मॅरिएटा
धौम्य ऋषींचे आरुणी, उपमन्यु आणि वेद हे तीन शिष्य होते. प्रत्येकाविषयी लहानमोठी कथा आहे. आज उपमन्युची कथा वाचू या:
धौम्य ऋषींनी उपमन्युला गायीची राखण करण्याचे काम सोपवले. गायी राखण्यासाठी उपमन्यु रानात जाऊ लागला. त्यांचे चरणे, पाणी पिणे विश्रांती झाली की सुर्यास्ताच्या वेळी गायींसह उपमन्यु गुरूच्या घरी येत असे.
थोड्या दिवसांनी उपाध्यायांच्या लक्षात आले की रानात जाऊन गायी राखण्याचे कष्टाचे कंटाळवाणे काम करूनही उपमन्यु गुटगुटीत झालाय. त्यांनी उपमन्युला विचारले, रानात तू काय खातो पितोस? चांगला धष्टपुष्ट झाला आहेस की?” त्यावर तो म्हणाला, “ मी भिक्षेवर उदरविर्वाह करतो.” त्यावर उपाध्याय म्हणाले, “ मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय ती तू खाणे बरे नाही.” त्यावर “ ठीक आहे ,” असे म्हणून दुसऱ्यादिवसापासून मिळालेली सगळी भिक्षा गुरूपुढे ठेवत जाऊ लागला. असे काही दिवस गेल्यावर, एकदा गुरूपुढे सगळी भिक्षा ठेवल्यावर त्यांना तो पूर्वीसारखाच धष्टपुष्ट दिसला. त्याच्याकडे खालीवर बारकाईने पाहून ते उपमन्युला म्हणाले, “ अरे उपमन्यु! तू आणलेली सर्व भिक्षा मी ठेवून घेतो. मग तुझे पोट कसे भरते?” त्यावर उपमन्यु म्हणाला, “ प्रथम मिळालेली भिक्षा मी तुम्हाला देतो. मग मी पुन्हाजाऊन भिक्षा मागतोो. त्या भिक्षेवर माझे पोट भागते.” “ अरे, असे कपटाने वागणे तुला शोभत नाही. दुसरी गोष्ट अशी की, अरे, तुझ्यासारखे इतरही कोणी भिक्षा मागून पोट भरत असतील त्यांच्या तोंडातला घास तू काढून घेतोस. त्यांची तू उपासमार करत नाहीस का? असे वागणे लोभीपणाचे तर आहेच पण बेपर्वाईचेही आहे.” “ ठीक आहे गुरुजी मी आता तसे करणार नाही.” खाली मान घातलेला उपमन्यु म्हणाला.
दुसऱ्या दिवसापासून तो एकदाच भिक्षा मागून धौम्य ऋषींजवळ देऊ लागला. रानात गुरे घेऊन जाऊ लागला. संध्याकाळी परत आल्यावर नेहमीप्रमाणे गुरूंना नमस्कार करून अभ्यास करायला बसायचा. हा क्रम चालू असता एका संध्याकाळी उपमन्यु गुरुंना नमस्कार करून जात असता गुरूंना उपमन्यु अजूनही तसाच टुणटुणीत आहे हे लक्षात आले. त्यांनी त्याला आजही विचारले, “ बाळा उपमन्यु! तू सगळी भिक्षा मला देतोस. पुन्हा दुसऱ्यांदा भिक्षाही मागत नाहीस तरी तू अजुनही गुबगुबीत कसा? तुझी भूक तू कशी भागवतोस?” “ गुरुजी, मी गायींचे दूध पिऊन राहतो.” त्यावर उपाध्याय धौम्य म्हणाले, “ गायीचे दूध पिण्याची मी परवानगी दिली होती का? माझी परवानगी न घेता गायीचे दूध पिणे योग्य आहे का?” “ नाही गुरूजी”, नम्रपणे उपमन्यु उत्तरला. “ तेव्हा आता तू गायींचे दूध पिणे थांबव,” आचार्य म्हणाले. त्यावर होय अशा अर्थी मान डोलवून उपमन्यु गेला.
उपमन्युचा रोजचा कार्यक्रम सुरू झाला. “उपमन्यु सगळी भिक्षा मला देतो; दुसऱ्यांदा पुन्हा भिक्षा मागून खात नाही; गायीचे दूधही पीत नाही. तरी सुद्धा उपमन्यु होता तसाच गट्टम गोल आहे “ हे धौम्य ऋषींच्या लवकरच लक्षात आले. तसे त्यांनी उपमन्युला विचारले. उपमन्यु म्हणाला, “ गायीच्या आचळांतू वासरे दूध पीत असताना त्यांच्या तोंडातून जे थोडे फेसासारखे दूध पडते तो फेस पिऊन दिवस भागवतो.”
“ उपमन्युचे उत्तर ऐकल्यावर , “ अरे ही गुणी वासरे तुझी कीव करून मुद्दामच भरपूर फेस बाहेर टाकीत असली पाहिजेत. त्यांच्या तोंडचा फेस पिऊन तू त्यांचे दूध तोडतोस. ते अर्धपोटी राहतात. तु आता दुधी फेसही पिऊ नकोस.” ह्यावर उपमन्यु हो शिवाय काय म्हणणार! तो हो म्हणाला.
उपमन्युचा रोजचा कार्यक्रम सुरू झाला. “उपमन्यु सगळी भिक्षा मला देतो; दुसऱ्यांदा पुन्हा भिक्षा मागून खात नाही; गायीचे दूधही पीत नाही. तरी सुद्धा उपमन्यु होता तसाच गट्टम गोल आहे “ हे धौम्य ऋषींच्या लवकरच लक्षात आले. तसे त्यांनी उपमन्युला विचारले. उपमन्यु म्हणाला, “ गायीच्या आचळांतू वासरे दूध पीत असताना त्यांच्या तोंडातून जे थोडे फेसासारखे दूध पडते तो फेस पिऊन दिवस भागवतो.”
“ उपमन्युचे उत्तर ऐकल्यावर , “ अरे ही गुणी वासरे तुझी कीव करून मुद्दामच भरपूर फेस बाहेर टाकीत असली पाहिजेत. त्यांच्या तोंडचा फेस पिऊन तू त्यांचे दूध तोडतोस. ते अर्धपोटी राहतात. तु आता दुधी फेसही पिऊ नकोस.” ह्यावर उपमन्यु हो शिवाय काय म्हणणार! तो हो म्हणाला.
उपाध्याय धौम्य ऋषींच्या आज्ञेनुसार उपमन्युने एकदा भिक्षा गुरुला अर्पण केल्यावर पुन्हा भिक्षा मागणे थांबवले होते. गायीचे दूध पिणे सोडले. आणि आता तर वासराच्या तोंडचा दुधाचा फेसही पिणे बंद केले. एकदा रानात उपमन्यु तहान भुकेने व्याकूळ झाला. भुकेल्या उपमन्युने रुईची पाने खाल्ली. ती झोंबणाऱ्या चवीची कडवट,नीरस आणि घातक रूईची पाने खाल्ल्यावर उपमन्युचे डोळे गेले. तो आंधळा झाला. तशाच स्थितीत तो रानात चाचपडत राहिला आणि शेवटी एका कोरड्या विहिरीत पडला.
संध्याकाळ झाली. सूर्य मावळूनही बराच वेळ गेला. तरी उपमन्यु रानातून परत आला नव्हता. धौम्य ऋषींना काळजी वाटून ते शिष्यांना म्हणाले, “ त्याच्या जेवणाच्या बाबतीत त्याची मी सर्व बाजूंनी कोंडी केली. तो माझ्यावर चिडला असला पाहिजे. म्हणूनच तो आज परत आला नसेल,” चला आपण त्याला शोधायला जाऊ.” धौम्य ऋषी शिष्यांना घेऊन रानात गेले. काही शिष्यांना दुसऱ्या बाजूने जाऊन शोध घ्यायला सांगितले. आणि काही शिष्यांना घेऊन तेही एका बाजूने उपमन्युला हाका मारत त्याचा शोध घेऊ लागले. गुरुजींचा आवाज ऐकल्यावर उपमन्यु मोठ्याने ओरडून, “ गुरुजी मी ह्या विहिरीत पडलो आहे असे म्हणू लागला. त्याचा आवाज ऐकून धौम्य ऋषींनी तो विहिरीत कसा पडला हे विचारल्यावर उपमन्यु सांगू लागला; “ गुरुजी मी भुकेने व्याकूळ झालो होतो. मी रुईची (रुचकीची) पाने खाल्ली. आणि आंधळा झालो. काही दिसेना. आणि मी विहिरीत पडलो.” हे ऐकून धौम्य ऋषींनी त्याला देवांचे वैद्य आश्विनीकुमारांची प्रार्थना करायला सांगितले. “ते तुला पुन्हा दृष्टी देतील.” असे म्हणाले.
उपमन्युने आश्विनी कुमारांची निरनिराळ्या प्रकारे स्तुती करून, त्यांचे मोठेपण वर्णन करीत त्यांची प्रार्थना केली.
आश्विनीकुमार प्रसन्न झाले. उपमन्युला ते म्हणाले, “ हा मांडा तू खा. तुझ्यासाठीच तो आणला आहे आम्ही.” पण उपमन्यु, आचार्यांना तो मांडा अर्पण केल्याशिवाय खाणार नाही असे वारंवार निक्षून सांगतो. त्यावर आश्विनीकुमार उपमन्युला सांगतात की एकदा फार पूर्वी असाच मांडा त्यांनी उपमन्युच्या गुरूनांही दिला होता. धौम्य ऋषींनी आपल्या गुरूंना न विचारता तो खाल्ला होता, असे उपमन्युला सांगितले. हा इतिहास सांगून ते उपमन्युला मांडा खाण्याचा पुन्हा आग्रह करतात. पण आपल्या गुरूनी परवानगी दिल्यावरच मांडा खाईन असे उपमन्यु पुन्हा सांगतो.
उपमन्युची गुरुभक्ती पाहून आश्विनीकुमार जास्तच आनंदित होऊन त्याला ते दृष्टी देतात. आणि विहिरीतून बाहेर काढतात. उपमन्युला पूर्ण ज्ञान प्राप्त होईल असा आशिर्वादही देतात.
उपमन्यु उपाध्यायांकडे येतो. घडलेला सर्व वृत्तांत सांगतो.धौम्य ऋषीही उपमन्युला,आश्विनी कुमारांनी वर दिल्याप्रमाणे, त्याला वेदशास्त्रांचे संपूर्ण ज्ञान होईल असे सांगतात व त्याला स्वगृही परत जाण्याची परवानगी देतात.