Author Archives: Sadashiv Kamatkar

टॉम  हॅन्क्स

अनेकांना टॉम  हॅन्क्स Forrest Gump सिनेमामुळे माहित आहे. मला तो सुधीरकडे पाहिलेल्या The Green Mile मुळेही माहित आहे. तसेच गाजलेल्या Toy Story मध्ये Woody चा आवाजी म्हणूनही माहित असेल. टॉय स्टोरी च्या चारी सिनेमात Woody ला आवाज त्यानेच दिला आहे. आता नाताळ आहे म्हणून त्याचा Polar Express सिनेमा सगळ्या वाहिन्यांवर दाखवला जाईल. ह्या सिनेमात तर त्याने मुलगा, बाप, कंडक्टर, ड्रायव्हर (हा स्वत:च) इतक्या जणांना आवाज दिला आहे! ह्या २५ डिसेंबरला काही टॅाकीजमध्ये व HBO वर त्याचा News From The World हा नवा कोरा सिनेमा येतोय.

बहुधा टॉम हॅन्क्सला ह्या भूमिकेमुळे Oscar मिळण्याची किंवा नामांकन तरी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. कथा अमेरिकेतील यादवी युद्ध नुकतेच संपले ह्या काळातली आहे. कॅप्टन केयल /केयल किड्ची(Kayla Kidd) बायको वारली. युद्ध संपल्यावर करायचे काय म्हणून हा सरहद्दी सरहद्दीवरील खेड्यापाड्यात जाऊन माणशी दहा पैशे(डाईम)घेऊन तो वर्तमानपत्र वाचून दाखवत प्रवास करत असतो. त्यातच त्याला युद्धामुळे पोरकी झालेली दहा वर्षाची मुलगी सापडते. टेक्सासमधील तिच्या आजी आजोबा कडे पोचवण्याची जबाबदारी घेतो. आणि एका मोठ्या प्रवासाला आपल्या घोडागाडीतून मजल दरमजल करत निघतो. त्यात काय होते ते ….

वर्तमानपत्र वाचून दाखवण्यावरून मला पूर्वी लहानमोठ्या पोस्ट ऑफिसच्या बाहेर एक लाकडी उतरते डेस्क घेऊन एक जण बसलेला असे, त्याची आठवण झाली.

डेस्कवर निळ्या आणि तांबड्या शाईच्या दौती, दोन तीन टाक व बाजुला डेस्कवरच टीपकागदाचा ठसा डुलत बसलेला; एव्हढाच सरंजाम. लागली तर असावीत म्हणून पाच सहा मनीऑर्डरचे फॉर्म,थोडी तिकीटे-पाकीटेही डेस्कच्या कप्प्यात असत. बरेच निरक्षर लोक आपली पत्रे मनीऑर्डरचे फॉर्म त्याच्या कडून लिहून घेत. त्याचे पैसे तो अर्थातच घेत असे. कामगार,मजूरवर्गाला,आणि इतर अनेकांना हा गृहस्थ मोठी विद्या शिकलेला वाटायचा ह्यात नवल नाही. त्या सर्वांसाठी ही फार मोठी सोय होती हे खरे.

कोर्टातही असे लोक होते व आजही आहेत. तिथे तर कोर्टाच्या मोठेपणा प्रमाणे दोन तीन ते आठ दहा जण असत. पोस्टाप्रमाणे ही माणसं साधी नसत. कोर्टाच्या वातावरणाचा हा परिणाम असावा. कोर्टाजवळची ही लिहिणारी माणसे कायदा कोळून प्यालेली असत. आज तर ते कियोस्को सारख्या टपऱ्यात कंम्प्युटर घेऊन व जोडीला झेरॅाक्सचे मशिन घेऊन आहेत. हे सुद्धा कोर्टकचेरीला नवख्या शिक्षितांना व चागल्या शिकल्या सवरलेल्यांनाही तसेच अशिक्षितांना ही ह्यांची गरज असते. पण पैसे काढायलाही बेरकी असतात. कोर्टाती पायरी चढलेला अडला नारायण काय करणार! देतात बिचारे.

टॉम हॅन्क्सने तीन चार सिनेमाच्या कथा किंवा पटकथाही लिहिल्या आहेत. फॅारेस्ट गम्प च्या कामासाठी त्याला एक रकमी मोबदला नव्हता. त्याऐवजी सिनेमाला जे उत्पन्न होईल त्याचे काही टक्के रक्कम मिळेल असा करार होता. त्याला त्याकाळी, वीस बावीस वर्षापुर्वी, ४०मिलियन डॅालर्स एव्हढी रक्कम मिळाली!
टॉम हॅन्क्स हा पंधरा सोळा वर्षाचा असतांना तो ओकलॅन्डच्या हिल्टन हॅाटेल मध्ये प्रवाशांचे सामान उचलून नेण्याचे काम करत होता. हॅालिवुडच्या चेर, सिडने पॅाइशे सारख्या अनेक नामवंतांचे सामान उचलून त्याने खोल्यात ठेवले आहे. आजही ते फोटो त्या हिल्टनमध्ये आहेत. तसेच ओकलॅन्ड टीमच्या बेसबॅालच्या मॅचेस वेळी त्याने पॅापकॅार्न चॅाकलेट विकली आहेत.

टॉम हॅन्क्सला टाईपरायटर फार आवडत. त्याच्या जवळ त्याने जमवलेले देशोदेशीचे २५० टाईपरायटर्स आहेत! तो टाईपरायटरवरच लिहायचा. आता लॅपटॅाप किंवा स्मार्ट फोन वरील कीबोर्ड वापरत असेल.

टाईपरायटरवरील प्रेमाने त्याने स्वत: एक साधन App केले! त्याचे नाव त्याने Hanks Writer ठेवले आहे. की बोर्डवरील अक्षर उमटताना टाईपरायटरच्या ‘की’चाच आवाज येतो व ओळ संपली की तशीच बेल वाजते! चला, माझ्या लिखाणाचीही ओळ संपली. टिंग्!

कर्ण

कर्णाच्या रथाचे चाक रक्ताचिखलात रूतले. कर्ण रथाखाली उतरून ते चाक बाहेर काढू लागला. कर्ण ? महारथी कर्ण खाली उतरून चाक काढू लागला? सारथी नाही उतरला चाक काढायला? सारथी नव्हता का?

सारथी होता.आणि तोही श्रीकृष्णाच्या तोडीचा सारथी होता. राजा शल्य!

शल्याने दुर्योधनाला तो त्याच्या कौरवांच्या बाजूने लढेन असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे तो आपल्या सैन्यासह कौरवांकडे येण्यास निघाला होता. पण वाटेत पांडवांनी त्याला आग्रहाने थांबवून घेतले. पाहुणचार केला. आपली बाजू सांगितली. आमच्या बाजूने तू लढ अशी विनंतीही केली. शल्यही जवळपास तयार झाला होता. पण आपण दुर्योधनाला अगोदरच त्याच्या बाजूने लढणार असे आश्वासन दिल्याची त्याला जाणीव झाली. पांडवांना,” पण मी आधीच दुर्योधनाला त्याच्या बाजूने लढेन असे कबूल केले आहे. माझी इच्छा असूनही मला तुमची बाजू घेता येत नाही असे सांगितले. पण त्याच बरोबर मी तुम्हाला मदत करेन” असेही सांगितले.

शल्याचे बोलणे ऐकून कृष्ण नेहमीप्रमाणे स्वत:शी हसल्यासारखे हसत म्हणाला,” शल्या,तुझी वाणी जरी वापरलीस तरी ती खूप मदत होईल!” कृष्णाच्या बोलण्याचा अर्थ कुणाला समजला असेल असे वाटत नाही. पण शल्य, कृष्णाने आपले वर्म काढून डिवचले की आपल्या शैलीचे कौतुक केले ह्यावर विचार करत पांडवांचा निरोप घेऊन कौरवांच्या युद्ध शिबिरात आला.

दुर्योधनाने शल्याचे स्वागत केले. द्रोणाचार्य पडल्यानंतर कर्णाकडे सेनापतीपद आले. दुर्योधनाने व कर्णाने त्याला आपले सारथ्य करावे अशी विनंती केली. सारथ्यात शल्याच्या तोडीचा,एक श्रीकृष्ण सोडल्यास कोणीही नव्हता. म्हणूनच दुर्योधनाने शल्याला तशी विनंती केली. शल्य मनात म्हणत होता,कर्ण पराक्रमी वीर आहे पण एका सूतपुत्राचे मी सारथी व्हावे हे कसे शक्य आहे. पण दुर्योधनाची मैत्री व त्याच्याविषयी वाटणारी जवळीक यामुळे तो कबूल झाला. पण एक अट घालून. तो फक्त कर्णाच्या रथाचे सारथ्यच करेल. सारथ्याची इतर कामे तो मुळीच करणार नाही. शिवाय मी कर्णाशी बोलताना किंवा मी कर्णाला काहीही बोललो तरी त्याला ते मुकाटपणे ऐकून घ्यावे लागेल. प्रत्युत्तर दिले तर माझीही प्रत्युत्तरे सहन करून ती ऐकावी लागतील. ह्या अटी मान्य असल्या तरच मी कर्णाचा सारथी व्हायला तयार आहे.

कर्णाला शल्याच्या अटीच्या पहिल्या भागाविषयी काही विशेष वाटले नाही. सारथ्य तर फक्त सारथ्य कर चालेल! असेच तो मनात म्हणाला असेल. पण शल्याने दुर्योधनाला मदत करण्या बद्दल अशा अटी घालाव्यात हेच कर्णाला पटण्यासारखे नव्हते. कर्णाला, आतापर्यंत राजमंडळात आपला विषय निघाला की त्याचा एखादा दोष काढता येत नाही असे जाणवल्यावर , मग केवळ “तो काय शेवटी सूतपुत्रच!” असे म्हणत अनेक राजे काय बोलत असतील ह्याचा त्याला अंदाज होता. त्यामुळे शल्य काय बोलेल ह्याची शक्यता त्याला माहित होती. तरीही आपला मित्र दुर्योधनाचे सांगणे मान्य करत शल्याची ती अट त्याने मान्य केली.

रणांगणावर शल्य कर्णाचा किती उपहास, उपमर्द, अपमान करत असे त्याला सीमा नाही! कर्णाच्या पुर्वीच्या पराभवांचा उल्लेख करीत त्याच्या वर्मावर बोट ठेवून झोंबणाऱ्या शब्दात बोलत असे. पराक्रमात अर्जुनाचे गोडवे गायचे;प्रत्येक बाबतीत अर्जुनाची स्तुती करून कर्णाला हिणवायचे. कर्ण अर्जुनाच्या तोडीचा नाही असे सांगत त्याची सर्वतोपरी खच्ची करण्याची संधी सोडत नसे. कर्णाचा शल्याने सतत तेजोभंग करीतच तीन दिवस सारथ्य केले होते. कर्णाच्या पराभवात शल्याचा मोठा वाटा होता. सुरुवातीला कर्णानेही उत्तर देतांना शल्याचा उल्लेख न करता सगळ्या मद्रदेशीयांच्या संदर्भात बोलत त्यांची निंदा केली होती. पण शल्यानेही त्याला तिरकस शब्दांत सुनावले होते. ह्या पार्श्वभूमीवर कर्णाच्या रथाचे चाक जमीनीत रूतल्यावर कर्णालाच ते बाहेर काढण्यासाठी उतरावे लागले ह्यात आश्चर्य वाटायला नको!

कर्ण रथचक्र शक्ति लावून काढत असता कृष्ण उदारदात्या कर्णाला विचारु लागला,” कर्णा तुला रथ देऊ का दुसरा?” मुळात दानशूर, उदार कर्ण दुसऱ्याची मदत मग तो कृष्ण असला तरी कशी घेईल? किंबहुना कृष्णाची मदत तो कशी घेईल? कर्णाचे उत्तर त्याला साजेसेच होते. तो म्हणाला,” कृष्णा ज्याच्या बाजूने, ज्याच्या साठी मी लढतो आहे त्या राजा दुर्योधनापाशी अनेक रथ आहेत. पण मी माझ्याच रथातून युद्ध करत असतो. म्हटले तर कौरवांचा राजा माझ्यासाठी दहा रथ पाठवेल. त्यामुळे मला तुझे सहाय्य घेता येणे शक्य नाही कृष्णा!” पण तुझी इच्छाच असेल तर कृष्णा तुला बरे वाटावे म्हणून मागतो. द्यायचेच असेल तर मला लाकडाचे मोठे दांडके दे. ते जास्त उपयोगी येईल.” पण कृष्णाला मानी कर्णाचे असले क्षुल्लक मागणे आपण पुरे करणे कमीपणाचे वाटले असावे. तो पुन्हा कर्णाला म्हणाला, “कर्णा,मी तुला रथ देत असता तू मला लाकडाचे दांडके मागतोस ! आणि मी ते देईन अशी अपेक्षा करतोस? अजूनही विचार कर! मी तुला पाहिजे तसा रथ देईन, बघ! “

कर्ण मनांत म्हणाला असेल,” रथापेक्षा दुसरा सारथी देतो म्हणाला असतास तर माझ्या स्वभावाला मुरड घालूनही ते मी लगेच मान्य केले असते.”

कर्णाने समोर मोडून पडलेल्या रथांपैकी एका रथाचा दांडका काढून आणला. ते मोठे दांडके चाकाच्या पुढे ठेवून त्यावरून चाक बाहेर काढण्याच्या खटपटीस लागला.

पण अखेर कर्णाची वेळ आली होती. कर्णाच्या त्या स्थितीत अर्जुनाने युद्धधर्माच्या विरुद्ध कृत्य करीत त्याच्यावर बाण मारायला सुरुवात केली. तेव्हा कर्णाने अर्जुनाला अशा परिस्थितीत लढणे हे युद्धधर्माविरुद्ध आहे; ह्याला धर्मयुद्ध म्हणत नाहीत असे सांगितले. पण “तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?” (कवि मोरोपंत) अशी एकेका प्रसंगाची आठवण करून देत, प्रश्न विचारत, अर्जुनाने कर्णावर शरसंधान चालूच ठेवले… इत्यादी इत्यादी …. भाग माहित आहेच.

कर्णानंतर शल्यच कौरवांचा सेनापती झाला. पण एका दिवसातच शल्याचा फडशा पडला. पांडवांकडून निघताना कृष्ण हसत शल्याला जे म्हणाला त्याचा अर्थ शल्याला अखेरीस लक्षात आला असेल!

आमच्या गावचे पाणी – १

वि
ही
री
ती

पा णी

बेलमॅान्ट

विहीर दिसली की तिच्यात डोकावून पाहण्याचा मोह कुणाला होत नाही? लहानपणी तर प्रत्येक जण विहीरीच्या भिंतीवर ओणवे होऊन, पाय उचलून, वाकून वाकून खोल पाण्याकडे पाहात असतो.

विहीर ! खोल, आणि दिवसाही आतून थोडेसे उन झेलणारी; किंचित अंधारी, काळोखी अशी वाटणारी! त्यामुळे विहीरीत पाहिले की, “ रात्र काळी बिलवर काळी । गळामुखी माझी काळी हो माय” असा विहिरीत सर्व काही थोडा प्रकाश मिसळलेला काळोख दाटलाय असे वाटायचे.

विहीर म्हटले की मी माझ्या डोळ्यासमोर येते ती मी पाहिलेली पहिली विहीर- खारी विहीर! सात की नऊ बुरुजी गढीसारख्या ( मी लहान असल्यामुळे तितके बुरुज होते की नव्हते हे पाहिल्याचेही आठवत नाही. दोन तीन पाहिल्याचे आठवते. तेही ढासळत आलेले) आमच्या आजीच्या मोठ्या वाड्यातील विहीर लहान कशी असेल ? खारी विहीरही प्रचंड वाड्याला शोभेल अशीच होती.

तिची प्रत्येक पायरी उतरताना कमरेला भरजरी शेला, त्यात जांभळ्या मखमलीच्या म्यानात तेजतरार तलवार लटकावलेली, दोन्ही बाजूला उभे असलेल्या मानकऱ्यांचा मुजरा घेत उतरतो आहे, असे त्या अर्ध्या चड्डीसदऱ्याच्या, मनगटाने नाक पुसण्याच्या वयातही वाटत असे. पायऱ्या उतरून कमानी खालच्या पाण्याजवळच्या पायरीवर उभे राहिले की मात्र त्या मोठ्या चौकोनी विहीरीतले ते शांत,पसरलेले पाणी पाहून जीव घाबरा घुबरा होत असे. पोहायचे नसतानाही छातीवर दडपण येई! पण हे सुरवातीचे पाच दहा क्षणच! तोपर्यंत वरच्या उंच कठड्यावरून धाडकन मुटका मारून चारी बाजूला उंच उडवलेले जोरदार पाणी तितक्याच वेगाने स्वत:भोवती फिरत गोल पसरत गेलेले असे. पाण्यावर पांढऱ्या काळसर फेसांची गोल गोल वर्तुळे फिरू लागली असत.बराच वेळ बुडबुडे दिसत. हळूच एक डोके वर येत असे. पाण्यातच उभे राहून हाताने केस मागे सरकवत,मान हलवून पाण्याचे थेंब उडवत,आवाज न करता हात मारत आईचे कुणी चुलत मामा, काका,भाऊ पोहत पलीकडे गेलेलेही असे.

लहान असल्यामुळे डोळेही लहान. डोळ्यांना सगळे काही मोठेच दिसायचे. त्यात भर म्हणजे बालपणातले कुतुहल, आश्चर्य व थक्क होण्याची सवय. सर्व काही विस्फारलेल्या डोळ्यांनीच पाहावे लागे. त्यामुळे खाऱ्या विहीरी सारखी मोठी विहीर जास्तच मोठी दिसायची. प्रत्येक वस्तु मोठी वाटायची. त्यानंतर आजीच्या गावी पुन्हा जाणे झाले नाही. आज तो बुरुजी वाडाही आहे का नाही माहित नाही.. विहीरही असेल नसेल. असली तरी कशा अवस्थेत असेल कुणास ठाऊक. झाडा ढगांच्या सावल्यांनी ‘झांकळोनि जळ काळिमा पसरलेला’ असेल. पण आजही कधीऽ तरी स्वप्नात ती ‘खारी विहीर’ येते. कारण नसता उत्सुकतेने क्षणभर छातीचे ठोके वाढतात. पण लगेच समोर पसरलेल्या पाण्याच्या गारव्याने स्वप्नातही धीर येतो.

विहीरीचा विषय निघाला आहे तर आजही आमच्या गावात पूर्वीपासून असलेल्या दोन विहीरी लक्षात येतात. एक डाळिंबाचे आड. म्हणताना तिचे डाळिंब्याचे आड व्हायचे. दुसरी म्हणजे नव्या पेठेतली गंगा विहीर. ही तेव्हाही बंदच असायची. डाळिंबाचे आड लहान विहीरच म्हणायची. ती काही वर्षे तरी रोजच्या वरकामासाठी वापरात होती. आज तीही नाही. बऱ्याच गावातील विहीरींप्रमाणे, आमच्या ह्या दोन विहीरींचाही पत्ता सांगण्यासाठी तरी मोठा उपयोग होत असे!

पण अंगावर काटा आणणाऱ्या एका विहीरीचा उल्लेख केला नाही तर गावाचेही वर्णन पूर्ण होणार नाही. ती म्हणजे ऐतिहासिक किल्यातली ‘बाळंतीणीची विहीर’ ! नावापासूनच रहस्यमय भयपटातील “ कॅुंईऽकर्रऽऽ किर्रऽऽकॅ किं ऽऽईऽ करत किंचितच उघडणाऱ्या दरवाजाची व त्यातून फिकट पिवळसर किंवा निळसर प्रकाशाच्या रेघेची व पडद्यामागील थरकाप वाढवणाऱ्या संगीताची” आठवण येऊन आपण खुर्चीच्या अगदी काठावर येऊन बसतो! आणि त्या विहीरीच्या एकाच गोष्टीच्या झालेल्या अनेक चित्तथरारक रूपांच्या गोष्टी ऐकण्याची उत्सुकता वाढते! ह्याला म्हणायचे ‘नावात काय नाही’?

खाऱ्या विहीरीच्या अगदी उलट अशी एक विहीर आमच्या गावात होती. दीनवाणी! जणू दुर्दैवाच्या दशावतारात सापडलेली. वारदाच्या कोर्टासारख्या राजेशाही इमारतीच्या मागे पसरलेल्या आवारातील एका भागात ती होती. त्यावेळीही ती ‘होती’ म्हणावी अशीच होती. भोवताली काटेरी झुडपे; त्यावर चढलेल्या रानवेलीं मधून ती जेमतेम दिसायची. मोठ्या ओबड धोबड झालेल्या गोलाकार खड्ड्याला विहीर का म्हणायचे तर आजूबाजूचे अनुभवी लोक विहीर म्हणायचे म्हणून. विहीरी भोवती दगड विटांचे तुकडे पडलेले. कधी काळी असलेल्या तिच्या भिंतीच्या तुकड्यांचे एक दोन अवशेष कलंडून उभे होते. पाला पाचोळा केर कचरा आणि शेवाळ्यांमधून हिरव्या पाण्याचे चार दोन पसरट दिसत. निर्जन भागातली, जणू वाळीत टाकलेली ती विहीर होती. आमच्या सारखी लहान पोरे, दुसरे काही उद्योग नसले तर कधी तरी एकदा त्या काट्याकुट्यांतून उड्या मारत,दगड विटावर पाय ठेवून आत डोकावल्यासारखे पाहून परत येत असू. स्वत:ला थोडे भेदरवून घेत,गप्प होऊन परत मागे फिरत असू.

काही वर्षांनी तिथले कोर्ट गेले. महापालिका आली. मागच्या मोकळ्या जागेत बांधकाम झाले. त्यात नावापुरती राहिलेली ही ‘विहीर’ नाहीशी झाली.

पण विहीरींचा खरा उपभोग व उपयोग आम्ही भावंडे, मित्र, लहान मुले-मुली व तरुण उन्हाळ्याच्या सुटीत पोहण्यासाठी करून घेत असू. गोपाळराव केळकरांच्या वाड्यातील विहीर ही त्यासाठीच होती. गोपाळरावही दिलदार माणूस. दरवर्षी त्यांनी आमच्यासारख्या लहानांना आणि मोठ्या मुलांनाही पोहायला शिकवले. अशी बरीच वर्षे! कुणाकडूनही एक पैसा न घेता! ॲकडमी, स्पोर्ट जिम, हेल्थ क्लब, रेक्रिएशन स्किल्स अशापैकी एकही नाव किंवा जलतरण विद्या मंडळ, केंद्र, तरंगिणी, तरणतारण, असलीही नावे न ठेवता ते फक्त जो येईल त्याला पोहायला शिकवीत असत. बरं विहीर म्हणायची खरी पण तशी लहान वाटायची.

गोपाळरावांच्या विहीरीत उतरायला पायऱ्या होत्या. पायऱ्या नेहमीच्या नाहीत. विहीरीच्या एका गोलाईच्या भिंतीतून एकेक हैदर आडवा बाहेर आलेला. एका खाली एक हैदर होता. त्यांमधील अंतर लहानांसाठी जास्त होते. कारण दोन हैदरमध्ये काही नव्हते. दोन दातामधला एक एक दात पडल्यावर राहिलेले दात दिसावेत सल्या पायऱ्या! पण कुणाच्या तरी मदतीने लहान मुले विहीरीत येत. तरीही त्या दगडी पायऱ्या उतरत येताना सिनेमातील आलिशान बंगल्याच्या आतील वळणदार जिन्यावरून गाऊन घातलेला व तोंडात सिगरेट धरून उतरणाऱ्या अशोककुमारची आठवण यायची. गोलाकारावरून खाली उतरताना पहिल्या तीन चार पायऱ्या काही वाटत नसे. पण जसे खाली खाली यावे तेव्हा काळ्या विवरात शिरत आहोत किंवा अंधाऱ्या गाभाऱ्यात चाललो आहोत असे वाटायचे. पाण्याच्या भीतीत ही भीती मिसळा मग लक्षात येईल की पोहायची भीती का वाटते. पण काही तरूण मुले एकापाठोपाठ धाडकन उड्या तरी किंवा मुटका मारून एन्ट्री घेत. पण नंतर अशा नाट्यमय पण पाण्यात असणाऱ्या व उडी घेणाऱ्या दोघांनाही धोकादायक एन्ट्रीला गोपाळरावांनी बंदी घातली.

पहिले काही दिवस प्रत्येकाच्या कुवतीनुसार स्वत: आणलेले डालडाचे पाच-दहा पौडी डबे पाठीला बांधून पाण्यातल्या पायऱ्यांपाशीच डुबक डुबुक करावे लागे. माझ्यासारख्या, दंड दालचिनी एव्हढे आणि गोळा मिरीएव्हढा,पाय ज्येष्ठमधाच्या काड्या, अशा ‘गब्रु सॅंन्डोला’ डबा बांधण्या ऐवजी मलाच डब्याला बांधावे लागे. म्हणून गोपाळराव म्हणत,” अरे ह्याचा डबा सोडा. हा कसला बुडतोय! “ मग माझ्याकडे पाहात म्हणायचे,” पाण्यांत राहा. वर हवेत तरंगायचं नाऽही!”

पण हे डबा प्रकरण फार तर एक दोन दिवस चाले. त्यानंतर लगेच गोपाळरावांचे पोहण्याच्या बिगरीतील पोरांसाठी पायरीला धरून “ हात मार पाय मार”चे लेफ्ट राईट् सुरू होई. त्या नंतर मुलांच्या पोटाखाली ते हात ठेवल्यासारखा करत पाण्यांतून “हात मार पाय मार” करत फिरवायचे. त्यांनी मध्येच हात कधी काढला हे पोराला एक दोन गटांगळ्या खाल्यावरच समजे.त्यांची पुढची पायरी म्हणजे ते मुलांच्या हनुवटीला बोटांनी वर उचलून ते पाण्यातून त्याच्याकडे पाहात मागे मागे जात. पोराला आपण पाण्यात असूनही हात पाय मारत अर्धी फेरी मारली हे समजतही नसे. कारण तेव्हढ्यात गोपाळराव दुसऱ्या पोराकडे “ए हात मार पाय हलव” करत गेलेले असायचे! आम्हा सगळ्यांना, न शिकताच आम्ही पोहू लागलो असा भ्रम व्हायचा. ह्यामुळेच गोपाळराव व त्यांची विहीर तिथे पोहायला शिकलेल्या सर्वांच्या आठवणीत असते!

गोपाळराव केळकरांच्या वाड्यात दुपारचे तीन तास तर सहज निघून जात. ज्यांचे नंबर लागायचे असतील ते पत्त्याचा डाव मांडून बसायचे; ज्यांचे पोहणे झाले असे तेही दुसरीकडे खेळत बसत. वसंता आणि भालू , दत्ता,बंडू सारखी किंवा आमचे थोरले भाऊ नाना, मुकुंद, अरूणआणि मधू हे मात्र पाण्यात आवाज न करता निरनिराळे हात मारत चकरा घेत असत. मध्येच कासवासारखे पाण्याच्या आतून पोहत.त्यांना त्यांच्या कौशल्याचे हे पारितोषिक असे. मग तीन सव्वा तीन वाजता तिथल्याच अंगणात वाळलेले, किंवा आंबट ओले कपडे खांद्यावर टाकून मजेत घरी यायचो!

एकदा पोहायला आल्यावर मग काय! आज वारदाच्या बागेतल्या विहिरीत तर परवा गुलाबचंदशेठच्या पंख्याच्या विहीरीत, तर कधी गणेशराम मुरलीधर यांच्या बागेतील विहीरीत पोहण्याच्या मोहिमेवर निघायचो. मोहिमेवर का म्हणायचे तर ह्या तीन विहीरी शहराच्या तीन दिशेला होत्या. ह्या मोठ्या धनवान माणसांचे मोठेपण की ते आमच्या सारख्या मुलांना त्यांच्या खाजगी विहीरीत पोहायला उदार मनाने परवानगी देत. पण आम्हीही तिथे कधी गडबड धिंगाणा केला नाही. पंख्याची विहीर म्हणजे दुरुनही दिसणारी तिची पवनचक्की असलेली विहीर! तिथली नारळाची उंच झाडे व आंबा चिक्कू पेरूंची व तऱ्हतऱ्हेंच्या फुलांचीही झाडे असलेली सुंदर बाग ह्यामुळे पंख्याची विहीर शोभिवंत होती! तिच्या पाण्यावर ही फळाफुलांची बाग बहरलेली असे.

थोडा भाजीपालाहू पंख्याची विहीर काढत असे. वारदाच्या बागेतील विहीर ही त्यांची उपवनासारखी बाग ताजी तवानी ठेवायची व जवळच असलेल्या शेतालाही पाणी पुरवत असावी. तशीच गणेशरामचीही विहीर. ह्या तिन्ही विहीरी खऱ्या विहीरी वाटायच्या. ह्या तीन विहीरी शहराच्या तीन टोकाला असल्यामुळे चालत जाणे किंवा सायकलवरून जाणेही रोज कधीच जमत नसे.त्यामुळे संपूर्ण सुट्टीत फार तर एक दोन वेळा प्रत्येक विहीरीत पोहणे होत असेल. पण जितके होई ते उत्साहाला भरतीच आणत असे.

गोपाळराव केळकरांच्या वाड्यातील बेतशीर विहीर म्हणजे अनेकांची पोहण्याची Alma Mater च होती! त्यांच्या वाड्यातील लोकांच्या धुण्या भांड्यांसाठी ती वापरली जाई. पिण्याच्या पाण्यासाठी शहरात नळाने पाणी पुरवठा होतच असे. ह्या सर्व विहीरींनी आम्हाला पाण्याचे वेगळे, गंभीर तितकेच खेळकर रूप दाखवले. भव्य, देखण्या,खाऱ्या विहीरीकडे,मी दोन तीन दिवस जवळून फक्त एकटक नजरेने समोर पसरलेले पाणी पाहत असेन.किती वर्षे उलटून गेली.पण ती माझ्या डोळ्यांच्याही लक्षात राहिली आहे.

पुढे बरेच जणांनी आधुनिक स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचे सुख उपभोगले. पण ह्या चार विहीरींच्या पाण्यातील गंभीरतेची, भयोत्सुकतेची, मध्येच घाबरलेल्या नवशिक्यांच्या चित्कारांची, त्यांची गंमत करणाऱ्यांच्या हसण्या खिदळण्याची, उड्या आणि मुटक्यांनी सपकन चौफेर उडवलेल्या उंच फवाऱ्यांची, ‘गावच्या पाण्यात’ पोहण्याच्या आठवणी ते विसरले नसतील. कसे विसरतील? त्या आठवणी म्हणजे भाग्यानेच लाभावी अशी आमच्या गावच्या पाण्याची चव होती!

पैसा झाला मोठा!

वजन-मापाची, लांबी- रुंदीची, अंतराची कोष्टके प्राथमिक शाळेत पाठ करावी लागत त्यावेळेस कंटाळा यायचा. इंच फूटांपासून, यार्ड ,फर्लांग ते मैल ह्यांची कोष्टके पाठ करण्यापेक्षा मैलो न् मैल चालणे बरे वाटायचे. आपल्याकडे एक मैला नंतर दोन मैल हे अंतर सुद्धा कोष्टकात होते. दोन मैल म्हणजे एक कोस. एका मैलापेक्षा जास्त अंतर कोसात सांगितले जात असे. खेड्यात पलीकडचे गाव ,”अहो हे काय चार कोसावर तर आहे!” असे म्हणत.

काय गंमत आहे पाहा. पैशा नाण्यांची कोष्टके पाठ करताना मात्र मजा वाटायची. माणसाला लहानपणापासून पैशाचे आकर्षण आहे हेच खरे. आम्हा लहान मुलांना पैशाचे महत्व माहित नव्हते. पण पैसे खुळखुळायला मजा येत असे. सुट्या पैशांची नाणी बाजूला करत चवड रचणे हा एक वेगळाच विरंगुळा असे. नोकरीत फिरतीवर असताना भुसावळ मेडिकल स्टोअर्समध्ये रात्री दुकान बंद केले की बरेच वेळा गप्पा मारत, मालक बाळासाहेब आचार्यांच्या बरोबर नाण्यांची; रूपये, दोन रुपये, पाच रुपयांच्या नाण्यांची चवड करत त्यांचा गल्ला मोजत असे. आचार्य विनोदी बोलायचे. त्यांच्यामुळे माझे कोमट विनोदही कढत व्हायचे. पण ह्या हसण्या खिदळण्यामुळे नाणी व चवड पुन्हा मोजायला लागायची! पण बाळासाहेब हुशार. नोटा मात्र ते स्वत: मोजत !


बाजारात शिरताना, कापडाची पथारी पसरून पैशाची, एक आण्याची, चवल्यांची (दोन आण्यांचे नाणे) , पावल्यांच्या (चार आण्यांचे एक नाणे, अधेली ( आठ आण्यांचे नाणे) आणि रुपयांच्या नाण्यांच्या चवडी रचून चिल्लर देण्याचा व्यवसाय करणारे दिसले की आता बाजारात आलो हे समजायचे. नाण्यांच्या त्या चवडी व बाजूला नाण्यांच्या सरमिसळीचा ढिगारा मागे वळून वळून पाहात पुढे जात असू.

‘पैशांची चवड’ घेऊन बसलेले तीन चार जण पाहिले की मनात यायचे, “इतके पैसे! हे उघड्यावर घेऊन कसे बसतात? “ आम्हाला पैसे मुठीत घाम येईपर्यंत घट्ट धरून तरी ठेवायचे किंवा चड्डीच्या खिशात तळाशी खोल दडवून ठेवायचे येव्हढेच माहित होते. दुसरा प्रश्न पडायचा की हे एव्हढे पैशेवाले लोक आणि रस्त्यावर पथारी पसरून का बसलेत? आणि ह्यांचा अवतार इतका साधा कसा? ह्या व अशा सगळ्या प्रश्नांना श्यामने एकाच प्रश्नाने वाचा फोडली. त्याने वडिलांना विचारले की,” हे आपला पैसा का विकतात? आणि दुसरे लोक तो कशाने विकत घेतात? “ अण्णांनी आम्हाला समजेल असे थोडक्यात सांगितले की,”ही माणसे,ज्यांना सुटे पैसे, मोड हवी असते त्यांची ती मोठी नाणी, नोटा घेऊन त्याबदली सुटे पैसे देतात. त्याबद्दल ते थोडे पैसे कापून घेतात; म्हणजे पैसे कमी देतात.”

आज रस्त्यांवर पैशांच्या नीटनेटक्या रचलेल्या चवडी व तो व्यवहार करणारी ती लहान माणसे दिसत नाहीत. ती आता गगनचुंबी इमारतीतील काचेच्या चकाचक ॲाफिसातून डॅालर्स, पाउंड, युरो,येनच्या खरेदी विक्रीचा आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतात !

पैशाची मोजणी पै ह्या एकाक्षरी लहान नाण्याने होई. तीन पै मिळून एक पैसा होई! पण पै हे नाणे बंद झाले होते. दोन पैशांचा एक ढब्बू होत असे. हे तांब्याचे मोठे नाणेही एक दोनदाच पाहिल्याचे लक्षात आहे. तेही बंदच झाले होते. पण त्या ऐवजी ब्रिटिश सरकारने दोन पैशाचे एक लहानसे चौकोनी नाणे काढले होते. तेही लवकरच बंद झाले! पै वरून चिं. वि. जोशींच्या लहानपणी त्यांनी केलेल्या विनोदाची आठवण येते.. ते आपल्या वडिलांबरोबर जात असता म्हणाले, “बाबा,तो पहा एक पैसा येतोय.” चिंवि काय म्हणत होते ते वडिलांना समजेना. . त्यांनी विचारले,” अरे कुठाय पैसा?” “तो काय,समोरून पै काका आणि त्यांची दोन मुले येताहेत. तीन पै एक पैसा!”


महायुद्धाचे ढग येऊ लागले तसे पैशाच्या नाण्यांच्या जोडीनेच व्यवहारात नोटांची चलती सुरु झाली. नोटा होत्याच पण सामान्यांच्या वाट्याला कमी येत. पगारदार नोकर, व्यापारी लोकांत, बॅंकात, नोटांची उठबस जास्त होती.नाण्यांचे आकार कमी होऊ लागले. रुपयातली चांदी एकदम कमी झाली. इतर नाण्यातील स्टेनलेस एकदम वाढले. पैशाची तर फार नाटके झाली. पहिल्या प्रथम तांबडा पण साधा एक पैसा असूनही त्याचा आकार नेटका होता. तो निम्याने कमी झाला.
युद्ध सुरू झाल्यावर तर त्याला मध्यभागी भोक पाडले! त्याला भोकाळी पैसा नाव पडले. त्याकाळची जुनी मंडळी पैशाचे हे हाल पाहून नेहमीची शेरेबाजी करू लागली. “चिंतामणराव! काही खरं नाही आता. ”कलियुग आलं हो कलियुग!काय काय पाहावं लागणार आहे आणखीन! पांडुरंगा तुलाच माहित!” हे केवळ एका पैशाचा आकार कमी झाला व हे कमी झाले म्हणून की त्याचा कोथळाच बाहेर काढला त्यामुळे ही थेट कलियुगापर्यंत नेणारी नेहमीची पराकोटीची शेरेबाजी!

पण लोकही इतके डोकेबाज की स्टोव्ह रिपेर करणाऱ्यांनी त्याच्या पंपाच्या दट्ट्यात वॅाशर म्हणून; सायकल दुरुस्ती करणाऱ्यांनी, लहान यंत्रे दुरुस्त करणाऱ्यांनी तो पैसा वॅाशर, चकती म्हणून वापर करायला सुरुवात केली. काही पेंटर लोकांनी कल्हई करून पाट्यांच्या अक्षरात, बॅार्डरच्या नक्षीत,तर बायकांनी लहान मुलींच्या परकराच्या घेराला कल्हई केलेला व साधा पैसा वापरून फॅशन करायला सुरुवात केली. बऱ्याच हौशी पोरांनी तांबड्या करदोट्यात तो ओवून गळ्यात घातला. तर पैलवान लोक काळ्या दोऱ्यात ओवून दंडात ताईत म्हणून बांधू लागले! पैशाचे व्यवहारातील हे असले चलनवलन पाहून, पैशाचे अवमूल्यन आहे का मूल्यवर्धन आहे ते अर्थशास्त्र्यांनाही समजेनासे झाले!

चार पैसे एक आणा, दोन आण्यांची एक चवली. चार आण्यांची एक पावली किंवा सोळा आण्यांचा एक रुपया होतो हे कोष्टक न पाठ करताही शाळकरी मुलांनाही माहित असे. आजही अनेकांना,पैसा जवळ नसला तरी, पैशाचे कोष्टक मात्र तोंडपाठ असते. अनेक गरीबांना फक्त कोष्टकच येत असते.

रुपया म्हणताना तो,”चांगला एक बंदा रुपया,” किंवा “खणखणीत एक रुपया दिला की त्याला !”असे जोर देऊनच म्हटले जाई. रुपया हे नाणे खरेच मोठे होते. चांदीचा रुपयाही पाहिला व हातात घेतल्याचे आजही अनेकांच्या लक्षात असणार ह्यात शंका नाही. कुणी आपली वस्तु किंवा बाजू खरी व भक्कम असल्याची ग्वाही,”अहो आमचे नाणे खणखणीत आहे!” तसेच लग्नाच्या स्थळा संबंधात मुलाची किंवा मुलीची ग्वाही देताना, “अहो आमचा मुलगा-मुलगी म्हणजे खणखणीत बंदा रुपया आहे!” असे अभिमानाने सांगितले जाई!

चांदीचे रुपये ह्या हातातून त्या हातावर ओघळत नेताना होणारा आवाज आजही ऐकू येतो ! आजही कधी चार पैसे खिशात खुळखुळतात तेव्हा जगाचा राजा झाल्याचा आनंद होतो.

नाहीतरी पैशाचाच आवाज सर्वात गोड असतो म्हणा!


बेलमॉंट

छटाकभर लेख!

बेलमॅान्ट

जुनी वजन मापे आठवताना अडीशेर किवा अडीसेर,अडीसरी हे चटकन आठवते. त्यातही लब्बा म्हणत असे ती हाक “छलो अडकी कुडरी अडीसरी वेंकटीऽ!” ही आजही ऐकू येते. त्यातला कानडी हेलातून म्हणलेला अडीसरी शब्द फार गोड वाटे! पासरी व धडा. किती अडीसरी म्हणजे पासरी? दोन? का ….? तसेच किती पासरी म्हणजे धडा?

मला बरोबर माहिती असलेली वजन मापे रुक्ष वाटली तरी वाचनीय आहेत.

धान्ये, मटकी चवळी सारखी कडधान्ये,डाळी, पीठे मोजण्याची मापे
सर्वात लहान माप चिमूट व नंतर मूठ . पण ही फक्त सोयीची व अंदाजाची. त्यामध्येच माशीच्या पंखाइतकी, नखभर, किंवा ‘ किंचित’ ह्यांचा समावेश करता येईल.

पण प्रमाणित मापे म्हणजे सर्वात लहान निळवे/ निळवं. २ निळवी = १ कोळवं. २ कोळवी = १ चिपटं . २ चिपटी= १ आठवा किवा आठवं. २ आठवी = १ शेर ही मापी वजने. चिपटे व शेर प्रत्येक घरात असे. लोखंडी पत्र्याचा किंवा काही ठिकाणी लाकडी. साधारणत: वाळूच्या घड्याळाच्या किंवा डमरुच्या आकाराचे. मान अवटाळली तर हा शेर डोक्याखाली घेऊन झोपले तर मान मोकळी होऊन दुखणे हमखास थांबायचे. दुखण्याच्या शेरावर हा शेर सव्वाशेर असायचा!

४ शेर = १ पायली. १६ पायल्या = १ मण. २० मण= १ खंडी.

दुधा तेलाची मापे.

दूध मापून देत व तेलही.
१ पावशेर ; २ पावशेर = १ अच्छेर (बहुधा अर्धा शेर ह्या अर्थी) २ अच्छेर = १ शेर.

तेल मोजून देताना १ १/२,(दीड पाव) पाव = १ अडीशेर (अडीच शेर) किंवा अडीसरी , २ अडीशेर किंवा अडीसरी = १ पासरी. २ पासरी = १ धडा. नमनाला धडाभर तेल तो हाच धडा!

मिठाई तोलताना (तराजूत वजने ठेवून) छटाक (हे लहान माप तेल मापतानाही असायचे.) हे सगळ्यात लहान माप होते; ४ छटाक = १ पावशेर. २ पावशेर = अर्धा शेर. २ अर्धा शेर किंवा ४ पावशेर = १ शेर , मिठाई नंतर शेराच्या पटीतच मागत. पण तेही फार थोडेजण.

वर सांगितलेली दीड पाव = १ अडीशेर किंवा पासरी ही मापे वांगी भेंड्या गवारी घेवडा ह्या सारख्या भाज्या तोलून देतानाही वापरत. तसेच सुपारी तीळ खोबरे साखर वगैरे वजन करून देतानाही वापरत.

सरपणाची लाकडे, कोळसा मोठ्या तराजूत तोलून देताना धडा, मण ही वजने असत. सोने तोलताना गुंज हे सर्वांत लहान माप. गुंजा दिसायलाही सुंदर असत. केशरी लाल व त्यावर देठाच्या जागी काळा ठिपका. गुंज चमकदार असे. सशाच्या डोळ्यांनाही गुंजेचीच उपमा आहे. ‘गुंजेसारखे लाल ( व लहान)डोळे लुकलुकत होते’.

तर अशा ८ गुंजा= १ मासा. १२ मासे= १ तोळा.

एखादी वस्तु अगदी थोडी घ्या किंवा द्या म्हणायचे असेल तर आधी म्हटल्याप्रमाणे, दोन बोटांच्या चिमटीत मावेल, चिमूटभर, माशीच्या पंखाएव्हढी, गहूभर, गव्हा एव्हढी म्हणले जात असे. कमी लांबीची सांगताना “ उगीच बोटाचे अर्धे किवा एका पेरा एव्हढे घ्या /द्या म्हटले जाई. नाहीतर “ एक टिचभर म्हणजेच अंगठा ते तर्जनी एव्हढे अंतर, जर त्या पेक्षा जास्त असेल तेव्हा एक वितभर म्हणत. विटी दांडू किंवा गोट्या खेळताना ही दोन मापे वारंवार उपयोगात यायची. पण कुणाची हेटाळणी करण्यासाठीही ह्याचा सढळ ‘हाताने’ वापर होत असे.

कापडाच्या दुकानात गज (तीन फुटाची धातूची,इंचाच्या व फुटांच्या खुणा असलेली जाड पट्टी ;आठवा रामसे बंधूंचा भयानक सिनेमा ‘ दो गज नीचे’ !!) सापडला नाही तर दुकानदार ‘हातभरा’चे माप काढून कापड मोजून द्यायचा. हातापासून खांद्यापर्यंत कापड ताणून घडी घालत एक, दोन अगदी अडीच ‘वार’ सुद्धा मोजून द्यायचा! दुकानदार किंवा नोकर लहान चणीचा असला तर त्यांचा फायदा! उंचापुरा मालक किंवा नोकर कधी ‘हातभर’ कापड मोजून देत नसे. पक्के गिऱ्हाईक त्याच उंचापुऱ्या नोकराकडून मोजा म्हणायचे. “ मोजून देताना हा दीड ऱ्फूट बांबू मोजणार; आम्ही परत आणले तर हा ताडमाड मोजणार. आणि तुम्ही निम्मेच पैसे देणार ! अरे वा!” असे सिनेमा छाप संवाद म्हणत लगेच दुसरे दुकान गाठले जायचे तिरिमिरीत ! आठवडे बाजारात बरीच वर्षे ही मापाची ‘हस्तकला’ मान्यता प्राप्त प्रथा होती. पण लवकरच हे हातघाईचे मोजमाप बंद झाले.

तराजूंचीही गोष्ट सुरस आणि चमत्कारिक आहे. तराजूची मधली दांडी गोल सळईसारखी असे. त्यावर मध्ये काटा.काटाही स्वयंभू असे. तो मखरात नसे. गिऱ्हाईकाच्या अंगावर हाच काटा येत असे. म्हणजे काय स्थिती असेल बघा तराजूची! वाळलेल्या तांबड्या मिरच्या मोजणाऱ्या तराजूंच्या करामती विचारू नका. तराजू टांगलेले नसत. फक्त किराणा दुकानात दर्शनी एक तराजू टांगलेला असे. त्यात एका तागडीत कायमचे वजन ठेवलेले असे. तुम्हाला पाहिजे असलेल्या भाराचे वजन ठेवल्यानंतरच ते अढळपद लाभलेले वजन काढले जाई. केव्हाही दोन्ही तागड्या रिकाम्या दिसणार नाहीत.”बाजारपेठेत भोसकाऽऽ भोसकी” ही बातमी दुसऱ्या दिवशी आली तर समजायचे की त्याने रिकामी तागडीचा तराजू पाहिला होता !

बहुतेक व्यापारी, भाजीवाले हातात तागडी धरूनच वस्तू मोजून देत.ती त्यांची खरी हात चलाखी. दोन चार वांगी टाकली नाहीत तोवर ते तागडं खाली आलंच. अरे थांब पुन्हा बघू म्हटल्याव एक दोन वांगी टाकायला परवानगी मिळे गिऱ्हाईकाला. काय तो झटका किंवा पुन्हा बघू म्हणल्यावर मधल्या काट्यामागे तळहाताचा जोर लावून तो काटा वस्तुच्या तागडीकडे ढकलला की काटा साष्टांग नमस्कार घालतोय की काय वाटायचे. वा! किती ढळढळीत माप करून घेतले ह्या समाधानात अडीसरीत अदपाव वांगी घेऊन घरी आलो की फुगा फुटायचा.

तिखटाच्या मिरच्या मागितल्या तेव्हढ्या कुणाला मिळाल्या असतील ह्यावर श्रद्धाळू आस्तिकही विश्वास ठेवणार नाही. कुणी स्वस्त देऊ लागला तर “ माप बरोबर देणार ना? “ असे विचारून व्यवहारात किती मुरब्बी आहोत हे दाखवणारेही धडाभर मिरच्याचे पैसे देऊन पासरीभरच घेत आले आहेत! तिथे त्या तिखटाच्या खाटांत, नाक पुसत, शिंकत कुणाचे लक्ष तागडीकडे जातेय! गिऱ्हाईक आल्याबरोबरच विकणाऱ्याची बायको सुपात मिर्च्यांचे तुकडे बिया गिऱ्हाईकाच्या तोंडावर पाखडायला सुरुवात करायची. कधी पोरगं मिरच्याचा डोंगर खालून वर सारखा करायला लागे! साट् साट् शिंकत, रुमाल काढतांना पैशे खाली पडत नाहीत ना ह्या धसक्यात पुन्हा डोळे मिटून शिंकताना धडाभर मिरच्यांनी अर्धी(च)पिशवी भरलेली असे. मिरच्या चांगल्या वाळलेल्या आहेत ना म्हणून पिशवी हलकी लागते असं म्हटल्यावर लहान भाऊ म्हणायचा , “मग तर जास्तच भरल्या पाहिजेत ना?” विषय बदलत, फसलेले वडील आपण पेरू घेऊ या म्हणत तिकडे वळायचे.

हे सगळे फार लहान व्यापारी असत. गुळाच्या दोन चार ढेपी घेऊन बसलेले किंवा भाजी बाजारात गवारीच्या शेंगा,मटार विकणारे तर नैतिक सफाई दाखवत. गुळवाला सुरुवातीला एकदम मोठेच ढेकूळ टाकायचा. आम्हाला आनंद व्हायचा. हा सढळ दिसतो बरं का. मग ते मोठ्ठे ढेकूळ काढून त्याहून बरेच लहान, ते काढून मध्यम आणि वर तुकडा तुकडा, चुरा टाकत निमिषार्धात ती तागडी खाली वज्रासन घालून तिचे कपाळ जमीनीला कधी टेकली समजायचे नाही. कारण तोपर्यंत डबल कागदात तुकड्यां- चुऱ्यासह तो खडा दोऱ्ऱ्याने गुंडाळलाही असे.

हीच तऱ्हा सोन्याच्या भावाचे मटार किंवा जवारी गवारीची. तागडी भसकन् त्या ढिगाऱ्यात खुपसली जायची. शिगोशिग भरलेली तागडी एकदाच दिसे त्यामुळे ती डोळे भरून पाहताना हा इकडे हाताने त्यातली तितक्याच वेगाने भसा भसा खाली टाकत असे. राहिले ते गंगाजळ म्हणत पिशवीत घ्यायची. तोपर्यंत तराजूच्या दोन्ही बाजूला असलेल्या कड्यांच्या भिकबाळ्यांचा आवाज करत तागडी घडी घालून निमूट बसलेली असे. वजनांकडे पाहिले तर अडीसेराची बरोबर असत. “पुन्हा मोज;”थांब थांब; “घाई नको करू “ ह्या विनवण्या प्रत्येक ओट्याकडून ऐकू येत.पण हे असे होणारच. ते भाजीवालेही हे आपले रोज फसवून घेणारे गिऱ्हाईक म्हणून अधून मधून मूठभर घेवड्याच्या शेंगा, तीन चार वांगी “राहू द्या, घ्या, आज बक्कळ हैत” म्हणत पिशवीत टाकत.

मोठ्या व्पापाऱ्यांपुढे किंवा कधी जायची पाळी आलीच तर सराफा- सोनाराकडे, तिथे शब्द काढायची हिंमत नसलेले आम्ही गिऱ्हाईक मंडळी आपला धीटपणा भाजीबाजारात दाखवण्याचा प्रयत्न करीत असू. इतकाच सारांश.

असाच काहीसा प्रकार लाकडाच्या वखारीत व्हायचा. मालकाचा विश्वासू नोकर सरपणाची लाकडे, किंवा साली, बंबफोड तागडीत टाकायचा. खंडी भराची वजने बाहेर ठेवायचा. की लाकडांनी भरलेली तागडी खाली यायची. मग आमच्या सारख्या गिऱ्हाईकाला पाहिजे तितक्या भाराची वजने टाकायचा. काटा पूर्ण मागे जाण्या पूर्वीच लाकडाची चौकोनी तागडी सराईत पणे ओतायचाही!
पावसाची वाट शेतकऱ्यांपेक्षा लाकडाची वखारवाले आतुरतेने पाहात. सुक्याबरोबर चार ओलीही वजनात भर टाकता यायची नां!

लेखकाने शक्यतो तोलून मापून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पण टीकाकार ‘दीड दांडीचा तराजू वापरून’ लिहिले अशी टीकाही करतील. सध्या न्यायालयांचा तराजूही झुकलेला आहे तिथे माझ्यासारख्या छटाकभर लेखणीच्या लेखकाची काय कथा! वजन मापाच्या तपशीलातील चु. भू. द्यावी घ्यावी!

‘एका’ लग्नाच्या गोष्टी

बेलमाॅन्ट

माझ्या आठवणीतील शाळेत शिकलेली व व्यवहारात असलेली वजने मापे, अंतर, मोजण्याची कोष्टके बरीच विसरलो आहे.काही चुकीचीही लक्षात असतील. पूर्वी छटाक, तोळा मासा,अदपाव, अशी बरीच मापे होती. आठवायचीच तर सोन्यापासूनच सुरुवात का नको?


सोने तोलायचे असेल तर गुंजा, मासा,व तोळा ही वजने वापरली जात.८ गुंजा= १ मासा ; १२ मासे = १ तोळा
तोळ्याच्या पुढचेही मोठे वजन असेल. पण ५-६ माशांच्या पुढे सोन्याची कल्पनाच नसल्यामुळे तोळा हेच शेवटचे वजन आमच्यासाठी होते. कित्येक कुटुंबांचा सोन्याचा संबंधही घरातल्या बहिणींच्या लग्नावेळीच येई.


प्रत्येकाला लग्ने काही काव्यात्मक गोष्टींनी लक्षात राहतात. पण काही गद्य भागही लक्षात राहण्यासारखा असतो. त्यातील सगळ्यांत मोठा गद्य पण नाट्यमय भाग म्हणजे लग्नाच्या ‘याद्या’! याद्या करताना दोन्ही बाजूंचे -मुला-मुलीचे- वडील काका मामा किंवा अगोदर झालेले व्याही व असलाच तर घरोब्यातील मित्र. पण मित्र किंवा शेजारी फार क्वचितच असत. शेजारी येतच नसत. कारण नंतर त्यांना उखाळ्या पाखाळ्या काढायला वाव राहात नाही !
राजकीय, परराष्ट्रांच्या किंवा मालक आणि कामगार नेते किंवा उद्योगातील दोन मोठ्या उद्योगपतींच्या वाटाघाटीत जशी मुरब्बी बेरकी लोक असतात तशी लग्नाच्या याद्यांच्या वेळीही दोन्ही बाजूंकडे असे एक दोघे असत.

सुरुवात कोणी करायची व तोंड कुणी, केव्हा,कोणाला कोणत्या बाबतीत, द्यायचे ह्याची रंगीत तालीम, दोन्ही कडचे नानुकाका, आबामामा, गुंडोअप्पा, धोंडोपंत अशी वाकबगार उस्ताद मंडळी, करून आली असत. सगळ्यात खणाखणी सुरु व्हायची जेव्हा मानापानाच्या बाबतीत व हुंडा (रोख) व दागिने किती तोळ्यांचे ह्या मागण्यांचा तिढा सोडवायच्या वेळी होत असे. आवाज चढलेले असत, सभात्यागाच्या नाटकांतील प्रवेश दोन्ही बाजूंकडून होत. मध्येच दोन्ही कडचे प्रमुख वाटाघाटीवाले आणि मुलाचे व मुलीचे वडील आपापल्या विंगेत जाऊन कितपत ताणायचे,कशात किती ढील द्यायची हे ठरवून पुन्हा रंगभूमीवर प्रकट व्हायचे.

त्यातही नाट्य वाढवण्यासाठी कुठल्या तरी एका बाजूच्या मागच्या खोलीतून खाणाखुणांतून बोलावले जायचे! त्यावेळी दोन्ही बाजूच्या आया, लेकाच्या किंवा लेकीच्या सुखासाठी, “आता हे स्थळ तरी हातचे जाऊ देऊ नका!” अशी भरल्या गळ्याने सुचवले जात असायचे. पण दोन्ही कडची पुरुष मंडळी रस्सीखेच, कुस्तीचे डावपेच, रबर किती ताणायचे त्याची लांबी व वेळ हे सगळे कोळून प्यालेले असत. मग कुठल्या तरी सामान्य बाबीत देवाण घेवाण व्हायची. मध्ये पुन्हा चहा यायचा. त्यामुळे पुन्हा तरतरीत होऊन आवाज वाढू लागत.

अखेर किती तोळ्यांचे दागिने, मुला-मुलीचा पोशाख कुणी व काय काय आणि किती म्हणजे शालू कोण घेणार व वरमाईला किती भारी किंमतीचे किंवा पद्धतीचे लुगडे,शाल ह्याची चर्चा. कुणा कुणाचे मानपान कसे करायचे ह्याचीही तपशीलवार बोलणी व्हायची. मग मुलाकडची किती माणसे आदल्या दिवशी व लग्नाच्या दिवशी किती ह्यावर चकमकी झडून एकदा ‘याद्या ‘ नावांचे प्रकरण संपायचे.

याद्या म्हणजे एकप्रकारचा करारनामा किंवा तपशीलवार मान्य कलमे किंवा मिनिटस् म्हणायची. तोंडीपेक्षा लेखी बरे हेच खरे!

याद्यांच्या हातखंडा खेळात नवऱ्या मुलीच्या बापाची स्थिती केविलवाणी व्हायची.; किंवा तशी दाखवलीही जात असावी. परंपरेने चेहरा कीव करावी असा व अंग चोरून बसल्यासारखे बसायचे असल्यामुळे असे होत असेलही. पण वरपक्षाकडील किती माणसे, किती पंगती कोणत्या दिवसापासून आणि मानापानाचे कापड चोपड, सोने किती, हुंड्याची रक्कम ही कलमे आली की मग मुलीचा बाप कितीही तालेवार, ऐपतदार असला तरी याद्यांच्या दिवशी त्याला हाच गरीब कोकराचा अभिनय करत बसावे लागे!

सीमांत पूजन व लग्नाच्या दिवशी वरपक्षाकडील किती माणसे येणार, यावीत ही चर्चा चालली असतांना आणि किती तोळे सोने द्यायचे ही निर्णायक खणाखणी चालू असताना, प्रत्येक वेळी मुलीच्या बापाचे प्राण कंठाशी येत. आवंढे गिळून नंतर नंतर तर गिळण्यासाठी आवंढाही शिल्लक नसे.

काही अनुभवी सांगतात की रुखवताची कोणती भांडी किती, आणि त्यातली चांदीची किती, ह्यावरही रंगात आलेल्या याद्यांचे प्रयोग मध्येच पडदा पाडून थांबवावे लागत! बरे, त्यावेळी रुखवत ही सजावटीची गोष्ट नसे. नाहीतर ठेवला तांबड्या लाईफबाॅय साबणाचा गॅस सिलिंडर किंवा पेनिसिलिन इंजेक्शनच्या व्हायल्सचा ‘असावा सुंदर’ बंगला की झाले रुखवत ! ह्यांचा काळ अजून पाच सहा वर्षानंतर उदयाला येणार होता! पण ह्यावरही काही लग्नाच्या रुखवतात पितळेच्या भांड्यांना चांदीचा मुलामा देऊन चांदीची म्हणून वरपक्षालाही चकवणारे वधूपक्ष होतेच!


लग्नाच्या ‘याद्यां’पासून सुरु असलेले हे युद्ध संपले असे समजू नका. सीमंत पुजनाच्या रात्रीच,लग्नाच्या दिवशीच्या कावेबाज लढाईची सुरुवात होत असे. दोन्ही बाजूंकडील नातेवाईकांची ओळख करून देण्याचा एक कौटुंबिक सोहळा असे. मुलाच्या मामाशी मुलीच्या मामाची, काका-काकांची अशा भेटी सुरू होत. त्यात वधूकडची मंडळी खवचट असली तर तांत्रिक दृष्ट्या अगदी बरोबर असलेला नेमका पोरसवदा मामा मुलाकडच्या मामूमियाॅं शोभेल अशा मामाला भेटवत. वरमंडळी आतून जळफळत पण उद्याचा दिवस आपलाच आहे अशी स्वत:ची समजूत घालत त्या पोरवयाच्या मामाच्या पाठीवर मामूमियाॅं ‘कौतुकाने’जोरदार थाप मारत! तो मामा डोळे पुसत मागे यायचा!


सीमंत पूजनाच्या दिवशी मुलीच्या बापाला घरच्या गनिमांशीही लढावे लागे. ‘ज्येष्ठ जावयांची पुजा’ हा सत्काराचा प्रसंग असे. पण गनिम, लग्नाची तारीख ठरल्यापासूनच आपल्या घरांत,” आम्हाला हजार बाराशेत गुंडाळले आणि आज? कुठून आले एकदम इतके? सोन्याच्या दागिन्यात दोन ‘गिलिटाचे खोटेही घुसडले तुम्ही!” असे म्हणत ज्वालामुखी धुमसत!


यानंतर मग नव्या जावयाची पूजा. त्याला याद्यांबरहुकुम द्यायचा पोशाख,ठरली असो नसो पण मुलीची आई जावयाचे कौतुक करते हे सिद्ध करणारी अंगठी देणे व्हायचे. ठिणगी पडली! ज्येष्ठ जावयांच्या बायका म्हणजेच मुलीच्या थोरल्या बहिणी आत आपल्याच आईशी ,” ह्याला भारी पोशाख आणि वर अंगठी! आमच्या नवऱ्यांना काय दिले होते? आठव! कसला तो सूट आणि काय ती टोपी! विदुषकही घालणार नाही! सगळी गरीबी काटकसर नेमकी आमच्याच वेळी!” इथे स्फुंदणे सुरू… आम्ही साध्या मॅट्रिक ना? पण आमचे नवरे तरी ग्रॅज्युएट आहेत ना? आणि हिचे काय कौतुक चाललेय बघा. साधी इंटर झाली. तेही दुसऱ्या खेपेला. काॅलेजात गेली ना? तिचे राहू दे. पण आई आम्हीही तुझ्याच मुली ना?” इथून मुसमुसून ते ओरडण्यापर्यंतचे आवाज बाहेर मंडपात येऊ लागतात.

लगेच मानभावीपणे ज्येष्ठ जावईही येतात. बायकोची समजुत काढण्याच्या निमित्ताने ते सासरेबुवांची उणीदुणी काढायला लागतात. मुलीच्या बापाला अजुन एक दोन दिवस ‘अल्लाकी गाय’ म्हणूनच वावरायचे असते.तो त्यांची दादाबाबा करीत समजूत काढतो. पण मुली बदल्यात काही मागण्या पुऱ्या करून घेतातच!

दुसरा मंगल दिवस उजाडतो. “ काय तो फराळ?” अहो चहा की रंगीत पाणी? चिवड्यांत तेल,मसाला, शेंगादाणे घालायचे माहित नाही का ह्यांना?” “ माहित आहे हो चांगले. त्यांच्याकडच्या पाव्हण्या रावळ्यांना दिलेला चिवडा संगीत होता! मी पाहून आलो.चकल्याही खुसखुशीत होत्या!” वगैरे संवाद पसरत होते.


मुहुर्त जवळ येतो;तरीही बरेच वेळा नवरा मुलगा आलेला नसे! मुलीचा मामा विंगेत तिला घेऊन एन्ट्री कधी करायची ह्याची वाट पाहात उभा असतो. मुलगी तरी किती वेळ मान खाली घालून अंगठ्याने जमीन उकरत बसणार! बऱ्याच लग्नांत नवरीच्या अंगठ्याची नखं तुटायची!

शेवटी मुलीकडचे जबाबदार नातेवाईक शत्रूच्या गोटात जावे तसे जात आणि कुणाशी बोलून परत येत असे. दोन तोळ्यांची सोन्याची साखळी मिळाल्यावर नवरामुलगा लगेच येईल हा निरोप घेऊन मुलीच्या वडिलांच्या कानाशी लागतो. मुलीचा बाप लठ्ठ असला तरी ताडकन उडण्याचा प्रयत्न करतो. अखेर एक तोळ्याच्या साखळीवर तडजोड होऊन समर प्रसंग टळतो.

मंगलाष्टकांची ती ‘काळरात्र’ येऊ लागते! सर्व उपस्थितांचे कान आपोआप किटावे अशा आवाजातील ‘मंगल संकष्टी’सुरु होते. दक्षिणा घेतली तरी भटजीही माणूसच की. दोन्ही बाजूंची ती चित्रविचित्र आवाजांची चॅम्पियन स्पर्धा केवळ भटजी म्हणून किती वेळ ऐकणार? तो मध्येच ‘ताराबलं चंद्रबलं च…’ सुरू करतो. लोकही मंगलाष्टकांच्या आरिष्टातून सुटल्याचा आनंद टाळ्या वाजवून साजरा करतात. वाजंत्री वाजू लागते.पण बॅन्ड नसल्यामुळे लहान पोरेही तिकडे फिरकत नाहीत. मुलांकडच्यांना मुलीच्या वडिलांना नावं ठेवण्यासाठी हे एक कोलित मिळते.

जेवणाच्या पंगती सुरु होतात. वरपक्षांकडील स्त्रियांना बोलावण्यासाठी मुलीच्या बहिणी-काकू- मावशा-वहिनी ये जा करू लागतात. व पुरुषांना आमंत्रित करायला मुलीचे काका, मामा (आता पोरसवदा नाही; चांगला बाप्या), मुलीचा थोरला भाऊ जात येत असतात. प्रत्येक लग्नात हा भाव खाण्याचा प्रकार म्हणून नाही पण पूर्वीच्या काही वधूपक्षांच्या बेफिकीर व आता काय लग्न ठरले, लागले,कशाला करायची ह्यांची वरवर अशा वागण्यामुळेही नंतरचा वरपक्ष सावध झालेला असतो.

वरपक्षाकडील ‘वगैरे’मंडळी पंगतीत बसलेले असतात. पण वरमाई, वधूची नणंद, आतेसासु असे कोणी व्हीआयपी, वराचे वडील यायचे असतात. त्यांच्या साठी मुलीकडचे तितक्याच तोलाची मंडळी बोलवायला जातात.पुन्हा पैठणी,शालू , इरकली लुगड्याची किंवा काही वस्तुंची मागणी. वधूचे आईवडील,नक्की पूर्ण करू पण जेवून घ्या अशी विनवणी करतात. काही वेळेस हे मान्य होते. काही वेळा वधू कडील पैशांची बाजू माहिती असते. ती ताबडतोबीने मागणी पुर्ण झाल्यावरच मानाची मंडळी पंगतीत बसतात. तरीही पंगत सुरू होत नाही. कारण आता शेवटचे हत्यार उपसले असते. नवरा मुलगा स्वत:च किंवा त्याचे नातेवाईक भरीस घालून त्याला रुसायला लावतात.

पुन्हा विनवण्या. पुन्हा मागणी. जशी दोन्ही कडची कुटुंबाची परिस्थिती दर्जा, तशी मागणी. कुठे व्यवसायासाठी रक्कम, तर कधी मोटरसायकल, तर कुठे सहा व्हाॅल्वचा रेडिओ पर्यंत हा रुसवा खाली येतो. वराचे हे रुसणे म्हणजे निवडणुका ऐन तोंडावर आल्या असतानाच सरकारी नोकरांनी संप जाहीर करण्यासारखेच म्हणायचे. अखेर नवरामुलगा येतो.इतका वेळ रुसलेला मुलगा आता नव्या नवरीला घासही भरवतो. सगळे कसे आनंदी आनंद गडेच होते.

संध्याकाळी मुलगी सासरी जाणार. तर त्याआधी पासूनच मुलगी चांगल्या घरी पडली, एक ओझे उतरले अजून एक धाकटी आहे पण अजून दोन चार वर्षे तरी आहेत ह्यावर समाधान मानत लग्नघरातली आवरा आवरी चालू असते. संध्याकाळ जवळ येते तशी त्यावेळी लग्नाचे राष्ट्रगीत झालेले “जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा” मधील ‘कढ मायेचे तुला सांगती जा’ ह्या ओळीच्या वातावरण निर्मितीस प्रारंभ झालेला असतो. मुलगी धाकट्या बहिणीशी विशेष मायेने बोलत असते. आपल्या आवडत्या वस्तू धाकटीला उदारपणे देत असते. हे करतांना डोळे भरलेले असतात. मग निघण्याचा क्षण आला की घरांतल्या सगळ्यांशी गळाभेटीचा निरोप समारंभ हुंदक्या हुंदक्याच्या तालावर चालू होतो. सगळेच थोडेफार भावुक झाले असतात.

वडील कार्यालयाचे, मंडपवाले, इतर काॅंट्रॅक्टरांचे पैसे चुकते करण्यात मुद्दाम गुंतलेले असतात. मुलगी सासरी मोटारने, सजवलेल्या बग्गीत किंवा साध्या टांग्यातून सासरी जाते. घरातले सगळे पुन्हा पुन्हा मागे पाहात मुलीच्या सासरी लक्ष्मी पूजनासाठी जाण्याची तयारी करू लागतात. —-


—-सर्वसाधारणपणे हे दृश्य सर्व लग्नसमारंभाचे असते.पण काही वेळा ‘कढ मायेचे तुला सांगती, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ हया ओळी बॅन्डवाले वातावरण निर्मितीसाठी वाजवायला लागले की इकडे त्या गाण्याचा अतिशय मोठा परिणाम होत असे. आईच्या डोळ्यातील पाणी संपत नसते, सख्ख्याच नाही तर लग्नाला आलेल्या चुलत मावस मामे आत्ये वगैरे सर्व प्रकारच्या बहिणींना ही मुलगी तरी किंवा ह्या तरी तिच्या गळ्यात पडून रडायच्या थांबत नाहीत.ह्या बहिणींपैकी अनेकजणी हिला वर्षातून एकदोनदाच भेटल्या असतील. पण ‘‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ‘ बॅन्डवर वाजायला सुरुवात झाली की जवळच्या,शेजारच्या, वर्गातल्या मुली एकसाथ स्फुंदू लागतात. हुंदक्यांची लाट पसरू लागते. हे कसेतरी संपवून मुलगी निघावे म्हणते तर काकू मावशी मामी शेजारच्या काकू, दूरच्या नात्यातली एकदा पाहिलेल्या अंबूअक्का,” निघाली का गं माझी सुमीऽ ऽ…! मला न भेटताच चाललीस?” असे म्हणत,मध्ये मध्ये खोकत, येतात. नवऱ्या मुलीला जवळ घेतात. जवळचा शकुनाचा एक रुपया काढून मुलीला देतात. तिच्या तोंडावरून हात फिरवून मुलीने लावलेला ‘स्नो’ ‘आशा’किंवा ‘उटी’ची फेस पावडर पुसून टाकतात!

नवरी मुलगी चिडल्याचे न दाखवता रागावून आत जाते पुन्हा ‘रेमी’ किंवा ‘एकलॅट’च्या स्नोची दोन बोटे फासून बाहेर येते! इकडे बॅन्डवाले ‘ जा मुली जा …’ हीच ओळ वारंवार गाल फुगवून फुंकून फुंकून दमले तरी मुलीला ह्या भेटीगाठींतून कुणी सोडत नसते.नवरी मुलगीच अखेर पुढाकार घेऊन ‘दिल्या घरी सुखी’राहण्यासाठी निघते. सासरी पोचल्यावर तिथले बॅन्डवाले ‘उंबरठ्यावरी माप ठेविले मी पायाने उलटूनी आले’ हे गाणे वाजवायला सुरुवातही करतात! अशा रीतीने एका शुभकार्याच्या मंगल नाट्याचा नेहमीच सुखांत शेवट होतो! इतकेच नव्हे तर अशा नाट्यमय ताणतणावात झालेल्या लग्नाचे संसार सुखाचे झालेले आहेत. टिकले आहेत.

इतकी ओढाताण, मानापमानाचे काहीही तणाव नसताही झालेल्या अलीकडच्या काळातल्या सर्वच लग्नाविषयी असे म्हणता येत नाही.


काय म्हणावे ह्या स्थितीला? “झपुर्झा गडे झपूर्झा” !

भाज्यांतील लोकप्रिय राग

संगीतात यमन, मल्हार, केदार, असे काही राग लोकप्रिय आहेत; त्याप्रमाणे भाज्यांतही लोकप्रिय रागांच्या भाज्या आहेत. काही राग सहज गुणगुणले जातात तशाच काही भाज्याही सहज आपोआप आणल्या जातात!

भाजी आणायला बाजारात जाणे हा एक मनप्रसन्न कार्यक्रम असतो.भाजी बाजार म्हणजे आकाशातील इंद्रधनुष्याच्या मंडपात भरलेली मयसभाच!

पालेभाज्यांचे वेगवेगळ्या छटांतील हिरवे रंग, फळ भाज्यांचे निळे जांभळे पिवळसर दुधी,हिरवे, तांबडे रंग पाहून कोणती घेऊ, किती घेऊ असे व्हायचे.नावे तरी किती घ्यायची. कागद आणि शाई पुरणार नाही इतके पालेभाज्यांचे आणि फळ भाजांचे प्रकार!

आळू-चुका ह्यांचा द्वंद्व समास, चुका-चाकवत, चंदनबटवा ही त्रिमूर्ती ! अंबाडी,करडई किंवा करडी ह्या त्यांच्या नावावरूनच करारी वाटणाऱ्या भाज्या; इतर भाज्यांवर ढाळणाऱ्या हिरव्या चवऱ्या वाटाव्या अशा शेपूच्या पेंड्या, तांदुळसा, राजगिरा,चवळी अशा राजस भाज्या तर मानाची आणि लाडाची मेथी ! तिचे किती कौतुक आजही होते! उखाण्यातून ती संस्कृतीचाही भाग झाली! मेथी आणि पोकळा ह्या विशेष मानाच्या दर्जेदार भाज्या तर असतच, जोडीला मायाळू (ही भाजीपेक्षा भज्यांसाठी जास्त मायाळू होती), आपले वेगळे वैशिष्ठ्य सांभाळत येणारी हादग्याची फुले, थंडीत हरभऱ्याचा हिरवा पाला. (तो वाळवून पुढे केव्हाही त्याची वेळ भागवणारी तातडीची भाजी व्हायची.) ;स्थानिक गावरान पालेभाज्यात नुकताच प्रवेश केल्यामुळे कौतुकाची पण स्वत:ची चव नसलेली पालकाची भाजी. अवचित कुठे तरी शेवग्याची कोवळी पाने व फुलेही भाजी म्हणून दिसायची. ह्यांची भाजी घरोघरी सर्रास होत नसे. तरी बाजाराची शोभा वाढवत. काहींची आवडही पुरवत असतील.

फळभाज्यातील पहिल्या क्रमांकाची , Forever वांगी; भाजीची, भरीताची, काटेरी जांभळी, काटेरी हिरवट, पांढरट, लहान अंडाकृती गोल, तर नुसती पाणथळ लांब जांभळी, भरिताचीही निळी जांभळी,मोठी गोल किंवा लंबगोल, खानदेशी किंचित लांबट पण जाड.हिरवट पांढरसर.आणखीही काही प्रकार असतील. आपला दुधी भोपळा; कोणतीही भूमिका ह्याला द्या, उत्तमच करेल. भाजी, रायते, दुधी हलवा करा वा वड्या करा, चौफेर चविष्ट,व सौम्य आणि सात्विक; पण जहाल पक्षाचे ह्याला नेमस्त, नेभळट म्हणून हिणवतात; घोसाळी,म्हणजे खानदेशातील गिलकी, भाजी करा,भजी करा किंवा वाफून रायते करा, भाज्यांतील नागराज पडवळ, त्याचीही भाजी करा, गोल चकत्या कापून कढीला कर्णफुले घालून तिची मजा वाढवा. अथवा महालक्ष्मीला कोशिंबिरींच्या संख्येचा कोरम पूर्ण करण्यासाठी वाफून कोशिंबीर करा. तांबडा भोपळा. हाही बहुगुणी आहे.भाजी करा, रायते करा, पुऱ्या करा किंवा शास्त्रोक्त घागरे करा. शिवाय दोन दिवस ठेवला तरी ऐन वेळी कामास येणारा हा भोपळा आहे. बरे आकारानेही मोठा. त्यामुळे म्हातारीही त्याच्यात बसून लेकीकडे जाऊन लठ्ठगुठ्ठ झाली तरी परतीच्या प्रवासात त्यात मावायची! भाजीसाठीच नव्हे तर हा काशी भोपळा पेपर तपासताना, मास्तरांच्या खूप उपयोगी येतो.

भोपळ्यांतही नेहमीच्या दुधी भोपळा,काशी भोपळ्यांबरोबरच आज फारसे माहित नसणारे चक्री ,डांगर, देवडांगर हेसुद्धा असत. ही भोपळे मंडळी दीर्घायुषी! टिकाऊ म्हणून प्रसिद्ध होती. पण फारशी घेतली जात नसत. हे दीर्घायुषी असल्यामुळे ह्यांचे रंग बदलत जातात. फिकट पिस्त्यापासून फिकट गुलाबी रंगाच्या छटा ते घेतात.ह्यांची पीठ पेरून किंवा भरपूर तेल घालून व डाळ घालून केलेली भाजी बरी लागे. पण नेहमीसारखी केलेली भाजी श्राद्ध-पक्षाला द्रोण रोवून ठेवण्यासाठीच वापरत!

भोपळ्यांवरून त्यांच्याच नात्यातील एक सामान्य नातेवाईक आठवला. त्याचे नाव किती ओबड धोबड ! ढेमसे किंवा ढेमसं! ढेमसं लहान असताना ती इतकी ‘लहान सुंदर गोजिरवाणी’ दिसतात. सुरेख हिरवा रंग. अदृश्य वाटावी अशी लव असलेली ती ढेमसे कुणीही पोतंभर घेईल! पण थोडी मोठी होऊ लागली की ती निबर दिसू लागत. पण मराठावाड्यातील रखरखीत उन्हाळ्यात पाण्याबरोबरच भाज्यांची आवकही आटली की ही ढेमसंच आपल्या मदतीला धावून येत! चव दुधी भोपळ्यासारखीच. दर्शनही look ही दुध्या सारखेच. पण आकाराने,लहान चेंडूसारखा बसका गट्टम गोल! “ ढेमसं घ्या ना”असे कुणी म्हणाले तर लोक पुढे जायचे. घ्या ना! म्हणणारी भाजीवाली असली तरी! आणि शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे?! त्याला ढेमसं घ्यावी लागत नव्हती म्हणून ही असली वचने सुचली. पण औरंगाबादच्या भाजीवाल्यांनी मात्र ढेमशांचं , कसलीही चळवळ नसतानाही, इतके सुंदर नामांतर केले की लोक ती ढेमसंच आहेत हे विसरून त्यावर उड्या पडू लागल्या! तिथे त्याला ‘दिलपसंद’ म्हणतात! का नाही होणार आपले ‘दिल’ खुष! शेक्सपिअरला म्हणावे बघ एका नावाने आमच्या ढेमशाला श्रीमंती आणि हृदयांत स्थान मिळाले!

त्यानंतर तोंडली. ही कोवळी,ताजी असतांना गोल चकत्या करून करा किंवा सुरेख लांबट, ओठाच्या आकाराची पातळ कापे करून भाजी करा. तेलासाठी फार सढळ हाताची आवश्यकता नाही. ‘हेल्दी’पेक्षा तेल थोडे जास्त टाकले तर तोंडल्यांनाही आनंद होतो. त्यामुळे त्या लुसलुशीत ओठांची माधुरी आपल्यालाही चाखता येते!

सुरवातीला बटाटे नवीन होते तोपर्यंत फार भाव खाऊन होते. पण त्यांच्यापेक्षाही रईस, श्रीमंत काॅली फ्लाॅवर, श्रीमान कोबी आले व गाड्या बरोबर नळ्याची यात्रा न्यायाने फक्त नावाचे आकर्षक नवलकोलही शिरले; तेव्हा मात्र बटाट्यांच्या चेहऱ्याचे भाव बदलले. नवलकोलची नवलाई त्याच्या नावात होती. चवीला पपईपेक्षा काही वेगळी नव्हती. नारळाच्या वाट्यांसारखी कापून, खोवून करीत किंवा कच्च्या पपईसारखी खिसूनही करीत.

थंडीत फ्लाॅवर, कोबीबरोबरच, शेंगावर्गीय असूनही फ्लाॅवर कोबींच्या पंक्तीत मानाने बसले ते मटार ! पुढे जसे ह्यांचे पीक वाढले तसे त्यांनी भाजी म्हणून स्थान मिळवलेच पण पुलाव किंवा मसाले भात त्यांच्याशिवाय शिजेना. मग पोहे उपमा तरी कसे मागे राहतील! प्रत्येकाला आपल्या बरोबर थोड्या का होईना मटारांचा हिरवा सहवास हवासा वाटू लागला. म्हणूनच फ्लाॅवर,कोबी,बटाटे ह्यांची भाजी मटाराशिवाय सुनी सुनी वाटू लागली. आपले पोहे त्यामानाने मटारची इतकी फिकीर करत नसत. त्यांचा जानी दोस्त कांदा त्यांच्याबरोबर सदैव असतो त्यामुळे पोह्यांना मटाराची मातब्बरी वाटत नाही. पण हिरव्या गोड मटारांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांची बेताचा मसाला व तेल घालून थोडा रस ठेवलेली भाजी म्हणा किंवा उसळ म्हणा तिला तोड नाही.तिचे तोंड भरून कौतुक करण्यासाठी मटारला आपले कोडकौतुक पुऱ्यांकडूनच व्हावे अशी इच्छा असते ! थोरा मोठ्यांच्या सहवासात असावे असे सर्वांना वाटते; यामुळेच जो तो मटारांशी निकटचे संबंध ठेवायला धडपडतो. त्यासाठी बटाटे स्वत:ला उकडून घ्यायला तयार होतात तर टोमॅटो स्वत:ला चिरून किंवा प्रसंगी चेचून घेऊन हुतात्मे होण्यासही मागे पुढे पाहात नाहीत.

भेंडीला तिच्या आकारावरून फळभाजीत घ्यावी की शेंगेच्या प्रकारात टाकावी असा प्रश्न पडला होता. चुकीचाही असेल. पण तिला अखेर फळभाजीत स्थान दिले. भेंड्यांविषयी दोन जबरदस्त तुल्यबल पक्ष आहेत.भेंडीच्या बाजूचे तिला सात्विकतेची मूर्ती मानतात. सौम्यपणात तिला प्रतिस्पर्धी नाही म्हणतात. आजाऱ्यालाही चालणारी भाजी म्हणून गौरव करतात. ती नुसती भाजून,मीठ लावून खाऊन तर पाहा असे आव्हानही देतात. तर तेच मुद्दे विरुद्ध बाजूचे तिच्यावर उलटवतात. अहो तिच्याहून सात्विक तर आमचा दुधी भोपळाही आहे. आरोग्यास पोषक गुणधर्म तर त्या नावातच आहे. त्याला उगीच दुधी म्हणत नाहीत! आणि काय हो त्या भेंडीला स्वत:ची यत्किंचितही चव तरी आहे का? मसाला घालून भरली भेंडी करावी लागते! पेंढा भरलेल्या प्राण्यांप्रमाणे. बरे झाले तो Taxidermist करत नाही भरली मसाला भेंडी. म्हणूनच ती जास्त करून घरांपेक्षा हाॅटेलातच केली जात असावी. बरे कुठल्याही प्रकारे तिची भाजी करायची म्हणजे तिचे फार सोपस्कार करावे लागतात! मग ती परतून करा किंवा कधी तिला चिंच गुळाचे वाण देऊन लाडाकोडाने तिची भाजी करा. त्यातही ती स्वच्छतेची अति भोक्ती. सर्जननेच तिच्या भाजीचे ‘ॲापरेशन’ करावे ! तिला दहा वेळा धुवुन पुसून कोरडी ठक्क करूनच मग करायची ती भाजी! बायकांसारखाच भेंडीलाही नट्टापट्टा करायला वेळ लागतो. म्हणूनच तिला लेडीज् फिंगर म्हणत असावेत! नाहीतर चिकटपट्टीपेक्षा चिकट होते ती! तरीही लहान मुलांचीच काय मोठ्यांनाही तिची तेलावर परतून केलेली भाजी आवडते.

षटकोनी गोल चकत्यातील मोत्यांसारख्या दाण्यांनी तर ती ताटातील अलंकारच वाटते!
दोडक्यांना विसरलो तर ‘दुसरे लाडके झाले, दोडक्याला कोण विचारतो’असे पूर्वी बुटबैगण व धारदार कड्यांचे असलेले; पण आता एकदम लंबूटांग आणि त्यांच्या हातापायाच्या शिरांतील धार गेलेले,दोडकेमहाराज तक्रार करतील. ह्याच्या शिरा काढून त्या किंचित भाजून तीळ, वाळलेले खोबरे घालून तेलात परतलेली चटणीही खमंग लागते.त्यामुळे ‘ एका तिकीटात दोन खेळासारखे’ दोडक्यांची चटणी आणि भाजी एकाच वेळी करता येते !

आमच्याकडे बेलवांगी म्हणतात त्याचीही भाजी करतात. पण बेलवांग्याची चटणी चविष्ट असते. ती वाफून त्यात कधी भाजलेले कारळ तर कधी भाजलेल्या तीळाचा कूट किंवा दाण्यांचा कूट घालून केलेल्या चटण्यांना मागणी असते.शिवाय आमसुल चिंचेऐवजी कशातही बेलवांग्याच्या दोन चार फोडी खपून जातात. पण खरी गंमत शेंगाचा कूट घालून केलेल्या करकरीत बेलवांग्याच्या कोशिंबिरीत आहे. आणि जेव्हा कांदे रजेवर असतात तेव्हा बारीक चिरलेली बेलवांगी पोह्यांना वेगळीच मजा आणतात! हो सांगायचे राहिलेच की! बेलवांगी म्हणजे हल्ली ज्याला कच्चे किंवा हिरवे टोमॅटो म्हणतात तेच.

पाले भाज्यांविषयी कितीही लिहिले तरी अपुरेच होईल. त्यांचे विविध प्रकार आणि त्या किती वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात हे लक्षात आल्यावर आपण स्वत:शीच थक्क होतो. त्यामुळे एकच पालेभाजी सलग तीन चार दिवस केली तरीही कंटाळा येणार नाही. किंवा लक्षातही येत नसेल कालचीच आहे म्हणून ! साधा हिरव्या पातीचा लहान कांदा किंवा कोवळ्या ताज्या पानांसकट मुळे घेतले तरी त्यांच्या पानांची किंवा ती पाने घालून केलेल्या भाज्यांच्या प्रकारांचे उदाहरण पुरेसे आहे.त्या शिवाय निरनिराळी सरमिसळ करून केलेल्या पालेभाज्या वेगळ्याच! त्यासाठी चवळी,मूग,मटकी,मुगाच्या डाळीही त्यांच्या सहाय्याला धावून येतात.

फळभाज्यांचीही हीच गंमत आहे.पाले भाज्या, फळभाज्या ह्यांची मोजदाद व त्यांचे प्रकार आणि त्यांचा वापर करून केलेले पदार्थ ह्याविषयी लिहायला कोणत्याही भाषेत पुरेसे शब्द असतील असे वाटत नाही. पालेभाज्यांची पाने मोजण्या इतकेच ते अशक्य आहे ! पण त्यांच्यापासून मिळणारा आनंदही तितकाच अमर्याद आहे. म्हणून ज्यांनी एकदा तरी भाजी बाजारात जाऊन निवांतपणे फिरत भाजी आणली नसेल तर कविवर्य बा.भ. बोरकरही अशांना “जीवन त्यांना नाही कळले हो” असेच म्हणतील! बालकवींनीही बाजारात जाऊन भाजी आणली नसावी. नाही तर त्यांनीही ‘मंडईमाजीं हर्ष मानसी भाजी बहरली चोहीकडे’अशीही एक कविता केली असती!

कागद,शाई आणि वेळ पुरणार नाही इतक्या लिहिण्यासारख्या कैक भाजा अजून कितीक आहेत. म्हणून अखेर थांबायचे.

सृष्टीची विविधता पाहायची असेल तर बाजारात रमत गमत भाज्या पाहात फिरत राहावे.मन आणि डोळ्यांसाठी हा खरा नव नवलोत्सव आहे. ज्याने बाजारात जाऊन, आरामात, घाई न करता फिरत फिरत भाजी आणली नाही तो जगाची प्रदक्षिणा करून आला तरी ती व्यर्थच गेली असे खुशाल समजावे !

भाज्यांमधील अनवट राग!

भाजीऽ!भाजी घ्याऽऽ! आली लई ताजी ताजी.” “ हिरवीग्गार! ताजी फ्फाऽर! कितीत्त्ताजी !” “ सस्ती झाली हो! लई सस्ती लावली वांगी! मेथी घ्या! चुका घ्या!चाकवत घ्घ्या करडीची भाजी घ्घ्याऽऽ ! अशा निरनिराळ्या शब्दांत गुंफलेल्या आरोळ्यांच्या निरनिराळ्या आवाजांनी सकाळ सुरु व्हायची. भाज्यांच्या हातगाड्या, टोपल्या,मोठ्या पाट्या भरभरून भाज्यांची वर्दळ सुरु व्हायची. पाले भाज्या खूप तजेलदार दिसत. वांगी,टमाटे, दुधी भोपळेही चमकत असत! हे दारावर येणाऱ्या भाज्यांचे झाले. भाजी बाजारात(मार्केट) मध्ये गेलो तर मग पहायलाच नको. निरनिराळ्या रंगांच्या भाज्यांची रंगपंचमीच असे. आणि त्यात रविवार असावा. तोही दसरा दिवाळीच्या थंडीतला.मग काय! तिथे असंख्य भाज्यांचे डोंगर रचले जात. सगळे ओटे, फरशा , खाली जमीनीवर भाज्या लिंबं, भाज्या हिरव्या मिरच्या काय काय आणि किती नाना तऱ्हेच्या रंगांच्या भाज्या ओसंडत असत.

त्या मोसमांत आणि एरव्ही सुद्धा भाजी बाजारात जाणे हा सहलीला जाण्याइतकाच मोठा आनंद होता. हा भाजीपाल्याचा तजेलदार रंगीत बाजार पाहून एकच पिशवी आणल्याचा पश्चात्ताप होई.

भाजीतील नेहमीचे यशस्वी कलाकार मेथी, आळु चुका , राजगिरा, करडी/ करडई, शेपू, तांदुळसा, अंबाडी, असतच. पालकाची एन्ट्री अजून व्हायची होती. चुका, चाकवत आणि चंदनबटवा ही च च्या ‘च’मत्काराची त्रिमूर्तीही विराजमान झालेली असे.

संगीतात जसे काही नेहमी न गायले जाणारे अनवट राग असतात तशाही भाज्या असायच्या.
त्यामधील पालेभाज्यातील दोन ठळक नावे म्हणजे माठ आणि घोळ! ही नावेही ज्यांनी ठेवली असतील ते खरेच मिष्किल बेरकी असले पाहिजेत! वाक्प्रचारातला ‘ घोळात घोळ’ ह्या भाजीवरून आला की भाजीचे रूप पसाऱ्यावरून भाजीला हे नाव दिले! ह्या दोन्ही भाज्या एका अर्थाने खऱ्या अपौरुषेय, स्वयंभू म्हणाव्या लागतील. घराच्या अंगणात काही पेरावे लागत नाही की वाफे आळे अशी विशेष सरबराई सुद्धा ह्यांना लागत नाही. आपोआप उगवतात,त्यांची ती वाढतात,पसरतात! माठ व तांदुळसा एकाच जाति प्रकारातला. पण माठाची पाने लहान असतात. घोळाची पाने लहान,गोलसर जाड आणि गुलाबी देठांची. गवतासारखी पसरलेली.

आणखी दोन अनवट भाज्या म्हणजे मायाळू व शुक्रवारच्या कहाणीमुळे प्रसिद्ध झालेली कनीकुरडु किंवा कनी कुरडईची. मायाळूचे वेल असतात. दोन प्रकारचे. एक नेहमीसारखा हिरव्या वेलीचा तर दुसरा गुलाबी देठांचा. पानांची पाठही फिकट, कळत न कळत अशा गुलाबी रंगाची. भाजीही करत असतील पण भज्यांसाठी प्रसिद्ध होती. तशीच कनी कुरडुचीही. आणखी असाच एक भाजीपाला होता. तो म्हणजे पाथरीचा! खरा गावरान! भाजी करतही असतील पण जास्त करून तो थेट मीठ लावून शेंगदाण्यासह खायचा. त्यामुळे भाकरीचा घास आणखीनच चविष्ट लागायचा.

आणखी दोन भाज्यांचा उल्लेख केल्याशिवाय ह्या अनवट रागांतील भाज्यांची मालिका पूर्ण होणार नाही. पठाडीच्या शेंगा आणि चौधारी ! पठाडीच्या शेंगा ह्या साधारणत: आठ-दहा इंच लांब,हिरव्या आणि मऊ असतात. चौधारी ही भाजी की सॅलाडचा प्रकार माहित नाही. कधी खाल्ली नाही. पण आकारामुळे लक्षात राहिलेली आहे. ह्याचीही सहा ते आठ इंच लांबीचे चौकोनी तुकडे/कांड असत. चारी कडांना, फिरत्या दरवाजाला असतात तसे पांढरट हिरवे, उभे काचेचे पाखे किंवा पडदे म्हणा असत. पडदे म्हटल्यावर लगेच फार काही मोठे डोळ्यासमोर आणू नका. कल्पना यावी म्हणून तसे म्हटले. अगदी अरुंद. त्यांच्या कडा अगदी फिकट कोवळ्या हिरव्या असत. त्या पालवीसारख्या वाटत. चौधारी नाव अतिशय समर्पक वाटते. पण म्हणताना मात्र आम्ही ‘चौधरीच्या’ म्हणत असू!
कडवंच्यांच्या विषयी सांगितले नाही तर काहीच सांगितले नाही !

कडवंच्या नावही वेगळे रुपही आगळे! बहुतेक सर्व भाज्याप्रमाणे ह्यासुद्धा हिरव्या रंगाच्याच. लहान; बोटाच्या एका पेराएव्हढ्या. दुधी भोपळ्याला आपण लिलिपुटच्या राजधानीत आल्यासारखे वाटेल. आकार मध्ये फुगीर व दोन्ही टोकांना निमुळता होत गेलेला. दोन लहान शंकू एकमेकाना चिकटवल्यावर जसा निमुळत्या होत जाणाऱ्या इटुकल्या मृदुंगासारखा. पृष्ठभागही रेघांचा. आत मध्ये थोड्या अगदी लहान बिया असतील नसतील इतपत. पण त्यामुळे चावताना कडवंच्या किंचित कुरकुरीत लागायच्या. तेलाच्या फोडणीत परतून तिखट मीठ आणि तळलेले किंवा भाजलेले ऱ्शेंगदाणे घालायचे. भाकरी बरोबर खायला एकदम झकास. थोडीशी कडसर चव असलेल्या ह्या कडवंच्या आपल्या वेगळेपणाने ही भाजी की चटणी असे वाटायची.तरी स्पेशल तोंडी लावणे म्हणून जेवताना मधून मधून खाण्यात गंमत यायची.

रानमेव्यातल्या बोरं पेरू आवळा ह्यातील चिंचा कुठेही सहज मिळणाऱ्या! चिंचा होण्याआधी त्याच्या कळ्या व लहान लहान फुलांचे गुच्छ आल्यावर, त्यांच्या गुलाबी पांढऱ्या बहराने झाड सुंदर दिसायचे. ती कळ्या फुले म्हणजे चिगुर. त्यांच्या बरोबरीने चिंचेची कोवळ्यांपेक्षाही कोवळी पालवी तर खायला किती मजा येते ते सांगता येत नाही. कोवळा चिगुर पालवी खाणे हा सुट्टीतला खरा उद्योग असे. रस्त्याच्या कडेला दिसला आणि हाताशी असला तर सोपेच. नसला तर फांद्या खाली ओढून तो ओरबडून मूठी भरून घ्यायचा. नुसता खाल्ला तरी झकास आणि किंचित मीठ व चवीला गुळ घालून खाल्ला तर खातच राहावा असा चिगुर असे. तर ह्या चिगुराचीही बाजारात आवक होत असे. (काही ठिकाणी चिघोळ,चिगोळही म्हणूनही ओळखत असतील) ह्या चिगुराची, तो व तीळ भाजून केलेली चटणीही खमंग लागते. आणि ती त्या मोसमात अनेक घरात होत असे.

समाजातील विषमता वेगवेगळ्या प्रकारे असते. पण ठळकपणे उच्च, मध्यम व,कनिष्ठ वर्ग ह्यातून दिसतेच. भाज्यांतही हे वर्ग आहेत. कारण आमच्या ह्या माठ,घोळ, पाथरीची पाने, तांदुळसा, आणि चिगुर ह्यांना बाजारात मोक्याच्या जागी प्रतिष्ठित भाज्यांच्या बरोबरीने जागा मिळत नसे. बाजारातील रुळलेल्या मळवाटा सोडून वाकडी वाट करून गेलो तर एखाद्या कोपऱ्यात,जमिनीवर हे विक्रेते साधी पोती, कापड पसरून त्यावर घोळाचे,पाथरीच्या पानांचे,कडवंच्या आणि चिगुराचे लहान लहान ढिगारे ठेवून बसलेले दिसत. विकणारेही ह्या भाज्यांसारखेच साधे व गरीब वाटत. आमच्यासारखे सामान्य माहितगार तिकडे वळले की त्यांचे चेहरे खुलत. ते सावरून बसत. तांदुळसा किंवा माठाची पेंडी, कडवंच्याचे, चिगुराचे एक दोन ढिगारे घेतले की ती गावाकडची मंडळी खूष होत. मग वर एक चिमुटभर चिगुर व चार कडवंच्या आपणहून पिशवीत टाकत! पठाडीच्या शेंगाही ह्यांच्या पथारीवर दिसत. पण क्वचित. पठाडीला ती नेहमी मिळणारी नसल्यामुळे जेव्हा येत तेव्हा त्यांना ओट्यांवर स्थान मिळे. तीच गोष्ट सुंदर हादग्याच्या फुलांची.

आणखी एका भाजीची ओळख करून द्यायची राहिली. ती शेंगाच्या प्रकारातली आहे. ती आजही मिळते पण आमच्याकडे पूर्वी तिचे स्वरूप निराळे व नावही निराळे होते. आज मुळ्याच्या शेंगा ह्या नावाने मिळणाऱ्या लांब शेंगा पूर्वी डिंगऱ्या ह्या नावाने ओळखल्या जात. त्यावेळी त्या अशा लांब नव्हत्या.दीड दोन पेराएव्हढ्याच पण फुगीर. भाजीत रस (पाणी) ठेवायचा. जेवायला बसेपर्यंत त्यांतील हे खमंग रसपाणी थोडेसे ह्या डिंगऱ्याच पिऊन टाकीत. भाजी खाताना रसपाण्याने जास्त टपोऱ्या झालेल्या ह्या डिंगऱ्या खाताना त्यांतील रसाची एखादे वेळी लहानशी चिळकांडी तोंडात उडाली की कृतकृत्य झाल्यासारखे वाटे. आमच्या बहिणीने ह्या डिंगऱ्यांचे रसमधुर बारसे केले होते. ती त्यांना तिखट मिठाच्या जिलब्या म्हणायची!

आज ह्या भाज्या आमच्या गावात मिळतात की नाही माहित नाही. मिळत असतील तर लोक अजूनही भाग्यवान आहेत म्हणायचे. लहान गावात मिळतही असतील. पण शहरातील मंडईत दिसत नाहीत.

मंडईत गेलात आणि ह्या अनवट भाज्यांपैकी काही मिळाल्या तर नमुन्याला का होईना जरूर घ्या. तोंडाला चव येईल !

भेटलेले साधे महाराज

माझी औरंगाबादला बढतीवर बदली झाली. तेव्हा जळगावचे माझे मित्र डाॅ. खटावकर ह्यांनी औरंगाबादच्या जयशंकर महाराजांना एकदा भेटा असे सांगितले होते. कामाच्या गडबडीत व पत्ता नेमका माहित नसल्यामुळे मी काही जयशंकरमहाराजांना भेटू शकलो नव्हतो. कामानिमित्त जळगावला गेलो. डाॅ. खटावकरांशी कामाचे बोलणे झाल्यावर मी निघालो. निघताना मीच म्हणालो, “ डाॅ., जयशंकर महाराजांना कुठे भेटायचे? पत्ता माहित नाही. ते म्हणाले,” औरंगपुऱ्यात आहेत. कुणाचा वाडा ते नेमके माहित नाही.” मी शोधून काढतो,इतके म्हणून दौरा संपवून औरंगाबादला आलो. आल्यावर नुकतेच ओळख झालेले व पुढे चांगले घरोब्याचे मित्र झालेले अनंतराव देशपांड्यांना जयशंकर महाराजांचा पत्ता विचारला. त्यांनी अंदाजाने सांगितला.

मी गेलो. ते राहात होते त्या वाड्यात गेलो. जुना वाडा. मोडकळीला आला नव्हता तरी तसा वाटत होता. आत गेल्यावर बाजूच्या ओवरीत छपरापर्यंत सरपणाची लाकडे भरून ठेवलेली. आजूबाजूलाही काही पडलेली. त्यातच एका कोपऱ्यात, बाजेवर थोडीशी वाढलेल्या पांढऱ्या दाढीचे म्हातारे गृहस्थ झोपलेले होते. तोंडात दातही फारसे नविहते. पण चेहरा हसरा होता.त्या काळात सर्रास वापरात असलेली चट्यापट्याची नाडीची अर्धी चड्डी घालून झोपलेले म्हातारे गृहस्थ दिसले. मी आत गेल्याबरोबर ते हसऱ्या चेहऱ्याने “जयशंकर”म्हणून गप्प झाले.

थोड्या वेळाने आतल्या बाजूने श्री.दातार व सौ.दातार आल्या. त्यांनी माझी चौकशी केली. दातार राज्य सरकारी नोकरीत साध्या पदावर असावेत. दोघे पतिपत्नी शांत,सौम्य पण समाधानी दिसत होते. हे जयशंकरमहाराजांची काळजी घेत होते. मी वारंवार नाही तरी काही वेळा जयशंकरमहाराजांना भेटून येत असे. ते माझी कसे काय चाललंय, मुलांची चौकशी करायचे. पण जयशंकर म्हणण्यात ते रमत असावेत असे वाटले. मध्येच ते मोठ्याने जयशंकर म्हणत. काही वर्षानंतर दातारांनी जागा बदलली व सरस्वती काॅलनीत राहायला आले. ही जागा जास्त प्रशस्त,मोकळी व व्यवस्थित होती. मी जयशंकरमहाराजांना भेटायला जाई तेव्हा दोघेही दातार सौम्य हसत स्वागत करीत. महाराजांपेक्षा अर्थात त्यांच्याशीच जास्त बोलणे होई. एकदोन वेळा मी सुधीरला घेऊन गेलो होतो. सुधीरला पाहून जयशंकरमहाराजांना आनंद झाल्याचे दिसत होते. त्याला ते जवळ बसवून पाठीवर किंवा डोक्यावर हात फिरवत.

अनंतराव देशपांडेसाहेबांनी मला जयशंकर महाराजांविषयी माहिती सांगितली ती ऐकण्यासारखी आहे. ती ऐकल्यावर जयशंकर महाराज महाराज का हे पटू लागले. ते सांगत होते,” मेवाड हाॅटेलचा मालक जयशंकरमहाराजांना रोज सकाळी हाॅटेलात घेऊन जात असे. आजही जात असतील कदाचित. तिथे त्यांना गल्ल्यावर बसवित. जेव्हढा वेळ ते हाटेलात गल्ल्यावर असत तोपर्यंत ते येणाऱ्या प्रत्येक भिकाऱ्याला गल्यातून पैसे देत. ते कुणाला किती देत तिकडे मेवाडचे मालक पाहात नसत. मग महाराज म्हणाले निघायचे की मालक त्यांना घरी आणून सोडत असे. हे किती तरी वर्षे चालू होते. आजही असेल कदाचित. रोज नसेल पण केव्हा तरी तो महाराजांना घेऊन येत असेलही.” मेवाड हाॅटेलच्या बरकती मागे जयशंकर महाराजांच्या कृपेचाही मोठा भाग असणार.

ही १९७२-७५ व त्यानंतरच्या काही वर्षातील हकीकत आहे. जयशंकरमहाराजांची सर्व प्रकारे काळजी दातार दांपत्याने मनापासून घेतली. जयशंकरमहाराजांनी मेवाडच्या हाॅटेल मालकाच्या श्रद्धेला किती सफळ सुफळ केले असेल त्याची इतर काही माहिती नाही. पण त्यांचे आणखी एक हाॅटेल सुरू झाले. गुलमंडीवरचे रेस्टाॅरंट जोरात चालतच होते. हे मात्र पाहिले आहे.

माझ्या बाबतीत काहीही चमत्कार घडला नाही. पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटत असे तेव्हा एकदाही माझ्या मनांत त्यांनी मला हे मिळवून द्यावे, असे घडावे असला विचार कधीही येत नसे.बहुधा,मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला ते महाराज वगैरे काही वाटले नव्हते. ह्यामुळेही कदाचित मला त्यांच्याकडे काही मागावे असे वाटले नसेल! पण मला बरे, शांत वाटत असे हे खरे. मी फक्त त्यांना भेटल्यावर व निघतांना नमस्कार करीत असे. ते फक्त नेहमी हात वर केल्यासारखा करून हसतमुखाने जयशंकर म्हणत.

अनंतराव देशपांडे ह्यांनी अशीच हकीकत बाळकृष्ण महाराजांसंबंधी सांगितली होती. औरंगाबादच्या अप्पा हलवाईंचा प्रसिद्ध पेढा हा बाळकृष्णमहाराजांचा कृपाप्रसाद आहे असे देशपांडेसाहेब म्हणाले होते. बाळकृष्णमहाराजांची समाधी अप्सरा टाॅकीजसमोरच्या भागात आहे. तीही मी जाऊन पाहिली.

हे लिहित असता एक लक्षात आले आणि ते आल्यावर माझ्या हातून केव्हढी मोठी चूक झाली, केव्हढा अपराध घडला ह्याची जाणीव झाली. शंभर थोबाडीत मारून घ्याव्यात असे वाटले. सुरवातीला तरी मी बरेच वेळा दातार साहेबांच्या घरी जयशंकर महाराजांच्या दर्शनासाठी गेलो असेन. पण मी त्या दोघांना एकदाही ,” आमच्या घरी चहाला या.” असे म्हणालो नाही! आता मी माझे मलाच ‘करंट्या’ शिवाय काय म्हणणार!

त्या दोघांनी कित्येक वर्षे जयशंकरमहाराजांची सेवा करण्यात व्यतीत केली असल्यामुळे दातार मला उदार मनाने क्षमा करतील अशी प्रार्थना करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही. जयशंकर!

शर्यत

एक मुलगा होता. अत्यंत जोरात पळायचा. उत्तम धावपटू होता. शर्यतीत भाग घ्यायची तीव्र इच्छा होती. त्याचे आजोबा होते. त्यांनाही नातवाचे कौतुक होते.


दुसऱ्या गावात पळण्याची शर्यत होती. मुलाने त्या शर्यतीत भाग घेतला. गावातल्या मुलांबरोबर तो गेला.आजोबानाही राहवले नाही. नातवाची शर्यत पाहायला तेही त्या गावात पोचले.


नातवाच्या बरोबर दोघे स्पर्धक होते. शर्यत सुरु झाली. नातू आणि एक मुलगा चांगल्या वेगाने पळत होते. तिसरा मागे पडू लागला. हे दोघे अटीतटीने पळत होते. लोक श्वास रोखून पाहात होते. कोण जिंकेल ह्याची उत्सुकता वाढत होती. आजोबा शांत होते. नातवाने शर्यत जिंकली. लोकांनी मोठ्या आनंदाने आरोळ्या ठोकून शिट्या टाळ्या वाजवून मुलाचे कौतुक केले. मुलाची मान ताठ झाली. स्वत:च्या पराक्रमाने त्याची छाती फुगली.आजोबा शांत होते. त्यांनी नातवाच्या डोक्यावरून हात फिरवून कौतुक केले.

दुसरी शर्यत जाहीर झाली. ह्या खेपेला दोन नव्या दमाची ताजीतवानी मुले नातवाबरोबर शर्यत खेळायला उतरली. नातू पहिल्या विजयाने अधिकच जोमात आला होता. शर्यत सुरू झाली. दोन्ही नवे धावपटू जोशात होते. त्यांनी नातवाला मागे टाकायला सुरुवात केली. आजोबा पाहात होते. नातू आता इरेला पेटला. सगळे कौशल्य शक्ति पणाला लावून धावू लागला. तिघे जातिवंत धावपटू एकाच रेषेत बरोबरीने पळू लागले. अंतिम रेषा जवळ येऊ लागली. नातवाने मान खाली घालत जोरदार मुसंडी मारून अंतिम रेषा लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात ओलांडली. किती वेळ टाळ्या शिट्या वाजत राहिल्या होत्या! नातू धापा टाकत होता. जग जिंकल्याच्या ताठ्यात उभा होता. आजोबांच्या जवळ येऊन उभा राहिला. आजोबांनी शाबासकी दिल्यासारखा त्याच्या पाठीवर हात थापटला.

नातू ‘इजा बिजा आणि आता तिजा’ जिंकण्याच्या इर्षेने,“पुन्हा एक शर्यत होऊ द्या !” म्हणून ओरडू लागला. आजोबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवित त्याला शांत करीत ते पुढे गेले. ह्या खेपेला आजोबांनी पुढाकार घेऊन एक अशक्त, दुबळी म्हातारी व एका आंधळ्याला शर्यतीत उतरवले. नातू थोड्या घुश्शातच म्हणाला,”आजोबा! ह्यांच्याशी मी, मी,ह्यांच्याशी शर्यत खेळू?” आजोबांनी एकाच शब्दात त्याला सांगितले,” खे-ळ.”

शर्यत सुरू झाली. मुलगा जरा घुश्शातच होता. त्याच्या वेगाने धावत सुटला. अंतिम रेषा पार केली. शर्यत जिंकली. दोन्ही हात वर करून ओरडत नाचू लागला.लोक गप्प होते. ना टाळ्या ना शिट्या ऐकू येत होत्या. मैदान शांत होते. अशक्त दुबळी म्हातारी मोजून एक दोन पावलेच पुढे आली होती. आंधळा जागीच उभा होता. नातवाचा चेहरा पडला होता.आजोबाजवळ आला. ,” मी शर्यत जिंकली पण लोक आनंदाने ओरडले नाहीत की टाळ्या वाजवून कौतुक केले नाही!” आजोबा शांत होते. ते नातवाला घेऊन पुन्हा शर्यतीच्या प्रारंभ रेषेकडे गेले. त्यांनी नातवाला त्या दोघा स्पर्धकाकडे तोंड करून उभे केले. काहीही न बोलता आजोबा हळू हळू आपल्या जागी गेले. नातू सुरुवातीच्या रेघेवर उभा राहिला.

शर्यत सुरु झाल्याचा इशारा झाला.सुरुवातीला सवयीने नातू पळणारच होता. एक दोन पावले त्याने तशी जोरात पुढे टाकलीही. पण लगेच तो दुबळ्या म्हातारीच्या व आंधळ्या माणसाच्या मध्ये जाऊन उभा राहिला.त्याने त्या दोघांचे हात धरले. तो त्यांच्या बरोबरीने चालू लागला. तिघेही चालू लागले. हलकेच एक दोन टाळ्या वाजल्या. मग तिघांच्या पावलांच्या ठेक्यावर त्या वाजू लागल्या. तिघांनीही हात धरून अंतिम रेषा ओलांडल्यावर कौतुकाच्या टाळ्यांचा पाऊस पडू लागला. लोक आनंदाने नाचू लागले.

“आजोबा,कुणासाठी टाळ्या वाजवताहेत लोक? कुणी जिंकली शर्यत? “ नातू विचारत होता. “ बाळा, लोक शर्यतीला टाळ्या वाजवताहेत.” आजोबा शांपणे म्हणाले. “बाळ तू जोरदार धावतोस. शर्यती जिंकतोस. पण फक्त शर्यत जिंकण्यालाच महत्व नाही. शर्यत कशी पळतोस ते महत्वाचे आहे. आयुष्यात शर्यत जिंकणे हेच एक सर्वस्व नाही. ह्या शर्यतीत दीन दुबळ्यांना आधार देत पळणे हीच जिंकण्याहून मोलाची गोष्ट आहे.”

(इंटरनेट वरील एका लहानशा इंग्रजी बोधकथेवरून ही विस्तारित कथा केली.)