चुनाभट्टी/शीव
जगातील पहिली working woman आई होय. ह्या कामकरी-कष्टकरी आईचे विविध रुपात दर्शन होत असते. शेतात, निंदणी खुरपणी वेचणी कापणी करणारी, उन्हात रस्त्यावर झारीने गरम डांबर ओतणारी, पुर्वी कापड गिरण्यांतही काम करणारी, बांधकामाच्या ठिकाणी तर हमखास दिसणारी, भाजीपाला विकणारी, डोक्यावर ‘कपबशा बरण्याब्बाई’ म्हणत दुपारी फिरणारी बोहारीण आणि तशीच घरात काेणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली आपली आई ! मॅक्झिम गाॅर्कीने त्या बाईचा सन्मान The Mother ह्या कादंबरीने केला.
गेल्या १९३०-४० सालापासून कनिष्ठ मध्यम वर्गातील व मध्यम वर्गातील कमी अधिक शिकलेल्या आया घराबाहेर पडून कारखान्यात आॅफिसात काम करू लागल्या.आणि सत्तरीच्या दशकापासून तर जास्तच प्रमाणात चांगल्या शिकलेल्या बायका मुली नोकरी करु लागल्या आणि “वर्किंग वुमन”चे नाव होऊ लागले. आज बहुसंख्य आया-बाया, स्त्रिया स्वतंत्र अर्थार्जन करु लागल्यामुळेWorking Woman भोवती एक वलय निर्माण झाले आहे. आणि त्यात काही गैरही नाही. कामाच्या ठिकाणी पाळणाघरे, दिवसभर मुलांना सांभाळण्याची त्यांची करमणुक करण्याच्या सोयी निर्माण झाल्या आहेत. त्या आवश्यकच आहेत.आणखीही सोयी होणे आवश्यकचआहे. पण अशा सोयी कामगार आया स्वत:च करत आणि आजही करताहेत. कामाच्या ठिकाणीच झाडाखाली, दोन्ही फांद्यामध्ये झोळीचाच “हॅमाॅक” करून, तर कुठे टाकीच्या सावलीत पोतं अंथरून पाळणाघर त्या आया आपल्या लेकरांसाठी आजही करतात. दोन्ही स्थानाठिकाणी, सर्वजणी आयाच आहेत ही महत्वाची समान गोष्ट आहे. आईची मायाममता सारखीच आहे. “ते हृदय कसे आईचे”हेच त्यातले खरेआहे!
जगात कशातही,कोणत्याही- सर्वांचे शेवटचे आशास्थान त्या न्यायातही- गोष्टीत समानता नाही. आहे ती फक्त ‘आई’पणात! मग ती आई घरातली असो की आॅफिसातली!
आंब्याच्या दिवसात घरोघरी आमरस होतोच. आंबे पिळून झाले की पातेल्यातली रसभरीत झालेली एक एक कोय चांगली पिळून दुसऱ्या पातेल्यात टाकली जायची. मग त्या कोयी दुधापाण्यात पुन्हा कोळून रसाच्या पातेल्यात तो रस ओतायचा. रस तयार ह्यायचा. पण त्यात एक गंमत असे. सर्व कोयी कोळल्या नसत. एक कोय अगोदरपासूनच त्या रसात असे. विचारले तर ‘शास्त्र म्हणून” ठेवायची असते असे म्हणत. जेवताना प्रत्येकजण रस मस्त”व्हडी अप्पाS”म्हणत ओरपून ओरपून तर मध्येच पोळीच्या मध्यस्थीशिवाय थेट वाटी तोंडाला लावूनच रिकामी करत असे.’आता पुरेSs’ स्थिती झाली की सर्व “मातृभक्त श्याम”,आई किंवा बहिणी पुन्हा रस वाढायला लागली तर “ नको नको आईला राहू दे की म्हणत वाटीभरून घ्यायचे! जेवणं संपून इकडे तिकडे करून झाल्यावर पुन्हा स्वैपाघरात आल्यावर आई जेवायला बसलेली असे. आणि त्या पातेल्यात रसातळाला गेलेल्या चमचा दोन चमचे रसाच्या ठिपक्यातली कोय आई कोळून तो रस वाटीत घेताना दिसायचे!
त्या कोयीचे हे शास्त्र होते तर! प्रत्येक घरातील आयांचे हेच त्या ‘रसातील कोयीचे वेदोपनिषद’ असते. निळ्या पिवळ्या प्लास्टिकने झाकलेल्या पत्र्याच्या छपरात, पत्र्याच्या किंवा सिमेटच्या पत्र्यांच्या चाळीतील घरातल्या आयांचेही ‘भाकरीच्या कोराचे’ असेल, ‘वशाट चे‘ ‘कालवणाचे ‘ चे असेल पण तेही “रसात ठेवलेल्या एका कोयीचे’च शास्त्र असते!
“दया, प्रेम आणि वात्सल्य ही क्षमेची नेहमीची तीन मंदिेरे आहेत,” असे आ. विनोबा भावे म्हणतात. दयेसंबंधी सांगायला नको. प्रेमात प्रेमिकांना एकमेकांचे दोष दिसत नाहीत. मित्र तर दोषासकट आपल्या मित्राचा स्वीकार करतो. तर वात्सल्य आपल्या मुलाचे दोष पोटात घालून त्याच्यावर निरपेक्ष मायाच माया करत असते. हे तिन्ही गुण फक्त एका आईतच एकवटले आहेत!
काॅलेजात असताना रिडर्स डायजेस्टमध्ये वाचलेले एक अवतरण आठवले. “God cannot be everywhere at the same moment so he created Mother!”
(मातृदिनाच्या निमित्ताने)