Category Archives: Commentary

‘एका’ लग्नाच्या गोष्टी

बेलमाॅन्ट

माझ्या आठवणीतील शाळेत शिकलेली व व्यवहारात असलेली वजने मापे, अंतर, मोजण्याची कोष्टके बरीच विसरलो आहे.काही चुकीचीही लक्षात असतील. पूर्वी छटाक, तोळा मासा,अदपाव, अशी बरीच मापे होती. आठवायचीच तर सोन्यापासूनच सुरुवात का नको?


सोने तोलायचे असेल तर गुंजा, मासा,व तोळा ही वजने वापरली जात.८ गुंजा= १ मासा ; १२ मासे = १ तोळा
तोळ्याच्या पुढचेही मोठे वजन असेल. पण ५-६ माशांच्या पुढे सोन्याची कल्पनाच नसल्यामुळे तोळा हेच शेवटचे वजन आमच्यासाठी होते. कित्येक कुटुंबांचा सोन्याचा संबंधही घरातल्या बहिणींच्या लग्नावेळीच येई.


प्रत्येकाला लग्ने काही काव्यात्मक गोष्टींनी लक्षात राहतात. पण काही गद्य भागही लक्षात राहण्यासारखा असतो. त्यातील सगळ्यांत मोठा गद्य पण नाट्यमय भाग म्हणजे लग्नाच्या ‘याद्या’! याद्या करताना दोन्ही बाजूंचे -मुला-मुलीचे- वडील काका मामा किंवा अगोदर झालेले व्याही व असलाच तर घरोब्यातील मित्र. पण मित्र किंवा शेजारी फार क्वचितच असत. शेजारी येतच नसत. कारण नंतर त्यांना उखाळ्या पाखाळ्या काढायला वाव राहात नाही !
राजकीय, परराष्ट्रांच्या किंवा मालक आणि कामगार नेते किंवा उद्योगातील दोन मोठ्या उद्योगपतींच्या वाटाघाटीत जशी मुरब्बी बेरकी लोक असतात तशी लग्नाच्या याद्यांच्या वेळीही दोन्ही बाजूंकडे असे एक दोघे असत.

सुरुवात कोणी करायची व तोंड कुणी, केव्हा,कोणाला कोणत्या बाबतीत, द्यायचे ह्याची रंगीत तालीम, दोन्ही कडचे नानुकाका, आबामामा, गुंडोअप्पा, धोंडोपंत अशी वाकबगार उस्ताद मंडळी, करून आली असत. सगळ्यात खणाखणी सुरु व्हायची जेव्हा मानापानाच्या बाबतीत व हुंडा (रोख) व दागिने किती तोळ्यांचे ह्या मागण्यांचा तिढा सोडवायच्या वेळी होत असे. आवाज चढलेले असत, सभात्यागाच्या नाटकांतील प्रवेश दोन्ही बाजूंकडून होत. मध्येच दोन्ही कडचे प्रमुख वाटाघाटीवाले आणि मुलाचे व मुलीचे वडील आपापल्या विंगेत जाऊन कितपत ताणायचे,कशात किती ढील द्यायची हे ठरवून पुन्हा रंगभूमीवर प्रकट व्हायचे.

त्यातही नाट्य वाढवण्यासाठी कुठल्या तरी एका बाजूच्या मागच्या खोलीतून खाणाखुणांतून बोलावले जायचे! त्यावेळी दोन्ही बाजूच्या आया, लेकाच्या किंवा लेकीच्या सुखासाठी, “आता हे स्थळ तरी हातचे जाऊ देऊ नका!” अशी भरल्या गळ्याने सुचवले जात असायचे. पण दोन्ही कडची पुरुष मंडळी रस्सीखेच, कुस्तीचे डावपेच, रबर किती ताणायचे त्याची लांबी व वेळ हे सगळे कोळून प्यालेले असत. मग कुठल्या तरी सामान्य बाबीत देवाण घेवाण व्हायची. मध्ये पुन्हा चहा यायचा. त्यामुळे पुन्हा तरतरीत होऊन आवाज वाढू लागत.

अखेर किती तोळ्यांचे दागिने, मुला-मुलीचा पोशाख कुणी व काय काय आणि किती म्हणजे शालू कोण घेणार व वरमाईला किती भारी किंमतीचे किंवा पद्धतीचे लुगडे,शाल ह्याची चर्चा. कुणा कुणाचे मानपान कसे करायचे ह्याचीही तपशीलवार बोलणी व्हायची. मग मुलाकडची किती माणसे आदल्या दिवशी व लग्नाच्या दिवशी किती ह्यावर चकमकी झडून एकदा ‘याद्या ‘ नावांचे प्रकरण संपायचे.

याद्या म्हणजे एकप्रकारचा करारनामा किंवा तपशीलवार मान्य कलमे किंवा मिनिटस् म्हणायची. तोंडीपेक्षा लेखी बरे हेच खरे!

याद्यांच्या हातखंडा खेळात नवऱ्या मुलीच्या बापाची स्थिती केविलवाणी व्हायची.; किंवा तशी दाखवलीही जात असावी. परंपरेने चेहरा कीव करावी असा व अंग चोरून बसल्यासारखे बसायचे असल्यामुळे असे होत असेलही. पण वरपक्षाकडील किती माणसे, किती पंगती कोणत्या दिवसापासून आणि मानापानाचे कापड चोपड, सोने किती, हुंड्याची रक्कम ही कलमे आली की मग मुलीचा बाप कितीही तालेवार, ऐपतदार असला तरी याद्यांच्या दिवशी त्याला हाच गरीब कोकराचा अभिनय करत बसावे लागे!

सीमांत पूजन व लग्नाच्या दिवशी वरपक्षाकडील किती माणसे येणार, यावीत ही चर्चा चालली असतांना आणि किती तोळे सोने द्यायचे ही निर्णायक खणाखणी चालू असताना, प्रत्येक वेळी मुलीच्या बापाचे प्राण कंठाशी येत. आवंढे गिळून नंतर नंतर तर गिळण्यासाठी आवंढाही शिल्लक नसे.

काही अनुभवी सांगतात की रुखवताची कोणती भांडी किती, आणि त्यातली चांदीची किती, ह्यावरही रंगात आलेल्या याद्यांचे प्रयोग मध्येच पडदा पाडून थांबवावे लागत! बरे, त्यावेळी रुखवत ही सजावटीची गोष्ट नसे. नाहीतर ठेवला तांबड्या लाईफबाॅय साबणाचा गॅस सिलिंडर किंवा पेनिसिलिन इंजेक्शनच्या व्हायल्सचा ‘असावा सुंदर’ बंगला की झाले रुखवत ! ह्यांचा काळ अजून पाच सहा वर्षानंतर उदयाला येणार होता! पण ह्यावरही काही लग्नाच्या रुखवतात पितळेच्या भांड्यांना चांदीचा मुलामा देऊन चांदीची म्हणून वरपक्षालाही चकवणारे वधूपक्ष होतेच!


लग्नाच्या ‘याद्यां’पासून सुरु असलेले हे युद्ध संपले असे समजू नका. सीमंत पुजनाच्या रात्रीच,लग्नाच्या दिवशीच्या कावेबाज लढाईची सुरुवात होत असे. दोन्ही बाजूंकडील नातेवाईकांची ओळख करून देण्याचा एक कौटुंबिक सोहळा असे. मुलाच्या मामाशी मुलीच्या मामाची, काका-काकांची अशा भेटी सुरू होत. त्यात वधूकडची मंडळी खवचट असली तर तांत्रिक दृष्ट्या अगदी बरोबर असलेला नेमका पोरसवदा मामा मुलाकडच्या मामूमियाॅं शोभेल अशा मामाला भेटवत. वरमंडळी आतून जळफळत पण उद्याचा दिवस आपलाच आहे अशी स्वत:ची समजूत घालत त्या पोरवयाच्या मामाच्या पाठीवर मामूमियाॅं ‘कौतुकाने’जोरदार थाप मारत! तो मामा डोळे पुसत मागे यायचा!


सीमंत पूजनाच्या दिवशी मुलीच्या बापाला घरच्या गनिमांशीही लढावे लागे. ‘ज्येष्ठ जावयांची पुजा’ हा सत्काराचा प्रसंग असे. पण गनिम, लग्नाची तारीख ठरल्यापासूनच आपल्या घरांत,” आम्हाला हजार बाराशेत गुंडाळले आणि आज? कुठून आले एकदम इतके? सोन्याच्या दागिन्यात दोन ‘गिलिटाचे खोटेही घुसडले तुम्ही!” असे म्हणत ज्वालामुखी धुमसत!


यानंतर मग नव्या जावयाची पूजा. त्याला याद्यांबरहुकुम द्यायचा पोशाख,ठरली असो नसो पण मुलीची आई जावयाचे कौतुक करते हे सिद्ध करणारी अंगठी देणे व्हायचे. ठिणगी पडली! ज्येष्ठ जावयांच्या बायका म्हणजेच मुलीच्या थोरल्या बहिणी आत आपल्याच आईशी ,” ह्याला भारी पोशाख आणि वर अंगठी! आमच्या नवऱ्यांना काय दिले होते? आठव! कसला तो सूट आणि काय ती टोपी! विदुषकही घालणार नाही! सगळी गरीबी काटकसर नेमकी आमच्याच वेळी!” इथे स्फुंदणे सुरू… आम्ही साध्या मॅट्रिक ना? पण आमचे नवरे तरी ग्रॅज्युएट आहेत ना? आणि हिचे काय कौतुक चाललेय बघा. साधी इंटर झाली. तेही दुसऱ्या खेपेला. काॅलेजात गेली ना? तिचे राहू दे. पण आई आम्हीही तुझ्याच मुली ना?” इथून मुसमुसून ते ओरडण्यापर्यंतचे आवाज बाहेर मंडपात येऊ लागतात.

लगेच मानभावीपणे ज्येष्ठ जावईही येतात. बायकोची समजुत काढण्याच्या निमित्ताने ते सासरेबुवांची उणीदुणी काढायला लागतात. मुलीच्या बापाला अजुन एक दोन दिवस ‘अल्लाकी गाय’ म्हणूनच वावरायचे असते.तो त्यांची दादाबाबा करीत समजूत काढतो. पण मुली बदल्यात काही मागण्या पुऱ्या करून घेतातच!

दुसरा मंगल दिवस उजाडतो. “ काय तो फराळ?” अहो चहा की रंगीत पाणी? चिवड्यांत तेल,मसाला, शेंगादाणे घालायचे माहित नाही का ह्यांना?” “ माहित आहे हो चांगले. त्यांच्याकडच्या पाव्हण्या रावळ्यांना दिलेला चिवडा संगीत होता! मी पाहून आलो.चकल्याही खुसखुशीत होत्या!” वगैरे संवाद पसरत होते.


मुहुर्त जवळ येतो;तरीही बरेच वेळा नवरा मुलगा आलेला नसे! मुलीचा मामा विंगेत तिला घेऊन एन्ट्री कधी करायची ह्याची वाट पाहात उभा असतो. मुलगी तरी किती वेळ मान खाली घालून अंगठ्याने जमीन उकरत बसणार! बऱ्याच लग्नांत नवरीच्या अंगठ्याची नखं तुटायची!

शेवटी मुलीकडचे जबाबदार नातेवाईक शत्रूच्या गोटात जावे तसे जात आणि कुणाशी बोलून परत येत असे. दोन तोळ्यांची सोन्याची साखळी मिळाल्यावर नवरामुलगा लगेच येईल हा निरोप घेऊन मुलीच्या वडिलांच्या कानाशी लागतो. मुलीचा बाप लठ्ठ असला तरी ताडकन उडण्याचा प्रयत्न करतो. अखेर एक तोळ्याच्या साखळीवर तडजोड होऊन समर प्रसंग टळतो.

मंगलाष्टकांची ती ‘काळरात्र’ येऊ लागते! सर्व उपस्थितांचे कान आपोआप किटावे अशा आवाजातील ‘मंगल संकष्टी’सुरु होते. दक्षिणा घेतली तरी भटजीही माणूसच की. दोन्ही बाजूंची ती चित्रविचित्र आवाजांची चॅम्पियन स्पर्धा केवळ भटजी म्हणून किती वेळ ऐकणार? तो मध्येच ‘ताराबलं चंद्रबलं च…’ सुरू करतो. लोकही मंगलाष्टकांच्या आरिष्टातून सुटल्याचा आनंद टाळ्या वाजवून साजरा करतात. वाजंत्री वाजू लागते.पण बॅन्ड नसल्यामुळे लहान पोरेही तिकडे फिरकत नाहीत. मुलांकडच्यांना मुलीच्या वडिलांना नावं ठेवण्यासाठी हे एक कोलित मिळते.

जेवणाच्या पंगती सुरु होतात. वरपक्षांकडील स्त्रियांना बोलावण्यासाठी मुलीच्या बहिणी-काकू- मावशा-वहिनी ये जा करू लागतात. व पुरुषांना आमंत्रित करायला मुलीचे काका, मामा (आता पोरसवदा नाही; चांगला बाप्या), मुलीचा थोरला भाऊ जात येत असतात. प्रत्येक लग्नात हा भाव खाण्याचा प्रकार म्हणून नाही पण पूर्वीच्या काही वधूपक्षांच्या बेफिकीर व आता काय लग्न ठरले, लागले,कशाला करायची ह्यांची वरवर अशा वागण्यामुळेही नंतरचा वरपक्ष सावध झालेला असतो.

वरपक्षाकडील ‘वगैरे’मंडळी पंगतीत बसलेले असतात. पण वरमाई, वधूची नणंद, आतेसासु असे कोणी व्हीआयपी, वराचे वडील यायचे असतात. त्यांच्या साठी मुलीकडचे तितक्याच तोलाची मंडळी बोलवायला जातात.पुन्हा पैठणी,शालू , इरकली लुगड्याची किंवा काही वस्तुंची मागणी. वधूचे आईवडील,नक्की पूर्ण करू पण जेवून घ्या अशी विनवणी करतात. काही वेळेस हे मान्य होते. काही वेळा वधू कडील पैशांची बाजू माहिती असते. ती ताबडतोबीने मागणी पुर्ण झाल्यावरच मानाची मंडळी पंगतीत बसतात. तरीही पंगत सुरू होत नाही. कारण आता शेवटचे हत्यार उपसले असते. नवरा मुलगा स्वत:च किंवा त्याचे नातेवाईक भरीस घालून त्याला रुसायला लावतात.

पुन्हा विनवण्या. पुन्हा मागणी. जशी दोन्ही कडची कुटुंबाची परिस्थिती दर्जा, तशी मागणी. कुठे व्यवसायासाठी रक्कम, तर कधी मोटरसायकल, तर कुठे सहा व्हाॅल्वचा रेडिओ पर्यंत हा रुसवा खाली येतो. वराचे हे रुसणे म्हणजे निवडणुका ऐन तोंडावर आल्या असतानाच सरकारी नोकरांनी संप जाहीर करण्यासारखेच म्हणायचे. अखेर नवरामुलगा येतो.इतका वेळ रुसलेला मुलगा आता नव्या नवरीला घासही भरवतो. सगळे कसे आनंदी आनंद गडेच होते.

संध्याकाळी मुलगी सासरी जाणार. तर त्याआधी पासूनच मुलगी चांगल्या घरी पडली, एक ओझे उतरले अजून एक धाकटी आहे पण अजून दोन चार वर्षे तरी आहेत ह्यावर समाधान मानत लग्नघरातली आवरा आवरी चालू असते. संध्याकाळ जवळ येते तशी त्यावेळी लग्नाचे राष्ट्रगीत झालेले “जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा” मधील ‘कढ मायेचे तुला सांगती जा’ ह्या ओळीच्या वातावरण निर्मितीस प्रारंभ झालेला असतो. मुलगी धाकट्या बहिणीशी विशेष मायेने बोलत असते. आपल्या आवडत्या वस्तू धाकटीला उदारपणे देत असते. हे करतांना डोळे भरलेले असतात. मग निघण्याचा क्षण आला की घरांतल्या सगळ्यांशी गळाभेटीचा निरोप समारंभ हुंदक्या हुंदक्याच्या तालावर चालू होतो. सगळेच थोडेफार भावुक झाले असतात.

वडील कार्यालयाचे, मंडपवाले, इतर काॅंट्रॅक्टरांचे पैसे चुकते करण्यात मुद्दाम गुंतलेले असतात. मुलगी सासरी मोटारने, सजवलेल्या बग्गीत किंवा साध्या टांग्यातून सासरी जाते. घरातले सगळे पुन्हा पुन्हा मागे पाहात मुलीच्या सासरी लक्ष्मी पूजनासाठी जाण्याची तयारी करू लागतात. —-


—-सर्वसाधारणपणे हे दृश्य सर्व लग्नसमारंभाचे असते.पण काही वेळा ‘कढ मायेचे तुला सांगती, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ हया ओळी बॅन्डवाले वातावरण निर्मितीसाठी वाजवायला लागले की इकडे त्या गाण्याचा अतिशय मोठा परिणाम होत असे. आईच्या डोळ्यातील पाणी संपत नसते, सख्ख्याच नाही तर लग्नाला आलेल्या चुलत मावस मामे आत्ये वगैरे सर्व प्रकारच्या बहिणींना ही मुलगी तरी किंवा ह्या तरी तिच्या गळ्यात पडून रडायच्या थांबत नाहीत.ह्या बहिणींपैकी अनेकजणी हिला वर्षातून एकदोनदाच भेटल्या असतील. पण ‘‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ‘ बॅन्डवर वाजायला सुरुवात झाली की जवळच्या,शेजारच्या, वर्गातल्या मुली एकसाथ स्फुंदू लागतात. हुंदक्यांची लाट पसरू लागते. हे कसेतरी संपवून मुलगी निघावे म्हणते तर काकू मावशी मामी शेजारच्या काकू, दूरच्या नात्यातली एकदा पाहिलेल्या अंबूअक्का,” निघाली का गं माझी सुमीऽ ऽ…! मला न भेटताच चाललीस?” असे म्हणत,मध्ये मध्ये खोकत, येतात. नवऱ्या मुलीला जवळ घेतात. जवळचा शकुनाचा एक रुपया काढून मुलीला देतात. तिच्या तोंडावरून हात फिरवून मुलीने लावलेला ‘स्नो’ ‘आशा’किंवा ‘उटी’ची फेस पावडर पुसून टाकतात!

नवरी मुलगी चिडल्याचे न दाखवता रागावून आत जाते पुन्हा ‘रेमी’ किंवा ‘एकलॅट’च्या स्नोची दोन बोटे फासून बाहेर येते! इकडे बॅन्डवाले ‘ जा मुली जा …’ हीच ओळ वारंवार गाल फुगवून फुंकून फुंकून दमले तरी मुलीला ह्या भेटीगाठींतून कुणी सोडत नसते.नवरी मुलगीच अखेर पुढाकार घेऊन ‘दिल्या घरी सुखी’राहण्यासाठी निघते. सासरी पोचल्यावर तिथले बॅन्डवाले ‘उंबरठ्यावरी माप ठेविले मी पायाने उलटूनी आले’ हे गाणे वाजवायला सुरुवातही करतात! अशा रीतीने एका शुभकार्याच्या मंगल नाट्याचा नेहमीच सुखांत शेवट होतो! इतकेच नव्हे तर अशा नाट्यमय ताणतणावात झालेल्या लग्नाचे संसार सुखाचे झालेले आहेत. टिकले आहेत.

इतकी ओढाताण, मानापमानाचे काहीही तणाव नसताही झालेल्या अलीकडच्या काळातल्या सर्वच लग्नाविषयी असे म्हणता येत नाही.


काय म्हणावे ह्या स्थितीला? “झपुर्झा गडे झपूर्झा” !

भाज्यांतील लोकप्रिय राग

संगीतात यमन, मल्हार, केदार, असे काही राग लोकप्रिय आहेत; त्याप्रमाणे भाज्यांतही लोकप्रिय रागांच्या भाज्या आहेत. काही राग सहज गुणगुणले जातात तशाच काही भाज्याही सहज आपोआप आणल्या जातात!

भाजी आणायला बाजारात जाणे हा एक मनप्रसन्न कार्यक्रम असतो.भाजी बाजार म्हणजे आकाशातील इंद्रधनुष्याच्या मंडपात भरलेली मयसभाच!

पालेभाज्यांचे वेगवेगळ्या छटांतील हिरवे रंग, फळ भाज्यांचे निळे जांभळे पिवळसर दुधी,हिरवे, तांबडे रंग पाहून कोणती घेऊ, किती घेऊ असे व्हायचे.नावे तरी किती घ्यायची. कागद आणि शाई पुरणार नाही इतके पालेभाज्यांचे आणि फळ भाजांचे प्रकार!

आळू-चुका ह्यांचा द्वंद्व समास, चुका-चाकवत, चंदनबटवा ही त्रिमूर्ती ! अंबाडी,करडई किंवा करडी ह्या त्यांच्या नावावरूनच करारी वाटणाऱ्या भाज्या; इतर भाज्यांवर ढाळणाऱ्या हिरव्या चवऱ्या वाटाव्या अशा शेपूच्या पेंड्या, तांदुळसा, राजगिरा,चवळी अशा राजस भाज्या तर मानाची आणि लाडाची मेथी ! तिचे किती कौतुक आजही होते! उखाण्यातून ती संस्कृतीचाही भाग झाली! मेथी आणि पोकळा ह्या विशेष मानाच्या दर्जेदार भाज्या तर असतच, जोडीला मायाळू (ही भाजीपेक्षा भज्यांसाठी जास्त मायाळू होती), आपले वेगळे वैशिष्ठ्य सांभाळत येणारी हादग्याची फुले, थंडीत हरभऱ्याचा हिरवा पाला. (तो वाळवून पुढे केव्हाही त्याची वेळ भागवणारी तातडीची भाजी व्हायची.) ;स्थानिक गावरान पालेभाज्यात नुकताच प्रवेश केल्यामुळे कौतुकाची पण स्वत:ची चव नसलेली पालकाची भाजी. अवचित कुठे तरी शेवग्याची कोवळी पाने व फुलेही भाजी म्हणून दिसायची. ह्यांची भाजी घरोघरी सर्रास होत नसे. तरी बाजाराची शोभा वाढवत. काहींची आवडही पुरवत असतील.

फळभाज्यातील पहिल्या क्रमांकाची , Forever वांगी; भाजीची, भरीताची, काटेरी जांभळी, काटेरी हिरवट, पांढरट, लहान अंडाकृती गोल, तर नुसती पाणथळ लांब जांभळी, भरिताचीही निळी जांभळी,मोठी गोल किंवा लंबगोल, खानदेशी किंचित लांबट पण जाड.हिरवट पांढरसर.आणखीही काही प्रकार असतील. आपला दुधी भोपळा; कोणतीही भूमिका ह्याला द्या, उत्तमच करेल. भाजी, रायते, दुधी हलवा करा वा वड्या करा, चौफेर चविष्ट,व सौम्य आणि सात्विक; पण जहाल पक्षाचे ह्याला नेमस्त, नेभळट म्हणून हिणवतात; घोसाळी,म्हणजे खानदेशातील गिलकी, भाजी करा,भजी करा किंवा वाफून रायते करा, भाज्यांतील नागराज पडवळ, त्याचीही भाजी करा, गोल चकत्या कापून कढीला कर्णफुले घालून तिची मजा वाढवा. अथवा महालक्ष्मीला कोशिंबिरींच्या संख्येचा कोरम पूर्ण करण्यासाठी वाफून कोशिंबीर करा. तांबडा भोपळा. हाही बहुगुणी आहे.भाजी करा, रायते करा, पुऱ्या करा किंवा शास्त्रोक्त घागरे करा. शिवाय दोन दिवस ठेवला तरी ऐन वेळी कामास येणारा हा भोपळा आहे. बरे आकारानेही मोठा. त्यामुळे म्हातारीही त्याच्यात बसून लेकीकडे जाऊन लठ्ठगुठ्ठ झाली तरी परतीच्या प्रवासात त्यात मावायची! भाजीसाठीच नव्हे तर हा काशी भोपळा पेपर तपासताना, मास्तरांच्या खूप उपयोगी येतो.

भोपळ्यांतही नेहमीच्या दुधी भोपळा,काशी भोपळ्यांबरोबरच आज फारसे माहित नसणारे चक्री ,डांगर, देवडांगर हेसुद्धा असत. ही भोपळे मंडळी दीर्घायुषी! टिकाऊ म्हणून प्रसिद्ध होती. पण फारशी घेतली जात नसत. हे दीर्घायुषी असल्यामुळे ह्यांचे रंग बदलत जातात. फिकट पिस्त्यापासून फिकट गुलाबी रंगाच्या छटा ते घेतात.ह्यांची पीठ पेरून किंवा भरपूर तेल घालून व डाळ घालून केलेली भाजी बरी लागे. पण नेहमीसारखी केलेली भाजी श्राद्ध-पक्षाला द्रोण रोवून ठेवण्यासाठीच वापरत!

भोपळ्यांवरून त्यांच्याच नात्यातील एक सामान्य नातेवाईक आठवला. त्याचे नाव किती ओबड धोबड ! ढेमसे किंवा ढेमसं! ढेमसं लहान असताना ती इतकी ‘लहान सुंदर गोजिरवाणी’ दिसतात. सुरेख हिरवा रंग. अदृश्य वाटावी अशी लव असलेली ती ढेमसे कुणीही पोतंभर घेईल! पण थोडी मोठी होऊ लागली की ती निबर दिसू लागत. पण मराठावाड्यातील रखरखीत उन्हाळ्यात पाण्याबरोबरच भाज्यांची आवकही आटली की ही ढेमसंच आपल्या मदतीला धावून येत! चव दुधी भोपळ्यासारखीच. दर्शनही look ही दुध्या सारखेच. पण आकाराने,लहान चेंडूसारखा बसका गट्टम गोल! “ ढेमसं घ्या ना”असे कुणी म्हणाले तर लोक पुढे जायचे. घ्या ना! म्हणणारी भाजीवाली असली तरी! आणि शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे?! त्याला ढेमसं घ्यावी लागत नव्हती म्हणून ही असली वचने सुचली. पण औरंगाबादच्या भाजीवाल्यांनी मात्र ढेमशांचं , कसलीही चळवळ नसतानाही, इतके सुंदर नामांतर केले की लोक ती ढेमसंच आहेत हे विसरून त्यावर उड्या पडू लागल्या! तिथे त्याला ‘दिलपसंद’ म्हणतात! का नाही होणार आपले ‘दिल’ खुष! शेक्सपिअरला म्हणावे बघ एका नावाने आमच्या ढेमशाला श्रीमंती आणि हृदयांत स्थान मिळाले!

त्यानंतर तोंडली. ही कोवळी,ताजी असतांना गोल चकत्या करून करा किंवा सुरेख लांबट, ओठाच्या आकाराची पातळ कापे करून भाजी करा. तेलासाठी फार सढळ हाताची आवश्यकता नाही. ‘हेल्दी’पेक्षा तेल थोडे जास्त टाकले तर तोंडल्यांनाही आनंद होतो. त्यामुळे त्या लुसलुशीत ओठांची माधुरी आपल्यालाही चाखता येते!

सुरवातीला बटाटे नवीन होते तोपर्यंत फार भाव खाऊन होते. पण त्यांच्यापेक्षाही रईस, श्रीमंत काॅली फ्लाॅवर, श्रीमान कोबी आले व गाड्या बरोबर नळ्याची यात्रा न्यायाने फक्त नावाचे आकर्षक नवलकोलही शिरले; तेव्हा मात्र बटाट्यांच्या चेहऱ्याचे भाव बदलले. नवलकोलची नवलाई त्याच्या नावात होती. चवीला पपईपेक्षा काही वेगळी नव्हती. नारळाच्या वाट्यांसारखी कापून, खोवून करीत किंवा कच्च्या पपईसारखी खिसूनही करीत.

थंडीत फ्लाॅवर, कोबीबरोबरच, शेंगावर्गीय असूनही फ्लाॅवर कोबींच्या पंक्तीत मानाने बसले ते मटार ! पुढे जसे ह्यांचे पीक वाढले तसे त्यांनी भाजी म्हणून स्थान मिळवलेच पण पुलाव किंवा मसाले भात त्यांच्याशिवाय शिजेना. मग पोहे उपमा तरी कसे मागे राहतील! प्रत्येकाला आपल्या बरोबर थोड्या का होईना मटारांचा हिरवा सहवास हवासा वाटू लागला. म्हणूनच फ्लाॅवर,कोबी,बटाटे ह्यांची भाजी मटाराशिवाय सुनी सुनी वाटू लागली. आपले पोहे त्यामानाने मटारची इतकी फिकीर करत नसत. त्यांचा जानी दोस्त कांदा त्यांच्याबरोबर सदैव असतो त्यामुळे पोह्यांना मटाराची मातब्बरी वाटत नाही. पण हिरव्या गोड मटारांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांची बेताचा मसाला व तेल घालून थोडा रस ठेवलेली भाजी म्हणा किंवा उसळ म्हणा तिला तोड नाही.तिचे तोंड भरून कौतुक करण्यासाठी मटारला आपले कोडकौतुक पुऱ्यांकडूनच व्हावे अशी इच्छा असते ! थोरा मोठ्यांच्या सहवासात असावे असे सर्वांना वाटते; यामुळेच जो तो मटारांशी निकटचे संबंध ठेवायला धडपडतो. त्यासाठी बटाटे स्वत:ला उकडून घ्यायला तयार होतात तर टोमॅटो स्वत:ला चिरून किंवा प्रसंगी चेचून घेऊन हुतात्मे होण्यासही मागे पुढे पाहात नाहीत.

भेंडीला तिच्या आकारावरून फळभाजीत घ्यावी की शेंगेच्या प्रकारात टाकावी असा प्रश्न पडला होता. चुकीचाही असेल. पण तिला अखेर फळभाजीत स्थान दिले. भेंड्यांविषयी दोन जबरदस्त तुल्यबल पक्ष आहेत.भेंडीच्या बाजूचे तिला सात्विकतेची मूर्ती मानतात. सौम्यपणात तिला प्रतिस्पर्धी नाही म्हणतात. आजाऱ्यालाही चालणारी भाजी म्हणून गौरव करतात. ती नुसती भाजून,मीठ लावून खाऊन तर पाहा असे आव्हानही देतात. तर तेच मुद्दे विरुद्ध बाजूचे तिच्यावर उलटवतात. अहो तिच्याहून सात्विक तर आमचा दुधी भोपळाही आहे. आरोग्यास पोषक गुणधर्म तर त्या नावातच आहे. त्याला उगीच दुधी म्हणत नाहीत! आणि काय हो त्या भेंडीला स्वत:ची यत्किंचितही चव तरी आहे का? मसाला घालून भरली भेंडी करावी लागते! पेंढा भरलेल्या प्राण्यांप्रमाणे. बरे झाले तो Taxidermist करत नाही भरली मसाला भेंडी. म्हणूनच ती जास्त करून घरांपेक्षा हाॅटेलातच केली जात असावी. बरे कुठल्याही प्रकारे तिची भाजी करायची म्हणजे तिचे फार सोपस्कार करावे लागतात! मग ती परतून करा किंवा कधी तिला चिंच गुळाचे वाण देऊन लाडाकोडाने तिची भाजी करा. त्यातही ती स्वच्छतेची अति भोक्ती. सर्जननेच तिच्या भाजीचे ‘ॲापरेशन’ करावे ! तिला दहा वेळा धुवुन पुसून कोरडी ठक्क करूनच मग करायची ती भाजी! बायकांसारखाच भेंडीलाही नट्टापट्टा करायला वेळ लागतो. म्हणूनच तिला लेडीज् फिंगर म्हणत असावेत! नाहीतर चिकटपट्टीपेक्षा चिकट होते ती! तरीही लहान मुलांचीच काय मोठ्यांनाही तिची तेलावर परतून केलेली भाजी आवडते.

षटकोनी गोल चकत्यातील मोत्यांसारख्या दाण्यांनी तर ती ताटातील अलंकारच वाटते!
दोडक्यांना विसरलो तर ‘दुसरे लाडके झाले, दोडक्याला कोण विचारतो’असे पूर्वी बुटबैगण व धारदार कड्यांचे असलेले; पण आता एकदम लंबूटांग आणि त्यांच्या हातापायाच्या शिरांतील धार गेलेले,दोडकेमहाराज तक्रार करतील. ह्याच्या शिरा काढून त्या किंचित भाजून तीळ, वाळलेले खोबरे घालून तेलात परतलेली चटणीही खमंग लागते.त्यामुळे ‘ एका तिकीटात दोन खेळासारखे’ दोडक्यांची चटणी आणि भाजी एकाच वेळी करता येते !

आमच्याकडे बेलवांगी म्हणतात त्याचीही भाजी करतात. पण बेलवांग्याची चटणी चविष्ट असते. ती वाफून त्यात कधी भाजलेले कारळ तर कधी भाजलेल्या तीळाचा कूट किंवा दाण्यांचा कूट घालून केलेल्या चटण्यांना मागणी असते.शिवाय आमसुल चिंचेऐवजी कशातही बेलवांग्याच्या दोन चार फोडी खपून जातात. पण खरी गंमत शेंगाचा कूट घालून केलेल्या करकरीत बेलवांग्याच्या कोशिंबिरीत आहे. आणि जेव्हा कांदे रजेवर असतात तेव्हा बारीक चिरलेली बेलवांगी पोह्यांना वेगळीच मजा आणतात! हो सांगायचे राहिलेच की! बेलवांगी म्हणजे हल्ली ज्याला कच्चे किंवा हिरवे टोमॅटो म्हणतात तेच.

पाले भाज्यांविषयी कितीही लिहिले तरी अपुरेच होईल. त्यांचे विविध प्रकार आणि त्या किती वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात हे लक्षात आल्यावर आपण स्वत:शीच थक्क होतो. त्यामुळे एकच पालेभाजी सलग तीन चार दिवस केली तरीही कंटाळा येणार नाही. किंवा लक्षातही येत नसेल कालचीच आहे म्हणून ! साधा हिरव्या पातीचा लहान कांदा किंवा कोवळ्या ताज्या पानांसकट मुळे घेतले तरी त्यांच्या पानांची किंवा ती पाने घालून केलेल्या भाज्यांच्या प्रकारांचे उदाहरण पुरेसे आहे.त्या शिवाय निरनिराळी सरमिसळ करून केलेल्या पालेभाज्या वेगळ्याच! त्यासाठी चवळी,मूग,मटकी,मुगाच्या डाळीही त्यांच्या सहाय्याला धावून येतात.

फळभाज्यांचीही हीच गंमत आहे.पाले भाज्या, फळभाज्या ह्यांची मोजदाद व त्यांचे प्रकार आणि त्यांचा वापर करून केलेले पदार्थ ह्याविषयी लिहायला कोणत्याही भाषेत पुरेसे शब्द असतील असे वाटत नाही. पालेभाज्यांची पाने मोजण्या इतकेच ते अशक्य आहे ! पण त्यांच्यापासून मिळणारा आनंदही तितकाच अमर्याद आहे. म्हणून ज्यांनी एकदा तरी भाजी बाजारात जाऊन निवांतपणे फिरत भाजी आणली नसेल तर कविवर्य बा.भ. बोरकरही अशांना “जीवन त्यांना नाही कळले हो” असेच म्हणतील! बालकवींनीही बाजारात जाऊन भाजी आणली नसावी. नाही तर त्यांनीही ‘मंडईमाजीं हर्ष मानसी भाजी बहरली चोहीकडे’अशीही एक कविता केली असती!

कागद,शाई आणि वेळ पुरणार नाही इतक्या लिहिण्यासारख्या कैक भाजा अजून कितीक आहेत. म्हणून अखेर थांबायचे.

सृष्टीची विविधता पाहायची असेल तर बाजारात रमत गमत भाज्या पाहात फिरत राहावे.मन आणि डोळ्यांसाठी हा खरा नव नवलोत्सव आहे. ज्याने बाजारात जाऊन, आरामात, घाई न करता फिरत फिरत भाजी आणली नाही तो जगाची प्रदक्षिणा करून आला तरी ती व्यर्थच गेली असे खुशाल समजावे !

भाज्यांमधील अनवट राग!

भाजीऽ!भाजी घ्याऽऽ! आली लई ताजी ताजी.” “ हिरवीग्गार! ताजी फ्फाऽर! कितीत्त्ताजी !” “ सस्ती झाली हो! लई सस्ती लावली वांगी! मेथी घ्या! चुका घ्या!चाकवत घ्घ्या करडीची भाजी घ्घ्याऽऽ ! अशा निरनिराळ्या शब्दांत गुंफलेल्या आरोळ्यांच्या निरनिराळ्या आवाजांनी सकाळ सुरु व्हायची. भाज्यांच्या हातगाड्या, टोपल्या,मोठ्या पाट्या भरभरून भाज्यांची वर्दळ सुरु व्हायची. पाले भाज्या खूप तजेलदार दिसत. वांगी,टमाटे, दुधी भोपळेही चमकत असत! हे दारावर येणाऱ्या भाज्यांचे झाले. भाजी बाजारात(मार्केट) मध्ये गेलो तर मग पहायलाच नको. निरनिराळ्या रंगांच्या भाज्यांची रंगपंचमीच असे. आणि त्यात रविवार असावा. तोही दसरा दिवाळीच्या थंडीतला.मग काय! तिथे असंख्य भाज्यांचे डोंगर रचले जात. सगळे ओटे, फरशा , खाली जमीनीवर भाज्या लिंबं, भाज्या हिरव्या मिरच्या काय काय आणि किती नाना तऱ्हेच्या रंगांच्या भाज्या ओसंडत असत.

त्या मोसमांत आणि एरव्ही सुद्धा भाजी बाजारात जाणे हा सहलीला जाण्याइतकाच मोठा आनंद होता. हा भाजीपाल्याचा तजेलदार रंगीत बाजार पाहून एकच पिशवी आणल्याचा पश्चात्ताप होई.

भाजीतील नेहमीचे यशस्वी कलाकार मेथी, आळु चुका , राजगिरा, करडी/ करडई, शेपू, तांदुळसा, अंबाडी, असतच. पालकाची एन्ट्री अजून व्हायची होती. चुका, चाकवत आणि चंदनबटवा ही च च्या ‘च’मत्काराची त्रिमूर्तीही विराजमान झालेली असे.

संगीतात जसे काही नेहमी न गायले जाणारे अनवट राग असतात तशाही भाज्या असायच्या.
त्यामधील पालेभाज्यातील दोन ठळक नावे म्हणजे माठ आणि घोळ! ही नावेही ज्यांनी ठेवली असतील ते खरेच मिष्किल बेरकी असले पाहिजेत! वाक्प्रचारातला ‘ घोळात घोळ’ ह्या भाजीवरून आला की भाजीचे रूप पसाऱ्यावरून भाजीला हे नाव दिले! ह्या दोन्ही भाज्या एका अर्थाने खऱ्या अपौरुषेय, स्वयंभू म्हणाव्या लागतील. घराच्या अंगणात काही पेरावे लागत नाही की वाफे आळे अशी विशेष सरबराई सुद्धा ह्यांना लागत नाही. आपोआप उगवतात,त्यांची ती वाढतात,पसरतात! माठ व तांदुळसा एकाच जाति प्रकारातला. पण माठाची पाने लहान असतात. घोळाची पाने लहान,गोलसर जाड आणि गुलाबी देठांची. गवतासारखी पसरलेली.

आणखी दोन अनवट भाज्या म्हणजे मायाळू व शुक्रवारच्या कहाणीमुळे प्रसिद्ध झालेली कनीकुरडु किंवा कनी कुरडईची. मायाळूचे वेल असतात. दोन प्रकारचे. एक नेहमीसारखा हिरव्या वेलीचा तर दुसरा गुलाबी देठांचा. पानांची पाठही फिकट, कळत न कळत अशा गुलाबी रंगाची. भाजीही करत असतील पण भज्यांसाठी प्रसिद्ध होती. तशीच कनी कुरडुचीही. आणखी असाच एक भाजीपाला होता. तो म्हणजे पाथरीचा! खरा गावरान! भाजी करतही असतील पण जास्त करून तो थेट मीठ लावून शेंगदाण्यासह खायचा. त्यामुळे भाकरीचा घास आणखीनच चविष्ट लागायचा.

आणखी दोन भाज्यांचा उल्लेख केल्याशिवाय ह्या अनवट रागांतील भाज्यांची मालिका पूर्ण होणार नाही. पठाडीच्या शेंगा आणि चौधारी ! पठाडीच्या शेंगा ह्या साधारणत: आठ-दहा इंच लांब,हिरव्या आणि मऊ असतात. चौधारी ही भाजी की सॅलाडचा प्रकार माहित नाही. कधी खाल्ली नाही. पण आकारामुळे लक्षात राहिलेली आहे. ह्याचीही सहा ते आठ इंच लांबीचे चौकोनी तुकडे/कांड असत. चारी कडांना, फिरत्या दरवाजाला असतात तसे पांढरट हिरवे, उभे काचेचे पाखे किंवा पडदे म्हणा असत. पडदे म्हटल्यावर लगेच फार काही मोठे डोळ्यासमोर आणू नका. कल्पना यावी म्हणून तसे म्हटले. अगदी अरुंद. त्यांच्या कडा अगदी फिकट कोवळ्या हिरव्या असत. त्या पालवीसारख्या वाटत. चौधारी नाव अतिशय समर्पक वाटते. पण म्हणताना मात्र आम्ही ‘चौधरीच्या’ म्हणत असू!
कडवंच्यांच्या विषयी सांगितले नाही तर काहीच सांगितले नाही !

कडवंच्या नावही वेगळे रुपही आगळे! बहुतेक सर्व भाज्याप्रमाणे ह्यासुद्धा हिरव्या रंगाच्याच. लहान; बोटाच्या एका पेराएव्हढ्या. दुधी भोपळ्याला आपण लिलिपुटच्या राजधानीत आल्यासारखे वाटेल. आकार मध्ये फुगीर व दोन्ही टोकांना निमुळता होत गेलेला. दोन लहान शंकू एकमेकाना चिकटवल्यावर जसा निमुळत्या होत जाणाऱ्या इटुकल्या मृदुंगासारखा. पृष्ठभागही रेघांचा. आत मध्ये थोड्या अगदी लहान बिया असतील नसतील इतपत. पण त्यामुळे चावताना कडवंच्या किंचित कुरकुरीत लागायच्या. तेलाच्या फोडणीत परतून तिखट मीठ आणि तळलेले किंवा भाजलेले ऱ्शेंगदाणे घालायचे. भाकरी बरोबर खायला एकदम झकास. थोडीशी कडसर चव असलेल्या ह्या कडवंच्या आपल्या वेगळेपणाने ही भाजी की चटणी असे वाटायची.तरी स्पेशल तोंडी लावणे म्हणून जेवताना मधून मधून खाण्यात गंमत यायची.

रानमेव्यातल्या बोरं पेरू आवळा ह्यातील चिंचा कुठेही सहज मिळणाऱ्या! चिंचा होण्याआधी त्याच्या कळ्या व लहान लहान फुलांचे गुच्छ आल्यावर, त्यांच्या गुलाबी पांढऱ्या बहराने झाड सुंदर दिसायचे. ती कळ्या फुले म्हणजे चिगुर. त्यांच्या बरोबरीने चिंचेची कोवळ्यांपेक्षाही कोवळी पालवी तर खायला किती मजा येते ते सांगता येत नाही. कोवळा चिगुर पालवी खाणे हा सुट्टीतला खरा उद्योग असे. रस्त्याच्या कडेला दिसला आणि हाताशी असला तर सोपेच. नसला तर फांद्या खाली ओढून तो ओरबडून मूठी भरून घ्यायचा. नुसता खाल्ला तरी झकास आणि किंचित मीठ व चवीला गुळ घालून खाल्ला तर खातच राहावा असा चिगुर असे. तर ह्या चिगुराचीही बाजारात आवक होत असे. (काही ठिकाणी चिघोळ,चिगोळही म्हणूनही ओळखत असतील) ह्या चिगुराची, तो व तीळ भाजून केलेली चटणीही खमंग लागते. आणि ती त्या मोसमात अनेक घरात होत असे.

समाजातील विषमता वेगवेगळ्या प्रकारे असते. पण ठळकपणे उच्च, मध्यम व,कनिष्ठ वर्ग ह्यातून दिसतेच. भाज्यांतही हे वर्ग आहेत. कारण आमच्या ह्या माठ,घोळ, पाथरीची पाने, तांदुळसा, आणि चिगुर ह्यांना बाजारात मोक्याच्या जागी प्रतिष्ठित भाज्यांच्या बरोबरीने जागा मिळत नसे. बाजारातील रुळलेल्या मळवाटा सोडून वाकडी वाट करून गेलो तर एखाद्या कोपऱ्यात,जमिनीवर हे विक्रेते साधी पोती, कापड पसरून त्यावर घोळाचे,पाथरीच्या पानांचे,कडवंच्या आणि चिगुराचे लहान लहान ढिगारे ठेवून बसलेले दिसत. विकणारेही ह्या भाज्यांसारखेच साधे व गरीब वाटत. आमच्यासारखे सामान्य माहितगार तिकडे वळले की त्यांचे चेहरे खुलत. ते सावरून बसत. तांदुळसा किंवा माठाची पेंडी, कडवंच्याचे, चिगुराचे एक दोन ढिगारे घेतले की ती गावाकडची मंडळी खूष होत. मग वर एक चिमुटभर चिगुर व चार कडवंच्या आपणहून पिशवीत टाकत! पठाडीच्या शेंगाही ह्यांच्या पथारीवर दिसत. पण क्वचित. पठाडीला ती नेहमी मिळणारी नसल्यामुळे जेव्हा येत तेव्हा त्यांना ओट्यांवर स्थान मिळे. तीच गोष्ट सुंदर हादग्याच्या फुलांची.

आणखी एका भाजीची ओळख करून द्यायची राहिली. ती शेंगाच्या प्रकारातली आहे. ती आजही मिळते पण आमच्याकडे पूर्वी तिचे स्वरूप निराळे व नावही निराळे होते. आज मुळ्याच्या शेंगा ह्या नावाने मिळणाऱ्या लांब शेंगा पूर्वी डिंगऱ्या ह्या नावाने ओळखल्या जात. त्यावेळी त्या अशा लांब नव्हत्या.दीड दोन पेराएव्हढ्याच पण फुगीर. भाजीत रस (पाणी) ठेवायचा. जेवायला बसेपर्यंत त्यांतील हे खमंग रसपाणी थोडेसे ह्या डिंगऱ्याच पिऊन टाकीत. भाजी खाताना रसपाण्याने जास्त टपोऱ्या झालेल्या ह्या डिंगऱ्या खाताना त्यांतील रसाची एखादे वेळी लहानशी चिळकांडी तोंडात उडाली की कृतकृत्य झाल्यासारखे वाटे. आमच्या बहिणीने ह्या डिंगऱ्यांचे रसमधुर बारसे केले होते. ती त्यांना तिखट मिठाच्या जिलब्या म्हणायची!

आज ह्या भाज्या आमच्या गावात मिळतात की नाही माहित नाही. मिळत असतील तर लोक अजूनही भाग्यवान आहेत म्हणायचे. लहान गावात मिळतही असतील. पण शहरातील मंडईत दिसत नाहीत.

मंडईत गेलात आणि ह्या अनवट भाज्यांपैकी काही मिळाल्या तर नमुन्याला का होईना जरूर घ्या. तोंडाला चव येईल !

पारले-जी

माझ्या कमावत्या काळात सगळ्यांत जास्त संबंध दोनच गोष्टींशी आला. एसटीची तांबडी बस आणि ग्लुकोजची बिस्किटे. नुसती ग्लुकोजची म्हटले तरी ती पारलेचीच हे सर्वांना माहित आहे. कारण ग्लुकोजची बिस्किटे म्हणजेच पारले व पारले म्हटलेकी ग्लुकोजची बिस्किटे ही समीकरणे लोकांच्या डोक्यांतच नव्हे तर मनांतही ठसली आहेत. ग्लुकोजची बिस्किटे जगात पारलेशिवाय कुणालाही करता येत नाहीत ह्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. संपूर्ण देशात ह्या एकाच गोष्टीवर मतभेद नाहीत.


१९५६ सालची गोष्ट असेल. दादर किंवा चर्चगेटहून मालाडला यायला निघालो की पेंगुळलेल्या डोळ्यांना जाग यावी किंवा मुंबईचा वास नाहीसा होऊन खऱ्या अर्थाने मधुर चवीचा वास येऊ लागला की डब्यातली सर्व गर्दीही ताजीतवानी व्हायची. पारले स्टेशन आले ह्याची खात्री पटायची. विलेपारलेच्या पूर्वेला राहणारे प्रवासीही घरी जाताना पारलेच्या ग्लुकोज बिस्किटाच्या फॅक्टरी कडे आत्मीयतेने पाहात, दिवसभराचे श्रम विसरून,ताज्या ताज्या ग्लुकोज बिस्किटांचा मधुर चवीचा वास पोट भरून घरी न्यायचे.आम्ही पुढे जाणारेही तो चविष्ट सुगंध एकदोन स्टेशने जाईपर्यंत साठवत असू.पार्ले बिस्किटांची ही प्रत्यक्ष ओळख अशी झाली.


फिरतीची नोकरी. जिल्ह्याच्या गावी आणि,तालुक्या तालुक्यातूनच नव्हे तर लहान मोठ्या गावांनाही जावे लागे. एसटीतून उतरल्यावर लगेच लहान मोठ्या थांब्यावरच्या कॅंटीन उर्फ काहीही म्हणता येईल अशा हाॅटेलात जायचे. गरम वडे किंवा भजी तळून परातीत पडत असत. शेजारी पातेल्यात तेलात वाफवलेल्या अख्ख्या मिरच्या असत. मालक किंवा पोऱ्या वर्तमानपत्राच्या कागदात एक पासून चार चार वडे किंवा भजी आणि मिरच्यांचे तुळशीपत्र टाकून पटापट गिऱ्हाईकी करत असायचे. गरमागरम भज्या वड्यांचा मोह टाळता येत नसे. तो खाल्ला की गरम व मसालेदार वड्यांनी हुळहुळलेल्या जिभेचे आणखी लाड करण्यासाठी एक हाप किंवा कट किंवा तसले प्रकार नसलेल्या गाडीवर एक चहा आणि पारले जी चा दोन रुपयाचा पुडा घेऊन त्या केवळ पोटभरू नव्हे तर कुरकुरीत व खुसखुशीत गोड बिस्किटांची मजा लुटायला सुरवात करायची!


भले पारले जी पोटभरू असतील. पण त्याहीपेक्षा आणखी काहीतरी नक्कीच होती. चविष्ट गोड असायची. दोन खाऊन कुणालाच समाधान होत नसे. तो लहानसा पुडा चहाबरोबर कधी संपला ते ग्लुकोज बिस्किटांच्या तल्लीनतेत समजत नसे.


मला पारले-जीची ओळख व्हायला पंचावन्न -छपन्न साल का उजाडावे लागले? त्या आधी बिस्किटे खाणे हे सर्रास नव्हते. बरे मिळत होती ती हंट्ले पामरची मोठी चौकोनी तळहाताएव्हढी. पापुद्रे असायचे पण मुंबईच्या बेकरीतील खाऱ्या बिस्किटांसारखे अंगावर पडायचे नाहीत. फक्त जाणीव होत असे खातांना. पण साहेबी थाटाची, चहा बरोबर तुकडा तोंडात मोडून खायची. त्यामुळे ती उच्चभ्रू वर्गासाठीच असावीत असा गैरसमज होता. पण खरे कारण म्हणजे ‘पाव बटेर’ पुढे बिस्किटांची गरजही भासत नसे. बरे बेकरीत तयार होणारी नानकटाई लोकांच्या आवडीची होती.

बेकरीची गोल, चौकोनी बिस्किटेही खपत होती. पण तीही रोज कोणी आणत नसे. शिवाय बिस्किटे हा मधल्या वेळच्या खाण्याचा किंवा येता जाता तोंडात टाकायचा रोजचा पदार्थ झाला नव्हता. बिस्किटे चहाबरोबरच खायची अशी पद्धत होती. खाण्याचे पदार्थ म्हणजे शेव,भजी, चिवडा, भाजलेले किंवा खारे दाणे, फुटाणे आणि डाळे चुरमुर. हे ब्लाॅक बस्टर होते.


डाळे चुरमुऱ्यांचीही गंमत आहे. आगरकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला हे प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या बरोबरीचे व नंतरची मोठी झालेली माणसेही रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करत होतो हे लिहू लागले. रस्त्यावरच्या दिव्याप्रमाणे माधुकरी मागून शिक्षण केले हा गरीबीतून कसे वर आलो सांगण्याचा प्रघात होऊ लागला. पण सर्वांना, गरीबांना तर होताच होता, गरीबी सांगण्यासाठी ‘“ कित्येक दिवस तर नुसत्या डाळंचुरमुऱ्यांवर काढले” असे म्हणणे प्रचलित होते. सांगायची गोष्ट अशी की डाळे चुरमुरेही सर्वप्रिय होते. येव्हढ्या गर्दीत बिस्किटांचा सहज प्रवेश होणे सोपे नव्हते.


खाल्लीच बिस्किटे तर लोक बेकरीत मिळणारी खात असत. त्यातही मध्यंतरी आणखी एक पद्धत प्रचलित झाली होती. आपण बेकरीला रवा पीठ तूप साखर द्यायची व बेकरी तुम्हाला बिस्किटे बनवून देत.त्यासाठी ते करणावळही अर्थातच घेत. तरीही ही बिस्किटे स्वस्त पडत. ह्याचे कारण ती भरपूर वाटत. गरम बिस्किटांचा आपलाच पत्र्याचा डबा घरी घेऊन जाताना फार उत्साह असे. आणि ‘ इऽऽऽतकीऽऽऽ बिस्किटे’ खायला मिळाणार ह्या आनंदाचा बोनसही मिळे!
त्या व नंतरचा काही काळ साठे बिस्किट कं.जोरात होती. त्यांची श्र्युजबेरी बिस्किटे प्रसिद्ध होती. पण पारले बिस्किट कंपनी आली आणि चित्र बदलले. स्वातंत्र्य मिळाले होते. त्या अगोदरच पारले कं.सुरु झाली होती. पण इंग्लिश कंपन्यांपुढे अजून तिचा जम बसत नव्हता. पण विक्रीची जोरदार मोहिम, विक्रेत्यांचे जाळे वाढवत नेणे आणि जाहिरातींचा मारा व स्वस्त किंमत ह्यामुळे नंतर नंतर पारलेने जम बसवला.


पारलेला प्रतिस्पर्धी पुष्कळ निर्माण झाले. त्यातला सर्वात मोठा म्हणजे ब्रिटानिया. त्यांनी पारले ग्लुकोजला तोड म्हणून टायगर ब्रॅन्ड आणला पण पारले जी पुढे त्या वाघाची शेळी झाली. स्पर्धेला तोंड देताना पारलेने व्यापारी क्लृप्त्याही वापरल्या. महागाईतही कमी किंमत कायम ठेवण्यासाठी पुड्यांतील बिस्किटांचे वजन कमी करणे,बिस्किटांचा आकार लहान करणे हे केलेच. त्यामुळे आजही दोन रुपये,पाच व दहा रुपयांची पाकीटे मिळतात. परवडतात. पूर्वी पारलेच्या बिस्किटांचा आयताकारी चौकोन मोठा होता. आता बराच लहान केला आहे.तरीही आजही ग्लुकोज म्हणजे पारले-जी च ! काही असो पारलेजी! तुम्ही लोकांसाठी आहात , लोकांचेच राहा.


पारलेने,पाकीटबंद बिस्किटे ही उच्चवर्गीयांसाठीच असतात ही कल्पना लोकांच्या मनातून काढून टाकली! कोणीही बिस्किट खाऊ शकतो हे पारलेने दाखवले.. त्यामुळे कमी किंमतीची लहान पाकीटे पारलेनेच आणली. दोन रुपयाचे पारले-जीचे बिस्किटांचे पाकीट गरीबही घेऊ लागला. चहा बरोबर बिस्किट खाऊ लागला! ‘चहा साखर पोहे ’ या बरोबरच पारले-जी चा पुडाही किराण्याच्या यादीत येऊन बसला. तर ‘धेले की चायपत्ती धेले की शक्कर’बरोबरच गोरगरीब मजूरही पारले-जी का पाकेट’ मागू लागले. दुकान किराण्याचे,दूध पाव अंड्यांचे असो,की पानपट्टीचे, जनरल स्टोअर किंवा स्टेशनरीचे असो पारले ग्लुकोजची बिस्कीटे तिथे दिसतीलच.तसेच हाॅटेल उडप्याचे असो की कुणाचे, कॅन्टीन,हातगाडी,टपरी काहीही असो जिथे चहा तिथे पारले-जी असलेच पाहिजे.


पॅकींगवर कंपनीने ग्लुको लिहिले असले तरी सगळेजण बिस्किटाला ग्लुकोजच म्हणतात! सर्व देशात प्रचंड प्रमाणात आवडीने खाल्ला जाणारा एकच पदार्थ आहे पारले-जी. मग भले अमूल आपले’ दूध इंडिया पिता है’म्हणो की ‘इंडियाज टेस्ट’ असे स्वत:चे वर्णन करो; देशातल्या जनतेची एकमेव पसंती पारले- जी ची ग्लुकोज बिस्किटे! गरीबालाही श्रीमंती देणारी ही बिस्किटे आहेत.


चहाचा दोस्त आणि भुकेला आधार असे डबल डेकर पारले ग्लुकोज बिस्किट आहे. म्हणूनच मी तीस चौतीस वर्षाच्या नोकरीच्या काळात एसटीतून उतरलो की चहा आणि पारलेचा एक पुडा संपवायचो. एक पुडा कामाच्या बॅगेत टाकायचो. दिवस मस्त जायचा. अपवाद फक्त उन्हाळ्याचा. उन्हाळ्यात ,”लोकहो विचार करा चहापेक्षा रस बरा” ह्या सुभाषिताचे मी एकनिष्ठेने पालन करायचो. तरीही पारलेची ग्लुकोज सोडली नाहीत. ती नुसती खाण्यातही मजा आहे!


आजही मुले माझ्यासाठी, बाजारातून येताना आठवणीने पारले- जी ग्लुकोज बिस्किटे आणतात. ह्या पेक्षा दुसरा आनंद कोणता असेल!

ये चिराग बुझ रहे है….

शीव चुनाभट्टी

पाकिजा सिनेमा अनेक चांगल्या पैलूंमुळे गाजला, इतका लोकप्रिय कसा झाला, त्याचे उत्तर त्या सिनेमातील अनेक उत्तम नाट्यपूर्ण प्रसंगाचे तितकेच कल्पक प्रतिभावान चित्रिकरणात आहे. मग त्यात त्या प्रसंगातील कलाकारांचा अभिनय, संगीत,पार्श्व संगीता इतकेच पार्श्वभूमीतील सर्व तपशील आणि हालचाली सर्व काही येते.


मी “चलते चलते यूॅंही कोई”हे गाणे पाहात व ऐकत होतो. त्याचे दृश्य इतके प्रभावीपणे बारिक सारीक तपशीलांसह केले आहे की प्रत्येक वस्तु एकमेकांस व नवाबी शौकिन वातावरणास पोषक व उठावदार करते.


पाकिजा गाणे म्हणत असते तेव्हा ती नंतर सहज उठून पदन्यास करीत चालेल ह्याची कल्पनाही लगेच येत नाही. गाण्यांच्या ओळींना हाताची व आपल्या पायाकडे व मध्येच समोरच्या आश्रयदात्याकडे पाहिले न पाहिल्यासारखे करत ती कथेतील हकीकत सांगत उठते!


सुरवातीपासून तिच्या पाठीमागे असलेल्या कमानीखाली दोन नर्तिका सुरेख हलक्याशा हालचालीतून शब्दांना अभिनय देत असतात. पण त्या, नायिकेचा प्रभाव कमी न करता तिला उठाव देत असतात.
संगीत, सारंगी,तबल्याचा ठेका, पाकिजा गाण्यातून सांगत असलेल्या घटनेला, भावनांना इतके बोलके करतात ! तरीही दिग्दर्शकाने प्रेक्षकांची नजर पाकिजावरच राहिल ह्याचीही सहजतेने दक्षता घेतली आहे. अभिनयातील,प्रसंगातील वास्तवही,दिग्दर्शकाने मध्येच शौकीन आश्रयदात्याला आपली पहिली औपचारिक बैठक सैल करून लोडावर रेलायला लावून जपले आहे. नंतर पाकिजा तिच्या घडून गेलेल्या गोड प्रसंगाच्या आठवणीत रमून दालनाच्या मागील बाजूच्या कारंजाच्या शतधारांकडे जाते; ह्या कारंजाच्या धाराही उसळत वर येत नाहीत. नेहमीच्या वेगानेच शांतपणे वरून खाली येत असतात. तिथली प्रकाश योजनाही सौम्यच आहे. आता पाकिजा फिरून मुख्य दालनात येताना मधल्या मोठ्या नक्षीदार कमानीमध्ये व बाजूच्या दोन लहान कमानीत त्या नर्तिका नाचत आहेत हा भागही सुंदर साधला गेला आहे.


पाकिजा, ‘ये चिराग बुझ रहे है’ ही ओळ म्हणते, ती ओळ जेव्हा वरच्या सुरांत मिळत जाते तेव्हा पाकिजा चित्रपटातील मुख्य पात्रांपैकीच एक असलेल्या त्या ‘आगगाडीचा आवाज व ती हृदयाला भिडणारी तर कधी विव्हळ करणारी शिट्टी’ आर्ततेने तितकीच हृदयाला भेदत वाजत जाते. शिट्टीच्या आवाजाबरोबरच गाडी पुढे गेल्याचे जाणवते व एका असफळ प्रेमाचे दिवे विझत आले आहेत ….. विझत चालले…विझले…


पाहाण्यासारखे हे गाणे आहे. ऐकत तर होतोच पण नंतरही ते ‘ये चिराग बुझ रहे है’ची व्याकुळता मागे राहातेच…


मोजक्याच सर्व दृष्टींनी उत्तम असलेल्या सिनेमांपैकी एक पाकिजा होता आणि आज सुद्धा तो उत्तम आहे.
Enjoy न म्हणता अनुभवा म्हणतो.

महाभारताची थोरवी

महाभारताच्या (पहिल्या) आदिपर्वातील अनुक्रमिणी ह्या पहिल्या अध्यायातच ऋषी लोमहर्षण सौती महाभारताचा संक्षिप्त रूपांत आढावा घेत सारांश सांगतो. तो सांगून झाल्यावर तो महामुनि महाभारताची थोरवी सांगतो ती ऐकण्यासारखी आहे. हे तो ३५ते ३९ व नंतरच्या ३८९-३९६ ह्या काही श्लोकांतून स्पष्ट करतो.महाभारताची ती महति, श्रेष्ठत्व ऐकू या:

मोक्षप्राप्तीची इच्छा करणारे(मुमुक्षु) वैराग्याचा आश्रय करतात त्याप्रमाणे योग्य अर्थवाही शब्दांतून व त्यांच्या रमणीय अर्थाने परिपूर्ण असलेल्या, अनेक आचारांचे वर्णन असलेल्या ह्या आख्यानाच्या अभ्यासातील (जिज्ञासेमुळे जाणीवपूर्वक वाचन) आनंदात अनेक बुद्धिमान लोक मग्न असतात.

जाणून घेण्याच्या (ज्ञेय) वस्तूंमध्ये आत्मा श्रेष्ठ ज्ञेय आहे, स्पृहणीय गोष्टींमध्ये आपले जीवित श्रेष्ठ असते त्याप्रमाणे सर्व शास्त्रांत सर्वांपेक्षा मोठा आशय व्यक्त करणारा हा भारत नावाचा ग्रंथ अग्रगण्य आहे.

अन्नपाण्यावाचून शरीराचे पोषण व धारणा होऊ शकत नाही त्याप्रमाणे भारत नावाच्या आख्यानाचा आश्रय घेतल्यावाचून कोणतीही कथा अस्तित्वात येऊ शकत नाही .

आपली उन्नती व्हावी, उत्कर्ष व्हावा म्हणून सेवक चांगल्या कुळातील प्रतिष्ठित व्यक्तींकडे काम करतात त्याप्रमाणे कविही आपल्या अभ्युदयासाठी भारताचे चांगले अध्ययन करतात. ( कविनांही भारतातील आख्याने आणि वर्णने ह्यांच्यापासून स्फूर्ति मिळते.)

जगातील दैनंदिन व्यवहार आणि वेदवित्या( सर्व विषय व शास्त्रांच्या विद्येची माहिती व ज्ञान) ह्यांचा सर्वाधार असलेली वाणी ज्याप्रमाणे स्वर व व्यंजने ह्यांच्यामध्येच पूर्ण सामावलेली आहे त्याप्रमाणे महाभारत नावाच्या सर्वश्रेष्ठ इतिहासात सर्व उत्कृष्ठ ज्ञान सामावलेले आहे.


ह्यापुढचे सांगणे महत्वाचे आहे:
जगामध्ये कोणताही विषय असा नाही किंवा मानवी स्वभावाचे पैलू नाहीत की जे महाभारतात आले नाहीत. किंबहुना महाभारत म्हणजे मानवी स्वभाव व वर्तणुकीचा स्वच्छ आरसा आहे.
महाभारताची थोरवी, त्याचे विशाल व्यापक तितकेच सखोल रूप हे दृष्टान्त रुपकातून सांगताना त्याचे भाष्यकार पुढे म्हणतात:

वेद वेदांग आणि उपनिषदे ह्यांचे ज्याने विचारपूर्वक अध्ययन केले पण पण त्याने महाभारताचा सखोल अभ्यास केला नसेल तर तो ‘प्रज्ञावंत’ ह्या पदवीला पात्र नाही असे समजावे!
ह्या महाभारतात काय नाही? ह्यामध्ये श्रेष्ठ धर्मशास्त्र आहे. अर्थशास्त्र आहे. इतकेच नव्हे तर कामशास्त्रही (सर्व वासनांचा समावेश काम ह्या शब्दांत होतो) आहे.

कोकिळेचे कूजन ऐकल्यावर कावळ्यांची काव काव कोणी ऐकेल का? ती ऐकायला कुणाला आवडेल! तसेच महाभारताचे हे आख्यान ऐकल्या-वाचल्यावर दुसरे आख्यान, साहित्य ऐकायला,वाचायला आवडणार नाही.

जरायुज( वारेतून जन्मणारे पशु. मनुष्य वगैरे), अंडज(अंड्यातून जन्मणारे पक्षी, साप, पाली वगैरे), स्वेदज(घामातून जन्मणारे ढेकूण, पिसवावगैरे), उदभिज( मातीतून ) ,फोडून वर येणारे वनस्पति वगैरे), अशी चारही प्रकारची सृष्टी पंचमहाभूतांपासून व अंतरिक्षावर अवलंबून असते त्याप्रमाणे महाभारतावर पुराणे अवलंबून आहेत.


पुढे अध्यात्मिक तत्वज्ञानाची उपमा देताना सर्व इंद्रियांकडून होणारी क्रिया कर्मे ज्याप्रमाणे मनांतील विविध विचार विकारांवर अवलंबून असतात त्याप्रमाणे ह्या जगातील सर्व विचार हे महाभारतावर अवलंबून आहेत असे मोठ्या गौरवाने ते म्हणतात.

अथांग सागरातून तरून जाणे नावेच्या मदतीने सोपे होते तसे ह्या अतिशय उत्कृष्ठ व गहन आशयाने भरलेल्या महाभारत नामक आख्यानाचे विचारपूर्वक वाचन किंवा श्रवण केले असता व्यवहाराच्या गुंतागुंतीत योग्य तऱ्हेने वाागणे सोपे होते.

वेगळी पुस्तके

बेलमाॅन्ट

आज रेडवुडसिटी लायब्ररीतील ‘माणूस ग्रंथालयात’ गेलो होतो. पंधरा दिवसांपूर्वी नाव नोंदवले होते. तीन मानवी पुस्तके निवडायला सांगितली होती. मी माझी आवड निवड कळवली. पण एकच वाचायला मिळेल बाकीची दोन आधीच कुणी तरी घेतली होती असे कळले. मी ठीक आहे असे मनात म्हणालो. त्यातही नेहमी प्रमाणे तिसऱ्या पसंतीचेच मिळाले होते.


ह्या पुस्तकांच्या यादीत वेगवेगळ्या विषयांवरचे मानवी ग्रंथ होते! यादी पाहा. आंधळा, व्यसनमुक्त बाप लेक, सुधारलेला गुंड, स्वप्ने पाहणारा!, संगणक शास्त्रज्ञ,पोलिस आॅफिसर, लिंगबदल झालेली व्यक्ति व आणखी काही दोन तीन पुस्तके होती.

परिक्षेत कोणत्याही पेपरात, एकही सोपा प्रश्न माझ्या वाट्याला न येणाऱ्या मला इथेही अवघड पुस्तकच वाचावे लागणार होते. लक्षात आलं असेलच की मला संगणक शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचायचे होते!

विषय समजल्यापासूनच धडधड सुरू झाली होती. मी काय वाचणार आणि मला काय समजणार?! सतीशला विचारायचो काय विचारू, काय बोलायचे वगैरे प्रश्न चालू होते माझे. नंतर लक्षात आले की सोनिया, तिच्या वर्गातील दुसरी मुले त्यांच्या project साठी काही जणांच्या मुलाखती घेतात ते किती अवघड असते! पण ती किती व्यवस्थित घेते. मी दहा बारा दिवस नुसता विचार न करताही घामेघुम होत असे. आणि आज सतीशने रेडवुडसिटी लायब्रीपाशी सोडले तेव्हा मी लगेच पळत घरी जायला गाडीत बसणार होतो. पहिल्या दिवशी शाळेत सोडायला आलेल्या आई बापाचा हात पोरगं सोडतच नाही; वर्गात जात नाही तसे माझे झाले होते. ‘ बाबा काही पुस्तक वाचायला जाणार नाहीत’हे सतीशला समजले असावे.

मी गाडीतून उतरल्याबरोबर त्याने इकडे तिकडे न पाहता फक्त All the Best पुटपुटत गाडी लगेच भरधाव नेली. मी रडकुंडीला येऊन गाडीमागे दोन पावले पळत गेलो.पण त्याने गाडी थांबवली नाही. मी त्यालाच आत पाठवणार होतो. पण मलाच आत जावेलागले. तिथे पोचणारा मीच पहिला होतो. अजून अर्धा एक तास होता. नेहमीप्रमाणे प्रथम तिथल्या दुकानात गेलो. नव्यासारखी दिसणारी, काही नवी, काही जुनी झालेली निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके पाहात थोडा वेळ घालवला.

रिडिंग हाॅल मध्ये जाऊन तिथे दिसेल ते पुस्तक वाचायचे ठरवले होते. पण पहिल्याच झटक्यात AIQ हे Nick Polson & James Scott ह्यांचे पुस्तक हाताला लागले! एकदम भरून आले. ‘केव्हढी कृपा’
‘चमत्कार चमत्कार तो हाच!’ ‘ह्यामागे काही तरी योजना असली पाहिजे’ ह्या भाबड्या बावळट विचारांच्या ढगांत फिरून आलो.महाराजांनी पेपर तर फोडलाच आणि वर मला हे AIQ चे गाईडही दिले!

पुस्तक वाचायच्या आधी परिक्षणे अभिप्राय तरी वाचावेत म्हणून मलपृष्ठ वाचू लागलो.पहिलाच अभिप्राय न्यूयाॅर्क टाईम्सचा. तो म्हणत होता, “लेखकांनी इतक्या हलक्या फुलक्या शैलीत लिहिले आहे की ते सदाशिव कामतकरांनाही समजेल! आम्हाला तर शंका आहे की त्यांच्यासाठीच ते लिहिले आहे! “ थक्क झालो! हे वाचल्यावर ट्रम्प, न्यूयाॅर्क टाईम्स वाॅशिंग्टन पोस्ट ह्यांना fake news म्हणणार नाही. पण मला आताच प्रश्न पडला की,न्यूयाॅर्क टाईम्सचे सोडून देऊ,त्यांना मी माहितच आहे; पण रेडवुड लायब्ररीला कसे समजले की मी वाचक आहे ते? थोडे डोके खाजवल्यावर लक्षात आले. “अरे शाळेत असतांना तू जसे गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये मला घ्याना मला घ्या ना बे; बॅटिंग बोलिंगही करतो ना मी. वाटल्यास फिल्डिंगही करीन. अशी दोन दिवस भुणभुण लावत त्या टीमभोवती फिरायचास? तसेच ह्या लायब्ररीलाही तू एकदा नाही तीन वेळा कळवलेस मी पुस्तक वाचायला येईन म्हणून!”

परीक्षेच्या हाॅल मध्ये जाण्यापूर्वी बहुतेक सगळेच अभ्यासावर शेवटचा हात फिरवितच आत जातात तसेच झाले की हे! असे म्हणत पुस्तक उधडले. वाचायला लागलो. भाताच्या प्रत्येक घासाला खडा लागावा किंवा भाकरीच्या पिठात खर आल्यामुळे भाकरीचा घासही वाळूची भाकरी खातोय की काय असे वाटावे तसे पहिल्या वाक्यापासून होऊ लागले. मुंग्यांनी मेरू पर्वत गिळायला घ्यावा किंवा ‘देवा तुझे किती सुंदर… ‘ ह्या कवितेच्यापुढे मजल न गेलेल्या माझ्या सारख्याने मर्ढेकर, पु. शि. रेगे किंवा ग्रेस ह्यांच्या कविताचे रसग्रहण करण्यासारखे किंवा अनुष्टुभ, अबक मधील कवितांचा अर्थ समजून घेण्यासारखेच हे काम आहे हे समजून आले. पुस्तक जागेवर उलटे ठेऊन वरच्या हाॅलमध्ये गेलो.

नेहमीप्रमाणे मीच पहिला वाचक. इतर वाचक कोणीही नव्हते. त्यामुळे मला पाहून Jenny Barnes ला खरंच ‘Happy to see you’ झाले. तिने मला नाव न विचारता माझे “सुंदर ते ध्यान” पाहूनच माझ्या नावापुढे मी आल्याची खूण केली. आत घेऊन गेली व माझे टेबल दाखवले. माझे पुस्तक आले नव्हते. हळू हळू इतर वाचक आणि पुस्तके येऊ लागली. त्या अगोदर व्यसनमुक्त बाप लेका ऐवजी माय लेक(मुलगा)आले होते.त्यांच्याशी बोललो. तेव्हढेच Warm up !

बार्न्सने एक छापील पत्रक दिले होते. वैयक्तिक खाजगी माहिती विचारू नये; हरकत नसेलतर विचारा/ सांगा. बोलण्यापेक्षा बोलते करा, ऐका; नमुन्यादाखल काय विचारणे चांगले वगैरे सर्व सूचना त्यात होत्या. मला पुष्कळ धीर येऊ लागला. वेळ झाली. सगळी पुस्तके आली वाचक आले. आपापल्या टेबला वर गेले. पेपर वीस मिनिटांचा. १५व्या मिनिटाला पूर्व सूचनेची घंटा होईल हे सांगून झाले. आणि सुर करा असे जेनी बार्न्स म्हणाली. माझी दातखीळ बसली! बरे झाले,शास्त्रज्ञ बाईनेच स्वत:ची “ हाय्! मी एमिली!” कसे काय आहात?”विचारत माझ्या घामाच्या धारांना बांध घालायचा प्रयत्न केला. नुकतेच वाचलेले शीर्षकच AIQ म्हणून उत्तर दिले. घाबरल्यावर आवाज मोठा होतो हे आजच लक्षात आले. कारण त्या हाॅलमध्ये माझ्या AIQ चे तीन वेळा प्रतिध्वनी घुमले! सगळ्या वाचकांनी पुस्तके पटापट बंद केली व काय झाले असा चेहरा करून एमिली बाईंकडे सहानुभुतीने पाहू लागले.त्यांना काय माहित असे अजून बरेच वेळा होणार आहे ते! पण एमिली बाई प्रसंगावधानी. त्यांनी तोच धागा पकडून “ ह्या गोष्टींची सुरवात १७५० पासून झाली. १९२० साली नेव्हीतील अॅडमिरल बाईंनी ह्यावर बरेच काम केले होते. मी मग काही संबंध नसताना algorithms हे संध्येतील नाव घ्यावे तसे म्हणून लगेच आठवून आठवून step by step..असे काही तरी पुटपुटलो.म्हणजे मला वाटले मी पुटपुटलो; पण माझा घुमलेला आवाज ऐकून लगेच इतर वाचकांनी आणि नवल म्हणजे पुस्तकांनीही माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने रागाने पाहात लायब्ररीत शांतता पाळायची असते त्याची आठवण करून दिली. एमिली बाईंबरोबर माझाही उत्साह वाढू लागला असावा. मग रोबाॅट्सही चर्चेत आले.

ह्या बाई संगणक शास्त्रात डाॅक्टरेट आहेत. पण गंमत अशी की त्या ह्या शास्त्राकडे वळल्या त्यामागे त्यांची पहिली व आजही असलेली भाषेविषयीची आवड. त्यांना चार पाच भाषा तरी येतात. विशेष म्हणजे लॅटिन जास्त चांगली येते. म्हणजे आपल्या कडील संस्कृत तज्ञ. भाषेतील व्याकरण, शब्दोच्चार त्यातील उच्चारांचे टप्पे किंवा तुकडे. शब्दरचना व होणारे वाक्य; पिरॅमिडच्या शिखरावर शब्द व त्या खाली, खाली तो तयार होण्यासाठी त्यातील अक्षरे त्यांचे होणारे उच्चार ह्यांची बांधणी करत करत शब्द होतो. तसेच वाक्यही. तेच मी प्रोग्रॅमिंगमध्ये करते असे उदाहरणे देऊन सांगितले. त्या इंजिनिअर नसूनही संगणक शास्त्रज्ञ झाल्या. त्यांनी मला alexa, siri संबंधात थोडक्यात सांगितले.पहिल्या अर्ध्या मिनिटातच माझ्या आकलनशक्तीचीही व स्तराची त्यांना कल्पना आली असावी. त्यांच्या टेबलाकडे मी व जातांना त्या स्वेटर विणत होत्या. शेवटी शेवटी मी त्यांना तसे सांगितले. त्यावर त्या लगेच हसत म्हणाल्या knitting सुद्धा प्रोग्रॅमिंगच आहे. विणायचा स्वेटर घेउन लगेच त्यांनी दोन उलट एक सुलट पुन्हा एक उलट…टाके सुईवर घेत त्याही कशा algorithmic स्टेप्स आहेत ते मला प्रत्येक स्टेप घेऊन सांगू लागल्या. घंटा होऊन गेली होती. ‘पेपर’ वाचून (सोडवून) झाला होता. वेळ संपत आला. सगळ्यांच्या उठण्याच्या निघायच्या हालचाली सुरु झाल्या. माझेही वाचन संपले होते.

हा मुलाखतीचा किंवा प्रश्नोत्तरांचा प्रकार नाही. ह्यात वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्या नेहमीच्या पठडीतील लोकांपेक्षा वेगळ्या, आपल्याला ज्यांच्याविषयी, ज्यांच्या पेशा कामा विषयी फारशी माहिती नसते कुतुहल असते अशांची भेट. त्यांनाही मुख्य प्रवाहात इतरेजनांच्या सहवासात आणून संवाद साधण्याचा हा एक वेगळा सामाजिक कार्याचा प्रकार आहे.दोन वाक्यात सांगायचे तर तुम्हीही आम्हीच आहात. आणि व आम्हीही तुम्हीच आहात. हे जाणून घ्यायचा हा वेगळा एका अर्थी उद्बोधक आणि सुंदर सामाजिक उपक्रम आहे.

उपक्रमाला नावही (ज्या स्थळी हा आयोजित केला त्याचाही त्यात थोडा वाटा असेल ) वेगळे व लक्षवेधी आहे . Human Library. Civit ह्या संस्थेने केलेला उपक्रम आहे.

मी सर्वेक्षणात सहसा भाग घेत नाही. पण अखेरीला मी त्यांचा फाॅर्म भरून दिला. नविन पुस्तके सुचवा मध्ये मी weatherman(Meteorologist) fire fighter first responders सुचवले.

मला हा नविन अनुभव होता. समोरासमोर अनोळखी व्यक्तीशी (इंग्रजीतून!) संभाषण करण्याची ही माझी पहिलीच वेळ. वेळ चांगला गेला व कारणी लागला असे वाटले.

मी लिहिलेले ‘हे पुस्तक’ वाचनीय वाटेल की नाही ही शंका आहे. कारण सर्वेक्षणातील “तुम्हाला ‘पुस्तक’ व्हायला आवडेल का?” हा प्रश्न मी सोडून दिला!

संपता संपता, AIQ ची मी दोन चार पाने वाचली त्यावरून हे पुस्तक उत्तम आणि वाचावे असे आहे इतके सुचवतो.

जन्मभरीच्या श्वासा इतुके लिहिले मी शब्द अपार

मी एक ओळीत जन्मभरीच्या श्वासा इतुके लिहिले मी शब्द अपार… !
माणूस आयुष्यभर शिकत असतो. जन्मभर विद्यर्थी असतो हे अनुभवाचे बोल प्रत्येकाला पाठ असतात. हे बोल ऐकल्यावर अनेकांना गुरु दत्तानी एकवीस गुरू केल्याची कथाही आठवते. त्याच त्या चुका वारंवार करत जीवनाच्या शाळेतील मी किती पारंगत विद्यार्थी आहे हे सगळ्यांना माहिती झाले आहे.
अनेक चुकांतील एक माझी नेहमीची ठळक चूक कोणती ते…..


आज मी उन्हे उलटण्याच्या सुमारास म्हणजे सावल्या लांब पडण्यास सुरुवात झाली नव्हती पण लवकरच पडू लागतील अशा वेळे आधी निघालो. साडे चार वाजता. फाटकातून बाहेर पडलो आणि नाॅटरडेम हायस्कूलच्या दिशेने निघालो.चुला व्हिस्टा’च्या वळणापाशी आलो. जावे का ह्या चढाच्या रस्त्याने? स्वत:लाच विचारले. “पण चढ खूप मोठा आहे. आपण ल्युनार्डीवरून ‘चुला व्हिस्टाकडे’ वळून दोन तीनदा गेलोय. कारण काय तर इकडूनही चढच आहे. पण ह्यापेक्षा कमी म्हणून तिकडून आलो होतो. पण हा जमेल का चढून जायला?” मळ्यात जाऊन “काय वांगी घेऊ का ?” असे वांग्यांच्या झाडांनाच विचारून भरपूर वांगी तोडून घेणाऱ्या भिकंभटासारखे मीही स्वत:लाच विचारून, जाऊ का नको ते ठरवत होतो! शेवटी देवाचे नाव घेतले व चुला व्हिस्टाचा चढ च-ढ-त,च—ढ—त निघालो.


वर मध्ये स्वल्प विराम टाकलाय पण एक एकेक पावलानंतर अर्धविराम घेत मी चाललो होतो. एका बाजूने डोंगर,झाडी दुसऱ्या हातालाएकीकडे खोलगट दऱ्या. घाटातला रस्ता म्हणावा तसा. पण झाडी दोन्ही बाजूला.आणि दोन्ही बाजूला घरे! काही झाडीतून दिसणारी, काही डोकावणारी! व वरच्या चढा चढाच्या हाताला वर वर बांधलेली. इकडे खाली उताराच्या बाजूलाही घरे. सगळी सुंदर! मी ज्या घाटातल्या रस्त्यावरून चढत जाण्याचा प्रयत्न करत होतो तो रहदारीचा. पण फार वर्दळीचा नाही. तिथे राहणाऱ्यांच्याच मोटारींची रहदारी. चढण त्रासाची होती. हे लोक मोटारीतूनही कशी सारखी ही चढण पार करत असतील व उतरतही कशी असतील!


अखेर वाटेत तीन चार वेळा प्रत्येक थांब्याला अर्धा एक मिनिट थांबत, ती रम्य आणि मनोहारी चढण पाहात पाहात पठारावर आलो. आणि हे काय आता आलीच की ती कार्लमाॅन्टची शाळा म्हणत पाय एक दो-न करत पडू लागले. डोंगर-चढाच्या चंद्रभागेचा रस्ता चढून-उतरून घरी आलो. एक तास लागला असेल. घाटातली अर्धचंद्राकार वळणाची गल्ली तीच चुला व्हिस्टाचीच; आज दुसऱ्या बाजूने आलो इतकेच.पण शहरातल्या खंडाळ्यातून फिरून आलोय इतका ताजा आनंद झाला!
ल्युनार्डीवरून भर रहदारीच्या नेहमीच्या रस्त्याने घरी सुखरूप आलो.
………………


वरचा संपूर्ण परिच्छेद मी पत्राच्या रूपात मुलांना पाठवला. त्याला काय उत्तर आले आले ते पाहा.
“बाबा, “आज उन्हे उलटण्याच्या ……निघालो” ह्याची काय गरज आहे? साडे चार वाजता निघालो. इतके पुरे.


पुढचे फाटकातून वगैरे कशाला? तुम्ही नेहमी फाटकावरून उड्या मारून बाहेर पडता? “चुला व्हिस्टापाशी आलो. इतके बास.नंतर तुम्ही जावे की न जावे वगैरे लिहिलेय. हॅम्लेटचे नाटक लिहिताय का भूमिका करताय? पुढचे ते देवाचे नाव कशासाठी? फिरायला निघाला होतात का लढाईला? आं?चुला व्हिस्टा तिथला चढ वगैरे अगोदर येऊन गेलंय. पुन्हा ते शिवणाचे टाके घालत काय लिहिलेय! चढ चढत किती वेळा? चढ चढतच जायचा असतो. ते लिहायची आवश्यकता नाही.बरं ते मध्ये स्वल्प वि…. ..का काय ते व्याकरण का आणले? अनावश्यक. आतातुम्ही शहरात राहता. घरे असणारच. बरे डोंगरातल्या रस्त्यावरून जाता आहात. तुम्ही अमेरिकेत असता. तिथे भरपूर झाडी आहे हे इथल्या देगाव-दवंड्यांचे गावच्या लोकांनाही माहित आहे. पुढे रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे काय.? कशासाठी प्रयत्न? आता निघालात ना फिरायला? पुन्हा प्रयत्न कसला? रहदारीचा पण फार वर्दळीचा नाही म्हणजे काय समजायचे वाचणाऱ्यांनी? असे हेही नाही तेही नाही तऱ्हेचे वाचून कुणी तो रस्ता ओलांडून गेला तर काय होईल त्याचे? अहो तुमचे हे पत्र वाचून अमेरिकेतले लोक खटला भरतील तुमच्यावर. तसेच ते पुढचे ‘मोटारीतूनही कशी ही चढण…..असतील’ ह्या वाक्याने वाचकाच्या माहितीत काय भर पडते? कित्येक वर्षे ते असे मोटारीतून जात येत आहेत.ते म्हणतील मोटारवाल्यांनी तुमच्याकडे किंवा सरकारकडे काही तक्रार केलीय का? काहीही लिहायचे आपले!


तुम्ही चालत गेला होता का बसने? मध्येच थांबे कुठून आले? काढून टाका तो सर्व मजकूर. बरं इतका वेळ तुम्हाला हा घाटाचा रस्ता चालवत नव्हता. मग एकदम ती चढण रम्य मनोहारी वगैरे कशी काय झाली?


पुढे, “पाय एक दो… “ लिहिले आहे.परेड करत होता का चालत होता? इतका वेळ एका ओळीतही पाण्याचा ओहोळ राहू द्या थेंबही नव्हता. मग ही डोंगर चढाचीच चंद्रभागा(म्हणजे काय ?!!)कुठून उगम पावली?खोडून टाका ते. बाबा तुम्हाला शाळा तर कधीही आवडत नव्हती. नेहमी ती बुडवत होता तुम्ही. कशाला ती कार्लमाॅन्ट का फाॅन्टची शाळा पाहिजे? बंद करा ती. त्यातही “अर्ध चंद्राकार काय … आज दुसऱ्या बाजूने आलो… “. तुम्हाला कुणा पोलिसाने अडवले होते का काय तिथे? कशाला हवा तो कबुली जबाब.”मी ह्या बाजूने आलो त्या बाजूने गेलो…?” खराय ना. गाळा तो मजकूर. आणि कुणाचा तरी आनंद शिळा असतो का हो? तुमचाच तेव्हढा ताजा? हल्ली काहीही शिळे नसते. बातमी,विनोद सुद्धा. आणि हो! ती ल्युनार्डी म्हणजे काय देऊळ आहे का रेल्वे स्टेशन की पार्क आहे का सरडा? कुणाला माहित आहे ल्युनार्डी? का जगातले कितवे आश्चर्य आहे ती ल्युनार्डी का खोटारडी? नको तिथे भरपूर खुलासेच्या खुलासे, विशेषणांची खैरात आणि ल्युनार्डी जसे काही कोथरुडच्या येनापुरे वडापाववाल्याही माहित अशा पद्धतीने लिहिले आहे. अहो तुमच्या ह्या पत्रापेक्षा मोटारीतला GPS चांगला की. शेवटी, फिरून घरीच येताना नेहमी? आणि सुखरूप ते काय? आजच सुखरूप आलात का? मग ते वाक्य लिहिण्याने विशेष काही सांगितले जाते का?

तुमच्या लक्षात येते का माहित नाही. तुमचे हे संपूर्ण पत्र फक्त दोन शब्दांचे आहे. “ फिरून आलो.”आणि हे शब्द फोनवरूनही पटकन पाठवता आले असते.

मुलांचे हे उत्तर वाचले आणि पत्रकाराची गोष्ट आठवली:-

वृत्तपत्रविद्येच्या वर्गात पत्रकाराने कमीत कमी शब्दात पण आशय तर स्पष्ट व्हावा असे लिहावे ह्यावर भर देत असतात. अशाच एका तासाला निरिक्षक म्हणून काही अनुभवी पत्रकारही आले होते.
प्राध्यापक शिकवत असता त्यांनी एक प्रश्न दिला. एका मच्छिमाराने मासे विकण्यासाठी दुकान टाकले. ताजे मासे विकत होता. चारी बाजूंनी काचा असलेल्या पाण्याच्या पेट्यांत निरनिराळ्या जातींचे मासे ठेवलेले. व्यवस्थित ठेवले होते. आणि दुकानाच्या समोर लोकांना माहिती व्हावी असा एक फलक त्याला ठेवायचा होता. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना तो फलक लिहायला सांगितला.

विचारासाठी दिलेला वेळ संपल्यावर एक एक विद्यार्थी येऊन लिहू लागला. कुणी पाच सहा ओळींचा तर कुणी चार ओळींचा काही जणांनी तर कमालच केली. निबंध लिहावा तसे लिहिले. मुले,सर व ते अनुभवी पत्रकार सगळे चर्चा करत ते तपासून दुसऱ्या मुलांना लिहायला सांगत. होता होता एका हुषार विद्यार्थ्याने मात्र फक्त एकच वाक्य लिहिले. सगळे विद्यार्थी एकदम ओह! वाह वा म्हणू लागले. सर व निरीक्षकांचेही समाधान झाले असावे. वाक्य होते:

‘Fresh Fish Are Sold Here’

तरीही सरांनी हे आणखी सुटसुटीत करता येईल का असे अनुभवी निरीक्षक पत्रकारांना विचारले. त्यावर एक पत्रकार फळ्याकडे आले व म्हणाले, “हे बघ तुझ्या दुकानासमोर हा बोर्ड लावणार ना?” “ हो” मग here कशाला हवा? “ असे म्हणत त्यांनी त्यातला तो शब्द काढला. “Fresh Fish are sold “
“ आता पहाare कशाला हवा? तो नसला तरी अर्थ तोच राहतो ना?” “ हो सर. “ त्यांनी are काढून टाकला.

“Fresh Fish sold “

मग ते निरीक्षक म्हणाले, हे पाहा मासे ताजे नसले तर त्याचा कुबट दुर्गंध येतो. तसा वास आला तर कोणी फिरकेल का?” “ नाही सर.” “ हे पाहा तुमचे मासे चांगले ताजे आहेत हे सगळ्यांना दिसते. ताज्या माशांसाठीच लोक येतात. मग fresh शब्द अनावश्यक आहे. हो की नाही?” “ yessSSir!”
“तर आता वाक्य बघा कसे होते ते.”

Fish Sold”.

पुढे त्यांनी विचारले,” तुम्ही मासे लोकांना फुकट वाटायला दुकान टाकले आहे ?
“नाही सर. विकण्यासाठीच टाकले”
“ मग ते Soldकशाला लिहिले?”आता बघा कसे थोड्याच म्हणजे एकाच शब्दात लोकांना समजते ते.”

“FISh”

प्रोफेसरांनी, विद्यार्थ्यानी बाके वाजवली. अनुभवी पत्रकारांनी डस्टर टेबलावर ठेवून विचारले, “हे दुकान मासे विकण्याचेच आहे हेतर स्पष्ट दिसतेय. हो नां ?” सगळेच “होऽऽ ! म्हणाले. मग हा Fish शब्द तरी का हवा? म्हणत त्यांनी तोही खोडून टाकला!

माझ्या मुलांनीही माझ्या पत्राचे अनुभवी पत्रकारासारखेच केलेले संपादन तुम्ही अगोदर वाचलेच. केले. त्यांनी ता.क. लिहिला; तो असा:-


ता.क. बाबा तुम्ही रोजच फिरायला जाता, म्हणून ‘फिरून’ हा शब्द काढून टाका. तुम्ही फिरून आल्यावर पुन्हा ‘आलो’ हे निराळे का सांगायला हवे? तोही शब्द काढून टाका.बघा बरं आता वाचायला किती छान सोपे झाले.


पुन्हा ता.क. लिहू नका!

तालेवार भाषांतरकार

Translation is an art of critical interpretation. No two languages ever dovetail perfectly but they can be linked by translation.

भाषांतर करणे सोपे नाही. विशेषत:एका भाषेतील साहित्य कृतीचे दुसऱ्या भाषेत भाषांतर कठिण असते. लेखाच्या सुरवातीलाच भाषांतरा संबंधातील कोणा मोठ्याचे विचार आणि सुरवातीची प्रस्तावना पाहून अाज मी असा भाषांतराकडे का वळलो असा प्रश्न पडला असणार.

शाळेच्या परीक्षा, प्रश्नपत्रिकेची आठवण झाली का हीशंका सुद्धा आली तर नवल नाही. कारण प्रारंभीच्या वर्गात हिंदीचे मराठीत आणि मराठीचे हिंदीत तर नंतर आठवीपासून संस्कृतचे मराठीत व त्याविरुद्ध मराठीचे संस्कृतात हे प्रश्न हमखास असत. संस्कृताचे हे दोन्ही प्रश्न नापास करण्यासाठीच असत असे आम्हा सर्वांचेच मत होते. गाईडमुळे संस्कृतचे मराठीत भाषांतराचा प्रश्न पाठांतर केले असल्यानुळे, सोडवण्याचा प्रयत्न तरी करत असू. पण मराठीचे संस्कृत? अरे बापरे. तो प्रश्न कधी सोडवल्याचे आठवत नाही! कारण सांगायचे तर शरदचंद्र चटर्जींच्या गाजलेल्या कादंबऱ्यांची प्रसिद्ध नाटककार भा.वि. उर्फ मामा वरेरकरांनी भाषांतरे केली नसती तर आपण वाचनाच्या किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो ह्याची जाणीव आता होते.

अमृता प्रितम, प्रेमचंद मुन्शी,किंवा सआदत हसन मंटो, पंजाबी उर्दू हिंदीतून लिहिणारे प्रख्यात लेखक राजेंद्रसिंह बेदी ह्यांच्या कथांचे कादंबरीचे भाषांतर जर कुणी केले नसते तर आपल्याला त्या परिणामकारक, विचार करायला लावणाऱ्या कथानकांचा अनुभव आनंद घेता आला असता का? “पण वर म्हटल्याप्रमाणे कोणत्याही भाषेतून आपल्या भाषेत भाषांतर करणे सोपे नाही. त्यासाठी साहित्यिक जाण व भाषांतरकार स्वत:ही जर लेखक असले तर ते जास्त चांगले होते. म्हणूनच मी वर वरेरकरांनी केलेल्या शरदचंद्र चटर्जींची ‘श्रीकांत’ चे तिन्ही भाग किंवा सानेगुरुजींनी केलेले कृष्णा हाथिसिंग यांच्या With No Regrets चे केलेले ‘ना खंत ना खेद’, प्रसिद्ध कादंबरीकार व मराठीतील शैलीदार लेखक ना.सा. फडके ह्यांनी आर्मेनियन लेखक विल्यम सारोयान ह्यांच्या कादंबरीचे ‘ जीवन-संगीत’ ह्या नावाने उत्कृष्ट भाषांतर केले होते त्याचा उल्लेख केला .तसेच रामानंद सागर ह्यांच्या ‘ और इन्सान मर गया’ ह्या कादंबरीचे मनोहर तल्हार ह्यांनी केलेले ‘आणि माणसाचा मुडदा पडला’ हे सुरेख भाषांतर अथवा अलिकडे पुपुल जयकर ह्यांनी इंदिरा गांधींविषयी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचे अशोक जैन यांनी केलेले भाषांतर ही सर्व अप्रतिम पुस्तके वाचतांना ती भाषांतरे न वाटता स्वतंत्र कृति वाटतात. असीकडे चांगली भाषांतरे बरीच होत आहेत. लोकवाड.मय प्रकाशन आपल्या येथील निरनिराळ्या भाषांतील पुस्तकांची, काव्यसंग्रहांची भाषांतरे प्रसिद्ध करीत असते. तीही वाचनीय असतात.

हे सुद्धा आठवण्याचे कारण, दोन वर्षापूर्वी वारलेल्या प्रख्यात अनुवादक Gregory-Rabassa ह्यांच्या संबंधी, वाड.मयाचे नोबेल पारितोषिक विजेते मारियो गार्सिया ह्यांनी काढलेले उद्गार वाचनात आले. ते म्हणाले, “ उत्तम भाषांतर म्हणजे ती स्वतंत्र निर्मितीच असते. आणि तसे उत्कृष्ट व अनुरूप भाषांतर करणारे ग्रेगरी रेबासा होते!” ग्रेगरी रेबासांमुळे मारियो गार्शिया, ज्युलिओ काॅर्टाझार, मारिओ व्हर्गाझ लोसा अशा बऱ्याच नामवंत स्पॅनिश व पोर्च्युगीझ भाषेतील लेखकांच्या श्रेष्ठ कादंबऱ्या, कथांची ओळख जगातील इंग्रजी वाचकांना झाली! लॅटिन अमेरिकेतील बऱ्याच प्रतिभावंत व दर्जेदार लेखकांना जगाच्या वाड.मयात स्थान मिळवून देण्यात ग्रेगरी रेबासाचा फार मोठा हातभार आहे. त्यामुळेच ते लेखक रेबासाला खूप मानतात.

ग्रेगरी रेबासा दोन वर्षापूर्वी वयाच्या ९४व्या वर्षी वारला.

त्याचा जन्म अमेरिकेतील न्यू याॅर्कच्या याॅन्कर्स येथे १९२२ साली झाला. त्याचे शिक्षण न्यू हॅम्पशायर जवळच्या डार्टमाऊथ काॅलेजमध्ये झाले.त्याचे वडील क्युबन होते. आई न्यू याॅर्कच्या बारमध्ये काम करायची. त्याने पदवीसाठी Romance( ह्यातील प्रमुख भाषा आहेत इटालियन, फ्रेंच,स्पॅनिश, पोर्च्युगीझ आणि रुमानियन. ह्यांचा उगम,त्या काळी रोजच्या व्यवहारात सामान्य माणसे बोलत त्या गावठी- अनागरी लॅटिन भाषेत आहे.)भाषांचा अभ्यासक्रम घेतला होता. त्यामध्ये त्याने पहिली पदवी मिळवली होती. त्यामुळे त्याला फ्रेंच, स्पॅनिश,पोर्च्युगीझ व इटालियन भाषेत बरीच गति व ज्ञान होते. दुसऱ्या महायुद्धात त्याची शत्रूंचे सांकेतिक भाषेतील गूढ संदेश उलगडण्याच्या महत्वाच्या कामावर नेमणूक झाली. मुळातच त्याला भाषेची आवड होती. हे कामही त्याच्या आवडीचे झाले. युद्ध संपल्यावर त्यामुळेच त्याने कोलंबिया विद्यापीठात स्पॅनिशमध्ये एम. ए. केले व पोर्च्युगीझ भाषा व वाड.मयात डाॅक्टरेट मिळवली! त्याच विद्यापीठात व नंतर काही वर्षे क्विन्स काॅलेजमध्ये अशी २२ वर्षे त्याने प्राध्यापक म्हणून काम केले. भाषा हे ग्रेगरी रबासाचे खास ‘प्रेम प्रकरणच’ होते! विद्यापीठात असतानाच त्याने स्पॅनिश आणि पोर्च्युगीझ लेखांचे व कथांचे भाषांतर केले. ते ओडिसी रिव्ह्यू ह्या साहित्याला वाहिलेल्या त्रैमासिकात प्रसिद्ध होऊ लागले. वाचकांना तर ते आवडलेच पण Pantheon ह्या प्रसिद्ध प्रकाशकांचेही लक्ष वेधून घेतले. रबासाचे ह्या दोन्ही भाषांवरील त्याच बरोबर इंग्रजीवरील प्रभुत्व त्यांच्या पारखी नजरेत भरले. त्यांनी रबासावर एक मोठे काम सोपवले. ज्युलिओ काॅर्टेझाच्या स्पॅनिश Rayvuela कादंबरीचे भाषांतर रबासाने हाती घेतले. रबासाने भाषांतर केलेली ही कादंबरी Hopscotch नावाने प्रसिद्ध झाली. ह्या कादंबरीला त्या वर्षीचे नॅशनल बुक अॅवार्ड मिळाले. ह्याच सुमारास ज्याने साहित्यात अदभुत वास्तवता आणली;अद्भुततेच्या कोंदणात बसवलेल्या वास्तववादी लिखाणाचे युग सुरू केले त्या मारिओ गार्शियाने आपली One Hundred Years of Solitude ही कादंबरी लिहून संपवली होती.

भाषांतर करण्या अगोदर तो ते पुस्तक आधी वाचत नाही. वाचून बघेन मग भाषांतर करायचे ठरवेन असे म्हणत नाही. वाचायला घेतो.पण काही शब्दांवाक्यांवर मात्र रेबासा बराच चिकित्सापूर्वक विचार करतो. मूळ भाषेतील शब्दांच्या हव्या त्याच अर्थछटा इंग्रजीतही आल्या पाहिजेत अशा शब्दांची तो निवड करतो. वर सांगितलेल्या मारिओ गार्शियाच्या कादंबरीतील पहिल्याच वाक्यात स्पॅनिश मधील firing squad ह्या अर्थाच्या शब्दाचे भाषांतर इंग्रजीत firing partyअसेही करता आले असते. पण अमेरिकन वाचकांना जास्त सवयीची व जवळची वाटेल अशी firing squad शब्दयोजना त्याने केली. कादंबरीचे स्पॅनिश नाव Cien Anos de Soledad चे इंग्रजीत नामांतर करताना त्याने One Hundred Years Of Solitude असे केले. स्पॅनिश Cien चा अर्थ “ One hundred “ आणि “a hundred” असाही होतो. पण त्याने one hundred च पसंत केले. त्याचे कारण सांगताना तो म्हणतो कादंबरी वाचल्यावर लक्षात येते की गार्शियाच्या मनात एक विशिष्ट असाच काळ होता. त्यामुळे तितकी ती शंभरच वर्षे दर्शविण्यासाठी One hundred हे शब्द वापरले. कादंबरीच्या नावातील दुसरा महत्वाचा शब्द म्हणजे Soledad. त्याचेही भाषांतर Loneliness आणि Solitude ह्या दोन्ही शब्दांनी करता आले असते. पण त्याने वर्णिलेल्या काळातील महत्वाचा भाव येण्यासाठी त्याने तो शब्द का निवडला ह्याचा खुलासा केला,तो आपल्या मराठीतील ‘एकटेपणा’/ ‘एकटेपण’आणि ‘एकान्तवास’ ह्या शब्दांत जो फरक आहे त्यावरून कळेल.

गार्शिया,काॅर्टेझा, लोसा किंवा आॅगस्टो माॅन्टेरसो ह्या लेखकांच्या कादंबऱ्या कथांचे अनेक भाषांत भाषांतर झाले आहे. पण रबासा संबंधी बोलतांना गार्शिया म्हणतो , “ फक्त रबासाने मला कधीही एखाद्याही शब्दाचा किंवा वाक्यांच्या बाबतीत खुलासा,संदर्भ विचारला नाही!” गार्शियाच्या काही पुस्तकांचे एडिथ ग्राॅसमन ह्या दुसऱ्या नामवंत भाषांतरकारानेही, इंग्रजीत भाषांतर केले आहे. तीही प्रसिद्ध आहेत. “स्पॅनिश पोर्च्युगीझ भाषांच्या बाबतीत रबासा हा आम्हा सर्वांचा पितामह आहे!” असे ग्राॅसमनने त्याच्याविषयी म्हटले आहे.एडिथ ग्राॅसमन ह्याने प्रख्यात स्पॅनिश लेखक सर्व्हॅन्टिसची तितकीच प्रख्यात सार्वकालीन अभिजात कादंबरी Don Quixote चे भाषांतर केले ते सगळ्यात जास्त वाचकप्रिय आहे. अशा लेखकांनी रबासाविषयी हे गौरवोद्गार काढले आहेत. पण रबासाचा खरा गौरव नोबेल विजेता मारियो गार्शियानेच केला.

गार्शियाने वर उल्लेखलेली आपली कादंबरी लिहून पूर्ण केली. रबासानेच आपल्या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर करावे असे त्याला वाटत होते. पण रबासाच्या हातात काम होते. ते संपायला तीन वर्षे लागणार होती. गार्शिया तीन वर्षे थांबला. तो इतकी वर्षे रबासासाठी का थांबला ते सांगताना तो म्हणतो,” उत्तम भाषांतर म्हणजे दुसऱ्या भाषेतील ती स्वतंत्र निर्मितीच असते! माझ्या कादंबरीचीही इंग्रजीत अशीच साहित्यकृति व्हावी, म्हणूनच ग्रेगरी रबासाविषयी माझ्या मनात असलेल्या नितांत आदरापोटीच, मी तीन वर्षे थांबणे पसंत केले !” भाषांतरकारांना साहित्यात मूळ लेखकाइतकेच मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या या तालेवार भाषांतरकार रबासाचे १३ जून २०१६ साली वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.






प्रसिद्ध पण अनोळखी लेखक

आपल्या सर्वांना ब्रिटिश अमेरिकन किंवा फ्रेंच आणि इटालियन लेखक माहित असतात. पुर्वीचे काही व अलिकडचेही काही.


गेल्या वीस पंचवीस वर्षात आणि त्यातीलही दहा वर्षात मला काही लॅटिन अमेरिकन, एखाद दुसरा पोर्च्युगीझ किंवा मेक्सिकन लेखक माहित झाले. त्यापैकी मी काहींचीच पुस्तके वाचली व इतरांविषयी दुसऱ्या लेखकांनी त्यांच्या संबंधात गौरवाने लिहिलेले लेख किंवा पुस्तकातील उल्लेख वाचले. बहुतेकांना Alchemist कादंबरीमुळे Paulo Coelho ह्या ब्राझेलियन लेखकाचे व ती मूळ पोर्च्युगीझ मध्ये आहे हे माहित झाले. व इंग्रजी फ्रेंच आणि इटॅलियन भाषांप्रमाणेच इतर भाषांतही उत्तम लेखक व साहित्य असू शकते हे कळून आले.

माझा वर्गमित्र कै.प्रा.मधु काळे, मी अमेरिकेला जायला निघालो की एक पुस्तक जरूर वाच म्हणायचा. मी पुस्तकाचे व लेखकाचे नाव एका कागदाच्या कपट्यावर लिहून घ्यायचो. बॅगेत जपून ठेवायचो. इतर पुस्तके पा्हण्याच्या चाळण्या वाचण्याच्या नादात काळेने सांगितलेले पुस्तक वाचायचे विसरत असे. तो कागद तसाच परत यायचा. दरखेपेला, “काळे, ह्या खेपेस नक्की वाचेन” म्हणायचो. काळे दोन वर्षांपूर्वी गेला. मी त्याने सांगितलेले पुस्तक अजूनही वाचले नाही. आता मन घेत नाही. पण अलिकडच्या पद्धतीप्रमाणे म्हणायचे तर, मी ते त्याच्या आठवणीसाठी वाचणार आहे. Octavia Paz हा मेक्सिकन कवि, लेखक आणि मुत्सद्दी. पण साहित्यिक म्हणूनच जास्त सर्वत्र ओळखला जातो. त्याने काही काव्य संग्रहासह अठरा पुस्तके लिहिली आहेत. बहुतेक सर्व प्रख्यात आहेत. त्याला १९९०मध्ये वाड.मयाचे नोबेल पारितोषक मिळाले. त्याचा त्याला आनंद झाला.

पण कोणालाही आपल्या भाषेचा सन्मान करणारे श्रेष्ठ पारितोषिक मिळाल्याचा निराळाच आनंद होतो तसा त्यालाही जेव्हा स्पॅनिश भाषेला जगाच्या नकाशावर ठळकपणे ज्याने आणले त्या अतिशय प्रख्यात कादंबरीकार Miguel de Cervantes च्या नावाने दिले जाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पारितोषिक मिळाले तेव्हा झाला. हा सर्व्हॅन्टिस म्हणजे सर्वकालीन श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या, आपणापैकी अनेकांना माहित असणारा , Don Quixote ह्या कादंबरीचा लेखक!

आपल्याला पाझ जवळचा वाटावा कारण १९५१ मध्ये तो हिंदुस्थानात मेक्सिकोच्या वकिलातीत अधिकारी म्हणून आला. नंतर पुन्हा १९६२ साली तो वकील (राजदूत) या मोठ्या हुद्द्यावर रुजु झाला. इथल्या अनुभवावर त्याने Light In India हे पुस्तक लिहिले. आणि माझा मित्र काळेने त्याचे गाजलेले पुस्तक सांगितले ते Labyrinth of Solitude. मी काळेचा कागद आपल्याजवळ आहे हे विसरलो होतो. त्यामुळे मी नाव तेच आहे समजून दुसऱे तितकेच गाजलेले पण दुसऱ्या लेखकाचे पुस्तक One Hundred Years of Solitude हे नोबेल पारितोषिक विजेता Gabriel García Marques ह्याचे पुस्तक वाचले!

आता आपल्याला नवे तिसरे नाव समजले.

हा गार्शिआ कोलंबियाचा लेखक. जन्म १९२३ साली झाला. ह्याने आपल्या कादंबऱ्यांतून,जॅार्ज बोर्जेसने आपल्या साहित्यातून आणलेल्या सत्य आणि काल्पनिकता यांच्या बेमालूम मिश्रणातून लिहिण्याच्या प्रकारातून जी एक निराळीच वास्तवता आणली होती तिचाच विकास त्याने सहजपणे केला. तिला magical realismअसे म्हटले जाते. अदभुत वास्तव! ह्याचीही अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. Love in the Time Of Cholera, Chronicle of a Death Foretold, The General in His Labyrinth तशीच कथा संग्रह आणि लघुकादंबऱ्यांचा संग्रह ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. त्याने आपली One Hundred Years of Solitude ही कादंबरी १९६७साली लिहिलीआणि तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा लेखक झाला! इतकेच नव्हे तर लॅटिन अमेरिकेचे हे पहिले “आंतरराष्ट्रीय तडाखेबंद विक्रीचे पुस्तक”असा मान मिळवला! जगभरात वीस कोटी प्रति खपल्या आहेत ! ह्या शतकातील श्रेष्ठ कादंबऱ्यांत तिची गणना होते.

गार्शिआ मार्किझ म्हणतो की कादंबरी लिहिण्याची प्रक्रिया १९५० सालीच सुरवात झाली. त्यावेळी तो आई बरोबर आपल्या आजोळी गेला होता.आठ वर्षापर्यंतचे त्याचे लहानपण आजी आजोबांच्या घरीच गेले होते. त्यामुळे तो आईबरोबर पुन्हा गेला तेव्हा त्याला “आजोळचे ते गाव तिथले रस्ते झाडे-पक्षी,घरे-माणसे, आजोबा आजीने सांगितलेल्या गोष्टी,त्यातल्याही माणसांसह व प्रसंगासह सर्व काही एका प्रचंड प्रकाशात डोळ्यांसमोर उभे राहिले.” पुढे नंतर कधीतरी लिहिताना म्हणतो की त्यावेळी मी कादंबरीचे पहिले संपूर्ण प्रकरणअगदी शब्द न् शब्द घडाघडा टायपिस्टला सांगितले असते. आजोबा आजी जशा आणि ज्या शब्दात गोष्टी सांगत तशाच तऱ्हेने मी लिहित गेलो असेही त्याने म्हटले आहे. १९६१साली लिहायला सुरुवात झाली. लिहायला अठरा महिने लागले.घरात जवळ जवळ बंदिस्त होऊन तो लिहित होता. कागदाचे दस्तेच्या दस्ते आणि सिगरेटची पाकिटे च्या पाकिटे एकामागून एक फस्त होत होती.त्याच बरोबर घरातील एक एक वस्तुही विकायला लागत होती.गहाण ठेवायची पाळी आली होती.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तशी गार्शिआची बायको मर्सिडिझ, खंबीरपणे घर चालवत होती. दोन मुलांचे सर्व काही करणे,घर चालवणे हे तिने एकटीने केले. मोटार विकावी लागली. घरातली ठेवता येण्यासारखी प्रत्येक गोष्ट गहाण ठेवून, परतफेडीच्या मुदती वाढवून घेणे,हेही तिने केले. संसाराचा गाडा रेटत नेला. गार्शिआ मार्किझला १९८२ सालचे नोबेल पारितोषिक मिळाले! हा अर्जेंटिनाचा कवि,कथाकार,निबंधकार, भाषांतरकार तत्वज्ञानी, संपादक, आणि अर्जेंन्टिनाच्या सार्वजनिक ग्रंथालयांचा प्रमुख होता.

गार्शिआ सारखाच र्ब्युनासएअर्स युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापक पदावर काम केलेला जॅार्ज फ्रान्सिस लुई बोर्जेस हा एक प्रतिभावंत साहित्यिक होता. जॅार्ज लुई बोर्जेसने तत्वदर्शी वाड.मयात मोलाची भर घातली. वाड.मयात एका वेगळ्याप्रकारची शैली आणली. काल्पनिकता,अदभुतता व प्रत्यक्षातले वास्तव सत्य ह्यांचे एकजीव मिश्रण अशा शैलीतून लिहिण्याचा मान ह्याच्याकडे जातो. ह्यात लेखकाच्या मनातील विचारांना कल्पनेत जाण्याचे स्वातंत्र्य जास्त आहे.

ह्याच्या कथासंग्रहात निरनिराळ्या कथा असल्या तरी कथा विषय समान एक असतो. त्यामुळे त्या कथा एकमेकांत जोडल्या जातात. सलग होतात. पण कादंबरी होत नाही हे विशेष. त्यांच्या कथांमध्ये Mirror, Labyrinth , Library इतकेच काय काल्पनिक लेखकही येतात. त्याचे नावाजले गेलेले पुस्तक म्हणजे Collected Fiction. ह्याला नोबेल पारितोषिक मिळाले नाही. पण प्रतिष्ठेची समजली जाणारी आंतरराष्ट्रीय, स्वित्झर्लॅंडच्या Belzan Foundation चे तसेच फ्रान्सचे Knights of the Legion of Honor अशी पारितोषिके मिळाली आहेत.

पोर्च्युगीझ लेखक Jose Saramago हे सुद्धा वरील सर्व लेखकांइतकेच विख्यात आहेत. आपल्यात ते आतापर्यंत म्हणजे २०१० पर्यंत होते. त्यांचा जन्म १९२२ सालचा. त्यांची अत्यंत गाजलेली व जिच्यामुळे त्यांना 1998 सालचे नोबेल पारितोषिक मिळाले ती Blindness ही कादंबरी वाचण्यासारखी आहे. ह्या कादंबरीचे माझे मित्र डॅा.भा.ल.भोळे ह्यांनी मराठीत भाषांतर केले आहे. त्यामुळ मला ती अनायासे वाचायला मिळाली. याच लेखकाची दुसरीही कादंबरी The Cave ही सुद्धा चांगली आहे व तीही वाचण्याची शिफारस श्रेष्ठ वाचक,इंग्रजी वाड.मयाचे प्राध्यापक, समीक्षक चार्ल्स व्हान डोरेन हे करतात.

ब्लाइंडनेस मध्ये, लोक अचानकपणे आंधळे होऊ लागतात. साथ पसरत जाऊ लागते. सरकारने ह्याला प्रतिबंध व्हावा म्हणून अशा आंधळ्यांना एका इमारतीत लोकवस्तीपासून वेगळे ठेवण्यास सुरुवात केली. तिथले आयुष्य, तिथेही काही समाजकंटक आंधळ्यांना मिळणाऱ्या अन्नपदार्थांचा ताबा घेतात. व काही मोबदल्याच्या बदली अन्नवाटप करु लागतात. मोबदल्याच्या वस्तूंमध्ये नंतर बायकांचीही मागणी होऊ लागते.

व्यवहारातील आंधळ्यांना समोर अंधार असतो तर कादंबरीत जे आंधळे होतात त्यांच्या समोर पांढरा पडदा येतो. संपूर्ण कादंबरीत,आंधळा झालेल्या डोळ्यांच्या डॅाक्टरच्या बायकोला मात्र आंधळेपण येत नाही. ती एकटी डोळस असते. ती तशी डोळस नसती तर कादंबरीत जे घडते ते आपल्याला समजले नसते. तिच्या डोळ्यातून आपण, आपलेच आंधळे झालेले जग पाहू शकतो.वाचू शकतो. मनुष्याच्या सर्व वृत्तींचे,वागण्याचे असहाय्यतेचे, त्या आंधळ्यांच्या जगातील- हे जन्माने आंधळे नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे- त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यात रोजच्या हालचाली करण्यात, तिथल्या नरकापेक्षाही जास्त असलेल्या घाणीतून वावरताना होणाऱ्या हालांचे, पोटासाठी शरीरही देण्याचे भोग कपाळी आलेले, बळी कसे कान पिळतात इत्यादींचे दर्शन कादंबरीत होते.

डोळ्यांचा डॅाक्टर आंधळा होणे, डोळ्याच्या दुखण्यावर उपचारासाठी आलेले त्याचे पेशंट आणि तो एकाच ठिकाणी येणे;माणसांचे अशा परिस्थितीत वागणे किती एकदम वेगळे होते इत्यादी गोष्टींचे वर्णन वाचायला मिळते. शेवटपर्यंत ती डोळस बाई तिला दिसतेय हे न सांगता इतरांना मदत.करीत असते. पुस्तक वाचण्या सारखे तर आहेच.पण आपल्याला विचार करायला लावणारे पुस्तक आहे. पुष्कळ लिहिण्यासारखे आहे. ‘पांढरे आंधळेपण’ इथूनच विचार करायला लावते.

वानगीदाखल सांगितलेल्या वरील लेखकांपेक्षाही अनोळखी असलेल्या एका लेखकाची ओळख करून देण्यासाठी मी लिहिण्यासाठी बसलो होतो. पण वरील लेखकांत गुंतत गेलो. आणखी एक गंमतीचा योगायोग असा की त्या रात्री मी मुलाला ओझ् झविषयी सांगत होतो. दुसरे दिवशी संध्याकाळी तो म्हणाला,” बाबा ओझची शेवटची मुलाखत घेणारी बाई आज रेडिओवरून त्याच्या विषयीच बोलत होती!”

हा मूळ हिब्रू भाषेत लिहिणारा यहुदी(ज्यू) लेखक आहे. त्याचे नाव Amos Oz. त्याने इझ्रायल संबंधित लिहिलेल्या कादंबऱ्या, लेख, निबंध ह्यामुळे त्याचे नाव प्रथम जगातील ज्यू लोकांमध्ये व त्याचे साहित्य इतर भाषांमध्ये भाषांतरीत झाल्यामुळे जगाला माहित झाले. विशेष म्हणजे हा इझ्रायल व पॅलेस्टिनी लोकांमध्ये शांतता निर्माण होऊन ती कायम राहावी ह्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करीत होता.

Amos Oz हा इझ्रायलच्या विख्यात लेखकांपैकी होता.पण त्याहीपेक्षा त्याची ओळख शांततेसाठी उभारलेल्या चळवळीतील अग्रणी, -सर्वांत श्रेष्ठ असा पुढारी अशी होती. चळवळ दोन्ही देशांच्या लोकांमध्ये सामंजस्य वाढीस लागावे व कायमची शांतता नांदावी ह्यासाठी होती. पण अशा चळवळींना यशासाठी फार झगडावे लागते.

त्याच्या निधनाची बातमी परवा त्याच्या मुलीने Twitter वर टाकली. ती म्हणते,” माझे वडील फार चांगले, कुटंबवत्सल गृहस्थ होते. ते म्हणजे मूर्तिमंत शांती आणि उदारता आणि समन्वयच होते! कॅन्सरशी अल्पकाळ लढताना, अखेरच्या क्षणी आपल्यावर प्रेम करणारे सभोवती आहेत ह्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. (शेवटच्या श्वासापर्यंत ते शुद्धीवर होते.) त्यांनी मागे ठेवलेला वारसा पुढे चालवून आपण परिस्थिती बदलू या.”

इझ्रायलच्या मातीत घडणाऱ्या कादंबऱ्या आणि इझ्रायलचा संदर्भ असलेले त्याचे लेख आणि निबंध Amos Oz ने पुष्कळ लिहिले आहेत. जगातील जवळपास चाळीस भाषांत त्याच्या कादंबऱ्या, लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके, लघुकथा संग्रह ह्यांची भाषांतरे झाली आहेत. त्यामुळे त्याचा साहित्यिक व त्या दोन्ही देशांतील शांतिदूत म्हणूनही जगात बोलबाला झालाआहे. तो संपूर्ण इझ्रायलमध्ये व West Bank मध्येही फिरला. कितीतरी लोकांना भेटला. त्यांच्याशी आपल्या देशाचा इतिहास आणि भविष्य ह्याविषयी बोलला. अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्याचे In the Land of Israel हे पुस्तक लिहिले गेले.

ओझ चे आई वडील पूर्व युरोपातून इझ्रायलमध्ये आले. देश अजून निर्माण झाला होता-नव्हता अशा बाल्यावस्थेत होता. ओझचा जन्म १९३९ साली इझ्रायलमध्येच झाला. त्यामुळे आई वडील आणि त्यांच्या पिढीतल्या लोकांना जे युरोप व पाश्चात्य देशांविषयी जवळीक,आकर्षण व अभिमान होता तसा त्याला नव्हता. तो बाळइझ्राईलमध्येच वाढला. नंतर त्याला आपला इझ्रईली तरुण,तरूण- इझ्राइल घडवत आहेत त्याचे आकर्षण होते. तो आपल्या आठवणींत लिहितो,” नव्या देशाबरोबरच मीही माझ्या आयुष्याचे नवीन गीत गाणार आहे.भर माध्यान्ही पाण्याने भरलेला ग्लास जसा हवासा वाटतो तसे या देशातील माझेच नाही सर्वांचे आयुष्य साधे आणि सरळ रेषेसारखे व्हावे असे वाटते !” ॲमॅास ओझने १९६१ साली लष्करी शिक्षण पूर्ण केले. १९६७ साली इझ्रायलने ईजिप्त आणि सिरिया या देशांना युद्धात पाठिंबा दिला. त्या युद्धात आणि १९७३च्या Yom kippur च्या युद्धातही तो आपल्या देशाकडून लढला होता.

त्याच्या आठवणीतून व्यक्त होणारे आत्मचरित्र A Tale of Love and Darkness प्रख्यात आहे. त्या पुस्तकाला Goethe Prize आणि इतर सन्मानही लाभले. त्यावर आधारित सिनेमाही निघाला आहे. इझ्रायलचा नामांकित मुत्सद्दी व पंतप्रधान शिमन पेरेझ हा ओझचा मित्र होता. ह्या पंतप्रधानाला पॅलेस्टिनींशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात ओझने पुढाकार घेतला होता.ह्यासाठी त्याला शांततेचे नोबेलही मिळाले. ओझने, पॅलेस्टाईनशी शांतता करार व्हावा आणि त्याला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळावा हे कलमही त्या शांतता करारात असावे ह्यासाठी वर्तमानपत्रांतून व ठिकठिकाणी अनेक लेख लिहिले.

तो व्यथित होऊन म्हणतो की दोन इझ्रायलींमध्ये आपला देश कसा व्हावा धोरण काय असावे ह्यावर एकमत होत नाही! साहित्यिक म्हणून ॲमॅास ओझचे महत्व फार मोठे आहे. त्याने आपल्या हिब्रू भाषेतून लिखाण केले. हिब्रूचे पुनरज्जीवन केले. तिला संजीवन दिले. साहित्यिक जगात स्थान मिळवून दिले. ही त्याची मोठी कामगिरी आहे.

ओझ गेल्यावर त्याला कट्टर विरोध करणाऱ्या पंतप्रधान नेत्यानेहूनेही,ओझने हिब्रू भाषेला जागतिक स्तरावर नेल्याचे मान्य करून त्याचा ह्याबाबतीत गौरव केला आहे. ओझच्या आत्मचरित्रात्मक आठवणींच्या गाजलेल्या पुस्तकाचे शीर्षक वापरून इझ्रायलचे राष्ट्राध्यक्ष रूव्हेन रिव्हलिन ह्यांनी यथार्थ व समर्पक शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात,” A Story of Love and light and now darkness!” त्याच वेळी इझ्रायलच्या भेटीसाठी आलेल्या युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाने तर ओझचा इझ्रयल व पॅलेस्टाईन ह्या दोन लोकांत शांततेसाठी झगडणारा बुलंद आवाज ह्या शब्दांत गौरव केला. अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके ओझला मिळाली असतील पण शांततेचे नोबेल मिळावे ह्या यादीत मात्र तो कायम ‘नामांकन यादीत’ अजून तिष्ठत उभा आहे!

शतकानुशतके समाज , सामाजिक विचार, राजकीय विचारसरणी आणि अप्रत्यक्षपणे माणसाचे जीवन जी वळणे घेत घेत आज जिथे माणूस आला आहे त्यामागे ह्यांच्या सारखे, आणि फार पूर्वीपासून होत गेलेले अनेक लेखक आहेत हे विसरता येणार नाही. साहित्य, वाड•मय काय करते त्याचे उत्तर आपणच, आणि आपले जीवन हे आहे. आजपावेतो माणसाच्या विचारात आणि आचरणात बदल होत झाले त्याला बव्हंशी लेखक त्यांचे साहित्य/वाड•मय, पुस्तके, कारणीभूत आहेत. ऋण मानायचे की नाही हा प्रश्न नाही; त्या ऋणात आपण राहणे ही कृतज्ञता आहे.

ता. क.
वर्गमित्र प्रा. मधुकर काळे ह्याच्या स्मरणार्थ त्याने सतत शिफारस केलेले Octavio Paz चे The Labyrinth of Solitude हे पुस्तक नुकतेच घेतले. वाचायला सुरुवातही केली. १८ फेब्रुवारी २०२२