कै. पुस्तके: महाकाव्याचे महाभारत

अरबांनी पर्शिया जिंकून घेतल्यावर अहमद -अद -दक़िकीने (इ.स. ७३२-७७६) आपले झोराष्ट्रीयन(पारशी धर्माचे ) नाव बदलून अबू मन्सूर मुहम्मद असे मुसलमानी नाव घेतले. तरीही परंपरेने तो झोराष्ट्रीयनच-झरतुष्ट्रीच – राहिला असे मानले जाते.

आनंद आणि सुखासाठी फक्त “डाळिंबी ओठ, बासरीचे मधुर सूर आणि झरतुष्ट्रावरची श्रद्धा” अकेवळ ह्या गोष्टीच आवश्यक आहेत असे अहमद-अद -दक़िक़ी म्हणत असे. चारशे वर्षानंतर झालेल्या उमर खय्यामच्या साधारणत: याच अर्थाची रुबाया सर्वांना माहीत आहे.

अहमद-अद -दक़िक़ी हा बगदादचा राजकवी होता. सर्वोत्कृष्टचा समानार्थी म्हणजे अहमद -अद -दक़िक़ी इतकी त्याची ख्याती होती. त्याची स्तुती करणे म्हणजे “ह्झरला खजूर पाठवण्यासारखे आहे ” असे अनेक विद्वान समीक्षक म्हणतात. ह्या वरून “To bring Coal to New Castle” हा इंग्रजी वाक्प्रचार आपल्याला आठवला. तर नवल नाही.

इतके यश, नावलौकिक मिळूनसुद्धा त्याच्या डोक्यात यशाचे वारे शिरले नव्हते. तो म्हणायचा, “माझे सर्व आयुष्य धीराचे, धीर धरण्यातच गेले. ह्याचे सुंदर रसाळ फळ उपभोगण्यासाठी मला पुढचे आयुष्य मिळावे.” जणू काही “धीर धरी रे धीरापोटी असती मोठी फळे गोमटी ” या काव्य वचनाचे त्याने पालन केले!

त्याच्या गझला आणि चतुष्पदीमुळे तो लोकप्रिय होता. राजाने त्याला महाकाव्य रचण्यास सांगितले. अद्द्कीने ते लिहायला घेतले. हजार एक ओळी लिहूनही झाल्या. पण … इराणचा हा नामवंत कवि महाकवि होण्यापूर्वीच अहमद अद्दकीला त्याच्या तुर्की नोकराने सुऱ्याने भोसकून ठार मारले! वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी हा नामवंत कवि जग सोडून गेला!!

त्याचा समकालीन कवि रुदाकीच्या कूलीला आणि दिमना ह्या काव्याप्रमाणेच अहमद अद्द्कीच्या हजार काव्यपंक्तीसुद्धा काळाच्या उदरात गडप झाल्या असत्या. पण तरुण कवि फिरदौसीमुळे (इ,स. ९४०-१०२०) त्या भावी पिढ्यांना मिळाल्या.

अहमद -अद्दक़िक़ीच्या अपूर्ण महाकाव्यातील हजार काव्यपंक्तीत इराणचे राजे गुस्तास्प (गुश्ताफ) पासून अरजास्प (अरजाफ) पर्यंतच्या राजांच्या गोष्टी आहेत. पण त्यातही त्याने त्याच्या अंतर्यामी असलेल्या झरतुष्ट्राचे कार्य आणि थोरवी गुंफली आहे.

फिरदौसीने अद्द्कीचे हे काव्य घरी आणले त्याच रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात, अद्द्की एका रम्य उद्यानात, हातात मदिरेचा प्याला घेऊन बसला होता. त्याने फिरदौसीला,” इराणच्या इतिहासाचे हे महाकाव्य पुढे लिहायला घे. त्यामध्ये माझ्या (अद्द्कीकीच्या ) काव्यपंक्तींचाही समावेश करायला त्याने परवानगी दिली. त्यामुळे माझे (अद्द्कीचे) नावही राहील” असे म्हणता म्हणता ते स्वप्न संपले.

फिरदौसीने आपले महाकाव्य लिहायला सुरुवात केली. त्या महाकाव्याचे महाभारतही ऐकण्यासारखे आहे.
फिरदौसीला हे महाकाव्य पूर्ण करायला थोडी थोडकी नाहीत तर पुरे पूर पस्तीस वर्षे लागली! तेच हे फिरदौसीचे सर्वज्ञात ‘शाह -ए-नामा ‘ ! पण दु:खाची, वाईट वाटण्यासारखी बाब अशी की अहमद-अद -दक़िक़ीला त्याने फारसा मोठेपणा दिला नाही की त्याच्याविषयी आदरही दाखवला नाही. उलट तो अद्द्क़िक़ीच्य हजार काव्य-पंक्तीतील बारीक सारीक दोषच दाखवत होता. इराणच्या इतिहासाचे त्याने वास्तव दाखवले नाही असे म्हणू लागला. पण जेव्हा त्याची ही शेरेबाजी अजूनही हयात असलेल्या राजपुरुषांच्या दिशेनेही होऊ लागली तेव्हा फिरदौसीला भयंकर परिणामांची जाणीव होऊ लागली!

सुलतान महमद गझनवीने फिरदौसीला आपण प्रत्येक कडव्याला एक सोन्याची मोहर देऊ असे सांगितले होते. पण फिरदौसीचे हे साठ हजार कडव्यांचे महाकाव्य पूर्ण झाले तेव्हा तेव्हा महमद गझनवीला एका कडव्याला एक सोन्याची मोहर कबूल केली ही आपण मोठी चूक केली असे वाटले. अविचाराने उतावळेपणाने निर्णय घेतला असेच त्याला वाटले असणार. त्याने सोन्याच्या नाण्याऐवजी साठ हजार चांदीच्या मोहरा फिरदौसीला दिल्या. फिरदौसी आतून संतापला. निराश होऊन आणि रागारागाने, तो ती नाणी घेऊन निघाला. वाटेत जे त्याला कोणी भेटले त्या पहिल्या दोघांना त्याने त्या चांदीच्या मोहरा देऊन टाकल्या. त्यापैकी एक होता हमामखान्यातला नोकर आणि दुसरा सरबत विकणारा होता !

फिरदौसीचे हे कृत्य समजल्यावर अपमानित झालेला सुलतान गझनवी संतापाने खवळला. फिरदौसीला हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार मारण्याची शिक्षा त्याने ठोठावली!

फिरदौसी घाबरून जो पळाला तो शेजारच्या हेरत राज्यात आला. तिथला राजा शहरीयार बिन शेरविनला त्याने आपले हे काव्य अर्पण केले. पण ते देताना त्यात महमद गझनवी वर टीका टवाळी करणारी शंभर ओळींची कविताही प्रास्तविक म्हणून घातली. शहरीयारने, ती वाचल्यावर, हे म्हणजे आपल्यावर बलाढ्य पर्शियाच्या सुलतानाचा हल्ला ओढवून घेणेच आहे.अशी त्याची खात्री झाली. भीतिही वाटली. त्याने कडव्याला एक हजार दिरहान या हिशोबाने फिरदौसीकडे ती मोठी रक्कम पाठवली. आणि इकडे शेरविनने सुलतान महमद गझनवीची निंदा करणारी फिरदौसीची ती कविता नष्ट करून टाकली.!

इतकी प्रचंड रक्कम फिरदौसीच्या नशिबी नव्हती असेच म्हणावे लागेल. रक्कम घेऊन येणाऱ्या जासूदाला फिरदौसी भेटण्याऐवजी फिरदौसीची अंत्ययात्राच पहावी लागली!

‘शाह-ए-नामा ‘ हे इराणचे महाकाव्य म्हणून गणले जाते. “आमच्या राष्ट्राचा इतिहास आणि आमची भाषा या शाह-ए-नामाने जतन करून ठेवली आहे,” असे प्रख्यात मिर्झा अहमद अली फिरंघीने म्हटले आहे. “शाह -ए-नाम्यामुळे आमचा महाकवी अहमद अद्द्कीचे नावही कायम तेवत ठेवले आहे. अहमद अद्दिकी जिवंत असता तर त्याने फिरदौसीलाही मागे टाकले असते. आज तो आपल्याला फिरदौसीच्या सुबक आणि नक्षीदार कोंदणात शोभून दिसतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *