Category Archives: Events

Dnyaaneshwari Writing Complete

“ काय (ज्ञान) देवा सांगू तुझी मात…” आजही सलग सहाव्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसन्न होऊन ओव्यांचे शतक तर पूर्ण करून घेतलेच आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी माझ्याकडून लिहून पूर्ण करून घेतली!गुरुमहाराज की जय ! ज्ञानेश्वर महाराज की जय!


आता ज्ञानेश्वरीतील पसायदान स्वतंत्र पानावर वेगळे लिहायचे; ज्ञानेश्वरांची आरती विठ्ठलाची आरती , सुंदर ते ध्यान हा अभंग आणि संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत केल्यानंतर तिच्याविषयी लिहिलेल्या ओव्या/ अभंग हे लिहायचे. आणि योजकांनी सांगितल्याप्रमाणे सविस्तर अनुक्रमणिका व माझे मनोगत/ अनुभव लिहिणे आहे.


पण पायी वारी करीत पंढरपुरला पोचल्याचा आनंद घ्यायचा, तो ज्ञानेश्वरी हाताने लिहून पुर्ण झाल्यावर घेतला. पंढरपुरांतील इतर देवदेवतांचे दर्शन घेणे राहावे तसे झाले आहे मला! चला, तुम्ही सर्वांनी, विशेषतः सतीश सुधीर ह्यांनी गेले पाच दिवस खूप म्हणजे खूपच कौतुक करत उत्तेजन दिले. त्यामुळे मला हे इतके जमले. होय. स्मिताने मला ह्या उपक्रमात भाग घ्यायला लावले. खटपट करून पिंपरी चिंचवडला जाऊन ज्ञानेश्वरी व ती ज्या वहीत लिहायची ती पुरस्कृत वही आणली. मला पाठवली.

तेजश्रीने तिच्या मावसबहिणीला- दीदींनाही- मी ज्ञानेश्वरी अर्थासह लिहतोय असे कळवले होते. त्यांच्याही शुभेच्छा मिळाल्या. म्हणूनच म्हटले की तुमच्या सर्वांमुळे मला लिहिणे शक्य झाले. त्तसेच सतीशने तो पावसला गेला होता तेव्हा माझ्यासाठी स्वामी स्वरुपानंदांनी लिहिलेली ‘अभंग ज्ञानेश्वरी आणली; तिचाही मला ज्ञानेश्वरीतील काहीं ओव्यांचा अर्थ समजण्यास मदत झाली. सुधीर स्मिता सतीश आणि उषाताईंनी वारंवार दिलेल्या उत्तेजनामुळे माझे हे लिखित पारायण पुरे झाले. दहा बारा दिवसांपूर्वी सतीश म्हणाला होता ,” बाबा, तुम्ही ३१ डिसेंबरच्या आत पूर्ण कराल.” झाले की हो तसेच!

॥जय जय जय रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी॥”

झाडे वाचवा आरे वाचवा ! कार-शेड हटवा आरे वाचवा!

मुंबई

मुंबईच्या मेट्रो ट्रेनचा तिसरा टप्पा करण्यास सुरवात झाली. त्यासाठी कार शेड करण्यासाठी २७०० झाडे तोडायला सुरुवात झाली. गेला एक महिना दर शनिवारी आणि रविवारी ‘झाडे वाचवा आरे वाचवा ‘ कार शेड हटवा ‘ अशा अनेक घोषणा देत हातात लहान फलक घेऊन तरुण मुले मुली कार्यकर्ते रस्त्याच्या एका बाजूला लांबलचक रांग करून उभी असतात. ह्या मध्ये काही
एनजीओज्, बरेच वैयक्तिक, काही राष्ट्र सेवा दलाचे(अजून सेवा दल जिवंत आहे हे पाहून आश्चर्यच वाटले!) काही तरुण मंडळांचे असे निरनिराळ्या गटाची तरुण मंडळी भाग घेतात. हिंदी इंग्रजी मराठीत घोषणा चालू असतात.

हे निदर्शन ११.००-३० पासून सुरु होते. दोन पर्यंत संपते.
गेले दोन तीन शनिवार रविवार मी आणि स्मिता जाऊ जाऊ म्हणत होतो. पण कुठे करतात निदर्शने, किती वाजता ही काहीही माहिती कुठेही सहजासहजी मिळत नव्हती. फक्त एखाद्या-एखाद्याच-चॅनेलवर फक्त शनिवारी रनिवारी हे आंदोलन असते असे सांगितले होते. हल्ली चळवळ्यांनाही वाटते की कुठेतरी सोशल मिडियावर टाकले की भरपूर प्रसिद्धी होते. भ्रम आहे.जाऊ दे. कल्याणीने शोधून वेळा सांगितल्या. बरे झाले नाही तर आम्ही सहाला उठून जाणार होतो. आरामात दहाला निघालो. ११.०० वाजता पोचलो.

फारशी मंडळी दिसत नव्हती. उगी २०-२५ इकडे तिकडे दिसली. पण पोलिसांच्या गाड्या, निदर्शकांना पकडून लांब दूर सोडून देण्यासाठी जाळीची मोठी गाडी हे सगळे पाहिल्यावर मला विशेष स्फुरण आले. तो लाठी हल्ला, ती आरडा ओरड, निदर्शनाच्या घोषणा,पोलिसांची फळी मोडण्यासाठीची निदर्शकांची रेटारेटी. त्यासाठी “इन्किलाब इन्किलाब! नही हटेंगे नही हटेंगे” घोषणा मध्येंच पोलिस धक्काबुक्की करत माझी मानगुट पकडून मला ढकलत मोटारीत कोंबताहेत, चॅनेलवाल्यांचे सगळे कॅमेरे माझ्यावर,त्यांची गडबड आणि बडबड हे सर्व दृश्य वारंवार डोळ्यांसमोर आणू लागलो. त्याची मनातल्या मनात दोन वेळा ‘रंगीत’ तालीमही झाली. आज हुतात्मा व्हायची केव्हढी मोठी संधी मिळाली ह्या हौतात्म्याच्या स्वप्नांत दंग होऊन, ती’अमर रहे’ ची मिरवणुक;माझ्यावर पडणारे हारांचे ढीग त्यामुळे चेहरा कुणाचा दिसतच नव्हता. मीच का हा हुतात्मा ही शंकाही आली. लगेच मी तिथेच करायचे श्रद्धांजलीचे भाषणही करु लागलो. हे सर्व स्वगतच चालले होते.प्रत्यक्षात फौजदार-पोलिसांना मी म्हणत होतो,” आमच्या पेक्षा तुमचीच संख्या जास्त दिसतेय साहेब! चॅनेलवर पोलिसांचीच निदर्शने अशी बातमी दाखवतील!” तोही हसला आणि म्हणाला,” येऊ द्या, तशी बातमीही येऊ द्या, तुम्हीच द्या!”

लवकरच अनेक जण पुटुपुटु करत कुठून कुठून येऊ लागले. रांग लांब लांब लांब होत चालली. मला आणि स्मिताला कुणी एक एक फ्लेक्सी दिला. तो रस्त्यावरील रहदारीला दाखवत, देणाऱ्याच्या मागोमाग घोषणा पूर्ण करत ओरडत होतो. ‘Save Aarey Save Mumbai’
‘कार शेड हटाव झाडे बचाव;’बचाव बचाव आरे बचाव;’ ‘आरे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची!’ ‘हटवा रे हटवा कार शेड हटवा,वाचवा रे वाचवा आरे वाचवा!’ (ही माझी), ‘जाॅनी जाॅनी येस पप्प…’ वापरून कुणी केलेली चांगली घोषणा; ह्या घोषणाबाजीतच काही तरूण मंडळी मोठा डफ वाजवत त्यांच्या कला पथकाची गाणी म्हणत होती. आणखीही बऱ्याच घोषणा चालूच होत्या. सगळीकडे तरुणांचा उत्साह दिसत होता. माझ्या एव्हढी नाही पण म्हातारी म्हणावीत असे दोघे तिघेच असतील.

आरे रस्ता म्हणजे दुतर्फा सुंदर झाडी असलेला! पूर्वी सिनेमाच्या गाण्यांचे शूटिंग होत असे ती आरे मिल्क काॅलनीची सुंदर बाग आणखी पुढे होती.,रस्ता अरुंद. त्यावरूनच बसेस मोटारी रिक्षा दुचाकी वाहनांची गर्दी. रविवार असल्यामुळे तर खूपच. त्यामुळे जातानाचे लोक परतताना बस मधून,मोटारीतून मलाच हात दाखवत thumsup करत जाऊ लागले असे वाटू लागले.बरेच लोक मला ओळखू लागलेत! ह्या भ्रमात मी घोषणाही जोरात देऊ लागलो.!

मधून मधून मी पाणी पीत होतो. चांगली दिड दोन किलोमीटर लांबीची रांग झाली होती. माझ्यासमोर एक पोलिस होता. त्याला मी म्हणालो, “असं काही तरी तुम्ही रोज पाहात असाल. मनात हसत असाल. काय ओरडताहेत उगीच. काही फरक पडणार नाही!” तो न बोलता फक्त हसला. सर्व काही शांततापूर्ण वातावरणात, गाणी म्हणत मध्येच जोशाने तर कधी नेहमीच्या आवाजात घोषणा चालू होत्या. उत्साह यावा म्हणून त्याच घोषणा चाल बदलून म्हणत. त्यामुळे पुन्हा आवाज जोरदार निघत!

स्मिताने थोडा वेळ रस्त्याच्या पलीकडे जाऊन Record for the posterity असावे म्हणून फोटो काढले. पण तिचा नाही आला फोटो. मला खरंच सुचले नाही! मी त्या अति सौम्य,साध्या वरणासारख्या निदर्शनात घोषणा देण्यातच रमलो होतो.

स्मिताच्या प्रोत्साहनामुळे माझा कालचा रविवार म्हणजे ‘पल भर के लिये तो आंदोलन करें,झूटा ही सही!’ के नाम झाला! झूटा ही नव्हते पण शांततामय होते.

Secret Life of Dr. Walter Mitty सारखा मी तेव्हढ्यातही रस्त्याच्या कडेची पांढरी लक्ष्मण रेखा ओलांडून मुठी वळवून; पोलिसांची नजर चुकवून; पळत पळत रस्त्याच्या मध्यभागी जाऊन “ नही हटेंगे नही हटेंगे” “नही चलेगी नही चलेगी कार शेडकी तानाशाही”, “आली रे आली जनता आली कारशेड खल्लास केली” अशा घोषणा देतोय; मी गेलेला पाहून इतरही रस्त्यामध्ये येताहेत, आॅलिव्ह ग्रीनची जाळीची हेल्मेट घालून अंगभर असणाऱ्या ढाली पुढे घेऊन पोलिसांची फलटण हवेत बंदुकी उडवत माझ्याच दिशेने येत आहे ह्या स्वप्नरंजनात स्वत:चे समाधान करून घेत होतो.प्रत्यक्षात मी समोरच्या पोलिसाच्या-तो पाठमोरा असूनही- धाकाने,रस्त्या कडेच्या खड्यात उभा होतो. खंबीरपणे पाय रोवून. काय समजलात मला!

१:३०-४५ वाजत आले. स्मिता म्हणाली,”बाबा,जाऊ या.” जिथे आम्ही सुरवातीला येऊन थांबलो होतो तिथे गेलो. पाण्याची बाटली घेतली. पाणी प्यालो. आरे काॅलनीतच होतो.त्यामुळे तिथे आरेचे ताकही मिळाले.

मी माझ्या शेजारी असलेल्या निदर्शकांचा निरोप घेत पुढे निघालो. रिक्षाने १७ किमिचे अंतर पार करून घरी आलो.
तर आता निदर्शनाचे स्मिताने काढलेले फोटो पहा.

वेगळी पुस्तके

बेलमाॅन्ट

आज रेडवुडसिटी लायब्ररीतील ‘माणूस ग्रंथालयात’ गेलो होतो. पंधरा दिवसांपूर्वी नाव नोंदवले होते. तीन मानवी पुस्तके निवडायला सांगितली होती. मी माझी आवड निवड कळवली. पण एकच वाचायला मिळेल बाकीची दोन आधीच कुणी तरी घेतली होती असे कळले. मी ठीक आहे असे मनात म्हणालो. त्यातही नेहमी प्रमाणे तिसऱ्या पसंतीचेच मिळाले होते.


ह्या पुस्तकांच्या यादीत वेगवेगळ्या विषयांवरचे मानवी ग्रंथ होते! यादी पाहा. आंधळा, व्यसनमुक्त बाप लेक, सुधारलेला गुंड, स्वप्ने पाहणारा!, संगणक शास्त्रज्ञ,पोलिस आॅफिसर, लिंगबदल झालेली व्यक्ति व आणखी काही दोन तीन पुस्तके होती.

परिक्षेत कोणत्याही पेपरात, एकही सोपा प्रश्न माझ्या वाट्याला न येणाऱ्या मला इथेही अवघड पुस्तकच वाचावे लागणार होते. लक्षात आलं असेलच की मला संगणक शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचायचे होते!

विषय समजल्यापासूनच धडधड सुरू झाली होती. मी काय वाचणार आणि मला काय समजणार?! सतीशला विचारायचो काय विचारू, काय बोलायचे वगैरे प्रश्न चालू होते माझे. नंतर लक्षात आले की सोनिया, तिच्या वर्गातील दुसरी मुले त्यांच्या project साठी काही जणांच्या मुलाखती घेतात ते किती अवघड असते! पण ती किती व्यवस्थित घेते. मी दहा बारा दिवस नुसता विचार न करताही घामेघुम होत असे. आणि आज सतीशने रेडवुडसिटी लायब्रीपाशी सोडले तेव्हा मी लगेच पळत घरी जायला गाडीत बसणार होतो. पहिल्या दिवशी शाळेत सोडायला आलेल्या आई बापाचा हात पोरगं सोडतच नाही; वर्गात जात नाही तसे माझे झाले होते. ‘ बाबा काही पुस्तक वाचायला जाणार नाहीत’हे सतीशला समजले असावे.

मी गाडीतून उतरल्याबरोबर त्याने इकडे तिकडे न पाहता फक्त All the Best पुटपुटत गाडी लगेच भरधाव नेली. मी रडकुंडीला येऊन गाडीमागे दोन पावले पळत गेलो.पण त्याने गाडी थांबवली नाही. मी त्यालाच आत पाठवणार होतो. पण मलाच आत जावेलागले. तिथे पोचणारा मीच पहिला होतो. अजून अर्धा एक तास होता. नेहमीप्रमाणे प्रथम तिथल्या दुकानात गेलो. नव्यासारखी दिसणारी, काही नवी, काही जुनी झालेली निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके पाहात थोडा वेळ घालवला.

रिडिंग हाॅल मध्ये जाऊन तिथे दिसेल ते पुस्तक वाचायचे ठरवले होते. पण पहिल्याच झटक्यात AIQ हे Nick Polson & James Scott ह्यांचे पुस्तक हाताला लागले! एकदम भरून आले. ‘केव्हढी कृपा’
‘चमत्कार चमत्कार तो हाच!’ ‘ह्यामागे काही तरी योजना असली पाहिजे’ ह्या भाबड्या बावळट विचारांच्या ढगांत फिरून आलो.महाराजांनी पेपर तर फोडलाच आणि वर मला हे AIQ चे गाईडही दिले!

पुस्तक वाचायच्या आधी परिक्षणे अभिप्राय तरी वाचावेत म्हणून मलपृष्ठ वाचू लागलो.पहिलाच अभिप्राय न्यूयाॅर्क टाईम्सचा. तो म्हणत होता, “लेखकांनी इतक्या हलक्या फुलक्या शैलीत लिहिले आहे की ते सदाशिव कामतकरांनाही समजेल! आम्हाला तर शंका आहे की त्यांच्यासाठीच ते लिहिले आहे! “ थक्क झालो! हे वाचल्यावर ट्रम्प, न्यूयाॅर्क टाईम्स वाॅशिंग्टन पोस्ट ह्यांना fake news म्हणणार नाही. पण मला आताच प्रश्न पडला की,न्यूयाॅर्क टाईम्सचे सोडून देऊ,त्यांना मी माहितच आहे; पण रेडवुड लायब्ररीला कसे समजले की मी वाचक आहे ते? थोडे डोके खाजवल्यावर लक्षात आले. “अरे शाळेत असतांना तू जसे गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये मला घ्याना मला घ्या ना बे; बॅटिंग बोलिंगही करतो ना मी. वाटल्यास फिल्डिंगही करीन. अशी दोन दिवस भुणभुण लावत त्या टीमभोवती फिरायचास? तसेच ह्या लायब्ररीलाही तू एकदा नाही तीन वेळा कळवलेस मी पुस्तक वाचायला येईन म्हणून!”

परीक्षेच्या हाॅल मध्ये जाण्यापूर्वी बहुतेक सगळेच अभ्यासावर शेवटचा हात फिरवितच आत जातात तसेच झाले की हे! असे म्हणत पुस्तक उधडले. वाचायला लागलो. भाताच्या प्रत्येक घासाला खडा लागावा किंवा भाकरीच्या पिठात खर आल्यामुळे भाकरीचा घासही वाळूची भाकरी खातोय की काय असे वाटावे तसे पहिल्या वाक्यापासून होऊ लागले. मुंग्यांनी मेरू पर्वत गिळायला घ्यावा किंवा ‘देवा तुझे किती सुंदर… ‘ ह्या कवितेच्यापुढे मजल न गेलेल्या माझ्या सारख्याने मर्ढेकर, पु. शि. रेगे किंवा ग्रेस ह्यांच्या कविताचे रसग्रहण करण्यासारखे किंवा अनुष्टुभ, अबक मधील कवितांचा अर्थ समजून घेण्यासारखेच हे काम आहे हे समजून आले. पुस्तक जागेवर उलटे ठेऊन वरच्या हाॅलमध्ये गेलो.

नेहमीप्रमाणे मीच पहिला वाचक. इतर वाचक कोणीही नव्हते. त्यामुळे मला पाहून Jenny Barnes ला खरंच ‘Happy to see you’ झाले. तिने मला नाव न विचारता माझे “सुंदर ते ध्यान” पाहूनच माझ्या नावापुढे मी आल्याची खूण केली. आत घेऊन गेली व माझे टेबल दाखवले. माझे पुस्तक आले नव्हते. हळू हळू इतर वाचक आणि पुस्तके येऊ लागली. त्या अगोदर व्यसनमुक्त बाप लेका ऐवजी माय लेक(मुलगा)आले होते.त्यांच्याशी बोललो. तेव्हढेच Warm up !

बार्न्सने एक छापील पत्रक दिले होते. वैयक्तिक खाजगी माहिती विचारू नये; हरकत नसेलतर विचारा/ सांगा. बोलण्यापेक्षा बोलते करा, ऐका; नमुन्यादाखल काय विचारणे चांगले वगैरे सर्व सूचना त्यात होत्या. मला पुष्कळ धीर येऊ लागला. वेळ झाली. सगळी पुस्तके आली वाचक आले. आपापल्या टेबला वर गेले. पेपर वीस मिनिटांचा. १५व्या मिनिटाला पूर्व सूचनेची घंटा होईल हे सांगून झाले. आणि सुर करा असे जेनी बार्न्स म्हणाली. माझी दातखीळ बसली! बरे झाले,शास्त्रज्ञ बाईनेच स्वत:ची “ हाय्! मी एमिली!” कसे काय आहात?”विचारत माझ्या घामाच्या धारांना बांध घालायचा प्रयत्न केला. नुकतेच वाचलेले शीर्षकच AIQ म्हणून उत्तर दिले. घाबरल्यावर आवाज मोठा होतो हे आजच लक्षात आले. कारण त्या हाॅलमध्ये माझ्या AIQ चे तीन वेळा प्रतिध्वनी घुमले! सगळ्या वाचकांनी पुस्तके पटापट बंद केली व काय झाले असा चेहरा करून एमिली बाईंकडे सहानुभुतीने पाहू लागले.त्यांना काय माहित असे अजून बरेच वेळा होणार आहे ते! पण एमिली बाई प्रसंगावधानी. त्यांनी तोच धागा पकडून “ ह्या गोष्टींची सुरवात १७५० पासून झाली. १९२० साली नेव्हीतील अॅडमिरल बाईंनी ह्यावर बरेच काम केले होते. मी मग काही संबंध नसताना algorithms हे संध्येतील नाव घ्यावे तसे म्हणून लगेच आठवून आठवून step by step..असे काही तरी पुटपुटलो.म्हणजे मला वाटले मी पुटपुटलो; पण माझा घुमलेला आवाज ऐकून लगेच इतर वाचकांनी आणि नवल म्हणजे पुस्तकांनीही माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने रागाने पाहात लायब्ररीत शांतता पाळायची असते त्याची आठवण करून दिली. एमिली बाईंबरोबर माझाही उत्साह वाढू लागला असावा. मग रोबाॅट्सही चर्चेत आले.

ह्या बाई संगणक शास्त्रात डाॅक्टरेट आहेत. पण गंमत अशी की त्या ह्या शास्त्राकडे वळल्या त्यामागे त्यांची पहिली व आजही असलेली भाषेविषयीची आवड. त्यांना चार पाच भाषा तरी येतात. विशेष म्हणजे लॅटिन जास्त चांगली येते. म्हणजे आपल्या कडील संस्कृत तज्ञ. भाषेतील व्याकरण, शब्दोच्चार त्यातील उच्चारांचे टप्पे किंवा तुकडे. शब्दरचना व होणारे वाक्य; पिरॅमिडच्या शिखरावर शब्द व त्या खाली, खाली तो तयार होण्यासाठी त्यातील अक्षरे त्यांचे होणारे उच्चार ह्यांची बांधणी करत करत शब्द होतो. तसेच वाक्यही. तेच मी प्रोग्रॅमिंगमध्ये करते असे उदाहरणे देऊन सांगितले. त्या इंजिनिअर नसूनही संगणक शास्त्रज्ञ झाल्या. त्यांनी मला alexa, siri संबंधात थोडक्यात सांगितले.पहिल्या अर्ध्या मिनिटातच माझ्या आकलनशक्तीचीही व स्तराची त्यांना कल्पना आली असावी. त्यांच्या टेबलाकडे मी व जातांना त्या स्वेटर विणत होत्या. शेवटी शेवटी मी त्यांना तसे सांगितले. त्यावर त्या लगेच हसत म्हणाल्या knitting सुद्धा प्रोग्रॅमिंगच आहे. विणायचा स्वेटर घेउन लगेच त्यांनी दोन उलट एक सुलट पुन्हा एक उलट…टाके सुईवर घेत त्याही कशा algorithmic स्टेप्स आहेत ते मला प्रत्येक स्टेप घेऊन सांगू लागल्या. घंटा होऊन गेली होती. ‘पेपर’ वाचून (सोडवून) झाला होता. वेळ संपत आला. सगळ्यांच्या उठण्याच्या निघायच्या हालचाली सुरु झाल्या. माझेही वाचन संपले होते.

हा मुलाखतीचा किंवा प्रश्नोत्तरांचा प्रकार नाही. ह्यात वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्या नेहमीच्या पठडीतील लोकांपेक्षा वेगळ्या, आपल्याला ज्यांच्याविषयी, ज्यांच्या पेशा कामा विषयी फारशी माहिती नसते कुतुहल असते अशांची भेट. त्यांनाही मुख्य प्रवाहात इतरेजनांच्या सहवासात आणून संवाद साधण्याचा हा एक वेगळा सामाजिक कार्याचा प्रकार आहे.दोन वाक्यात सांगायचे तर तुम्हीही आम्हीच आहात. आणि व आम्हीही तुम्हीच आहात. हे जाणून घ्यायचा हा वेगळा एका अर्थी उद्बोधक आणि सुंदर सामाजिक उपक्रम आहे.

उपक्रमाला नावही (ज्या स्थळी हा आयोजित केला त्याचाही त्यात थोडा वाटा असेल ) वेगळे व लक्षवेधी आहे . Human Library. Civit ह्या संस्थेने केलेला उपक्रम आहे.

मी सर्वेक्षणात सहसा भाग घेत नाही. पण अखेरीला मी त्यांचा फाॅर्म भरून दिला. नविन पुस्तके सुचवा मध्ये मी weatherman(Meteorologist) fire fighter first responders सुचवले.

मला हा नविन अनुभव होता. समोरासमोर अनोळखी व्यक्तीशी (इंग्रजीतून!) संभाषण करण्याची ही माझी पहिलीच वेळ. वेळ चांगला गेला व कारणी लागला असे वाटले.

मी लिहिलेले ‘हे पुस्तक’ वाचनीय वाटेल की नाही ही शंका आहे. कारण सर्वेक्षणातील “तुम्हाला ‘पुस्तक’ व्हायला आवडेल का?” हा प्रश्न मी सोडून दिला!

संपता संपता, AIQ ची मी दोन चार पाने वाचली त्यावरून हे पुस्तक उत्तम आणि वाचावे असे आहे इतके सुचवतो.

दलाई लामा

काल (८ नोव्हेंबर रोजी) शनिवारी तिबेटचे धर्मगुरु आणि प्रमुख दलाई लामा यांचे भाषण ऐकायला मिळाले.सभाग्रहात मी बऱ्याच मागच्या रांगेत होतो. त्यामुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण ते प्रत्यक्ष तिहे आहेत, त्यांच्या हालचाली, त्यांचे हसणे वगैरे दिसत होते. थोडे वाकून आणि हळू चालत होते. पण आवाज भक्कम, हसणेही मोकळे आणि तसे आवाजी.

दलाई लामांनी आपल्या भाषणात सकारात्मक विचार आपल्या मनात असावेत आणि ही सकारात्मता आपल्या आचराणातही असावी असे सांगितले. ही सकारात्मकता कशाने येते आपल्या जीवनात? तर ती आपल्या सह्रूदयतेमुळे, प्रेमामुळे येते. आजपर्यंतच्या कित्य्क हजारो वर्षांपासून, अनेक तत्वज्ञानातून संस्कृतीतून हेच सगळ्यांनी सांगितले आहे. दुसऱ्यांविषयी, सर्वांविषयी प्रेम, करुणा, आणि सहृदयता असू द्या. ह्यातूनच अहिंसा भाव निर्माण होतो. प्रेम, आपुलकी, सहृदयता करुणा म्हणजेच सकारात्मकता. क्रोध, द्वेष मत्सर हीच नकारात्मकता. ही मूल्ये, हे गूण जोपासावेत हेच सर्व तत्वज्ञानात, संस्कृतीत सांगितले आहे. ह्यात कुठे धर्माचा, कुठल्या धर्माचा अडथळा येतो? हे सदभाव अंगी बाअणले, दुसऱ्यांविषयी सतत सहृदयता, प्रेम बाळगले तर आपले आयुष्यही आनंदाचे होत. खऱ्या मानसिक शांततेच होते. आपली प्रतिकार्शक्तीही वाढते. शारिसिक आणि मानसिक दोन्हीही.

दलाई लामांने आपल्या अर्ध्या पाऊण तासाच्या भाषणात हे सांगितले. ह्यात त्यांनी नवीन असे विशेष काय सांगितले? अनेकजण हेच सांगतात. रोज. प्रवचनातून आणि भाषणातून. पुस्तकातून आणि चित्रवाणीच्या वाहिन्यांवरून. शिबिरातून आणि कार्यशाळांतून. पण दलाई लामांनी हे सांगितल्यावर, भाषण ऐकताना ते इतके खरे– सत्य, मोलाचे विचार असे सर्वांना का वाटत होते? लोकांना इतका निर्भेळ आनंद समाधान का वाटत होते?कारण सांगता येत नाही. भाषणातील मधूनच होणाऱ्या नर्म विनोदाचा शिडकावा; त्यांचे मनमोकळे हसणे; स्वत:च्याच विचाराला, विधानाला त्यांनी हसत हसत मारलेली कोपरखळी; बोलण्यातून जाणवणारा त्यांचा साधेपणा, सरळ्पणा; तिबेटी जनतेचे ध्र्म प्रमुख; तिबेटचे अनभिषिक्त राजे; बौद्ध धर्माचे विद्वान आचरणशील उपासक म्हणून? ही कारणे नसावीत. ते सांगत होते आणि हजार दोन हजार श्रोते ऐकत होते. न कंटाळता. न जांभया देता ऐकत होते. मधून मधून प्रतिसाद देत होते. मला वाटते, ते सांगत होते ते सगळ्यांना पटत होते. कारण ते जे काही सांगत होते ते त्यांच्या स्वानुभवातून आले होते.ते जे काही सांगत होते ते स्वत: आचरत होते. त्यामुळे सहृदयता, प्रेम, करुणा, आपुलकी आणि अहिंसा हे केव्ळ शब्द वाटत नव्हते. हे सर्व शब्द त्यांच्या अर्थासह दलाई लामांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रकट झाली होत्ते. स्वानुभवातून आचराणातून आलेल्या स्ब्दांना-ते नेहमीचे असले तरी-एक वेगळीच झळाळी येते, धार येते.आपल्या अंत:करणाला भिडतात. तसेच झाले काल. निदान मला तरी. प्रत्यक्ष आचरलेल्या, केलेल्या गोष्टीच खऱ्या खुऱ्या वाटतात.

थोडक्यात सांगायचे तर क्षणभरही त्यांचे भाषण “उपदेश” वाटले नाही.

चीनशी, तिबेटच्या स्वातंत्र्याविषयी; मग पुढे नमते घेऊन स्वायत्ततेविषयी; आणि आता मर्यादित स्वायत्ततेसंबंधी , आपल्या देशातून परांगदा हॊऊन, गेली अनेक वर्षे दलाई लामा अहिंसक मार्गाने म्हणजेच चर्चा, वाटाघाटी इतर राष्ट्रांच्या तोंडदेखल्या पाठिंब्याने करत होते. परवा अखेर त्यांनी जाहीरपणे सांगितले, ” मी हरलो; तिबेटला मुक करू शकलो नाही आणि इतरही काहीही हक्क तिबेटी लोकांना मिळवून देऊ शकलो नाही.” पण कुठेही चीनविषयी अगर इतर कुणाविषयीही कोणताही कटु शब्दांचा उच्चार केला नाही! अहिंसे संबंधी बोलण्याच्या ओघात त्यांनी अहिंसेचा प्रसार हिंदुस्थानने कसा जोरात करायला हवा, कारण जगात सर्वत्रा अहिंसेची मागणी वाढली आहे असे सांगितले. समोरच्या बहुसंख्य म्हाताऱ्या श्रोत्यांकडे पहात आता तरुणांनीही ह्यात पुढाकार घेऊन अहिंसेचे पालन आणि प्रसार करावा असे सांगताना त्यांनी हल्ली प्रचलित असलेले शब्द वापरून ,दृष्टांत देऊन गंमत केली. “इन्डिया शुद प्रोड्युस मोअर, मोअर अन्द मोअर अहिंसा अँड एक्स्पोर्ट इट. अहिंसा इज वेल ऍक्सेप्टेड बाय द वर्ल्ड.प्रोड्युस मोअर अहिंसा, एक्स्पोर्ट इट मोअर अंड मोअर. यंग पीपल शूड जॉईन इन धिस प्रॉडक्शन.” हे सांगत असताना उत्साहाने त्यांच्या हाताच्या जोरदार हालचाली आणि मोकळे हसणे चालू होते.

अलिकडच्या वैद्यकीय संशोधनाचा दाखला देत सहृदयता, प्रेम,अहिंसा करुणा ह्या विचारांमुळे आपले आरोग्यही चांगले राहते, शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते वगैरे सांगितले. त्यासंदर्भात त्यांनी “आपली नुकतीच गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रिया झाली. एरव्ही इतरांच्या बाबतीत हे ऑपरेशन २०-३० मिनिटात होते. पण त्यांच्या वयामुळे त्यांच्यावरची ही शस्त्रक्रिया तीन तास चालली वगैरे सांगितले. पण आठ दिवसातच मी पूर्ण बरा झालो.डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले.माझ्या रोजच्या वागण्या-चालण्यामुळे हे असे झाले.” असे ते म्हणाले.इतके सांगून झाल्यावर हळूच त्याच ओघात “ह्या गुणामुळे जर असा फायदा झाला तर मग मुळात ही व्याधी झालीच का , कशी?” अशी स्वत:लाच कोपरखळी मारून ते हसले. सकाळी १०:२० ला बाहेर पडलो होतो.पेट्रोल भरणे, रहदारीतून वाट काढणे; इतर अनेक वाहनांना मार्ग देणे असे करत चाळीस एक मिनिटांनी मी संमेलन्स्थळे पोहचलो.इतकी धडपड करत उत्साहाने जाण्याचे आणि तेही माझ्यासारख्या राग, संताप, द्वेष , क्रोध या सर्व सदगुणांनी काटोकाठ नसला तरी पूर्ण भरलेल्या माणसाने सात्विक शुद्ध साजूक तुपासारख्या[तेही गाईच्या दुधाच्या]सर्वोदय संमेलनाला जाण्याचे कारण काय? हे म्हणजे रोज दारुचा रतीब लावून पिणाऱ्या माणसाने देवळात जाऊन तीर्थ पिण्यासारखे , एम टीव्ही, व्ही टीवी वर नाचण्या-गाणाऱ्याने देवळात भजन म्हणण्यासारखेच झाले की! सुताच्या गिरण्यात चरख्यांवर ऊत काढण्यासारखेच किंवा अभिषेक बच्चनने अभिनय करण्यासारखे झाले की~ पण ह्याला कारणही तसेच घडले.

मी सर्वोदयी कार्यकर्ते श्री. विजय दिवाण यांना भेटायला गेलो होतो. आता त्यांना कशासाठी भेटायला गेलो? तर श्री.सुहास बहुळकर यांनी,” पुण्यात ६-७ नोव्हेंबरला सर्वोदय संमेलन आहे. तिथे नक्की दिवाण असतील.तुम्हाला उत्सुकता असेल तर त्यांना भेता.”असे त्यांनी मला फोनवरून सांगितले. आता हे सुहास बहुळकर कोण आणि त्यांनी तुम्हाला हे का सांगावे? असे सर्व प्रश्न तुम्हाला पडतील. पूर्वीच्या ह.ना. आपटे, नाथ माधव अगर गेला बाजार वि.वा. हडप यांच्या कादंबऱ्या वाचणाऱ्या वाचकांना असेच चक्रावून सोडणारे प्रश्न पडत. ” ह्या सूर्याजीचे काय झाले, भवानराव कमळजेला घेऊन कुठे गेले, शिलेदारने अंधारत उडी मारली तो कुठे गेला भुयारातून वगैरे प्रश्नांना हे कादंबरीकार, “आता थोडे आपण मागे जाऊन आपल्या चरित्र नायकाचे काय झाले ते पाहू(इकडे वाचकांचे काय झाले ते पहा ना!), पण त्या पूर्वी आपण…रावांच्या वाड्याकडे जाऊ या(काय कुणाच्या लग्नाचे आमंत्रण आहे का?) …पण तिथे पोचण्या अगोदर इकडे भैरोबाच्या देवळाकडे वळू…” असे म्हणत वाचकाला १०-१५ पाने तरी फिरवून आणत! तसं झालं आहे इथे. तर आता हरदासाची कथा मूळ पदावर आणू या.पण त्या अगोदर (आलं का पुन्हा ते त्या जुन्या कादंबरीतले दळण आणि वळण!)श्री सुहास बहुळकर हे कोण, त्यांचे माझे फोनवर का बोलणे झाले हे पाहू या.( पाहू या! चला!)

सुहास बहुळकर हे नामांकित चित्रकार. काही काळ ते जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्राध्यापक होते. व्यक्तिचित्रण हा त्यांचा विशेष अधिकाराचा भाग.त्यांनी काढलेले लोक्मान्य टिळकांचे तैलचित्र–पोर्ट्रेट- आपल्या लोकसभेत आहे. तसेच त्यांची गांधी आणि नेहरू यांची चित्रे मुंबईच्या राजभवनात–गव्हर्नर्स हाऊस- मध्ये आहेत.

त्यांचा यंदाच्या दीपावली या दिवाळी अंकात “कथा चित्रांच्या आणि चित्रकारांच्या” असा एक लेख आला आहे.तो लेख मला आवडला, म्हणून मी त्यांना तसे सांगण्यासाठी फोन केला. बोलताना मी विनोबाजींचे चित्र काढण्याच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभवाविषयी बोलताना सहज त्यांनीच दोन तीन वेळा उल्लेख केलेल्या, विजय दिवाणांचे पालुपद”आम्हाला काहीही घाई नाही” हे सांगितले. लेखातील इतर काही गोष्टींविषयी जुजबी बोलल्यावर शेवटी मी त्यांना सांगितले की, “तुमच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदात तुम्ही ठरवलेले {त्यांच्या आता मोठ्या झालेल्या २०-२२ वर्षांच्या-दोन्ही मुलींचे आणि त्यांच्या बायकोची अशी पोर्ट्रेट करायचे ह्या दिवाळीत; बावीस वर्षे झाली इतकी चित्रे काढली पण ह्यांची पोर्ट्रेट्स केली नाहीत ह्याची रुखरुख वगैरे त्यांनी त्या परिच्छेदात व्य्क्त्त केली आहे} काम मात्र लवकर पूर्ण करा. त्याचा आनंद फार मोठा असेल. इतर कुठल्याही मान-मरातबापेक्षा ही चित्रे काढण्याचा आनंद, समाधान फार मोठे, निराळे असेल असे मी त्यांना म्हणालो. “बरंय, पुरे करतो ते काम.” असे ते म्हणाले. त्या अगोदर त्यांनी मला श्री. दिवाण ह्यांच्या विषयी सांगितले की सध्या ते ५०-५५चे असतील. तरुणपणीच त्यांनी विनोबांच्या सर्वोदयी, ग्राम विकास कार्यक्रमाला वाहून घेतलेय. विनोबांच्या जन्मगावी आणि आजूबाजूच्या खेड्यात ते काम करतात.ते तिथे गेले असताना –
खेड्यात बरेच वेळा गाय, म्हैस मरून पडल्याचे, भोवती कावळे कुत्री त्यांना तोचताहेत, लचके तोडताहेत माश्या घोंगावताहेत असे दिसले. डॉ.आंबेडकरांच्या सुधारणावादी क्रांतीकारी चळवळीमुळे पूर्वीची महार मंडळी मेलेली जनावरे ओढून नेण्याची, त्यांची कातडी सोलण्याची कामे करत नहीत.आणि इतर कोणी सवर्ण्ही अर्थातच अशी कामी करत नाहीत.ह्यावर ह्या ’दिवाण्याने’ उपाय काढला. ब्राम्हण दिवाण स्वत:च मेलेली जनावरे ओढून नेऊन त्यांची कातडी काढून ती सगळी स्वच्छ करू लागला. ह्या अशा इतक्या कातड्यांचे करायचे काय? हा प्रश्न पडला. तोही त्याने सोडवला. स्वत: चपला बूत जोडे शिवायला शिकला आणि तयार करू लागला! आज गोगोद्याला (विनोबांच्या जन्मगावी) त्यांनी ह्याची एक मोठी संस्था उभी केली आहे.

तर ह्या दिवाणांना मी भेटायला गेलो.६-७ नोव्हेंबरला मला जाणे जमले नाही. कालचा शेवटचा दिवस होता.वर्तमानपत्रात फारशी प्रसिद्धि नव्हती. त्यामुळे तिथे खादीचे, ग्रामोद्योगातील वस्तूंचे, सर्वोदयी पुस्तकांचे मोठे प्रदर्शन होते.माहिती नव्हतीयाची. फारसे पैसे नेले नव्हते. म्हणून ६०-१०० रुउपये मीटर्ची उत्तम तलम खादी सदऱ्यासाथी घेता आली नाही.किंवा सर्दी पडशासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा,किंवा मूळव्याध,मधुमेह वरील चूर्ण, अगदी पारदर्शक, गाईच्या तुपापासून केलेला साबण वगैरे काही घेता आले नाही. असो हे महत्वाचे नाही.

मी सगळीकडे फिरलो. दोघा तिघा कार्यकर्त्यांना, डॉ. कुमार सप्तर्षींनाही विचारले. सगळ्यांनी आता/इथे/इकडे/तिकडे होते दिवाण; भेटले,दिसले तर सांगतो म्हणाले.मीही त्यांना शोधत फिरलो. पण ते भेटले नाहीत.मी हिरमुसलो.मी घरी जाणार, पण असे फिरत असतानाच थोड्या वेळात दलाई लामा येणार आहेत. समारोपाचे भाषण तेच करणार आहेत असे समजले. थांबलो.
थांबलो त्याचे सार्थक झाले. आलो त्याचे फळ मिळाले. एका मोट्या माणसाला दुरून का होईना पहायला मिळाले. त्यांना बोलताना, हसताना ऐका पहायला मिळाले. हा भाग्य योगच म्हणायचा.नाहीतर इतकी वर्षे जगलो.इतकी थोर माणसे डोळ्यासमोर आता आता होती. त्यांचे फोटो, बातम्या, किस्से मोठेपण ऐकले असेल. एखाद्याचे पुस्तक वाचले असेल.पण प्रत्यक्ष त्यांना पहाण्याची संधी आली नाही किंवा मी तसे प्रयत्नही केले नसतील. नोबेल पारितिषिक विजेता, लहानशा का होईना पण एका देशाच्या राजा,अनभिषिक्त राजापेक्षाही मोठा माणूस; मोठ्या , जबर हुकमतीखाली असलेल्या देशाशी शांततेतेने लढा देणारा; स्वत:साठी नव्हे तर आपल्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी, संस्कृती, भाषा जपण्यासाठी, अहिंसेचे पालन करणाऱ्या माणसाला दुरून का होईना पहायला मिळाले हे भाग्य नव्हे का? दुधाच्या अपेक्षेने गेलो तर बासुंदी मिळाली!

मी बहुळकरांना त्यांच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदातील कामाविषयी बोललो. तेही हो, बरं, लवकरच पुरे करतो म्हणाले. त्यांनी फोन खाली ठेवला आणि मीही. क्षनभरातच फोनची घंटा वाजली. फोन उचलून कानाला लावला तर काय! “मी बहुळकर बोलतोय” असे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले,” तुम्ही जे शेवटी बोललात ते मला लिहून पाठवा. त्या चार ओळी मी जपून ठेवेन! तुम्ही सांगितलेत त्यात भावनिक ओलावा होता.” मी अवाक झालो. म्हटलं हा तर माझा मोठा सन्मानच केलात तुम्ही. वगैरे, वगैरे.
त्यांना मी पत्र पाठवलय.

श्री. विजय दिवाणही भेटले असते तर आणखी बरे वाटले असते.आता केव्हा योग यॆईल कुणास ठाऊक.