Category Archives: Commentary

Libraries

बाळपणापासून पुस्तके, वाचन ह्याचे बाळकडू आम्हा बहिण भावंडानांच नव्हे तर आमच्या बरोबरीच्या अनेकांना प्यायला मिळाले.त्यामुळे पुस्तके ओळखीची झाली होती.वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके वाचण्याचीआवड अमच्या घरातूनच पोसली गेली. जणू पुस्तकांचे घरच! त्याबरोबरीने ही आवड आमच्या गावच्या जनरल लायब्ररीने जोपासली, वाढवली. हायस्कूल मधील लायब्ररीत, त्या अकरा वर्षांच्या काळात फार थोडा वेळ गेलो असेन. पण जेव्हा एखादे शिक्षक गैरहजर असतील तर त्या वर्गाच्या मॅानिटरने लायब्ररीत जाऊन गोष्टींची निदान चाळीस एक तरी पुस्तके आणावीत. आणि ती आम्ही वाचावीत; अशी मोठी चांगली ‘वाचनीय’ पद्धत आमच्या हायस्कूल मध्ये होती. त्यामुळे स्वाध्याय मालेतील अनेक चांगल्या गोष्टींची पुस्तके, साने गुरुजींची, ना. धों. ताम्हणकरांची, पुस्तके वाचायला मिळत असत. त्यामुळे पुस्तकाविषयीची गोडी वाढत गेली.

त्यानंतर कॅालेजची भव्य लायब्ररी व तिथे बसून अभ्यासाला लागणारी किंवा इतरही चांगली प्रख्यात पुस्तके वाचण्याची सोय होती. कॅालेजच्या लायब्ररीतील ‘अभ्यास लायब्ररी’ चा विभाग रात्रीही उघडी असे! केव्हढी सोय होती ही अनेक विद्यार्थ्यांसाठी! हॅास्टेलच्या मुलांना ह्याचा खरा फायदा होत असे.
त्यानंतर औरंगाबादचे बळवंत वाचनालय, पुण्याचे नगरवाचन मंदिर, दादर येथील मुंबई मराठी ग्रंथालय ह्या वाचनालयांनीही चांगली, चांगली पुस्तके वाचायला देऊन वाचनाचे खूप लाड केले. आमचे सर्वच दिवस पुस्तकांचे दिवस झाल्यासारखे सरकत होते.

मनांत कुठेतरी जाऊन पडलेले हे विचार आताच वर येण्याचे कारण काय? तर निमित्त सतीशने WhatsApp वर पाठवलेली ब्रिटिश लायब्ररीचा व्हिडिओ! तो पाहिल्यावर पुन्हा पुस्तकांच्या ‘विश्वात्मके देवा’च्या जगात गेल्याचा अनुभव आला.

मी थक्क झालो ही लायब्ररी व तिथे चालणारे काम पाहून. प्रकाशित होणारे एकूण एक पुस्तके , किंबहुना जे काही प्रसिद्ध होते ते सर्व काही – मासिके, वर्तमानपत्रे, जाहिराती, जतन करीत आहे हे ऐकून व पाहिल्यावर किती मोठे व ऐतिहासिक महत्वाचे कार्य ही लायब्ररी करीत आहे ह्याची थोडी फार कल्पना आली. त्या लायब्ररीची- ब्रिटिश लायब्ररीची अत्याधुनिक उत्तुंग इमारत तिथली सर्व कामे यंत्रमानव – Robots करीत असलेले पाहिल्यावर माझ्यासारखा सामान्य वाचक थक्क ,विस्मयचकित ,अचंबित होणार नाही तर काय! इंग्लंड हा देश तसा टिचभर , त्या लहानशा देशात , लंडनसारख्या गर्दीने गजबजाट झालेल्या महानगरात एव्हढी जागा मिळणे अशक्यच. त्यामुळे त्याच्या आजुबाजुच्या गावातील जमीनीवर ही प्रचंड ज्ञानवास्तु उभी केली आहे.

कोणत्याही गावाचे,राज्याचे, किंवा देशाचे खरे वैभव तिथली ग्रंथसंग्रहालये व शिक्षणसंस्था ह्याच असतात. ह्या व्हिडिओखाली असलेल्या कॅामेन्टसही वाचनीय आहेत. त्याही वाचाव्यात.

ही लायब्ररी पाहिल्यावर व तेथील बहुतेक सर्व काम रोबॅाटस् करतात वगैरे विस्मय चकित करणारी यंत्रणा पाहिल्यावर मला आमच्या वाचनाच्या गावातली जनरल लायब्ररी , बेलमॅान्टची लायब्ररी , मॅरिएटातली माउन्टन व्ह्यू लायब्ररी,दिसेनाशा होऊन , अंधुक पुसट होऊ लागल्या. पण संत ज्ञानेश्वरांनी मला पुन्हा जमीनीवर आणले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “ चालायचे म्हणजे फक्त राजहंसानेच डौलदार चालायचे? त्याचे चालणे पाहिल्यावर इतर किडा मुंगीनी – काई चालू नाई?”ही ओवी लक्षांत आल्यावर, मी पाहिलेल्या , तिथे जाऊन वाचन केलेल्या आमच्या गावचे ज्ञानपीठच अशी जनरल लायब्ररी, कॅालेजची त्यावेळी मोठी भव्य वाटणारी लायब्ररी, बेलमॅान्ट, सॅन कार्लोस, रेडवुडसिटी,रेडवुड शोअर्स, मॅरिएटातील माउन्टन व्ह्यू, ह्या लायब्ररींसकट सर्व लहान मोठ्या लायब्ररी पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या.

ब्रिटिश लायब्ररीशी संबंध, सतीश बंगलोरला असतांना आला. तिथे काढलेल्या कार्डाचा फायदा पुण्याला आल्यावर झाला. कारण त्यावेळी पुण्यातील ब्रिटिश लायब्ररीमध्ये नवीन सभासद घेणे थांबले होते. पण बंगलोरच्या कार्डामुळे मी नवा सभासद मानला गेलो नाही. ह्या लायब्ररीचा फायदा मी घेतलाच पण माझी नात मृण्मयीनेही घेतला!

‘आमच्या वाचनाचे गावात ’ असतांना पुणे विद्यापीठाची लायब्ररी, भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन संस्थेची, नगर वाचन मंदिर ही नावे एकत होतो. त्यांत ब्रिटिश लायब्ररीचे नांवही पुढे असे. तिथले सभासदत्व मिळणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात होती. त्या ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झाल्यामुळे मनातल्या मनांत माझी कॅालर ताठ होत असे.

सांगायची गंमत म्हणजे तिचे ग्रंथपाल हे आमच्या नागवंशी चाळीत राहाणाऱ्या डॅा. जोशी ह्यांचे भाऊ किंवा त्यांचे थोरले चिरंजीव असावेत. म्हणजे आमच्या बरोबरीचे विष्णु जोशी ,मन्या जोशी ह्यांचे सगळ्यांत मोठे भाऊ किंवा काका -विठ्ठल जोशी हे होते! पण ते निवृत्त झाल्यावर, त्यांच्या निवृत्तीची बातमी वाचल्यावर हे कळले !


बघा! एका जागतिक प्रसिद्ध लायब्ररीच्या ‘ लिंक’मुळे पुस्तकांच्या व लहान मोठ्या वाचनालयांच्या ‘आठवणींच्या कड्यांची एक लांबलचक साखळी ‘ होत गेली ! हा लाभही नसे थोडका.

पुस्तकांच्या गराड्यांत

बेलमाँट

गेले काही दिवस पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलो आहे. आजपर्यंत पाचसहा लायब्रऱ्यात जाऊन बराच काळ तिथे काढला. सर्व ठिकाणी अनेक चांगल्या पुस्तकांच्या नंदनवनात वाचक म्हणून वावरत होतो.

सध्या बेलमॅान्टच्या लायब्ररीत मात्र मी व्हॅालन्टियर म्हणून जातो. म्हणूनच सुरुवातीला लिहिले की पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलोआहे.

पुस्तके मासिके वाचण्यासाठी माझ्या लायब्ररींच्या भेटी जनरल लायब्ररीपासून सुरुवात झाली. त्यानंतर वल्लभदास वालजी वाचनालय, बळवंत वाचनालय,नवजीवन ग्रंथालय, ते मुंबई मराठी ग्रंथालय – विशेषतः तिथल्या संदर्भ ग्रंथालयापर्यंत पर्यटन झाले. . त्यानंतर माउन्टन व्हयू लायब्ररी, मर्चंटस् वॅाक, रेडवुड शोअर्स, सॅन कार्लोस रेडवुडसिटी ह्या लायब्रऱ्यात सुद्धा जाऊन आलो. सॅन कार्लोस लायब्ररीपासून माझे व्हॅालंन्टियरचे दिवस सुरू झाले.

पण आज जास्त करून लिहिणार आहे ते, विशेषतः बेलमॅान्टच्या वाचनालयाशी संबंधित आहे. कारण सध्या मी बेलमॅान्टच्या लायब्ररीत व्हॅालन्टियर म्हणून जात आहे. तिथे देणगी म्हणून येणाऱ्या पुस्तकांशी माझा सतत संबंध येतो.

निरनिराळी, अनेक विषयांवरची, कादंबऱ्या, आठवणींची, चरित्रे, आत्मचरित्रे, अभिजात (classic), काव्यसंग्रह , इतिहासाची, उत्कृष्ठ छायाचित्रांची, आर्थिक राजकीय विषयांवरची किती किती, अनेक असंख्य पुस्तके समोर येत असतात.

काही पुस्तके अगोदर वाचली असल्यामुळे ओळखीची असतात. त्यातलीही काही पुस्तके तर केव्हा कुठे वाचली कोणी दिली ह्यांच्याही आठवणी जाग्या करतात. ह्यातच काही योगायोगांचीही भर पडते. थोरल्या मुलाने अगोदर केव्हा तरी – केव्हा तरी नाही- दोन तीन दिवसांपूर्वी विचारले असते ,” बाबा सध्या अचानक ज्योतिषावरची पुस्तके दिसायला लागलीत.तुमच्या पाहण्यात आलीत का?” त्यावर मी नाही म्हणालो. इतक्यात तरी काही दिसली नाहीत.” असे म्हणालो. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, चिनी ज्योतिष, अंकशास्त्रावर आधारित भविष्याची, तुमची जन्मतारीख आणि भविष्य अशी पुस्तके आली की! योगायोग म्हणायचा की चमत्कार हा प्रश्न पडला.

फेब्रुवारीत धाकटा मुलगा म्हणाला की ते सगळे एप्रिलमध्ये युरोपातील ॲमस्टरडॅम लंडन पॅरीस ला जाणार आहेत. दोन चार दिवस माझ्या ते लक्षात राहिले. नंतर विसरलो. ऐका बरं का आता. मी लायब्ररीतल्या कॅाम्प्युटरवर पाहिले. स्टीव्ह रीकची पुस्तके दिसली नाहीत. एक आढळले. पण ते दुसऱ्या गावातल्या लायब्ररीत होते. माझ्यासाठी राखून ठेवा असे नोंदवून ठेवले. दोन दिवस गेले. तिसरे दिवशी लंडन का पॅरिसवरचे स्टीव्ह रीकचे पुस्तक समोर आले. अगदी समोर. वा! हे जाऊ द्या. मी लायब्ररीतल्या बाईंनाही सांगून ठेवले होते. दोन तीन दिवसांनी त्यांनी मला बोलावलेआणि नेदर्लॅंडचे पुस्तक हातात ठेवले. “ पण तुला पाहिजे त्या ॲाथरचे नाही .” मी काय बोलणार? योगायोग की चमत्कार ? हा नेहमीचा प्र्शन पुन्हा पडला!

पुस्तके देणारे बरेच लोक पुस्तके देतात ती इतक्या चांगल्या स्थितीत असतात की आताच दुकानातून आणली आहेत! अनेक पुस्तके खाऊन पिऊन सुखी अशी असतात. तर काही जिथे जागा सापडली तिथे बसून, जेव्हा मिळाला वेळ तेव्हा वाचलीअशी असतात. कव्हरचा कोपरा फाटलेला , नाहीतर कान पिरगळून ठेवावा तशी आतली बऱ्याच पानांचे कोपरे खुणेसाठी दुमडून ठेवलेली, अशा वेषांतही येतात. काही मात्र बघवत नाहीत अशा रुपाने येतात. पण अशा अवस्थेतील, फारच म्हणजे अगदी फारच थोडी असतात.

पुस्तके ज्या पद्धतीने दिली जातात ती पाहिल्यावर देणगी दार आणि त्यांची घरे कशी असतील ह्याचा ढोबळ अंदाज येतो. काही पुस्तके बऱ्याच वर्षांपूर्वी प्रकाशित झाली असतात तरी ती नुकतीच दुकानातून आणली आहेत असे वाटते.काहीजण कागदी पिशव्या भरून पुस्तके देतात. पण इतकी व्यवस्थित लावून रचलेली की ती पिशवी रिकामी करू नये; पिशवीकडे पाहातच राहावे असे वाटते. साहजिकच पुस्तके बाहेर काढताना मीही ती काळजीपूर्वक काढून टेबलावर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

काही वेळा पुस्तके खोक्यांत भरून येतात. पहिले दोन थर आखीव रेखीव. मग वरच्या थरात जशी बसतील, ठेवली जातील तशी भरलेली ! खोकी आपले दोन्ही हात वर करून उभे ! काही पुस्तके तर धान्याची पोती रिकामी करावी तशी ओतलेली. सुगीच्या धान्याची रासच! हां त्यामुळे मोऽठ्ठ्या, खोल पिपातली पुस्तके उचलून घ्यायला सोपे जाते हे मात्र खरे.

एक दोनदा तर दोन लहान मुले,पुस्तकांनी भरलेले आपले दोन्ही हात छातीशी धरून “कुठे ठेवायची ?” विचारत कामाच्या खोलीत आली ! लहान मुलांची पुस्तके होती. त्या मुलांइतकीच पुस्तके गोड की पुस्तकांपेक्षाही मुले ? ह्याचे उत्तर शोधण्याची गरजच नव्हती. दोन्ही गोड! किती पुस्तके आणि ती देणारेही किती!

आठवणी जाग्या करणारी पुस्तकेही समोर येतात. पूर्वी मुलाने ,” हे वाचा” म्हणून दिलेले Little Prince दिसल्यावर माउन्टन व्ह्यु नावाच्या लायब्ररीची आठवण येते. जिथे बसून वाचत असे ती कोचाची खुर्ची, तिच्या बाजूला खाली ठेवलेली, बरोबर घेतलेली वहीची पिशवी…. असेच आजही बेलमॅान्टच्या लायब्ररीत टाईम, न्युयॅार्क संडे मॅगझिन, रिडर्स डायजेस्ट,न्यूयॅार्कर वाचताना वही बॅालपेन असलेली पिशवी जवळच्या टेबलावर ठेवलेली असते!

मध्यंतरी धाकट्या मुलाने दिलेले बेंजॅमिन फ्रॅन्कलिनचे, आयझॅकसनने लिहिले चरित्र आले तर एकदा त्यानेच दिलेले लॅारा हिल्डनबर्डचे Unbroken भेटीला आले. माझ्या दोन्ही नातवांच्या शेल्फातील चाळलेले The Catcher in the Rye आणि Of the Mice and Man ही पुस्तके हातात आल्यावर त्यांची ती विशेष खोली, तिथली,त्यांच्या पुस्तकांनी भरलेली शेल्फंही दिसली. इकडे अगदी पहिल्यांदा आलो तेव्हा मुलाने आणून दिलेले Ian Randची सर्वकालीन श्रेष्ठ कादंबरी Fountain Head काही दिवसांपूर्वी दिसले ! आणि त्याच लेखिकेचे Anthem ही ! धाकट्याने दिलेले Confidence Men सुद्धा मध्यंतरी अचानक भेटून गेले.

मुलीचे आवडते Little Women हे अभिजात वाड•मयाचे पुस्तक आणि तिला आवडलेले व नातीने मला दिलेले Anne of Green Gables ही दोन्ही पुस्तके इतक्या विविध, सुंदर आवृत्यांतून येत असतात की लग्नसमारंभाला नटून थटून जाणाऱ्या सुंदर स्त्रियांचा घोळकाच जमलाय! हाच सन्मान शेक्सपिअर , चार्ल्स डिकन्स,शेरलॅाक होम्स आणि लिटल प्रिन्स , हॅरी पॅाटरला, आणि ॲगाथा ख्रिस्तीलाही मिळत असतो. उदाहरणादाखल म्हणून सन्मानीयांची ही मोजकीच नावे सांगितली.

लहान मुलांच्या पुस्तकांनाही देखण्या, जरतारी आवृत्यांतून असेच गौरवले जाते. त्यापैकी काही ठळक नावे सांगायची तर C.S. Lewis ह्यांचे प्रख्यात Chronicles of Narnia , Signature Classics of C.S. Lewis. तसेच E.B. White ची Charlottes Web , Stuart Little ही पुस्तके, Alice in Wonderland, Sleeping Beauty , The Beauty and The Beast, ह्या पुस्तकांनाही असाच मान मिळतो.

अगदी अलिकडच्या योगायोगाची कहाणी; मी पूर्वी वाचलेले Dr. Andrew Weil चे पुस्तक अचानक प्रकट झाले. अरे वा म्हणालो. पुन्हा परवा त्याच डॅाक्टरांचे Natural Health Natural Medicine हे पुस्तक दिसले. म्हटलं आता मात्र हे मुलांना कळवायलाच पाहिजे.

मघाशी मी वेगवेगळ्या रुपातील आवृत्यांतून येणाऱ्या पुस्तकांच्या यादीतील आणखी एका मानकऱ्याचे नाव सांगायचे राहिले. ते म्हणजे Hermann Hess चे Siddhartha ! हे सुद्धा सार्वकालीन लोकप्रिय पुस्तक आहे. मागच्याच वर्षी मला हे मुलाने दिले होते. मी वाचले. छान लिहिलेय. आपल्या तत्वज्ञानासंबंधी व तत्वज्ञाविषयी लिहिलेले, तेही परदेशी लेखकाने ह्याचे एक विशेष अप्रूप असते. ह्याने बरेच समजून उमजून लिहिले आहे. सहा महिन्यांपूर्वी, मुलांनी वाचलेले व मला,” बाबा हे वाचा तुम्हालाही समजेल,आवडेल असे पुस्तक आहे “ म्हणत दिलेले Homosepiens हे गाजलेले पुस्तक परवाच दोन तीन वेळा शेकहॅन्ड करून गेले. माझ्याकडे असलेली लायब्ररीविषयी, लायब्ररी हेच मुख्य पात्र असलेली The Library Book किंवा Troublewater Creeks Book-woman अशी पुस्तके पाहिली की लायब्ररीत लायब्रऱ्या आल्या असे वाटू लागते !

काही वेळा मी ह्या ना त्या पुस्तकांचा “ परवा हे आले होते आणि ते सुद्धा, बरं का!” असे मुलांना सांगतो. पण माझ्या आवडीच्या जेम्स हेरियटचे एकही पुस्तक आतापर्यंत तरी ह्या गराड्यात आलेले, थांबलेले पाहिले नाही! येईल, योग असेल तेव्हा ती चारीही पुस्तके येतील. !

पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या गराड्यांत , किंवा प्रसिद्धीच्या सतत झोतांत असलेल्या लोकप्रिय नामवंतांना आपल्या चहात्यांची गर्दी,गराडा हवा हवासा वाटतो. पुस्तकप्रिय वाचकांनाही पुस्तकांच्या गर्दीगडबडीचा गराडाही हवा हवासा वाटत असतो ! नाहीतर आजही लायब्ररीत इतके वाचक-लोक आले असते का?

यशस्वी लोकांची मनोगते


मागच्या लेखांत विविध क्षेत्रातील काही नामवंत काय वाचतात , त्यांच्या आवडीची पुस्तके ह्या संबंधी वाचले. टिमोथी फेरिसने शंभराच्यावर नामवंताना बरेच प्रश्न विचारले होते. त्यामध्ये त्यांची आवडीची पुस्तके व ती का आवडली, तसेच त्यांना जर त्यांच्यासाठी स्वतंत्र मोठा जाहिरात फलक दिला तर त्यावर काय लिहाल ? त्यांची उत्तम गुंतवणूक कोणती? नव्या पदवीधारकांना, तरुणांना काय सांगाल? असेही काही प्रश्न विचारले होते. त्यावर ह्या मोठ्या यशस्वी लोकांनी काय सांगितले तेही आपण आज वाचणार आहोत.


नवल रविकांत हे मूळचे हिंदुस्थानचे पण ते बऱ्याच काळापासून अमेरिकेतच आहेत. तेही यशस्वी गुंतवणुकदार आहेत. त्यांनी सुमारे दोनशेच्यावर कंपन्यांत, त्या अगदी बाल्यावस्थेत असल्यापासून,गुंतवणुक केली आहे. त्यापैकी काही कंपन्यांची नावे सांगायची तर Opendoor, Postmates , Uber, FourSquare , Twitter, Snapchat अशी सांगावी लागतील.


नवल रविकांत ह्यांची उत्तम गुंतवणूक म्हणजे पुस्तके !पुस्तकांचे, वाचनाचे महत्व सांगताना ते म्हणतात की, , “ वाचनाची आवड असणे आणि ती जोपासणे म्हणजेच वाचन हे मोठी शक्ती आहे. वाचन तुम्हाला सामर्थ्यवान बनवते. मी शाळेत असल्यापासून “ आवश्यक वाचन” (Required Reading) पुस्तकेच नाही तर इतरही अनेक पुस्तके वाचत असे.कधी काही एक उद्देशाने तर बरीच सहजगत्याही वाचली. आज आपल्या हाताशी पुस्तकांचा महासागर आहे. पण ती वाचण्याची इच्छा, उर्मी हवी. वाचनामुळे आपण निश्चित शिकत असतो. त्या साठी इच्छा तळमळ हवी. ती तुमच्यामध्ये येऊ द्या. वाचनामुळे तुम्हाला काय हवे, काय करावे, कोण व्हावे ह्याची जाणीव होते. तशी ती होऊ द्या. वाचा.”


कॅालेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या तरुणांना काय सांगाल ह्यावर ते म्हणाले,” तुम्हाला जे करावेसे वाटते , मनापासून तीव्रतेने वाटते ते करा. पण ते करताना एक गोष्ट सतत ध्यानात ठेवा. कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. वाट पाहाण्याची शक्ती असू द्या.जे करायचे ते करताना चिडचिड , चिंतेने अस्वस्थ होऊन करू नका.” “ बातम्या , कुरकुर करणारे, संतापी प्रक्षुब्ध लोकांकडे दुर्लक्ष करा, दूर राहा” असेही ते सांगतात. हे सांगत असतानाच कोणतीही अनैतिक, अनीतीची गोष्ट कधीच करू नका, तसे वागूही नका.” असेही ते बजावतात.


ह्याच प्रश्नाला उत्तर देताना प्रख्यात पाकशास्त्रातील तज्ञ आणि तिच्या पाककृतींच्या पुस्तकांमुळे नावारुपास आलेली सेमीन नुसरत सल्ला देते की,” प्रसंगी गोंधळून जाल , शंका,संशयांत पडाल तेव्हा तुमच्यामधील दयाळूपणा, करूणा आणि चांगुलपणाचा आधार घ्या. त्यांनाच प्राधान्य द्या.”


Floodgates चा संस्थापक माईक मेपल्सला सांगितले की तुम्हाला तुमचा स्वतंत्र मोठा जाहिरात फलक दिला तर तियावर काय लिहाल? त्यावर त्याने दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे “ सचोटीच्या मार्गाने जा. तुम्ही कधीच रस्ता चुकणार नाहीत!”


तर ह्याच प्रश्नाला उत्तर देताना SalesForce ह्या प्रख्यात कंपनीचा अध्यक्ष आणि मुख्य कार्याधिकारी मार्क बेन्यॅाफ Marc Benioff म्हणतो , “बालवाडी ते १२ वी एक शाळा दत्तक घ्या” अर्थात हे ज्यांना सहज शक्य आहे अशा धनवंतांना तो सांगत असावा. पण उदात्त, आणि समाजाला उपयोगी असा सल्ला आहे ह्यात शंका नाही. विशेष म्हणजे ‘ आधी केले मग सांगितले’ असा तो माणूस आहे.


जिचा MarieTV कार्यक्रम हा खूप लोकप्रिय आहे, तसेच प्रख्यात B-School ची संस्थापिका मेरी फर्लियोने सांगितले की तिची आई नेहमी सांगत असे तेच वाक्य मी वचन म्हणून माझ्या जाहिरात फलकावर लिहिन. “कोणत्याही अडी अडचणीच्या वेळी , बिकट न सुटणारा प्रश्न, संकट आले की आई म्हणायची ,” Everything is ‘figure-out-able’ ! “ ती पुढे म्हणते घरांतील आम्हा सर्वांसाठी तिचे हे सांगणे मार्गदर्शक झाले आहे. कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतोच! साधे, रोजचे वाटणारे हे बोल किती आश्वासक धीर देणारे आहेत. तिच्या आईचा ‘फिगरआऊटेबल’ शब्द वाचला तेव्हा मला आपण गमतीने किंवा सहजही ‘ परवडेबल’ म्हणतो त्याची आठवण झाली.


मागील लेखात काईल मेनर्डविषयी(Kyle Maynard) विषयी वाचले. खास त्याच्यासाठीच जर मोठा जाहिरात फलक मिळाला तर तो म्हणतो की त्यावर त्याचा नौदलातील श्रेष्ठ वीरपदक मिळवणारा मित्र Richard Machowicz म्हणत असे तेच, कुणातही वीरश्री निर्माण करणारे, वचन मी लिहिन. ” Not Dead, Can’t Quit !” “मारता मारता मरेतों लढेन “ किंवा मराठी वीर सरदार दत्ताजी शिंदें ह्यांनी पानिपतच्या रणभूमीवर अखेरच्या क्षणी सुद्धा जे उत्तर दिले त्या “ बचेंगे तो और भी लढेंगे” ह्या वीरवचनाची आठवण करून देणारे हे स्फूर्तिदायक वचन आहे !


काही नामवंतांनी ते मोठ्या फलकावर काय ते लिहितील हे सांगितले. पण आपल्याला बरेच वेळा मोठमोठ्या फलकांचा त्रास वाटतो; उबगही येतो. हे दोन्ही बाजूंचा देखावा , दृश्य, पाह्यला अडथळा आणणारे, बटबटीत, वाहन चालवणाऱ्यांचे लक्ष विचलित करणारे फलक नको वाटतात. काढून टाकावेत असे वाटते. अगदी असेच, लेखक,व चित्रपट कथा पटकथा लेखक, जाहिराती उत्तम लिहिणाऱ्या Steve Pressfield ह्यालाही वाटते. तो म्हणतो,” अगोदर मला असा फलक कुणी देणार नाही. दिला तरी तो मी घेणार नाही.उलट तो मी ओढून खाली पाडून टाकेन. दुसरे ही असे फलक मी पाडून टाकेन.”


पण ह्यापेक्षाही आणखी काही प्रेरक विचार वाचायला मिळतील. “ मैदान सोडून पळून न जाणे हाच यश आणि अपयश ह्यातील फरक आहे” किंवा प्रसिद्ध टेनिसपटू विजेती मारिया शारापोहव्हा जेव्हा ,” पराभवानंतर जितका विचार करते तेव्हा तितका विजयानंतर होत नाही.” हे सुभाषितासारखे बोलून जाते तेव्हा आपणही त्यावर विचार करू लागतो. निदान,” खरे आहे.” इतके तरी म्हणतोच..


टिमोथी फेरिसच्या The Tribe of Mentors मध्ये Affirm ह्या कंपनीचा सह संस्थापक मॅक्स लेव्हशिन Max Levchin , ; न्यूयॅार्क टाईम्सचा सतत आठ वेळा सर्वाधिक खप Best Seller असलेला लेखक Neil Strauss; हॅालिवुडमधील नट व एकपात्री विनोद वीर, Joel Mettale ; नट दिग्दर्शक Ben Stiller ; आणि आणखीही बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींनी आपले विचार मांडले आहेत. सर्वांचा परामर्श घेणे शक्य नाही.


“ तुमची सर्वांत उत्तम गुंतवणुक कोणती?” ह्या प्रश्नाला Mike Maples ह्याने दिलेल्या, सर्वांना पुन्हा अंतर्मुख करणाऱ्या, उत्तराने ह्या लेखाचा समारोप करतो. तो सांगतो,” मी माझ्या मुलांवर ठेवलेला विश्वास !” “Believing in my Kids”

वेगळ्या जमातीची आवडीची पुस्तके

आयुष्याची वाटचाल कशी करावी, “जगावे कसे ? तर उत्तम” , हे शिकवणारे मार्गदर्शक, धडपडणाऱ्यांना हात देऊन उभे करणारे शिक्षक किंवा अनुभवी उद्योजक; ‘तान्ह्या’ कंपन्यांत भांडवल गुंतवून त्यांना वाढवणारे गुंतवणुकदार; किंवा समाजातील गुणी मुलांमुलींसाठी मदत करणारे जगप्रसिद्ध खेळाडू, गायक, नट, संस्था; किंवा कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे तर ‘पाठीवर थाप मारून फक्त ‘लढ’ म्हणत निश्चय बळकट करणारे, अशा विविध रुपाने अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक मददगारांची ही विशेष जमात आहे. हे इतक्या तऱ्हेने सांगण्याचे कारण म्हणजे मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात टिमोथी फेरिसचे The Tribe of Mentors हे पुस्तक वाचनात आले.


पुस्तकाविषयी तर जमेल तेव्हढे सांगावेसे वाटते. पण त्या अगोदर हा लेखक कोण आहे तेही समजून घेणे प्राप्त आहे.
टिमोथी फेरिस हा कंपन्या बाल्यावस्थेत असताना त्यांच्यात पैसा गुंतवणारा कुशल गुंतवणुकदार आहे. कितीही चांगले, वेगळे,व भविष्यकाळ असलेले उत्पादन असो; त्याची संकल्पना ज्यांना सुचली ते बुद्धिमान प्रतिभाशाली असोत, पुरेसे भांडवल नसेल तर गाडे अडते. अशावेळी, कंपनी आणि उत्पादनाविषयी थोडीफार खात्री असणारे गुंतवणुकदार पुढे येतात. आपला पैसा त्यात गुंतवतात. अशा angel investor (पोषणकर्त्यां) पैकी टिमोथी फेरिस आहे. त्याशिवाय तो लेखकही आहे. तो पुढे आला 4-Hour Week ह्या पुस्तकामुळे. त्यानंतर त्याची अशीच 4-Hour Body आणि 4-Hour Chef ही पुस्तके प्रकाशित झाली.


फेरिसने StumbleUpon, Evernote आणि कितीतरी अनेक तंत्रज्ञान कंपन्यांत त्यांच्या प्राथमिक अवस्थेपासून गुंतवणुक केलेली आहे. उबेर कंपनीचा तो सल्लागारही आहे. लोकांना तो माहित आहे ते त्याच्या पॅाडकास्टमुळे. त्यातअनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींच्या मुलाखती असतात. या बरोबरच त्याने ‘ऐकण्याची’ Audio (श्रवण)पुस्तकेही प्रकाशित केली आहेत.


ह्या टिमोथी फेरीसने सुमारे शंभराच्यावर नामवंतांना अकरा प्रश्न पाठवले व त्यांची उत्तरे देण्याची विनंती केली. बहुतेक नामवंत हे तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. तसेच काही गायक, वादक,लेखक, प्रख्यात बल्लवाचार्य, खेळाडू, अपंगही आहेत.
ह्या ख्यातनामांनी दिलेली उत्तरे बारावी आणि कॅालेज आटपून नुकतेच बाहेरच्या वास्तव जगात प्रवेश करणाऱ्या तरुणांना, उद्योजक व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्या धाडसी व्यक्तींना आणि इतरांनाही उपयुक्त ठरतील. म्हणूनही हे पुस्तक वाचनीय आहे.


माझ्यासारख्या सामान्य वाचकाला ही मोठी माणसे कोणती पुस्तके वाचतात, आपण वाचलेली किंवा वाचू अशी काही पुस्तके आहेत का ही माहिती मिळते. निदान नविन किंवा वेगळ्या पुस्तकांची माहिती होते. हा लाभ मोठा आहे. कारण फेरिसने त्या सगळ्यांना “ तुम्ही आतापर्यंत सर्वात जास्त कोणते पुस्तक /पुस्तके भेट दिली आहेत? आणि का? किंवा कोणत्या एका किंवा तीन पुस्तकांचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव पडला आहे? “ हा पहिला प्रश्न विचारलाय. “तुमची सर्वात महत्वाची गुंतवणुक कोणती?” सर्वांत आवडते किंवा संस्मरणीय अपयश कोणते?”किंवा आपण कधी कुठे कमी पडलो असे वाटले का?” “ ताण तणाव घालवण्यासाठी तुम्ही काय करता?” “ तुम्हाला एक मोठा प्रसिद्धी-फलक दिला व त्यावर लिहिण्याचे स्वातंत्र्य दिले तर काय लिहाल?” ह्या आशयाचे व इतरही दुसरे काही प्रश्न त्याने विचारले आहेत.


सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे नाही. ज्या प्रश्नांची उत्तरे द्यावी वाटतील ती द्यावी हा खुलासाही त्याने केला होता.
सर्वांनी दिलेल्या सर्व उत्तरांचा परामर्श घेता येणे शक्य नाही. काही प्रश्न, त्यांची काही व्यक्तींनी दिलेली उत्तरे ह्यांचा उल्लेख करावा असे ठरवले आहे. बघू या , कितपत जमते ते.


स्टीव्हन प्रेसफिल्ड Steven Pressfield ह्याने लेखनाच्या- ‘जाहिराती, पटकथा, कथा-कादंबऱ्या ,ललितेतर , आणि प्रेरक पुस्तके – पंचक्रोशीत’ आपला चांगला ठसा उमटवला आहे.


त्याची The Legend of Bagger Vance ( ह्यावर ह्याच नावाचा पाहण्याजोगा उत्तम सिनेमाही निघाला आहे.ह् सिनेमात विल्स स्मिथ, मॅट डॅमन सारखे नामवंत नट आहेत.), Gates of Fire , The Virtues of War ही त्याची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्याच्या कथा पटकथा असलेले चित्रपट सांगायचे तर Above theLaw, King Kong Lives, Joshua Tree ( Army of One) ही काही नावे सांगता येतील. Pressfield त्याच्या आवडत्या पुस्तकाविषयी म्हणतो की,” त्याच्यावर खरा आणि अत्यंत प्रभाव पाडणारे पुस्तक फार जाडजूड आणि प्रचंड आहे. रक्तरंजित घडामोडींनी ते भरलेले आहे. पुस्तकाचे नाव “ Thucydides’s History of Peloponnesian War “ प्रेसफिल्ड पुढे सांगतो की स्वतः लेखकच पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचकांना सावध करतो “ गंमतीसाठी, करमणुक करणारे हे पुस्तक नाही.आणि वाचायलाही सोपे जाणारे नाही.” पण प्रेसफिल्ड सांगतो की पुस्तक कालातीत, त्रिकालाबाधित सत्यांनी भरलेले आहे. लोकशाहीतील सर्वांनी हे पुस्तक वाचायला हवे असेही तो आवर्जुन सांगतो. तोही म्हणतो की मनोरंजनासाठी हे पुस्तक नाही. पण उत्तुंग तितकेच सखोल वैचारिक असे काही वाचायचे असेल तर हे पुस्तक वाचायला हवे.


War of Art, A Man at Arms, Gates of Fire, Tides of War( अथेन्स आणि स्पार्टनस् मध्ये २७ वर्षे चाललेल्या युद्धाविषयी) ही त्याने लिहिलेली काही पुस्तके. त्याच्या बहुतेक पुस्तकांच्या नावात ‘युद्ध’ आहेच. युद्धाविषयी व त्या संकल्पनेविषयी त्याला आकर्षण दिसते!


Marie Forleo मरी फर्लियो ही सुरुवातीला “ रेस्टॅार्ंट, पब मध्ये ड्रिंक्स देणे, वेटर , जॅनिटर अशी कामे करत करत , नंतर व्यवसाय विद्येची पदवीधर झाली. तिने आपले on line बी- स्कूल सुरू केले. लघु उद्योग करू इच्छिणाऱ्या व लघु उद्योजक असलेल्यांनाही तिच्या बी- स्कूल मध्ये त्यासंबंधी मार्गदर्शन व शिक्षण दिले जाते. लघुउद्योग वाढवावा कसा ह्याचेही प्रशिक्षण तिच्या संस्थेत दिले जाते. १४८ देशातील ७०,००० लघु उद्योजक तिच्या बी- स्कूल मधून प्रशिक्षित होऊन उद्योग व्यवसायिक झाले आहेत.


मरी फर्लियो लेखिका आहेच त्या शिवाय ती हिप हॅाप नृत्यातही पारंगत आहे. MTV वर तिने बसविलेली बरीच नृत्ये सादर झाली आहेत. तिची स्वतःची मरी फर्लिओ इंटरनॅशनल कंपनीही आहे. १०० झपाट्याने उत्कर्ष होणाऱ्या कंपन्यांच्या यादीत तसेच आघाडीच्या पन्नास महिला उद्योजकांच्या कंपन्यातही तिच्या कंपन्यांचा समावेश आहे. हार्पर्स बझार मासिकाने तिचा “स्वतःच्या बळावर झालेली कोट्याधीश” असा उल्लेख केला आहे. फोर्ब्ज मासिकाने “ उद्योग-व्यावसायिकांसाठी असलेल्या सर्वोत्कृष्ठ १०० websites “मध्ये मरी फर्लियोच्या वेबसाईटची गणना केली आहे. आपण आताच ज्याच्या विषयी वाचले त्या स्टिव्ह प्रेसफिल्डचे “War of Art हे तिचे आवडते पुस्तक आहे . “ ती म्हणते, “हे पुस्तक वाचकाला आपल्या न्यूनगंडातून किंवा भयगंडातून बाहेर काढते. त्याच्यात आत्मविश्वास देणारे आणि वाढवणारे पुस्तक आहे.त्याच्या मनातली मरगळ दूर करणारे ते पुस्तक आहे.शिवाय पुस्तक कुठल्याही पानापासून वाचले तरी चालते.वाचकाला प्रत्येक पानातून उत्साहाची उभारी येते.”


कायल मेनर्ड जन्मापासून दोन्ही हातांनी आणि पायांनी अपंग आहे. हात कोपरापर्यंतही नव्हते. पायही अर्धेच होते. गुडघेही दिसू नयेत इतकेच. चौरंगी अपंग म्हणतात तसा तो आहे. तो कृत्रिम हात आणि पाय वापरत नाही. आहेत त्या हाता पायांनी तो सर्व व्यवहार, हालचाली करतो. इतकेच काय कुणाचीही मदत न घेता त्याने टॅन्झानियातील किलिमॅंन्जॅरो पर्वत आणि अर्जेन्टिनातील Aconcagua अकॅांनकाग्वा पर्वत तो चढून गेला आहे. ह्या ठिकाणी किलिमॅंन्जॅरो १९३४१ फूट तर अकॅांनकाग्वा हा २२८४१ फूट उंच आहे हे अवश्य लक्षात घ्यावे. खऱ्या अर्थाने कायल मेनर्ड स्वावलंबी आहे. तो म्हणतो ,” कुणाचीही मदत घ्यायची नाही हे मी आणि घरातल्या सगळ्यांनी पहिल्यापासून ठरवले होते .” त्याच्या आवडत्या पुस्तकाविषयी तो सांगतो ,” फ्रॅन्क ह्युबर्टचे Dune ; अल्बेर केम्यु Albert Camus चे The Stranger ( अल्बेर केम्यु किंवा जॅान पॅाल सार्ट्रा ह्यांची पुस्तके वाचणे आणि ती आवडणे हे विशेष वाचकांची ओळख मानली जाते- हे मेनर्ड म्हणत नाही😀.) ) आणि The Hero With a Thousand Faces हे जोसेफ कॅम्पबेलचे ही तीन पुस्तके माझ्या खास आवडीची आहेत.” Dunes च्या पुस्तकांची -बहुधा सहा- मालिकाच आहे. Dune,Dune Messiah, Children of Dune ,Heretics of Dune वगैरे. Dune चा सिनेमाही निघाला. पुस्तकांसारखा तोही गाजला. त्याने एक व्यायामशाळा काढली आहे. तिचे नाव वाचल्यावर खूष होऊन तुम्ही “ व्वा! व्वा!” म्हणाल. नाव आहे “ No Excuse” तुम्ही ‘वा वा’ का म्हणाला ते मलाही माहित आहे .


दोन्ही हातापायांनी अपंग असलेल्या कायल मेनर्ड कधीही कोणतीही सबब न सांगता तो स्वावलंबी राहिला!
गायक, गीतकार, गिटार वादक , नट आणि रेकॅार्डसचा निर्माता. अनेक प्रतिष्ठेची सन्मानाची पारितोषिके, पदके मिळवलेल्या आणि विविध रुपाने ख्यातनाम असलेल्या टिम मॅकग्राथ चे आवडते पुस्तक आहे -Jayber Crowe . वेन्डल बेरी लेखक आहे. “पुस्तक वाचल्यावर मनाला शांति लाभते. आपण शांत स्थिर होतो. पण त्याच बरोबर पुस्तक विचारही करायला लावते . जी श्रेष्ठ कलाकृती असते ती तुम्हाला अंतर्मुख करते. स्वतःचाही पुनर्विचार करायला लावते. आपण आपल्या विचारांचे,मग ते स्वतःविषयीचे, आपण प्राधान्य देत असलेल्या गोष्टींचे, आपल्या अवती भोवतीचे, आपलेच पुनर्मुल्यांकन करू लागलो तर ती श्रेष्ठ कलाकृती समजावी. असे करत नसू तर आपण एककल्ली, एकांगी बनत जाण्याची शक्यता असते; “ असे टिम मॅकग्रा ह्या पुस्तकाविषयी म्हणतो.


अमेरिकेतील आरंभीच्या काळातील अग्रेसर आंतरजाल कंपनी AOL चे संस्थापक स्टीव्ह केस ह्यांना आवडलेल्या पुस्तकाने तत्यांना ते कॅालेजमध्ये असल्यापासूनच भुरळ घातली होती. त्यावेळेपासूनच त्यांनी ह्याच क्षेत्रात उतरायचे ठरवले होते. ते म्हणतात,” ह्या पुस्तकाचा माझ्यावर एव्हढा प्रभाव होता की ह्या पुस्तकाचे नाव, मी काही वर्षानंतर लिहिलेल्या माझ्या पुस्तकासाठी वापरले !” त्यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाते नाव आहे “ The Third Wave” . ह्या पुस्तकाचे लेखक आहेत अल्व्हिन टॅाफलर. “ ह्या पुस्तकातील ( जग जवळ आणणाऱ्या) Global Electronic Village विषयी वाचल्यामुळे मला AOL सुरू करण्याचा विचार आला. निश्चय झाला.लोक एकमेकांशी Digital माध्यमातून संबंध ठेवतील, संपर्कात राहतील ह्याची मला जाणीव झाली.” “अल्व्हिन टॅाफलरने शेतकी , औद्योगिक , आणि तंत्रज्ञान ह्या तीन क्षेत्रात होणाऱ्या क्रांती विषयी लिहिले. तेच नाव वापरून मी नंतरच्या काळात येणाऱ्या तंत्रज्ञानात होणाऱ्या तीन मोठ्या बदलांविषयी, तिसऱ्या लाटेसंबंधी पुस्तक लिहिले आणि मी त्याचे Third Wave : An Entrepreneur’s Vision of Future असे बारसे केले.”


जेसी विल्यमस हा टीव्ही वरील अतिशय लोकप्रिय मालिका Grey’S Anatomy मध्ये डॅा. जॅकसन एव्हरीची भूमिका करणारा नट; आणि The Butler, The Cabin in The woods आणि आणखीही काही सिनेमातील नट म्हणूनही ख्यात आहे. तो सामाजिक कार्यकर्ताही आहे. विशेषतः त्याच्या २०१६ सालच्या कृष्णवर्णीय लोकांवर आणि विशेषतः तरुणांवर राजकीय,सामाजिक दृष्ट्या होणाऱ्या अन्याय तसेच पोलिसी अत्याचारांसंबंधीच्या भाषणामुळे तो जगापुढे आला. त्याची आवडत्या पुस्तकांची नावे सांगायची तर — Confederacy of Dunces हे जॅान केनेडी टूलचे , टोनि मॅारिसनचे Song of Solomon , Black Folk हे W.E.B. DuBois चे आणि वाचकांपैकी अनेकांना माहित असलेले क्लासिक गणले जाईल असे Ayan Rand चे Fountainhead , हे पुस्तक.


माईक मेपल्स हा भांडवल गुंतवणुक करणारी कंपनी Floodgate चा सहसंस्थापक आहे . फोर्बसच्या परिसस्पर्श कंपन्यांच्या यादीत सतत १२ वर्षे ही कंपनी मानाने टिकून आहे.


मेपल्सवर प्रभाव टाकणारी बहुतेक पुस्तके नेतृत्वगुणांची वाढ कशी करावी, त्यासाठी रोजचे आयुष्य एखाद्या उद्दीष्टपूर्ती साठी तर असावेच, स्वतःला जे योग्य वाटेल ते – मग ते स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी किंवा जी कंपनी चालवतो किंवा नोकरी करतो- ते ते काम उत्कृष्ठच झाले पाहिजे ह्या भावनेने करावे. चित्रकला, गायन शिल्पकला, जाहिरात तयार करणे कोणतेही असो ते अशा उंचीवर न्यावे की ते करतांना आपल्यालाही आकाशात झेप घेऊन विहरणाऱ्या पक्षासारखा आनंद व स्वातंत्र्य लाभावे. अशी झेप प्रत्येकालाच घ्यावी वाटते. का वाटू नये? अशा किंवा ह्यासम विचारांची पुस्तके त्याला आवडतात असे वाटते. Top Five Regrets of Dying – हे Brownie Ware चे तसेच प्रेरणादायी पुस्तकांचे भीष्म समजले जाणारे Jonathan Livingstone Seagull हे रिचर्ड ब्राख चे आजही मागणी असलेले पुस्तक. हार्वर्ड बिझिनेस स्कूल च्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना, लेखकाने स्वतः आयुष्य कसे व्यतित करावे ह्यावर विचार केला व ठरवले,त्या अनुभवावर आधारित भाषण दिले. त्याचे नंतर त्यानते पुस्तक झाले. तेच हे हार्वर्डचा प्राध्यापक Clayton Christensen चे पुस्तक How will You Measure Your Life .


पुस्तकांचा प्रभाव, परिणाम किती होतो ह्याचे मोजमाप करणे अवघड आहे. ह्या पुस्तकांत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शंभर सव्वाशे नामवंतांच्या लेखी मुलाखती आहेत. किती पुस्तके, किती नावे,किती लेखक आपल्या समोर येतील ! . त्यांना आवडलेली सर्व पुस्तके आपणा सगळ्यांना आवडतील असे मुळीच नाही. आपले ते आवडीचे विषयही नसतील. त्यातील विषयांशी बऱ्याच वाचकांचा संबंधही येत नसेल. तरीही निदान ही मोठी माणसे काय वाचतात; काही नाही तरी पुस्तकांची व लेखकांची थोडी माहिती होईल. काही पुस्तकांची नावे समोर आल्यावर ,” अरे! ही पुस्तके मी सुद्धा वाचली आहे!” त्या क्षणापुरते तरी आपण नामवंतांच्या पंक्तीत जातो. ह्याचेही एक वेगळेच समाधान असते.


नंतर, माझ्या हातून लिहिले गेलेच, तर टिमोथी फेरिसने प्रसिद्ध व्यक्तींना विचारलेल्या इतर काही प्रश्नांना त्यांचा प्रतिसाद पाहू या.

जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे

स्वातंत्र्यवीर सावरकर हे कवि लेखक साहित्यिक होते. विज्ञानवादी होते. उत्कृष्ट वक्ते होते.मात्र लोकांच्या मनांत ते जाज्वल्य देशभक्त रुपानेच विराजमान आहेत. मराठी वाचकांना सावरकरांची ‘ ने मजसी ने परत मातृभुमीला। सागरा प्राण तळमळला” ही कविता माहित आहे. ह्याचे कारण ती शाळेच्या क्रमिक पुस्तकातही होती. त्यांची


जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे


ही देशाला स्वातंत्र्य मिळावे ह्या तळमळीतून स्वतंत्रतेलाच दैवी रूप देऊन तिची स्तुति गाणारी कविता आहे. बहुधा १९५९-६० साली ही कविता आकाशवाणीचे संगीतकार मधुकर गोळवलकर ह्यांनी ‘महिन्याचे गीत’ ह्या कार्यक्रमातून सादर केली. तेव्हापासून वीर सावरकरांची ही कविता प्रकाशात आली. त्यामुळे ती हजारो लोकांपर्यंत पोचली.अलिकडच्या शालेय पुस्तकात ही कविता घेतली आहे.


कवितेची सुरुवात ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे।। ह्या संस्कृत श्लोकाने होते. सावरकरांनी बाजी प्रभु देशपांडे ह्या पराक्रमी वीराच्या पोवाड्याची सुरुवातही ह्याच श्लोकाने केली आहे.


स्वातंत्र्य, स्वतंत्रता ह्या अमूर्त संकल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिले. आपला देश परकीयांच्या ताब्यात आहे. परके लोक आपल्यावर राज्य करतात. त्यांच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी; स्वातंत्र्यासाठी चाललेल्या लढ्यात यश मिळावे ह्यासाठी स्वतंत्रतेलाच देवी मानून कवि तिची स्तुति करतो. स्वराज्यदेवतेचे हे स्तोत्र देशभक्त कवि गात आहे.


प्रारंभीच्या श्लोकात स्वातंत्र्यदेवीचे वर्णन करताना, कवि म्हणतो,” हे महान मंगलकारी,पवित्र, आणि सर्वांचे कल्याण करणाऱ्या आणि आम्हाला यश मिळवून देणाऱ्या स्वतंत्रते भगवतिदेवी तुझा जयजयकार असो. स्वातंत्र्याची देवी भगवति, तू राष्ट्राचे मुर्तिमंत चैतन्य आहेस.तेच स्वातंत्र्य्याचे चैतन्य आमच्यातही सळसळते राहो. सर्व सदगुण आणि नीतिमत्ता तुझ्यात एकवटली असल्यामुळे तू त्यांची सम्राज्ञी आहेस. पारतंत्र्याच्या काळोख्या अंधाऱ्या रा्त्री आकाशात तू तेजस्वी ताऱ्याप्रमाणे लखलखत आहेस.


अथवा (भगवति ! स्वातंत्र्याचा तेजस्वी तारा पारतंत्र्याचा काळोख दूर करो. किंवा तुझा लखलखता तारा चमकू लागला की देशावर पसरलेला गुलामीचा अंधार नाहीसा होईल.)


पुढे नाजुक शब्दांचा सुंदर खेळ करीत कवि स्वातंत्रयदेवीचा गौरव करताना म्हणतो, फुलांचे सौदर्य आणि कोमलता तूच आहेसआणि सूर्याचे तेज आणि समुद्राची गंभीरताही तूच आहेस. त्या पुढच्या ‘अन्यथा ग्रहण नष्ट तेचि’ ह्या शब्दांतून ते स्वातंत्र्याचे सामर्थ्य व महत्व स्पष्ट करताना म्हणतात तू नसताीस तर (पारतंत्र्याच्या) ग्रहणाने ते सौदर्य, तेज आणि सखोल गंभीरता सर्व फिके पडले असते.


विद्वान योगी मुनी ज्याला मुक्ति मोक्ष श्रेष्ठ परब्रम्ह म्हणतात तीही, हे स्वतंत्रते, तुझीच रूपे आहेत. जे काही सर्वश्रेष्ठ, उदार थोर आणि सर्वोच्च आहे ते सर्व तुझे साथी सोबती आहेत. (तेही नेहमी तुझ्या बरोबरच असतात.)


शत्रंचा संहार करताना, त्याच्या रक्ताने रंगलेल्या चेहऱ्याने अधिकच सुशोभित दिसणाऱ्या स्वातंत्र्यदेवते, सर्व चांगले सज्जन लोक तुझीच पूजा करतात; तुझ्यासाठी लढता लढता आलेले मरण हेच खरे जगणे; जन्माला आल्याचे ते सार्थक आहे. हे स्वतंत्रते तू नसलीस ( देश स्वतंत्र नसला तर) तर ते कसले जिणे? ते मरणाहून मरणे होय ! स्वातंत्र्य हेच जीवन, पारतंत्र्य हेच मरण! निर्माण झालेले सर्व काही, सकल प्राणीमात्र तुलाच शरण येते. ह्या भावनेतूनच कवि तळमळीने विचारतो,”तू आमच्या देशाला कधी जवळ करशील? आम्हा देशवासीयांना हे स्वतंत्रते, ममतेने कधी हृदयाशी धरशील? “
पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकलेल्या हिमालयाच्या मोहातून शंकरही सुटला नाही. हिमालयाला त्याने आपले घरच मानले. मग तू इथे का रमत नाहीस? अप्सराही इथल्याच गंगेच्या, चंद्रप्रकाशा सारख्या रुपेरी पाण्याच्या आरशात पाहून स्वत:ला नीट नेटके करतात.मग स्वातंत्र्यदेवी तुला आमच्या देशात का करमत नाही? आमच्या देशाचा तू का त्याग केलास? पाहिजे असेल तर तुझ्या वेणीत घालायला तुला इथे रोज ‘कोहिनूर’ चे ताजे फुलही आहे. ह्या सुवर्णभूमीत तुला कशाचीही कमतरता पडणार नाही.


आमची भारतमाता सर्व समृद्धीने भरली असता,तू तिला का दूर लोटलेस? कुठे गेली तुझी पुर्वीची माया ममता ? तू तिला परक्यांची दासी केलेस. माझा जीव तळमळतो आहे. यशाने युक्त असलेल्या स्वातंत्र्यदेवते! तुला वंदन करून मी हेच विचारतो की तू आमचा त्याग का केलास? आमच्या देशाला तुझ्यापासून का दूर लोटलेस? हे स्वतंत्रते! ह्याचे उत्तर दे.

Social Media Fad

प्रत्येक काळात काही गोष्टींचा सुकाळ येत असतो. पन्नास ते साठ सत्तरच्या दशकांत स्टेनलेसच्या भांड्यांचा, वस्तूंचा सुकाळ आला होता. कोणत्याही प्रसंगी एकमेकांना स्टेनलेसची भांडी देण्याचा सपाटा चालू होता. प्रत्येकाची घरे स्टेनलेसच्या भांड्यांची दुकाने झाली होती. नंतरचा काळ कॅसेटसचा आला. कॅसेटसनी कहर केला होता. प्रत्येक घरात हॅालमधले एक कपाट शोकेस कॅसेट्सनी गच्च भरलेली असे. त्यातच काही घरांत जर व्हिडिए कॅसेटस किंवा नंतर डीव्हीडी कॅसेटस् असल्या तर त्यांच्या आरत्या ऐकाव्या लागत. अशांची प्रतिष्ठा वेगळीच असे. एकूणात काय तर कॅसेटच्या ढिगाऱ्यावर माणसाची पत प्रतिष्ठा मोजली जायची.


बायकांच्या साड्यांमध्ये तर वॅायलच्या साड्यांनी तर वेड लागायची पाळी आली होती. पुरुषांवर. त्यातही खटावचीच वॅायलची साडी सर्वोत्तम हाही एक अस्मितेचा भाग झाला होता.तशा कॅलिको,अरविंद, नंतर बॅाम्बे डायिंग व आमच्या लक्ष्मी विष्णु मिलच्या ( माधव आपटे यांची) ह्यांच्या वॅायल्स गाजू लागल्या. मग मी का मागे म्हणून नंतर वेगळ्या स्वरूपात रिलायन्सही त्यांची गार्डन वरेली साड्या घेऊन स्वतंत्र दुकानेच काढू लागले! सर्वांचा सुकाळ झाला.

पुरुषांतही ह्या लाटा येत पण त्या लहान लहरींसारख्या येत. विजारींच्या कापडांत समर सुटिंग, तर कधी शार्कस्किनच्या चमकदार सुटिंगच्या मग रेमंडमुळे टेरुल ह्यांची लहर विहरत होती. तयार शर्टांच्या बाबतीत क्रांतीची सुरुवात सॅमसन ब्रॅन्डने केली. पण पुढे लिबर्टी मिल्टन सेरिफ हे अधिराज्य गाजवू लागले. ही मंडळी नामशेष झाल्यावर झोडियाक, रेमन्डचे पार्क ॲव्हेन्यू आले ते आज परदेशी ॲरो, पीटर इंग्लॅन्ड व्हॅन ह्युजन इत्यादी परदेशी ब्रॅन्डमध्ये टिकून आहेत . ह्यांचाही सुकाळ होती म्हणायचा.

तसाच सध्या सुविचार,सुसंस्कार, प्रेरणादायी वचना-उदघृतांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातही कुणालाही झेपणारा म्हणजे एकमेकांना फेकून मारण्याचा प्रकार म्हणजे गुड मॅार्निंग शुभप्रभातींचा सतत मारा.


जिथे ज्ञानेश्वरही ह्या ‘सुकाळु करी’ मधून सुटले नाहीत ( त्यांनी ‘ब्रम्हविद्येचा सुकाळु करी’ हा निश्चय केला होता हे लक्षात नसेल म्हणून सांगतो) तिथे माझ्यासारखा त्यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे ‘ जीवजंतू’ कसा मागे राहील? तर जमल्यास मीही काही सकाळी एक सकाळचे वचन पाठवून तुमच्या दिवसाची सुरुवात हसण्याने करावी म्हणतो.

साऽऽवधाऽऽन!

देवाची डबा पार्टी !

काय लहर आली कुणास ठाउक ! पण एका लहान मुलाच्या मनात आपण देवाला भेटून यावे असे आले.
मुलाने आपल्या बॅकपॅकमध्ये दोन दिवसाचे कपडे भरले. आणि मधल्या सुट्टीतल्या खाण्याचा डबा भरून घेतला. पाण्याची बाटलीही घेतली. सवयीप्रमाणे कॅप उलटी घालून, “आई जाऊन येतो “ म्हणत दरवाजा धाडकन ओढून निघालाही.

खूप चालून झाले. मुलगा दमला. एका पार्कमध्ये बसला. घोटभर पाणी प्याला. माथ्यावरचा सुर्य थोडा ढळला होता . त्याने आपला डबा काढला. आईने दिलेल्या पोळीच्या भरलेल्या सुरळ्या खायला लागला. तितक्यात त्याला जवळच बसलेली एक बाई दिसली. त्याच्या आईपेक्षा मोठी होती. ती मुलाकडे ‘हा छोटासा मुलगा काय करतोय्’ हे हसून पाहात होती. मुलाला तिचे हसणे इतके आवडले की त्याने तिला जवळ जाऊन आपल्या पोळीचा घास दिला. तो तिने न खळखळ करता सहज घेतला. खाल्ला. आणि ती मुलाकडे पाहात हसली. मुलाला आनंद झाला. त्याने तिला आणखी एक पोळी दिली. तीही तिने न बोलता घेतली, खाल्ली आणि ती पुन्हा हसली. तिचे हसणे पुन्हा पुन्हा पाहायला मिळावे म्हणून तो मुलगा एक घास खाऊन दुसरा घास तिला देई . प्रत्येक घासाला तिचे हसणे त्याला पाहायला मिळे. दोघांचे बोलणे मात्र काही झाले नाही. मुलगा आणि ती बाई आपल्यातच जणू दंग होती.

बराच वेळ झाला. सुर्य मावळतीला आला. उशीर झाला असे मनाशीच म्हणत मुलगा उठला. डबा बॅगेत टाकला. निघाला. दह पंधरा पावले पुढे गेला असेल. त्याने मागे वळून पाहिले. बाई तिथेच होती. मुलगा पळत तिच्याकडे गेला. तिला त्याने आनंदाने मिठी मारली. बाईसुध्दा त्याच्याकडे हसत पाहात त्याचा मुका घेत हसत पाहू लागली.

मुलगा घरी पोहचेपर्यंत अंधार होऊ लागला होता. मुलाने बेल वाजवली. दरवाजा आईनेच उघडला. इतके दूरवर चालत जाऊनही मुलाच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून तिने विचारले,” अरे ! काय झाले आज तुला? इतका मजेत दिसतोस ते!

“आई आज मला एक बाई भेटली. तिचे हसणे इतके सुंदर आणि गोड होते म्हणून सांगू! काय सांगू! मी इतके सुरेख छान हसणे कधी पाहिलेच नव्हते. हो, खरंच सांगतो आई!” आणि ते हसणे व तो हसरा चेहरा पाहाण्यात पुन्हा रमला.

बाईने दरवाजा उघडल्यावर सर्वात मोठा मुलगा म्हणाला,” आई आज काही विशेष झाले का? नेहमीच्या पार्कमध्येच गेली होतीस ना? किती प्रसन्न दिसतोय तुझा चेहरा आज! फिरून आल्यावर इतकी आनंदी पाहिली नव्हती तुला!

“अरे आज फार मोठी गंमत झाली. आज मला देव भेटला! खरेच! देव भेटला मला. पण देव इतका लहान असेल अशी माझी कल्पना नव्हती ! अरे त्याच्या बरोबर डबा पार्टीही केली मी!” सोफ्यावर बसत ती म्हणाली. पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर तिला तो मुलगा दिसू लागला.

१९ मार्च २०२१ युट्युबवरील एका स्थळावर वाचलेल्या अति लघु बोधकथेवर आधारित.अशाच किंवा ह्याच कथेवर एक short film ही आहे असे वाचले.

टॉम  हॅन्क्स

अनेकांना टॉम  हॅन्क्स Forrest Gump सिनेमामुळे माहित आहे. मला तो सुधीरकडे पाहिलेल्या The Green Mile मुळेही माहित आहे. तसेच गाजलेल्या Toy Story मध्ये Woody चा आवाजी म्हणूनही माहित असेल. टॉय स्टोरी च्या चारी सिनेमात Woody ला आवाज त्यानेच दिला आहे. आता नाताळ आहे म्हणून त्याचा Polar Express सिनेमा सगळ्या वाहिन्यांवर दाखवला जाईल. ह्या सिनेमात तर त्याने मुलगा, बाप, कंडक्टर, ड्रायव्हर (हा स्वत:च) इतक्या जणांना आवाज दिला आहे! ह्या २५ डिसेंबरला काही टॅाकीजमध्ये व HBO वर त्याचा News From The World हा नवा कोरा सिनेमा येतोय.

बहुधा टॉम हॅन्क्सला ह्या भूमिकेमुळे Oscar मिळण्याची किंवा नामांकन तरी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. कथा अमेरिकेतील यादवी युद्ध नुकतेच संपले ह्या काळातली आहे. कॅप्टन केयल /केयल किड्ची(Kayla Kidd) बायको वारली. युद्ध संपल्यावर करायचे काय म्हणून हा सरहद्दी सरहद्दीवरील खेड्यापाड्यात जाऊन माणशी दहा पैशे(डाईम)घेऊन तो वर्तमानपत्र वाचून दाखवत प्रवास करत असतो. त्यातच त्याला युद्धामुळे पोरकी झालेली दहा वर्षाची मुलगी सापडते. टेक्सासमधील तिच्या आजी आजोबा कडे पोचवण्याची जबाबदारी घेतो. आणि एका मोठ्या प्रवासाला आपल्या घोडागाडीतून मजल दरमजल करत निघतो. त्यात काय होते ते ….

वर्तमानपत्र वाचून दाखवण्यावरून मला पूर्वी लहानमोठ्या पोस्ट ऑफिसच्या बाहेर एक लाकडी उतरते डेस्क घेऊन एक जण बसलेला असे, त्याची आठवण झाली.

डेस्कवर निळ्या आणि तांबड्या शाईच्या दौती, दोन तीन टाक व बाजुला डेस्कवरच टीपकागदाचा ठसा डुलत बसलेला; एव्हढाच सरंजाम. लागली तर असावीत म्हणून पाच सहा मनीऑर्डरचे फॉर्म,थोडी तिकीटे-पाकीटेही डेस्कच्या कप्प्यात असत. बरेच निरक्षर लोक आपली पत्रे मनीऑर्डरचे फॉर्म त्याच्या कडून लिहून घेत. त्याचे पैसे तो अर्थातच घेत असे. कामगार,मजूरवर्गाला,आणि इतर अनेकांना हा गृहस्थ मोठी विद्या शिकलेला वाटायचा ह्यात नवल नाही. त्या सर्वांसाठी ही फार मोठी सोय होती हे खरे.

कोर्टातही असे लोक होते व आजही आहेत. तिथे तर कोर्टाच्या मोठेपणा प्रमाणे दोन तीन ते आठ दहा जण असत. पोस्टाप्रमाणे ही माणसं साधी नसत. कोर्टाच्या वातावरणाचा हा परिणाम असावा. कोर्टाजवळची ही लिहिणारी माणसे कायदा कोळून प्यालेली असत. आज तर ते कियोस्को सारख्या टपऱ्यात कंम्प्युटर घेऊन व जोडीला झेरॅाक्सचे मशिन घेऊन आहेत. हे सुद्धा कोर्टकचेरीला नवख्या शिक्षितांना व चागल्या शिकल्या सवरलेल्यांनाही तसेच अशिक्षितांना ही ह्यांची गरज असते. पण पैसे काढायलाही बेरकी असतात. कोर्टाती पायरी चढलेला अडला नारायण काय करणार! देतात बिचारे.

टॉम हॅन्क्सने तीन चार सिनेमाच्या कथा किंवा पटकथाही लिहिल्या आहेत. फॅारेस्ट गम्प च्या कामासाठी त्याला एक रकमी मोबदला नव्हता. त्याऐवजी सिनेमाला जे उत्पन्न होईल त्याचे काही टक्के रक्कम मिळेल असा करार होता. त्याला त्याकाळी, वीस बावीस वर्षापुर्वी, ४०मिलियन डॅालर्स एव्हढी रक्कम मिळाली!
टॉम हॅन्क्स हा पंधरा सोळा वर्षाचा असतांना तो ओकलॅन्डच्या हिल्टन हॅाटेल मध्ये प्रवाशांचे सामान उचलून नेण्याचे काम करत होता. हॅालिवुडच्या चेर, सिडने पॅाइशे सारख्या अनेक नामवंतांचे सामान उचलून त्याने खोल्यात ठेवले आहे. आजही ते फोटो त्या हिल्टनमध्ये आहेत. तसेच ओकलॅन्ड टीमच्या बेसबॅालच्या मॅचेस वेळी त्याने पॅापकॅार्न चॅाकलेट विकली आहेत.

टॉम हॅन्क्सला टाईपरायटर फार आवडत. त्याच्या जवळ त्याने जमवलेले देशोदेशीचे २५० टाईपरायटर्स आहेत! तो टाईपरायटरवरच लिहायचा. आता लॅपटॅाप किंवा स्मार्ट फोन वरील कीबोर्ड वापरत असेल.

टाईपरायटरवरील प्रेमाने त्याने स्वत: एक साधन App केले! त्याचे नाव त्याने Hanks Writer ठेवले आहे. की बोर्डवरील अक्षर उमटताना टाईपरायटरच्या ‘की’चाच आवाज येतो व ओळ संपली की तशीच बेल वाजते! चला, माझ्या लिखाणाचीही ओळ संपली. टिंग्!

कर्ण

कर्णाच्या रथाचे चाक रक्ताचिखलात रूतले. कर्ण रथाखाली उतरून ते चाक बाहेर काढू लागला. कर्ण ? महारथी कर्ण खाली उतरून चाक काढू लागला? सारथी नाही उतरला चाक काढायला? सारथी नव्हता का?

सारथी होता.आणि तोही श्रीकृष्णाच्या तोडीचा सारथी होता. राजा शल्य!

शल्याने दुर्योधनाला तो त्याच्या कौरवांच्या बाजूने लढेन असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे तो आपल्या सैन्यासह कौरवांकडे येण्यास निघाला होता. पण वाटेत पांडवांनी त्याला आग्रहाने थांबवून घेतले. पाहुणचार केला. आपली बाजू सांगितली. आमच्या बाजूने तू लढ अशी विनंतीही केली. शल्यही जवळपास तयार झाला होता. पण आपण दुर्योधनाला अगोदरच त्याच्या बाजूने लढणार असे आश्वासन दिल्याची त्याला जाणीव झाली. पांडवांना,” पण मी आधीच दुर्योधनाला त्याच्या बाजूने लढेन असे कबूल केले आहे. माझी इच्छा असूनही मला तुमची बाजू घेता येत नाही असे सांगितले. पण त्याच बरोबर मी तुम्हाला मदत करेन” असेही सांगितले.

शल्याचे बोलणे ऐकून कृष्ण नेहमीप्रमाणे स्वत:शी हसल्यासारखे हसत म्हणाला,” शल्या,तुझी वाणी जरी वापरलीस तरी ती खूप मदत होईल!” कृष्णाच्या बोलण्याचा अर्थ कुणाला समजला असेल असे वाटत नाही. पण शल्य, कृष्णाने आपले वर्म काढून डिवचले की आपल्या शैलीचे कौतुक केले ह्यावर विचार करत पांडवांचा निरोप घेऊन कौरवांच्या युद्ध शिबिरात आला.

दुर्योधनाने शल्याचे स्वागत केले. द्रोणाचार्य पडल्यानंतर कर्णाकडे सेनापतीपद आले. दुर्योधनाने व कर्णाने त्याला आपले सारथ्य करावे अशी विनंती केली. सारथ्यात शल्याच्या तोडीचा,एक श्रीकृष्ण सोडल्यास कोणीही नव्हता. म्हणूनच दुर्योधनाने शल्याला तशी विनंती केली. शल्य मनात म्हणत होता,कर्ण पराक्रमी वीर आहे पण एका सूतपुत्राचे मी सारथी व्हावे हे कसे शक्य आहे. पण दुर्योधनाची मैत्री व त्याच्याविषयी वाटणारी जवळीक यामुळे तो कबूल झाला. पण एक अट घालून. तो फक्त कर्णाच्या रथाचे सारथ्यच करेल. सारथ्याची इतर कामे तो मुळीच करणार नाही. शिवाय मी कर्णाशी बोलताना किंवा मी कर्णाला काहीही बोललो तरी त्याला ते मुकाटपणे ऐकून घ्यावे लागेल. प्रत्युत्तर दिले तर माझीही प्रत्युत्तरे सहन करून ती ऐकावी लागतील. ह्या अटी मान्य असल्या तरच मी कर्णाचा सारथी व्हायला तयार आहे.

कर्णाला शल्याच्या अटीच्या पहिल्या भागाविषयी काही विशेष वाटले नाही. सारथ्य तर फक्त सारथ्य कर चालेल! असेच तो मनात म्हणाला असेल. पण शल्याने दुर्योधनाला मदत करण्या बद्दल अशा अटी घालाव्यात हेच कर्णाला पटण्यासारखे नव्हते. कर्णाला, आतापर्यंत राजमंडळात आपला विषय निघाला की त्याचा एखादा दोष काढता येत नाही असे जाणवल्यावर , मग केवळ “तो काय शेवटी सूतपुत्रच!” असे म्हणत अनेक राजे काय बोलत असतील ह्याचा त्याला अंदाज होता. त्यामुळे शल्य काय बोलेल ह्याची शक्यता त्याला माहित होती. तरीही आपला मित्र दुर्योधनाचे सांगणे मान्य करत शल्याची ती अट त्याने मान्य केली.

रणांगणावर शल्य कर्णाचा किती उपहास, उपमर्द, अपमान करत असे त्याला सीमा नाही! कर्णाच्या पुर्वीच्या पराभवांचा उल्लेख करीत त्याच्या वर्मावर बोट ठेवून झोंबणाऱ्या शब्दात बोलत असे. पराक्रमात अर्जुनाचे गोडवे गायचे;प्रत्येक बाबतीत अर्जुनाची स्तुती करून कर्णाला हिणवायचे. कर्ण अर्जुनाच्या तोडीचा नाही असे सांगत त्याची सर्वतोपरी खच्ची करण्याची संधी सोडत नसे. कर्णाचा शल्याने सतत तेजोभंग करीतच तीन दिवस सारथ्य केले होते. कर्णाच्या पराभवात शल्याचा मोठा वाटा होता. सुरुवातीला कर्णानेही उत्तर देतांना शल्याचा उल्लेख न करता सगळ्या मद्रदेशीयांच्या संदर्भात बोलत त्यांची निंदा केली होती. पण शल्यानेही त्याला तिरकस शब्दांत सुनावले होते. ह्या पार्श्वभूमीवर कर्णाच्या रथाचे चाक जमीनीत रूतल्यावर कर्णालाच ते बाहेर काढण्यासाठी उतरावे लागले ह्यात आश्चर्य वाटायला नको!

कर्ण रथचक्र शक्ति लावून काढत असता कृष्ण उदारदात्या कर्णाला विचारु लागला,” कर्णा तुला रथ देऊ का दुसरा?” मुळात दानशूर, उदार कर्ण दुसऱ्याची मदत मग तो कृष्ण असला तरी कशी घेईल? किंबहुना कृष्णाची मदत तो कशी घेईल? कर्णाचे उत्तर त्याला साजेसेच होते. तो म्हणाला,” कृष्णा ज्याच्या बाजूने, ज्याच्या साठी मी लढतो आहे त्या राजा दुर्योधनापाशी अनेक रथ आहेत. पण मी माझ्याच रथातून युद्ध करत असतो. म्हटले तर कौरवांचा राजा माझ्यासाठी दहा रथ पाठवेल. त्यामुळे मला तुझे सहाय्य घेता येणे शक्य नाही कृष्णा!” पण तुझी इच्छाच असेल तर कृष्णा तुला बरे वाटावे म्हणून मागतो. द्यायचेच असेल तर मला लाकडाचे मोठे दांडके दे. ते जास्त उपयोगी येईल.” पण कृष्णाला मानी कर्णाचे असले क्षुल्लक मागणे आपण पुरे करणे कमीपणाचे वाटले असावे. तो पुन्हा कर्णाला म्हणाला, “कर्णा,मी तुला रथ देत असता तू मला लाकडाचे दांडके मागतोस ! आणि मी ते देईन अशी अपेक्षा करतोस? अजूनही विचार कर! मी तुला पाहिजे तसा रथ देईन, बघ! “

कर्ण मनांत म्हणाला असेल,” रथापेक्षा दुसरा सारथी देतो म्हणाला असतास तर माझ्या स्वभावाला मुरड घालूनही ते मी लगेच मान्य केले असते.”

कर्णाने समोर मोडून पडलेल्या रथांपैकी एका रथाचा दांडका काढून आणला. ते मोठे दांडके चाकाच्या पुढे ठेवून त्यावरून चाक बाहेर काढण्याच्या खटपटीस लागला.

पण अखेर कर्णाची वेळ आली होती. कर्णाच्या त्या स्थितीत अर्जुनाने युद्धधर्माच्या विरुद्ध कृत्य करीत त्याच्यावर बाण मारायला सुरुवात केली. तेव्हा कर्णाने अर्जुनाला अशा परिस्थितीत लढणे हे युद्धधर्माविरुद्ध आहे; ह्याला धर्मयुद्ध म्हणत नाहीत असे सांगितले. पण “तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?” (कवि मोरोपंत) अशी एकेका प्रसंगाची आठवण करून देत, प्रश्न विचारत, अर्जुनाने कर्णावर शरसंधान चालूच ठेवले… इत्यादी इत्यादी …. भाग माहित आहेच.

कर्णानंतर शल्यच कौरवांचा सेनापती झाला. पण एका दिवसातच शल्याचा फडशा पडला. पांडवांकडून निघताना कृष्ण हसत शल्याला जे म्हणाला त्याचा अर्थ शल्याला अखेरीस लक्षात आला असेल!

पैसा झाला मोठा!

वजन-मापाची, लांबी- रुंदीची, अंतराची कोष्टके प्राथमिक शाळेत पाठ करावी लागत त्यावेळेस कंटाळा यायचा. इंच फूटांपासून, यार्ड ,फर्लांग ते मैल ह्यांची कोष्टके पाठ करण्यापेक्षा मैलो न् मैल चालणे बरे वाटायचे. आपल्याकडे एक मैला नंतर दोन मैल हे अंतर सुद्धा कोष्टकात होते. दोन मैल म्हणजे एक कोस. एका मैलापेक्षा जास्त अंतर कोसात सांगितले जात असे. खेड्यात पलीकडचे गाव ,”अहो हे काय चार कोसावर तर आहे!” असे म्हणत.

काय गंमत आहे पाहा. पैशा नाण्यांची कोष्टके पाठ करताना मात्र मजा वाटायची. माणसाला लहानपणापासून पैशाचे आकर्षण आहे हेच खरे. आम्हा लहान मुलांना पैशाचे महत्व माहित नव्हते. पण पैसे खुळखुळायला मजा येत असे. सुट्या पैशांची नाणी बाजूला करत चवड रचणे हा एक वेगळाच विरंगुळा असे. नोकरीत फिरतीवर असताना भुसावळ मेडिकल स्टोअर्समध्ये रात्री दुकान बंद केले की बरेच वेळा गप्पा मारत, मालक बाळासाहेब आचार्यांच्या बरोबर नाण्यांची; रूपये, दोन रुपये, पाच रुपयांच्या नाण्यांची चवड करत त्यांचा गल्ला मोजत असे. आचार्य विनोदी बोलायचे. त्यांच्यामुळे माझे कोमट विनोदही कढत व्हायचे. पण ह्या हसण्या खिदळण्यामुळे नाणी व चवड पुन्हा मोजायला लागायची! पण बाळासाहेब हुशार. नोटा मात्र ते स्वत: मोजत !


बाजारात शिरताना, कापडाची पथारी पसरून पैशाची, एक आण्याची, चवल्यांची (दोन आण्यांचे नाणे) , पावल्यांच्या (चार आण्यांचे एक नाणे, अधेली ( आठ आण्यांचे नाणे) आणि रुपयांच्या नाण्यांच्या चवडी रचून चिल्लर देण्याचा व्यवसाय करणारे दिसले की आता बाजारात आलो हे समजायचे. नाण्यांच्या त्या चवडी व बाजूला नाण्यांच्या सरमिसळीचा ढिगारा मागे वळून वळून पाहात पुढे जात असू.

‘पैशांची चवड’ घेऊन बसलेले तीन चार जण पाहिले की मनात यायचे, “इतके पैसे! हे उघड्यावर घेऊन कसे बसतात? “ आम्हाला पैसे मुठीत घाम येईपर्यंत घट्ट धरून तरी ठेवायचे किंवा चड्डीच्या खिशात तळाशी खोल दडवून ठेवायचे येव्हढेच माहित होते. दुसरा प्रश्न पडायचा की हे एव्हढे पैशेवाले लोक आणि रस्त्यावर पथारी पसरून का बसलेत? आणि ह्यांचा अवतार इतका साधा कसा? ह्या व अशा सगळ्या प्रश्नांना श्यामने एकाच प्रश्नाने वाचा फोडली. त्याने वडिलांना विचारले की,” हे आपला पैसा का विकतात? आणि दुसरे लोक तो कशाने विकत घेतात? “ अण्णांनी आम्हाला समजेल असे थोडक्यात सांगितले की,”ही माणसे,ज्यांना सुटे पैसे, मोड हवी असते त्यांची ती मोठी नाणी, नोटा घेऊन त्याबदली सुटे पैसे देतात. त्याबद्दल ते थोडे पैसे कापून घेतात; म्हणजे पैसे कमी देतात.”

आज रस्त्यांवर पैशांच्या नीटनेटक्या रचलेल्या चवडी व तो व्यवहार करणारी ती लहान माणसे दिसत नाहीत. ती आता गगनचुंबी इमारतीतील काचेच्या चकाचक ॲाफिसातून डॅालर्स, पाउंड, युरो,येनच्या खरेदी विक्रीचा आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतात !

पैशाची मोजणी पै ह्या एकाक्षरी लहान नाण्याने होई. तीन पै मिळून एक पैसा होई! पण पै हे नाणे बंद झाले होते. दोन पैशांचा एक ढब्बू होत असे. हे तांब्याचे मोठे नाणेही एक दोनदाच पाहिल्याचे लक्षात आहे. तेही बंदच झाले होते. पण त्या ऐवजी ब्रिटिश सरकारने दोन पैशाचे एक लहानसे चौकोनी नाणे काढले होते. तेही लवकरच बंद झाले! पै वरून चिं. वि. जोशींच्या लहानपणी त्यांनी केलेल्या विनोदाची आठवण येते.. ते आपल्या वडिलांबरोबर जात असता म्हणाले, “बाबा,तो पहा एक पैसा येतोय.” चिंवि काय म्हणत होते ते वडिलांना समजेना. . त्यांनी विचारले,” अरे कुठाय पैसा?” “तो काय,समोरून पै काका आणि त्यांची दोन मुले येताहेत. तीन पै एक पैसा!”


महायुद्धाचे ढग येऊ लागले तसे पैशाच्या नाण्यांच्या जोडीनेच व्यवहारात नोटांची चलती सुरु झाली. नोटा होत्याच पण सामान्यांच्या वाट्याला कमी येत. पगारदार नोकर, व्यापारी लोकांत, बॅंकात, नोटांची उठबस जास्त होती.नाण्यांचे आकार कमी होऊ लागले. रुपयातली चांदी एकदम कमी झाली. इतर नाण्यातील स्टेनलेस एकदम वाढले. पैशाची तर फार नाटके झाली. पहिल्या प्रथम तांबडा पण साधा एक पैसा असूनही त्याचा आकार नेटका होता. तो निम्याने कमी झाला.
युद्ध सुरू झाल्यावर तर त्याला मध्यभागी भोक पाडले! त्याला भोकाळी पैसा नाव पडले. त्याकाळची जुनी मंडळी पैशाचे हे हाल पाहून नेहमीची शेरेबाजी करू लागली. “चिंतामणराव! काही खरं नाही आता. ”कलियुग आलं हो कलियुग!काय काय पाहावं लागणार आहे आणखीन! पांडुरंगा तुलाच माहित!” हे केवळ एका पैशाचा आकार कमी झाला व हे कमी झाले म्हणून की त्याचा कोथळाच बाहेर काढला त्यामुळे ही थेट कलियुगापर्यंत नेणारी नेहमीची पराकोटीची शेरेबाजी!

पण लोकही इतके डोकेबाज की स्टोव्ह रिपेर करणाऱ्यांनी त्याच्या पंपाच्या दट्ट्यात वॅाशर म्हणून; सायकल दुरुस्ती करणाऱ्यांनी, लहान यंत्रे दुरुस्त करणाऱ्यांनी तो पैसा वॅाशर, चकती म्हणून वापर करायला सुरुवात केली. काही पेंटर लोकांनी कल्हई करून पाट्यांच्या अक्षरात, बॅार्डरच्या नक्षीत,तर बायकांनी लहान मुलींच्या परकराच्या घेराला कल्हई केलेला व साधा पैसा वापरून फॅशन करायला सुरुवात केली. बऱ्याच हौशी पोरांनी तांबड्या करदोट्यात तो ओवून गळ्यात घातला. तर पैलवान लोक काळ्या दोऱ्यात ओवून दंडात ताईत म्हणून बांधू लागले! पैशाचे व्यवहारातील हे असले चलनवलन पाहून, पैशाचे अवमूल्यन आहे का मूल्यवर्धन आहे ते अर्थशास्त्र्यांनाही समजेनासे झाले!

चार पैसे एक आणा, दोन आण्यांची एक चवली. चार आण्यांची एक पावली किंवा सोळा आण्यांचा एक रुपया होतो हे कोष्टक न पाठ करताही शाळकरी मुलांनाही माहित असे. आजही अनेकांना,पैसा जवळ नसला तरी, पैशाचे कोष्टक मात्र तोंडपाठ असते. अनेक गरीबांना फक्त कोष्टकच येत असते.

रुपया म्हणताना तो,”चांगला एक बंदा रुपया,” किंवा “खणखणीत एक रुपया दिला की त्याला !”असे जोर देऊनच म्हटले जाई. रुपया हे नाणे खरेच मोठे होते. चांदीचा रुपयाही पाहिला व हातात घेतल्याचे आजही अनेकांच्या लक्षात असणार ह्यात शंका नाही. कुणी आपली वस्तु किंवा बाजू खरी व भक्कम असल्याची ग्वाही,”अहो आमचे नाणे खणखणीत आहे!” तसेच लग्नाच्या स्थळा संबंधात मुलाची किंवा मुलीची ग्वाही देताना, “अहो आमचा मुलगा-मुलगी म्हणजे खणखणीत बंदा रुपया आहे!” असे अभिमानाने सांगितले जाई!

चांदीचे रुपये ह्या हातातून त्या हातावर ओघळत नेताना होणारा आवाज आजही ऐकू येतो ! आजही कधी चार पैसे खिशात खुळखुळतात तेव्हा जगाचा राजा झाल्याचा आनंद होतो.

नाहीतरी पैशाचाच आवाज सर्वात गोड असतो म्हणा!


बेलमॉंट