संतापला. निराश होऊन आणि रागारागाने, तो ती नाणी घेऊन निघाला. वाटेत जे त्याला कोणी भेटले त्या पहिल्या दोघांना त्याने त्या चांदीच्या मोहरा देऊन टाकल्या. त्यापैकी एक होता हमामखान्यातला नोकर आणि दुसरा सरबत विकणारा होता !

फिरदौसीचे हे कृत्य समजल्यावर अपमानित झालेला सुलतान गझनवी संतापाने खवळला. फिरदौसीला हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार मारण्याची शिक्षा त्याने ठोठावली!

फिरदौसी घाबरून जो पळाला तो शेजारच्या हेरत राज्यात आला. तिथला राजा शहरीयार बिन शेरविनला त्याने आपले हे काव्य अर्पण केले. पण ते देताना त्यात महमद गझनवी वर टीका टवाळी करणारी शंभर ओळींची कविताही प्रास्तविक म्हणून घातली. शहरीयारने, ती वाचल्यावर, हे म्हणजे आपल्यावर बलाढ्य पर्शियाच्या सुलतानाचा हल्ला ओढवून घेणेच आहे.अशी त्याची खात्री झाली. भीतिही वाटली. त्याने कडव्याला एक हजार दिरहान या हिशोबाने फिरदौसीकडे ती मोठी रक्कम पाठवली. आणि इकडे शेरविनने सुलतान महमद गझनवीची निंदा करणारी फिरदौसीची ती कविता नष्ट करून टाकली.!

इतकी प्रचंड रक्कम फिरदौसीच्या नशिबी नव्हती असेच म्हणावे लागेल. रक्कम घेऊन येणाऱ्या जासूदाला फिरदौसी भेटण्याऐवजी फिरदौसीची अंत्ययात्राच पहावी लागली!

‘शाह-ए-नामा ‘ हे इराणचे महाकाव्य म्हणून गणले जाते. “आमच्या राष्ट्राचा इतिहास आणि आमची भाषा या शाह-ए-नामाने जतन करून ठेवली आहे,” असे प्रख्यात मिर्झा अहमद अली फिरंघीने म्हटले आहे. “शाह -ए-नाम्यामुळे आमचा महाकवी अहमद अद्द्कीचे नावही कायम तेवत ठेवले आहे. अहमद अद्दिकी जिवंत असता तर त्याने फिरदौसीलाही मागे टाकले असते. आज तो आपल्याला फिरदौसीच्या सुबक आणि नक्षीदार कोंदणात शोभून दिसतो आहे.

कैलासवासी पुस्तके

स्टुअर्ट केली लहान असताना एका नातेवाईकाने त्याला Mr. Men या पुस्तकांच्या मालिकेतील एक पुस्तक दिले. ते वाचून झाल्यावर त्याने त्या मालिकेतील सर्व पुस्तके घेऊन वाचली . Mr. Menचा संपूर्ण संच त्याने जमवला . त्या पाठोपाठ Dr. Whoचा संपूर्ण संच त्याने जमवला . आणि थोडा मोठा झाल्यावर अगाथा ख्रिस्तीची सर्व पुस्तके घेऊन त्याने ती वाचली . जमाही केली . ज्याचे एक पुस्तक वाचले त्या प्रत्येक लेखकाची सर्व पुस्तके आपल्याकडे पाहिजेत याचे त्याला जणू वेडच लागले!

स्टुअर्टच्या चौदाव्या वर्षी त्याच्या वडीलांनी त्याला Complete Works of Shakespeare आणि Selections of Wordsworth हे दोन संच आणून दिले. त्यानंतर त्याने पैसे साठवून ग्रीक साहित्याची पुस्तके घेण्यास सुरुवात केली . एकदा तो अरिस्टोफन Aristophanचे नाटक वाचत होता. त्याच्या प्रस्तावनेतील एका वाक्यापाशी तो थांबला . “हे नाटक जेव्हा प्रसिध्द झाले त्यावेळेस त्या काळचा दुसरा प्रख्यात नाटककार अगथोन Agathon हा एकेचाळीस वर्षांचा होता . त्याने लिहिलेली नाटके, लेख व्याख्याने यापैकी आज काहीही अस्तित्वात नाही!”

हे वाचणारा स्टुअर्ट केली केवळ पंधरा वर्षांचा होता ! तेव्हापासून त्याने आपण वाचलेल्या पुस्तकांच्या यादीबरोबरच ‘नष्ट, नाहीशी झालेली पुस्तके ‘ अशीही एक यादी करण्यास सुरुवात केली . दु:खाची गोष्ट अशी की कैलासवासी पुस्तकांची यादीच मोठी होत गेली !

हे ग्रीक वाङ्गमयाच्या बाबतीतच नाही, सर्व भाषेतील साहित्याच्या बाबतीत घडले आहे . शेकस्पिअरपासून ते अलीकडच्या एझरा पाउंड पर्यंत सगळ्यांच्या लिखाणातून काही न काही साहित्यसृष्टीने गमावले आहे .

बरेचसे वांग्मय लेखकाने स्वत:च जाळून टाकले किंवा नष्ट केले . एकोणिसाव्या शतकातील कवी जेरार्ड हॉपकिन्सने आपल्या सुरुवातीच्या सर्व कविता जाळून टाकल्या . कारण ? त्याचे चित्त देवाकडे, अध्यात्मात लागले होते. नामवंत लेखक जेम्स जॉयसने आपले Stephan Heroचे हस्तलिखित आणि Portrait of the Artistचे पहिले लिखाण सरळ जाळून टाकले . रशियन लेखक मिखाईल बाख्तिनला सायबेरियात हद्दपार केले होते . तेथे त्याने प्रख्यात रशियन कादंबरीकार डोस्तोयव्हस्कीवर स्वत: केलेल्या लिखाणाच्या कागदांत तंबाखू भरून त्या सिगारेटी ओढून थंडीची हुडहुडी कमी केली . त्या अगोदर त्याने बायबलची पाने जाळून केलेल्या सिगारेटी ओढून थंडीवर मात केली होती !

सॉक्रेटिस तुरुंगात आपल्या मृत्युची वाट बघत असताना त्याने इसापच्या कथांचे काव्यात रुपांतर केले. पण त्याने त्याही नष्ट केल्या . त्या काव्यातले आपल्यासाठी काहीही राहिले नाही .

Aristotleचा दुसरा खंड नाहीसा झाला . ज्याला आपण पहिला खंड म्हणतो तोही Aristotleच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या टीपणांवर आधारित आहे .

अगदी अलीकडे १९६२ साली घडलेली ही दुर्घटना . जॉन काल्डर हा बडा प्रकाशक . अचानक त्याला आपल्या कार्यालयाची जागा सोडावी लागली . घाईघाईने सामान हलविण्याच्या गडबडीत अनेक लेखकांची हस्तलिखिते सगळी त्या जुन्या इमारतीतच राहिली . आणि त्या मालकाने ती इमारत जमीनदोस्त केली . किती एक हस्तलिखितांचे त्यात दफन झाले त्याची कल्पना करवत नाही .

अनेक साहित्यकृती लेखकांच्या मृत्युमुळे अर्धवटच राहिल्या . त्या कधीही पुऱ्या होऊ शकल्या नाहीत .

सर फिलिप सिडनीने Arcadia एकदा लिहिले पण त्याला ते पूर्ण झाले असे वाटत नव्हते . त्याला अजून त्यात भर घालायची होती . पण Zutphenच्या रणांगणावर गोळी लागून तो मेला . पूर्वीचे गाजलेले लेखक आर . एल. स्टीव्हन्सनचे Weir of Hermiston , विल्यम Thackerayचे Denis Duval आहेत त्या स्वरूपातही उच्च दर्जाचे साहित्य आहे .

काही लेखकांच्या संकल्पित पुस्तकांच्या योजना कधीच पूर्ण झाल्या नाहीत . प्लेटो आणि अरिस्टोटल यांच्या विचारात तत्वज्ञानात साम्य होते असे तत्वज्ञ बोथियसचे म्हणणे होते. पण त्यासंबंधीचा ग्रंथ त्याच्या हातून कधीच लिहून झाला नाही . तो हे कधीच सिद्ध करू शकला नाही .

नाटककार शेरेडन सगळ्यांना सांगत असे, “मी School for Scandalचा पुढचा भाग Affectation लिहिणार आहे .” पण त्याच्या हातूनही ते कधी लिहून झाले नाही .

नोव्हालीसाचा ज्ञानकोश , त्याची अनुक्रमणिका हिच सूचि म्हणूनही वापरता येईल अशी करावी का नको या द्वंद्वातच अडकून त्याचा तो ज्ञानकोश जन्माला आलाच नाही .

पुस्तके उदंड झाली, गवतासारखी वाढली असे काही वेळा वाटते . पण असलेल्या पुस्तकांपेक्षा काळाच्या उदरात गडप झालेली पुस्तकांची संख्या अफाट आहे . असंख्य पुस्तके नष्ट झाली. काही हरवली ती पुन्हा कधी सापडलीच नाहीत . आपल्या इथेही पानशेत सारख्या आणि मुंबईत तिथे नदी आहे हेसुद्धा लोक विसरून गेले होते , त्या मिठी नदीला मोठा पूर आला होता तेव्हा मुंबईतील किती पुस्तके वाहून गेली असतील!

याला एक अपवाद आहे, तो सांगण्यासारखा आहे .

भास हा संस्कृत नाटककार . त्याच्याविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे . त्याच्या काळाची निश्चिती नाही . ख्रिस्त पूर्व २ रे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक असावा असे मानले जाते . पण भास हा कालिदासाचा पूर्वकालीन आहे हे निश्चित .

कालिदासाच्या फार पूर्वीपासून भासाची श्रेष्ठ नाटककार म्हणून ख्याती होती . पण १३व्या -१४व्या शतकानंतर काय झाले ते कोणासही ज्ञात नाही . भासाची नाटकेच नव्हे त्याचे नावही लुप्त झाले . त्याची नाटके , भासाचे नावही कुठे आढळत नाही . भास आपल्या १३ नाटकांसह नाहीसा झाला!

आपले नशीब थोर म्हणून ७०० वर्षांनी १९१२ साली त्रिवेंद्रम येथील जुन्या पोथ्यांच्या संग्रहात विश्वस्तांना — म. म. गणपतीशास्त्री यांना भासाची नाटके सापडली! नाटककार भास हा ‘भास’ न राहाता सत्य ठरला . रसिक मोठे भाग्यवान . आज आपल्याला आवडणारी भासाची ‘स्वप्नवासवदत्त ‘ आणि ‘प्रतिमा’ ही दोन सुंदर नाटके वाचायला मिळतात .

कित्येक पुस्तके आगगाडीत विसरली हरवली चोरीला गेली . कित्येक आगीत जळून खाक झाली . प्राचीन काळातील ग्रंथालये जशी तक्षशीला नालंदा येथील तर अलेक्झांड्रीयाची जेत्यांनी नष्ट केली किंवा काळात नाहीशी झाली . कोणत्याही कारणाने असो, अशी नष्ट झालेली मूळ स्वरूप बदलून नव्या अवतारात आलेल्या , केवळ संकल्पातच राहिलेल्या अशा काही पुस्तकांची त्यांच्या लेखकांसह आपण, शक्य झाल्यास, ओळख करून घेऊ या.

आश्चर्य वाटेल पण त्या लेखकांत रोमन सम्राट ज्युलिअस सिझरही आहे !

झाले मेरु -मंदार धाकुटे!

तारखा, वार , दिवस रोजच येतात आणि जातात . पण एखादीच तारीख , तो वार , तो दिवस कायमचा लक्षात राह्तो. दुपारचे दोनही रोजच वाजतात . पण २३ जुलै २०१३ आणि त्या दिवशीचे दुपारचे दोन ह्यांना अनन्य महत्व आहे . हा दिवस आपल्या सर्वांच्याच लक्षात राहणार आहे . कौतुक आपल्या डोळ्यांतून ओसंडेल आणि ऊर अभिमानाने भरून येईल . आपल्या कल्याणीचे किती कौतूक करावे असे होईल . कारण याच दिवशी–२३ जुलै २०१३ दुपारी २. ०० वाजता कल्याणीने हिमालयाचे २२०००फूट उंचीवरचे छामसेर(समशेर) कांगडा शिखर सर केले , जिंकले!

हिमालय, २२००० फूट, छामसेर शिखर, प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्यक्ष पराक्रमालाच आव्हान आहे. कल्याणीने ते शांतपणे स्वीकारले. चिकाटी, दृढ निश्चय, मनाचा शांतपणा आणि अंगभूत उत्साहाच्या जोरावर तिने हिमालय चढून ती छामसेर (समशेर) कांगडा शिखरावर गेली. कल्याणी ”समशेर’ बहाद्दर झाली .

कल्याणीच्या या धाडसी, साहसी मोहिमेचे थोडक्यात वर्णन आपण तिच्याच शब्दांत . ऐकू या…।

“पुण्याहून आम्ही अकराजण दिल्ली-मनाली-लेहला जाण्यासाठी निघालो. दिल्लीला पोचलो . दिल्लीहून मनालीला आम्ही बसने आलो . मनालीहून लेहला जाण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले. कारण वाटेत एक रात्र मुक्काम केला होता ”

“लेहला आल्यापासून श्वासोश्वास घेणे अवघड होऊ लागले . कारण तिथली उंची! तिथून २४०किमीचा प्रवास करून कारझोकला आलो . इथे आमच्यापैकी एकाला श्वासोश्वास घेणे फारच अवघड, जड होऊ लागले. त्याला आम्ही लगेच लेहला माघारी पाठवले . तिथे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले . तो बरा झाला . पण मोहिमेत काही परत येऊ शकला नाही ”

“कारझोकला तिथल्या वातावरणाची, विरळ हवेशी जुळवून घेण्याची सवय होण्यासाठी आम्ही रोज दोन-तीन तास चढ-उतर करत असू . हे झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या बाजूने हिमालय चढून जाणार होतो त्या वाटेकडे निघालो. ते १५ किमीचे अंतर चालून जायला आम्हाला ७ तास लागले !”

” तिथेच त्या क्युरूच या ठिकाणी आमचा दुसरा तळ आम्ही ठोकला . इथेही आम्ही तिथल्या हवेची सवय होण्यासाठी तीन-चार तास चढ-उतार केली .”

“पर्वतावर इतरत्र बर्फ होता पण आम्ही ज्या बाजूने चढून जाणार होतो तिकडे बर्फ नव्हता . ठिसूळ, खडकाळ घसरडी अशी ती बाजू होती .बर्फ असता तर बरे झाले असते . कारण बर्फातून चढून जाण्यासाठी बूट असतात त्यांच्या spikesमुळे पायाची पकड तरी घट्ट होते. आमच्या बाजूच्या पर्वताचा भाग ठिसूळ,खडकाळ आणि घसरडा . त्यामुळे घसरतच पुन्हा चढायचे . दोन फुट वर गेले की एक फुट खाली . गणितातल्या त्या पालीसारखे!”

“चढण वाढत जाऊ लागली तसे श्वास घेणेही अवघड होऊ लागले . तो घेणेही एक ‘चढण’च वाटायचे . तरीही २१ जुलैला आम्ही दहाजण १८,००० फूटावर जाऊन पोहचलो . इथे आम्ही आमचा Base-Camp तळ ठोकला . त्या दिवशी हवा फार ढगाळ झाली होती . सगळीकडे अगदी ढगाळ झाले होते .. उद्या शेवटची चढाई करायची असे ठरले होते. पण हवा अशीच राहिली तर काय करायचे अशी सगळ्याना काळजी लागली . कारण मग पाऊस पडणार . पुन्हा जास्तच निसरडे होणार . बर्फही पडण्याची शक्यता . अशा विचारात आम्ही सगळे होतो . पण सुदैवाने हवा निवळली . आम्ही२३ जुलैला पहाटे ३.३० वाजता शिखरावर चढायला सुरुवात केली . पंधरा पावले चढून गेल्यावर थांबावे लागत असे . इतका दम लागत होता . त्यामुळे आमच्यातील पाचजण पहिल्या काही १५-२० पावलातच परत मागे तळावर गेले.”

“आता आम्ही पाचजणच चढत होतो . दम लागायचाच . थांबल्यावर थोडे बरे वाटायचे . पुन्हा चढायला सुरुवात करायची . चढ होताच . अगदी काटकोनी नव्हता पण ७०-७५ अंशाचा तरी होताच. अखेर चढत-थांबत आम्ही पाचजण दुपारी दोन वाजता छामसेर शिखरावर पोहचलो . शिखर गाठले! उभे राहिलो . फोटो काढले . तिथे आम्ही फार तर अर्धा तास होतो . Base-Campसोडल्यापासून १०तासांनी आम्ही शिखरावर पोहचलो होतो.”

“आता उतरायचे वेध लगले. उतरताना घसरायची भिती तशी जास्तच . आम्ही आमच्या Base-campला रात्री ८. ३० वाजता पोह्चलो. . Summitवरून Base-Campपर्यंत यायला आम्हाला ७ तास लागले . म्हणजे एकूण १७ तास झाले . मी फक्त कॅडबरी खाल्ली असेल तेव्हढीच . पण Base-Campला येईपर्यंत खाण्याची जेवण्याची आठवणही झाली नाही . पाणीही जास्त जात नव्हते .”

“शेवटपर्यंत, शिखरावर आम्ही फक्त पाचजणच होतो. त्यापैकी मी एकटीच मुलगी . आणि आमच्या अकराजणात सर्वात लहान मीच . एकोणीस वर्षांची . आमचे ग्रुप-लीडर माझ्या बाबांच्या वयाचे, पन्नाशीचे .दुसरी एक मुलगी ती चोवीस वर्षांची; एक आजोबा ते ६०-६५ वर्षांचे . बाकीचे तिशीतले . वर आम्ही जे पाचजण शिखरावर पोचलो त्यात आमचे Group-leader, मी , आणि बाकीचे तिशीतले असावेत .”

आपल्यापैकी हिमालयात एखाद्या शिखरावर चढून जाणारी , अशा साहसी मोहिमेत भाग घेणारी कल्याणी हि पहिलीच . माझे भाग्य असे की , आकाशात स्वत: विमन-उड्डाण करून आकाशी झेप घेणारी कल्याणीची थोरली बहिण मृण्मयी आणि हिमालयातील २२,००० फूट उंचीवरचे शिखर जिंकणारी ही कल्याणी या दोघींचेही पराक्रम मला प्रत्यक्ष पहायला, ऐकायला मिळाले . मलाही बरोबर घेऊन मृण्मयीने आकाशात झेप घेतली आणि विमानातून सृष्टी दाखवली . कुणी सांगावे! कल्याणीही तिच्याबरोबर मलाही एव्हरेस्टवर घेऊन जाईल! ह्या परते माझे दुसरे भाग्य ते काय?

कल्याणीच्या यशात तिच्या आई – बाबांचा, त्यानी तिला दिलेल्या उत्तेजनाचा, पाठिंब्याचा फार फार मोठा वाटा आहे हे विसरता येणार नाही .