Memories – 1

मॅरिएटा

प्रतिभशाली प्रसिद्ध कवि बा.भ. बोरकरांच्या बहुतेक सर्वच कविता फार चांगल्या व काही सुंदर आहेत . तर कांही सर्वोत्कृष्ट आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘ सरीवर सरी …” आणि “ निळाई”, “तेथे कर माझे जुळती.“

बोरकरांच्या दोन कविता तरी आम्हाला शाळेत होत्या.

“ दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती …. यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर

घडिले मानवतेचे मंदिर

परि जयांच्या दहनभूमीवर

नाहि चिरा नाहि पणती

तेथे कर माझे जुळती”.

तशीच “ एकच माझा साद ऐक प्रभु एकच माझा साद……

पापासरशी देउनि शापा

सन्मार्गी मज लाव लावी बापा

जाणतसे मी तुझ्या घरी प्रभु

शासन हाचि प्रसाद .

ऐक प्रभु एकच माझा साद …..

आणखी एक “ जीवन त्यांना कळले हो

मीपण ज्यांचे सहजपणाने परिपक्व फळापरि गळले हो

जीवन त्यांना कळले हो…

त्यांची प्राथमिक शाळेच्या पुस्तकात असलेली व शोभा आणि सुहासमुळे आम्हाला माहित झालेली अप्रतिम काव्यचित्री कविता “ निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव …”

ही कविता . अशा किती सुंदर कविता सांगायच्या त्यांच्या!

आज बोरकरांची किवा त्यांच्य कवितांची आठवण का आली अचानक.? मी कविता कधी फारशा वाचत नाही तरीपण कवि बोरकरांची आठवण होण्याचे कारण म्हणजे ते सोलापुरला आमच्या घरी आले होते ,! हो. नुसते आले नव्हते तर ते रात्री त्यांचा सोलापुरातील कार्यक्रम संपल्यानंतर जेवायलाही आले होते. जेवतांना, ते रंगून जाऊन गप्पाही मारत होते. आम्ही त्यांच्या पंक्तीला नव्हतो पण हॅालमध्ये आम्हाला त्या बऱ्यापैकी ऐकू येत होत्या.

त्या काळचे नाटककार वि.ना. कोठीवाले हे तर ते जेव्हा जेव्हा सोलापुरला येत त्यावेळी आमच्या घरी यायचे. तेही जेवायला असत कधी कधी. एकदा जेवताना बोलत असता कोणत्या तरी संदर्भात हात समोर लांब करीत , “ अहोऽ धडेऽऽ! “ असे मोठ्यांदा म्हणाले. आम्ही म्हणजे मी श्याम वासुनाना एकदम चमकलो. थोड्या वेळाने कसेतरी आम्ही हसू दाबत कुजबुजायला लागलो.आज श्याम असता तर ह्या आठवणीत त्याचे आणखीही तपशील भरले असते.

ह्या नामवंत लेखकांच्या मालिकेत तितक्याच प्रसिद्ध लेखका विषयी सांगितले पाहिजे. ते म्हणजे सुप्रसिद्ध कादंबरीकार, रुपककथाकार, चित्रपटकथा लेखक व साहित्यातील अत्युच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले लेखक वि. स. खांडेकर! हयांचे आमच्या घरी कधी येणे, आमच्या आठवणी लक्षात राहण्याच्या वयात तरी झाले नव्हते. पण ते सोलापुरला १९४२ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. एक गंमत ती. अण्णा सांगायचे की खांडेकरांनी त्वाटत होते आमच्या अण्णांनाच स्वागताध्यक्षाचा मान मिळेल, मिळावा. पण तसे काही घडले नाही. त्यानंतर कित्येक वर्षांनी वि.स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेव्हा पुरस्कार मिळालेल्यांना आपले काही मित्रांना जवळच्यांना समारंभास हजर राहण्याचे निमंत्रण पाठनता येत असे. आणि वि.स खांडेकरांनी आपल्या ती. अण्णांना ते निमंत्रण पाठवले होते! खरं तर ह्या मध्यंतरीच्या काळात त्यांचा ती. अण्णांशी किती संपर्क होता किंवा नाही हे सांगता येत नाही. पण त्यांच्या व अण्णांच्या त्यावेळी झालेल्या भेटीचा प्रभाव अजूनही असावा इतकेच म्हणता येईल. ह्या संदर्भात अण्णा सांगायचे की त्यांनी सोलापुरात साहित्यिक वर्तुळात चौकशी केली पण एकालाही हे आमंत्रण आले नव्हते!

हे झाले सोलापुरच्या बाहेरच्या मोठ्या शहरातील ख्यातनाम साहित्यिक कवींविषयी. पण सोलापुरचेच, आपल्या एकाच कवितेने संपूर्ण महाराष्ट्रात कायम प्रसिद्ध झालेले कवि कुंजविहारी! कुंजविहारींची “ भेटेन नऊ महिन्यांनी” ही हुतात्मा होणाऱ्या एका देशभक्ताची कविता आहे. कविवर्य , ते सकाळी फिरायला जात तेव्हा, आमच्या घरी रोज सकाळी येत असत. त्यांची फेरी आली की मग चहाबरोबर ती. अण्णांशी त्यांच्या गप्पा होत. त्यामध्ये मग ते त्यांची नुकतीच केलेली ताजी कविता चालीवर म्हणून दाखवत. त्यांनी म्हटलेल्या अशाच कवितेपैकी एक उत्तम कवितेच्या एक दोन ओळी लक्षात आहेत. ‘ उसात रस रसात गोडी …’ अशी ती कविता होती. त्यांनी भेट दिलेल्या त्यांच्या एका काव्यसंग्रहात ती आहे. त्यांचा आवाज खणखणीत व त्यात थोडासा गोडवाही होता. आमच्याकडे कविकुंजविहारींचे नियमित येणे होत असल्यामुळे ते किती चांगले व मोठे कवि आहेत ह्याची मला तेव्हढीशी जाण नव्हती. पण अलिकडे “आठवणीतल्या कविता” ह्या नामांकित संग्रहात अनेकांच्या आठवणीत असलेली त्यांची “भेटेन नऊ महिन्यांनी “ ही कविता पाहिल्यावर त्यांचे कविम्हणून मोठेपण लक्षात आले! आमच्या चंदूने त्यांचे अतिशय समर्पक स्मारकशिल्प तयार करवून घेतले. ते आजही राजवाड्या सारख्या भव्य व देखण्या महापालिकेच्या इमारतीच्या प्रांगणात उठून दिसते !

आणखी चिमणराव” “ वायफळांचा मळा”, “ओसाडवाडीचे देव” “ माझे दत्तक वडील” ,चिमणरावांचे चऱ्हाट “. “चिमणराव आणि गुंड्याभाऊ” ही विनोदीच नव्हे तर मराठीच्या सर्व साहित्य प्रकारातील अजरामर जोडी निर्माण करणारे, “चिमणरावांचे स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग” हे अप्रतिम विनोदी प्रकरण लिहिणारे, ज्यांच्या विनोदी कथांवर आधारित प्रसिद्ध नट ,दिग्दर्शक निर्माते, मा. विनायक यांनी काढलेल्या ॰सरकारी पाहुणे” ह्या चित्रपटाची मूळ कथा, प्रख्यात साहित्यिक . ज्यांनी आम्हाला शाळकरी वयापासून हसायला शिकवले ते प्रा. चिं. वि. जोशी! हे सुद्धा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या घरी दोन तीन वेळा तरी चहाला येत असत.

आम्हाला अशा बऱ्याच मराठी साहित्यिकांना जवळून पाहण्याचे ‘अहो भाग्यं’ लाभले ते आमचे वडील वै. ती अण्णांच्यामुळे! ते त्यांच्या पिढीतील उत्तम यशस्वी नाटककार, साहित्यिक व व्याख्याते होते, प्रसिद्धही होते!

आमचेअण्णा,साहित्यक्षेत्रातील विशेष महत्वाची संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद, तिच्या सोलापूर शाखेत सक्रिय होते. तिथे पदाधिकारीही होते. त्यांनी आणि प्रभात चित्रपटगृहाचे संचालक शं. ग. पटवर्धन यांनी मिळून जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यात मराठी संमेलने भरवली होती. ती. अण्णा जनरल लायब्ररीच्या कार्यकारिणीत बरीच वर्षे प्रमुख सभासद होते व एक किंवा दोन वर्षे ते लायब्ररीचे अध्यक्षही होते. मसापचे कार्यालय प्रभात टॅाकिजच्या एका बऱ्यापैकी मोठ्या सभगृहातच होते. ती. अण्णा बहुतेक तिथे रोज, कोर्टाचे काम झाल्यावर संध्याकाळी जात असत.

आमच्या ती. अण्णांची सोलापुरात किंवा महिन्या दोन महिन्यातून जिल्ह्यातील बार्शी पंढरपूर मंगळवेढा अशा तालुक्याच्या ठिकाणीही व्याख्याने होत असत. त्या काळी सर्व गावच, निदान घरातली मुलंबाळं तरी रात्री आठ वाजता गाढ झोपलेली असत. त्यामुळे ती. अण्णा रात्री केव्हा येत हे आम्हाला सकाळीच समजे. तेही मधल्या खोलीतल्या खुंटीवर चांगला जाडजूड झुलता हार पाहिल्यावर समजत असे. मग समजायचे की अण्णांचे कुठेतरी व्याख्यान होते ! सुट्टीच्या दिवशी तर दोन तीन हार दिसत!

बरं अण्णांची व्याख्याने फक्त साहित्य,वाड•मय ह्या संबंधातच नसत. तर इतरही विषयांवर होत. त्यांना रोटरी क्लब , लायन्स क्लब मध्येही व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले जाई. शिवाय वकीलांच्या बार असोशियनमध्येही वर्षांतून दोन तीन वेळा त्यांची भाषणे होत.त्या दिवशी अण्णा आम्हाला सेशन्स कोर्ट जज्ज, सरकारी वकील कधी कलेक्टरही हजर होते असे सांगत. भाषणानंतर ती मंडळी आवर्जून आपले मत सांगत. ह्यातील बरीच भाषणे अर्थातच इंग्रजीत होत. मला आठवतेय एकदा आमच्या चंदूने सांगितले की तो आणि ती. अण्णा सोलापूरचा नकाशा घेऊन बसले होते. व अण्णांची कुठे कुठे व्याख्याने झाली, त्यावर ते पिना टोचत होते. काही ठिकाणी तर एकापेक्षा जास्त वेळा झालेली असत. नगरेश्वराच्या देवळापासून ते रिमांड होम पर्यंत , लायब्ररी, रिपन हॅाल, मुळे सभागृह, कोर्टाचे बार असोशिअनचा हॅाल, सेवासदन, नव्या रामाचे देऊळ, तेलगु समाजाच्या सभागृहात, मार्कंडेय मंदिर, सेंट्रल कोॲाप बॅंकेचा हॅाल, प्रभात टॅाकीजचा हॅाल( मसाप), अ. वि. गृहाचे सभागृह आणि मला लक्षात नसलेली अनेक स्थळे! किती सांगावीत!. त्यामुळे वर्षभर आमच्या घरांत फुलांचे गेंदेदार- सोलापुरात अशा मोठ्या गुबगुबीत हारांना संगीत हार म्हणत-फुलांचे हारच हार असत!! घरांतही ती.अणांच्या भाषणांचा,विद्वत्तेच्या,साहित्यिक व संत वाड•मयाचा सुगंध सतत दरवळत असे. हा शब्दगंध कायम होता. ती. अण्णा वकीलीतून हळू हळू निवृत्त होत असण्याच्या काळापासून ते त्यांनी शेवटचा श्वास सोडेपर्यंत त्यांची अध्यात्म मंडळात, (कोतकुंडे वकीलांच्या घरी,) नव्या रामाच्या मंदिरात अध्यात्मावर, ज्ञानेश्वरी दासबोध( समर्थांच्या वाड•मयावर) प्रवचने चालूच होती.

ती. अण्णांच्या व्याख्यानांचा म्हणा किंवा साध्या भाषेत सांगायचे तर भाषणांचा वृत्तांत रोज सोलापुर समाचार आणि किंवा संचारमध्ये येत असे. त्यामुळे ती.अण्णा म्हणजेच पं. मा. कामतकर वकील हे नाव अनेकांच्या परिचयाचे होते. आमच्या ती. सौ. माईचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ती. विजयअण्णा म्हणाले ,” अण्णांचे नांव आम्ही वर्तमानपत्रात रोज वाचत असू. तेव्हा हिचे ( आमची सौ. माईचे) स्थळ सांगून आले तेव्हा आम्हालाच जास्त आनंद झाला. इतके प्रसिद्ध स्थळ म्हणजे काय! “ ह्यावरून चंदूनेच सांगितलेली आम्हा सर्वांना दिवाळीत जमलो असतांना सांगितलेली गोष्ट आठवली. तो, ती. अण्णांच्या बरोबर एका रनिवारी बाहेर जात होता. हाजरतखानच्या मशिदीपासून ते लकी चौक , पुढे जुने दत्ताचे देऊळ ते बक्षीब्रदर्स च्या दुकानापर्यंत ती. अण्णांना किती लोक नमस्कार करत होते! शेवटी त्याने मोजायचे थांबवले!

ती. अण्णांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा हा एक पैलू झाला. पण ते तितकेच यशस्वी वकीलही होते. क्रिमिनल खटलेच ते घेत. आमच्या घराच्या पायऱ्यांवर तर कधी त्या लहानशा अंगणातही पक्षकार बसलेले असत. ती. अण्णा त्यांच्या व्वहारज्ञान, कायद्याची सखोल माहिती, प्रतिपक्षाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्या संबंधात , साक्षीदारांची निष्णात वकीली पद्धतीने करण्याची उलट तपासणी, अर्ग्युमेन्टबद्दल कोर्टाच्या वर्तुळात त्यांना फार मानले जाई. शिवाय आपल्या कामाबद्दल व अशीलाबद्दलअसलेली त्यांची निष्ठा ह्यामुळे अण्णांनी केस चांगली लढवूनही कधी आरोपींला शिक्षा व्हायची. पण निकालानंतर तो गुन्हेगार अशिल व त्याच्या घरातील लोक ती. अण्णांना नमस्कारच करीत! ती फासेपारधी मंडळी म्हणत “वकीलसायेब तुम्ही जोरदार लढलात! पण त्या जज्ज्याला पटलं नाही म्हणायचं.! “

स्वातंत्र्य मिळाल्यावरही काही वर्षे वरिष्ठ न्यायाधीश ब्रिटिश असत. त्यांना अण्णांच्या चांगल्या इंग्रजीचे कौतुक वाटत असावे. कारण ती. अण्णा ब्रिटिश न्यायाघिशांच्या भाषेतील phrases आणि idioms ह्यांचा आपल्या कामात चपखल वापर करीत. त्याबद्दलचा एक किस्सा ती. अण्णा आम्हाला सांगत. अण्णा कधी मधी सिव्हिल दिवाणी केसही घेत. पण शक्यतो घटस्फोटाच्या केसेस ते घेत नसत. पण घेतलीच एखादी दुसरी तर ते बरेच वेळा दोन्ही बाजूंना बोलावून समजूत घालून , सामंजस्याने सोडवत. ह्यात वेळ जाई पण ह्यामागे कुटुंब तुटू नये ही त्यांची एकच भावना असे. तरी काही प्रकरणे कोर्टात जात. अशाच एका केसमध्ये मुलाचा ताबा कुणाकडे असावा यावर बरीच वादावादी झाली. न्यायाधीशांनी दोन्ही वकीलांना विचारले. प्रतिपक्षाच्या वकीलाने आपली बाजू चांगली मांडली. जेव्हा अण्णांना न्यायाधीशाने विचारले तेव्हा ती. अण्णा पटकन फक्त येव्हढेच म्हणाले,” Your honour , it’s obvious, calf goes with the cow!”पुढे अण्णा सांगत की ,” ते ऐकून जज्ज वेल्स (Wells) टेबलावर हात आपटून ,” of course! That’s it!” म्हणाले!

पुढे चालू ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *