Category Archives: Commentary

साबणाचा लाडू

शीर्षक बरोबर आहे. मुद्राराक्षसाचा प्रताप नाही किंवा उपसंपादकाच्या डुलक्यांचाही परिणाम नाही. ’साबुदाण्याचा लाडू’ऐवजी मी साबणाचा लाडू असे तर लिहिले नाही ना, असेही वाटण्याची शक्यता आहे. पण तसे काही नाही. लाडू साबणाचाच आहे.

साबणाचा लाडू म्हटल्यावर काहीजण म्हणतील, “लोक काय खातील, कशाचे काय करतील, काही सांगता येत नाही हल्ली”!

खरं सांगायचे तर काही शब्द नुसते ऐकले तरी लागलीच पुढचा शब्द, नावे, व्यक्ती लगेच आपल्या डोळ्यांसमोर येतात. नुसते छ्त्रपती म्हटल्यावर लगेच शिवाजी महाराज, लोकमान्य शब्दाच्या पुढे लगेच टिळकच येणार. किंवा महात्मा म्हटल्यावर गांधींच्या किंवा जोतिबा फुले यांचाशिवाय कोण समोर यॆईल? तसेच ’खादी’च्या पुढे भांडारच येणार.

पाडवा म्हटल्यावर घराघरांवर लावलेल्या भरजरी गुढ्या दिसू लागतात, तर दसरा शब्द ऐकला तर आपट्यांच्या पानांचे-शिलंगणाच्या सोन्यचे- ढिगारे आणि टपोऱ्या झेंडुच्या फुलांचे डोंगर आणि माळा-तोरणे डोळ्यांसमोर येतात यात नवल नाही. दिवाळी म्हणल्यावर सर्वांना लहानपणी तरी भरपूर सुटी, फटाके, आकाशदिवा, लाडू करंज्या, शंकरपाळी आणि चकल्या-कडबोळ्यांनी भरलेले स्वैंपाकघर दिसत असणार. त्याचबरोबर दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून दरवळणारा सुगंधही येत असतो. मग तो फटाक्यांच्या प्रकाशाने अंगण उजळून गेल्यावर पसरलेल्या धुराचा असो, घराघरांतून येणारा तेला-तुपाचा खमंग वास असेल,किंवा आंघोळीच्या आधी लावलेल्या तेलाचा आणि त्याबरोबरच खास दिवाळीसाठी आणलेल्या साबणाचा सुगंधही येत असतो!

दिवाळीच्या आधी तीन चार दिवस कुणा मोठ्या माणसांबरोबर गावात, बाजारपेठेतून जाताना दुतर्फा दिसणाऱ्या फटाक्यांची, आकाशदिव्यांच्या रंगीत रांगाच रांगा असलेली, तेल-उटणी आणि साबणांची आरास असलेली लहान मोठी दुकाने पहात पहात जात असू. आणि हे फटाके घ्यायचेच, हा आकाशदिवा आणू, ह्या बाटल्या घॆउ असे मनाशी ठरवत पुढे पुढे जात असू.

कधी तर अंधार पडेपर्यंत अशी भटकंती व्हायची.  आकाशदिव्यातून येणाऱ्या निळ्या-तांबड्या प्रकाशाचे कवडसे अंगावर झेलत, त्यांच्या डुलणाऱ्या झिरमिळ्यांबरोबर आम्हीही तल्लीन होऊन पहात बसयचो.फटाक्यांच्या दुकानांपुढून तर पाय निघत नसे. तितक्याच कुतुहलाने, पायऱ्या पायऱ्यांच्या फळ्यांवर मांडून ठेवलेल्या सुवासिक तेलाच्या निरनिराळ्या आकारांच्या बाटल्या, आणि त्या खालीच समोर साबणांच्या वड्यांचे पिरॅमिडस, तर कुठे सुगंधी सबणांच्या वड्यांची तटबंदीच उभी केलेली पहात उभे रहात असू.

एरव्ही डोक्याला अंगाला खोबरेल तेलाशिवाय दुसरे तेल क्वचितच लागत असे. पण दिवाळीची गोष्ट काही औरच! टाटा, स्वस्तिकच्या डाळिंबी रंगाच्या कॅस्टर ऑइलच्या डौलदार बाटल्या, त्यांच्या शेजारीच राजकोटचे पोपटी व्हेजितेबल ऑइलच्या त्रिकोणी बाटल्या ऐटीत उभ्या असत. तर झुल्फे बेंगॉल असे आम्हाला अफलातून वाटणारे म्हणजेच न समजणाऱ्या नावाच्या  बाटल्याही पुढे पुढे करीत असायच्या. ह्या सर्व सुगंधी तेलाच्या प्रदेशात मालेगावी आवळेल तेलाच्या बाटल्याही अंग चेपुन पण नेटाने उभ्या असत.

ह्या तेलांच्या बाटल्यांच्या झगमगाटात समोर नेहमीचे लक्स, रेक्सोना, स्वस्तिकचा कांति, कधी झिजेल ह्याची वाट बघायला लावणारा दीर्घायुषी हिरवा हमाम आणि ’आरोग्य तेथे वास करी’चा लाल लाइफबॉय ही रोजच्या ’सोप ऑपेरा’तील यशस्वी “साबणे मंडळी” हजर असतच. त्यांच्यापेक्षा वरिष्ठ पातळीवर गोदरेज नं १, पाटणवाला यांचे सुगंधी साबण, पेअर्सची पारदर्शक वडी, म्हैसूर सॅंन्डल सोप आपल्याच तोऱ्यात ऐटीत बसलेले असत. पण पिरॅमिडस, तटबंदी, मैदानी प्रदेश आणि वरच्या पायरीवरील या सर्व साबणांपेक्षाही उच्चासनावर विराजमान असलेले टाटाचे मोती साबणाचे लाडू हे खरे लक्ष वेधून घेत. राजाचा शाही रुबाब, दिमाख या बरोबरच त्याचा “मोठेपणा” हे सर्व निरनिराळ्या रंगातील आणि सुगंधातील ’मोती’ साबणाच्या लाडूत असे. मोती साबणाचा आमच्या हातात न मावणारा लाडू घ्यायचाच हे ठरवायला फार वेळ लागत नसे.

दिवाळीच्या सुटीतले पहिले दोन तीन दिवस अशा आराशीने सजलेल्या बाजारपेठेतून हिंडण्यात जायचे आणि रोज अचंबित होऊन उत्साहाने एक-दोनच दिवसावर आलेल्या दिवाळीच्या पहाटेची वाट बघता बघता कधी झोपी जायचो ते समजतही नसे.

दिवाळीच्या चारी दिवसात रोज आमच्या हातात न मावणाऱ्या साबणाच्या लाडूने आंघोळ करताना, आपण कुणीतरी मोठे झालो असे वाटायचे!

पण दिवाळी संपल्यावर मात्र त्या साबणाच्या लाडुतली अप्रूपता, कौतूक आणि सुगंधही कमी व्हायचा!

आता लक्षात येते की ती सर्व चार दिवसाच्या दिवाळीची जादू असायची!

तरीही छत्रपती म्हटले की शिवाजी महाराज, महात्मा म्हटल्यावर गांधी, तसे लाडू म्हटले की बेसनाचा, बुंदीचा, मोतीचूर या लाडोबांबरोबरच ’मोती’ साबणाचा लाडूही डोळ्यांसमोर येतो.

साबणाचे आता आपले रूपही बदलले आहे. साबणाच्या वड्या कमी झाल्या आणि लाडूही फारसे दिसत नाहीत. साबणाने नवीन अवतार घेतला आहे. साबणाचा आता बॉडी वॉश झाला आहे. कुणाचा ओल्ड स्पाइस तर कुणाचा जिलेट,एक्स! त्यांचीही नव्या दिवाळीत परंपरा होईल.

दिवाळी येतच राहणार आणि साबणाच्या लाडूचीही आठवण यॆणार.

आजही आम्ही तो साबणाचा लाडू आठवणीने आणतो.

सदाशिवनगरचे गोल रिंगण

नातेपुत्याहून सर्व वारी निघाली. आमची अणि सर्वच वारकऱ्यांची मने
जवळपास पंढरपूरला पोचली होती.

आजचा मुक्काम माळशिरस ह्या तालुक्याच्या ठिकाणी. माळशिरस गाव
साखरेच्या शुभ्र समृद्धीचे लेणे लेवून नटले आहे.”पांढऱ्या सोन्याचे”–
-साखरेचे– हे गाव

साखर कारखान्याबरोबरच इतर अनेक सहकारी संस्थांचे जाळे असलेल्या या
गावात प्रवेश केल्यापासून मुख्य रूंद रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठमोठ्या
आधुनिक पद्धतीच्या इमारती; कापड, विविध उपकरणे, खाण्याचे पदार्थ,
टी. व्ही, इत्यादी वस्तूंनी भरलेली मोठमोठी दुकाने नजरेला पडत होती.
अशा या गावाला ग्रामपंचायत कशी? नगरपरिषद वगैरे का नाही? असा
प्रश्न पडला.हे ठरविण्यासाठी दुसऱ्याही निरनिराळ्या कसोट्या असतील
हे नंतर लक्षात आले. ह्या राजरस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या
चांगल्या इमारती, कार्यालये, संस्था ह्यांच्या पाठीमागील गाव कसे आहे?
माहित नाही. पण चांगले समृद्धीचे असणार ह्यात शंका नाही.

माळशिरसला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी सदाशिवनगर
येथील साखर कारखान्याच्या भव्य, प्रचंड मैदानात आज माऊलीच्या
पालखीचे पहिले गोल रिंगण होते.

मी आणि श्री. आवताडे यांनी हॉटेलात चहापाणी केले. हॉटेलवाल्याला पैसे
दॆऊन निघालो. मी पुन्हा माघारी आलो.मालकांना विचारले,”गोल रिंगण पहायचे
आहे.कुठे जायचे? “आलात त्याच दिशेन थोडे मागे जा. कारखान्याच्या मैदानात
पोचाल.कालव्याच्या बाजूला, आमच्या हॉटेलाच्या दिशेलाच बसा, म्हणजे
तुम्हाला सर्व दिंड्या,माऊलीचे पालखी येताना दिसेल. मग पुढे सरका व
पुढच्या रिंगणाच्या बाजूल बसा. सर्व काही मस्त पहायला मिळेल.” त्यांनी
सांगितले.

इतक्या माहितगार माणसाकडून सर्व बारकाव्यांसहित माहिती मिळाल्यावर आणखी
काय पाहिजे?

दुपारची रणरणते उन्ह; नुकतेच खाणेपिणे झालेले. अंगावर सुस्ती
पसरायच्या बेतात आलेली पण तरीही आम्ही मैदानाकडे निघालो.

मैदानात आलो. आम्हाला वाटत होते आम्हीच सर्वांत अगोदर पोचलेलो असणार. पण
आमच्या आधीच हजारो वारकरी तिथे आले होते. त्यांनाही माहितगार
माणसांकडून सर्व बारकाव्यांसह माहिती मिळालेली असावी!

आम्ही खट्टू झालो. पण चिकाटीने पुढे सरकत थोडीशी मोकळी जागा शोधत
पुढे निघालो.एका झाडाखाली हळू हळू पाय पुढे मागे घेत थोडे आरामात
बसलो.

दिंड्या,पालख्या येण्याला अजून खूप अवकाश होता.

नजर टाकावी तिकडे फक्त माणसे आणि माणसे! नुसती गर्दी. बसलेली, उभी
राहिलेली,झाडांवर बसलेली,गर्दीच गर्दी! मधूनच माणसे माऊली म्हणत
उठायची,उभी रहायची. पण अनुभवी वारकरी आम्हाला,”उठू नका, अजून
लई टायम हाय.” असे म्हणायची.

थोड्या वेळाने आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या हॉटेल मालकानी
सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघे उठून पुढे गेलो.बाहेरच्या रिंगणाच्या
काठाशी गेलो. पण तिथेही गर्दीच. बरीच कुटुंबवत्सल गावकरी आणि
वारकरी होते. त्यांच्यामुळेच आम्हाला बसायला, उभे रहायला, बाहेरच्य्या
आणि आतल्या दिंड्यांसाठींच्या दोन रिंगणामधील मोकळ्या जागेत म्हणजे
प्रेक्षकांच्या रिंगणात मोक्याची जागा मिळाली.

बराच वेळ झाला होता. दोघा चौघांनी सांगितले दिंड्या बाहेरच्या रिंगणात
आल्या की इकडे तोंड करून उभे राहायचे आणि सर्व दिंड्यांचे रिंगण झाले की
आतल्या रिंगणाकडे तोंड करून बसा किंवा उभे रहा.

एक एक दिंडी येऊ लागली. हजारो वारकऱ्यांची उत्सुकता त्यांच्या डोळ्यांत
दाटली होती. येणाऱ्या प्रत्येक दिंडीलाही उत्साहाचे उधाण आले होते.

योगायोगाने आम्हाला जागा चांगली मिळाली होती.प्रत्येक दिंडी आमच्या समोरच
थांबायची.

हरिनामाचा, संतांच्या अभंगाचा कल्लोळ, विठूरायाचा गजर करीत,उंच
उड्या मारत तर कधी लेझीमचे हात केल्यासारखे वाकून, गिरक्या घेऊन,
दिंडीकर भजनानंदात दंग असत.त्यांच्या पुढची दिंडी धावत धावत बरेच
अंतर पुढे जाऊन थांबे.अगदी एकदम ब्रेक लावल्यासारखी सर्व मंडळी थांबत. त्या
नंतरची दिंडी मग पुढे यॆई.

एका दिंडीत तर दोन वारकऱ्यांनी सुंदर फुगडी घातली. दहा पंधरा सेकंद
एक मोठी भिंगरी फिरते आहे असे वाटत होते.पुढच्या दिंडीने,दहीहंडी
फोडण्यासाठी जसा मनोरा करतात तसा उंच मनोरा केला.मनोऱ्याच्या शिखरावरचा
वारकरी टाळ वाजवत होता!

आणखी काही दिंड्यांनीही मनोरे केले. एक मनोरा फार उंच नव्हता पण त्याच्या
शिखरावर एक म्हातारे आजोबा वारकरी वैष्णवांची पताका तोल सांभाळत
फडकवत,नाचवत होते!

मोठी मजा आली. हे सर्व चालले होते ते साध्या दोन वाद्यांच्या नादावर!
टाळ आणि मृदुंग!

पंढरपूरला जाणारी श्रीज्ञानेश्वरमहाराजांची पालखी असो किंवा
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीची वारी असो,लाखो
वारकऱ्यांच्या ह्या साऱ्या वाऱ्या टाळमृदुंगाच्या नादब्रम्हावरच चालत
असतात.

सर्व कष्ट, अडचणी विसरून लाखोंचा हा भक्तीमार्ग उत्साहाने पुढे जात असतो
तो टाळमृदुंगाच्या ठेक्यावरच.टाळ आणि मृदुंग! किती साधी आणि बाळबोध
वाद्ये. असे कितीसे निरनिराळे ताल आणि ठेके त्यावर वाजवले जात असतील?पण
त्यांच्या एक दोन भजनी ताला ठेक्यातून वारकऱ्यांवर सुखाची झुळूक सतत
वहात असते.

प्रदक्षिणेचे रिंगण आटोपून सर्व दिंड्या एकत्र जमल्यावर
श्रीज्ञानेश्वरमाऊलीची पालखी अबदागिर, छत्र चामरे आणि घोडेस्वारासह
रिंगणाच्या मुख्य ठिकाणी आली.

आता सर्वांनी तोंडे मागे फिरवली. माना उंचावून नजरा घोडेस्वाराकडे आणि
माऊलीच्या घोड्याकडे लागल्या. त्या अगोदर मारुतीचे रूप घॆऊन एक दोघे आतल्या
रिंगणातून उड्या मारत लोकांची करमणूक करून गेले.

घोडेस्वार आपला घोडा दौडत रिंगणातून फेरी मारून गेला. उत्कंठा वाढतच
चालली.दुसऱ्या फेरीत त्या घोडेस्वाराबरोबर माऊलीचा घोडा भरधाव
गेला.त्याच्या अशा तीन भर वेगाच्या फेऱ्या झाल्या प्रत्येक फेरीला “ज्ञानोबा
माऊली”,”माऊली, माऊली” असा आवाज घुमायचा.तिसरी फेरी झाल्यावर तर
अनेक घोष झाले.अखेर पंढरीनाथ महाराज की जय होत होत दिंड्या बाहेर पडून
पुन्हा वारीचा मार्ग क्रमू लागल्या.इथेही श्रद्धाळू भाविकांची माऊलीच्या
घोड्याच्या रिंगणातील मातीचा अंगारा घेण्याची धावपळ सुरू झाली.

वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर फक्‍त आनंद दिसत होता. भक्तीमार्गाची ही
पेठ असली तरी रोजच्या वाटचालीतील तोच तोचपणा घालवायला ही रिंगणे
म्हणजे वारकऱ्यांसाठी मोठा विरंगुळा असतो. चांदोबाच्या लिंबासारखी
उभी व माळशिरस जवळच्या गोल रिंगणासारखी दिंड्यांची अशी रिंगणे
पंढरपूरपर्यंत तीन चार ठिकाणी होतात.कोणत्याही साधन सामग्री
शिवाय,फुगड्या,फेर धरणे, मनोरे उभे करणे, असे साधे विरंगुळ्याचे खेळ ह्या
ईश्वरनिष्ठांना पुरतात. त्यांचे करमणुकीच्या बाबतीतही “मागणं लई
नाई” हेच खरं.

प्रथमच अनुभवलेला गोल रिंगणाचा रोमहर्षक सोहळा पाहून आम्ही
माळशिरसला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो.

ऍन आयरिश कंट्री डॉक्टर

रेडवूड सिटी

काल रात्री “ऍन आयरिश कंट्री डॉक्टर” हे पॅट्रिक टेलरचे उत्तम पुस्तक वाचून संपवले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतरच्या ५-१० वर्षांच्या काळात नुकताच डॉक्टर झालेल्या एका तरुण ,हुशार डॉक्टराच्या अनुभवाची ही कादंबरी आहे.स्वत: लेखक हा डॉक्टर आहे. खेड्यात वाढलेला आहे. शाळा कॉलेजात अभ्यासू, हुशार तसेच काव्य-शास्त्र-विनोद यात उत्तम रस असलेला असा हा तरुण डॉक्टर. डॉक्टरीची परीक्षा पास झाल्यावर पुढचे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती पण पैशाची अत्यंत गरज होती म्हणून एका लहानशा खेड्यातील अनुभवी डॉक्टराच्या हाताखाली काम करण्यासाठी आला.

खेड्याचे नाव ’बेलीबकलबो’ जिथून डॉक्टर झाला ते बेलफास्ट हेच जवळचे मोठे शहर. ह्या तरुण डॉक्टरचे नाव बॅरी लॅव्हर्टी. ह्याला खेड्यातील निसर्ग सौदर्याची, तिथल्या शांत वातावरणाची मनापासून आवड होती.

बेलीबकलबो कुणालाही फारसे माहित नसलेले गाव. पण तिथला एकमेव डॉक्टर एफ. एफ.ओरॅली तसा प्रसिद्ध होता. ओरॅली म्हणजे एक आडदांड, मस्त व्यक्तिमत्व. त्याच्याकडे काम करताना डॉ.बॅरी लॅव्हर्टीला व्यवसायातील व्यवहारी शहाणपण,रोग्यांविषयी आस्था, गावातल्या लोकांविषयी जिव्हाळा; आपल्या ज्ञानाचा, पेशाचा दबदबा कसा ठेवावा पण त्याच बरोबर रोग्याच्ची जबाबदारी आपण कशी घेतली पाहिजे, त्याच्या कुटुंबाविषयी आस्था, काळजी; आपला थोडा धाक आणि ह्या सर्व गोष्टींबरोबरच इतर गप्पा, धमाल ह्या सर्व गोष्टींचे लॅव्हर्टीला नकळत पण प्रत्यक्ष मिळालेले शिक्षण आणि अनुभव; आणि पुस्तकी ज्ञानपेक्षा लोकांच्या भावना, समजुती, त्यांची रहाणी स्वभाव हे सगळे ध्यानात घेऊन उपचार कसे करावेत ह्याचे फार सुंदर आणि अगदी धमाल विनोदी नसले तरी मनापासून हसवणारे प्रसंग ह्या पुस्तकात आहेत. डॉ.बॅरी लॅव्हर्टीबरोबर आपण वाचकही बॅलीबकलबो ह्या खेडेगावाशी आणि तिथल्या माणसांशी किती एकरूप झालो आहोत हे वाचून झाल्यावरच समजते! डॉ.ओरेली दणकट आडव्या बांध्याची आसामी. त्याचा आवाजही त्याच्या देहाला शोभेल असाच मोठा आणि जीभही धारदार. डॉ. ओरेलीचीही वाचन चौफेर.बायबल, पुराण, कविता, इतिहास, साहित्य, नाटके, शेक्स्पिअर,ऑस्कर वाइल्ड, शॉ ,यांच्या साहित्यातील उतारेच्या उतारे संदर्भासहित पाठ! डॉ. बॅरी लॅव्हर्टीला तोडीस तोड.बोलण्यातही वाकबगार, व्यवहारात बेरकी पण तितकाच मोठ्या मनाचा.उदार हृदयाचा आणि विनोदीही..तो नौदलात डॉक्टर होता.तिथे युद्धात काम केल्यामुळे अनुभव दांडगा.समुद्र आकाश ,वारे ,तारे यांच्या सतत सान्निध्यामुळे त्यातही तज्ञ. अशा डॉ.फिंगल ओरेली ह्या वरून नारळासारख्या टणक,फणसासारख्या काटेरी पण आतून गोड पाण्यासारखा, गोड गऱ्यांसारखा, दणकट तितकाच सहृदयी मोकळ्या मनाच्या , शुद्ध अंत:करणाच्या डॉक्टरवर बॅलीबकलबोच्या लोकांइतकेच आपणही प्रेम करू लागतो. आदराने बोलू लागतो.

गदिमा आणि व्यंकटेश माडगूळकरांमुळे माडगूळ आणि तिथली माणदेशी माणसे, गो.नी. दांडेकरांचे हर्णे,श्री.ना पेंडशांची गारंबी आणि तिथला बापू, पु.लंचे’रावसाहेब’, प्रकाश संतांचा ’लंपन’ आणि त्याचे बेळगाव, आर.के. नारायणचे मालगुडी, जेम्स हेरीयटचे ’ऑल क्रिचर्स ग्रेट ऍंड स्मॉल’ मधील —डेल गाव असो की ए.जे. क्रोनिन चे सिटाडेल मधील गाव किंवा होमेर हिकमचे कोलवूड आणि त्या गावातील खाण कामगार असोत, ही आपल्या मनात कायमची घर करून राहिले आहेत. पॅट्रिक टेलरचे बॅलीबकलबो हे गाव आणि डॉ.ओरॅली,तिथली माणसेही अशीच आपल्या मनात कायमची रहातील यात शंका नाही.
आपणही तिथलेच, त्या त्या गावचे रहिवासी आहोत असे वाटायला लागते. ह्यातच ह्या सर्व लेखकांचे मोठेपण आहे.वर नमुन्यादाखल उल्लेख केलेल्या पुस्तकांमुळे आपल्यालाही आपले गाव आणि तिथल्या माणसांविषयी जास्त जिव्हाळा वाटू लागतो!

*****************************

डॉ.बॅरी लॅव्हर्टी डॉ.ओरॅलीचे बोलणे ऐकत होता. पण त्यापण ह्या खेडेगावात कशाला आलो.,इथे रहायचे की नाही हे ठरत नव्हते.ओरॅलीने त्याला आपल्या समोरच्या खुर्चीत बस म्हणून सांगितले. तो बसला. पण बसल्यावर तो घसरायला लागला. खुर्चीचे दोन्ही हात घट्ट धरून बसला. ओरॅली त्याला खेड्यातील प्रॅक्टिसविषयी सांगत होता.पण लॅव्हर्टी खुर्चीतून घसरता घसरता सावरत बसण्यातच गुंतला होता. ही काय खुर्ची आहे की घसरगुंडी? असे मनात म्हणत होता. आता इथे कसले रहायचे?, नको; विचार करू असे त्याचे चालले होते. आणि एकिकडे जमिनीला पाय घट्ट दाबून खुर्चीत पुन्हा वर सरकत होता.त्याचे हात आणि पाय दुखायला लागले ही घसरगुंडीची कसरत करता करता. डॉ.ओरॅलीला हे सर्व दिसत होते. तो बॅरीला म्हणाला,” हात पाय भरून आले ना?” “होय हो. ही खुर्ची अशी कशी? मी सारखा घसरतोय.पुन्हा मागे वर सरकतोय. पाय घट्ट रोवून रोवून दुखायला लागलेत.”बॅरी म्हणाला. “काय झालय काय खुर्चीला?’” त्याने पुन्हा विचारले. “काही नाही. मी स्वत: ती चांगली नीट दुरुस्त केलीय.” डॉ. ओरॅली म्हणाला. पुन्हा त्यांची बोलणी सुरू झाली. पण डॉ. बॅरी लॅव्हर्टीची त्या घसरगुंडीच्या खुर्चीवरची कसरत काही थांबत नव्हती.”अहो. काय दुरुस्ती केलीय तुन्ही डॉक्टर? तो आता जरा चिडूनच म्हणाला.”खुर्चीचे पुढचे दोन्ही पाय मी एकेक इंच कापून टाकले!” डॉ. ओरॅली हसत हसत म्हणाले. काय़?!!” डॉ.बॅरी जवळ जवळ किंचाळतच म्हणाला.
“हो. नीट बसता येत नाही ना?” डॉ.ओरॅली मख्ख्पणे म्हणाला.”नाही हो, हे काय ….” तो घसरता घसरता म्हणाला.”तुला जसे इथे खेड्यात रहावेसे वाटत नाही तसेच ह्या खुर्चीत बसल्यावर पेशंटला इथे दवाखान्यात फार वेळ थांबावे वाटत नाही” डॉ. ओरॅली शांतपणे म्हणाला. अशा घसरगुंडीच्या खुर्चीवर पशंटला बसवून त्याच्या आजाराची माहिती डॉ.ओरॅली कशी काय घेत असतील असा प्रश्न डॉ. बॅरीला पडला.त्यापेक्षा कारखान्यातल्या सरकत्या पट्ट्यावर पेशंटना का बसवत नाही? धन्य धन्य आहेत हे डॉक्टर ओरॅली! असे तो मनात म्हणत होता. त्याच्या मनातील विचार ओळखून की काय डॉ. ओरॅली म्हणाले,”इथे खेडेगावत काही काही पेशंट असे असतात की त्यांना नुसते “हं, काय होतेय?” असे विचारण्याचा अवकाश की ते जे काही रटाळ चऱ्हाट लावतात ते संध्याकाळ झाली तरी थांबत नाही. जसे काही चावडीवर गप्पा मारत बसले आहेत!”डॉक्टर ओरॅली थोड्याशा वैतागाने, किंचित गमतीने सांगत होते. “इकडे इतके पेशंट खोळंबलेले असतात. काम इतके आणि इतक्या तऱ्हेचे असते की मला एकट्याला आटोपणे शक्य होत नाही. म्हणून ही खुर्चीची मी घसरगुंडी केली. दोन तीन वेळा घसरला की पेशंट आपोआप आपले चऱ्हाट वळणे थांबवतो. मी लगेच, चला, पुढचा कोण? असे ओरडतो.” हे सांगताना डॉ. ओरॅलींचे डोळे मजेशीर चमकत होते!

*****************************

डॉ.ओरैलीने इंजेक्शनच्या सहा पिचकाऱ्या काढल्या. त्या गुलाबी औषधाने भरल्या. “हे काय डॉक्टर?” डॉ.बॅरी लॅव्हर्टीने विचारले.ओरैली हसत हसत,”व्हिटमिन बी१२!” म्हणाला.”बी१२? पण ते काही….”डॉ. बॅरी पुढे काही म्हणायच्या आत,”हो,हो बाबा, मला माहित आहे ते काही टॉनिक नाही. मला माहित आहे आणि तुलाही माहित आहे ते टॉनिक नाही, पण, तो आणखीनच हसत म्ह्हणाला,” पण त्यांना त्या पेशंटना माहित नाही ते टॉनिक नाही म्हणून… जा त्या सगळ्यांना बोलाव!”ओरैलीने डॉ. बॅरी लॅव्हर्टीला सांगितले.
ते सहा पेशंट आले. टेबलाच्या कडेला पण भिंतीकडे तोंड करून वाकून उभे राहिले. एका रांगेत.डॉ. ओरेलीने सढळ हाताने प्रत्येक पेशंटच्या कंबरेखाली थबथबा स्पिरिट फासले. नंतर एकामागून एक असे प्रत्येकाच्या त्या जागेवर खस्सकन सुया खुपसल्या. त्या सहात दोन बायकाही होत्या! पण त्याने सुया सरळ सगळ्यांच्या कपड्यातूनच खुपसल्या होत्या! आणि म्हणूनच स्पिरिटचे बोळे थबथबा फासले होते.डॉ. बॅरी इंजेक्शन देण्याची ही अजब पद्धत पाहून चकित झाला.

“हां, झाले. आता तुम्ही लाह्या फुटल्यासारखे टणा टणा उड्या मारायला लागाल.एकदम झक्क झाले. चला.” डॉ. ओरेली पेशंटना म्हणाला. पेशंट ओरेलीकडे कृतज्ञतेने पहात गेले.”त्यांना कसलाही त्रास होणार नाही आणि बहुतेकांना बरे वाटेल. मला महित आहे ह्याचा औषधी उपयोग काही नाही. पण पेशंटला बरे वाटावे म्हणून अशी समजूत काढावी लागते.” डॉ.ओरेली बॅरीला सांगू लागला.”आपण पेशटला बरे वाटावे म्हणूनच आहोत आणि त्यासाठी असे करावे लागते अधून मधून.”डॉ ओरेली सांगत होता आणि डॉ. बॅरी अजूनही जरा साशंकतेनेच ह्या प्रकाराकडे पहात होता! पण हळू हळू त्याला हे पटणार होते.

*****************************

” डॉ.फिंगल आहेत का?” डॉ.बॅरी लॅव्हर्टीने दार उघडल्यावर एका साठीच्या घरात असलेल्या, तोंडाचे बोळके झालेल्या म्हाताऱ्या बाईने डॉ. बॅरीला विचारले. तो काही म्हणाणार तोच ” या ,या, मॅगीआजी असे मोठ्याने म्हणत डॉ. ओरेली स्वत:च पुढे आला.” हे माझे तरूण मदतनीस, डॉ. बॅरी लॅव्हर्टी.आज तेच तुला तपासतील.”
मॅगी आजी बसल्या. बॅरीने तपासणी करायला सुरवात केली. “काय होतय तुम्हाला?”
डॉ. ओरेलीकडे बघत ती म्हणाली”डोकं दुखतय.””अस्सं. केव्हापासून दुखतय?” डॉ.बॅरी. “अरे देवा! काय सांगू! अहो ते किती दिवसांपासून म्हणून काय सांगू? कधी कधी फार ठणकते. पण काल कमालच झाली. रात्रभर डोकं ठणकत होतं! अजूनही तसं दुखतयच.”हे सांगत असतानाही मॅगीबाई मध्येच डॉ. ओरेलीकडे पहात होत्याच.
” असं.आणि आता मला सांगा हे डोकं ठणकतं ते नेमके कुठे?” डॉ.लॅव्हर्टीने कॉलेजात शिकवले होते त्याप्रमाणे शास्त्रशुद्धपणे पेशंटची तपासणी चालू ठेवली. मॅगी आजी थोडे पुढे वाकल्या आणि गुपित सांगावे तसे हळू आवाजात,आपला हात डोक्यावरच्या फुलाफुलांच्या उंच हॅटच्या वर नेत,”इथे”म्हणाल्या! डो. बॅरी लॅव्हर्टी खुर्चीतून उडायचाच बाकी राहिला होता!”तुमच्या डोक्याच्या वर डोके दुखते?” बॅरी थक्क हॊऊन म्हणाला. “हो, डोक्याच्या वर दोन अडीच इंच वरती.”मॅगी मॅकॉर्कल आजी ठामपणे म्हणाल्या. आता डॉ.बॅरी लॅव्हर्टीची डॉ.ओरेलीकडे पहाण्याची पाळी होती!
“बरं. आणि अलिकडे डोकं दुखु लागले की आवाजही ऐकू येतात?”बॅरीने विचारले. “काय? आवाज?”असे जरा घुश्यातच बाईने उलट प्रश्न केला. डॉ.ओरेलीच समजुतीच्या स्वरात तिला म्हणाले,” डॉक्टर विचारताहेत की तुमच्या कानात काही आवाज होतात असे वाटते का?” “कसे?डिंग डॉन्ग की ट्ट्र्र्र्र्र्र्र्र?” घसरगुंडीच्या खुर्चीत स्वत:ला सावरत मॅगीआजीनी विचारले?” “तुम्हीच सांगा.”ओरेली म्हणाला. “डिंग डॉन्ग! डॉक्टर.” मॅगीबाई. ओरेलीचा चष्मा खाली घसरला होता.तो सावरत हसत असतानाच आजीबाईंचे आपले”डिंग डॉंग..डिंगी डिंगी डॉन्ग… डिंगी..”चाललेच होते. “आजी, बरं”ओरेली अगदी गंभीरपणाचा आव आणून म्हणाला,”डिंग डॉन्ग आणि दोन इंचांच्या वर. दुखतं कुठे डोक्याच्या मध्यभागी का एका बाजूला?” “मध्यभागी नाही.एका बाजूला,ह्या बाजूला. फार वाईट असते का असे ?”मॅगी बाईंनी विचारले. “नाही.तसे काही नाही.” तिच्या खांद्यावर थोपटत ओरेली म्हणाला. आपण एका झटक्यात बरं करू.” आजीबाईंना बरं वाटलं हे ऐकून.ती डॉ.ओरेलीकडे बघून हसली.आणि लगेच तरूण डॉ.बॅरी लॅव्हर्टीकडे अपल्या थंड नजरेने रोखून पाहू लगली. डॉ.ओरेलीने तेव्हढ्यात औषधाच्या कपाटातून एक बाटली काढली.”ह्या गोळ्या खरं काम करतील”डॉ. ओरेली बाईना म्हणाला. “ह्या गोळ्या अगदी निराळ्या, खास स्पेशल आहेत,बरं का,मॅगी. डॉ.ओरेली त्या बाईना दरवाज्याकडे नेत म्हणाला.” बाईनी मान हलवली.” मी सांगतो त्या प्रमाणेच ह्या गोळ्या घ्यायच्या. नीट लक्ष देऊन ऐका.” ओरेली. “हो, अगदी तुम्ही सांगाल त्याप्रमाणेच मी घॆईन. पण कशा घ्यायच्या? मॅगी आजी आता खुषीत होत्या. ओरेलीने त्या आजींसाठी दरवाजा उघडला. “अर्धा तास” इतके म्हणून डॉ.ओरेली थांबला आणि गंभीरपणे तिच्याकडे पहात पुढे सांगू लागला, “बरोब्बर अर्धा तास ,डोकं दुखायच्या आधी बरोबर अर्धा तास आधी.” ” हो का, डॉक्टर? बरं नक्की घॆईन” असे मॅगी आजी डॉ.ओरेलीकडे आनंदाने पहात म्हणाल्या.पण लगेच डॉ.बॅरी लॅव्हर्टीकडे पहात पण डॉ.ओरेलीला म्हणाल्या,”ह्या नवशिक्या तरूण लॅव्हर्टीला अजून बरच काही शिकायचं आहे…”

बिचारा लॅव्हर्टी!

*****************************

डॉ.ओरेली आज तसे घाईतच होते.आज टीव्हीवर त्यांच्या आवडत्या टीमची रग्बीचे मॅच होती. मग ते कशी चुकवणार ती मॅच? त्यामुळे सकाळपासूनच ते प्रत्येक गोष्ट भराभर आटपत होते. कुणाकडेही व्हिजिटला गेल्यावर वेळ घालवत नव्हते.नेहमीच ते मोटार भन्नाट चालवत. त्यात आज ती मॅच चुकवायची नाही ह्याचा ध्यास. घरी परत जाताना गाडी जोरात निघाली. पण रहदारीचे दिवे आले की चौकात नाइलाजाने थांबावे लागायचेच.ओरेलीची अस्व्स्थता आणि चुळबुळ,वाढत जायची.पुढच्या वाहनाच्या ड्रायव्हरवर रागावून स्वत:शीच बोलणे आणि चरफडण्यापलिकडे तो काही करू शकत नव्हता.

एका चौकात रह्दारीचा तांबडा दिवा लागला. डॉ. ओरेलीने गाडी थांबवली. त्याच्या पुढे दोन तीन गाड्या होत्या. अगदी समोर एक ट्रॅक्टर होता. ओरेली अस्वस्थ झाला होता आता. तेव्हढ्यात हिरवा दिवा लागला. पुढच्या दोन मोटारी निघून गेल्या.ट्रॅक्टरचे इंजीनही फटर फटर आवाज करू लागले. पण काय! नुसते फटर, फटर फटर्र्र झाले आणि फट्ट करत ट्रक्टर बंद झाला.त्या ट्रॅक्टरवाल्याने मागे वळून पाहिले तेव्ह्ढ्यात पुन्हा दिवा तांबडा झाला. ओरेली स्वत:शीच चरफडत ओरडत बसला. डॉ. बॅरी हे सगळे पहात होता. त्याने समोरच्या ट्रॅक्टरवाल्यालाही ओळखले. डॉ. ओरेलीचा पेशंटच होता तो. त्या ट्रॅक्टरवाल्याने आरशातून मागे पाहिले आणि डॉ. ओरेलीच मागे आहेत हे पाहिल्यावर तो जरा भेदरला!. दिवा हिरवा झाला. ट्रॅक्टची फटर फटर फटर्र्र्र्र्र्र… सुरू झाली पण तेव्हढेच. पुन्हा फट्ट्ट …. आणि ट्रॅक्टर थंड पडला.पुन्हा त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरने मागे वळून ओरेलीकडे पाहिले. ओरेलीच्या गाडीमागे आता पाच सहा मोटारींची रांग लागली. पुन्हा हिरवा दिवा तांबडा झाला. सगळे चिडून हताश हॊऊन बसले. खेडेगावातील तो मुख्य रस्ता. मुख्य असला तरी किती रूंद असणार? त्या ट्रॅक्टरला वळसा घाळून जाता ही येणे शक्य नव्हते!. इतक्यात दिवा हिरवा झाला. सगळ्या मोटारींनी आपापली इंजिने चालू केली. ट्रॅक्टरही चालू झाला…फटर…फटर..फट्ट्टर.. ओरेलीने गाडी किंचित पुढे नेण्याचा प्रयत्न केला तेव्ह्ढ्यात फट्ट्ट करत तो ट्रॅक्टर बंद पडला. आणि हिरवा दिवा तांबडा झाला. आणि डॉ. ओरेलीचा चेहरा त्या दिव्यापेक्षाही लालबुंद झाला.डॉ. ओरेली गाडीतून उतरला आणि इतर मोटार गाड्या चालू असूनही त्यांच्या इंजिनांच्या आवाजावर चढला होता.इतक्यात दिवा हिरवा झाला. आणि डॉ. ओरेली त्या दिव्याकडे बोट दाखवून ट्रॅक्टरवाल्या म्हणाला, “अरे स्वत:ला माणूस म्हणवून घेणाऱ्या क्षुद्र प्राण्या, डोनाल्ड डोनेली! अरे,बोल, बोल! हिरव्या रंगाच्या अशा, कोणत्या खास छटेची तू वाट पहात थांबला आहेस रे मघापासून इतका वेळ? आं,होय रे?……”

स्वातंत्र्य,प्रगती,सुबत्ता समृद्धी……..

जळगावचे माझे मित्र आणि शेजारी डॉ.देसाई यांना अखेर स्कूटर मिळाली. ती आणण्यासाठी त्यांना धुळ्याला जावे लागले. एक दोन दिवस तिथे रहायला लागले.दोन दिवसांची प्रॅक्टिस बुडाली. पण स्कूटर मिळाली त्या पुढे प्रॅक्टिस बुडणे वगैरे गोष्टी क्षुल्लक होत्या. आपल्या देशाच्या औद्योगिक प्रगती आणि भरभराटीसाठी इतका थोडा त्याग करायलाच हवा प्रत्येकाने. त्यांनी सर्व कागदपत्रे, पैसे भरून स्कूटर ताब्यात घेतली. नेहमी स्कूटर बरोबर एक जास्तीचे चाकही असते. पण त्या दुकानदाराने ते दिले नाही कारण ते आले नव्हते. त्या ऐवजी एक ट्यूब दिली!तरीही डॉक्टर आपली ती नवीन स्कूटर मोठ्या आनंदाने घेऊन आले.तिला हार घालून नारळ फोडून पेढे वाटून विजयी वीरासारखे आले. जळगावच्या वेशीपाशी पंचवीस सुवासिनींनी त्यांना ओवाळायचे तेव्हढे राहिले. पण घरी आल्यावर त्यांच्या बायकोने प्रेम आणि कौतूकभरल्या डोळ्यांनी त्यांचे -त्यापेक्षा त्या स्कूटरचे- पंचारती करून औक्षण केले असणार ह्यात शंका नाही. दिवसच तसे देशाच्या भरभराटीच्या स्वप्नांचे होते. देश आर्थिक सुबत्तेकडे प्रगतीकडे, भरभराटीकडे मोठी झेप घेत होता. आजही तो तशीच झेप घेतच आहे.

नंतरचा महिना दीड महिना डॉक्टर नाटक-सिनेमातल्या शिवाजी सारखी मान थोडी तिरपी वर करून आणि छाती पुढे काढून जात होते. स्कूटरवर असतानाही हीच स्टाईल! पायी चालताना तर ते कुणाकडे ढुंकुनही पहात नसत.त्या काळात कुणी असे चालू लागला की सगळ्यांना समजायचे ,ह्यांचा स्कूटरचा नंबर लागला. ह्यांना स्कूटर मिळाली!अखेर स्कूटरचा नंबर लागला, स्कूटर मिळाली की पुढे आयुष्यात काही करायचे बाकी नसे! आपली स्कूटर असणे म्हणजे काय असते ते आताच्या केव्हाही, कुठेही, पैसे फेकले की ’बाईक’ मिळणाऱ्या,आणि ती घेणाऱ्या पिढीला कळणार नाही. तो गगनात न मावणारा आनंद, तो अभिमान, ते आपले कर्तृत्व,आपले स्वप्न सत्यात उतरले त्या यशाचा उत्साह आणि मनात मारलेल्या आनंदाच्या उड्या, ह्या सर्व शुद्ध आनंदाची चव आणि अनुभव आता कुणाला येणार नाही!

ह्याचे कारण डॉक्टरांना ती स्कूटर पैसे भरून पाच वर्षांनी नंबर लागल्यावर मिळाली होती!

हे सगळे सांगण्याचे कारण आमच्या वासुनाने सांगितलेला किस्सा. वासुनानाच्या मित्रानी काटकसर करून, बऱ्याचशा इच्छा मारून पैसे साठवले आणि पैसे घेऊन तो स्कूटरसाठी नाव नोंदवायला स्कूटरच्या शोरूममध्ये गेला.निमुटपणे पैसे भरले. कुठे राहतो, त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड विजेची तीन बिले वगैरे सर्व सोपस्कार पूर्ण झाले. पावती घेतली. दुकानदाराला नम्रपणे विचारले,”स्कूटर केव्हा मिळेल? दुकानदाराने आपल्या पुस्तकात पाहिले आणि सांगितले,” बरोबर ह्याच तारखेला म्हणजे १५ ऑगस्टला पण पाच वर्षांनी या.” वासुनानाचा मित्र म्हणाला,”शेठजी,पाच वर्षांनी स्कूटर ताब्यात घ्यायला सकाळी येऊ का संध्याकाळी?” शेठजींना हा असे का विचारतो ते समजेना. तो म्हणाला,का, तुम्ही असे का विचारता?” मित्र म्हणाला,” त्याच दिवशी ग!असचा सिलिंडरही येणार आहे घरी…म्हणून… म्हणून….”

[१६ ऑगस्ट,२००८ द इकॉनॉमिस्ट्च्या अंकात एका वाचकाच्या पत्रावरून मला हे सुचले. त्याने रशियात मोटार मिळणे किती अवघड होते,असते ह्या संबंधी विनोदी किस्सा पाठवला होता. त्याचा आधार माझ्या लिखाणाला आहे.]

हसण्यासाठी जन्म आपला!

रेडवूड सिटी

मला एकदम हसू आलं. कारण काही नाही. सोनियाची आठवण झाली आणि
तिची हसरी मूर्ती डोळ्यांसमोर आली. हसण्यासाठी तिला विशेष कारण
लागत नाही. आणि म्हणूनच तिचे हसणे इतकं गोड असावे. सोनिया अवघी दोन
अडीच वर्षांची. सोनियाला हसताना पाहणे ह्यापरते दुसरे सुख नाही,
भाग्य नाही. सोनिया हसू लागली की–खरं म्हणजे कोणतेही लहान मूल हसू
लागले की-प्रकाश जास्त उजळतो, पक्षी अंगणात येतात, झाडे डोलू लागतात,
वारा फ़ुलांचा सुगंध घेऊन येतो, बाल-निर्झर हसत-खेळत झुळुझुळ वाहत
येतो, काळज्या मिटून जातात, खेद-खंत मावळतात, राग-लोभ पळून जातात;
सारे जग हसू लागते.

हसवणारा सगळ्यांनाच आवडतो. मग तो विनोदी लेखक,कवि, वक्ता, विनोदी
कलाकार, नट-नटी, विदूषक, व्यंग चित्रकार,गोष्टीवेल्हाळ कोणीही असो,
तो सर्वप्रियच होतो.विनोद,चुटके, किस्से, आठवणी, गप्पा म्हणजे रोज येणाऱ्या
आनंदाच्या सरीच! त्यांत भिजणे कुणाला आवडत नाही?

हसणे आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. नव्हे ते आयुष्यवर्धक संजीवक आहे
असे डॉक्टरही म्हणतात.कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा युनिव्हर्सिटीच्या
हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या आणि ह्रुदयविकाराच्या रुग्णांना “आय लव्ह ल्युसी”
सारखे विनोदी कार्यक्रम रोज दाखवतात. ते पहाताना रोगी आपले दुखणे विसरून
हसत असतात. ह्यामुळे शरीरातील टी-सेल्स वाढून त्यांची प्रतिकारशक्ती
वाढल्याचे आढळून आले.

“सॅटर्डे रिव्ह्यू” ह्या प्रख्यात मासिकाचा संपादक नॉर्मन कझीन हा मणक्यांच्या
विकाराने अंथरुणात पडून होता. त्यावेळी तो मार्क्स ब्रदर्सचे विनोदी चित्रपट
पहात असे. आठ दिवसात पूर्ण बरा होऊन तो चालू लागला.हे पाहून डॉक्टरही
चकित झाले.

नाटकातील, कथा-कादंबऱ्यातील संवादात कुणी हसला किंवा हसणे हे हा:
हा: ; ही ही; हो हो; असे लिहून दर्शवतात.इंग्रजी आणि इतर भाषांतही असे
ह-च्या बाराखडीतून “हसणे” सुचवतात.स्वराच्या मागे ह हे व्यंजन
वापरलेले असते. आपण श्वासोश्वास घेतानाही “ह” असाच काहीसा आवाज होत
असतो. म्हणजे श्वासोश्वासा इतकेच हसणेही आपल्या जीवनाशी किती निगडित
आहे पहा! इतर भाषांत ’हसणे’ यासाठी जे शब्द आहेत त्या शब्दांची सुरवात
’ह’ या व्यंजनाने होत नाही; उदा. इंग्रजीत ’लाफ”लाफ्टर’; पण मराठीत मात्र
’हसणे’ ’हास्य’ हे शब्द ’ह’नेच सुरू होतात! आपल्या मराठीचे हे एक खास
वैशिष्ठ्य आहे.

कुणी”हसून हसून बेजार होतो” पण हसल्यने तो आजारी पडल्याचे
कोणी ऐकले नाही. “हसून हसून आपले पोट दुखले” असेही कुणी सांगतो पण
हसण्याने कधी तब्येत बिघडल्याचे आपल्याला माहित नाही. प्रख्यात इंग्रजी
लेखक आणि निबंधकार मॅक्स बीरभॉमने म्हटल्याप्रमाणे, ह्या पृथ्वीतळावर
आपल्यापूर्वी आणि आजपर्यंत इतके लोक हो़ऊन गेले पण हसण्यामुळे, हसून
हसून कोणी दगावला आहे अशी इतिहासात कुठेही नोंद नाही.
बायबलच्या जुन्या करारातील जेनेसिस[विश्वोत्पत्ती संबधीचा भाग]मधील एक
प्रसंग लक्षात घेण्यासारखा,गमतीचा आहे.:- आणि देव ऍब्रॅहमला
म्हणाला,”मी तुझ्यावर आणि तुझ्या बायकोवर प्रसन्न झालो आहे. माझ्या
आशीर्वादाने तुम्हाला मुलगा होईल!” हे ऐकून ऍब्रॅहम पोट धर धरून हसू
लागला.अगदी जमिनीला डोके टेकेपर्यंत हसत होता. त्याला वाटले, माझी
म्हाताऱ्याची देव किती थट्टा करतोय!”
ही देववाणी ऐकून ऍब्रॅहमची बायको-सेरा-सुद्धा हसायला लागली. ह्या
वयात-त्यावेळी ती नव्वद वर्षांची होती- आपल्याला मूल होणार ह्या नुसत्या
कल्पनेनेही तिला हसू लोटलं. देव आपली गंमत करतोय असे तिला वाटले.
देवाने त्या मुलाचे नावही ठरवले होते. देव पुढे म्हणाला,”तुमच्या मुलाचे
नाव आयझॅक असेल.” खरी गंमत पुढेच आहे–’आयझॅकचा अर्थही,’हसरा’ ’तो
हसेल’ ’हसणारा’ असा आहे!

आपले मूळ स्वरूप आनंदच आहे असे आपल्या अध्यात्मिक तत्वज्ञानातही म्हटले
आहे. ही आनंद साधना करणे ह्यात आपल्या आयुष्याचे सार्थक आहे असे आपले
संत, ज्ञानी पुरूषही सांगतात.

आपले हसणे, हास्य म्हणजे आनंदाचा प्रकट आविष्कार. आनंदाचे मूर्त स्वरूप
म्हणजे हसणे, हास्य! इजिप्तमध्ये सापडलेल्या, इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या
शतकातील एका कागदपत्रात म्हटले आहे: “जेव्हा देव मोठ्या आनंदाने
पहिल्यांदा हसला तेव्हा प्रकाश निर्माण झाला…..दुसऱ्यांदा मोठ्याने हसला
तेव्हा पाणी निर्माण झाले…. आणि जेव्हा देव सातव्यांदा [सात मजली?] हसला
तेव्हा मानव, मनुष्य प्राणी निर्माण झाला!” परमेश्वराच्या आनंदाच्या
परमोच्च क्षणी आपला जन्म झाला ही कल्पना किती रम्य आहे!

हे सगळं हसण्यावारीच जाण्याची शक्यता आहे.हसण्यासंबंधी इतके
वाचल्यावर तुम्ही, हे म्हणजे अगदी, “अति झालं आणि हसू आलं” असे म्हणून
हसाल.हरकत नाही. तुम्ही असे हसण्यातही मजा आहे!

पोस्टमन

परवा बाळासाहेबांचे पत्र आले.आजही हाताने पत्र लिहून पोष्टाने
पाठवणारी थोडी माणसे असतील त्यापैकी बाळासाहेब आहेत.पाकिटावरील
सुंदर हस्ताक्षरावरूनच समजलो की बाळासाहेबांचे पत्र! सुंदर
अक्षराबरोबरच ते, पाकिटही वेलबुट्टीनी तर कधी फुलांच्या नक्षीने
सजवतात. आजच्या पाकिटावर पत्रं घेऊन लगबगीने निघालेल्या पोस्टमनचे
लहानसे चित्र चिकटवले होते.पत्रावर आपले चित्र पाहून पोष्टमनही खूष
झाला होता. पाकिट माझ्या हातात देताना तो हसत होता त्यावरूनच ते दिसत
होते.इतके समर्पक चित्र पाहून मलाही त्यांचे कौतूक वाटले.पत्रासाठी
कोणीतरी घराघरात, कार्यालयात, वाट पहात असेल हे जाणून असलेला तो
पोस्टमन किती लगबगीने निघाला आहे!

आपल्या प्रियकराचे पत्र आज यॆईल म्हणून अधिरतेने सारखे आत बाहेर करत,
शिवाय ते दुसऱ्या कोणाच्या हातात पडू नये ह्यासाठीही,मधेच खिडकीतून
दूर टक लावून पोस्टमन दिसतोय का याची उत्सुकतेने वाट पहात असलेली तरूणी
असेल; किंवा”इतके दिवस झाले अजून तिचे पत्र कसे नाही”म्हणून थोडा चिडलेला,
थोड्या चिंतेत असलेला पण तितक्याच आतुरतेने आपल्या प्रियतमेच्या पत्राची
येरझाऱ्या घालत वाट पहाणारा “घायाळ” प्रियकर असेल; तर “माहेरी गेली की
विसरली मला”असे गेले चार दिवस घोकणारा,नुकतेच लग्न झालेला तरूण
नवरा विरह कष्टाने सहन करत, सर्वच बाबतीत सध्या उताविळ असलेला तो
नवरा पोस्टमनची तितक्याच उताविळपणे वाट पहात असेल; तर एखादी
पहिल्यांदाच माहेरी आलेली तरूण माहेरवाशीण”ह्यांचे पत्र कसले येते!

बसले असतील हॉटेलात मित्रांच्या बरोबर चहा ढोसत,हसत खिदळत.कशाला
आठवण येतेय त्यांना!” असे मनातल्या मनात म्हणत पण चेहऱ्यावर मात्र आज
नक्की यॆईल पत्र असा हर्षभाव असलेली, आपल्या धाकट्या भावा-बहिणींना
पोस्टमनकडे लक्ष ठेवा रे असे सांगत स्वत:च दाराबाहेर दोन चार वेळ येऊन त्या
मेघदूताची वाट पहात असेल.

एखादी माऊली, घर सोडून पहिल्यांदाच लांबच्या गावाला शिकायला/
नोकरीला गेलेल्या मुलाच्या साध्या खुशालीच्या पत्राची प्राण डोळ्यात
साठवून वाट पहात असेल तर दूर गावी शिकायला, नोकरीच्या
खटपटीसाठी गेलेला मुलगा आपल्या वडिलांच्या “गोष्टी घराकडील”
पत्राची वाट पहात गहिवरून उभा असेल.किंवा एखादा तरूण इंटरव्ह्यू अथवा
नेमणूकीच्या पत्राची, मान मोडून दुखायला लागली तरी आशेने पोस्टमनची
वाट पहात असेल; कुणी नवखा लेखक संपादकाच्या”तुमची कथा दिवाळी
अंकासाठी स्वीकारली आहे” अशा भाग्योदयी पत्राची डोळ्यांत दिवाळीच्या
चंद्रज्योतीचा प्रकाश घेऊन धडधडत्या अंत:करणानी वाट पहात असेल.उपवर
मुलीचे आईबाप “मुलगी पसंत आहे, मुहूर्त नक्की करण्यासाठी या”अशा
पसंतीची मोहर असलेल्या पत्राची, उत्सुकता आणि काळजीने दाटलेल्या
डोळ्यांनी पोस्टमनची रोज वाट पहात असतील!

पोस्टमन ना नात्याचा ना गोत्याचा. पत्र आणल्या दिवशी मात्र प्रत्येकाचा!
असा इतका बाहेरचा असूनही सगळ्यांच्या ह्रुदयातला झालेला त्याच्या
सारखा समरस सेवक दुसरा नाही!

खऱ्याखुऱ्या अर्थाने सर्वांचा ’पत्रमित्रच’ तो. सगळ्यांचे ज्याच्या
वाटेकडे डोळे लागलेले असतात तो पोस्टमन!

पण हे सगळे पत्रपुराण ४५-४६ वर्षापूर्वीच्या काळाला लागू पडणारे आहे.

आज दूरध्वनी,संगणक, ई-मेल, व्हॉइस-मेल,एसएमएस,टेक्स्ट मेसेज,सर्वसंचारी
दूरध्वनी इत्यादी आधुनिक सोयींची रेलचेल झाली आहे की हस्ताक्षरातील
पत्रेच गेली.ती आता “एन्डेंजर्ड स्पेसीज” झाली आहेत.पत्रेच नाहीत तर
पोस्टमनची वाट कोण पाहिल?

छापील कचरा वाटप करण्याचे काम फक्त त्याला आता राहिले आहे.तोही
बिचारा आता कोरडेपणाने काम करतोय ह्यात त्याचा काय दोष?

पूर्वीचा पोस्टमन “कुणा’रावसाहेब!’बोले बघून। कुणा’भाऊ!’नाना!’म्हणे तो
हसून॥ अशी नावे पुकारून पत्र टाकताना किंवा हातात देताना पत्राच्या
अक्षरा रूपावरून त्यातील भावना हसून, डोळ्यांनी, भुवयांनी आनंद,
आश्चर्य व्यक्त करत जात असे.

कोण कोणत्या पत्राची वाट पहातात हे अनुभवी पोस्टमनला सरावाने माहित असे.
“वकीलसाहेब, मुलासाठी बऱ्याच पत्रिका-फोटो आलेले दिसताहेत!”असे अदबीने
म्हणत त्यांना पत्रे दॆईल तर भोसले मधुला,”चहा-चिवडा तरी पाहिजे नोकरी
लागल्याचा”असे म्हणून सरकारी पत्त्याच्या पाकिटाकडे पहात लांब पाकिट
दॆईल. “श्री”आणि कसलाही मायना नसलेले दोन-तीन ओळीचे कार्ड खाली मान
घालून न बोलता शेजारच्या लाटकरांच्या घरात हळूच सरकवून झटकन
पुढे जाईल.

काळाच्या झपाट्यात हे सर्व संपले.आणि त्यात काही नवल नाही. असे होणारच.

पोट खपाटी गेलेला शेतकरी जसा पावसाच्या ढगाची, आकाशाकडे खोल
गेलेल्या डोळ्यांनी काकुळतीने वाट पाहात असतो त्याप्रमाणे एखाद्या खेड्यातील
कुणी गरीब आई-बाप पोराच्या मनीऑर्डरसाठी आजही पोस्टमनची काकुळतीने
वाट पहात असतील म्हणा.

आणि आपला पोस्टमनही, ती मनी-ऑर्डर देण्यासाठी लगबगीने निघालाही
असेल!

परिस मिळाल्यावर……!

रेडवूड सिटी ४ जून, २००८

नेहमीप्रमाणे बाळासाहेबांचे पत्र आले. नेहमीप्रमाणे पत्र वाचून आनंदही झाला. पण त्यांच्या अलिकडील काही पत्रातून,”कुणाशी बोलावे,चार गोष्टी कराव्यात तर तसे कोणी आसपास दिसत नाहीत. कोणी फारसे भेटत नाहीत. आवडीने बोलावे, थट्टामस्करी, प्रसंगी थोडासा वात्रटपणा करावा असे शेजारी जवळपास भेटत नाहीत.कुणाकडे जावे तर असे तडक जाताही येत नाही.” अश्या थोडाश्या निराश तक्रारीचा सूर जाणवत होता.मला वाटले ते परदेशात असल्यामुळे त्यांची अशी मन:स्थिती झाली असावी.

सध्या परदेशातच नव्हे तर आपल्या येथेही वारंवार एकमेकांकडे जाणे येणे कुठे होते? आले मनात की गेलो मित्रांकडे,नातेवाईकांकडे,असे घडत नाही. इतकेच काय शेजाऱ्यांकडे जाऊन गप्पा-टप्पा,थट्टा-मस्करी, पत्ते कुटणे होत नाही. कारणे अनेक असतील पण थोडक्यात सांगायचे तर बदललेली, रोज बदलत असलेली परिस्थिती हेच मुख्य कारण होय.

माणसे भेटावीत,आपण जाऊन त्यांना भेटावेत असे सर्वांनाच वाटते.काही काळापूर्वी म्हणजे घरांचे दरवाजे उघडे असण्याच्या काळात हे शक्य होते. बोलावून, न बोलावता, शेजारी, जवळपासचे असे भेटत असत.भेटीगाठी सहज होत.

हुंकाराला शब्दांचा अंकुर फुटण्यापूर्वी, आवाजाला शब्दांची पालवी बहरण्यापूर्वी; दळणवळणाची साधने येण्यापूर्वी माणूस एकमेकांना कसा भेटत असेल,कसाबोलत असेल! आपला प्रतिध्वनी ऐकू आला तरी त्याला कोणी भेटल्याचा, कोणाशी बोलल्याचा आनंद झाला असेल!

माणूस बोलयला लिहायला लागल्यावर तो पक्ष्यांमार्फत चिठ्यांतून संदेश पाठवू लागला. भेटता येत नाही,गपा मारता येत नाहीत यावर माणसाने शोधून काढलेला उपाय म्हणजे पत्र.असे म्हणतात की, परमेश्वराला एकाच वेळी सगळीकडे,सगळ्यांकडे जाता/पाहता यॆईना म्हणून त्याने ’आई’ निर्माण केली.माणसाने ’पत्र’ शोधून काढले! पत्रं लिहायला सुरूवात केली.पत्रातून भेटी गाठी हॊऊ लागल्या,होत आहेत आणि पुढेही होतील.काळाप्रमाणे पत्र आपले रूप बदलेल.

नळ-दमयंतीचे पत्र हंस होते.कालिदासाने तर कमाल केली. त्याच्या यक्षाने मेघालाच आपले पत्र केले.’न देखे रवि,ते देखे कवि’अशा प्रतिभावान कवींनी चंद्रालाही पत्र केले– साजण आपल्याला विसरला अशी त्याच्या भेटीसाठी तळमळत असलेली प्रेयसी ’चंदा देस पियाके जा’आणि त्याला समजावून परत घेऊन ये अशी चंद्राला विनवणी करते.तर माहेरच्या आठवणीने मन भरून आलेली सासुरवाशीण, अंगणात आलेल्या पाखराला ’माझिया माहेरा जा’, तुझ्या सोबतीला माझे आतुरलेले मन देते आणि माहेरची वाट दाखवायला भोळी आठवणही देते,असे म्हणत पाखराला आपले पत्र करते. तुरुंगात बंदीवान झालेला क्रांतिकारक तर आपल्या श्वासांना पत्र करून आपल्या ह्रुदयातील खंत मातृभूमीला कळवतो!

पत्रांतून माणूस आपले विचार, मतं कळवतो.मनातल्या गोष्टी, ह्रुदयातील गोड गुपित सांगतो, मन मोकळे करतो. पत्रातून माणसे एकमेकांना भेटतात ही कवि-कल्पना वाटेल किंवा भाषालंकार. पण भेटत असली पाहिजेत. काहींना तर ती दिसतातही! असावीत; कुणी सांगावे? तसे नसते तर उगीच का कुणी एखादे पत्र ओठांना लावून ह्रुदयाशी घट्ट धरतो? का कुणी हातात पत्र फडफडवत हसत हसत सगळ्यांना दाखवत घरभर फिरतो? का कोणी आराम खुर्चीतून उठून,नाकावर घसरलेला चष्मा सावरत,”पाहिलस का…आपला…काय म्हणतोय” म्हणत कौतूकभरल्या डोळ्यांनी ते पत्र दुसऱ्या चष्म्याला देतो! पत्र वाचल्यावर आपल्याला आनंद होतो,आपण तरंगतो,बुडून जातो,थोडेसे चकित होतो, सुखावतो, काळजीतही पडतो. सगळे कसे कोणी भेटल्यावर बोलल्यावर वाटते तसेच पत्र वाचून होते यात शंका नाही.कवींचे मेघ, चंद्र, हंस, पाखरू, श्वास हे वरवर पहाता पत्र-दूत वाटतील, पण ती त्यांची पत्रेच आहेत.

सध्याच्या अतिशय वेगवान काळात एकमेकांना भेटणे, गप्पा गोष्टी करणे पत्रं लिहिणे शक्य होत नाही.पण शब्दसृष्टीच्या परतिभावंतांने लिहिलेल्या शब्दांतूनही मणसे भेटवण्याची दिसताहेत अशी भावना निर्माण केली त्याचप्रमाणे प्रतिभाशाली वैज्ञानिकांनी त्याहीपेक्षा सोयीचे,उपाय शोधून आपल्या हातात दिले. दूरध्वनी, बिनतारी संदेश,आणि ह्यांचीच आजची बदलली विविध रूपे पाहिली की आपण थक्क होतो.परिसाचा एक लहानसा तुकडा सर्व लोखंडाचे सोने करतो. तसे आजच्या विज्ञानयुगातील लहानशा परिसाने-मायक्रोप्रोसेसर चिपने[लघुतम क्रियाप्रक्रियाकारी ?]सर्व विश्व आपल्या घरात आणून ठेवले! संगणकावरून आपल्या अनेक मित्रांशी एकाच वेळी बोलता येते.संगणकातून पत्र लिहिले तर ते पोचायला एक क्षणही लागत नाही. दूरध्वनी वरून बोलताना समोरचा आपल्याला समोर दिसतो! व्हिडिओ कॉन्फ़रन्सिंगने[चित्रफितिमुळे]चार मित्रांची झकास गप्पाष्टकेही रंगू शकतात.आणि हे सर्व, मनात आले की क्षणार्धात घडून येते! चाळी-वाड्यांतील घरांची दारे उघडी असण्याच्या काळात जसे सहज होत असे तशाच आता ह्या मायक्रोप्रोसेसरच्या ’परिसा”मुळे हे सर्व साधते.भाषाप्रभू शब्द आणि कल्पना सृष्टीचे निर्माते तर विज्ञानप्रभू सत्याभास सृष्टीचे जनक.ह्या किमयागारांनी आणि त्यांच्या “परिसाने” प्रत्यक्ष आणि कल्पित, सत्य आणि मिथ्य, वास्तव आणि भास यामधील सीमारेषा इतकी पुसट,अंधुक केली आहे की भासाची चाहूलही लागत नाही! ही खरी किमया! पुन्हा कवींच्या शब्दातच म्हणावेसे वाटते ’प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर’!

हा नव्या मनुचा नवा परिस हाताशी असल्यावर पूर्वीची ती पत्रे, त्या भेटीगाठी,त्या गप्पा नाहीत, ’गेले ते दिन गेले’ ही खंत कशाला? परिस हातात असल्यावर जुन्या सोन्याच्या खाणी उजाड झाल्या ह्याची चिंता कोण करेल? आणि का करावी?

गरीब बिचारा मारुती – एक उपेक्षित दैवत

आज हनुमान जयंती. मारुतीचा जन्म झाला तो साजरा करण्याचा दिवस. त्यामुळेच वर उजव्या कोपऱ्यात शब्दांचे भु:भुत्कार उमटले असावेत.

खरं तर मारुतीचा म्हणून वर्णिलेला एकही गुण अंगात नाही. त्याच्यासारखे दणकट शरीर नाही की ताकद नाही. त्याची चपळाई नाही की त्याच्या उंच उड्डाणाची, शारीरिक सोडा मानसिक ’झेप’ही नाही. फार तर ’झोपावे उत्तरेकडे’ इतकेच बिनघोर जमते मला! मारुतीशी कसलेही साम्य नाही, तुळणा नाही. पण इतके सणवार, जयंत्या उत्सव येतात. अगदी वाजत गाजत येतात, गर्जत जातात. मग आजच मारुती जन्माची–हनुमान जयंतीचे मला इतके अप्रूप का वाटावे? आठवण का व्हावी?

तशी काही कारणे सांगता येणार नाहीत.सांगता येतीलही. (ही अशी कायमची द्विधा अवस्था; जन्मभराची!) हो आणि नाही दोन्ही एकदमच. असो.

लहानपणी दोन तीन वर्षं मी, मी आणि श्याम; तर कधी श्याम आणि देगावकर चाळीतली कुणीतरे मुलं असे मिळून- आणि हो शशीही असेच- फरशा, विटांचे लहान लहान तुकडे लावून ’देऊळ’ करायचो. आमच्या किंवा कधी आबासाहेबांच्या बोळात, मागच्या अंगणात हे देऊळ असायचे. देवळाचा इतर जामानिमा देवळाच्या फरशा विटाच्या तुकड्यांना साजेसाच!मारुतीचे कुठून तरी आणलेले लहानसे चित्र तरी किंवा त्यतल्या त्यात चांगला गुळगुळीत उभा दगड हाच आमचा मारुती असायचा. कोरांटीची, गुलबक्षीची किंवा पारिजातकांची एक दोन फुले त्यावर कशाचीही हिरवी पाने! मारुती खूष!पण हा’उत्सव’आमच्या उत्साहा इतकाच दोन तीन वर्षेच झाला असावा.

पण ह्या ’उत्सवा’ पेक्षाही आमच्या मारुती भक्तीला, प्रेमाला खरे उधाण भागवत टॉकीज मध्ये ’रामभक्त हनुमान’ हा अद्भुत चित्तथरारक सिनेमा पहाताना यायचे. मारुतीचा सिनेमा पहाण्याचा आनंद मोठा असायचा. माझ्यासारख्या लहान मुलांचाच नाही तर साध्या अशिक्षित कामगारांचा पोरांचाही तसाच असायचा. हा सिनेमा काही हनुमान जयंतीलाच लागत नसे. तो केव्हाही यायचा.संक्रांतीच्या जत्रेच्या वेळी कुठल्यातरी एखाद्या थेटरात हमखास असायचाच. ह्या मारुतीवर बरेच सिनेमा निघाले. आणि रामावरच्या सिनेमातही मारुती असायचाच!

मारुतीच्या सिनेमातील ट्रिक सीन्स, मारुतीने आपली छाती फाडून,(गंजिफ्राक फाडतय बे त्ये!असं पुढं मोठेपणी म्हणायचे) त्याच्या हृदयात राम लक्ष्मण सीता बसलेली दाखवणे, त्याची आकाशातील उड्डाणे वगैरे भाग म्हणजे खरा सिनेमा. तुफान गर्दीत चालायचा. त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या.’पवनपुत्र हनुमान’, ’जय हनुमान’ ’रामभक्त हनुमान’. शिवाय रामायणावरचे सिनेमे मारुतीशिवाय कसे पूर्ण होतील?रामापेक्षाही सर्वजण मारुती कधी येतो… मोठ मोठी झाडे उपटून उचलून; प्रचंड दगड फेकून राक्षसांच्या टाळक्यात कधी हाणतो त्यांना हैराण करतो; गदेने त्यांची टाळकी कधी शेकणार; राक्षसांच्या छातीत गदा हाणून त्यांना कधी लोळवणार; ह्याचेच मोठे कौतूक आणि उत्सुकता सगळ्या थेटरला असे!

अलिकडे सिनेमाचे तंत्र, छायाचित्रण कितीही सुधारले असो पण त्या आमच्या सिनेमातील मारुती हात पाय पसरून ते हलवत आकाशातून पोहत, झेप घेत निघाला की सगळे थेटर त्याच्याबरोबर पराक्रमाला निघत असे.मग तो टेबलावरच त्या पोझमध्ये आडवा पसरला आहे; टेबलाची अंधुकशी रेघ दिसतेय; वरच्या दोऱ्या अस्पष्ट दिसताहेत; आकाशातले ढग फक्त मागे जाताहेत; मारुती आहे तिथेच आहे; अशा कर्मदरिद्री शंका कुशंका घेण्याचे करंटेपण थेटरातला एकही प्रेक्षक करत नसे. मारुती आपल्या जळत्या शेपटीने लंकेला आग लावतोय , रावणाची दाढी जाळतोय (रावणाला दाढी कशी? विचारू नको बे!), ह्या गच्चीवरून त्या वाड्यावर उड्या मारतोय ह्याची अपूर्वाई; तो अद्बुत पराक्रम सगळेजण आपापल्या बाकावरची, खुर्ची वरची जागा सोडून अर्धवट उभे, ओणवे हॊऊन, पुढच्या माणसाच्या खांद्यावर हात टेकून तोंडाचा आ करून पहात. मारुतीला शाबासकी देत. “तिकडे राहिले”, “अरे तो वाडा”, “तो महाल” “आता त्या गच्चीवर हां” “अरे तिकडून राक्षस येतोय”, हय़्य रे पठ्ठे!” अशा शंभर सुचना देत, प्रोत्साहन देत मारुतीला सावध करत ते सीन जिवंत करत. दिग्दर्शकाचे पुष्कळसे काम प्रत्येक थेटरात आम्ही प्रेक्षकच करत असू! पडद्यावर एक मारुती, थेटरात ३००-४००!

आणि अशा वेळी जर का फिल्म तुटली मध्येच तर काही विचारू नका.पहिल्यांदा”अबे लाईट” चा आरडा ओरडा. लाईट आल्यावर जस जसा उशीर हॊऊ लागला की त्या ऑपरेटरच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार सुरू. प्रथम त्याच्या आई-बापा पासून कौटुंबिक सुरवात करत एक एक ठेवणीतल्या गावरान शिव्यांचा वर्षाव सुरू होई. जितके प्रेक्षक तितक्या शिव्या. बरं एक शिवी पुन्हा वापरायची नाही.उष्टं कोण खातंय? तिळा दार उघड म्हणल्यावर अलिबाबाला तो प्रचंड खजिना दिसला तसा फिल्म तुटल्यावर हा शिव्यांचा खजिना उघडला जायचा! क्षणभर मारुती मागे पडायचा आणि अशा इतक्या प्रकारच्या शिव्या ऐकून आमच्यासारखी मुलं नुसती थक्क होत!पण फिल्म जोडून सिनेमा चालू झाला की पुन्हा सगळे मारुतीमय हॊऊन जात.

आश्चर्य म्हणजे आज एकही लाऊडस्पीकर चौकात, कोपऱ्या कोपऱ्यावर ओरडत नाही! गाणी नाहीत. झेंडे नाचवणे नाही. शोभायात्रा नाहीत. मिरवणुका नाहीत. झांजांचे आवाज आदळत नाहीत की ढोल, ताशे बडवले जात नाहीत. गुलाल उधळला जात नाही की शेंदूर फासला जात नाही.
मारुती दैवत राहिले नाही की काय? मारुतीला देवांच्या यादीतून वगळले तर नाही ना?
मारुती देवापेक्षा आज मारुती मोटारच लोकांना प्रिय आहे. शिवाय मारुती हा”बुद्धिमतां वरिष्ठं” असा असल्यामुळेही तो ह्या लोकांच्या समजुतीपलीकडे असावा.तो “वानर युथ मुख्यम” मधील ’युथ’ हा शब्द इंग्रजी आहे अशा समजुतीमुळेही मारुती परधर्मीय देव आहे असाही शोध त्यांनी लावला असावा.

मारुतीचे देऊळ जास्त करून खेडेगावात असते.म्हणून त्याला ग्रामीण वर्गात टाकून पांढरपेशा शहरांनी त्याला उपेक्षित ठेवले असावे.

उत्सव, शोभायात्रा, यासाठी असले आडदांड शक्तिवान दैवत धार्मिक “मार्केटिंग”साठी व्हायेबल/फिझिबल प्रॉडक्ट/इमेज नाही असा सल्ला सर्व पक्षातील कॅंपेन मॅनेजमेंट गुरूंनी दिला
असावा. मारुती भले ’मारुततुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं’ वगैरे असेल पण तो श्रीरामदूतंही असल्यामुळे अशा दूताचा-दासाचा-नोकराचा कसला उत्सव? हा विचारही झाला असावा. त्यामुळेही सर्वत्र शांतता आहे.

प्रत्येक गावातील मारुतीच्या देवळातील मारुती आजही मिणमिणत्या दिव्याच्या अंधारात विनारुपाच्या चेहऱ्याने आकृती म्हणूनच उभा आहे. हातात गदा असून ती हाणता येत नाही. दुसऱ्या हातावर द्रोणागिरी झेललेला आहे पण तो कुठे ठेवताही येत नाही. झेप घेण्याचा पवित्रा आहे पण पाय उचलत नाही. धडकी भरवणारा बुभ:त्कार करून सर्व भूमंडळ सिंधुजळ डळमळून टाकावे आणि ब्रम्हांडही गडगडावे अशी शक्ती आहे पण गुरव पुजाऱ्यांनी शेंदूर नुसता फासलाच नाही तर तोंडावर फासून आत तोंडातही घातल्यामुळे घसा निकामी झालाय. सर्वांगी शेंदूर थापून थापून मारुती दिसेनासा झालाय.मिणमिणत्या अंधारात सगळ्या गावातले मारुती उदास उभे आहेत. बिनवासाची उदबत्ती देवळातली कोंदट हवा कुबट करत धुराचे झुरके सोडत कलली आहे.

गरीब बिचारा मारुती. सगळ्यांनी उपेक्षिलेला. एके काळी आमच्या लहानपणचा महाबळी प्राणदाता असलेला मारुती आज उदास मारुती झालाय!

धर्म आणि अध्यात्म

पुणे.

जगातील सगळे भेदभाव काढून टाकणारा धर्मच टिकेल. खरा धर्म अजून बनलेला(च) नाही. तो यापुढे बनायचा आहे. सर्व मानवांचा तो एकच धर्म होईल.

वेदकाळापासून आजपर्यंत ’धर्म’ हा शब्द सतत चालत आला आहे. तो संस्कृत शब्द आहे. दुसऱ्या कोणत्याही भाषेत त्याला नेमका प्रतिशब्द नाही.

धर्म हा व्यापक शब्द आहे. आपले जीवन ज्या नीतिविचारांवर आधारलेले असते त्याला आपण धर्म म्हणतो. गणिताप्रमाणेच धर्माच्या तत्वातही बदल होत नाहीत. तिन्ही काळात आणि सगळ्या देशात ती सारखीच अविचल असतात. उदा. सत्य-प्रेम-करूणा हे सदगुण देशकालानुसार बदलत नाहीत. आज जगात जे वेगवेगळे (धर्म) दिसतात ते धर्मपंथ अथवा संप्रदाय आहेत. या संप्रदायांनी लोकांना एकत्र ठेवले होते. पण आज मात्र हे सगळे संप्रदाय तोडणारे सिद्ध होत आहेत. या संप्रदायांनाच आज धर्म म्हटले जाते. त्यांच्या जागी अध्यात्माला आणायचे आहे.

अध्यात्म धर्मपंथाहून वेगळी वस्तू आहे. प्रेम करणे, खरे बोलणे, करूणा ठेवणे हे अध्यात्म आहे.

ईश्वरभक्ती करणे हेही अध्यात्म आहे. ईश्वराच्या प्राप्तीसाठी गुडघे टेकणे, पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करणे, उपवास करणे हे आजच्या प्रचलित धर्माचा भाग आहे. पण स्वत:वर नियंत्रण ठेवण्याकरता उपवास करणे हे आहे अध्यात्म.

धर्म बाह्य गोष्टींसाठी आदेश देतो. अध्यात्म आतली शक्ती वाढवतो. धर्म आणि अध्यात्म एकाच वस्तुकडे जातात. आजचा धर्म मनुष्याला आंधळा समजून हात धरून मुल्ला,मौलवी, गुरूंच्या मागे जायला शिकवतो. अध्यात्म म्हणजे तुम्ही आणि ईश्वर यांच्यामधे आणखी कोणी नाही.

—— आचार्य विनोबा भावे ( यांचे धर्म आणि अध्यात्म यावर स्फुट विचार)

ता. ७ फेब्रु. २००५ च्या ’आजची वार्ता’ह्या जाहिरातींच्या वर्तमानपत्रात आलेला हा मजकूर. सप्रेस(मराठी); सर्वधर्म प्रभूचे पाय या पुस्तकातून.