Author Archives: Sadashiv Kamatkar

भगवंताने भक्तासाठी किती करावे!

शीव/चुनाभट्टी

हरिकृष्णाने आपल्या सगळ्याच भक्तांना मदत केली. नरसी मेहतासाठी मात्र तो वेळोवेळी धावून गेला आहे. ठळक आख्यायिका आणि कथांवरून तो दोन तीनदा तरी धावून गेला असे दिसते. खरे तर भक्ताला तो सतत आपल्य पाठीशी आहे ह्याची खात्री असते .पण लोकांना मात्र त्याचा परिणाम दिसल्यावाचून खात्री पटत नाही. श्रीहरीने नरसी मेहत्याची पत राखली. प्रतिष्ठाही वाढवली.


नरसी मेहत्याचा जन्म जुनागडला नागर ब्राम्हणाच्या पोटी झाला. नरसी मेहताची रीतीप्रमाणे मुंज झाली. पण त्याच्या नशिबी आई वडीलांचे सुख नव्हते. मुंज झाल्यानंतर त्याच्या चुलत भावाने त्याचा सांभाळ केला.


बालसुलभ स्वभावाप्रमाणे नरसीचे लक्ष गल्लीतल्या मुलांबरोबर खेळण्या हुंदण्यात जास्त होते. तो आणि त्याचे सवंगडी कोणते खेळ खेळत ते आपण संतकवि महिपतीबुवांच्या ओव्यांतूनच ऐकू या. आज यातले अनेक खेळ लुप्त झाले आहेत. लगोरी लपंडाव विटीदांडू आपण आता आतपर्यंत खेळत होतो. भोवराही फिरवत असू. पण महिपतीबुवांनी वर्णिलेले खेळ १८व्या शतकातील आहेत. किती विविध तऱ्हेचे आहेत!

“गावची मुले खेळती सकळ।। इटीदांडू लगोरिया। चुंबाचुंबी (!) लपंडाया। हमामा हुंबरी घालोनिया।पाणबुडियां खेळती।।वाघोडी आणि आट्यापाट्या।झिज्या बोकट अगलगाट्या। भोवरे चक्रे फेरवाट्या ।देती काट्या सत्वर।।”

असे रोज निरनिराळे खेळ खेळून हुंदडून पाण्यात पोहून डुंबून तो एकदा खूप दमला.तहान लागली.घरी आला. वहिनीला पाणी मागितले. तिने पाणी दिले पण,” नुसते दिवसभर गावात गप्पा मारत टवाळ्या करायच्या. खेळायचे हुंदडायचे आणि घरी येऊन फुकटचे हादडायचे! काम नको, कमवायला नको. भावाच्या जीवावर बसून आयते खायचे!” हे सुद्धा ऐकवले.किती बोलावे तिने! काय काय ऐकवले तिने नरसीला!

नरसी मेहता आवंढ्यांबरोबर पाणी प्याला खरे पण तो रडवेला होऊन तिरिमरीत घरातून निघाला तो थेट गावाबाहेर दूर चारपार मैलावर असलेल्या अरण्यात गेला. एक जुनाट महादेवाचे देऊळ दिदसले. पिंडीला मिठी मारून तो ढसढसा रडू लागला. आणि पिंडीवरच डोके टेकून झोपी गेला. अन्नपाण्यावाचून तो सात दिवस तसाच पडून राहिला.

शंकराला दया आली. त्यांनी नरसीच्या खांद्याला धरून हलवले. उठवले. “बाळ काय पाहिजे तुला? हवे ते माग!“ नरसी खराच लहान म्हणायचा. तो म्हणाला, शंभोमहादेवा, मी लहान आहे. काय मागायचे ते मला समजत नाही.” “ अरे पण तुला काही तरी हवे असे वाटत असेल की!” शंकर असे म्हणाल्यावर नरसी म्हणाला,” शंकरदेवा मी काय मागायचे ते मला खरच समजत नाही. नाही तर असे कर ना? तुला प्राणाहूनही प्रिय असेल ते मला दे !” नरसीचे हे मागणे ऐकल्यावर शंकराला त्याच्या चतुराईचे कौतुक वाटले. भोलेनाथ आनंदाने म्हणाले,” मला कृष्ण फार प्रिय आहे. तोच तुला मी देतो. चल.” इतके बोलून शंकराने नरसीला गोपीचा वेष दिला. चांगले नटवले. त्याचा हात धरला व क्षणार्धात त्याला घेऊन गोकुळातल्या कालिंदी काठी आले.


तिथल्या सुंदर उपवनात श्रीकृष्ण गोपींबरोबर रास लीला करत होते. (त्या रासक्रीडेचे बरेच स्पष्ट वर्णन महिपतीबुवांनी केले आहे.) प्रत्येक गोपीच्या मनात कृष्ण आपला व्हावा ही इच्छा झाली की कृष्ण तिला आलिंगन देऊन तिथे रमायचा. गोपी मथुरेहून आल्या. वृंदावनातून आल्या. गोकुळच्याही होत्या नव्हत्या सर्व येऊ लागल्या. तस तसे श्रीकृष्णही तितकेच होऊ लागले. प्रत्येकीचा श्रीकृष्ण रासक्रीडा करू लागला.रासक्रीडा रंगात आली होती. शंकराने हळूच गोपी-नरसीलाही त्यांच्यामध्ये सोडले.

स्वत: कृष्ण ह्या नव्या गोपीजवळ आले. निरखत पाहात म्हणाले,” तू गोपी काही इथली दिसत नाहीस.तू तर मला नरसी दिसतोस जुनागडचा. भगवान शंकर कुठे आहेत ?” असे म्हणतच कृष्ण नरसीगोपीला घेऊन शंकराजवळ आले. शंकर म्हणाले ,”कृष्णा हा माझा भक्त नरसी आता तुझा झाला.” हे ऐकताच नरसीने कृष्णाच्या पायावर डोके ठेवले. कृष्णाने त्याला वर उठवले.त्याला मिठी मारून त्याला आपला केले. ते नरसीला म्हणाले, नरसी आता तू निश्चिंतपणे जा. मी आता तुला माझा म्हटले आहे. आता तू माझा आणि मी तुझा.” आणि हो,नरसी, इथले रासमंडळ, रासलीला तू स्वत: पाहिली आहेस. हे सर्व तू कवितेत लिहून काढ.” गुजराती ऱ्भाषेत नरसी मेहत्यांनी कुंजवनात पाहिलेला रासमंडळ कवितेत लिहून काढले.त्याचे “रासमंडळ” काव्यग्रंथ आजही गुजराथमध्ये आवडीने वाचला जातो.

नरसी मेहताला शंकराने पुन्हा जुनागड जवळच्या जंगलातील जुन्या शंकराच्या देवळात आणून सोडले व ते गुप्त झाले.

शंकराचा हा वैष्णव भक्त तिथे हरिनाम घेत हरीचे कीर्तन करू लागला. सगळीकडे इथे एक वैष्णव हरीकृष्णाचे फार मधुर कीर्तन करतो ही बातमी पसरली. नरसी मेहत्याचा भाऊही तिथे आला. त्याने आपल्या नरसीला लगेच ओळखले. मोठ्या प्रेमाकौतुकाने घरी नेले.


नरसी मेहता,महान नरसी भगत म्हणून ओळखला जाऊ लागला. घरचा व्यवसाय अंगावर पडला तरी त्याने तो आपल्याला चिकटू दिला नाही. यथावकाश नरसी मेहत्याचे गावातल्याच एका वैष्णवाच्या मुलीशी लग्न झाले. संसार रोजच सुखाचा होऊ लागला. नरसी मेहत्याला एक मुलगा आणि मुलगीही झाली. संसार फळाला आला.


दिवस वर्षे भराभर जात होती.नरसी मेत्याचा मुलगाही लग्नाचा झाला. नरसी मेहत्याच्या मुलाच्या लग्नाचा सोहळा पाहावा ऐकावा तितका अदभुत आहे. तोही आपण पाहू या.

सदाशिव पं. कामतकर

नरसी मेहत्याची हुंडी

शीव/चुनाभट्टी

श्यामापुरात नरसी मेहत्याच्या मुलाचे लग्न थाटामटात पार पडले.नव्या लक्ष्मीसूनबाईला घेऊन सर्वजण आपल्या जुनागडच्या घरी आले.आपला भक्त नरसी मेहत्याचे लोकांत कमीअधिक दिसू नये ह्यासाठी भगवान त्याचा व्यवहारिक योगक्षेमही चालवत होते.

एकदा द्वारकेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा जथा जुनागडात रात्री मुक्कामासाठी उतरला. धर्मशाळेत,देवळांमध्ये आपापली व्यवस्था लावून यात्रेकरू झोपले.सकाळी
सर्वजण उठले. कामाला लागले. एका यात्रेकरूजवळ मोठी रक्कम होती. प्रवासात रोकड नेणे सुरक्षित नाही म्हणून तो गावात सावकाराची पेढी शोधू लागला.काही लोकांनी नरसी मेहत्याचे नाव बद्दू करण्यासाठी यात्रेकरूला नरसी भगतचे नाव सुचवले. नरसी मेहत्याचे ते गुणवर्णनही करू लागले. ते यात्रेकरूला सांगू लागले ”अहो नरसी मेहता सावकार हा प्रेमळ भक्त आहे. सधन,नामवंत आहे.त्याचे वैभव विचारू नका.त्याच्याकडे जा; तुमचे काम झालेच समजा!” नरसी मेहत्याविषयी इतके चांगले ऐकल्यावर त्याने नरसीची पेढी घर कुठे आहे ते विचारले. त्यावर सगळे एकमुखाने सांगू लागले,
“पताका आणि वृंदावन। गरूडटके हरिकीर्तन। नरसी मेहत्याचे सदन। तेचि तू जाण।।”

यात्रेकरू नरसी मेहत्याच्या घराजवळ जसा आला तसे त्याला हरिनाम संकीर्तनाचे गोड सूर कनावर आले.यात्रेकरू खुणेबरहुकुम नेमका नरसी मेहत्याच्या घरी आला. सांगितलेले वैभव काही दिसेना पण वातावरण कुणाचेही मन प्रसन्न करणारे होते. वृंदावन मोठे होते. वैजय्ंतीही बहरली होती. समोरच विष्णुभक्त नरसी हरिकृष्णाला “तूच आमचा आनंदघन दयाळा, भक्त भूषण पांडुरंगा, सकळ देवांत तूच वरिष्ठ, भक्त वत्सला पांडुरंगा! हरेकृष्णा मायबापा! म्हणत त्याने दंडवत घातले. उठून पाहतो तर समोर यात्रेकरू उभा! यात्रेकरूने नमस्कार करण्या आतच नरसीने त्याला लवून नमस्कार केला. “ काय काम काढले माझ्यासाठी?” असे नरसीने विचारल्यावर लोकांनी नरसी मेहता किती मोठा सावकार आहे;त्याचे वैभव अमाप आहे; तुम्ही त्याच्याकडेच जा काम होईल असे सांगितल्यावरून मी तुमच्याकडे आलो आहे असे यात्रेकरू म्हणाला. लोकांनी आपली फजिती करण्यासाठीच ह्याला आपल्याकडे पाठवून दिले हे नरसी मेहत्याच्या लक्षात आले. मुलाला गूळ पाणी आणायला सांगितले. ते यात्रेकरूला दिले. मग यात्रेकरूने सातशे रुपये घेऊन त्याची हुंडी करून द्यायला सांगितले. आली का पंचाईत! पण द्वारकाधीशावर भरोसा ठेवून त्याने यात्रेकरूला सातशे रुपये वृंदावनाजवळ ठेवायला सांगितले. हुंडी लिहून दिली.

यात्रेकरूने नरसीचे”वैभव” पाहिले होते. मोठा सावकार पण त्याच्या ओसरीवर गाद्या लोड तक्के नव्हते हेही लक्षात आले. इतक्यात नरसीने यात्रेकरूला इतर यात्रेकरूंनाही घेऊन यायला सांगितले. मुलाला बोलावून गावातल्या लोकांना आणायला सांगितले.
गावकरी आले. इतर सर्व यात्रेकरूही आले.मुला जवळ सातशे रुपये देऊन यात्रेकरूंसाठी धोतर,लुगडी,पांघरुणे आणायला पिटाळले.तर सर्वांसाठी प्रसादही करायला सांगितला. त्या यात्रेकरू समोरच नरसी मेहत्याने सातशे रुपये खर्च करून संपवलेही होते.

यात्रेकरूने नरसीच्या हुंडीकडे पाहात विचारले.” सावकार , “तुमचा द्वारकेचा गुमास्ता आहे त्याचे नाव काय?” नरसी म्हणाला,” त्याचे नाव सावळसा सावता! गुमास्ता असला तरी त्याच्या पेढ्या पुष्कळ आहेत. मुख्य पेढी द्वारकेला. इतर दुकाने गोकुळ वृंदावन मथुरा इथेही आहेत. त्याची आणखी एक मोठी पेढी पंढरपुरला आहे. आणि नंतर हळूच म्हणाला मूळ पेढी क्षीरसागर येथे आहे!”
यात्रेकरू निघाला. पण विचार नरसीने दिलेल्या हुंडीचाच करत होता. “ हा नरसी मेहता तर सावकार वाटत नाही. नाही दिसण्या वागण्यात ना व्यवहारातही. कुणी चिटपाखरू आले नाही तिथे दिवसभरात! आणि मूळ पेढी क्षीरसागरला काय आणि गोकुळ मथुरेलाही गुमास्त्याच्या पेढ्या आहेत म्हणतो. कमाल म्हणजे पंढरपुरलाही मोठी पेढी आहे म्हणे. इकडचा कोण यात्रेकरू दूरच्या पंढरपूरला जातो! हुंडी तरी खरी आहेका? माझे पैसे बुडालेच म्हणायचे. बरे परतताना सातशे रुपये परत घ्यावे म्हटले तर ह्याने ते आपल्या समोरच खर्चून टाकले. समुद्रात एकदा विरघळलेले मीठ परत येते का? एकदा नदी समुद्राला मिळाली की ती समुद्राचीच झाली! तसे माझे पैसेही गेले ते गेलेच!बुडाले!”

यात्रेकरू द्वारकेत आला. द्वारकाधीशाचे डोळे भरून दर्शन घेतले. दर्शन झाल्यावर तिथल्या दोन पुजाऱ्यांना त्याने “इथे सावळसा सावता नावाचा गुमास्ता कुठे असतो?” विचारल्यावर असा कुणी गुमास्ता इथे नाही असे पुजाऱ्यांनी सांगितले. मग गावात एक दोन व्यापाऱ्यांना विचारले की सावळसा सावता गुमास्त्याची पेढी कुठे आहे? तर ते हसू लागले. “अरे कोण कुठला सावता? इथे असा कुणीही गुमास्ता नाही!” हे ऐकल्यावर तो रडायचाच बाकी राहिला होता. व्यापाऱ्यांनी,”अशी हुंडी कुणी दिली?” विचारल्यावर त्याने नरसी मेहत्याने दिली सांगितल्यावर तर ते खो खो हसू लागले! “तुला दुसरा कुणी भेटलाच नाही का तिकडे? पैसे बुडाले तुझे.” हे पूर्ण ऐकायलाही तो यात्रेकरू थांबला नाही. तो एका जुनाट वाड्याच्या ओट्यावर डोक्याला हात लावून बसला. त्याला खाणे सुचेना, पिणे रुचेना. हुंडीकडे वेड्यासारखा पाहात होता.

इतक्यात एक दिमाखदार चार घोड्यांचा रथ येताना दिसला. वाड्यावरून पुढे गेला. पण लगेच मागे फिरला. यात्रेकरूजवळ येऊन थांबला. त्या चकाकणाऱ्या रथाकडे व शुभ्र घोड्यांकडे तो पाहू लागला. रथातून एक मोठी सावकारी पगडी घातलेला, रेशमी धोतर व रेशमी लांब कोट त्यावर सोन्याच्या दोन साखळ्या व छातीवर कौस्तुभमण्याचा कंठा घातलेला, कानात पाणीदार मोत्यांची भिकबाळी, हातात चांदीची मुठ असलेली चंदनाची काठी घेतलेला,खरा श्रीमंत दिसणारा सावकार उतरला. त्याने यात्रेकरूला इथे ओसाड जागी का बसलास? येव्हढा खिन्न का? असे विचारल्यावर नरसी मेहत्याने सावळसा सावता गुमास्त्याच्या नावे दिलेल्या हुंडीची हकाकत सांगितली. आणि “नरसी मेहत्याने सावळसा सावत्याच्या नावावर मला फसवले. तो सावळसा सावता शोधून सापडत नाही ही सर्व हकीकत एका दमात सांगितली”. त्यावर त्या सावकाराने हसत हसत ,” अरे मीच तो सावळसा सावता. माझ्या नरसी मेहत्याचा गुमास्ता!”

हे ऐकल्यावर सातशे रुपयात अडकलेल्या त्याच्या जीवात जीव आला. हुंडी त्याने सावता गुमास्त्याला दिली.सारथ्याला रथातून थैली आणायला सांगितली . प्रथम गुमास्त्याने नरसी मेहताने दिलेली हुंडी डोळे मिटून कपाळाला लावली. मग थैलीतून सातशे कलदार नाणी काढून यात्रेकरूला दिली.
नाणी पाहून यात्रेकरुला आनंद झाला. आश्चर्य वाटत होते ते त्याने मोकळेपणाने उघड केले. यात्रेकरूने विचारले, “तुम्ही नरसीचे गुमास्ते आहात पण तुम्हीच घरंदाज गर्भश्रीमंत सावकार दिसता. आणि नरसी बघा! हे कसे?” त्यावर सावकार प्रसन्न हसत म्हणाला, का ह्यात काय विशेष ?

अहो कृष्ण कसा आणि त्याचा शाळासोबती सुदामा कुठे! गोकुळात कालिंदी काठी खेळणाऱ्या बाळकृष्णाची सर कुणाला येईल का? आणि त्याचा खेळगडी बोबडा लंगडा पेंद्या कुठे? पण गवताच्या काडीसारखा सुदामा आणि बोबडा पेंद्या कृष्णाचे जिवलग सखे नव्हते का? मग मी असा आणि नरसी भगत कसा म्हणण्यात काय अर्थ?” असे म्हणून परतताना तुझी भेट झाली तर नरसी मेहताला माझा नमस्कार सांग म्हणत गुमास्ता सावळसा सावता वैभवशाली रथात बसून केव्हा गेला ते मागे उडालेल्या धुळीच्या लोटात कुणालाही दिसले नाही.
यात्रेकरू कलदार नाणी मोजत होता. मोजून मोजून हात दुखू लागले. बसून बसून पायाला मुंग्या आल्या पण मोजायची नाणी संपतच नव्हती!

सदाशिव पं. कामतकर

ये चिराग बुझ रहे है….

शीव चुनाभट्टी

पाकिजा सिनेमा अनेक चांगल्या पैलूंमुळे गाजला, इतका लोकप्रिय कसा झाला, त्याचे उत्तर त्या सिनेमातील अनेक उत्तम नाट्यपूर्ण प्रसंगाचे तितकेच कल्पक प्रतिभावान चित्रिकरणात आहे. मग त्यात त्या प्रसंगातील कलाकारांचा अभिनय, संगीत,पार्श्व संगीता इतकेच पार्श्वभूमीतील सर्व तपशील आणि हालचाली सर्व काही येते.


मी “चलते चलते यूॅंही कोई”हे गाणे पाहात व ऐकत होतो. त्याचे दृश्य इतके प्रभावीपणे बारिक सारीक तपशीलांसह केले आहे की प्रत्येक वस्तु एकमेकांस व नवाबी शौकिन वातावरणास पोषक व उठावदार करते.


पाकिजा गाणे म्हणत असते तेव्हा ती नंतर सहज उठून पदन्यास करीत चालेल ह्याची कल्पनाही लगेच येत नाही. गाण्यांच्या ओळींना हाताची व आपल्या पायाकडे व मध्येच समोरच्या आश्रयदात्याकडे पाहिले न पाहिल्यासारखे करत ती कथेतील हकीकत सांगत उठते!


सुरवातीपासून तिच्या पाठीमागे असलेल्या कमानीखाली दोन नर्तिका सुरेख हलक्याशा हालचालीतून शब्दांना अभिनय देत असतात. पण त्या, नायिकेचा प्रभाव कमी न करता तिला उठाव देत असतात.
संगीत, सारंगी,तबल्याचा ठेका, पाकिजा गाण्यातून सांगत असलेल्या घटनेला, भावनांना इतके बोलके करतात ! तरीही दिग्दर्शकाने प्रेक्षकांची नजर पाकिजावरच राहिल ह्याचीही सहजतेने दक्षता घेतली आहे. अभिनयातील,प्रसंगातील वास्तवही,दिग्दर्शकाने मध्येच शौकीन आश्रयदात्याला आपली पहिली औपचारिक बैठक सैल करून लोडावर रेलायला लावून जपले आहे. नंतर पाकिजा तिच्या घडून गेलेल्या गोड प्रसंगाच्या आठवणीत रमून दालनाच्या मागील बाजूच्या कारंजाच्या शतधारांकडे जाते; ह्या कारंजाच्या धाराही उसळत वर येत नाहीत. नेहमीच्या वेगानेच शांतपणे वरून खाली येत असतात. तिथली प्रकाश योजनाही सौम्यच आहे. आता पाकिजा फिरून मुख्य दालनात येताना मधल्या मोठ्या नक्षीदार कमानीमध्ये व बाजूच्या दोन लहान कमानीत त्या नर्तिका नाचत आहेत हा भागही सुंदर साधला गेला आहे.


पाकिजा, ‘ये चिराग बुझ रहे है’ ही ओळ म्हणते, ती ओळ जेव्हा वरच्या सुरांत मिळत जाते तेव्हा पाकिजा चित्रपटातील मुख्य पात्रांपैकीच एक असलेल्या त्या ‘आगगाडीचा आवाज व ती हृदयाला भिडणारी तर कधी विव्हळ करणारी शिट्टी’ आर्ततेने तितकीच हृदयाला भेदत वाजत जाते. शिट्टीच्या आवाजाबरोबरच गाडी पुढे गेल्याचे जाणवते व एका असफळ प्रेमाचे दिवे विझत आले आहेत ….. विझत चालले…विझले…


पाहाण्यासारखे हे गाणे आहे. ऐकत तर होतोच पण नंतरही ते ‘ये चिराग बुझ रहे है’ची व्याकुळता मागे राहातेच…


मोजक्याच सर्व दृष्टींनी उत्तम असलेल्या सिनेमांपैकी एक पाकिजा होता आणि आज सुद्धा तो उत्तम आहे.
Enjoy न म्हणता अनुभवा म्हणतो.

हे असे हृदय फक्त आईचेच….

स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता. म. गांधींनी उभारलेला चंपारण्यातील हिंदुस्थानातील शेतकऱ्यांचा पहिला लढा सुरू होता. त्यानंतर मीठाच्या सत्याग्रह सारा देश अहिंसेच्या मार्गाने लढत होता. खेड्यापाड्यातील जनता निर्भय झाली होती. तशी ब्रिटिशांची दडपशाही सुद्धा वाढतच होती. त्याच काळातील एका गावातील तरुणाची आणि त्याच्या आईची ही कहाणी आहे.

आत्माराम गावातील आणि आजुबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला आपल्या लेखणीने तोंड फोडत होता.त्यामुळे त्याला त्याच्या गावचे आणि दुसऱ्या गावातील गावकऱीही चांगले ओळखत होते. त्याचे सगळेच लेख,पत्रे छापून येत नव्हती. पण जी येत त्यामुळे सरकार अस्वस्थ होत असे.त्यामुळे ब्रिटिश त्याच्यावर नजर ठेवून होते.

आत्माराम आणि त्याची आई असे दोघेच एका लहानशा मातीच्या घरांत राहात होते. सारवलेल्या अंगणातील एका झाडाखाली तो लिहिण्यात गर्क होता. आई चुलीपुढून बाहेर आली. पदराला हात पुसत डोक्यावरील पदर सारखा करत “ अरे मेरे लला जेवायला चल. किती वेळ झाला अजून लिहितोच आहेस. जेवून घे आणि पुन्हा लिहायला बस.चल.” आत्मारामला काही ऐकू गेले नाही. तो लिहिण्यातच गर्क होता. ओवरीतच बसत आई आपल्या एकुलत्या एक लेकाकडे मायेने आणि अभिमानाने पाहात होती. तो ओठात लेखणी ठेवून विचार करत पाहू लागला. आईला पाहिल्यावर तो म्हणाला,” आई तू जेवून घे ना. मला आज हा लेख पूर्ण केलाच पाहिजे.संपतच आलाय. तू जेवून घे.” “ अरे लल्लू अगोदर तू जेवल्याशिवाय मी कधी जेवले का?” इतक्यात गावातला धन्नोराम शेतमजूर खांद्यावरील फावडे खाली घेत आला. फावडे ठेवून आत्माराम समोर बैठक मारत मोठ्या उत्साहात त्याला आणि आईला सांगू लागला,” दादा, तुझा लेख पत्रात छापून आलाय. सगळीकडे लोक वाचताहेत. आणि तू आहेस म्हणून आम्हाला आधार आहे म्हणतात.” पण..पण.. सांभाळून हां. पोलीसही तुझ्या पाठीमागे लागलेत.जरा जपून लिही.” हे ऐकून आत्मारामच्या आईला आपल्या मुलाचा अभिमान आणि त्याच बरोबर त्याची काळजीही वाटू लागली.आई पुन्हा आत्मारामला जेवायला चल म्हणू लागली. पण लिहिता लिहिताच तो म्हणाला आई हा धन्नोराम आलाय. त्यालाही जेवायला वाढ आणि तूही जेव.” दोन मिनिटांनी आत्मारामचे लिखाण संपले तशी आई उठली आणि,” चला तुम्ही दोघेही जेवून घ्या.” आई आत गेली. दोन ताटे वाढून घेतली आणि बाहेर आली. आत्माराम आणि गरीब धन्नोराम जेवायला बसणार इतक्यात लोक,पोलीस आले!पोलिस आले! म्हणत आपापल्या घरात जाऊ लागले.

आत्माराम शांत होता. पण आई गोंधळून गेली. धन्नोरामही घाबरला. तो आत्मारामला,” आता काय करायचे?” असे विचारू लागला. त्यावर आत्माराम शांतपणे म्हणाला,” अरे मी काहीच केले नाही. खरे तेच लिहिले.” तो इतके म्हणे पर्यंत पोलिसांच्या पावलांचे व “कहाॅं रहेता वो बदमाश?” असे आवाज येऊ लागले.हे ऐकल्यावर धन्नोराम आत्मारामला,” तू कुठेतरी निघून जा! पळ!” असे सांगू लागल्यावर आत्माराम शांतपणे म्हणत होता,” का पळायचे मी? मी काही चोरी डाका घातला नाही. कर नाही त्याची डर कशाला?” तरीही धन्नो आईकडे हात जोडून पाहात आत्मारामला तू पळून जा हे पोलिस फार हाल करतात म्हणत राहिला.” आणि आत्माराम फक्त मान हलवत नाही नाही म्हणू लागला. आईला तर धसकाच बसला होता. दोघांसमोरची ताटे तशीच भरलेली होती. आणि पोलिस लाठी आपटत आले!

आत्माराम आणि धन्नोरामकडे डोळे वटारून मोठ्या जरबेने ,” तुमच्यातील आत्माराम कोण आहे?” असे फौजदार विचारू लागला. आत्मारामन पुढे येत मीच आत्माराम, साहेब” असे म्हणाला. “ बॅंकेवर दरोडा तूच घातलास; काय रे? हो का नाही?“ असे त्याच्या छातीवर दंडुका ठेवत विचारले. आत्माराम हा आरोप ऐकून चकितच झाला. त्याच्या आईला आपण हे काय ऐकतोय ह्यावर विश्वासच बसेना. ती फौजदारासमोर येऊन म्हणाली,” साहेब अहो हे काय म्हणताय तुम्ही? हा कसलाआरोप करताय माझ्या मुलावर? चोरी करणे दरोडा घालणे असले वाईट विचार माझ्या मुलाच्या मनांतही कधी येणार नाहीत!” तिला बाजूला ढकलून देत अधिकारी पोलिसांना म्हणाला, “घ्या रे ह्याच्या घराची झडती.”

धन्नोराम फौजदाराला विनवणी करत म्हणाला,” साहेब आमचा आत्माराम सज्जन आहे हो. तो असले काही कधीच करणार नाही!” “ अरे देखो! ये आया बादशाह सर्टिफिकेट द्यायला.काय बे तुलाही आत टाकू का?” हे ऐकल्यावर धन्नोराम जोडलेल्या हातांनीच मागे मागे सरकू लागला. त्या मातीच्या घरात डोके वाकवून तिघे पोलीस आत गेले.आणि थोड्या वेळाने एक एक एक पोलिस बाहेर आला. एकाच्या हातात अगदी लहान पिशवी सारखे काहीतरी होते. फौजदाराकडे ती देत,” ये मिल गयी साब.” म्हणाला.,फौजदाराचे डोळे लकाकले. मिळाला पुरावाअसे म्हणत त्याने पोलिसांना आत्मारामला ताब्यात घ्यायला सांगितले. पोलिस आणि फौजदार आत्मारमला घेऊन चालले. आत्मारामची आई रडत रडत धावत त्यांच्या मागे जात,” हे सगळं कुभांड आहे. माझ्या मुलाला सोडा, सोडा असे ओरडत, रडत भेकत त्यांच्या मागे जाऊ लागली. पण तिला कोण दाद देणार! आपल्या पोराला भरल्या ताटावरून उठवून नेले ह्याचे तिला राहून राहून दु:ख होत होते.धन्नोरामही डोक्याला हात लावून रस्त्यातच बसला.

कोर्टाने आत्मारामाला दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. हाच अधिकारी तुरुंगातही त्याचा अतोनात छळ करू लागला.त्यातच आत्मारामचा मृत्यु झाला.नंदरामची आई एकटी पडली. तिच्या काळजाचा तुकडाच जुलमी राजवटीने, त्या क्रुरकर्मा फौजदाराने हिरावून नेला होता. ती दैवाला दोष देत नव्हती. आत्मारामला पकडल्याचे शिक्षा झाल्याचेही दु:ख नव्हते. पण स्वातंत्र्यासाठी, लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून सरकारविरुद्ध लिहून लोकांत जागृती करणाऱ्या आपल्या मुलाला चोर दरोडेखोर ठरवून त्याच्या नावाला बट्टा लावला ह्याची तिच्या मनात आग धुमसत होती.

वर्षे उलटत होती. नवरा गेल्यावर तिचा मुलगा आत्माराम हेच तिच्या जगण्याचे एकमेव कारण होते. तोच त्या पोलिस अधिकाऱ्याने कपटीपणा करून तिच्यापासून हिसकावून नेला होता.

त्या अधिकाऱ्याला मोठी बढती मिळाली. त्यासाठी त्याने मोठ्या लोकांना मेजवानीसाठी बोलावले होते.आत्मारामच्या आईला हे समजले. कपडे चादर पांघरूणाचे एक बोचके घेऊन ती त्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंगल्याकडे जीवाच्या कराराने निघाली. आपला ओठ दाबून राग आतल्या आत दाबत निघाली. तिच्या मनात काय होते ते तिलाच ठाऊक!

बंगल्यावर पोचली. येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या लोकांची खूप वर्दळ होती. डोक्यावरचा पदर बराच पुढे घेऊन ती पायरीजवळ उभी होती. त्या वरिष्ठाचे तिच्याकडे लक्ष गेले. अधिकाऱ्याच्या तोऱ्यात त्याने ती इथे का आली वगैरे विचारले. मध्ये इतकी वर्षे गेली होती. तो तिला ही नंदरामची आई म्हणून कसा ओळखणार? तिने भुकेली आहे, काही खायला मिळेल तर बरे होईल”, म्हटल्यावर, “पीछे बाजू जाव. भांडी कुंडी घास. जेवायला जरूर मिळेल” असे तो म्हणाला.

समारंभ संपत आला. सगळे पाहुणे गेले होते.एखादा जवळचा कोणी थांबला असेल.आत्मारामची आई पुन्हा तिथेच डोकीवर पदर ओढून मान बाजूला करून उभी असलेली पाहिली. इन्स्पेक्टरने तिला पाहिले.आता काय पाहिजे असे जरा चिडूनच त्याने विचारल्यावर आईने तिला काम हवे असे उत्तर दिले. ते ऐकून तिथेच असलेल्या त्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या बायकोने मुलाला सांभाळायला राहतेस का असे विचारल्यावर आत्मारामची आई नम्रपणे मान हलवित, हां जी म्हणाली. त्या रात्रीपासून ती त्या बंगल्यात तान्ह्या मुलाला सांभाळण्यासाठी राहिली.

एके दिवशी ती मालकीणबाईच्या खोलीत चोर पावलाने गेली.बाळ आई शेजारच्या पाळण्यात झोपले होते. दबकत दबकत जाताना कशाला तरी तिचा पाय लागला. आवाज झाल्याने आई जागी झाली. नुकतीच कामाला लागलेल्या दाईला पाहिल्यावर बाळाच्या आईने, “बरे झाले तू आलीस ते! तुझ्याशिवाय त्याला करमत नाही. इतक्या थोड्या दिवसांत त्याला तुझा लळा लागला बघ!” आत्मारामाची आई किंचित हसत म्हणाली,” लहान बाळ ते! नेहमी समोर दिसणाऱ्याचे ते पटकन होते.” असे बोलणे चालू असताना मालकीणबाईला खालून साहेबांनी बोलावले. बाळाला दूध दे सांगून त्या खाली गेल्या. आत्मारामच्या आईला आपण कशासाठी ह्या घरात आलो आणि आता हीच संधी आहे ह्याची जाणीव झाली. ती बाळाच्या पाळण्याकडे गेली. वाकून बाळाकडे पाहू लागली. “ लवकर! लवकर! चल आटप! हीच संधी आहे तुला.लाव बाळाच्या नरडीला नख. पुन्हा ही संधी येणार नाही. दाब त्याचा गळा.?डोळे मिट आणि झटक्यात उरक हे!” आत्मारामची आई स्वत:ला सांगत होती. ती ह्या पोलिस अधिकाऱ्याच्या घरात आत्मारामच्या तुरुंगातील छळकपटाने झालेल्या मृत्यचा सूड उगवण्यासाठी आली होती.पाळण्यावर वाकली. निष्पाप बाळ तिच्याकडे तितक्याच निष्पापतेने,त्याच्या निर्मळ दृष्टीने पाहात होते. आत्मारामची आई आणखी ओणवी झाली.

काही करणार इतक्यात तिला आपल्या आत्मारामाचे,” आई आई ! तू जेवून घे आई!” हे नेहमीचे सांगणे इतक्या मोठ्यांदा कानात ऐकू आले की ती झटकन मागे सरली. तिने पुन्हा जवळ जाऊन बाळाला उचलून छातीशी घेतले. डोळे मिटून त्याला हळुवारपणे थोपटू लागली. दिवस चालले होते. आत्मारामची आई आतून प्रक्षुब्ध असायची पण त्या लहान बाळाला सांभाळत असता ती हळू हळू पुन्हा आत्मारामची आई होऊ लागली असावी का?बाळाला ती खाली ठेवत नसे. पण एक दिवस तिने आता घरी परतायचे ठरवले.

बाहेर पावसात भिजून आलेल्या बाळाच्या दाईला पाहिल्यावर मालकीणबाई व तो पोलिस अधिकारी दोघेही “बरे झाले तू आलीस. बाळाला घेऊन नोकर बाहेर घेऊन गेले होते. बाळ थोडे शिंकत होते,” वगैरे सांगू लागले. तिलाही कपडे बदलून यायला त्यांनी सांगितले.

आत्मारामची आई मालकिणबाईच्या खोलीत गेली. बाळाला अलगद घेऊन “ओ ल्ले ले ल्ले ! अले अले लब्बाडा म्हणत त्याला घेऊन फिरु लागली. मध्येच तिने बाळाच्या कपाळावरून गालावरून हात फिरवला. आणि ती जवळ जवळ ओरडलीच! “ मालकिन. मालकीन! मुन्ने को कितना बुखार है!” बघा बघा हात लावून पाहा बाईसाहेब. चटका बसतोय!” हे ऐकून त्या बाईसुद्धा घाबरल्या. साहेबाला बोलावू लागली. साहेबही घाबरले. आत्मारामची आई म्हणाली ,”मी बाळाला पाण्याने पुसून घेते.पण त्याची छाती भरलीय वाटते. साहेब काही करा. डाॅक्टरला पटकन बोलवा.” सगळ्यांची धावपळ सुरु झाली. आत्मारामच्या आईने पोटीस केले. बाळाच्या छातीला लावले. हळू हळू त्याला थापटत बसली. बाळाच्या आईच्या डोळ्यांतील पाणी खळत नव्हते. आत्मारामची आईसुद्धा चिंतेच्या घोरात पडली.

डाॅक्टर आले. त्यांनी बाळाला बराच वेळ तपासले. डाॅक्टरांनी अधिकाऱ्याला बाहेर बोलावले. त्याने घाबरत ,” माझा मुलगा बरा होईल ना?” इतकेच विचारले. डाॅक्टर म्हणाले,” त्याला न्युमोनिया होण्याची शक्यता आहे. मी इंजेक्शन दिलेय. पण त्याला शेकत राहिले पाहिजे. मधून पोटिसही लावले पाहिजे. ग्लुकोज घालून गरम पाणीही पाजवा.” इतके सांगून डाॅक्टर गेले.

आत्मारामची आई तीन दिवस रात्र बाळापाशी होती. क्षणभरही झोपली नव्हती. त्याचे औषधपाणी सगळे काही वेळच्या वेळी करीत होती. मनातला सूड संताप चीड आग कुठे गेली, केव्हा विझली तिलाही समजले नाही. ती पुन्हा आई झाली. त्या बाळाची जणू दुसरी आईच झाली होती.
बाळाच्या तब्येतीत उतार पडला. सगळ्यांचे चेहरे उजळले.

दोन तीन दिवस गेल्यावर आत्मारामची आई, मालकिणबाईंचा निरोप घ्यायला त्यांच्या खोलीत गेली.
“मालकीन, मुझे ईझाझत दो. मी निघते” असे ती म्हणाल्यावर बाई म्हणाल्या, “दाईमां, मला पाच मुले झाली. पण ती वाचली नाहीत. हे बाळ तेव्हढे वाचले. तेही तुझ्यामुळे. का जातेस? राहा इथेच. बाळालाही तू हवी आहेस.” तो दुष्ट अधिकारीही तेच म्हणाला. त्याही पुढे तो पश्चात्तापाने पोळलेल्या गहिवरल्या आवाजात सांगू लागला,” माझ्या नोकरीत मला नको नको त्या खोट्या नाट्या गोष्टी कराव्या लागल्या. छळ कपट करावे लागले. त्याचे बक्षिसही आमची पाच मुले न जगण्यात मिळाले असेल! तू राहा दाईमाॅं!”

आत्मारामाची आई काहीच बोलली नाही. बाळाला एकदा खेळवावे म्हणून तिने त्याला आपल्या हाताच्या झोक्यात घेतले. आणि ओ लाला! कैसे हो तुम ?! अरे बोल बेटा; हसो तो सही असे बाळाकडे व त्याच्या आईकडे पाहात ती म्हणू लागली.आणि अचानक बाळाकडे पाहात,” अरे काय झाले तुला? उठ. जागा हो.पाहा माझ्याकडे. अरे बाळा रे! पाहा पाहा!” म्हणत ती कावरी बावरी, घाबरी झाली. आणि, “ हे देवा हे काय झाले!हे काय झाले! म्हणत ती रडू लागली!”

बाळाच्या आई-बापाने तर हंबरडाच फोडला. आत्मारामची आई दगडासारखी स्तब्ध होऊन शून्यात बघत होती. मनात स्फुंदत स्फुंदत विचारत होती,” भगवंता!अरे हे तू काय केलेस? ! असं का केलेस? मी काय पाप केले म्हणून तू मला पुन्हा ही शिक्षा दिलीस? तू कसला दयाळू! अरे मला न्यायचे सोडून तू ह्या निष्पाप बाळाला नेलेस! अरे त्याने काय केले होते तुझे? कोणती आई तुला क्षमा करेल रे?!”

ती फक्त आत्मारामची आई आता फक्त आई होती! ती आई निर्जीव पुतळ्यासारखी पावले टाकीत जात राहिली.

(ही कथा हिंदी उर्दुतील प्रख्यात कथाकार प्रेमचंद मुन्शी ह्यांच्या ‘माता का हृदय’ ह्या कथेचे भाषांतर आहे)

सदाशिव पं. कामतकर

झाडे वाचवा आरे वाचवा ! कार-शेड हटवा आरे वाचवा!

मुंबई

मुंबईच्या मेट्रो ट्रेनचा तिसरा टप्पा करण्यास सुरवात झाली. त्यासाठी कार शेड करण्यासाठी २७०० झाडे तोडायला सुरुवात झाली. गेला एक महिना दर शनिवारी आणि रविवारी ‘झाडे वाचवा आरे वाचवा ‘ कार शेड हटवा ‘ अशा अनेक घोषणा देत हातात लहान फलक घेऊन तरुण मुले मुली कार्यकर्ते रस्त्याच्या एका बाजूला लांबलचक रांग करून उभी असतात. ह्या मध्ये काही
एनजीओज्, बरेच वैयक्तिक, काही राष्ट्र सेवा दलाचे(अजून सेवा दल जिवंत आहे हे पाहून आश्चर्यच वाटले!) काही तरुण मंडळांचे असे निरनिराळ्या गटाची तरुण मंडळी भाग घेतात. हिंदी इंग्रजी मराठीत घोषणा चालू असतात.

हे निदर्शन ११.००-३० पासून सुरु होते. दोन पर्यंत संपते.
गेले दोन तीन शनिवार रविवार मी आणि स्मिता जाऊ जाऊ म्हणत होतो. पण कुठे करतात निदर्शने, किती वाजता ही काहीही माहिती कुठेही सहजासहजी मिळत नव्हती. फक्त एखाद्या-एखाद्याच-चॅनेलवर फक्त शनिवारी रनिवारी हे आंदोलन असते असे सांगितले होते. हल्ली चळवळ्यांनाही वाटते की कुठेतरी सोशल मिडियावर टाकले की भरपूर प्रसिद्धी होते. भ्रम आहे.जाऊ दे. कल्याणीने शोधून वेळा सांगितल्या. बरे झाले नाही तर आम्ही सहाला उठून जाणार होतो. आरामात दहाला निघालो. ११.०० वाजता पोचलो.

फारशी मंडळी दिसत नव्हती. उगी २०-२५ इकडे तिकडे दिसली. पण पोलिसांच्या गाड्या, निदर्शकांना पकडून लांब दूर सोडून देण्यासाठी जाळीची मोठी गाडी हे सगळे पाहिल्यावर मला विशेष स्फुरण आले. तो लाठी हल्ला, ती आरडा ओरड, निदर्शनाच्या घोषणा,पोलिसांची फळी मोडण्यासाठीची निदर्शकांची रेटारेटी. त्यासाठी “इन्किलाब इन्किलाब! नही हटेंगे नही हटेंगे” घोषणा मध्येंच पोलिस धक्काबुक्की करत माझी मानगुट पकडून मला ढकलत मोटारीत कोंबताहेत, चॅनेलवाल्यांचे सगळे कॅमेरे माझ्यावर,त्यांची गडबड आणि बडबड हे सर्व दृश्य वारंवार डोळ्यांसमोर आणू लागलो. त्याची मनातल्या मनात दोन वेळा ‘रंगीत’ तालीमही झाली. आज हुतात्मा व्हायची केव्हढी मोठी संधी मिळाली ह्या हौतात्म्याच्या स्वप्नांत दंग होऊन, ती’अमर रहे’ ची मिरवणुक;माझ्यावर पडणारे हारांचे ढीग त्यामुळे चेहरा कुणाचा दिसतच नव्हता. मीच का हा हुतात्मा ही शंकाही आली. लगेच मी तिथेच करायचे श्रद्धांजलीचे भाषणही करु लागलो. हे सर्व स्वगतच चालले होते.प्रत्यक्षात फौजदार-पोलिसांना मी म्हणत होतो,” आमच्या पेक्षा तुमचीच संख्या जास्त दिसतेय साहेब! चॅनेलवर पोलिसांचीच निदर्शने अशी बातमी दाखवतील!” तोही हसला आणि म्हणाला,” येऊ द्या, तशी बातमीही येऊ द्या, तुम्हीच द्या!”

लवकरच अनेक जण पुटुपुटु करत कुठून कुठून येऊ लागले. रांग लांब लांब लांब होत चालली. मला आणि स्मिताला कुणी एक एक फ्लेक्सी दिला. तो रस्त्यावरील रहदारीला दाखवत, देणाऱ्याच्या मागोमाग घोषणा पूर्ण करत ओरडत होतो. ‘Save Aarey Save Mumbai’
‘कार शेड हटाव झाडे बचाव;’बचाव बचाव आरे बचाव;’ ‘आरे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची!’ ‘हटवा रे हटवा कार शेड हटवा,वाचवा रे वाचवा आरे वाचवा!’ (ही माझी), ‘जाॅनी जाॅनी येस पप्प…’ वापरून कुणी केलेली चांगली घोषणा; ह्या घोषणाबाजीतच काही तरूण मंडळी मोठा डफ वाजवत त्यांच्या कला पथकाची गाणी म्हणत होती. आणखीही बऱ्याच घोषणा चालूच होत्या. सगळीकडे तरुणांचा उत्साह दिसत होता. माझ्या एव्हढी नाही पण म्हातारी म्हणावीत असे दोघे तिघेच असतील.

आरे रस्ता म्हणजे दुतर्फा सुंदर झाडी असलेला! पूर्वी सिनेमाच्या गाण्यांचे शूटिंग होत असे ती आरे मिल्क काॅलनीची सुंदर बाग आणखी पुढे होती.,रस्ता अरुंद. त्यावरूनच बसेस मोटारी रिक्षा दुचाकी वाहनांची गर्दी. रविवार असल्यामुळे तर खूपच. त्यामुळे जातानाचे लोक परतताना बस मधून,मोटारीतून मलाच हात दाखवत thumsup करत जाऊ लागले असे वाटू लागले.बरेच लोक मला ओळखू लागलेत! ह्या भ्रमात मी घोषणाही जोरात देऊ लागलो.!

मधून मधून मी पाणी पीत होतो. चांगली दिड दोन किलोमीटर लांबीची रांग झाली होती. माझ्यासमोर एक पोलिस होता. त्याला मी म्हणालो, “असं काही तरी तुम्ही रोज पाहात असाल. मनात हसत असाल. काय ओरडताहेत उगीच. काही फरक पडणार नाही!” तो न बोलता फक्त हसला. सर्व काही शांततापूर्ण वातावरणात, गाणी म्हणत मध्येच जोशाने तर कधी नेहमीच्या आवाजात घोषणा चालू होत्या. उत्साह यावा म्हणून त्याच घोषणा चाल बदलून म्हणत. त्यामुळे पुन्हा आवाज जोरदार निघत!

स्मिताने थोडा वेळ रस्त्याच्या पलीकडे जाऊन Record for the posterity असावे म्हणून फोटो काढले. पण तिचा नाही आला फोटो. मला खरंच सुचले नाही! मी त्या अति सौम्य,साध्या वरणासारख्या निदर्शनात घोषणा देण्यातच रमलो होतो.

स्मिताच्या प्रोत्साहनामुळे माझा कालचा रविवार म्हणजे ‘पल भर के लिये तो आंदोलन करें,झूटा ही सही!’ के नाम झाला! झूटा ही नव्हते पण शांततामय होते.

Secret Life of Dr. Walter Mitty सारखा मी तेव्हढ्यातही रस्त्याच्या कडेची पांढरी लक्ष्मण रेखा ओलांडून मुठी वळवून; पोलिसांची नजर चुकवून; पळत पळत रस्त्याच्या मध्यभागी जाऊन “ नही हटेंगे नही हटेंगे” “नही चलेगी नही चलेगी कार शेडकी तानाशाही”, “आली रे आली जनता आली कारशेड खल्लास केली” अशा घोषणा देतोय; मी गेलेला पाहून इतरही रस्त्यामध्ये येताहेत, आॅलिव्ह ग्रीनची जाळीची हेल्मेट घालून अंगभर असणाऱ्या ढाली पुढे घेऊन पोलिसांची फलटण हवेत बंदुकी उडवत माझ्याच दिशेने येत आहे ह्या स्वप्नरंजनात स्वत:चे समाधान करून घेत होतो.प्रत्यक्षात मी समोरच्या पोलिसाच्या-तो पाठमोरा असूनही- धाकाने,रस्त्या कडेच्या खड्यात उभा होतो. खंबीरपणे पाय रोवून. काय समजलात मला!

१:३०-४५ वाजत आले. स्मिता म्हणाली,”बाबा,जाऊ या.” जिथे आम्ही सुरवातीला येऊन थांबलो होतो तिथे गेलो. पाण्याची बाटली घेतली. पाणी प्यालो. आरे काॅलनीतच होतो.त्यामुळे तिथे आरेचे ताकही मिळाले.

मी माझ्या शेजारी असलेल्या निदर्शकांचा निरोप घेत पुढे निघालो. रिक्षाने १७ किमिचे अंतर पार करून घरी आलो.
तर आता निदर्शनाचे स्मिताने काढलेले फोटो पहा.

हिशोबातील खर्चिक लेख

शीव

ता.११ सप्टेंबर २०१९ पासूनचा खर्च:-
रु. २०.०० किल्ली बनवून घेतली.
रु. ७.०० चहा.
ता.१२ सप्टेंबर २०१९
रु.२४०.००दाराच्या अंगच्या व कडीकोयंड्याच्या कुलुपाच्या किल्ल्या बनवून घेतल्या.
रु. ३०.०० ताक
रु. १९०.०० चाॅकलेट्स मेलडी आणि किसमि – १०० चाॅकलेटांची दोन पाकिटे!
रु. १०.०० पार्ले ग्लुको बिस्किट्स
रु. ४०.०० किल्यासाठी- दोन key chains
ता. १३ सप्टेंबर २०१९


रु. २८:०० दोन समोसे आणि एक चहा(८रु.) बनारस दुग्धालयात.हे दुकान सायन स्टेशनकडे जाण्याच्या रस्त्यावर आहे. बरेच वेळा त्यावरून जातो पण कधीही जावेसे वाटले नाही. पण आजची परिस्थितीच निराळी होती. दरवाज्याच्या अंगच्या कुलपाची (latch key) एक जास्तीची किल्ली बनवून घ्यायचे काम परवा पासून चालू आहे. एक किल्ली ती काय! जणू काही ‘बंद अकलका दरवाजे का तालेकी’ किल्लीच ती.


काल माझ्याकडे तशी एकच किल्ली होती. त्याबरहुकुम बनविण्यासाठी ती देणे भागच होते.पण मग मी घरात कसा जाणार? ह्यावर उपाय म्हणून स्मिता तिची किल्ली ठेवून गेली होती. काल दुपारी जास्तीची बनवून घेतलेली व मूळची अशा दोन्ही किल्या घेऊन आलो. पण नविन करून घेतलेली किल्ली कुलपातच जाईना.पुन्हा आज किल्लीवाल्याकडे जाणे आले.गेलो. तर तो आपली सर्व हत्यारे व display (!) साठी दोन तीन तारांना अडकवून लावलेल्या जुन्या पुराण्या व गंजलेल्या किल्ल्यांचे ते गबाळ गुंडाळून, मोटरसायकलवरून निघण्याच्या तयारीतच होता.बरे झाले ती चालू झाली नाही. मी गेलो. त्याने म्हटले तुमची नेहमीची किल्ली व जी दुरुस्त करायची ती अशा दोन्ही किल्ल्या द्या. मी गडबडीत मोठ्या आत्मविश्वासाने त्याला दिल्या.

घरी आलो. तर लॅच की नव्हती. दोन्ही खिसे उलटे सुलटे करून पाहिले. स्मिताने ठेवलेली किल्ली मी घरातच विसरलो होतो तर ती खिशात कुठून मिळणार? माणूसच मी. प्रथम, आता काय करायचे? ह्या विचारात आणि काळजीत पडलो. मग म्हणालो,” स्मिता येईपर्यंत फक्त आठ तासांचाच प्रश्न आहे. काढू या इकडे तिकडे फिरत. बागेत बाकावर बसू.मध्येच त्यावर आडवे पडू. जवळ रुपम टाॅकीज आहे तिथे सिनेमे पाहू, लागोपाठ दोन.(पण ते दोन्ही रद्दी होते.) पाण्याची बाटली विकत घेऊ.” खिशात पैसे होते ना! अलिकडे भूक लागली आहे जोरात, असे होत नाही. पण आता मात्र लगेच काही तरी खाऊन घेऊ हा विचार आला. निरिक्षण:- संकटात खूप भूक लागते. वर लिहिलेल्या बनारसी दुग्धालयात जाऊन न आवडणारे सामोसे खाल्ले.


स्मिताला आणि कल्याणीला फोन करुन सांगावे व त्यांनाही काळजीत टाकावे हा एक सुविचारही आला.पण जवळ फोनही नव्हते. नंबरही लक्षात नाहीत. हाॅटेलातून बाहेर पडल्यावर लक्षात आले,”अरे त्या चावीवाल्याकडून आपली किल्ली आणावी. घरात जाऊन जास्तीची किल्ली घ्यावी व ही किल्ली त्याला पुन्हा आणून द्यावी. अरे व्वा! अशा बिकट प्रसंगी, कधी नाही ते, हे मला सुचले ह्यावर मीच माझ्यावर किती तरी वेळ खूष झालो ! ह्या खुषीत बराच वेळ गेला. मग काय! ढांगा टाकत तिथे पोचलो तर चावीवाला आपले सर्व गबाळे आवरून नमाज पढायला गेला होता! आज शुक्रवार आहे विसरलो होतो. गेले तीन दिवस मला तिथे तिन्ही त्रिकाळ पाहून मला चावीवाल्याचा नविन ॲप्रेंटिस समजू लागलेला रसवाला म्हणाला,”बाबा, नादिरके पास काम सिखते हो का?अच्छा है काम. कभी भी खुदका पेट खुद भरना अच्छा रहेता.चाबीवाला येईल;थांबा इथे.” हे सगळे, मी डोळ्यांसकट चेहऱ्याचे उदगार चिन्ह करून ऐकून घेतले.


जनकल्याण बॅंकेच्या रखवालदाराच्या खुर्चीवर बसलो.पण बॅंकेचे गिऱ्हाईक आल्यावर चुकुन मीच उभा राहायचो. हे लक्षात आल्यावर नंतर तिथेच बाजूच्या अरुंद कट्ट्यावर बसलो. रखवालदाराची असली तरी खुर्ची आपल्या नशिबात नाही हे पुन्हा लक्षात आले. तास दीड तास वाट पाहात बसलो. रसवाल्याची किती विक्री झाली हे पाहात त्याच्या गल्ल्याचा अंदाज घेत वेळ काढत होतो. अखेर तो किल्लीवाला आला.त्याच्या कडून किल्ली घेतली.घरी आलो. कुलुप उघडून घरात आल्यावर घर म्हणजे Home Sweet Home हे जाणवले. दुपारी चार साडेचारला जेवलो. सहा वाजता पुन्हा त्याला किल्ली द्यायला गेलो पण जाताना दरवाजाचे अंगचे कुलुप लागू नये ह्याची दक्षता घेऊन निघालो. किल्ली देऊन परत आलो. साधे कडीचे कुलुप उघडून घरात आलो!!! हुश्श! हे तुम्ही म्हणायचे.


ता. १४ सप्टेंबर २०१९
रु. १०.०० केळी ३
रु. ३५.०० पार्लेची नवीन चाॅकलेट कुकीज्- मिलानो.
रु. २५.०० सिताफळे, फक्त दोन तीही लहान.
रु. १२.०० अमूलची बिस्किटे.
रविवार ता. १५ सप्टें २०१९ – अखेर आज किल्ली बनवून घेण्याच्या रामायणाचे पारायण संपले. (गदिमांनी ळ चे घननीळा लडिवाळा हिंदोळा वगैरे ळ चे चार शब्द लिहून गाणे लिहिले तर किती कौतुक केले डाॅ. करंबेळकरांनी सुंदर लेख लिहून. मी वर बाणातला ण वापरून सलग तीन शब्द त्यातला एक तर ण वापरून एक जोडाक्षरही लिहिले ! ह. ना. आपटे म्हणतात तसे’पण लक्षात कोण घेतो?!’ मला तर सुखाची किल्ली मिळाल्याचा आनंद झाला! रोज कमीत कमी दोन चार हेलपाटे घातले असतील. असे चार दिवस हेलपाटे घालत होतो.काल तर सोसायटीचा रखवालदार म्हणाला “ आजोबा, शतपावली किती वेळा घालता. तीही इतका वेळ?” मी काय उत्तर देणार. नुसते हसलो. हसणे व माझा चेहरा दोन्ही केविलवाणा झाला असणार. कारण तो लगेच म्हणाला,” नाही तसे काही नाही सहज विचारले!” कुलपाच्या किल्लीसाठी इतके हेलपाटे तर यशाची गुरुकिल्ली सापडायला जन्म-मरणाचे किती खेटे घालायला लागतील! ! असो.


तुम्हीही सुटकेचा निश्वास सोडला असेल; गेले चार दिवस किल्ली पुराण चालू आहे माझे. असो. “असो असो लिहिता,म्हणता आणि पुन्हा दहा वाक्ये लिहतात तुम्ही “ असे तुम्ही म्हणाल. पण खरेच आता असो.चला एकदाचे अखेरचे ‘असो’ लिहून झाले! अ……


रविवार १५ सप्टें २०१९
रु. १५.०० एव्हरेडी बॅटरी सेल्
सोमवार ता.१६ सप्टें२०१९ माझा जमा नसलेला हिशोब चालूच आहे !

हिशेबनीस- सदाशिव पं. कामतकर

वृद्ध कलाकार- वास्तवात आणि भूमिकेतही !

आता पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये अवतार किशन हनगल ह्यांचा १९१४ साली जन्म झाला. अवतार किशन वगैरे नावावरून काही बोध होणार नाही.,ए. के हनगल म्हटल्यावर लगेच लक्षात येईल. हिंदी सिनेमात शाळा मास्तर,प्रोफेसर, डाॅक्टर, कर्नल, शंभूनाथ, रामशरण किंवा रहिमचाचा अशा सर्वसामान्य नावाच्या व माणसाच्या भूमिका हातखंडा उत्तम करणारे ए.के. हनगल ह्यानी स्वातंत्र्य लढ्यात मोठा भाग घेतला. बरेच वेळा ते तुरुंगातही गेले. पोलिसांच्या लाठ्या दंडुकेही पुष्कळ खाल्ल्या.
भगतसिंगाना तुरुंगात टाकले तो दिवस व त्यांना फाशी दिली तो दिवस त्यांना कायम आठवत असे. भगतसिंगाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यातून ते साम्यवादी विचारांकडे वळले. जालियनवालाबागचे हत्याकांड आणि भगतसिंगला फाशी दिली त्या दिवशी पठाण (North West Frontier मधील) आणि पंजाब रडत होता अशी आठवण ते सांगत.


कराचीत असतांना त्यांच्या ब्रिटीश विरोधी स्वातंत्र्य चळवळीतील कामामुळे त्यांना तीन वर्षे तुरुंगात डांबले होते.फाळणी झाल्यावर ते हिंदुस्थानात आले.,
ते पूर्वीच शिवणकाम शिकले होते. वयाच्या विसाव्या वर्षापासून ते रंगभूमीवर काम करीत होते. १९४९ साली मुंबईत आल्यावर प्रथम ते शिंपी कामच करू लागले. त्याचबरोबर IPTA ह्या संस्थेच्या नाटकात भूमिका करू लागले.वर्तमानपत्रांतही काम करू लागले.


१९६७साली त्यांनी शशधर मुखर्जीच्या ‘शागीर्द सिनेमात मध्ये काम केले. वयाच्या पन्नाशीत सिनेमात आले. आयुष्याची माध्यान्ह उलटता उलटता सिनेमात आले. वयाला अनुरुप भूमिका मिळाल्या आणि त्या ते करू लागले. जागृती,आंधी,नमक हराम, मेरे अपने, गुड्डी, बावर्ची, आनंद, तिसरी कसम (राजकपूरच्या थोरल्या भावाची भूमिका), गरम हवा, सत्यम शिवम सुंदरम् अशा एकूण २२७ सिनेमात त्यांनी काम केले होते. राजेश खन्नाच्या १६ चित्रपटात त्यांनी त्याच्या बरोबर काम केले होते. शोले मधला त्यांच्या इमामसाबचा”इतना सन्नाटा क्यों है” हा संवाद अनेकांच्या लक्षात असेल. अर्थातच तो “कितनेऽ आदमी थे” इतका गाजलेला नाही. पण बऱ्याच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला असेल. त्यांचा अखेर अखेरीचा सिनेमा अमीर खानचा ‘लगान’.


त्यांच्या दत्तुभाऊ, गजानन देसाई, मि. जोशी, सिंधी शिक्षक, इमाम साब, शंभूकाका अशा सामान्य नावांच्या सर्वसाधारण भूमिकेपेक्षा अगदी वेगळी भूमिका त्यांनी “शौकीन” ह्या सिनेमात रंगवली होती. त्यांच्या परिचित प्रतिमेपेक्षा अगदी निराळी होती. त्या सिनेमात अशोक कुमार, प्रख्यात बंगाली नट उत्तमकुमार सारखे नट होते. पण लोकांच्या लक्षात एके हनगलनी रंगवलेला स्त्रीलंपट म्हातारा लक्षात राहिला.


एकदा दिल्लीत हनगल पंचतारांकित हाॅटेलमध्ये कुठल्याश्या पार्टीला गेले होते. हनगलना आपल्या मित्राकडे जायचे होते. त्यांना तिकडे सोडण्यासाठी सोबत वीस बावीस वर्षाच्या तरुणीला जायला सांगितले होते. पण त्या मुलीने मॅनेजरला हळूच सांगितले,” मी जाणार नाही. मी ह्यांचा “शौकीन” पाहिला आहे!” मग दुसऱ्या पुरुषाला पाठवावे लागले!


बाळासाहेब ठाकरेंनी हनगलवर ते देशविरोधी आहेत असा आरोप केला होता. बहुतेक ही १९९२-९३ ची घटना असावी. कारण काय तर ते पाकिस्तानच्या काॅन्सल जनरलने आयोजित केलेल्या त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला हजर होते. प्रत्येक देशाची वकिलात किंवा काॅन्सल जनरल आपल्या कार्यालयात आपल्या देशाचे स्वातंत्र्यदिन साजरे करतात.तसेच पाकिस्तानची वकिलातही करते. त्यात विशेष काही नाही. हनगलांवर मग ‘बाॅलिवुडनेही अघोषित बहिष्कार घातला होता. वर्ष दोन वर्षे कुणीही त्यांना काम देईना. शिवसेनेच्या धाकामुळे हनगल काम करीत असलेले सिनेमेही थिएटरमधून हळूच काढून घेतले जाऊ लागले. तरी बरे हनगल काही धर्मेंद्र, सलमान खान,आमिर खान,शाहरुख खानसारखे स्टार नव्हते. त्यांना आर्थिक झळ तर बसलीच. हनगल श्रीमंत कधीच नव्हते. तशात हा बहिष्कार. IPTAची नाटकेही अशी कितीशी चालत असणार? हनगल पाकिस्तानच्या काॅन्सलमध्ये त्यादिवशी व्हिसाच्या कामासाठी गेले होते! आपल्या सियालकोट ह्या मूळगावी जाण्यासाठी! नंतर बाळासाहेबांनी,” मी एकेंवर कसलीही बंदी घातली नव्हती” असे जाहीर केल्यावर त्यांना पुन्हा कामे मिळू लागली.


ए.के. हनगल इप्टामध्ये काम करीत असता त्यांच्याबरोबर बलराज साहनी, कैफी आझमी सारखी मंडळीही होती.एकेंनी संजीवकुमारला इप्टामध्ये नाटकात भूमिका मिळवून दिल्या.हीआणि सयाजी शिंदे राजकपूर आणि इतर बरेच नट वा नट्या अतिशय सहज वाटेल असा उत्तम अभिनय करत व संवाद म्हणत त्याचे कारण ते प्रथम रंगभूमीवरचे कसलेले कलाकार होते.


ए. के. हनगल एकदा एका शिष्टमंडळा बरोबर रशियाच्या दौऱ्यावरून परत येत असता त्यांचे विमान तांत्रिक अडचणींमुळे पाकिस्तानातील विमानतळावर उतरावे लागले. तिथे हनगलांना पाहिल्यावर अनेक पाकिस्तानी त्यांच्या भोवती जमले. ते हिंदी सिनेमा, नट नट्या, गाणी,संगीत आणि संगीतकार ह्यांच्याविषयी इतके विचारू, बोलू लागले की हनगलांना दम खायलाही वेळ मिळत नव्हता. ते पुढे सांगतात की तिथे जमलेल्या पाकिस्तानी लोकांना त्यांचा राष्ट्राध्यक्ष महम्मद झिया हुल हक त्याच दिवशी विमान अपघातात ठार झाला ह्याचेही त्यांना भान राहिले नाही! जणू ते आजुबाजूचे जग, सर्व काही विसरून गेले होते!


ए.के हनगल पं नेहरूंचे नातेवाईक होते. हनगलची आई आणि पं नेहरूंची पत्नी कमला नेहरू ह्या चुलत/ मामे किंवा मावस किंवा आते बहिणी होत्या.
ए. के. हनगल ह्यांचे अखेरची काही वर्षे हलाख्याची गेली.२००५ साली त्यांनी अमोल पालेकरच्या सिनेमात काम केले. त्या अगोदर सात आठ महिने आजारपणामुळे घराबाहेर पडले नव्हते. पण सिनेमात कॅमेऱ्यापुढे उभे राहिले की तब्येतीची पर्वा न करता त्यांच्यातील नट बाहेर येई.
त्यांचा मुलगा विजय हा बाॅलीवुड मध्ये कॅमेरामन होता. पण त्यालाही काम मिळेनासे झाले. हनगलांच्या औषधपाण्याचा खर्च परवडत नव्हता. मुलगा विजय हा ७५ वर्षाचा.त्यालाही पाठीचे दुखणे.कुणाला काम नाही. पैसे नाहीत. राज ठाकरेंनी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी थोडी मदत केली. वर्तमानपत्रातून हनगलांच्या परिस्थितीची बातमी आली.त्यावेळच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही मदत केली.


ए. के. हनगल ह्यांना पद्मभूषण देऊन सरकारनेही गौरवले.
२०१२ साली मधुबाला-एक इश्क और जुनुन ह्या TV मालिकेत काम करायला ९७ वर्षाचे ए. के. हनगल व्हील चेअरवरून आले. त्यांना स्वत:लाही आपण काम करू शकू ह्याची खात्री नव्हती. पण “अॅक्शन टेक …” हे ऐकले आणि ए.के. हनगल पुन्हा नट झाले!
आपणा सर्व मराठी लोकांना हनगलांविषयी विशेष आस्था,जवळीक वाटावी व आनंद देणारी गोष्ट म्हणजे त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतला होता! हे त्यांनी, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना देशविरोधी म्हटल्यावर काही वर्षांनी सांगितले!


नऊ-दहा वर्षांपूर्वी पुणे महापालिकेच्या काही कामगार संघटना व पुण्यातील इतर अन्य श्रमिक संघटनांनी ए. के. हनगलांचा सत्कार समारंभ केला. त्या समारंभास मीही गेलो होतो.(आणखी एक कारण म्हणजे समारंभाचे अध्यक्ष माझ्या ओळखीचे औरंगाबादचे डाॅ. भालचंद्र कानगो हे होते. त्यानांही भेटता आले.) लालबुंद गोऱ्या वर्णाच्या ह्या पंजाबी वृद्ध कलाकाराने छोटेसे पण चांगले भाषण केले.


ए. के. हनगलांना ‘ह्या जगण्यावर’ खूप प्रेम होते. दीर्घायुषी असावे असे वाटत असे. सांताक्रुझला एका सामान्य फ्लॅटमध्ये मुलाबरोबर राहात होते. खूप वर्षे जगावे ही त्यांची इच्छा पुरी झाली. २०१२ साली त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्डाचे नूतनीकरण करून घेतले होते. सिनेसृष्टीत पन्नाशी उलटल्यावर येऊन बहुसंख्य भूमिका म्हाताऱ्याच्याच करणारा हा दीर्घायुषी वास्तवात व भूमिकेतीही ‘वृद्ध कलावंत’ २०१२ साली वयाच्या ९८ व्या वर्षी जगाच्या रंगभूमीवरून पडद्याआड गेला!

सुखाचा सदरा

शीव

“ही सगळी चित्रे मी घेऊन जातो. तुम्हाला चार पाच दिवसांत परत पाठवतो.” येव्हढे बोलून त्या माणसाने माझी सगळी चित्रे घेतली.एका चांगल्या कागदात घेऊन आपल्या गाडीत काळजीपूर्वक ठेवली. माझ्याकडे पाहात हात हलवून गेला.

मी काही फुटपाथवर माझी चित्रे मांडून बसलो नव्हतो. आमच्या काॅलेजातील एका झाडाखाली मी व माझे मित्र बोलत होतो. मधून मधून माझी चित्रे दाखवत होतो. आणि हा बूट टाय घातलेला तीस-बत्तीस वर्षाचा तरूण मागे येऊन कधी उभा राहिला ते आमच्या लक्षातही आले नाही. मग चित्रे पाहात, बोलताना त्याने माझे नाव गाव पत्ता सहज विचारूनही घेतला होता! मला हो नाही म्हणू न देता थोडेसे हसत माझी चित्रे घेऊनही गेला. मित्रांनी तर मला धारेवर धरले. “ अरे तू गप्प काय बसला होतास? कोण कुठला आणि एक नाही सगळी चित्रं घेऊन गेला की तुझी ! नुसता बघत काय होतास?” “ तुम्हीही काही बोलला नाहीत! अरे तुम्ही माझे दोस्त ना? तुम्ही का बोलला नाहीत त्याला? आणि मलाच विचारता? जाऊ देऽ! मी काही आचरेकर, सातवळेकरांसारखा मोठा किंवा भोसले आणि यल्ला-चदासी इतका प्रसिद्ध सिने होरडि्ंग्जचा चित्रकारही नाही म्हणा!”

घरी आलो. आई बाबांना काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता. बहिणीला मात्र रात्री सांगितले. ती बराच वेळ काही बोलली नाही. नंतर म्हणाली, उद्या काॅलेजच्या आॅफिसात विचार तो कोण होता ते. दुसऱ्या मुलांनाही विचार. नाहीतर शेवटी प्रिन्सिपाॅलचे पी. ए. आहेत ना डीआरडी, त्यांना विचार तो कोण,होता ते” मी व माझ्या मित्रांनी दुसरे दिवशी काॅलेजातील बहुतेक सगळ्यांना विचारले पण कुणालाच त्याची माहिती नव्हती.मात्र बऱ्याच मुलांनी त्याला पाहिला होता.पीएनां तो भेटला,”पण त्याने कार्ड वगैरे दिले नाही. सर्व एचओडी,मी आणि प्रिन्सिपाॅल मिटींगमध्ये होतो म्हणून तो निघून गेला,” इतकेच ते म्हणाले.

मी त्या आठ दिवसांत एकही चित्र काढले नाही की रेघही ओढली नाही. माझ्या गेलेल्या चित्राच्या चिंतेतच होतो. काल कुरियरचा माणूस एक सुंदर लांब पाकीट “मी इथेच राहतो का,हेच कोटम नगर का” विचारत घरी आला. पाकिटावरचा तो मीच हे समजल्यावर तो चिडचिड करत इथे सही करा.म्हणाला. मी पाकिट घेतले. जातानाही तो आठ्या घालून रस्त्यातले अडथळे उड्या मारत, लांब ढांगा टाकत, पार करत होता. काय करणार मी तरी. आम्ही कोणीच इथे हौसेने राहात नव्हतो!

पाकीट फोडून पत्र वाचले. माझ्या तोंडाचा जो आऽऽ झाला तो मिटेचना. डोळ्यांवर विश्वास बसेना. ते पत्र हातात घेऊन मी तिथल्या तिथेच किती पळालो असेन, दोन्ही हात वर करून किती उड्या मारल्या असतील ते सांगताच येणार नाही. ते पत्र किती तरी वेळा वाचले असेल. बहिणीची वाट पाहात बसलो. पण धीर धरवत नव्हता. मोठ्याने ओरडावेही वाटत होते. घरातल्या घरात फेऱ्या मारत होतो. आईने अरे काय करतो आहेस? काही झालेय का? विचारल्यावर काही नाही म्हणत मान हलवत होतो.

बहिण आल्यावर तिला “इकडे ये” असे हात करून बोलवत होतो. पण ती लगेच आली नाही. तरी बरे एक वर्षाने का होईना लहान आहे माझ्यापेक्षा. ती आली. मी तिला पत्र दाखवले. तिनेही डोळे विस्फारले! पत्रात माझी चार चित्रे कंपनी विकत घेणार आहे. त्या चार चित्रांच्या पुढे त्यांनी किंमत लिहिली होती. हजारोंच्या आकड्यांची ती रक्कम पाहून मला हर्षवायु व्हायचेच बाकी राहिले होते.पत्रात शेवटी लिहिले होते की किंमती मान्य असतील तर कळवावे व परवा आॅफिसमध्ये यावे असेही
लिहिले होते.

बहिणीने मला विचारले काय करायचे? मी म्हणालो,” हो म्हणून कळवणार! “ बहिण म्हणाली,” नाही अजिबात नाही. दोन चित्रांच्या किंमती वाढवून कळव.” ज्या दोन चित्रांच्या किंमती त्यांनी जास्त देऊ केल्या होत्या त्यापैकी एका चित्राची व ज्या चित्रांचे त्यांनी पैसे कमी देऊ केले होते त्यापैकी एका चित्राची अशा दोन चित्रांसाठी मी जास्त रक्कम मागितली. बहिणीने नंतर सांगितले की परवा तुला जमणार नाही असेही कळव. मी तेही लिहून टाकले. आणि तिला विचारले ,” असं का? मग जायचं केव्हा? “ “पुढच्या आठवड्यात मंगळवारी येईन म्हणावे.” मी तेही लिहिले. दुसरे दिवशी पत्र पोष्टात टाकले.

चार दिवसांत त्यांचे त्यांना आम्ही कळवलेल्या किंमती मान्य आहेत व पुढच्या आठवड्यात बुधवारी येण्यास सांगितले. आम्ही पत्र वाचले. मी बहिणीला पुन्हा विचारले,” किंमती का वाढवल्या! वेळ नाही असे का कळवले आपण? अगं,इतके पैसे बघितले तरी होते का? मोजता तरी येतील का? त्यांनी दिलेलेच खूप होते!” ती मला वेड्यात काढत म्हणाली,” म्हणूनच! अरे दादा, तू साधा आहेस. तुझे महत्व वाढवून घेण्यासाठी तसे लिहायला सांगितले.”

माझे महत्व वाढले की नाही ते मला अजूनही माहित नाही. पण माझी बहिण व्यवहारचतुर आहे हे नक्की. मी तिला घेऊनच कंपनीच्या आॅफिसमध्ये पोचलो. बाहेरून ती इमारत पाहताना छाती दडपून गेली. चकचकीत काचांची आणि किती उंच! इमारतीच्या काचेत आकाश, समोरची झाडे, पक्षी, थोडी रहदारी ह्यांची खऱ्या पेक्षा चांगली दिसणारी प्रतिबिंबे पाहात मी थोडा वेळ उभा होतो. दरवाजा लोटण्याची गरजच नव्हती. जवळ जाताच आपोआप उघडला. आत गेल्यावर आतील उंचावरचे छत, आणि गुळगुळीत फरशी. फरशी कशी म्हणायची त्या डोळ्यांना शांत करणाऱ्या मखमली जमीनीला! पाय न ठेवता अलगद जावे वाटणारी अशी ती शोभा होती. आणि झालेही तसेच. लिफ्टमध्ये कसे जायचे हे कोडे सुटण्या आधीच अलगदपणे आम्ही वरच्या मजल्यावरील एका गुबगुबीत कोचात बसलो होतो! समोरा समोरच्या भिंतीवर चित्रे होती. माझीच! जवळ जाऊन पाहिली. काय सुंदर दिसत होती! कोंदणामुळे रत्नालाही अधिकच तेज येते म्हणतात.कधी नव्हे ती माझी बहिणही माझी चित्रे पाहात होती. मी त्याच खुषीत होतो.

समोरून टक्कल पडायला लागेल असे एक चष्मा घातलेले गृहस्थ हसत आले. मला व बहिणीला चला म्हणत ते एका प्रशस्त खोलीत घेऊन गेले.स्वत: खुर्च्या मागे घेत आम्हाला त्यांनी खुर्च्यांत बसवले. आपल्या खुर्चीवर बसल्यावर त्यांनी आमची नावे पुन्हा विचारून ते बोलू लागले. चित्रे केव्हा पासून काढतोस, कोणी शिकवले, वेगळ्या क्लासमध्ये जात होतास का, आवडते चित्रकार कोण असे विचारल्यावर मी दोन चार नामांकित चित्रकारांची नावे सांगितली. पण पुढे जाऊन सिनेमाची मोठमोठी होर्डिंग्ज करणारे, नट-नट्यांना त्यातून मूर्तिमंत उभे करणारे, कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबांना मोत्याचे पाणी देणारे मनोहर,जी.भोसले, यल्ला-दासी ह्यांची नावे मुद्दाम सांगितली! ते ऐकून भुवया उंच करून हसत ते माझ्याकडे पाहू लागले.

आपले काही चुकले असावे वाटून मी बहिणीकडे पाहिले.तिने डोळ्यांनीच व माझ्या हातावर थापटत काही चुकले नाही सांगितले. धीर आला. मग ते उठत आम्ही कुठे राहतो विचारल्यावर मी कोटम नगर म्हणालो.ते गंभीर झाले असावेत. पण लांब पाहावे तसे पाहात उभे होते.आम्हाला वाटले की कोटम नगर खूप दूर आहे की काय! हो का येव्हढेच म्हणत ते आम्हाला घेऊन बाहेर आले.

माझ्या चित्राच्या भिंतीजवळ एका बाजूने आम्ही गेलो. तिथे दरवाजा होता. आम्ही येतोय हे पाहून दरवाजा स्वत:च आपोआप उघडला. आत गेलो तर समोर आरशाची भिंत होती. पण त्यात आम्ही कोणी दिसलो नाही. आमच्या डाव्या उजव्या बाजूला सुंदर झाडे होती! साहेब एका फांदीला धरून होते. लगेच त्या आरशाची चांदण्याची वाट झाली, त्या वाटेवरून मी व बहिण तोंडात बोटे घालूनच चालत होतो! मध्ये एक वरून येणारा धबधबा दिसला. साहेबांनी आम्हाला तिकडे नेले.आम्ही कंपनी,आॅफिस सगळे विसरून पाण्याखाली हात धरले. आजूबाजूला थेंब उडाले.पाणी पिऊन तोंडावरून गार पाण्याचा हात फिरवावा म्हणून ओंजळ तोंडाजवळ नेली पण ओंजळ रिकामी होती! साहेब तो पर्यंत पुढे जाऊन थांबले होते. त्यांनी आम्हाला काय झाले वगैरे काही विचारले नाही. आम्ही पहिल्या साहेबांच्या दालना पेक्षा दुसऱ्या मोठ्या खोलीत आलो.बहुतेक हे आणखी मोठ्या साहेबांचे आॅफिस असावे. साहेब मोठे असतील. पण आमच्या बरोबर आलेल्या साहेबांपेक्षा तरूण होते. ते तोंडभर हसून हाय हॅलो करत पुढे आले.

ते म्हणाले, “ तू पेन्सिल,चारकोल, ब्रशने चित्रे काढतोस. तू काढलेली पोरट्रेट्स पाहिली. अजून सराव चालू ठेव.आणि आमचे आर्ट डिपार्टमेंटचा स्टाफ म्हणत होता की तू आॅईल पेंट तर करच पण आवड असल्यास शिल्पकामही कर.” माझे लहान काम ही मोठी माणसे इतके बारकाईने पाहतात तेच पुष्कळ होते!

मी गप्प बसलेला पाहून पहिल्या साहेबांनी चहा आणायला सांगितला. कुणाला ते समजले नाही. पण रुबाबदार पोषाखातल्या एकाने चहा बिस्किटे आणली. मी व बहिणीने कपात बोट बुडवुन कपात चहा आहे ह्याची खात्री करून घेतली. दोघे साहेबही हसले. मोठ्या साहेबांनी ,” बिस्किटेही खरी आहेत” म्हणत बिस्किट खायला सुरवात केली!

चहा झाल्यावर मोठे साहेब उठलेले पाहून आम्हीही उठलो.”चला” म्हणत बाजूच्या भिंतीकडे गेले. आम्ही तिघेही तिकडे गेलो.भिंतीची लिफ्ट कशी झाली समजले नाही.खाली जातोय की वर हे न समजल्यामुळे मी व बहिण आतून घाबरून गेलो. पण काही क्षणात आम्ही अर्ध चंद्राकार स्टुडिओत होतो.हे आमचे आर्ट,ॲनिमेशन डिपार्टमेंट. पार पलिकडे दिसते ते रोबोटिक्स लॅब आहे साहेब सांगत होते. पण मला ती आपली नेहमीच्या माणसांसारखी वाटली.काही स्त्रिया, पुरूष निरनिराळ्या वयांची मुले; असे पाहात होतो. निरनिराळ्या जागेत बरेच जण काम करत होते. त्यातही तिघे वरिष्ठ असावेत. दोन मोठ्या साहेबांना पाहिल्यावर ते तिघे सामोरे आले. त्यांचे काही बोलणे झाले. ते चालू असता एका वरिष्ठाने मला चित्रकारांच्या घोडीकडे,(फळ्याकडे)नेले. त्यावर कॅनव्हास होते. ते म्हणाले,” तुला वाटेल ते रंगव.” मी म्हणालो,” मला कॅनव्हसवर काढण्याची सवय नाही.” ते हसले. त्यांनी ते कॅनव्हस काढले.खाली दर्जेदार ड्राॅईंग पेपर होता. मी समोरच्या भव्य चंद्राकार काचेत दिसणारे प्रतिबिंबच काढू लागलो. ते पाहून वरिष्ठांना आश्चर्य व माझ्या उत्स्फूर्ततेचे कौतुक वाटले. ते हसले. इतरांनाही त्यांनी खुणेने मी काय रंगवतोय ते पहायला सांगितले.

त्या प्रचंड अर्ध गोलाकार सभागृहात -हो सभागृहा येव्हढा- विशाल हाॅल होता. तिथे काय नव्हते. सर्व कला व कलाकार होते. वादन, गायन, नृत्य, अभिनय सगळे कला प्रकार दिसत होते.शिल्पकला ही चालू होती.कुणी भाषणही करत असावेत. हे सर्व दिसत होते. पण अधल्या मधल्या अदृश्य काचांमुळे काहीही ऐकू येत नव्हते.

मोठे साहेब निघाले म्हटल्यावर आम्ही तिघेही निघालो. पुढे गेल्यावर केसाच्या सुंदर बटे प्रमाणे वळणदार जिन्याची पायरीच पायाखाली आली. समोरचा व मागचा जिना गुंडाळला गेला का नाहीसा झाला ते समजण्या आत दुसऱ्या आॅफिसमध्ये कांचेच्या खुर्च्यावर विराजमान झालो होतो! विराजमानच म्हणायला हवे. सिंहासनासारख्या त्या खुर्च्या होत्या. एका माणसाने मोठ्या साहेबांच्या समोर एक देखणा ट्रे ठेवला. त्यावरचे पाकिट साहेबांनी माझ्या हातात दिले. ते म्हणाले,” हा तुमचा चेक.”. चेक न पाहताच मी तो परत देत म्हणालो,” सर, आमचे बॅंकेत कुठले खाते असणार? मला रोख दिले तर बरे होईल .” साहेबांनी सर्व रक्कम रोख देता येणार नाही म्हटल्यावर बहिण म्हणाली,” सर पाच हजार तरी द्या. आणि बाकीच्या पैशाचा चेक द्या.” तो माणूस पुन्हा आत जाऊन एक पाकिट घेऊन आला. दोन्ही पाकिटे मला दिली. एका पाकिटात चेक व दुसऱ्या पाकिटात पैसे. पाकिटातले पैसे मी मोजायला काढणार इतक्यात बहिणीने कपाळाला आठ्या घालत माझ्या हातून दोन्ही पाकिटे घेतली. पर्समध्ये ठेवली. पहिले साहेब हसले वाटते!

पहिले साहेब म्हणाले,” निघायचे ना?” मोठे साहेबही हो हो म्हणत उठले. आम्ही सगळे पुन्हा माझी चित्रे होती त्या उंच छताच्या शांत आणि प्रसन्न दालनात आलो. येताना मोठ्या साहेबांनी कसे काय वाटले तुम्हाला असे विचारल्यावर मी उत्साहाने सांगितले,” सर, हॅरी पाॅटरच्या जगात,अल्लाउद्दीनच्या गालिचावरून आलो असे वाटले.” साहेब हिरमुसले. विचारात पडून ते ,” खरं?” इतकेच म्हणाले. पहिल्या साहेबांकडे वळून ते काही तरी इंग्रजीत बोलत होते. मला हाॅगवर्ट, मॅजिक, अदभुत व नो नो! We aren’t yet there; असे काही तरी पुटपुटल्यासारखे वाटले. माझ्याकडे पाहात पहिले साहेब मला म्हणाले,” तुला AI, VR, रोबाॅट माहित असेल ना?” मी म्हणालो,” हो,फक्त ऐकून माहित आहे. ‘भास-आभास का हे खरेच आहे’ असे वाटावे असे काही आहे ते. व “Yes; मोठे साहेब म्हणाले. पण आम्ही त्याच्या पुढे जाऊन आभासही प्रत्यक्षात खराच करणार आहोत.” त्यावर माझी बहिण म्हणाली, मग ते तर आता आहेच की.!” “ वास्तव, दिसणारे आणि जाणवणारे त्याच जगात तर आपण आताही आहोतच की सर! तुम्ही आणखीन काय वेगळे करणार?” मीही भर घालत म्हणालो,” आता पलीकडे माणसांसारखे रोबाॅट्स पाहिले. तुम्ही रोबाॅट्सचे जग करणार का? “ त्यावर दोघेही साहेब घाईघाईने ,” नाही! नाही!, तसले काही करणार नाही. ती प्रयोग शाळा आहे. त्यासाठी आम्ही माणसांऐवजी रोबॅट्सचा वापर करतो.” “रोबाॅट्स वाटत होते हालचालींवरून पण सर ती माणसेच दिसत होती” माझी बहिण म्हणाली. त्यावर दोघेही साहेब सांगू लागले नाही ती दिसत असली तरी माणसेही नाहीत. आहे त्या पेक्षा चांगले जग करणार आहोत आम्ही.” “आहे त्यापेक्षा जग चांगले करायचे तर आधी माणूसच चांगला करायला हवा; हो ना? बाकीचे जग तर चांगलेच आहे! आपण काऽय म्हणतोऽ बघा तेऽऽ,” मोठे साहेब पहिल्या साहेबाकडे पाहात विचारत होते. “ Utopia , रामराज्य.”
“Yes, Utopia रामराज्य!”
ते ऐकल्यावर मी अडखळत म्हणालो,” सर मी फार लहान आहे. माझे आजोबा त्यांच्या वेळच्या गोष्टी सांगतांना ते फार उत्साहात आनंदात असतात. त्यांचा काळ ते म्हणतात रामराज्यच होते! माझे वडीलही त्यांच्या शाळा काॅलेजच्या दिवसांच्या आठवणी सांगतात तेव्हाही त्यांना किती बरे वाटते,आनंद होतो ते आम्हाला समजते. ते त्यांचे युटोपिया होते. लागलीच बहिण म्हणाली,” गतकाळ रामराज्यच असते; काल रामराज्य!”
जणू आम्ही दोघेच बोलतो आहोत समजून मी भर घातली,” आजही उद्या कालच होणार! कालचा दिवस युटोपिया असतो.”jj
हे ऐकून दोघे साहेब म्हणाले,” आम्ही आज आणि उद्यालाही युटोपिया, रामराज्यच करणार आहोत!”
मी थोडा वेळ गप्प होतो. नंतर हळूच म्हणालो,” सर! रामराज्य आणि सुखी माणसाचा सदरा दोन्हीही virtual पेक्षाही पुढे पळणाऱ्या, पुसल्या जाणाऱ्या कjल्पना आहेत ना ? सर,तुमची ही कंपनी, आॅफिस पाहताना कल्पनेच्या पलिकडले काही पाहतो आहे असे वाटत होते. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नव्हता. सर, सुखी माणूस दिसला असे वाटले पण इथेही त्याचा सदरा नाही सापडला!” मी थोडे निराशेने म्हणालो असेन. लगेच बहिणीने विचारले ,”तुला मृगजळ म्हणायचेय का?”
मी म्हणालो,”नाही; मृगजळ हा ‘खरा’भास आहे. मला कल्पना किंवा कल्पनेसारखे काही म्हणायचे आहे. कारण कल्पना केव्हा का होईना त्या प्रत्यक्षात येतात! आणि दोघेही साहेब म्हणतात तसे त्यांचेही प्रयत्न वास्तवात येतील.” इतके सगळे बोलत असताना, मी येव्हढा तत्वज्ञानी कधी झालो ह्याचे मलाच आश्चर्य वाटत होते.

दोघेही साहेब उत्साहाने एकसुरात म्हणाले,” YES! YES! लवकरच आम्ही तो सदरा देणार आहोत तुम्हा सर्वांना!” त्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह पाहून कुणालाही उमेद आली असती. मग आम्हालाही का नाही येणार?

मी आणि बहिण निघताना ते म्हणाले,” तुझे शिक्षण पूर्ण झाल्यावर तू आमच्याकडे केव्हाही येऊ शकतोस. तुझी चित्रे घेऊन केव्हाही येत जा. तुझ्या चित्रकलेसाठी आणि कल्पनेसाठीही आमचे दरवाजे नेहमी खुले आहेत!”च

त्यांचा निरोप घेऊन मी आणि बहिण आनंदात हातातल्या पाकिटातील आमचा ‘सुखाचा सदरा’पाहात घरी आलो!

हाके राव

शीव

“दोन इसम पाच रुपये! ते मागचे मामा त्यांचे अडीच घ्या! साहेबांचे साडे चार! “ हाक्के हाॅटेल मधल्या वेटरचे आवाज चालू होते.वडा,वडापाव, मिसळीच्या प्लेटी भराभर ठेवल्या जात होत्या हाक्केभाऊ टेबला मधून फेरी मारत बारकाईने पाहात होते. “अरे, सुभ्या, तीन नंबरला पाणी दे ना”असे थोड्या जरबेनेच सांगत होते. नेहमीच्या गिऱ्हाईकांशी दोन शब्द बोलून परत गल्ल्याकडेल येत होते.
आमच्या गावचा हाक्के वडा प्रख्यात होता.
नगरपालिकेचे गाव होते. महापालिका होण्याला अजून काही वर्षे लागणार होती.
शहर म्हटले की हाॅटेले, ऱेस्टाॅरंट आलीच. रेस्टाॅरंट बरोबरीने आमच्या शहरातही चहाच्या गाड्या, टपऱ्या होत्या. प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकलेली पत्र्याची हाॅटेले होती. हाकेचे रेस्टाॅरंटही बेताचेच आणि बेताच्या मध्यम भागात होते.
हाक्केला शहरातले अनेकजण ओळखत होते. पण निरनिराळ्या नावाने ओळखत होते. काहीजण हाकेराव म्हणत. काही हाके भाऊ,हाक्के दादा म्हणून आवाज देत. काही हाक्केभाय् म्हणत हसून मान झुकवत. हाके हाक्के एकच होता. पण सगळे त्याला त्यांच्या त्यांच्या नावानेओळखत होते.
हाकेच्या बेतशीर हाॅटेलात नेहमीचे पदार्थही मिळत असत. चहा फुल-हाप, स्पेशलही होता. पण तिन्ही चहासाठी काचेचा ग्लास एकच होता. काना एव्हढा लहान नव्हता, पंजा एव्हढा उंच नव्हता, मुठी इतका मध्यम होता. ताटल्या चमचे स्टेनलेसचे होते. हाक्केचा राव-दादा, भाऊ -भाय् होण्यापूर्वी, ‘ए हाक्के’म्हणणाऱ्या गिऱ्हाईकांना मात्र त्याच्या हाॅटेलातल्या ताटल्या चमचे जर्मलचे होते तेही आजआठवत असते.

हाकेचा प्रसिद्ध वडा इतर हाॅटेलांसारखाच होता तरी तो त्याचाच वडा म्हणून का ओळखला जातो ते शहरातल्या अनेक लोकांना समजत नसे. तसे पाहिले तर स्वत: हाक्के भाई,भाऊ-दादा-रावांला सुद्धा लगेच लक्षात येत नाही.

मी,एकदा हाक्केच्या वाॅर्डाचे आजी माजी नगरसेवक आणि नगराध्यक्ष नगरपालिकेच्या प्रकरणांसाठी कोर्टात वकीलांना भेटायला गेलो होतो. वाटेत हाक्केचे हाॅटेल दिसले. नगरसेवक म्हणाले, चला आलोच आहोत तर तुमची हाक्केभाऊंशी ओळख करून देतो.

आम्ही हाॅटेलात आलो नसू तेव्हढ्यात स्वत: हाक्केराव पुढे येऊन नगरसेवकाला व आम्हाला नमस्कार करत आला. त्याच्या गल्ल्याच्या कांऊंटर जवळचे टेबल- खुर्च्या मुलगा साफ करेपर्यंत रेंगाळलो आणि हाक्केने आम्हाला टेबलाकडे नेले. टेबला भोवती गल्ल्यावर विझून गेलेल्या उदबत्तीचा सुवास रेंगाळत होता. आमच्यासाठी वडा पाव आला. आम्ही सगळेच नको म्हणालो. पण नगरसेवकाने घेतला आणि हळूच नगराध्यक्षांना म्हणाला,” घ्या साहेब. हाक्केभाऊला वाईट वाटेल.” हाक्केने हे काहीच ऐकले नव्हते. मग मलाही तो खावा लागला. त्याच्या सुरवातीच्या वड्यासारखाच होता. गरम होता, तेलावर वाफवलेल्या मिरच्यांबरोबर तो चांगला लागला. चहा झाल्यावर आम्ही सर्व निघालो. “तुमच्या वड्याचे एव्हढे स्पेशल काय आहे हो ?” असे नगराध्यक्षांनी विचारल्यावर हाके म्हणाले, “ मी काय सांगणार ? बरीच वर्षे करतोय तसाच अजूनही होतोय.इतकंच साहेब.” असे हाक्केभाऊ म्हणाला.

आम्हाला गाडीपर्यंत पोचवायला हाकेभाऊ आला होता. माझ्याकडे पाहात म्हणाला,” काय रे..काय ..हो, बरेच दिवसात आला नाहीस— आला नाहीत?” “काम वाढलंय. राहायलाही जरा लांब गेलो आहे. पण येत जाईन मधून मधून.” हे मी जरा अडखळतच म्हणत होतो.

गाडीत बसल्यावर नगरसेवकांनी हाक्केभाऊ तुम्हाला कसे ओळखतो असे विचारलेच. लोक म्हणजे मतदार व ते नगरसेवकाला जास्त ओळखतात हे गणित जाणणाऱ्या नगरसेवकांनी विचारल्यावर मी त्यांना जे सांगितले तेच तुम्हालाही सांगतो-
काॅलेजपासून मी त्याला ओळखतो. अगोदर लहान गाडी, मग टपरी आणि आता हे बेताचे का असेना हाॅटेल. काॅलेजला जाता येता मी हक्केच्या टपरीवर येत असे. थोडक्यात वारंवार येत असे.मी येत असे तेव्हा कोणी ना कोणी एक दोघे गरीब माणसे वडापाव खाऊन पाणी पिऊन जाताना,”हाकेदादा येतो. लै बरं वाटलं बघं, पोट कसं गार झालं”म्हणत जात असत. पैशे हाक्के मागत नसे,ती माणसे देत नसत. एकदा विचारु का नको असे ठरवत मी त्याला विचारले,”ही अशी माणसं रोज येतात का?” “ हां येतात.” हे केव्हा पासून चाललं आहे?” “अरे माझी हातगाडी होती तेव्हापासून.” तो सहज नेहमीच्या आवाजातच बोलत होता. काही वेळा मी चहा वडा काही घेत नसे. थोडावेळ गप्पा मारून जात असे. त्यातच जून जुलै महिन्यात त्याच्या टपरीत थोड्या पाटी पेन्सिली वह्या दिसल्या. मी काही विचारले नाही. पण सात आठ दिवसांत ते सामान सगळे संपले होते. मी समजलो.

हे ऐकल्यावर नगरसेवक आणि नगराध्यक्ष गप्प बसले होते. विचारात पडलेले दिसले. आठ दिवसांनी त्यांनी मला त्यांच्या दालनात बोलावून घेतले. नगरसेवकही होते. अध्यक्ष म्हणाले , “ तुम्ही सांगितल्यावर लक्षात आलं की हाक्के हे काम बरीच वर्षे करतोय. आपण त्याच्या करता काही करावे असे वाटतंय.” मी म्हणालो,” नगरपालिकेने काही करायचे म्हटले तर सभा, ठराव,पैसा, मंजुरी आणि शिवाय एकट्या हाक्केलाच का दुसऱ्यांनाही का नको असे फाटे फुटणार.हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.” त्यावर ते गप्प बसले. थोड्या वेळाने म्हणाले,”मीही विचार करतोय त्यावर. पण तुम्ही त्याच्याशी बोला ह्यावर; एकदम काही सांगू नका. त्याला काय वाटते ते महत्वाचे आहे.” “ मी म्हणालो, “ बरोबर आहे तुमचे. पण थोडा वेळ लागेल.” ते म्हणाले, “हरकत नाही.”
काही दिवसांनी मी हाक्केच्या हाॅटेलात गेलो. मी एकटा हे पाहून त्याला बरे वाटलेले दिसले. नेहमी प्रमाणे पूर्वीच्या दिवसांची भराभर उजळणी झाली.,मी सहज इतकेच विचारले,”हाक्केराव, अजून चालू आहे का?” “ ते कसं बंद पडेल? गरीबी चालूच असते!” आता महागाई वाढत चाललीय. जास्त लोक गरीब होत आहेत असं वाटतेय.”मी म्हणालो,”तू एकटा पुरा पडशील?” छ्या:काय बोलतोस! “ अरे तुला माहित आहे तेव्हाही माझ्या डोक्यात कधी हे आलं नाही. अरे मी केव्हढा आणि गरीबी केव्हढीऽ!”
पुन्हा आठ दिवसांनी गेलो. त्याला म्हणालो की,”आम्ही तुला त्या वडापावाचे पैसे दिले तर चालतील का?”
हाके विचारात पडला. “माझ्या हाॅटेलात बिल तिकिटावर लिहून देत नाही आम्ही. पोरं ओरडून सांगतेत.तुम्हाला पावती बिलं लागणार. कुठून देणार? तुम्ही स्वत: देणार का म्युनसिपालटी देणार आहे? रोजचे रोज देणार का महिन्याला ?” हाकेला मी तिथेच सर्व सांगू शकलो असतो. पण म्हटले थोडा वेळ घ्यावा.
आमच्या तिघा चौघांत बरीच भवति न भवति होऊन तूर्तास रोजचे रोज द्यावेत म्हणजे किरकोळ खर्चात रक्कम टाकता येईल. हाकेच्या माणसाने मला किंवा नगरसेवकाला भेटावे. व हाकेचा कागद दाखवून पैसे घेऊन जावेत ठरले. मी हाक्केभाऊला तसे सांगितले. तो म्हणाला, “मुलगा दुसरे दिवशी सकाळी येईल. कारण रात्री अकरा पर्यंत हाॅटेल बंद होते.”

सुरळीत सुरु झाले.माझ्या आणि हिशेबनीसाच्या एक गोष्ट लक्षात आली. सर्वसाधारणपणे रोज पाच सहा वडापावचे बिल येई. कधी बिलच नसे.तर आठदहा दिवसांतून एकदम दहा बारा वडापावचे पैसे द्यावे लागत. महिन्यानी हाक्केदादाला बोलावले. तो आला. नगराध्यक्षाचे दालन, गुबगुबीत खुर्च्या काचेखाली हिरव्या फ्लॅनलचा टेबल क्लाॅथ असलेले मोठे टेबल वगैरे पाहून सुरवातीला तो बिचकला असणार. पण थोडे हवापाण्याचे बोलणे झाल्यावर त्याला नगरसेवकांनी, आम्हाला पडलेला प्रश्न विचारला.त्यावर हाकेभाऊ म्हणाला, “साहेब, गरीब झाला तरी त्याला रोज फुकट खायला गोड वाटत नाही. दोन वेळचे पोट अर्धवट भरले आणि दुसरे दिवशीचा सकाळच्या चहा बटेर पुरते मिळाले तरी ते येत नाहीत. तुमची गरीबीची रेघ का काय म्हणता ती मला समजत नाही. पण मी पाच सात रुपयापासूनचे दिवस पाहातोय; आता वीस पंचवीस मिळाले की माणसे येत नाहीत. म्हणून कधी दोन चार तर कधी सहासात तर मध्येच एखादा दिवस आठ- दहा जण येतात.”
ह्या अधिकृत अनधिकृत योजनेला सहा महिने झाले. पुन्हा आम्ही हिशेबनीस आणि हिशेब तपासनीसासह सगळे हाक्केदादाकडे गेलो. मुद्दामच रात्री गेलो. काही तरी उपाय करावा लागणारच होता. सर्वांच्या सरळपणा आणि प्रामाणिकपणावर चाललेली ही हाकेभाऊच्या धर्मार्थ कामाला आमची निम्मी मदत चालली होती. मदत निम्मीच करा हेसुद्धा हाकेभाऊनेच सांगितले होते. पण काही चांगले ठोस व्हायला पाहिजे असे आम्हाला वाटत होते. त्यातूनच बोलता बोलता ‘वडा पाव, पाव-मिसळ’ योजना का काढू नये? हा विचार पुढे आला. आमच्यापैकी बहुतेकांचे म्हणणे असे की हे नगरपालिकेचे काम नाही. हाक्केभायने सुचवले,” अहो सब्शिडी म्हणा की ग्रॅन्ट द्या कुणाला. चालव म्हणावे.” लगेच आम्ही सर्वजण एकसुरात म्हणालो, दादा, तुम्हीच चालू करा. आम्ही देऊ ! बघा! केव्हा करता सुरू?” “साहेबांनो, जागा पाहण्यापासून सुरुवात आहे. रोजचे पोट हातावर असणाऱ्यांच्या सोयीचे ठिकाण पाहिजे.” पण नक्की झाले.
एकदिड महिन्यात हाकेदादाचा निरोप आला. जागा ठरली. तुम्ही पाहायला इथे इथे या. आम्ही गेलो. आम्ही कोण हो नाही म्हणणार? पाण्याचा नळ द्या साहेब तेव्हढा.” इतकेच तो म्हणाला. तेही काम झाले. चांगल्या पत्र्याच्या मंडपात वडा वडापाव आणि मिसळ पाव केंद्र सुरु झाले. सर्व साधारण गिऱ्हाईकालाही प्रवेश होता. पण त्यांना नेहमीच्या दराने पदार्थ मिळत.पहिल्या दिवशी सर्वांनाच कोणताही पदार्थ मोफत होता. नगराध्यक्ष म्हणाले, “हे ठिकाण गरीबाच्या उपयोगी पडावे ह्यासाठी आहे. त्यांनी यावे. पण केंद्राची भरभराट होवो असे मात्र मी म्हणणार नाही. अडीअडचणी वेळी काही तरी आधार असावा ह्या साठी हे केंद्र हाक्केदादांनी काढले आहे.”
दोन महिन्यात आणखी केंद्र दुसऱ्या भागात काढले. हाकेची दोन्ही मुले ती सांभाळू लागली. हाकेदादा दर दिवशी एकदा एका केंद्रावर जाऊन यायचा.

दिवस जात होते. केंद्रावर आता सर्वसाधारण गिऱ्हाईकांचीही ये जा वाढू लागली. गल्ल्यात भर पडू लागली.केंद्रावर तसेच पहिल्या हाॅटेलमध्ये अजूनही गरीब मजूर कामगार येत असत. हाकेदादाला तोंडभरून आशिर्वाद देऊन, कोणी शुक्रिया जी करून जात असत.

नगरपालिकेची महापालिका झाली. आजूबाजूची गावे सामील झाली. शहर वाढू लागले. हाकेदादांनी आपल्याच हाॅटेलातील चार पोरांना दोन हातगाड्या आणि थोडे पैसे देऊन वाढलेल्या वस्तीत गाड्या चालवायला दिल्या. त्यांना स्वतंत्र व्यवसाय दिला. तेच मालक! एक म्हणाला, दादा, मी चायनीजची गाडी काढणार तर दुसरा म्हणाला,आम्ही सॅन्डविचची! हाकेराव म्हणाला,” बरोब्बर! काही तरी नवीन करा.”
हाकेरावच्या मदतीला त्याची बीकाॅम शिकलेली काॅन्प्युटरचा कोर्स केलेली मुलगी अर्धा दिवस हाॅटेल चालवू लागली. हाकेरावला दोन्ही केंद्राकडे जायला मिळू लागले. मुलगी अर्धा दिवस टॅलीचे शिक्षण घेत होती. यथावकाश तेही पूर्ण झाले. केंद्रावर दोन्ही मुलांनी माणसे चांगली तयार केली होती. महापालिका झाल्यामुळे आजूबाजूच्या सरहद्दीवरचे गरीबही येऊ लागले. आधीच्या गरीबांच्या गर्दीत नविन गरीब आले.

महापालिकेने गरीबांच्या उपयोगाची आणखी दोन केंद्रे काढली. शिकलेली पण बेकार दोन चार तरुण मुले ती चालवू लागली. महापालिकेने हाकेरावला चारी केंद्रावर मानधनावर देखरेख करून चांगली घडी बसवण्याचे काम दिले. ते काम पाहू लागला.पहिल्या हाॅटेलवर तोंडभर आशिर्वाद देणाऱ्यांचीही वाढ होऊ लागली. हाकेभाऊंनी पूर्वी प्रमाणेच आपली प्रथा चालू ठेवली होती.मुलीला पूर्णवेळ नोकरी लागली. हाकेदादाची तारांबळ होऊ लागली. पण विश्वासू नोकर व दोन्ही मुलांची मदत ह्यामुळे सर्व निर्धास्त चालले होते.

दिवस वर्षे सरत होती. हाके थकला होता. महापालिकेत मला किंचित बढती मिळाली होती. मी कधी मुद्दाम वेळ काढून हाकेभाऊंना भेटत असे. आठवणींना उजाळा देऊन झाले की म्हणायचा,” बघ तुझ्या समोर किती घडून गेले. आपल्याला चांगले दिवस लवकर आले.”

हाकेराव थकले होते. मुला मुलींचे संसारही चांगले चालले होते. आलेला माणूस जाणार ह्या न्यायाने कुणाचा हाके भाऊ-हाकेदादा-हाकेराव- हाक्केभाई गेले. अंत्यात्रेला अनेक लोक होते. हार जाड जूड नव्हते. माळा म्हणाव्या तसे होते. वर वर जात चाललेल्या गरीब रेषे खालची हाकेभाऊ-दादाची मंडळी खूप होती. ते लोक आपले डोळे पुशीत चालत होते. अंत्ययात्रा वेगळी होती.

काही विद्यार्थी विद्यार्थिनी वही पुस्तके कंपास पेट्या छातीशी धरून चालले होते.कुणी क्रिकेटची बॅट, हाॅकीची स्टिक बंदुकी सारखी खांद्यावर घेऊन चालत होती; काही पोरं पेन्सिली, बाॅलपेन फूटपट्ट्या घेऊन आली होती. बऱ्याच आयाबापड्याच्या कडेवरच्या आणि बोट धरलेल्या मुलांच्या हातात खेळणी होती.थोड्या मुली नविन ड्रेस घालून आल्या होत्या. शाळेतली काही पोरं दोन पुड्यांचे मधल्या सुट्टीचे डबे मधूनच कपाळाला लावून हुमसत होती. पदवीचे झगे घातलेले दोन तीन तरूण आपले ओघळणारे डोळे,चेहरे लपवत होते. ही गर्दी वेगळी होती.

चिरायु होवो, अमर रहे असे कापडी फलक नव्हते. बॅन्ड नव्हता, टाळ मृदुंगही नव्हते. तीन हलगीवाले वाजवण्याचा प्रयत्न करीत होते. पण आवाज निघत नव्हता. अंत्ययात्रेत कृतज्ञतेचे हुंदके होते.ही गर्दी तशी वेगळीच होती!
हाकेभाऊची अंत्ययात्रा पाहिली आणि आम्हा सर्वांचे, ‘हाक्केरावसाठी आपण कितीऽ केल्याचे’ अहंकाराचे तरंगते फुगे हवेतच फुटले.

स्मशानभूमीत कोणी भाषणे करू शकले नाहीत. जमलेल्यांच्या मनात संभाषणे चालू होती
स्मशानातून परतताना हिशेबनीस व हिशेब तपासनीसांनी हाकेरावची एक गोष्ट सांगितल्यावर तर आमच्या सर्वांचा उरला सुरला गर्वही गायब झाला. ते म्हणाले,
“ हाक्केदादांनी मानधनही कधी घेतले नाही!”

अखेरीच्या दिवसात मी जेव्हा हाकेभाऊला अजूनही त्याच्याकडे गरीब बऱ्याच संख्येने येतात; तुम्ही त्यांच्यासाठी कायमचे करत आलात, असे म्हटल्यावर हाकेराव थोडा वेळ गप्पच होते. मग म्हणाले, “ करता येईल तेव्हढं करायचे. काही करायचे असे ठरवून कधी केले नाही. ती माणसे दोन तीन तास तरी त्यांची भूक विसरत होते.दुसरं काय !”

पद्मश्री,नगरभूषण सारख्या पदव्या हाकेसारख्या माणसाच्या वाटेला जात नाहीत. त्या पदव्यांपेक्षा फार मोठ्या ‘हाकेराव, भाऊ, दादा, हाकेभाय’ ह्या पदकांच्या माळा त्याला जास्त शोभत होत्या.

हाकेभाऊ गेल्यानंतर काही दिवसांनी मी,माजी नगराध्यक्ष,आणि ते नगरसेवक बोलत होतो. मी नगराध्यक्षांना म्हणालो, “ पहिल्या भेटीत तुम्ही हाकेरावना त्यांच्या बटाटे वड्याचे वैशिष्ठ्य काय विचारले होते, आठवतेय ना?” ते लगेच उत्तरले,” हो हो आणि त्यांचे उत्तरही आठवते! “ हाकेराव म्हणाले होते की ते पूर्वी जसा करत तसाच आजही तो बनतो, इतकेच.”
आम्ही सगळे थोडा वेळ गप्पच होतो. हळू हळू आमच्या लक्षात आले की हाक्के वड्याची प्रसिद्धी त्याच्या चवीमुळे नव्हती; ते बनवणाऱ्या माणसामुळे होती! ‘सामान्यांसाठी सामान्यांचा’ हाकेराव सामान्य होता!
‘सामान्यांच्या सामान्य’ हाक्केभाऊनी गावाने देऊ केलेले मानधनही घेतले नव्हते!

महाभारताची थोरवी

महाभारताच्या (पहिल्या) आदिपर्वातील अनुक्रमिणी ह्या पहिल्या अध्यायातच ऋषी लोमहर्षण सौती महाभारताचा संक्षिप्त रूपांत आढावा घेत सारांश सांगतो. तो सांगून झाल्यावर तो महामुनि महाभारताची थोरवी सांगतो ती ऐकण्यासारखी आहे. हे तो ३५ते ३९ व नंतरच्या ३८९-३९६ ह्या काही श्लोकांतून स्पष्ट करतो.महाभारताची ती महति, श्रेष्ठत्व ऐकू या:

मोक्षप्राप्तीची इच्छा करणारे(मुमुक्षु) वैराग्याचा आश्रय करतात त्याप्रमाणे योग्य अर्थवाही शब्दांतून व त्यांच्या रमणीय अर्थाने परिपूर्ण असलेल्या, अनेक आचारांचे वर्णन असलेल्या ह्या आख्यानाच्या अभ्यासातील (जिज्ञासेमुळे जाणीवपूर्वक वाचन) आनंदात अनेक बुद्धिमान लोक मग्न असतात.

जाणून घेण्याच्या (ज्ञेय) वस्तूंमध्ये आत्मा श्रेष्ठ ज्ञेय आहे, स्पृहणीय गोष्टींमध्ये आपले जीवित श्रेष्ठ असते त्याप्रमाणे सर्व शास्त्रांत सर्वांपेक्षा मोठा आशय व्यक्त करणारा हा भारत नावाचा ग्रंथ अग्रगण्य आहे.

अन्नपाण्यावाचून शरीराचे पोषण व धारणा होऊ शकत नाही त्याप्रमाणे भारत नावाच्या आख्यानाचा आश्रय घेतल्यावाचून कोणतीही कथा अस्तित्वात येऊ शकत नाही .

आपली उन्नती व्हावी, उत्कर्ष व्हावा म्हणून सेवक चांगल्या कुळातील प्रतिष्ठित व्यक्तींकडे काम करतात त्याप्रमाणे कविही आपल्या अभ्युदयासाठी भारताचे चांगले अध्ययन करतात. ( कविनांही भारतातील आख्याने आणि वर्णने ह्यांच्यापासून स्फूर्ति मिळते.)

जगातील दैनंदिन व्यवहार आणि वेदवित्या( सर्व विषय व शास्त्रांच्या विद्येची माहिती व ज्ञान) ह्यांचा सर्वाधार असलेली वाणी ज्याप्रमाणे स्वर व व्यंजने ह्यांच्यामध्येच पूर्ण सामावलेली आहे त्याप्रमाणे महाभारत नावाच्या सर्वश्रेष्ठ इतिहासात सर्व उत्कृष्ठ ज्ञान सामावलेले आहे.


ह्यापुढचे सांगणे महत्वाचे आहे:
जगामध्ये कोणताही विषय असा नाही किंवा मानवी स्वभावाचे पैलू नाहीत की जे महाभारतात आले नाहीत. किंबहुना महाभारत म्हणजे मानवी स्वभाव व वर्तणुकीचा स्वच्छ आरसा आहे.
महाभारताची थोरवी, त्याचे विशाल व्यापक तितकेच सखोल रूप हे दृष्टान्त रुपकातून सांगताना त्याचे भाष्यकार पुढे म्हणतात:

वेद वेदांग आणि उपनिषदे ह्यांचे ज्याने विचारपूर्वक अध्ययन केले पण पण त्याने महाभारताचा सखोल अभ्यास केला नसेल तर तो ‘प्रज्ञावंत’ ह्या पदवीला पात्र नाही असे समजावे!
ह्या महाभारतात काय नाही? ह्यामध्ये श्रेष्ठ धर्मशास्त्र आहे. अर्थशास्त्र आहे. इतकेच नव्हे तर कामशास्त्रही (सर्व वासनांचा समावेश काम ह्या शब्दांत होतो) आहे.

कोकिळेचे कूजन ऐकल्यावर कावळ्यांची काव काव कोणी ऐकेल का? ती ऐकायला कुणाला आवडेल! तसेच महाभारताचे हे आख्यान ऐकल्या-वाचल्यावर दुसरे आख्यान, साहित्य ऐकायला,वाचायला आवडणार नाही.

जरायुज( वारेतून जन्मणारे पशु. मनुष्य वगैरे), अंडज(अंड्यातून जन्मणारे पक्षी, साप, पाली वगैरे), स्वेदज(घामातून जन्मणारे ढेकूण, पिसवावगैरे), उदभिज( मातीतून ) ,फोडून वर येणारे वनस्पति वगैरे), अशी चारही प्रकारची सृष्टी पंचमहाभूतांपासून व अंतरिक्षावर अवलंबून असते त्याप्रमाणे महाभारतावर पुराणे अवलंबून आहेत.


पुढे अध्यात्मिक तत्वज्ञानाची उपमा देताना सर्व इंद्रियांकडून होणारी क्रिया कर्मे ज्याप्रमाणे मनांतील विविध विचार विकारांवर अवलंबून असतात त्याप्रमाणे ह्या जगातील सर्व विचार हे महाभारतावर अवलंबून आहेत असे मोठ्या गौरवाने ते म्हणतात.

अथांग सागरातून तरून जाणे नावेच्या मदतीने सोपे होते तसे ह्या अतिशय उत्कृष्ठ व गहन आशयाने भरलेल्या महाभारत नामक आख्यानाचे विचारपूर्वक वाचन किंवा श्रवण केले असता व्यवहाराच्या गुंतागुंतीत योग्य तऱ्हेने वाागणे सोपे होते.