भक्त जोगा परमानंद

बेलमाॅन्ट

भक्त जसा परिपक्व होत जातो तशी त्याच्यामध्ये शांती क्षमा येऊनि पाही। अखंड वसती त्याचे हृदयी।हे गुण वास करू लागतात. हे सत्वगुणच आहेत पण बरेच वेळा भक्त त्याचबरोबर आपल्या भगवंतावरच्या प्रेमाला, शरीराला पराकोटीचे क्लेश देऊन त्याची भक्ती निष्ठा सिद्ध करण्याचेहीप्रयत्न करतो. पण तसे करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे भक्त आपल्यातील विवेक ह्या गुणाला विसरला का असा विठ्ठलालाही प्रश्न पडतो. पांडुरंग, स्वत:लाच विचारल्यासारखे,भक्ताला म्हणतो,” एव्हढे का मांडिले निर्वाण। काहीच नसता अन्याय जाण। केले देहासी दंडण।।” पण तरीही भक्त स्वत:ला बजावत असतो की माझी दैवतावरील निष्ठा ही केव्हाही शंभर टक्के असली पाहिजे. नव्हे ही त्याची नेहमीच तीव्र इच्छा असते. ह्यासाठी प्रसंगी स्वत:च्या जीवाचीही तो पर्वा करत नाही. कारण माझा विठोबा मला ‘कसा मोकलील’हा त्याचा ठाम विश्वास असतो.

भक्तांच्या कथा ऐकण्यातही पुष्कळ पुण्य आहे.तीही भक्तीच आहे.श्रवण,भजन, कीर्तनआणि पठण हे भक्तीमध्ये अंतर्भूत आहेत. सामान्याप्रमाणेच साधकालाही हरीकथा ऐकणे जितके लाभदायक आहे तितकेच पुण्यवान भक्तांच्या कथा ऐकण्यातही आहे असे शंकर पार्वतीला सांगतात. ते काय म्हणतात ते आपण संतकवि महिपती बुवांच्या शब्दांतून ऐकू या.

शुद्ध सत्वगुण तोही।येत लवलाही निजप्रति।।……।सकळ दु:खांचे होय दहन।…….. वर्णिता गुण हरि कीर्तनी।। ऐसा अंतरी देखोनि नेम। मग प्रसन्न होईल पुरुषोत्तम। आपुले भजनी देऊनि प्रेम।। ऐसी भक्तकथेची गोडी थोरी। पार्वतीस सांगे त्रिपुरारी।।

भक्तकथा ऐकण्याने किंवा हरिकथा ऐकण्याने थोड्याच दिवसांत किंवा थोडक्या काळातच काही रोकडा (प्रत्यक्ष)फायदा होतो असे नाही. पण हळू हळू सद्भावनेचा उदय होऊन वाढ होते.असा हा अल्प सत्वगुण थोडा फार मुरला तरी त्याची जोपासना होऊ लागते. हया अप्रत्यक्ष फायद्यातून रोजच्या जीवनात कळत न कळत जे सुखाचे आनंदाचे क्षण येतात ते जास्त काळ टिकू लागतात.
भगवंताची एकनिष्ठेने उपासना करणारा असाच एक भक्त सोलापुर जिल्ह्यातील बार्शी गावात राहात होता. त्याचे नाव जोगा परमानंद.

जोगा गावात घरोघरी भिक्षाटनास जात असे. मिळेल त्या भिक्षेत कुटुंबाचे पोषण करीत असे. आंधोळ करून घरातल्या देवाची यथासांग पूजा करून तो गावातल्या प्रसिद्ध भगवंताच्या दर्शनाला जात असे. पण चालत जात नसे. गीतेचा एक श्लोक म्हणून जमिनीवर दंडवत घालायचा. दुसरा श्लोक म्हणायचा दुसरे दंडवत घालून पुढे सरकायचा. उठून तिसरा श्लोक म्हणून झाला की पुन्हा दंडवत……अशा रीतीने गीतेचे सातशे श्लोक म्हणत सात शते दंडवत घालून भगवंताचे दर्शन घ्यायचा. हे झाले की घरी चालत आल्यावर मगच जेवण करायचा. हा नित्यनेम पाहून गावातले लोक तर जोगा परमानंदाला मोठा मानीतच पण परगावातून बाजारहाटासाठी आलेले लोक आणि लहान मोठे व्यापारीही थक्क होत.

त्या रात्री खूप पाऊस पडला. रस्ता चिखल पाण्याचा झाला होता. गेले दोन तीन दिवस जोगाची ही दंडवत भक्ती पाहून एका व्यापाऱ्याच्या मनात आले की ह्या भक्ताला आपल्या मालातील एक पितांबर द्यावा. चिखलातूनही साष्टांग दंडवत घालत येणाऱ्या जोगाला पाहिल्यावर तर तो व्यापारी अचंबित झाला. निष्ठानेम म्हणावा तर हीच व निष्ठावान भक्त पाहावा तर जोगा परमानंदासारखा असे मनात म्हणत तो व्यापारी जोग्याजवळ जाऊन नम्रतेने म्हणाला,” जोगा महाराज! तुम्ही हा पितांबर घ्यावा व तो नेसावा. मला फार फार संतोष होईल.” जोगा म्हणाला,” शेठजी, हा पितांबर माझ्या काय कामाचा? मला स्वत:ला व घरालाही तो अति विशोभित दिसेल. जुन्यापान्या धोतरावर माझे भिक्षा मागून पोट भरते. आणि शेठजी ह्या पावसापाण्यात पितांबर काय कामाचा? राहू द्या तुमच्यापाशी. त्यापेक्षा हा तुम्ही पांडुरंगाला नेसवावा.” जोगाच्या बोलण्यावर शेठजी आदरपूर्वक म्हणाला,” जोगा परमानंद, तुमचे ह्यामुळे पोट भरावे किंवा घरासाठी ह्याचा काही उपयोग व्हावा ह्या विचाराने मी पितांबर दिला नाही. तुमची भक्ती पाहून माझे मन भरून आले म्हणून ही फुल ना फुलाची पाकळी देतोय. पांडुरंगालाही मी दुसरा देईन. चिखल- पाण्याने पितांबर खराब होईल तर त्याचीही चिंता नको. मी आणखी एक पितांबर आपल्याला देईन! आपण हा पितांबर नेसूनच पुढे जावे. माझ्या मनाला बरे वाटेल.”

तरीही जोगी परमानंदाने आढेवेढे घेतले. पण व्यापाऱ्याने मनापासून केलेल्या आग्रहापुढे व देणाऱ्याचे मन मोडू नये ह्या विचाराने जोगा नमला. त्याने तो पितांबर परिधान केला.

गीतेचा श्लोक म्हणत जोगा दंडवत घालणार पण पितांबर पायघोळ होतोय हे त्याच्या लक्षात आले. पितांबर वर खोचला. दंडवत घालायला वाकला पण हा भारी पितांबर चिखलाने घाण होईल ह्या विचाराने तो कुठे कोरडी जागा दिसतेय का पाहू लागला. चिखल तर सगळीकडेच झाला होता. ते पाहिल्यावर जोगाने दंडवत घातले. पुढचा श्लोक तो म्हणाला पण घसरलेले पितांबर पुन्हा वर खोचले. आणि दंडवत घातले. असे होता करता किती प्रहर उलटले ते जोगा परमानंदाच्या आज लक्षात आले नाही. कोणता श्लोक म्हणून झाला हेही त्याच्या बरेच वेळा लक्षात येईना. शरीर थकले होते पण त्यापेक्षाही मन फार ठेचकाळले होते. देवळा बाहेरच बसून राहिला.

हे काय झाले आज! कालपर्यंत रोजच्या धोतराकडे ते जुने का पुराणे, स्वच्छ का मळलेले, ते धुळीने भरते का वाऱ्याने उडते हे विचारही मनात येत नव्हते. भगवंताशिवाय दुसरीकडे अर्धा क्षणही लक्ष गेले नाही. आणि आज दंडवतापेक्षा, पांडुरंगापेक्षा पितांबरातच मन गुंतले होते.मनातच पांडुरंग नव्हता तर तो ध्यानांतही कसा असेल?  जोगा खिन्न झाला. त्याहीपेक्षा त्याला स्वत:चा संताप आला. तो आपलीच निर्भत्सना करू लागला. “अरे कुठे गेला तुझा नेम? मन थाऱ्यावर नव्हते. ते पितांबराच्या भरजरीत होते.ते चिखलाने माखेल ह्याची तुला चिंता होती. पितांबराच्या मोहाने मन बरबटले ह्याची तुला फिकीर नव्हती. अरे जोगड्या, काल पर्यंत काय पितांबर नेसलेल्या पांडुरंगाशिवाय तुला कशाचेही भान नव्हते. दंडवताने कष्ट होतात म्हणजे काय हे तुझ्या खिजगणतीतही नव्हते! एकाग्रता काय असते,ती वेगळी काही असते हे माहित असण्याचीही तुला आवश्यकता पडली नाही. कारण तुझे चित्त पांडुरंगाच्या पायीच रंगले होते.तल्लीनता एकाग्रता अनन्यता हे शब्द तुझ्यासाठी वेगवेगळे नव्हते.कारण तो तुझा सहज भाव होता.पण आज पितांबर नेसलास काय आणि त्याच्याच विवंचनेत गुंगलास काय! अरे जोगी होतास तो चार हात पितांबरामुळे भोगी झालास! लाज वाटली पाहिजे तुझी तुलाच. उठ प्रायश्चित्त घे.शिक्षा भोग. त्यामुळे तरी तुझी भगवंतापाशी थोडीफार पत राहिल. उठ!”

जोगा परमानंद असा विचार करत असतानाच समोरून धष्टपुष्ट बैलांची जोडी घेऊन एक शेतकरी चाललेला दिसला. शेतकऱ्याला आपला हा भरजरी पितांबर घेऊन त्या बदली त्याचे बैल काही वेळासाठी परमानंदाने घेतले. शेतकरीही थोड्या वेळासाठी इतका भारी पितांबर मिळाला ह्या आनंदात होता. परमानंदाने शेतकऱ्याकडून चऱ्हाटाने आपले पाय बैलाच्या जोखडाला घट्ट बांधून घेतले. आणि तो शेतकऱ्याला म्हणाला बैलाना जोरात चाबूक हाणून पळव. भाड्यापोटी भारी पितांबर मिळाल्याच्या आनंदात शेतकऱ्याने जोगा सांगेल तसे केले.

चाबकाचा फटकारा बसल्यावर बैल चौखुर उधळत निघाले. आणि जोगा परमानंद फरफटत चालला. काटेकुटे-सराटे, दगड-गोटेआणि खड्यां-मातीतून जोगा अंग खरचटत फरपटत होता.नंतर कातडे सोलून निघू लागले. रक्त वाहू लागले. बैल वारा प्याल्यासारखे, शेपट्या वर करून पळतच होते. बैलांना आवरणारा कुणी शास्ता नव्हता. त्याही सिथितीत पश्चात्तापाने पोळलेला जोगा तोंडाने,” जय रूक्मिणीमानसरंजना। पयोब्धिवासा शेषनयना । भक्त कैवारिया गुणनिधाना। जगज्जीवना पांडुरंगा।। असा धावा करीत, मध्ये रामकृष्ण हरि हा नाममंत्र जपत, अंगाची कातडी सोलून निघालेल्या,मांसपेशी लळत लोंबत खाली पडत चाललेल्या अवस्थेत फरफटतच होता. बैल थांबण्याचे चिन्ह नव्हते. जोगाचे हाल संपणार नव्हते. आता तर रक्ताने माखलेला हाडाचा सांगाडा तोंडाने जय जय जय रामकृष्ण हरि हे भजन करीत फरफटत होता. तो सांगाडा कोणी पाहिला असता तर तो कुणाचा असा प्रश्न त्याला पडला असता.

अखेर भक्ताची दया देवालाच येणार ह्या न्यायाने चक्रधारी पांडुरंग जोगा परमानंदासाठी धावून आला. बैलांसमोर उभा राहून त्यांची शिंगे धरून त्यांना थांबवले. जोगाच्या पायाचे चऱ्हाट सोडून त्याचे पाय मोकळे केले.मुखाने हरिनाम घेणाऱ्या सांगाड्याकडे अत्यंत प्रेमळ दृष्टीने पाहात पांडुरंगाने आपला कृपेचा वरदहस्त हळुवारपणे जोगाच्या सांगाड्यावरून फिरवला.भक्त जोगा पुन्हा पहिल्यासारखा झाला.

आपल्यासाठी निर्गुण भाव सोडून सगुण साकार रुपात प्रत्यक्ष प्रकट झालेल्या दयाघन विठ्ठलाकडे जोगा डोळे भरून नुसता पाहातच राहिला. मग थोड्या वेळाने भानावर आलेल्या परमानंदाने आपले रोजचे दंडवत भगवंतापुढे घातले! परमेश्वरापुढे शरण होऊन तसाच पडून राहिला. पांडुरंगाने त्याला उठवले. जवळ घेतले. विठ्ठलाने त्यानंतर जोगा परमानंदाला सांगितले ते सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे.

“रोज रस्त्यावरून दंडवत घालत शरीराला इतके कष्ट देऊन माझ्या दर्शनाला येण्याचे कारण नाही. नित्यनेमात मन काही काळ विचलित झाले तरी त्याचे इतक्या निर्वाणीला येऊन असे पराकोटीचे प्रायश्चित्त घेण्याचे मनातही आणू नये. मी भाव भक्तीचा भुकेला आहे. मला भक्तांचे इतके कौतुक असते की त्याने जेवताना घेतलेला घासही माझ्याच मुखात जातो. भक्त सहज चालत येतो जातो ती माझी प्रदक्षिणाच मानतो.आणि माझा भक्त समाधानाने झोपला तरी तेच त्याने मला घातलेले दंडवत मानतो.”
दमहिपतीबुवांनी देवाचेच शब्द आपल्या रसाळ ओव्यांतून सांगितले ते म्हणत भक्त जोगा परमानंदाची कथा संपवू या,
“ जोग्यासी म्हणे रुक्मिणीरमण। एव्हढे का मांडिले निर्वाण । काहीच नसता अन्याय जाण। केले दंडण देहासी । तुम्ही करता अन्नपान । ते माझे मुखी पडता जाण। सहज करीता गमना गमन। तेचि प्रदक्षिणा आमुची। नातरी कोणासी बोलाल वचन। तेचि होतसे माझे स्तवन। की सुख संतोषे करीता शयन। ते साष्टांग नमन मज पावे। ऐसे असता निजभक्त राया। एव्हढे निर्वाण केले कासया।

भगवंताचे हे अमृताचे शब्द ऐकून परमानंदाने देवाच्या पायांवर मस्तक ठेवले व त्याची कृपाछाया आपल्यावर सदैव असो द्यावी ही प्रार्थना केली. जोगा परमानंदाप्रमाणेच भगवंताची आपणा सर्वांवरही अशीच कृपा असू द्यावी ही प्रार्थना करून ही भक्तकथा संपवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *