Author Archives: Sadashiv Kamatkar

पोस्टाची पेटी

माझ्यासारख्या अनेकांना हळहळ वाटेल असा दिवस. आठवणींनी हुरहुर लागेल. एकामागोमाग एक आठवणी येत राहतील. असा हा दिवस असेल!


काय होणार त्या दिवशी? कुणाच्या अध्यात ना मध्यात येणारी, कुणालाही कसलाही अडथळा न आणणारी , वर्षो न् वर्षे उन पाऊस थंडी वाऱ्यात निमुटपणे उभी असणारी ही पोस्टाची लोखंडाची किंवा बीडाची भक्कम तांबडी उभी पेटी, पोस्ट खाते काढून टाकणार आहे. तिची उचलबांगडी होणार आहे, अशी आताच WhatsApp वरून पुढे पुढे सरकत आलेली बातमी वाचली. आणि अरेरे! असं का व्हावं हा प्रश्न पडला.

अगोदर म्हटल्याप्रमाणे ह्या उभ्या गोल तांबड्या पोस्टाच्या पेटीला कोणी कधी धडकला, पडला असे ऐकल्याचे , गावातल्या संध्याकाळच्या लहानशा वर्तमानपत्रातही वाचल्याचे आठवत नाही. उलट कुण्या दमल्या भागलेल्याला टेकून,तिच्या खांद्यावर हात ठेवून, तिचा आधार घेता येत असे. एखाद्याला रात्री ‘जास्तच’ झाली तर तिच्या पाठीला टेकून घसरत खाली पडता येत असे! क्वचित कधी रस्त्यावरची एक दोन हाडतहुडत कुत्री एक पाय वर करून तिला मानवंदना देऊन पुढे जात!

अशा आमच्या ह्या नित्योपयोगी पोस्टाच्या उभ्या पेटीला, पोस्ट खात्याने आडवे करण्याचे ठरवले हे ऐकल्यापासून तिच्या आठवणी पुन्हाजाग्या झाल्या.

कायम तिथे असुनही नसल्यासारखी ही बुटक्या स्तंभासारखी पेटी कित्येकांच्या कित्येक गोष्टी आपल्या पोटात ठेवून घेत असे.व्यंकटेस्तोत्रातील दोन चरण सांगतात,” पुत्राचे सहस्र अपराध । माता काय मानी तयाचा खेद। “ ह्यामध्ये बदल करून ही पत्रांची मायपेटीअनेकांच्या दशसहस्र भावनांची सहस्र पत्रे रोज आपल्या पोटात साठवून ठेवी. ठरल्यावेळी पोस्टमनच्सा भल्या मोठ्या थैलीत रिकामी करी.

लहानपणी दुपारच्या तीन- चार वाजता वारदाच्या कोर्टातलीअजून महानगरपालिका आली नव्हती तिथे) ही पोस्टाची पेटी उघडायला पोस्टमन येई त्यावेळी आम्ही लहान पोरे गुडघे वाकवून किंचित ओणवे होवून “आता काय होणार?” ह्या उत्सुकते माना पुढे करीत पाहात राहू. पोस्टमन पेटीच्या पोटाचे कुलुप उघडायला लागला की मनांत “ अरे, उघड लवकर रे बाबा” म्हणत असू. आणि ते लहानसे ,’स्वर्गाचे दार’ उघडण्या आधीच , “तिळा दार उघड”, “ खुल जा सिमसिम्” हे मंत्र प्रत्येक जण मनात घोकत आता कोणता खजिना बाहेर येणार ह्याची उत्कंठतेने वाटपाहात असू!

एक आण्याच्या पोस्ट कार्डापासून ते पोस्टाचेच तिकीटाचा उठावदार शिक्का असलेली पाकिटे, विकत घेतलेली आणि त्यावर पोस्टाची तिकिटे चिकटवलेली चौकोनी, लांबट फिकट निळसर रंगाची बदामी रंगाची पाकिटे, कोर्टाच्या आवारात असल्यामुळे कोर्टाती सरकारी शिक्के असलेली लांब ब्राऊन रंगाची पाकिटे. डाव्या कोपऱ्यात वकीलांची नावे छापलेली पाकीटे, त्यात कुणाला नोटीसा पाठवलेल्या असतील ; कुणाला माहित! नंतर अंतर्देशीय पत्रेही आली. वारदाची चाळ व आजूबाजूच्या चाळीतील लोकांची पत्रे; त्यात कधी एक दोन गुलाबी पाकिटेही असत. आमचा रसिक पोस्टमन ती पाकिटे थोडावेळ हातात घेऊन चेहऱ्यावर दिसेल न दिसेल असे हसुन आमच्याकडे पाहात इतर पत्रांसारखे भराभर दोन्ही हातांनी थैलीत न ढकलता, सावकाश आपल्या मोठ्या थैलीत ठेवत असे.

अनेक गावा शहरातील ह्या तांबड्या पोस्टाच्या पेटीतून कुणी कुणी काय काय लिहून पत्रे टाकली असतील. “ मुलीची कुंडली जुळते आहे” इथपासून ते “आम्ही ह्या तारखेला मुलगी पाहायला येत आहोत,” तर लग्नाच्या केशरी रंगात छापलेल्या व वर गणपतीचे चित्र असलेल्या निमंत्रण पत्रिकांची पाकिटेही किती आनंदाने मुलीच्या वडिलांनी किंवा भावांनी टाकली असतील!

त्या पेटीने “ बाळ बाळंतीण सुखरूप आहेत “अशी पेढे/ बर्फी वाटायला लावणाऱी पत्रेही पोटात ठेवून दुपारी पोस्टमनच्या थैलीच्या हवाली केली असतील. तर कार्डावर “श्री” न लिहिलेली “ कळवण्यास अत्यंत….” अशी शोककारी दुःखकारी पत्रेही तिने पोटात घेतली असतील. तर नोकरीसाठी केलेले प्रमाणपत्रांच्या प्रतींसह तरुणांनी मोठ्या अपेक्षेने पाठवलेले अर्जही असतील. आणि शिकला सवरला असला तरी त्या मुलाने अर्जाचे ते पाकीट पेटीची झडप वर करून टाकतांना व टाकल्यानंतर “उभा क्षणभरी” होऊन मनात पेटीला नमस्कार करीत “ इन्टरव्ह्यूचा कॅाल येऊ दे “! अशी नक्कीच विनवणी केली असणार. मी करत होतो म्हणून हे लिहू शकतो. तर तिकडून कधी “ तुमची निवड झाली असून ह्या ता.ला रुजू व्हावे” अशी आनंदाने उड्या मारायला लावणारी पत्रेही तिकडच्या पेटीने सांभाळून घेतली असतील!

किती तरुण तरुणींच्या हृदयांची धडधड, भेटीची, मीलनाची उत्सुकता,पुस्तकात वाचलेल्या नायक नायिकेच्या अशाच पत्रांतील काव्यमधुर वाक्येही उचलून ती तारकाफुले एकमेकांना पाठवली असतील! जोडीला सिनेमातील गाण्यांची एखादी ओळही रंगत वाढवत असतील. आणि आमच्या ह्या तांबड्या पोस्टाच्या पेटीनेही ती पत्रे तितक्याच हळुवारपणे आपल्या ढिगाऱ्यावर अलगद झेलली असतील!

दोन्ही बाजूंच्या वकीलांच्या नोटीसांचीही देवाणघेवाण ह्या पेटीमार्फतच होत असेल.परीक्षेचे निकाल जरी शाळा- कॅालेजातून, वर्तमानपत्रातून मिळत असे तरी काकांनी, थोरल्या भावाबहिणींनी केलेल्या कौतुकाची व लिहिलेल्या त्या पत्रातूनच एखादी पाच- दहा रुपयांची नोटही गुपचुप पाठवली असणार!

अशा अनेक भावभावनांचे आविष्कार रोज ह्या पेटीने पाहिले असणार . पण सुखदुःखे समेकृत्वा अशा स्थितप्रज्ञ वृत्ती असलेली पोस्टाची तांबडी पेटी खरोखर लोकोपयोगी होती ! ह्या रस्त्यावर उभ्या असलेल्या पेट्यांची धाकटी भावंडे सुद्धा लहान मोठ्या रस्त्यावरील विजेच्या किंवा टेलिफोनच्या खांबाला जाड तारेने तर काही ठिकाणी लोखंडी पट्ट्यांच्या ब्रॅकेटसने लावून ठेवलेल्या असत. आमच्या हायस्कूलच्या पोर्चच्या मोठ्या दगडी आणि देखण्या खांबालाही अशी पेटी होती.

काही काही भागात ह्या उभ्या असलेल्या पेटीत मात्र पत्रांबरोबरच इतरही काही पडत असे. आमच्या बरोबरीची काही खारबेळी पोरं अशा गमती करीत. “ अबे लच्छ्याने काल काय क्येलं त्ये माहित हाय का ब्येऽ ? त्येनी साला काल शाईची दौतच खाली केला बेऽ पोस्टाच्या पेटीत!” सगळेजण अस्सं केलं त्यांनं? चला बे त्या पेटीकडे. पोस्टमन यायची वेळ झालीच हाये की“ असे म्हणत सगळे, पण कोणी जायला तयार नसे.


पोस्टमन बिचारा काय करणार? त्याच्या हातात होते तेच त्याने केले. आठ दिवस फिरकलाच तो तिकडे. आठाचे दहा बारा दिवस होऊन गेल्यावर कोणी चार-पाच सज्जन हेडपोस्टात जाऊन त्यांनी साहेबाला सांगितले. साहेबांनी शाईने बरबटलेली कार्डे पाकिटे दाखवली. ते पाहिल्यावर काय बोलणार? .“तुमच्या भागातल्याच मुलांचे काम आहे.. म्हणून आम्ही पोस्टमन पाठवला नव्हता.” त्या लोकांनी सांगितले “पुन्हा असे होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतो.” मग एक दोन दिवसांनी सुरळीत झाले. पोरांपैकीच कुणीतरी लच्छ्याचे नाव सांगितले असणार. त्याच्या बाबांनी त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे लच्छ्याच्या थोबाडात दोन चार झणझणीत लगावल्या. हेसुद्धा आम्हाला त्याच खबऱ्या पोरानेच त्याची भर घालून समग्र वर्णन करीत “ त्याच्या बापानं असं दणकं देऊन ठोकून काढलं लच्छ्याला! त्ये चड्डीतच … की बे!” सांगितले. आणि खरंच लच्छ्या तीन दिवस आमच्यात आलाच नाही!


पेटीत पत्र टाकल्यावर काही पोक्त , म्हातारे गृहस्थ पेटीच्या पाठीवर तर कुणी दोन्ही बाजूंवर हाताने मोठ्याने थोपटत. हे पाहिल्यावर आम्ही चार सहा पोरांनी एकदा विचारलेच त्यांना,” तुम्ही असे दोनदा तीनदा थोपटता का पेटीला?” त्यावर आम्हाला उत्तर ऐकायला मिळे,” मुलांनो! पत्र टाकल्यावर ते पेटीच्या पोटात गेले पाहिजे की. मध्येच तिच्या घशात अडकले तर?” हे ऐकल्यावर आम्हाला ते पटत नसे किंवा समजतही नसेल. पण आता लक्षात येते की कोणत्याही गोष्टीला मानवी रूप भावना देऊन तिला सजीव करण्याची ही आपली सवय आहे!

पेट्यांची सहज काही ठळक ठिकाणे लक्षात आली. प्रभात टॅाकीज जवळच्या पोलिस चौकी समोरची तांबडी मोठी उभी पेटी , सरस्वतीच्या देवळाजवळील चौंडेअण्णांच्या सायकलच्या दुकानासमोरील खांबावरची पोस्टाची पेटी , कोथरुडच्या पोस्टाच्या खिडकी बाहेरची लहान “ स्थानिक पत्रांसाठी”ची एक दुसरी “मुंबई “ साठी लिहिलेली अशा दोन पेट्या लटकलेल्या असत. आणि समोरच्या उघड्या जागेतील उभी पेटी,तर दादरला मावशीकडे गेल्यावर रोज दिसणाऱ्या रानडे रोडवरील किंवा राममारुती रोड ओलांडल्यावर बेबी बिस्किट मार्टच्या आसपास असणारी, तशीच शिवसेना (त्यावेळी ती नव्हती) भवनाच्या समोरील पेटी अशा ह्या लोकोपयोगी पेट्या डोळ्यांसमोर येतात. आज त्या, त्या ठिकाणी असतील का नाही हे माहीत नाही. पण ह्या पेट्यांत तसेच आमच्या गावच्या चौपाडच्या पोस्टातल्या भिंतीलाच एक मोठी खाच असलेली व पत्रे पोस्टाच्या खोलीत घसरत घेऊन जाणारी भिंतीतली अंगचीच पेटी, तर स्टेशन समोरच्या मुख्य पोस्टाच्या बाहेरील नेहमीपेक्षा जरा मोठी वाटणारी पेटी …. प्रत्येक गावातल्या अशा पेट्या आपल्या सर्वांच्या कामाला सहजपणे येत. कसलाही गवगवा नाही की सजावटही नाही. स्तब्ध राहात आपले काम चोख करणारी ही पेटी.तिच्यावर पेटी उघडण्याची वेळ लिहिलेली लहानशी पाटी छातीवर बिल्ला असावा तशी त्या पेटीवर असे. काही पेट्या दिवसांतून दोन वेळा उघडल्या जात. . एकदा उघडल्या नंतर पोस्टमन थैली सायकलला लावण्याआधी तीच लहान पट्टी उलटी करून नंतर केव्हा उघडणार ती बाजू दाखवायचा.

ह्या सर्व गोष्टींची आठवण झाली; ह्याचे कारण WhatsApp वरून आलेली एक सप्टेंबर पासून तांबडी पोस्टाची पेटी बंद होणार ही दुःखद बातमी.

चला! सरकार दुसरी काही तरी सोय करेल असे म्हणत गप्प झालो.

दुसरे दिवशी माझ्या मुलाने सांगितले की ही बातमी खरी नाही. पोस्ट खात्याने खुलासा केला की “ह्या पोस्टाच्या पेट्या बंद होणार नाहीत. सोशल मीडिया वरून चुकीची माहिती पसरवली आहे. १ सप्टेंबर पासून रजिस्टर्ड पत्रे व स्पीड पोस्ट ह्या सेवा एकत्रित होणार आहेत.”

हुऽऽश्श! बरे झाऽले ! वाईट बातम्या खोट्या ठरत नाहीत असे म्हटले जाते. पण हळहळ वाटावी अशी ही बातमी खोटी निघाली ह्याचा फार आनंद झाला. आपल्या सर्वांच्या उपयोगी पडणारी पोस्टाची ही १८१ वर्षांची परंपरा असलेली दीर्घायुषी तांबडी पोस्टाची पेटी चिरंजीवी राहील हे कळल्यावर आपल्या पोटा बरोबरच पोस्टाच्या पेटीच्या पोटातही आनंद मावेनासा झालाय!

पावसाचे ढग येत होते….

रेडवुड सिटी

पावसाचे ढग येत होते, आले तसे जात होते,
थेंबाचेही नाव नव्हते; गावाकडे न बघता जात होते।.
काळे भोर दिसत होते पण पाऊसपाणी त्यात नव्हते।
आले आले ढग म्हणत लोक आशेने पाहात होते.
पण ढगांवर आमच्या गावाचे नाव लिहिले नव्हते.
गेल्या साली असेच होते सारे गाव कोरडेच होते.
विहिरी खोल केल्या,काढता तितका गाळ काढला
नदी-वाळूत बिळं खणून ओंजळीत पाणी भरू लागले.
चारा कडबा आता कुठला,पानं काटे ओरबडून झाले;शेळ्या कोंबड्या गायी वासरांचे एक्सरे उभे राहिले.।
तरणी ताठी बायापुरुष खेडे पाडे सोडून दूर गेले ।
आजोआजी माय लेकरं गाय वासरं तिथेच राहिले.
माळरानांतून किती धोंडे दगडं वर आली,
गावाचीही गालफडं सगळी हाडं वर आली.।
हपशीने हाय खाल्ली, विहिर गेली खोल खोल तिचा थांग नाही।
गावाची बुबळंही तितकीच खोल खोल जातच राहीली!
पावसाचे ढग येत होते आले तसे जात होते…
आले तसे जाऽऽत होते…जातच होते…जातच होते !

दुष्काळात श्रावणाचा महिना!

सांगायचे काय तर गावात दुष्काळ पडला होता. खायला कुठे तरी झाडपाला असेल पण प्यायला पाणी नव्हते ! ह्याच गावात एक गरीब आई आणि तिची मुलगी राहात होती. काही दिवस लोक कसेतरी ढकलत होते. असेल नसेल ते किडुक मिडुक मोडून भागवत होते. तसेच ह्या मायलेकींचेही चालले होते..

दुष्काळ जास्त जास्तच भयंकर होऊ लागला. उन कायमचे रणरणू लागले. पाणी संपल्यातच होते. लोक दूर दूर जाऊन कुठल्या तरी विहिरीतून, हपशीतून एखादे लहान मडकेभर पाणी मिळवत. पण फार फार आटारेटा करावा लागे. ही मुलगीही पाण्यासाठी अशीच हिंडून कसेबसे ते मडके भरून आणत असे. वाटेत कोणी गयावया करून पाणी मागितले तर ती बिचारी मडक्यातले घोटभर का होईना देत असे. घरी येईपर्यंत ती इतकी थकून गेली असे की आल्यावर मटकन खालीच बसे. पण तरीही बळ एकवटून ती अगोदर आपल्या आईला पाणी देई. मग आपण घोट दोन घोट प्यायची.

घरातल्या सर्व चीज वस्तु विकून झाल्या.आता तर खायलाही काही नव्हते. प्यायला पाणीही मिळणे मुष्किल होऊ लागले. पाण्यासाठी आता दोन दोन चारचार मैल फिरावे लागे. तरीही,मिळाले तर मिळाले,नाही तर नाहीच अशी स्थिती आली. पण जेव्हढे मिळेल तितके, अर्धे मुर्धे मडके भरलेले जर कुणी केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहिले तरी ती थेंब दोन थेंब तरी आपल्या मडक्यातले पाणी देतच असे. काही दिवस असेच गेले. आई तर आता पडूनच असे. पोट खपाटीला आणि डोळे खोल गेलेले अशी तिची अवस्था होती.

मुलगी पाण्यासाठी हिंडायची. उन तळपतच असे. पाय भाजायचे.अंगात शक्ती नव्हती. पाय चटचट भाजले तरी ते उचलायचेही त्राण नव्हते. पण मुलगी वण वण करून पाणी आणायची. वाटेत तिला एक भिकारी धुळीत पडलेला दिसलेला.तोंड उघडे, डोळे उघडे पण बुबुळं अर्धी वर गेलेली. मधूनच हात झाडायचा तर मध्येच एक पाय हळू वर सरकवत ेकै असे. मुलीला काय करावे समजेना. तिने त्याच्या तोंडात पाणी घातले. त्याचे डोळे नेहमी सारखे दिसू लागले. त्याने आपला हात अगदी हळू हळू किंचित वर केल्यासारखा केला. डोळ्यांनीच जा म्हणाला. मुलगी घाबरून गेली होती.

घर अजून लांब होते. एक एक पाय ओढत खुरडत खुरडत चालली होती. तिच्या बरोबर एक मरतुकडं कुत्रंही तिच्यासारखच पाय ओढत,जीभ बाहेर काढलेली पण ती ल्हा ल्हा करण्याचीही ताकद नसलेलं; निस्तेऽज डोळ्यांनी चाललं होता. थोडा वेळ गेला. मुलीलाही चक्कर येतेय वाटत होती. आपल्या जीवापेक्षा मोलाचे असलेले ते अर्धे अधिक भरलेले पाण्याचे मडके सांभाळत ती आता पडलीच जणू अशी बसली. डोळे मिटून घेतले. जरा वेळाने डोळे उघडून पाहिले तिने तर तिला ते कुत्रं दिसेना. जमिनीवरच्या वाफेच्या लाटांतून ते तिला चार पाच पावलांवर पडलेले दिसले. त्याची स्थितीही भिकाऱ्यासारखीच झाली होती. तिला पुढे जाणे भागच होते. गेली. कुत्र्याने केविलवाणे नजरेने तिच्याकडे पाहिले. तिने त्या कुत्र्यालाही पाणी पाजले. मडकं घेऊन निघाली.

गाव जवळ येऊ लागले.गावाच्या वेशीतून ती आत आली. झोपडीच्या तोंडाशी बसलेल्या बाईने हातानेच तिला बोलावले. मुलगी जवळ गेल्यावर त्या बाईने हाताची ओंजळ तोंडापुढे धरून ती मुलीकडे डोळे वर करून आशाळभूतपणे पाहू लागली. मुकाटपणे मुलीने मडक्यातल्या पाण्याची धार बाईच्या ओंजळीत भरली. आपले मडके रिकामे झाल्याने रडवेली झालेली मुलगी घराकडे निघाली. पण मडके होते तितकेच अर्धे मुर्धे भरलेले ! तिला जाणवले पण मरण बरे इतकी ती मेल्यासारखी थकून गेलेली मुलगी मडक्याकडं लक्ष न देता चालली.

घर आलं. आईला पाणी द्यायचे तेव्हढ्यात शेजारची भागाक्का म्हणाली, “पोरी पोटभर कुठलं पानी आता; घोटभर बी असलं तरी चालंल. त्ये बी नसलं तर थ्येंब असला तरी चालंल.पन द्ये.जीभ तरी वली व्हईल गं माझ्ये लेकरा!” मुलगी तिला पाणी देऊ लागली. ओंजळभर भागाक्का प्याली. “तुझे मायऽला बी द्ये पोरी,” भागाक्का म्हणाली. मुली मनात म्हणाली. आता मडक्यात पाणी कुठं असणार? पण हे काय! घरात जातांना पुन्हा मडकं तितकच भरलेलं! मुलगी आईला पाणी देणार तेव्हढ्यात दाराशी एक जख्ख म्हातारा मुलीला हाताची ओंजळ करून खुणेनेच प्यायला पाणी मागू लागला. त्याला ती पाणी देणार इतक्यात त्या म्हाताऱ्याने ते मडकेच तिच्या हातून हिसकावून घेतले! आणि आणि…ते डोक्यापर्यंत नेऊन चक्क उलटे करून पाणी खाली ओतून दिले!

ते पाहून मुलगी किंचाळत म्हणाली “अरे म्हाताऱ्या ह्ये काय केलंस रे तू?” इतके म्हणून ती रडत ओरडू लागली. त्या एका क्षणार्धात वरून पावसाच्या धारा पडू लागल्या! पाऊस पडू लागला! ! हे काय होतंय?! हे काय! ह्या विचारातच मुलगी होती.ते सगळं पाहात असलेली तिची आई,शेजारची भागाक्काही बाहेर येऊन,” ह्यो बया! ह्ये काय गं ? ह्ये का गं? अगं मुली ह्ये कसं झालं? म्हणू लागली. मुलगी त्या म्हाताऱ्याला पाहू लागली. जोरदार पावसाच्या पडद्यात म्हातारा कुठेच दिसेना. कुणालाच दिसेना! कुणालाच दिसेना!

Memories – 2

मॅरिएटा

पुढे चालू …..

ती. अण्णांविषयी खूप आठवणी आहेत. रविवारी , सणासुदीच्या सुट्टीच्या दिवशी आमची दुपारची जेवणे म्हणजे खऱ्या अर्थांनी “काव्य-शास्त्र- विनोद” ह्यांनी रसभरित व्हायची. अण्णा कधी कधी त्यांच्या फर्ग्युसन कॅालेजच्या गोष्टी सांगत. त्यातल्या दोन तर आम्हा सर्वांच्याच-शैला अमलाच्यासुद्धा- लक्षात राहिलेल्या आहेत. त्या गप्पांमध्ये आम्हा सर्व भावंडाचा सहभाग असे. त्यामुळे जेवण तर लांबत असेच. पण जेवण संपल्यावरही पाटावर बसून गप्पा रंगतच असत. सगळ्यांचे हात कोरडे झाले असत. ओट्यावर आई शांतपणे बसलेली असे. कुणाच्या तरी लक्षात येई.” अरे अजून आईचे जेवण व्हायचेय की!” अण्णा मग लगेच उठत. मागोमाग आम्हीही. जेवणापेक्षा ह्या गप्पांच्या पंगतीच रंगत असत.

अण्णांनी फर्ग्युसन कॅालेजमध्ये असतांना गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी “ वसतिगृहात” ही प्रहसनात्मक एकांकिका लिहिली होती. ती पाहायला प्रमुख पाहुणे “केसरी” चे संपादक व साहित्यसम्राट न.चि. केळकर ह्यांना आमंत्रण देण्यासाठी अण्णा व इतर पदाधिकारी विद्यार्थी गेले त्यांच्याकडे. अगोदर नाही नाही म्हणत होते. पण तरुणांचा हिरमोड होऊ नये म्हणून अखेर ते तयार झाले. पण एका अटीवर- “ मी फक्त दहा मिनिटेच थांबेन”. अण्णा व इतरांनी ते मान्य केले.

त्या विनोदी नाटिकेचा प्रयोग अर्थातच फर्ग्युसनच्या ॲम्फी थिएटरमध्ये होता. गॅदरिंगचे अध्यक्ष न.चि. केळकर आले. दहा मिनिटासाठीच येईन म्हणणारे साहित्यसम्राट व लो. टिळकांच्या प्रख्यात केसरीचे संपादक, विद्यार्थ्यांच्या गडगडाटी हसण्यात सामील होऊन नाटिका प्रहसन पूर्ण होईपर्यंत शेवटपर्यंत थांबले होते. अण्णांना स्वतःचा अभिमान का वाटणार नाही?

मराठी कवितेला नविन वेगळे वळण देणाऱ्या रविकिरण मंडळाचे अध्यक्ष कविवर्य डॅा. माधवराव पटवर्घन उर्फ माघव ज्युलियन हे होते. ( “प्रेमस्वरूप आई,” “मराठी असे आमुची मायबोली, “ “ … वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हां कां पडे? कवितांचे कर्ते) ते एकदा अण्णांना बरोबर घेऊन रविकिरण मंजळाच्या सभेला गेले. तिथे असलेल्या सर्व प्रसिद्ध कवींशी – कवि यशवंत, कवि गिरीश( नाटककार वसंत कानेटकरांचे वडील) व इतरही – त्यांनी अण्णांची ओळख ,” हे माझे तरुण कविमित्र…” अशी करून दिली. अण्णा पुढे सांगत ही खरी मोठ्या मनाची माणसे ! दुर्मिळ आहेत! “ ह्यामुळे कवि गिरीश व यशवंत ( आई म्हणोनि कोणी ह्या अविस्मरणीय कवितेचे जनक) अणांचे चांगले मित्र झाले. त्यावेळी अण्णा, आबासाहेब ती. बाबा वगैरे रिठ्याच्या वाड्यांत राहत होते . तिथे बरेच वेळा कवि गिरीश त्यांच्या घरी मुक्कामाला असत.त्या वेळी ते आपल्या जुन्या, नवीन कविता म्हणून दाखवीत. ते कविता कशा म्हणत ह्याची नक्कलही अण्णा “गेले तुझ्यावर मन जडून राऽमा गेले…” असे साभिनय करीत!

“प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा —“ हे महाराष्ट्र गीत लिहिणारे, तसेच “ सुदाम्याचे पोहे” ह्यासारखे अप्रतिम विनोदी पुस्तक लिहिणारे, नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यावेळच्या साहित्यिकात मोठे प्रस्थ होते. स्वतः प्रतिभाशाली नाटककार व विनोदी लेखक नाटककार आणि कवि राम गणेश गडकरी, श्री.कृ . कोल्हटकारांना गुरू मानीत. तर सांगायचे असे की, आमच्या ती. अण्णांचे “पैशाचा पाऊस” हे नाटक मुंबई पुणे व इतरत्र गाजत होते. अण्णांची व श्री.कृ. कोल्हटकरांची चांगली ओळख झाली. कधी कोल्हटकर अण्णांना आपल्याबरोबर निमंत्रित ठिकाणी घेऊन जात. तिथे गेल्यावर कोल्हटकर अर्थातच तक्के लोड असलेल्या गादीवर बसत. अण्णा नम्रपणे त्यांच्या बाजूल पण जरा खाली सतरंजीवर बसत. ते पाहिल्यावर स्वतः कोल्हटकर मोठ्याने आपल्या शेजारी गादीवर थाप मारत म्हणत,” अहो कामतकर इथे या. इथे बसा. अहो तुम्ही आम्ही नाटककार आहोत. असे इकडे या.” म्हणत अण्णांना आपल्या शेजारी बसवून घेत. ती. अण्णा त्यांचा मोठेपणा सांगण्यासाठी नव्हे तर वर माधव ज्युलियन संबंधात ते म्हणाले तसे ,” अशी खऱ्या मोठ्या मनाची उदारवृत्तीची माणसे दुर्मिळ!” हे पटवून देण्यासाठी सांगत. श्री.कृ कोल्हटकरांचे सुपुत्र प्रभाकर कोल्हटकर आमच्या घरी एकदा आले होते.

आमच्या हायस्कूलच्या दिवसात महाराष्ट्रात दोन वक्तृत्व स्पर्धा प्रतिष्ठेच्या होत्या. पुण्याची रानडे वक्तृत्व स्पर्धा आणि बेळगावचीही रानडे स्पर्धा. आम्ही हायस्कूल मध्ये नुकतेच गेलो होतो. आमच्या वर्गात स्पर्धक मुले मुली स्पर्धेच्या तयारी साठी ती भाषणे आम्हापुढे करीत. नंतर कळले की काही वर्षे आमचे ती. अण्णा ही भाषणे लिहीत. त्यांनी तयार करून दिलेल्या भाषणांनी व त्या मुलींच्या वक्क्तृत्व कलेने दोन वर्षे – वनमाला किंवा शरयू चितळे व विदुला लळित ह्या त्या दोन मुली!- ह्यांनी दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या. पुढे मग आमच्याच हायस्कूल मध्ये शिक्षक असलेले माझे चुलत भाऊ गो. रा. कामतकर हे भाषणे लिहित. एके वर्षी आमच्या श्यामने दोन्ही स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने बेळगावची रानडे स्पर्धा जिंकून ती गाजवली!

ती अण्णांना अनेक लेखक आपली पुस्तके भेट म्हणून पाठवत असत. मग त्यामध्ये सोलापुरला आमच्याच कॅालेजात प्राध्यापक असलेले कवि डॅा. वि. म. कुळकर्णीचे ‘कमळवेल’ हा काव्यसंग्रह, चरित्रकार व ती. अण्णांचे सहाध्यायी मित्र गं. दे.खानोलकरांचे “ माधव ज्युलियन यांचे चरित्र , य. गो. नित्सुरे यांचे त्या काळी वेगळ्या विषयावरचे “कुमारांचा सोबती, सुप्रसिद्ध कथालेखक वि. स. सुखटणकर ह्यांनी त्यांचे “ टॅालस्टॅायच्या बोधकथा” , तसेच अण्णांचे मित्र प्रख्यात लेखक य. गो. जोशी ( वहिनींच्या बांगड्या फेम) ह्यांची पुस्तकेही ; आणखी स्थानिक लेखकांची पुस्तकेही ! किती तरी!

ती. अण्णांचा ज्योतिषाचाही चांगला अभ्यास होता. विशेषतः कुंडलीचे ज्ञान. त्यानंतर हस्त सामुद्रिक. हा वारसा आमच्या ती वासुनानाने चालवला. पण पुढे त्याने सांगण्याचे थांबवले. ते जेव्हा दिल्लीला कोर्टाच्या केससाठी गेले होते त्या प्रवासात त्यांच्या ज्योतिषाच्या अभ्यासाला चांगलेच यश मिळाले. त्यानंतर, त्यांना प्रवासात भेटलेल्या व ज्यांचे त्यांनी भविष्य सांगितले असेल त्या प्रवाशांची एक दोन वर्षे तरी पत्रे येत होती.

अण्णांना रेल्वेच्या केसेस मुळे हैद्राबाद सिकंदराबाद तसेच दिल्ली येथे प्रवास करण्याची मोठी संधी मिळाली. आम्हाला आठवते ते जेव्हा दिल्लीहून येत तेव्हा आठवणीने आग्र्याचा पेठा घेऊन येत असत.

प्रवासावरून आठवले . सोलापुरच्या श्रीयोगी अरविंद मंडळाच्या मंडळींची कलकत्ता गया काशी वगैरे ठिकाणी जाण्याच्या यात्रेत ती. अण्णा व योगिनी प. पू. मावशी ह्यासुद्धा होत्या. कलकत्याला अर्थातच ते रामकृष्ण परमहंसांच्या दक्षिणेश्वर येथील मंदिरात वगैरे जाऊन आलेच. गयेलाही गेले . बोधीवृक्षही पाहिला असणार. पण प्रवासानंतर एक दोन वर्षांनी ते मला म्हणाले की गयेला मी माझे स्वतःचे श्राद्धही करून घेतले. केले. थोडावेळ मी अवाकच झालो. ते म्हणाले की ही फार पूर्वींपासून चालत आलेली प्रथा आहे. गयेला गेले की अनेकजण असे करतात. मग आपण गेल्यानंतर कुणी श्राद्ध करो न करो. तो प्रश्न राहात नाही.

ती. अण्णा गेल्यानंतर त्यांच्या जुन्या आणि हयात असलेल्या कुणाला कळवायचे त्यासाठी मी, वासुनाना,श्याम, अण्णांना आलेली पत्रे पाहात होतो. त्यामध्ये कोण कोण असावेत? नागपुरचे प्रसिद्ध साहित्यिक व त्यांच्याच तरुण भारतचे संपादक ग. त्र्यं माडखोलकर, , श्री. कृ. कोल्हटकर, प्रभाकर कोल्हटकर, कोठीवाले, खांडेकर, दिल्लीला क्युरेटर पदावर असलेले मुंबईचे श्री दिघे , कवि गिरीश, खानोलकर, सुखठणकर, समीक्षक टीकाकार श्री. श्रीकेक्षी ( म्हणजेच श्री. के. क्षीरसागर), चिं.वि. जोशी, संत साहित्याचे अभ्यासक व प्रेमबोध ह्या मासिकाचे संपादक पंढरपुरचे भा. पं. बहिरट, वगैरे. आज ह्या नावांचे कुणाला फारसे महत्व वाटणार नाही. पण ही मंडळी आपापल्या परीने सर्वांना माहितीची व प्रसिद्ध होती.

आणखीही पुष्कळ आठवणी आहेत. लिहायच्या आहेत. आपल्या सगळ्यांनाच ती. अण्णा त्यासाठी प्रेरणा देतील ह्यात शंका नाही. आज फार वाईट वाटते ते एका गोष्टीचे ; ती. सौ. ताई , ती. सौ. माई, ती. वासुनाना , श्याम, नंदू,चंदू,मालू नाहीत आपल्यांत. त्यांनी ती. अण्णांच्या, त्यांच्या ह्याहून जास्त मोलाच्या आठवणी सांगितल्या असत्या!

आमची शैला व अमला ह्यांच्यापाशीही ती. अण्णांच्या आठवणींच्या अत्तराच्या खूप कुप्या भरलेल्या असणार. त्या दोघीही छान भर घालतील.

ती. आई आणि अण्णांनी, आम्हा भावंडांना कुणालाही कधी अरे अभ्यास करा , केला की नाही वगैरे सांगितले नाही. विचारलेही नाही. किंवा वळण लावले वगैरे काही नाही. त्यांचे वागणे बोलणे, रोजचे आचरणच न कळत आम्हाला काही शिकवत गेले असावे. आम्हीच काय आमच्या मुलाबाळांनीही त्यांना पुस्तके वाचतानाच जास्त पाहिले असेल! बहुधा आम्हालाही त्यामुळे न कळत वाचनाची आवड निर्माण झाली असावी.

ती. अण्णांच्या साहित्यिक प्रतिभेचा वारसा चि. चंदूला लाभला. तो त्याने आणखीनच जोमाने यशस्वीरीत्या पुढे नेला. आज मेधाची नेहा व चि. नंदूचा अभिजित ही तोच वारसा पुढे नेत आहेत.

ती. अणांनी स्वतंत्र व्यवसाय, उत्तम, नेकीचे, गरीबाचे वकील अशी ख्याती मिळवून चांगला केला. तोच स्वतंत्र व्यवसायाचा वारसा आपल्या नंदूने डॅाक्टर होऊन पुढे चालवला.मेधानेही वकील होऊन ती तो पुढे नेत आहे.

आपला श्याम ती. अण्णांचे श्राद्ध त्याच्या अखेरीपर्यंत, निष्ठापूर्वक व प्रेमाने, शास्त्रोक्त विधिवत् करीत असे. सुरुवातीची काही वर्षे मीही करीत होतो. पण आता खंड पडला . आज ती. अण्णांचा तिथीप्रमाणे श्राद्धाचा दिवस आहे. मी त्यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊन त्यांची श्रद्धापूर्वक आठवण करीत आहे.

ती. प.पू. अण्णा ( आणि अर्थातच ती. आई तुझेसुद्घा) आम्हा सर्वां सर्वांना तुमचे आशीर्वाद सतत लाभोत ! ती. अण्णा! तुमचे गुणसंकीर्तन करण्याची संधी व पात्रता आम्हाला लाभू दे.

Memories – 1

मॅरिएटा

प्रतिभशाली प्रसिद्ध कवि बा.भ. बोरकरांच्या बहुतेक सर्वच कविता फार चांगल्या व काही सुंदर आहेत . तर कांही सर्वोत्कृष्ट आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘ सरीवर सरी …” आणि “ निळाई”, “तेथे कर माझे जुळती.“

बोरकरांच्या दोन कविता तरी आम्हाला शाळेत होत्या.

“ दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती …. यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर

घडिले मानवतेचे मंदिर

परि जयांच्या दहनभूमीवर

नाहि चिरा नाहि पणती

तेथे कर माझे जुळती”.

तशीच “ एकच माझा साद ऐक प्रभु एकच माझा साद……

पापासरशी देउनि शापा

सन्मार्गी मज लाव लावी बापा

जाणतसे मी तुझ्या घरी प्रभु

शासन हाचि प्रसाद .

ऐक प्रभु एकच माझा साद …..

आणखी एक “ जीवन त्यांना कळले हो

मीपण ज्यांचे सहजपणाने परिपक्व फळापरि गळले हो

जीवन त्यांना कळले हो…

त्यांची प्राथमिक शाळेच्या पुस्तकात असलेली व शोभा आणि सुहासमुळे आम्हाला माहित झालेली अप्रतिम काव्यचित्री कविता “ निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव …”

ही कविता . अशा किती सुंदर कविता सांगायच्या त्यांच्या!

आज बोरकरांची किवा त्यांच्य कवितांची आठवण का आली अचानक.? मी कविता कधी फारशा वाचत नाही तरीपण कवि बोरकरांची आठवण होण्याचे कारण म्हणजे ते सोलापुरला आमच्या घरी आले होते ,! हो. नुसते आले नव्हते तर ते रात्री त्यांचा सोलापुरातील कार्यक्रम संपल्यानंतर जेवायलाही आले होते. जेवतांना, ते रंगून जाऊन गप्पाही मारत होते. आम्ही त्यांच्या पंक्तीला नव्हतो पण हॅालमध्ये आम्हाला त्या बऱ्यापैकी ऐकू येत होत्या.

त्या काळचे नाटककार वि.ना. कोठीवाले हे तर ते जेव्हा जेव्हा सोलापुरला येत त्यावेळी आमच्या घरी यायचे. तेही जेवायला असत कधी कधी. एकदा जेवताना बोलत असता कोणत्या तरी संदर्भात हात समोर लांब करीत , “ अहोऽ धडेऽऽ! “ असे मोठ्यांदा म्हणाले. आम्ही म्हणजे मी श्याम वासुनाना एकदम चमकलो. थोड्या वेळाने कसेतरी आम्ही हसू दाबत कुजबुजायला लागलो.आज श्याम असता तर ह्या आठवणीत त्याचे आणखीही तपशील भरले असते.

ह्या नामवंत लेखकांच्या मालिकेत तितक्याच प्रसिद्ध लेखका विषयी सांगितले पाहिजे. ते म्हणजे सुप्रसिद्ध कादंबरीकार, रुपककथाकार, चित्रपटकथा लेखक व साहित्यातील अत्युच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले लेखक वि. स. खांडेकर! हयांचे आमच्या घरी कधी येणे, आमच्या आठवणी लक्षात राहण्याच्या वयात तरी झाले नव्हते. पण ते सोलापुरला १९४२ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. एक गंमत ती. अण्णा सांगायचे की खांडेकरांनी त्वाटत होते आमच्या अण्णांनाच स्वागताध्यक्षाचा मान मिळेल, मिळावा. पण तसे काही घडले नाही. त्यानंतर कित्येक वर्षांनी वि.स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेव्हा पुरस्कार मिळालेल्यांना आपले काही मित्रांना जवळच्यांना समारंभास हजर राहण्याचे निमंत्रण पाठनता येत असे. आणि वि.स खांडेकरांनी आपल्या ती. अण्णांना ते निमंत्रण पाठवले होते! खरं तर ह्या मध्यंतरीच्या काळात त्यांचा ती. अण्णांशी किती संपर्क होता किंवा नाही हे सांगता येत नाही. पण त्यांच्या व अण्णांच्या त्यावेळी झालेल्या भेटीचा प्रभाव अजूनही असावा इतकेच म्हणता येईल. ह्या संदर्भात अण्णा सांगायचे की त्यांनी सोलापुरात साहित्यिक वर्तुळात चौकशी केली पण एकालाही हे आमंत्रण आले नव्हते!

हे झाले सोलापुरच्या बाहेरच्या मोठ्या शहरातील ख्यातनाम साहित्यिक कवींविषयी. पण सोलापुरचेच, आपल्या एकाच कवितेने संपूर्ण महाराष्ट्रात कायम प्रसिद्ध झालेले कवि कुंजविहारी! कुंजविहारींची “ भेटेन नऊ महिन्यांनी” ही हुतात्मा होणाऱ्या एका देशभक्ताची कविता आहे. कविवर्य , ते सकाळी फिरायला जात तेव्हा, आमच्या घरी रोज सकाळी येत असत. त्यांची फेरी आली की मग चहाबरोबर ती. अण्णांशी त्यांच्या गप्पा होत. त्यामध्ये मग ते त्यांची नुकतीच केलेली ताजी कविता चालीवर म्हणून दाखवत. त्यांनी म्हटलेल्या अशाच कवितेपैकी एक उत्तम कवितेच्या एक दोन ओळी लक्षात आहेत. ‘ उसात रस रसात गोडी …’ अशी ती कविता होती. त्यांनी भेट दिलेल्या त्यांच्या एका काव्यसंग्रहात ती आहे. त्यांचा आवाज खणखणीत व त्यात थोडासा गोडवाही होता. आमच्याकडे कविकुंजविहारींचे नियमित येणे होत असल्यामुळे ते किती चांगले व मोठे कवि आहेत ह्याची मला तेव्हढीशी जाण नव्हती. पण अलिकडे “आठवणीतल्या कविता” ह्या नामांकित संग्रहात अनेकांच्या आठवणीत असलेली त्यांची “भेटेन नऊ महिन्यांनी “ ही कविता पाहिल्यावर त्यांचे कविम्हणून मोठेपण लक्षात आले! आमच्या चंदूने त्यांचे अतिशय समर्पक स्मारकशिल्प तयार करवून घेतले. ते आजही राजवाड्या सारख्या भव्य व देखण्या महापालिकेच्या इमारतीच्या प्रांगणात उठून दिसते !

आणखी चिमणराव” “ वायफळांचा मळा”, “ओसाडवाडीचे देव” “ माझे दत्तक वडील” ,चिमणरावांचे चऱ्हाट “. “चिमणराव आणि गुंड्याभाऊ” ही विनोदीच नव्हे तर मराठीच्या सर्व साहित्य प्रकारातील अजरामर जोडी निर्माण करणारे, “चिमणरावांचे स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग” हे अप्रतिम विनोदी प्रकरण लिहिणारे, ज्यांच्या विनोदी कथांवर आधारित प्रसिद्ध नट ,दिग्दर्शक निर्माते, मा. विनायक यांनी काढलेल्या ॰सरकारी पाहुणे” ह्या चित्रपटाची मूळ कथा, प्रख्यात साहित्यिक . ज्यांनी आम्हाला शाळकरी वयापासून हसायला शिकवले ते प्रा. चिं. वि. जोशी! हे सुद्धा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या घरी दोन तीन वेळा तरी चहाला येत असत.

आम्हाला अशा बऱ्याच मराठी साहित्यिकांना जवळून पाहण्याचे ‘अहो भाग्यं’ लाभले ते आमचे वडील वै. ती अण्णांच्यामुळे! ते त्यांच्या पिढीतील उत्तम यशस्वी नाटककार, साहित्यिक व व्याख्याते होते, प्रसिद्धही होते!

आमचेअण्णा,साहित्यक्षेत्रातील विशेष महत्वाची संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद, तिच्या सोलापूर शाखेत सक्रिय होते. तिथे पदाधिकारीही होते. त्यांनी आणि प्रभात चित्रपटगृहाचे संचालक शं. ग. पटवर्धन यांनी मिळून जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यात मराठी संमेलने भरवली होती. ती. अण्णा जनरल लायब्ररीच्या कार्यकारिणीत बरीच वर्षे प्रमुख सभासद होते व एक किंवा दोन वर्षे ते लायब्ररीचे अध्यक्षही होते. मसापचे कार्यालय प्रभात टॅाकिजच्या एका बऱ्यापैकी मोठ्या सभगृहातच होते. ती. अण्णा बहुतेक तिथे रोज, कोर्टाचे काम झाल्यावर संध्याकाळी जात असत.

आमच्या ती. अण्णांची सोलापुरात किंवा महिन्या दोन महिन्यातून जिल्ह्यातील बार्शी पंढरपूर मंगळवेढा अशा तालुक्याच्या ठिकाणीही व्याख्याने होत असत. त्या काळी सर्व गावच, निदान घरातली मुलंबाळं तरी रात्री आठ वाजता गाढ झोपलेली असत. त्यामुळे ती. अण्णा रात्री केव्हा येत हे आम्हाला सकाळीच समजे. तेही मधल्या खोलीतल्या खुंटीवर चांगला जाडजूड झुलता हार पाहिल्यावर समजत असे. मग समजायचे की अण्णांचे कुठेतरी व्याख्यान होते ! सुट्टीच्या दिवशी तर दोन तीन हार दिसत!

बरं अण्णांची व्याख्याने फक्त साहित्य,वाड•मय ह्या संबंधातच नसत. तर इतरही विषयांवर होत. त्यांना रोटरी क्लब , लायन्स क्लब मध्येही व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले जाई. शिवाय वकीलांच्या बार असोशियनमध्येही वर्षांतून दोन तीन वेळा त्यांची भाषणे होत.त्या दिवशी अण्णा आम्हाला सेशन्स कोर्ट जज्ज, सरकारी वकील कधी कलेक्टरही हजर होते असे सांगत. भाषणानंतर ती मंडळी आवर्जून आपले मत सांगत. ह्यातील बरीच भाषणे अर्थातच इंग्रजीत होत. मला आठवतेय एकदा आमच्या चंदूने सांगितले की तो आणि ती. अण्णा सोलापूरचा नकाशा घेऊन बसले होते. व अण्णांची कुठे कुठे व्याख्याने झाली, त्यावर ते पिना टोचत होते. काही ठिकाणी तर एकापेक्षा जास्त वेळा झालेली असत. नगरेश्वराच्या देवळापासून ते रिमांड होम पर्यंत , लायब्ररी, रिपन हॅाल, मुळे सभागृह, कोर्टाचे बार असोशिअनचा हॅाल, सेवासदन, नव्या रामाचे देऊळ, तेलगु समाजाच्या सभागृहात, मार्कंडेय मंदिर, सेंट्रल कोॲाप बॅंकेचा हॅाल, प्रभात टॅाकीजचा हॅाल( मसाप), अ. वि. गृहाचे सभागृह आणि मला लक्षात नसलेली अनेक स्थळे! किती सांगावीत!. त्यामुळे वर्षभर आमच्या घरांत फुलांचे गेंदेदार- सोलापुरात अशा मोठ्या गुबगुबीत हारांना संगीत हार म्हणत-फुलांचे हारच हार असत!! घरांतही ती.अणांच्या भाषणांचा,विद्वत्तेच्या,साहित्यिक व संत वाड•मयाचा सुगंध सतत दरवळत असे. हा शब्दगंध कायम होता. ती. अण्णा वकीलीतून हळू हळू निवृत्त होत असण्याच्या काळापासून ते त्यांनी शेवटचा श्वास सोडेपर्यंत त्यांची अध्यात्म मंडळात, (कोतकुंडे वकीलांच्या घरी,) नव्या रामाच्या मंदिरात अध्यात्मावर, ज्ञानेश्वरी दासबोध( समर्थांच्या वाड•मयावर) प्रवचने चालूच होती.

ती. अण्णांच्या व्याख्यानांचा म्हणा किंवा साध्या भाषेत सांगायचे तर भाषणांचा वृत्तांत रोज सोलापुर समाचार आणि किंवा संचारमध्ये येत असे. त्यामुळे ती.अण्णा म्हणजेच पं. मा. कामतकर वकील हे नाव अनेकांच्या परिचयाचे होते. आमच्या ती. सौ. माईचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ती. विजयअण्णा म्हणाले ,” अण्णांचे नांव आम्ही वर्तमानपत्रात रोज वाचत असू. तेव्हा हिचे ( आमची सौ. माईचे) स्थळ सांगून आले तेव्हा आम्हालाच जास्त आनंद झाला. इतके प्रसिद्ध स्थळ म्हणजे काय! “ ह्यावरून चंदूनेच सांगितलेली आम्हा सर्वांना दिवाळीत जमलो असतांना सांगितलेली गोष्ट आठवली. तो, ती. अण्णांच्या बरोबर एका रनिवारी बाहेर जात होता. हाजरतखानच्या मशिदीपासून ते लकी चौक , पुढे जुने दत्ताचे देऊळ ते बक्षीब्रदर्स च्या दुकानापर्यंत ती. अण्णांना किती लोक नमस्कार करत होते! शेवटी त्याने मोजायचे थांबवले!

ती. अण्णांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा हा एक पैलू झाला. पण ते तितकेच यशस्वी वकीलही होते. क्रिमिनल खटलेच ते घेत. आमच्या घराच्या पायऱ्यांवर तर कधी त्या लहानशा अंगणातही पक्षकार बसलेले असत. ती. अण्णा त्यांच्या व्वहारज्ञान, कायद्याची सखोल माहिती, प्रतिपक्षाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्या संबंधात , साक्षीदारांची निष्णात वकीली पद्धतीने करण्याची उलट तपासणी, अर्ग्युमेन्टबद्दल कोर्टाच्या वर्तुळात त्यांना फार मानले जाई. शिवाय आपल्या कामाबद्दल व अशीलाबद्दलअसलेली त्यांची निष्ठा ह्यामुळे अण्णांनी केस चांगली लढवूनही कधी आरोपींला शिक्षा व्हायची. पण निकालानंतर तो गुन्हेगार अशिल व त्याच्या घरातील लोक ती. अण्णांना नमस्कारच करीत! ती फासेपारधी मंडळी म्हणत “वकीलसायेब तुम्ही जोरदार लढलात! पण त्या जज्ज्याला पटलं नाही म्हणायचं.! “

स्वातंत्र्य मिळाल्यावरही काही वर्षे वरिष्ठ न्यायाधीश ब्रिटिश असत. त्यांना अण्णांच्या चांगल्या इंग्रजीचे कौतुक वाटत असावे. कारण ती. अण्णा ब्रिटिश न्यायाघिशांच्या भाषेतील phrases आणि idioms ह्यांचा आपल्या कामात चपखल वापर करीत. त्याबद्दलचा एक किस्सा ती. अण्णा आम्हाला सांगत. अण्णा कधी मधी सिव्हिल दिवाणी केसही घेत. पण शक्यतो घटस्फोटाच्या केसेस ते घेत नसत. पण घेतलीच एखादी दुसरी तर ते बरेच वेळा दोन्ही बाजूंना बोलावून समजूत घालून , सामंजस्याने सोडवत. ह्यात वेळ जाई पण ह्यामागे कुटुंब तुटू नये ही त्यांची एकच भावना असे. तरी काही प्रकरणे कोर्टात जात. अशाच एका केसमध्ये मुलाचा ताबा कुणाकडे असावा यावर बरीच वादावादी झाली. न्यायाधीशांनी दोन्ही वकीलांना विचारले. प्रतिपक्षाच्या वकीलाने आपली बाजू चांगली मांडली. जेव्हा अण्णांना न्यायाधीशाने विचारले तेव्हा ती. अण्णा पटकन फक्त येव्हढेच म्हणाले,” Your honour , it’s obvious, calf goes with the cow!”पुढे अण्णा सांगत की ,” ते ऐकून जज्ज वेल्स (Wells) टेबलावर हात आपटून ,” of course! That’s it!” म्हणाले!

पुढे चालू ….

Dnyaaneshwari Writing Complete

“ काय (ज्ञान) देवा सांगू तुझी मात…” आजही सलग सहाव्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसन्न होऊन ओव्यांचे शतक तर पूर्ण करून घेतलेच आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी माझ्याकडून लिहून पूर्ण करून घेतली!गुरुमहाराज की जय ! ज्ञानेश्वर महाराज की जय!


आता ज्ञानेश्वरीतील पसायदान स्वतंत्र पानावर वेगळे लिहायचे; ज्ञानेश्वरांची आरती विठ्ठलाची आरती , सुंदर ते ध्यान हा अभंग आणि संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत केल्यानंतर तिच्याविषयी लिहिलेल्या ओव्या/ अभंग हे लिहायचे. आणि योजकांनी सांगितल्याप्रमाणे सविस्तर अनुक्रमणिका व माझे मनोगत/ अनुभव लिहिणे आहे.


पण पायी वारी करीत पंढरपुरला पोचल्याचा आनंद घ्यायचा, तो ज्ञानेश्वरी हाताने लिहून पुर्ण झाल्यावर घेतला. पंढरपुरांतील इतर देवदेवतांचे दर्शन घेणे राहावे तसे झाले आहे मला! चला, तुम्ही सर्वांनी, विशेषतः सतीश सुधीर ह्यांनी गेले पाच दिवस खूप म्हणजे खूपच कौतुक करत उत्तेजन दिले. त्यामुळे मला हे इतके जमले. होय. स्मिताने मला ह्या उपक्रमात भाग घ्यायला लावले. खटपट करून पिंपरी चिंचवडला जाऊन ज्ञानेश्वरी व ती ज्या वहीत लिहायची ती पुरस्कृत वही आणली. मला पाठवली.

तेजश्रीने तिच्या मावसबहिणीला- दीदींनाही- मी ज्ञानेश्वरी अर्थासह लिहतोय असे कळवले होते. त्यांच्याही शुभेच्छा मिळाल्या. म्हणूनच म्हटले की तुमच्या सर्वांमुळे मला लिहिणे शक्य झाले. त्तसेच सतीशने तो पावसला गेला होता तेव्हा माझ्यासाठी स्वामी स्वरुपानंदांनी लिहिलेली ‘अभंग ज्ञानेश्वरी आणली; तिचाही मला ज्ञानेश्वरीतील काहीं ओव्यांचा अर्थ समजण्यास मदत झाली. सुधीर स्मिता सतीश आणि उषाताईंनी वारंवार दिलेल्या उत्तेजनामुळे माझे हे लिखित पारायण पुरे झाले. दहा बारा दिवसांपूर्वी सतीश म्हणाला होता ,” बाबा, तुम्ही ३१ डिसेंबरच्या आत पूर्ण कराल.” झाले की हो तसेच!

॥जय जय जय रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी॥”

Libraries

बाळपणापासून पुस्तके, वाचन ह्याचे बाळकडू आम्हा बहिण भावंडानांच नव्हे तर आमच्या बरोबरीच्या अनेकांना प्यायला मिळाले.त्यामुळे पुस्तके ओळखीची झाली होती.वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके वाचण्याचीआवड अमच्या घरातूनच पोसली गेली. जणू पुस्तकांचे घरच! त्याबरोबरीने ही आवड आमच्या गावच्या जनरल लायब्ररीने जोपासली, वाढवली. हायस्कूल मधील लायब्ररीत, त्या अकरा वर्षांच्या काळात फार थोडा वेळ गेलो असेन. पण जेव्हा एखादे शिक्षक गैरहजर असतील तर त्या वर्गाच्या मॅानिटरने लायब्ररीत जाऊन गोष्टींची निदान चाळीस एक तरी पुस्तके आणावीत. आणि ती आम्ही वाचावीत; अशी मोठी चांगली ‘वाचनीय’ पद्धत आमच्या हायस्कूल मध्ये होती. त्यामुळे स्वाध्याय मालेतील अनेक चांगल्या गोष्टींची पुस्तके, साने गुरुजींची, ना. धों. ताम्हणकरांची, पुस्तके वाचायला मिळत असत. त्यामुळे पुस्तकाविषयीची गोडी वाढत गेली.

त्यानंतर कॅालेजची भव्य लायब्ररी व तिथे बसून अभ्यासाला लागणारी किंवा इतरही चांगली प्रख्यात पुस्तके वाचण्याची सोय होती. कॅालेजच्या लायब्ररीतील ‘अभ्यास लायब्ररी’ चा विभाग रात्रीही उघडी असे! केव्हढी सोय होती ही अनेक विद्यार्थ्यांसाठी! हॅास्टेलच्या मुलांना ह्याचा खरा फायदा होत असे.
त्यानंतर औरंगाबादचे बळवंत वाचनालय, पुण्याचे नगरवाचन मंदिर, दादर येथील मुंबई मराठी ग्रंथालय ह्या वाचनालयांनीही चांगली, चांगली पुस्तके वाचायला देऊन वाचनाचे खूप लाड केले. आमचे सर्वच दिवस पुस्तकांचे दिवस झाल्यासारखे सरकत होते.

मनांत कुठेतरी जाऊन पडलेले हे विचार आताच वर येण्याचे कारण काय? तर निमित्त सतीशने WhatsApp वर पाठवलेली ब्रिटिश लायब्ररीचा व्हिडिओ! तो पाहिल्यावर पुन्हा पुस्तकांच्या ‘विश्वात्मके देवा’च्या जगात गेल्याचा अनुभव आला.

मी थक्क झालो ही लायब्ररी व तिथे चालणारे काम पाहून. प्रकाशित होणारे एकूण एक पुस्तके , किंबहुना जे काही प्रसिद्ध होते ते सर्व काही – मासिके, वर्तमानपत्रे, जाहिराती, जतन करीत आहे हे ऐकून व पाहिल्यावर किती मोठे व ऐतिहासिक महत्वाचे कार्य ही लायब्ररी करीत आहे ह्याची थोडी फार कल्पना आली. त्या लायब्ररीची- ब्रिटिश लायब्ररीची अत्याधुनिक उत्तुंग इमारत तिथली सर्व कामे यंत्रमानव – Robots करीत असलेले पाहिल्यावर माझ्यासारखा सामान्य वाचक थक्क ,विस्मयचकित ,अचंबित होणार नाही तर काय! इंग्लंड हा देश तसा टिचभर , त्या लहानशा देशात , लंडनसारख्या गर्दीने गजबजाट झालेल्या महानगरात एव्हढी जागा मिळणे अशक्यच. त्यामुळे त्याच्या आजुबाजुच्या गावातील जमीनीवर ही प्रचंड ज्ञानवास्तु उभी केली आहे.

कोणत्याही गावाचे,राज्याचे, किंवा देशाचे खरे वैभव तिथली ग्रंथसंग्रहालये व शिक्षणसंस्था ह्याच असतात. ह्या व्हिडिओखाली असलेल्या कॅामेन्टसही वाचनीय आहेत. त्याही वाचाव्यात.

ही लायब्ररी पाहिल्यावर व तेथील बहुतेक सर्व काम रोबॅाटस् करतात वगैरे विस्मय चकित करणारी यंत्रणा पाहिल्यावर मला आमच्या वाचनाच्या गावातली जनरल लायब्ररी , बेलमॅान्टची लायब्ररी , मॅरिएटातली माउन्टन व्ह्यू लायब्ररी,दिसेनाशा होऊन , अंधुक पुसट होऊ लागल्या. पण संत ज्ञानेश्वरांनी मला पुन्हा जमीनीवर आणले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “ चालायचे म्हणजे फक्त राजहंसानेच डौलदार चालायचे? त्याचे चालणे पाहिल्यावर इतर किडा मुंगीनी – काई चालू नाई?”ही ओवी लक्षांत आल्यावर, मी पाहिलेल्या , तिथे जाऊन वाचन केलेल्या आमच्या गावचे ज्ञानपीठच अशी जनरल लायब्ररी, कॅालेजची त्यावेळी मोठी भव्य वाटणारी लायब्ररी, बेलमॅान्ट, सॅन कार्लोस, रेडवुडसिटी,रेडवुड शोअर्स, मॅरिएटातील माउन्टन व्ह्यू, ह्या लायब्ररींसकट सर्व लहान मोठ्या लायब्ररी पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या.

ब्रिटिश लायब्ररीशी संबंध, सतीश बंगलोरला असतांना आला. तिथे काढलेल्या कार्डाचा फायदा पुण्याला आल्यावर झाला. कारण त्यावेळी पुण्यातील ब्रिटिश लायब्ररीमध्ये नवीन सभासद घेणे थांबले होते. पण बंगलोरच्या कार्डामुळे मी नवा सभासद मानला गेलो नाही. ह्या लायब्ररीचा फायदा मी घेतलाच पण माझी नात मृण्मयीनेही घेतला!

‘आमच्या वाचनाचे गावात ’ असतांना पुणे विद्यापीठाची लायब्ररी, भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन संस्थेची, नगर वाचन मंदिर ही नावे एकत होतो. त्यांत ब्रिटिश लायब्ररीचे नांवही पुढे असे. तिथले सभासदत्व मिळणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात होती. त्या ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झाल्यामुळे मनातल्या मनांत माझी कॅालर ताठ होत असे.

सांगायची गंमत म्हणजे तिचे ग्रंथपाल हे आमच्या नागवंशी चाळीत राहाणाऱ्या डॅा. जोशी ह्यांचे भाऊ किंवा त्यांचे थोरले चिरंजीव असावेत. म्हणजे आमच्या बरोबरीचे विष्णु जोशी ,मन्या जोशी ह्यांचे सगळ्यांत मोठे भाऊ किंवा काका -विठ्ठल जोशी हे होते! पण ते निवृत्त झाल्यावर, त्यांच्या निवृत्तीची बातमी वाचल्यावर हे कळले !


बघा! एका जागतिक प्रसिद्ध लायब्ररीच्या ‘ लिंक’मुळे पुस्तकांच्या व लहान मोठ्या वाचनालयांच्या ‘आठवणींच्या कड्यांची एक लांबलचक साखळी ‘ होत गेली ! हा लाभही नसे थोडका.

आमचा ‘ पासिंग शो ‘

बेलमाँट

बहुसंख्य लहान मुलांना मुलींना काही तरी गोळा करण्याचा , जमवण्याचा , जमवून ते जपून ठेवण्याची हौस छंद आवड -काही नाव द्या- असते . मला आणि माझ्या बरोबरीच्या काही सवंगड्यांना सुरुवातीला काचेच्या,सिमेन्ट सारख्या टणक, लहान मोठ्या गोट्या जमवण्याची आवड होती. गोट्या खेळत असल्यामुळे ती जोपासणेही सहज होत असे. मोठ्या गोटीला, गोटी कसे म्हणायचे, गोटूलाच म्हणावे लागेल, अशा गोट्या ढंपर म्हणून ओळखल्या जायच्या. काचेच्या गोट्यांतही विविध रंगासोबतच त्यांच्या पोटात नक्षीही असे. पोटात, अंतरात नक्षी खेळत असलेल्या पारदर्शी गोट्यांना तितक्याच सुंदर नावाने म्हणजे ‘बुलबुल’ म्हणून त्याओळखले जायचे .

गोट्यांनंतर काड्याच्या पेटीचे छाप जमवणे सुरू केले. काड्याच्या पेट्या घरोघरी असायच्या. किराणा दुकानदार. पानपट्टीवाले संख्येने किती तरी असत. त्या प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या छापांच्या काड्यापेट्यांची बंडले असत.

छाप जमवण्यास सुरुवात झाल्यावर दोस्तांशी गप्पा मारत जात असलो तरी प्रत्येकाचे लक्ष चारी बाजूना बारकाईने असे. काही जण गप्पांत रमले की, मला नाही तर त्याला रिकामी काड्यापेटी किंवा चिरडली गेलेली काड्यापेटी दिसली की कशाचेही भान न राहता त्या काड्यापेटींवर झडप घालायला झेपावत असू. एकदम दोन्ही मिळणे फार कठिण. एक जरी मिळाली तरी लढाई जिंकल्याचा आनंद असायचा. मग तुला कोणता छाप मिळाला ह्याची चर्चा. “हाऽत्तीच्या! घोडा छापच की” म्हणत तो किंवा मी ती काड्याची पेटी पुन्हा फेकून देत असू. कारण हा घोडा छाप सर्रास सापडत असे. पत्त्याच्या पानाचा छाप, किंवा नुसता एकच किलवर आणि इस्पिक छाप मिळाले की काही तरी मिळाले असे वाटे. अदला बदलीत किंचित वरचढ ठरणारे हे छाप असत. तांबड्या रंगाचा आडवा चौकटच्या एक्क्याचा छाप असलेली काडीपेटी सापडली की तो दिवस सोन्याच व्हायचा आम्हा दोस्त मंडळीचा.

एकेकटे फिरताना, भाजी आणायला संध्याकाळी फाटकावर जाताना, रविवारी गावातल्या मुख्य भाजीबाजारात जातांना किंवा, आई किंवा काकूंबरोबर देवळात जाताना, ह्या छापांची आणि तशीच अगदी वेगळ्या नेहमीच न मिळणाऱ्या छापांची कमाई होत असे!

कधी कधी आमची ही हौस- छंद-आवड अगदी व्यसनाची पातळी गाठायची. कुणी दोघे- तिघे अगर एकटा माणूस सिग्रेट विडी ओढताना दिसले किंवा आता ‘तो/ ते विडी सिग्रेट शिलगावणार ‘ असा अंदाज आला की आशाळभूतपणे तो किंवा त्यांच्यातले एक दोघे तरी रिकामी काडीपेटी केव्हा फेकतील ह्याची वाट पाहात उभे असू. सहज दोस्त उभे आहेत किंवा कोणी एकटा असला तर, कुणाची वाट पाहातोय अशी ॲक्शन करत उभे राहायचो. नशिब जोरावर असेल तर दोन काड्याच्या पेट्या खाली पडलेल्या दिसायच्या. दिसल्या की त्याच सहजतेने ती काड्याची पेटी उचलून पुढे सटकायचे. घोडा छाप निघाली की चिडून ती पायाखाली चिरडून पुढे जायचो; कुणी विडी सिग्रेट ओढतेय का ते पाहात ! हा तपश्चर्येचाच काळ होता आमच्यासारख्या ‘ एका ध्येयाने पछाडलेल्या ‘ ‘ एकच श्वास एकच ध्यास ‘ घेतलेल्या पोरांचा. काड्यापेटींचे वेग वेगळे भारी वाटणारे छाप जमा करणाऱी छंदोमय झालेली मुले आम्हीच ! आमच्यासारखी आणखीही पुष्कळ असतील.

प्रत्येकाकडे दुर्मिळ, सहज न मिळणारे काड्या पेटींचे एक दोन छाप तरी नक्कीच असत. त्यांची अदला बदल देवाण घेवाण सहसा होत नसे. प्रत्येकासाठी ते छाप Trophy च असत. माझ्याकडे आणि धाकट्या भावाकडेही अशी मौल्यवान रत्ने होती. एका काड्यापेटीच्या वर संत तुकारामांचा छाप होता . त्याची छपाई व चित्रही सुंदर! दुसरा एक छाप टारझनचा होता. त्यालाही तोड नव्हती. सुरवातीला दुर्मिळ असणारा पण नंतर काही महिन्यांत तो तितकासा वैशिष्ठ्यपूर्ण न राहिलेला म्हणजे जंगलातून झेप घेतलेला वाघ व झाडावर बंदूक रोखून बसलेला शिकारी. पिवळसर व हिरव्या रंगाचे मिश्रण त्या छापात होते. काडीपेटी ती अशी कितीशी मोठी ? त्यावर हे चित्र छापणे सुद्धा फार अवघड आहे असे त्या वयातही वाटायचे. दुसरा एक छाप होता, समई छाप. किंचित गडद तपकिरी रंगाच्या पार्श्वभूमीवर पितळेची चकचकीत समई, चारपाच तेवणाऱ्या ज्योती आणि त्यांच्या भोवती पिवळ्या प्रकाशाते वलय. आमच्या भाषेत- येकदम मस्त! असेच उदगार संत तुकाराम महाराजांचा छाप पाहिल्य्वर सगळ्या पोरांच्या तोंडून बाहेर पडत. फक्त” येकदम मस्त हाय ब्ये!” ही भर पडायची.

गोट्यांच्या मागोमाग काड्यांच्या पेटीचे छाप जमवण्याचा नाद लागला व तोही संपला. काड्यापेटीची सखीसोबती सिग्रेटच्या पाकिटांच्या मागे लागलो. त्यावेळी बिडी सिग्रेट पिणे म्हणत जरी त्यात ओढण्याची क्रिया असली तरी पिणे हेच क्रियापद प्रचलित होते.

ह्या दोन्ही नादासाठी रस्ते धुंडाळणे हे समान कर्तव्य होते. ते इमान इतबारे पार पाडत असू. त्यासाठी शाळेच्या सुट्टीची वाट पाहण्याची गरज नव्हती. काड्यापेटीचे छाप असोत की सिग्रेटची पाकिटे, शाळा सुद्धा आमच्या संशोधनाचे केंन्द्र होते. मोरे मास्तर, पवार मास्तर, हे ह्या दोन्हींसाठी भरवशाचे .

काड्याच्या पेटीत जशी घोडाछाप सार्वत्रिक होती तशी सिग्रेटीत दोन ब्रॅन्ड लोकप्रिय होते. चहात जसा कडक चाय पिणारे तसे सिग्रेटमध्ये लई कडक चार मिनार होती ! त्यानंतर सर्वाना सहज सहन होणारी म्हणजे पीला हत्ती किंवा पिवळा हत्ती. ही पाकिटे जमवायला कौशल्याची हुन्नरीची आवश्यकता नव्हती. कुठेही गेलो आणि पाहिले तरी सहज ह्या दोन्ही छापांची पाकिटे मुबलक मिळायची. त्यानंतर बर्कले व त्याही नंतर कॅपस्टन हे दोन प्रतिष्ठित छाप होते. सर्वात वरिष्ठ म्हणजे गोल्ड फ्लेक्स सिगरेट. तिला सिग्रेट- शिग्रेट म्हणण्याचे धाडस कुणी करत नसे. ती लोकसंबोधने जनतेच्या जिव्हाळ्याचे जे दोन ब्रॅन्ड चार मिनार आणि पिवळ्या हत्तींसाठी राखीव होती ! कारण ते सर्वसामान्य कामगारांना, कारकुनांना आणि हेडक्लार्कना परवडणारे होते.

छाप कोणताही असो सर्व सिग्रेटींची पाकीटे दहाची असत. नंतर काही काळांनी काही ब्रॅन्डनीं वीसचीही पाकिटे आणली ती दोन्हीही गुण्या गोविंदाने पानपट्टीच्या टपऱ्यांत एकमेकाशेजारी बसत. तसेच बर्कले, कॅपस्टन, आणि गोल्ड फ्लेक्स ह्यांचे पन्नास सिगरेटींचे टिन असत. इस्त्रीच्या कपड्यातील, गॅागल लावलेले तरूण कधीतरी रुबाबात हातात हा टिन तिरपा धरून जाताना जिसत. पण अशी शान मोजके मोटरवाले होते त्यांना जास्त शोभून दिसे. गोल्ड फ्लेकस शिवाय ते दुसऱ्या सिगरेटीचा झुरकाही घेत नसावेत. पण चार मिनारवाले ह्या सर्वांना तुच्छ समजत. बायकी शिग्रेटी पिणारे म्हणत त्यांना.

ही पाकिटे जमा करायचोच पण कधी सटीसहीमाहीला कॅमल किंवा अबदुल्ला नावाचे एखादे पाकीट मिळे ! ही वार्ता सिग्रेटची पाकिटे जमवणाऱ्या आमच्या सारख्या नादिष्ट मुलांच्या गोटांत वाऱ्यासारखी पसरे! दुध पिणाऱ्या गणतीचे दर्शन घ्यायला पुढे येणाऱ्या नंतरच्या काळात धावपळ झली नसेल तितकी पळापळी केली असेल पोरांनी! हे कधी न ऐकलेले ना पाहिलेली छापाची पाकिटे कशी दिसतात इतके पाहायला मिळाले तरी धन्य वाटायचे.

पण दुर्मिळ असल्यामुळे व कसलीही माहिती नसल्यामुळे लहानशा ओढ्याला अचानक आलेल्या पुराचा लोंढा जसा लगेच ओसरतो तशी आमची उत्सुकताही ओसरायची ! ओळखीची माणसेच बरी हाच सनातन नियम पटायचा.

हे चार मिनार, पिवळा हत्ती, कॅपस्टन वगैरे जमा करण्याच्या मोसमातच एक वेगळा ब्रॅन्ड त्याच्या अत्यंत अनोळखी नावा मुळे, पाकिटाच्या रंगसंगतीमुळे व त्यावर असणाऱ्या स्टायलिश माणसाचा फोटो आणि त्याच्या तितक्याच स्टायलिश हॅट मुळे त्या पाकिटाची किंमत ( मूल्य वगैरे शब्द कुणाला माहित?! आणि म्हणता येणार होते!) आमच्या अदलाबदलीच्या मार्केटमध्ये वधारली! ज्यांच्याकडे ही पाकिटे होती ते मोटारीतून गोल्डफ्लेकसचा टिन घेऊन उतरणाऱ्या रुबाबदार श्रीमंताप्रमाणे आव आणीत आमच्यात वावरत !

पण ह्या सिग्रेटचे नावही सुंदर आहे . ‘ पासिंग शो ‘ वा! सिगरेटचे झुरके घेण्याला इतके काव्यमयच नव्हेतर वास्तवही म्हणता येईल नाव आहे. ‘ घटकाभरचा खेळ, घटकाभर करमणुक, क्षणभराचा विरंगुळा!’ ‘फार नाही, दोन घटका मजेत घालवा’ ‘दोन घटका लगेच सरतील,’ त्यावेळी हे अर्थ माहित नव्हते. नाव सोपे आणि निराळे होते. हे समजत होते. ते नाव लक्षात राहण्याचे त्यातील सहजता हेही कारण असेल.

काड्यापेट्यांचे छाप, सिगरेटची पाकिटे जमवणे हा खेळही होता आणि नाद होता. छंद आवड हौस हे शब्दही आम्हाला कधी आमच्या वाटेवर भेटले नाहीत. त्यामुळे नाद होता म्हणणेच योग्य. बरं ह्या वस्तु अखेर शब्दशः टाकाऊच. बरीच माणसे, मुलं छाप पाकिटे गोळा जमवतात हे पाहून ते कौतुकाने आपणहून रिकामी काडेपेटी किंवा रिकामे सिगरेटचे पाकीट देत. काहीजण तर एकच शिल्लक असली तर ती खिशात ठेवून सिगरेटचे पाकिट देत.

गोट्या जमवणे थांबले, मग काड्यापेटींचे छाप जमवण्यामागे लागलो. तेही बंद कधी झाले त्याचा पत्ता नाही आणि सिगरेटची पाकिटे जमवता जमवता तोही नाद कसा आणि कुठे संपला तेही समजले नाही.

हा खेळ अखेर ‘पासिंग शो’ च होता!

‘बॅट बाॅल’ आणि…

आम्ही मुले स्वतंत्रपणे आणि काही वेळा आमच्या काकांच्या आणि वडिलांबरोबरही बॅडमिन्टन, रिंगटेनिस खेळत असू. बॅडमिन्टनसाठी लागणाऱ्या रॅकेटस मोजक्या होत्या. त्यामुळे आळीपाळीने खेळणे ओघानेच आले. बॅडमिंन्टनचा उत्साह संपला की त्याच मोठ्या अंगणात बॅट- बाॅल खेळत असू.

सुरवातीला सिद्धेश्वरच्या जत्रेत मिळणाऱ्या बॅटी होत्या. खऱ्या बॅटीशी किंचित सारखेपणा असायचा. तोही फक्त आकारात. ती बॅट म्हणजे बॅटीच्या आकाराची केवळ फळी होती. पण त्याकडे आमचे लक्ष नसे. रबरी चेंडू आणि ती बॅट म्हणजे आमचा बॅट बाॅल; म्हणजेच क्रिकेट खेळणे असे. रबरी बॅाल (टेनिसचा नव्हे) हरवायचा किंवा बॅटीचा मार खाऊन फुटायचा. जशी बॅट तसाच बाॅल. समान दर्जाचे. रबरी बाॅल फुटला की श्रावणी सोमवारी सिद्धेश्वरच्या जत्रेतून लाकडी बाॅल आणायचो. टिकाऊ आणि टाळक्यात, कपाळाला लागला की किती कडक आणि दणकट तेही समजायचे. त्यामुळे तो बाॅल अडवण्याचा, कॅच पकडण्याचा आमच्यापैकी कुणीही प्रयत्न करीत नसे. असल्या हिरोगिरीच्या वाटेला जात नसू.

खऱ्या बॅटी बॅाल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कुकरेजाचे दुकान ! हे दुकान म्हणजे क्रिकेटच्या बॅटी बॅाल आणि फुटबॅाल हॅाकी आणि इतरही सर्व खेळांच्या साहित्याचे दुकान, -भांडारच! त्यावेळी संपूर्ण शहरात असे एकच दुकान होते. गावातल्या सगळ्या शाळा कॅालेजांची, खेळाच्या सामानाची खरेदी इथूनच होत असे. कुकरेजा कं.चे आणखी एक खास वैशिष्ठ्य म्हणजे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेची मानाची ढाल कुकरेजांनी ठेवली होती. कुकरेजा शिल्ड जिंकण्यासाठी सर्व हायस्कुलांत दरवर्षी अटीतटीची लढाई असायची. विशेषतः आमची शाळा, न्यु हायस्कूल आणि ॲन्ग्लो उर्दु ह्यांच्यात.

आम्हाला कुकरेजा आणि कं.चे दुकान आणखी एका कारणाने माहितीचे होते. बॅडमिन्टनच्या रॅकेटस दुरुस्त करायला तिथे जात असू. दुकानात एक अत्यंत कुशल आणि कसबी कारागीर होता. हा कारागिर अगदीशिडशिडा. आणि मालक कुकरेजा ( हे गृहस्थ, मालक कुकरेजाच होते का कोणी व्यवथापक होते हे माहित नाही. पण आम्हाला ते मालकच वाटत.) जाडे होते. ह्या दोघांना पाहिले की लॅारेल हार्डीची आठवण यायची. त्यांचा वेष ठरलेला असे. जाड कापडाचा ढगळ पायजमा आणि त्यावर कधी अर्ध्या बाह्यांचा रंगीत, कधी पांढरा शर्ट. केस पांढरट. भांग साधा पाडलेला . पण व्यवसथित विसकटलेले. त्यांचा कारागीर उंच आणि शिडशिडीत. पंजाबी लुंगी, वर पैरणीसारखा अर्ध्या बाह्यांचा चोकटीचा सदरा किंवा बनियन. डोक्यावर फेटा नसे पण मध्यभागी केसांचा बुचडा बांधलेला असे. सदा कामात गढलेला. बॅडमिन्टनच्या रॅकेटस ची जाळी घट्ट विणत बसलेला दिसे तर कधी क्रिकेटच्या बॅटला तळाशी चांभारी दोऱ्यासारखी ट्वाईन काटेकोरपणे गुंडाळत असे. त्यासाठी तो बॅट, मागे- पुढे- -बाजुला सरकवता येईल असा, जमीनीवर ठेवलेल्या साचात ठेवायचा. ट्वाईन बॅटला ज्या ठिकाणी गुंडाळायची तिथे ब्रशने सरस लावायचा. मग ट्वाईनचे एक टोक तिथे घट्ट चिकटवून ठेवायचा. त्यानंतर साचा हळू हळू फिरवायला लागे. आणि ट्वाईन इकडे तिकडे न भरकटू देता बरोबर एकाखाली एक अगदी सरळ रेषेत जवळ आणत आपोआाप तो गुंडाळत असे. ही पट्टी झाली की तीन चार बोटांचे अंतर ठेवून त्यावर सरसाचा ब्रश फिरवून झाला की दुसऱ्या पट्टीसाठी ट्वाईन गुंडाळणे सुरू. अशा तऱ्हेने तो ट्वाईनच्या दोन पण बहुतेक बॅटीना तीन पट्ट्या लावायचा.

आम्ही आमचे काका आबासाहेबांच्याबरोबर बॅडमिन्टनच्या रॅकेटस दुरुस्तीसाठी कुकरेजाकडे घेऊन जायचो. रॅकेटची जाळी सैल झाली असेल तर दोन तीन दिवसांनी या म्हणायचा. कधी मधली एखाद दुसरी तार तुटली असेल तर तो अर्ध्या तासात सुंदर विणून द्यायचा. जाळी पुन्हा पहिल्या सारखी दिसायची. एखाद्या तारेची वेलांटी फ्रेम मधून सैल झालेली दिसल्यावर तो काय करायचा माहित नाही. पण खालच्या बाजूने, वरच्या बाजूने दोन तारा तो अशा काही खाली वर ताणत असे. आणि तळहातावर ती रॅकेट मारत असे त्यावेळी “तंन्नन” असा झंकारणारा आवाज ऐकायला मजा येई. जाळी आता पक्की झाली ह्याची खात्री होई.

असेच एकदा आम्हाला आमचे वडील अचानक कुकरेजा मध्ये क्रिकेटची बॅट घ्यायला घेऊन गेले. तेव्हाचा आनंद काय वर्णावा. आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळायला जाणाऱ्या बॅटसमनला किंवा बॅालरला काय वाटत असेल ह्याची काही कल्पना नव्हती. पण शाळेच्या टीम मधून न्यू हायस्कूल किंवा ॲंग्लो उर्दु विरुद्ध पार्कच्या मैदानावर खेळायला जाताना बॅट्समन किंवा गोलंदाजाला काय वाटत असेल तोच आनंद, तीच धाकधुक, तसाच उत्साह आम्हालाही आला होता.

खरी क्रिकेटची बॅट! आणि तो चमकणारा, पॅालिशने चकाकणाऱ्या लाल रंगाचा लेदर बॅाल! तो बॅाल हातात घ्यायला मिळाला, नव्हे ह्या बॅटने व बॅालने आता बॅटबॅाल न खेळता ‘ क्रिकेट ‘ खेळणार हाच विचार वारंवार आम्हा तिघाही भावांच्या मनात येत होता. आमच्यासाखे भाग्यवान आम्हीच!

दुकानात आम्ही तीन चार बॅटी स्टाईलमध्ये धरून बॅटिंग करण्याच्या पवित्र्यात उभे राहून पाहिल्या. तिघांनाही बॅट व्यवस्थित धरता येईल अशी एकमेव बॅट मिळणे शक्य नव्हते. त्यातून कुकरेजानीच मार्ग काढला. आमच्याकडे पाहात त्यांनी एक दोन प्रसिद्ध ‘नॅान्जर’च्या बॅटी ( बॅटीना खेळाडूच्या शरीरयष्टी म्हणण्यपेक्षा उंची ध्यानात घेऊन नंबर दिलेला असे. ५,६ ७ वगैरे.) पाहून त्यातली त्यांनी योग्य त्या नंबरची बॅट दिली. oiling करून झाल्यावर बॅट घेऊन जा असे त्यांनी सांगितले. स्टम्पस? कमीत कमी तीन तरी लागायचे पण बजेटमध्ये स्टम्प बसत नव्हते त्यामुळे बॅालिंग न करता उडवले आम्ही ते !

भरपूर खेळलो आम्ही त्या बॅटने. गल्लीतल्या मॅचेस मध्ये नवीन होती तोपर्यंत आमची बॅट हिरॅाईन होती. एकदा बॅटीचे हॅन्डलच सैल झाले. कुकरेजा कडे गेलो. बिनफेट्याचा तो कसबी शीख कारागीर यायचा होता. कुकरेजाशेठनी बॅट पाहिली. थोडा वेळ थांबा म्हणाले. थोड्या वेळाने तो शीख कारागीर येताना पाहिला. बिचारा एका पायाने लंगडा होता ते आम्हाला समजले. एका पायाच्या चौड्यांने चालायचा. त्या पायाची टाच टेकतच नव्हती. उंच होता मुळात त्यात एक पाय नेहमीसारखा टाकायचा पण तो दुसरा पाय चौड्यावर चालण्यामुळे दर पावला गणिक तो एका बाजूने जास्त उंच व्हायचा.

त्याने बॅटीकडे नुसती नजर टाकली. काही न बोलता, सैल झालेल्या हॅन्डलच्या पाचरात जिथे अंतर होते तिथे सरस भरला आणि त्या साच्यात बॅट ठेवली. व हॅन्डलचे पाचर जिथे खुपसले होते त्या बॅटीच्या दोन्ही भागांना त्याने रबरी हातोड्याने योग्य तेव्हढ्याच शक्तीने हळू हळू ठोकू लागला. “ठीक हो गयी है. पण ट्वाईन लावली तर बरेच दिवस टिकेल.” पैशाचा अंदाज घेतला. परवडेल वाटल्यावरून हो म्हणालो. त्याची ती आखीव रेखीव पण तितकीच दोरा बळकट गुंडाळण्याची कामगिरी ओणवे होऊन पाहात राहीलो. बॅट हातात दिली त्यांनी. पुन्हा बॅटिंग करण्याच्या पवित्र्यात उभे राहून मुद्दाम हॅन्डलवर जोर देत जमिनीवर बॅटीने टक टक करत बॅटिंग करून पाहिली. बॅट नविन झाली ह्या खुषीत आलो घरी !

बॅटीचा दोस्त लाल चेंडूची मात्र रया जाऊ लागली. पण दुसरा लेदर बॅाल घेणे शक्य नव्हते. त्या ऐवजी खेळण्याच्या इतर मोठ्या दुकानात सीझन बॅाल नावाचा एक बॅाल मिळायचा. तो स्वस्त व बरेच दिवस टिकत असे. पण नडगीवर किंवा हॅन्डल धरलेल्या दोन्ही हातांना लागला की ठो ठो करण्याची वेळ यायची. पण असल्या किरकोळ कारणांनी कुणी क्रिकेट खेळणे थांबवते का?

बॅटीच्या हॅन्डलला रबरी कव्हर बसवताना पाहणे हा सुद्धा एक नेत्रसुभग सोहळा असायचा. कुकरेजाचा हा वाकबगार कलावंत-कारागीर तुम्हाला पाहिजे ते कव्हर ( ‘परवडणे’ हा आमचा परवलीचा शब्द असायचा.) निवडा म्हणायचा. बॅट नवीन घेताना जे कव्हर असे ते फुकट असे. कारण बॅटीसह ते गृहप्रवेश करायचे. त्याची गुणवत्ता तितकीच. नवीन घेणे बरेच दिवस लांबणीवर टाकायचो आम्ही. पण बदलायची वेळ टळून गेली. उघड्या हॅन्डलने खेळून हात खरचटू लागले. टोलाच नाही चेंडू नुसता तटवला तरी हाताला झिणझिण्या यायच्या. आता मात्र तसे नवीन कव्हर बसवणे आणि हॅन्डल पक्के करून घेण्यासाठी गेलो.

चांगले रबरी काटेरी ठिपकेदार कव्हर ज्यामुळे पकड छान यायची खेळताना तसे घ्यावे असे पहिल्यांदा वाटायचे पण किंमत ऐकल्यावर मग “हे केव्हढ्याला, ते केव्हढ्याला” करत एक परवडणारे( पुन्हा तो परवलीचा शब्द आलाच) कव्हर नक्की करत असू.

आता इथून त्या शीखाची कामगिरी सुरू. पहिल्यांदा तो ते कव्हर दोन्ही बाजूंनी ओढून ताणून पाहात असे. बॅटीच्या हॅन्डलला पांढरी पावडर लागायची. तीच पावडर रबरी कव्हरमध्येही जायची. कव्हर चांगले चोळले जाई. त्यानंतर तो ते कव्हर आत खुपसताखुपसता मध्ये पावडर हाताला लावायचा, रबरी कव्हर मध्यम लांबीचे करी. उघडे तोंड हॅन्डलच्या डोक्यावर घट्ट दाबून ठेवल्या सारखे करतो ना करतो तोच कव्हरची वर राहिलेली बाजू सरसर करीत खाली आणत जाई! बॅटीचे दोन्ही खांदे बेताने झाकले जातील इतके ते कव्हर खाली न्यायचा. थोडा भाग अजून वर दिसत असे तो भाग खाली सरकवत सरकवत हॅन्डलच्या कपाळपट्टीला खाली वळवत गुंडाळून टाके. वारे पठ्ठे ! एका झटक्यात, हवेत हात फिरवून बंद मुठीतला रुपया प्रेक्षकांना दाखवणाऱा कुकरेजाच्या दुकानातील हा आमचा लंगडा कलाकार जादूगारच होता आमच्यासाठी !

ढगळ मापाचा वाढत्या अंगाचा अभ्रा असला तरी तो उशीला घालण्यासाठी अर्धा तास झटापट करणारे आम्ही. आम्हाला तो कसबी शीख जादूगार वाटला तर आश्चर्य नाही.

पुस्तकांच्या गराड्यांत

बेलमाँट

गेले काही दिवस पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलो आहे. आजपर्यंत पाचसहा लायब्रऱ्यात जाऊन बराच काळ तिथे काढला. सर्व ठिकाणी अनेक चांगल्या पुस्तकांच्या नंदनवनात वाचक म्हणून वावरत होतो.

सध्या बेलमॅान्टच्या लायब्ररीत मात्र मी व्हॅालन्टियर म्हणून जातो. म्हणूनच सुरुवातीला लिहिले की पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलोआहे.

पुस्तके मासिके वाचण्यासाठी माझ्या लायब्ररींच्या भेटी जनरल लायब्ररीपासून सुरुवात झाली. त्यानंतर वल्लभदास वालजी वाचनालय, बळवंत वाचनालय,नवजीवन ग्रंथालय, ते मुंबई मराठी ग्रंथालय – विशेषतः तिथल्या संदर्भ ग्रंथालयापर्यंत पर्यटन झाले. . त्यानंतर माउन्टन व्हयू लायब्ररी, मर्चंटस् वॅाक, रेडवुड शोअर्स, सॅन कार्लोस रेडवुडसिटी ह्या लायब्रऱ्यात सुद्धा जाऊन आलो. सॅन कार्लोस लायब्ररीपासून माझे व्हॅालंन्टियरचे दिवस सुरू झाले.

पण आज जास्त करून लिहिणार आहे ते, विशेषतः बेलमॅान्टच्या वाचनालयाशी संबंधित आहे. कारण सध्या मी बेलमॅान्टच्या लायब्ररीत व्हॅालन्टियर म्हणून जात आहे. तिथे देणगी म्हणून येणाऱ्या पुस्तकांशी माझा सतत संबंध येतो.

निरनिराळी, अनेक विषयांवरची, कादंबऱ्या, आठवणींची, चरित्रे, आत्मचरित्रे, अभिजात (classic), काव्यसंग्रह , इतिहासाची, उत्कृष्ठ छायाचित्रांची, आर्थिक राजकीय विषयांवरची किती किती, अनेक असंख्य पुस्तके समोर येत असतात.

काही पुस्तके अगोदर वाचली असल्यामुळे ओळखीची असतात. त्यातलीही काही पुस्तके तर केव्हा कुठे वाचली कोणी दिली ह्यांच्याही आठवणी जाग्या करतात. ह्यातच काही योगायोगांचीही भर पडते. थोरल्या मुलाने अगोदर केव्हा तरी – केव्हा तरी नाही- दोन तीन दिवसांपूर्वी विचारले असते ,” बाबा सध्या अचानक ज्योतिषावरची पुस्तके दिसायला लागलीत.तुमच्या पाहण्यात आलीत का?” त्यावर मी नाही म्हणालो. इतक्यात तरी काही दिसली नाहीत.” असे म्हणालो. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, चिनी ज्योतिष, अंकशास्त्रावर आधारित भविष्याची, तुमची जन्मतारीख आणि भविष्य अशी पुस्तके आली की! योगायोग म्हणायचा की चमत्कार हा प्रश्न पडला.

फेब्रुवारीत धाकटा मुलगा म्हणाला की ते सगळे एप्रिलमध्ये युरोपातील ॲमस्टरडॅम लंडन पॅरीस ला जाणार आहेत. दोन चार दिवस माझ्या ते लक्षात राहिले. नंतर विसरलो. ऐका बरं का आता. मी लायब्ररीतल्या कॅाम्प्युटरवर पाहिले. स्टीव्ह रीकची पुस्तके दिसली नाहीत. एक आढळले. पण ते दुसऱ्या गावातल्या लायब्ररीत होते. माझ्यासाठी राखून ठेवा असे नोंदवून ठेवले. दोन दिवस गेले. तिसरे दिवशी लंडन का पॅरिसवरचे स्टीव्ह रीकचे पुस्तक समोर आले. अगदी समोर. वा! हे जाऊ द्या. मी लायब्ररीतल्या बाईंनाही सांगून ठेवले होते. दोन तीन दिवसांनी त्यांनी मला बोलावलेआणि नेदर्लॅंडचे पुस्तक हातात ठेवले. “ पण तुला पाहिजे त्या ॲाथरचे नाही .” मी काय बोलणार? योगायोग की चमत्कार ? हा नेहमीचा प्र्शन पुन्हा पडला!

पुस्तके देणारे बरेच लोक पुस्तके देतात ती इतक्या चांगल्या स्थितीत असतात की आताच दुकानातून आणली आहेत! अनेक पुस्तके खाऊन पिऊन सुखी अशी असतात. तर काही जिथे जागा सापडली तिथे बसून, जेव्हा मिळाला वेळ तेव्हा वाचलीअशी असतात. कव्हरचा कोपरा फाटलेला , नाहीतर कान पिरगळून ठेवावा तशी आतली बऱ्याच पानांचे कोपरे खुणेसाठी दुमडून ठेवलेली, अशा वेषांतही येतात. काही मात्र बघवत नाहीत अशा रुपाने येतात. पण अशा अवस्थेतील, फारच म्हणजे अगदी फारच थोडी असतात.

पुस्तके ज्या पद्धतीने दिली जातात ती पाहिल्यावर देणगी दार आणि त्यांची घरे कशी असतील ह्याचा ढोबळ अंदाज येतो. काही पुस्तके बऱ्याच वर्षांपूर्वी प्रकाशित झाली असतात तरी ती नुकतीच दुकानातून आणली आहेत असे वाटते.काहीजण कागदी पिशव्या भरून पुस्तके देतात. पण इतकी व्यवस्थित लावून रचलेली की ती पिशवी रिकामी करू नये; पिशवीकडे पाहातच राहावे असे वाटते. साहजिकच पुस्तके बाहेर काढताना मीही ती काळजीपूर्वक काढून टेबलावर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

काही वेळा पुस्तके खोक्यांत भरून येतात. पहिले दोन थर आखीव रेखीव. मग वरच्या थरात जशी बसतील, ठेवली जातील तशी भरलेली ! खोकी आपले दोन्ही हात वर करून उभे ! काही पुस्तके तर धान्याची पोती रिकामी करावी तशी ओतलेली. सुगीच्या धान्याची रासच! हां त्यामुळे मोऽठ्ठ्या, खोल पिपातली पुस्तके उचलून घ्यायला सोपे जाते हे मात्र खरे.

एक दोनदा तर दोन लहान मुले,पुस्तकांनी भरलेले आपले दोन्ही हात छातीशी धरून “कुठे ठेवायची ?” विचारत कामाच्या खोलीत आली ! लहान मुलांची पुस्तके होती. त्या मुलांइतकीच पुस्तके गोड की पुस्तकांपेक्षाही मुले ? ह्याचे उत्तर शोधण्याची गरजच नव्हती. दोन्ही गोड! किती पुस्तके आणि ती देणारेही किती!

आठवणी जाग्या करणारी पुस्तकेही समोर येतात. पूर्वी मुलाने ,” हे वाचा” म्हणून दिलेले Little Prince दिसल्यावर माउन्टन व्ह्यु नावाच्या लायब्ररीची आठवण येते. जिथे बसून वाचत असे ती कोचाची खुर्ची, तिच्या बाजूला खाली ठेवलेली, बरोबर घेतलेली वहीची पिशवी…. असेच आजही बेलमॅान्टच्या लायब्ररीत टाईम, न्युयॅार्क संडे मॅगझिन, रिडर्स डायजेस्ट,न्यूयॅार्कर वाचताना वही बॅालपेन असलेली पिशवी जवळच्या टेबलावर ठेवलेली असते!

मध्यंतरी धाकट्या मुलाने दिलेले बेंजॅमिन फ्रॅन्कलिनचे, आयझॅकसनने लिहिले चरित्र आले तर एकदा त्यानेच दिलेले लॅारा हिल्डनबर्डचे Unbroken भेटीला आले. माझ्या दोन्ही नातवांच्या शेल्फातील चाळलेले The Catcher in the Rye आणि Of the Mice and Man ही पुस्तके हातात आल्यावर त्यांची ती विशेष खोली, तिथली,त्यांच्या पुस्तकांनी भरलेली शेल्फंही दिसली. इकडे अगदी पहिल्यांदा आलो तेव्हा मुलाने आणून दिलेले Ian Randची सर्वकालीन श्रेष्ठ कादंबरी Fountain Head काही दिवसांपूर्वी दिसले ! आणि त्याच लेखिकेचे Anthem ही ! धाकट्याने दिलेले Confidence Men सुद्धा मध्यंतरी अचानक भेटून गेले.

मुलीचे आवडते Little Women हे अभिजात वाड•मयाचे पुस्तक आणि तिला आवडलेले व नातीने मला दिलेले Anne of Green Gables ही दोन्ही पुस्तके इतक्या विविध, सुंदर आवृत्यांतून येत असतात की लग्नसमारंभाला नटून थटून जाणाऱ्या सुंदर स्त्रियांचा घोळकाच जमलाय! हाच सन्मान शेक्सपिअर , चार्ल्स डिकन्स,शेरलॅाक होम्स आणि लिटल प्रिन्स , हॅरी पॅाटरला, आणि ॲगाथा ख्रिस्तीलाही मिळत असतो. उदाहरणादाखल म्हणून सन्मानीयांची ही मोजकीच नावे सांगितली.

लहान मुलांच्या पुस्तकांनाही देखण्या, जरतारी आवृत्यांतून असेच गौरवले जाते. त्यापैकी काही ठळक नावे सांगायची तर C.S. Lewis ह्यांचे प्रख्यात Chronicles of Narnia , Signature Classics of C.S. Lewis. तसेच E.B. White ची Charlottes Web , Stuart Little ही पुस्तके, Alice in Wonderland, Sleeping Beauty , The Beauty and The Beast, ह्या पुस्तकांनाही असाच मान मिळतो.

अगदी अलिकडच्या योगायोगाची कहाणी; मी पूर्वी वाचलेले Dr. Andrew Weil चे पुस्तक अचानक प्रकट झाले. अरे वा म्हणालो. पुन्हा परवा त्याच डॅाक्टरांचे Natural Health Natural Medicine हे पुस्तक दिसले. म्हटलं आता मात्र हे मुलांना कळवायलाच पाहिजे.

मघाशी मी वेगवेगळ्या रुपातील आवृत्यांतून येणाऱ्या पुस्तकांच्या यादीतील आणखी एका मानकऱ्याचे नाव सांगायचे राहिले. ते म्हणजे Hermann Hess चे Siddhartha ! हे सुद्धा सार्वकालीन लोकप्रिय पुस्तक आहे. मागच्याच वर्षी मला हे मुलाने दिले होते. मी वाचले. छान लिहिलेय. आपल्या तत्वज्ञानासंबंधी व तत्वज्ञाविषयी लिहिलेले, तेही परदेशी लेखकाने ह्याचे एक विशेष अप्रूप असते. ह्याने बरेच समजून उमजून लिहिले आहे. सहा महिन्यांपूर्वी, मुलांनी वाचलेले व मला,” बाबा हे वाचा तुम्हालाही समजेल,आवडेल असे पुस्तक आहे “ म्हणत दिलेले Homosepiens हे गाजलेले पुस्तक परवाच दोन तीन वेळा शेकहॅन्ड करून गेले. माझ्याकडे असलेली लायब्ररीविषयी, लायब्ररी हेच मुख्य पात्र असलेली The Library Book किंवा Troublewater Creeks Book-woman अशी पुस्तके पाहिली की लायब्ररीत लायब्रऱ्या आल्या असे वाटू लागते !

काही वेळा मी ह्या ना त्या पुस्तकांचा “ परवा हे आले होते आणि ते सुद्धा, बरं का!” असे मुलांना सांगतो. पण माझ्या आवडीच्या जेम्स हेरियटचे एकही पुस्तक आतापर्यंत तरी ह्या गराड्यात आलेले, थांबलेले पाहिले नाही! येईल, योग असेल तेव्हा ती चारीही पुस्तके येतील. !

पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या गराड्यांत , किंवा प्रसिद्धीच्या सतत झोतांत असलेल्या लोकप्रिय नामवंतांना आपल्या चहात्यांची गर्दी,गराडा हवा हवासा वाटतो. पुस्तकप्रिय वाचकांनाही पुस्तकांच्या गर्दीगडबडीचा गराडाही हवा हवासा वाटत असतो ! नाहीतर आजही लायब्ररीत इतके वाचक-लोक आले असते का?

एकातून एक … ह्यातून ते … त्यातून हे …

बेलमॉंट

८ मार्च २०२३ – महिला दिन

गोपू लहान होता. त्याच्या आजोबांनी त्याच्यासाठी एक उबदार पांघरूण शिवून दिले. रंगीत कापडांचे दोन तीन थर लावून ते पांघरूण शिवले होते. ते गुडीगुप्प पांघरुण गोपुला इतके आवडायचे की झोपताना, जागा झाल्यावर , दूध पिताना ते सतत घेऊन असायचा.

गोपू थोडा मोठा झाला तरी ‘आजोबाच्या पांघरुणा’ शिवाय तो झोपत नसे. बरे , उठता बसताही ते त्याच्या बरोबर असायचेच.

इतके दिवस होऊन गेल्यावर ते पांघरुण फाटायला लागले. वरच्या कापडाचा रंग विटू लागला. आई म्हणाली, “ गोपाळा, अरे ते पांघरूण टाकून दे आता.” “ टाकायचे का? मी नाही टाकणार.हे आजोबाला दे. ते करतील पुन्हा चांगले.”

गोपुच्या आईने आजोबांना ते पांघरुण दिले. “ बघा काय करायचे ते “, असे सांगून घरी आली. आजोबांनी पांघरुण चारी बाजूंनी पाहिले. “ हंऽऽ, हॅां, अस्सं तर “ असे पुटपुटत ते पुढे म्हणाले की , “ अरे पुष्कळ आहे की हे करायला …. .” असे म्हणत त्यांनी कात्री घेतली .

आजोबांची कात्री कच कच करीत कापड कापू लागली. त्यांच्या मशिनची सुई खाली- वर-खाली जोरात चालू लागली. दुसरे दिवशी आजोबा गोपुच्या घरी आले. त्यांनी गोपुला ,” हा घालून बघ “ म्हटल्या बरोबर गोपु टणकन उडी मारत पळत आला. तो लांब कोट अंगात घालून आई पुढे उभा राहिला. “ बघ आजोबांनी पांघरुणातून कोट केला की नाही? “ इतके म्हणून कोट घालून तो बाहेर पळाला. सर्वांना दाखवत फिरत राहिला. जो तो विचारी,” काय गोप्या नविन कोट शिवला का?” “ हो माझ्या आजोबांनी शिवलाय. मस्त आहे ना?” उत्तराची वाट न पाहता गोपू पुढे सटकला देखील.

आता गोपूला त्या कोटाशिवाय काहीच सुचत नव्हते. दिवस रात्र, घरात आणि बाहेर, गोपु कोटाशिवाय दिसत नसे. शेजारची, जवळची गोपुची दोस्त कंपनी त्याला म्हणे , अरे गोपु मला घालून पाहू दे ना कोट. दे ना! एकदाच.” मग गोपु बबन्याला, मग बाज्याला, नंतर गज्याला, असं करीत सर्वांना आपला कोट घालायला देत असे.

कोटाचेही दिवस भरले असावेत. गोपुची आई म्हणाली, “ अरे गोपाळा, त्या कोटाची रया गेली की रे! टाकून दे तो आता.” लगेच गोपु म्हणाला, “ टाकायचा कशाला? आजोबा आहेत की. त्यातून ते- हे काहीतरी करून देतील मला.”

आई गोपुचा कोट घेऊन आजोबांकडे आली. त्यांच्या समोर कोट टाकीत म्हणाली, “ गोपुचा कोट. तुम्ही, गोपु आणि कोट! काय करायचे ते करा.” आजोबांनी कोट खाली वर, मागे पुढे फिरवून पाहिला. “ हंऽऽ , हॅां ऽ हॅूं ऽऽ अस्संऽऽऽ तर “ असे पुटपुटत, “ पुष्कळ आहे की ….हे करायला….” म्हणत

म्हणत त्यांनी कात्री घेतली. कात्री कच कच करीत गोल, तिरपी, आडवी,उभी होत कोट कापायला लागली. आजोबांच्या मशिनची सुई खाली-वर-खाली वेगाने जाऊ लागली. आणि आजोबांनी आपण शिवलेल्या कपड्याकडे पाहात त्याची घडी घालून गोपुकडे आले.

“ आजोबा, आजोबा काय आणले माझ्यासाठी” म्हणत गोपु धावत त्यांच्याजवळ गेला. आजोबांनी अर्ध्या बाह्या असलेले सुंदर जाकीट गोपुच्या अंगात घातले. गोपुराजे एकदम खूष होऊन आईला म्हणाले, “ बघ आई, कोट टाकून दे म्हणत होतीस ना? बघ कोटातून आजोबांनी काय काढले ते ! “

गोपु आता जाकीटमय झाला. बरेच दिवस सगळे त्याला जाकीटगोपुच म्हणत. बाज्या- गज्या, बबन्या- गहिनी , अरुण- मधुला , सगळ्या दोस्तांनाही थोडा वेळ का होईना जाकीट घातल्याचा आनंद लुटता आला.

दिवस गेले. जाकीट मळकट कळकट दिसू लागलेच पण फाटायलाही लागले. आईचे पुन्हा ते “टाकून दे रे बाबा आता ते जाकीट!” आणि गोपुचे, “ आजोबा करतील काही तरी ह्यातून” हे रोजचे पाढे म्हणून झाले.

पांघरूण कापडांच्या थरांनी बनविले होते तरी त्यातली बरीचशी कापडे विरून गेली होती. आजोबांनी जाकीटाला सगळ्या दिशांनी फिरवले. शिंप्याच्या पाटावर पसरून ठेवले. “ हंऽऽ , हॅांऽऽऽ , हॅूंऽऽ अस्संऽऽ तर “ असे पुटपुटत पुष्कळ झाले की इतके” म्हणत आजोबांची कात्री कच कच करीत कापड कापत गेली. त्यांच्या मशिनची सुई खाली-वर -खाली जोरात जाऊ लागली. थोड्या वेळाने तयार झालेली….

आजोबा गोपुला हाका मारीतच घरात शिरले. गोपुही ‘आजोबा आले’ म्हणत एकेक पायरी सोडून उड्या मारीत खाली आला. आजोबांनी, सुंदर कारागिरी केलेली झोकदार टोपी, गोपुच्या डोक्यावर चढवली. हातानी चाचपून ठाकठीक केली. गोपु हर्षभरीत होऊन आईकडे ओरडतच गेला, “आई बघ आजोबांनी जाकीटातून, जादूने टोपी केली माझ्यासाठी. बघ बघ ,” असे म्हणताना तो आपली मान, डोके रुबाबात इकडे तिकडे फिरवत होता. घरातून धूम ठोकत गोपू बाहेर पडला. रस्यावरचे, बाजूचे, घरातले सर्व गोपुकडे कौतुकाने पाहात राहिले. टोपी होतीच तशी देखणी.

पक्या-मक्या, बबन्या-गहिन्या, अरुण-मधु , बाज्या-गज्या सर्वांच्या डोक्यांवर गोपुची टोपी दिमाखात मिरवत राहीली.

टोपीच ती. तीही बरेच दिवसांनी भुरकट धुरकट झाली. तिची एक घडी फाटली, दुसरी उसवली गेली. आईचा ,” अरे आता तरी फेकून दे ना ती टोपी. तिचे चिरगुट झालंय की रे!” हा मंत्र सुरु झाला. त्यावर गोपुचा, “ आजोबा ह्या टोपीतून दुसरे काही एक करतील” हा खात्रीचा पाढा न चुकता गोपुने म्हटला.

आजोबांनी टोपी पाहिली. सुस्कारा टाकला. पण हंऽऽ, हॅांऽऽ हॅूऽऽ , अस्सं तऽऽर “, पुटपुटणे सुरु झाले. कात्री फिरू लागली. सुई खाली-वर-खाली झाली. आजोबांनी झालेली वस्तु समोर घरून पाहिली.

आजोबा गोपुच्या घरी आले. “गोऽपु ! अशी हाक दिली. हाकेसरशी गोपु आला. आजोबांनी मोठा हातरुमाल समोर धरला. गोपुने तो पटकन ,” हात रुमाऽऽल!” म्हणत घेतला. दोस्तांना दाखवायला पळत गेला. झेंड्यासारखा फडकावत चालला. प्रत्येक खेळगड्यांनीही तो वाऱ्यावर फडकवत नाचवला. गोपूने काळजीपूर्वक घडी घालून सदऱ्याच्या वरच्या खिशात ‘फॅशन ’ करीत ठेवला. आता रुमाल गोपुला सोडेना की गोपु रुमालाला. गोपूने हातरुमालाचे पॅरशूट केले. हवेत फुगून ते डोलत डोलत खाली येऊ लागले की सर्व पोरे टाळ्या वाजवायचे. गावातल्या नदीवर खेळायला गेले की वाळूतले रंगीत दगड तर कधी चिंचा, चिंचेचा चिगुर तर कधी बोरं रुमालात येऊ लागली. पण हातरुमाल तो हात रुमालच की!

बरेच दिवस होऊन गेले. आईचे ,” अरे माझ्या ल्येका गोपाळा! अरे तो रुमाल आहे का चिंघी? होय रे? टाकून दे तो बाबा!” हे नेहमीचे म्हणून झाले. त्यावर गोपूचे ठरलेले उत्तरही देऊन झाले. रुमाल घेऊन स्वतः गोपुच आजोबांकडे गेला.

आजोबांनी रुमालाकडे पाहिले. “ हंऽऽ, हॅांऽऽ हॅूऽऽ, अस्स्ंऽऽ तर ” पुटपुटणे झाले. आजोबा उठले. कपडा बेतताना, कापताना उरलेले रंगी बेरंगी कपड्यांच्या तुकड्यांनी भरलेली पिशवी काढली. गोपू हे सर्व टक लावून पाहात होता. आजोबांनी तुकडे एकत्र गोळा करून रुमालासहित एका रंगीत तुकड्याने झाकला. सुईने त्या गोळ्यावर भराभर टाके घातले . थोड्या वेळाने चेंडू तयार झाला. गोपुला तो देत ते म्हणाले, “ हा घे चेंडू! खेळ आता भरपूर!”

छाती पुढे काढून ऐटीत, आजोबांनी दिलेला चेंडू आईला दाखवित गोपु म्हणाला, “बघ बघ आई! हातरुमालातून आजोबांनी हा गोल गुबगुबीत चेंडू करून दिला! बघ! “

गज्या- बाज्या, अरुण -मधु, बबन्या-गहिनी, पक्या-मक्या रोज चेंडू खेळू लागले. दिवस जात होते. एके दिवशी खेळता खेळता चेंडू जवळच्या नदीत पडला. वाहात गेला. कुणाला तो काढता आला नाही.

हिरमुसली होऊन गोपू आणि त्याची दोस्त कंपनी घरी गेली. आजोबाही म्हणाले , “गोपाळा, आता काही करता येणे शक्य नाही रे ! ” गोपुला काही सुचेना. पण शाळा, अभ्यास, घर खेळ ह्यात तो कसे तरी मन रमवू लागला.

दिवस पुढे सरकत होते.चेंडू हरवला होताच. काही दिवसांनी गोपुचे आजोबाही गेले.

गोपू आता हायस्कुलात होता. एके दिवशी त्या विषयाचे सर आले नव्हते. दुसरे सर आले. त्यांनी मुलांना “तुम्हाला आठवती आणि आवडती ती गोष्ट “ लिहायला सांगितली.

वही उघडली, गोपू लिहित गेला, “ हंऽऽ , हॅूऽऽ, अस्सं तर … पुषकळ आहे की हे करायला…. “. एकामागून एक , एकातून एक .. लिहित गेला, लिहित गेला ….

… आणि हीच सुंदर गोष्ट त्याने आपल्यासाठी लिहिली की हो!

{ एका ज्यू लोककथेचा संदर्भ. मी मराठीत रुपांतरीत केली. )