पुणे.
जगातील सगळे भेदभाव काढून टाकणारा धर्मच टिकेल. खरा धर्म अजून बनलेला(च) नाही. तो यापुढे बनायचा आहे. सर्व मानवांचा तो एकच धर्म होईल.
वेदकाळापासून आजपर्यंत ’धर्म’ हा शब्द सतत चालत आला आहे. तो संस्कृत शब्द आहे. दुसऱ्या कोणत्याही भाषेत त्याला नेमका प्रतिशब्द नाही.
धर्म हा व्यापक शब्द आहे. आपले जीवन ज्या नीतिविचारांवर आधारलेले असते त्याला आपण धर्म म्हणतो. गणिताप्रमाणेच धर्माच्या तत्वातही बदल होत नाहीत. तिन्ही काळात आणि सगळ्या देशात ती सारखीच अविचल असतात. उदा. सत्य-प्रेम-करूणा हे सदगुण देशकालानुसार बदलत नाहीत. आज जगात जे वेगवेगळे (धर्म) दिसतात ते धर्मपंथ अथवा संप्रदाय आहेत. या संप्रदायांनी लोकांना एकत्र ठेवले होते. पण आज मात्र हे सगळे संप्रदाय तोडणारे सिद्ध होत आहेत. या संप्रदायांनाच आज धर्म म्हटले जाते. त्यांच्या जागी अध्यात्माला आणायचे आहे.
अध्यात्म धर्मपंथाहून वेगळी वस्तू आहे. प्रेम करणे, खरे बोलणे, करूणा ठेवणे हे अध्यात्म आहे.
ईश्वरभक्ती करणे हेही अध्यात्म आहे. ईश्वराच्या प्राप्तीसाठी गुडघे टेकणे, पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करणे, उपवास करणे हे आजच्या प्रचलित धर्माचा भाग आहे. पण स्वत:वर नियंत्रण ठेवण्याकरता उपवास करणे हे आहे अध्यात्म.
धर्म बाह्य गोष्टींसाठी आदेश देतो. अध्यात्म आतली शक्ती वाढवतो. धर्म आणि अध्यात्म एकाच वस्तुकडे जातात. आजचा धर्म मनुष्याला आंधळा समजून हात धरून मुल्ला,मौलवी, गुरूंच्या मागे जायला शिकवतो. अध्यात्म म्हणजे तुम्ही आणि ईश्वर यांच्यामधे आणखी कोणी नाही.
—— आचार्य विनोबा भावे ( यांचे धर्म आणि अध्यात्म यावर स्फुट विचार)
ता. ७ फेब्रु. २००५ च्या ’आजची वार्ता’ह्या जाहिरातींच्या वर्तमानपत्रात आलेला हा मजकूर. सप्रेस(मराठी); सर्वधर्म प्रभूचे पाय या पुस्तकातून.