मॅरिएटा
महाभारतातील समुद्राचे नाट्यमय वर्णन
महाभारताची थोरवी नुकतीच तुम्ही वाचली. आज महाभारताच्या सोन्याच्या लगडीसम वजनदार भाषेचा प्रभावी आविष्कार व्यासांनी केलेल्या समुद्राच्या वर्णनातून दिसतो तो भाग वाचण्यासारखा आहे. त्या वर्णन वाचण्या अगोदर त्यामागची पार्श्वभूमी एकदोन वाक्यात सांगतो:
विनता व कद्रू ह्या दोघी बहिणी बहिणी. त्या दोघीही कश्यप मुनीच्या बायका. बहिणी एकमेकींच्या सवती झाल्या. त्या दोघींमध्ये समुद्रमंथनातून निघालेल्या उच्चै:श्रवा ह्या रत्नाचा (घोड्याचा) रंग कोणता ह्यावर पैज लागली होती. विनतेचे म्हणणे तो संपूर्ण पांढरा आहे तर कद्रू म्हणत होती की उच्चै:श्रवा पूर्णपणे पांढरा नाही. जी पैज हरेल ती दुसरीची(आपल्या सवतीची) दासी होईल असेही ठरले होते.
उचै:श्रवाला प्रत्यक्ष पाहून खात्री करून घेण्यासाठी त्या दोघी समुद्र दर्शनाला निघाल्या. त्यांना समुद्र दिसतो. त्यावेळी समोर पसरलेल्या समुद्राचे वर्णन व्यासमुनी करतात. समुद्राचे त्याच्या गुणांसह, त्याचे स्वरूप, त्याच्या वृत्ती, समुद्राची गंभीरता, त्याच्या पोटातील प्राणी ह्याचे विशेष सुंदर शब्दांनी अलंकृत केलेले अप्रतिम वर्णन मोठे विलोभनीय आहे. वाचनाचा आनंद म्हणून जो असतो तो देणारा हे वर्णन आहे असा माझा अनुभव आहे. कोणत्याही नटाला आव्हान देणारे जणू ते स्वगत भाषणच आहे! मी ते थोडा फेरफार व काही काटछाट करून लिहित आहे. पण तसे करतांना व्यास आणि भाषांतरकारांवर कोणताही अन्याय किंवा त्यांना उणेपणा येईल असे मी काहीही केले नाही.
रात्र संपली. पहाट झाली. सूर्यही उगवला.तेव्हा पैज हरली तर दासी होण्याचे मान्य केलेल्या कद्रू आणि विनता ह्या दोघी बहिणी मोठ्या उत्सुकतेने उचै:श्रवा नेमका कसा आहे व कोणत्या रंगाचा आहे ते निश्चित करण्यासाठी निघाल्या. विनताचे म्हणणे तो पूर्ण पांढरा तर कद्रूचे म्हणणे त्याची शेपटी काळी आहे.
“ त्या दोघी सागरतीरी आल्या. समोर समुद्र अथांग पसरला होता. अथांग पाण्याने भरलेला, उसळत्या लाटांनी तांडव करणारा; प्रचंड गर्जना करीत लाटांनी पुढे सरकणारा, तिमिंगल, झष, मकर, आणि त्यांच्यापेक्षाही किती तरी अधिक भयानक, विचित्र व घोर जलचरांमुळे कोणासही भीतीमुळे आपल्या जवळपास येऊ न देणारा; रत्नांचा खजिना, वरूणाचे निवासस्थान, सर्व सरितांचा पती, भीषण असूनही पाहात राहावासा वाटणारा, वडवानलाचे माहेर,असुरांचा पाठीराखा, सर्व प्राणीमात्रांचा भयाने थरकाप उडवणारा, पाण्याचे विशाल आश्रयस्थान, कल्पनेच्या कल्पनेलाही अगम्य, विचारांच्याही पलीकडे, अदभुत, आणि भयंकर; भीतिदायक जलचरांच्या निनादामुळे अधिकच रौद्रभीषण, भयानक ध्वनींनी दुमदुमणारा,असंख्य भोवऱ्यांनी भरलेला, सर्व प्राण्यांना भयभीत करणारा, भरतीच्या उंच उसळणाऱ्या लाटा आणि वेगवान वाऱ्यांनी खवळलेला, क्षणाक्षणात खूप उंच उसळणारा, उचंबळून येणाऱ्या आपल्या उंच लाटांच्या प्रेक्षणीय नृत्याने मन मोहून टाकणारा, त्याच्या गर्जना ऐकत एकटक नजरेने पाहातच राहावसा वाटणारा, चंद्रकलांच्या वृद्धीबरोबर आणि त्यांच्या क्षयाबरोबर होणाऱ्या भरती ओहोटीच्या लाटांनी उफाळून येणाऱ्या लाटांनी प्रक्षुब्घ होणारा, अज्ञानी-ज्ञानी, सामान्य-असामान्य लोकांनाही आपला थांग लागू न देणारा, युगारंभी महातेजस्वी पद्भनाभ विष्णुला अध्यात्मयोगनिद्रेसाठी उपयोगी पडलेले शयनस्थान, आपल्यावर वज्रसंकट कोसळेल ह्या भीतीने काळजीत पडलेल्या मैनाक पर्वताचा आहार, आपल्या उदकाच्या आहुतीने वडवानलाला शांत करणारा, अगाध, अपार, अचिंन्त्य आणि विस्तीर्ण असा, परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या अनेक महानद्यांच्या प्रवाहामुळे मागे रेटला जातोय असे वाटणारा, देवमाशांनी, सुसरी मगरींनी गजबजलेला आकाशाप्रमाणे अतिविस्तीर्ण, आकाशाला चंद्र सूर्य ताऱ्यांसह प्रतिबिंबानी सामावून घेणारा, जळाचा अक्षय साठा असा जलनिधान”
– असा महासागर त्या दोघी बहिणींच्या दृष्टीस पडला!