Category Archives: My Life

वारीतील सखे सोबती

वारी पूर्ण झाली. मी घरी आलो. डोळ्यासमोर अजूनही वारीच दिसायची.
कानात टाळ मृदुंगाचे आवाज घुमत होते. मनात वारीचेच विचार आणि माझ्या
सहवारकऱ्यांच्या आठवणी.

तीन चार दिवस घरातील सर्वांना पंढरीच्या पायी वाटचालीच्या,
आळंदीपासून माझ्या सोबत असलेल्या वारकरी सज्जनांच्या, सुहृदांच्या आठवणी
सांगत होतो.

ठरल्याप्रमाणे आळंदीला माझे चंद्रपूरचे मित्र डॉ.अंदनकर भेटले;त्यांच्या
बरोबर आलेली त्यांची चंद्रपूरची मित्रमंडळी भेटली.आता इथून
पंढरपुरापर्यंत आम्ही चौदा वारकरी एकत्र वारी करणार! डॉक्टर आणि श्री.
शंकरराव आदे हे दोघे अनुभवी वारकरी.डॉक्टारांनी यापूर्वी सहा सात वेळा
पंढरपूरची पायी वारी केली आहे.बाकीचे आम्ही सर्व अगदी “पहिलटकरी”
होतो वारीत.

य़ा वारीच्या निमित्ताने आम्हा दोघा मित्रांची–डॉक्टरांची आणि माझी–
जवळपास चाळीस वर्षांनी भेट झाली! ह्या भेटीचा आनंद तर काही वेगळाच
होता. वारीत चालताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.त्यांची तब्येत
बिघडली म्हणून त्यांना माघारी परतावे लागले. पण त्यांची जवळ जवळ अर्धी
वारी झाली होती. डॉक्टर परत गेले खरे पण ते आणि आम्ही दर दोन एक दिवसांनी
एकमेकांची चौकशी करत असू. त्यांना बरे वाटते आहे हे समजल्यावर
सगळ्यांनाच बरे आणि हायसे वाटले.एका परीने त्यांचे मन वारीतच होते.वारी
संपल्यावर मी त्यांना फोन केला तेव्हा डॉक्टर पूर्ण बरे झाले आणि आता ते
आपल्या हॉस्पिटल मध्ये जातात आणि ऑपरेशन्स वगैरे करू लागले हे त्यांच्याकडून
ऐकल्यावर मला खरा आनंद झाला.

लोणंदपर्यंत डॉक्टर,मी आणि श्री. कमलाकर कुमरवार वारीत एकत्र असायचो.वाटेत
गप्पा मारताना ते, त्यांचा व्यवसाय ते स्वत: आणि त्यांचा मुलगा नविन कल्पनांनी
कसा वाढवतोय, त्यांची आणि डॉक्टरांची कशी घनिष्ठ मैत्री आहे हे सांगत.
त्यांना गुडघेदुखीचा फार त्रास होत असे. पण ते दुखणे सहन करत ते सावकाश
विश्रांती घेत सगळे टप्पे पार करत. कमलाकर अणि डॉक्टर दोघेही आपले
दुखणे अंगावर काढत चालत आहेत ह्याची मला थोडी फार कल्पना होती.
गुडघे फारच दुखू लागले तर काही अंतर कमलाकर गाडीतून पार करत.पण
असे क्वचित. ह्या दोघांमुळे आम्ही लोणंदपर्यंत आलो हे जाणवले नाही.

दिंडीत आम्हाल पहिले काही दिवस २८ क्रमांकाचा तंबू मिळाला होता.आमचा हा
तंबू म्हणजे एक नमूना होता. पालाची एक बाजू अगदी वर तर दुसरी बाजू फार
खाली. शंकरराव आदे सारखे अनुभवी सुद्धा ह्या तंबूच्या दोऱ्या आवळून
थकले.त्यांना मदत करणारे श्री.फडणवीस, सुनील सिद्धमशेट्टीवारही रोज ही
कसरत करतान बेजार व्हायचे. बरं दिंडीच्या मालकांना सांगावे तर आणखीनच
गंमत व्हायची. दिडीचे मालक,चालक प्रमुख दोघे भाऊ होते.एक भाऊ मुका तर
दुसरा बहिरा. पण दोघेही कर्तबगार आणि हुशार. एकदा मुके बंधू भेटायचे तर
दुसऱ्या वेळी बहिरे! दोघे एकदम भेटूनही उपयोग होईना! मग एकदा आमच्या
तंबूची दुर्दशा बहिऱ्या मालकांना कागदावर लिहून दाखवली. मग आम्हाला
दुसरा तंबू मिळाला.पण हे सर्व होण्यास आठ दहा दिवस गेले!

आम्ही संध्याकाळी सर्वजण तंबूत मुक्कामाला आलो की महिला मंडळ
श्री.फडणविसांची गंमत करत असे. फडणविसांनी त्यांना सांगितलेल्या काही
गोष्टींवरून त्यांची खिल्ली उडवत. फडणविसही खिलाडूपणे त्यात सामील हॊऊन
पुन्हा एखादी घटना तक्रारवजा सुरात सांगत आणि त्यावरूनही सौ.घरोटे,
विद्याताई मसादे, सौ.ज्योती तारे त्यांची फिरकी घेत.पण वारीत चालताना
फडणविसांची आपल्याला खात्रीची सोबत असायची असे माझ्यापाशी, महिलामंडळ
आवर्जून सांगत.

मुक्कामाला आलो की आमचे(एक्स्प्लोरर)-संशोधक-म्हणजे श्री. सुनील सिद्धमशेट्टीवार
आणि फडणवीस. पाण्याचा टॅंकर कुठे आहे, टॅंकरपाशी अजून गर्दी नाही,
“बहिर्दिशा” कोणत्या दिशेला वगैरे साध्या पण गरजेच्या बाबींची अचूक
माहिती हे दोघेजण सांगत. भल्या पहाटे, पहाट कसली, खरं म्हणजे उत्तर रात्रीच
तीन साडे तीन वाजता हे दोघे बहाद्दर “बढिया” आंघोळीसकट सर्व आटोपून
“तैय्यार”! आम्हा इतरांचे सर्व आटोपे पर्यंत ह्या दोघांची पुन्हा एक झोपही
होत असे! पुन्हा सगळ्यांना सामानासकट गाडीकडे घेऊन जाण्यातही पुढे.माझी जड
बॅग सुनील तर कधी श्री. शंकरराव आदे घेत.आणि रात्री तंबूत आणूनही ठेवीत.

रात्री जेवणाच्या पंगतीला ह्या तिघांची तसेच श्री आवताडे आणि
श्री.रेभणकर यांची मला सोबत असायची.शिवाय श्री. फडणविस आणि सुनील
सिद्धमशेट्टीवार हे दोघे चंद्रपूरकर दिंडीतल्या एखाद्या पंगतीला जेवायलाही
वाढीत.

सिद्धमशेट्टीवार यांना भजने, श्लोक, स्तोत्रे चांगली पाठ आहेत आणि आपल्या
उत्तम आवाजात ते म्हणतही छान. आम्ही ११ जुलैला सासवडहून थेट पंढरपूरला
जाताना गाडीत त्यांच्या आणि विशेषत: सौ. आदे आणि सौ घरोटे यांच्या
भजनांनी बहार आणली. खरोखर त्या दिवशी हरीनामाचा गजर आणि संकीर्तनच
झाले आमच्या गाडीत!

श्री. शंकरराव आदे अनुभवी वारकरी.तंबूच्या एखद्या कोपऱ्याची दोरी
ताणून बांधणे,वाटचाल संपून मुक्कामाला तंबूत आल्याबरोबर कपडे वाळत
घालण्याचे दोरी बांधणे, पाऊस येणार असे दिसले की, तंबूवर प्लास्टिक्सचे कापड
सुनीलच्या मदतीने टाकणे. गाड्यांत सर्व सामान नीट रचून ठेवणे, ह्या गोष्टीत
त्यांचा नेहमी मोठा हातभार असे.

सौ.ज्योती तारे, सौ.घरोटे, सौ आदे, विद्याताई मसादे अणि त्यांची बहिण बेबीताई
ह्या महिलांमुळे आमच्या तंबूत सतत काही ना काही चालू असायचे.एखाद्या
संध्याकाळी हरिपाठाच्या अभंगाबरोबर इतर स्तोत्र, भजने ह्यांच्यामुळेच म्हटली
जात असत. कधी विद्याताई किंवा त्यांची बहिण बेबीताई संध्याकाळी गरम चहा
घेऊन येत; तर कधी सरबत कर असे काहीना काही चालू असायचे.

सौ.ज्योती तारे ह्यांच्या वाचनाची आवड, त्यांचे वाचन त्यांच्या बोलण्यातून
जाणवत असे.उत्तम संस्कार करणाऱ्या, चांगले आदर्श आणि मूल्ये मुलांपुढे
ठेवणाऱ्या आपल्या वडिलांविषयी त्या भरभरून सांगत.ऍडव्होकेट विद्याताई
गुडघ्यांच्या त्रासामुळे गाडीतून येत असत पण जेव्हा लवकर येत तेव्हा दिंडीच्या
मुक्कामाचे ठिकाण शोधून काढणे, हिशोब ठेवणे अशी महत्वाची कामे त्यांनी
व्यवस्थित सांभाळली. त्यांच्या बेबीताईंची, चालून दमून भागून आल्यावर
सुद्धा एखादी बादली पाणी भरून आणणे, चहा आणणे वगैरे बारिक सारिक कामे
चालू असायची.

जे ज चांगले आपल्या वाचनात आले की ते लिहून ठेवणाऱ्या,
भजनांची गोडी असणाऱ्या आणि म्हणणाऱ्या, वाटचालीत नेहमी त्यांच्या बरोबर
असणाऱ्या सौ.ज्योती तारे, बहुधा भंडी शेगावहून वाखरीला येताना, आपल्या
बरोबर दिसत नाहीत त्या कुठे मागे राहिल्या की काय हे लक्षात आल्यावर ज्योती
सुखरूप असावी, लवकर भेटावीम्हणून धावा करणाऱ्या, रडणाऱ्या, हळव्या सौ.
घरोटे; “पांडुरंग विठ्ठला। पंढरिनाथ विठ्ठला। विठू किती दमला॥” हे
भजन ठेक्यात, गोड म्हणणाऱ्या सौ. आदे या सर्वांची आठवण आमच्या तंबूतील
सगळ्यांना येणार यात नवल नाही.

सौ. ज्योती तारे, आपल्या बरोबरचे इतर सांगाती, रस्ता ओलांडून, पुन्हा वळून
जाताना तसेच पुढे गेले; आपण मागे राहिलो हे त्या लोकांच्या लक्षातही कसे आले
नाही! मग त्या तशाच एकट्या पुढे निघाल्या. एव्हढ्या अफाट लोकसागरात
बरोबरीचे मागे आहेत की पुढे गेले हे समजणेच फार कठिण. थोडी वाट पाहून त्या
लोकगंगेच्या लाटेबरोबर पुढे जाणे इतकेच आपल्या हातात असते. तशाच त्याही मग
पुढे निघाल्या. आपल्या बरोबरचे आणि आपली चुकामूक झाल्यावर त्या तेव्हढ्या
अफाट गर्दीतही–गर्दी हा शब्दसुद्धा वारी नावाच्या महासागराचे वर्णन करण्यास
अपुराच आहे–आपण एकटेच असतो!

अशा एकट्या अवस्थेत त्या एकाकी निघाल्या. कितीही धैर्य गोळा करून निघाल्या,
गर्दी वारीतील भाविकांची असली तरी, तसे सर्व अनोळखीच.वाट आणि प्रदेशही
नवखाच. केव्हातरी जीवात धाकधुक झालीच असणार. पण ह्या बहाद्दर बाई
निश्चयाने पुढे पुढेच आल्या आणि अखेर पोलिसांना विचारून नेमक्या मुक्कामाच्या
ठिकाणी आल्या!आपले धैर्य कसोटीवर घासून सिद्ध करावे लागलेल्या ह्या
प्रसंगाची त्यांना आणि इतरांनाही सदैव आठवण राहील.

मुक्काम हलवून सकाळी सहा साडेसहाला आमच्या तंबूतले इतर आणि मी व
श्री.आवताडे बाहेर मुख्य रस्त्यावर आल्यावर थोडा वेळ कुणाच्या ना कुणाच्या पण
अनेक वेळा माझ्या आणि श्री. आवताडे यांच्या बरोबर असणारे श्री. रेभणकर
थोड्याच वेळात अंतर्धान पावत! गायब होत! आणि एकदम संध्याकाळी मुक्कामाच्या
ठिकाणी तंबूत प्रकट होत.आल्यावर प्रथम माझी चौकशी करत. मग
सर्वांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला शांतपणे, हसतमुखाने तोंड देणारे,आपल्या
वैशिष्ठ्यपूर्ण पोषाखाने आमचेच काय पण सर्व वारीचेच लक्ष वेधून घेणारे,
कधी एखाद्या मलंग तर कधी गाडगेबाबांसारखे भासणारे, सरळ मनाचे,मस्त
अवलियासारखे स्वानंदात मग्न असणाऱ्या रेभणकरांना विसरणे कठिण आहे.
आठवण ठेवून चंद्रपूरला पोहोचल्यावर त्यांनी मला फोन केला तेव्हा मला
आनंद झाला.

कसलाही नवस नव्हता की व्रत घेतले नव्हते पण श्री. आवताडे यांनी आळंदी ते
पंढरपूर ही वारी अक्षरश: अनवाणी पायांनी केली.
काट्याकुट्यांतून, रणरणत्या उन्हात भाजून तापून निघालेल्या डांबरी
रस्त्यावरून, दगडगोट्यातून, अणकुचीदार खडे पायाला टोचत असताना,
तापलेल्या धुळीतून, वावरातल्या काळ्या चिकण मातीच्या चिखलातून अनवाणी
पायांनी २५०/२६० किलोमीटरची ही वारी करणे म्हणजे श्री. आवताडे यांची एक
प्रकारे मोठी तपश्चर्याच नाही का? असा हा तपस्वी वारकरी लोणंदपासून
माझ्या बरोबर होता.हा माझा सन्मानच होता. अगदी वाखरीच्या पुढे
पांडुरंगाच्या पंढरीत प्रवेश करून आम्ही पंढरपूरात आठ दहा मिनिटे
सोबतीनेच चालत होतो.

रोज संध्याकाळी तंबूत मुक्कामाला आल्यावर “थकलो” म्हणण्याचा खरा अधिकार
फक्त श्री.आवताडे यानांच होता यात शंका नाही.ह्या एका गोष्टीमुळेही आवताडे
सगळ्यांच्या लक्ष्यात राहतील.

सौ. ज्योती तारे मध्यंतरी एका वाटचालीत एकट्या मागे राहिल्या होत्या.त्यावेळी
त्यांच्या सुखरूपतेसाठी देवाचा धावा करणाऱ्या सौ. घरोटे वारीच्या
अगदी अखेरच्या क्षणी आमच्यातून हरवल्या!

पंढरपूरच्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून आम्हा सर्वांच्यापुढे त्या
केव्हा गेल्या हे आम्हाला आणि त्यांनाही समजले नाही. त्या बराच वेळ तशाच
पुढे गेल्या. इकडे आम्ही काळजीत. वाट पहात, शोधत त्या चौकात उभे. चारी
बाजूंनी लोकांचे, वाहनांचे लोंढे! सौ.ज्योती आणि विद्याताईंची बहिण
चौकाच्या तोंडाशी थांबल्या.मी सांगोला रस्त्यावर शोधायला गेलो आणि श्री.
फडणविस सोलापूर रस्त्यावर. बऱ्याच वेळानंतर मी जेव्हा परत चौकात आलो तेव्हा
सौ.घरोटे सौ. ज्योतीशी बोलत उभ्या असलेल्या पाहिल्यावर मी सुटकेचा नि:श्वास
टाकला. जीव भांड्यात पडला.सौ.ज्योतीलाही तसेच वाटले असणार.चला,
फिट्टंफाट झाली. त्या दोघींना एकमेकींसाठी कराव्या लागलेल्या प्रार्थना,
चिंता सार्थकी लागल्या.

सर्वांना काही ना काही मदत करणारे श्री. फडणविस आणि श्री.सुनील
सिद्धमशेट्टीवार हे दोघे पुन्हा माझ्या मदतीला धावले. क्रांतिवीर नाना पाटील
चौकापर्यंत माझे सामान घॆऊन हे दोघे सहवारकरी सज्जन मी एसटीत बसेपर्यंत
माझ्याबरोबर होते.

या वारीत काही चांगले अनुभव आले. अनेक चांगल्या गोष्टी ऐकायला, पहायला
मिळाल्या. काय अनुभव मिळाला अथवा वारी करून काय मिळविले याचे उत्तर देता
येणार नाही.पण जे काही माझ्या हातून-खरं तर पायांनी-घडले तोच एक मोठा
अनुभव होता. ह्याचे सर्व श्रेय माझे मित्र डॉ. अंदनकर यांना आहे. माझ्या
सारख्या “पहिलटकऱ्या” वारकऱ्याची ही वारी सुखरूपतेची, आनंदाची
झाली ती डॉ.अंदनकर आणि वर उल्लेख केलेल्या आमच्या तंबूतील सर्व सज्जन
सुह्रुदांच्या मुळेच हे अगदी खरे. ह्या सर्वांच्या सोबतीच्या ऋणात राहणे हे ही
एका परीने भाग्यच आहे.

वारीला निघालो तेव्हा ह्या सर्वांना माझे “लोढणे” हॊऊ नये असे मला
वाटायचे.आणि मी त्यांना “लोढणे” झालो नाही हा माझा मोठा आनंद आहे.

वारीचे वैभव!

मी थेट आळंदीपासून वारकऱ्यांसोबत पंढरपूरच्या वारीसाठी निघालो.
आळंदीला त्या रात्री, उद्यापासून आपली वारी सुरू होणार ह्याचे थोडे अप्रूप
वाटत होते. पण सासवडला पोचलो तरीही आपली पंढरपूरची वारी होतेय
असे मनात येत नव्हते. नवखेपणाच्या नवलाईचा उत्साह अजूनही संचारला
नव्हता.

सासवडचा मुक्काम संपवून जेव्हा आम्ही जेजुरीला निघालो त्या क्षणापासून
मात्र मला एकदम काहीतरी निराळे वाटू लागले. अरे वा! निघालो की मी
पंढरपूरा! लहान मुलाला पहिल्यांदाच आगगाडीत बसून प्रवासाला जाताना
वाटते तसे काही तरी मलाही वाटत होते.वारीला आपण खरच निघालोय ही
भावना काही औरच होती!

गेली अनेक शतके ही वारी चालू आहे. सर्व संतांच्या पालख्यांबरोबर
वारकऱ्यांची ही वारी विठोबाच्या भेटीसाठी अखंड चालूच आहे. आज
आपणही त्यांच्याबरोबर त्या मार्गावरून जात आहोत. किंचित का होईना आपण
आज वारकरी झालो असा फार फार पुसटसा शिक्का माझ्यावर उमटला असेल याचा आनंद
झाला होता.

लहान मुलाच्या कुतुहलाने, त्याच्या डोळ्यांनी मी आजूबाजूला पहात होतो.
कुठेही, केव्हाही पाहिले तरी हजारो वारकऱ्यांची दाटी नदीच्या
प्रवाहासारखी सतत वहात असलेली दिसायची.

वारीचा रंग कसा सांगावा! वारीचा पोषाख पांढरा. पांढरा सदरा,
डोक्यावर पांढरे पागोटे किंवा गांधी टोपी आणि पांढरे धोतर,किंवा पायजमा.
कपाळावर नाममुद्रा– गोपीचंदनाचा टिळा त्यावर काळ्या बुक्क्याचा ठिपका.
मराठवाड्याचे वारकरी त्यांच्या गुलबक्षी तांबड्या रूमाला-पागोट्याने
उठून दिसायचे. वारकरी स्त्रीयांची रंगीत लुगडी-साड्या त्या पांढऱ्या
वारीत रंग भरायच्या. ह्या सर्वांवर वारकऱ्यांच्या हातातील गेरुच्या
रंगाची वारकरी पंथाची निशाणे, पताका जोरात फडफडत तर कधी
उंच उंच नाचत असत.

संत चोखोबाने( संत चोखा मेळा)म्हटल्याप्रमाणे,”टाळी वाजवावी गुढी
उभारावी । वाट हे चालावी पंढरीची॥ पतांकाचे भार मिळाले अपार…….”
आमची ही अडीच तीन लाख वारकऱ्यांची वारी टाळमृदुंग वाजवित,निशाणे
उंचावत, फडफडवत “हरीनाम गर्जता नाही भयचिंता” असे संत चोखोबाच्या
विश्वासाने हरीनाम गर्जत निश्चिंतपणे चालत होती.

टाळमृदुंगाच्या नादावर संतांचे अभंग तल्लीनतेने म्हणत,मध्येच आनंदाने
उड्या मारीत, कधी फुगड्या घालत,रिंगण धरून भजने म्हणताना
वारकऱ्यांच्या ओसंडणाऱ्या उत्साहाचे काय वर्णन करावे?

खेड्यापाड्यातील वारकरी बायकाही काहीना काही म्हणत, गुणगुणत चालत असत.
मग ती एकनाथांची गौळण असो,किंवा साधे “ज्ञानोबा माऊली तुकाराम,तुकाराम”
असो, मनापासून म्हणत.त्यांची काही गाणीही गमतीची असत. “जात्ये विठोबाला
(शी) भांडायाला”,किंवा कृष्णाविषयी, तो दिसल्यावर”गेली माझी घागर सुटून”
अशा गोड तक्रारीची,”द्येवा मी करत्ये धंदा व्यापार…देत्ये हो नाम उधार”…..
तरीही कोणी देवाचे नाव घेत नाही असे हताशपणे सांगणारे गाणे, म्हणत म्हणत
लांबची वाट सोपी करत.

[ह्या बाया-बापड्यांकडे अशा अनेक गाण्यांचा, लोकगीतांचा साठा आहे ह्याची
आपल्याला-निदान मला तरी नव्हती-अजूनही कल्पना नाही. ती ऐकताना
त्यांच्या पाठांतराचे तर कौतूक,आश्चर्य वाटायचेच पण हे ध्वनिमुद्रित करावे
असे सारखे वाटत होते.असो]

दूरदर्शनवर किंवा सिनेमात डोक्यावरची समई किंवा लहान कळशा, खाली पडू
न देता थोडा वेळ नृत्य केलेले पाहिले तर त्याचे किती कौतूक होते.पण वारीतील अनेक
स्त्रीया डोक्यावर तुळशीवृंदावनाची कुंडी, हाताचा आधार न देता,रोज वीस
पंचवीस किलोमीटर चालत असतात.डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या त्या
बाईच्या शेजारी डोक्यावर पाण्याने भरलेली लहान कळशी घॆऊन चालत असते
तिची दुसरी सोबती. तुळस सुकू नये म्हणून ती पाण्याची कळशी.हे असे थेट
पंढरपुरापर्यंत. ह्याला काय म्हणायचे? भक्तीमार्गातील हटयोग? काहीही
नाही.ही फक्‍त परंपरेने आलेल्या प्रथेवरची चालती बोलती भक्ती,श्रद्धा!

वारी म्हणजे एक चालते फिरते शहरच!

वारीमध्ये फक्त वारकरीच चालतात असे नव्हे. वारकऱ्यां़च्या रोजच्या गरजा
भागवणारे अनेक लहान व्यावसायिक वारीबरोबर असतात. न्हावी, पायताणे दुरुस्त
करणारे, ती विकणारे, साबण, काड्यापेट्या, मेणबत्त्या पान तंबाखू विकणारे असे
कित्येक हातावर पोट भरणारे लहान व्यावसायिक वारीबरोबर येत असतात. अगदी
पहाटेपासून, वारी जागी झाल्यापासून, आपल्या चहाच्या गाड्या तयार ठेऊन
गरम चहा देण्याऱ्या “सागर चहा,मोडलिंब”च्या अनेक हातगाड्या उभ्या असतात.
आपापल्या हातगाड्या ढकलत वारी चालू लागायच्या आत ठरलेल्या मोक्याच्या
जागा धरत तर कधी वारीबरोबर तर कधी पुढच्या थांब्याजवळ ह्या “सागर
चहा,मोडलिंब” च्या गाड्या सेवेला उभ्या असत.भजी, वडे, भेळ चुरमुरे वगैरे
पदार्थांची लहान हॉटेलं,टपऱ्या, गाड्या असतातच.लिंबाच्या सरबताच्या,
उसाच्या रसाच्या गाड्या वारकऱ्यांची तहान गोड करत. केळी, डाळिंबं,पेरु
विकणारेही भरपूर!

म्हणूनच वारी हे एक चालते फिरते शहर असते.एक दृष्टीने पाहिले म्हणजे
महंमद तुघ्लकानी राजधानी अशी हलवायला हवी होती असे वाटते. चहाची
प्रत्येक गाडी “सागर चहा, मोडलिंब”च कशी? असा प्रश्न पडला. मोडलिंबच्या
कोणी एकाने चहाची पहिली गाडी वारी सोबत आणली असावी. मग ह्या आद्य
चहावाल्याचेच नाव गाव इतरांनीही वापरायला सुरुवात केली असावी. बौद्धिक
संपदा हक्क, “फ़्रंचायझ”, “चेन ऑफ़ शॉप्स” अशा आधुनिक मालकी हक्काच्या सोयी
त्यावेळी आणि आजही अशा लहान गरीब चहाच्या हातगाडीवाल्याला कुठून लागू
पडणार? आणि अशा बिचाऱ्यांना ह्याची माहिती तरी कोण लागू देणार? बरं हे
नाव वापरणारेही बिचारे त्याच्या इतकेच लहान!

वारीच्या सुरवाती पासून ते थेट पंढरपूरपर्यंत अनेक उदार लोक चहा पणी,
खाण्याचे निरनिराळे पदार्थ, केळी, जेवणखाण मोफत देत असतात.

ऐपत असलेले आणि ऐपत नसलेले, असंख्य गोरगरीब वारकरी, थोडक्यात वारीत
कोणीही उपाशी राहात नाही!

वारीतील अनेकजण आपल्या आंघोळी, कपडे धुण्यासाठी विश्रांतीसाठी
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतमळ्यांचा आश्रय घेत.त्या शेतमळ्यांचे मालक
शेतकरी मोठ्या उदार मनाचे असले पाहिजेत. पिकांना पाणी देणारे त्यांचे
पाण्याचे पंप वारीच्या दिवसात वारकऱ्यांसाठी दिवसभर धो धो पाणी देत
असत.तिथे वारकरी गर्दी करीत.

एक दोन गावातील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला वारकऱ्या़ंच्या
आंघोळीसाठी फार चांगली सोय केली होती.अर्धा पाऊण किलो मीटर अंतरा पर्यंत
दहा-दहा, बारा-बारा पाण्याची कारंजी बसवली होती. त्या कारंज्याखाली
(शॉवर) शहरातील आधुनिक पद्धतीच्या आंघोळीचे(शॉवर-बाथ) सुखही
वारकरी लुटत होते. अशा सुंदर, मोफत सोयी करणाऱ्या शेतकऱ्यांना कोण दुवा
देणार नाही?

आपल्या घराच्या ओवऱ्यांवर, अंगणात, शेता-वावरात वारकऱ्यांना
विश्रांतीसाठी जागा देणारे,हे शेतकरीही वारकऱ्यांचा दुवा घेत असतील.

सुरवातीचे ३-४ दिवस मी आमच्या दिंडीच्या पाण्याच्या मोटारीखाली आंघोळ
करत असे. त्या तीन चार नळांवर बायका पुरुषांची ,तांबे, कळशा, बादल्यासह
गर्दी होई. शिवाय तिथेच नळाखाली घुसुनही बायका पुरुषांच्या आंघोळी
पहाटे ३-४ वाजल्यापासून सुरू होत.आजूबाजूला इतका चिखल, दलदल असे की
आंघोळ केली तरी आंघोळ झाल्यासारखी वाटत नसे.

लोणंद पासून मात्र मी, बहुसंख्य वारकऱ्यांसारखी वाटेत वाहत्या नळाखाली
आंघोळ करायचे ठरवले. माझ्याबरोबर माझे नेहमीचे सोबती असत. आम्ही दोघे
लवकर निघत असू. कमी गर्दीचे भरपूर पाण्याचे ठिकाण शोधण्यासाठी दोन्ही
बाजूला आमची टेहळणी चालू असे.बऱ्याच वेळाने अशी एखादी जागा
सापडायची. काही वेळेला रस्त्याच्या कडेला पाण्याच्या मोटारी असत. त्यांच्या
नळाखाली आंघोळी व्हायच्या.

एकदा आंघोळीची गंमतच झाली. रस्त्याच्या उताराला एक शेतमळा होत. तेथे
बरेच लोक न्याहारी करत होते. तो मोठा घोळका ओलांडून आम्ही पुढे जात राहिलो.
लांब पडवी असलेले शेतकऱ्याचे घर आले. थोड्या अंतरावर उसा जवळ पाण्याचा
पाईप चांगला पाणी ओतत होता. एक दोघेच आंघोळ करत, कपडे धूत होते. विचार
केला, कपडे साबण लावून भिजवून ठेवू. त्या दोघांचे आटोपत आले आहे. मग
आंघोळ करू निवांत. तोपर्यंत माझे सोबतीही “जाऊन येतो” म्हणून गेले. कपडे
साबणात भिजवून ठेवले. तेव्हढ्यात त्या दोघा वारकऱ्यांचेही आटोपले. मी
आंघोळीसाठी त्या मुसळधार पाइपाखाली वाकून बसलो. एक सेकंद,दोन सेकंद…..
तीन सेकंद झाले पण डोक्या पाठीवर पाण्याचा एक थेंबही पडला नाही. हा काय
चमत्कार म्हणून वर पाहिले तर पाणी बंद झालेले!

श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने सापडलेली गंगा एकदम सरस्वती प्रमाणे गुप्त
झाली! पायजम्यातली नाडी आत गेल्यासारखे पाणी पाइपात पुन्हा आतमध्ये
गेले. मी वेड्यासारखा पाइपात हात घालून पाहिला. मग काही अंतर पाईप
बाहेरून चाचपडत पहात राहिलो!

तेव्हढ्यात माझे सोबती आवताडेही आले. तेही चक्रावले. वीज गेली असावी असे
वाटले. पण वीज गेल्याचे तसेही काही दिसत नव्हते. इकडे तिकडे पाहिले. काही
सुचेना. परत कपडे घातले. शेतकऱ्याचा तरूण मुलगा दिसला. त्याला
सांगितले. त्याने दुर्लक्ष केले. काही वेळाने शेतकऱ्याची घरधनीण आली. तिला
मी सर्व हकिकत सांगितली. एखादी बादली पाणी दिली तरी मेहरबानी होईल असे
म्हणालो. त्या माऊलीने घरात जाऊन आपल्या घरधन्याला सांगितले असावे.तो
म्हातारा शेतकरी आला. आमच्याकडे न पाहता कुठे तरी गेला. मग काही
क्षणातच त्या पाईपाला पुन्हा पाझर फुटला!

आमच्या आंघोळी, कपडे धुणे निवांत झाले हे निराळे सांगायला नको. कोणत्या
का होईना ’माऊलीची’ कृपा झाली!

ह्याच्या अगदी उलट अनुभव एकदा आला.

एका मळ्यात चांगले नविन पद्धतीचे मोठे घर होते.थोडी वारकरी मंडळी
घराच्या अंगणात,आणि काही झाडाखाली थांबले होते.आम्ही तिथे गेलो.
पाण्याचा पाईप दिसला. मनात आले आंघोळीला ही जागा चांगली आहे.
घरातील माणसांना विचारले.त्यांनी, “इथे नाही. पुढे ढाबा आहे. तिथल्या
हौदावर आंघोळ करा”, असे सांगितले.

आम्ही पुढे निघालो. थोड्या अंतरावर ढाब्याच्या आवारात हौदाच्या तीन चार
नळाखाली लोक आंघोळी करत होते. कपडे काढले आणि नळ रिकामे झाल्यावर
आंघोळीसाठी गेलो.आता आंघोळीसाठी नळाखाली जाणार तेवढ्यात मालक आला.
त्याने आमचे दोन्ही नळ बंद केले.”इथे आंघोळ करायची नाही” असे बजावले.आणि
तो तिथेच थांबला. एक दोनदा मी विनवणी केली पण तो काही बधला नाही.
निमूटपणे परत जाऊन कपडे चढवले आणि पुढे निघालो.

वारीच्या वाटचालीत दुपारी उन्हं तापू लागली की सर्वजण सावली शोधून
कुठेही विश्रांतीसाठी आसरा घेत. आम्हीही अपवाद नव्हतो. चांगली सावलीची
झाडे झुडुपे शोधण्यातच पुष्कळ वेळ जायचा. पण दर खेपेला दाट सावली
दिसणारी जागा, जवळ गेल्यावर त्या दाट सावल्या उन्हाच्या असंख्य कवडशांनी
उसवलेल्या असायच्या. उन्हाची तिरीप चुकवत, उन-सावलीचा खेळ खेळत आम्ही
पडून विश्रांती घेत असू. खरी दाट सावली कधी लाभली नाही वारीत.दुरून
सावल्या दाट हेच खरे!

दाट सावलीची झाडाखालची जागा इतर वारकऱ्यांनी आधीच भरलेल्या
असायच्या.

वारीत आणखी एक विशेष जाणवणारी गोष्ट म्हणजे”माऊली”! श्रीज्ञानेश्वर
महाराजांच्या पालखी बरोबरच्या वारीत तर “माऊली” हा परवलीचा शब्द
आहे. एक चलनी नाणे आहे.

सर्व व्यवहार “माऊली” ह्या शब्दानेच सुरू होतात. साधे बाजूला सरका
म्हणताना किंवा म्हणण्या ऐवजी “माऊली, माऊली” असा आवाज देत तुम्हाला थोडे
बाजूला करून लोक पुढे सरकत असतात. दिंड्यांचे टृक-टेंपो, मोटारीसुद्धा भोंगा
न वाजवता, पुढे बसलेले दरवाज्यावर हात आपटत”माऊली,माऊली” असे ओरडतच
पुढे जातात. सर्व सूचना, हुकूम, आर्जव, थोडक्यात सर्वच भावना एका
“माऊली”च्या उच्चाराने वारीत व्यक्त होतात.” माऊली, माऊली” ह्या एका
संबोधनानेच सर्व व्यवहार सुरळीत होतात.

“सौभद्र” नाटकात संन्याशाचा वेष घेतलेला अर्जुन आपल्या सर्व भाव-भावना,
प्रतिक्रिया “नारायण! नारायण!”ह्यातूनच सांगत असतो. तसेच काहीसे वारीत
“माऊली,माऊली” ह्यातूनच सगळे काही होत असते.

सासवड सोडल्यावर मात्र माझी पंढरीची वारी खऱ्या अर्थाने सुरू झाली
असे वाटले त्याप्रमाणे वाल्ह्यापर्यंत माझ्या हातून वारी पूर्ण होईल का याची
थोडीशी धाकधूक होती.पण वाल्ह्यानंतर मात्र अशा शंकेची, धास्तीची
पाल एकदाही चुकचुकली नाही.

आमच्या तंबूतील डॉक्टर अंदनकर अणि श्री.आदे सोडले तर आम्ही सर्व
पहिल्यांदाच ही पंढरीची वारी करत होतो. पहिले काही दिवस तर रोज आज किती
चाललो,उद्या किती चालयचे अशी चर्चा होई.बरेच जण तर थेट पंढरपूर
यॆईपर्यंत हा विचार करत होते. मी आणि इतर काहीजणांनी हा विषय कधीच
मनात आणला नाही.

आम्ही सासवडहून थेट पंढरपूरला गेलो होतो.विठ्ठलाचे मनसोक्‍त दर्शन झाले
होते.

वारीतील मुक्कामाचा अखेरचा टप्पा-वाखरी-सोडला आणि पंढरपुरात आलो.
कृतकृत्य झाल्याचा आनंद झाला. फार मोठे समाधान लाभले. आणि काय
वाटले ते सांगता येत नाही. आम्ही विठोबाचे दर्शन अगोदरच घेतले होते.
त्यामुळे वारीतून विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा
रोमहर्षक अनुभव मात्र चुकला. उत्कंठा वाढवणाऱ्या चित्रपट नाटकाचा
शेवट कोणीतरी अगोदर सांगितल्यावर वाटते तसे काही वेळ मला पंढरपुरात
पोचल्यावर वाटले. पण ते तेव्हढ्यापुरतेच.कारण हजारो वारकऱ्यांच्या
संतसंगतीने झालेली पंढरीची पायी वारी हाच एक मोठा रोमहर्षक अनुभव
होता आणि तो अजूनही तितकाच ताजा आहे. अजूनही वारीचे टाळ मृदुंगाचे नाद,
बोल आणि ठेका ऐकू येतो आहे.

“सैन्य पोटावर चालते” असी नेपोलियन म्हणत असे. वारी टाळ मृदुंगाच्या नादा-
-ठेक्यावर चालते असे म्हटले तर वावगे होणार नाही.टाळमृदुंगाचा नादमधुर
आवाज सतत तुमच्याबरोबर असतो. अगदी सावलीसारखा. संतश्रेष्ठ
तुकाराममहाराजांनी सांगितलेले,
“सोपे वर्म आम्हा सांगितले संतीं ।
टाळदिंडी हाती घेऊनी नाचा ॥”
हेच ते सोपे वर्म,लक्षावधी वारकरी, टाळ मृदुंग वाजवत, हरीनाम गर्जत
नाचत पंढरीच्या वारीत आचरत असतात. संपूर्ण वाटचाल आनंदे भरत जात
असतात.टाळमृदुंगाचे हे नादब्रम्ह वारी संपल्यावरही काही दिवस अनाहत
नादासारखे तुमच्या मनात गुंजत राहते!

वाखरी आणि आता…. माहेर पंढरपूर!

२५ जुलै,२००७,बुधवारी पहिली एकादशी. पंढरपूरच्या वारकऱ्यांची
एकादशी उद्या, गुरुवारी. काही का असेना, आम्ही श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या
सोबतीने इथपर्यंत आलो.

आज बुधवारी पालखी सकाळी,पंढरपूरला पोहोचण्यासाठीन इघणार.
आम्हीही वाखरीहून सकाळी निघालो.

गेले १७-१८ दिवस पाऊले पंढरीची वाट चालत होती. आज ही
अवस्था संपली. आज तर पांडुरंगाच्या पायाशीच(पंढरपूरला) पोचणार
आपण! पंढरीची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यां़च्या ह्या आनंदाला,
कृतकृत्यतेला त्रिखंडात तोड नाही!

एका मागोमाग एक येणाऱ्या वारकऱ्यांच्या लाटांबरोबर आम्ही
वाखरीतून कधी निघालो हे समजलेही नाही.

वाखरी सोडली. काही अंतर पुढे आल्यावर वाटेत श्रीज्ञानेश्वर
–आणि बहुधा श्रीतुकाराम महाराजांची सुद्धा-महाराजांची पालखी
जेथे विसाव्यासाठी थांबते त्या विठ्ठल-रखुमाईच्या देवळात
थांबलो. हे देऊळ इ.स. १८३३ साली बांधलेले आहे. थिटे घराण्याच्या मालकीचे
आहे.विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतले.देवळाभोवती प्रदक्षिणा घातली.

देवळाभोवती, लहान लहान दगड गोटे एकावर एक असे ठिकठिकाणी रचून ठेवलेले
दिसले. अनेक वारकरीही तसे दगड, लगोरी सारखे, देवळाच्या आकाराचे रचत
असलेले पाहिले. एका आजोबा वारकऱ्यांना हे असे दगड का रचून ठेवतात ते
विचारले.

“या देवळाभोवती असे दगड रचून ठेवले की पुढची वारी
घडते. वारी पुन्हा घडते असे म्हणतात.”असे ते म्हातारेबुवा म्हणाले.

मी आणि श्री आवताडे यांनीही तसे दगड रचून ठेवले.पुन्हा एकदा
पंढरीची वारी आपल्या हातून घडावी!श्रद्धा-अश्रद्धेच्या सरहद्दीवर
रेंगाळणाऱ्या, कधी श्रद्धेच्या तळ्यात तर कधी अश्रद्धेच्या मळ्यात उभे
राहण्याचा हा मध्यमवर्गीय खेळ! दुसरे काय म्हणणार!

सकाळी नऊ साडे नऊच्या सुमारास पंढरपूरच्या हद्दीत आलो.
त्या अगोदरच पंढरपूरच्या विविध संस्था, पुढारी आमचे मोठमोठया
फलकांनी “सहर्ष स्वागत” करत होते. आणखी १० मिनिटे चाललात की
पंढरपूरात पोचाल असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्या प्रमाणे
मी आणि आवताडे पुढे चालत निघालो. सगळ्या महाराष्ट्राचे, सर्व
वारकऱ्यांचे माहेर, त्या पंढरपूरला आम्ही पोचलो!

माहेर म्हटल्याबरोबर मला बरडला विश्रांती घेत असताना
भेटलेला जुन्नर येथील शिवनेरी जवळचा वारकरी आठवला………..

………बरडला जाताना एके ठिकाणी रस्त्याच्या उतारावर झाडाखाली
पडलो होतो. थोड्या वेळात दोन वारकरी आले. आमच्या शेजारी तेही लवंडले.
थोडा वेळ विश्रांती झाल्यावर त्यातील एक वारकरी, कोण कुठले झाल्यावर,
बोलू लागला.शिवनेरी किल्ल्याजवळच्या गावातला. दिसण्यातही विठोबाच!

सर्व सामान्य वारकऱ्यांची विठ्ठलाविषयी असलेली भक्ती व प्रेम त्याच्या
बोलण्यातून ओसंडत होते. मी ऐकत होतो. बोलता बोलता तो म्हणाला,”अवो, लेकीला
सासराहून आपल्या माह्येरला जाताना जसं वाटतं, आनंद हुतो बघा, त्येच,
तसाच आनंद आमाला पंढरपूराला जाताना हुतो. अवो, आपलं माह्येरच हाये हो
पंढरपूर! आपून माह्येरालाच चाललोय.”
शेवटची दोन वाक्ये बोलताना म्हातारपणाकडे झुकलेल्या वारकऱ्याचे डोळे
भरून आले होते.शहरी सायबाला ते अश्रू दिसू नयेत म्हणून त्याने आपला
चेहर झट्कन वळवला.!

आपल्या संतांनी सुद्धा आपल्या अभंग, ओव्यातून हेच म्हटलय.
ज्ञानेश्वर महाराजही,”जाईन गे माये तया पंढरपुरा।
भेटेन माहेरा जीविचीया ॥ ”
म्हणतात. पंढरपूर हेच त्यांच्या जीवाचे माहेर होते आणि ते स्वत: विठोबाला,
त्या माहेराच्या पांडुरंगाला, आपली क्षेम-खुशाली सांगताना,”क्षेम मी
दॆईन पांडुरंगा”असे म्हणतात. एकनाथ महाराजांनी तर माझे माहेर पंढरी
म्हणताना आपल्या माहेरच्या सर्वांचीच, बहिण भावंडांचीही आठवण
काढली आहे.आपल्या माहेरचे मोठेपण आणि तिथे कोण कोण आहे हे सांगताना,
आपल्या माहेराचा किती अभिमानाने आणि प्रेमाने उल्लेख करतात.आपल्या मातब्बर
बहिण भावंडांचा,आणि ती काय,काय करू शकतात याचा किती अभिमानाने
उल्लेख करतात.

आपल्या सर्व संतांची विठलाविषयीची भक्ती,प्रेम, माया, जिव्हाळा, कौतूक त्या
शिवनेरीच्या वारकरी बाबांच्या बोलण्यात होते. आणि ते सर्व त्यांच्या
डोळ्यातील पाण्यानेही सांगितले!

तिन्ही लोक आनंदे भरले आहेत का ते मला माहित नाही पण माढ्याच्या आणि
शिवनेरीच्या ह्या दोन विठोबा-वारकऱ्यांनी मात्र माझे वारीचे दिवस
आनंदाने काठोकाठ भरले!…………….

मी आणि श्री. आवताडे पुढे चालत चालत पंढरपुराच्या उंबरठ्या पर्यंत
आलो.

सर्व मराठी संतांचे आणि त्यांची शिकवण आचरणाऱ्या लक्षावधी
वारकऱ्यांचे सावळे परब्रम्ह जिथे भक्तांसाठी तिष्ठत उभे आहे, सर्व
संतांचे “जीविचिया माहेर” त्या पंढरपूरातील रस्त्यावर मी खाली वाकून
विठ्ठलाला, त्या पांडुरंगाला नमस्कार केला.

मल इथपर्यंत पंढरपूरला श्रीज्ञानेश्वर माऊलीनी आणि पांडुरंगाने
आणले. माझ्याकडून त्यांनीच हे घडवून आणले. माझी पंढरपूरची पायी
वारी श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली.

वाखरी!

भंडी शेगावहून निघालो. संपूर्ण वारीलाच आता आपल्या विठोबाचे
पंढरपूर जवळ आले आहे याची जाणीव झाली असावी. का कुणास ठाऊक
पण आज वारी भरभर,झपझप चालली आहे असे वाटत होते.आपल्या
मनाच्या कल्पना, दुसरे काय!

दुपारी वाखरीच्या वाटेवर बाजीरावची विहीर येथे उभे रिंगण आणि चौथे
गोल रिंगणही होणार होते.पण आम्ही त्यासाठी आज थांबलो नाही. चालतच राहिलो.

दुपारी अडीच वाजता आम्ही वाखरीला पोहोचलो. पालखी तळावर आलो.
केव्हढा प्रचंड तळ आहे हा! श्रीज्ञानेश्वर माऊलीची पालखी ज्या गोलाकार
ओट्यावर मुक्कामासाठी विसावते तो ओटाही मोठा भव्य आहे.

आजूबाजूला माऊली बरोबर आलेल्या अनेक दिंड्यांचा मुक्कामही इथेच होता.
सर्वदूर, तंबू, राहुट्या,ट्रक्स,टेंपो, पाण्याच्या मोटारी, वारकऱ्यांचे थवे,
निशाणे, पताका……..एक मोठे गावच वसले होते.

महाराष्ट्र सरकारने इथे पाण्याची आणि विशेषत: संडासांची मोठी आणि
चांगली सोय केली होती.आम्ही लवकर पोचलो होतो. त्यामुळे सर्व काही स्वच्छ
होते.

अनेक दिंड्यांच्या तंबू, राहुट्या, पाण्याच्या मोटारींच्या चक्रव्यूहातून
नेमक्या आमच्या दिंडीचा तळ सापडायला दोन तास लागलेच!

भंडी शेगाव ते वाखरी हे वीस किलोमीटरचे अंतर किती झटकन पार केले असे
सारखे वाटत होते. आणि उद्या फक्‍त पाच किलोमीटर चालायचे. जणू दोन तीन
पावलांच्या अंतरावर पंढरपूर!

पंढरपूरच्या वेशीपाशीच आलो की आपण! इतकी वर्षे पंढरपूरला
वारीतून जायचे,जायचे असे घोकत होतो.म्हातारी जाई पंढरपुरा ।
वेशीपासून यॆई घरा॥ या वाक्प्रचारातील म्हातारीसारखे आपले झाले
होते.उद्या पंढरपूरला पोचणार या आनंदातच आम्ही सर्वजण होतो.

सर्वच वारकऱ्यांना वाखरीला पोचल्यावर पंढरपुराला आलो ह्याचा
आनंद होत असणार. विठोबा आणि आपल्यामध्ये फक्‍त चार-पाच किलोमीटरचा
रस्ता! म्हणजे पंढरपूरच्या अंगणात आलो आपण.हाकेच्या अंतरावर पांडुरंग
आपली वाट पहात उभा आहे. हे विचार, जाणीव उत्साह वाढवणारी आहे.

वेळापूर, माढ्याचा वारकरी विठोबा, भंडी शेगाव

माळशिरसचा मुक्काम आटोपून आम्ही दुपारी साडे चार, पाच वाजता
वेळापूरला आलो.

गेले चार पाच दिवस रोज २२-२३ किलोमीटर चलणे होत असे.वेळापूरचा मुक्काम
झाल्यावर सोमवारी सकाळी भंडी शेगावला जाण्यासाठी निघालो.

वाटेत तोंडले बोंडले येण्या आधी ठाकूरबुवांच्या समाधी जवळ तिसरे गोल
रिंगण झाले. ते पहाण्यासाठी आम्ही थांबलो नाही. पुढे आलो. वारीचा
दुपारचा विसावा “टप्पा” येथे होता. तोंडले बोंडले पार करून”टप्प्यावर” यॆऊन
विश्रांतीसाठी थांबलो.

टप्प्यावर संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील एक वारकरी
भेटले.त्यांच्याकडूनच समजले की या ठिकाणी तुकाराम महाराजांची
पालखीही येते. या दोन संतश्रेष्ठांची त्यांच्या लाखो वारकऱ्यांसह
इथे गाठ पडते.

हा वारकरी गृहस्थ भेटला तो माढ्याचा. नाकी डोळी अगदी नीटस. हसतमुख.
विठोबासारखाच काळा सावळा. बोलणे आणि हसणेही प्रसन्न. डोळे पाणीदार.
वारीत पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन,आषाढी एकादशीला तर किती मुष्किल
आणि कठिण असते; आपल्यासारख्या असंख्य सामान्य वारकऱ्यांना तर फारच
कठिण वगैरे तो अनुभवी वारकरी सांगत होता. हे बोलत असताना सहज
म्हणाला,”अहो, आपणच एकमेकांना पहायचं,भेटायचं!”

वा! व्वा! वारीचे, वारकरी पंथाचे संपूर्ण सार त्या माढ्याच्या
वारकऱ्याच्या सहजोद्गारातून बाहेर पडले! जे जे भेटे भूत। ते
मानीजे भगवंत॥ ह्याचे एका वाक्यात ते निरुपण होते. हे बोलत असताना
माढेकरांचे डोळे जास्त पाणीदार झाले होते, चेहऱ्यावर निर्मळ हसणेही होते.
वारीत नकळत साधणारे उद्दिष्टही त्यांच्या त्या उत्स्फूर्त बोलण्यात होते.ह.भ.प.
बुवांना त्यांच्य कीर्तनात टाळकरी-मृदुंगवाल्यांनी साथ करावी तसे
माढेकर बुवा हे सांगत असताना त्याच वेळी मोठ्या रस्त्यावरून,
“विठ्ठल विठठल। जय हरी विठठल॥” “ज्ञानोब्बा माऊली तुकाराम” असे
टाळमृदुंगा समवेत म्हणत वारकऱ्यांचा एक मोठा जथा गेला!

विठोबाच पांढरे धोतर, सदरा, गांधी टोपी घालून माढेकर वारकरी हॊऊन
आला असे त्यांचा निरोप घेताना मला क्षणभर वाटले!

टप्प्यावरची विश्रांती आटोपून आम्ही रात्री भंडी शेगावला
आलो.

भंडी शेगावला संध्याकाळी सौ.ज्योती तारे आम्हाला माऊलीच्या
घोड्याविषयी त्यांना बरडला एका वारकऱ्याने सांगितलेली गोष्ट सांगितली.
सगळ्या नवख्या वारकऱ्यांना माऊलीचा घोड्याविषयी कुतुहल असते.
माऊलीच्या घोद्यावर स्वार का नाही? असे काही प्रश्न वारीत नवीनच आलेल्या माझ्यासारख्या
वारकऱ्यांच्या मनात असतात.
श्रीज्ञानेश्वरमहाराज ज्या मार्गाने पंढरपूरला गेले त्याच मार्गाने आजही
त्यांची पालखी पंढरपुरला जाते. माऊली पंढरपूरला जात असताना
एकदा वाटेत त्यांच्या समोर एक घोडा आला. तो त्यांना आपल्या पाठीवर बसून
पंढरीला चला असे बराच वेळ विनवणी करत होता पण माऊलीनी माझी ही
पायी वारी आहे असे त्या घोड्याला संगितले. घोड्याला वाईट वाटले. पण तो
घोडा माऊली बरोबर, पुढे थेट पंढरपूर पर्यंत चालत होता.त्यानंतर
श्रीज्ञानेश्वरमहाराजांची पालखी पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू
झाली तेव्हापासून एक घोडाही पालखी बरोबर नेऊ लागले. ही परंपरा आजही
चालू आहे. ही आख्यायिका आहे.त्यामुळे ही निरनिराळ्या स्वरूपात सांगितली जात
असण्याची शक्यता आहे.

रात्री झोपताना मनात म्हणालो,उद्या वाखरी! वाखरी म्हणजे पंढरपूर
आलेच की! वाखरी म्हणजे पंढरपूरची वेस म्हणायची.

आपल्याकडून पंढरीची पायी वारी पूर्ण होत आहे ह्याचा मनात आनंद
वाढत असताना, झोप कधी लागली हे समजलेही नाही.

किर्तन

माळशिरसला बस स्टॅंड समोर असलेल्या शाळेच्या पटांगणात
आमचा मुक्काम होता. योगायोगाने आमच्या दिंडी जवळच ह भ.प. जैतुनबी
यांच्या दिंडीचा मुक्काम होता. रात्री त्यांचे कीर्तन होणार आहे असे समजले.
आमच्या दिंडीचे जेवण वगैरे होईपर्यंत कीर्तन सुरुही झाले होते.

मी कीर्तनाला गेलो.वारकरी पंथाच्या कीर्तनाचा एक उत्तम नमुना असेच
त्यांच्या कीर्तनाचे वर्णन करावे लागेल. ह.भ.प.जैतुनबी यांची कीर्ति
बरीच वर्षे ऐकत होतो. आज त्यांचे कीर्तन ऐकण्याचा योग आला.

ह.भ.प. जैतुनबी भक्तीमार्गातील मोठ्या अधिकारी बाई. पंचाहत्तरी पार
केलेल्या या बाईंचा आवाज खणखणीत आहे,पण अभंग, ओव्या,भजन म्हणताना
वयामुळे आवाजात कंप येतो, किंचित थकवा वाटतो.

संत गाडगेबाबा, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे यांच्या शैलीचे
बोलणे. कीर्तनात श्रोत्यांशी प्रश्नोत्तरी संवाद करण्याची शैली अप्रतिम.जे
स्पष्ट करायचे ते अतिशय समर्पक गोष्टीतून. निराळे उपदेशपर किंवा
अभंगाचे तेच ते खुलासेही करण्याची गरज नव्हती! त्यांच्या टाळकरी
भजनींनी कव्वालीच्या धर्तीवर म्हटलेले भजनी पदही सुरेख होते.

मोकळ्या उघड्या जागेत कीर्तने होत असल्यामुळे साथीदारांचे आवाज बरेच वेळा
फाटल्यासारखे होत; सारखे वरच्या पट्टीत म्हणण्यामुळेही असे होत असावे.
अर्थात ह्या संगीतातल्या, वादनातल्या गोष्टींचे मला अजिबात ज्ञान नाही. पण
वर म्हटल्याप्रमाणे काही तरी होत असे. बेसूरही व्हायचे. पण असे होणारच.
आणि इथे गायकीपेक्षा भाव मोठा, संकीर्तन महत्वाचे असते. आणि ते सर्व
काही त्यात होते.

एक लक्षात रहाण्यासारखा अनुभव गाठीशी बांधून, बरेच दिवसांची
इच्छाही अनायासे पूर्ण झाल्याचे समाधान घॆऊन,तंबूत परतलो.

………..बरड …………..नातेपुते

सकाळी फलटणहून निघालो ते वाटेतील विडणी, पिंपरद करत करत दुपारचा
विसावा वाजेगावला होता तिथे आलो.

दुपारच्या विसाव्यापाशी, त्या अगोदर दोन अडीच किलोमीटर, आणि विसाव्याच्या पुढे
दोन तीन किलोमीटर पर्यंत वारकरी शेतात, मळ्यात, केळी-डाळिंबाच्या बागेत,
झाडाखाली रस्त्याच्या कडेला कुठे सावली आडोसा मिळेल तिथे, विश्रांतीसाठी
पहुडलेले होते. आम्हीही तेच केले.

दुपारची विश्रांती आटोपून बरडकडे कूच केले.आजचा मुक्काम बरडला होता.तळ
बरडच्या मार्केट यार्डच्या बाजूला होता. आम्ही बरडला पोचून आमच्या तंबूत
शिरलो.

आता पंढरपूर जवळ येत होते. वारकऱ्यांच्या लोकसमुद्रालाहे याची जाणीव होत
आली होतीच.
रात्री डॉक्टरांचा फोन आला. त्यांना तीव्र ब्रॉंकायटीस झाला होता.
औषधोपचारांचा उपयोग हॊऊन त्यांना आता बरं वाटत आहे हे प्रत्यक्ष
त्यांच्याकडून समजल्याने मला खूप बरे वाटले.

बरडचा मुक्काम संपवून नातेपुत्याला निघायचे. नातेपुत्यालाही आमच्या
मुक्कामाचे ठिकाण सापडायला फार त्रास झाला.पत्ता स्पष्ट,तपशीलवार
नसल्यामुळे असे झाले. खरं म्हणजे आम्ही नातेपुत्याला लवकर पोचलो होतो पण
मुक्कामाची जागा सापडेपर्यंत संध्याकाळचे ७.०० वाजले!

अशा अपुऱ्या, संदिग्ध माहितीमुळे असे वाटायचे की,यापेक्षा असेच चालत चालत
पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलेले बरे! पण हे क्षणभरच. कारण पुढच्या
गावातही ठावठिकाणा हुडकावाच लागणारच की! एका मोकळ्या मैदानात अनेक
दिंड्या उतरलेल्या. बहुतेकांचे तंबू सारखेच.मग तंबूवर लिहिलेले आपापल्या
दिंडीचे क्रमांक तरी बघत जायचे किंवा आजूबाजूच्या, तंबूतील लोकांना
त्यांच्या दिंडीचा नंबर विचारायचा! असा हा आता रिवाजच झाला होता!

फलटण; माऊली इकडे….तिकडे नाही………

तरडगावाहून फलटण पर्यंत वीस किलोमीटरची चाल आहे. रात्रीचा मुक्काम
फलटणला होता.

आमची जोडी–श्री. आवताडे आणि मी–चालत चालत, थांबत थांब फलटणला
यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या भव्य इमारतीत यॆऊन
पोहोचलो.

आज तंबूत मुक्काम नाही ही एक चांगली गोष्ट झाली. फलट येण्या अगोदर
पासूनच पावसाला सुरुवात झाली होती.फलटणला पोचलो तर तिथे मुसळधार
पाऊस पडत होता.शाळेच्या रस्त्यावर आणि सभोवती पाणी साचले होते. चिखलच
चिखल झाला होता. त्यामुळे आज मुक्काम शाळेच्या वर्गात आहे म्हटल्यावर
सगळ्यांना हायसे वाटले.

अनेक दिंड्या शाळेतच उतरल्या होत्या. दोन तीन दिंड्यांच्या जेवणाची एकच वेळ
आली. कोणत्या दिंडीची पंगत कुठे संपते आणि दुसऱ्या दिंडीची कुठे सुरू होते
हे त्या त्या दिंडीच्या वाढप्यांना लक्षात येणे कठिण झाले. पंगतीत बसलेलेच
आपला वाढपी पुढच्या ताटांत वाढत चालला हे लक्षात आल्यावर, “माऊली
इकडे; तिकडे नाही”. असे सांगत त्यामुळे “माऊली इकडे इथे; तिकडे नाही,” याचा
गलबला दर पाच सात मिनिटांनी होई!

दुसऱ्या दिंडीत आज काय बेत होता, काय गोड होते त्याचा लाभ झाला नाही ह्याची
रुखरुख माझ्यासारख्या अनेकांना वाटली!

चांदोबाचा लिंब……….तरडगाव

लोणंदचा मुक्काम आटोपून आम्ही सकाळी निघालो. आज आमच्यापैकी एकदम
तीन वारकरी कमी झाले होते. त्यांची उणीव जाणवत होती. यापुढे इथून
ते थेट पंढरपूरपर्यंत मला आवताडेंची सततची सोबत होती.

आम्ही दोघे, आमच्यातील इतरांच्या मानाने, वारीच्या मुख्य रस्त्याला लवकर
लागायचो.

मजल दरमजल करीत दीड एक तास चाललो की पंधरा मिनिटांपासून ते अर्धा
तासपर्यंत आणि दुपारी उन चढू लागले की तास दीड तास विश्रांते घेत ह्या
आषाढी यात्रेतील आमची वाटचाल व्हायची.

अशीच वाटचाल करत “चांदोबाच्या लिंबा”पर्यंत आलो. इथे माऊलीचा
दुपारचा विसावा असतो. सर्व दिंड्या, वारकरीही विसावा घेतात आज आम्हीही
सर्वजण एकत्र थांबलो. कारण इथे वारीतील पहिले उभे रिंगण होणार होते.

“चांदोबाचा लिंब” या नावापासूनच कुतुहल सुरू होते. या ठिकाणीच का
चांदोबा भागून इथल्या लिंबाच्या झाडामागे लपत होता; हेच का ते लिंबोणीचे
करवंदी झाड? दूरवर पाहिले मामाचा चिरेबंदी वाडा दिसतो का? वारीतील
काही जणांना विचारले पण कुणालाच ह्या ठिकाणाला हे नाव कसे पडले याची
माहिती नव्हती.पण त्या गोड बाल/लोक काव्या इतकेच हे नावही गोड आहे हे खरे.

रस्त्याच्या दुतर्फा फारशी झाडी नव्हतीच. लांब लांब अंतरावर एखाद दुसरे
झाड उभे होते.

बरेच वेळा वर्तमानपत्रात “चांदोबाचा लिंब” येथे उभे रिंगण झाले, तसेच
“माळशिरस येथील सदाशिव नगरच्या साखर कारखान्याच्या मैदानात वारीतील
पहिले गोल रिंगण” असे वाचत असे. त्याची चित्रेही पाहिली होती. त्यामुळे उभे
रिंगण पाहण्याची उत्सुकता होती.त्यासाठी आमच्या तंबूतील आम्ही बहुतेक
सर्वजण थांबलो.

माऊलीची पालखी जेथे विसावली होती तिथपासून ते समोर -रस्त्याच्या
दुतर्फा मैल दीड मैल पर्यंत सर्व दिंड्या, टाळकरी-मृदुंगवाले, दिंडीकर
वारकऱ्यांसह शिस्तीत उभ्या राहिल्या.

इतर आमच्या सारखे सर्व वारकरी त्या दिंड्यांच्या पाठीमाग गर्दीने उभे
होते; पण त्यांच्यात अंतर ठेवून खचाखच गर्दीने उभे होते. काही उत्साही
वारकरी झाडांवर तर काही खूप मागे पण उंच पाण्याच्या टाकीवर, तर काही
जिथे जिथे उंच ठिकाण मिळेल तिथे बसले,उभे राहिले होते.सर्व रस्ता मात्र पूर्ण
मोकळा होता.

आम्ही काही वेळ तीन चार रांगांच्या मागे होतो. टाळ-मृदुंगाचे ठेकेदार आवाज,
भजना-अभंगाचे सूर फक्‍त ऐकू येत होते.

पालखीच्या दिशेने जाणे तर अशक्य,इतकी गर्दी. आम्ही मग विरुद्ध दिशेने जाऊन
शक्यतो रस्त्याजवळच्या रांगेत शिरण्याचा प्रयत्न करू लागलो. असे करत,करत
म्हणजेच घुसखोरी करत एका दिंडीच्या मागे आलो.पुरातून नदी पोहून आल्याचा
आनंद झाला. आमच्या भाग्याने आमच्या समोरील दिंडीचे वारकरी फार
चांगले होते. अभंग म्हणत टाळ वाजवताना ते दोन्ही बाजूला हलत डोलत,
त्यावेळी आमच्यापैकी काहींना ते त्यांच्या अधे मधे उभे राहू देत होते, डोके
काढू देत.आता दोन्ही बाजूच्या दिंड्या आपली निशाणे पताका नाचवत उभ्या
जागी मागे पुढे होत, दोन्ही बाजूला झुकत,झुलत टाळ मृदुंगाच्या गजरात
हरिनाम गर्जत होते. त्यावेळी त्या भजनी वारकऱ्यांची एक मोठी लाट पसरत
चाललीय असा भास व्हायचा.

सुदैवाने माझ्या समोरचा वारकरी उंच नव्हता.म्हातारा होता.शांत होता.
मला आणि माझ्या बाजूला उभ्या असलेल्या दोघा तिघांना रस्ता स्पष्ट दिसत
होता.

थोड्याच वेळात माऊलीच्या रथापुढचा घोडेस्वार हळू हळू येऊ लागला.
समोरचे भाविकजन घोड्याच्या कपाळाला हात लावून नमस्कार करण्यासाठी
पुढे सरसावत. माऊलीचा तो स्वार अनेकांचे समाधान करण्यासाठी घोड्याची
मान डौलात हलवत, कधी ह्या बाजूला तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला डोलवत
घोडा नेऊ लागला. तो थेट रिंगणाची हद्द संपेपर्यंत गेला. मग घोडा उलटा
फिरवून लगेच माऊलीच्या रथाकडे वेगाने दौडत गेला. स्वाराचा घोडा
भरधाव वेगाने पळताना पाहणे हे खरंच काही तरी दुर्लभ पहायला
मिळाल्याचा आनंद होता.

थोड्या वेळातच तो घोडेस्वार पुन्हा वेगाने दौडत आला आणि मग काय विचारता!
वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण त्या घोडेस्वाराच्या
मागून तितक्याच वेगाने माऊलीचा घोडा धावत येत होता.

रिंगणाच्या शेवटच्या टोकापर्यंत थेट दौडत जाऊन माऊलीच घोडा पुन्हा
माघारी भरधाव वेगाने पळत आला. सर्वच गोष्टी टिपेल्या गेल्या.”माऊली,
माऊली”चा जयघोष सुरू झाला तो घोडा माऊलीच्या पालखी समोर पुढचे
पाय टेकून मान खाली झुकवून नमस्कार करेपर्यंत चालूच होता.

रिंगण संपले. दिंड्या आपापल्या क्रमाने जागी जाऊन उभ्या राही पर्यंत,
माऊलीचा घोडा गेला त्या रस्त्यावरची माती सोने समजून वारकरी कपाळाला
लावू लागले.टाळ-मृदुंगही वाढत्या वेगाने वाजत होते. उभ्या रिंगणाचा
आनंद, दिंडीकर मंडळी आणि त्यांच्यामुळे सर्व वारकरी, त्या सूरांनी आणि
ठेक्यांनी,तो लुटत होती.

हा पहिला नवीन अनुभव घॆऊन आमची पावले पंढरीच्या वाटेवर असलेल्या
तरडगावाकडे निघाली. आम्ही तरडगावला दुपारी ३.०० वाजता पोहोचलो.पेट्रोल
पंपाशेजारी आमची राहण्याची व्यवस्था होती.

पेट्रोल पंप काही येता यॆईना. मुक्कामाचे ठिकाण जसे जवळ येते तसा थकवा
जास्त वाढतो. आम्ही दोघांनी एका मळ्यात, पाण्याचा पाईप धो धो चालू होता
तिथे गार सावलीत विसावा घेतला. नंतर ३-४ कि.मी. आणखी चालून गेल्यानंतर
तो नामांकित पेट्रोल पंप दिसला. आता त्यापुढे आमच्या दिंडीची पालं
गाठायची. असे होत होत आम्ही तरडगावापासून थोडे पुढे असलेल्या आमच्या
तळावर आलो.

नीरा—-लोणंदकडे कूच…..

औषधे घेतली म्हणून किंवा मनाची उभारी म्हणा, पण नेहमीप्रमाणे सर्व
आटोपून मी माझ्या सोबत्यांसह सकाळी सहा-सव्वा सहा वाजता लोणंदच्या
दिशेने उसळलेल्या वारकऱ्यांच्या लाटेत सामील झालो.

टाळ मृदुंगाच्या नादावर, अधून मधून उड्या मारत, भजने म्हणत, हरिनामाचा
घोष करत चाललेल्या दिंड्या आणि वारकऱ्यांची असंख्य पावले सोबतीला होतीच.
त्यांच्या बरोबरीने आमची पावलेही वाट चालू लागली.

आज खुद्द डॉक्टरांचीच तब्येत बिघडली होती. त्यामुळे ते वाल्ह्याहून
गाडीतूनच पुढे गेले होते.

वाटेत नीरा नदी लागली. मोठे रूंद पात्र. पाणीही भरपूर. दोन्ही काठांवर
हिरवे हिरवे शेतमळे. सर्व प्रदेश मोठा रमणीय होता.

नीरा नदीचा पूल ओलांडून आम्ही दोघे तिघे लोणंदला इतरांपेक्षा लवकर
पोहोचलो. मुक्कामाचे ठिकाण नेहमीप्रमाणे गावाबाहेर दोन-तीन कि.मी. दूर.

लोणंदच्या विशाल मार्केट यार्डमधील कांद्याच्या अनेक वखारींपैकी एका
वखारीत आमचा मुक्काम होता. इतक्या वखारींतून आमची वखार सापडायला
बराच वेळ लागला.वारीत कितीही चालले तरी ती पायपीट वाटत नाही.पण
अनोळखी गावातील अशी ठिकाणे शोधण्यासाठी हिंडणे त्रासदायक वाटायचे. हा
अनुभव तरडगाव, नातेपुते येथेही आला.

कांद्याची वखार प्रथमच पहात होतो. भली मोठी, उंच, पत्र्याचे छ्प्पर असलेली
व चारी बाजूंना लोखंडी जाळ्याच्या भिंती.थोडक्यात वर उंचावर छप्पर;आणि
जाळ्यांना थोड्या उंची पर्यंतच प्लास्टिक्स्चे कापड लावलेले.इतकेच खाजगीपण.
जमीन इथेही गारगोट्या,मुरुमाची खडी, खडे यांनी खचाखच भरलेली.आम्ही
तीन चार मोठ्या पाट्या भरतील इतके दगड खडी बाजूला केली!

थोड्या अंतरावर असलेल्या आमच्या दिंडीच्या ट्रकमधून ताडपत्र्या आणल्या.
आमच्या जागेवर त्या पसरून इतर सोबत्यांची वाट पहात बसलो.

हळू हळू सर्वजण आले.इतर दिंडीकरही आले.सर्वांनी सामान आपापल्या हद्दीत
लावले. गडबड, बडबड सुरू झाली. डॉक्टर आले ते अंगात ताप घेऊनच. शिवाय
भरीस भर म्हणून खोकलाही होता.

कांद्याच्या मार्केट यार्डपासून गाव लांबच. मी ताडपत्र्या वगैरे टाकल्यावर
फोनची बॅटरी भारीत करण्यासाठी आणि नंतर संध्याकाळी डॉक्टरांसाठी
औषधे आणण्यासाठी गावात गेलो.

गावातील मुख्य रस्ता वारकऱ्यांनी आणि वाहनांनी दुथडी भरून वहात होता.
अखेर हवी होती ती औषधे आतल्या रस्त्यावरच्या एका दुकानात मिळाली.
डॉक्टरांना दिली. ते अंथरुणात पडून होते.

रात्रभर एकटे डॉक्टरच नाही तर आमच्या कांद्याच्या वखारीतील आम्ही
सर्वजणच खोकत होतो.कंदर्प संपर्क!

लोणंदचा मुक्काम दोन रात्र्रींचा होता. त्यामुळे दुसरे दिवशी आम्ही
नेहमीचे पाच-सहाजण आंघोळीसाठी नीरा नदीवर गेलो. त्यासाठी आम्ही
लोणंदपासून चार पाच किलोमीटर मागे गेलो. झकास आंघोळी झाल्या. आजचा
दिवस निवांत. पायांना विश्रांती.

डॉक्टरांची तब्येत जास्तच बिघडली. त्यांनी चंद्रपूरला परत जायचे
ठरवले. प्रथम पुण्याला आमच्या गाडीतून जायचे आणि तेथून रात्री
चंद्रपूरला.त्यांच्याबरोबर त्यांचे निकटचे स्नेही श्री. कमलाकरही
जाणार. कारण त्यांनाही ताप वगैरे होताच शिवाय त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचे
दुखणे त्यांना असह्य झाले होते. त्यांनी आपल्या गुडघेदुखी पुढे गुडघेच टेकले.
त्या दोन आजारी माणसांबरोबर एक तरी धडधाकट माणूस हवा म्हणून
डॉक्टरांनी आपल्या भावाला बरोबर घेतले. तेही जाण्यासाठी तयारच होते.

मी पुण्याला फोनाफोनी करून माझे जावई श्री.श्रीकांतकडून चंद्रपूरची
तिकीटे काढून ठेवली.

डॉक्टर परत निघाले. आपली वारी पूर्ण झाली नाही. अर्धवट सोडून
परत जावे लागते ह्याचे दु:खही होते. आळंदीला भेटल्यावर वाटेत,” ह्या
वारीनंतर मी पुन्हा वारी करणार नाही. ही बहुधा शेवटची वारी.ती
तुमच्याबरोबर होतेय, आपली इतक्या वर्षानंतरची भेट या वारीमुळे होतेय”.
वगैरे सांगत होते. त्यांचे निकटचे मित्र कमलाकर यांच्याजवळही ते असेच
काहीसे म्हणाले होते असे मला कमलाकर वारीत सांगत होते.

मलाही मनातून फार वाईट वाटत होते.डॉक्टरांच्यामुळेच माझ्या आयुष्यातील ही
पहिलीवहिली पंढरपूरची वारी घडत होती. इतक्या वर्षांनी भेटलो, थोड्या
फार गप्पा झाल्या. आतापर्यंत त्यांच्या अनुभवी सोबतीने वाट सोपी झाली होती.

डॉक्टरांनी आणि मी उराभेट घेऊन निरोप घेतला. आमच्या दोघांचेही डोळे
पाणावले. ते पाहून महिला मंडळही गलबलले.

मी आणि श्री. आवताडे डॉक्टरांना व इतरांना निरोप दॆऊन परतलो. थोडा वेळ
सुनं सुनं वाटत होते.काही वेळाने एका वखारीत भारूड, गौळण वगैरे चालले
होते.तिथून लोकांच्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता.मी व श्री. आवताडे तिकडे
गेलो.

नाथांची भारूडे चालली होती. ती झाल्यावर संत सेना महाराजांचा”आम्ही
वारिक वारिक । करू हजामत बारिक बारिक॥” ह्या अभंगाचा दोघा वारकऱ्यांनी
नाट्याविष्कार केला.अभंगाचे नाट्यीकरण सादर करण्याचा प्रकार मी प्रथमच
पहात होतो.

प्रहसनातील-फार्स मध्ये जलद हालचाली असतात तसे अभंगातल्या ओळीत जी
कृती वर्णन केली ती विनोदी पद्धतीने ती कृती प्रत्यक्ष करत होते. वस्तऱ्याने
गळा कापल्याचा(पाप काढून टाकण्याचा) अभिनय, एका मोठ्या केरसुणीने बगला
झाडण्याची कृती; हे पाहून सर्वांना मजा वाटत होती. मध्येच टाळ
मृदंगाच्या बरोबर अभंगातील पुढची ओळ म्हटली जायची की त्यावर विनोदी
सादरीकरण.

गंमत आली. प्रहसनाच्या-वळणाने अतिशयोक्‍तीने सादर केलेले हे अभंगांचे नाट्यीकरण
वारकऱ्यांना हसवून सोडत होते. संत सेना महाराजांनी ह्या रुपकातून
सांगितलेला भावार्थ मात्र हरवून जाऊ नये. मात्र वारकरी मंडळीची
घटकाभर झकास करमणूक झाली हे निर्विवाद.

रात्री श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम गावात जिथे होता तिथे
शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असावा. भक्तीपर चिजा, पदे गायक गात होता.

दूरवरून येणारे ते सूर आनंद देत होते. काही दिंड्यांतून भजने, तर एखाद्या
दिंडीत ह.भ.प.बुवांचे कीर्तन चालू होते. सर्व वातावरण सुस्वर झाले होते.
कीर्तन भजन लवकर संपले.गायन मात्र पहाटे २.३०/३.००पर्यंत चालू असावे.
ऐकता ऐकता कधी झोपलो ते समजले नाही.