रेडवुड सिटी
शेक्सपिअरचाच काळ म्हटले तर सोळाव्या शतकाच्या मध्यापासून ते सतराव्या शतकाचे दुसरे शतक असे म्हणता येते. त्या अगोदरच्या शतकापासून इंग्लंड,
रोगराई, अनेक प्रकारचे आजार, देवी,प्लेग आणि साथीच्या रोगांसारख्या अनेक संकटांनी त्रस्त आणि ग्रस्त झाले होते. खुद्द इंग्लंडच्या राणीला, शेक्सपिअर जन्मायच्या आधी दोनच वर्षे, देवी आल्या होत्या.आणि शेक्सपिअरच्या जन्मावेळीही ह्या साथींची लागण होतीच.त्यातच लंडनमध्ये बरेच वेळा प्रचंड आगींचेही मधून मधून थैमान चालू असे.ह्याचा परिणाम असा की जन्म नोंदींपेक्षा मृत्युच्या नोंदीच जास्त होत्या !
काही रोग त्या काळीच असतात तसेच विशिष्ट प्रदेशापुरतेच मर्यादित असतात. त्या आजारांचे निदानही होऊ शकत नाही. तसाच एक आजार म्हणजे English Sweat ! हा कसलीही पुर्वचिन्हे न दाखवता तात्काळ यायचा आणि मृत्युही तडकाफडकी यायचा! ह्या आजाराने कित्येक हजार लोक गेले असतील! नशीब असे की त्यानंतर हा आजार पुन्हा कधीही आला नाही. तसाच दुसरा आजार, त्याचेही निदानच करता येत नसे. म्हणून त्याचे नाव ‘नविन आजार ‘. ह्या आजाराने १५५६ ते १५५९ या चार पाच वर्षांत कितीतरी हजारो लोकांचे बळी घेतले असतील! ह्या आजाराचेही संकट पुन्हा आले नाही. पण प्लेग मात्र वारंवार तोंड वर काढत होता. शेक्सपिअरच्या जन्मानंतर तीनच महिन्यांनी त्याच्या गावी साथ आली होती.गावातील दोनशे लोकांचा बळी घेतला. त्या साथीत शेक्सपिअरच्या स्ट्रॅटफर्ड-अपाॅन – एव्हन मधीलच नाही तर जवळपास लंडन व इतरत्र लहान मुलांच्या लोकसंख्येपैकी दोन तृतियांश बालकांचा मृत्यु झाला!
लंडन हे तर ह्या सर्व गोष्टींचे केंद्र होते म्हणायला हरकत नाही. हे आजार आणि साथी तर होतच पण बंदर असल्यामुळे खलाशी कुठून कुठून येत. ते आपल्याबरोबर गुप्तरोगासह इतरही रोग आणीत व ते लंडनमध्ये पसरत. लंडनमध्ये प्रचंड आगीही लागत.तरीही इ.स.पंधराशे साली लंडनची असलेली पन्नास हजार लोकसंख्या वाढत वाढत सोळाशी साली ती चौपट म्हणजे सुमारे दोन लाख झाली होती. ह्याचे कारण म्हणजे लंडनच्या आजूबाजूच्या परगण्यांतून पोटापाण्याच्या शोधात लोकांचे लोंढे येत. महाराष्ट्राला तर हा अनुभव आजही भोगायला मिळतो.तसेच इंग्लंड प्राॅटेस्टंट असल्यामुळे युरोपमधील इतर देशात ज्यांचा धार्मिक छळ होत असे तेही लोक लंडनमध्येच धडकत. हे सर्व कमी की काय म्हणून त्यात दुष्काळ पडे. १५५५ आणि १५५६ ही दोन वर्षे सतत दुष्काळाची गेली. बेकारी दारिद्रय ह्यात वाढ झाली.
अशी परिस्थिती असतानाही लंडनमधील नाट्यगृहे व इतर करमणुकीचे खेळ करणारी थेटरे मात्र रिकामी नसत ! लोक परिस्थितीला तोंड देत पुढे जात असतात. काळ आपल्याला अनुकुल करून घेण्याची माणसाची धडपड असते. आणि करमणुक करून घेणे, मनोरंजनाची साधने शोधणे ह्यामध्ये माणूस कोणत्याही काळात कल्पकच राहिला आहे. नाटक हे करमणुकीचे प्रमुख आकर्षण व नाट्यगृहे केंद्रस्थानी होती.
लंडन तर मोठे शहर. टाॅवर आॅफ लंडन आणि सेंट पाॅलचे कॅथेड्रलच्या भोवतालून जाणारी मोठी तटबंदी लंडनभोवती होती. त्या तटबंदीच्या आतील ४४८ एकरावर लंडन वसले होते. शेक्सपिअरच्या वेळचे लंडन तसे लहानच म्हणायचे. दक्षिणोत्तर दोन मैल आणि पूर्वं-पश्चिम अंतर तीन मैल! तरीही संपूर्ण युरोपमध्ये त्यावेळी नेपल्स आणि पॅरिस ही दोनच शहरे लंडनपेक्षा मोठी होती. लंडनच्या भोवती असणाऱ्या तटबंदीचे काही अवशेष आजही दिसतात.आपल्याकडे औरंगाबाद मधील पैठण गेट,भडकल गेट किंवा सोलापूरातील बाळी वेस,विजापूर वेस या वेशींच्या नावांवरून गावाच्या जुन्या सरहद्दी समजतात तशा लंडनच्या तटबंदीची आठवण बिशप गेट, न्यू गेट अशा वेशींच्या रूपाने आजही जपलीआहे.
वारंवार येणाऱ्या प्लेगच्या व इतर अनेक रोगांच्या साथीमुळे,सरदार,दरकदार,अमीर उमरावांनी आपले महाल, वाडे लंडन बाहेर बांधले होते. राजवाडा आणि ह्या सर्व इमारती रिचमंड,ग्रीनविच,हॅ्म्टन कोर्ट ह्या गावात होती.
वारंवार उदभवणाऱ्या साथीचे रोग,प्लेग, दुष्काळ, मोठ्या शहरात पोट भरण्यासाठी करावी लागणारी कमालीची धडपड ह्या परिस्थितीमुळे लोकांची आयुर्मर्यादा ३५ वर्षेच होती. गरीबांच्या वस्तीत तर ती उणीपुरी फक्त पंचवीस वर्षे इतकीच होती!
लंडनमधील अरुंद रस्त्यांची आणि गल्ली बोळांची आज कल्पनाही करता येणार नाही. काही मोजके मुख्य रस्ते सोडले तर सर्व रस्ते फारच अरुंद होते.घरेही एकमेकांना चिकटलेली. त्यांची छपरेही एकमेकांच्या घरांना चिकटलेली असत! घाटाचा रस्ता किती बाकदार वळणा वळणांचा होता ह्या अतिशयोक्तीच्या गोष्टीतील, तिथून जाणाऱ्या आगगाडीचा इंजिन ड्रायव्हर आणि गार्ड एकमेकांशी हस्तांदोलन करीत,तसे अशा इमारतींच्या वरच्या मजल्यावर राहणारे बोलता बोलता दुसऱ्यांच्या घरात जात!
कचरा सांडपाण्याची विल्हेवाट लावणे जिकीरीचे होते. लंडनचा आढावा घेणारा,लंडन शहराचा इतिहासकार जाॅन स्टो म्हणतो,” मेलेली कितीतरी कुत्री- मांजरे त्या खड्डयात टाकलेली असत. त्यावरूनच त्या खड्यांचे नाव HoundsDitches पडले.
अशा घरांच्या वस्तीतच श्रीमंत आणि गरीबही शेजारी राहात असत. लंडन ब्रिज जवळच्या डाॅऊगेटच्या भिकार वस्तीतील आपल्या घरात राहणारा कादंबरीकार विद्वान राॅबर्ट ग्रीनची अखेर झाली. राॅबर्ट ग्रीनचे हे घर, इंग्लंडचा त्यावेळचा प्रसिद्ध दर्यावर्दी, धनाढ्य फ्रान्सिस ड्रेकच्या घरापासून चार घरे सोडूनच होते! अशीही वेगळी समानता त्यावेळी होती !
रायगडाचे सर्व दरवाजे रात्री नऊच्या तोफेला बंद होत. त्याप्रमाणे लंडनच्या सर्व वेशींचे दरवाजे संध्याकाळी सात वाजता बंद होत. कोणालाही तटबंदी बाहेरून आत येण्यास आणि बाहेर पडण्यास बंदी होती. पण कायदा तिथे पळवाट आणि जिथे अंमलबजावणी तिथे ढिलाई येतेच.
तटबंदीच्या बाहेरच नाट्यगृहे. आणि इतर करमणुकीच्या खेळांची व कार्यक्रमाची थेटरे होती. ते सर्व खेळ सात आणि त्यानंतरही बऱ्याच वेळाने सुटत. त्या प्रेक्षकांना अडवले जात नसावे. तटबंदीच्या आतील,गावातील सर्व हाॅटेले खाणावळी दारुचे गुत्ते सात वाजताच बंद करावे लागत. पण इथेही कायदा काटेकोरपणे पाळला जात नसावा किंवा पोलिसांना लोक जुमानत नसावेत. कारण नाटकात आणि इतर खेळातही रात्री बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची टर उडवलेली असे. शेक्सपिअरनेही आपल्या Much Ado About Nothing मध्ये डाॅगबेरी ह्या पात्रातून पोलिसांची चेष्टाच केली आहे.
लंडनच्या प्रशस्त चौकात बारा एकरात उभे असलेल्या सेंट पाॅल चर्चची अवस्था अस्ताव्यस्त म्हणावी की अत्यवस्थ असा प्रश्न पडतो. काही वेळेला वाटते की हे चर्च वगैरे नसून सगळा ‘ या या घर आपलेच आहे, ऱ्निवांत हात पाय पसरा, पसार व्हा,पंगती उठवा,पतंगी उडवा काहीही करा’ अशी त्यावेळी तिथे रोज स्थिती होती.
तिथे काय नव्हते? स्मशानही होते आणि बाजारही भरलेला असे.ह्यापूर्वीच्या शतकात छापील पुस्तके घेणे ही चैनीची,श्रीमंतांची बाब होती. पण छपाई यंत्रे वाढली, कागदही भरपूर मिळू लागला. त्यामुळे पुस्तकेही भराभर बाहेर येऊ लागली. बऱ्यापैकी माणूसही पुस्तके घेऊ शकत होता. त्यामुळे बाजारात पुस्तकांची,कागद आणि इतर स्टेशनरीचे दुकानदार दुकाने मांडत असत. एलिझाबेथ राणीच्या काळात सात हजाराहून पुस्तके प्रकाशित झाली होती! ह्या कॅथड्रेलच्या आतली परिस्थितीही फारशी निराळी नव्हती. त्याच्या आतल्या विशाल भागात तर अतिशय गोंधळ, गडबड, गजबजाट आणि निरनिराळे आवाजच आवाजांचे राज्य होते. आतही बाजार भरलेला! सुताराची लाकडी वस्तूंची, लोकांना पत्रे, सरकारी कागदपत्रे, अनेक प्रकारचे अर्ज लिहून देणाऱ्या ‘ लेखनिकांच्या’ टपऱ्या, वकीलांचे लहान दुकानांसारखी कार्यालये, आणि इतर कारागिर, कामगारांच्या टपऱ्या, मालाची नेआण करणारे. तसेच इतर निरनिराळे व्यवसाय करणारेही बसलेले असत. त्यातच दारुडे, रिकामटेकडे इथे तिथे पसरलेले असत! काहीजणांनी तर तिथेच,जिथे तिथे लघवी केंद्र म्हणूनही कॅथेड्रलचा वापर केला असे!
चर्चच्या मार्गिकेमध्ये अनेक लहान मुले चेंडू, चेंडूफळीचे खेळ खेळत असत. चर्चच्या लोकांना त्या मुलांना हुसकावून लावणे हेच काम आहे असे वाटावे इतपत पोरे गर्दी करत.त्यातच आवारात अनेक लोक शेकोट्या पेटवून स्वत:ला उबदार ठेवण्याचा उद्योग करत. जिकडे तिकडे धूरच धुर! चर्चच्या आतही हा धूर पसरलेला असे! ह्या सगळ्या गलक्यात पाद्र्याचे प्रवचन चालू असे. चर्चमधल्या भक्तांना काय ऐकू येत असेल ते तेच जाणोत.एक पिढी उलटून गेल्यावर सेंट पाॅलच्या कॅथड्रेल मध्ये आलेला जाॅन एव्हलिन लिहितो,” मी त्या भव्य आणि प्रशस्त चर्चमध्ये जायचो तेव्हा तिथे पसरलेल्या धुरामुळे फादर दिसतही नसे आणि तेथील प्रचंड कोलाहलामुळे तो काय उपदेश करतोय तेही ऐकू येत नसे!”
ह्या चर्चचा आणखी एक व्यवहारी उपयोग लंडनचे लोक करीत. ते चर्च अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग होता की नाही हे सांगता येणार नाही. पण पलिकडे असलेल्या रस्त्यावर जायला लोक ‘ जवळचा मार्ग’ short cut म्हणून रोजच सर्रास वापर करीत! त्याला एक कारण म्हणजे लंडनला केव्हाही पडणारा पाऊस. पाऊस पडायला लागला की आडोशासाठी येणारी रहदारी तशीच चर्चमधून थेट पलीकडच्या रस्त्यावर जात असे. लोक पाऊस पडू लागला की कोणत्याही बंदिस्त जागेत आडोसा गाठण्यासाठी धावत पळत निघत. ह्या तारांबळ उडवणाऱ्या घाई गर्दीमागे लंडनचे पावसाळी हवामान आणि दुसरे नुकतीच फ्रान्समधून आलेली काॅलरची फॅशन! ही काॅलर मानेभोवती असणे हे केवळ फॅशनचेच नव्हे तर प्रतिष्ठेचे लक्षण होऊ लागले होते. काॅलर तरी कशी? कापडी फितींच्या(laces)फुलांच्या मोठ्या पाकळ्यांचे आकर्षक पद्धतीने लावलेले थर.माणसाकडे पाहिले तर जणू मोठ्या फुलातून डोके उमलले आहे असे वाटावे.ही काॅलर लेसची आणि खळ लावलेलीअसे. पावसात भिजली की कोमेजून जायची. पाकळ्या पंख मिटून पसरून पडायच्या. त्यामुळे ती वापरणाऱ्याचाही रुबाब कमी होऊन त्याचाही चेहरा मलूल होऊन जायचा ! शिवाय त्या काळी कपड्यांचे रंगही कच्चे होते. बहुतेक रंग पाण्याने ओघळायचे. सर्व कपड्यांवर ते पसरायचे. ही दुसरी भीती! त्यामुळे पाऊस पडू लागला की सगळीकडे आपली शान जाऊ नये म्हणून एकच धावपळ आणि गडबड उडायची. मग ‘सेंट पाॅल’ शिवाय कोण आश्रय देणार?
ह्या फॅशनेबल काॅलरचे नाव समजल्यावर मला पुलंच्या ‘ अपूर्वाई’ मधला संवाद आठवला! पुलंना पिकॅडलीला जायचे होते. किलबर्न स्टेशनवरच्या तिकीट खिडकीतल्या बुवाला ते पिकॅडलीची तिकीटे मागतात. पुलं काय म्हणतात ते पुलंच्या शुद्ध तुपातील इंग्रजी उच्चारांमुळे त्या बुवाला काही केल्या समजेना. तो त्याच्या उच्चारात ,” मे ग्याॅ फाऊन” म्हणाला असे पुल सांगतात. पुलं अखेर चिडून त्याला आपल्या खणखणीत इंग्रजीत ” टू टिकेटस् आॅफ द ट्यूब रेल्वे फाॅर पिकॅडली” असे स्पष्टआवाजात सुनावतात. तरी तो प्रश्नार्थक मुद्रेनेच पाहात राहतो. अखेर पुल कागदावर इंग्रजीत “दोन पिकॅडली” असे लिहूनच त्याला देतात. तो बिचारा लागलीच “ओSS! यू मीन फिख्व्याड्ली!” असे म्हणून पटकन तिकिटे देतो. लक्षात आले असेल की फ्रान्समधून आलेल्या ह्या नविन पद्धतीच्या वर्तुळाकार गेंदेदार काॅलरला पिकॅडली म्हणत!
पण ह्या पिकॅडलीचे स्पेलिंग Piccadills, pecadills, pickadailles, picardillas, अशा निरनिराळ्या २० तऱ्हेच्या “स्पेलिंग”मधून लिहिले जात असे ! अखेर Piccadilly असे लिहिण्याची पद्धत रुढ झाली.
प्रारंभीचा piccadill शब्द शेक्सपिअरच्या काळातच १६०७ साली थाॅमस डेकरने लिहिलेल्या ‘नाॅर्थवर्ड हो’ ह्या नाटकात पहिल्यांदा आढळतो.नंतर काही काळाने ट्रॅफलगार स्क्वेअर जवळच एक मोठी इमारत Piccadilly Hall नावाने सर्रास ओळखली जाऊ लागली; कारण इमारतीच्या मालकाचा ह्या आधुनिक स्टार्च केलेल्या पाकळ्या पाकळ्यांच्या गोल काॅलर तयार करून विकण्याचा मोठा व्यापार होता.त्या व्यवसायाच्या कमाईतूनच त्याने ही इमारत बांधली होती. म्हणून साहजिकच ती Piccadilly Hall नावानेच ओळखली जाऊ लागली. हाईड पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याचे Piccadilly नावही या हाॅलवरुनच पडले आहे. त्या काॅलरवरून नाही.
पंधराव्या – सोळाव्या शतकात आज लोक खात नाहीत ते करकोचे, हंस, लांब मानेचे बगळ्यांसारखे पक्षी खात असत. गरीबांचे जेवण साधेअसे. जाडा भरडा पाव आणि चीझ्. हेच दोन पदार्थ त्यांच्या जेवणात असत. त्यात बदल नसे. ज्यांना हेही परवडत नसे ते फक्त भाजीपाल्यावर गुजराण करीत.
बटाटा हा त्या काळी ब्रिटनला अगदी नविन होता. त्याची पाने दुसऱ्या काही विषारी वनस्पतींसारखी दिसत असल्यामुळेही बटाटा खायला कोणी धजत नसे. इंग्लंडमध्ये बटाटा खाण्यास सुरवात व्हायला अठरावे शतक उजाडावे लागले! आपल्याकडेही सुरवातीस बटाटा आणि टोमॅटोकडे संशयानेच पाहिले जात असे.टोमॅटो तर मास मटनाशीच जोडला गेला होता !
काहीही असो पण गोड मात्र इंग्रजांना खूप आवडत असे.
गरीब असो,मध्यम किंवा श्रीमंत असो सर्वांमध्ये साखर खाण्याचे प्रमाण प्रचंडापेक्षाही प्रचंड होते! साखर घातली नाही असा एकही पदार्थ त्यांनी शिल्लक ठेवला नव्हता. साखरेच्या तावडीतून मास-मच्छीमटण,अंडी हे मांसाहारी पदार्थही सुटले नव्हते. बरे, प्रत्येक वेळी, प्रत्येक पदार्थात साखर घालताना ‘अापला हात जगन्नाथ’ ह्या मापानेच घातली जात होती. दारूतही ती अशीच ओतली जाई. कोण किती साखर खातात त्यावर प्रतिष्ठा आधारली होती. साखर खाऊन कित्येकांचे दात काळे पडले होते.ज्यांचे तितकेसे काळे नसत ते कमीपणा येऊ नये म्हणून दातांना काळा रंग लावत! आपल्या मराठीतले “काळं कर तुझं तोंड”, ” त्याने तिथून तोंड काळे केले ” हे वाक्प्रचार तिकडे हे सन्मानादर्शक समजले गेले असते!
आज साखरेवर पुर्णपणे नसला तरी बहिष्काराची फिकट सावली पडलीय असे वाटते. साखर म्हटली की “नको नको”, “अगदी कमी” हेच ऐकायला येते. कालाय तस्मै नम: म्हणावे का विज्ञानाची प्रगती म्हणायचे.
हे साखर खाण्याचे झाले. पण ‘पिण्या’चेही प्रमाण तितकेच होते. बिअर अतोनात प्याली जात होती. जीवनात हसणे, चांगल्या गोष्टींचा उपभोग घेणे करमणुकीचे कार्यक्रम पाहणे म्हणजे पाप समजणारे कडक सोवळ्याचे कर्मठ puritans पंथीय लोकही बिअरवर मात्र तुटून पडत! असे सांगतात की ह्या प्युरिटनांच्या म्होरक्याला जेव्हा न्यू इंग्लंडला आणले तेव्हा त्याच्या जहाजात चाळीस हजार लिटर बिअरशिवाय इतर दुसरे काही नव्हते! चर्च,मठात प्रत्येकाला दिवसाला चार लिटर बिअर मिळायची!
तंबाखूच्या कथेवर तर विश्वास बसणार नाही इतकी ती थक्क करणारी आहे. तंबाखूच त्या काळी ‘व्यसनमुक्त’ होती! शेक्सपिअर लंडनला आला आणि पाठोपाठ तंबाखू एकवर्षाने आली. सुरवातीला ती एक चैनीची वस्तुच होती.पण शतकाच्या शेवटी ती गोरगरीबांचीही झाली. तंबाखूचा इतका प्रसार झाला की लंडनमध्ये तंबाखू आणि तिच्या पदार्थांची सात हजार दुकाने झाली होती!
तंबाखू केवळ शौक म्हणून खाण्यासाठीच वापरली जात नसे. रोग प्रतिबंधकारक, बऱ्याच रोगांवर उपचार म्हणूनही ती वापरली जात असे.त्यामध्ये गुप्तरोगांचाही समावेश असायचा.अर्धशिशी,तोंडाची दुर्गंधी आणि त्याहीपेक्षा लंडनला सळो की पळो करून हजारो लोकांना मृत्युमुखी धाडणाऱ्या प्लेगसाठी प्रतिबंधक उपाय म्हणून नियमाने तंबाखू खाल्ली जात असे. तंबाखूचा शुभसंस्कार लहान मुलांवरही करत असत. इटनसारख्या शाळेत आज तंबाखू खाल्ली नाही म्हणून विद्यार्थ्यांना बदडून काढत! आपल्याकडेही तंबाखूची मिश्री अजूनही दात घासण्यासाठी खेड्यापाड्यात वापरत असतील. पूर्वी तर शहरातही बरेच लोक तंबाखूने दाताला,तल्लीन होऊन,मालिश करत बसत !
विज्ञानाच्या दाराची कवाडे उघडू लागली तशी आज तंबाखूचे प्रस्थ जवळपास नाहीसेच झाले.
शेक्सपिअरच्या आधी आणि त्याच्या काळातही समाज अनेक लहानमोठ्या स्तरांत विभागला होता. अर्थात सर्वात उच्चपदी राजाच होता. त्यानंतर येणाऱ्या सरदार, उमराव,जहागिरदार लष्करी अधिकारी आणि त्यानंतर उच्च स्थानवरचे धर्माधिकारी आणि नंतर वर्णी लागायची ती प्रतिष्ठितांची. ह्या सर्वांच्या खाली नंतर नागरिक. त्यातही प्रथम श्रीमंत जसे व्यापारी आणि त्या खाली मध्यम वर्ग.
शेतकरी व सर्वांत खाली सामान्य कारागिर व त्यांच्याही खाली मजूर असायचा. वर जे सामाजिक थर सांगितले त्यातही अंतर्गत पायऱ्या होत्याच.थोडक्यांत फळ्याआणि चिरफळ्या अनेक होत्या.
कोणी काय व कोणता पोशाख घालायचा, पेहराव काय कसा करायचा, कोणत्या प्रकारचे कापड व तेही कोणत्या वस्त्रासाठी वापरायचे ह्याचेही नियम होते! ज्याचे वार्षिक उत्पन्वीस पौड अाहे त्याला सॅटिनच्या कापडाचे जाकिटासारखे (Doublet) वापरायला परवानगी होती. पण सॅटिनचा gown पायघोळ अंगरखा किंवा कोटासारखे वस्त्र वापरता येत नसे. ज्याचे उत्पन्न शंभर पौडांपेक्षा जास्त असेल त्याला सर्व कपडे सॅटिनचे वापरायला मुभा होती. पण आतले जाकिटासारखे doublet फक्त मखमलचे वापरायला परवानगी होती. वरच्या पोशाखात मात्र मखमलीचा वापर करण्यास बंदी होती! मात्र निळ्या रंगाचे किंवा गडद जांभळट तांबड्या रंगाच्या मखमलीचे जाकिट वापरायला त्याला बंदी होती. कारण ह्या रंगाची मखमल फक्त ‘सर’ किताब असलेल्या शूर सरदारांसाठी व त्यांच्यापेक्षाही वरच्या दर्जाच्या सरदारांनाच वापरण्याचे अधिकार होते. ह्यापेक्षाही चक्रावून टाकणारी मर्यादा-प्रतिबंध म्हणजे पोषाखातील एखाद्या विशिष्ठ वस्त्र प्रावरणासाठी किती कापड वापरायचे व त्याला किती दुमडून किती चुण्या असल्या पाहिजेत ह्याचेही निर्बंध होते! हे निर्बंध असण्यामागे ह्या कापडाची आयात होत असे. त्यामुळे खूप पैसा बाहेरदेशी जात असे. त्यावर काही प्रमाणात बंधने घालावीत ह्यासाठी हे नियम असावेत असे काही तज्ञांचे मत आहे.
राजे आणि त्यांचे अमर्याद अधिकार किती असू शकतात ह्याची कल्पना ह्यावरून आणि कोणी काय, किती खावे ह्या सूचना वाचल्यावरही समजून येते.
कुणाच्या जेवणात किती पदार्थ असावेत किंवा एकूण वाढप किती वेळा व्हावे ह्याचे नियमही सामाजिक, राजकीय स्थानावर ठरलेले होते. जसे चर्चच्या कार्डिनलला जेवणात नऊ पदार्थ किंवा नऊ वेळा वाढप करण्याची परवानगी होती. गरीबाला व त्याने कुणाला जेवायला बोलावले तर फक्त दोन पदार्थ आणि सूपची परवानगी होती. इंग्लडने पोपची सत्ता झुगारून दिल्यानंतर शुक्रवारी मास खाण्यावरची बंदी उठली.
कायदा सुव्यवस्था व स्वच्छतेसंबंधीचे कायदेकानू कडक होते. खेडेगावाच्या पातळीवरही कुणाची बदके रस्त्यावर हिंडताना आढळली तर दंड होत असे. गाई घोड्याची शेण-लीद रस्त्यावरच नव्हे,कडेला जरी दिसली तरी दंड होत असे. ह्या शिक्षेतून शेक्सपिअरच्या बापाचीही सुटका झाली नाही. हेन्री स्ट्रीटवर सार्वजनिक ठिकाणी अशी घाण केल्याबद्दल त्याला एक शिलिंग दंड ठोठावला होता. त्या काळी एक शिलिंग ही मोठी रक्कम होती. ह्या शिक्षा प्लेग व इतर रोगराई पसरु नये यासाठी आवश्यकच होत्या.
पुस्तकांचा प्रसार आणि खप वाढला होता. नाटकांना लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. व राज्यकर्त्यांचा उदार आश्रय लाभला होता. स्पेन विरुद्धचे युद्ध जिंकल्यामुळे लोकांत उत्साह होता. काव्य नाटके आणि एकूण साहित्यालाच चांगले दिवस आले होते. जगात आजही काव्यात्मक भाषा, प्रभावी संवाद, अत्यंत कमी व नेमक्या शब्दांत प्रसंग त्याची वेळ व पात्रे कोण हे शब्दातून डोळ्यांसमोर उभे करणारा,मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरिक्षण,नाट्यपूर्ण प्रसंग आणि हॅम्लेट,आॅथेल्लो, आयागो, ज्युलिेएट, यासारख्या पात्रांची अजरामर स्वगते, सुखात्मिका आणि शोकांतिका ह्या दोन्ही तऱ्हेची,आजही गाजत असलेली नाटके लिहून दिगंत कीर्ति मिळवणारा; आपल्या चतुरस्त्र प्रतिभेच्या बळावर लोकांचे आणि राजघराण्यातील परिवाराचे मन जिंकणारा; स्व कर्तृत्वावर राजाकडून आपल्यासाठी अभिमानाने मिरवावयाचे मानचिन्ह मिळवणारा;
लंडनपासून शंभर मैलावर असलेल्या लहानशा स्ट्रॅटफर्ड- अपाॅन- एव्हन गावातील शेक्स्पिअरचे ह्याच काळात लंडनला आगमन झाले. इथेच त्याचा उत्कर्षही झाला. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावाचे नावही ठळकपणे जगाच्या नकाशावर आणले!
[बिल ब्रायसनचे शेक्सपिअरवरील पुस्तक व काही जमवलेल्या माहितीच्या आधारे.]