फ्रान्सिस बेकन – तत्वज्ञानी, मुत्सद्दी, वैज्ञानिक,विद्वान

पैसा सर्वस्व नाही पण पैशाशिवाय सर्व अडते. साठलेले पाणी आणि साठलेला पैसा दोन्हीही फार काळ उपयोगी पडत नाहीत. संपत्ती विषयी असे बरेच काही आपण वाचलेले असते. पण सोळाव्या शतकातील एका राजकारणी,मुत्सद्दी,आणि विद्वानाचे पैशाच्या बाबतीतले व्यवहार्य मत आजही लक्षात ठेवण्यासारखे आहे.तो आपल्या Of Seditions and Trouble निबंधात लिहितो,”Money is like muck(manure), not good except it be spread.” हे वाचकांना सांगणारा विद्वान म्हणजे लाॅर्ड फ्रान्सिस बेकन !

फ्रान्सिस बेकनचा जन्म १५६१ साली लंडनमध्ये झाला. राजदरबाराशी निगडीत असलेल्या उच्च घराण्यात झाला. फ्रान्सिस बेकनचे वडिल सर निकोलस बेकन हे होत. पहिल्या एलिझाबेथ राणीचे ते Lord Keeper होते. हे पद मोठ्या अधिकाराचे व जबाबदारीचे होते. राणीची सरकारी आज्ञा,हुकूम,संमती,कायदे अशा महत्वाच्या कागदपत्रांवर उमटवण्याची ‘राजमुद्रा’ ह्याच्या ताब्यात व अखत्यारित असे. ती कागदपत्रे कायदेशीर व अधिकृत करण्याचा त्याला अधिकार होता. ह्याच पदाचे विलीनीकरण लाॅर्ड चॅन्सेलरमध्ये झाले. हा काही काळ पार्लमेंटचा सभापतीही असे. न्यायखात्याचे सेक्रेटरीही ह्याच्याच अंतर्गत होते. कॅबिनेट मंत्रिपदही असे. थोडक्यात फ्रान्सिस बेकनला बाळपणापासून अनुकुल परिस्थिती होती.

फ्रान्सिस बेकनने कायद्याचे शिक्षण पुरे केल्यावर तो इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये आला. तिथे त्याचा आणि अर्ल आॅफ इसेक्स Essexचा संबंध आला. बेकनला त्याच्या कामात वरच्या आणि त्याही वरच्या पदांवर जाण्यासाठी ह्या अर्लने खूप प्रयत्न आणि मदत केली. कारण अर्ल राणीच्या निकटवर्तियांमधील महत्वाचा माणूस होता.

त्यानंतर आलेल्या पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीत फ्रान्सिस बेकनच्या कर्तृत्वाचा तारा तेजाने तळपू लागला.
हल्लीच्या पदाचे नाव वापरून सांगायचे तर साॅलिसिटर जनरल पदापासून तो लाॅर्ड चॅन्सलर ह्या मोठ्या अधिकारपदा पर्यंत पोहचला. पण दुर्दैवाने त्याच्या सोनेरी कारकीर्दीला ग्रहण लागले. इ.स.१६२१ मध्ये असे काही घडले की त्यामुळे फ्रान्सिस बेकनने पार्लमेंट,राजकारण उच्च पदांचा त्याग करून त्याने आपले पुढील सर्व आयुष्य लिहिण्यात घालवले.

बेकनवर लाच घेतल्याचा आरोप आला. चौकशी झाली. त्याने आपण लाच घेतल्याचे कबूल केले.लाॅर्ड आॅफ बकिंगहॅमला बदनामीपासून वाचवण्यासाठी बेकनला ह्यामध्ये पद्धतशीरपणे गोवले गेले. त्याला बळीचा बकरा केला गेला असे काही इतिहासकारांचे मत आहे. काही असो पण बेकनची चाळीस वर्षांची गौरवास्पद राजकीय कारकीर्द संपली हे खरे. फ्रान्सिस बेकन, बॅराॅन व्हेरुलेम व्हायकाउन्ट सेंट अल्बन्स…लाॅर्ड बेकन; पण अधिकृतरीत्या लाॅर्ड सेन्ट अल्बन्स, लाॅर्ड चॅन्सलर फ्रान्सिस बेकन इतकी मानाची बिरुदे किताब पदव्या असणारा उच्च अधिकारपदे भूषविणारा बेकन राजकारणाच्या धकाधकीतून आणि राज्यकारभारातून बाहेर पडला. त्याच्या लाॅर्ड, सर,अर्ल ह्या भूषणावह पदव्यांचे लोकांच्या लेखी महत्व नव्हते. ह्याचे कारण त्याच्या विद्वत्तेमुळे व त्याने लिहिलेल्या ग्रंथांतील ज्ञान आणि विचार ह्यामुळे तो आजही आदरपुर्वक फ्रान्सिस बेकन अशा साध्या नावानेच ओळखला जातो. त्याने मागे ठेवलेला वैचारिक वारसा पाहिला की बेकनने लाच घेतली हे एका अर्थी बरेच झाले असे वाटते.

राजाच्या मर्जीतला असल्यामुळे त्याला तुरुंगवास वगैरे काही घडला नाही. बेकनचा एक गुण उठून दिसतो. ज्यांनी त्याला मदत केली आपला म्हटले त्यांच्याशी तो प्रामाणिक राहिला.भावनात्मकतेने नव्हे तर त्याच्या विचारपूर्वक बनलेल्या मतांमुळेही असेल. कारण आपल्याला बेकनच्या कारकिर्दीची, त्याने लिहिलेल्या पुस्तकांची खूप माहिती मिळते पण त्याच्या हृदयातील मनांतील भावभावनांविषयी फारशी माहिती मिळत नाही.

बेकनने लिहिलेल्या ग्रंथांतून मांडलेल्या विचारांमुळे आपल्या ज्ञानात मोलाची भर घातली हे निर्विवाद सत्य आहे. अधिकारपदावरून खाली आल्यावर बेकनने त्याचा मित्र पंतप्रधान बर्ली ह्याला एक पत्र लिहिले. त्यात त्याने लिहिलेले एक वाक्य आपले लक्ष निश्चित वेधून घेते. ह्यानंतर बेकन आपण काय करणार आहोत हे स्पष्ट करताना म्हणतो, “I have taken all knowledge to be my province.” पूर्वीपासून चालू असलेल्या त्याच्या अभ्यासाची, विचारांची झेप व बुद्धीचा प्रचंड आवाका ह्यामधून व्यक्त होतो. अर्थातच इथे All Knowledge ह्या शब्दांतील Knowledge ह्या शब्दावर जास्त भर आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

वाड.मय त्यातील सर्व प्रकार, धर्म, व्यवहारातील अनुभवांवर आधारीत ज्ञान, ह्यांचा समावेश बेकनने ज्ञानात केला नाही.त्याचा भर विज्ञानावर आहे. ह्यामध्येही अर्थातच ज्ञानाचे अनेक विषय येतात.त्यात Logic ही येते.समस्त निसर्गसृष्टी येते. म्हणजे विज्ञान येते.

बेकनने आपल्या ज्ञान साम्राज्याचे,त्यावर वेळोवेळी झालेले, होणाऱ्या हल्ल्यांपासून(विरोधी मते,टीका) त्याचे रक्षण करणारी स्वत:ची बाजूही त्यामध्ये मांडली आहे. त्याने वरील पत्रात व्यक्त केलेल्या All Knowledge संबंधात त्याने पुस्तक लिहिले आहे. दुर्दैवाने तो ते पुरे करू शकला नाही. त्या पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यावर, त्या विषयाचा अफाट आवाका पाहिल्यावर हे एका माणसाचे काम नाही ह्याची खात्री पटते.बेकनच्या ह्या पुस्तकाचे नाव आहे Great Instauration , म्हणजे महान पुनर्बांधणी, पुनर्रचना. ह्या पुस्तकात बरेच विभाग आहेत.

पहिला भाग विषयाची ओळख करून देणारा आहे. ह्याची पाने थोडीच आहेत. “ती वाचताना आपण आपला श्वास रोखून वाचू इतक्या अप्रतिम व ओघवत्या शैलीत बेकनने लिहिले आहे. ती वाचताना शब्दांचे सौदर्य व सामर्थ्य काय असते ते बेकन आपल्या शब्दांतून प्रकट करतो!” असे चार्ल्स व्हान डाॅरेन सारख्या बऱ्याच विद्वान समीक्षकांचे आणि श्रेष्ठ वाचकांचे मत आहे.

पुस्तकाचा दुसरा भाग Novum Organon अथवा Modern Logic असा आहे.आणि त्यानंतर येतो Advancement Of Learning हा भाग. त्यामध्ये निरनिराळ्या शास्त्रांचे, मनुष्याच्या बुद्धीच्या, आकलनशक्तीच्या आधारे वर्णन केले आहे. त्यानंतर बरीच प्रकरणे आहेत. त्यामध्ये तत्वज्ञानाला व विज्ञानाला जे प्रश्न पडतात किंवा सोडवायचे आहेत त्यांची चर्चा आहे. ही प्रकरणे, आणि बेकनचे इतर लेखन पाहिले तरी बेकनने काय करायचे योजले होते किंवा मानवजातीनेच काय केले पाहिजे त्याचा अंदाज येतो.

ह्यामध्ये New Logic आणि The Advancement of Learning हे दोन भाग विशेष वाचनीय आहेत.
नोव्हम आॅर्गॅनान मध्ये त्याने मनातील भ्रामक कल्पनांना, चुकीच्या समजुतींना,तर्कबुद्धीचा आधार नसलेल्या कल्पनां-विचारांना Idol म्हटले आहे.ह्यावर त्याने जे विश्लेषण केले आहे ते आजही मानले जाते. Idolविषयी लिहिताना तो म्हणतो की एखादी वस्तु काय आहे , कशी आहे, तिचे वेगवेगळे पैलू हे वस्तुनिष्ठपणे जाणून घेण्यात आपल्या मनातील असलेल्या पूर्व कल्पना किंवा त्यांच्यावर बुद्धीपेक्षा इतर बाबींचा प्रभाव(पूर्वसमजुती,ऐकीव माहिती इत्यादि) अडथळा आणतात.समाजमनावरही ह्यांचा मोठा प्रभाव असतो.माणसाचा कल त्याचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्याच गोष्टींवर विश्वास ठेवण्याकडे असतो. त्याला जे दिसावेसे वाटते तेच तो पाहात असतो.निसर्गातही त्याला तीच ती नियमितता नित्य असावी असे वाटत असते. त्याला फारसा कशातही बदल नको असतो. आपल्या अनुभवांचे विश्लेषण विवेकबुद्धी, तटस्थ विचारांच्या आधारे करण्यापेक्षा दिसते,वाटते तेच खरे मानण्याचे तो पत्करत असतो.

सभोवतालच्या सृष्टीचे ज्ञान करून घेणे अवघड आहे पण अशक्य नाही हे बेकनला माहित होते. पण ह्यातूनही निसर्गावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे असे तो म्हणतो. त्यासाठी निसर्गाचे नियम पाळून त्याच्या कलाने घेत आपल्याला ते करता येईल. ज्ञान मिळविण्यासाठी त्याने प्रयोग, वस्तूंत अंतर्बाह्य होणाऱ्या क्रिया,प्रक्रिया, प्रतिक्रिया ह्यांच्या अभ्यासावर त्याचा भर होता. ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी।हे नवमत लोका कळवु द्या’ इतक्या स्पष्टपणे म्हटले नाही तरी त्याने जे लिहिले त्याचा आशय हाच होता.वर सांगितलेल्या पायऱ्यांनी, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून, का व कसे ह्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत असे त्याचे म्हणणे होते. आलेली उत्तरे व निष्कर्षही कसोटीला लावून,म्हणजे त्यांचा वापर करून पाहावा ह्या मताचा त्याने पुरस्कार केला.
हे सांगत असतानाच, बेकन म्हणतो हे सगळे करणे,होणे शक्य आहे पण माणूस समजून घेणे हे त्याहूनही अवघड आहे हे सत्यही तो सांगतो.

पण बेकन माणसाला समजून घेण्याचे ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नातही बराच यशस्वी ठरला आहे. बेकनला माणसाविषयी झालेले ज्ञान त्याने आपल्या प्रख्यात Essays मध्ये मांडले आहे. बेकनच्या इतर पुस्तकांपेक्षा Essays जास्त वाचले जातात. Essays च्या प्रारंभी तो स्वत:च म्हणतो त्याप्रमाणे त्याचे निबंध “Would come home to men’s business and bosoms.” सर्वांना उपयोगी आणि आपलेवाटतात ! बेकनच्या ह्या पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यात थोडक्याच शब्दांत खूप अर्थपूर्ण आशय सांगणाऱ्या वाक्यांची मेजवानी आहे. त्याला काय म्हणायचे आहे त्याचे सार अशा वाक्यांतून येते. ह्या वचन सदृश वाक्यांतून बेकनचा मानवी स्वभावाचा आणि पदार्थांचा अभ्यास किती होता हे दिसून येते. बेकनच्या Essays मधील अशी अनेक वचने उदघृतांच्या पुष्कळ पुस्तकांत आढळतील.

The Truth ह्या निबंधातील सत्यासंबंधात बेकन म्हणतो,” A mixture of a lie doth ever add a pleasure!”ह्यातील गंमतीचा स्वाद घेतल्यानंतर,माणसाला अति शुद्ध प्राणवायु पेक्षा तो निवळलेला प्राणवायु श्वास घ्यायला सोपा जातो ते का हेही पटते! तसेच ” Revenge is a kind of wild justice!” हे वाचल्यावर बेकनच्या ह्या निबंधातून सत्य किती व कसे व्यक्त होते ह्याची कल्पना येईल.

Of Marriage and Single Life ह्या निबंधाची -“He that has wife and children hath given hostages to fortune; for they are impediments to great enterprises, either of virtue or mischief.”- ही सुरुवात वाचल्यावरच निबंध पुढे वाचावासा का वाटणार नाही? प्रेमाच्या सागरात डुंबत असलेले दोघे अतिशयोक्तीच्या लाटांवरच खेळत असतात हा बहुतेकांचा अनुभव आहे. कविता, हिंदी सिनेमातील गाण्यांतून, ‘तुझ्यासाठी चांद तारे तोडून आणेन’ अशा ओळीतून तर अतिशयोक्तीचा सुखद अनुभव नेहमी येतोअाणि अतिशयोक्ति किंवा अवाच्या सवा बोलणे हे तेव्हढ्यापुरते ठीक आहे हे आपण जाणून असतो. बेकन म्हणतो “The Speaking in a perpetual hyperbole is comely in nothing but love.” हे वाचून आपणही संमती देत हसतो.

एक वेळ नाविन्याचा ध्यास नाही घेतला तरी चालेल पण निदान नविन ते माणसाने स्वीकारावे हे बेकनचे मत होते. तो स्वत: नविन होणाऱ्या बदलांना सामोरा जात असे. कोणत्याही काळात बदल, नविन विचार-वस्तु-शोध ह्यांना विरोध होत असतो. हे प्रत्येक काळात होणे चालूच असते. पण ‘नाविन्या’ला जे सामोरे जात नाहीत त्यांना सावध करण्यासाठी बेकन भाकित केल्याप्रमाणे इशारा देताना म्हणतो,”He that will not apply new remedies must expect new evils; for time is the greatest innovator.”

तो पुढे आपल्या “OF Beauty” मध्ये सौदर्यातील सत्य कशात आहे ते साध्या शब्दांत किती सुंदर करतो! वाचा, “ Virtue is like a rich stone, best plain set.”

बेकनच्याच एका सुगंधी फुला इतक्या सुंदर आणि पिकलेल्या फळासारख्या मधुर वचनाने लेखाचा शेवट करतो.”God Almighty first planted a garden, it is the purest of known pleasures.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *