Monthly Archives: April 2019

समुद्र

मॅरिएटा

महाभारतातील समुद्राचे नाट्यमय वर्णन

महाभारताची थोरवी नुकतीच तुम्ही वाचली. आज महाभारताच्या सोन्याच्या लगडीसम वजनदार भाषेचा प्रभावी आविष्कार व्यासांनी केलेल्या समुद्राच्या वर्णनातून दिसतो तो भाग वाचण्यासारखा आहे. त्या वर्णन वाचण्या अगोदर त्यामागची पार्श्वभूमी एकदोन वाक्यात सांगतो:


विनता व कद्रू ह्या दोघी बहिणी बहिणी. त्या दोघीही कश्यप मुनीच्या बायका. बहिणी एकमेकींच्या सवती झाल्या. त्या दोघींमध्ये समुद्रमंथनातून निघालेल्या उच्चै:श्रवा ह्या रत्नाचा (घोड्याचा) रंग कोणता ह्यावर पैज लागली होती. विनतेचे म्हणणे तो संपूर्ण पांढरा आहे तर कद्रू म्हणत होती की उच्चै:श्रवा पूर्णपणे पांढरा नाही. जी पैज हरेल ती दुसरीची(आपल्या सवतीची) दासी होईल असेही ठरले होते.


उचै:श्रवाला प्रत्यक्ष पाहून खात्री करून घेण्यासाठी त्या दोघी समुद्र दर्शनाला निघाल्या. त्यांना समुद्र दिसतो. त्यावेळी समोर पसरलेल्या समुद्राचे वर्णन व्यासमुनी करतात. समुद्राचे त्याच्या गुणांसह, त्याचे स्वरूप, त्याच्या वृत्ती, समुद्राची गंभीरता, त्याच्या पोटातील प्राणी ह्याचे विशेष सुंदर शब्दांनी अलंकृत केलेले अप्रतिम वर्णन मोठे विलोभनीय आहे. वाचनाचा आनंद म्हणून जो असतो तो देणारा हे वर्णन आहे असा माझा अनुभव आहे. कोणत्याही नटाला आव्हान देणारे जणू ते स्वगत भाषणच आहे! मी ते थोडा फेरफार व काही काटछाट करून लिहित आहे. पण तसे करतांना व्यास आणि भाषांतरकारांवर कोणताही अन्याय किंवा त्यांना उणेपणा येईल असे मी काहीही केले नाही.


रात्र संपली. पहाट झाली. सूर्यही उगवला.तेव्हा पैज हरली तर दासी होण्याचे मान्य केलेल्या कद्रू आणि विनता ह्या दोघी बहिणी मोठ्या उत्सुकतेने उचै:श्रवा नेमका कसा आहे व कोणत्या रंगाचा आहे ते निश्चित करण्यासाठी निघाल्या. विनताचे म्हणणे तो पूर्ण पांढरा तर कद्रूचे म्हणणे त्याची शेपटी काळी आहे.


“ त्या दोघी सागरतीरी आल्या. समोर समुद्र अथांग पसरला होता. अथांग पाण्याने भरलेला, उसळत्या लाटांनी तांडव करणारा; प्रचंड गर्जना करीत लाटांनी पुढे सरकणारा, तिमिंगल, झष, मकर, आणि त्यांच्यापेक्षाही किती तरी अधिक भयानक, विचित्र व घोर जलचरांमुळे कोणासही भीतीमुळे आपल्या जवळपास येऊ न देणारा; रत्नांचा खजिना, वरूणाचे निवासस्थान, सर्व सरितांचा पती, भीषण असूनही पाहात राहावासा वाटणारा, वडवानलाचे माहेर,असुरांचा पाठीराखा, सर्व प्राणीमात्रांचा भयाने थरकाप उडवणारा, पाण्याचे विशाल आश्रयस्थान, कल्पनेच्या कल्पनेलाही अगम्य, विचारांच्याही पलीकडे, अदभुत, आणि भयंकर; भीतिदायक जलचरांच्या निनादामुळे अधिकच रौद्रभीषण, भयानक ध्वनींनी दुमदुमणारा,असंख्य भोवऱ्यांनी भरलेला, सर्व प्राण्यांना भयभीत करणारा, भरतीच्या उंच उसळणाऱ्या लाटा आणि वेगवान वाऱ्यांनी खवळलेला, क्षणाक्षणात खूप उंच उसळणारा, उचंबळून येणाऱ्या आपल्या उंच लाटांच्या प्रेक्षणीय नृत्याने मन मोहून टाकणारा, त्याच्या गर्जना ऐकत एकटक नजरेने पाहातच राहावसा वाटणारा, चंद्रकलांच्या वृद्धीबरोबर आणि त्यांच्या क्षयाबरोबर होणाऱ्या भरती ओहोटीच्या लाटांनी उफाळून येणाऱ्या लाटांनी प्रक्षुब्घ होणारा, अज्ञानी-ज्ञानी, सामान्य-असामान्य लोकांनाही आपला थांग लागू न देणारा, युगारंभी महातेजस्वी पद्भनाभ विष्णुला अध्यात्मयोगनिद्रेसाठी उपयोगी पडलेले शयनस्थान, आपल्यावर वज्रसंकट कोसळेल ह्या भीतीने काळजीत पडलेल्या मैनाक पर्वताचा आहार, आपल्या उदकाच्या आहुतीने वडवानलाला शांत करणारा, अगाध, अपार, अचिंन्त्य आणि विस्तीर्ण असा, परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या अनेक महानद्यांच्या प्रवाहामुळे मागे रेटला जातोय असे वाटणारा, देवमाशांनी, सुसरी मगरींनी गजबजलेला आकाशाप्रमाणे अतिविस्तीर्ण, आकाशाला चंद्र सूर्य ताऱ्यांसह प्रतिबिंबानी सामावून घेणारा, जळाचा अक्षय साठा असा जलनिधान”

– असा महासागर त्या दोघी बहिणींच्या दृष्टीस पडला!


उपमन्यु

मॅरिएटा

धौम्य ऋषींचे आरुणी, उपमन्यु आणि वेद हे तीन शिष्य होते. प्रत्येकाविषयी लहानमोठी कथा आहे. आज उपमन्युची कथा वाचू या:

धौम्य ऋषींनी उपमन्युला गायीची राखण करण्याचे काम सोपवले. गायी राखण्यासाठी उपमन्यु रानात जाऊ लागला. त्यांचे चरणे, पाणी पिणे विश्रांती झाली की सुर्यास्ताच्या वेळी गायींसह उपमन्यु गुरूच्या घरी येत असे.

थोड्या दिवसांनी उपाध्यायांच्या लक्षात आले की रानात जाऊन गायी राखण्याचे कष्टाचे कंटाळवाणे काम करूनही उपमन्यु गुटगुटीत झालाय. त्यांनी उपमन्युला विचारले, रानात तू काय खातो पितोस? चांगला धष्टपुष्ट झाला आहेस की?” त्यावर तो म्हणाला, “ मी भिक्षेवर उदरविर्वाह करतो.” त्यावर उपाध्याय म्हणाले, “ मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय ती तू खाणे बरे नाही.” त्यावर “ ठीक आहे ,” असे म्हणून दुसऱ्यादिवसापासून मिळालेली सगळी भिक्षा गुरूपुढे ठेवत जाऊ लागला. असे काही दिवस गेल्यावर, एकदा गुरूपुढे सगळी भिक्षा ठेवल्यावर त्यांना तो पूर्वीसारखाच धष्टपुष्ट दिसला. त्याच्याकडे खालीवर बारकाईने पाहून ते उपमन्युला म्हणाले, “ अरे उपमन्यु! तू आणलेली सर्व भिक्षा मी ठेवून घेतो. मग तुझे पोट कसे भरते?” त्यावर उपमन्यु म्हणाला, “ प्रथम मिळालेली भिक्षा मी तुम्हाला देतो. मग मी पुन्हाजाऊन भिक्षा मागतोो. त्या भिक्षेवर माझे पोट भागते.” “ अरे, असे कपटाने वागणे तुला शोभत नाही. दुसरी गोष्ट अशी की, अरे, तुझ्यासारखे इतरही कोणी भिक्षा मागून पोट भरत असतील त्यांच्या तोंडातला घास तू काढून घेतोस. त्यांची तू उपासमार करत नाहीस का? असे वागणे लोभीपणाचे तर आहेच पण बेपर्वाईचेही आहे.” “ ठीक आहे गुरुजी मी आता तसे करणार नाही.” खाली मान घातलेला उपमन्यु म्हणाला.

दुसऱ्या दिवसापासून तो एकदाच भिक्षा मागून धौम्य ऋषींजवळ देऊ लागला. रानात गुरे घेऊन जाऊ लागला. संध्याकाळी परत आल्यावर नेहमीप्रमाणे गुरूंना नमस्कार करून अभ्यास करायला बसायचा. हा क्रम चालू असता एका संध्याकाळी उपमन्यु गुरुंना नमस्कार करून जात असता गुरूंना उपमन्यु अजूनही तसाच टुणटुणीत आहे हे लक्षात आले. त्यांनी त्याला आजही विचारले, “ बाळा उपमन्यु! तू सगळी भिक्षा मला देतोस. पुन्हा दुसऱ्यांदा भिक्षाही मागत नाहीस तरी तू अजुनही गुबगुबीत कसा? तुझी भूक तू कशी भागवतोस?” “ गुरुजी, मी गायींचे दूध पिऊन राहतो.” त्यावर उपाध्याय धौम्य म्हणाले, “ गायीचे दूध पिण्याची मी परवानगी दिली होती का? माझी परवानगी न घेता गायीचे दूध पिणे योग्य आहे का?” “ नाही गुरूजी”, नम्रपणे उपमन्यु उत्तरला. “ तेव्हा आता तू गायींचे दूध पिणे थांबव,” आचार्य म्हणाले. त्यावर होय अशा अर्थी मान डोलवून उपमन्यु गेला.

उपमन्युचा रोजचा कार्यक्रम सुरू झाला. “उपमन्यु सगळी भिक्षा मला देतो; दुसऱ्यांदा पुन्हा भिक्षा मागून खात नाही; गायीचे दूधही पीत नाही. तरी सुद्धा उपमन्यु होता तसाच गट्टम गोल आहे “ हे धौम्य ऋषींच्या लवकरच लक्षात आले. तसे त्यांनी उपमन्युला विचारले. उपमन्यु म्हणाला, “ गायीच्या आचळांतू वासरे दूध पीत असताना त्यांच्या तोंडातून जे थोडे फेसासारखे दूध पडते तो फेस पिऊन दिवस भागवतो.”


“ उपमन्युचे उत्तर ऐकल्यावर , “ अरे ही गुणी वासरे तुझी कीव करून मुद्दामच भरपूर फेस बाहेर टाकीत असली पाहिजेत. त्यांच्या तोंडचा फेस पिऊन तू त्यांचे दूध तोडतोस. ते अर्धपोटी राहतात. तु आता दुधी फेसही पिऊ नकोस.” ह्यावर उपमन्यु हो शिवाय काय म्हणणार! तो हो म्हणाला.

उपमन्युचा रोजचा कार्यक्रम सुरू झाला. “उपमन्यु सगळी भिक्षा मला देतो; दुसऱ्यांदा पुन्हा भिक्षा मागून खात नाही; गायीचे दूधही पीत नाही. तरी सुद्धा उपमन्यु होता तसाच गट्टम गोल आहे “ हे धौम्य ऋषींच्या लवकरच लक्षात आले. तसे त्यांनी उपमन्युला विचारले. उपमन्यु म्हणाला, “ गायीच्या आचळांतू वासरे दूध पीत असताना त्यांच्या तोंडातून जे थोडे फेसासारखे दूध पडते तो फेस पिऊन दिवस भागवतो.”


“ उपमन्युचे उत्तर ऐकल्यावर , “ अरे ही गुणी वासरे तुझी कीव करून मुद्दामच भरपूर फेस बाहेर टाकीत असली पाहिजेत. त्यांच्या तोंडचा फेस पिऊन तू त्यांचे दूध तोडतोस. ते अर्धपोटी राहतात. तु आता दुधी फेसही पिऊ नकोस.” ह्यावर उपमन्यु हो शिवाय काय म्हणणार! तो हो म्हणाला.

उपाध्याय धौम्य ऋषींच्या आज्ञेनुसार उपमन्युने एकदा भिक्षा गुरुला अर्पण केल्यावर पुन्हा भिक्षा मागणे थांबवले होते. गायीचे दूध पिणे सोडले. आणि आता तर वासराच्या तोंडचा दुधाचा फेसही पिणे बंद केले. एकदा रानात उपमन्यु तहान भुकेने व्याकूळ झाला. भुकेल्या उपमन्युने रुईची पाने खाल्ली. ती झोंबणाऱ्या चवीची कडवट,नीरस आणि घातक रूईची पाने खाल्ल्यावर उपमन्युचे डोळे गेले. तो आंधळा झाला. तशाच स्थितीत तो रानात चाचपडत राहिला आणि शेवटी एका कोरड्या विहिरीत पडला.

संध्याकाळ झाली. सूर्य मावळूनही बराच वेळ गेला. तरी उपमन्यु रानातून परत आला नव्हता. धौम्य ऋषींना काळजी वाटून ते शिष्यांना म्हणाले, “ त्याच्या जेवणाच्या बाबतीत त्याची मी सर्व बाजूंनी कोंडी केली. तो माझ्यावर चिडला असला पाहिजे. म्हणूनच तो आज परत आला नसेल,” चला आपण त्याला शोधायला जाऊ.” धौम्य ऋषी शिष्यांना घेऊन रानात गेले. काही शिष्यांना दुसऱ्या बाजूने जाऊन शोध घ्यायला सांगितले. आणि काही शिष्यांना घेऊन तेही एका बाजूने उपमन्युला हाका मारत त्याचा शोध घेऊ लागले. गुरुजींचा आवाज ऐकल्यावर उपमन्यु मोठ्याने ओरडून, “ गुरुजी मी ह्या विहिरीत पडलो आहे असे म्हणू लागला. त्याचा आवाज ऐकून धौम्य ऋषींनी तो विहिरीत कसा पडला हे विचारल्यावर उपमन्यु सांगू लागला; “ गुरुजी मी भुकेने व्याकूळ झालो होतो. मी रुईची (रुचकीची) पाने खाल्ली. आणि आंधळा झालो. काही दिसेना. आणि मी विहिरीत पडलो.” हे ऐकून धौम्य ऋषींनी त्याला देवांचे वैद्य आश्विनीकुमारांची प्रार्थना करायला सांगितले. “ते तुला पुन्हा दृष्टी देतील.” असे म्हणाले.

उपमन्युने आश्विनी कुमारांची निरनिराळ्या प्रकारे स्तुती करून, त्यांचे मोठेपण वर्णन करीत त्यांची प्रार्थना केली.


आश्विनीकुमार प्रसन्न झाले. उपमन्युला ते म्हणाले, “ हा मांडा तू खा. तुझ्यासाठीच तो आणला आहे आम्ही.” पण उपमन्यु, आचार्यांना तो मांडा अर्पण केल्याशिवाय खाणार नाही असे वारंवार निक्षून सांगतो. त्यावर आश्विनीकुमार उपमन्युला सांगतात की एकदा फार पूर्वी असाच मांडा त्यांनी उपमन्युच्या गुरूनांही दिला होता. धौम्य ऋषींनी आपल्या गुरूंना न विचारता तो खाल्ला होता, असे उपमन्युला सांगितले. हा इतिहास सांगून ते उपमन्युला मांडा खाण्याचा पुन्हा आग्रह करतात. पण आपल्या गुरूनी परवानगी दिल्यावरच मांडा खाईन असे उपमन्यु पुन्हा सांगतो.

उपमन्युची गुरुभक्ती पाहून आश्विनीकुमार जास्तच आनंदित होऊन त्याला ते दृष्टी देतात. आणि विहिरीतून बाहेर काढतात. उपमन्युला पूर्ण ज्ञान प्राप्त होईल असा आशिर्वादही देतात.

उपमन्यु उपाध्यायांकडे येतो. घडलेला सर्व वृत्तांत सांगतो.धौम्य ऋषीही उपमन्युला,आश्विनी कुमारांनी वर दिल्याप्रमाणे, त्याला वेदशास्त्रांचे संपूर्ण ज्ञान होईल असे सांगतात व त्याला स्वगृही परत जाण्याची परवानगी देतात.

संत चोखामेळा

बेलमाॅन्ट

भक्तांच्या कथा ऐकताना फार बरे वाटते. अनेक वेळा त्या कथांमध्ये तर्कसंगती नसते, तर्कशुद्धताही नसते. पण माणसाच्या मनाला त्या वेगळ्याप्रकारे सुखावत जातात. त्यामागे, आपल्याला नेहमीच्या धबडग्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि तेही अद्भुत घडावे असे वाटत असते. रोजच्या जगण्यात तसे काही होत नसते आणि होणारही नाही हे माहित असते. आणि म्हणूनच ते घडावे अशी आपण अपेक्षा, कल्पना करीत राहतो. नेमके भक्तांच्या, संतांच्या कथा आपली ही साधी इच्छा पुरी करतात.

पण संतकवि महिपतिबुवा आपल्याला त्या कथा ऐकताना सांगतात की “ भक्तकथा ऐकता सुख । अंतरी विवेक ठसावे।। त्या कथांचे सुख अनुभवत असता आपण योग्य-अयोग्य, हित-अहित, चांगले आणि वाईट ह्यातील भेद ओळखण्याची बुद्धी ठेवावी. आणि त्याच बरोबर महिपतिबुवांनी भक्तकथेला अत्यंत गोड शब्दांत दिलेली नेमकी आणि समर्पक उपमाही लक्षात राहण्यासारखी आहे. ते भक्तकथेला “ शांतीवृक्षाचे अमृतफळ” म्हणतात! दोन अतिशय हव्याश्या अनुभवांचा संगम त्यांनी घडवला आहे!

आपण आज ‘उस डोंगा परि रस नव्हे डोंगा’हे सांगणाऱ्या संत चोखा मेळ्याच्या आयुष्यात त्याच्यावर गुदरलेल्या काही प्रसंगांच्या गोष्टी ऐकूया.

एकादशीसाठी सकळ संतांबरोबर चोखामेळाही आपल्या कुटुंबासह भूलोकीच्या वैकुंठाला निघाला. पंढरपुराला आल्यावर पांडुरंगाचे देवळाबाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले तरी चोखा त्या सावळ्या परब्रम्हाच्या प्रेमात अडकून पडला. बायकोला म्हणाला आपण आता इथेच पंढरपुरीच राहायचे.

कुणाचे बोल नकोत ऐकायला म्हणून चंद्रभागेतच पण दूर लांब जाऊन आंघोळ करून तो रोज महाद्वाराशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून व हृदयात साठवून लोटांगण घालीत असे.

शूद्राला त्या काळी कोण देवळात जाऊ देत असेल! पण चोखामेळ्याने विठ्ठलाचे महाद्वाराच्या बाहेर उभा राहून दर्शन घेणेही ढुढ्ढाचार्यांच्या डोळ्यांत खुपत होते. ते त्याला हिणवून टोमणा मारत “ अरे पांडुरंगाला तुला दर्शन द्यायचे असते तर तुला त्यानेच आत राऊळात नेले नसते का? उगीच रोज उगीच शिणतोस? आणि आमच्या वाटेत मधी मधी येतोस?” हां. शेवटचा प्रश्नच त्यांना सतावत होता! पुढे उपमा दृष्टांतांतून तत्वज्ञान सांगत त्याच्यावर छाप पडावी म्हणून बोलत. “अरे अल्पायुषी, आयुष्यहीन रानोरानी मारे भटकला तरी त्याला कल्पतरु भेटेल का? तसाच देवळात असूनही तुझ्यासार…तुला हा जगजेठी दिसणार नाही. व्यर्थ का दुरून श्रीमुख न दिसणाऱ्या विठ्ठलाला दंडवत घालतोस चोख्या?” ह्यावर आमचा अडाणी चोखा मेळा त्या कर्मठ बडव्यांना, आचार्यांना लीनतेने म्हणायचा,” माझे मायबाप हो, पांडुरंगाने मला देवळात नेऊन दर्शन द्यावे एव्हढे मोठे भूषण कशा करता पाहिजे ! अहो लक्षावधी कोसावरून सूर्य इथल्या तळ्यातील कमळाला फुलवतो; तसा दुरूनही पांडुरंग माझं रक्षण करतो. चोखा ढुढ्ढचार्यांच्याच शब्दांत माप घालतांना म्हणतो,” दोन लक्ष गावे निशापती। चकोरावरी अत्यंत प्रीती। तेवी अनाथनाथ कृपामूर्ती । माझा सांभाळ करीतसे।। इथेच न थांबता चोखोबा पुढे आणखी एका मात्रेचा वळसा त्यांना चाटवत सांगतो, कासवी कशी दुरून केवळ प्रेमळ नजरेने पाहात आपल्या पिलांना वाढवत सांभाळ करते तसे, मायबाप हो! विठोबाही माझ्याकडे इतक्या दुरून कृपादृष्टीने पाहतो!” चोखा मेळा त्यांना आता शेवटच्या मात्रेचे चाटण चाखवत विचारतो,” महाराज हो! चोवीस तास त्याच्याजवळ असले आणि मनात पांडुरंगाविषयी प्रेम भक्ती नसली इतकेच काय त्याचा विचारही मनात नसला तर त्याच्या जवळ राहण्याचा काय फायदा? चोख्याचे हा नम्र टोला खाऊन लाजलेली ती सर्व पंडीत मंडळी चला चला, लवकर निघा म्हणत लगबगीने काढता पाय घेत.

एके रात्री चोख्याच्या घरी अचानक पंढरीनाथ आले. ते गडबडून गेलेल्या चोखामेळ्याला म्हणाले,”चोखा चल; मी आताच तुला माझ्या राऊळात नेतो.” आणि क्षणार्धात चोखोबा आणि विठ्ठल गाभाऱ्यात आले. विठोबाने चोखोबाला आपुल्या ‘जीवीचे निजगुज’ बोलून दाखवले. “ अरे चोखा! रोज सकाळी मी तुला महाद्वारा बाहेर उभा असलेला पाहात असतो.,तुझी आठवण येत नाही असा क्षणही जात नाही. नाम्याचा नैवेद्य खाताना, पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचकी येते; ठसका लागतो! तुझ्या आवणीनेच हे होते.” हे ऐकून चोखा काय बोलणार? त्याचे डोळे भरून आले! विठोबाचे पाय धरत तो इतकेच बोलू शकला,” विठ्ठ्ला मायबापा, तूच खरा आम्हा अनाथांचा नाथ आहेस!”

बाहेरच बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू आला. त्याने पांडुरंगाचा आवाज ओळखला नाही(त्यात आश्चर्य कसले?) पण चोखामेळ्याचा आवाज नात्र ओळखला. दाराला कडी कोयंडा कुलुप घातलेले असतानाही हा चोखोबा गाभाऱ्यात शिरला ही बातमी त्याने धावत पळत जाऊन इतर बडवे मंडळींना सांगितली. सगळे जमले.कलुप काढून आत गेले तर खरंच तिथे विठ्ठल मूर्तीपाशी हात जोडून चोखामेळा पुटपुटत असलेला दिसला. मग काय विचारता! “ कुलुप कसे काढलेस? आत कसा शिरलास? दरवाजे बंद करतानाच तू आत होतास का? अनेक प्रश्न धडाधड विचारत होते सर्वजण.

चोखा मेळा हात जोडून दीनवाणे सारखे इतकेच म्हणत होता,” अहो माझा काही गुन्हा नाही. मला स्वता पांडुरंगानीच हात धरून आत आणले. खरं त्येच सांगतोय मी. मला जाऊ द्या. दया करा माझ्यावर” असे म्हणत चोखामेळा जाऊ लागला. पण त्याला सगळ्या वरिष्ठांनी दरडावून सांगितले,”चोख्या आता जा. पण इथे पंढरपुरात राहायचे नाही. तू राहिलास इथे तर तू सांगतोस तसे पांडुरंग तुला देवळात घेऊन येईल रोज. विठ्ठ्लाला तुझा विटाळ नको. काय? पुन्हा इकडे यायचे नाही, लक्षात ठेव!” अशी त्याला तंबी दिली.

विठ्ठलाला तुझा विटाळ नको हे ऐकल्यावर मात्र चोखा थबकला; आणि म्हणाला,” महाराज मी पंढरीनाथाला बाटवले असे म्हणू नका हो.अहो शूद्राने आणि ब्राम्हणाने दोघांनीही गंगेत स्नान केले तर गंगेला कसे काय दूषण येते? गंगा कशी अपवित्र होईल? अहो दुर्जनाच्या अंगाला वारा लागला तर वारा दुष्ट होतो का? त्याला कसला दोष लागेल? पांडुरंगालाही सर्व जाती सारख्याच आहेत!तो आहे तसाच आहे!”

चोख्याचे हे बिनतोड विचार ऐकल्यावर तर पुजारी मंडळी अधिकच खवळली. आणि म्हणाले,” चोख्या,आम्हाला ब्रम्हज्ञान शिकवू नकोस. चल निघ इथून.” चोखा हिरमुसला आणि घरी परतला.विठ्ठलालाच आपला उबग आला की काय असे मनाला विचारत घरी परतला.

दुसरे दिवशी आपला प्रपंच पसारा होता तेव्हढा घेऊन नदीपल्याड राहायला लागला. कुठेही असला, राहिला तरी ऱ्भक्त हरिभजनाशिवाय कसा राहील? रोज पांडुरंगाची आठवण काढत तो हरिनामसंकीर्तनात राहू लागला. नंतर काही दिवसांनी विठोबाच्या देवळाला सन्मुख होईल अशी एक दीपमाळ त्याने बांधली.

एके दिवशी दुपारी लिंबाच्या झाडाखाली चोखोबा जेवायला बसला असता अचानक पांडुरंग आले! चोखोबाचा आनंद काय वर्णावा! बायकोला हे सांगितले. तिचीही धांदल उडाली. विठ्ठल आपल्याइथं जेवणार म्हणल्यावर दिवाळीही फिकी झाली की! चिवडा लाडू कुठुन असणार पण भाकरी आमटी दह्याचे गाडगे आणू ठेवू लागली. दोघे जेवायला बसले. देवा भक्ताच्या गोष्टी चालू होत्या. आणि जेवणही. तिकडून पंढरीचा पुजारी तिथे आला. आणि चोखोबा जेवतोय बायको वाढतेय हे तो पाहात होता. वाढताना चोखामेळ्याच्या बायकोच्या हातून दही सांडले असावे. कारण चोखा म्हणाला ,” अगं सावकाश. आज पंढरीनाथ महाराज जेवताहेत आपल्याकडे. आणि तू त्यांच्या भरजरी पितांबरावर दही सांडलेस की! जरा बेताने!” चोखा म्हणत होता. काही वेळाने झाडाकडे पाहात वर बसलेल्या कावळ्याला चोखोबा म्हणतो,” काकबा, हे काय करता? लिंबोळ्या नीट खा. खाली भगवंताच्या पानात टाकू नका.” म्हणत त्याने जवळ पडलेली निंबोळी उचलून फेकून दिली. हे ऐकून पुजारी कातावला. पितांबरावर दही सांडले काय म्हणतोय? कावळ्याला लिंबोळ्या अर्घवट खाऊन टाकू नको काय म्हणतोय! काय चाललेय काय हे सगळे त्याचे थेर? मला पाहून हा मुद्दाम मला खिजवण्यासाठीच करतोय.दुसरं काय?! “ असे स्वत:शी म्हणत तो पुढे झाला आणि चोखामेळ्याच्या अंगावर ओरडून म्हणाला,” काय रे चोख्या, हे काय पाखंडाचे थोतांड चालवले आहेस? कुठला विठोबाआणि त्याचा पितांबर? कावळ्याशीही काय बोलतोस!” असे म्हणत संतापाने पुढे होऊन चोखामेळ्याला एक सणसणीत मुस्काडात ठेवून दिली! चोख्याचा गाल चांगलाच फुगला होता. चोखा गालावर हात ठेवून कळवळत मागे कलंडला. त्याच्यावर आणखीनच दरडावत, “ ही नाटकं बंद कर.” असा दम देत पुजारी नदी पार करून विठ्ठल मंदिरात आला. गाभाऱ्यात गेला. तो हतबुद्धच झाला. दुसरे दोन तीन पुजारी होते तेही गप्प गप्प होते!

विठोबाच्या मूर्तीचा दगडी गाल सुजून चांगलाच फुगला होता. आणि विठोबाच्या पितांबरावर दही सांडलेलेही दिसले! ते पाहून पुजारी घाबरला. उलट पावली चोखामेळ्याकडे गेला. इतर ब्राम्हण व मजारी बडवेही त्याच्या मागोमाग निघाली. चोखामेळ्यासमोर तो पुजारी साष्टांग नमस्कार घालत म्हणाला,” चोखोबा (आता चोख्या म्हणाला नाही!) मला क्षमा करा. तुमच्या भक्तीभावाची मी कुचेष्टा केली. तुम्ही माझ्याबरोबर देवळात चला. विठोबाची समजुत घाला. मला वाचवा!”

चोखा म्हणाला, “ ममाझी जागा देवळाबाहेर ! आता तर तुम्ही गावाबाहेर काढले मला. विठोबा माझं काय ऐकणार! तुम्ही ब्रम्हज्ञानी माणसं. मी साधा शुद्रातला शूद्र. विठोबा माझं काय ऐकणार? “
पुजारी आणि आता इतर ब्रम्हवृंदही गयावया करू लागले. चोखोबा तयार झाला.

गाभाऱ्यात गेल्यावर विठोबाचा तो इतका सुजलेला गाल, की एक डोळाही दिसेना असा बारीक झाला होता. आपल्या पांडुरंगाचे असे श्रीमुख पाहून चोखोबा विठोबाच्या पायावर डोके ठेवून मुसमुसून रडू लागला. मनात सारखे घोकत होता,” पांडुरंगा, विठ्ठला मायबापा! अरे मी कोण कुठला.क्षुल्लक क्षुद्र माणूस.माझे घाव तुम्ही झेलले. माझ्यावरचे तडाखे तुम्ही खाल्ले, सोसले!
करूणाकरा, विठ्ला म्हणत त्याने पांडुरंगाच्या गालावरून आपला हात हळुवारपणे फिरवला. विठ्ठ्लाचा सुजलेला गाल पूर्ववत झाला. त्याचे सावळे सुंदर रूप पुन्हा नेहमीसारखे साजिरे गोजिरे मनोहर झाले!

चोखोबा बरोबर इतर सर्व मंडळी जय जय रामकृष्ण हरी ह्या भजनाचा घोष तल्लीनतेने करू लागले व नंतर त्यांच्या सुरांत आपलेही सूर मिसळून आपणही ‘पुंडलिक वरदाऽ हाऽऽरी विठ्ठल ! श्रीपंढरीनाऽऽथ महाराऽऽज की जय।। चा जय जयकार करू या!

वेगळी पुस्तके

बेलमाॅन्ट

आज रेडवुडसिटी लायब्ररीतील ‘माणूस ग्रंथालयात’ गेलो होतो. पंधरा दिवसांपूर्वी नाव नोंदवले होते. तीन मानवी पुस्तके निवडायला सांगितली होती. मी माझी आवड निवड कळवली. पण एकच वाचायला मिळेल बाकीची दोन आधीच कुणी तरी घेतली होती असे कळले. मी ठीक आहे असे मनात म्हणालो. त्यातही नेहमी प्रमाणे तिसऱ्या पसंतीचेच मिळाले होते.


ह्या पुस्तकांच्या यादीत वेगवेगळ्या विषयांवरचे मानवी ग्रंथ होते! यादी पाहा. आंधळा, व्यसनमुक्त बाप लेक, सुधारलेला गुंड, स्वप्ने पाहणारा!, संगणक शास्त्रज्ञ,पोलिस आॅफिसर, लिंगबदल झालेली व्यक्ति व आणखी काही दोन तीन पुस्तके होती.

परिक्षेत कोणत्याही पेपरात, एकही सोपा प्रश्न माझ्या वाट्याला न येणाऱ्या मला इथेही अवघड पुस्तकच वाचावे लागणार होते. लक्षात आलं असेलच की मला संगणक शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचायचे होते!

विषय समजल्यापासूनच धडधड सुरू झाली होती. मी काय वाचणार आणि मला काय समजणार?! सतीशला विचारायचो काय विचारू, काय बोलायचे वगैरे प्रश्न चालू होते माझे. नंतर लक्षात आले की सोनिया, तिच्या वर्गातील दुसरी मुले त्यांच्या project साठी काही जणांच्या मुलाखती घेतात ते किती अवघड असते! पण ती किती व्यवस्थित घेते. मी दहा बारा दिवस नुसता विचार न करताही घामेघुम होत असे. आणि आज सतीशने रेडवुडसिटी लायब्रीपाशी सोडले तेव्हा मी लगेच पळत घरी जायला गाडीत बसणार होतो. पहिल्या दिवशी शाळेत सोडायला आलेल्या आई बापाचा हात पोरगं सोडतच नाही; वर्गात जात नाही तसे माझे झाले होते. ‘ बाबा काही पुस्तक वाचायला जाणार नाहीत’हे सतीशला समजले असावे.

मी गाडीतून उतरल्याबरोबर त्याने इकडे तिकडे न पाहता फक्त All the Best पुटपुटत गाडी लगेच भरधाव नेली. मी रडकुंडीला येऊन गाडीमागे दोन पावले पळत गेलो.पण त्याने गाडी थांबवली नाही. मी त्यालाच आत पाठवणार होतो. पण मलाच आत जावेलागले. तिथे पोचणारा मीच पहिला होतो. अजून अर्धा एक तास होता. नेहमीप्रमाणे प्रथम तिथल्या दुकानात गेलो. नव्यासारखी दिसणारी, काही नवी, काही जुनी झालेली निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके पाहात थोडा वेळ घालवला.

रिडिंग हाॅल मध्ये जाऊन तिथे दिसेल ते पुस्तक वाचायचे ठरवले होते. पण पहिल्याच झटक्यात AIQ हे Nick Polson & James Scott ह्यांचे पुस्तक हाताला लागले! एकदम भरून आले. ‘केव्हढी कृपा’
‘चमत्कार चमत्कार तो हाच!’ ‘ह्यामागे काही तरी योजना असली पाहिजे’ ह्या भाबड्या बावळट विचारांच्या ढगांत फिरून आलो.महाराजांनी पेपर तर फोडलाच आणि वर मला हे AIQ चे गाईडही दिले!

पुस्तक वाचायच्या आधी परिक्षणे अभिप्राय तरी वाचावेत म्हणून मलपृष्ठ वाचू लागलो.पहिलाच अभिप्राय न्यूयाॅर्क टाईम्सचा. तो म्हणत होता, “लेखकांनी इतक्या हलक्या फुलक्या शैलीत लिहिले आहे की ते सदाशिव कामतकरांनाही समजेल! आम्हाला तर शंका आहे की त्यांच्यासाठीच ते लिहिले आहे! “ थक्क झालो! हे वाचल्यावर ट्रम्प, न्यूयाॅर्क टाईम्स वाॅशिंग्टन पोस्ट ह्यांना fake news म्हणणार नाही. पण मला आताच प्रश्न पडला की,न्यूयाॅर्क टाईम्सचे सोडून देऊ,त्यांना मी माहितच आहे; पण रेडवुड लायब्ररीला कसे समजले की मी वाचक आहे ते? थोडे डोके खाजवल्यावर लक्षात आले. “अरे शाळेत असतांना तू जसे गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये मला घ्याना मला घ्या ना बे; बॅटिंग बोलिंगही करतो ना मी. वाटल्यास फिल्डिंगही करीन. अशी दोन दिवस भुणभुण लावत त्या टीमभोवती फिरायचास? तसेच ह्या लायब्ररीलाही तू एकदा नाही तीन वेळा कळवलेस मी पुस्तक वाचायला येईन म्हणून!”

परीक्षेच्या हाॅल मध्ये जाण्यापूर्वी बहुतेक सगळेच अभ्यासावर शेवटचा हात फिरवितच आत जातात तसेच झाले की हे! असे म्हणत पुस्तक उधडले. वाचायला लागलो. भाताच्या प्रत्येक घासाला खडा लागावा किंवा भाकरीच्या पिठात खर आल्यामुळे भाकरीचा घासही वाळूची भाकरी खातोय की काय असे वाटावे तसे पहिल्या वाक्यापासून होऊ लागले. मुंग्यांनी मेरू पर्वत गिळायला घ्यावा किंवा ‘देवा तुझे किती सुंदर… ‘ ह्या कवितेच्यापुढे मजल न गेलेल्या माझ्या सारख्याने मर्ढेकर, पु. शि. रेगे किंवा ग्रेस ह्यांच्या कविताचे रसग्रहण करण्यासारखे किंवा अनुष्टुभ, अबक मधील कवितांचा अर्थ समजून घेण्यासारखेच हे काम आहे हे समजून आले. पुस्तक जागेवर उलटे ठेऊन वरच्या हाॅलमध्ये गेलो.

नेहमीप्रमाणे मीच पहिला वाचक. इतर वाचक कोणीही नव्हते. त्यामुळे मला पाहून Jenny Barnes ला खरंच ‘Happy to see you’ झाले. तिने मला नाव न विचारता माझे “सुंदर ते ध्यान” पाहूनच माझ्या नावापुढे मी आल्याची खूण केली. आत घेऊन गेली व माझे टेबल दाखवले. माझे पुस्तक आले नव्हते. हळू हळू इतर वाचक आणि पुस्तके येऊ लागली. त्या अगोदर व्यसनमुक्त बाप लेका ऐवजी माय लेक(मुलगा)आले होते.त्यांच्याशी बोललो. तेव्हढेच Warm up !

बार्न्सने एक छापील पत्रक दिले होते. वैयक्तिक खाजगी माहिती विचारू नये; हरकत नसेलतर विचारा/ सांगा. बोलण्यापेक्षा बोलते करा, ऐका; नमुन्यादाखल काय विचारणे चांगले वगैरे सर्व सूचना त्यात होत्या. मला पुष्कळ धीर येऊ लागला. वेळ झाली. सगळी पुस्तके आली वाचक आले. आपापल्या टेबला वर गेले. पेपर वीस मिनिटांचा. १५व्या मिनिटाला पूर्व सूचनेची घंटा होईल हे सांगून झाले. आणि सुर करा असे जेनी बार्न्स म्हणाली. माझी दातखीळ बसली! बरे झाले,शास्त्रज्ञ बाईनेच स्वत:ची “ हाय्! मी एमिली!” कसे काय आहात?”विचारत माझ्या घामाच्या धारांना बांध घालायचा प्रयत्न केला. नुकतेच वाचलेले शीर्षकच AIQ म्हणून उत्तर दिले. घाबरल्यावर आवाज मोठा होतो हे आजच लक्षात आले. कारण त्या हाॅलमध्ये माझ्या AIQ चे तीन वेळा प्रतिध्वनी घुमले! सगळ्या वाचकांनी पुस्तके पटापट बंद केली व काय झाले असा चेहरा करून एमिली बाईंकडे सहानुभुतीने पाहू लागले.त्यांना काय माहित असे अजून बरेच वेळा होणार आहे ते! पण एमिली बाई प्रसंगावधानी. त्यांनी तोच धागा पकडून “ ह्या गोष्टींची सुरवात १७५० पासून झाली. १९२० साली नेव्हीतील अॅडमिरल बाईंनी ह्यावर बरेच काम केले होते. मी मग काही संबंध नसताना algorithms हे संध्येतील नाव घ्यावे तसे म्हणून लगेच आठवून आठवून step by step..असे काही तरी पुटपुटलो.म्हणजे मला वाटले मी पुटपुटलो; पण माझा घुमलेला आवाज ऐकून लगेच इतर वाचकांनी आणि नवल म्हणजे पुस्तकांनीही माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने रागाने पाहात लायब्ररीत शांतता पाळायची असते त्याची आठवण करून दिली. एमिली बाईंबरोबर माझाही उत्साह वाढू लागला असावा. मग रोबाॅट्सही चर्चेत आले.

ह्या बाई संगणक शास्त्रात डाॅक्टरेट आहेत. पण गंमत अशी की त्या ह्या शास्त्राकडे वळल्या त्यामागे त्यांची पहिली व आजही असलेली भाषेविषयीची आवड. त्यांना चार पाच भाषा तरी येतात. विशेष म्हणजे लॅटिन जास्त चांगली येते. म्हणजे आपल्या कडील संस्कृत तज्ञ. भाषेतील व्याकरण, शब्दोच्चार त्यातील उच्चारांचे टप्पे किंवा तुकडे. शब्दरचना व होणारे वाक्य; पिरॅमिडच्या शिखरावर शब्द व त्या खाली, खाली तो तयार होण्यासाठी त्यातील अक्षरे त्यांचे होणारे उच्चार ह्यांची बांधणी करत करत शब्द होतो. तसेच वाक्यही. तेच मी प्रोग्रॅमिंगमध्ये करते असे उदाहरणे देऊन सांगितले. त्या इंजिनिअर नसूनही संगणक शास्त्रज्ञ झाल्या. त्यांनी मला alexa, siri संबंधात थोडक्यात सांगितले.पहिल्या अर्ध्या मिनिटातच माझ्या आकलनशक्तीचीही व स्तराची त्यांना कल्पना आली असावी. त्यांच्या टेबलाकडे मी व जातांना त्या स्वेटर विणत होत्या. शेवटी शेवटी मी त्यांना तसे सांगितले. त्यावर त्या लगेच हसत म्हणाल्या knitting सुद्धा प्रोग्रॅमिंगच आहे. विणायचा स्वेटर घेउन लगेच त्यांनी दोन उलट एक सुलट पुन्हा एक उलट…टाके सुईवर घेत त्याही कशा algorithmic स्टेप्स आहेत ते मला प्रत्येक स्टेप घेऊन सांगू लागल्या. घंटा होऊन गेली होती. ‘पेपर’ वाचून (सोडवून) झाला होता. वेळ संपत आला. सगळ्यांच्या उठण्याच्या निघायच्या हालचाली सुरु झाल्या. माझेही वाचन संपले होते.

हा मुलाखतीचा किंवा प्रश्नोत्तरांचा प्रकार नाही. ह्यात वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्या नेहमीच्या पठडीतील लोकांपेक्षा वेगळ्या, आपल्याला ज्यांच्याविषयी, ज्यांच्या पेशा कामा विषयी फारशी माहिती नसते कुतुहल असते अशांची भेट. त्यांनाही मुख्य प्रवाहात इतरेजनांच्या सहवासात आणून संवाद साधण्याचा हा एक वेगळा सामाजिक कार्याचा प्रकार आहे.दोन वाक्यात सांगायचे तर तुम्हीही आम्हीच आहात. आणि व आम्हीही तुम्हीच आहात. हे जाणून घ्यायचा हा वेगळा एका अर्थी उद्बोधक आणि सुंदर सामाजिक उपक्रम आहे.

उपक्रमाला नावही (ज्या स्थळी हा आयोजित केला त्याचाही त्यात थोडा वाटा असेल ) वेगळे व लक्षवेधी आहे . Human Library. Civit ह्या संस्थेने केलेला उपक्रम आहे.

मी सर्वेक्षणात सहसा भाग घेत नाही. पण अखेरीला मी त्यांचा फाॅर्म भरून दिला. नविन पुस्तके सुचवा मध्ये मी weatherman(Meteorologist) fire fighter first responders सुचवले.

मला हा नविन अनुभव होता. समोरासमोर अनोळखी व्यक्तीशी (इंग्रजीतून!) संभाषण करण्याची ही माझी पहिलीच वेळ. वेळ चांगला गेला व कारणी लागला असे वाटले.

मी लिहिलेले ‘हे पुस्तक’ वाचनीय वाटेल की नाही ही शंका आहे. कारण सर्वेक्षणातील “तुम्हाला ‘पुस्तक’ व्हायला आवडेल का?” हा प्रश्न मी सोडून दिला!

संपता संपता, AIQ ची मी दोन चार पाने वाचली त्यावरून हे पुस्तक उत्तम आणि वाचावे असे आहे इतके सुचवतो.