Monthly Archives: August 2020

भाज्यांतील लोकप्रिय राग

संगीतात यमन, मल्हार, केदार, असे काही राग लोकप्रिय आहेत; त्याप्रमाणे भाज्यांतही लोकप्रिय रागांच्या भाज्या आहेत. काही राग सहज गुणगुणले जातात तशाच काही भाज्याही सहज आपोआप आणल्या जातात!

भाजी आणायला बाजारात जाणे हा एक मनप्रसन्न कार्यक्रम असतो.भाजी बाजार म्हणजे आकाशातील इंद्रधनुष्याच्या मंडपात भरलेली मयसभाच!

पालेभाज्यांचे वेगवेगळ्या छटांतील हिरवे रंग, फळ भाज्यांचे निळे जांभळे पिवळसर दुधी,हिरवे, तांबडे रंग पाहून कोणती घेऊ, किती घेऊ असे व्हायचे.नावे तरी किती घ्यायची. कागद आणि शाई पुरणार नाही इतके पालेभाज्यांचे आणि फळ भाजांचे प्रकार!

आळू-चुका ह्यांचा द्वंद्व समास, चुका-चाकवत, चंदनबटवा ही त्रिमूर्ती ! अंबाडी,करडई किंवा करडी ह्या त्यांच्या नावावरूनच करारी वाटणाऱ्या भाज्या; इतर भाज्यांवर ढाळणाऱ्या हिरव्या चवऱ्या वाटाव्या अशा शेपूच्या पेंड्या, तांदुळसा, राजगिरा,चवळी अशा राजस भाज्या तर मानाची आणि लाडाची मेथी ! तिचे किती कौतुक आजही होते! उखाण्यातून ती संस्कृतीचाही भाग झाली! मेथी आणि पोकळा ह्या विशेष मानाच्या दर्जेदार भाज्या तर असतच, जोडीला मायाळू (ही भाजीपेक्षा भज्यांसाठी जास्त मायाळू होती), आपले वेगळे वैशिष्ठ्य सांभाळत येणारी हादग्याची फुले, थंडीत हरभऱ्याचा हिरवा पाला. (तो वाळवून पुढे केव्हाही त्याची वेळ भागवणारी तातडीची भाजी व्हायची.) ;स्थानिक गावरान पालेभाज्यात नुकताच प्रवेश केल्यामुळे कौतुकाची पण स्वत:ची चव नसलेली पालकाची भाजी. अवचित कुठे तरी शेवग्याची कोवळी पाने व फुलेही भाजी म्हणून दिसायची. ह्यांची भाजी घरोघरी सर्रास होत नसे. तरी बाजाराची शोभा वाढवत. काहींची आवडही पुरवत असतील.

फळभाज्यातील पहिल्या क्रमांकाची , Forever वांगी; भाजीची, भरीताची, काटेरी जांभळी, काटेरी हिरवट, पांढरट, लहान अंडाकृती गोल, तर नुसती पाणथळ लांब जांभळी, भरिताचीही निळी जांभळी,मोठी गोल किंवा लंबगोल, खानदेशी किंचित लांबट पण जाड.हिरवट पांढरसर.आणखीही काही प्रकार असतील. आपला दुधी भोपळा; कोणतीही भूमिका ह्याला द्या, उत्तमच करेल. भाजी, रायते, दुधी हलवा करा वा वड्या करा, चौफेर चविष्ट,व सौम्य आणि सात्विक; पण जहाल पक्षाचे ह्याला नेमस्त, नेभळट म्हणून हिणवतात; घोसाळी,म्हणजे खानदेशातील गिलकी, भाजी करा,भजी करा किंवा वाफून रायते करा, भाज्यांतील नागराज पडवळ, त्याचीही भाजी करा, गोल चकत्या कापून कढीला कर्णफुले घालून तिची मजा वाढवा. अथवा महालक्ष्मीला कोशिंबिरींच्या संख्येचा कोरम पूर्ण करण्यासाठी वाफून कोशिंबीर करा. तांबडा भोपळा. हाही बहुगुणी आहे.भाजी करा, रायते करा, पुऱ्या करा किंवा शास्त्रोक्त घागरे करा. शिवाय दोन दिवस ठेवला तरी ऐन वेळी कामास येणारा हा भोपळा आहे. बरे आकारानेही मोठा. त्यामुळे म्हातारीही त्याच्यात बसून लेकीकडे जाऊन लठ्ठगुठ्ठ झाली तरी परतीच्या प्रवासात त्यात मावायची! भाजीसाठीच नव्हे तर हा काशी भोपळा पेपर तपासताना, मास्तरांच्या खूप उपयोगी येतो.

भोपळ्यांतही नेहमीच्या दुधी भोपळा,काशी भोपळ्यांबरोबरच आज फारसे माहित नसणारे चक्री ,डांगर, देवडांगर हेसुद्धा असत. ही भोपळे मंडळी दीर्घायुषी! टिकाऊ म्हणून प्रसिद्ध होती. पण फारशी घेतली जात नसत. हे दीर्घायुषी असल्यामुळे ह्यांचे रंग बदलत जातात. फिकट पिस्त्यापासून फिकट गुलाबी रंगाच्या छटा ते घेतात.ह्यांची पीठ पेरून किंवा भरपूर तेल घालून व डाळ घालून केलेली भाजी बरी लागे. पण नेहमीसारखी केलेली भाजी श्राद्ध-पक्षाला द्रोण रोवून ठेवण्यासाठीच वापरत!

भोपळ्यांवरून त्यांच्याच नात्यातील एक सामान्य नातेवाईक आठवला. त्याचे नाव किती ओबड धोबड ! ढेमसे किंवा ढेमसं! ढेमसं लहान असताना ती इतकी ‘लहान सुंदर गोजिरवाणी’ दिसतात. सुरेख हिरवा रंग. अदृश्य वाटावी अशी लव असलेली ती ढेमसे कुणीही पोतंभर घेईल! पण थोडी मोठी होऊ लागली की ती निबर दिसू लागत. पण मराठावाड्यातील रखरखीत उन्हाळ्यात पाण्याबरोबरच भाज्यांची आवकही आटली की ही ढेमसंच आपल्या मदतीला धावून येत! चव दुधी भोपळ्यासारखीच. दर्शनही look ही दुध्या सारखेच. पण आकाराने,लहान चेंडूसारखा बसका गट्टम गोल! “ ढेमसं घ्या ना”असे कुणी म्हणाले तर लोक पुढे जायचे. घ्या ना! म्हणणारी भाजीवाली असली तरी! आणि शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे?! त्याला ढेमसं घ्यावी लागत नव्हती म्हणून ही असली वचने सुचली. पण औरंगाबादच्या भाजीवाल्यांनी मात्र ढेमशांचं , कसलीही चळवळ नसतानाही, इतके सुंदर नामांतर केले की लोक ती ढेमसंच आहेत हे विसरून त्यावर उड्या पडू लागल्या! तिथे त्याला ‘दिलपसंद’ म्हणतात! का नाही होणार आपले ‘दिल’ खुष! शेक्सपिअरला म्हणावे बघ एका नावाने आमच्या ढेमशाला श्रीमंती आणि हृदयांत स्थान मिळाले!

त्यानंतर तोंडली. ही कोवळी,ताजी असतांना गोल चकत्या करून करा किंवा सुरेख लांबट, ओठाच्या आकाराची पातळ कापे करून भाजी करा. तेलासाठी फार सढळ हाताची आवश्यकता नाही. ‘हेल्दी’पेक्षा तेल थोडे जास्त टाकले तर तोंडल्यांनाही आनंद होतो. त्यामुळे त्या लुसलुशीत ओठांची माधुरी आपल्यालाही चाखता येते!

सुरवातीला बटाटे नवीन होते तोपर्यंत फार भाव खाऊन होते. पण त्यांच्यापेक्षाही रईस, श्रीमंत काॅली फ्लाॅवर, श्रीमान कोबी आले व गाड्या बरोबर नळ्याची यात्रा न्यायाने फक्त नावाचे आकर्षक नवलकोलही शिरले; तेव्हा मात्र बटाट्यांच्या चेहऱ्याचे भाव बदलले. नवलकोलची नवलाई त्याच्या नावात होती. चवीला पपईपेक्षा काही वेगळी नव्हती. नारळाच्या वाट्यांसारखी कापून, खोवून करीत किंवा कच्च्या पपईसारखी खिसूनही करीत.

थंडीत फ्लाॅवर, कोबीबरोबरच, शेंगावर्गीय असूनही फ्लाॅवर कोबींच्या पंक्तीत मानाने बसले ते मटार ! पुढे जसे ह्यांचे पीक वाढले तसे त्यांनी भाजी म्हणून स्थान मिळवलेच पण पुलाव किंवा मसाले भात त्यांच्याशिवाय शिजेना. मग पोहे उपमा तरी कसे मागे राहतील! प्रत्येकाला आपल्या बरोबर थोड्या का होईना मटारांचा हिरवा सहवास हवासा वाटू लागला. म्हणूनच फ्लाॅवर,कोबी,बटाटे ह्यांची भाजी मटाराशिवाय सुनी सुनी वाटू लागली. आपले पोहे त्यामानाने मटारची इतकी फिकीर करत नसत. त्यांचा जानी दोस्त कांदा त्यांच्याबरोबर सदैव असतो त्यामुळे पोह्यांना मटाराची मातब्बरी वाटत नाही. पण हिरव्या गोड मटारांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांची बेताचा मसाला व तेल घालून थोडा रस ठेवलेली भाजी म्हणा किंवा उसळ म्हणा तिला तोड नाही.तिचे तोंड भरून कौतुक करण्यासाठी मटारला आपले कोडकौतुक पुऱ्यांकडूनच व्हावे अशी इच्छा असते ! थोरा मोठ्यांच्या सहवासात असावे असे सर्वांना वाटते; यामुळेच जो तो मटारांशी निकटचे संबंध ठेवायला धडपडतो. त्यासाठी बटाटे स्वत:ला उकडून घ्यायला तयार होतात तर टोमॅटो स्वत:ला चिरून किंवा प्रसंगी चेचून घेऊन हुतात्मे होण्यासही मागे पुढे पाहात नाहीत.

भेंडीला तिच्या आकारावरून फळभाजीत घ्यावी की शेंगेच्या प्रकारात टाकावी असा प्रश्न पडला होता. चुकीचाही असेल. पण तिला अखेर फळभाजीत स्थान दिले. भेंड्यांविषयी दोन जबरदस्त तुल्यबल पक्ष आहेत.भेंडीच्या बाजूचे तिला सात्विकतेची मूर्ती मानतात. सौम्यपणात तिला प्रतिस्पर्धी नाही म्हणतात. आजाऱ्यालाही चालणारी भाजी म्हणून गौरव करतात. ती नुसती भाजून,मीठ लावून खाऊन तर पाहा असे आव्हानही देतात. तर तेच मुद्दे विरुद्ध बाजूचे तिच्यावर उलटवतात. अहो तिच्याहून सात्विक तर आमचा दुधी भोपळाही आहे. आरोग्यास पोषक गुणधर्म तर त्या नावातच आहे. त्याला उगीच दुधी म्हणत नाहीत! आणि काय हो त्या भेंडीला स्वत:ची यत्किंचितही चव तरी आहे का? मसाला घालून भरली भेंडी करावी लागते! पेंढा भरलेल्या प्राण्यांप्रमाणे. बरे झाले तो Taxidermist करत नाही भरली मसाला भेंडी. म्हणूनच ती जास्त करून घरांपेक्षा हाॅटेलातच केली जात असावी. बरे कुठल्याही प्रकारे तिची भाजी करायची म्हणजे तिचे फार सोपस्कार करावे लागतात! मग ती परतून करा किंवा कधी तिला चिंच गुळाचे वाण देऊन लाडाकोडाने तिची भाजी करा. त्यातही ती स्वच्छतेची अति भोक्ती. सर्जननेच तिच्या भाजीचे ‘ॲापरेशन’ करावे ! तिला दहा वेळा धुवुन पुसून कोरडी ठक्क करूनच मग करायची ती भाजी! बायकांसारखाच भेंडीलाही नट्टापट्टा करायला वेळ लागतो. म्हणूनच तिला लेडीज् फिंगर म्हणत असावेत! नाहीतर चिकटपट्टीपेक्षा चिकट होते ती! तरीही लहान मुलांचीच काय मोठ्यांनाही तिची तेलावर परतून केलेली भाजी आवडते.

षटकोनी गोल चकत्यातील मोत्यांसारख्या दाण्यांनी तर ती ताटातील अलंकारच वाटते!
दोडक्यांना विसरलो तर ‘दुसरे लाडके झाले, दोडक्याला कोण विचारतो’असे पूर्वी बुटबैगण व धारदार कड्यांचे असलेले; पण आता एकदम लंबूटांग आणि त्यांच्या हातापायाच्या शिरांतील धार गेलेले,दोडकेमहाराज तक्रार करतील. ह्याच्या शिरा काढून त्या किंचित भाजून तीळ, वाळलेले खोबरे घालून तेलात परतलेली चटणीही खमंग लागते.त्यामुळे ‘ एका तिकीटात दोन खेळासारखे’ दोडक्यांची चटणी आणि भाजी एकाच वेळी करता येते !

आमच्याकडे बेलवांगी म्हणतात त्याचीही भाजी करतात. पण बेलवांग्याची चटणी चविष्ट असते. ती वाफून त्यात कधी भाजलेले कारळ तर कधी भाजलेल्या तीळाचा कूट किंवा दाण्यांचा कूट घालून केलेल्या चटण्यांना मागणी असते.शिवाय आमसुल चिंचेऐवजी कशातही बेलवांग्याच्या दोन चार फोडी खपून जातात. पण खरी गंमत शेंगाचा कूट घालून केलेल्या करकरीत बेलवांग्याच्या कोशिंबिरीत आहे. आणि जेव्हा कांदे रजेवर असतात तेव्हा बारीक चिरलेली बेलवांगी पोह्यांना वेगळीच मजा आणतात! हो सांगायचे राहिलेच की! बेलवांगी म्हणजे हल्ली ज्याला कच्चे किंवा हिरवे टोमॅटो म्हणतात तेच.

पाले भाज्यांविषयी कितीही लिहिले तरी अपुरेच होईल. त्यांचे विविध प्रकार आणि त्या किती वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात हे लक्षात आल्यावर आपण स्वत:शीच थक्क होतो. त्यामुळे एकच पालेभाजी सलग तीन चार दिवस केली तरीही कंटाळा येणार नाही. किंवा लक्षातही येत नसेल कालचीच आहे म्हणून ! साधा हिरव्या पातीचा लहान कांदा किंवा कोवळ्या ताज्या पानांसकट मुळे घेतले तरी त्यांच्या पानांची किंवा ती पाने घालून केलेल्या भाज्यांच्या प्रकारांचे उदाहरण पुरेसे आहे.त्या शिवाय निरनिराळी सरमिसळ करून केलेल्या पालेभाज्या वेगळ्याच! त्यासाठी चवळी,मूग,मटकी,मुगाच्या डाळीही त्यांच्या सहाय्याला धावून येतात.

फळभाज्यांचीही हीच गंमत आहे.पाले भाज्या, फळभाज्या ह्यांची मोजदाद व त्यांचे प्रकार आणि त्यांचा वापर करून केलेले पदार्थ ह्याविषयी लिहायला कोणत्याही भाषेत पुरेसे शब्द असतील असे वाटत नाही. पालेभाज्यांची पाने मोजण्या इतकेच ते अशक्य आहे ! पण त्यांच्यापासून मिळणारा आनंदही तितकाच अमर्याद आहे. म्हणून ज्यांनी एकदा तरी भाजी बाजारात जाऊन निवांतपणे फिरत भाजी आणली नसेल तर कविवर्य बा.भ. बोरकरही अशांना “जीवन त्यांना नाही कळले हो” असेच म्हणतील! बालकवींनीही बाजारात जाऊन भाजी आणली नसावी. नाही तर त्यांनीही ‘मंडईमाजीं हर्ष मानसी भाजी बहरली चोहीकडे’अशीही एक कविता केली असती!

कागद,शाई आणि वेळ पुरणार नाही इतक्या लिहिण्यासारख्या कैक भाजा अजून कितीक आहेत. म्हणून अखेर थांबायचे.

सृष्टीची विविधता पाहायची असेल तर बाजारात रमत गमत भाज्या पाहात फिरत राहावे.मन आणि डोळ्यांसाठी हा खरा नव नवलोत्सव आहे. ज्याने बाजारात जाऊन, आरामात, घाई न करता फिरत फिरत भाजी आणली नाही तो जगाची प्रदक्षिणा करून आला तरी ती व्यर्थच गेली असे खुशाल समजावे !

भाज्यांमधील अनवट राग!

भाजीऽ!भाजी घ्याऽऽ! आली लई ताजी ताजी.” “ हिरवीग्गार! ताजी फ्फाऽर! कितीत्त्ताजी !” “ सस्ती झाली हो! लई सस्ती लावली वांगी! मेथी घ्या! चुका घ्या!चाकवत घ्घ्या करडीची भाजी घ्घ्याऽऽ ! अशा निरनिराळ्या शब्दांत गुंफलेल्या आरोळ्यांच्या निरनिराळ्या आवाजांनी सकाळ सुरु व्हायची. भाज्यांच्या हातगाड्या, टोपल्या,मोठ्या पाट्या भरभरून भाज्यांची वर्दळ सुरु व्हायची. पाले भाज्या खूप तजेलदार दिसत. वांगी,टमाटे, दुधी भोपळेही चमकत असत! हे दारावर येणाऱ्या भाज्यांचे झाले. भाजी बाजारात(मार्केट) मध्ये गेलो तर मग पहायलाच नको. निरनिराळ्या रंगांच्या भाज्यांची रंगपंचमीच असे. आणि त्यात रविवार असावा. तोही दसरा दिवाळीच्या थंडीतला.मग काय! तिथे असंख्य भाज्यांचे डोंगर रचले जात. सगळे ओटे, फरशा , खाली जमीनीवर भाज्या लिंबं, भाज्या हिरव्या मिरच्या काय काय आणि किती नाना तऱ्हेच्या रंगांच्या भाज्या ओसंडत असत.

त्या मोसमांत आणि एरव्ही सुद्धा भाजी बाजारात जाणे हा सहलीला जाण्याइतकाच मोठा आनंद होता. हा भाजीपाल्याचा तजेलदार रंगीत बाजार पाहून एकच पिशवी आणल्याचा पश्चात्ताप होई.

भाजीतील नेहमीचे यशस्वी कलाकार मेथी, आळु चुका , राजगिरा, करडी/ करडई, शेपू, तांदुळसा, अंबाडी, असतच. पालकाची एन्ट्री अजून व्हायची होती. चुका, चाकवत आणि चंदनबटवा ही च च्या ‘च’मत्काराची त्रिमूर्तीही विराजमान झालेली असे.

संगीतात जसे काही नेहमी न गायले जाणारे अनवट राग असतात तशाही भाज्या असायच्या.
त्यामधील पालेभाज्यातील दोन ठळक नावे म्हणजे माठ आणि घोळ! ही नावेही ज्यांनी ठेवली असतील ते खरेच मिष्किल बेरकी असले पाहिजेत! वाक्प्रचारातला ‘ घोळात घोळ’ ह्या भाजीवरून आला की भाजीचे रूप पसाऱ्यावरून भाजीला हे नाव दिले! ह्या दोन्ही भाज्या एका अर्थाने खऱ्या अपौरुषेय, स्वयंभू म्हणाव्या लागतील. घराच्या अंगणात काही पेरावे लागत नाही की वाफे आळे अशी विशेष सरबराई सुद्धा ह्यांना लागत नाही. आपोआप उगवतात,त्यांची ती वाढतात,पसरतात! माठ व तांदुळसा एकाच जाति प्रकारातला. पण माठाची पाने लहान असतात. घोळाची पाने लहान,गोलसर जाड आणि गुलाबी देठांची. गवतासारखी पसरलेली.

आणखी दोन अनवट भाज्या म्हणजे मायाळू व शुक्रवारच्या कहाणीमुळे प्रसिद्ध झालेली कनीकुरडु किंवा कनी कुरडईची. मायाळूचे वेल असतात. दोन प्रकारचे. एक नेहमीसारखा हिरव्या वेलीचा तर दुसरा गुलाबी देठांचा. पानांची पाठही फिकट, कळत न कळत अशा गुलाबी रंगाची. भाजीही करत असतील पण भज्यांसाठी प्रसिद्ध होती. तशीच कनी कुरडुचीही. आणखी असाच एक भाजीपाला होता. तो म्हणजे पाथरीचा! खरा गावरान! भाजी करतही असतील पण जास्त करून तो थेट मीठ लावून शेंगदाण्यासह खायचा. त्यामुळे भाकरीचा घास आणखीनच चविष्ट लागायचा.

आणखी दोन भाज्यांचा उल्लेख केल्याशिवाय ह्या अनवट रागांतील भाज्यांची मालिका पूर्ण होणार नाही. पठाडीच्या शेंगा आणि चौधारी ! पठाडीच्या शेंगा ह्या साधारणत: आठ-दहा इंच लांब,हिरव्या आणि मऊ असतात. चौधारी ही भाजी की सॅलाडचा प्रकार माहित नाही. कधी खाल्ली नाही. पण आकारामुळे लक्षात राहिलेली आहे. ह्याचीही सहा ते आठ इंच लांबीचे चौकोनी तुकडे/कांड असत. चारी कडांना, फिरत्या दरवाजाला असतात तसे पांढरट हिरवे, उभे काचेचे पाखे किंवा पडदे म्हणा असत. पडदे म्हटल्यावर लगेच फार काही मोठे डोळ्यासमोर आणू नका. कल्पना यावी म्हणून तसे म्हटले. अगदी अरुंद. त्यांच्या कडा अगदी फिकट कोवळ्या हिरव्या असत. त्या पालवीसारख्या वाटत. चौधारी नाव अतिशय समर्पक वाटते. पण म्हणताना मात्र आम्ही ‘चौधरीच्या’ म्हणत असू!
कडवंच्यांच्या विषयी सांगितले नाही तर काहीच सांगितले नाही !

कडवंच्या नावही वेगळे रुपही आगळे! बहुतेक सर्व भाज्याप्रमाणे ह्यासुद्धा हिरव्या रंगाच्याच. लहान; बोटाच्या एका पेराएव्हढ्या. दुधी भोपळ्याला आपण लिलिपुटच्या राजधानीत आल्यासारखे वाटेल. आकार मध्ये फुगीर व दोन्ही टोकांना निमुळता होत गेलेला. दोन लहान शंकू एकमेकाना चिकटवल्यावर जसा निमुळत्या होत जाणाऱ्या इटुकल्या मृदुंगासारखा. पृष्ठभागही रेघांचा. आत मध्ये थोड्या अगदी लहान बिया असतील नसतील इतपत. पण त्यामुळे चावताना कडवंच्या किंचित कुरकुरीत लागायच्या. तेलाच्या फोडणीत परतून तिखट मीठ आणि तळलेले किंवा भाजलेले ऱ्शेंगदाणे घालायचे. भाकरी बरोबर खायला एकदम झकास. थोडीशी कडसर चव असलेल्या ह्या कडवंच्या आपल्या वेगळेपणाने ही भाजी की चटणी असे वाटायची.तरी स्पेशल तोंडी लावणे म्हणून जेवताना मधून मधून खाण्यात गंमत यायची.

रानमेव्यातल्या बोरं पेरू आवळा ह्यातील चिंचा कुठेही सहज मिळणाऱ्या! चिंचा होण्याआधी त्याच्या कळ्या व लहान लहान फुलांचे गुच्छ आल्यावर, त्यांच्या गुलाबी पांढऱ्या बहराने झाड सुंदर दिसायचे. ती कळ्या फुले म्हणजे चिगुर. त्यांच्या बरोबरीने चिंचेची कोवळ्यांपेक्षाही कोवळी पालवी तर खायला किती मजा येते ते सांगता येत नाही. कोवळा चिगुर पालवी खाणे हा सुट्टीतला खरा उद्योग असे. रस्त्याच्या कडेला दिसला आणि हाताशी असला तर सोपेच. नसला तर फांद्या खाली ओढून तो ओरबडून मूठी भरून घ्यायचा. नुसता खाल्ला तरी झकास आणि किंचित मीठ व चवीला गुळ घालून खाल्ला तर खातच राहावा असा चिगुर असे. तर ह्या चिगुराचीही बाजारात आवक होत असे. (काही ठिकाणी चिघोळ,चिगोळही म्हणूनही ओळखत असतील) ह्या चिगुराची, तो व तीळ भाजून केलेली चटणीही खमंग लागते. आणि ती त्या मोसमात अनेक घरात होत असे.

समाजातील विषमता वेगवेगळ्या प्रकारे असते. पण ठळकपणे उच्च, मध्यम व,कनिष्ठ वर्ग ह्यातून दिसतेच. भाज्यांतही हे वर्ग आहेत. कारण आमच्या ह्या माठ,घोळ, पाथरीची पाने, तांदुळसा, आणि चिगुर ह्यांना बाजारात मोक्याच्या जागी प्रतिष्ठित भाज्यांच्या बरोबरीने जागा मिळत नसे. बाजारातील रुळलेल्या मळवाटा सोडून वाकडी वाट करून गेलो तर एखाद्या कोपऱ्यात,जमिनीवर हे विक्रेते साधी पोती, कापड पसरून त्यावर घोळाचे,पाथरीच्या पानांचे,कडवंच्या आणि चिगुराचे लहान लहान ढिगारे ठेवून बसलेले दिसत. विकणारेही ह्या भाज्यांसारखेच साधे व गरीब वाटत. आमच्यासारखे सामान्य माहितगार तिकडे वळले की त्यांचे चेहरे खुलत. ते सावरून बसत. तांदुळसा किंवा माठाची पेंडी, कडवंच्याचे, चिगुराचे एक दोन ढिगारे घेतले की ती गावाकडची मंडळी खूष होत. मग वर एक चिमुटभर चिगुर व चार कडवंच्या आपणहून पिशवीत टाकत! पठाडीच्या शेंगाही ह्यांच्या पथारीवर दिसत. पण क्वचित. पठाडीला ती नेहमी मिळणारी नसल्यामुळे जेव्हा येत तेव्हा त्यांना ओट्यांवर स्थान मिळे. तीच गोष्ट सुंदर हादग्याच्या फुलांची.

आणखी एका भाजीची ओळख करून द्यायची राहिली. ती शेंगाच्या प्रकारातली आहे. ती आजही मिळते पण आमच्याकडे पूर्वी तिचे स्वरूप निराळे व नावही निराळे होते. आज मुळ्याच्या शेंगा ह्या नावाने मिळणाऱ्या लांब शेंगा पूर्वी डिंगऱ्या ह्या नावाने ओळखल्या जात. त्यावेळी त्या अशा लांब नव्हत्या.दीड दोन पेराएव्हढ्याच पण फुगीर. भाजीत रस (पाणी) ठेवायचा. जेवायला बसेपर्यंत त्यांतील हे खमंग रसपाणी थोडेसे ह्या डिंगऱ्याच पिऊन टाकीत. भाजी खाताना रसपाण्याने जास्त टपोऱ्या झालेल्या ह्या डिंगऱ्या खाताना त्यांतील रसाची एखादे वेळी लहानशी चिळकांडी तोंडात उडाली की कृतकृत्य झाल्यासारखे वाटे. आमच्या बहिणीने ह्या डिंगऱ्यांचे रसमधुर बारसे केले होते. ती त्यांना तिखट मिठाच्या जिलब्या म्हणायची!

आज ह्या भाज्या आमच्या गावात मिळतात की नाही माहित नाही. मिळत असतील तर लोक अजूनही भाग्यवान आहेत म्हणायचे. लहान गावात मिळतही असतील. पण शहरातील मंडईत दिसत नाहीत.

मंडईत गेलात आणि ह्या अनवट भाज्यांपैकी काही मिळाल्या तर नमुन्याला का होईना जरूर घ्या. तोंडाला चव येईल !

भेटलेले साधे महाराज

माझी औरंगाबादला बढतीवर बदली झाली. तेव्हा जळगावचे माझे मित्र डाॅ. खटावकर ह्यांनी औरंगाबादच्या जयशंकर महाराजांना एकदा भेटा असे सांगितले होते. कामाच्या गडबडीत व पत्ता नेमका माहित नसल्यामुळे मी काही जयशंकरमहाराजांना भेटू शकलो नव्हतो. कामानिमित्त जळगावला गेलो. डाॅ. खटावकरांशी कामाचे बोलणे झाल्यावर मी निघालो. निघताना मीच म्हणालो, “ डाॅ., जयशंकर महाराजांना कुठे भेटायचे? पत्ता माहित नाही. ते म्हणाले,” औरंगपुऱ्यात आहेत. कुणाचा वाडा ते नेमके माहित नाही.” मी शोधून काढतो,इतके म्हणून दौरा संपवून औरंगाबादला आलो. आल्यावर नुकतेच ओळख झालेले व पुढे चांगले घरोब्याचे मित्र झालेले अनंतराव देशपांड्यांना जयशंकर महाराजांचा पत्ता विचारला. त्यांनी अंदाजाने सांगितला.

मी गेलो. ते राहात होते त्या वाड्यात गेलो. जुना वाडा. मोडकळीला आला नव्हता तरी तसा वाटत होता. आत गेल्यावर बाजूच्या ओवरीत छपरापर्यंत सरपणाची लाकडे भरून ठेवलेली. आजूबाजूलाही काही पडलेली. त्यातच एका कोपऱ्यात, बाजेवर थोडीशी वाढलेल्या पांढऱ्या दाढीचे म्हातारे गृहस्थ झोपलेले होते. तोंडात दातही फारसे नविहते. पण चेहरा हसरा होता.त्या काळात सर्रास वापरात असलेली चट्यापट्याची नाडीची अर्धी चड्डी घालून झोपलेले म्हातारे गृहस्थ दिसले. मी आत गेल्याबरोबर ते हसऱ्या चेहऱ्याने “जयशंकर”म्हणून गप्प झाले.

थोड्या वेळाने आतल्या बाजूने श्री.दातार व सौ.दातार आल्या. त्यांनी माझी चौकशी केली. दातार राज्य सरकारी नोकरीत साध्या पदावर असावेत. दोघे पतिपत्नी शांत,सौम्य पण समाधानी दिसत होते. हे जयशंकरमहाराजांची काळजी घेत होते. मी वारंवार नाही तरी काही वेळा जयशंकरमहाराजांना भेटून येत असे. ते माझी कसे काय चाललंय, मुलांची चौकशी करायचे. पण जयशंकर म्हणण्यात ते रमत असावेत असे वाटले. मध्येच ते मोठ्याने जयशंकर म्हणत. काही वर्षानंतर दातारांनी जागा बदलली व सरस्वती काॅलनीत राहायला आले. ही जागा जास्त प्रशस्त,मोकळी व व्यवस्थित होती. मी जयशंकरमहाराजांना भेटायला जाई तेव्हा दोघेही दातार सौम्य हसत स्वागत करीत. महाराजांपेक्षा अर्थात त्यांच्याशीच जास्त बोलणे होई. एकदोन वेळा मी सुधीरला घेऊन गेलो होतो. सुधीरला पाहून जयशंकरमहाराजांना आनंद झाल्याचे दिसत होते. त्याला ते जवळ बसवून पाठीवर किंवा डोक्यावर हात फिरवत.

अनंतराव देशपांडेसाहेबांनी मला जयशंकर महाराजांविषयी माहिती सांगितली ती ऐकण्यासारखी आहे. ती ऐकल्यावर जयशंकर महाराज महाराज का हे पटू लागले. ते सांगत होते,” मेवाड हाॅटेलचा मालक जयशंकरमहाराजांना रोज सकाळी हाॅटेलात घेऊन जात असे. आजही जात असतील कदाचित. तिथे त्यांना गल्ल्यावर बसवित. जेव्हढा वेळ ते हाटेलात गल्ल्यावर असत तोपर्यंत ते येणाऱ्या प्रत्येक भिकाऱ्याला गल्यातून पैसे देत. ते कुणाला किती देत तिकडे मेवाडचे मालक पाहात नसत. मग महाराज म्हणाले निघायचे की मालक त्यांना घरी आणून सोडत असे. हे किती तरी वर्षे चालू होते. आजही असेल कदाचित. रोज नसेल पण केव्हा तरी तो महाराजांना घेऊन येत असेलही.” मेवाड हाॅटेलच्या बरकती मागे जयशंकर महाराजांच्या कृपेचाही मोठा भाग असणार.

ही १९७२-७५ व त्यानंतरच्या काही वर्षातील हकीकत आहे. जयशंकरमहाराजांची सर्व प्रकारे काळजी दातार दांपत्याने मनापासून घेतली. जयशंकरमहाराजांनी मेवाडच्या हाॅटेल मालकाच्या श्रद्धेला किती सफळ सुफळ केले असेल त्याची इतर काही माहिती नाही. पण त्यांचे आणखी एक हाॅटेल सुरू झाले. गुलमंडीवरचे रेस्टाॅरंट जोरात चालतच होते. हे मात्र पाहिले आहे.

माझ्या बाबतीत काहीही चमत्कार घडला नाही. पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटत असे तेव्हा एकदाही माझ्या मनांत त्यांनी मला हे मिळवून द्यावे, असे घडावे असला विचार कधीही येत नसे.बहुधा,मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला ते महाराज वगैरे काही वाटले नव्हते. ह्यामुळेही कदाचित मला त्यांच्याकडे काही मागावे असे वाटले नसेल! पण मला बरे, शांत वाटत असे हे खरे. मी फक्त त्यांना भेटल्यावर व निघतांना नमस्कार करीत असे. ते फक्त नेहमी हात वर केल्यासारखा करून हसतमुखाने जयशंकर म्हणत.

अनंतराव देशपांडे ह्यांनी अशीच हकीकत बाळकृष्ण महाराजांसंबंधी सांगितली होती. औरंगाबादच्या अप्पा हलवाईंचा प्रसिद्ध पेढा हा बाळकृष्णमहाराजांचा कृपाप्रसाद आहे असे देशपांडेसाहेब म्हणाले होते. बाळकृष्णमहाराजांची समाधी अप्सरा टाॅकीजसमोरच्या भागात आहे. तीही मी जाऊन पाहिली.

हे लिहित असता एक लक्षात आले आणि ते आल्यावर माझ्या हातून केव्हढी मोठी चूक झाली, केव्हढा अपराध घडला ह्याची जाणीव झाली. शंभर थोबाडीत मारून घ्याव्यात असे वाटले. सुरवातीला तरी मी बरेच वेळा दातार साहेबांच्या घरी जयशंकर महाराजांच्या दर्शनासाठी गेलो असेन. पण मी त्या दोघांना एकदाही ,” आमच्या घरी चहाला या.” असे म्हणालो नाही! आता मी माझे मलाच ‘करंट्या’ शिवाय काय म्हणणार!

त्या दोघांनी कित्येक वर्षे जयशंकरमहाराजांची सेवा करण्यात व्यतीत केली असल्यामुळे दातार मला उदार मनाने क्षमा करतील अशी प्रार्थना करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही. जयशंकर!