महाशिवरात्रीचा उपवास

रेडवुड सिटी

जलदीची एक मैत्रिण अवंती दामले ही खेळाडूंच्या आहाराची तज्ञ आहे.तिने एक चांगला आहार, सबंध दिवसात क्रमाने आठ वेळा घ्यायचा अशा आठ ‘मील्सचा ‘ सांगितला आहे. ती मील्स वाचल्यावर……

“महाशिवरात्रीचा उपवास असो किंवा आषाढी- कार्तिकी

सारख्या मोठ्या एकदशीचा उपवास असो…..

आणि ह्या प्रत्येक वाट्याबरोबर( वाटा, शिधा म्हणजेच ‘मील्स’ बरोबरीने) आपली दोन वेळा साधी भगर, तीन वेळा भगरेची खिचडी, ती नामांकित शेंगाचा कूट पेरलेली साखरेची चव आणि सहज म्हणून फिरवलेला लिंबाचा रस अशी बटाट्याची ढीगभर भाजी, निराळी साखर न घालावी लागणारी सावळ्या-गुलाबी रंगाचा रताळ्याच्या खिसाची टेकडी, आणि वाळकाच्या कोशिंबिरी शिवाय चव कशी येणार म्हणून तिही हवीच की; हे सर्व बसवायचे, त्याशिवाय चार म्हणत चाळीस खजुराच्या बिया म्हणजे बिया काढून उमलवलेले दोन रात्री तुपात भिजवलेले म्हणण्यापेक्षा थबथलेले चविष्ट खजूर; शेंगादाण्याची खसखस लावून केलेली ताकातली गरमा गरम आमटीची,मधून मधून म्हणायचे पण वारंवार भुरकुन मजा घेत तर कधी सढळ हाताने पुन्हा ताटात आलेल्या भगरीला तिने आंघोळ घालत मजा लुटायची; ह्यातही ती आमटी, नुकत्याच बाजारात आलेल्या ओल्या भुईमुगाच्या शेंगादाण्याची असली तर ती आनंदाने ठो ठो करतच प्यावी!

पण ओल्या शेंगांच्या ह्या आमटीमध्येही एक पाठभेद आहेच. बरेच जण त्या ओल्या शेंगा तशाच वाटून कुटुन मिक्सरून आमटी करतात. वेळ वाचतो पण चवीतही बचत होते. त्याऐवजी ते शेंगादाणे, त्यातील ओलेपणाचा जीवनरस पूर्ण जाऊ न देण्याइतपत हलकेच,बहुतेक शेंगांवर एकदोन, दृष्ट लागू नये म्हणून, गालबोटे उमटली न उमटली अशा भाजून घ्याव्यात.मग निश्चयाने सगळा मोह आवरून त्यांच्याकडे न पाहता कुटायवाटायमिक्सरुन घ्याव्यात. पण इतका निग्रह करूनही स्वत:ने, आणि इतरांनीही त्या मुठ मुठ घेतलेल्या असतातच. मग बाजारात पुन्हा पुन्हा एक दोन हेलपाटे घातल्याशिवाय प्रत्येकाला किमान सहा-सात वाट्या ती अमृतमधुर आमटी पिण्याचे भाग्य लाभत नाही. पण उपास घडणार म्हटल्यावर इतके तरी कष्ट घ्यावे लागणारच! आम्हाला ठीक होते. फाटक जवळच होते. आणि प्रत्येक हेलपाट्याला एक भाऊ होता.”

“मग एकादशी असली म्हणून काय झाले? दुपारी चार वाजता साबुदाण्याचे वडे डझन अर्धा डझन खाल्ले नाहीत तर उपास मोडेतो या धसक्याने, ते खायचे. बरे कुणी आग्रहही करत नाही म्हटल्यावर स्वत:च मोकळेपणाने ते आणखी दोन तीन फस्त करायचे”.

“रात्री बेताचे हलके म्हणून ताटाऐवजी मोठी ताटली शिगोशिग भरून,शुद्ध तुपातली उपासाचे लोणचे आणि वाटी सापडत नाही म्हणून वाडगाभर कवड्या दह्याच्य साथीने साबुदाण्याची खिचडी चवीचवीने दोन तीवेळा ती ताटली भर भरून खायची. रात्री झोपताना पोटात काहीतरी थंड जावे म्हणून दह्यादुधात भिजवलेल्या ‘ खारकांच्या सुमनमालां’ची मधुर आणि हविहवीशी वाटणारी खीर पोटच नव्हे तर आत्मारामही गार पडावा इतकी रिचवणे आवश्यकच असायचे.मग तेव्हढ्यात अरे इतके लंधन करूनही केळी खाल्ली नाहीत तर तो उपवास कसला ह्याची आठवण होते. मग कुरकुरत का होईना सहा सात लठलठ् केळी रिचवून नाईलाजाने झोपायचे. ”

“हे सगळे साधायचे म्हणजे अवंतीबाईंच्या आग्रहाचा मान ठेवून त्याची सगळी ‘मील्स’ ह्या माझ्या उपासाच्या नित्यनेमात बसवावी लागणारच.नाही म्हणून कसे चालेल! नव्या जुन्यांचा संगम करून निदान उपवास तरी करावाच. ”

“पण त्यामध्ये एक लहानसा बदल करावा म्हणतोय. त्यांच्या बऱ्याच मील्समध्ये, उदा. बदाम दोन अंजीर एक असे प्रमाण दिले आहे. ते बहुधा त्यांचे दामले आडनाव सिद्ध करण्यीसाठी असावे. साधारणत: मुठभर, एक दोन मुठी आणि डझन अर्धा डझन हे प्रमाण मला जास्त योग्य वाटते! ते वापरूनच त्यांच्या आरोग्यदायी ‘मील्स’सह उपवास करणार आहे. “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *