Monthly Archives: May 2018

वर्षभराच्या साठवणी!

आजकाल कोणी वर्षभरासाठीच्या कोणत्याच वस्तु करीत नाहीत. एप्रिल लागणार म्हणले की वर्षाचा गहू भरण्यासाठी मोंढ्यात जाऊन गव्हाच्या राशींच्या टेकड्यांमघून वाट काढत, मी ढिगाऱ्यात हात घालून गहू पारखण्याचा अभिनय करायचो.कुणाला समजतय की हा बन्सी, हा सरबती, हा बुटका तो जोड गहू ! व्यापारी सांगतील ती नावे मीही घोकायचो. आज त्यांची नावे सिहोर, लोकवन, गुजरात लोकवन अशी झाली आहेत. तांदळालाही एचएमटी,इंद्रायणी, सुरती कोलम, बासमती नावाने ओळखतात. आंबेमोहोर,सोन्याची तार,जिरेसाळ ही नावे फारशी घेतली जात नाहीत. नाशकात अजून कमोद, काळा कमोद मिळतही असेल.किंवा अकोल्यालाही काली मूंछ तांदूळ मिळत असेल.

तुरीची डाळ घ्यायची तर बार्शीचीच व तीही हरिण छाप अशी ख्याती होती. आता तिची जागा प्रेसिडेंट,प्रेसिडेंट गोल्डने घेतली आहे.

परपंचाच्या प्रगतीप्रमाणे गव्हाची एक पोते, दोन पोती होत होत गेली- ही शंभर किलोची असत- , तांदळाची पन्नास किलोची! ते दिवस सर्व काही देशस्थी प्रमाणाचे होते! ती पोती हातगाडीवर टाकून तो हमाल मोंढ्यापासून ढकलत ओढत घरी आणायचा. बरं, अंतर काही थोडे थोडके नसायचे. मी स्कूटरवर बसून काही अंतर त्याच्या बरोबर पुढे-मागे करत यायचो.पण असं किती वेळ करणार मी तरी ? त्याला पुन्हा पत्ता देऊन पुढे घरी यायचो. तो म्हणण्यापेक्षा, ती पोती घरी येईपर्यंत आमची मध्यम वर्गीय बत्तीस-चौतीस इंची छाती सारखी धडधडत असायची. पाठीवर ती वजनदार पोती पेलून, दोन जिने चढत चढत घामेघुम झालेला तो हातगाडीवाला घरात आणून व्यवस्थित ठेवायचा, तेव्हा हुश्श वाटायचे.

त्या अगोदर मार्चमध्ये तुरीची डाळ घेऊन झालेली असे. तांदुळ नेहमी जुनाच घ्यायचा असे काही संकेतही पाळले जात होते.

उन्हाळ्यातच तांबड्या मिरच्या येत.अहो,त्या तांबड्याचेही किती छटा आणि प्रकार! बरं मिरची ती मिरची असे म्हणून चालत नसे. आपले अडाणीपण दाखवणेच झाले की ते. काही चपट्या, काही भरल्या अंगाच्या, जाड पण तुकतुकीत; लालसर पण जास्त काळपटच, काही शेलाट्या अंगाच्या, काही पिवळट काटकुळ्या, काही आताच सुरकुतलेल्या पण जहाल, काही बांधेसूद, कोणी ‘लाSSल बावटेS की’, नुसते जवळून काय,दुरून पाहिले तरी ठसका आणणारी, तशाच काही छद्मी आणि कावेबाजपणे हसणाऱ्या केशरी मिरच्या तर काही जवळही येऊ न देणाऱ्या, त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनीच पहावे लागत असे. मिरच्याच्या लाल प्रदेशातून हिंडताना मी मी करणारेसुद्धा नाक डोळे पुसत मध्येच शिंकत खोकत फिरायचे. प्रत्येकाचे हातरुमाल मोंढ्याच्या किंवा मार्केटच्या बाहेर पडेपर्यंत- हृदय पिळवटणारे “बाळा जो जो रे,”स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी,”चिमणी पाखरं”,माहेरची साडी”हे सिनेमे पाहून आल्यासारखे- भिजून चिंब झालेले! बरे येव्हढे “शोककारी दु:खकारी” होऊन पाच किलोचे पोते घेऊन घरी आल्यावर, “अहो नुसत्या लाल म्हणजे काही मिरच्या होत नाहीत.

त्या तिखट पाहिजेत. ह्या कसल्या ! मिळमिळीत तांबड्या भेंड्या आहेत.” मग त्या तसल्या किंवा ह्या तशा आणायच्या” हे ऐकायला लागायचे. आम्ही काय! संत चोखोबाच्या “ काय भुललासी वरलीया रंगा”जातीचे. त्यामुळे दिसली लाल,आणली मड्डम ! अशा मिरच्या आणणार! ती तिखट, झणझणीत, पातळ सालीची, व्यवस्थित भरलेली, अगदी छय्यम छय्यम नको, किंचित कुरळ्या,काहीशी बाकदार, नख न लावता देठ तटकन तुटणारी, अबबSS इतके छत्तीस गुण जमणारी कुठून आणणार? “आणली तीच तिखट मानून घ्या” म्हणत नाक डोळे पुसत,मुसमुसत आणि जोरदार शिंक देत निघून जायचो.

जसे वर्षाचे धान्य, डाळी भरणे, तिखट, मीठ करणे , शिकेकई कुटणे, करणे गेले तसे ते टिकवण्यासाठी कडुलिंबाचा पाला,बोरिक पावडर, पाऱ्याच्या गोळ्या ह्या गोष्टीही दिसेनाशा झाल्या. अलिबाबाचे चाळीस चोर आरामात बसतील अशी ती पिपेही बंद पडलेल्या थेटरमधील रिकाम्या खुर्च्या प्रमाणे, रिकामी पडून आहेत. त्या पिपांवर रंगीत चादरीच्या घड्या पसरुन त्यावर वळकट्या, उशा, पांघरूणे ठेवलीत!

हे सर्व का लिहिले तर एकाने व्हाॅट्सअपवर स्वैपाकघरातील काही गोष्टींसाठी सूचनांची भली मोठी यादी पाठवली होती. त्यातील, “ वर्षाचे तिखट टिकवण्यासाठी ते बरणीत/ डब्यात भरण्यापुर्वी तळाशी हिंगाची पावडर टाका” ही युक्ति वाचल्यावर हा लेखन ‘प्रपंच’ केला.
असोSS, आक्छीSS !!

साठवण वर्षाची

चुनाभट्टी /शीव

आजकाल कोणी वर्षभरासाठीच्या कोणत्याच वस्तु करीत नाहीत किंवा धान्यही भरून ठेवत नाहीत.एप्रिल लागणार म्हटले किंवा पाडवा झाल्यावर वर्षाचा गहू, ज्वारी आणण्यासाठी मोंढ्यात जाऊन गव्हाच्या राशींच्या टेकड्यामघून वाट काढत, मी ढिगाऱ्यात हात घालून गहू पारखण्याचा अभिनय करायचो.कुणाला समजतय की हा बन्सी, तो सरबती, हा बुटका तो जोड गहू ! व्यापारी सांगतील ती नावे मीही घोकायचो. आज त्यांची नावे सिहोर, लोकवन, गुजरात लोकवन अशी झाली आहेत. तांदळालाही एचएमटी,इंद्रायणी सुरती कोलम, बासमती नावाने ओळखतात. आंबेमोहोर,सोन्याची तार,जिरेसाळ ही नावे फारशी घेतली जात नाहीत. नाशकात अजून कमोद, काळा कमोद मिळत असेल.किंवा अकोल्याला काली मूंछ तांदूळ मिळतही असेल. तुरीची डाळ घ्यायची तर बार्शीचीच व तीही हरिण छाप अशी ख्याती होती. आता तिची जागा प्रेसिडेंट,प्रेसिडेंट गोल्डने घेतली आहे.

प्रपंचाच्या प्रगतीप्रमाणे गव्हाची एक पोते, दोन पोती होत. गव्हा-ज्वारीची शंभर किलोची असत- , तांदळाची पन्नास किलोची! ते दिवस सर्व काही देशस्थी प्रमाणाचे होते! ती पोती हातगाडीवर टाकून तो हमाल मोंढ्यापासून ढकलत ओढत घरी आणायचा. बरं,अंतर काही थोडे थोडके नसायचे. मी स्कूटरवर बसून काही अंतर त्याच्या बरोबर पुढे-मागे करत यायचो.पण असं किती वेळ करणार मी? त्याला पुन्हा पत्ता देऊन पुढे घरी यायचो. तो म्हणण्यापेक्षा, ती पोती घरी येईपर्यंत आमची मध्यम वर्गीय बत्तीस-चौतीस इंची छाती सारखी धडधडत असायची. पाठीवर ती वजनदार पोती पेलून दोन जिने चढत चढत घामेघुम झालेला तो हातगाडीवाला घरात आणून व्यवस्थित ठेवायचा.
त्या अगोदर मार्चमध्ये तुरीची डाळ घेऊन झालेली असे. तांदुळ नेहमी जुनाच घ्यायचा असे काही संकेत पाळले जात होते.

उन्हाळ्यातच तांबड्या मिरच्या येत.अहो त्या तांबड्याचेही किती छटा आणि प्रकार! बरं मिरची ती मिरची असे म्हणून चालत नसे. आपला अडाणीपण दाखवणेच झाले की ते. काही चपट्या, काही भरल्या अंगाच्या, जाड पण तुकतुकीत; लालसर पण जास्त काळपटच, काही शेलाट्या अंगाच्या, काही पिवळट काटकुळ्या, काही आताच सुरकुतलेल्या पण जहाल, काही बांधेसूद, कोणी ‘लाSSल बावटेS की’, नुसते जवळून काय,दुरून पाहिले तरी ठसका आणणारी, काही जवळही येऊ न देणाऱ्या, त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनीच पहावे लागत असे. मिरच्याच्या लाल प्रदेशातून हिंडताना मी मी करणारेसुद्धा नाक डोळे पुसत मध्येच शिंकत खोकतफिरायचे. प्रत्येकाचे रुमाल बाहेर पडेपर्यंत- हृदय पिळवटणारे बाळा जो जो रे, स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी, चिमणी पाखरं,माहेरची साडी हे सिनेमे पाहून आल्यासारखे- भिजून चिंब झालेले! बरे “शोककारी दु:खकारी” होऊन पाचकिलोचे पोते घेऊन घरी आल्यावर, “अहो नुसत्या लाल म्हणजे काही मिरच्या होत नाहीत. त्या तिखट पाहिजेत. ह्या कसल्या ! मिळमिळीत तांबड्या भेंड्या आहेत.” मग त्या तसल्या किंवा ह्या तशा आणायच्या” हे ऐकायला लागायचे. आम्ही काय! संत चोखोबाच्या “ काय भुललासी वरलीया रंगा”जातीचे. त्यामुळे दिसली लाल, आणली मड्डम अशा मिरच्या आणणार! ती तिखट, झणझणीत, पातळ सालीची, व्यवस्थित भरलेली, अगदी छल्लम छ्ल्लम नको, किंचित कुरळ्या, खळ पडलेल्या गालांची, काहीशी बाकदार, नख न लावता देठ तटकन तुटणारी, अबबSS इतके छत्तीस गुण जमणारी कुठून आणणार? “आणली तीच तिखट मानून घे ”म्हणत नाक डोळे पुसत,मुसमुसत आणि जोरदार शिंक देत निघून जायचो.

जसे वर्षाचे धान्य डाळी तिखट मीठ भरणे, करणे गेले तसे ते टिकवण्यासाठी कडुलिंबाचा पाला,बोरिक पावडर, पाऱ्याच्या गोळ्या ह्या गोष्टीही दिसेनाशा झाल्या. अलिबाबाचे चाळीस चोर आरामात बसतील अशी ती पिपेही बंद पडलेल्या थेटरमधील रिकाम्या खुर्च्या प्रमाणे, रिकामी पडून आहेत. त्या पिपांवर रंगीत चादरीच्या घड्या पसरुन त्यावर वळकट्या, उशा, पांघरूणे ठेवलीत!

हे सर्व का लिहिले तर एकाने व्हाॅट्सअपवर स्वैपाकघरातील काही गोष्टींसाठी सूचनांची भली मोठी यादी पाठवली होती. त्यातील, “ वर्षाचे तिखट टिकवण्यासाठी ते बरणीत/ डब्यात भरण्यापुर्वी तळाशी हिंगाची पावडर टाका” ही युक्ति वाचल्यावर हा लेखन ‘प्रपंच’ केला.
असोSS, आक्छीSS !!

ते हृदय कसे आईचे

चुनाभट्टी/शीव

जगातील पहिली working woman आई होय. ह्या कामकरी-कष्टकरी आईचे विविध रुपात दर्शन होत असते. शेतात, निंदणी खुरपणी वेचणी कापणी करणारी, उन्हात रस्त्यावर झारीने गरम डांबर ओतणारी, पुर्वी कापड गिरण्यांतही काम करणारी, बांधकामाच्या ठिकाणी तर हमखास दिसणारी, भाजीपाला विकणारी, डोक्यावर ‘कपबशा बरण्याब्बाई’ म्हणत दुपारी फिरणारी बोहारीण आणि तशीच घरात काेणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली आपली आई ! मॅक्झिम गाॅर्कीने त्या बाईचा सन्मान The Mother ह्या कादंबरीने केला.

गेल्या १९३०-४० सालापासून कनिष्ठ मध्यम वर्गातील व मध्यम वर्गातील कमी अधिक शिकलेल्या आया घराबाहेर पडून कारखान्यात आॅफिसात काम करू लागल्या.आणि सत्तरीच्या दशकापासून तर जास्तच प्रमाणात चांगल्या शिकलेल्या बायका मुली नोकरी करु लागल्या आणि “वर्किंग वुमन”चे नाव होऊ लागले. आज बहुसंख्य आया-बाया, स्त्रिया स्वतंत्र अर्थार्जन करु लागल्यामुळेWorking Woman भोवती एक वलय निर्माण झाले आहे. आणि त्यात काही गैरही नाही. कामाच्या ठिकाणी पाळणाघरे, दिवसभर मुलांना सांभाळण्याची त्यांची करमणुक करण्याच्या सोयी निर्माण झाल्या आहेत. त्या आवश्यकच आहेत.आणखीही सोयी होणे आवश्यकचआहे. पण अशा सोयी कामगार आया स्वत:च करत आणि आजही करताहेत. कामाच्या ठिकाणीच झाडाखाली, दोन्ही फांद्यामध्ये झोळीचाच “हॅमाॅक” करून, तर कुठे टाकीच्या सावलीत पोतं अंथरून पाळणाघर त्या आया आपल्या लेकरांसाठी आजही करतात. दोन्ही स्थानाठिकाणी, सर्वजणी आयाच आहेत ही महत्वाची समान गोष्ट आहे. आईची मायाममता सारखीच आहे. “ते हृदय कसे आईचे”हेच त्यातले खरेआहे!
जगात कशातही,कोणत्याही- सर्वांचे शेवटचे आशास्थान त्या न्यायातही- गोष्टीत समानता नाही. आहे ती फक्त ‘आई’पणात! मग ती आई घरातली असो की आॅफिसातली!

आंब्याच्या दिवसात घरोघरी आमरस होतोच. आंबे पिळून झाले की पातेल्यातली रसभरीत झालेली एक एक कोय चांगली पिळून दुसऱ्या पातेल्यात टाकली जायची. मग त्या कोयी दुधापाण्यात पुन्हा कोळून रसाच्या पातेल्यात तो रस ओतायचा. रस तयार ह्यायचा. पण त्यात एक गंमत असे. सर्व कोयी कोळल्या नसत. एक कोय अगोदरपासूनच त्या रसात असे. विचारले तर ‘शास्त्र म्हणून” ठेवायची असते असे म्हणत. जेवताना प्रत्येकजण रस मस्त”व्हडी अप्पाS”म्हणत ओरपून ओरपून तर मध्येच पोळीच्या मध्यस्थीशिवाय थेट वाटी तोंडाला लावूनच रिकामी करत असे.’आता पुरेSs’ स्थिती झाली की सर्व “मातृभक्त श्याम”,आई किंवा बहिणी पुन्हा रस वाढायला लागली तर “ नको नको आईला राहू दे की म्हणत वाटीभरून घ्यायचे! जेवणं संपून इकडे तिकडे करून झाल्यावर पुन्हा स्वैपाघरात आल्यावर आई जेवायला बसलेली असे. आणि त्या पातेल्यात रसातळाला गेलेल्या चमचा दोन चमचे रसाच्या ठिपक्यातली कोय आई कोळून तो रस वाटीत घेताना दिसायचे!
त्या कोयीचे हे शास्त्र होते तर! प्रत्येक घरातील आयांचे हेच त्या ‘रसातील कोयीचे वेदोपनिषद’ असते. निळ्या पिवळ्या प्लास्टिकने झाकलेल्या पत्र्याच्या छपरात, पत्र्याच्या किंवा सिमेटच्या पत्र्यांच्या चाळीतील घरातल्या आयांचेही ‘भाकरीच्या कोराचे’ असेल, ‘वशाट चे‘ ‘कालवणाचे ‘ चे असेल पण तेही “रसात ठेवलेल्या एका कोयीचे’च शास्त्र असते!

“दया, प्रेम आणि वात्सल्य ही क्षमेची नेहमीची तीन मंदिेरे आहेत,” असे आ. विनोबा भावे म्हणतात. दयेसंबंधी सांगायला नको. प्रेमात प्रेमिकांना एकमेकांचे दोष दिसत नाहीत. मित्र तर दोषासकट आपल्या मित्राचा स्वीकार करतो. तर वात्सल्य आपल्या मुलाचे दोष पोटात घालून त्याच्यावर निरपेक्ष मायाच माया करत असते. हे तिन्ही गुण फक्त एका आईतच एकवटले आहेत!

काॅलेजात असताना रिडर्स डायजेस्टमध्ये वाचलेले एक अवतरण आठवले. “God cannot be everywhere at the same moment so he created Mother!”

(मातृदिनाच्या निमित्ताने)

कैरीची चटणी

पुणे

घ्या आता! कैरीची चटणीही पाककृति झाली! कशाला केव्हा महत्व येईल ते सांगता येत नाही. कैरीचीच का कोणतीही चटणी कुणालाही करता येते. त्यासाठी साहित्य, कृति, लागणारा वेळ, त्यातल्या वजनमापांचा पसारा आणि घोळ आणि येव्हढ्या साहित्यात किती जण खातील ( आणि ती खाल्ल्या नंतर ICU मध्येच भेटतील), हासगळा प्रपंच करायला कुणी सांगितलं होतं ह्यांना किंवा हिला? अरे, रोज कोण गावजेवण घालतंय काय इथं? आं?

सगळी कथा सांगून झाल्यावर वर पुन्हा ओलं खोबरं आवडत नसेल तर साधे म्हणजे नेहमीचे म्हणजे वाळलेले म्हणजेच सुके खोबरेही चालेल इतके खुलासेवार सांगतात. साखरे ऐवजी गूळ सुद्धा हरकत नाही. तो नसलातर खांडसरी साखर आणि तीही नसली तर खडी साखर घ्यावी. पण देवळात देतात ती डिझायईनर्स खडीसाखर नको; म्हणजेच जाड मोरस साखरे सारख्या दिसणाऱ्या, अंगठीतल्या चौकोनी खड्यासारखी दिसणारी नको तर साधारणत: मिरवणुकीत,मोर्च्यावर, किंवा मैत्रीपूर्ण लढतीत दगडफेक करण्यासाठीही वापरता येतील असे खडे गोटे असणारी खडी साखर घ्यावी. पण तो खडा एकदम दण्णकन चटणीत काय कोणत्याच पाककृतीत टाकू नये. तो घरात खलबत्ता असल्यास व तो कशाला म्हणतात ते माहित असल्यास त्या खलबत्त्यात कुटून मग घालावी. मिक्सरमधूनही फोडता येते पण साधारणत: त्यासाठी चारपाच शेजारणींचे मिक्सर अगोदरच मागून घ्यावेत. चालेल त्यांनी नाके मुरडली तरी. कारण ते चारपाच मिक्सर त्या खडासाखरेने एकदम ‘खडाSSर्डम स्टाप् ‘ करत तोडून मोडून फोडले तरी आपला मिक्सर सुरक्षित राहतो हे न विसरता त्यांच्या नाक मुरडण्याकडे निगरगट्टपणे दुर्लक्ष करावे. व निगरगट्टपणा तुम्हाला काही बाहेरून आणावा लागत नाही. तो तुमच्याकडे जन्मजातच असतो. म्हणूनच तुम्ही त्यांना “ Sorry हं “हे किती गोड अभिनय करून म्हणायचे त्याचा सराव करायला सुरवात करा.(इंग्रजी किSSत्ती कि्त्ती उपयोगी आहेनां?) तिखटा ऐवजी हिरव्या मिरच्याही चालतील. पण त्या लवंगी असल्या तर बेतानेच घ्या. मध्यम तिखट असतील तर मध्यम संख्येनेच(?) घ्या! अगदीच आळणी असतील तर मुठी दोन मुठी घ्याव्यात.परवा एकीने तिखटाच्या गोड मिरच्या किती घ्याव्यात असे त्या पाककर्तीला विचारले होते!!
तसेच हे तिखट, हिरव्या मिरच्या आवडत नसतील त्यांनी तांबड्या मिरच्या वापरायलाही हरकत नाही अशी सवलतही दिली जाते. पण पुन्हा त्या शक्यतो बेडगीच्या किंवा नंदुरबार-दोंडाईचे इथल्या असाव्यात अशा प्रेमळ दमबाजीच्या अटी असतातच. आणि त्या नसतील तर मग मेक्सिकन वापरायची स्वदेशी परवानगीही दिली जाते. पण कदापी ढब्बू मिरची घेऊ नये. कारण चटणीचा उद्देशच नाहीसा होतो, हेही सांगतात.

ह्या पर्यायांमध्ये तेलाची तर फार मोठी भूमिका असते. आता आता तेलाचे दोन तीनच प्रकार होते. खायचे आणि दिव्याचे. ऐपतदार असेल तर डोक्याला लावायचे. इतक्या तेलांत पिढ्या न् पिढ्या जात असत, जगत असत. आता अपरिहार्य आहे म्हणून अनेक प्रकार आले हे खरे. पण पाकृतीत हे बहुतेक सगळे दिले जातात. शुद्धिकरण केलेले, घाण्याचे पण त्यातही पुन्हा बैलाच्या घाण्याचे. त्यातील व्याकरण किंवा गणित जाणणारे पुन्हा “बैलाचे व लाकडी घाण्याचेच” वापरावे असे पर्याय कटाक्षाने देतात. त्यापाठोपाठ नेहमीचे शेंगदाण्याचे, हृदयविकाराच्या खवय्यांसाठी करडीच्या तेलाचा पर्याय हरकत नाही अशी परवानगी दिली जाते. आता संपर्क, सहवास वाढल्यामुळे सरसों का तेल, शुद्ध नारळाचे तेल अशी अखिल भारतीय तेलेही सुचवली जातात. तीही कर्नाटकी कडबूच्या किंवा उकडीच्या मोदकांच्या पाककृतीत! मोहरीच्या( सरसोंका तेल) तेलातील पुरणाचे कडबू किंवा उकडीचे मोदक ही किती चित्तथरारक पाककृती असेल ह्या कल्पनेनेच भीतीचा काटा उभाराहतो! एका नव प्रायोगिक पाककर्तीने शेवयाच्या खिरीला सरसों की तेलातील लसणाची फोडणी सुचवली होती. व नेहमीच्या हिंगा एैवजी हिरा हिंगच घ्यावा पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगितले होते. नंतर बातमी आली होती की ही कृति तिने तिच्या “सास भी बहुत खाती थी“ ह्या सिरियल मधील सासूला खाऊ घातली होती ! सिरियल बंद पडलीच पण ही पाककृति सध्या तुफान व्हायरल झाली आहे.

हे झाले साखर-गुळ, तिखट-हिरव्या मिरच्या, तेले या द्वंद्व समासांचे. असेच त्यातील प्रत्येक घटकाला म्हणजे शेंगदाण्यांऐवजी तीळ, कारळांऐवजी जवसही, चिंचेऐवजी आवडत असेल तर आमसूल आणि पुढे पुढे तर ह्याच चालीवर गोड पाककृतीत, काळ्या मनुका ऐवजी बेदाणे त्याऐवजी खिसमिसही चालेल, खसखस नसेल तर राजगिरा, जायफळ नसेल तर जर्दाळू (आतल्या बीया सकट?), बदाम नसतील तर शेंगादाणे ; हाच पर्याय काजूसाठीही असतो. बडिशेपे ऐवजी जिरे, बरं ते नसतील तर शहाजिरे, विड्याची पाने नसतील तर वडाचीही चालतील, खारिक नसेल तर खजूर, सुके अंजीर नसतील तर वांगीही(!) पण ती चांगली जांभळी बघून व जमल्यास वाळवून घ्यावीत( मग पदार्थ केव्हा करायचा होSs!) हे माना वेळावत किंवा तो डोक्यावरची मापाची नसलेली पांढरी ‘जिरेटोपी’ हलवत सुचवतात. परवा तर मक्याच्या चिवड्याच्या पाककृतीत मक्याचे पोहे नसतील तर अंड्याची टरफले घ्यायला हरकत नाही असे म्हटले. पण त्याच बरोबर ती टरफले गावरानी कोंबडीच्या अंड्याची असावीत किंवा ती नसतील तर बदकांची किंवा बदामी रंगाच्या अंड्याची घ्यावीत असे सुचवले होते! शाकाहाऱ्यांसाठी, शाकाहारी अंड्याची टरफले हे ओघाने आलेच.

अरे, आम्हाला काय पाहिजे असेल ते आमचे आम्हाला नीट सुखाने चार घास खाऊ द्या की रे बाबांनो!

बरं,पण त्या कैरीच्या चटणीचे काय झाले?

कार्ल मार्क्सच्या जन्म द्विशताब्दिनिमित्त

पुणे

कार्ल मार्क्स ( ५ मे १८१८-  १४ मार्च १८८२ )

आपल्या तत्वज्ञानाने जगावर कायमचा ठसा उमटवणारा कार्ल मार्क्स ह्याचीआज जन्म द्विशताब्दी. प्रख्यात नाटककार लेखक आॅस्कर वाईल्ड म्हणतो, “An idea that’s not dangerous is unworthy of being called an idea at all.” कुण्या एखाद्या विचारवंताला हे विधान सर्वथैव लागू होईल तर ते कार्ल मार्क्सलाच!

मार्क्स हा मुळत: तत्वज्ञ, अभ्यासक आणि विचारी होता. त्याच्या खळबळजनक व वेगळ्या विचारांनी प्रभावित विसाव्या शतकात झालेले जसे अनेक होते तितकाच मोठा गैरसमज त्याला भविष्यकाळातील क्रांतीचा अग्रदूत मानणाऱ्यांनी निर्माण केला. बाहेर त्याने मांडलेल्या सिद्धांतावर चर्चा वादविवाद इतर विद्वान करत असताना मार्कस् आपला बराच वेळ ब्रिटीश म्युझियममध्ये प्राचीन काळातील तत्वज्ञ व त्या काळचे अर्थतज्ञ ह्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यात घालवत असे. शंभर वर्षानंतरही मार्क्सचा विचार ‘मार्क्सिझम’ ह्या शब्दाशीच निगडित केला जातो. त्याला सामाजिक आर्थिक क्रांतीचा द्रष्टा,प्रेषित बनवणाऱ्यांनी त्याच्यातील तत्वज्ञाकडे दुर्लक्ष करून मार्क्सिस्टम्हणवून घेणाऱ्या एन्गल्स, लेनिन,स्टालिन,माओ,कॅस्ट्रो ह्यांनी आपल्या क्रांतीला व जुलमी दहशतीच्या कारभारासाठी सोयिस्कर तो अर्थ लावून त्याचा वापर केला. मार्क्स हा माणसाच्या स्वातंत्र्याच्या,स्वत:चे भवितव्य स्वत:च घडवणाऱ्या मूलभूत प्रवत्तीवर विश्वास ठेवणारा होता. (सामाजिक स्थितीचा विचार करता तो कामगार कष्टकऱ्यांचाही त्यात मुख्यत्वे समावेश करतो;माणूसच स्वत: आपले भविष्य घडवतो;विशेषत:कामगार आणि कष्टकरी.) कामगार स्वत: त्याचा सर्वतोपरी उद्धार, जोखडांतून मुक्ती करुन घेऊ शकतो ह्यावर मार्क्सचा विश्वास होता.पण त्याच बरोबर त्याच्यावर हेगेलच्या एकच एक अशा सर्वंकष सामाजिक बदलाच्या वैश्विक नियमाचाही प्रभाव होता. ह्या बदलाचे,परिवर्तनाचे रुपांतर,मला वाटते, वर सांगितलेल्या पुढाऱ्यांनी त्यांच्या क्रांतीत केले.

कोणत्याही विचाराचे, तत्वाचे किंवा तत्वज्ञानाचा विचार करणारे आपल्या दृष्टिकोनातून ते मांडतात. पूर्णपणे वैज्ञानिक असलेल्या उत्क्रांतिवादाचे स्पष्टीकरण शतकानुशतके निरनिराळ्या विद्याशाखांनी आपले अर्थ लावून केले. इतकेच काय विज्ञानाशी संबंध नसलेल्या हिटलर सारख्यांनी Survival of the Fittest चा अशास्त्रीय संबंध लावून तो आपल्या राजवटीसाठी वापरला, तिथे इतिहासाच्या तत्वज्ञानातूनही हिंसक क्रांति व जुलमी हुकुमशाहीचे समर्थन होते ह्यात आश्चर्य ते काय !

व्हाॅल्टेअरने,” जे तुम्हाला,त्यांचे भ्रामक विचार हेच तात्विक सिद्धांत व तेच सत्य आहे ह्याची खात्री करून देतात तेच तुमच्याकडून समाज- घातक गोष्टी सहज करवून घेतात;” असे म्हटलेय ते आजच्या काळातही किती स्पष्टपणे लागू आहे ते पहा! ह्यामध्ये मार्क्सवादाचे समर्थन नाही अथवा टीकाही नाही. पण कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाचा प्रभाव कायम राहणारा आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे. मार्क्सला डावलून कोणत्याही काळात सामाजिक आर्थिक आणि पर्यायाने राजकारणावर विचारविमर्श होऊ शकत नाही. त्याचे दास कॅपिटाॅल हे वाचायला आणि अभ्यासण्यासाठी अतिशय किचकट क्लिष्ट आहे. पण तो तितक्याच बारकाईने वाचावा व अभ्यास करावा हे अनेकजण सांगतात. जगातील इतर देशांतील वाचकांची, विचारवंतांची माहिती नाही. आणि आपल्याकडीलही सर्वांची माहिती नाही. पण मानवेंद्रनाथ राॅय व काॅ.श्रीपाद अमृत डांगे ह्यांनी मात्र त्याचा चांगला, पूर्ण व सखोल अभ्यास केला होता ही माहिती आहे.

जेव्हा रशियात कम्युनिझम मोडकळीस आला तेव्हाही मार्क्सवादाचा हा पाडाव आहे असे लोक म्हणत असताना मी म्हणत होतो की हा मार्कसच्या तत्वज्ञानाचा पराभव नाही पण ज्यांनी तो त्यांच्या पद्धतीने अमलात आणला त्या हुकुमशहांचा पाडाव आहे असे म्हणालो होतो. तत्वज्ञान, विचार नष्ट होत नाहीत. ते विपरितरीत्या अमलात आणणारे पराभूत होतात, असे म्हटले होते. तशा अर्थाचे पत्रही मी म.टा.मध्ये लिहिले होते. असो. The Hindu मध्ये रामन जहाबेगलू (Ramin Jahanbegalu) यांचा कार्ल मार्क्सवरील लेख वाचला त्यावर, व जे ह्यात जे काही विसंगत वाटणारे आहे ते माझे, असे हे ज्ञान अज्ञान मिश्रित टिपण आहे.