Monthly Archives: November 2008

चांदोबाचा लिंब……….तरडगाव

लोणंदचा मुक्काम आटोपून आम्ही सकाळी निघालो. आज आमच्यापैकी एकदम
तीन वारकरी कमी झाले होते. त्यांची उणीव जाणवत होती. यापुढे इथून
ते थेट पंढरपूरपर्यंत मला आवताडेंची सततची सोबत होती.

आम्ही दोघे, आमच्यातील इतरांच्या मानाने, वारीच्या मुख्य रस्त्याला लवकर
लागायचो.

मजल दरमजल करीत दीड एक तास चाललो की पंधरा मिनिटांपासून ते अर्धा
तासपर्यंत आणि दुपारी उन चढू लागले की तास दीड तास विश्रांते घेत ह्या
आषाढी यात्रेतील आमची वाटचाल व्हायची.

अशीच वाटचाल करत “चांदोबाच्या लिंबा”पर्यंत आलो. इथे माऊलीचा
दुपारचा विसावा असतो. सर्व दिंड्या, वारकरीही विसावा घेतात आज आम्हीही
सर्वजण एकत्र थांबलो. कारण इथे वारीतील पहिले उभे रिंगण होणार होते.

“चांदोबाचा लिंब” या नावापासूनच कुतुहल सुरू होते. या ठिकाणीच का
चांदोबा भागून इथल्या लिंबाच्या झाडामागे लपत होता; हेच का ते लिंबोणीचे
करवंदी झाड? दूरवर पाहिले मामाचा चिरेबंदी वाडा दिसतो का? वारीतील
काही जणांना विचारले पण कुणालाच ह्या ठिकाणाला हे नाव कसे पडले याची
माहिती नव्हती.पण त्या गोड बाल/लोक काव्या इतकेच हे नावही गोड आहे हे खरे.

रस्त्याच्या दुतर्फा फारशी झाडी नव्हतीच. लांब लांब अंतरावर एखाद दुसरे
झाड उभे होते.

बरेच वेळा वर्तमानपत्रात “चांदोबाचा लिंब” येथे उभे रिंगण झाले, तसेच
“माळशिरस येथील सदाशिव नगरच्या साखर कारखान्याच्या मैदानात वारीतील
पहिले गोल रिंगण” असे वाचत असे. त्याची चित्रेही पाहिली होती. त्यामुळे उभे
रिंगण पाहण्याची उत्सुकता होती.त्यासाठी आमच्या तंबूतील आम्ही बहुतेक
सर्वजण थांबलो.

माऊलीची पालखी जेथे विसावली होती तिथपासून ते समोर -रस्त्याच्या
दुतर्फा मैल दीड मैल पर्यंत सर्व दिंड्या, टाळकरी-मृदुंगवाले, दिंडीकर
वारकऱ्यांसह शिस्तीत उभ्या राहिल्या.

इतर आमच्या सारखे सर्व वारकरी त्या दिंड्यांच्या पाठीमाग गर्दीने उभे
होते; पण त्यांच्यात अंतर ठेवून खचाखच गर्दीने उभे होते. काही उत्साही
वारकरी झाडांवर तर काही खूप मागे पण उंच पाण्याच्या टाकीवर, तर काही
जिथे जिथे उंच ठिकाण मिळेल तिथे बसले,उभे राहिले होते.सर्व रस्ता मात्र पूर्ण
मोकळा होता.

आम्ही काही वेळ तीन चार रांगांच्या मागे होतो. टाळ-मृदुंगाचे ठेकेदार आवाज,
भजना-अभंगाचे सूर फक्‍त ऐकू येत होते.

पालखीच्या दिशेने जाणे तर अशक्य,इतकी गर्दी. आम्ही मग विरुद्ध दिशेने जाऊन
शक्यतो रस्त्याजवळच्या रांगेत शिरण्याचा प्रयत्न करू लागलो. असे करत,करत
म्हणजेच घुसखोरी करत एका दिंडीच्या मागे आलो.पुरातून नदी पोहून आल्याचा
आनंद झाला. आमच्या भाग्याने आमच्या समोरील दिंडीचे वारकरी फार
चांगले होते. अभंग म्हणत टाळ वाजवताना ते दोन्ही बाजूला हलत डोलत,
त्यावेळी आमच्यापैकी काहींना ते त्यांच्या अधे मधे उभे राहू देत होते, डोके
काढू देत.आता दोन्ही बाजूच्या दिंड्या आपली निशाणे पताका नाचवत उभ्या
जागी मागे पुढे होत, दोन्ही बाजूला झुकत,झुलत टाळ मृदुंगाच्या गजरात
हरिनाम गर्जत होते. त्यावेळी त्या भजनी वारकऱ्यांची एक मोठी लाट पसरत
चाललीय असा भास व्हायचा.

सुदैवाने माझ्या समोरचा वारकरी उंच नव्हता.म्हातारा होता.शांत होता.
मला आणि माझ्या बाजूला उभ्या असलेल्या दोघा तिघांना रस्ता स्पष्ट दिसत
होता.

थोड्याच वेळात माऊलीच्या रथापुढचा घोडेस्वार हळू हळू येऊ लागला.
समोरचे भाविकजन घोड्याच्या कपाळाला हात लावून नमस्कार करण्यासाठी
पुढे सरसावत. माऊलीचा तो स्वार अनेकांचे समाधान करण्यासाठी घोड्याची
मान डौलात हलवत, कधी ह्या बाजूला तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला डोलवत
घोडा नेऊ लागला. तो थेट रिंगणाची हद्द संपेपर्यंत गेला. मग घोडा उलटा
फिरवून लगेच माऊलीच्या रथाकडे वेगाने दौडत गेला. स्वाराचा घोडा
भरधाव वेगाने पळताना पाहणे हे खरंच काही तरी दुर्लभ पहायला
मिळाल्याचा आनंद होता.

थोड्या वेळातच तो घोडेस्वार पुन्हा वेगाने दौडत आला आणि मग काय विचारता!
वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण त्या घोडेस्वाराच्या
मागून तितक्याच वेगाने माऊलीचा घोडा धावत येत होता.

रिंगणाच्या शेवटच्या टोकापर्यंत थेट दौडत जाऊन माऊलीच घोडा पुन्हा
माघारी भरधाव वेगाने पळत आला. सर्वच गोष्टी टिपेल्या गेल्या.”माऊली,
माऊली”चा जयघोष सुरू झाला तो घोडा माऊलीच्या पालखी समोर पुढचे
पाय टेकून मान खाली झुकवून नमस्कार करेपर्यंत चालूच होता.

रिंगण संपले. दिंड्या आपापल्या क्रमाने जागी जाऊन उभ्या राही पर्यंत,
माऊलीचा घोडा गेला त्या रस्त्यावरची माती सोने समजून वारकरी कपाळाला
लावू लागले.टाळ-मृदुंगही वाढत्या वेगाने वाजत होते. उभ्या रिंगणाचा
आनंद, दिंडीकर मंडळी आणि त्यांच्यामुळे सर्व वारकरी, त्या सूरांनी आणि
ठेक्यांनी,तो लुटत होती.

हा पहिला नवीन अनुभव घॆऊन आमची पावले पंढरीच्या वाटेवर असलेल्या
तरडगावाकडे निघाली. आम्ही तरडगावला दुपारी ३.०० वाजता पोहोचलो.पेट्रोल
पंपाशेजारी आमची राहण्याची व्यवस्था होती.

पेट्रोल पंप काही येता यॆईना. मुक्कामाचे ठिकाण जसे जवळ येते तसा थकवा
जास्त वाढतो. आम्ही दोघांनी एका मळ्यात, पाण्याचा पाईप धो धो चालू होता
तिथे गार सावलीत विसावा घेतला. नंतर ३-४ कि.मी. आणखी चालून गेल्यानंतर
तो नामांकित पेट्रोल पंप दिसला. आता त्यापुढे आमच्या दिंडीची पालं
गाठायची. असे होत होत आम्ही तरडगावापासून थोडे पुढे असलेल्या आमच्या
तळावर आलो.

नीरा—-लोणंदकडे कूच…..

औषधे घेतली म्हणून किंवा मनाची उभारी म्हणा, पण नेहमीप्रमाणे सर्व
आटोपून मी माझ्या सोबत्यांसह सकाळी सहा-सव्वा सहा वाजता लोणंदच्या
दिशेने उसळलेल्या वारकऱ्यांच्या लाटेत सामील झालो.

टाळ मृदुंगाच्या नादावर, अधून मधून उड्या मारत, भजने म्हणत, हरिनामाचा
घोष करत चाललेल्या दिंड्या आणि वारकऱ्यांची असंख्य पावले सोबतीला होतीच.
त्यांच्या बरोबरीने आमची पावलेही वाट चालू लागली.

आज खुद्द डॉक्टरांचीच तब्येत बिघडली होती. त्यामुळे ते वाल्ह्याहून
गाडीतूनच पुढे गेले होते.

वाटेत नीरा नदी लागली. मोठे रूंद पात्र. पाणीही भरपूर. दोन्ही काठांवर
हिरवे हिरवे शेतमळे. सर्व प्रदेश मोठा रमणीय होता.

नीरा नदीचा पूल ओलांडून आम्ही दोघे तिघे लोणंदला इतरांपेक्षा लवकर
पोहोचलो. मुक्कामाचे ठिकाण नेहमीप्रमाणे गावाबाहेर दोन-तीन कि.मी. दूर.

लोणंदच्या विशाल मार्केट यार्डमधील कांद्याच्या अनेक वखारींपैकी एका
वखारीत आमचा मुक्काम होता. इतक्या वखारींतून आमची वखार सापडायला
बराच वेळ लागला.वारीत कितीही चालले तरी ती पायपीट वाटत नाही.पण
अनोळखी गावातील अशी ठिकाणे शोधण्यासाठी हिंडणे त्रासदायक वाटायचे. हा
अनुभव तरडगाव, नातेपुते येथेही आला.

कांद्याची वखार प्रथमच पहात होतो. भली मोठी, उंच, पत्र्याचे छ्प्पर असलेली
व चारी बाजूंना लोखंडी जाळ्याच्या भिंती.थोडक्यात वर उंचावर छप्पर;आणि
जाळ्यांना थोड्या उंची पर्यंतच प्लास्टिक्स्चे कापड लावलेले.इतकेच खाजगीपण.
जमीन इथेही गारगोट्या,मुरुमाची खडी, खडे यांनी खचाखच भरलेली.आम्ही
तीन चार मोठ्या पाट्या भरतील इतके दगड खडी बाजूला केली!

थोड्या अंतरावर असलेल्या आमच्या दिंडीच्या ट्रकमधून ताडपत्र्या आणल्या.
आमच्या जागेवर त्या पसरून इतर सोबत्यांची वाट पहात बसलो.

हळू हळू सर्वजण आले.इतर दिंडीकरही आले.सर्वांनी सामान आपापल्या हद्दीत
लावले. गडबड, बडबड सुरू झाली. डॉक्टर आले ते अंगात ताप घेऊनच. शिवाय
भरीस भर म्हणून खोकलाही होता.

कांद्याच्या मार्केट यार्डपासून गाव लांबच. मी ताडपत्र्या वगैरे टाकल्यावर
फोनची बॅटरी भारीत करण्यासाठी आणि नंतर संध्याकाळी डॉक्टरांसाठी
औषधे आणण्यासाठी गावात गेलो.

गावातील मुख्य रस्ता वारकऱ्यांनी आणि वाहनांनी दुथडी भरून वहात होता.
अखेर हवी होती ती औषधे आतल्या रस्त्यावरच्या एका दुकानात मिळाली.
डॉक्टरांना दिली. ते अंथरुणात पडून होते.

रात्रभर एकटे डॉक्टरच नाही तर आमच्या कांद्याच्या वखारीतील आम्ही
सर्वजणच खोकत होतो.कंदर्प संपर्क!

लोणंदचा मुक्काम दोन रात्र्रींचा होता. त्यामुळे दुसरे दिवशी आम्ही
नेहमीचे पाच-सहाजण आंघोळीसाठी नीरा नदीवर गेलो. त्यासाठी आम्ही
लोणंदपासून चार पाच किलोमीटर मागे गेलो. झकास आंघोळी झाल्या. आजचा
दिवस निवांत. पायांना विश्रांती.

डॉक्टरांची तब्येत जास्तच बिघडली. त्यांनी चंद्रपूरला परत जायचे
ठरवले. प्रथम पुण्याला आमच्या गाडीतून जायचे आणि तेथून रात्री
चंद्रपूरला.त्यांच्याबरोबर त्यांचे निकटचे स्नेही श्री. कमलाकरही
जाणार. कारण त्यांनाही ताप वगैरे होताच शिवाय त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचे
दुखणे त्यांना असह्य झाले होते. त्यांनी आपल्या गुडघेदुखी पुढे गुडघेच टेकले.
त्या दोन आजारी माणसांबरोबर एक तरी धडधाकट माणूस हवा म्हणून
डॉक्टरांनी आपल्या भावाला बरोबर घेतले. तेही जाण्यासाठी तयारच होते.

मी पुण्याला फोनाफोनी करून माझे जावई श्री.श्रीकांतकडून चंद्रपूरची
तिकीटे काढून ठेवली.

डॉक्टर परत निघाले. आपली वारी पूर्ण झाली नाही. अर्धवट सोडून
परत जावे लागते ह्याचे दु:खही होते. आळंदीला भेटल्यावर वाटेत,” ह्या
वारीनंतर मी पुन्हा वारी करणार नाही. ही बहुधा शेवटची वारी.ती
तुमच्याबरोबर होतेय, आपली इतक्या वर्षानंतरची भेट या वारीमुळे होतेय”.
वगैरे सांगत होते. त्यांचे निकटचे मित्र कमलाकर यांच्याजवळही ते असेच
काहीसे म्हणाले होते असे मला कमलाकर वारीत सांगत होते.

मलाही मनातून फार वाईट वाटत होते.डॉक्टरांच्यामुळेच माझ्या आयुष्यातील ही
पहिलीवहिली पंढरपूरची वारी घडत होती. इतक्या वर्षांनी भेटलो, थोड्या
फार गप्पा झाल्या. आतापर्यंत त्यांच्या अनुभवी सोबतीने वाट सोपी झाली होती.

डॉक्टरांनी आणि मी उराभेट घेऊन निरोप घेतला. आमच्या दोघांचेही डोळे
पाणावले. ते पाहून महिला मंडळही गलबलले.

मी आणि श्री. आवताडे डॉक्टरांना व इतरांना निरोप दॆऊन परतलो. थोडा वेळ
सुनं सुनं वाटत होते.काही वेळाने एका वखारीत भारूड, गौळण वगैरे चालले
होते.तिथून लोकांच्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता.मी व श्री. आवताडे तिकडे
गेलो.

नाथांची भारूडे चालली होती. ती झाल्यावर संत सेना महाराजांचा”आम्ही
वारिक वारिक । करू हजामत बारिक बारिक॥” ह्या अभंगाचा दोघा वारकऱ्यांनी
नाट्याविष्कार केला.अभंगाचे नाट्यीकरण सादर करण्याचा प्रकार मी प्रथमच
पहात होतो.

प्रहसनातील-फार्स मध्ये जलद हालचाली असतात तसे अभंगातल्या ओळीत जी
कृती वर्णन केली ती विनोदी पद्धतीने ती कृती प्रत्यक्ष करत होते. वस्तऱ्याने
गळा कापल्याचा(पाप काढून टाकण्याचा) अभिनय, एका मोठ्या केरसुणीने बगला
झाडण्याची कृती; हे पाहून सर्वांना मजा वाटत होती. मध्येच टाळ
मृदंगाच्या बरोबर अभंगातील पुढची ओळ म्हटली जायची की त्यावर विनोदी
सादरीकरण.

गंमत आली. प्रहसनाच्या-वळणाने अतिशयोक्‍तीने सादर केलेले हे अभंगांचे नाट्यीकरण
वारकऱ्यांना हसवून सोडत होते. संत सेना महाराजांनी ह्या रुपकातून
सांगितलेला भावार्थ मात्र हरवून जाऊ नये. मात्र वारकरी मंडळीची
घटकाभर झकास करमणूक झाली हे निर्विवाद.

रात्री श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम गावात जिथे होता तिथे
शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असावा. भक्तीपर चिजा, पदे गायक गात होता.

दूरवरून येणारे ते सूर आनंद देत होते. काही दिंड्यांतून भजने, तर एखाद्या
दिंडीत ह.भ.प.बुवांचे कीर्तन चालू होते. सर्व वातावरण सुस्वर झाले होते.
कीर्तन भजन लवकर संपले.गायन मात्र पहाटे २.३०/३.००पर्यंत चालू असावे.
ऐकता ऐकता कधी झोपलो ते समजले नाही.

… वाल्हे…….. वाल्या कोळ्याची भूमि

जेजुरीहून आज वाल्ह्याला जायचे. अंतर १०-१२.कि.मी.च असेल. फारच थोडे
अंतर. आम्ही चार पाच जण एकत्र निघालो. ३-४ कि.मी. चालून झाल्यावर
माझी तब्येत पाहून डॉक्टरांनी मला “डॉक्टरी सल्ला” म्हणजे जवळ जवळ हुकुमच करून
गाडीत बसायला लावले. पायी वारीला हे ६-७ कि.मी.चे गालबोट लागणार
ह्याचे वाईट वाटले. पण मोठे उद्दिष्ट लक्षात घॆऊन निमूटपणे गाडीत बसलो.
वाल्ह्याला आलो.

आज संपूर्ण वारीच आपल्या मुक्कामी वाल्ह्याला दुपारच्या जेवण्याच्या वेळी
आली असावी. अगदी थोडे अंतर हेच कारण.

वाल्हे लक्षात रहाण्याचे कारण इथली भूमि. गावच्या लोकांना ही
वाल्या कोळ्याची भूमि वाटते, तसे मानतातही गावचे लोक.टेकडी, डोंगरावर
वाल्या कोळ्याच्या खुणा म्हणून लहान दगडांनी भरलेला रांजण वगैरे आहे
असे म्हणतात.आमच्यातील काहीजण तिकडे जाऊन आले पण तसे काही विशेष त्यांना
आढळले नाही.

पण मला वाल्हे लक्षात राहण्याचे कारणही ही भूमीच! आमच्या दिंडीचा तळ
जिथे पडला होता ती जमीन खाच खळगे आणि खड्या-खुड्ड्यांची. दगड खडे
गोटे तर होतेच. आमचा तंबू जेथे ठोकला होता ती भूमीही तशीच.त्यात
आणखी भर म्हणून आम्ही पुरुष मंडळी ज्या बाजूला झोपणार तिथून एक
उथळसा पण बऱ्यापैकी खोलगट चर लांबवर गेला होता. मी जिथे झोपलो तिथे
माझी पाठ आणि खांदा यामध्ये एक उंचवट्याचा दगड! पक्का रोवलेला. कोण
आणि कसा काढणार? झोपलो तसाच. कंबर त्या चराच्या गटारीत आणि पाठी
खांद्याशी हे धोंडोपंत! चांगलेच रुतायचे आणि टोचायचे.कसेही झोपा, ह्या
कुशीवर किंवा त्या कुशीवर झोपा, की कसेही पडा, सरका-सरकायला जागाच
नव्हती. गटारवजा तो चर आणि हे दगडूशेठ काही चुकवता यॆईनात.तसाच
पडलो बराच वेळ.

वरती फक्‍त आकाश आणि खाली खडकाळ, उंचसखल जमीन. शेजारी वाहती
गटारे, पाण्याची डबकी, जवळपास कुत्री मांजरं पहुडलेली. अशा संगतीत
आयुष्यभर झोपणाऱ्या असंख्य कष्टकऱ्यांची,सर्व संसार रस्त्यावरच
असणाऱ्या खेडेगाव, वस्त्यातील, गावा-शहरातील अनेक गरीबांची आठवण आली
आणि तंबूतील ह्या अडचणी विसरून,तसाच रेटून झोपलो.

पण मध्यरात्र उलटल्यावर रात्री२.३० वा. जागा झालो. डोळे उघडे
ठेवून पहाटेपर्यंत पडून राहिलो.

मूलभूत सोयी

जेजुरीला निघाल्यापासूनच सर्दी पडसे, ताप होताच. तशात आणखी
पोट बिघडले. औषधे घेतली. रात्री नीट झोपही लागली नाही.

पहाटे ४.००/४.३० वा. तंबूतील एकाने बातमी आणली. जेजुरीच्या
एस. टी. स्टँडवर सुलभ शौचालयाची सोय आहे. आमच्यासारख्या
शहरी लोकांना हे ऐकून बरे वाटले. मी एस.टी. स्टॅंडवर आलो. अंधार
थोडा कमी कमी होत होता. सर्व एस.टी. स्टँडना जी कळा आली आहे
तीच अवकळा जेजुरीच्या स्टँडलाही आली आहे. इमारत चांगली पण
जुनाट झालेली. सभोवती मात्र खूप मोकळी जागा. तिथे बरेच वारकरी
झोपलेले तर काही जण मोकळ्या मैदानात”बसलेले”!

दोन-चार तरुण मंडळी उभी होती. त्यांच्यापाशी जाऊन मी एस.टीच्या सुलभ
शौचालयाची चौकशी केली.पण त्यांना काही माहिती नव्हती. पण एकाने
समोरच्या भल्या मोठ्या मैदानाकडे हात करून,”अहो, हे काय! हे सगळं सुलभ
शौचालयच आहे की, बघा!”

मी मोठ्याने हसलो; पुढे जाऊन चौकशी केल्यावर ठावठिकाणा मिळाला.

माझी वारी: पुन्हा सासवड……तेथून जेजुरी

पंढरपूरहून सासवडला आम्ही रात्री पोहोचलो. सासवडला आमचा
रात्रीचा मुक्काम छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये होता.शाळेची इमारत
भली मोठी होती. पण त्यापेक्षाही शाळेचे मैदान फार मोठे होते.विद्यार्थी
मोठे भाग्यवान.

शाळाचुकार विद्यार्थी जसा मास्तरांचा डोळा चुकवून हळूच वर्गात
येऊन बसावा त्याप्रमाणे आम्ही दुसरे दिवशी सकाळी पुन्हा वारीत सामील
झालो. सासवडहून निघाल्यावर पुढचा मुक्काम जेजुरीला.पुण्यापासून
वारकऱ्यांसाठी अनेक उदार लोक ठिकठिकणी चहा, फराळ जेवणाची सोय
करतात. वारीतील अनेक गोरगरीबांना त्याचा फायदा होतो. पुणे सासवड सोडले
की अशा सोयी कमी होतात असे ऐकले होते. पण तशी काही फारशी तफावत
दिसली नाही.जेजुरीपर्यंत अनेकांनी उदार हस्ते अशा सोयी केल्या होत्या.
दात्यांची संख्या कमी असेल पण दिंडीशिवाय येणाऱ्या अनेक गरीब
वारकऱ्यांसाठी त्या पुरेशा होत्या. पुढे नातेपुतेपासून ते वाखरीपर्यंत
अनगरकर मंडळींनी(अनगरचे पुढारी आणि समस्त गावकऱ्यांनी) तर
माऊलीच्या वाटेवर रोज सकाळी-दुपारी चहा नाश्ता, दुपारी जेवणाची
चांगली सोय केली होती. अनेक गोरगरीब शेतमजूर,कष्टकऱ्यांचे दुवे ह्या आणि
इतर अनेक दात्यांना मिळाले असतील ह्यात शंका नाही.

सासवड ते जेजुरीची ही वाटचाल,पुणे ते सासवड आणि त्यातील
घाटाची चढण ह्या पेक्षा पुष्कळच सोपी. पण मी अंगात ताप घेऊनच
जेजुरीपर्यंत आलो. आमच्या दिंडीचा मुक्काम जेजुरीच्या एस.टी. स्टॅंड शेजारी
होता.आमच्या दिंडी सकट अनेक दिंड्यांचा तळ तिथे पडला होता. माझे अंग
दुखत होते. ताप भरला होता.

जेजुरीला माऊलीच्या पालखीचा जिथे मुक्काम असतो तिथे सर्व
दिंड्या एकत्र येतात. त्यांच्या काही तक्रारी, अडचणी, सूचना असल्या
तर त्या ऐकल्या जातात व पालखीबरोबरचे प्रमुख त्या ऐकून त्यावर
निर्णय जाहीर करतात, निवारण करतात. मग आरती हॊऊन हा कार्यक्रम
संपतो. ही फक्त रूपरेखा झाली. पण सर्व दिंड्यांचे एकत्र येणे,
त्यानंतर माऊलीची पालखी येण्यापासून तिचे ह्या दिंड्या मोठ्या
चढाओढीने भजने, अभंग,नामघोष करून स्वागत करतात.ह्या सर्व
गोष्टीतील आणि तिथे जमलेल्या अफाट गर्दीतीलही शिस्त, मग निस्तब्ध शांतता,
ज्ञानराज माऊलीची आरती वगैरे पहण्यासारखे असते,असे डॉक्टरांनी
सांगितले. पुढेही वारीत दोन तीन ठिकाणी हा कार्यक्रम असतो. पण आजचे
ठिकाण जवळच आहे म्हणून मी जायचे ठरवले.

मी एकटाच निघालो. मैदान जवळच म्हटले तरी एक दीड कि.मी.
असेल. त्याशिवाय प्रचंड गर्दीचे लोंढे होतेच.

मी त्या मैदानात पोचलो.गर्दी होतीच. वारकरी होते, आजूबाजूच्या
लहान गावातील, खेड्यातील,वाड्या-वस्तीतील लोक, जेजुरीतील लोक असा मोठा
जनसमुदाय जमला होता.

मैदानाच्या एका बाजूला माऊलीच्या मुक्कामासाठी मोठ्या सुबक
चौथऱ्यावर एक मोठा सुंदर तंबू होता. हार फुलांच्या माळा आणि
विजेच्या दिव्यांनी नटला होता.

एक एक दिंडी येऊ लागली. मैदानाच्या चारी बाजूंनी त्या दिंड्या
आपापल्या जागी उभ्या राहू लागल्या. पण हे सर्व संगीतमय वातावरणात
चालले होते. माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी आपण आलो आहोत हे जाणून
दिंड्या,माऊली वगैरे टाळमृदुंगाच्या साथीने, मोकळ्या राना-मैदानात
गाण्याची सवय झालेल्या तापल्या गळ्याने, जोरात म्हणत येत होते.

दिंडीतील वारकऱ्यांच्या गायकीतील जोष आणि तन्मयता
अनुभवण्यासारखी असते.

सर्वांचे कान टाळमृदुंगाच्या आवाजाने भरले होते आणि डोळे
श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीकडे लागले होते.

अधून मधून लोक मध्येच उठून माऊली, माऊली, श्रीज्ञानदेव-
तुकारामाचा गजर करत उभे रहायचे. पण माझ्या जवळ बसलेले गृहस्थ
म्हणायचे, “अहो, अजून वेळ आहे; उठू नका.अजूनही दिंड्या इकडून येताहेत.
माऊली (हात दाखवून) तिकडून येणार आहे.”

माऊलीच्या स्वागतासाठी तंबूच्या दोन्ही बाजूला उभ्या
असलेल्या दिंड्यांतून वारकरी म्हणत असलेल्या अभंगांचे शब्द नीट कळत नव्हते
पण टाळ मृदुंगाच्या नादातून साध्या सुरेख चालीवर तरंगत आलेले सूर
कानावर येत होते. चहूकडून येणाऱ्या सुरांच्या गोपाळकाल्याने
वातावरण भारावून गेले होते. तेव्हढ्यात माऊलीची पालखी आली.

चोपदाराने आपल्या हातातील दंडा उंच उभारल्या बरोबर
सर्वदूर क्षणात शांतता झाली. सर्व काही स्तब्ध. फक्‍त शांतता.
दिंड्यातील टाळ मृदुंगही गप्प झाले. पण एका कोपऱ्यात मात्र टाळांचा
आवाज ऐकू येतच होता. म्हणजे त्यांची काही तरी तक्रार असणार.
पालखीबरोबरची मोठी माणसे तिकडे जाऊन तक्रार ऐकून आली असावीत.
तक्रार मोठ्यांदा सांगण्यात आली व त्यावरील निकालही दिला. मग
काही निवेदने व इतर सोपस्कार झाले. पालखी मुक्कामासाठी माऊलीच्या
तंबूकडे निघाली. दर्शनासाठी गर्दीही पुढे सरकू लागली.

मी तापाने फणफणलो आहे, थकलेला आहे हे लक्षात आल्यावर माझ्या शेजारी
बसलेल्या त्या माहितगार माणसाने माझा हात धरून,तशा त्या गर्दीतून मला
सुरळीतपणे मुख्य रस्त्यावर आणले आणि माझ्या दिंडीचा तळ जेथे होता त्या
रस्त्याला मला लावून दिले.

शेतकीखात्यातून निवृत्त झालेल्या त्या सज्जनाचे नाव विचारायचे मी विसरलो.
त्यानेही सांगितले नव्हते.

पंढरीच्या वारीत अशीच असंख्य अनामिक, साधी माणसं मदत करत असतात.
त्यामुळेच वारीत प्रत्येकजण दुसऱ्याला “माऊली” म्हणत असावा!

माझी वारी: थेट पंढरपूर……………!

खरी गोष्ट अशी की……. श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचा सासवडला
दोन दिवसांचा मुक्काम असतो. आषाढी एकादशीला पंढरपूरात माऊलीबरोबर गेलो
तरी विठ्ठलाचे दर्शन दोन दोन दिवस थांबूनही नीट मिळत नाही ही वस्तुस्थिती
आहे; आणि अनेक वारकऱ्यांचा तसाच अनुभवही आहे. पांडुरंगाचे थोडे
निवांतपणे दर्शन घ्यावे आणि पुन्हा सासवडला मुक्कामाला यायचे. दुसरे दिवशी
पुन्हा माऊलीबरोबर पंढरीच्या वारीला निघायचे असा आमचा बेत होता.

आम्ही सासवडहून संध्याकाळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालो.
आमच्या महिला मंडळाने चांगली भजने, भक्‍तीगीते म्हटली. आवाजात एखादी
उणीव काढता आली असती पण म्हणण्यातला भाव फार चांगला होता. आमचा
प्रवास ह्या हरिनामाच्या संकीर्तनात फार लवकर झाल्यासारखा वाटला.

पंढरपुरात पोहचल्यावर नामदेवाच्या पायरीवर डोके ठेवले आणि आम्ही
विठोबाच्या दर्शनासाठी बारीत उभे राहिलो.वर्षभर विठोबाच्या दर्शनासाठी
रांगा लागलेल्या असतात. पण आम्ही त्या दिवशी मोठ्या भाग्याचे! आम्हाला
अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागले नाही.

गर्दी नव्हती. दर्शनासाठी मोठ्या रांगाही नव्हत्या. तरीही बडवे
मंडळी सवयीनुसार दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाला पांडुरंगापुढून क्षणात
पुढे ढकलतच होते!

आम्ही आता गाभाऱ्यात आलो होतो. त्यामुळे, नामदेवाचे हट्ट पुरवणारा,
भक्‍तांच्या काजा त्यांच्या संकटकाळात धावून जाणारा, सर्व संतांचे
परब्रम्ह अशा त्या सावळ्या पांडुरंगाचे आम्हाला दर्शन होत होते. गाभाऱ्यात
असलेले रांगेतील आम्ही, ते सावळ्या तेजाचे, कटेवरी हात ठेवून भक्‍तांसाठी
तिष्ठत उभ्या असलेल्या, महाराष्ट्राचे साक्षात लोकदैवत असलेल्या विठोबाचे
रूप तिथूनही डोळ्यात साठवत होतो.

आज माझे दैव विशेष बलवत्तर असावे. मी विठोबाच्या समोर उभा होतो.
कपाळावर चंदनाच्या उटीत बुक्क्याचा ठसठशीत ठिपका असलेला टिळा,
डोक्यावर चमचमणारा मुकुट, गळ्यात भरगच्च ताजा वैजयंती हार,
मोरपंखी असा सुंदर निळा पोषाख घातलेला, कमरेला लाल पट्टा,
खांद्यावरून गेलेल्या तांबूस पिवळ्या शेल्याचा भरजरी पट्टा, झळाळणारा
पितांबर नेसलेला तो पांडुरंग पुन्हा जवळून पाहिला. त्याच्या समचरणावर
दोन तीनदा डोके ठेवले! इतके मनसोक्‍त दर्शन मी घेतले तरी बडव्यांनी मला
पुढे ढकलले नाही! पंढरीनाथ महाराज की जय म्हणत मी पुढे सरकलो. हे मी
इतरांना सांगितल्यावर माझ्या या अप्रूप भाग्याचे कौतूक, हेवा न करता
“तुम्ही पैसे पेटीत न टाकता विठ्ठलाच्या पायाशी ठेवले होते” असे व्यावहारिक
सत्य सांगितल्यावर माझे ते भाग्याचे, दैवाचे विचार जमिनीवर आले!

मतितार्थ इतकच की ज्यासाठी हट्टाहास केला होता तो पांडुरंगाने
पुरवला. अगदी आषाढी एकादशीला नाही तर आगाऊ वर्दी न देता आम्ही
एकदम त्याच्या देवळात धडकलो होतो. हजार वर्षे सारा मराठी मुलुख, मराठी
संतांची मांदियाळी ज्याची उत्कटतेने भक्ती करते, त्या विठोबाचे आम्हाला इतके
निवांत दर्शन झाले, ह्याचा आनंद फार मोठा होता.

ह्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्रीज्ञानेश्वरमाऊली, संतश्रेष्ठ
तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर तसेच इतर अनेक संतांच्या
पालख्यांबरोबर ह्या सर्व संतांचे असंख्य वारकरी भक्‍त निघाले आहेत,त्या
लक्षावधी वारकऱ्यांबरोबर आपणही जात आहोत ह्याचे समाधान किती होते ते
शब्दात कसे सांगता यॆईल?

आम्ही पारंपारिक पद्धतीत थोडी सोयीची तडजोड केली इतकेच.