जेजुरीहून आज वाल्ह्याला जायचे. अंतर १०-१२.कि.मी.च असेल. फारच थोडे
अंतर. आम्ही चार पाच जण एकत्र निघालो. ३-४ कि.मी. चालून झाल्यावर
माझी तब्येत पाहून डॉक्टरांनी मला “डॉक्टरी सल्ला” म्हणजे जवळ जवळ हुकुमच करून
गाडीत बसायला लावले. पायी वारीला हे ६-७ कि.मी.चे गालबोट लागणार
ह्याचे वाईट वाटले. पण मोठे उद्दिष्ट लक्षात घॆऊन निमूटपणे गाडीत बसलो.
वाल्ह्याला आलो.
आज संपूर्ण वारीच आपल्या मुक्कामी वाल्ह्याला दुपारच्या जेवण्याच्या वेळी
आली असावी. अगदी थोडे अंतर हेच कारण.
वाल्हे लक्षात रहाण्याचे कारण इथली भूमि. गावच्या लोकांना ही
वाल्या कोळ्याची भूमि वाटते, तसे मानतातही गावचे लोक.टेकडी, डोंगरावर
वाल्या कोळ्याच्या खुणा म्हणून लहान दगडांनी भरलेला रांजण वगैरे आहे
असे म्हणतात.आमच्यातील काहीजण तिकडे जाऊन आले पण तसे काही विशेष त्यांना
आढळले नाही.
पण मला वाल्हे लक्षात राहण्याचे कारणही ही भूमीच! आमच्या दिंडीचा तळ
जिथे पडला होता ती जमीन खाच खळगे आणि खड्या-खुड्ड्यांची. दगड खडे
गोटे तर होतेच. आमचा तंबू जेथे ठोकला होता ती भूमीही तशीच.त्यात
आणखी भर म्हणून आम्ही पुरुष मंडळी ज्या बाजूला झोपणार तिथून एक
उथळसा पण बऱ्यापैकी खोलगट चर लांबवर गेला होता. मी जिथे झोपलो तिथे
माझी पाठ आणि खांदा यामध्ये एक उंचवट्याचा दगड! पक्का रोवलेला. कोण
आणि कसा काढणार? झोपलो तसाच. कंबर त्या चराच्या गटारीत आणि पाठी
खांद्याशी हे धोंडोपंत! चांगलेच रुतायचे आणि टोचायचे.कसेही झोपा, ह्या
कुशीवर किंवा त्या कुशीवर झोपा, की कसेही पडा, सरका-सरकायला जागाच
नव्हती. गटारवजा तो चर आणि हे दगडूशेठ काही चुकवता यॆईनात.तसाच
पडलो बराच वेळ.
वरती फक्त आकाश आणि खाली खडकाळ, उंचसखल जमीन. शेजारी वाहती
गटारे, पाण्याची डबकी, जवळपास कुत्री मांजरं पहुडलेली. अशा संगतीत
आयुष्यभर झोपणाऱ्या असंख्य कष्टकऱ्यांची,सर्व संसार रस्त्यावरच
असणाऱ्या खेडेगाव, वस्त्यातील, गावा-शहरातील अनेक गरीबांची आठवण आली
आणि तंबूतील ह्या अडचणी विसरून,तसाच रेटून झोपलो.
पण मध्यरात्र उलटल्यावर रात्री२.३० वा. जागा झालो. डोळे उघडे
ठेवून पहाटेपर्यंत पडून राहिलो.