रेडवुड सिटी
युटोपिया, राजा राम आणि रामराज्य
त्यावेळी
ग्रीक भाषेतील युटोपिया शब्द आणि प्लेटोने सांगितलेले “राजा हा तत्वज्ञानी असावा” ह्यावर अनेक विद्वानांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत. ते लेखनही राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा विषय झाला अाहे.
युटोपियात, केवळ राजाच नव्हे तर प्रजाही सर्व बाबतीत सर्व आदर्शांचे पालन, आचरण करणारी असते.असे शंभर टक्के परिपूर्ण आदर्श राजाआणि राज्य असणे अशक्य आहे. म्हणून युटोपिया ही केवळ कल्पना आणि तसे आदर्श राज्यही फक्त कल्पनेतच असणार! आणि ते सध्या तरी खरे आहे.
युटोपिया किंवा त्याचे विशेषण युटोपियन या शब्दांमागे नकारात्मक भावना आली. ” हे कसे शक्य आहे? केवळ क्ल्पनाच ती!” “अशा गोष्टी कुठे असतात तरी का?” “मग स्वर्गच म्हटला पाहिजे!” अशा भावनेनेच तो वापरला जातो. मग पटते की युटोपियाचा अर्थच मुळी “no place” असा का आहे! अस्तित्वात नसलेले!
पण इथे युटोपिया सारखी Philosopher King ही आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. प्लेटोचे म्हणे “राज्यकर्ता हा तत्वज्ञ असावा” असे होते.ही सुद्धा क्लपनेच जमा होणारे तत्व वाटते. पण आपल्या देशातील राजा जनक प्लेटोची ती अपेक्षा पूर्ण करतो. त्याला राजर्षी असेच म्हणत. अत्यंत स्थिर मनाचा, स्थिरवृत्ती समबुद्धी, स्थितप्रज्ञ असा जनक राजा होता.पण राजाच्या कर्तव्यातही त्याने कसुर केली नाही. म.गांधी म्हणत तसा तो trustee सारखा किंवा परिरक्षक custodianच्या भूमिकेतून राज्य करीत असे.
एक योगायोग पहा. जनकाच्या वेळी म्हणजेच योग्य शब्दात म्हणायचे तर रामायण काळातच अयोध्येचा राजा आणि त्याचे राज्य प्रत्यक्ष utopiaच होते!
ज्ञानेश्वर, नामदेव तुकाराम यांचा जसा विठोबा हे सावळे परब्रम्ह होते तसा श्रीराम हा रामदासांचा ‘देवांचा देव, ‘देवराणा ‘ होता. मनाच्या श्लोकात त्यांनी सगुण भक्तीचे माहात्म्य सांगतांना (श्लोक १३७ पर्यंत) आणि नंतरच्या निर्गुण भक्तीचे महत्व पटवून देतानाही ते आपल्या रामरायाचे गुणवर्णन करतात.
रामदासस्वामी, भक्ती मनापासून करावी व ती फलद्रुप कशी व्हावी ह्यासाठी “प्रभाते मनी राम चिंतित जावा”, ” मना राघवी वस्ती कीजे”, आणि मनात सतत ईश्वराचेच चिंतन असावे आणि त्याबरोबर ते साधण्यासाठी आपल्याला “मना सज्जना सज्जनीं वस्ती कीजे” असे विविध उपाय सांगतात. त्याचीच परिणिती ते आपल्याला एका रामाचे भजन करायला सांगतात. हा बोध करताना ते पुरुषोत्तम रामाचे गुणगान कसे करतात ते पाहण्यासारखे आहे.
ते म्हणतात,
” भजाया जनी पाहता राम एकू।
करी बाण एकू मुखी शब्द एकू।
क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू।
धरा जानकीनायकाचा विवेकू।। १३१।।
ह्यातील क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू । हा चरण महत्वाचा आहे. इथे क्रिया याचा अर्थ आचरण, चरित्र चारित्र्य असा आहे.
रामाच्या एकेक गुणाचे आणि त्या गुणांप्रमाणेच तो प्रत्यक्ष आचरणही करीत होता हे आपल्याला रामचरित्राचे वाचन करताना समजून येते. वाचता येत नसलेल्यांना रामकथा केवळ ऐकल्यानेही ते लक्षात राहते.
रामापाशी सर्वांविषयी दया होती. रामाला सर्वांची काळजी होती. आईबापाविषयी अत्यंत पूज्य बुद्धी होती. वडिलधाऱ्यांविषयी आदर होता. भावांविषयी अपार माया होती. भक्तांविषयी तर त्याला विशेष प्रेम, कौतुक, आणि अभिमान होता. रामापाशी न्यायबुद्धी होती.तो न्यायी होता. याशिवाय रामदासस्वामींनी वरील श्लोकात वर्णन केलेले गुणही होतेच.
रामाच्या आचरणाचा आदर्श समोर ठेवून जे लोक तसे वागण्याचा प्रयत्न करतात ते हळू हळू वरच्या पायरीवर जाऊ लागतात. रामचरित्र माहिती होण्यापूर्वी आपण ज्या पायरीवर होतोतेव्हा त्या पातळीवरचेच आपले वागणे होते. पण जसे आपण रामकथा मनापासून गोडीने ऐकल्या वाचल्यावर रामाच्या आचरणासारखे अंशत: जरी अनुकरण करून वागू लागलो तर आहे त्यापेक्षा वरच्या श्रेणीत जाऊ शकतो. आपल्या आचारविचारात चांगला फरक होऊ लागतो. आपले आयुष्य उन्नत होऊ शकते. ह्यालाच रामदासस्वामी ” क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू।” असे म्हणतात.
राजा रामाच्या चारित्र्यातील महत्वाचा भाग हा की अयोध्येतील सर्व प्रजा सुखी होती. समाधानात होती. त्याहीपेक्षा महत्वाची बाब अशी की रामाचा राजा म्हणून वागण्याचा, त्याच्या आचरणाचा अयोध्येतील प्रजेवर फार प्रभाव होता.
वै. ह.भ.प.ल.रा.पांगारकरांनी उदघृत केलेल्या समर्थ रामदसांच्या अफाट वांड.मयातील ‘मानपंचक’ मधील श्लोकांतून रामदासांनी वर्णन केलेले रामाच्या कार्याचे, अयोध्येतील लोकस्थितीचे, वातावरणाचे, ‘लोक वर्तती कैसे’ हे वाचण्यासारखे आहे. पण त्यातील जे काही निवडक श्लोक बहारदार आहेत, ते वाचू या:-
कीर्ती या रघुनाथाची। पाहता तुळणा नसे।
येकबाणी येकवचनी। येकपत्नीच धार्मिकु।।६।।
लोक कसे होते? तर
उद्वेग पाहतां नाही। चिंता मात्र नसे जनीं।
व्याधी नाही रोग नाही। लोक आरोग्य नांदती।।
लोकांची वृत्ती वागणे, आचरण किती नैतिक होते, स्वभाव कसे होते ते वाचल्यावर आपण स्तिमित होऊन जातो.
युद्ध नाहीच अयोध्या। रोग ना मत्सरू नसे।
बंदनिर्बंदही नाही। दंडदोष कदा नसे।।९।।
बोलणे सत्य न्यायाचे। अन्याय सहसा नसे।
अनेक वर्तती काया। येकजीव परस्परें।।११।।
दरिद्री धुंडता नाहीं। मूर्ख हा तो असेचिना।
परोपकार तो मोठा। सर्वत्र लोकसंग्रहो।।१२।।
राजापेक्षाही तिथले लोक श्रेष्ठ दर्जाचे वाटावेत अशी अयोध्येची प्रजा होती.मग सुबत्ताही का असणार नाही?
अद्भुत पिकती भूमी। वृक्ष देती सदा फळे।
अखंड दुभती धेनु । आरोग्यें वाहती जळे।।१३।।
वा! वा! रामदासांच्या शब्दयोजनेची, प्रतिभेची चुणुक या दोन शब्दांत स्पष्ट होते! “आरोग्यें वाहती जळे!”
पाण्याचे, निर्मळ शुद्ध असे सगळेच वर्णन करतात. काही त्यापुढे जाऊन स्फटिकासारखे स्वच्छ म्हणतील; पण केवळ रामदासच “आरोग्ये” हा त्याचे ‘सर्व गुण, उपयोग, परिणाम, स्वरुप,आवाज, उत्साह,त्याचा प्रवाह,’ इतके आणि असेच काही सूचित करणारा परिपूर्ण यथार्थ शब्द वापरु शकतात! पुढे वाचा,
चढता वाढता प्रेमा। सुखानंद उचंबळे।
संतोष समस्तै लोकां । रामराज्य भूमंडळी।। १८।।
आतापर्यंत रामराज्य म्हणजे सुबत्ता-समृद्धी, धार्मिकता, त्यामुळे शांतता ह्याच गोष्टींवर भर देऊन वर्णन केले जात असे. केले जाते. पण राजा राम आणि रामराज्य ह्यांचे खरे मर्म कशात असेल तर” क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू” ह्यामध्ये आहे.
‘ यथा राजा तथा प्रजा’ ही म्हण आपण वापरतो.ती बरेच वेळा नकारात्मक रुपाने वापरतो. कारणे आणि करणीही तशीच असते म्हणूनही असेल.विशेषत: राज्यकर्ते,नोकरशहा किंवा आॅफिसातील वरिष्ठ किंवा व्यसनी माणसांच्या बाबतीत ती वापरली जात असते. ‘हेच असे तर तेही तसेच असणार!” “अहो जसा वरिष्ठ तसा कनिष्ठ” ” मग दुसरं काय होणार? असंच!” हीच भावना त्यामागे असते.
पण राम आणि अयोध्येतील लोक यांच्या बाबतीत मात्र ती म्हण जशी आहे, त्यातील शब्दांचे जे अर्थ आहेत त्याच सरळ अर्थाने नि:शंकपणे वापरता येते! हा रामाच्या आचरणाचा खरा महिमा आहे. रामराज्याचा खरा अर्थ तिथले लोकही राजा रामासारखेच नितीमान चारित्र्यसंपन्न होते. अथवा मोठा शब्दच वापरायचा तर सत्वगुणी होते त्यामध्ये आहे. राजा आपल्या आचरणाने सगळ्या प्रजेचे आयुष्य उन्नत करु शकतो त्याचे हे उदाहरण आहे. म्हणून रामदासस्वामी रामाचा ‘ क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू।’ या शब्दांत गौरव करतात.
सुबत्ता, शांतता, कायद्याचे पालन आर्थिक भरभराट इतकेच काय धार्मिक वातावरणही इतर राजांच्या राज्यात असणे शक्य आहे. पण वर दिलेल्या श्लोकांतील लोकाचार आणि लोकस्थितीआणि त्याचा परिणाम, तसे वातावरण कुठे आढळेल का? हो, युटोपियात ! रामराज्य हे युटोपिया होते . त्यावर हा नियमाचा अपवाद आहे असे कोणी म्हणतील. पण हा अपवाद इतका महान आहे की त्यामुळे तो नियमाचा गौरवच करतो.