Monthly Archives: December 2018

जगमित्र नागा

बेलमाॅन्ट

परळी वैजनाथ गावात नागा नावाचा ब्राम्हण आपल्या कुटुंबासह राहात होता. गावाबाहेरच तो एका झोपडीत राहात असे.पुढची मागची मोकळी जागा रोज शेणाने सारवली जायची. शेणसड्यांनी शिंपली जायची. झोपडी आतून बाहेरून स्वच्छ असायची. सदाफुली,गुलबक्षी कोरांटीची तीन चार फुलझाडे त्या झोपडीला शोभा आणीत. गावात आणि आजूबाजूच्या दोन तीन वस्त्यांमध्ये भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा. रोज रात्री गावातल्या देवळात हरिरसगुण गात कीर्तन करायचा. नागाच्या रसाळ कीर्तनाला लोकही गर्दी करीत. झोपण्या अगोदर घरातील सगळे मिळून थोडा वेळ भजन करून झोपी जायचे.
सगळ्यांशी मिळून मिसळून आणि कोणाच्याही ना अध्यात ना मध्यात असे त्याचे वागणे होते. सर्वांशी नेहमी शांतपणे गोड बोलायचा. इतकेच नव्हे तर गायी वासरेही नागा चालला की त्याला खेटून चालत. तो दिसला की धावत येत. मान हलवून गळ्यातली घंटा वाजवत आम्ही आलो आहोत सांगत. मध्येच हलकीशी ढुशी देत. काही नाही तर त्याला खेटून शांत उभी राहायची. नागाही गायी बैलांच्या वासरांच्या पाठीवर हात फिरवत किंवा त्यांच्या मानेचे पोळ हाताने घासून पुढे जाई. नागा जसा जगाचा मित्रच होता. सगळेजण त्याला जगमित्र नागा म्हणत. थोडक्यात, गावात नागा ब्राम्हणाला कोणीही वाईट म्हणत नसे.

एखाद्याचा चांगुलपणा हाच काहीजणांसाठी त्याचा हेवा द्वेष करण्याचे कारण ठरते. गावातले लोक नागाचा आदर करतात त्याच्याविषयी चार चांगले शब्द काढतात ह्याचाच दुस्वास करणारे, त्यावरून नागाचा विनाकारण द्वेष करणारे तीन चार लोक होतेच. असे लोक सर्व ठिकाणी असतात म्हणा.

एकदा रात्री नामा कीर्तन आटोपून गावा बाहेरच्या आपल्या झोपडीत आला. सगळेजण रोजचे भजन करून झोपले. त्या रात्री नागाच्या वाईटावर असलेल्या लोकांनी नागाच्या झोपडीवर पेटते बोळे फेकून झोपडी पेटवून दिली. ज्वाळा वर जाऊ लागल्या तसे ते दुष्ट गावात निघून गेले. दुरून झोपडी पेटल्याचे पाहात झोपून गेली. इकडे नागाला आणि त्याच्या बायकोला जाग आली. मुलांना पांघरूणात गुंडाळून जवळ घेऊन बसली. नागाने विठोबाचा धावा सुरु केला. सामान्य नागाला देवाशिवाय कोण आधार असणार?

म्हणे धाव आता रुक्मिणीकांता। दीनबंधो अनाथनाथा। तुजवाचोनि आम्हाल रक्षिता। कोण असे ये समयी।।

भक्ताने केलेल्या तळमळीच्या हाकेला आपले सुदर्शन चक्र हाती घेऊन देव धावून आला. च्क्रपाणीने कमाल केली. आगीचे लोळ वरच्यावर उठून हवेतच विझून जात. खाली त्याची ठिणगी नाही. निखाराही नाही,कोळसाही नाही! मग राख तरी कुठे असणार? गावातल्या लोकांना दुरून आगीच्या ज्वाळा दिसल्या. गावात गडबड उडाली. “ जगमित्र नागाच्या खोपटाला आग लागली.” “ लागली का लावली?” “ हे त्यांचेच काम असणार!” अशा चर्चा चालू होत्या. लोक हळहळत होते. तशा पहाटे पहाटेच नागाच्या झोपडीकडे आले. नागा आणि त्याची बायको बसलेली. मुलं पांघरुणात गुंडाळून झोपवलेली होती. नागाचे भजन चालूच होते. बायकोच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते.

नागा आणि त्याचे कुटुंब जिवंत आहे हे पाहून लोकांना आनंद झाला. आश्चर्यही वाटले. वर वर उठत चाललेल्या भडकलेल्या आगीचे लोळच्या लोळ त्यांनी पाहिले होते. पण इथे झोपडीत अंगणात धुमसती राख नाही, निखारे नाहीत की कोळसे नाहीत;जळलेले काटे कुटक्या काही नाही! नागाच्या विठ्ठ्लाच्या तीव्र भक्तीची प्रचिती त्यांना प्रत्यक्षच पाहायला मिळाली. विठोबाने आग वरच्यावर झेलली. एकही लोळ खाली येऊ दिलाच नाही. आग वरच्यावर विरघळून गेली.

हे आश्चर्य पाहून नागाच आपला विठोबा ह्या साध्या भोळ्या भावनेने ते नागाला नमस्कार करू लागले.जमलेल्या सगळ्या लोकांनी जगमित्र नागाबरोबरीने “ पुंडलिक वरदाSS हाSSरी विठ्ठल ! पंढरीनाथ महाराज की जSSय!” अशी हरिनामाची गर्जना केली.

गावकऱ्यांनी नंतर विचार केला की आपण नागाला थोडी शेतजमीन द्यावी. तसे ठरवूनच ते नागाकडे जमले. त्यांनी आपला विचार त्याला सांगितला. त्याच्या नावे कागदपत्र तयार करून आणले होते. ते त्याला दाखवून पुढे म्हणाले की ह्याचे सर्व उत्पन्न तुझे. सगळे ऐकून नागा म्हणाला,” मला भिक्षुकाला जमीनजुमला कशाला हवा? गावातल्या
घरांतून उदार भिक्षा मिळते. त्यात आमचं भागते.

शेतीभातीच्या भानगडीत मला पाडू नका. अहो,पांडुरंग आपले रक्षण करतो. परवा झोपडी जळाली. तुम्ही पाहिलेच की आम्हाला पांडुरंगाने एव्हढीशीही झळ लागू दिली का? पांडुरंग आपल्याला सांभाळतो ह्याची ह्यापेक्षा दुसरी खात्री काय पाहिजे?” नागाने इतके सांगूनही गावकरी ऐकेनात. त्यावर गावकरी म्हणाले,” आम्ही जमीन तुझ्या नावाने करणार. गाव कसेल जमीन. जे पिकेल त्यातले तुला पाहिजे तितके घेत जा.बाकी राहिल ते आम्ही गावाच्या उत्सवा-गावजेवणाच्या खर्चासाठी लावू. कागदपत्रावर गावकऱ्यांच्या सह्या झाल्या. जगमित्र नामा हे सगळे तटस्थपणे पाहात होता. गावकऱ्यांचा शब्द पडू द्यायचा नाही म्हणून तो कुटुंबाच्या पोटापाण्याला लागेल तेव्हढेच दरवर्षी घेई. दिवस असे नेहमीसारखेच चालले होते.

गावात एक यवन नविन हवालदार बदलून आला.हेही काही दिवस चांगले जात होते. पण गावात नव्या साहेबापुढे गोंडा घोळणारे लोक असतात. जगमित्राचा विनाकारण दुस्वास करणारे लोकही तेच करू लागले. एके दिवशी हवालदाराच्या काय मनात आले ते कळेना. त्याने नागाला आपल्या कचेरीत बोलावले. नागाला कचेरीत बोलावले हे कळल्यावर गावचे लोक काही वजनदार लोकांना बरोबर घेऊन कचेरीत आले.

“ नागा तू दुसऱ्या काही लोकांची जमीन हडपून उत्पन्न खातोस असे हुजुराच्या कानावर गेले. त्यांनी तुझी जमीन जप्त करण्याचा हुकुम मला दिलाय. इतकी वर्षे खाल्लंस उत्पन्न आता काही मिळणार नाही.” त्यावर गावातल्या लोकांनी सगळी खरी परिस्थिती हवालदाराला सांगितली.” अहो गावकऱ्यांनीच सह्या-अंगठे करून नागाच्या नावावर खुषीने करून दिलीय. हे कागदपत्र पाहा.” म्हणत कागदही काढले. इतकेच काय त्यांनी नागाचे चांगले गुणही सांगितले. नागा सज्जन आहे. तो कुणाची दिडकी घेणार नाही तिथे तो दुसऱ्याची जमीन कशाला हडप करेल? सगळे सांगून झाले; पण तिकडे दुर्लक्ष करून तो हवालदार घुश्शाने म्हणाला,” ते काही मला सांगू नका, काही दाखवू नका.जमीन जप्त झाली आहे. तिथे आता कुणीच जायचे नाही” हे ऐकल्यावर नागा जगमित्र आहे हेच सहन न होणारे ते चार दोन लोक हातावर टाळी देत एकमेकांत बोलू लागले,” नागाची दिवाळी संपली की रे!”
सुनावणी नाही काही कुणाची बाजू ऐकली नाही आणि नागाची जमीन लगेच जप्तही झली! नामा गप्पच होता इतका वेळ. पण तो आता म्हणाला,” हवालदार मित्रा, जमीन माझी नव्हती आणि नाहीच.पण गावकऱ्यांनी आपल्याच जमीनीतला तुकडा वाटा काढून ती फक्त माझ्या नावावर केली. जप्त केलेली तुम्ही जमीन माझी नाही,गावाची केली. हा अन्याय गावावर का? अहो गावच्या लोकांचे मित्र व्हा. त्यांची जमीन परत करा.” नागाचे बोलणे ऐकून त्या यवन हवालदाराचा घुस्सा आणखीच वाढला. तो कातावून म्हणाला, “ओ नागा, हे काय मित्रा मित्रा चालवलंय मघापासून? तुला लोक जगमित्र म्हणतात म्हणून तू मलाही मित्रा मित्रा कराय लागलास का? तमीजसे बोल, काय?” हवालदाराच्या मनात, नागाला लोक प्रेमादराने जगमित्र म्हणतात त्याचा हेवा वाटत होता! ती मळमळ बाहेर आली! नागा काही बोलला नाही हवालदाराला. त्याच्याकडे तो शांतपणे पाहात उभा होता.गावकरीच पुन्हा पुन्हा त्याची व आपली बाजू मांडू लागले.

अखेर हवालदाराला काय वाटले कुणास ठाऊक? तो नागाकडे आणि गाववाल्यांकडे पाहून नागाला म्हणाला,”नागा,माझ्या मुलीचे लगीन है. तिच्या देवकासाठी आमच्या घरात वाघ लागतो. तो घेऊन ये. नाही तरी तू जगमित्र म्हणवून घेतोस. अरे गावची गाईगुरं वासरं कुणाचेही अंग चाटतील; नजदिक येऊन राहतील. त्यात काय विशेष मोठे आहे. जगमित्र असशीलच तर वाघ घेऊन ये. मला मित्र मित्र म्हणत होतास. मी तुला एक सवलत देतो. बघ,मित्रासाठी वाघ घेऊन ये. हां पण आज संध्याकाळ पर्यंत आणला पाहिजे वाघ! वाघ आण जमीन घेऊन जा. !”

ही जगावेगळी,जीव घेणारी सवलत ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. मनातून सर्वच घाबरून गेले. नागा शांत होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, “हवालदार तुला मी चांगल्या भावनेनेच मित्रा म्हणालो होतो. आता तुझ्या लेकीच्या लग्नात देवदेवकासाठी पाहिजे म्हणतोस तर प्रयत्न करतो. पण मला आता माझं काही खरं नाही असे वाटायला लागले आहे.. पण पुन्हा सांगतो ती जमीन माझी नाही. गावकऱ्यांनी प्रेमाने ती माझ्या नावे करून दिली. पण वाघ तर मलाच आणला पाहिजे. बघतो.”
नंतर तो आपल्याशी मनात बोलू लागला, जमीन मी मागितली नव्हती. ह्या उपाधीत मला गुंतवू नका अशी गावाची विनवणी करत होतो. पण गावाच्या प्रेमापुढे माझे काही चालेना. माझ्या जवळ पांडुरंगाची आळवणी करत त्याच्याकडे भीक मागण्या शिवाय आता दुसरे काय आहे. विठ्लाच्या भरवशावर आल्या प्रसंगाला तोंड दिलेच पाहिजे. इतका विचार केल्यावर तो हवालदाराला व गावकऱ्यांना नमस्कार करून तिथूनच तडक रानाकडे निघाला.

आगीचे संकट झोपल्यावर आले होते. हे तर जागेपणी डोळे पांढरे करणारे संकट नागा ब्राम्हणावर आले होते. नागा जंगलात आला. विठोबाची मनापासून तळमळीने, अतिशय तीव्रतेने आळवणी करू लागला. “जय जय अनाथबंधो करूणाकरा। भक्तवत्सला कृपासागरा। पतितपावना विश्वंभरा। दीनोद्धारा रुक्मिणीवरा,पांडुरंगा, माझी तुला करुणा येऊ दे रे दयाघना! कृपा कर ! आता उशीर नको मायबापा! धाव पाव विठाई माऊली, लवकर ये. हवालदार माझा मित्र जाण। त्याच्या कन्येचे आहे लग्न । वाघाचे दैवत प्रतिष्ठे कारण । पाहिजे सत्य तयासि।।त्याच्या कार्यास ह्या समयी पांडुरंगा विठ्ठला तू धावून ये. तू नाही आलास तर तुझ्या पायाशी माझा हा देह लगेच ठेवीन. विठठ्ला गोविंदा अशावेळी तू नाही आलास तर मी जगून तरी काय उपयोग? “
नागाची ती अार्ततेने अनन्यभावाने केलेली विनवणी ऐकून एका मोठ्या वाघाचे रूप घेऊन चक्रपाणी पंढरीनाथ तात्काळ प्रकट झाले.

एक मोठी डरकाळी फोडून वाघरूपी विठ्ठलाने नागास विचारले,” अरे नागा, तुला कोण त्रास दतोय? दाखव तो मला.एका घासात त्याला खाऊन टाकीन!” हे ऐकल्यावर नागा वाघापुढे हात जोडून म्हणाला ,” महाराज! हवालदार माझा मित्र झालाय. त्याच्याकडे मंगल कार्य आहे. म्हणून तुम्हाला मी प्रार्थना करून बोलावले केशवराजा,इथे आज हिरण्यकश्यपु नाही. आणि मी प्रल्हादा एव्हढा महान भक्त नाही. तरी नरहरी श्यामराजाच्या उग्र संतापाची आवश्यकता नाही. पांडुरंगा तुमचे रोजचे सौम्य रूप पाहिजे. अहो त्या यवन हवालदाराच्या मुलीच्या लग्नासाठी आपण चालले आहोत.” त्यावर महाव्याघ्ररूप पुंडलिकवरदायी हरिनारायण नागाला बोलले, “ते ठीक आहे. हरकत नाही. मला घरून ठेवू आणि तू चल. पण जे दुष्ट असतील त्यांना गमजा दाखवतोच ते तू पाहा.”

नागाने आपले उपरणे वाघोबा झालेल्या विठोबाच्या गळ्यात बांधले. एक टोक धरून तो गावाकडे आला. नागाबरोबर मोठा वाघही येतोय हे पाहून गावचे लोक घाबरून आोरडत घराकडे पळत सुटले. घाबरून पळत सुटलेल्या एकेकांची विशेषत: नागाचा अकारण द्वेष करणारी मंडळींची तर भलतीच फजिती होऊ लागली. पळता पळता धोतरात पाय अडकून पडले, तर वाघ कुठे आहे हे मागे वळून पाहताना पुढच्या खाचखळग्यात काही धडपडले. तर काहींची भीतीने गाळण उडून पळताना धोतरे फिटू लागली. वाघाला पाहून घाबरलेली पोरे पळताना तशाही अवस्थेत, मोठ्या माणसांची पळता भुई थोडी झाली हे पाहून, एकमेकांत ओरडून बोलू लागली. “ अरे शिरप्या! त्या गणपतरावाचं मुंडासं उडून चाललय बघ!” “ अरे मुंडाशाचं काय बघतोस त्या जालिंदरमामाचं धोतर गळून पडतेय त्ये बघ!” “ पळ, पळ,पळा “ ओरडत गावातले लोक ऱ्घरात जाऊन कवाडे बंद करून बसली. तेव्हढ्यात “ नागा झाला तरी त्याने वाघाला घेऊन येणे ठीक केले नाही म्हणत वेशीचा प्रचंड दरवाजा बंद करून टाकला.
केशवराज महाव्याघ्र वेशीपाशी आले. आणि त्याने आपली फक्त शेपटी जमीनीवर अशी आपटली की मोठ्या आसुडाचा फाट ऱ्फटाक्क् असा कडाडून आवाज आला! तसा एक धुळीचा मोठा लोट गावावर पसरला! वेशी आतले लोक दचकले. पाठोपाठ ‘प्रलयजलधिनादंकल्पकृत वन्हिवक्त्रम’ अशी नरहरी शामराज, नरसिंहासारखी डरकाळी फोडली. त्या गगनभेदी आवाजानेच वेशीचा दरवाजा तीन ठिकाणी तुटून फळ्या चिरफळ्या होऊन धाडकन खाली पडला. त्या फळ्या चिरफळ्या तुडवत राजेशाही थाटात महाव्याघ्र केशवराज एकेका पावलाने दहा दहा भूकंपाचे हादरे देत आत शिरला!

तो आवाज ऐकून अनेक गर्भगळित होऊन जिथे होते तिथेच मटकन बसले. मोठे बाप्येही दारा आडून फटीतून खिडक्या किलकिल्या करून त्या महाव्याघ्राचे रूप न्याहळीत बसले. बायांनी तर ‘राम राम’ ‘ रामकृष्ण हरीचा’ जप थांबवलाच नव्हता.
“ अरे हे नागाच आहे आपला?” कसला भारी वाघ घेऊन आलाय? भ्रम आहे सगळा!” “ अहो हा जादूटोणा आहे!” “जादूटोणा आहे ना मग घरात का लपून राहिले सकाळचा लोटा घेवून तुमी?” आं? बाहिर जाऊन वाघाच्या नको नागाच्या पाठीवर हात फिरवून ये, जा की.” हे सवाल जवाब चालूच होते. जाणती म्हणवणारी माणसे,”जगमित्राने भक्तीच्या बळावर देवालाच आणले आहे.अहो नाहीतर कोणता वाघ गळ्यात पंचा बांधू देईल?” पण हे सांगताना ह्या सर्व सज्जनांच्या कवळ्या थाड थाड आपटत होत्या.भीतीने सर्वात जास्त तेच काकडले होते. खिडक्यांची अर्धीच फळी किलकिली करून तोतरं बोलू लागले होते! दुसरा एक सांगत होता, “ अहो पंडीत, तो वाघच आहे. नागाने हवालदाराला खाऊन टाकण्यासाठीच आणलाय.” वाघ असो की विठोबा लोकांचे तर्क कुतर्क थांबत नसतात.

नागा मात्र लोकांना ओरडून सांगत होता,” लोकांनो घाबरू नका. हा वाघ कोणालाही काही करणार नाही. मी ह्याला कबूल केल्याप्रमाणे हवालदाराला द्यायला चाललोय.” इतके ऐकल्यावर लोकांनी आपली दारे खिडक्या थोड्या जास्त उघडल्या. इतकेच केले!

नागा वाघाला घेऊन पुढे गेला ह्याची खात्री झाल्यावर बरेच लोक तिकडे निघाले. एरव्ही घरात गावात वाघिणी असलेल्या बाया, राम राम म्हणत, पोराबाळांना छातीशी पोटाशी, मिठीत जवळ घेऊन स्वत:च्या तोंडात पदराचा चुरगळ घेऊन बसल्या होत्या त्या ‘वाघिणी’ही पाठोपाठ निघाल्या.

हवालदाराच्या गल्लीत, नागा वाघ घेऊन आलाय हे पोराटोरांच्या मोठ्या कालव्यावरून सगळ्यांना समजले. घरांची दारे कवाडे पटापट बंद झाली. हवालदारही घाबरून घरात लपून बसला. नागाला आपण जगमित्रावरून म्हणालो काय, त्याची हेटाळणी काय केली,आपण त्याला वाघ आणण्याची अट घालून मोठी ‘सवलत’ दिल्याचे नाटक काय केले ते आठवून हवालदाराने हंबरडा फोडायचेच बाकी राहिले होते. पण गळा काढून रडण्याचे काम त्याच्या बायकामुलांनी अगोदरच जोरजोरात सुरु केले होते!
“ हवालदार मित्रा म्हणू का हुजुर म्हणू! तू सांगितल्याप्रमाणे वाघ आणलाय. बाहेर येऊन पाहा.” नागा इतके म्हणतोय तोच वाघविठोबा नागाला हिसडा मारून हवालदाराच्या अंगणात मोठी डरकाळी फोडून उभा राहिला. फाड् फाट्ट् शेपटी आपटली आणि गुरगुरत एक फेरी मारून उभा राहिला. हे ऐकून घराघरातला गोंधळ आणखीच वाढला. काही जणांची दातखीळ बसली. हवालदाराच्या घरात पुन्हा एकच आकांत झाला. नागा पुन्हा हवालदाराला म्हणाला,” तुझ्या मुलीचे देवक बसवायचे त्यासाठी वाघ आलाय. ये बाहेर ये तो आता तुझाच आहे. “ नागा बोलला की लगेच वाघाने धडकी भरवणारी डरकाळी फोडली. नागाचे बोलणे ऐकून जागचा उठलेला हवालदार डरकाळी ऐकून खालीच कोसळला! गारठून गप्प झालेली गल्लीही आता रडू ओरडू लागली.

नागा वाघाजवळ जाऊन म्हणाला,” तुम्ही मला वाचवलेत. माझे रक्षण केले. मुख्य म्हणजे माझी गरीबाची पत राखलीत. हा हवालदार त्याच्या मुलीच्या मंगलासाठी तुम्हाला घेऊन या म्हणाला. शांत व्हा. तुमचा मूळ प्रेमळ कृपाळूपणा धरा.” इतके विठोबाला सांगून त्याच्या पाठीवर नागा हात फिरवित थांबला.
हवालदाराच्या घरातून बायको त्याला सांगत होती ते बाहेर ऐकू येत होते. “ अहो आपल्या बालबच्चांसाठी तरी बाहेर जा. तुमचे काय वय झालं आहे, होणारच आहे. बिमार पडून तरी तुम्ही जाणारच.पोरांची सब जिंदगी पडलीय अजून. आपल्या बेटीसाठीच आणलाय म्हणतो तो वाघ.जा, बाहेर जा. आम्हाला तरी वाचवा.” ते ऐकून नागाही म्हणाला,” हवालदार तू एकटाच नाही तुम्ही सगळे या. तुम्ही सगळे आबाद राहाल. या, हा वाघदेव तुम्हाला काही करणार नाही. असा वाघ कुणालाच पाहायला मिळत नसतो. हेच महिपतीबुवांच्या शब्दांत नागा म्हणतो,” जे चंद्राहूनि शीतळ बहुत। जे अमृतासीही जीववित। ते दृष्टीसी देखोनि दैवत ।भयभीत मनी का होता। नाना योग याग करिता ऋषी। लवकरी प्राप्त नव्हे तयांसी। प्राप्त नव्हते ज्याचे चरण । ते दैवत दृष्टीसी देखोन । तुम्ही का लपून बैसावे।। “

हवालदार दरवाजा हळूच उघडून भीत भीत बाहेर आला. नागाला हात जोडून करूणा भाकित बोलता झाला,” आता कृपा करूनि मजवर। वाचवी सत्वर दयाळा।” मी तुझ्याशी आकसाने वागलो. त्याचे आज मला तात्काळ फळ मिळाले. तुला जगमित्र का म्हणतात त्या मागचे सत्यही कळले. ह्या वाघाने ते समजावून दिले.तू वाघ आणून दाखवलास. आम्हा घरातल्या सगळ्यांना तुझ्यामुळे दैवताचे दर्शन घडले. माझ्या मुलीचे देवक जगमित्र नागा तुझ्यामुळेच साक्षात “देवप्रतिष्ठे”ने आज झाले.”
हवालदार आणि त्याच्या घरातील सगळी मंडळी जगमित्र नागा आणि वाघासमोर हात जोडून होती!

वाघाला घेऊन जाताना नागा हवालदाराला म्हणाला, “मी जगमित्र आहे की नाही मला ठाऊक नाही. पण तुझ्यामुळे माझे दैवत मला भेटले. तू मात्र माझा मित्र झालास. वाघ आणून दे जमीन परत करतोस म्हणाला होतास.ती जमीन माझी नाही. गावकऱ्यांना परत दे.” नागाच्या प्रत्येक बोलाला हवालदार हात जोडून मान खाली घालून हो हो म्हणत होता.
जमलेले सर्व लोकआमचा नागा खरा जगमित्र आहे असे पुन्हा पुन्हा म्हणू लागले.

नागा आपल्या जीवीच्या जीवाला, विठूरायाला घेऊन पुन्हा अरण्यात गेला. तिथे दाट झाडीत पंढरीच्या परब्रम्हाने, संतांच्या सावळ्या विठूरायाने, शंख चक्र गदाधारी चतुर्भुज रुपात आपल्या भक्ताला दर्शन दिले. नागा त्या अभूतपूर्व, अद्भुताहूनि अद्भूत,आणि डोळ्यांनाही अमृताहूनी गोड अशा सगुण साकार भगवंताकडे डोळे भरून पाहात असतानाच पांडुरंगाने त्याला प्रेमाने आलिंगन देऊन ‘आपणासरिखे केले तात्काळ!”

परिसा भागवत

बेलमाॅन्ट

संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, एकनाथ तुकाराम ही नावे त्यांची चरित्रकथा, त्यांच्या जीवनातील काही घटना कुणाला माहित नाहीत? बहुतेकांना माहित आहेत. पण बरीच संत मंडळी अशी आहेत की त्यापैकी काहींची आपणास नावे किंवा प्रसंग घटना बहुतेकांना माहित नसण्याची शक्यता आहे. तर अशा काही संतांच्या मांदियाळीतील, गर्दीतील काही संतांच्या गोष्टी आपण ऐकू या. अशा गर्दीतल्या किती संतांविषयी सांगणे मला जमेल ते मला आज सांगता येणार नाही. पण सुरुवात तरी करायला काय हरकत आहे? खरंय की नाही?

आपले बहुतेक सर्व मराठी संत हे विठ्ठलाचे भक्त आहेत. वारकरी पंथाचे म्हणजेच भागवत आहेत. पण असाही एक भक्त पंढरपुरातच,तेही संत नामदेवांच्या काळातच,होऊन गेला ; तो रुक्मिणीचा भक्त होता. त्याचे नाव भागवत होते पण तो परिसा भागवत म्हणूनच ओळखला जातो.

भागवत रुक्मिणी देवीचा मोठा एकनिष्ठ भक्त होता. रोज पांडुरंगाच्या देवळात जाऊन तेथील देवी रुक्मिणीची तो मनापासून पूजाअर्चा करीत असे. त्यानंतर ध्यानस्थ होऊन तिचेच तो ध्यानचिंतन करत बसे. मग भजन करून नैवेद्य दाखवून घरी येई. घरी आले की संसारप्रपंचातील रोजचे व्यवहार चालू होत असत. भागवत मनापासून दिवसभर ‘उठता बसता खाता पिता’ रुक्मिणी मातेचे स्मरण करण्याचा प्रयत्न करत असे. ते चालूही असेल पण प्रपंचाच्या रहाटगाडग्यात अडकल्याने ते एकचित्ताने होत नाही ह्याची त्याला जाणीव होती. म्हणून तो मनात खंत करीत असे.

असाच एकदा भागवत रुक्मिणीपुढे तल्लीन होऊन ध्यानस्मरण करत बसला असता रुक्मिणीने त्याला दर्शन देऊन त्याच्यबावर कृपा केली. इथेच न थांबता ती भागवताला म्हणाली, “ भागवता बाळा तुझी काही इच्छा असेल तर सांग. आपल्याला आई रुक्मिणीचे प्रत्यक्ष दर्शन झाले ह्या परमानंदात असलेला भक्त भागवत म्हणाला,”आई! तुझी भक्ति अखंडित करता यावी ह्या शिवाय माझं तुझ्यापाशी दुसरे काय मागणे असणार? “ रुक्मिणीने ते ऐकून घेतले. पण भक्ताच्या मनातले त्याच्या दैवताशिवाय कोण चांगले जाणू शकते? शिवाय रुक्मिणीकांत पांडुरंगापेक्षा जगाचे व्यवहार कशावर चालतात ह्याचे तिला पूर्ण ज्ञान होते. तिथल्या वास्तवाची तिला चांगली माहिती होती. तिने भागवताला एक परिस दिला. “ आता तुझ्या भक्तीआराधनेत, भजन-पूजनात व्यत्यय नाही ना येणार?असे हसत हसत म्हणाली.

आई रुक्मिणीने आपल्याला प्रत्यक्ष दर्शन दिले ह्या परमानंदात असलेल्या भागवताला देवीने परीसही दिला ह्याचा व्यावहारिक आनंदही दुप्पट झाला!

भागवताने घरी आल्यावर हर्षभरित होऊन देवळात घडलेली हकीकत आपली बायको कमळजेला सांगितली. परिस दाखवला.एका सुईला तो लावून तिचे सोने झाल्याचे पाहून दोघांचाही आनंद पोटात मावेना! भागवत निष्ठावान भक्त होता तरी त्याचे पाय जमिनीवर होते. तो बायकोला आणि स्वत:लाही सावध करत म्हणाला,”आपल्या जवळ परिस आहे हे कुणालाही कळता कामा नये. कुणापाशीही बोलू नकोस. आपण पंढरपुरी राहतो आहोत हे विसरु नकोस. इथे आणि आसपास संतसज्जनांची वस्ती आहे. त्यांना जर समजले की भागवताने रखुमाईला मागून काय मागितले तर परिस! बरं मी न मागता देवीने दिला म्हटले तरी देवी रखुमाईने सुद्धा देऊन दिले काय तर परिस! असे ते माझ्या आईलाही बोल लावतील. त्यापेक्षा गरीबासारखे गप्प बसलेले किती बरे! “

भागवताचा दिनक्रम चालू होता. नेहमीपेक्षा दुप्पट उत्साहाने जास्त निश्चिंततेने चालला होता.त्याने परिस एकदम पहारीला लावला नाही. टाचणीलाच लावला. बाहेर वावरताना भागवताचा वेष पूर्वीचाच पण मुद्रा जरा दीनवाणी आणि वागण्यातील वृत्तीही उदास दिसू लागली. घरात सुग्रास जेवण पण बाहेर आपण कदान्न खातो असा चेहरा घेऊन वावर. तरीही, घरात रोज चांगले चुंगले, गोडा धोडाचे, दुधा तुपाचे भोजन होत असे. त्याची देहावर येणारी कांती कशी लपवली जाईल! तरी अनेक पंढरपुरकर त्या कांतीला भक्तीचे तेज मानीत. तेही खरे असणार. पण चांगल्या अन्नाचाही तो परिणाम असणारच.
भागवत हा विरक्ती दाखवत होता. काही प्रमाणात त्याच्या भक्तीचे ते फळ असेलही. पण समाजातले सज्ञान परीक्षक जन होते त्यांना भागवताला काही तरी घबाड लाभले असावे हे त्यांना जाणवत होते. जसे वक्त्याला श्रोत्यांच्या चेहऱ्यावरून आपले व्याख्यान त्यांना समजले, आवडले का ते कंटाळवाणे रटाळ होतेय हे लक्षात येते; दिव्यात तेल आणि वात आहे का नाही हे प्रकाशच सांगतो तसे चतुर, जाणत्या जनांना भागवताची विरक्ति, उदासीन वृत्ती खरी नाही असे वाटत होते.

भागवताची बायको नेहमी प्रमाणे एकदा चंद्रभागेवरून पाणी घेऊन निघाली असता तिला संत नामदेवाची पत्नी राजाई भेटली. कमळजाला पाहताच राजाई म्हणाली,” ही मी आलेच घागर भरून. मी येईतो थांब.दोघी मिळून जाऊ.” राजाई पाणी घेऊन आली. दोघी चालू लागल्या. बोलू लागल्या. मध्येच थांबायच्या. राजाईचे लुगडे साधेच. तसेच खाणेपिणेही बेताचेच. ती रोड झाली होती.अशक्त दिसत होती. राजाईकडे निरखून पाहात कमळजा म्हणाली,” राजाई कसं चाललंय तुझं? बरं आहे ना?खरं सांग. शेजारीण मैत्रिणीपाशी काही लपवायला नको. लपतही नाही.” “अगं लपवायचं काय आहे? सांगण्यासारखं वेगळं काही नाही. आमचे हे पांडुरंगाच्या भजनभक्तीतच रंगलेले. त्यातच गुंगलेले. धंदा व्यवसायाकडे पाहिजे तेव्हढे लक्ष नाही. चाललंय आमचं रुटुखुटू!”नामदेवाची राजाई म्हणाली तशी कमळजा जरा उत्साहानेच सांगू लागली,” “ ह्यांनी रुक्मिणीची भक्ति केली. आमचं बरे चाललेय बघ.”दोघी पुढे निघाल्या. चालता चालता कमळजा सांगू लागली,” अगं भावजींना म्हणावे ज्या झाडाला ना फूल ना फळ लागत नाही त्याला पाणी घालून व्यर्थ का शिणावे? विहिरीसी न लागता जीवन। व्यर्थच उकरायाचा शीण। तेवी प्रसन्न न होता रुक्मिणीरमण। कासया करावे आराधन।। अगं जो सोयरा लग्नमुंजीतही आहेर देत नाही त्याला कोणी कधी बोलावते का? पंढरीनाथाचे इतके भजन करूनही जो आपल्या भक्ताची साधी रोजची पोटापाण्याची चिंता सोडवत नाही त्याची भक्ती का करावी? ती काय कामाची? “इतके कमळजा राजाईला बोलली तरी तिला राजाईबद्दल प्रेम होते.,कमळजाचे घर आले. ती राजाईला म्हणाली, “आत ये, जरा थांब.” कमळजा आत जाऊन परिस घेऊन आली. “माझ्या नवऱ्याने रखुमाईची अनन्यभावाने भक्ती केली. ती माऊली प्रसन्न झाली. तिने आम्हाला हा परिस दिला”हा परिस घे. तुझी गरज भागव. लागलीच मला परत आणून दे. काहीही झाले तरी परिस मला द्यायला विसरू नकोस. माझी तुला विनवणी आहे ही. येव्हढे चुकवु नकोस. आपल्या दोघींच्याही नवऱ्यांना यातले काही समजू न देता सगळे लवकरझाले पाहिजे. कसेही कर पण परिस आणून दे.”
राजाई हरखून गेली होती. घरी आली. घरातल्या सुया कातऱ्या किल्ल्याना परिस लावून सोन्याच्या केल्या. त्यातलेच किडुक मिडुक सोनं घेऊन सोनाराकडे गेली. सोने देऊन द्रव्य घेतले. राजाई, गोणाई, कमळजा काय सर्व बायकाच. राजाई पहिल्यांदा वाण्याकडे गेली. संसाराला लागणारे धान्यधुन्य. पिठ मिठ, तेल तिखट, गूळ पोहे, खारिक खोबरे, हिंग जिरे खडीसाखर बत्तासे सर्व काही घेतले.

नामदेवासाठी धोतर अंगरखा, मोठे पागोटे; मुलांसाठी कापड चोपड, जनीसाठी लुगडे खण आणि सर्वात शेवटी स्वत:साठी अगदी बेताची जरीच्या काठा पदराचे साधेच लुगडे आणि खण घेऊन घरी आली. चारी ठाव स्वैपाक केला. भांडी कुंडी रचून मांडणीवर ठेवली. केरवारे आटपुन नवे लुगडे नेसून नामदेवाची वाट पाहू लागली.

दोन प्रहरी नामदेव आले. जेवायला बसण्यापूर्वी स्वैपाक, धान्य,गूळ खारका खोबऱ्यांनी भरलेले डबे वगैरे पाहून आणि सर्व नवऱ्यांप्रमाणे सगळ्यात शेवटी राजाई आणि तिच्या नव्या लुगड्याकडे पाहून त्यानी विचारले,” ही सगळी इतकी सामुग्री कशी आली घरात?” राजाई काही बोलेना ना काही सांगेना. मग इकडून तिकडे वळणे घेत बोलू लागली. नामदेव म्हणाले,” खरे काय ते स्पष्ट सांग.नाहीतर मी जेवणार नाही.” राजाई रडवा चेहरा करून रुक्मिणीने आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन भागवताला परिस दिला. कमळजाने मैत्रिण म्हणून आपल्याला गरज भागवण्यापुरता तो दिला.कुणालाही, तुम्हालाही आणि भागवतभाऊंनाही ह्यातले काही कळू न देता झाले पाहिजे अशी सर्व हकीकत सुगतवार सांगितली. हे इतके सांगूनही फारसे बिघडणार नव्हते. पण आधीच रडवेला झालेला चेहरा आता केव्हाही रडू कोसळेस असा होतसा ती नामदेवाला म्णाली,”तुम्ही विठ्ठलाची लहानपणापासून इतकी भक्ती करता; त्याचे दिवसरात्र भजन कीर्तन करता पण घरात खायला ल्यायला पुरेसे नसते; मग त्या पांडुरंगाची भक्ती काय कामाची? असे तिने जेव्हा विचारले तेव्हा सगळे गाडे बिघडले आणि घसरले!

नामदेव शांत खरे पण आता थोडे रागानेच उत्तरले,” विठा नारायणाची आई,आपल्याला विठ्ठलाची भक्ती पुरेशी आहे. त्याची भक्ती करता येणे,करणे हीच त्याची आपल्यावर कृपा आहे.ही असली किमया काय कामाची? मला तो परिस बघू दे.”राजाईने भीत भीत तो परिस नामदेवा हाती सोपवला. नामदेव तसाच उठला आणि चंद्रभागेकडे निघाला. तिथे जाऊन त्याने तो परिस नदीत भिरकावून दिला!

नामदेवाच्या मागोमाग राजाई रडत ओरडत,” अहो तो परिस मला कमळजेला दिला पाहिजे. मला द्या तो. नाहीतर तिला शिक्षा भोगायला लागेल. माझ्यामुळे कमळजेला किती त्रास भोगायला लागेल हो! अशी रडत भेकत विनवणी करीत चालली होती.पण नामदेव पार पुढे गेले होते.

नदीकाठी नामदेव पांडुरंगापुढे आपल्याला दोष देत बसले होते. नामदेवांच्या लहानपणापासूनच्या सवयीप्रमाणे आताही ते विठ्ठलाशी बोलत होते. “पांडुरंगा !विठ्ठला,मायबापा!अरे तू मला ह्या मोहा्च्या उपाधीत कसे पाडलेस रे! राजाई झाली तरी ती म्हणजे मीच ना? आम्ही दोघे वेगळे नाहीत पांडुरंगा.तिला मोह झाला असे कसे म्हणू विठ्ठला ! पाणी आणि त्यावरच्या लाटा वेगळ्या असतात का? सूर्य, प्रकाश,आणि किरणे ही वेगळी कशी विठ्ठला? मोह मलाच झाला. ह्या उपाधीत मीच सापडलो ह्यातून मला बाहेर काढ.” असे म्हणत ्सताना तो येई हो विठ्ठले माझे माऊली ये असा धावा करत, उन्हाची तिरिप चुकवण्यासाठी, ‘निढळावरती ठेवूनी कर’, ‘झळकतो का गगनी पितांबर’ हे मोठ्या आशेने पाहू लागला. नामदेवाचे पांडुरंगाशी संभाषण चालू होते.

कमळजेच्या घरी दुसरेच रामायण घडत होते. परिसा भागवतही घरी आला होता. आल्यावर देवपूजेला बसला. अलिकडे लागलेल्या सवयीमुळे देव संबळीतून काढताना त्याला आपला’प्राण’परीस हाताला लागला नाही; डोळ्यांना दिसला नाही.”बाहेर काढला होता का? कशासाठी काढला? कुठे ठेवला?” असे एकापाठोपाठ एक प्रश्न कमळजेला विचारू लागला.कमळजा गोंधळली.पण अखेर तिने आपण तो परिस नामदेवाच्या राजाईला दिला. ती आता लगेच येईलच. आणून देईल.असेसांगितले. ते ऐकून परिसा भागवत कमळजेवर चिडूनम्हणू लागले ,”अगं तो परिस आहे परिस! चिलिम पेटवायची गारगोटी नाही ती. काय समजलीस? रोज चूल पेटती ठेवून गोड खाऊ घालणारी अन्नपूर्णाआहे ती? , “माझे आई! ती राजाई येण्याची वाट पहात बसणार का? तूच ताबडतोब जा आणि घेऊन ये आपला परिस.”

कमळजा धावत पळत राजाईकडे आली. राजाई रडत असलेली पाहून तिच्यापोटात धस्स झाले. राजाईला तिने का रडतेस असे विचारल्यावर तिने नामदेव परिस घेऊन चंद्रभागे तीरी गेला असे म्हटल्यावर कमळजाही छाती पिटीत रडू लागली.
दोघीही रडत रडत नदीकडे निघाल्या. दोन भक्तांच्या बायका रडत भेकत निघाल्या हे पाहून आजूबाजूचे, शेजारी पाजारीसगळे त्यांच्या मागू नदीकडे निघाले. हा हां म्हणता “ परिसा भागवताचा परिस नामदेव घेऊन नदीकडे गेलाय!” नामदेवाने परिसा भागवताचा परिस हाडपला!” “नामदेव परिस कमरेला बाधून चंद्रभागेवर भजन करतोय.” ह्याच्याही पुढे “नामदेव भागवताचा परिस घेऊन पंढरपुरांतून पळून गेला!” अशा नाना तऱ्हेच्या बातम्या अफवा पसरल्या.हे ऐकून परिसा भागवतही लगोलग चंद्रभागेच्या तीरी आला.

काठावर नामदेव शांतपणे विठ्ठल भावात दंग होऊन बसले होते. त्यांना पाहिल्या बरोबर नामदेवाकडे बोट रोखून, मधून लोकांकडे पाहात भागवत म्हणाला,” नामदेवा! हे बरे नाही केलेस.माझा परिस चोरून घेतोस आणि इथे येऊन विठ्ठल भक्ती करतोस.अरे बगळाही इतक्या ढोंगीपणाने ध्यान करणार नाही. मुकाट्याने माझा परिस मला दे.” पहिल्यांदा नामदेव काहीच बोलला नाही. पण रीतीप्रमाणे लोक आपल्याला वाटते ते बोलू लागली.

काही जण,” बघा बघा! संत म्हणवणारे कसे भोंदू असतात !त्या परिसा भागवताचा परिस हाडपलाय आणि आता भजनाचे नाटक चाललेय!” तर दुसरे काही,” अरे हा भागवत तरी कसला! हा स्वत:ला हीन दीन दाखवत
पडलेला चेहरा घेऊन वागत होता. पण बघा आता! परिस असल्यामुळे सोने करून रोज पंचपक्वान्नांचे जेवण हदडित होता. अहो पाहा पाहा! त्याच्या चेहऱ्यावरची तुकतुकी चमक पाहा.” “ नुसते फाटके धोतर आणि अंगावर मळका पंचा पांघरला की माणूस गरीब दिसेल पण गरीब होत नाही. आता परिस गेल्यावर नामदेवावर चोरीचा आळ घेतोय.व्वाह!” तर काही नामदेवाला दोष देऊ लागले. दुसरे आणखी काही जन,” अहो आपण सामान्य माणसं. भक्ती परमार्थ काय समजतो आपल्याला? ही स्वत:ला संत म्हणवून मिरवणाऱ्यांची कामे.आपल्याला नक्की काय माहित असणार आहे? पण एक विठ्ठलाचा लाडका भक्त म्हणवणारा आणि दुसरा रुक्मिणीचा नि:सीम सेवक म्हणवणारी ही देवाची दोन माणसे चार चौघात आरोप प्रत्यारोप करताहेतह्याचा अर्थ दोघांतही काही तरी बरेवाईट असणार !”

नामदेव शांत पण ठामपणे म्हणाला,”परिस माझ्या काय कामाचा? मी तो नदीत फेकून दिला!”त्यावर परिसा पटकन म्हणाला,” तुमच्या कामाचा नव्हता तर माझा मला परत करायचा!”लोक हो हो म्हणू लागले. नामदेव त्यावर उत्तरला, “ भागवता, तुम्ही स्वत:ला विरक्त, संसारात उदास म्हणून दाखवत,व्यवहार करीत होता. तुम्हाला तरी तो कशाला हवा? मी चोरून माझ्यापाशी ठेवला नाही. नदीत फेकून दिला.पाहा नदीत;शोधा. “ “अरे वा! फेकणार तुम्ही आणि शोधायचा आम्ही? तोही ह्या चंद्रभागेच्या तळातल्या वाळूरेतीत? नामदेवा तू टाकलास तूच शोधून काढ.”

हे ऐकून नामदेवांनी चंद्रभागेत मोठी बुडी घेतली. काही वेळाने ते वर आले ते ओंजळभर वाळू घेऊन. ते परिसाला म्हणाले,” परिसा भागवता, ह्यातला तुझा परिस कोणता तो घे!” भागवत कपाळाला हात लावून बोलला,” नामदेवा चंद्रभागेच्या ह्या वाळू गोट्यात कुठे माझा परिस असणार?” पण आता उत्साह संचारलेल्या एकदोघांनी लगेच जाऊन सुया टाचण्या आडकित्ते आणले. नामदेवाच्या ओंजळीतल्या वाळूरेतीला लावून पाहू लागले तर कशालाही ती वस्तु लावा सोन्याची झाली. सगळ्या वस्तु सोन्याच्या झाल्या! वाळूचे सोने झाले! लोकांमधून ओSSSह असा मोठा उदगार उमटला!

नामदेव आपली वाळूने भरलेली ओंजळ पुढे करीत प्रेमळपणे म्हणाले, “परिसा हेघे तुझे परिस!” परिसा भागवत ओशाळला. खाली मान घालून गप्प झाला. नामदेवांना हात जोडून म्हणाला, “नामदेवमहाराजा, रुक्मिणीमातेने दिलेल्या एका परिसाने फुगलो होतो. आज तुमचा हातच परिस आहे हे मलाच काय सर्वांनाच पटले आहे. तुमचा हा कृपेचा हात ज्याला लागेल त्याच्या आयुष्याचे सोने होईल! आपल्या कृपेचा हा वरदहस्त माझ्या मस्तकी असू द्या म्हणजे सर्व काही भरून पावलो!”

संतकवि महिपतीबुवांचा परिसा म्हणतो, “तुमचे चरण लागती जेथे। सकळ ऐश्वर्य ओळंगे तेथे। आता परिस नलगे माते।अभय हस्ताते चिंतितो।।”

( महिपतीबुवांनी ओव्यांतून सांगितलेल्या कथेतील मध्यवर्ती कल्पनेवर आधारित)

फ्रॅन्क काप्रा

सणासुदीचे दिवस आले की सगळ्यात मोठा बदल होतो तो राशि- भविष्यात. सर्व राशींच्या लोकांचे एकगठ्ठा चांगभले होऊ लागते.कालपर्यंत ज्यांच्या पाठीमागे साडेसाती होती, कुणाला राहू गिळू पाहात होता, कुणाच्या मानगुटीवर केतू बसला होता आणि ‘कन्या’राशींच्या मंगलकार्यात मंगळ खदिरांगार डोळ्यांनी पाहात होता त्या सर्वांची भविष्ये इतकी उज्वल होतात की त्यांना हा काय चमत्कार असा आनंद होतो. दिवाळीचे दिवस तर आनंदाचे होतातच पण पुढचे वर्ष कसे आहे ह्याचीही काळजी मिटलेली असते! दिवाळीत जशी सुखदायी नाटके आणि कौटुंबिक सिनेमांची गर्दी होते तसे इकडेही नाताळाचे वेध लागले की कौटुंबिक आणि आनंदी आनंद गडे अशा ख्रिसमसवर आधारलेल्या नव्या जुन्या सिनेमांची लाट येते.

परवा मी एक फार पूर्वीचा पण सदाबहार It’s Wonderful Life हा उत्कृष्ट सिनेमा पाहिला. मुद्दाम black and white पाहिला. ह्या सिनेमाचे नंतर अनेक वेळा रंगीतीकरण झाले आहे. ह्याचे दिग्दर्शन लेखन पटकथा प्रख्यात दिग्दर्शक Frank Kapraचे आहे. सिनेमा उत्कृष्ट आहे ह्यात शंकाच नाही. फ्रॅंक कापराला सहा वेळा Oscar मिळाले आहे. त्यात दुसऱ्या महायुद्धावरील डाॅक्युमेंटरीचा समावेश आहे. त्याच्या सिनेमांना नऊ पेक्षा जास्त वेळा ॲकॅडमी अवाॅर्डसाठी नामांकन मिळाले आहे. त्याने पूर्ण लांबीचे चित्रपट, लघुपट, डाॅक्युमेंटरीज वगैरे एकंदर ५८ चित्रपट काढले. ह्यात तो लेखक पटकथाकार, संवाद लेखक निर्माता अशा विविधरूपाने आहे. तो चांगला लेखकही होता. त्याच् It Happened One Night, Mr.Smith goes to Washington, Mr. Deed Goes to Town, You Can’t Take It With You, Lost Horizon(James Hiltonच्या कादंबरीवरील)ह्यासारखे बरेच चित्रपट गाजले. त्याने मूकपटाच्या काळापासून बोलपटाच्या सुवर्णकाळातही काम केले आहे. क्लार्क गेबल, जेम्स स्टीवार्ट, कॅरी ग्रॅंट, गॅरी कूपर, बेटी डेव्हिस. क्लाॅडेट काॅल्बर्ट, बार्बरा स्टॅनविक अशा त्या काळच्या अनेक नामवंत नट-नट्यांनी त्याच्या दिग्दर्शनाखाली काम केले आहे.

अमेरिकेतील बरेच नामवंत हे युरोपियन देशातून आले तसा काप्राही वयाच्या सहाव्या वर्षी इटलीतल्या सिसिलीहून आपल्या आईवडील बहिण भावंडांबरोबर अमेरिकेत आला.

लहानपणी लाॅस एन्जल्सच्या रस्त्यावर वर्तमानपत्रे विकून हा शाळेत जायचा. पुढे हायस्कूलचे शिक्षणही लहान सहान नोकरी करत पुरे केले. हा नंतर कॅलटेक इन्स्टिट्यूट मधून इंजिनिअर झाला. काॅलेजचे शिक्षणही घरची मदत व नोकऱ्या करूनच पूर्ण केले. हायस्कूलच्या अखेरच्या वर्षांपासून त्याला कवितेची आवड व गोडी निर्माण झाली. ती इंजिनिअर होत असतानाही त्याने ती जोपासली. पुढे तो लिहू लागला. पण नंतरच्या चढउताराच्या दिवसात त्याला वाटायचे की आपला मित्र एडवर्ड हुबल/हबलसारखा मीही शास्त्रज्ञ,खगोल शास्त्रज्ञ झालो असतो तर किती बरे झाले असते! हो तोच प्रख्यात ‘हबलची दुर्बिण’ वाला हुबल/हबल ह्याचा मित्र होता. ते दोघेही त्याच कॅलटेक इन्स्टिट्यूटमध्ये होते.

फ्रॅन्क काप्राला सिनेमा, सिनेमाच्या शक्तीचा फार अभिमान होता. वर्तमानपत्रकारालाही असाच अभिमान असतो. काप्रा म्हणतो: “ No saint, no pope, no general, no sultan ever has the power to talk to hundreds of millions of people for two hours in the dark.”
मला जाणवली ती गोष्ट म्हणजे ह्या वाक्यातील सेंट, सुलतान पोप वगैरे इंग्रजीत छापलेल्या शब्दांची सुरवात ठळक अक्षराने (Capital letterने होत नाही!)

त्याला लोकांविषयी नेहमी जवळीक वाटायची. सामान्यमाणसाला त्याचेही महत्व मोठे आहे तो कोण आहे हे त्याला समजून दिले पाहिजे असे वाटे. तो म्हणतो : “ Someone should keep reminding Mr.Average Man that he was born free, divine and strong And that goodness is riches, kindness is power and freedom is his glory.”

सिनेमाविषयी,विषयीची त्याची वचने अनेक आहेत. त्यासाठी त्याचे आत्मचरित्र Name Above the Title वाचावे लागेल. त्याने Cry Wilderness कादंबरीही लिहिली आहे. त्याशिवाय त्याच्या काही सिनेकथा व पटकथांचीही पुस्तके आहेत.

फ्रॅन्क कापरा, अनेकांप्रमाणे,हुकुमशाही दडपशाही जुलुमी सत्ता मग ती कोणाचीही,कोणत्याही ‘इझम’ ची असो त्याचा विरोधक होता. सामान्य लोकांचे कल्याण ह्वावे, त्यांच्यासाठी कल्याणकारी दृष्टिकोन व धोरणाचे सरकार असावे असे त्याला वाटे. त्याबरोबरच सर्वांमध्ये एकमेकांविषयी सामंजस्य प्रेम असावे हे त्याचे मत होते. तो सिनेनिर्मिती संबंधात सांगतानाही म्हणतो,” Mankind needed dramatization of the truth that man is essentially good, a living atom of divinity; that compassion for others, friend or foe, is the noblest of all virtues.” Films must be made to say these things, to counteract violence and to demobilize the hatreds.” एखादा मराठी संत इंग्रजीत बोलतोय असे वाटते!

परवा एका लेखकाने अशी आशा व्यक्त केली की May Capra never go out of style.
मी आणि संजीवनी अमेरिकेत आलो त्यावेळी सुधीरकडे आम्ही असाच डिसेंबरमध्ये सदाबहार उत्कृष्ट Miracle on the 34 Street सिनेमा पाहिला होता.

माणसाला त्याच्या चांगुलपणाचे पारितोषिक मिळवून देणारी एका ‘ प्रेमाच्या गावात’ घडलेल्या साध्या सुंदर सिनेमावरून लिहिणे झाले.

असेल माझा हरि तर….

म्हातोबा म्हणजे म्हातोबाच. तोच तसा असू शकतो. आता सकाळचे सहा वाजले.म्हातोबा झोपलेला. बायको उठलेली. चूल पेटवून चहाला पाणी ठेवून ती मागच्या अंगणातल्या चुलाण्यावरच्या हंड्यात पाणी तापवत ठेवून आली.गरम पाण्यात चिमूट दीड चिमूटभर चा ची पत्ती टाकली. लहान गुळाचा खडा टाकला. गप्प बसून राहिली. चा उकळला दिसतंय. दोन्ही हाताने भांडं पटकन खाली उतरवलं. हुळहुळणारी बोटं पदराला चोळली.जर्मलच्या बगुण्यातलं चमचा दोन चमचं असंल दूध ओतलं. पितळीत चा ओकून गरम गरम पिऊ लागली. चा लालभडक असनं का पण लई गुळचाट ग्वोड होता त्याचाच म्हतोबाच्या सवाईला पोटभर जोर आला. सात वाजले. म्हातोबा झोपलेला. आठ वाजले, नऊ झाले, दहा कधीच होऊन गेले. म्हातोबा झोपलेलाच होता. हे काही आजचे नव्हते. रोजचेच. अकरा वाजले आणि डोळे किलकिले करत म्हातोबा पांघरूण नाकापर्यंत खाली आणून बघू लागला. हात पाय ताणत तो उठला.

म्हातोबा उठला म्हटल्याबरोबर सवाई लगबिगिनं बाहेर गेली. दुकानात जाऊन अधेलीभर दूध,पावबटेर आणि भाकरीचं पीठ आणि बेसन व गुळाचा मोठा खडा घेऊन आली. दुकानवाला दसऱ्या म्हातोबाचा दोस्त.तोम्हातोबा कडून पैसे घेत नसे.
म्हातोबाने पावबटेर बरोबर पितळी दोन पितळीभर चहा रिचवला. आंघोळ केली.सवाईला म्हणाला, “सवाई, अगं दनक्यात भूक लागलीय. काही हाये का चावायला. बायकोने भराभरा गरम भाकऱ्या आणि चून वाढलं. म्हातोबा मांडी ठोकून बसला. बुक्कीनं कांदा फोडला. तीन चार भाकऱ्या रिचवल्या. डाईरेक्ट तांब्यातूनच पाणी घटाटा प्याला. डोक्याला मुंडासं आवळून गुंडाळलं. खांद्यावर गमचा टाकून बाहेर पडला. मोठी फेरी मारून भूक लागली म्हणून घरी परतला.

रात्र झाली. होणारच ती. म्हातोबाला झोप येऊ लागली. तीही येणारच होती. म्हातोबा व त्याची सवाई पांघरूणात थोड्यावेळ खुसखुस बोलत राहिली. दोघंही झोपली. पण आज दसऱ्याला मात्र झोप येत नव्हती. “ ह्या म्हातोबाला काय करायचं ? काही काम करत नाही की कसला धंदाही बघत नाही. काही कर म्हटलं तर,” अरे माझ्या दोस्ता! हे बघ काम धंदा सर्वेच करत्यात. मला भूक-झोप-भूक थोडी एक चक्कर मारून येणं. वाटेत कुणी काही उचलून दे, हात लाव रे पाटीला, त्ये पोतं तिथं ठेवतोस का म्हटलं तर तसलं काही कराव. दमलो म्हणून भूक लागली म्हणत घरी यावं भाकरी, मीठ चटणी असेल त्या संगट खावं. झोप येत्येच बघ. अरे असल माझा हरी तर देईल खाटल्यावरी म्हणत गप झोपायचं बघ.”असं भाषाण ऐकवतो. पण मी दोस्त म्हणून मागेल ते देतो येव्हढं म्हणायचं इसरला. नेहमीच इसरतो. काही नाही. आता त्याला फुकट नाही द्यायाचं काई.असं ठरवलं आणि दसऱ्याला झोप आली.

रोजच्या प्रमाणे सकाळ झाली. रोजच वाजायचे तसे सहा, सात…नऊ, दहा वाजत वाजत अकरा वाजले. म्हातोबा उठण्याच्या तयारीत की त्याची लाडकी सवाई दुकानाकडे गेली.  “ रोजचंच सामान द्या भावोजी.”असे सवाई म्हणाली. आणि दसऱ्याच्या कपळावरआठ्यांचे जाळे पसरले. “ह्ये बघा, म्हात्याला सांगा आता फुकटचं काई बी मिलनार न्हाई. काम कर म्हनाव. मी दोन खोल्या बांधणार आहे. त्यासाठी डोंगरातल्या खदानातून दगड आणले त्यानं तर चार पैशे मिळतील.सांगा त्येला. तुमी तरी समजावा त्याला वैनी.”

वैनी नुसतीअर्धवट मान डोलवून आली. सवाईनं आज दोस्तानं काई दिलं नाही आणि काम केल्या बिगर फुकट मिळणार नाही सांगितलं. नंतर तिने दसऱ्या नवीन खोल्या बांधतोय त्यासाठी मोठे दगड आणून दिले म्हातोबाने तर त्याला चार पैसेही मिळतील; हा निरोपही सांगितला. ते म्हातोबानं सगळे ऐकून घेतले. नंतर म्हणाला, ते मोठ मोठे हैदर आणणं सोपं न्हाई. फार मेहनत पडते. हातच मोडंल माझा. सवाये, अगं ‘असंल माझा हरि तर देईल खाटल्यावरी!” काय?” सवाईने खरं खरं म्हणत निमूटपणे मान हलवली.

घरात होतं त्यात चा,जेवण केलं.म्हातोबा तोपर्यंत आंघोळ करून आलाच होता. रेट जेवल्यावर थोडा पडला आणि मुंडासे बांधून बाहेर पडला. भेटेल त्याच्याशी बोलत चालत गावाबाहेर आला ते त्याला समजलेही नाही. फक्त एक लांब पांढऱ्या दाढी मिशा असलेला म्हातारा तट्टावर बसून येताना दिसला. दिसला खरा पण तो मोठ मोठ्याने “अरे गाढवाच्या थांब थांब होSs होSS अरे गाजऱ्या ये गाजऱ्या थांब”असं घाबरून ओरडत वेगाने धावत सुटलेल्या गाजऱ्या तट्टाला लगाम ओढून ओढून ओरडत होता. पण गाजऱ्याच्या अंगात आल्यासारखे वेडे वाकडे उधळत चालला होता. तेव्हढ्यात म्हाताऱ्याच्या हातून लगाम सुटला. त्याची मांड सरकली. म्हातारा पडतोय की काय असे वाटत होते. तितक्यात म्हातोबा जोरात पळत त्या गाजऱ्या तटटापुढे घट्ट ऊभा राहिला. एक मोठी उडी खाऊन गाजऱ्यावर धावुन गेला. लोंबकळणारा लगाम पकडून खेचला. गाजऱ्याच्या तोंडावर दोन बुक्के मारले. लगाम फार जोरात खेचला की गाजऱ्याच्या तोंडातून फेसा बरोबर खरचटल्याने रक्तही आले. तट्टू थांबले. पण अजून थयथयाट चालू होता. म्हातारेबुवाही सावरले होते. म्हातोबा तट्टाच्या मानेवरून घसरत उतरला. गाजऱ्यापुढे जाऊन उभा राहिला. त्याच्या कपाळावरून, डोक्यावरून हात फिरवित म्हाताऱ्याकडे पाहात राहिला. गाजऱ्या शांत झाला होता.

म्हातारा म्हणाला,” इकडे बरेच टोळ भैरव येत असतात. गांज्या चिलिम ओढत बसतात. पण लेकरा तू कधी मधी दिसतोस. पण कुठे झाडाखाली डुलकी घेत पडलेला मी एक दोनदा तुला पाहिलाय.” “ बाबा, तुम्ही मायाळू दिसता. पर मला आता लई जोराची भूक लागलीय. जातो.” “ अरे पोरा थांब. तू माझा जीवच वाचवलास की आज. तुला मी काही द्यावं म्हणतो. देवानीच तुला पाठवलं. दमाझ्यापाशी आता तर काई नाई बग.देवच तुलाबी काही दिल. हां पण तू माझ्या संगट डोंगरावर चल. तिथे तुला दावतो द्येतो. बघ. चल.” “ अवो बाबा. ते डोंगराचं उद्या बघू. आत्ताच्या भुकेचं पाह्यला पाहिजे. मला घरी जाउ द्या. तुम्ही मायाळू वाटता, यव्हढी माया करा माझ्यावर.” म्हाताऱ्याने काही ऐकलं नाही. शेवटी कुरकुरत का होईना म्हातोबा आणि तो म्हातारा डोंगरावर आले. तिथे एक झाड होते. काही मोठे दगड होते. म्हातारा म्हातोबाला म्हणाला,” तो मोठ्ठा दगड हलव. म्हातोबा मनात म्हणाला माझ्या दोस्तासाठी दगड वाहून आणायला नको म्हणालो आणि ह्या म्हाताऱ्याचे दगड हलवत बसायलो मी. पण म्हातोबाने तो मोठा दगड हलवला. म्हातारा म्हणाला, “ तिथली पानं बाजूला करून खाली काय ते पाहा.” म्हातोबाने पाने हलवली . त्याला मोठे मोठे सहा पेटारे दिसले. म्हाताऱ्याने न सांगता त्याने ताकद लावून पेटाऱ्याचे झाकण उघडले.

कुंईकर्र्कर्र करत झाकण वर नेले. आत चांदीच्या मोहरा! दुसरी पेटी तिसरी पेटी करत साही पेट्या म्हातोबाने उघडून पाहिल्या सगळ्या पेट्या चांदीच्या नाण्यांनी भरलेल्या! म्हातोबाने एकेक पेटारा पक्का बंद करत पहिली पेटी बंद करताना थोडी नाणी हातात घेऊन म्हातारेबाबांना ,” अहो बाबा! हे काय?”असं मागे वळून विचारले तर म्हातारे बाबा नव्हते. गाजऱ्या तट्टूही नव्हते.कुठे गेला बाबा म्हणत ती नाणी मोजली सहा नाणी होती. खिशात टाकली पेटारा घट्ट बंद केला. वर पहिल्यासारखी सगळी पानं पसरली. तो ‘मोठ्ठा हैदरचा बाप’असा दगड ठेवला. आणि भूक लागलेली दमलेला म्हातोबा खाली येत झाडाखाली पडला. पडला तर झोपलाच. बऱ्याच वेळाने उठला. त्या पेट्या ती नाणी तो दगड सगळे स्वप्न होते की काय असे त्याला वाटले. उठला. जाऊ द्या काय करायचे आपल्याला म्हणत भुकेला म्हातोबा घराकडे निघाला. चालता चालता त्याला खिशात काहीतरी खळखुळ वाजतेय असे वाटले म्हणून खिशात हात घालून पाहिले तर तीच चांदीची सहा नाणी! अरेच्या सगळे खरेच होते. स्वप्न काहीच नव्हते. म्हातारे बाबाही खरेच होते. घरी आल्यावर म्हातोबा रेट जेवला. सवाईही जेवली. दोधे पांघरुणात खुसुखुसु बोलत होते. पण आज चांदीच्या नाण्याची खुसखुस होती. म्हातोबा घोरू लागला.रोजचा सूर्यच आजही उगवला. सहा, सात, आठ…दहा वाजून गेले. म्हातोबा आजही अकरा वाजताच उठला.

लगेच सवाई दुकानाकडे निघाली.म्हातोबाच्या दोस्ताला नेहमीच्या वस्तु मागितल्या पण रवा तूपही घेतले. हे पाहून दसऱ्याने आठवण दिली आता फुकटचे जिन्नस बंद. सवाई न बोलता हसली. “ किती झाले?” “चार नाणी” दसऱ्या तुटकपणे बोलला. सवाईने ठसक्यात पदराची गाठ सोडून चार नाणी दिली. दसऱ्यातील दुकानदाराने तिने पुन्हा पदरात बांधलेली दोन नाणीही पाहिली होती. पण सर्व पाहताना त्याच्या तोंडाचा आs झाला होता. सावरून त्याने हे कसे काय झाले ते विचारल्यावर आज रात्री दुकान बंद केल्यावर घराकडे या. तुमचे दोस्त सांगतील समदं” असे म्हणून पदर जोरात फडकावत तो कमरेला खोवत घरी आली. आज म्हातोबाला भाकरी बरोबरच गुळाचा सांजाही तगडा खायला मिळाला.

रात्री दसऱ्या आला. म्हातोबाने डोंगर, भले मोठे दगड, त्याखली पाने त्यांच्याखाली लपवलेले सहा पेटारे चांदीची नाणी भरलेली सगळे सगळे सांगितले.दोस्त दसऱ्या हरखून गेला. तो म्हणाला,” म्हातोबा! …म्हातोबाला आपला म्हात्याच म्हातोबा झाला हे ऐकून हसू आले. “ म्हातोबा, माझ्याकडे बैलगाड्या आहेत. बैलाच्या जोड्याबी दांडग्या आहेत. माणसं आहेत. आपण दोघे जाऊ या उद्या रात्री. पेट्या आणू. तुझ्या तीन पेट्या माझ्या तीन पेट्या. काय पटतंय का?” “ अरं दोस्ता न पटायला काय झालं? तू आनं मी दोस्त हाहोत. है की नै?” दसऱ्याने मान डोलावली.

म्हातोबा आणि त्याची लाडकी सवाई जेवण करून झोपले. इकडे दोस्त दसऱ्याला काही झोप येईना. रात्रभर विचार करत होता. बैल जोड्या, गाड्या माझ्या. माणसंबी माझीच. मेहनत माझी. म्हात्या नुसता पाटलावानी येणार. हिथं तिकडं न्हाई. हां हिथं सांगत हुकुम देणार. इतके दिस त्याला पोसलं . आताही तीन पेटारे त्याचे? ह्ये काई खरं नव्हं” असे म्हणत त्याला पहाटे डोळा लागला.

सकाळ झाली. कालच्या सारखाच आजही सूर्य ऱ्उगवला. सहा,सात , आठ नऊ …. दहा केव्हाच होऊन गेले. म्हातोबा आजही अकरा वाजताच उठला. आज काही सवाई दुकानाकडे गेली नाही. चहात कालपासून दूध जास्त पडत होते. गुळाचा खडाही मोठा टाकत होती. भाकरी बरोबर आता भाजी होती. दुपारी गुळाचा गरम गरम सांजा व्हायचा चा बरोबर. दसऱ्या रात्री येणार होता. सवाई म्हातोबाला आठवण करत होती. रात्रीचे नऊ वाजले. दहा वाजले. दसऱ्या दोस्ताचा पत्ता नाही. सवाई म्हणाली ,”अकरा झाले की!” म्हातोबा म्हणाला, “येव्हढं काय त्यात, उद्या येईल. दुकानाची कामं काय थोडी असतात? हिशोब ठिशोप असत्यो.चला मला झोप आली”. दोघेही गाढ झोपी गेले.

दसऱ्या दुकानदार दुकान लवकरच बंद करून बैल गाड्या जोडून माणसं बरोबर घेऊन डोंगराकडे निघाला होता . रात्र काळी झाली होती. दसऱ्याने सगळे बारिक लक्षात ठेवून काम सुरू केले. तास दोन तास झाल्यावर ते मोठ्या दगडाचे झाड सापडले. मग पुढची कामं सुरू झली. शेवटी पेट्या दिसल्या. तोपर्यंच चंद्राची कोर उगवली होती. पेटारा उघडून पाहिला. दसऱ्याने हात घालून पाहिला. नुसता चिखल माती खडे गोटे! अरे, दुसरा पेटारा उघडला. दसऱ्याने स्वत:च पुन्हा हात घातला. तेच मटेरियल! नंतर तिसऱ्या पेटीत माणसाला हात घालून पाहायला सांगितले. दगड माती चिखला शिवाय काही नव्हते . साही पेट्यात तीच सोनमाती! दसऱ्या मनात म्हणाला लेकाचा म्हात्या मला हासत असंल झोपत बी!” पण दसऱ्याही साधा नव्हता. त्येबी लई खारबेळं होतं त्याने गाड्यात पेटारे चढवले. सगळे निघाले. रात्रीचे तीनचार झाले असतील. दसऱ्याने सगळे पेटारे म्हात्याच्या घराच्या दारासमोर खिडकी समोर त्या पेट्या ओतून रिकाम्या करायला लावल्या. प्रचंड उंच ढिगारे झाले होते. “आता बस घरातच कोंडून. झोपूनच राहा म्हात्या आता!” म्हणत दोस्त दसऱ्या चडफडत आणि इतर सगळे निघून गेले.

सकाळ झाली. सूर्य तोच सकाळही तशीच. आणि म्हात्या झोपलेलाच. बायको लवकर उठली होती. पण चहा वगैरेच्या गर्दीत होती. काही वेळाने दरवाजा उघडायला गेली पण उघडेना. उघडता उघडेना. एक फटही पडेना. ढाराढूर झोपलेल्या म्हातोबाला उठवत म्हणाली, अवं अहो उठा उठा.! “ म्हातोबा झोपलेलाच. बराच वेळ हाका मारल्यावर तो उठला. सवाई म्हणाली, अहो दरवाजा उघडत नाही. काय बी करा एक फटही दिसत नाही.” म्हातोबा आरामात उठला, दात ओठ खात दरवाजा ढकलू लागला. पण उघडेना. मग कशीबशी ताकदीने एक फट पडली.आणि त्यातून “खळखळा ओतल्या मोहरा” तशी चांदीच्या नाण्यांची खळखळ खण् खण् करत धारच लागली. हळू हळू दरवाजा जसा उघडू लागला तशा लाटा येऊ लागल्या.

 

सवाईने व म्हातोबाने पोती भरायला सुरवात केली. सगळी नाणी भरून झाली. जागच्या जागी ठेवली गेली. गुळा पोळीचे जेवण झाले म्हतोबाला लवकर उठायला लागल्यामुळं झोप येऊ लागली. सवाई नवऱ्याकडे कौतुकाने पाहात होती. म्हातोबाला गोडाधोडाचे खाल्यामुळे झोप येत होती. तरी ती म्हणाली, मीम्हणत होते तसेच झाले. भावजी रात्रीच जाऊन काम करून आले. त्यांनी तुमची झोपमोड होईल म्हणून मोहरा ओतून ते गेले.””हो हो, तुझं खरं हाये सवाई, पण मला झोपू दे. दुपारी सवाई दुकानात गेली. मालकासाठी नवं धोतर पैरण फेटा आणि स्वत:साठी एक चांगलं लुगडं चार खण आणि रोजचाच चा ची पत्ती गुळ रवा आणि आज गहू घेतला.तूप तर घेतलेच. ही यादी सगळं ऐकून दोस्त दसऱ्याचे तोंड जे वासले होते ते सर्व देई पर्यंत तसेच होते. सवाईने वीस चांदीची नाणी काढून दिल्यावर त्याचे डोळे कपाळात जायचे तेव्हढे राहिले होते. पैसे दिल्यावर नामदेवाची जनी, तुकारामाची आवली तशी साध्या म्हातोबारायाची साधीभोळी,सरळ मनाची सवाई,मालकाच्या दोस्त दसऱ्याला म्हणाली, भावजी, तुमचं मन मोठ्टं बघा. तीन पेटाऱ्यांपेक्षा तुम्ही जास्त दिलेय वाटतं!”

दोस्त दुकानदार दसऱ्या हळू आवाजात म्हणाला, “नाई वैनी, तुमचा मालक आमचा म्हातोबा म्हणत्यो त्येच खरं. असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी!” पण वैनी म्हणाली,” त्ये काई असंल नसंल,मला समजत न्हई. पन तुमचं मन चांगलं ह्ये खरं!”

 

(मेक्सिकन लोकथेच्या आधारे)

आनंदाचा गुणाकार!

दवाखान्यातले ते दोन्ही म्हातारे रुग्ण बरेच आजारी होते. एकाचा पलंग आता आताच दिवसातून एक तास डोक्याच्या बाजूने वर उचलला जात होता. छातीत साठलेला कफ मोकळा व्हायला मदत व्हाही हा उद्देश होता. त्याच्या शेजारच्या पलंगावरच्या पेशंटला मात्र चोवीस तास पाठीवर पडून राहावे लागे. त्यामुऱ्ळे रोगापेक्षा ह्या उताणे पडण्यानेच वैतागून गेला होता.

ज्याला तासभर का होईना बसायची परवानगी होती त्याचा पलंग खिडकी पाशी होता. तो खिडकी बाहेर बघत ,”समोरच्या तलावात पाणी कापत पाण्यावर बदकं नक्षी कशी काढत कशी काय जातात समजत नाही; हिरवळीवर मुलं काय काय खेळतात. कुणी प्रियकर प्रेयसीच्या कमरेभोवती हात घालून तिला जवळ ओढत मुद्दाम हळू चालतोय, तिच्या तोंडापुढे तोंड नेऊन काही तरी बोलतोय, ती मुलगी मान झटकत हसतेय.; सिनेमाची जाहिरात बॅंड वाजवत चाललीय; अरेच्या ते तीन चार लोक भांडायला लागले की!”असे रोज काहीना काही सांगत असे. “अरे वा आज पोलिसांची परेड चाललेली दिसतेय. त्यांचा बॅंड वाजवणारे किती स्टाईलिश चाललेत !” दोन्ही बाजूला लोक उभे आहेत. काही टाळ्या वाजवताहेत! तिघे चौघे तर पोराला खांद्यावर बसवून ही मजा दाखवताहेत!”

रोज तासभर त्याची ही running commentary चालायची. पलंगावर पडून असलेला रोगी ते मन लावून ऐकायचा. तो म्हणायचा तू रोज बाहेरच्या गमती ऐकून त्या तासाभरामुळे माझा दिवस चांगला जातो.
पण एके दिवशी त्या ‘तासाच्या समालोचक’ रुग्णाचे निधन झाले. व्हायची ती सगळ्यांची सगळी धावपळ झाली.
एक दिवस उलटल्यावर विचारू का नको असे ठरवत तो सतत पडून असणारा पेशंट नर्सला म्हणाला, “सिस्टर, मला तो खिडकी जवळचा पलंग देता का?”

नर्स म्हणाली,” त्यात काय! बदलून देते तुमचा पलंग.”
थोड्या वेळाने तो पेशंट म्हणाला, ह्याच पलंगावर होता तो पेशंट; उठून बसायचा बघा एक तास रोज. मग खिडकीतून दिसणारा तलाव,ती हिरवळ,बाग,आणि जे काही तेव्हढ्या वेळात दिसेल ते उत्साहाने सांगत असे मला. तोच मला ‘पडीक’ माणसाला विरंगुळा होता.”

ते ऐकून नर्स त्याला म्हणाली,” अहो आजोबा तुम्ही सांगतातसे तो सांगत होता?” “हो! रोज! चार दिवसापूर्वी पोलिसांची परेड बॅंडच्या ताला ठेकाच काय सुरावटीसह सांगितली होती त्याने!”

नर्स शांत हळुवारपणे म्हणाली,” आजोबा खिडकी आहे पण तिच्या समोर उंच भिंत आहे. आणि… आणि.. ते आजोबा आंधळे होते हो!” इतके म्हणत ती नर्स डोळे पुसत वाॅर्डाबाहेर गेली.

त्या आंधळ्या आजोबांना माहित असावे की दु:ख वाटल्याने अर्धे होते पण आनंद दिल्याने तो दुप्पट होतो.. मिळालेले आयुष्य देणगी आहे हे खरे पण त्यातील ‘आज’चा दिवस ही सगळ्यात भारी भेट आहे.

कोण जाणे त्यांना इंग्रजीतील “Today is a Gift that’s why it’s Present” हा वाक्यसंप्रदाय माहित होता की काय , कुणास ठाऊक?

(Lessons taught by Lifeवरून)

पुरावा

पुणे जिल्ह्यात तळेगाव आणि त्याच्या परिसरात बटाट्याचे पीक घेतात. सर्वच शेतकऱ्यांची जमीन फार नसते. गरीबाची तर वाटण्या होत होत अर्धा पाऊण एकरापर्यंत आलेली असते.
शेतमजुराचा कसातरी शेतकरी झालेल्या म्हादबाचाही असाच तुकडा होता. तो आणि बायको ‘आवडीने भावे’
बटाटा लावत. नंतर मुलगा मोठा झाल्यावर तोही शेतीचा तुकडा नांगरायला मदत करत असे. म्हादबा आणि बायको विशेषत: त्याची बायको फार उत्साहाने बटाट्याची लागवड करीत असे. असे पोटापुरते बरे चालले होते.

म्हादबाची बायको गेली. म्हादबा आणि मुलगा दोघेच राहिले. पण नांगरणी पेरणी चालूच होती. म्हादबा म्हातारा झाला होता. कसेतरी बटाट्याचे काम रेटत होता. पण यंदा मात्र म्हादबाला काय करावे ते सुचेना.

बटाट्याचे डोळे पेरायची वेळ आली. पण म्हादबाच्या नांगरणीलाच पत्ता नव्हता. थकला होता. काय करावे ह्या विचारात पडला. आता पोरगा जवळ पाहिजे होता असे त्याला फार वाटू लागले. मुलाने मदत केली असती.पण ….

….पण म्हादबाच्या मुलाला तीन चार महिन्यापूर्वी गावच्या वरच्या वस्तीतल्या कुणीतरी खोटानाटा आळ घालून पोलिसात तक्रार करून तुरुंगात बसवले होते. गरीबाला न्याय म्हणून तारखावर तारखाच मिळतात. जामिनावर सोडवायला जामिनदार तर लागतोच शिवाय पैसा. म्हादबाने पैका नाही दातावर मारायला म्हणून वकील वगैरे काहीच दिला नाही.फौजदार हाच त्याचा न्यायाधीश. तोच त्यालामाहित होता.फौजदारापुढे गयावया करून दीनवाणेपणे हात जोडून “साहेब त्याने काय बी क्येलं न्हऊ; सोडा लेकाला”असं पहिल्या तीन चार हेलपाट्यात विनवण्या केल्या. प्रत्येक वेळी फौजदारसाहेब गुरगुरत,मुठीची छडी फिरवत, टेबलावर आपटत,” म्हाताऱ्या पुरावा सापडत नाही म्हणून ते बेनं इथच आहे. पुरावा मिळू दे मग आर्थर रोडलाच जाईल तो. बघच तू” असे बोलून म्हादबाला धुडकून लावायचा. म्हादबाने पुढे जिल्ह्याच्या ठाण्यातही जाणे सोडून दिले. पैसा आणि तब्येत दोन्ही खालावलेलीच होती.

म्हादबा सुन्न होऊन बसला.शेवटी शेजाऱ्याला हाक मारली. त्याने म्हादबाच्या खांद्यात हात घालून उठवले. म्हादबाने पत्र्याच्या डब्यातून एक दोन चुरगाळलेल्या नोटा, काही नाणी घेतली. शेजाऱ्याने हात धरून म्हादबाला हमरस्त्याच्या फाट्यावर सोडले. शेजारी थोडा वेळ थांबला. पण नंतर निघून गेला. वाट बघितल्यावर,बघितल्यावर सहा शीटाची रिक्षा चौदा पॅसिंजर घेऊन आली. म्हादबाला पाहिल्यावर थांबली. म्हादबाला रिक्षापर्यंत त्यातल्याच एकाने आणले.आता बसायचे कुठे ह्या पेक्षा कुठल्या सळईला धरून अर्धे ढुंगण कुठ्ल्या पत्र्याच्या कडेला की कुणाच्या गुढघ्याला टेकायचे हा विचार करायलाही वेळ न देता फक्त म्हादबा कसाबसा लटकला ते पाहून रिक्षा निघालीही होती!

म्हादबा जिल्ह्याच्या तुरुगांत गेला. बाहेरच्या दरवाजापासून जो दिसेल त्याला, पोराला भेटायचे कुठे, कसे भेटायचे विचारत होता. कोण ऐकतेय? पण अखेर कुणाला तरी ऐकू गेले. तास दीड तास झाल्यावर म्हादबाची व पोराची भेट झाली. पोराच्या जवळ दोन जेलचे पोलिस होते. म्हादबा पोरालाम्हणाला, “पोरा मी थकलो रे. तुझी आई बटाटे लई सुगतीने लावायची रे. पर अजून नांगरटच झाली नाही. मी असा. तू इथं जेलात. घरी असतास तर तूच नांगरलं असतस. बटाटेही तूच लावले असतेस.पण आता कुणाला तरी मदतीला बोलावून नांगरून घेईन. काय करणार?”

ते ऐकून पोरगा गप्प बसला. बोलेना. म्हादबा पाहात होता त्याच्याकडे. पोरगा ते ऐकून गांगरल्या सारखा झालाय. तोंडावरून हात फिरवित पोराने तोंड बाजूला फिरवले. ते पाहून पोलिस जरा जवळ आले. बाहेर म्हादबाच्या बाजूलाही ठाण्याचा पोलिस होता. पोराने म्हाताऱ्याला जवळ येण्यास खुणावले.म्हादबाला कळेना की शेताची नांगरणी करायची ऐकल्यावर पोरगा घाबरल्या सारखा का झाला !
मुलगा मग थोड्या हळू आवाजात बेड्याचे हात जोडून बापाला म्हणाला,” तात्या, तसलं कायी कराचं न्हाई.काही झालं तरी नांगरायचा नाही तुकडा. कुणालाही बोलवू नको.सांगून ठिवतो. अरं तात्या तू नांगरलंस तुकडा तर मी लपवलेले पाच सहा गावठी कट्टे सापडतील की रं माझ्या बाबा!”
म्हादबाचा विश्वासच बसेना. तोंड आ करून, डोळे फाडून हे आपलंच पोरगं बोलतेय का असं, पोराकडे बघत राहिला. कपाळावर हात मारून बाहेर पडला.

पुन्हा तशाच सहा आसनी रिक्षात ‘तिरपांगडे आसन’ करत फाट्यावर आला. हातापायातली सगळी शक्ती गेली होती. म्हादबाचा चेहरा वीज पडून काळाठिक्कर पडावा तसा झाला होता. घरी तो कसा आला, घरी कुणी आणून सोडले काही त्याला समजत नव्हते. रांजणातलं पाणी घटा घटा प्यायला. गिपचिप पडून राहिला.

दुसरे दिवशी पहाटेच पोलिसांची जाळ्या लावलेली मोठी निळी मोटार आली. भराभर तीन चार पोलिस व काही मजूर उतरले. म्हादबावर मोठ्याने ओरडून नंतर एक लाथ घालून त्याला उठवले. नांगर कुठाय असे काही विचारत नांगर कुदळी फावडी घेऊन म्हादबाच्या तुकड्याची चिरफाड सुरु झाली. गावातले लोक मजा पाह्यला आले. त्यापैकी काही जणावर डाफरत पोलिसांनी त्यांनाही नांगरायला खणायला जुंपले. गावात बातमी पसरलीच होती. तक्रार करणाराही चार जणांना घेऊन आला होता. सगळे जण”म्हादबा, त्याचे पोरगे किती साळसूद आहेत पण हे सगळं वरून कीर्तन आणि आतून तमाशाच आहे हे पटलं ना आता?” अशी चर्चा करत होते. म्हादबाला शिव्या शाप देणेही चालूच होते. पोलिस जाऊद्या. दांडकी हाणून थेरड्याला गावा बाहेर करू असे ठरवत होते. दिवस वर येऊनही बराच वेळ गेला होता. कट्टे काही सापडले नाहीत. तक्रार करणारा आणि त्याचे चार सहा डावे उजवे हात पोलिसांना अजून खणा,अजून खणा,नांगरा म्हणत होते. “अहो दादा काय बोलताय? इतकं खणून झालंआता. आणखी खणून काय पाझर तलाव करायचाय का इथं ? आं?“

गर्दी पांगू लागली. म्हादबा डोक्याला हात लावून मान गुडघ्यात घालून बसला होता. तोपर्यंत गावातल्या कुणीतरी पोलिसांना चहा आणि वडापाव आणला होता. मजूर इकडे तिकडे गेले.
पोलिसांनी “कट्टा वगैरे काही मिळाले नाही आणि इतर केलेल्या सगळ्या गोष्टीचा” पंचनामा केला. दोन तीन लोकांच्या सह्या घेतल्या. म्हादबाच्या बखोटीला धरून उभे केले. त्याच्या दोन खोल्यात जाऊन सगळी उलथा पालथ केली. काही मिळाले नाही. त्याचा राग येऊन पोलिसांनी म्हादबाला गालफडात एक जोरदार थप्पड आणि पुन्हा एक कंबरेत लाथ घातली. त्याला धरून मोटारीत ढकलले.बरोबर आणलेल्या मजुरांना घेऊन पोलिस जिल्हा ठाण्यावर आले. तिथे म्हादबाला सोडले. पोलिस गेले. म्हादबाची चौकशी केली.पुन्हा त्याला तुरुंगात घेऊन गेले. पोराची आणि म्हादबाची भेट झाली.पोलिस होतेच बाजूला. म्हादबा पोराला म्हणाला, “ल्येका आज लई लाथा बुक्क्या खाल्या तुझ्या पायी. आता किती दिस राहीन रं सांगता येत न्हाई.अरं घर उस्कटून टाकलं. पोरा आपल्या सगळ्या तुकड्याचा कोपरा नं कोपरा नांगरून खणून काढला रं ह्यांनी.”

म्हादबाचा मुलगा हसत हसत म्हणाला, “तात्या! तुरुंगातून मी तुला दुसरी काय मदत करणार? जमली तेव्हढी केली !”

सदाशिव पं. कामतकर

(एका अति अति लघुबोधकथेच्या मध्य कल्पनेच्याआधारे)