भगवंताने भक्तासाठी किती करावे!

शीव/चुनाभट्टी

हरिकृष्णाने आपल्या सगळ्याच भक्तांना मदत केली. नरसी मेहतासाठी मात्र तो वेळोवेळी धावून गेला आहे. ठळक आख्यायिका आणि कथांवरून तो दोन तीनदा तरी धावून गेला असे दिसते. खरे तर भक्ताला तो सतत आपल्य पाठीशी आहे ह्याची खात्री असते .पण लोकांना मात्र त्याचा परिणाम दिसल्यावाचून खात्री पटत नाही. श्रीहरीने नरसी मेहत्याची पत राखली. प्रतिष्ठाही वाढवली.


नरसी मेहत्याचा जन्म जुनागडला नागर ब्राम्हणाच्या पोटी झाला. नरसी मेहताची रीतीप्रमाणे मुंज झाली. पण त्याच्या नशिबी आई वडीलांचे सुख नव्हते. मुंज झाल्यानंतर त्याच्या चुलत भावाने त्याचा सांभाळ केला.


बालसुलभ स्वभावाप्रमाणे नरसीचे लक्ष गल्लीतल्या मुलांबरोबर खेळण्या हुंदण्यात जास्त होते. तो आणि त्याचे सवंगडी कोणते खेळ खेळत ते आपण संतकवि महिपतीबुवांच्या ओव्यांतूनच ऐकू या. आज यातले अनेक खेळ लुप्त झाले आहेत. लगोरी लपंडाव विटीदांडू आपण आता आतपर्यंत खेळत होतो. भोवराही फिरवत असू. पण महिपतीबुवांनी वर्णिलेले खेळ १८व्या शतकातील आहेत. किती विविध तऱ्हेचे आहेत!

“गावची मुले खेळती सकळ।। इटीदांडू लगोरिया। चुंबाचुंबी (!) लपंडाया। हमामा हुंबरी घालोनिया।पाणबुडियां खेळती।।वाघोडी आणि आट्यापाट्या।झिज्या बोकट अगलगाट्या। भोवरे चक्रे फेरवाट्या ।देती काट्या सत्वर।।”

असे रोज निरनिराळे खेळ खेळून हुंदडून पाण्यात पोहून डुंबून तो एकदा खूप दमला.तहान लागली.घरी आला. वहिनीला पाणी मागितले. तिने पाणी दिले पण,” नुसते दिवसभर गावात गप्पा मारत टवाळ्या करायच्या. खेळायचे हुंदडायचे आणि घरी येऊन फुकटचे हादडायचे! काम नको, कमवायला नको. भावाच्या जीवावर बसून आयते खायचे!” हे सुद्धा ऐकवले.किती बोलावे तिने! काय काय ऐकवले तिने नरसीला!

नरसी मेहता आवंढ्यांबरोबर पाणी प्याला खरे पण तो रडवेला होऊन तिरिमरीत घरातून निघाला तो थेट गावाबाहेर दूर चारपार मैलावर असलेल्या अरण्यात गेला. एक जुनाट महादेवाचे देऊळ दिदसले. पिंडीला मिठी मारून तो ढसढसा रडू लागला. आणि पिंडीवरच डोके टेकून झोपी गेला. अन्नपाण्यावाचून तो सात दिवस तसाच पडून राहिला.

शंकराला दया आली. त्यांनी नरसीच्या खांद्याला धरून हलवले. उठवले. “बाळ काय पाहिजे तुला? हवे ते माग!“ नरसी खराच लहान म्हणायचा. तो म्हणाला, शंभोमहादेवा, मी लहान आहे. काय मागायचे ते मला समजत नाही.” “ अरे पण तुला काही तरी हवे असे वाटत असेल की!” शंकर असे म्हणाल्यावर नरसी म्हणाला,” शंकरदेवा मी काय मागायचे ते मला खरच समजत नाही. नाही तर असे कर ना? तुला प्राणाहूनही प्रिय असेल ते मला दे !” नरसीचे हे मागणे ऐकल्यावर शंकराला त्याच्या चतुराईचे कौतुक वाटले. भोलेनाथ आनंदाने म्हणाले,” मला कृष्ण फार प्रिय आहे. तोच तुला मी देतो. चल.” इतके बोलून शंकराने नरसीला गोपीचा वेष दिला. चांगले नटवले. त्याचा हात धरला व क्षणार्धात त्याला घेऊन गोकुळातल्या कालिंदी काठी आले.


तिथल्या सुंदर उपवनात श्रीकृष्ण गोपींबरोबर रास लीला करत होते. (त्या रासक्रीडेचे बरेच स्पष्ट वर्णन महिपतीबुवांनी केले आहे.) प्रत्येक गोपीच्या मनात कृष्ण आपला व्हावा ही इच्छा झाली की कृष्ण तिला आलिंगन देऊन तिथे रमायचा. गोपी मथुरेहून आल्या. वृंदावनातून आल्या. गोकुळच्याही होत्या नव्हत्या सर्व येऊ लागल्या. तस तसे श्रीकृष्णही तितकेच होऊ लागले. प्रत्येकीचा श्रीकृष्ण रासक्रीडा करू लागला.रासक्रीडा रंगात आली होती. शंकराने हळूच गोपी-नरसीलाही त्यांच्यामध्ये सोडले.

स्वत: कृष्ण ह्या नव्या गोपीजवळ आले. निरखत पाहात म्हणाले,” तू गोपी काही इथली दिसत नाहीस.तू तर मला नरसी दिसतोस जुनागडचा. भगवान शंकर कुठे आहेत ?” असे म्हणतच कृष्ण नरसीगोपीला घेऊन शंकराजवळ आले. शंकर म्हणाले ,”कृष्णा हा माझा भक्त नरसी आता तुझा झाला.” हे ऐकताच नरसीने कृष्णाच्या पायावर डोके ठेवले. कृष्णाने त्याला वर उठवले.त्याला मिठी मारून त्याला आपला केले. ते नरसीला म्हणाले, नरसी आता तू निश्चिंतपणे जा. मी आता तुला माझा म्हटले आहे. आता तू माझा आणि मी तुझा.” आणि हो,नरसी, इथले रासमंडळ, रासलीला तू स्वत: पाहिली आहेस. हे सर्व तू कवितेत लिहून काढ.” गुजराती ऱ्भाषेत नरसी मेहत्यांनी कुंजवनात पाहिलेला रासमंडळ कवितेत लिहून काढले.त्याचे “रासमंडळ” काव्यग्रंथ आजही गुजराथमध्ये आवडीने वाचला जातो.

नरसी मेहताला शंकराने पुन्हा जुनागड जवळच्या जंगलातील जुन्या शंकराच्या देवळात आणून सोडले व ते गुप्त झाले.

शंकराचा हा वैष्णव भक्त तिथे हरिनाम घेत हरीचे कीर्तन करू लागला. सगळीकडे इथे एक वैष्णव हरीकृष्णाचे फार मधुर कीर्तन करतो ही बातमी पसरली. नरसी मेहत्याचा भाऊही तिथे आला. त्याने आपल्या नरसीला लगेच ओळखले. मोठ्या प्रेमाकौतुकाने घरी नेले.


नरसी मेहता,महान नरसी भगत म्हणून ओळखला जाऊ लागला. घरचा व्यवसाय अंगावर पडला तरी त्याने तो आपल्याला चिकटू दिला नाही. यथावकाश नरसी मेहत्याचे गावातल्याच एका वैष्णवाच्या मुलीशी लग्न झाले. संसार रोजच सुखाचा होऊ लागला. नरसी मेहत्याला एक मुलगा आणि मुलगीही झाली. संसार फळाला आला.


दिवस वर्षे भराभर जात होती.नरसी मेत्याचा मुलगाही लग्नाचा झाला. नरसी मेहत्याच्या मुलाच्या लग्नाचा सोहळा पाहावा ऐकावा तितका अदभुत आहे. तोही आपण पाहू या.

सदाशिव पं. कामतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *