इब्न हशिम इ.स. ८३३ मध्ये बगदाद येथे वारला. तो व्याकरणकार आणि विद्वान होता. त्याच्यापुढे एक मोठे जिकिरीचे काम आले. साठ वर्षांपूर्वी एक थोर विद्वान इब्न इश्क़्ने लिहिलेल्या प्रेषित मुहम्मद पैगंबराचे सिरत रसूल अल्लाह या चरित्राची शुद्ध प्रत तयार करण्याचे ऐतिहासिक महत्वाचे काम त्याला पूर्ण करायचे होते. .
इब्न हशिमनॆ हे काम मनापासून केले. पण दुर्दैवाने, त्याने, इब्न इश्क़्ने लिहिलेल्या ‘सिरत रसूल अल्लाहची” -या चरित्राची- मूळ प्रत मात्र नष्ट करून टाकली !
मुहम्मद पैगंबर हा क्वुरैश जमातीचा . तो व्यवसायाने व्यापारी होता. मुहम्मद एकदा मक्केच्या बाहेर निवांत जागी शांतपणे डोळे मिटून बसला होता. असा ध्यानस्थ बसला असताना देवदूत जिब्राऐल त्याला दिसला. डोळे उघडून पाहतो तेव्हा त्याला सगळीकडे जिब्राऐलच दिसत होता . आकाशापासून जमिनीपर्यंत सर्वत्र एक जिब्राआईलच भरून राहिला होता.
“म्हण, म्हणायला सुरवात कर.” जिब्राऐलने मुहम्मदाला आदेश दिला. पहिल्यांदा चाचरत, अडखळत मुहम्मदाने म्हणायला सुरुवात केली. नंतर मात्र तो नीट, सरळ म्हणत राहिला. आणि तो म्हणतच राहिला. अशा तऱ्हेने मुह्म्मदाने संपूर्ण कुराण रचले!
जेव्हा मुह्म्मदाला सगळीकडे जिथे पाहावे तिथे जिब्राऐल दिसत होता आणि, “म्हण, सुरू कर पठण” हे त्याचे शब्द ऐकू आले आणि हळू हळू पठण करत मुहम्मदाकडून संपूर्ण कुराण रचून झाले त्यावेळी प्रेषित मुहम्मद इतका घाबरला होता की आपण जीव द्यावा असे त्याला वाटत होते; असे इतिहासकार अल ताबरीने नमूद केले आहे.
पुढील वीस वर्षे मुहम्मद पैगंबर कुराणातील सुरा आणि आयता लोकांना सांगत होता. कुराणाची शिकवण देत होता . कुरण सांगताना मुहम्मद पैगंबर निराळ्याच अवस्थेत जात असे. परमेश्वरानेच-अल्लाहनेच- आपल्याकडून कुरण रचून घेतले ही मुह्म्मदाची खात्री अधिकाधिक दृढ होत चालली.
व्यापाराच्या निमित्ताने क्वुरैश /क्वुरायिश (आपल्याकडे कुरेशी/क्वुरेशी आहेत ते हेच क्वुरायीश असावेत) लोकांचा ज्यू आणि ख्रिश्चन लोकांशी संबंध यायचा. त्या लोकांना हे क्वुरैश ‘पुस्तकी’, ‘पुस्तकी धर्माचे’ म्हणत. त्याला कारण टेस्टमेंट आणि बायबल हे ग्रंथ. हे ‘पुस्तकी’ लोक क्वुरैशीना आपल्या धर्माच्या देवानी कसे चमत्कार केले ते वर्णन करून सांगत.
आपल्याकडे का असे चमत्कार नाहीत, आपल्यातले कोणी का चमत्कार करत नाहीत असा प्रश्न क्वुरैशिना पडे. आणि ते मुहम्मद पैगम्बराला तसे विचारतही.
“तुला का चमत्कार करता येत नाहीत?” असे त्याला विचारल्यावर मुहम्मद म्हणे,” आपले कुराण हाच एक मोठा चमत्कार आहे. ह्यापेक्षा दुसरा काय चमत्कार असू शकतो? कुराणाप्रमाणे वागा. मग चमत्कारच चमत्कार होतील. चमत्कारांना महत्व देऊ नका, ” असे तो उत्तर देई.
मुहम्मद पैगम्बारामुळे कुराण हा पवित्र ग्रंथ मुसलमानांना मिळाला. त्यामधूनच त्यांना एकच देव आहे,देव एकच तो म्हणजे अल्लाह,याची खात्री पटली.
क्वुरैश जमातीतील मुहम्मद आणि त्याच्यामुळे मुस्लिम धर्म स्थापन झाला आणि त्याचा विस्तारही झाला. पण त्याचीही एक पूर्वपिठीका आहे. ज्यू आणि ख्रिश्चनांना
आपला देव अब्राहमचा मुलगा आयझाक /इस्साक मार्फतच मिळाला. ऐझाकमुळे ज्यू आणि त्यातून पुढे ख्रिश्चन हे धर्म स्थापन झाले.
पण अब्राहमला आयझाक /इसाक शिवाय एक थोरला मुलगा होता. त्याचे नाव इस्माईल. हा अनौरस पुत्र. इस्माईल आणि त्याची इजिप्शियन आई हगार Hagar ह्या दोघांनाही अब्राहमची राणी सेरा Sara हिने देशाबाहेर घालवून दिले होते. त्यावेळी देवाने त्यांना वर दिला. “आयझाक/इस्साक प्रमाणेच इस्माईलसुद्धा एक मोठा देश वसवेल व त्याचीही प्रजा खूप वाढेल.”
कुराणातही क्वुरायिश जमात ही इब्राहिमी वंशाची जमात असाच उल्लेख आढळतो.
जस जसा मुहम्मद पैगंबराने स्थापन केलेला एकेश्वरी धर्म फोफावू लागला तसे अनेक लोक कुराणातील वचने,अध्यायचे अध्याय तोंडपाठ करू लागले. म्हणू लागले. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यात अनेक पाठभेद होण्याची शक्यता वाढली.
मुहम्मद पैगंबराच्या निर्याणानंतर झालेल्या पहिल्या दोन खलिफांनी–हे दोघेही पैगंबराचे सासरेच-अबू बक्र आणि उमर– सर्वांच्या तोंडी असलेले, अनेक पाठभेद झालेले कुरण एकत्र लिहून काढले. त्यानंतर आलेल्या तिसऱ्या खलीफाने काही पाठभेद वगळून काही शुद्ध करून एक प्रमाणित प्रत तयार केली. पण इथेही जुने पाठभेद कायम असलेले,पहिल्या दोन खलिफांनी एकत्र केलेले कुराण ह्या तिसऱ्या खलिफाने उतत्तेमान याने नष्ट केले!
ह्याच वेळी,प्रेषित मुह्म्मदाविषयी, त्याच्या संबंधीच्या अनेक प्रसंग, आख्यायिका, सगळीकडे प्रचलित हॊत्या. एक थोर विद्वान मुहम्मद इब्न इश्क़ने (इ. स. ७०४-इ.स. ७६७) ह्या सर्व आख्यायिका, घटना यांचे तपशीलवार संशोधन केले. त्यानंतर, मुहम्मद पैगंबराची निरुपणे, वचने आणि त्याच्या जीवनाशी निगडित असलेले प्रसंग घटना या सर्वांची नोंद असलेला संग्रह(इस्नाद) तयार केला.
इब्न इश्क़्च्या इस्नादमधील सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या मुह्म्मदाच्या, कुराणातील मूळ शिकवणीशी विसंगत नाहीत ना हे अभ्यायासाचे काम साथ वर्षानंतर इब्न हश्मीकडे आले होते. शिरत रसूल अल्लाहच्या संपादनाचे हश्मने मनावर घेतले होते . मुस्लिम परंपरेने मान्य क लेल्या वचनांची, प्रसंगांची त्याने भरही घातली. आणि इब्न इश्क़ ह्या विद्वानाने लिहिलेला मुहम्मद पैगंबराचा सिरत रसूल अल्लाह हा चरित्र ग्रंथ प्रमा
णित झाला. पण, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे
त्याने इब्न इश्क़्ने लिहिलेली मूळ प्रत नाहीशी करून टाकली!
सिरत रसूल अल्लाह हे मुहम्मद पैगंबराचे चरित्र. त्याला देवत्वाच्या जवळ नेउन ठेवणारे असले तरी त्यामध्ये त्याचे माणूसपण कायम ठेवले आहे. त्याला देव बनविले नाही. ह्या चरित्रातील पैगंबर आपल्यासारखा हसतो, गप्पा-गोष्टी करतो. रागावतो, चिडतो आणि घाबरतोही. तो आपल्यासारखीच दु:खे सहन करतो. अडचणी सोसतो. आणि संकटांना तोंड देतो. तसाच तो दयाळूही आहे. त्यालाही मुले आवडतात.
एकदा एका माणसाच्या हातून काही अपराध होतो. तो अपराधी गरीब होता. त्याला पैगंबरापुढे आणले. पैगंबराने त्याला,”तू गरीबांना दान दे. दान धर्म कर.” असे सांगितले. तो गरीब अपराधी म्हणाला,” माझ्याजवळ काही नाही तर मी दुसऱ्यांना काय देणार?”
मुहम्मद पैगंबराने त्याला ओंजळ भरून खजूर दिला आणि म्हणाला, “हा घे खजूर. तुझ्यापेक्षा गरीब असलेल्या कुणाला तरी हा दे.’ ह्यावर तो अपराधी म्हणाला,” अल्लाह रहेम करे. सरकार! हुजूर ! माझ्यापेक्षा कुणीही गरीब नाही!”
मुहम्मद पैगंबराला खूप हसू आले. हसता हसताच तो म्हणाला,”प्रायश्चित्त म्हणून तूच हा खजूर खाऊन टाक, जा.”