Monthly Archives: March 2018

सायकलचे दिवस

Redwood City

सॅनफ्रान्सिस्को,रेडवुड सिटीमध्ये काही वर्षांपासून share the bike उपक्रम सुरु झाला. ठराविक रक्कम दिली की दिवसभर, अर्धा दिवस अथवा काही तास सायकल वापरायची. आताच समजले की पुण्यातही ही योजना सुरु झालीय.
फॅशनच्या बाबतीत -कपड्याची किंवा दागिन्यांची किंवा सदऱ्याच्या काॅलरची असो- पुन्हा त्याच जुन्या फॅशन नव्याने येतात असे म्हटले जाते. ते खरेही आहे. त्याची आठवण share the bike ऐकल्यावर झाली. मी शाळा काॅलेजात असतानाच नव्हे तर नोकरीच्या काळातही ही योजना होती.त्यावेळी योजना, उपक्रम , नाविन्यपूर्ण कल्पना किंवा ‘किती कल्पक असतात लोक ‘असले भारदस्त किंवा गौरवाचे शब्द नव्हते ह्यासाठी. साध्या बाळबोध,स्पष्ट शब्दांत, ‘ भाड्याच्या सायकली मिळण्याचे दुकान’ म्हणत. दुकानदार,”चौंडे सायकल मार्ट’ किंवा ” गोन्यल बंधू सायकल मार्ट” नाव लावून धंदा करत. चौंडेअण्णांच्या सायकली नव्या कोऱ्या दिसत. सायकलीचे भाडे दोन आणे तास किंवा स्पर्धेत एक आणा तास असे. क्वचित कोणी दिवसाचे भाडे ठरवून सायकल नेत. जितके तास तितक्या तासाचे ऱ्भाडे द्यायचे. सरळ व्यवहार.

हां, गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या आणि नसतातही! असत्या तर रामराज्याची कुणाला आठवण तरी झाली असती का? आम्हाला पहिला झटका बसायचा तो दहा पंधरा मिनिटे जास्त झाली तरी किमान अर्ध्या तासाचे भाडे भरावे लागे. ” पण मालक मी पावणे तीन वाजता नेली होती. तुमच्या दशरथला विचारा!” त्यावेळी दशरथ नेमका पंप घेऊन बाहेर कुणाच्या तरी सायकलीत हवा भरायला पळायचा! दशरथच तो, मालकापुढे तो धैर्यधर थोडाच होणार ! मग मुकाटपणे पैसे भरायचे पण ते देताना “मी तर ३:५०लाच सायकल आणली” असे पुटपुटलो तर “घड्याळ हाये का तुझ्याकडं?दुकानातल्या घडाळ्याकडे पाहात मालक विचारणार! “नाही. पण तुमचं घड्याळ पुढं आहे.” मालक म्हणणार, “अब्ये सायकल नेताना ह्येच होतं की.” चला जाऊ दे असे मनात म्हणत घाम पुसत बाहेर पडायचो.

नंतर त्या दुकानात न जाता रस्यासमोरच्या साळुंखेच्या दुकानातून घ्यायची. निघताना आठवण ठेवून,” किती वाजले?” विचारून घ्यायची. हापिंग करत चार चाकं पुढे गेल्यावर समजायचे की अरे मागच्या चाकात हवाच नाही! दुकानात जाऊन सांगितले हवा नाही म्हणून. ” पंम्च्यर केला काय तू, आं?” दोन नोकरांकडे बघून मालक तेच त्यांनाही पुन्हा सांगणार. एक नोकर लगेच म्हणणार “अरे! मी तर आताच पंप मारून ठेवलो की!” दुसरा नोकर लगेच ,” आणि हा बाद्दर हंपिंग करत करत मस्त गेला होता की!” मी गोरामोरा होऊन,”अहो मी इथुनच परत आलो की. हापिंग करत करत काय मी बाळ्याच्या ओढ्याला गेलोतो का? बाळ्याच्या ओढ्याला आमच्या गावचे स्मशान आहे! मग कुरकरत म्हंम्हद का ज्यालिंदर हवा भरून द्यायचे. सायकल परत द्यायला आलो.

सायकलचा प्रत्येक पार्ट तपासून त्यांनी ती घेतली. आणि नोकर मालकाकडे पाहून म्हणाला,” मालक पुढचा ब्र्येक नाही. माझ्या पोटात गोळा आला. दोन आणे तासाचे आणि दोन आणे ब्रेकच्या रबराचे. “चार आणे झाले.” मालकाने जाहीर केले. कुठले चार आणे देणार मी. तासाच्या वर होऊ नये म्हणून सगळ्या चढांवर जीव खाऊन खाऊन पायडल मारत मारत घामेघुम होऊन आलो होतो. टाॅलस्टाॅयच्या निघण्याच्या ठिकाणी सूर्य मावळायच्या आत पोचले पाहिजे म्हणून जणू रक्त ओकत पळत येणाऱ्या, शेतकऱ्याप्रमाणे मीही एक तास व्हायच्या आत धापा टातक आलो होतो. मालकाला म्हणालो,” मी ब्रेक कुठेही लावला नाही. पुढचा तर नाहीच नाही. तो तर कुणी लावतच नाही.” ” नाही, मीच तो पाडला हिथं दुकानात बसून.”मालक तिरके बोलत होता.बरीच बौद्धिक चर्चा आणि परिसंवाद व्हायचे. “लहान हायेस म्हणून सोडला. पण पुना न्येताना सगळी सायकल तपासून न्येत जा, काय?” हे ऐकून घरी यावे लागे.
त्यानंतर पुन्हा दुकान बदलायचे. आता गोन्यल कडून घ्यायची.

सायकली जुन्या असायच्या पण ही सर्व माणसे राजा आदमी वाटायची. शिवाय एक गोन्यल आमच्या भावाच्या वर्गात होता. तरीही किती वाजता घेतली, ब्रेक ची सगळी रबरं आहेत ना, सायकलची साखळी आहे ना पाहून घेतले. चाकं दिसत होती म्हणून ती पाहिली नाहीत! दोन्ही पायडलची एकेक रबर नव्हते. पण पायडल होती. जाऊ दे,असू दे म्हणत हापिंग करत सायकल वर टांग मारून निघालो. आज लांब जायचे होते. तरी पण अर्ध्या तासात परतायचेच ह्या निश्चयाने I can do, I can doघोकत निघालो. काय झाले कुणास ठाऊक. पायडल छान फिरू लागले पण सायकल पुढे जाईना. सायकलची साखळी घसरली होती. “अर्धा तास, अर्धा तास” स्वत:लाच बजावत साखळी बसवायला लागलो. पण मला काय जमते. पुढच्या चक्रावर बसवली की मागच्या लहान चक्रावरून घसरायची. दोन तीन वेळा प्रयत्नांती परमेश्वर म्हणत प्रयत्न करत राहिलो.पण ते फक्त प्रयत्नच झाले. माझ्याच बरोबरीच्या एका पोराने माझी खटपट पाहिली. काय केलं कुणास ठाऊक त्याने. पण दोन्ही चक्रांवर हात ठेवून बोटे सफाईदार फिरवून चेन बसवली. फार आनंद झाला. तरी पण तो आनंद त्याने फार काळ टिकू दिला नाही.” चेन बशिवता न्हाही येत; सायकल चालवतो म्हणे.” असे म्हणत माझी किडा-मुंगी करत तो माझ्यातली हवा काढून गेला.

मी निघालो. अर्धा तास, अर्धा तास असे बजावत चालवत होतो सायकल. थोड्याच वेळात एक चाक फुसफुसू लागले. पुन्हा धसका. पंक्चर नक्की. घाम पुसायचेही सुचत नव्हते. तशीच ढकलत रस्त्यावर,एका खोक्यावर पंक्चरवरील औषधोपचाराची सर्व औषधे नीट ठेवून, शेजारी मळकट पाणी भरलेली पाटी असलेला साधारणत: माझ्याच वयाचा छोटा शिलेदार होता. त्याला काय झाले ते सांगितले. त्याने चाक वगैरे काही न काढता फक्त हवा भरतात ते नाकाडे आट्या फिरवुन काढले. लाल रबराची लहानशी गुंडाळी पाहिली. ती गेल्याचे सांगितले. पंक्चर नाही ? पंक्चर नाही? ह्या आनंदात बेहोश होऊन, दोन तीन वेळा हेच विचारून त्याला सतावल्यावर तो म्हणाला, “ते माहित नाही. ही व्हालटूब गेलीय.” त्याने ती बसवली. हवा भरली. मी निघणार तेव्हा म्हणाला, “थोडं थांब.” त्याने दोन तीन ठिकाणी कान लावून हात वरून फिरवून हवा भरतात त्या नाकाड्यावर थुंकी लावून पाहिले. आणि मला जायला परवानगी दिली. एक आणा घेतला त्याने पण मला नामोहरम केले नाही.

पुन्हा दात ओठ खात सायकल दामटत निघालो. दुकानात आल्यावर इकडे न पाहता घड्याळाकडे पाहिले. आता माझी हवा पूर्ण गेली ! दोन आणे होते.एक आणा दुरुस्तीला गेला. अर्धा तासच काय त्याहून पंधरा वीस मिनिटे जास्तच झाली होती. पण गोन्यल बंधू दिलदार होते. मी एक आणा दिल्यावर,” हरकत नाही म्हणाले;पुढे बघू “.

सायकल दुरुस्तीचीही अशी लहान-मोठी, टपऱ्या, रस्त्यावर केवळ एक पंप घेऊन हवाभरून देणारी मुलेही असत. तर लहानसहान दुरुस्त्या पंक्चर काढून देणारी,खोक्यासह बसलेलीही मुले असत. त्यामुळे रस्त्यावर सायकल बिघडली तरी चिंता नसे. बरे दुरुस्त्या करणारे सर्व वयाचे होते. पण त्यातही दहाबारा वर्षांपासूनची मुलेही बरीच असत. दुरुस्ती म्हणजे पंक्चर काढणे, हीच जास्त असे. त्यामुळे ” पंम्चर काढून मिळेल” ही पाटी सगळीकडे दिसत असे.

पंक्चर काढताना पाहणे हा एक कार्यक्रमच असायचा आमच्यासाठी. पण आता माझ्यावरच बेतल्यामुळे धसका होता. एक जाडसर पाना, टायर आणि चाकाच्या खाचेत घालून दुसरीकडे कानशीसारखे पसरट हत्यार घालून आलटून पालटून ती हलवत, टायर चाका पासून थोडे सैल करून दोन्ही हातांनी आतली ट्यूब बाहेर यायची.ती निघाली की आमच्या चेहऱ्यावर अरे व्वा! असे भाव दिसायचे. मग तो मुलगा संपूर्ण टायरच्या आतून डाॅक्टर इतक्याच काळजीने हाताची बोटे फिरवायचा. चुक, तारेचा तुकडा,खडा वगैरे नाही ह्याची खात्री झाली की मग तो ट्यूबकडे वळायचा. दुसऱ्या घराण्याचा कलावंत ही क्रिया पंक्चर वगैरे काढून पुन्हा ट्यूब आत बसवण्यापूर्वी करायचा. पण हात की सफाई तशीच ! आता मुख्य कारवाईची सुरवात. प्रथम ट्यूब मध्ये हवा भरायची. की लगेच ती ट्यूब थोडीशी हवेत फिरवल्यासारऱ्खी करत पाण्याच्या पाटीत दोन्ही हातानी तिचा प्रत्येक भाग दाबत दाबत पाहत जायची.

आम्ही त्यावेळे पासून जे मान पुढे करून त्या पाटीमध्ये पाहायचो की अर्जुनानेही मस्त्यवेध करताना इतक्या एकाग्रतेने, पाण्यात दिसणाऱ्या फिरत्या माशाकडे पाहिले नसेल!
आणि पंक्चर सापडले की तो आम्हाला ती ट्यूब पु्न्हा पुन्हा दाबून त्या ट्यूबमधून वेगाने येणारे बुडबुडे दाखवायचा. लगेच तिथे मास्तरांप्रमाणे कार्बनच्या पेन्सिलीने सुरेख जांभळा गोल करायचा. पण तो कसबी कारागिर तिथेच थांबत नसे. सर्व ट्यूब त्या पाण्यात पोहल्याशिवाय आणि दुसरे पंक्चर नाही समजल्यावर तो निराशेने पाणी झटकायचा. आम्ही मात्र एकच पंक्चर म्हणत सुटकेचा निश्वास सोडायचो.ह्यानंतर तो cosmetic शल्यचिकित्सक व्हायचा. कानस काढून त्या गोलावर घासायला लागायचा.जोर अति नाही की वरवरचा नाही. ती ट्यूब पुरेशी खरखरीत झाली की ते छिद्र पुरेसे झाकले जाईल येव्हढा रबराचा तुकडा कापायला लागायचा.

ही कलाकारी पाहण्यासारखी असते. काही पंक्चरवाले- सर्जन चौकोनी कापतात तर काही गोल.पण तो चौकोनही अगदी काटकोन चौकोन नसायचा. त्याच्या चारी कोपऱ्यांना तो इतक्या सहजतेने गोलाई द्यायचा. कात्री एकदाही न थांबवता! सिनेमाच्या पडद्यासारखा दिसणारा तो तुकडा पाहात राहावा. आणखी दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याची कात्री. काय तिची धार असेल. ना मध्ये तिचे अडखळणे की दबकत बिचकत जाणे. हा कारागिर ती फिरवतोय का ती कात्री त्याचा हात धरून फिरवतेय समजत नसे! तसाच गोलाकार कापताना, तो तुकडा पहिल्याच प्रयत्नात गोल व्हायचा.पाहातच राहत असू आम्ही. तो तुकडा त्या ट्युबवर चिकटवणे म्हणजे पोस्टाचे तिकीट चिकटवण्याइतके गद्य काम नव्हते. बरेचसे पारदर्शक असणारे ते द्रव तो बोटाने त्या रबराच्या त्वचेला लावायचा. आणि त्यावर फुंकर घालून त्या छिद्रावर पटकन चिकटावयाचा. एकदा दोनदा बोटाने दाबायचा. पण ते grafting इकडे तिकडे सरकू न देता! अजून शस्त्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता cosmetic सर्जनचे काम संपले. आता orthopedic सर्जनची भूमिका तो वठवायचा.

वईसाचे ते हॅंडल एका फिरकीत तो वर न्यायचा; मधल्या ऐरणीवर तो त्या ट्युबचा भाग ठेवून वईसाच्या हॅंडलला अशी शैलीदार गिरकी द्यायचा की वईसाने त्या ट्युबला आपल्या तावडीत कधी घट्ट धरून ठेवले ते तिलाही समजायचे नाही. लगेच दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या सायकलकडे वळायचा. पुन्हा तो मोठा पाना व लोखंडी पट्टी आत बाहेर करत त्या टायरचे आतडे तो मोकळे करायचा. तोपर्यंत आमच्या ट्युबची सौदर्यशस्त्रक्रिया संपलेली असे. पुन्हा ट्युबचे आतडे जागी जायचे. हवा भरण्यासाठी दुसऱ्या कुणाला सांगितलेले असायचे.

हवा भरणारा कसरतपटू असे. साधा पंप तो काय आणि हवा भरणे असे किती तांत्रिक असते! पण नाही, हा त्यात आपले अभिनय कौशल्य, नृत्यकलेची ओझरती झलकही दाखवायचा. पंप मोठा. हा त्या पंपापेक्षा थोडा जाड!

पंपाच्या पायावर आपला पाय दाबून हा त्या पंपाचे हॅंडल धरून पंप पुढे मागे हलवत एक पाय मागे थोडा उंचावून दट्या दाबायचा. त्यावेळी मान खाली करून पुन्हा पटकन वर झटकवत, पदट्ट्यावर रेलून, तो वरचे हॅंडलसह पंप मागे पुढे करत दट्ट्या दाबणार. पाय मागे किंचित लंगडी घातल्या सारखा करत पुढे झुकणार आणि मागे येताना म्हंमद असेल तर केसाला झटका देणार; ज्यालिंदर असेल तर मान इकडे तिकडे फिरवत हसणार. पण हे दहा बारा वेळा इतके शिस्तीत चालायचे की पहात राहावे. मग आमच्यापैकी कुणीतरी मी मारु का पंप म्हटल्यावर हां म्हणायची ती पोरे. आम्हाला काय जमते त्यांचे भरतनाट्यम! ते नाट्य तर नाहीच पण पंपाचा तो दट्ट्याही खाली जायला दहा मिनिटे लागायची! थांबत थांबत तो खाली नेत असू. पंपातली हवाही हलायची नाही! ती मुले हसायची. ही विद्या तरी त्यांचीच,असे त्यांना वाटत असावे.

सायकली म्हणजे त्यावेळचे सर्वांचे वाहन होते. रिक्षा अजून आल्या नव्हत्या. बसचेही काही खरे नव्हते. बराच काळ त्या नव्हत्याही. त्यामुळे सायकल भूषण होते. ही सायकली भाड्याने देणारी दुकाने होती म्हणून अनेकांची मोठी सोय होती. लहान पोरांसाठीही एखाद्या दुकानात कमी उंचीच्या एक दोन सायकली दिसत.

नविन सायकल घ्यायची ठरले तर घरात कितीतरी अगोदर दिवस-रात्र चर्चा,वादविवाद,चिडाचिड, चालत असे. कुठल्या कंपनीची घ्यायची ह्यावर दोन तीन दिवस गुऱ्हाळ चालायचे. पण सायकल काही एक दोन वर्षे यायची नाही. तरी तिच्या गप्पा मात्र चवीने व्हायच्या!

रॅले, फिलिप्स आणि त्यानंतर हर्क्युलिस. तीन ब्रॅंड जोरात होते. रॅले नंबर एक. त्यातही तिच्यातील हिरव्या रंगाची सर्वांची आवडती. पण त्या फारशा मिळत नव्हत्या लवकर. बरं नुसती सायकल घेऊन चालायची नाही. त्याला दिवा पाहिजे. कायद्याने रात्री दिवा लावणे भागच होते. लहान कंदिलासारखे दिवे बहुतेकांचे असत. कायद्यापुरता प्रकाश पडे. पुढच्या चाकाच्या मर्डगार्डवर मिणमिणता पडला तरी “लै पावरफुल्ल” म्हणायला लागायचे. त्यानंतर आली चौकोनी लहान डब्याची बॅटरी. हॅंडलच्या खालच्या बाजूला हुकासारखी पट्टी असते त्यात ती अडकवायची. त्याचा उजेड बरा पडायचा. पण बॅटरी संपत आली तरी लोक वापरायचे. सिगरेटचे ऱ्थोटूक किंवा उदबत्तीचा विस्तव जास्त प्रकाशमान असेल. पण पोलिसाला दाखवायला पुरेसा वाटे. “आता बॅटरीचाच मसाला आणायला चाललोय” इतके सांगून सटकायला तो निखारा कामाला यायचा. काही खमके पोलिस मात्र,” अब्ये कुणाला ववाळाला निघाला तू ह्ये अगरबत्ती घ्येवूनआं? कानफटात हानल्यावर मग लाईटी चमकेल तुझा.” म्हणत पावती पुस्तक काढायचा.लगेच आमची खरी तत पप,तत पप ची भाषा सुरु व्हायची.

मागच्या चाकापाशी लावलेला डायनामो आणि पुढचा हेडलाईट ही खरी शान असायची. आणि त्यातही हिरवी रॅले! मग काय! हायस्कूल काॅलेजात तो सायकलवाला सगळ्याजणींचा स्वप्नातील राजकुमारच असायचा. सायकलची निगा राखणारे शौकिनही होते.त्यांची ती ‘जीवाची सखी’च असे. तिला रोज पिवळ्या मऊ फडक्याने(च) पुसायची. पण किती! चाकातली प्रत्येक तार चमचम करीपर्यंत. डोळे दिपून अपघात व्हायचे! इतकेच काय मागचे लोंबते रबरही साबणाने धुवून टाॅवेलने पुसून ठेवायचे. दर रविवारी,पिटपिट आवाज करणाऱ्या डबीच्या नळीतून तेल पाजायचे. त्या जागांची तांत्रिक नावे घेऊन गप्पा मारायच्या. “पायडल, हॅंडवेल सीट बिरेक” येव्हढा शब्दसंग्रह असला की सायकल चालवता येत असे. विशेष म्हणजे हेच शब्द वापरणारे सायकल चालवण्यात तरबेज होते.

दोन्ही हात सोडून भर गर्दीत शिटी वाजवत सायकल दडपून नेणे, किंवा मधल्या दांडीवरून ‘हॅंडवेलवर’ पाय टाकून आरामात उतारावरून जाणे,एकाच वेळी तिघांना घेऊन जाणे असले कसरतीचे प्रयोग हीच मंडळी करत. बाकी आम्ही फक्त सायकल या विषयावर दिवसभर बोलू शकत असू. फार हुषार असेल तर सायकलीत कुत्रे कशाला म्हणतात असा रहस्यमय प्रश्न विचारून कुणी तोंडी परीक्षा घ्यायचा. आम्ही त्याला हड् हड् करत टाळत असू. पण सीटला ‘सॅडल’ किंवा मध्येच ‘हब’ वापरून इंप्रेशन मारणारेही असत! बरे दिवा असूनही तेव्हढा रुबाब येत नसे.तो डायनॅमोचाच हवा. साखळीला गार्डची खोळ पाहिजे. तिही फक्त एका झाकणासारखी असली तरी लक्ष देत नसत मुले. पूर्ण दोन्ही बाजूनी चमकदार, चकचकीत, आणि चेनला पूर्ण झाकणाऱ्या,तिला कुलवंत घराण्यातली करणारे गार्ड असले की लोक सायकलकडे जरा दबून आदराने पाहायचे.

आता डोळ्यापुढे ती कायम नवी दिसणारी हिरवी रॅले, खटका दाबला की मागच्या टायरला डायनॅमो चिकटून चाक फिरले की मोठा लांब झोत टाकणारा मोटरच्या हेडलाईटसारखा दिवा, ते अंगभरूनआणि डोईवरून चेनने पदर घेतलेले शाही गार्ड, मागच्या चाकावर बसवलेले कॅरिअर, चिखल उडू नये म्हणून लावलेले मागच्या बाजूचे रबराचे झुलते पदक, टेल लॅम्प च्या तांबड्या चकतीचा कुंकवाचा टिळा लावलेले मागचे बाकदार मडगार्डआणि इतरांच्या घंटीपेक्षा वेगळाच आवाज काढणारी घंटी, सायकल उभी करायची तीही शैलीदार पद्धतीनेच आणि त्यासाठी तिला एक मुडपुन ठेवता येईल असा पाय जोडलेला; बेफिकिरपणे पण सहज,दिला न दिला,अशा झटक्याने तो खाली आणून त्यावर, पुढचे चाक मान वेळावून पाहते अशी ठेवलेली सायकल असल्यावर जगाचे राज्यही त्यापुढे तुच्छ असायचे.पण अशी सकलगुणमंडित,सालंकृत सायकल पहायला मिळण्यासाठी सुद्धा कुंडलीत योग लागत. दैवयोगाने आम्हाला शाळेत व काॅलेजात मोजून तशा दोन तीन दिसायच्या. बाकी बहुसंख्य सायकली चारचौघी सारख्याच; घंटी सोडून सगळे पार्टस् वाजणाऱ्याच !

माझा मित्र बंडूने चौडेअण्णांच्या दुकानातून नवी कोरी सायकल घेतली. तेव्हा त्याचे हॅंडल एकदम नव्या पद्धतीचे. त्याच्या दोन्ही मुठी मधल्या दांड्यापेक्षा वर आणि बाकदार होत्या. बसणाऱ्या स्वाराच्या दोन्ही हातांची महिरपी सारखी नक्षी व्हायची. रुबाबदार दिसायचा! सर्व मुले,सायकल नवीन आणि हॅंडल त्याहूनही नवीन म्हणून आणि सायकलवर बसलेला बंडूही स्टायलिश दिसायचा;त्यामुळे दोघांकडेही टकमक पाहायचे. प्रत्येक जण त्याला ‘एक चक्कर मारु दे रे’ म्हणत विनवणी करायचे. बंडूने सगळ्यांना ती फिरवायला दिलीही. नव्या सायकलमुळे एक दोन दिवस बंडूकडेच सगळ्यांची वर्दळ असायची!

गावात अजून मोटारी दिसत नव्हत्या. संपूर्ण गावात चार पाच असतील. त्याही सारख्या फिरत नसत. म्युनसिपालिटीचे दोन चार ट्रक असतील. पण त्या काही मोटारी नव्हेत. ते सायकलचे दिवस होते. त्याही अति झाल्या नव्हत्या. तसे म्हणायचे तर दोनच प्रकारचे लोक.चालणारे आणि सायकलवाले. नोकरीत असतानाही मी सायकल भाड्याने घेउन काम करीत असे. जळगावला आमच्या घराजवळ असलेल्या नाईकांच्या दुकानातून सायकल घेत असे. मी त्यांच्याच गल्लीतला आणि टाय बूट वगैरे घातलेला त्यामुळे नाईक बंधू मला नवी सायकल देत. ती देण्याअगोदर चांगली स्वच्छ पुसून, हवापाणी तपासून देत. आणि खरंच तशी कसलीही कुकरकु न करणारी सायकल चालवताना एक निराळेच सुख उपभोगतोय असे वाटत होते. कधीतरी माझ्यातला शाळकरी जागा व्हायचा. नाईकांना विचारायचा, “हिरवी सायकल नाही ठेवत तुम्ही?” त्या सज्जन भावांनी, ” नाही; पण आणणार आहोत आम्ही,” असे सांगितले. महिना दीड महिना उलटून गेल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितले. दहा पंधरा मिनिटांनी त्यांच्यातील एकजण,एक डौलदार वळण घेत हिरव्या सायकलवरून आला.पुन्हा एकदा फडक्याने पुसत ती मला दिली. त्या तरूण मुलांचा एव्हढा चांगुलपणा पाहून मन खरेच भरून आले होते त्या दिवशी.

चाळीसगावलासुद्धा मी सायकलवरून काम करत असे. स्टेशनच्या समोरच सायकलींची दुकाने होती. तो सिंधीही चांगली सायकल काढून द्यायचा. बामणोदहून भालोदला जायला त्या दिवसांत फार एसटी नव्हत्या. पण त्याबदली सायकलीचे दुकान होते. विशेष म्हणजे त्याकाळचे सायकलींचे ते u-Haul किंवा Enterprise, Herstz होते. बामणोद ची सायकल भालोदला देता येत होती! चार पाच मैल अंतर होते. तो दुकानदारही मला त्यातली बरी सायकल काढून द्यायचा. म्हणजे दोन्ही मडगार्ड थडथड करण्या ऐवजी एकच मडगार्ड आवाज करायचे. तसाच एक तरी ब्रेक लागत असे. रस्ता बरा होता. पण पावसाळ्यात उखडला जायचा. त्यामुळे घोड्यावर बसून चालल्यासारखे वाटायचे. मध्ये मध्ये सीटवर न बसता उंच होऊन चालवावी लागे. परतताना भालोदहून पन्हा सायकल घ्यायची आणि बामणोदला परत करायची. किती सोय होती!

आजही अनेक गावात त्यांची त्यांची चौडे सायकल मार्ट, गोन्यल बंधू,नाईक सायकल्स, इंडिया सायकल डेपो सारखी लोकोपयोगी दुकाने आहेत.

ते सायकलचे दिवस होते. दोनच प्रकारचे लोक होते. चालणारे आणि सायकलवाले.सायकलवाल्यांमधीलही बहुसंख्यांसाठी, Share the bike चे मूळ रूप “सायकली भाड्याने मिळतील” ही दुकाने केव्हढी सोय होती!

सायकलचे दिवस

Redwood City

सॅनफ्रान्सिस्को,रेडवुड सिटीमध्ये काही वर्षांपासून share the bike उपक्रम सुरु झाला. ठराविक रक्कम दिली की दिवसभर, अर्धा दिवस अथवा काही तास सायकल वापरायची.

आताच समजले की पुण्यातही ही योजना सुरु झालीय.

फॅशनच्या बाबतीत -कपड्याची किंवा दागिन्यांची किंवा सदऱ्याच्या काॅलरची असो- पुन्हा त्याच जुन्या फॅशन नव्याने येतात असे म्हटले जाते. ते खरेही आहे. त्याची आठवण share the bike ऐकल्यावर झाली. मी शाळा काॅलेजात असतानाच नव्हे तर नोकरीच्या काळातही ही योजना होती.त्यावेळी योजना, उपक्रम , नाविन्यपूर्ण कल्पना किंवा ‘किती कल्पक असतात लोक ‘असले भारदस्त किंवा गौरवाचे शब्द नव्हते ह्यासाठी. साध्या बाळबोध,स्पष्ट शब्दांत, ‘ भाड्याच्या सायकली मिळण्याचे दुकान’ म्हणत. दुकानदार,”चौंडे सायकल मार्ट’ किंवा ” गोन्यल बंधू सायकल मार्ट” नाव लावून धंदा करत. चौंडेअण्णांच्या सायकली नव्या कोऱ्या दिसत. सायकलीचे भाडे दोन आणे तास किंवा स्पर्धेत एक आणा तास असे. क्वचित कोणी दिवसाचे भाडे ठरवून सायकल नेत. जितके तास तितक्या तासाचे ऱ्भाडे द्यायचे. सरळ व्यवहार.

हां, गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या आणि नसतातही! असत्या तर रामराज्याची कुणाला आठवण तरी झाली असती का? आम्हाला पहिला झटका बसायचा तो दहा पंधरा मिनिटे जास्त झाली तरी किमान अर्ध्या तासाचे भाडे भरावे लागे. ” पण मालक मी पावणे तीन वाजता नेली होती. तुमच्या दशरथला विचारा!” त्यावेळी दशरथ नेमका पंप घेऊन बाहेर कुणाच्या तरी सायकलीत हवा भरायला पळायचा! दशरथच तो, मालकापुढे तो धैर्यधर थोडाच होणार ! मग मुकाटपणे पैसे भरायचे पण ते देताना “मी तर ३:५०लाच सायकल आणली” असे पुटपुटलो तर “घड्याळ हाये का तुझ्याकडं?दुकानातल्या घडाळ्याकडे पाहात मालक विचारणार! “नाही. पण तुमचं घड्याळ पुढं आहे.” मालक म्हणणार, “अब्ये सायकल नेताना ह्येच होतं की.” चला जाऊ दे असे मनात म्हणत घाम पुसत बाहेर पडायचो.

नंतर त्या दुकानात न जाता रस्यासमोरच्या स्वस्तिक किंवा साळुंखेच्या दुकानातून घ्यायची. निघताना आठवण ठेवून,” किती वाजले?” विचारून घेतले. हापिंग करत चार चाकं पुढे गेलो तर मागच्या चाकात हवाच नाही! दुकानात जाऊन सांगितले हवा नाही म्हणून. ” पंम्च्यर केला काय तू, आं?” दोन नोकरांकडे बघून मालक तेच त्यांनाही पुन्हा सांगणार. एक नोकर लगेच म्हणणार “अरे! मी तर आताच पंप मारून ठेवलो की!” दुसरा नोकर लगेच ,” आणि हा बाद्दर हंपिंग करत करत मस्त गेला होता की!” मी गोरामोरा होऊन,”अहो मी इथुनच परत आलो की. हापिंग करत करत काय मी बाळ्याच्या ओढ्याला गेलोतो का? बाळ्याच्या ओढ्याला आमच्या गावचे स्मशान आहे! मग कुरकरत म्हंम्हद का ज्यालिंदर हवा भरून द्यायचे. सायकल परत द्यायला आलो. सायकलचा प्रत्येक पार्ट तपासून त्यांनी ती घेतली. आणि नोकर मालकाकडे पाहून म्हणाला,” मालक पुढचा ब्र्येक नाही. माझ्या पोटात गोळा आला. दोन आणे तासाचे आणि दोन आणे ब्रेकच्या रबराचे. “चार आणे झाले.” मालकाने जाहीर केले. कुठले चार आणे देणार मी. तासाच्या वर होऊ नये म्हणून सगळ्या चढांवर जीव खाऊन खाऊन पायडल मारत मारत घामेघुम होऊनआलो होतो. टाॅलस्टाॅयच्या,निघण्याच्या ठिकाणी सूर्य मावळायच्या आत पोचले पाहिजे म्हणून जणू रक्त ओकत पळत येणाऱ्या, शेतकऱ्याप्रमाणे मीही एक तास व्हायच्या आत धापा टातक आलो होतो. मालकाला म्हणालो,” मी ब्रेक कुठेही लावला नाही. पुढचा तर नाहीच नाही. तो तर कुणी लावतच नाही.” ” नाही, मीच तो पाडला हिथं दुकानात बसून.”मालक तिरके बोलत होता. बरीच बौद्धिक चर्चा आणि परिसंवाद झाले. “लहान हायेस म्हणून सोडला. पण पुना न्येताना सगळी सायकल तपासून न्येत जा, काय?” हे ऐकून घरी यावे लागे.

त्यानंतर पुन्हा दुकान बदलायचे. गोन्यल कडून घेतली. सायकली जुन्या असायच्या पण ही सर्व माणसे राजा आदमी वाटायची. शिवाय एक गोन्यल आमच्या भावाच्या वर्गात होता. तरीही किती वाजता घेतली, ब्रेक ची सगळी रबरं आहेत ना, सायकलची साखळी आहे ना पाहून घेतले. चाकं दिसत होती म्हणून ती पाहिली नाहीत! दोन्ही पायडलची एकेक रबर नव्हते. पण पायडल होती. जाऊ दे,असू दे म्हणत हापिंग करत सायकल वर टांग मारून निघालो. आज लांब जायचे होते. तरी पण अर्ध्या तासात परतायचेच ह्या निश्चयाने I can do, I can doघोकत निघालो. काय झाले कुणास ठाऊक. पायडल छान फिरू लागले पण सायकल पुढे जाईना. सायकलची साखळी घसरली होती. “अर्धा तास, अर्धा तास” स्वत:लाच बजावत साखळी बसवायला लागलो. पण मला काय जमते. पुढच्या चक्रावर बसवली की मागच्या लहान चक्रावरून घसरायची. दोन तीन वेळा प्रयत्नांती परमेश्वर म्हणत प्रयत्न करत राहिलो.पण ते फक्त प्रयत्नच झाले. माझ्याच बरोबरीच्या एका पोराने माझी खटपट पाहिली. काय केलं कुणास ठाऊक त्याने. पण दोन्ही चक्रांवर हात ठेवून बोटे सफाईदार फिरवून चेन बसवली. फार आनंद झाला. तरी पण तो आनंद त्याने फार काळ टिकू दिला नाही.” चेन बशिवता न्हाही येत; सायकल चालवतो म्हणे.” असे म्हणत माझी किडा-मुंगी करत तो माझ्यातली हवा काढून गेला.

मी निघालो. अर्धा तास, अर्धा तास असे बजावत चालवत होतो सायकल. थोड्याच वेळात एक चाक फुसफुसू लागले. पुन्हा धसका. पंक्चर नक्की. घाम पुसायचेही सुचत नव्हते. तशीच ढकलत रस्त्यावर,एका खोक्यावर पंक्चरवरील औषधोपचाराची सर्व औषधे नीट ठेवून, शेजारी मळकट पाणी भरलेली पाटी असलेला साधारणत: माझ्याच वयाचा छोटा शिलेदार होता. त्याला काय झाले ते सांगितले. त्याने चाक वगैरे काही न काढता फक्त हवा भरतात ते नाकाडे आट्या फिरवुन काढले. लाल रबराची लहानशी गुंडाळी पाहिली. ती गेल्याचे सांगितले. पंक्चर नाही ? पंक्चर नाही? ह्या आनंदात बेहोश होऊन, दोन तीन वेळा हेच विचारून त्याला सतावल्यावर तो म्हणाला, “ते माहित नाही. ही व्हालटूब गेलीय.” त्याने ती बसवली. हवा भरली. मी निघणार तेव्हा म्हणाला, “थोडं थांब.” त्याने दोन तीन ठिकाणी कान लावून हात वरून फिरवून हवा भरतात त्या नाकाड्यावर थुंकी लावून पाहिले. आणि मला जायला परवानगी दिली. एक आणा घेतला त्याने पण मला नामोहरम केले नाही.

पुन्हा दात ओठ खात सायकल दामटत निघालो. दुकानात आल्यावर इकडे न पाहता घड्याळाकडे पाहिले. आता माझी हवा पूर्ण गेली ! दोन आणे होते.एक आणा दुरुस्तीला गेला. अर्धा तासच काय त्याहून पंधरा वीस मिनिटे जास्तच झाली होती. पण गोन्यल बंधू दिलदार होते. मी एक आणा दिल्यावर हरकत नाही म्हणाले.पुढे बघू .

सायकल दुरुस्तीची अशी लहान-मोठी, टपऱ्या, रस्त्यावर केवळ एक पंप घेऊन हवाभरून देणारी मुलेही असत. तर लहानसहान दुरुस्त्या पंक्चर काढून देणारी,खोक्यासह बसलेलीही मुले असत. त्यामुळे रस्त्यावर सायकल बिघडली तरी चिंता नसे. बरे दुरुस्त्या करणारे सर्व वयाचे होते. पण त्यातही दहाबारा वर्षांपासूनची मुलेही बरीच असत. दुरुस्ती म्हणजे पंक्चर काढणे, हीच जास्त असे. त्यामुळे ” पंम्चर काढून मिळेल” ही पाटी सगळीकडे दिसत असे.

पंक्चर काढताना पाहणे हा आम्हाला एक कार्यक्रमच असायचा. पण आता माझ्यावरच बेतल्यामुळे धसका होता. एक जाडसर पाना, टायर आणि चाकाच्या खाचेत घालून दुसरीकडे कानशीसारखे पसरट हत्यार घालून आलटून पालटून ती हलवत टायर चाका पासून थोडे सैल करून दोन्ही हातांनी आतली ट्यूब बाहेर यायची.ती निघाली की आमच्या चेहऱ्यावर अरे व्वा! असे भाव दिसायचे. मग तो मुलगा संपूर्ण टायरच्या आतून डाॅक्टर इतक्याच काळजीने हाताची बोटे फिरवायचा. चुक, तारेचा तुकडा,खडा वगैरे नाही ह्याची खात्री झाली की मग तो ट्यूबकडे वळायचा. दुसऱ्या घराण्याचा कलावंत ही क्रिया पंक्चर वगैरे काढून पुन्हा ट्यूब आत बसवण्यापूर्वी करायचा. पण हात की सफाई तशीच ! आता मुख्य कारवाईची सुरवात. प्रथम ट्यूब मध्ये हवा भरायची. की लगेच ती ट्यूब थोडीशी हवेत फिरवल्यासारऱ्खी करत पाण्याच्या पाटीत दोन्ही हातानी भागश: दाबत दाबत पाहत जायची. आम्ही त्यावेळे पासून जे मान पुढे करून त्या पाटीमध्ये पाहायचो की अर्जुनानेही मस्त्यवेध करताना इतक्या एकाग्रतेने, पाण्यात दिसणाऱ्या फिरत्या माशाकडे पाहिले नसेल!

आणि पंक्चर सापडले की तो आम्हाला ती ट्यूब पु्न्हा पुन्हा दाबून त्या ट्यूबमधून वेगाने येणारे बुडबुडे दाखवायचा. लगेच तिथे मास्तरांप्रमाणे कार्बनच्या पेन्सिलीने सुरेख जांभळा गोल करायचा. पण तो कसबी कारागिर तिथेच थांबत नसे. सर्व ट्यूब त्या पाण्यात पोहल्याशिवाय आणि दुसरे पंक्चर नाही समजल्यावर निराशेने पाणी झटकायचा, आम्ही मात्र एकच पंक्चर म्हणत सुटकेचा निश्वास सोडायचो.ह्यानंतर तो cosmetic शल्यचिकित्सक व्हायचा. कानस काढून त्या गोलावर घासायला लागायचा.जोर अति नाही की वरवरचा नाही. ती ट्यूब पुरेशी खरखरीत झाली की ते छिद्र पुरेसे झाकले जाईल येव्हढा रबराचा तुकडा कापायला लागायचा. ही कलाकारी पाहण्यासारखी असते. काही पंक्चरवाले- सर्जन चौकोनी कापतात तर काही गोल.पण तो चौकोनही अगदी काटकोन चौकोन नसायचा. त्याच्या चारी कोपऱ्यांना तो इतक्या सहजतेने गोलाई द्यायचा. कात्री एकदाही न थांबवता! सिनेमाच्या पडद्यासारखा दिसणारा तो तुकडा पाहात राहावा. आणखी दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याची कात्री. काय तिची धार असेल. ना मध्ये तिचे अडखळणे की दबकत बिचकत जाणे. हा कारागिर ती फिरवतोय का ती कात्री त्याचा हात धरून फिरवतेय समजत नसे! तसाच गोलाकार कापताना, तो तुकडा पहिल्याच प्रयत्नात गोल व्हायचा. ममपाहातच राहत असू आम्ही.

तो तुकडा त्या ट्युबवर चिकटवणे म्हणजे पोस्टाचे तिकीट चिकटवण्याइतके गद्य काम नव्हते. बरेचसे पारदर्शक असणारे ते द्रव तो बोटाने त्या रबराच्या त्वचेला लावायचा. आणि त्यावर फुंकर घालून त्या छिद्रावर पटकन चिकटावयाचा. एकदा दोनदा बोटाने दाबायचा. पण ते grafting इकडे तिकडे सरकू न देता! अजून शस्त्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता cosmetic सर्जनचे काम संपले. आता orthopedic सर्जनची भूमिका तो वठवायचा. वईसाचे ते हॅंडल एका फिरकीत तो वर न्यायचा; मधल्या ऐरणीवर तो त्या ट्युबचा भाग ठेवून वईसाच्या हॅंडलला अशी शैलीदार गिरकी द्यायचा की वईसाने त्या ट्युबला आपल्या तावडीत कधी घट्ट धरून ठेवले ते तिलाही समजायचे नाही. लगेच दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या सायकलकडे वळायचा. पुन्हा तो मोठा पाना व लोखंडी पट्टी आत बाहेर करत त्या टायरचे आतडे तो मोकळे करायचा. तोपर्यंत आमच्या ट्युबची सौदर्यशस्त्रक्रिया संपलेली असे. पुन्हा ट्युबचे आतडे जागी जायचे. हवा भरण्यासाठी दुसऱ्या कुणाला सांगितले असायचे.

हवा भरणारा कसरतपटू असे. साधा पंप तो काय आणि हवा भरणे असे किती तांत्रिक असते! पण नाही, हा त्यात आपले अभिनय कौशल्य, नृत्यकलेची ओझरतीझलकही दाखवायचा. पंप मोठा. हा त्या पंपापेक्षा थोडा जाड! पंपाच्या पायावर आपला पाय दाबून हा त्या पंपाचे हॅंडल धरून पंप पुढे मागे हलवत एक पाय मागे थोडा उंचावून दट्या दाबायचा. त्यावेळी मान खाली करून पुन्हा पटकन वर झटकवत, पदट्ट्यावर रेलून, तो वरचे हॅंडलसह पंप मागे पुढे करत दट्ट्या दाबणार. पाय मागे किंचित लंगडी घातल्या सारखा करत पुढे झुकणार आणि मागे येताना म्हंमद असेल तर केसाला झटका देणार; ज्यालिंदर असेल तर मान इकडे तिकडे फिरवत हसणार. पण हे दहा बारा वेळा इतके शिस्तीत चालायचे की पहात राहावे. मग आमच्यापैकी कुणीतरी मी मारु का पंप म्हटल्यावर हां म्हणायची ती पोरे. आम्हाला काय जमते त्यांचे भरतनाट्यम! ते नाट्य तर नाहीच पण पंपाचा तो दट्ट्याही खाली जायला दहा मिनिटे लागायची! थांबत थांबत तो खाली नेत असू. पंपातली हवाही हलायची नाही! ती मुले हसायची. ही विद्या तरी त्यांचीच असे त्यांना वाटत असावे.

सायकली म्हणजे त्यावेळचे सर्वांचे वाहन होते. रिक्षा अजून आल्या नव्हत्या. बसचेही काही खरे नव्हते. बराच काळ त्या नव्हत्याही. त्यामुळे सायकल भूषण होते. ही सायकली भाड्याने देणारी दुकाने होती म्हणून अनेकांची मोठी सोय होती. लहान पोरांसाठीही एखाद्या दुकानात कमी उंचीच्या एक दोन सायकली दिसत.

नविन सायकल घ्यायची ठरले तर घरात कितीतरी अगोदर दिवस-रात्र चर्चा,वादविवाद,चिडाचिड, चालत असे. कुठल्या कंपनीची घ्यायची ह्यावर दोन तीन दिवस गुऱ्हाळ चालायचे. पण सायकल काही एक दोन वर्षे यायची नाही. तरी तिच्या गप्पा मात्र चवीने व्हायच्या!

रॅले, फिलिप्स आणि त्यानंतर हर्क्युलिस. तीन ब्रॅंड जोरात होते. रॅले नंबर एक. त्यातही तिच्यातील हिरव्या रंगाची सर्वांची आवडती. पण त्या फारशा मिळत नव्हत्या लवकर. बरं नुसती सायकल घेऊन चालायची नाही. त्याला दिवा पाहिजे. कायद्याने रात्री दिवा लावणे भागच होते. लहान कंदिलासारखे दिवे बहुतेकांचे असत. कायद्यापुरता प्रकाश पडे. पुढच्या चाकाच्या मर्डगार्डवर मिणमिणता पडला तरी “लै पावरफुल्ल” म्हणायला लागायचे. त्यानंतर आली चौकोनी लहान डब्याची बॅटरी. हॅंडलच्या खालच्या बाजूला हुकासारखी पट्टी असते त्यात ती अडकवायची. त्याचा उजेड बरा पडायचा. पण बॅटरी संपत आली तरी लोक वापरायचे. सिगरेटचे ऱ्थोटूक किंवा उदबत्तीचा विस्तव जास्त प्रकाशमान असेल. पण पोलिसाला दाखवायला पुरेसा वाटे. “आता बॅटरीचाच मसाला आणायला चाललोय” इतके सांगून सटकायला तो निखारा कामाला यायचा. काही खमके पोलिस मात्र,” अब्ये कुणाला ववाळाला निघाला तू ह्ये अगरबत्ती घ्येवूनआं? कानफटात हानल्यावर मग लाईटी चमकेल तुझा.” म्हणत पावती पुस्तक काढायचा.लगेच आमची खरी तत पप,तत पप ची भाषा सुरु व्हायची.

मागच्या चाकापाशी लावलेला डायनामो आणि पुढचा हेडलाईट ही खरी शान असायची. आणि त्यातही हिरवी रॅले! मग काय! हायस्कूल काॅलेजात तो सायकलवाला सगळ्याजणींचा स्वप्नातील राजकुमारच असायचा. सायकलची निगा राखणारे शौकिनही होते.त्यांची ती ‘जीवाची सखी’च असे. तिला रोज पिवळ्या मऊ फडक्याने(च) पुसायची. पण किती! चाकातली प्रत्येक तार चमचम करीपर्यंत. डोळे दिपून अपघात व्हायचे! इतकेच काय मागचे लोंबते रबरही साबणाने धुवून टाॅवेलने पुसून ठेवायचे. दर रविवारी,पिटपिट आवाज करणाऱ्या डबीच्या नळीतून तेल पाजायचे. त्या जागांची तांत्रिक नावे घेऊन गप्पा मारायच्या. “पायडल, हॅंडवेल सीट बिरेक” येव्हढा शब्दसंग्रह असला की सायकल चालवता येत असे. विशेष म्हणजे हेच शब्द वापरणारे सायकल चालवण्यात तरबेज होते. दोन्ही हात सोडून भर गर्दीत शिटी वाजवत सायकल दडपून नेणे, किंवा मधल्या दांडीवरून ‘हॅंडवेलवर’ पाय टाकून आरामात उतारावरून जाणे,एकाच वेळी तिघांना घेऊन जाणे असले कसरतीचे प्रयोग हीच मंडळी करत. बाकी आम्ही फक्त सायकल या विषयावर दिवसभर बोलू शकत असू. फार हुषार असेल तर सायकलीत कुत्रे कशाला म्हणतात असा रहस्यमय प्रश्न विचारून कुणी तोंडी परीक्षा घ्यायचा. आम्ही त्याला हड् हड् करत टाळत असू. पण सीटला ‘सॅडल’ किंवा मध्येच ‘हब’ वापरून इंप्रेशन मारणारेही असत! बरे दिवा असूनही तेव्हढा रुबाब येत नसे.तो डायनॅमोचाच हवा.

साखळीला गार्डची खोळ पाहिजे. तिही फक्त एका झाकणासारखी असली तरी लक्ष देत नसत मुले. पूर्ण दोन्ही बाजूनी चमकदार, चकचकीत, आणि चेनला पूर्ण झाकणाऱ्या,तिला कुलवंत घराण्यातली करणारे गार्ड असले की लोक सायकलकडे जरा दबून आदराने पाहायचे. आता डोळ्यापुढे ती कायम नवी दिसणारी हिरवी रॅले, खटका दाबला की मागच्या टायरला डायनॅमो चिकटून चाक फिरले की मोठा लांब झोत टाकणारा मोटरच्या हेडलाईटसारखा दिवा, ते अंगभरूनआणि डोईवरून चेनने पदर घेतलेले शाही गार्ड, मागच्या चाकावर बसवलेले कॅरिअर, चिखल उडू नये म्हणून लावलेले मागच्या बाजूचे रबराचे झुलते पदक, टेल लॅम्प च्या तांबड्या चकतीचा कुंकवाचा टिळा लावलेले मागचे बाकदार मडगार्डआणि इतरांच्या घंटीपेक्षा वेगळाच आवाज काढणारी घंटी, सायकल उभी करायची तीही शैलीदार पद्धतीनेच आणि त्यासाठी तिला एक मुडपुन ठेवता येईल असा पाय जोडलेला; बेफिकिरपणे पण सहज,दिला न दिला,अशा झटक्याने तो खाली आणून त्यावर, पुढचे चाक मान वेळावून पाहते अशी ठेवलेली सायकल असल्यावर जगाचे राज्यही त्यापुढे तुच्छ असायचे.पण अशी सकलगुणमंडित, सालंकृत सायकल पहायला मिळायला सुद्धा कुंडलीत योग लागत. दैवयोगाने आम्हाला शाळेत व काॅलेजात मोजून तशा दोन तीन दिसायच्या. बाकी बहुसंख्य सायकली चारचौघी सारख्याच; घंटी सोडून सगळे पार्टस् वाजणाऱ्याच!

माझा मित्र बंडूने नवीन सायकल घेतली. तेव्हा त्याचे हॅंडल एकदम नव्या पद्धतीचे. त्याच्या दोन्ही मुठी मधल्या दांड्यापेक्षा वर आणि बाकदार होत्या. बसणाऱ्या स्वाराच्या दोन्ही हातांची महिरपी सारखी नक्षी व्हायची. रुबाबदार दिसायचा! सर्व मुले,सायकल नवीन आणि हॅंडल त्याहूनही नवीन म्हणून आणि सायकलवर बसलेला बंडूही स्टायलिश दिसायचा;त्यामुळे दोघांकडेही टकमक पाहायचे. प्रत्येक जण त्याला ‘एक चक्कर मारु दे रे’ म्हणत विनवणी करायचे. बंडूने सगळ्यांना ती फिरवायला दिलीही. नव्या सायकलमुळे एक दोन दिवस बंडूकडेच सगळ्यांची वर्दळ असायची!

गावात अजून मोटारी दिसत नव्हत्या. संपूर्ण गावात चार पाच असतील. त्याही सारख्या फिरत नसत. म्युनसिपालिटीचे दोन चार ट्रक असतील. पण त्या काही मोटारी नव्हेत. ते सायकलचे दिवस होते. त्याही अति झाल्या नव्हत्या. तसे म्हणायचे तर दोनच प्रकारचे लोक.चालणारे आणि सायकलवाले. नोकरीत असतानाही मी सायकल भाड्याने घेउन काम करीत असे. जळगावला आमच्या घराजवळ असलेल्या नाईकांच्या दुकानातून सायकल घेत असे. मी त्यांच्याच गल्लीतला आणि टाय बूट वगैरे घातलेला त्यामुळे नाईक बंधू मला नवी सायकल देत. ती देण्याअगोदर चांगली स्वच्छ पुसून, हवापाणी तपासून देत. आणि खरंच तशी कसलीही कुकरकु न करणारी सायकल चालवताना एक निराळेच सुख उपभोगतोय असे वाटत होते. कधीतरी माझ्यातला शाळकरी जागा व्हायचा. नाईकांना विचारायचा, “हिरवी सायकल नाही ठेवत तुम्ही?” त्या सज्जन भावांनी, ” नाही; पण आणणार आहोत आम्ही,” असे सांगितले. महिना दीड महिना उलटून गेल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितले. दहा पंधरा मिनिटांनी त्यांच्यातील एकजण,एक डौलदार वळण घेत हिरव्या सायकलवरून आला.पुन्हा एकदा फडक्याने पुसत ती मला दिली. त्या तरूण मुलांचा चांगुलपणा पाहून मन खरेच भरून आले होते त्या दिवशी.

चाळीसगावलासुद्धा मी सायकलवरून काम करत असे. स्टेशनच्या समोरच सायकलींची दुकाने होती. तो सिंधीही चांगली सायकल काढून द्यायचा. बामणोदहून भालोदला जायला त्या दिवसांत फार एसटी नव्हत्या. पण त्याबदली सायकलीचे दुकान होते. विशेष म्हणजे त्याकाळचे सायकलींचे ते u-Haul किंवा Enterprise, Herst होते. बामणोद ची सायकल भालोदला देता येत होती! चार पाच मैल अंतर होते. तो दुकानदारही मला त्यातली बरी सायकल काढून द्यायचा. म्हणजे दोन्ही मडगार्ड थडथड करण्या ऐवजी एकच आवाज करायचे. तसाच एक तरी ब्रेक लागत असे. रस्ता बरा होता. पण पावसाळ्यात उखडला जायचा. त्यामुळे घोड्यावर बसून चालल्यासारखे वाटायचे. मध्ये मध्ये सीटवर न बसता उंच होऊन चालवावी लागे. परतताना भालोदहून पन्हा सायकल घ्यायची आणि बामणोदला परत करायची. किती सोय होती!

आजही अनेक गावात त्यांची त्यांची चौडे सायकल मार्ट, गोन्यल बंधू,नाईक सायकल्स, इंडिया सायकल डेपो सारखी लोकोपयोगी दुकाने आहेत.

ते सायकलचे दिवस होते. दोनच प्रकारचे लोक होते. चालणारे आणि सायकलवाले.सायकलवाल्यांमधीलही बहुसंख्यांसाठी, Share the bike चे मूळ रूप “सायकली भाड्याने मिळतील” ही दुकाने केव्हढी सोय होती!

 

शेक्सपिअर आणि लंडन

रेडवुड सिटी

शेक्सपिअरचाच काळ म्हटले तर सोळाव्या शतकाच्या मध्यापासून ते सतराव्या शतकाचे दुसरे शतक असे म्हणता येते. त्या अगोदरच्या शतकापासून इंग्लंड,  

रोगराई, अनेक प्रकारचे आजार, देवी,प्लेग आणि साथीच्या रोगांसारख्या अनेक संकटांनी त्रस्त आणि  ग्रस्त झाले होते. खुद्द इंग्लंडच्या राणीला, शेक्सपिअर जन्मायच्या आधी दोनच वर्षे, देवी आल्या होत्या.आणि शेक्सपिअरच्या जन्मावेळीही ह्या साथींची लागण होतीच.त्यातच लंडनमध्ये बरेच वेळा प्रचंड आगींचेही मधून मधून थैमान चालू असे.ह्याचा परिणाम असा की जन्म नोंदींपेक्षा मृत्युच्या नोंदीच जास्त होत्या ! 

काही रोग त्या काळीच असतात तसेच विशिष्ट प्रदेशापुरतेच मर्यादित असतात. त्या आजारांचे निदानही होऊ शकत नाही. तसाच एक आजार म्हणजे English Sweat !  हा कसलीही  पुर्वचिन्हे न दाखवता तात्काळ यायचा आणि मृत्युही तडकाफडकी यायचा! ह्या आजाराने कित्येक हजार लोक गेले असतील! नशीब असे की त्यानंतर हा आजार पुन्हा कधीही आला नाही. तसाच दुसरा आजार, त्याचेही निदानच करता येत नसे. म्हणून त्याचे नाव ‘नविन आजार ‘. ह्या आजाराने १५५६ ते १५५९ या चार पाच वर्षांत कितीतरी हजारो लोकांचे बळी घेतले असतील! ह्या आजाराचेही संकट पुन्हा आले नाही. पण प्लेग मात्र वारंवार तोंड वर काढत होता. शेक्सपिअरच्या जन्मानंतर तीनच महिन्यांनी त्याच्या गावी साथ आली होती.गावातील दोनशे लोकांचा बळी घेतला. त्या साथीत शेक्सपिअरच्या स्ट्रॅटफर्ड-अपाॅन – एव्हन मधीलच नाही तर जवळपास लंडन व इतरत्र लहान मुलांच्या लोकसंख्येपैकी दोन तृतियांश बालकांचा मृत्यु झाला! 

लंडन हे तर ह्या सर्व गोष्टींचे केंद्र होते म्हणायला हरकत नाही. हे आजार आणि साथी तर होतच पण बंदर असल्यामुळे खलाशी कुठून कुठून येत. ते आपल्याबरोबर गुप्तरोगासह इतरही रोग आणीत व ते लंडनमध्ये पसरत. लंडनमध्ये प्रचंड आगीही लागत.तरीही इ.स.पंधराशे साली लंडनची असलेली पन्नास हजार लोकसंख्या वाढत वाढत सोळाशी साली ती चौपट म्हणजे सुमारे दोन लाख झाली होती. ह्याचे कारण म्हणजे लंडनच्या आजूबाजूच्या परगण्यांतून पोटापाण्याच्या शोधात लोकांचे लोंढे येत. महाराष्ट्राला तर हा अनुभव आजही भोगायला मिळतो.तसेच इंग्लंड प्राॅटेस्टंट असल्यामुळे युरोपमधील इतर देशात ज्यांचा धार्मिक छळ होत असे तेही लोक लंडनमध्येच धडकत. हे सर्व कमी की काय म्हणून त्यात दुष्काळ पडे. १५५५ आणि १५५६ ही दोन वर्षे सतत दुष्काळाची गेली. बेकारी दारिद्रय ह्यात वाढ झाली. 

अशी परिस्थिती असतानाही लंडनमधील नाट्यगृहे व इतर करमणुकीचे खेळ करणारी थेटरे मात्र रिकामी नसत ! लोक परिस्थितीला तोंड देत पुढे जात असतात. काळ आपल्याला अनुकुल करून घेण्याची माणसाची धडपड असते. आणि करमणुक करून घेणे, मनोरंजनाची साधने शोधणे ह्यामध्ये माणूस कोणत्याही काळात कल्पकच राहिला आहे. नाटक हे करमणुकीचे प्रमुख आकर्षण व नाट्यगृहे केंद्रस्थानी होती. 

लंडन तर मोठे शहर. टाॅवर आॅफ लंडन आणि सेंट पाॅलचे कॅथेड्रलच्या भोवतालून जाणारी मोठी तटबंदी लंडनभोवती होती. त्या तटबंदीच्या आतील ४४८ एकरावर लंडन वसले होते. शेक्सपिअरच्या वेळचे लंडन तसे लहानच म्हणायचे. दक्षिणोत्तर दोन मैल आणि पूर्वं-पश्चिम अंतर तीन मैल! तरीही संपूर्ण युरोपमध्ये त्यावेळी नेपल्स आणि पॅरिस ही दोनच शहरे लंडनपेक्षा मोठी होती. लंडनच्या भोवती असणाऱ्या तटबंदीचे काही अवशेष आजही दिसतात.आपल्याकडे औरंगाबाद मधील पैठण गेट,भडकल गेट किंवा सोलापूरातील बाळी वेस,विजापूर वेस या वेशींच्या नावांवरून गावाच्या जुन्या सरहद्दी समजतात तशा लंडनच्या तटबंदीची आठवण बिशप गेट, न्यू गेट अशा वेशींच्या रूपाने आजही जपलीआहे.

वारंवार येणाऱ्या प्लेगच्या व इतर अनेक रोगांच्या साथीमुळे,सरदार,दरकदार,अमीर उमरावांनी आपले महाल, वाडे लंडन बाहेर बांधले होते. राजवाडा आणि ह्या सर्व इमारती रिचमंड,ग्रीनविच,हॅ्म्टन कोर्ट ह्या गावात होती.

वारंवार उदभवणाऱ्या साथीचे रोग,प्लेग, दुष्काळ, मोठ्या शहरात पोट भरण्यासाठी करावी लागणारी कमालीची धडपड ह्या परिस्थितीमुळे लोकांची आयुर्मर्यादा ३५ वर्षेच होती. गरीबांच्या वस्तीत तर ती उणीपुरी फक्त पंचवीस वर्षे इतकीच होती! 

लंडनमधील अरुंद रस्त्यांची आणि गल्ली बोळांची आज कल्पनाही करता येणार नाही. काही मोजके मुख्य रस्ते सोडले तर सर्व रस्ते फारच अरुंद होते.घरेही एकमेकांना चिकटलेली. त्यांची छपरेही एकमेकांच्या घरांना चिकटलेली असत! घाटाचा रस्ता किती बाकदार वळणा वळणांचा होता ह्या अतिशयोक्तीच्या गोष्टीतील, तिथून जाणाऱ्या आगगाडीचा इंजिन ड्रायव्हर आणि गार्ड एकमेकांशी हस्तांदोलन करीत,तसे अशा इमारतींच्या वरच्या मजल्यावर राहणारे बोलता बोलता दुसऱ्यांच्या घरात जात! 

कचरा सांडपाण्याची विल्हेवाट लावणे जिकीरीचे होते. लंडनचा आढावा घेणारा,लंडन शहराचा इतिहासकार जाॅन स्टो म्हणतो,” मेलेली कितीतरी कुत्री- मांजरे त्या खड्डयात टाकलेली असत. त्यावरूनच त्या खड्यांचे नाव HoundsDitches पडले. 

अशा घरांच्या वस्तीतच श्रीमंत आणि गरीबही शेजारी राहात असत. लंडन ब्रिज जवळच्या डाॅऊगेटच्या भिकार वस्तीतील आपल्या घरात राहणारा कादंबरीकार विद्वान राॅबर्ट ग्रीनची अखेर झाली. राॅबर्ट ग्रीनचे हे घर, इंग्लंडचा त्यावेळचा प्रसिद्ध दर्यावर्दी, धनाढ्य फ्रान्सिस ड्रेकच्या घरापासून चार घरे सोडूनच होते! अशीही वेगळी समानता त्यावेळी होती ! 

रायगडाचे सर्व दरवाजे रात्री नऊच्या तोफेला बंद होत. त्याप्रमाणे लंडनच्या सर्व वेशींचे दरवाजे संध्याकाळी सात वाजता बंद होत. कोणालाही तटबंदी बाहेरून आत येण्यास आणि बाहेर पडण्यास बंदी होती. पण कायदा तिथे पळवाट आणि जिथे अंमलबजावणी तिथे ढिलाई येतेच. 

तटबंदीच्या बाहेरच नाट्यगृहे. आणि इतर करमणुकीच्या खेळांची व कार्यक्रमाची थेटरे होती. ते सर्व खेळ सात आणि त्यानंतरही बऱ्याच वेळाने सुटत. त्या प्रेक्षकांना अडवले जात नसावे. तटबंदीच्या आतील,गावातील सर्व हाॅटेले खाणावळी दारुचे गुत्ते सात वाजताच बंद करावे लागत. पण इथेही कायदा काटेकोरपणे पाळला जात नसावा किंवा पोलिसांना लोक जुमानत नसावेत. कारण नाटकात आणि इतर खेळातही रात्री बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची टर उडवलेली असे. शेक्सपिअरनेही आपल्या Much Ado About Nothing  मध्ये डाॅगबेरी ह्या पात्रातून पोलिसांची चेष्टाच केली आहे. 

लंडनच्या प्रशस्त चौकात बारा एकरात उभे असलेल्या सेंट पाॅल चर्चची अवस्था अस्ताव्यस्त म्हणावी की अत्यवस्थ असा प्रश्न पडतो. काही वेळेला वाटते की हे चर्च वगैरे नसून सगळा ‘ या या घर आपलेच आहे, ऱ्निवांत हात पाय पसरा, पसार व्हा,पंगती उठवा,पतंगी उडवा काहीही करा’ अशी त्यावेळी तिथे रोज स्थिती होती.

तिथे काय नव्हते? स्मशानही होते आणि बाजारही भरलेला असे.ह्यापूर्वीच्या शतकात छापील पुस्तके घेणे ही चैनीची,श्रीमंतांची बाब होती. पण छपाई यंत्रे वाढली, कागदही भरपूर मिळू लागला. त्यामुळे पुस्तकेही भराभर बाहेर येऊ लागली. बऱ्यापैकी माणूसही पुस्तके घेऊ शकत होता. त्यामुळे बाजारात पुस्तकांची,कागद आणि इतर स्टेशनरीचे दुकानदार दुकाने मांडत असत. एलिझाबेथ राणीच्या काळात सात हजाराहून पुस्तके प्रकाशित झाली होती! ह्या कॅथड्रेलच्या आतली परिस्थितीही फारशी निराळी नव्हती. त्याच्या आतल्या विशाल भागात तर अतिशय गोंधळ, गडबड, गजबजाट आणि निरनिराळे आवाजच आवाजांचे राज्य होते. आतही बाजार भरलेला! सुताराची लाकडी वस्तूंची, लोकांना पत्रे, सरकारी कागदपत्रे, अनेक प्रकारचे अर्ज लिहून देणाऱ्या ‘ लेखनिकांच्या’ टपऱ्या, वकीलांचे लहान दुकानांसारखी कार्यालये, आणि इतर कारागिर, कामगारांच्या टपऱ्या, मालाची नेआण करणारे. तसेच इतर निरनिराळे व्यवसाय करणारेही  बसलेले असत. त्यातच दारुडे, रिकामटेकडे इथे तिथे पसरलेले असत! काहीजणांनी तर तिथेच,जिथे तिथे लघवी केंद्र म्हणूनही कॅथेड्रलचा वापर केला असे!   

चर्चच्या मार्गिकेमध्ये अनेक लहान मुले चेंडू, चेंडूफळीचे खेळ खेळत असत. चर्चच्या लोकांना त्या मुलांना हुसकावून लावणे हेच काम आहे असे  वाटावे इतपत पोरे गर्दी करत.त्यातच आवारात अनेक लोक शेकोट्या पेटवून स्वत:ला उबदार ठेवण्याचा उद्योग करत. जिकडे तिकडे धूरच धुर! चर्चच्या आतही हा धूर पसरलेला असे! ह्या सगळ्या गलक्यात पाद्र्याचे प्रवचन चालू असे. चर्चमधल्या भक्तांना काय ऐकू येत असेल ते तेच जाणोत.एक पिढी उलटून गेल्यावर सेंट पाॅलच्या कॅथड्रेल मध्ये आलेला जाॅन एव्हलिन लिहितो,” मी त्या भव्य आणि प्रशस्त चर्चमध्ये जायचो तेव्हा तिथे पसरलेल्या धुरामुळे फादर दिसतही नसे आणि तेथील प्रचंड कोलाहलामुळे तो काय उपदेश करतोय तेही ऐकू येत नसे!” 

ह्या चर्चचा आणखी एक व्यवहारी उपयोग लंडनचे लोक करीत. ते चर्च अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग होता की नाही हे सांगता येणार नाही. पण पलिकडे असलेल्या रस्त्यावर जायला लोक ‘ जवळचा मार्ग’ short cut म्हणून रोजच सर्रास वापर करीत! त्याला एक कारण म्हणजे लंडनला केव्हाही पडणारा पाऊस. पाऊस पडायला लागला की आडोशासाठी येणारी रहदारी तशीच चर्चमधून थेट पलीकडच्या रस्त्यावर जात असे. लोक पाऊस पडू लागला की कोणत्याही बंदिस्त जागेत आडोसा गाठण्यासाठी धावत पळत निघत. ह्या तारांबळ उडवणाऱ्या घाई गर्दीमागे लंडनचे पावसाळी हवामान आणि दुसरे नुकतीच फ्रान्समधून आलेली काॅलरची फॅशन! ही काॅलर मानेभोवती असणे हे केवळ फॅशनचेच नव्हे तर प्रतिष्ठेचे लक्षण होऊ लागले होते. काॅलर तरी कशी? कापडी फितींच्या(laces)फुलांच्या मोठ्या पाकळ्यांचे आकर्षक पद्धतीने लावलेले थर.माणसाकडे पाहिले तर जणू मोठ्या फुलातून डोके उमलले आहे असे वाटावे.ही काॅलर लेसची आणि खळ लावलेलीअसे. पावसात भिजली की कोमेजून जायची. पाकळ्या पंख मिटून पसरून पडायच्या. त्यामुळे ती वापरणाऱ्याचाही रुबाब कमी होऊन त्याचाही चेहरा मलूल होऊन जायचा ! शिवाय त्या काळी कपड्यांचे रंगही कच्चे होते. बहुतेक रंग पाण्याने ओघळायचे. सर्व कपड्यांवर ते पसरायचे. ही दुसरी भीती! त्यामुळे पाऊस पडू लागला की सगळीकडे आपली शान जाऊ नये म्हणून एकच धावपळ आणि गडबड उडायची. मग ‘सेंट पाॅल’ शिवाय कोण आश्रय देणार? 

ह्या फॅशनेबल काॅलरचे नाव समजल्यावर मला पुलंच्या ‘ अपूर्वाई’ मधला संवाद आठवला! पुलंना पिकॅडलीला जायचे होते. किलबर्न स्टेशनवरच्या तिकीट खिडकीतल्या बुवाला ते पिकॅडलीची तिकीटे मागतात. पुलं काय म्हणतात ते पुलंच्या शुद्ध तुपातील इंग्रजी उच्चारांमुळे त्या बुवाला काही केल्या समजेना. तो त्याच्या उच्चारात ,” मे ग्याॅ फाऊन” म्हणाला असे पुल सांगतात. पुलं अखेर चिडून त्याला आपल्या खणखणीत इंग्रजीत ” टू टिकेटस् आॅफ द ट्यूब रेल्वे फाॅर पिकॅडली” असे स्पष्टआवाजात सुनावतात. तरी तो प्रश्नार्थक मुद्रेनेच पाहात राहतो. अखेर पुल कागदावर इंग्रजीत “दोन पिकॅडली” असे लिहूनच त्याला देतात. तो बिचारा लागलीच “ओSS! यू मीन फिख्व्याड्ली!” असे म्हणून पटकन तिकिटे देतो. लक्षात आले असेल की फ्रान्समधून आलेल्या ह्या नविन पद्धतीच्या वर्तुळाकार गेंदेदार काॅलरला पिकॅडली म्हणत! 

पण ह्या पिकॅडलीचे स्पेलिंग Piccadills, pecadills, pickadailles, picardillas, अशा निरनिराळ्या २० तऱ्हेच्या “स्पेलिंग”मधून लिहिले जात असे ! अखेर Piccadilly असे लिहिण्याची पद्धत रुढ झाली. 

प्रारंभीचा piccadill शब्द शेक्सपिअरच्या काळातच १६०७ साली थाॅमस डेकरने लिहिलेल्या ‘नाॅर्थवर्ड हो’ ह्या नाटकात पहिल्यांदा आढळतो.नंतर काही काळाने ट्रॅफलगार स्क्वेअर जवळच एक मोठी इमारत Piccadilly Hall नावाने सर्रास ओळखली जाऊ लागली; कारण इमारतीच्या मालकाचा ह्या आधुनिक स्टार्च केलेल्या पाकळ्या पाकळ्यांच्या गोल काॅलर तयार करून विकण्याचा मोठा व्यापार होता.त्या व्यवसायाच्या कमाईतूनच त्याने ही इमारत बांधली होती. म्हणून साहजिकच ती Piccadilly Hall नावानेच ओळखली जाऊ लागली. हाईड पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याचे Piccadilly नावही या हाॅलवरुनच पडले आहे. त्या काॅलरवरून नाही. 

पंधराव्या – सोळाव्या शतकात आज लोक खात नाहीत ते करकोचे, हंस, लांब मानेचे बगळ्यांसारखे पक्षी खात असत. गरीबांचे जेवण साधेअसे. जाडा भरडा पाव आणि चीझ्. हेच दोन पदार्थ त्यांच्या जेवणात असत. त्यात बदल नसे. ज्यांना हेही परवडत नसे ते फक्त भाजीपाल्यावर गुजराण करीत. 

बटाटा हा त्या काळी ब्रिटनला अगदी नविन होता. त्याची पाने दुसऱ्या काही विषारी वनस्पतींसारखी दिसत असल्यामुळेही बटाटा खायला कोणी धजत नसे. इंग्लंडमध्ये बटाटा खाण्यास सुरवात व्हायला अठरावे शतक उजाडावे लागले!  आपल्याकडेही सुरवातीस बटाटा आणि टोमॅटोकडे संशयानेच पाहिले जात असे.टोमॅटो तर मास मटनाशीच जोडला गेला होता ! 

काहीही असो पण गोड मात्र इंग्रजांना खूप आवडत असे. 

गरीब असो,मध्यम किंवा श्रीमंत असो सर्वांमध्ये साखर खाण्याचे प्रमाण प्रचंडापेक्षाही प्रचंड होते! साखर घातली नाही असा एकही पदार्थ त्यांनी शिल्लक ठेवला नव्हता. साखरेच्या तावडीतून मास-मच्छीमटण,अंडी हे मांसाहारी पदार्थही सुटले नव्हते. बरे, प्रत्येक वेळी, प्रत्येक पदार्थात साखर घालताना ‘अापला हात जगन्नाथ’ ह्या मापानेच घातली जात होती. दारूतही ती अशीच ओतली जाई. कोण किती साखर खातात त्यावर प्रतिष्ठा आधारली होती. साखर खाऊन कित्येकांचे दात काळे पडले होते.ज्यांचे तितकेसे काळे नसत ते कमीपणा येऊ नये म्हणून दातांना काळा रंग लावत! आपल्या मराठीतले “काळं कर तुझं तोंड”, ” त्याने तिथून तोंड काळे केले ” हे वाक्प्रचार तिकडे हे सन्मानादर्शक समजले गेले असते! 

आज साखरेवर पुर्णपणे नसला तरी बहिष्काराची फिकट सावली पडलीय असे वाटते. साखर म्हटली की “नको नको”, “अगदी कमी” हेच ऐकायला येते. कालाय तस्मै नम: म्हणावे का विज्ञानाची प्रगती म्हणायचे.

हे साखर खाण्याचे झाले. पण ‘पिण्या’चेही प्रमाण तितकेच होते. बिअर अतोनात प्याली जात होती. जीवनात हसणे, चांगल्या गोष्टींचा उपभोग घेणे करमणुकीचे कार्यक्रम पाहणे म्हणजे पाप समजणारे कडक सोवळ्याचे कर्मठ puritans पंथीय लोकही बिअरवर मात्र तुटून पडत! असे सांगतात की ह्या प्युरिटनांच्या म्होरक्याला जेव्हा न्यू इंग्लंडला आणले तेव्हा त्याच्या जहाजात चाळीस हजार लिटर बिअरशिवाय इतर दुसरे काही नव्हते! चर्च,मठात प्रत्येकाला दिवसाला चार लिटर बिअर मिळायची! 

तंबाखूच्या कथेवर तर विश्वास बसणार नाही इतकी ती थक्क करणारी आहे. तंबाखूच त्या काळी ‘व्यसनमुक्त’ होती! शेक्सपिअर लंडनला आला आणि पाठोपाठ तंबाखू एकवर्षाने आली. सुरवातीला ती एक चैनीची वस्तुच होती.पण शतकाच्या शेवटी ती गोरगरीबांचीही झाली. तंबाखूचा इतका प्रसार झाला की लंडनमध्ये तंबाखू आणि तिच्या पदार्थांची सात हजार दुकाने झाली होती! 

तंबाखू केवळ शौक म्हणून खाण्यासाठीच वापरली जात नसे. रोग प्रतिबंधकारक, बऱ्याच रोगांवर उपचार म्हणूनही ती वापरली जात असे.त्यामध्ये गुप्तरोगांचाही समावेश असायचा.अर्धशिशी,तोंडाची दुर्गंधी आणि त्याहीपेक्षा लंडनला सळो की पळो करून हजारो लोकांना मृत्युमुखी धाडणाऱ्या प्लेगसाठी प्रतिबंधक उपाय म्हणून नियमाने तंबाखू खाल्ली जात असे. तंबाखूचा शुभसंस्कार लहान मुलांवरही करत असत. इटनसारख्या शाळेत आज तंबाखू खाल्ली नाही म्हणून विद्यार्थ्यांना बदडून काढत! आपल्याकडेही तंबाखूची मिश्री अजूनही दात घासण्यासाठी खेड्यापाड्यात वापरत असतील.  पूर्वी तर शहरातही बरेच लोक तंबाखूने दाताला,तल्लीन होऊन,मालिश करत बसत ! 

विज्ञानाच्या दाराची कवाडे उघडू लागली तशी आज तंबाखूचे प्रस्थ जवळपास नाहीसेच झाले. 

शेक्सपिअरच्या आधी आणि त्याच्या काळातही समाज अनेक लहानमोठ्या स्तरांत विभागला होता. अर्थात सर्वात उच्चपदी राजाच होता. त्यानंतर येणाऱ्या सरदार, उमराव,जहागिरदार लष्करी अधिकारी आणि त्यानंतर उच्च स्थानवरचे धर्माधिकारी आणि नंतर वर्णी लागायची ती प्रतिष्ठितांची. ह्या सर्वांच्या खाली नंतर नागरिक. त्यातही प्रथम श्रीमंत जसे व्यापारी आणि त्या खाली मध्यम वर्ग. 

शेतकरी व सर्वांत खाली सामान्य कारागिर व त्यांच्याही खाली मजूर असायचा. वर जे सामाजिक थर सांगितले त्यातही अंतर्गत पायऱ्या होत्याच.थोडक्यांत फळ्याआणि चिरफळ्या अनेक होत्या. 

कोणी काय व कोणता पोशाख घालायचा, पेहराव काय कसा करायचा, कोणत्या प्रकारचे कापड व तेही कोणत्या वस्त्रासाठी वापरायचे ह्याचेही नियम होते! ज्याचे वार्षिक उत्पन्वीस पौड अाहे त्याला सॅटिनच्या कापडाचे जाकिटासारखे (Doublet) वापरायला परवानगी होती. पण सॅटिनचा gown पायघोळ अंगरखा किंवा कोटासारखे वस्त्र वापरता येत नसे. ज्याचे उत्पन्न शंभर पौडांपेक्षा जास्त असेल त्याला सर्व कपडे सॅटिनचे वापरायला मुभा होती. पण आतले जाकिटासारखे doublet फक्त मखमलचे वापरायला परवानगी होती. वरच्या पोशाखात मात्र मखमलीचा वापर करण्यास बंदी होती! मात्र निळ्या रंगाचे किंवा गडद जांभळट तांबड्या रंगाच्या मखमलीचे जाकिट वापरायला त्याला बंदी होती. कारण ह्या रंगाची मखमल फक्त ‘सर’ किताब असलेल्या शूर सरदारांसाठी व त्यांच्यापेक्षाही वरच्या दर्जाच्या सरदारांनाच वापरण्याचे अधिकार होते.  ह्यापेक्षाही चक्रावून टाकणारी मर्यादा-प्रतिबंध म्हणजे पोषाखातील एखाद्या विशिष्ठ वस्त्र प्रावरणासाठी किती कापड वापरायचे व त्याला किती दुमडून किती चुण्या असल्या पाहिजेत ह्याचेही निर्बंध होते!  हे निर्बंध असण्यामागे ह्या कापडाची आयात होत असे. त्यामुळे खूप पैसा बाहेरदेशी जात असे. त्यावर काही प्रमाणात बंधने घालावीत ह्यासाठी हे नियम असावेत असे काही तज्ञांचे मत आहे. 

राजे आणि त्यांचे अमर्याद अधिकार किती असू शकतात  ह्याची कल्पना ह्यावरून आणि कोणी काय, किती खावे ह्या सूचना वाचल्यावरही समजून येते. 

कुणाच्या जेवणात किती पदार्थ असावेत किंवा एकूण वाढप किती वेळा व्हावे ह्याचे नियमही सामाजिक, राजकीय स्थानावर ठरलेले होते. जसे चर्चच्या कार्डिनलला जेवणात नऊ पदार्थ किंवा नऊ वेळा वाढप करण्याची परवानगी होती. गरीबाला व त्याने कुणाला जेवायला बोलावले तर फक्त दोन पदार्थ आणि सूपची परवानगी होती. इंग्लडने पोपची सत्ता झुगारून दिल्यानंतर शुक्रवारी मास खाण्यावरची बंदी उठली. 

कायदा सुव्यवस्था व स्वच्छतेसंबंधीचे कायदेकानू कडक होते. खेडेगावाच्या पातळीवरही कुणाची बदके रस्त्यावर हिंडताना आढळली तर दंड होत असे. गाई घोड्याची शेण-लीद रस्त्यावरच नव्हे,कडेला जरी दिसली तरी दंड होत असे. ह्या शिक्षेतून शेक्सपिअरच्या बापाचीही सुटका झाली नाही. हेन्री स्ट्रीटवर सार्वजनिक ठिकाणी अशी घाण केल्याबद्दल त्याला एक शिलिंग दंड ठोठावला होता. त्या काळी एक शिलिंग ही मोठी रक्कम होती. ह्या शिक्षा प्लेग व इतर रोगराई पसरु नये यासाठी आवश्यकच होत्या. 

पुस्तकांचा प्रसार आणि खप वाढला होता. नाटकांना लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. व राज्यकर्त्यांचा उदार आश्रय लाभला होता. स्पेन विरुद्धचे युद्ध जिंकल्यामुळे लोकांत उत्साह होता. काव्य नाटके आणि एकूण साहित्यालाच चांगले दिवस आले होते. जगात आजही काव्यात्मक भाषा, प्रभावी संवाद, अत्यंत कमी व नेमक्या शब्दांत प्रसंग त्याची वेळ व पात्रे कोण हे शब्दातून डोळ्यांसमोर उभे करणारा,मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरिक्षण,नाट्यपूर्ण प्रसंग आणि हॅम्लेट,आॅथेल्लो, आयागो, ज्युलिेएट, यासारख्या पात्रांची अजरामर स्वगते, सुखात्मिका आणि शोकांतिका ह्या दोन्ही तऱ्हेची,आजही गाजत असलेली नाटके लिहून दिगंत कीर्ति मिळवणारा; आपल्या चतुरस्त्र प्रतिभेच्या बळावर लोकांचे आणि राजघराण्यातील परिवाराचे मन जिंकणारा; स्व कर्तृत्वावर राजाकडून आपल्यासाठी अभिमानाने मिरवावयाचे मानचिन्ह मिळवणारा; 

लंडनपासून शंभर मैलावर असलेल्या लहानशा स्ट्रॅटफर्ड- अपाॅन- एव्हन गावातील शेक्स्पिअरचे ह्याच काळात लंडनला आगमन झाले. इथेच त्याचा उत्कर्षही  झाला. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावाचे नावही ठळकपणे जगाच्या नकाशावर आणले! 

[बिल ब्रायसनचे शेक्सपिअरवरील पुस्तक व काही जमवलेल्या माहितीच्या आधारे.] 

फुलेच फुले

 रेडवुड सिटी

फुलेच फुले 

परवा, कोल्हापूरहून निघणाऱ्या ‘ लोकमत’ आवृत्तीतील पळसाच्या फुलांचा सुंदर फोटो असलेला आणि त्या झाडाच्या गुधर्माविषयीचा एक चांगला लेख वाचायला मिळाला. 

बरेच वर्षांनी चित्रात का होईना पळसाची फुले पाहायला मिळाली. नोकरीतल्या फिरतीत ही लाल अग्निफुलांच्या ज्योतींनी बहरलेली झाडे पहायचे भाग्य लाभत होते. त्याला ज्वाळासारखी दाहक उपमा दिली असली तरी उन्हाळ्यात ती फार नेत्रसुखदायी होती. ती फुले पाहताना उन्हाळ्याचा रखरखीतपणा एकदम कमी होऊन तांबड्या रंगाचा गारवा जाणवायचा. आधीच उन्हाचा ताप, झळा आणि त्यातच बसमधल्या गर्दीमुळे वाढणारा घाम,प्रवाशांच्या चढ-उतारीची गडबड-गोंधळ, बडबडीची गडबड ही सर्व त्या रंगीत लाल फुलांमुळे कानामागे पडायचे. तहान लागली वाटत होती तीही भागलेली असायची ! साधारणत: गारवा हा हिरवा म्हटला जातो. पण पळसाची तांबडी फुलेही त्या त्या क्षणी थंड वाटत. अजिंठ्याच्या डोंगरकड्यावरून, चाळिसगाव-कन्नड घाटातून किंवा कधी सिन्नर तर लळिंगच्या डोंगराजवळून जाताना, तसेच यवतमाळच्या जंगलातून अकोल्याकडे येताना ह्या विस्तवाच्या फुलांचे सुभग दर्शन होई!  पळसाच्या तांबड्या फुलांचे हे आयते सर्वांसाठी भरवलेले प्रदर्शन पहायला मिळे!

ह्या तांबड्या लाल पळाशफुलांच्या जोडीनेच एका पिवळ्या फुलांनी लकडलेल्या झाडांची आठवण झाली. झाडांची म्हणायचे खरे पण ती फुले त्यावर लकडली होती म्हणून झाडे म्हणायची इतकेच. नाहीतर त्या पिवळ्या सोन्याच्या तितक्याच शांत पण तजेलदार, झळाळीत फुलांनीच आपल्या शोभेसाठी असावीत म्हणून उदार मनाने ठेवलेल्या चारदोन दिसणाऱ्या पानांच्या फांद्यामुळे त्यांना झाडे म्हणायची. त्या पिवळ्याधमक फुलांच्या घोसात कुणाचे लक्ष जाणार झाडाकडे? 

नगरला जाताना थोडे गावाबाहेरच पीडब्ल्यूडीच्या साहेबांच्या मुख्य आॅफिसच्या दहाबारा दगडी बैठ्या इमारती होत्या. आवार मोठे. त्या इमारतींच्या आसपास बाहेरील कुंपणाच्या भिंतीलगत  बहाव्याची म्हणजे कॅशियाची बरीच झाडे होती. ( कॅशिया म्हणजेच बहावा की निराळी ते नक्की माहित नाही) ती फुलली की सगळीकडे सोनेरी प्रकाश पडल्याचा भास व्हायचा. सूर्य ढगाआड गेलेला असला तरीही! सर्व आवार त्या फुलांच्या प्रकाशातच वावरत असायचे. काय ते पिवळे घोस! भरघोस हा शब्द त्यांच्यासाठीच किंवा त्या फुलांच्या घोसांनीच स्वत:साठी केला वाटावे असे ते लकडलेले असायचे! बरे, विशेष चमकदार वगैरे काही नव्हते. पण त्यांची ताजी टवटवीच उल्हसिता होती! 

फुलांचे झुबके त्यांच्या वजनाने खाली झुकलेले. वाऱ्यासंगे किंचित डोलणारे, जसे तरुणीच्या कानातील आभूषणांची मोहक आणि आकर्षक हालचाल वाटावी असे ते दृश्य दिसे. बाजारपेठेतील सोन्याचे दुकानदार भाजी फळांसारखे आपल्या पाट्या टोपल्या सोन्यांनी भरून बसलेत की काय असा तो पिवळा त्या आवारात व रस्याच्या कडेलाही बहरला होता! बालकवींनी पाहिले असते तर सुवर्ण चंपकाऐवजी तितक्याच आनंदाने ‘ सुवर्ण कॅशिया फुलला विपिनी ‘ म्हणाले असते!  

सोने पिवळे, ‘पिवळे पिवळे ऊन्ह कोवळे ‘ किंवा हळदीसारखा पिवळा हे फक्त त्या फुलांच्या घोसांचा पिवळा रंग लक्षात यावा एव्हढ्यासाठी. पण तो पिवळा किती व कसा,त्याच्या छटा शब्दात सांगणे कठिणच आहे. हे कॅशिया किंवा बहाव्याच्या फुलांचे रम्य दृश्य नगरला जाताना – तिथून घरी परतताना दिसायचे. 

हा पहिला बहर पाहिला त्या आनंदाच्या भरात मी घरी मुलांनाही ह्याचे पत्र लिहिले होते. त्यात,ओघात, संत निळोबारायांनी केलेल्या ज्ञानेश्वरांच्या आरतीतील   ‘सुवर्णपिंपळ असुमाय’ चाही उल्लेख होता. त्याच पत्राची नक्कल करून मी उत्साहाच्या भरात पीडब्ल्यूच्या मुख्य अभियंत्यानांही ते पाठवले होते! त्या साहेबांना मी त्यांच्या आवारातील हे फुलांचे सौदर्य नजरेस आणून दिले असे मला वाटले. त्यांच्या कार्यालयाने ही झाडे लावून दिलेल्या आनंदाबद्दल आभारही मानले. पण त्यांनी कुठला कोण वेडा माणूस म्हणत माझे नाव पत्ता ठाण्याच्या आणि येरवड्याच्या हाॅस्पिटलला कळवला असेल!  

पिवळ्या कॅशियावरून आणखी एका अविस्मरणीय पिवळ्या फुलांनी बहरलेल्या हजारो रांगांची आठवण झाली. ती सांगतो आणि हा पिवळ्या फुलांचा प्रसन्न रंगीत चष्मा बाजूला ठेवतो.

तो काळ सूर्यफुलांच्या लागवडीचा प्रारंभाचा  होता. करडई शेंगादाणे तीळ यांचे पिक वाढत नव्हते आणि त्यांचे भावही परवडणारे नव्हते. व तेलाचाही  त्या प्रमाणात भरपूर उतारा नसे. रशियाकडून सूर्यफुलांच्या तेलाची महति कळली. आपल्याकडेही त्याची शेती सुरु झाली.कुणाच्या बागेत एखाद दुसरे झाड दिसणाऱ्या सुर्यफुलांची आता राने बहरू लागली. 

माझ्या फिरतीत बीड जिल्ह्यातील तेलगावला गेल्यावर तिथे दुतर्फा सूर्यफुलांची मोठी पदके पाहिली! प्रथमच येव्हढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पिवळ्या पाकळ्यांच्या सहस्रकिरणांचे तेजोवलय मिरवित, ऐटीत उभे असलेल्या टपोऱ्या काळ्या डोळ्यांची ती फुले पाहिल्यावर थक्क झालो होतो. चौफेर,नजर फिरवावी तिकडे ही सोन्याची तळहाता एव्हढी मोठी पदके उन्हात हसत पाहताहेत असा भास होत होता! एकदा वाटले प्रभाशंकर कवडी इथे येऊन ह्या फुलांना डोळे देऊन गेले की काय? 

हे प्रभाशंकर कवडी कोण ? चित्रकार. त्यांची चित्रे किशोर मासिकात बरीच वर्षे त्यातील कथा लेख सजवत होती. इतर काही प्रसिद्ध मासिकात, काही जाहिरातीतही ते चित्रे काढीत. त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे डोळे. ते मोठे टपोरे आणि गोल असत. बुबुळांच्या ह्या एकमेव आकार आणि ठसठशीतपणावरून व चेहऱ्यांच्या गोलाईवरून हे कवडींचे चित्र पटकन ध्यानात येई. सूर्यफुलांचाही मध्यगोल तसाच ठसठशीत आणि एकदम स्पष्ट नजरेत भरणारा! 

एका ओळीत उभे राहिलेल्या सूर्यफुलांच्या रांगाच्या रांगा हासुद्धा एक वेगळाच अपूर्व देखावा होता. आजूबाजूला काही नाही. घरेही तशी दूरच होती. सुर्यफुलांच्या शेकडो हजारो खड्या सैनिकांनी घातलेल्या वेढ्यात मी एकटा. बरोबर ड्रायव्हर. पाहातच राहिलो आम्ही! वरून एखादे विमान येत नव्हते; ते असते तर हिचकाॅकच्या North By Northwest ची आठवण झाली असती!