काल (८ नोव्हेंबर रोजी) शनिवारी तिबेटचे धर्मगुरु आणि प्रमुख दलाई लामा यांचे भाषण ऐकायला मिळाले.सभाग्रहात मी बऱ्याच मागच्या रांगेत होतो. त्यामुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण ते प्रत्यक्ष तिहे आहेत, त्यांच्या हालचाली, त्यांचे हसणे वगैरे दिसत होते. थोडे वाकून आणि हळू चालत होते. पण आवाज भक्कम, हसणेही मोकळे आणि तसे आवाजी.
दलाई लामांनी आपल्या भाषणात सकारात्मक विचार आपल्या मनात असावेत आणि ही सकारात्मता आपल्या आचराणातही असावी असे सांगितले. ही सकारात्मकता कशाने येते आपल्या जीवनात? तर ती आपल्या सह्रूदयतेमुळे, प्रेमामुळे येते. आजपर्यंतच्या कित्य्क हजारो वर्षांपासून, अनेक तत्वज्ञानातून संस्कृतीतून हेच सगळ्यांनी सांगितले आहे. दुसऱ्यांविषयी, सर्वांविषयी प्रेम, करुणा, आणि सहृदयता असू द्या. ह्यातूनच अहिंसा भाव निर्माण होतो. प्रेम, आपुलकी, सहृदयता करुणा म्हणजेच सकारात्मकता. क्रोध, द्वेष मत्सर हीच नकारात्मकता. ही मूल्ये, हे गूण जोपासावेत हेच सर्व तत्वज्ञानात, संस्कृतीत सांगितले आहे. ह्यात कुठे धर्माचा, कुठल्या धर्माचा अडथळा येतो? हे सदभाव अंगी बाअणले, दुसऱ्यांविषयी सतत सहृदयता, प्रेम बाळगले तर आपले आयुष्यही आनंदाचे होत. खऱ्या मानसिक शांततेच होते. आपली प्रतिकार्शक्तीही वाढते. शारिसिक आणि मानसिक दोन्हीही.
दलाई लामांने आपल्या अर्ध्या पाऊण तासाच्या भाषणात हे सांगितले. ह्यात त्यांनी नवीन असे विशेष काय सांगितले? अनेकजण हेच सांगतात. रोज. प्रवचनातून आणि भाषणातून. पुस्तकातून आणि चित्रवाणीच्या वाहिन्यांवरून. शिबिरातून आणि कार्यशाळांतून. पण दलाई लामांनी हे सांगितल्यावर, भाषण ऐकताना ते इतके खरे– सत्य, मोलाचे विचार असे सर्वांना का वाटत होते? लोकांना इतका निर्भेळ आनंद समाधान का वाटत होते?कारण सांगता येत नाही. भाषणातील मधूनच होणाऱ्या नर्म विनोदाचा शिडकावा; त्यांचे मनमोकळे हसणे; स्वत:च्याच विचाराला, विधानाला त्यांनी हसत हसत मारलेली कोपरखळी; बोलण्यातून जाणवणारा त्यांचा साधेपणा, सरळ्पणा; तिबेटी जनतेचे ध्र्म प्रमुख; तिबेटचे अनभिषिक्त राजे; बौद्ध धर्माचे विद्वान आचरणशील उपासक म्हणून? ही कारणे नसावीत. ते सांगत होते आणि हजार दोन हजार श्रोते ऐकत होते. न कंटाळता. न जांभया देता ऐकत होते. मधून मधून प्रतिसाद देत होते. मला वाटते, ते सांगत होते ते सगळ्यांना पटत होते. कारण ते जे काही सांगत होते ते त्यांच्या स्वानुभवातून आले होते.ते जे काही सांगत होते ते स्वत: आचरत होते. त्यामुळे सहृदयता, प्रेम, करुणा, आपुलकी आणि अहिंसा हे केव्ळ शब्द वाटत नव्हते. हे सर्व शब्द त्यांच्या अर्थासह दलाई लामांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रकट झाली होत्ते. स्वानुभवातून आचराणातून आलेल्या स्ब्दांना-ते नेहमीचे असले तरी-एक वेगळीच झळाळी येते, धार येते.आपल्या अंत:करणाला भिडतात. तसेच झाले काल. निदान मला तरी. प्रत्यक्ष आचरलेल्या, केलेल्या गोष्टीच खऱ्या खुऱ्या वाटतात.
थोडक्यात सांगायचे तर क्षणभरही त्यांचे भाषण “उपदेश” वाटले नाही.
चीनशी, तिबेटच्या स्वातंत्र्याविषयी; मग पुढे नमते घेऊन स्वायत्ततेविषयी; आणि आता मर्यादित स्वायत्ततेसंबंधी , आपल्या देशातून परांगदा हॊऊन, गेली अनेक वर्षे दलाई लामा अहिंसक मार्गाने म्हणजेच चर्चा, वाटाघाटी इतर राष्ट्रांच्या तोंडदेखल्या पाठिंब्याने करत होते. परवा अखेर त्यांनी जाहीरपणे सांगितले, ” मी हरलो; तिबेटला मुक करू शकलो नाही आणि इतरही काहीही हक्क तिबेटी लोकांना मिळवून देऊ शकलो नाही.” पण कुठेही चीनविषयी अगर इतर कुणाविषयीही कोणताही कटु शब्दांचा उच्चार केला नाही! अहिंसे संबंधी बोलण्याच्या ओघात त्यांनी अहिंसेचा प्रसार हिंदुस्थानने कसा जोरात करायला हवा, कारण जगात सर्वत्रा अहिंसेची मागणी वाढली आहे असे सांगितले. समोरच्या बहुसंख्य म्हाताऱ्या श्रोत्यांकडे पहात आता तरुणांनीही ह्यात पुढाकार घेऊन अहिंसेचे पालन आणि प्रसार करावा असे सांगताना त्यांनी हल्ली प्रचलित असलेले शब्द वापरून ,दृष्टांत देऊन गंमत केली. “इन्डिया शुद प्रोड्युस मोअर, मोअर अन्द मोअर अहिंसा अँड एक्स्पोर्ट इट. अहिंसा इज वेल ऍक्सेप्टेड बाय द वर्ल्ड.प्रोड्युस मोअर अहिंसा, एक्स्पोर्ट इट मोअर अंड मोअर. यंग पीपल शूड जॉईन इन धिस प्रॉडक्शन.” हे सांगत असताना उत्साहाने त्यांच्या हाताच्या जोरदार हालचाली आणि मोकळे हसणे चालू होते.
अलिकडच्या वैद्यकीय संशोधनाचा दाखला देत सहृदयता, प्रेम,अहिंसा करुणा ह्या विचारांमुळे आपले आरोग्यही चांगले राहते, शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते वगैरे सांगितले. त्यासंदर्भात त्यांनी “आपली नुकतीच गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रिया झाली. एरव्ही इतरांच्या बाबतीत हे ऑपरेशन २०-३० मिनिटात होते. पण त्यांच्या वयामुळे त्यांच्यावरची ही शस्त्रक्रिया तीन तास चालली वगैरे सांगितले. पण आठ दिवसातच मी पूर्ण बरा झालो.डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले.माझ्या रोजच्या वागण्या-चालण्यामुळे हे असे झाले.” असे ते म्हणाले.इतके सांगून झाल्यावर हळूच त्याच ओघात “ह्या गुणामुळे जर असा फायदा झाला तर मग मुळात ही व्याधी झालीच का , कशी?” अशी स्वत:लाच कोपरखळी मारून ते हसले. सकाळी १०:२० ला बाहेर पडलो होतो.पेट्रोल भरणे, रहदारीतून वाट काढणे; इतर अनेक वाहनांना मार्ग देणे असे करत चाळीस एक मिनिटांनी मी संमेलन्स्थळे पोहचलो.इतकी धडपड करत उत्साहाने जाण्याचे आणि तेही माझ्यासारख्या राग, संताप, द्वेष , क्रोध या सर्व सदगुणांनी काटोकाठ नसला तरी पूर्ण भरलेल्या माणसाने सात्विक शुद्ध साजूक तुपासारख्या[तेही गाईच्या दुधाच्या]सर्वोदय संमेलनाला जाण्याचे कारण काय? हे म्हणजे रोज दारुचा रतीब लावून पिणाऱ्या माणसाने देवळात जाऊन तीर्थ पिण्यासारखे , एम टीव्ही, व्ही टीवी वर नाचण्या-गाणाऱ्याने देवळात भजन म्हणण्यासारखेच झाले की! सुताच्या गिरण्यात चरख्यांवर ऊत काढण्यासारखेच किंवा अभिषेक बच्चनने अभिनय करण्यासारखे झाले की~ पण ह्याला कारणही तसेच घडले.
मी सर्वोदयी कार्यकर्ते श्री. विजय दिवाण यांना भेटायला गेलो होतो. आता त्यांना कशासाठी भेटायला गेलो? तर श्री.सुहास बहुळकर यांनी,” पुण्यात ६-७ नोव्हेंबरला सर्वोदय संमेलन आहे. तिथे नक्की दिवाण असतील.तुम्हाला उत्सुकता असेल तर त्यांना भेता.”असे त्यांनी मला फोनवरून सांगितले. आता हे सुहास बहुळकर कोण आणि त्यांनी तुम्हाला हे का सांगावे? असे सर्व प्रश्न तुम्हाला पडतील. पूर्वीच्या ह.ना. आपटे, नाथ माधव अगर गेला बाजार वि.वा. हडप यांच्या कादंबऱ्या वाचणाऱ्या वाचकांना असेच चक्रावून सोडणारे प्रश्न पडत. ” ह्या सूर्याजीचे काय झाले, भवानराव कमळजेला घेऊन कुठे गेले, शिलेदारने अंधारत उडी मारली तो कुठे गेला भुयारातून वगैरे प्रश्नांना हे कादंबरीकार, “आता थोडे आपण मागे जाऊन आपल्या चरित्र नायकाचे काय झाले ते पाहू(इकडे वाचकांचे काय झाले ते पहा ना!), पण त्या पूर्वी आपण…रावांच्या वाड्याकडे जाऊ या(काय कुणाच्या लग्नाचे आमंत्रण आहे का?) …पण तिथे पोचण्या अगोदर इकडे भैरोबाच्या देवळाकडे वळू…” असे म्हणत वाचकाला १०-१५ पाने तरी फिरवून आणत! तसं झालं आहे इथे. तर आता हरदासाची कथा मूळ पदावर आणू या.पण त्या अगोदर (आलं का पुन्हा ते त्या जुन्या कादंबरीतले दळण आणि वळण!)श्री सुहास बहुळकर हे कोण, त्यांचे माझे फोनवर का बोलणे झाले हे पाहू या.( पाहू या! चला!)
सुहास बहुळकर हे नामांकित चित्रकार. काही काळ ते जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्राध्यापक होते. व्यक्तिचित्रण हा त्यांचा विशेष अधिकाराचा भाग.त्यांनी काढलेले लोक्मान्य टिळकांचे तैलचित्र–पोर्ट्रेट- आपल्या लोकसभेत आहे. तसेच त्यांची गांधी आणि नेहरू यांची चित्रे मुंबईच्या राजभवनात–गव्हर्नर्स हाऊस- मध्ये आहेत.
त्यांचा यंदाच्या दीपावली या दिवाळी अंकात “कथा चित्रांच्या आणि चित्रकारांच्या” असा एक लेख आला आहे.तो लेख मला आवडला, म्हणून मी त्यांना तसे सांगण्यासाठी फोन केला. बोलताना मी विनोबाजींचे चित्र काढण्याच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभवाविषयी बोलताना सहज त्यांनीच दोन तीन वेळा उल्लेख केलेल्या, विजय दिवाणांचे पालुपद”आम्हाला काहीही घाई नाही” हे सांगितले. लेखातील इतर काही गोष्टींविषयी जुजबी बोलल्यावर शेवटी मी त्यांना सांगितले की, “तुमच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदात तुम्ही ठरवलेले {त्यांच्या आता मोठ्या झालेल्या २०-२२ वर्षांच्या-दोन्ही मुलींचे आणि त्यांच्या बायकोची अशी पोर्ट्रेट करायचे ह्या दिवाळीत; बावीस वर्षे झाली इतकी चित्रे काढली पण ह्यांची पोर्ट्रेट्स केली नाहीत ह्याची रुखरुख वगैरे त्यांनी त्या परिच्छेदात व्य्क्त्त केली आहे} काम मात्र लवकर पूर्ण करा. त्याचा आनंद फार मोठा असेल. इतर कुठल्याही मान-मरातबापेक्षा ही चित्रे काढण्याचा आनंद, समाधान फार मोठे, निराळे असेल असे मी त्यांना म्हणालो. “बरंय, पुरे करतो ते काम.” असे ते म्हणाले. त्या अगोदर त्यांनी मला श्री. दिवाण ह्यांच्या विषयी सांगितले की सध्या ते ५०-५५चे असतील. तरुणपणीच त्यांनी विनोबांच्या सर्वोदयी, ग्राम विकास कार्यक्रमाला वाहून घेतलेय. विनोबांच्या जन्मगावी आणि आजूबाजूच्या खेड्यात ते काम करतात.ते तिथे गेले असताना –
खेड्यात बरेच वेळा गाय, म्हैस मरून पडल्याचे, भोवती कावळे कुत्री त्यांना तोचताहेत, लचके तोडताहेत माश्या घोंगावताहेत असे दिसले. डॉ.आंबेडकरांच्या सुधारणावादी क्रांतीकारी चळवळीमुळे पूर्वीची महार मंडळी मेलेली जनावरे ओढून नेण्याची, त्यांची कातडी सोलण्याची कामे करत नहीत.आणि इतर कोणी सवर्ण्ही अर्थातच अशी कामी करत नाहीत.ह्यावर ह्या ’दिवाण्याने’ उपाय काढला. ब्राम्हण दिवाण स्वत:च मेलेली जनावरे ओढून नेऊन त्यांची कातडी काढून ती सगळी स्वच्छ करू लागला. ह्या अशा इतक्या कातड्यांचे करायचे काय? हा प्रश्न पडला. तोही त्याने सोडवला. स्वत: चपला बूत जोडे शिवायला शिकला आणि तयार करू लागला! आज गोगोद्याला (विनोबांच्या जन्मगावी) त्यांनी ह्याची एक मोठी संस्था उभी केली आहे.
तर ह्या दिवाणांना मी भेटायला गेलो.६-७ नोव्हेंबरला मला जाणे जमले नाही. कालचा शेवटचा दिवस होता.वर्तमानपत्रात फारशी प्रसिद्धि नव्हती. त्यामुळे तिथे खादीचे, ग्रामोद्योगातील वस्तूंचे, सर्वोदयी पुस्तकांचे मोठे प्रदर्शन होते.माहिती नव्हतीयाची. फारसे पैसे नेले नव्हते. म्हणून ६०-१०० रुउपये मीटर्ची उत्तम तलम खादी सदऱ्यासाथी घेता आली नाही.किंवा सर्दी पडशासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा,किंवा मूळव्याध,मधुमेह वरील चूर्ण, अगदी पारदर्शक, गाईच्या तुपापासून केलेला साबण वगैरे काही घेता आले नाही. असो हे महत्वाचे नाही.
मी सगळीकडे फिरलो. दोघा तिघा कार्यकर्त्यांना, डॉ. कुमार सप्तर्षींनाही विचारले. सगळ्यांनी आता/इथे/इकडे/तिकडे होते दिवाण; भेटले,दिसले तर सांगतो म्हणाले.मीही त्यांना शोधत फिरलो. पण ते भेटले नाहीत.मी हिरमुसलो.मी घरी जाणार, पण असे फिरत असतानाच थोड्या वेळात दलाई लामा येणार आहेत. समारोपाचे भाषण तेच करणार आहेत असे समजले. थांबलो.
थांबलो त्याचे सार्थक झाले. आलो त्याचे फळ मिळाले. एका मोट्या माणसाला दुरून का होईना पहायला मिळाले. त्यांना बोलताना, हसताना ऐका पहायला मिळाले. हा भाग्य योगच म्हणायचा.नाहीतर इतकी वर्षे जगलो.इतकी थोर माणसे डोळ्यासमोर आता आता होती. त्यांचे फोटो, बातम्या, किस्से मोठेपण ऐकले असेल. एखाद्याचे पुस्तक वाचले असेल.पण प्रत्यक्ष त्यांना पहाण्याची संधी आली नाही किंवा मी तसे प्रयत्नही केले नसतील. नोबेल पारितिषिक विजेता, लहानशा का होईना पण एका देशाच्या राजा,अनभिषिक्त राजापेक्षाही मोठा माणूस; मोठ्या , जबर हुकमतीखाली असलेल्या देशाशी शांततेतेने लढा देणारा; स्वत:साठी नव्हे तर आपल्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी, संस्कृती, भाषा जपण्यासाठी, अहिंसेचे पालन करणाऱ्या माणसाला दुरून का होईना पहायला मिळाले हे भाग्य नव्हे का? दुधाच्या अपेक्षेने गेलो तर बासुंदी मिळाली!
मी बहुळकरांना त्यांच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदातील कामाविषयी बोललो. तेही हो, बरं, लवकरच पुरे करतो म्हणाले. त्यांनी फोन खाली ठेवला आणि मीही. क्षनभरातच फोनची घंटा वाजली. फोन उचलून कानाला लावला तर काय! “मी बहुळकर बोलतोय” असे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले,” तुम्ही जे शेवटी बोललात ते मला लिहून पाठवा. त्या चार ओळी मी जपून ठेवेन! तुम्ही सांगितलेत त्यात भावनिक ओलावा होता.” मी अवाक झालो. म्हटलं हा तर माझा मोठा सन्मानच केलात तुम्ही. वगैरे, वगैरे.
त्यांना मी पत्र पाठवलय.
श्री. विजय दिवाणही भेटले असते तर आणखी बरे वाटले असते.आता केव्हा योग यॆईल कुणास ठाऊक.