हे असे हृदय फक्त आईचेच….

स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता. म. गांधींनी उभारलेला चंपारण्यातील हिंदुस्थानातील शेतकऱ्यांचा पहिला लढा सुरू होता. त्यानंतर मीठाच्या सत्याग्रह सारा देश अहिंसेच्या मार्गाने लढत होता. खेड्यापाड्यातील जनता निर्भय झाली होती. तशी ब्रिटिशांची दडपशाही सुद्धा वाढतच होती. त्याच काळातील एका गावातील तरुणाची आणि त्याच्या आईची ही कहाणी आहे.

आत्माराम गावातील आणि आजुबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला आपल्या लेखणीने तोंड फोडत होता.त्यामुळे त्याला त्याच्या गावचे आणि दुसऱ्या गावातील गावकऱीही चांगले ओळखत होते. त्याचे सगळेच लेख,पत्रे छापून येत नव्हती. पण जी येत त्यामुळे सरकार अस्वस्थ होत असे.त्यामुळे ब्रिटिश त्याच्यावर नजर ठेवून होते.

आत्माराम आणि त्याची आई असे दोघेच एका लहानशा मातीच्या घरांत राहात होते. सारवलेल्या अंगणातील एका झाडाखाली तो लिहिण्यात गर्क होता. आई चुलीपुढून बाहेर आली. पदराला हात पुसत डोक्यावरील पदर सारखा करत “ अरे मेरे लला जेवायला चल. किती वेळ झाला अजून लिहितोच आहेस. जेवून घे आणि पुन्हा लिहायला बस.चल.” आत्मारामला काही ऐकू गेले नाही. तो लिहिण्यातच गर्क होता. ओवरीतच बसत आई आपल्या एकुलत्या एक लेकाकडे मायेने आणि अभिमानाने पाहात होती. तो ओठात लेखणी ठेवून विचार करत पाहू लागला. आईला पाहिल्यावर तो म्हणाला,” आई तू जेवून घे ना. मला आज हा लेख पूर्ण केलाच पाहिजे.संपतच आलाय. तू जेवून घे.” “ अरे लल्लू अगोदर तू जेवल्याशिवाय मी कधी जेवले का?” इतक्यात गावातला धन्नोराम शेतमजूर खांद्यावरील फावडे खाली घेत आला. फावडे ठेवून आत्माराम समोर बैठक मारत मोठ्या उत्साहात त्याला आणि आईला सांगू लागला,” दादा, तुझा लेख पत्रात छापून आलाय. सगळीकडे लोक वाचताहेत. आणि तू आहेस म्हणून आम्हाला आधार आहे म्हणतात.” पण..पण.. सांभाळून हां. पोलीसही तुझ्या पाठीमागे लागलेत.जरा जपून लिही.” हे ऐकून आत्मारामच्या आईला आपल्या मुलाचा अभिमान आणि त्याच बरोबर त्याची काळजीही वाटू लागली.आई पुन्हा आत्मारामला जेवायला चल म्हणू लागली. पण लिहिता लिहिताच तो म्हणाला आई हा धन्नोराम आलाय. त्यालाही जेवायला वाढ आणि तूही जेव.” दोन मिनिटांनी आत्मारामचे लिखाण संपले तशी आई उठली आणि,” चला तुम्ही दोघेही जेवून घ्या.” आई आत गेली. दोन ताटे वाढून घेतली आणि बाहेर आली. आत्माराम आणि गरीब धन्नोराम जेवायला बसणार इतक्यात लोक,पोलीस आले!पोलिस आले! म्हणत आपापल्या घरात जाऊ लागले.

आत्माराम शांत होता. पण आई गोंधळून गेली. धन्नोरामही घाबरला. तो आत्मारामला,” आता काय करायचे?” असे विचारू लागला. त्यावर आत्माराम शांतपणे म्हणाला,” अरे मी काहीच केले नाही. खरे तेच लिहिले.” तो इतके म्हणे पर्यंत पोलिसांच्या पावलांचे व “कहाॅं रहेता वो बदमाश?” असे आवाज येऊ लागले.हे ऐकल्यावर धन्नोराम आत्मारामला,” तू कुठेतरी निघून जा! पळ!” असे सांगू लागल्यावर आत्माराम शांतपणे म्हणत होता,” का पळायचे मी? मी काही चोरी डाका घातला नाही. कर नाही त्याची डर कशाला?” तरीही धन्नो आईकडे हात जोडून पाहात आत्मारामला तू पळून जा हे पोलिस फार हाल करतात म्हणत राहिला.” आणि आत्माराम फक्त मान हलवत नाही नाही म्हणू लागला. आईला तर धसकाच बसला होता. दोघांसमोरची ताटे तशीच भरलेली होती. आणि पोलिस लाठी आपटत आले!

आत्माराम आणि धन्नोरामकडे डोळे वटारून मोठ्या जरबेने ,” तुमच्यातील आत्माराम कोण आहे?” असे फौजदार विचारू लागला. आत्मारामन पुढे येत मीच आत्माराम, साहेब” असे म्हणाला. “ बॅंकेवर दरोडा तूच घातलास; काय रे? हो का नाही?“ असे त्याच्या छातीवर दंडुका ठेवत विचारले. आत्माराम हा आरोप ऐकून चकितच झाला. त्याच्या आईला आपण हे काय ऐकतोय ह्यावर विश्वासच बसेना. ती फौजदारासमोर येऊन म्हणाली,” साहेब अहो हे काय म्हणताय तुम्ही? हा कसलाआरोप करताय माझ्या मुलावर? चोरी करणे दरोडा घालणे असले वाईट विचार माझ्या मुलाच्या मनांतही कधी येणार नाहीत!” तिला बाजूला ढकलून देत अधिकारी पोलिसांना म्हणाला, “घ्या रे ह्याच्या घराची झडती.”

धन्नोराम फौजदाराला विनवणी करत म्हणाला,” साहेब आमचा आत्माराम सज्जन आहे हो. तो असले काही कधीच करणार नाही!” “ अरे देखो! ये आया बादशाह सर्टिफिकेट द्यायला.काय बे तुलाही आत टाकू का?” हे ऐकल्यावर धन्नोराम जोडलेल्या हातांनीच मागे मागे सरकू लागला. त्या मातीच्या घरात डोके वाकवून तिघे पोलीस आत गेले.आणि थोड्या वेळाने एक एक एक पोलिस बाहेर आला. एकाच्या हातात अगदी लहान पिशवी सारखे काहीतरी होते. फौजदाराकडे ती देत,” ये मिल गयी साब.” म्हणाला.,फौजदाराचे डोळे लकाकले. मिळाला पुरावाअसे म्हणत त्याने पोलिसांना आत्मारामला ताब्यात घ्यायला सांगितले. पोलिस आणि फौजदार आत्मारमला घेऊन चालले. आत्मारामची आई रडत रडत धावत त्यांच्या मागे जात,” हे सगळं कुभांड आहे. माझ्या मुलाला सोडा, सोडा असे ओरडत, रडत भेकत त्यांच्या मागे जाऊ लागली. पण तिला कोण दाद देणार! आपल्या पोराला भरल्या ताटावरून उठवून नेले ह्याचे तिला राहून राहून दु:ख होत होते.धन्नोरामही डोक्याला हात लावून रस्त्यातच बसला.

कोर्टाने आत्मारामाला दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. हाच अधिकारी तुरुंगातही त्याचा अतोनात छळ करू लागला.त्यातच आत्मारामचा मृत्यु झाला.नंदरामची आई एकटी पडली. तिच्या काळजाचा तुकडाच जुलमी राजवटीने, त्या क्रुरकर्मा फौजदाराने हिरावून नेला होता. ती दैवाला दोष देत नव्हती. आत्मारामला पकडल्याचे शिक्षा झाल्याचेही दु:ख नव्हते. पण स्वातंत्र्यासाठी, लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून सरकारविरुद्ध लिहून लोकांत जागृती करणाऱ्या आपल्या मुलाला चोर दरोडेखोर ठरवून त्याच्या नावाला बट्टा लावला ह्याची तिच्या मनात आग धुमसत होती.

वर्षे उलटत होती. नवरा गेल्यावर तिचा मुलगा आत्माराम हेच तिच्या जगण्याचे एकमेव कारण होते. तोच त्या पोलिस अधिकाऱ्याने कपटीपणा करून तिच्यापासून हिसकावून नेला होता.

त्या अधिकाऱ्याला मोठी बढती मिळाली. त्यासाठी त्याने मोठ्या लोकांना मेजवानीसाठी बोलावले होते.आत्मारामच्या आईला हे समजले. कपडे चादर पांघरूणाचे एक बोचके घेऊन ती त्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंगल्याकडे जीवाच्या कराराने निघाली. आपला ओठ दाबून राग आतल्या आत दाबत निघाली. तिच्या मनात काय होते ते तिलाच ठाऊक!

बंगल्यावर पोचली. येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या लोकांची खूप वर्दळ होती. डोक्यावरचा पदर बराच पुढे घेऊन ती पायरीजवळ उभी होती. त्या वरिष्ठाचे तिच्याकडे लक्ष गेले. अधिकाऱ्याच्या तोऱ्यात त्याने ती इथे का आली वगैरे विचारले. मध्ये इतकी वर्षे गेली होती. तो तिला ही नंदरामची आई म्हणून कसा ओळखणार? तिने भुकेली आहे, काही खायला मिळेल तर बरे होईल”, म्हटल्यावर, “पीछे बाजू जाव. भांडी कुंडी घास. जेवायला जरूर मिळेल” असे तो म्हणाला.

समारंभ संपत आला. सगळे पाहुणे गेले होते.एखादा जवळचा कोणी थांबला असेल.आत्मारामची आई पुन्हा तिथेच डोकीवर पदर ओढून मान बाजूला करून उभी असलेली पाहिली. इन्स्पेक्टरने तिला पाहिले.आता काय पाहिजे असे जरा चिडूनच त्याने विचारल्यावर आईने तिला काम हवे असे उत्तर दिले. ते ऐकून तिथेच असलेल्या त्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या बायकोने मुलाला सांभाळायला राहतेस का असे विचारल्यावर आत्मारामची आई नम्रपणे मान हलवित, हां जी म्हणाली. त्या रात्रीपासून ती त्या बंगल्यात तान्ह्या मुलाला सांभाळण्यासाठी राहिली.

एके दिवशी ती मालकीणबाईच्या खोलीत चोर पावलाने गेली.बाळ आई शेजारच्या पाळण्यात झोपले होते. दबकत दबकत जाताना कशाला तरी तिचा पाय लागला. आवाज झाल्याने आई जागी झाली. नुकतीच कामाला लागलेल्या दाईला पाहिल्यावर बाळाच्या आईने, “बरे झाले तू आलीस ते! तुझ्याशिवाय त्याला करमत नाही. इतक्या थोड्या दिवसांत त्याला तुझा लळा लागला बघ!” आत्मारामाची आई किंचित हसत म्हणाली,” लहान बाळ ते! नेहमी समोर दिसणाऱ्याचे ते पटकन होते.” असे बोलणे चालू असताना मालकीणबाईला खालून साहेबांनी बोलावले. बाळाला दूध दे सांगून त्या खाली गेल्या. आत्मारामच्या आईला आपण कशासाठी ह्या घरात आलो आणि आता हीच संधी आहे ह्याची जाणीव झाली. ती बाळाच्या पाळण्याकडे गेली. वाकून बाळाकडे पाहू लागली. “ लवकर! लवकर! चल आटप! हीच संधी आहे तुला.लाव बाळाच्या नरडीला नख. पुन्हा ही संधी येणार नाही. दाब त्याचा गळा.?डोळे मिट आणि झटक्यात उरक हे!” आत्मारामची आई स्वत:ला सांगत होती. ती ह्या पोलिस अधिकाऱ्याच्या घरात आत्मारामच्या तुरुंगातील छळकपटाने झालेल्या मृत्यचा सूड उगवण्यासाठी आली होती.पाळण्यावर वाकली. निष्पाप बाळ तिच्याकडे तितक्याच निष्पापतेने,त्याच्या निर्मळ दृष्टीने पाहात होते. आत्मारामची आई आणखी ओणवी झाली.

काही करणार इतक्यात तिला आपल्या आत्मारामाचे,” आई आई ! तू जेवून घे आई!” हे नेहमीचे सांगणे इतक्या मोठ्यांदा कानात ऐकू आले की ती झटकन मागे सरली. तिने पुन्हा जवळ जाऊन बाळाला उचलून छातीशी घेतले. डोळे मिटून त्याला हळुवारपणे थोपटू लागली. दिवस चालले होते. आत्मारामची आई आतून प्रक्षुब्ध असायची पण त्या लहान बाळाला सांभाळत असता ती हळू हळू पुन्हा आत्मारामची आई होऊ लागली असावी का?बाळाला ती खाली ठेवत नसे. पण एक दिवस तिने आता घरी परतायचे ठरवले.

बाहेर पावसात भिजून आलेल्या बाळाच्या दाईला पाहिल्यावर मालकीणबाई व तो पोलिस अधिकारी दोघेही “बरे झाले तू आलीस. बाळाला घेऊन नोकर बाहेर घेऊन गेले होते. बाळ थोडे शिंकत होते,” वगैरे सांगू लागले. तिलाही कपडे बदलून यायला त्यांनी सांगितले.

आत्मारामची आई मालकिणबाईच्या खोलीत गेली. बाळाला अलगद घेऊन “ओ ल्ले ले ल्ले ! अले अले लब्बाडा म्हणत त्याला घेऊन फिरु लागली. मध्येच तिने बाळाच्या कपाळावरून गालावरून हात फिरवला. आणि ती जवळ जवळ ओरडलीच! “ मालकिन. मालकीन! मुन्ने को कितना बुखार है!” बघा बघा हात लावून पाहा बाईसाहेब. चटका बसतोय!” हे ऐकून त्या बाईसुद्धा घाबरल्या. साहेबाला बोलावू लागली. साहेबही घाबरले. आत्मारामची आई म्हणाली ,”मी बाळाला पाण्याने पुसून घेते.पण त्याची छाती भरलीय वाटते. साहेब काही करा. डाॅक्टरला पटकन बोलवा.” सगळ्यांची धावपळ सुरु झाली. आत्मारामच्या आईने पोटीस केले. बाळाच्या छातीला लावले. हळू हळू त्याला थापटत बसली. बाळाच्या आईच्या डोळ्यांतील पाणी खळत नव्हते. आत्मारामची आईसुद्धा चिंतेच्या घोरात पडली.

डाॅक्टर आले. त्यांनी बाळाला बराच वेळ तपासले. डाॅक्टरांनी अधिकाऱ्याला बाहेर बोलावले. त्याने घाबरत ,” माझा मुलगा बरा होईल ना?” इतकेच विचारले. डाॅक्टर म्हणाले,” त्याला न्युमोनिया होण्याची शक्यता आहे. मी इंजेक्शन दिलेय. पण त्याला शेकत राहिले पाहिजे. मधून पोटिसही लावले पाहिजे. ग्लुकोज घालून गरम पाणीही पाजवा.” इतके सांगून डाॅक्टर गेले.

आत्मारामची आई तीन दिवस रात्र बाळापाशी होती. क्षणभरही झोपली नव्हती. त्याचे औषधपाणी सगळे काही वेळच्या वेळी करीत होती. मनातला सूड संताप चीड आग कुठे गेली, केव्हा विझली तिलाही समजले नाही. ती पुन्हा आई झाली. त्या बाळाची जणू दुसरी आईच झाली होती.
बाळाच्या तब्येतीत उतार पडला. सगळ्यांचे चेहरे उजळले.

दोन तीन दिवस गेल्यावर आत्मारामची आई, मालकिणबाईंचा निरोप घ्यायला त्यांच्या खोलीत गेली.
“मालकीन, मुझे ईझाझत दो. मी निघते” असे ती म्हणाल्यावर बाई म्हणाल्या, “दाईमां, मला पाच मुले झाली. पण ती वाचली नाहीत. हे बाळ तेव्हढे वाचले. तेही तुझ्यामुळे. का जातेस? राहा इथेच. बाळालाही तू हवी आहेस.” तो दुष्ट अधिकारीही तेच म्हणाला. त्याही पुढे तो पश्चात्तापाने पोळलेल्या गहिवरल्या आवाजात सांगू लागला,” माझ्या नोकरीत मला नको नको त्या खोट्या नाट्या गोष्टी कराव्या लागल्या. छळ कपट करावे लागले. त्याचे बक्षिसही आमची पाच मुले न जगण्यात मिळाले असेल! तू राहा दाईमाॅं!”

आत्मारामाची आई काहीच बोलली नाही. बाळाला एकदा खेळवावे म्हणून तिने त्याला आपल्या हाताच्या झोक्यात घेतले. आणि ओ लाला! कैसे हो तुम ?! अरे बोल बेटा; हसो तो सही असे बाळाकडे व त्याच्या आईकडे पाहात ती म्हणू लागली.आणि अचानक बाळाकडे पाहात,” अरे काय झाले तुला? उठ. जागा हो.पाहा माझ्याकडे. अरे बाळा रे! पाहा पाहा!” म्हणत ती कावरी बावरी, घाबरी झाली. आणि, “ हे देवा हे काय झाले!हे काय झाले! म्हणत ती रडू लागली!”

बाळाच्या आई-बापाने तर हंबरडाच फोडला. आत्मारामची आई दगडासारखी स्तब्ध होऊन शून्यात बघत होती. मनात स्फुंदत स्फुंदत विचारत होती,” भगवंता!अरे हे तू काय केलेस? ! असं का केलेस? मी काय पाप केले म्हणून तू मला पुन्हा ही शिक्षा दिलीस? तू कसला दयाळू! अरे मला न्यायचे सोडून तू ह्या निष्पाप बाळाला नेलेस! अरे त्याने काय केले होते तुझे? कोणती आई तुला क्षमा करेल रे?!”

ती फक्त आत्मारामची आई आता फक्त आई होती! ती आई निर्जीव पुतळ्यासारखी पावले टाकीत जात राहिली.

(ही कथा हिंदी उर्दुतील प्रख्यात कथाकार प्रेमचंद मुन्शी ह्यांच्या ‘माता का हृदय’ ह्या कथेचे भाषांतर आहे)

सदाशिव पं. कामतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *