“ काय (ज्ञान) देवा सांगू तुझी मात…” आजही सलग सहाव्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसन्न होऊन ओव्यांचे शतक तर पूर्ण करून घेतलेच आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी माझ्याकडून लिहून पूर्ण करून घेतली!गुरुमहाराज की जय ! ज्ञानेश्वर महाराज की जय!
आता ज्ञानेश्वरीतील पसायदान स्वतंत्र पानावर वेगळे लिहायचे; ज्ञानेश्वरांची आरती विठ्ठलाची आरती , सुंदर ते ध्यान हा अभंग आणि संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत केल्यानंतर तिच्याविषयी लिहिलेल्या ओव्या/ अभंग हे लिहायचे. आणि योजकांनी सांगितल्याप्रमाणे सविस्तर अनुक्रमणिका व माझे मनोगत/ अनुभव लिहिणे आहे.
पण पायी वारी करीत पंढरपुरला पोचल्याचा आनंद घ्यायचा, तो ज्ञानेश्वरी हाताने लिहून पुर्ण झाल्यावर घेतला. पंढरपुरांतील इतर देवदेवतांचे दर्शन घेणे राहावे तसे झाले आहे मला! चला, तुम्ही सर्वांनी, विशेषतः सतीश सुधीर ह्यांनी गेले पाच दिवस खूप म्हणजे खूपच कौतुक करत उत्तेजन दिले. त्यामुळे मला हे इतके जमले. होय. स्मिताने मला ह्या उपक्रमात भाग घ्यायला लावले. खटपट करून पिंपरी चिंचवडला जाऊन ज्ञानेश्वरी व ती ज्या वहीत लिहायची ती पुरस्कृत वही आणली. मला पाठवली.
तेजश्रीने तिच्या मावसबहिणीला- दीदींनाही- मी ज्ञानेश्वरी अर्थासह लिहतोय असे कळवले होते. त्यांच्याही शुभेच्छा मिळाल्या. म्हणूनच म्हटले की तुमच्या सर्वांमुळे मला लिहिणे शक्य झाले. त्तसेच सतीशने तो पावसला गेला होता तेव्हा माझ्यासाठी स्वामी स्वरुपानंदांनी लिहिलेली ‘अभंग ज्ञानेश्वरी आणली; तिचाही मला ज्ञानेश्वरीतील काहीं ओव्यांचा अर्थ समजण्यास मदत झाली. सुधीर स्मिता सतीश आणि उषाताईंनी वारंवार दिलेल्या उत्तेजनामुळे माझे हे लिखित पारायण पुरे झाले. दहा बारा दिवसांपूर्वी सतीश म्हणाला होता ,” बाबा, तुम्ही ३१ डिसेंबरच्या आत पूर्ण कराल.” झाले की हो तसेच!
॥जय जय जय रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी॥”