पुणे
कार्ल मार्क्स ( ५ मे १८१८- १४ मार्च १८८२ )
आपल्या तत्वज्ञानाने जगावर कायमचा ठसा उमटवणारा कार्ल मार्क्स ह्याचीआज जन्म द्विशताब्दी. प्रख्यात नाटककार लेखक आॅस्कर वाईल्ड म्हणतो, “An idea that’s not dangerous is unworthy of being called an idea at all.” कुण्या एखाद्या विचारवंताला हे विधान सर्वथैव लागू होईल तर ते कार्ल मार्क्सलाच!
मार्क्स हा मुळत: तत्वज्ञ, अभ्यासक आणि विचारी होता. त्याच्या खळबळजनक व वेगळ्या विचारांनी प्रभावित विसाव्या शतकात झालेले जसे अनेक होते तितकाच मोठा गैरसमज त्याला भविष्यकाळातील क्रांतीचा अग्रदूत मानणाऱ्यांनी निर्माण केला. बाहेर त्याने मांडलेल्या सिद्धांतावर चर्चा वादविवाद इतर विद्वान करत असताना मार्कस् आपला बराच वेळ ब्रिटीश म्युझियममध्ये प्राचीन काळातील तत्वज्ञ व त्या काळचे अर्थतज्ञ ह्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यात घालवत असे. शंभर वर्षानंतरही मार्क्सचा विचार ‘मार्क्सिझम’ ह्या शब्दाशीच निगडित केला जातो. त्याला सामाजिक आर्थिक क्रांतीचा द्रष्टा,प्रेषित बनवणाऱ्यांनी त्याच्यातील तत्वज्ञाकडे दुर्लक्ष करून मार्क्सिस्टम्हणवून घेणाऱ्या एन्गल्स, लेनिन,स्टालिन,माओ,कॅस्ट्रो ह्यांनी आपल्या क्रांतीला व जुलमी दहशतीच्या कारभारासाठी सोयिस्कर तो अर्थ लावून त्याचा वापर केला. मार्क्स हा माणसाच्या स्वातंत्र्याच्या,स्वत:चे भवितव्य स्वत:च घडवणाऱ्या मूलभूत प्रवत्तीवर विश्वास ठेवणारा होता. (सामाजिक स्थितीचा विचार करता तो कामगार कष्टकऱ्यांचाही त्यात मुख्यत्वे समावेश करतो;माणूसच स्वत: आपले भविष्य घडवतो;विशेषत:कामगार आणि कष्टकरी.) कामगार स्वत: त्याचा सर्वतोपरी उद्धार, जोखडांतून मुक्ती करुन घेऊ शकतो ह्यावर मार्क्सचा विश्वास होता.पण त्याच बरोबर त्याच्यावर हेगेलच्या एकच एक अशा सर्वंकष सामाजिक बदलाच्या वैश्विक नियमाचाही प्रभाव होता. ह्या बदलाचे,परिवर्तनाचे रुपांतर,मला वाटते, वर सांगितलेल्या पुढाऱ्यांनी त्यांच्या क्रांतीत केले.
कोणत्याही विचाराचे, तत्वाचे किंवा तत्वज्ञानाचा विचार करणारे आपल्या दृष्टिकोनातून ते मांडतात. पूर्णपणे वैज्ञानिक असलेल्या उत्क्रांतिवादाचे स्पष्टीकरण शतकानुशतके निरनिराळ्या विद्याशाखांनी आपले अर्थ लावून केले. इतकेच काय विज्ञानाशी संबंध नसलेल्या हिटलर सारख्यांनी Survival of the Fittest चा अशास्त्रीय संबंध लावून तो आपल्या राजवटीसाठी वापरला, तिथे इतिहासाच्या तत्वज्ञानातूनही हिंसक क्रांति व जुलमी हुकुमशाहीचे समर्थन होते ह्यात आश्चर्य ते काय !
व्हाॅल्टेअरने,” जे तुम्हाला,त्यांचे भ्रामक विचार हेच तात्विक सिद्धांत व तेच सत्य आहे ह्याची खात्री करून देतात तेच तुमच्याकडून समाज- घातक गोष्टी सहज करवून घेतात;” असे म्हटलेय ते आजच्या काळातही किती स्पष्टपणे लागू आहे ते पहा! ह्यामध्ये मार्क्सवादाचे समर्थन नाही अथवा टीकाही नाही. पण कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाचा प्रभाव कायम राहणारा आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे. मार्क्सला डावलून कोणत्याही काळात सामाजिक आर्थिक आणि पर्यायाने राजकारणावर विचारविमर्श होऊ शकत नाही. त्याचे दास कॅपिटाॅल हे वाचायला आणि अभ्यासण्यासाठी अतिशय किचकट क्लिष्ट आहे. पण तो तितक्याच बारकाईने वाचावा व अभ्यास करावा हे अनेकजण सांगतात. जगातील इतर देशांतील वाचकांची, विचारवंतांची माहिती नाही. आणि आपल्याकडीलही सर्वांची माहिती नाही. पण मानवेंद्रनाथ राॅय व काॅ.श्रीपाद अमृत डांगे ह्यांनी मात्र त्याचा चांगला, पूर्ण व सखोल अभ्यास केला होता ही माहिती आहे.
जेव्हा रशियात कम्युनिझम मोडकळीस आला तेव्हाही मार्क्सवादाचा हा पाडाव आहे असे लोक म्हणत असताना मी म्हणत होतो की हा मार्कसच्या तत्वज्ञानाचा पराभव नाही पण ज्यांनी तो त्यांच्या पद्धतीने अमलात आणला त्या हुकुमशहांचा पाडाव आहे असे म्हणालो होतो. तत्वज्ञान, विचार नष्ट होत नाहीत. ते विपरितरीत्या अमलात आणणारे पराभूत होतात, असे म्हटले होते. तशा अर्थाचे पत्रही मी म.टा.मध्ये लिहिले होते. असो. The Hindu मध्ये रामन जहाबेगलू (Ramin Jahanbegalu) यांचा कार्ल मार्क्सवरील लेख वाचला त्यावर, व जे ह्यात जे काही विसंगत वाटणारे आहे ते माझे, असे हे ज्ञान अज्ञान मिश्रित टिपण आहे.