Monthly Archives: November 2013

तत्वज्ञान जगणारा नाटककार

माझ्या थोरल्या भावाने संशय कल्लोळ नाटकात फाल्गुनरावाचे आणि चुलत भावाने भादव्याचे काम केले होते. दोघांनीही आपल्या भूमिका उत्कृष्ठ वठवल्या होत्या. कवडी चुंबक नाटकाचा एक प्रयोग एकदम आगळ्या वेगळ्या कलावंतांनी केला होता . कवडी चुंबकाच्या त्या प्रयोगात प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकारांनी भूमिका केल्या होत्या. त्यात आचार्य अत्रे ह्यांनी मुख्य भूमिका केली होती! खुद्द कवडी चुंबक चिक्कू शेठजीचे पात्र अत्र्यांनी रंगवले होते. प्रयोग अर्थातच खूप गाजला.

मोलीयेविषयी वाचत असताना हे दोन्ही प्रयोग डोळ्यांसमोर आले .

“हस्तलिखिते जळून नष्ट होत नसतात ” असे मिखाइल बुल्गाकोव्ह ने त्याचे ‘द मास्टर and मार्गारिटा” ह्या पुस्तकात म्हटले आहे. पण तो ज्याचा चाहता होता, ज्याचे त्याने “The Life of Monsieur de Moliere” हे चरित्र लिहिले त्या मोलीयेची अनेक पत्रे, काही अप्रसिद्ध लिखाण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले !इतकेच नव्हे मोलीयेचे अतिशय उत्कृष्ट गणले गेलेले अखेरचे पुस्तक L’Homme du Courही जळून भस्मसात झाले.

मोलिये हा फ्रेंच नाटककार, लेखक होता . तो इ.स. १६२२ साली जन्मला. आणि वयाच्या ५१ व्या वर्षी इ.स. १६७३ साली मरण पावला . त्याचे खरे नाव Jean-Baptiste Poquelin पण तो मोलिये या त्याच्या साहित्यिक नावानेच अजरामर आहे. जसे मार्क ट्वेन ओ हेन्री हे त्यांच्या टोपण नावानेच ओळखले जातात!

मोलिये हा अत्यंत यशस्वी नाटककार होता. त्याची नाटके सामाजिक दंभावर व्यक्तींच्या विक्षिप्तपणावर, लोभ-लालसा यावर हसत खेळत विनोदात टीका करणारी आहेत. विनोदी संवाद आणि उपरोधातून त्यातील विसंगती, हलकेच खेळकर शैलीत उलगडून दाखवणारी असल्यामुळे त्याची नाटके लोकप्रिय झाली. त्यातील प्रासंगिक नाट्यमय घटना आणि त्यातून निर्माण झालेले विनोदी प्रसंग यांनी ती नटलेली असत.

अनेकांप्रमाणे मोलीयेलाही आपण नट व्हावेसे वाटत होते . तो रंगमंचावरही आला . पण एक अडचण होती. मोलिये तोतरा होता प्रेक्षकांनी त्याची हुर्यो केली. त्याला शहाणपण सुचले. तो आपल्या ताकदीच्या, खऱ्या प्रांताकडे वळला. मोलिये लेखक झाला. नुसता साधारण नाही तर यशस्वी , लोकप्रिय प्रसिद्ध नाटककार म्हणून गाजला.

मोलीयेने स्वतची नाटक कंपनी काढली. त्याने ती चांगली चालविली.पण काही काळात अशी परिस्थिती आली कीं त्याची नाटक कंपनी बुडाली. मोलिये रस्त्यावर आला. पण त्यातूनही तो बाहेर येऊन चिकाटीने पुन्हा उभा राहिला. यश त्याच्याकडे पुन्हा आपसुख आले. मोलीयेला समृद्धी आली. मोलीयेवर प्रेक्षकच नव्हे तर राजघराण्यातील मंडळीही खूष होती.

असा हा मोलिये मोठा नशीबवान म्हणायला हवा. एकदा त्याच्या काही विधानांनी त्याला लोकक्षोभाला तोंड द्यावे लागले. पण त्यातूनही तो आपल्या बुद्धिबळावर बाहेर आला. अनुकूल -प्रतिकूल परिस्थितीचे हेलकावे खात असतानाही त्याच्या यशाचा झोका उंचच जात होता. पण यामागे केवळ त्याच्या नशिबाचा भाग नव्हता . त्याचे स्वभाव वैशिष्ठ्य म्हणजे अडचणींना संकटांना फजितीला तोंड द्यावे लागले तेव्हा त्यावर तो आपल्या विनोद-बुद्धीच्या जोरावर मात करू शकला. अडचणी-संकटाचे त्याने हसतमुखाने आणि बुद्धीच्या जोरावर संधी मध्ये रुपांतर केले. टीकेचे घावही त्याच्यासाठी फुलांचे हार होत असत.

ह्यामागे होता तो त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन; हेच त्याच्या आनंददायी विनोद-प्रचुर लिखाणाचेही मुख्य गमक होते. माणसांच्या दुर्गुणा कडेही तो त्यांच्या चुका, गफलती असे समजून पाहत असे . गंभीर परिणाम होऊ शकणाऱ्या घटनाही हास्यकल्लोळात बुडवून त्या एकदम हलक्या फुलक्या करणाऱ्या विनोदी माणसाने-लेखकाने चिमटे काढले तरी कोणी फारसे ओरडत नाही . ओरडले तरी त्यातून ते नकळत काही तरी शिकतात, धडे घेतात .

मोलीयेच्या या स्वभावविशेषा मागे त्याच्यावर असणाऱ्या ऱोमन तत्वज्ञानी ल्युक्रेशसचा मोठा प्रभाव ! त्याकाळच्या विद्यार्थ्यांना तत्वज्ञानी ल्युक्रेशस वाचावा लागे. ल्युक्रेशसच्या मते,” देव ही संकल्पना अनावश्यक आहे. माणसाचे दोष, त्याच्या चुका घोडचुका हीच त्याला मोठी शिक्षा आहे. परिस्थिती विरुद्ध तक्रारी न करता, कुरकुरत न बसता आपण पुढे जावे. दुख: टाळावे. त्यावर अति कुढत बसू नये. आनंद आपणहून आपल्याकडे येतो ” असे त्याचे तत्वज्ञान थोडक्यात सांगता येईलस्वर्गाचे अस्तित्व न मानणाऱ्या ल्युक्रेशसच्या जीवन दृष्टीने स्वर्ग नसतानाही इथेच आनंद, सुख मिळवता येते.

मोलीयेवर ल्युक्रेशसचा मोठा प्रभाव होता यात शंका नाही. मोलिये ह्या तत्वज्ञानानुसार जगला.

मोलीयेने ल्युक्रेशसच्या लाटिन ग्रंथाचे फ्रेंचमध्ये भाषांतर केले होते . १८६१ साली ते पसिद्ध करू असे तो म्हणत होता पण ते काही प्रसिद्ध झाले नाही !ख्रि.पू. ९८ साली जन्मलेल्या ल्युक्रेशसचे On Nature of the Universe/things हे एक दीर्घ काव्य आहे. त्याने आपल्या मृत्युच्या आधी हे लिहिले तो त्याकाळी देव-धर्माविषयी अश्रद्ध,समजला जात होता. तो ख्रि.पू. ५५ साली वारला.
मोठ्या दु:खाची आणि विचित्र गोष्ट अशी की तत्वज्ञानी ल्युक्रेशसला आपल्या विचारांमुळे एखादे संकट येणार याची खात्री होती. त्यासंबंधात त्याला माहितीही झाली असावी. पण त्या येणाऱ्या संकटातून वाचण्यासाठी, त्याचे परिणाम टाळण्यासाठी, या तत्वज्ञानी ल्युक्रेशसने आत्महत्या केली !

मोलिये मात्र कुणीही आपल्या आयुष्याचा असा शेवट करण्याच्या ठाम विरोधी होता. मोलीयेचे आयुष्य हे,बऱ्याच अंशी, ल्युक्रेशसच्या तत्वज्ञानाचा वस्तुपाठच होता. तो संकटाने डगमगला नाही .दु:खात कुढत बसला नाही.

मोलीयेने लिहीलेल्या नाटकांपैकी रंगभूमीवर यशस्वी ठरलेली काही नाटके The Miser, The School for Lovers, Le Misanthrope ही होत. मराठी वाचक-प्रेक्षकांना मोलिये जवळचा वाटतो कारण त्याची दोन नाटके, मोलिये इतक्याच प्रतिभावंत अशा दोन मातब्बर मराठी नाटककारांनी मराठीत आणली. ती सुद्धा मराठी रंगभूमीवर गाजली. ह्या दोन्ही नाटकानी मराठी प्रेक्षकांना मनमुराद हसवले. गो. ब. देवल यांचे संशय कल्लोळ आणि आचार्य अत्र्यांचे कवडी चुंबक. ही नाटके पहाताना वाचताना ती रुपांतरीत आहेत असे क्षणभरही जाणवत नाही. इतकी ती स्वतंत्र मराठी नाटके वाटतात. संशय कल्लोळचे एक लहानसे वैशिष्ठ्य आहे. यातील मुख्य पुरुष पात्रांची नावे मराठी महिन्यांची आहेत.फाल्गुनराव, वैशाखशेठ आणि भादव्या. स्त्री पात्रांची नावे रेवती कृत्तिका अशा नक्षत्रांची आहेत.

देवलांनी तर त्या काळच्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन संशय कल्लोळ संगीत नाटक केले.त्यातली “कर हा करी धरिला शुभांगी” ह्या सारखी गाणी अजूनही कार्यक्रमात म्हटली जातात अत्र्यांच्या कवडी चुन्बकात नायक-नायिकेच्या नावांभोवती एक सुगंधी परिमल दरवळतो! कारण त्यांची नावे! केशर आणि कस्तुरी ! आचार्य अत्र्यांचे कवडी चुंबक आताही रंगभूमीवर आले तर आजही संपूर्ण नाट्यगृह सतत हसत राहील !