असेल माझा हरि तर….

म्हातोबा म्हणजे म्हातोबाच. तोच तसा असू शकतो. आता सकाळचे सहा वाजले.म्हातोबा झोपलेला. बायको उठलेली. चूल पेटवून चहाला पाणी ठेवून ती मागच्या अंगणातल्या चुलाण्यावरच्या हंड्यात पाणी तापवत ठेवून आली.गरम पाण्यात चिमूट दीड चिमूटभर चा ची पत्ती टाकली. लहान गुळाचा खडा टाकला. गप्प बसून राहिली. चा उकळला दिसतंय. दोन्ही हाताने भांडं पटकन खाली उतरवलं. हुळहुळणारी बोटं पदराला चोळली.जर्मलच्या बगुण्यातलं चमचा दोन चमचं असंल दूध ओतलं. पितळीत चा ओकून गरम गरम पिऊ लागली. चा लालभडक असनं का पण लई गुळचाट ग्वोड होता त्याचाच म्हतोबाच्या सवाईला पोटभर जोर आला. सात वाजले. म्हातोबा झोपलेला. आठ वाजले, नऊ झाले, दहा कधीच होऊन गेले. म्हातोबा झोपलेलाच होता. हे काही आजचे नव्हते. रोजचेच. अकरा वाजले आणि डोळे किलकिले करत म्हातोबा पांघरूण नाकापर्यंत खाली आणून बघू लागला. हात पाय ताणत तो उठला.

म्हातोबा उठला म्हटल्याबरोबर सवाई लगबिगिनं बाहेर गेली. दुकानात जाऊन अधेलीभर दूध,पावबटेर आणि भाकरीचं पीठ आणि बेसन व गुळाचा मोठा खडा घेऊन आली. दुकानवाला दसऱ्या म्हातोबाचा दोस्त.तोम्हातोबा कडून पैसे घेत नसे.
म्हातोबाने पावबटेर बरोबर पितळी दोन पितळीभर चहा रिचवला. आंघोळ केली.सवाईला म्हणाला, “सवाई, अगं दनक्यात भूक लागलीय. काही हाये का चावायला. बायकोने भराभरा गरम भाकऱ्या आणि चून वाढलं. म्हातोबा मांडी ठोकून बसला. बुक्कीनं कांदा फोडला. तीन चार भाकऱ्या रिचवल्या. डाईरेक्ट तांब्यातूनच पाणी घटाटा प्याला. डोक्याला मुंडासं आवळून गुंडाळलं. खांद्यावर गमचा टाकून बाहेर पडला. मोठी फेरी मारून भूक लागली म्हणून घरी परतला.

रात्र झाली. होणारच ती. म्हातोबाला झोप येऊ लागली. तीही येणारच होती. म्हातोबा व त्याची सवाई पांघरूणात थोड्यावेळ खुसखुस बोलत राहिली. दोघंही झोपली. पण आज दसऱ्याला मात्र झोप येत नव्हती. “ ह्या म्हातोबाला काय करायचं ? काही काम करत नाही की कसला धंदाही बघत नाही. काही कर म्हटलं तर,” अरे माझ्या दोस्ता! हे बघ काम धंदा सर्वेच करत्यात. मला भूक-झोप-भूक थोडी एक चक्कर मारून येणं. वाटेत कुणी काही उचलून दे, हात लाव रे पाटीला, त्ये पोतं तिथं ठेवतोस का म्हटलं तर तसलं काही कराव. दमलो म्हणून भूक लागली म्हणत घरी यावं भाकरी, मीठ चटणी असेल त्या संगट खावं. झोप येत्येच बघ. अरे असल माझा हरी तर देईल खाटल्यावरी म्हणत गप झोपायचं बघ.”असं भाषाण ऐकवतो. पण मी दोस्त म्हणून मागेल ते देतो येव्हढं म्हणायचं इसरला. नेहमीच इसरतो. काही नाही. आता त्याला फुकट नाही द्यायाचं काई.असं ठरवलं आणि दसऱ्याला झोप आली.

रोजच्या प्रमाणे सकाळ झाली. रोजच वाजायचे तसे सहा, सात…नऊ, दहा वाजत वाजत अकरा वाजले. म्हातोबा उठण्याच्या तयारीत की त्याची लाडकी सवाई दुकानाकडे गेली.  “ रोजचंच सामान द्या भावोजी.”असे सवाई म्हणाली. आणि दसऱ्याच्या कपळावरआठ्यांचे जाळे पसरले. “ह्ये बघा, म्हात्याला सांगा आता फुकटचं काई बी मिलनार न्हाई. काम कर म्हनाव. मी दोन खोल्या बांधणार आहे. त्यासाठी डोंगरातल्या खदानातून दगड आणले त्यानं तर चार पैशे मिळतील.सांगा त्येला. तुमी तरी समजावा त्याला वैनी.”

वैनी नुसतीअर्धवट मान डोलवून आली. सवाईनं आज दोस्तानं काई दिलं नाही आणि काम केल्या बिगर फुकट मिळणार नाही सांगितलं. नंतर तिने दसऱ्या नवीन खोल्या बांधतोय त्यासाठी मोठे दगड आणून दिले म्हातोबाने तर त्याला चार पैसेही मिळतील; हा निरोपही सांगितला. ते म्हातोबानं सगळे ऐकून घेतले. नंतर म्हणाला, ते मोठ मोठे हैदर आणणं सोपं न्हाई. फार मेहनत पडते. हातच मोडंल माझा. सवाये, अगं ‘असंल माझा हरि तर देईल खाटल्यावरी!” काय?” सवाईने खरं खरं म्हणत निमूटपणे मान हलवली.

घरात होतं त्यात चा,जेवण केलं.म्हातोबा तोपर्यंत आंघोळ करून आलाच होता. रेट जेवल्यावर थोडा पडला आणि मुंडासे बांधून बाहेर पडला. भेटेल त्याच्याशी बोलत चालत गावाबाहेर आला ते त्याला समजलेही नाही. फक्त एक लांब पांढऱ्या दाढी मिशा असलेला म्हातारा तट्टावर बसून येताना दिसला. दिसला खरा पण तो मोठ मोठ्याने “अरे गाढवाच्या थांब थांब होSs होSS अरे गाजऱ्या ये गाजऱ्या थांब”असं घाबरून ओरडत वेगाने धावत सुटलेल्या गाजऱ्या तट्टाला लगाम ओढून ओढून ओरडत होता. पण गाजऱ्याच्या अंगात आल्यासारखे वेडे वाकडे उधळत चालला होता. तेव्हढ्यात म्हाताऱ्याच्या हातून लगाम सुटला. त्याची मांड सरकली. म्हातारा पडतोय की काय असे वाटत होते. तितक्यात म्हातोबा जोरात पळत त्या गाजऱ्या तटटापुढे घट्ट ऊभा राहिला. एक मोठी उडी खाऊन गाजऱ्यावर धावुन गेला. लोंबकळणारा लगाम पकडून खेचला. गाजऱ्याच्या तोंडावर दोन बुक्के मारले. लगाम फार जोरात खेचला की गाजऱ्याच्या तोंडातून फेसा बरोबर खरचटल्याने रक्तही आले. तट्टू थांबले. पण अजून थयथयाट चालू होता. म्हातारेबुवाही सावरले होते. म्हातोबा तट्टाच्या मानेवरून घसरत उतरला. गाजऱ्यापुढे जाऊन उभा राहिला. त्याच्या कपाळावरून, डोक्यावरून हात फिरवित म्हाताऱ्याकडे पाहात राहिला. गाजऱ्या शांत झाला होता.

म्हातारा म्हणाला,” इकडे बरेच टोळ भैरव येत असतात. गांज्या चिलिम ओढत बसतात. पण लेकरा तू कधी मधी दिसतोस. पण कुठे झाडाखाली डुलकी घेत पडलेला मी एक दोनदा तुला पाहिलाय.” “ बाबा, तुम्ही मायाळू दिसता. पर मला आता लई जोराची भूक लागलीय. जातो.” “ अरे पोरा थांब. तू माझा जीवच वाचवलास की आज. तुला मी काही द्यावं म्हणतो. देवानीच तुला पाठवलं. दमाझ्यापाशी आता तर काई नाई बग.देवच तुलाबी काही दिल. हां पण तू माझ्या संगट डोंगरावर चल. तिथे तुला दावतो द्येतो. बघ. चल.” “ अवो बाबा. ते डोंगराचं उद्या बघू. आत्ताच्या भुकेचं पाह्यला पाहिजे. मला घरी जाउ द्या. तुम्ही मायाळू वाटता, यव्हढी माया करा माझ्यावर.” म्हाताऱ्याने काही ऐकलं नाही. शेवटी कुरकुरत का होईना म्हातोबा आणि तो म्हातारा डोंगरावर आले. तिथे एक झाड होते. काही मोठे दगड होते. म्हातारा म्हातोबाला म्हणाला,” तो मोठ्ठा दगड हलव. म्हातोबा मनात म्हणाला माझ्या दोस्तासाठी दगड वाहून आणायला नको म्हणालो आणि ह्या म्हाताऱ्याचे दगड हलवत बसायलो मी. पण म्हातोबाने तो मोठा दगड हलवला. म्हातारा म्हणाला, “ तिथली पानं बाजूला करून खाली काय ते पाहा.” म्हातोबाने पाने हलवली . त्याला मोठे मोठे सहा पेटारे दिसले. म्हाताऱ्याने न सांगता त्याने ताकद लावून पेटाऱ्याचे झाकण उघडले.

कुंईकर्र्कर्र करत झाकण वर नेले. आत चांदीच्या मोहरा! दुसरी पेटी तिसरी पेटी करत साही पेट्या म्हातोबाने उघडून पाहिल्या सगळ्या पेट्या चांदीच्या नाण्यांनी भरलेल्या! म्हातोबाने एकेक पेटारा पक्का बंद करत पहिली पेटी बंद करताना थोडी नाणी हातात घेऊन म्हातारेबाबांना ,” अहो बाबा! हे काय?”असं मागे वळून विचारले तर म्हातारे बाबा नव्हते. गाजऱ्या तट्टूही नव्हते.कुठे गेला बाबा म्हणत ती नाणी मोजली सहा नाणी होती. खिशात टाकली पेटारा घट्ट बंद केला. वर पहिल्यासारखी सगळी पानं पसरली. तो ‘मोठ्ठा हैदरचा बाप’असा दगड ठेवला. आणि भूक लागलेली दमलेला म्हातोबा खाली येत झाडाखाली पडला. पडला तर झोपलाच. बऱ्याच वेळाने उठला. त्या पेट्या ती नाणी तो दगड सगळे स्वप्न होते की काय असे त्याला वाटले. उठला. जाऊ द्या काय करायचे आपल्याला म्हणत भुकेला म्हातोबा घराकडे निघाला. चालता चालता त्याला खिशात काहीतरी खळखुळ वाजतेय असे वाटले म्हणून खिशात हात घालून पाहिले तर तीच चांदीची सहा नाणी! अरेच्या सगळे खरेच होते. स्वप्न काहीच नव्हते. म्हातारे बाबाही खरेच होते. घरी आल्यावर म्हातोबा रेट जेवला. सवाईही जेवली. दोधे पांघरुणात खुसुखुसु बोलत होते. पण आज चांदीच्या नाण्याची खुसखुस होती. म्हातोबा घोरू लागला.रोजचा सूर्यच आजही उगवला. सहा, सात, आठ…दहा वाजून गेले. म्हातोबा आजही अकरा वाजताच उठला.

लगेच सवाई दुकानाकडे निघाली.म्हातोबाच्या दोस्ताला नेहमीच्या वस्तु मागितल्या पण रवा तूपही घेतले. हे पाहून दसऱ्याने आठवण दिली आता फुकटचे जिन्नस बंद. सवाई न बोलता हसली. “ किती झाले?” “चार नाणी” दसऱ्या तुटकपणे बोलला. सवाईने ठसक्यात पदराची गाठ सोडून चार नाणी दिली. दसऱ्यातील दुकानदाराने तिने पुन्हा पदरात बांधलेली दोन नाणीही पाहिली होती. पण सर्व पाहताना त्याच्या तोंडाचा आs झाला होता. सावरून त्याने हे कसे काय झाले ते विचारल्यावर आज रात्री दुकान बंद केल्यावर घराकडे या. तुमचे दोस्त सांगतील समदं” असे म्हणून पदर जोरात फडकावत तो कमरेला खोवत घरी आली. आज म्हातोबाला भाकरी बरोबरच गुळाचा सांजाही तगडा खायला मिळाला.

रात्री दसऱ्या आला. म्हातोबाने डोंगर, भले मोठे दगड, त्याखली पाने त्यांच्याखाली लपवलेले सहा पेटारे चांदीची नाणी भरलेली सगळे सगळे सांगितले.दोस्त दसऱ्या हरखून गेला. तो म्हणाला,” म्हातोबा! …म्हातोबाला आपला म्हात्याच म्हातोबा झाला हे ऐकून हसू आले. “ म्हातोबा, माझ्याकडे बैलगाड्या आहेत. बैलाच्या जोड्याबी दांडग्या आहेत. माणसं आहेत. आपण दोघे जाऊ या उद्या रात्री. पेट्या आणू. तुझ्या तीन पेट्या माझ्या तीन पेट्या. काय पटतंय का?” “ अरं दोस्ता न पटायला काय झालं? तू आनं मी दोस्त हाहोत. है की नै?” दसऱ्याने मान डोलावली.

म्हातोबा आणि त्याची लाडकी सवाई जेवण करून झोपले. इकडे दोस्त दसऱ्याला काही झोप येईना. रात्रभर विचार करत होता. बैल जोड्या, गाड्या माझ्या. माणसंबी माझीच. मेहनत माझी. म्हात्या नुसता पाटलावानी येणार. हिथं तिकडं न्हाई. हां हिथं सांगत हुकुम देणार. इतके दिस त्याला पोसलं . आताही तीन पेटारे त्याचे? ह्ये काई खरं नव्हं” असे म्हणत त्याला पहाटे डोळा लागला.

सकाळ झाली. कालच्या सारखाच आजही सूर्य ऱ्उगवला. सहा,सात , आठ नऊ …. दहा केव्हाच होऊन गेले. म्हातोबा आजही अकरा वाजताच उठला. आज काही सवाई दुकानाकडे गेली नाही. चहात कालपासून दूध जास्त पडत होते. गुळाचा खडाही मोठा टाकत होती. भाकरी बरोबर आता भाजी होती. दुपारी गुळाचा गरम गरम सांजा व्हायचा चा बरोबर. दसऱ्या रात्री येणार होता. सवाई म्हातोबाला आठवण करत होती. रात्रीचे नऊ वाजले. दहा वाजले. दसऱ्या दोस्ताचा पत्ता नाही. सवाई म्हणाली ,”अकरा झाले की!” म्हातोबा म्हणाला, “येव्हढं काय त्यात, उद्या येईल. दुकानाची कामं काय थोडी असतात? हिशोब ठिशोप असत्यो.चला मला झोप आली”. दोघेही गाढ झोपी गेले.

दसऱ्या दुकानदार दुकान लवकरच बंद करून बैल गाड्या जोडून माणसं बरोबर घेऊन डोंगराकडे निघाला होता . रात्र काळी झाली होती. दसऱ्याने सगळे बारिक लक्षात ठेवून काम सुरू केले. तास दोन तास झाल्यावर ते मोठ्या दगडाचे झाड सापडले. मग पुढची कामं सुरू झली. शेवटी पेट्या दिसल्या. तोपर्यंच चंद्राची कोर उगवली होती. पेटारा उघडून पाहिला. दसऱ्याने हात घालून पाहिला. नुसता चिखल माती खडे गोटे! अरे, दुसरा पेटारा उघडला. दसऱ्याने स्वत:च पुन्हा हात घातला. तेच मटेरियल! नंतर तिसऱ्या पेटीत माणसाला हात घालून पाहायला सांगितले. दगड माती चिखला शिवाय काही नव्हते . साही पेट्यात तीच सोनमाती! दसऱ्या मनात म्हणाला लेकाचा म्हात्या मला हासत असंल झोपत बी!” पण दसऱ्याही साधा नव्हता. त्येबी लई खारबेळं होतं त्याने गाड्यात पेटारे चढवले. सगळे निघाले. रात्रीचे तीनचार झाले असतील. दसऱ्याने सगळे पेटारे म्हात्याच्या घराच्या दारासमोर खिडकी समोर त्या पेट्या ओतून रिकाम्या करायला लावल्या. प्रचंड उंच ढिगारे झाले होते. “आता बस घरातच कोंडून. झोपूनच राहा म्हात्या आता!” म्हणत दोस्त दसऱ्या चडफडत आणि इतर सगळे निघून गेले.

सकाळ झाली. सूर्य तोच सकाळही तशीच. आणि म्हात्या झोपलेलाच. बायको लवकर उठली होती. पण चहा वगैरेच्या गर्दीत होती. काही वेळाने दरवाजा उघडायला गेली पण उघडेना. उघडता उघडेना. एक फटही पडेना. ढाराढूर झोपलेल्या म्हातोबाला उठवत म्हणाली, अवं अहो उठा उठा.! “ म्हातोबा झोपलेलाच. बराच वेळ हाका मारल्यावर तो उठला. सवाई म्हणाली, अहो दरवाजा उघडत नाही. काय बी करा एक फटही दिसत नाही.” म्हातोबा आरामात उठला, दात ओठ खात दरवाजा ढकलू लागला. पण उघडेना. मग कशीबशी ताकदीने एक फट पडली.आणि त्यातून “खळखळा ओतल्या मोहरा” तशी चांदीच्या नाण्यांची खळखळ खण् खण् करत धारच लागली. हळू हळू दरवाजा जसा उघडू लागला तशा लाटा येऊ लागल्या.

 

सवाईने व म्हातोबाने पोती भरायला सुरवात केली. सगळी नाणी भरून झाली. जागच्या जागी ठेवली गेली. गुळा पोळीचे जेवण झाले म्हतोबाला लवकर उठायला लागल्यामुळं झोप येऊ लागली. सवाई नवऱ्याकडे कौतुकाने पाहात होती. म्हातोबाला गोडाधोडाचे खाल्यामुळे झोप येत होती. तरी ती म्हणाली, मीम्हणत होते तसेच झाले. भावजी रात्रीच जाऊन काम करून आले. त्यांनी तुमची झोपमोड होईल म्हणून मोहरा ओतून ते गेले.””हो हो, तुझं खरं हाये सवाई, पण मला झोपू दे. दुपारी सवाई दुकानात गेली. मालकासाठी नवं धोतर पैरण फेटा आणि स्वत:साठी एक चांगलं लुगडं चार खण आणि रोजचाच चा ची पत्ती गुळ रवा आणि आज गहू घेतला.तूप तर घेतलेच. ही यादी सगळं ऐकून दोस्त दसऱ्याचे तोंड जे वासले होते ते सर्व देई पर्यंत तसेच होते. सवाईने वीस चांदीची नाणी काढून दिल्यावर त्याचे डोळे कपाळात जायचे तेव्हढे राहिले होते. पैसे दिल्यावर नामदेवाची जनी, तुकारामाची आवली तशी साध्या म्हातोबारायाची साधीभोळी,सरळ मनाची सवाई,मालकाच्या दोस्त दसऱ्याला म्हणाली, भावजी, तुमचं मन मोठ्टं बघा. तीन पेटाऱ्यांपेक्षा तुम्ही जास्त दिलेय वाटतं!”

दोस्त दुकानदार दसऱ्या हळू आवाजात म्हणाला, “नाई वैनी, तुमचा मालक आमचा म्हातोबा म्हणत्यो त्येच खरं. असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी!” पण वैनी म्हणाली,” त्ये काई असंल नसंल,मला समजत न्हई. पन तुमचं मन चांगलं ह्ये खरं!”

 

(मेक्सिकन लोकथेच्या आधारे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *