दोन घडीचा डाव

गेली दोन तीन वर्षे व्टेंटी-२० क्रिकेटचा जल्लोष चालू आहे. क्रिकेट शौकीनांना रोज मेजवानी. थोड्या वेळात भरपूर मजा आणि करमणूकही! सिनेमा नाटकाला जाऊन यावे तसे लोक जातात. पूर्वी जसे सिनेमाच्या थेटरात हिरो घोड्यावरून/फटफटी/मोटारीतून भरधाव वेगाने हिरॉइनला सोडवायला निघाला की प्रेक्षक टाळ्या शिट्ट्या वाजवून थेटर डोक्यावर घेत; तसे आता सेहवाग, ख्रिस गेल, वॉर्नर, रायडू चौकारामागून चौकार,सिक्सर वर सिक्सर ठोकू लागले की सगळे स्टेडियम डोक्यावर घेतात.आणि त्यांचे एखादे दैवत पटकन बाद झाले की एकदम सगळीकडे सुतकी कळा पसरते.

क्रिकेटच्या ह्या नवीन प्रकारने एक टाईमपास मजा आणली आहे. तीन तासाच्या ह्या झटपट क्रिकेटची मोठ्या बेभरवशाची, क्षणभराच्या धुंदीची आणि बेहोष जल्लोषाची जादू संपली की खरे क्रिकेटभक्त सोडले तर तो सामना कुणाच्या फारसा लक्षात राहात असेल का याची शंकाच आहे. ह्या प्रकारात होत्याचे नव्हते कधी होईल याचा नेम नाही. ठोकाठोकी करून धावा काढणारा दुस्रऱ्याच चेंडूवर बाद! ज्याचे कधी नावही ऐकले नव्हते तो चांगल्या चांगल्या गोलंदाजाना पिटून काढतो तर तसाच एखादा नवखा, नाव नसलेला गोलंदाज क्रिकेटच्या महारथीची दांडी उडवतो. एखादा चिपळी मध्येच केव्हा तरी आपली बॅट वाजवतो, तर कोण श्रीवास्तव भराभर बळी घेतो! भरवशाचा म्हणून फलंदाजीला पाठवलेला युसुफ़ फुस्स होतो, तर क्रिकेटमधले देव-दैवते निष्प्रभ होऊन तंबूत परततात.आणि आता हा काय खेळणार असे लोक म्हणत असताना तोच संघाला वाचवतो. राजाचा रंक आणि रंकाचा राव कोण कधी होईल याचा नेम नाही.

नेम नाही वरून लक्षात आले. कुठला टोला कुठे जाईल ह्याचाही नेम क्रिकेटच्या ह्या प्रकारात नाही. आम्ही लहानपणी ज्याला अंधापत्ता म्हणून हिणवत असू तोच टोला आता सामना जिंकूनही देतो! लगेच लोक त्याला आणि स्टेडियमला डोक्यावर घेतात. बरेच वेळा बॅट इकडे फिरते तर चेंडू तिकडे जातो आणी क्षेत्ररक्षक थोडावेळ गोंधळून गोल फिरतो. पण संघाला धाव मिळते. प्रत्येक धाव आणि क्षण मोलाचा आहे. एका रात्रीत श्रीमंत व्हावे आणि सकाळी दिवाळे निघावे तसे सुरवातीची चार-पाच षटके भरभराटीची तर पुढच्या दोन-चार षटकात संघाचा खुर्दा उडालेला! म्हणूनच हा खेळ रोमांचक आणि रोमहर्षक झाला असावा.

पण व्टेंटी-व्टेंटीने बऱ्याच नव्या गोष्टी घडवून आणल्या हे मात्र खरे.ज्या खेळाडूना रणजी ट्रॉफीनंतर मोठ्या सामन्यात खेळायला मिळाले नसते त्यांना जगातील आणि आपल्या देशातील नामांकित खेळाडूंबरोबर खेळायला मिळते आणि आपली गुणवत्ता सिद्ध करता येते, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.पण खेळाबरोबर आणखीही गोष्टी आल्यामुळे पैशाची उलाढाल वाढली.आमच्या गावात सामन्यांच्या वेळी हौशी प्रेक्षक आपणच एखाद-दुसरे वाद्य वाजवत.काहीजण फटाके उडवत. आता फटाके, शोभेची दारू यांची आतषबाजी होते. आणि आयोजकच बॅंडवाले आणतात, गाणी लावणारे आण्तात. एकंदरीत मौज-मजा वाढलीय.क्रिकेटचा आणि पैशाचाही खेळ झालाय.

अलिकडे हा वीस-वीस षटकांचा खेळ सुरू झाल्यापासून आणि त्याही थोडे अगोदर उलटा शॉट-रिव्हर्स स्वीप- मारणे सुरू झाले. जावेद मियांदादने हा प्रकार सुरू केला असे हल्लीचे क्रिकेटप्रेमी,जाणकारही म्हणतात.पण आमच्या संभा पवारने हा शॉट सुरू केला. आम्ही सगळेजण त्यावेळी,”अबे संभा पवार डोक्यावरून, कधी तर विकेटकीपरच्या डोक्यावरून बॉंड्री मारतय रे. “फावड्यासारखी बॅट फिरवुन बॅटीच्या तळहातावरून शॉट. येकदम बॉंड्री बे!”

आता प्रत्येक संघात परदेशाचे दोन-तीन खेळाडू तरी असतात. ही प्रथा अलिकडचीच असे सगळ्यांना वाटते. तसे वाटणे साहजिक आहे. पण आमच्या गावात क्रिकेटचे मोठे जोरदार सामने होत. एके वर्षी क्रिकेटप्रेमी हाजी हाजरतखान यांनी एसवायसी साठी लाहोर, पंजाबचे नामांकित खेळाडू आणले होते. त्यापैकी अमीर इलाही तर हिंदुस्थानकडून टेस्ट खेळत असत. ते तसेच महम्मद गझाली हा प्रख्यात गोलंदाज त्यांनी आणला होता. तर नरसिंगगिरजी संघाने हिंदुस्थानकडून काही टॆस्ट खेळलेल्या चंदू गडकरी हा उत्तम फलंदाज आणि क्रिकेट महर्षी देवधरांचा मुलगा शरद देवधर यांना आणले होते. हे सगळे खेळाडू मोठे रुबाबदार होते. गझाली तर लाल गोरा, उंचापुरा. शरद देवधर तितका उंच नव्हता पण लालबुंद होता इतके आठवतेय. पण तो काही क्रिकेटर म्हणून कधीच फारसा माहित नव्हता.देवधरांचा मुलगा म्हणून आणले असावे. प्रेक्षकांची गर्दीही भरपूर. ढोल, बिगुल जोरात वाजायचे. टाळ्य़ा, आरडा ओरडा असायचाच. पण चीअर-लीडर्स नव्हत्या! तरीही गर्दी असायची!

काही वाहिन्यांनी आयपीएलच्या ह्या सामन्यांना महासंग्राम म्हटलय. संग्रामच नाही तर महासंग्राम कुठला.फार तर छोटीशी चकमक म्हणता येईल.

दोन घडीचा डाव हेच खरं. पहा आणि विसरा!

1 thought on “दोन घडीचा डाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *