चक्रदेव मंगल कार्यालय आम्ही चालवायला घेतले. तेव्हा पासून पंगतीत इतर ताटांसारखेच तेही ताट वाढले जायचे. पंगतीत सगळे लोक जेवायला बसले तरी तो पाट रिकामा ठेवावा लागे. असे का करायचे आम्हाला माहित नव्हते. चक्रदेवांनी सांगितल्यामुळे तो एक पाट रिकामा ठेवत असू. थोडा वेळ वाट पाहून मगच वाढपी तूप वाढायला घेत.
काही महिने पंगतीत तो पाट रिकामाच राहिला होता. नेहमीप्रमाणे आजही पंगत बसली होती. एकाने मला रिकाम्या पाटाविषयी विचारले. “ कार्यालयाच्या मालकांनी ह्या कार्यालयातली ही पद्धत आहे व ती आम्हीही पाळावी असे सांगितल्यावरून आम्ही तो पाट रिकामा ठेवतो. पंगतीच्या एका टोकाला उभी राहून मी हे सांगत होते. ते ऐकून जवळच बसलेल्या एका विशीतल्या मुलाने मला त्या मागची हकीकत सांगितली…..
… तो सांगू लागला,” ही पद्धत आम्हीच सुरू केली. तुमच्या आधी आम्ही हे कार्यालय चालवत होतो. एकदा सर्व लोक जेवायला बसले असता, एक गृहस्थ आला व वडिलांना विचारू लागला ह्या पंगतीत जेवायला बसू का?” वडील म्हणाले, “तुम्ही जेवायला जरूर बसा. पण आता पंगत सुरु झालीय्. एकही पाट रिकामा नाही. नंतर आमच्या घरच्यांबरोबर व इथे काम करतात त्यांची पंगत असते. तुम्ही आमच्या बरोबर बसा.” तो माणूस थोड्या अजिजीने म्हणाला,” अहो अशा पंगतीत बसून जेवायची माझी खूप इच्छा आहे. बघा कुठे कोपऱ्यात पाट मांडता आला तर.” वडिलांनी सगळीकडे पाहिले पण जागा दिसेना. वडील आमच्या घरच्यांच्या बरोबर बसा असे त्याला पुन्हा सांगू लागले. पण तो माणूस काही न बोलता निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा कधी आला नाही. दिसला नाही. आम्हाला एक दीड वर्षांनी हे कार्यालय ….”
त्या मुलाचे बोलणे अर्धवट सोडून मी प्रवेदाराकडे पाहू लागले. नेहमीप्रमाणे वाट पाहून आजची पंगत सुरु झाली. थोड्याच वेळात एक पंचवीस- तिशीतला माणूस ह्यांना काही विचारु लागला. माझ्या मिस्टरांनी बोट दाखवून त्याला त्या रिकाम्या पाटावर बसायला सांगितले.
मला काय वाटले कुणास ठाऊक मी भाजी आमटी कोशिंबिरीचे पंचपात्र घेऊन पंगतीत आले. आज स्वत: आपल्या मालकीणबाई वाढताहेत पाहून आमचे वाढपी बुचकळ्यात पडले. त्यांना, मीच ह्यांना वाढणार आहे हे हळूच सांगितले. मी त्याला सगळे पदार्थ वाढायला सुरू केली. वाढताना माझ्या न कळत उत्स्फूर्ततेने मी त्याला वाढू लागले. “ सावकाश होऊ द्या. कसलीही घाई नाही.” “ कोशिंबीर कशी झालीय्?” “ ही भाजी आवडत नाही वाटते, मग ही बघा म्हणत दुसरी भाजी वाढे. जिलब्या प्रत्येक वेळी , “ अहो घ्या, संकोच करू नका. आमची जिलबी आवडेल तुम्हाला!” असे म्हणत एक जास्तच वाढे.
पंगतीचे जेवण आटोपले.सगळी मंडळी हात धुवायला जाऊ लागली. तो माणूस बसूनच होता. मग उठला, ते पाहून मी लगेच त्याला वाकून नमस्कार केला. ते पाहून तर त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले.तो मला म्हणत होता,” तुम्ही वाढत असताना मला सारखी आईची आठवण येत होती.” मी त्याची समजुत घातल्यासारखे सांगत होते, “अहो मीही तीन मुलामुलींची आई आहे. वाढतांना मलाही खूप बरे वाटत होते. पण आज अचानक तुम्ही कसे आलात?”
त्यावर तो गृहस्थ गहिवरून सांगू लागला, “आमच्या सोसायटीत काम करणारा माणूस मला नेहमी सांगे की लग्नाच्या अशा पंगतीत मला जेवायची खूप इच्छा होती. मी लग्नामुंजींच्या दिवसात कार्यालयांत जात असे. पण कुठे दाद लागली नाही. पाट रिकामा नाही म्हणून सांगायचे.नशिब म्हणत ती एक इच्छा सोडल्यास दिवस चांगले काढले.” काल पर्यंत तो मला त्याची ही इच्छा सांगत होता. काल सकाळी मी त्त्याची ही इच्छा पूर्ण करेन असा शब्द दिला. काल संध्याकाळीच तो वारला. आज मी इथे आलो. तुम्ही मला मायेने वाढले.”
हे ऐकल्यावर मी त्याला पुन्हा नमस्कार केला. हात धुवायला जाताना त्याने समाधानाने ढेकर दिली. ती तृप्तीची ढेकर आम्हाला आशीर्वाद होता.
मी मागे वळून पाहिले तर तो विशीतला तरूण बसूनच होता.मी जवळ गेले तर त्याचे डोळेही भरून आले होते. त्याला रडायला काय झाले असे हळूच विचारल्यावर तो कुठेतरी पाहात असल्यासारखा बोलू लागला,”त्यानंतर तो माणूस आला नाही की दिसला नाही. पाट मांडलेला, ताट वाढलेले तसेच राही. आमचे कंत्राट गेले. कारण आमचे कार्यालय तितके चालेना. दिवस वाईट आले. आई वडील अकाली थकले. मला कॅालेजात जाता आले नाही. एका छापखान्यात साधे काम लागले आहे. कसेतरी चालले आहे. डोळ्यांत का पाणी आले सांगता येत नाही. तुमच्या पंगतीतला पाट रिकामा राहिला नाही ह्याचा आनंद झाला की तुम्हाला त्या ‘अवचित अतिथीला’जेवायला घालता आले; आम्हाला ती संधी मिळाली नाही; ह्याचे वैषम्य म्हणून, का तुम्हाला बरकत येईल ह्याचा हेवा किंवा द्वेष वाटला, काही सांगता येत नाही. पदवी मिळाल्यावर मलाही आमच्या आई-वडीलांचा हा व्यवसाय करायचा होता. पण तसे जमेल असे वाटत नाही.” इतके झाल्यावर तो पुन्हा डोळे पुसत हात धुवायला गेला.
इकडे मी कोठीघरात गेले. परत आले. तो मुलगा दिसला. त्याला हाक मारली. “ हे बघ हे शकुनाचे पैसे घे. ह्याने तुला व्यवसाय सुरू करता येणार नाही हे माहित आहे. पण तुझी हिंमत टिंकून राहील. तुझ्या स्वप्नातील पंखातले हे लहानसे पिस आहे.” असे म्हणत त्याच्या हातात शंभराच्या चार पाच नोटा ठेवल्या. तो मुलगा पाहात राहिला. त्यानेही मला नमस्कार केला. द्यायचा तो आशिर्वाद मी दिला.
तो मुलगा म्हणाल्या प्रमाणे आमची बरकत होत गेली. खरं म्हणजे हे कार्यालय तसे गैरसोयीचे होते. का कुणास ठाऊक पण ते लग्ना मुंजीच्या दिवसात एकही दिवस रिकामे नसे. मालकांनाही त्यामुळे चांगले उत्पन्न होऊ लागले. त्यांनी कार्यलयाचे पूर्ण नूतनीकरण करायची योजना आखली. त्यामुळे आमचा एक मोसम रिकामा जाणार होता. पण आम्ही चक्रदेवांना विचारले की ,”नविन कार्यालयाचे काम आम्हाला मिळेल नां?” त्यावर ते म्हणाले, “अहो तुमच्यामुळेच हे मी करू शकतोय्. तुम्हाला मी कसा विसरेन?”…..
….. काळ पुढेच जात असतो. “आमचे आई वडील गेले. आमच्या सासूबाई गेल्या. पाटांच्या पंगतीही गेल्या. टेबल खुर्च्यांच्या पंगती झाल्या. आजही आम्ही एक खुर्ची रिकामी ठेवतो. कोणी अवचित पाहुणा येतो. सासरहून कधी आमच्या बहिणी त्या पाहुण्याला वाढायला येतात.” “ आम्ही दोधीही त्या रिकाम्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थाला किंवा बाईंना वाढतो.” मुले व सुना सांगत होत्या. स्वत:ला विसरून मी त्यांचे बोलणे ऐकत होतो.