बीजाक्षरांचा व्यावहारिक मंत्रकोश

रेडवुड सिटी

नुकतीच माझ्या वाचनात काही पुस्तके आली. त्या पुस्तकांत काही मुळाक्षरे अनुस्वार दिल्यावर मंत्राक्षरे होऊन ती बऱ्याच व्याधी दूर करतात असे आत्मविश्वासाने सांगितले आहे. त्यासाठी शरीरात सहा चक्रे असतात. ती पाकळ्यांची असतात. त्यावर आणि पर्यायाने संबंधित अवयव किंवा संस्थांवर ही मुळाक्षरे परिणाम करतात ते स्पष्ट केले आहे. प्रत्येक चक्रांची वेगवेगळी बीजाक्षरेही दिली आहेत. कोणत्या व्याधीसाठी कोणती मुळाक्षरे म्हणायची तीही यादी दिली अाहे. अक्षरावर अनुस्वार दिला की मंत्र होतो ही साधी युक्ति त्यासाठी वापरली आहे. काहीजण म्हणतात की कुठेही अनुस्वार दिला की ती अक्षरे, शब्द संस्कृत होतात! संस्कृत इतके सोपे आहे हे मला कळले असते तर मी म्यॅट्रिकला अर्धमागधी घेतले नसते!
काही म्हणा, सोपा उपाय असे म्हटले असले तरी ते पुस्तक मला अवघड वाटले म्हणून दुसरे पुस्तक वाचायला घेतले.

त्या दुसऱ्या पुस्तकात बद्धकोष्ठ, गॅसेस, गुबारा, तंबाखू, त्याहीपेक्षा गांजा खाण्या ओढण्याने परसाकडला त्रास होतो. तो त्रास केवळ त्या माणसालाच होत नाही तर त्याच्या संडासातील दीर्घकालीन स्थानापन्न अवस्थेमुळे बाहेर टमरेलघेऊन रांगेत उभे राहिलेल्यांनाही होतो. हा त्रास टाळण्यासाठी लेखकाने, “कुं थु न कुं थु न कुं थ शी ल कि ती ,” हा बीजाक्षरी मंत्र सुटका होईपर्यंत मोठ्याने जपायला सांगितले आहे. पुन्हा त्यानेच दिलासाही दिला की संवयीने हा अक्षरमंत्र आपोआप तोंडातून आवाजरुपानेही बाहेर येत राहतो. शिवाय आपल्या पूर्वजांपासून हा मंत्र म्हणला जात आहे ही ऐतिहासिक पार्श्वभूमीही त्याने दिली आहे. मुळव्याध झालेल्यांसाठी प्रथम हाच “कुं थुं… ..”
मंत्र लागू आहे पण त्यांच्यासाठी त्याने अॅडव्हान्स कोर्समधील ” आ आ आs आss ग ग ग आ आ आआ
Sssss ई आई ग गsss! हा मंत्रही सांगितला आहे. तो म्हणताना त्यातील “दीर्घ उच्च स्वरांच्या खुणांकडे ” विशेष लक्ष देऊन म्हणावा अशी सूचना केली आहे. त्यापुढचे लेखकाचे निरिक्षण जास्त व्यवहारी वाटते. तो म्हणतो, या सूचनेकडे लक्ष न देताही खुणांपेक्षाही मोठ्या आवाजात तो म्हणू लागतो.काही वेळा हा मंत्र म्हणून झाल्यावर जुनाट रोगी अनेकदा ‘निपचित पडणे’ हे आसनही त्यांच्या इच्छेविरुद्ध करतात.

आपल्याला जेवताना काही वेळा उचकी लागते. पाणी प्याल्यावर ती थांबते. हा अनेकांचा अनुभव आहे.इतर वेळीही उचकी लागते.हाही अनेकांचा अनुभव आहे. उचकी देताना हनवटी वर जाते, चेहरा वर आणि डोके किंचित मागे जाते, हा सुद्धा अनेकांचा अनुभव आहे. उचकी लागते त्यावेळी “उ् उ उ्उ, अ्ह् ह् ह् उ्ह्उ्क् उक् ” हा बीजाक्षरी मंत्र जपावा. शेवटचा उ्क् दोन वेळा आपोआप म्हटला जातो. ह्या मंत्रात अनुस्वार ऐच्छिक आहे असे त्यानी विशेष सूचनेत म्हटले आहे.

जेवताना स्वत:हून बरंच हादडले असेल किंवा तुमच्या सर्वांच्या आग्रहाला बळी पडून जोरदार खाल्ले असेल तर जेवण झाल्यावर उचक्या येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. ह्यामध्ये पोक्त वयाच्या लोकांचे आणि म्हाताऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यावेळी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊनलगेच उचकी-मंत्राच्या भानगडीत पडू नका. कारण तुम्ही न सांगताही त्याने तो चालू केलेलाच असतो. पहिल्या प्रथम रोग्याला पाणी पाजावे. त्यात खायचा सोडा आणि लिंबाचा रस पिळल्यास जास्त चांगले असे म्हटले आहे. त्यानंतर वरील बीजाक्षरी मंत्र म्हणावा असे लेखक सुचवतात.लेखक पुढे म्हणतो, त्या उचकीग्रस्त व्यक्तीकडे लक्ष देऊन पाहा. कारण काही वेळा उचकी देताना व मंत्र म्हणताना तो डोळ्यांची बुबुळे वर नेतो, आणि तिथेच स्थिर ठेवतो. तो भ्रुकुटीमध्यात खेचरदृष्टी लावून निर्गुणाचे ध्यान करतोय या अध्यात्मिक समजुतीत राहू नका. मंत्र चालू असेल, तो जोरजोरात होत असेल व तुमच्या प्रोत्साहनाने तो तसा म्हणतच राहीला तर तुमच्या लवकरच ध्यानात येईल, निदान यावे,की त्या उचक्यांचे रुपांतर आता आचके देण्यात होऊ लागले आहे. अशावेळी त्याला बीजाक्षरी मंत्र म्हणण्याचा आग्रह न करता, कारण तो आपण जेवताना केलाच होता, ताबडतोब अॅंब्युलन्स बोलावलेली बरी!

रोजच्या आयुष्यात आपण काही गोष्टी न कळत करतो किंवा आपल्याकडून होतात. त्यापैकी ढेकर,आणि इतरही काही विशेष आवाजांचा समावेश होतो.

ढेकर ही सामान्यपणे जेवणाचे समाधान,पोट भरल्याची खूण आहे. त्यावेळेस ती तृप्ती एकदाच उमटते.पण व्यक्तीनुरूप संख्येत फरकही पडतो. किंवा ती एखाद्या अंतस्थ व्याधीचा उघड उदगारही असते. त्यावेळी माणूस सतत ढेकराच देत असतो. त्यावर उपाय म्हणून लेखक
” अssब्बा! अ्ह्sब ब्बा! हsब्! ह्हा्ब् ” हा बीजाक्षरी मंत्र म्हणायला सांगतो. ह्या अक्षरांबरोबर दिलेले उदगार चिन्ह म्हणायचे नाही. म्हणण्यासाठी ते दिले नाही. त्याचा आवाज काढून ते म्हणता येत असेल तर ते चिन्हही म्हणायला लेखकाची हरकत नाही! लेखकाने, ढेकर मंत्र म्हणताना प्रत्येकाचा चेहरा, भुवया, कपाळावर पडणाऱ्या आठ्यांची संख्या हे निरनिराळे असतात हे लक्षात घेतले आहे. उदगार चिन्ह त्यांचे निदर्शक आहे,इतकेच.

तसेच बरेच इतर आवाजही आपल्याकडून बाहेर पडतात. त्यामुळे माणूस अवघडून जातो. चेहरा ओशाळलेला होतो. दुसऱ्या बाजूला किंवा दुसऱ्यांकडे ‘तो मी नव्हेच’ ही खात्री करून देण्यासाठी बघायला लागतो. अशा आवाजासाठी लेखकाने प्रत्येकाला ज्याचे त्याचे बीजाक्षरी मंत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे ! तरीही एक सर्वसाधारण नमुना यासाठी दिला आहेच. तो असा, “ढों म ढां ढिंम् ढंम्म्.” मंत्राच्या सुरवातीला ओम् म्हणण्याचा विकल्प देऊन वातावरण सांस्कृतिक करण्याचाही त्याने प्रयत्न केला आहे.
लेखक पुढे म्हणतो त्याने मर्यादा पाळून, बाहेर पडणाऱ्या अशा आवाजाच्या खालच्या पट्टीतील ‘सुर निरागस हो’ स्वरांसाठी मंत्र देण्याचे टाळले आहे.

माणूस हा जात्याच आनंदी खुशालचेंडू असला तरी काही वेळा तो आनंदी नसतो.स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी त्याने ” टां ग टिं ग टिं गा की टां ग टिं ग टिं गा ” हा किंवा लहानांनी,तरुणांनी ” ढां ग चि क ढां क चि क ढां क चि क” हे बीजाक्षरी मंत्र प्रथम सावकाश व नंतर भराभर म्हणण्यास सांगितले तर आहेच पण त्याबरोबर जसे येईल तसे नाचायलाही उदार मनाने परवानगी दिली आहे. ह्यामुळे परंपरेला आधुनिकतेचीजोड मिळून अनायासे एरोबिक्स साधते असे त्याला सुचवायचे असावे.

लेखकाने प्रसंगा प्रसंगानुरूप केलेल्या सूचना लक्षात घेतल्या तर त्याचे अचूक निरीक्षण व अनुभव ह्यांची प्रकर्षाने (हा एक आणि दुसरा अभिव्यक्ति हे शब्द समीक्षणात्मक परिक्षण करताना कटाक्षाने वापरावेतअसे सांगतात.) जाणीव होते. तसेच लेखकाची भाषाशैली आणि विशेषत: मंत्रांसाठी रोजच्या वापरातल्या बीजाक्षरांची योजना पाहिली की पुस्तकाचे ‘बीजाक्षरांचा व्यावहारिक मंत्रकोश’ हे नाव तर खूपच समर्पक वाटते.
इति बीजाक्षर व्यवहार मंत्रकोशस्य परिक्षण समाप्ता ! ओSम् टण् !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *