Monthly Archives: November 2017

बीजाक्षरांचा व्यावहारिक मंत्रकोश

रेडवुड सिटी

नुकतीच माझ्या वाचनात काही पुस्तके आली. त्या पुस्तकांत काही मुळाक्षरे अनुस्वार दिल्यावर मंत्राक्षरे होऊन ती बऱ्याच व्याधी दूर करतात असे आत्मविश्वासाने सांगितले आहे. त्यासाठी शरीरात सहा चक्रे असतात. ती पाकळ्यांची असतात. त्यावर आणि पर्यायाने संबंधित अवयव किंवा संस्थांवर ही मुळाक्षरे परिणाम करतात ते स्पष्ट केले आहे. प्रत्येक चक्रांची वेगवेगळी बीजाक्षरेही दिली आहेत. कोणत्या व्याधीसाठी कोणती मुळाक्षरे म्हणायची तीही यादी दिली अाहे. अक्षरावर अनुस्वार दिला की मंत्र होतो ही साधी युक्ति त्यासाठी वापरली आहे. काहीजण म्हणतात की कुठेही अनुस्वार दिला की ती अक्षरे, शब्द संस्कृत होतात! संस्कृत इतके सोपे आहे हे मला कळले असते तर मी म्यॅट्रिकला अर्धमागधी घेतले नसते!
काही म्हणा, सोपा उपाय असे म्हटले असले तरी ते पुस्तक मला अवघड वाटले म्हणून दुसरे पुस्तक वाचायला घेतले.

त्या दुसऱ्या पुस्तकात बद्धकोष्ठ, गॅसेस, गुबारा, तंबाखू, त्याहीपेक्षा गांजा खाण्या ओढण्याने परसाकडला त्रास होतो. तो त्रास केवळ त्या माणसालाच होत नाही तर त्याच्या संडासातील दीर्घकालीन स्थानापन्न अवस्थेमुळे बाहेर टमरेलघेऊन रांगेत उभे राहिलेल्यांनाही होतो. हा त्रास टाळण्यासाठी लेखकाने, “कुं थु न कुं थु न कुं थ शी ल कि ती ,” हा बीजाक्षरी मंत्र सुटका होईपर्यंत मोठ्याने जपायला सांगितले आहे. पुन्हा त्यानेच दिलासाही दिला की संवयीने हा अक्षरमंत्र आपोआप तोंडातून आवाजरुपानेही बाहेर येत राहतो. शिवाय आपल्या पूर्वजांपासून हा मंत्र म्हणला जात आहे ही ऐतिहासिक पार्श्वभूमीही त्याने दिली आहे. मुळव्याध झालेल्यांसाठी प्रथम हाच “कुं थुं… ..”
मंत्र लागू आहे पण त्यांच्यासाठी त्याने अॅडव्हान्स कोर्समधील ” आ आ आs आss ग ग ग आ आ आआ
Sssss ई आई ग गsss! हा मंत्रही सांगितला आहे. तो म्हणताना त्यातील “दीर्घ उच्च स्वरांच्या खुणांकडे ” विशेष लक्ष देऊन म्हणावा अशी सूचना केली आहे. त्यापुढचे लेखकाचे निरिक्षण जास्त व्यवहारी वाटते. तो म्हणतो, या सूचनेकडे लक्ष न देताही खुणांपेक्षाही मोठ्या आवाजात तो म्हणू लागतो.काही वेळा हा मंत्र म्हणून झाल्यावर जुनाट रोगी अनेकदा ‘निपचित पडणे’ हे आसनही त्यांच्या इच्छेविरुद्ध करतात.

आपल्याला जेवताना काही वेळा उचकी लागते. पाणी प्याल्यावर ती थांबते. हा अनेकांचा अनुभव आहे.इतर वेळीही उचकी लागते.हाही अनेकांचा अनुभव आहे. उचकी देताना हनवटी वर जाते, चेहरा वर आणि डोके किंचित मागे जाते, हा सुद्धा अनेकांचा अनुभव आहे. उचकी लागते त्यावेळी “उ् उ उ्उ, अ्ह् ह् ह् उ्ह्उ्क् उक् ” हा बीजाक्षरी मंत्र जपावा. शेवटचा उ्क् दोन वेळा आपोआप म्हटला जातो. ह्या मंत्रात अनुस्वार ऐच्छिक आहे असे त्यानी विशेष सूचनेत म्हटले आहे.

जेवताना स्वत:हून बरंच हादडले असेल किंवा तुमच्या सर्वांच्या आग्रहाला बळी पडून जोरदार खाल्ले असेल तर जेवण झाल्यावर उचक्या येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. ह्यामध्ये पोक्त वयाच्या लोकांचे आणि म्हाताऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यावेळी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊनलगेच उचकी-मंत्राच्या भानगडीत पडू नका. कारण तुम्ही न सांगताही त्याने तो चालू केलेलाच असतो. पहिल्या प्रथम रोग्याला पाणी पाजावे. त्यात खायचा सोडा आणि लिंबाचा रस पिळल्यास जास्त चांगले असे म्हटले आहे. त्यानंतर वरील बीजाक्षरी मंत्र म्हणावा असे लेखक सुचवतात.लेखक पुढे म्हणतो, त्या उचकीग्रस्त व्यक्तीकडे लक्ष देऊन पाहा. कारण काही वेळा उचकी देताना व मंत्र म्हणताना तो डोळ्यांची बुबुळे वर नेतो, आणि तिथेच स्थिर ठेवतो. तो भ्रुकुटीमध्यात खेचरदृष्टी लावून निर्गुणाचे ध्यान करतोय या अध्यात्मिक समजुतीत राहू नका. मंत्र चालू असेल, तो जोरजोरात होत असेल व तुमच्या प्रोत्साहनाने तो तसा म्हणतच राहीला तर तुमच्या लवकरच ध्यानात येईल, निदान यावे,की त्या उचक्यांचे रुपांतर आता आचके देण्यात होऊ लागले आहे. अशावेळी त्याला बीजाक्षरी मंत्र म्हणण्याचा आग्रह न करता, कारण तो आपण जेवताना केलाच होता, ताबडतोब अॅंब्युलन्स बोलावलेली बरी!

रोजच्या आयुष्यात आपण काही गोष्टी न कळत करतो किंवा आपल्याकडून होतात. त्यापैकी ढेकर,आणि इतरही काही विशेष आवाजांचा समावेश होतो.

ढेकर ही सामान्यपणे जेवणाचे समाधान,पोट भरल्याची खूण आहे. त्यावेळेस ती तृप्ती एकदाच उमटते.पण व्यक्तीनुरूप संख्येत फरकही पडतो. किंवा ती एखाद्या अंतस्थ व्याधीचा उघड उदगारही असते. त्यावेळी माणूस सतत ढेकराच देत असतो. त्यावर उपाय म्हणून लेखक
” अssब्बा! अ्ह्sब ब्बा! हsब्! ह्हा्ब् ” हा बीजाक्षरी मंत्र म्हणायला सांगतो. ह्या अक्षरांबरोबर दिलेले उदगार चिन्ह म्हणायचे नाही. म्हणण्यासाठी ते दिले नाही. त्याचा आवाज काढून ते म्हणता येत असेल तर ते चिन्हही म्हणायला लेखकाची हरकत नाही! लेखकाने, ढेकर मंत्र म्हणताना प्रत्येकाचा चेहरा, भुवया, कपाळावर पडणाऱ्या आठ्यांची संख्या हे निरनिराळे असतात हे लक्षात घेतले आहे. उदगार चिन्ह त्यांचे निदर्शक आहे,इतकेच.

तसेच बरेच इतर आवाजही आपल्याकडून बाहेर पडतात. त्यामुळे माणूस अवघडून जातो. चेहरा ओशाळलेला होतो. दुसऱ्या बाजूला किंवा दुसऱ्यांकडे ‘तो मी नव्हेच’ ही खात्री करून देण्यासाठी बघायला लागतो. अशा आवाजासाठी लेखकाने प्रत्येकाला ज्याचे त्याचे बीजाक्षरी मंत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे ! तरीही एक सर्वसाधारण नमुना यासाठी दिला आहेच. तो असा, “ढों म ढां ढिंम् ढंम्म्.” मंत्राच्या सुरवातीला ओम् म्हणण्याचा विकल्प देऊन वातावरण सांस्कृतिक करण्याचाही त्याने प्रयत्न केला आहे.
लेखक पुढे म्हणतो त्याने मर्यादा पाळून, बाहेर पडणाऱ्या अशा आवाजाच्या खालच्या पट्टीतील ‘सुर निरागस हो’ स्वरांसाठी मंत्र देण्याचे टाळले आहे.

माणूस हा जात्याच आनंदी खुशालचेंडू असला तरी काही वेळा तो आनंदी नसतो.स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी त्याने ” टां ग टिं ग टिं गा की टां ग टिं ग टिं गा ” हा किंवा लहानांनी,तरुणांनी ” ढां ग चि क ढां क चि क ढां क चि क” हे बीजाक्षरी मंत्र प्रथम सावकाश व नंतर भराभर म्हणण्यास सांगितले तर आहेच पण त्याबरोबर जसे येईल तसे नाचायलाही उदार मनाने परवानगी दिली आहे. ह्यामुळे परंपरेला आधुनिकतेचीजोड मिळून अनायासे एरोबिक्स साधते असे त्याला सुचवायचे असावे.

लेखकाने प्रसंगा प्रसंगानुरूप केलेल्या सूचना लक्षात घेतल्या तर त्याचे अचूक निरीक्षण व अनुभव ह्यांची प्रकर्षाने (हा एक आणि दुसरा अभिव्यक्ति हे शब्द समीक्षणात्मक परिक्षण करताना कटाक्षाने वापरावेतअसे सांगतात.) जाणीव होते. तसेच लेखकाची भाषाशैली आणि विशेषत: मंत्रांसाठी रोजच्या वापरातल्या बीजाक्षरांची योजना पाहिली की पुस्तकाचे ‘बीजाक्षरांचा व्यावहारिक मंत्रकोश’ हे नाव तर खूपच समर्पक वाटते.
इति बीजाक्षर व्यवहार मंत्रकोशस्य परिक्षण समाप्ता ! ओSम् टण् !

सुखाच्या शोधात

रेडवुड सिटी

किती हा पसारा! कसा झाला,कुणी केला समजत नाही.शिस्त म्हणून काही नाहीच कुणाला. असे मी किती वेळा स्वत:शी म्हणालो असेन सांगता येणार नाही. हिंमत धरून कधीआवरायला घेतला पसारा की जसा आवरावा तसा तो वाढतोच आहे हे पाहिल्यावर प्रथम दुसऱ्यावर, मग स्वत:वर चिडचिड सुरू! लक्षात येऊ लागते, अरे हा मीच जमा केलेला पसाराआहे. आवरू आवरू म्हणत डोंगर झाल्यावर नाईलाज म्हणून सुरवात होते.

प्रत्येक वस्तु पाहत,ती लावून ठेवताना ‘हे केव्हा घेतले?’ ‘अरे इथे पडले होते का? किती हुडकत होतो!’ ‘आणि ह्या वह्या सापडल्या की! इथे सांदीत कुणी टाकल्या इकडे? किंमत नाहीमाझ्या लिखाणाची.’ मग ते वाचत बसतो. एक फोटो हाताला लागतो. खाडकन जागा होतो! कुणाचा हा? माझाच? बरं झाले ह्या अडगळीत होता.पोरांनी पाहिला तर हसून हसून मलावेडे केले असते. लपवून ठेवू का फाडून टाकू ? हे हॅम्लेटचे स्वगत पंधरा मिनिटे म्हणत बसतो. त्यामुळे निश्चित काहीच ठरवता येत नाही. तो फोटो मी तिथेच आणखी खोल खालीखुपसून ठेवतो. दुसरे काही एखादे टाकायचे म्हणून बाजूला भिरकावतो. पुन्हा आणखी दुसरे काही सापडले की ते अगोदर टाकलेले लागेल त्यासाठी म्हणत पुन्हा आणून ठेवतो. हळूहळू टाकून द्यायचा ढिगारा पुन्हा कमी होऊ लागतो. आणि इकडे पसाऱ्याचा ढीग वाढत जातो! पुन्हा चिडचिड! पुन्हा लक्षात येते की ह्यातला जास्त पसारा माझाच आहे. मग तो नीटलावायला परत सुरवात. एखादे पुस्तक पाहिले की अरे हे आपल्याकडे आहे?! असे म्हणत स्वत:च्या आणि त्या पुस्तकाच्या कौतुकातच वेळ घालवतो.होते काय तर पसारा आवरणेआणखी काही दिवस पुढे ढकलले जाते!

हे सर्व डोक्यात आणि डोळ्यासमोर येण्याचे कारण म्हणजे मी Paula Poundstone चे The Totally Unscientific Study ofThe Search for Human Happiness( घ्या, थोडेपाणी प्या; नाव वाचून झाले ना?) हे पुस्तक वाचत होतो. त्यातले To Get Organized for Happiness Experiment हे प्रकरण वाचत होतो. वाचताना हसत होतोच. कारणआपल्या प्रत्येकाचे ते प्रकरण आहे!

लेखिका गेली तीस वर्षे एकपात्री विनोदी कार्यक्रम करत आहे. NPR रेडिओवर काही वर्षे Wait, Wait… Don’t Tell Me ह्या लोकप्रिय कार्यक्रमात मुख्य भाग सांभाळत आहे. तिलातीन मुले, आणि तिची १६ मांजरे आणि३ कुत्री आहेत! तिला एकदा विचारले ,” की तुमच्याकडे सोळा मांजरे कशी झाली?” ती म्हणाली, ” अगोदर पंधरा होतीच,आणखी एकआणल्यावर सोळा झाली!”

हल्लीची लहान मुलेच नाही तर तिची कुत्र्यांची पिलेही किती पटकन शिकतात ते सांगताना, “आम्ही नुकतेच एक पिलू आणले. काही दिवसातच तो बरेच शब्द शिकला. त्यालासमजूही लागले.” खाली”, “बस”, ” चल आता”, “थांब”…., “मायक्रोसाॅफ्ट वर्ड्स” !!…

गेली काही वर्षे,  माणसाने आनंदी कसे राहावे, आनंद कसा मिळवावा, आपल्यापाशीच आहे तो कसा शोधावा, ‘साध्या गोष्टीतही आनंद किती आढळे’, ह्यातून ‘आनंद मिळवा सुखीआयुष्य जगा,’अशी एक ना दोन भाराभर पुस्तके, शिवाय जगभरचे मानसशास्त्रज्ञ आनंद,सुख यावर संशोधन करत आहेतच. त्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध होत असतात. अनेक विद्यापीठात’सुखाच्या शोधाचे’ अभ्यासक्रम चालू झाले आहेत.त्यासाठी परिक्षा नाहीत. चर्चा, परिसंवाद, व्याख्याने अनेक गोष्टींचा त्यात समावेश असतो. इतके झाल्यावर विनोदी लेखक,कलावंत  हा विषय सोडतील का?

आनंद, पाऱ्यासारखी निसटतीच नाही तर,वाफेसारखी लगेच उडून जाणारी भावना आहे. आनंद मिळतो. पण फार काळ राहात नाही. आईन्स्टाईनने दिलेले काळाच्या सापेक्षतेचेउदाहरण समर्पक आणि बरोबर असले तरी आनंद टिकाऊ नाही हे खरे. तसा तो असता तर तुकाराम महाराज,” सुख पाहता जवा एव्हढे” म्हणाले असते का? आणि  “शंभर धागेसुखाचेच” झाले असते की!

पाॅला पाॅऊंडस्टोनही म्हणते की दीर्घकाळ टिकाऊ सुख कुणाला मिळाल्याचे कानावर आले नाही.पुढचा षटकार ठोकताना म्हणते,” टिकाऊ सुखानंदासाठी viagraचा शोध अजूनकसा नाही लावला कुणी !” पण पुढची दोन वाक्ये वाचल्यावर लेखिकेचे मन समजू लागते.”मी खरीच सुखी झाले तर मला गाडी ठेवण्याची जागा मिळायला किती वेळ लागलाअसता कोण जाणे!” आणि म्हणते,  “आता मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की गाडी लांsब दूर ठेवून चालतच जावे असे वाटते.”

तिने आपला आनंद कोणकोणत्या गोष्टीतून मिळवण्यासाठी किती प्रयोग केले त्याचे प्रकरणवार, खुमासदार वर्णन विनोदी शैलीत लिहिले आहे. शास्त्रीय प्रयोगाप्रमाणेच तिनेप्रकरणांची सुरवातही उद्देश, मध्ये-मध्ये निरीक्षण १, २ असे नोंदवत ती अखेर निष्कर्ष सांगते.ती निरीक्षणे आणि निष्कर्ष वाचण्यासारखी आहेत. काही तर वचने वाटावीत अशीवैचारिक तर काही हृदयस्पर्शी आहेत. सुख मोजण्याचे तिने तिचे मापही शोधले आहे. त्याला ती hepम्हणते. चमचाभर, चिमूटभर किंवा एक लिटर,किलो काहीही समजा. अखेरआपण आपले सुख कसे मोजतो त्यावर अवलंबून आहे.

“आपण ज्यांना ओळखत नसतो इतकेच काय जे आपल्यासारखे दिसत नसतात, आपल्यासारखे राहात नसतात त्यांच्या सुखाशी,आनंदाशी आपला आनंद अतिशय निगडीत असतोअसे सत्य लिहून जाते.मुलांच्या सहवासात राहून आनंद मिळवण्यात्या प्रयोगात ती आणि मुले ठरवतात की एक संपू्र्ण दिवस-२४ तास-आपण सगळ्यांनी मिळून सिनेमा पाहायचे.ठरले. मग एक दोन सिनेमा झाल्यावर एक मुलगा, हा पाहू या म्हणतो त्यावर  बहिण हा नको तो बघू या म्हणते.  दुसरी बहिण लगेच तिसराच सुचवते. हे अधून मधून चालतच होते.पण लेखिकेने हा पाहू या म्हटले की मात्र तिघेही एकासुरात कडाडून विरोध करायचे. हेही बरेच वेळा होते. ह्यावर लिहिताना पाॅला पाउंडस्टोन निरीक्षण लिहिते:- “आईबापांना जेआवडते ते आपल्याला आवडत नाहीच, त्याची कधी मजा घ्यायचीच नाही हे मुलांनी किती कायमचे ठामपणे ठरवले असते!”  पण त्यानंतर,तीच पाॅला, आपण इतकी वर्षे ज्यामुलांना रोज दोनमैल तर कुणाला पाच मैलावरच्या शाळेत सोडायचो, पुन्हा निरनिराळ्या वेळी जाऊन त्यांना घरी आणायचो, ती मुले शिकण्यासाठी दूर गेल्यावर, “मला चांगलास्वैपाक करता येत नाही.पण घरात मुले नसली की स्वैपाक करण्यातही काही अर्थ उरत नाही” ही सर्व आयांची खंत  पाॅलाही व्यक्त करते.

लेखिका काही वेळा अशी शब्दयोजना करते की ती वाक्ये जास्तच चटकदार लागतात. दरवर्षी आपल्या मुलाचे प्रगती-पुस्तक पाहताना, जबरदस्त फी उकळणाऱ्या खाजगीशाळेविषयी ती,it’s an “Expensive Disappointment ” म्हणते. तसेच ती सकारात्मक वृत्तीतून आनंद मिळतो हे ऐकल्यावर तो प्रयोग करण्यापूर्वी ,”Although negativity is my “native language….” असा शब्दप्रयोग करते!

घरातला पसारा आवरणे, तो पुन्हा नीट शिस्तीने व्यवस्थित लावणे ह्यामधून आनंद मिळवण्याच्या प्रयोगात तिची तीन चार दिवस चाललेली धडपड आणि दमछाक आणि त्याप्रयोगाचा बोजवारा उडाल्यावर  शेवटी तिची मुले तिला ऐकवतात, “आई, तू अगदी त्यांच्या नावाची अंगाई गात बसलीस तरी ही मांजरं त्यांच्या नावांच्या आद्याक्षराप्रमाणे रांगेतझोपणार ना-ही-त.”! हे ऐकल्यावरच ह्या प्रयोगाच्या अखेर तिने असा निष्कर्ष काढला असावा:- EXPERIMENTAL ERROR!

Get Over Here and Help for Happiness Experiment प्रकरण सुरवातीला जितके विनोदी आहे तितकेच ते नंतर हृदयस्पर्शी होत जाते. लेखिका लोकांसाठी काही करावे याउद्देशाने आपले platelets दान करण्यासाठी, म्हाताऱ्यांसाठी असलेल्या काळजीवाहू संस्थेत जाते. हा तिचा पहिलाच अनुभव असतो. तिथल्या परिचारिकांचा विक्षिप्तपणा वर्णनकेल्यावर तिला अर्ज भरायला देतात. त्यातल्या काही प्रश्नांनी ती चक्रावून जाते. एक प्रश्नात, काही देशांची नावे दिली होती आणि या देशात तुम्ही कधी संभोग केला होता काअसेविचारले होते! बाई तीन ताड उडालीच! अर्ज भरून झाला. प्लॅटलेटसही दिले. काही महिन्यांनी बोलावले. पुन्हा अर्ज भरणे, पुन्हा तोच प्रश्न पण देश निराळे! तिसऱ्यांदा ती गेली. पुन्हाअर्ज भरणे आणि पुन्हा तो प्रश्न पण ह्या खेपेला निराळ्याच देशांची नावे! ती म्हणते “१२७ देशात माझा शरीरसंबंध नाही झाला ही माहिती मला आताच मिळाली! किती हायसंवाटले!”  पण जेव्हा “तुमच्या platelets मुळे पेशंट बरा झाला, त्याबद्दल आमची संस्था आणि पेशंट,तिची मुले नातेवाईक आभारी आहेत.” हे पत्र वाचल्यावर तिला झालेला आनंदपाहून आपल्यालाही बरे वाटते. त्याच संस्थेत ती काही महिने त्या म्हाताऱ्या लोकांसाठी स्ययंसेविका म्हणून काम करते. त्यांच्याशी ती फुगा हवेत उडता ठेवायचा खेळ खेळते. त्यांनाती लहानपणीची गाणी म्हणायला लावते. विस्मरणाचा आजार झालेल्या पेशंटलाही ती बालगीते आठवतात! लहानपणी तरुणपणी ऐकलेली,आवडलेली गाणी, कविताडिमेन्शियाच्या रुग्णालाही आठवतात हे गीत संगीताचे अदभुत वैशिष्ठ्य म्हणावे लागेल! “Home On The Range” हे गाणे झाल्यावर कधीही न बोलणारी फिलीस हळूकुजबुजत्या आवाजात म्हणाली. “I am from the range.” (युटाहची) आणि बाळपणीच्या काही आठवणी सांगू लागली. ‘मौलिक निरीक्षण’ समोर लेखिका लिहिते,” फिलीसशीजो संवाद झाला त्याचा कमीत कमी तीन हेप्स आनंद झाला! ”

पुस्तक वाचताना थंडीतील सकाळच्या उबदार उन्हात, किंवा उन्हाळ्याच्या दिवसात वाऱ्याची हलकीशी झुळुक झेलत समुद्राच्या किंवा नदीच्या काठी आपण फिरत आहोत असेवाटते. मंगला गोडबोले यांचे झुळुक किंवा पद्मजा फाटक यांचे गर्भश्रीमंतीचे झाड, या पुस्तकांची आठवण होते. हे पुस्तक वाचताना मलाही ‘काही heps आनंद झाला! ‘

विज्ञानात संशोधन करताना किती वर्षे संशोधन चालले होते; प्रयोगासाठी गिनिपिग्स किंवा इतर प्राण्यांचा वापर केला नाही असे जाहीर केलेले असते. तसेच लेखिकेने इथे गमतीनेलिहिले आहे की संशोधनात एकाही डाॅल्फिनचा वापर केला नाही! डाॅल्फिन सगळ्या माशांत आनंदी आहे हे लक्षात घ्यायचे.

योगायोग पहा,येव्हढ्यात लक्षात आले होते की तिने प्रस्तावनेत किंवा शेवटी “माझा कार्यक्रम तिकडे आहे तिथे जरूर या” असे गमतीने लिहिले आहे. तर आज वर्तमानपत्रात, ३१डिसेंबरला सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये पाॅला पाउंडस्टोनचा एकपात्री कार्यक्रम आहे हे आताच वाचले !

पंगतीची रंगत-संगत

साग्र-संगीत चारी ठाव स्वैपाक भुकेला चेतवत होता
डावी उजवी बाजू सजलेले ताट भरगच्च भरले होते रांगोळीच्या मखरात ते विराजमानही झाले होते

खमंग पदार्थ पक्वान्नांचा मधुर सुवास दरवळत होता
उदबत्तीचा सुगंधही त्या घाईगर्दीत मिसळत होता
चटण्या रायती कोशिंबिरी कुरड्या पापड भजी वडे सांडगे लोणची कोरसमुळे सारे संगीत साग्र होते

आमटी पंचामृत एकूण लिज्जत वाढवत होत्या
खीर शेवया गव्हल्या माधुरी सर्वांना वाटत होत्या
सुवर्णरस वरणाचा आंबेमोहरावर ओघळत होता
सुगंध लोणकढ तुपाचा पंगतभर पसरला होता
वाफेसह मसाले भात भरभर वाढला जात होता
नारळाचा चव तुपाधारेने सुखावला होता
आमटी कटाची आपली सलगी पुरणपोळीशी वाढवत होती

चवड केशरी जिलब्यांची रचली कधी समजत नव्हती मठ्ठ्याची वाटी काठोकाठ लगबगीने भरत होती
ताटात गुलाबी गोल पुऱ्या परीसारख्या उतरत होत्या
वाटी भरल्या श्रीखंडाला गुदगुल्या करत हसवत होत्या लच्छीदार बासुंदीत चारोळ्या आरामात तरंगत होत्या
तुपात झिरपल्या पुरणपोळीपुढे सारी दुनिया फिकी होती मऊसूत गोडी त्या घासाला स्वर्गातही तोड नव्हती

गेल्या घटका आस्वादात मग आग्रहाच्या फैरी झडू लागल्या
“घ्या! घ्या! वाढा वाढा! आणखी वाढा” मैत्रीच्या लढती सुरु झाल्या
हसण्या ओरड्यात “पुरे!पुरे! नको आता फार झाले”
सगळे आवाज घासांमध्येच विरघळून गेले
सुग्रास रंग पंगतीचा चढत वाढत चढतच राहिला
मारा तो आग्रहाचा होता तसाच चालू राहिला

जेवण झाले… सगळेजण तृप्त झाले
पाने विड्यांची रंगू लागली … तक्क्यावरचे डोळेही हळू हळू मिटू लागले…
….तृप्त होऊन कधी झोपले
त्यांनाही ते नाही समजले…!

चौफेर, चतुरस्त्र … सगळे सगळे फिक्के

रेडवुड सिटी

एखादा ‘ राॅक स्टार’ गायक आपल्या आयुष्याविषयी काही लिहेल किंवा लिहू शकेल अशी त्याच्या चाहत्यांचीही फारशी अपेक्षा नसते. बरे त्याने लिहिले तरी त्यात काय असणार असे विशेष? त्याच्याविषयी किंवा ‘बॅंड ‘मधील सहकाऱ्यांविषयी किस्से, एकमेकांची, प्रतिस्पर्ध्यांची उणीदुणी, त्याच्याविषयी प्रसारात असलेल्या गप्पा, अफवा यांचे खुलासे किंवा समर्थन; त्यातच मालमसाला घालून फोडणी दिलेल्या एखाद-    दुसऱ्या गाण्यांची किंवा गाजलेल्या कार्यक्रमाच्या आठवणी. असेच काही असणार. हे सरासरी गृहित असते.

ब्रुस डिकिन्सनने लिहिले तरी ते असेच काही असणार असे समजण्याची चूक करु नका.

Iron Maiden ह्या ८०-९०च्या दशकातील जागतिक कीर्तिच्या गान-वाद्यवृंदाचा ब्रुस हा मुख्य गायक. रंगभूमीच्या ह्या कडेपासून ते त्या टोकापर्यंत सतत एखाद्या खेळाडूसारखा हा वावरतो. मध्येच ढांगा टाकीत, लांब उड्या, उंच उड्या मारतो. त्याच्या आवाजाची जात आॅपेरा गायकासारखी आहे. वर पर्यंत आवाज चढवतो. प्रेक्षकानांही तो मधून मधून, “माझ्यासाठी तुम्हीही आवाज चढवा; आणखी,आणखी वर!” असे आवाहन करत असतो. चाहतेच ते! दाद देणारच. आपल्या गाण्यांनी, आवाजाने श्रोत्या-प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या ब्रिटिश ‘राॅक स्टार ‘ने नुकतेच What Does This Button Do ? हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे.

ब्रुस हा प्रख्यात ब्रिटिश जगप्रसिद्ध गायक आहे इतकी ओळखही पुरेशी आहे. माणसाला काही मर्यादा असतात हे सर्वांनाच माहित आहे.तशीच चतुरस्त्रतेलाही मर्यादा असतात असा आपला सार्थ समज आहे. पण संगीताच्या क्षेत्रात ‘ ब्रुस ब्रुस ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वत: डिकिन्सनला अशा मर्यादा असतील ते माहितही नसावे!

ब्रुस हा गायक आहे. जोडीने गिटार वादनही आलेच. तो गीतकारही आहे. संगीतही तोच देतो. १९८०मध्ये सॅमसन्स बॅंड मधून त्याची कारकीर्द सुरू झाली. पण एका वर्षातच तो तिथून बाहेर पडला. Iron Maiden मध्ये आला. इथून त्याची चढती कमान सुरू झाली. किर्ती होऊ लागली,नावही झाले. हे एक झाले. पण त्याने बीबीसीसारख्या नामवंत संस्थेसाठी २००२ ते २०१० पर्यंत स्वत: चे संगीताचे कार्यक्रमबीबीसी म्युझिक६ वर केले. दूरदर्शनवर Documentaries पेश केल्या. त्यापैकी काहींचे लेखन-निवेदन त्यानेच केले आहे. डिस्कव्हरी चॅनलने हवाई-शास्त्राचा (विमाने व तत्सम वाहने) यांचा इतिहास या विषयावर एक मालिका केली. त्यात ब्रुस डिकिन्सनचा महत्वाचा सहभाग होता. त्यामध्ये त्याची Flying Heavy Metal ही film ही दाखवली होती. ही मालिका इंग्लंडमध्ये डिस्कव्हरी टर्बो या वाहिनीवरही प्रसारित झाली होती. म्हणजे तो दूरदर्शनवरचा स्टार आणि कार्यक्रमांचा प्रसारकही( broadcaster)आहे.

ब्रुस डिकिन्सनने टीव्हीसाठी काही लेखन केले आहेच. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ही की त्याने पुस्तकेही लिहिली आहेत! त्याचे पहिले पुस्तकThe Adventures of Lord Iffy Boctrace हे पुस्तक चांगले गाजले. त्याच्या पहिल्याच धडाक्यात ४०,०००प्रति खपल्यावर त्याच्या प्रकाशकाने – Sidgwic &Jackson- ह्या कादंबरीचा पुढचा भाग लगेच लिहायला सांगितला. ब्रुसनेही लगेच The Missionary Position लिहून दिली! ब्रुसने,ज्युलियन डाॅयल (हा दिग्दर्शकही आहे) बरोबर Chemical Wedding ही कादंबरी लिहिली. त्यावर सिनेमाही काढला. त्याची पटकथाही ह्या दोघांची आहे. आणखी एक पुस्तक  त्याच्या ‘बॅंड’ संबंधित असावे, Iron Maiden – A Matter of Life and Death हे पुस्तकही त्याने व त्याच्या सहकाऱ्याने मिळून लिहिले आहे.या काळातील दुर्मिळ वैशिष्ठ्य हे की तो आपले सर्व लिखाण आजही हातानेच लिहितो! अे-४च्या वह्याच्या वह्या भरून टाकतो.

ब्रुस डिकिन्सन हा बिअरचा चाहता आहे. त्यातूनच त्याने आपल्या चोखंदळ आवडीनिवडीतून एका बिअरची निर्मिती केली. प्रख्यात बिअर उत्पादक Robinson ह्यांच्या मद्यार्कशालेतील Marlyn Weeks  हा तज्ञ व ब्रुस यांनी मिळून Trooper नावाची बिअर निर्माण केली. तशीच बेल्जियमची अशी खास व प्रसिद्ध चवीची बिअर त्याने Hallowed नावाने  इंग्लंडमध्य् तयार केली. ट्रूपरची ४० देशात पहिल्याच वर्षी २५ लाख पिंटसची विक्री झाली होती!

डिस्कव्हरी चॅनलने हवाईप्रगतीचा इतिहास या मालिकेत ब्रुसचा जो लघुपट दाखवला त्यामागेही इतिहास आहे. ब्रुस डिकिन्सन हा वैमानिक आहे. तो काही काळ Astraeus Airlinesमध्ये वैमानिक होता. त्याच कंपनीत तो नंतर marketing Director ही होता. त्या कंपनीच्या एका ७४७-बोईंग विमानातून आपल्या बॅंडच्या सहकाऱ्यांना व कंपनीचे सर्व सामान,वाद्यांसकट, नेण्यासाठी त्याने आवश्यक बदल करून घेतले.त्या विमानातून त्यांच्या Iron Maiden चे जागतिक दौरे सुरुझाले. ह्या सर्व दौऱ्यात मुख्य गायक ब्रुस हाच मुख्य वैमानिकही होता! आपल्या विमानाचे नाव त्याने Ed Force Oneअसे ठेवले होते. त्या दौऱ्यापैकी बोस्नियातील सॅराजोव्ह ते इजिप्तच्या प्रवासाची ती फिल्म आहे. त्यावेळी त्या भागात युद्धाचेच वातावरण होते.
Astraeus बंद पडल्यावर त्याने स्वत:ची, Cardiff Aviation नावाची विमानांची देखभाल करण्याची कंपनी काढली. त्या कंपनीत ४०ते ६० लोक काम करत. ब्रुस डिकिन्सनने वैमानिक म्हणून फार महत्वाच्या कामगिऱ्या पाडल्या आहेत. इंग्लंडच्या सैनिकांना आणि ब्रिटिश हवाई दलाचा  वैमानिकांना अफगाणिस्तानातून सरक्षित आणण्याची कामगिरीही त्याने२००८ साली वैमानिक म्हणून पार पाडली आहे. २००६ मध्ये लिबिया आणि हेझबुलाह व इझ्रायलच्या लढाईमुळे लेबनाॅनमध्ये अडकून पडलेल्या २०० ब्रिटीश नागरिकांनाही त्याने विमानातून सुरक्षित परत आणले आहे. तसेच इंग्लंडचे  XL Airways चे विमान इजिप्तमध्ये पडले! त्यातील १८० प्रवाशांनाही ब्रुस डिकिन्सननेच परत आणले. इंग्लंडचे लिव्हरपूल व रेंजर्स या दोन फुटबाॅल संघाना त्याने २०१०मध्ये इटलीतील सामन्यासाठी व २००७ मध्ये रेंजर्सच्या संघाला इझ्रायलमध्ये नेले होते. दोन्ही वेळेस ब्रुसच वैमानिक होता. त्याहीपेक्षा महत्वाची कामगिरी म्हणजे दुसऱ्या महायुद्धातील हवाई लढाईच्या प्रात्यक्षिकांत एक लढाऊ विमान ब्रुसच चालवत होता. ते महायुद्धातील हवाई लढायांची पुनर्नाट्यनिर्मिती होती. त्यामध्ये राॅयल एअर फोर्सची लढाऊ विमाने सहभागी होती. त्यांच्यात ब्रुस डिकिन्सनला भाग घेण्याचा सन्मान मिळाला होता!

ब्रुस डिकिन्सन उत्तम तलवारबाजी -fencing-करतो. ब्रिटनमध्ये त्याने सातवा क्रमांक पटकावला होता.ह्या आवडीपोटीच त्याने तलवारबजीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याच्या निर्मितीचा उद्योग सुरु केला त्याची उत्पादने Duellistनावाने ओळखली जातात. तलवारबाजीकडे वळण्याचे महत्वाचे कारण सांगताना तो म्हणाला,”हा खेळ तुमची बुद्धी तलवारी सारखीच टोकदार आणि धारदार ठेवते. मन व शरीर त्या पात्यासारखेच लवलवते ठेवते. आणि मला हा खेळ आवडतो! ”

ब्रुस डिकिन्सनची अर्थातच उद्योजक अशीही ओळख आहे. त्या मुळे त्याला ठिकठिकाणी भाषणे देण्यासाठीही आमंत्रणे असतात. ठळक उदाहरणे द्यायची तर २०१२ मध्ये क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, लंडन येथे तर २०१३ Connect2Buisness स्टाॅकहोम येथे, तर २०१५ मध्ये युरोपच्या Aviation Week’s च्या काॅन्फरन्समध्ये आणि मुंबईत २०१५साली त्याला Blog Now and Live Foreverमध्ये Key Speakerम्हणुन बोलावले होते. वर सांगितलेल्या ठिकाणीही तो बीज-वक्ता म्हणूनच आमंत्रित होता.

एकाच माणसाची किती रूपे किती व्यक्तिमत्वे! सप्तरंगी की शतरंगी म्हणावे ; अष्टपैलू,की शतपैलू; चौफेरी, चतुरस्त्र, चौपदरी का अष्टपदरी अशा कोणत्या शब्दांत ह्या माणसाला वर्णावे हा प्रश्न पडतो की नाही? कोणत्याही विशेषणांच्या आवाक्यात न येणारे हे व्यक्तिमत्व आहे.

परवा, दोन नोव्हेंबरला हा सॅनफ्रान्सिस्कोला आला आहे.गाण्याच्या कार्यक्रमासाठी पण त्याचबरोबर त्याच्या आत्मचरित्राच्या विक्रीवाढीसाठीही. जवळच असलेल्या मेन्लो पार्क या गावातील केपलर या दुकानात तो २तारखेलाच सही करून पुस्तके देणार होता. पण त्या अगोदर त्याचे भाषणही होणार होते. या कार्यक्रमाला १५डाॅलर ते ५० डाॅरची तिकीटे होती! हा कार्यक्रम कमी उत्पन्नाच्या गटातील मुलांची वांड.मयीन, वाचनाची, लिहिण्याची आवड वाढावी, प्रत्यक्ष उत्तेजन देण्यासाठी आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी होता.

चतुरस्त्र,अष्टपैलू,हरहुन्नरी याशिवाय आणखीही कोणत्या विशेषणांनी–या नामवंत गायक,गीतकार, संगीतकार, टीव्ही कलाकार, निवेदक, टीव्हीवर प्रश्नमंजुषा,संगीताचे असे विविध कार्यक्रम करणारा, निवेदक, कथा पटकथा लेखक, लेखक, वैमानिक, उद्योजक, वक्ता, बिअर उत्पादक, तलवारबाजीत निपुण, इंग्लंडतर्फे तलवारबाजीत आॅलिंपिक संघात निवड झालेला अशा,–ब्रुस डिकिन्सनचे वर्णन कुणाला करता येईल का याची शंकाच आहे!

त्याच्या पुस्तकाचा कार्यक्रम सिलिकाॅन व्हॅलीच्या मेन्लो पार्क गावात असूनही सर्व तिकीटे अगोदरच संपली कशी या प्रश्नावर ब्रुस म्हणाला,” रॅप आणि कंट्री संगीताच्या ललाटेच्या जमान्यातही Iron Maiden सारख्या hard metal bandच्या कार्यक्रमाला आजही सगळीकडे गर्दी लोटते. माहिती तंत्रज्ञांचे गाव असले तरी संगीत कुणाला आवडत नाही? १५ वयाच्या मुलांपासून ते पन्नाशीतल्या CEOपर्यंत माझे चाहते आहेत.”

काही दिवसांपूर्वी इथल्या मोठ्या वर्तमानपत्राने त्याची टेलिफोन वरून मुलाखत घेतली होती. त्याला विचारले की ” अजून ५९ वर्षेही झाली नाहीत तरी एकदम आत्मचरित्र का लिहायला घेतले. तो म्हणाला,” हीच योग्य वेळ आहे. पहिल्यापासून मला प्रत्येक काम, गोष्ट भराभर, कमीतकमी वेळेत आणि वेळच्या वेळी झाली पाहिजे असे वाटत असते. तसे मी करतोही.नुकताच माझा घशा,मानेचा कॅन्सर बरा झाल्याचा निर्वाळा डाॅक्टरांनी दिला. पहा बरे, गंभीर गोष्टीचा शेवटही आनंदाचा झाला. मग लिहिता लिहिता माझे आत्मचरित्रही याच आनंदाच्या टप्याशी आले हे किती छान झाले!”

माझे शिनिमाचे गाव ३: पिक्चर चालू होणार!

माझ्या शिनिमाच्या गावाकडील ह्या गोष्टी साधारणत:१९४५ते १९५७ ह्या काळातील आहेत.
‘शांतता पाळा’ किंवा ‘ शांत रहा’ ही पाटी पडद्यावर स्थिरावली की थिएटरमध्ये शांतता पसरे. न्यूज रिव्ह्यू सुद्धा शांतपणे बघत. पं नेहरु किंवा सरदार पटेल बातमीत दिसले की लोक टाळ्या वाजवत. मुले, तरूण पोरे,अखेरीस क्रिकेटच्या मॅचची मग ती रणजी असो की टेस्ट असो मोठ्या उत्सुकतेने व “वारे पठ्ठे! बाॅन्ड्री हाणली!” किंवा कुणाची ताडकन् दांडी उडाली की हेच ‘हंपायर’ होत बोटे वर नाचवत ‘आउट; आउट’ अशी जिवंत दाद देत! पण खेळाची बातमी फार थोडा वेळ असणार ही चुटपुट असतानाच आता ‘पिच्चर’ सुरु होणार ह्याचाही आनंद होई!

पिक्चर सुरु झाला! प्रभात असेल तर बहुतेक वेळा प्रभातची तुतारी वाजायला सुरुवात झाली की टाळ्यांचा कडकडाट! चित्रा टाॅकीज असेल तर राजकमलची, कमळात उभी असलेली,जलतरंगाच्या मधुर संगीतावर एक कमनीय स्त्री ओंजळीतून फुले टाकताना दिसली की जोरात टाळ्या पडत. चित्रमंदिर, छाया अथवा कलामंदिर असेल तर महेबुब प्राॅडक्शन्स चा कणीस असलेले विळाकोयता दिसला आणि त्याच बरोबर ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता, वही होता है जो मंझुरे खुदा होता है ‘ हे आमच्या गावचे प्रेक्षक केवळ ऐकतच नसत तर त्याच्याबरोबर म्हणतही असत! तसेच भागवत मध्ये राजकपूरचा सिनेमा सुरु होण्या अगोदर भरदार व्यक्तिमत्वाचे पृथ्वीराज कपूर शंकराच्या पिंडीवर फुले वाहताना गंभीर आवाजात ‘ॐनम:शंभवाय, शंकराय … नम: शिवाय , नमो नम:नमो म्हणायला लागले की आमचे प्रेक्षकही एक एक मंत्र म्हणत शेवटी त्याच्यासारखाच आवाज काढत नम:नमो मंत्र म्हणत थेटरचा ‘गाभारा’ भरून टाकत! मीना टाॅकीज असेल तर जेमीनीची दोन बाळे गोल फिरत बिगुल वाजवताना दिसली की आता भव्य दिव्य पाहायला मिळणार ह्या खात्रीने टाळ्या वाजवत.

इथेच सहभाग थांबत नसे तर शांताराम बापूंचा सिनेमा असेल तर त्यांच्या कल्पक टायटल्सलाही टाळी पडे. संत सावता माळ्याच्या कथेवरील ‘भक्तीचा मळा’ च्या सुरवातीलाच विहिरीतून तुडुंब भरलेल्या मोटेतले पाणी रतनबाव मध्ये लोटू लागले की लोट पुढे येताच त्यावर भक्तीचा मळा ही अक्षरे नाचू लागत की पुन्हा टाळ्या पडत.

शिनेमाच्या गावचा अभिमानही बरेच वेळा स्पष्ट प्रकट होई. चित्रा टाॅकीजमध्ये ‘डाॅ. कोटणीस की अमर कहानी’ सुरवातीच्या दृश्यातच जेव्हा त्यांच्या घरचा टांगेवाला विचारतो,” क्या आप शोलापूर में डाक्तरी नही करोगे?” डाॅ. कोटणीस उत्तर देताना “ नही मै शोलापूरमें डाॅक्टरी नही करूंगा!”” ह्या संवादात शोलापूर नाव आले की लोक टाळ्यांचा कडकडाट करून चित्रा टाॅकीज दुमदुमून टाकीत. तीच गोष्ट ‘लोकशाहीर रामजोशी’च्या नामावलीनंतर ‘सोलापूर शके १७०७’ हा फलक झळकला की सगळे प्रेक्षक तो मोठ्याने वाचत व टाळ्या कडाडू लागत!

प्रत्यक्ष सिनेमा सुरु झाल्यावर थेटर शांत असे. अेक दोन दृश्ये शांततेत जात. पण ‘पतंगा’सिनेमात निगार आणि याकूबचे ‘ओ दिलवाले दिलको लगाना अच्छा है पर कभी कभी’हे गाणे सुरु झाल्यावर निगारची ओळ संपल्यावर याकूबला “पर कभी कभी” म्हणावे लागायचे नाही. प्रेक्षकच”पर कभी कभी” कोरसने म्हणत. आरपार मधील ‘कभीआर कभी पार पार लागा तीर-ए-नजर’ म्हणत डोक्यावर पाटी घेतलेली कुमकुम (त्यावेळी ती एक्स्ट्रा होती!)दिसली किंवा ‘ये लो मैं हारी पिया’ हे श्यामाच्या अदाकारीतले गाणे, किंवा ‘मैं आवारा हूॅं’ हे गाणे सुरु झाले की राजकपूरला एकदोन ओळीच म्हणाव्या लागत. नंतरचे गाणे राजकपूरचे किंवा मुकेशचे राहिलेलेच नसे! प्रेक्षकांनी त्यातील ‘ट्यूॅंऽ डिरुरु’ ह्या म्युझिकसह कधीच म्हणायला सुरवात केलेली असे! ‘नागीन’मधले जादूगर सैया छोड मेरी…’ ह्या गाण्यातले ‘हो गयी आधी रात अब घर जाने दो’ ह्या विनवणीवजा ओळीला लगेच “मग आता कुठे जाते? राहून जा इथेच” असे ‘जादूगर सैया प्रदिपकुमार’ ऐवजी आमचे प्रेक्षकच वैजयंतीमालेला रोज आग्रह करीत!

आमच्या शिनिमाच्या गावचे दर्दी प्रेक्षक कोरसही गात असत. मग ते राजकपूरच्या बरसात मधील ‘तक नी ना धिन्न’ असो अगर आनंदमठ मधील ‘वंदे मातरम वंदेमातरम’ असो (सक्ती नव्हती तरी!) मनापासून साथ देत. कोरस नुसता ‘हमिंग’ असले तरी प्रेक्षक तोंड मिटून ‘हुॅं हाहाआआ’ असे त्या कोरस बरोबर आवाज काढत.’एक थी लडकी’ मधील ‘लारा लप्पा लारा लप्पा लाई रख्खा दा’ गाण्याला तर संपूर्ण थेटराची ठेक्यात साथ मिळेच पण काही प्रेक्षक उभे राहून ‘आज कल की नारीयाॅं ‘ ओळ सुरु झाली की त्याप्रमाणे हातवारे करत कडवे म्हणायचे! सिनेमा तर करमणूक करत असेच पण लोक स्वत: त्यात सामील होऊन आपली आणखी करमणूक करून घेत!

महंमद रफीच्या गाण्यांना तर प्रत्येक टाॅकीजमध्ये सामुहिक साथ मिळे. बऱ्याच गाण्यांत रफीचा आवाज खूप उंच चढतो.आवाज चढवण्यात रफीचा हात कोण धरू शकेल? प्रत्येक कडव्याच्या अखेरीस तार सप्तकात जायचा आणि शेवटच्या कडव्यात तर तीव्र तार सप्तकातच चढायचा. ‘ओ दुनियाके रखवाले’ ह्या गाण्याच्या पहिल्या कडव्याच्या ‘अब तो नीऽर बहाऽऽलेऽऽऽ पाशी चढायचा तेव्हा ते शेवटच्या ‘महल उदास गलीयाॅं सुऽनी’ सुरु झाले की जणू वाट पाहात असलेले आमच्या सिनेमाचे गाववाले ‘मंदिर बनता फिर गिर जाता’ पासून सरसावून खुर्चीच्या कडेपाशी येत येत ‘ओ दुनियाकेऽऽरखवालेऽऽऽ रखवाऽऽलेऽऽऽ रखवालेऽऽऽऽऽह्या अखेरच्या ओळीला तर महंमद रफीला,आपले आवाज एकवटून,तार सप्तकाचा हिमालय सर करण्यास मदत करीत! इतक्या चढलेल्या त्या आवाजाला जागा मिळावी म्हणून थिएटरचे छप्परही त्यावेळी वर जात असे!

महंमद रफीची तर अशी अनेक गाणी आहेत. त्या प्रत्येक गाण्यांत आमचे दर्दी रसिक त्याला आपल्या आवाजांची साथ देऊन तीव्र तार सप्तक गाठण्यासाठी त्याच्या मदतीला धावून गेले आहेत! आमच्यातल्या साध्या सिनेभोळ्या रसिकांना महमद रफीला दुसऱ्या गावातील थेटरात आवाजाची इतकी उंची गाठता येईल का ह्याची काळजी पडलेली असे!!

सिनेमातली हिराॅईन पडद्यावर असली की सर्व रसिक तिच्या प्रत्येक डौलदार हालचालीत गुंतून जात. त्यामुळे आपापसातल्या बडबडीला आळा बसे.हिरोबरच्या तिच्या दृश्यात थेटरातला प्रत्येकजण हिरो होऊन तिच्याबरोबर काम करू लागे. त्यात गाणे आले की मग विचारू नका. हिरोला बाजूला सारून तेच संवाद म्हणत. हिराॅईन बिचारी एक. तिच्यावर जान कुर्बान करणारे तिला व्हिलनपासून सोडवणारे, तिच्याशी झाडामागून लपंडाव खेळणारे, तिच्याबरोबर नावेत बसणारे, थेटरातला प्रत्येक हिरो पुढे असायचा. गाणे म्हणायचे. थिएटर पुन्हा मुकेश, रफी,तलत महंमद,मन्ना डेने भरून जायचे! किती सिनेमांची नावे घ्यायची! ‘प्यार की जीत’ मधली सगळीच गाणी हिट होती. किंबहुना त्यावेळच्या बहुसंख्य सिनेमातील गाणी हिटच असत. मग तो ‘दिल्लगी, दर्द, दीदीर असो की अंदाज, बावरे नैन, नागीन, अनारकली, अलबेला, नास्तिक,पतंगा,बरसात,आवारा, जाल,बाजी, आरपार, बैजूबावरा, कवि, बडी बहेन, शहनाई सरगम ‘ असो सर्वच सिनेमा गाण्यांमुळेही गाजलेले असत.

प्यार की जीत मध्ये महंमद रफी ‘एक दिलके टुकडे हजार हुए कोई यहा गिरा कोई वहा गिरा’ हे गाणे आमच्या गावचे लोक पहिले पाच सात आठवडे मनापासून ऐकत. नंतर मग हे गाणे सुरु झाले की आमच्या प्रेक्षकांच्या वाणीची रसवंती सुरु व्हायची! “ अबे तुझ्या बाजूला पडला बघ एक तुकडा उचल!” अबे तिकडे तीन चार पडलेत की रे ! गोळा करा बे सगळे तुकडे!” वगैरे सुरु व्हायचे! तर बडी बहेन मधले ‘छुप छुप खडे हो जरूर कोई बात है.. ….’ ही ओळ सुरु होण्यापूर्वी एक दोन सेकंद जी पेटी वाजवली आहे त्यावर प्रेक्षक शिट्या मारून आपल्या पसंतीची पावती लगेच द्यायचे. तर ‘भोली सुरत दिल छोटे नाम बडे…’ हे गाणे सुरू झाले की मा. भगवान बरोबर बरेचसे थेटरही ती सोपी पावले टाकत नाचायचे!!
आमच्या ‘शिनिमाच्या’गावातील थेटरांइतकी ‘सामाजिक रसिकतेची समरसता’ दुसरीकडे पाहायला मिळाली नाही.

काही वर्षांनंतर दुसऱ्या गावांत ‘देख कबीरा रोया’ प्यासा’ बरसात की रात’ ‘किंवा दिल ही तो है’ ‘ जिस देशमें गंगा बहती है’ असे सिनेमा पाहताना ‘माझ्या शिनेमाच्या गावा’ची आठवण यायची!

प्यासा पाहाताना जाॅनी वाॅकरच्या ‘चंपीऽऽतेऽल मालिऽऽश’ गाण्यात कोरस नसला तरी माझ्या शिनिमाच्या गावातील प्रेक्षकांनी नक्कीच कोरस म्हटला असणार हे दिसायचे! तसेच शेवटचे गाणे ‘ये महेलों ये ताजों ये तख्तों की दुनिया’ हे गंभीर गाणे सुरू झाल्यावर पडद्यावरील सिनेमाच्या सभागृहामधील प्रेक्षक प्रथम चमकून नंतर कुतुहलाने माना वळवून हळूच उठून उभे राहतात त्या सीनला, तसे आमच्या शिनिमाच्या गावचे प्रेक्षकही मागे मशिनच्या प्रकाशाकडे बघून नंतर पडद्याकडे पाहात उठून उभे राहिलेले डोळ्यासमोर यायचे! शेवटी महंमद रफी जेव्हा जीव ओतून आवाज चढवत चढवत ‘जला दो जला दो ये दुनिया” म्हणायला लागला की आमच्या गावातले प्रेक्षकच त्याच्या मदतीला आपला आवाज मिसळवून गेले असणार ह्याची मला तिथेही खात्री होती!
‘देख कबीरा रोया’ मध्ये ‘ कौन आया मेरे मनके द्वारे’ ह्या गाण्यात अनुपकुमार जरूरीपेक्षा जास्त हावभाव करतोय हे लक्षात येते. त्यावेळेस ‘अबे माहित है बे तू अशोक कुमार किशोर कुमारचा भाऊ आहे त्ये; जरा सबुरीने घे” असे ‘माझ्या शिनेमाच्या गावचे’ लोक नक्कीच म्हणाले असतील असे राहून राहून वाटायचे!

तसेच ‘ जिस देश में गंगा बहती है’मध्ये ‘होठोपे सच्चाई होती है जहा दिलमें सफाई होती है’ ह्या ओळीला राजकपूर त्या लाजऱ्या लहान मुलीला कडेवर घेतो तेव्हा आणि पुढे ‘महेमाॅं हमारा होता है वो जानसे प्यारा होता है’ आणि ‘जादाकी लालच नही थोऽडेमें गुजारा होता है’ ह्या ओळ्यांना नक्कीच कडाडून टाळ्या पडल्या असणार हेही नक्की! त्याबरोबरच त्या ओळीही सर्वांनी राजकपूर बरोबर म्हणलेल्या ऐकू येत होत्या!

पण माझ्या शिनेमाच्या गावातील प्रेक्षक फक्त सिनेमातील गाण्या संगीताला ठेका धरून टाळ्या देण्या इतपतच रसिक नव्हते तर सिनेमातील इतर चांगल्या गोष्टींनाही ………..