Jean-Jacques Rousseau (रूसाॅं)

दिवाळीसारख्या सणासुदींच्या सुट्ट्यांत आम्ही सगळे नातेवाईक एकमेकांकडे एकत्र जमत असू. तेव्हा जेवणापूर्वी व नंतरही दुपारचा चहा होईपर्यंत चालू घडामोडी व इतर बऱ्याच विषयांवर गप्पा चर्चा होत असत. त्यातच कधी फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातले टप्पे, त्या जुलैत झालेला उठाव अशा अनेक बाबींवर चर्चा होत असे. त्यावेळी आणि शाळेत परशुराम हरी बर्वे ह्यांचे इतिहासाचे भले जाडजूड पुस्तक उघडायला लावून सर,फ्रेंच राज्यक्रांती संबंधी सांगत त्यावेळीही रूसाॅं आणि व्हाॅल्टेअर ही दोन नावे कानावर पडत. त्यांचे विचार-स्वातंत्र्य, भाषण-स्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य किंवा धर्म आणि राज्यसत्ता, व कारभार ह्यांचा एकमेकांशी संबंध, सरमिसळ असू नये असे ऐकल्याचे व संक्षिप्तात वाचल्याचेहीआठवते. आणि परीक्षेत तसे लिहिल्याचेही आठवते.व्हाॅल्टेर व रूसाॅं हे दोघे विचारी आणि जगाला त्यांच्या काळी काही नवीन विचार तत्वज्ञान देणारे असावेत इतपत माहिती असायची.

व्हाॅल्टेअर व रूसाॅं तसे समकालीन. व्हाॅल्टेअर १६९४ साली जन्मला तर रूसाॅंचा जन्म त्याच्यानंतर १८ वर्षांनी १७१२ साली झाला. पण योगायोग असा की ज्यांच्या विचारांचा प्रभाव तीन शतकंनंतर आजही टिकून आहे ते हे दोघे विचारवंत एकाच साली म्हणजे १७७८ साली वारले. दोघांच्या आयुष्यातील काही घडामोडीत पुष्कळच साम्य आहे. दोघांनीही बरेच वेळा देशांतरे करावी लागली. पण त्यातही रूसाॅंला तर फारच वेळा. व्हाॅल्टेअर रूसाॅंपेक्षा बराच जमीनीवर पाय रोवून उभा असायचा.म्हणायचेच तर रूसाॅं हा आयुष्यभर असमाधानी,अस्वस्थ आत्म्यासारखा होता. त्यात त्याचाही दोष नाही. तो त्याच्या काळाच्या फार पुढचा विचार करीत असे.,तो स्वतंत्र कल्पनाविश्वात विहार करणारा म्हणा किंवा स्वप्नवादी -इंग्रजीत Romantic म्हणतात तसा होता.पण तशा काळाच्या पन्नास वर्षे आधी तो जन्मला होता! रूसाॅं तितकाच बुद्धिवादी होता. व्हाॅल्टेअरला त्याच्या राजदरबारी चांगले संबंध असूनही दोन वेळा लहान मोठे तुरुंगवास भोगायला लागले. रूसाॅंवर तशी पाळी आली नाही. कारण अशा संकटकाळी त्याला बायकांनीच मदत केली. रूसाॅं जेथे गेला तिथल्या बायका, ह्या कलंदर पण फटकळ, दुसऱ्यांशी फार दिवस न पटवून घेणारा, मतभेदांचे रुपांतर भांडणात करणारा, पण बुद्धिमान व स्वतंत्र विचारांच्या ह्या तरूण व देखण्या विचारवंतावर फिदा असत.त्याची सोबत रूसाॅंला बरेच वेळा मदत करणारी ठरली. अनेक देशांतून त्याला बाहेर काढण्यात आले होते. बरेच आयुष्य देशांतरातच गेले. कारण त्याचे विचार त्या काळात स्फोटक होते. पण एक गोष्ट निर्विवाद होती की रूसाॅं हा युरोपमधील प्रसिद्ध माणूस होता. त्याला सगळे बुद्धिमंतही दबून होते. समाजातील कोणी महत्वाचे धार्मिक अधिकारी,धार्मिक पुढारी असो की निधर्मी मतांचे विचारी असोत, तो त्या धार्मिक व निधर्मी दोघांचाही नावडता होता. दोघांनाही रूसाॅंचा मोठा धसका होता.पण गंमत अशी की रूसाॅं दैवी देणगीला मानत होता. तो नास्तिक नव्हता पण धर्माबाबत त्याचे स्वतंत्र विचार होते. निसर्गाचा तो भोक्ता होता. निसर्गातील सौदर्याकडे , निसर्गाकडे त्याने समजाचे लक्ष पुन्हा वेधले. पण प्रस्थापित व्यवस्थेतील सगळ्या संस्थांना त्याची भीती वाटत असे. रूसाॅंला फार थोडे मित्र होते. त्याला आयुष्यात अनेक अपयशे पचवावी लागली. पुढच्या काळातील शेली, बायरन सारखे कवि आणि व्हिक्टर ह्युगो सारखे त्यावेळच्या अनेकांपेक्षा वेगळ्या प्रतिभेचे लेखक निर्माण झाले त्याचे श्रेय रूसाॅंच्या विचारांना आहे. त्याचा ह्या साहित्यिकांवर मोठा प्रभाव होता. रूसाॅंच्या A Discourse on the Origin of Inequality आणि The Social Contract ह्या दोन्ही पुस्तकातील विचार व तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आजच्या सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञावर आहे. त्याच प्रमाणे व्हाॅल्टेरच्या भाषण-स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व्यवहारातील मोकळेपणा, धर्माचा आणि सत्तेचा एकमेकांशी संबंध असू नये ह्या मतांचा पगडा आजही आहे.त्या दोघांच्या विचारंचा अलिकडच्या जडण घडणीत फार मोठा वाटा आहे. Jean-Jacques Roussaeu चा जन्म १७१२ साली जिन्व्हा येथे झाला. त्यावेळी ते स्वतंत्र होते. त्याच्या आईवडिलांना जिन्न्हीव्वाचा अभिमान होता.आई तर जिन्हिव्हा स्पार्टन सारखे Republic आहे म्हणायची. झाला उणेपुरे ५५-५६ वर्षाचे आयुष्य लाभलेला

रूसाॅं १७७८ मध्ये वारला. तो युरोपमधील प्रख्यात विचारवंत होता. पण त्याला एका देशात फार दिवस राहता आले नाही. ज्या ज्या देशात तो जाई तिथून त्याला बाहेर पडावे लागत असे.किंवा तो स्वत:हून बाहेर पडत असे. आयुष्यभर तो हद्दपाराचे जीवन जगला. त्याच्या,काळाच्या पुढच्या स्फोटक विचारांचा धसका धार्मिकांना आणि निधर्मींना दोघांनाही होता.प्रस्थापित व्यवस्थेला,संस्थांना,त्याच्या विचार व युक्तीवादाने तो केव्हाही खाली खेचू शकतो; सुरुंग लावून ते उध्वस्त करू शकतो ही त्यांची कायमची भीती होती. त्यामुळे रूसाॅं जेव्हा मेला त्यावेळी धर्मवाद्यांनी व निधर्मी विद्वानांनी सुटकेचा निश्वास टाकला असणार ह्यात शंका नाही. पण पुढील अर्धशतक रूसाॅंच्या विचारांनी भारले होते.तसेच त्यानंतरच्या काळातही रुसाॅंच्या विचाराने तरूण पिढीही प्रभावित झाली होती. रूसाॅंचा जन्म स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा येथे झाला. पण त्याकाळी जिनिव्हा हे स्वतंत्र राज्य होते. ते प्राॅटेस्टंट राज्य होते. प्राॅटेस्टंट पंथाला रूसाॅंचा विरोध नव्हता. पण त्याचे वादळी व्यक्तिमत्व व विचारांना प्राॅटेस्टंटवादी समजू शकत नव्हते. रूसाॅंने जिन्हीव्हा सोडले.काही काळ तो फ्रान्समध्ये राहिला. पण नंतर लगेच तो त्यावेळी स्वतंत्र असलेल्या व्हेनिसमध्ये आला. पण व्हेनिस मधूनही तो लवकरच बाहेर पडला.

डाॅ. सॅम्युअल जाॅन्सन ह्या प्रख्यात इंग्लिश विद्वानाचा मित्र व त्यांचा चरित्रकार जेम्स बाॅस्वेलच्या सहाय्याने व लेखक तत्वज्ञ डेव्हिड ह्यूम यांच्या सोबतीने रूसाॅं इंग्लंडमध्ये वास्तव्यास आला. पण थोड्याच काळात त्याच्या स्वभावाप्रमाणे ज्यांच्या मदतीने व आधाराने तो इंग्लंडमध्ये आला होता त्या बाॅस्वेल व ह्यूम ह्यांच्याशीच वादविवाद घालून, भांडून,तो वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी पुन्हा फ्रान्समध्ये आला! पण ह्या मागे रूसाॅंला वाटणारीही कारणे होती. रूसाॅं इग्लंडमध्ये आल्यावर खूप लोकप्रिय होता. काही दिवसांनी जेव्हा त्याने त्याच्या मतांनुसार काही गोष्टींवर व लोकांवर टीका केली. त्यातून अनेक गोष्टी वाद निर्माण झाले. वर्तमानपत्रातून रुसीॅंवर वैयक्तिक टीका, नालस्ती व त्याने पूर्वी काही लिहिलेले लेख प्रसिद्ध होऊ लागले. ह्यात व्हाॅल्टेअरनेही लेख पुरवले होते. अशावेळी आपला मित्र ह्यूमने आपली बाजू घेऊन उभे राहायला हवे असे रूसाॅंला वाटत होते. पण ह्यूम गप्प राहिला. शिवाय रूसाॅंच्या काही व्यक्तीगत गोष्टी ह्यूमलाच त्याने सांगितल्या होत्या त्याही सार्वजनिक झाल्या.ह्याचा विषाद व राग रूसाॅंला येणे स्वाभाविक असे रूसाॅंच्या बाजूच्या लोकांचे म्हणणे आहे. त्या ुळे तो फ्रान्समध्ये परत आला. आणि काही वर्षे राहून तेथेच १७७८ साली पॅरिस जवळील अर्मनव्हिल येथील लहानशा बंगल्यात त्याचे निधन झाले.

रूसाॅंची साहित्यिक कारकिर्द त्याच्या वयाच्या सदतिसाव्या वर्षी सुरु झाली. Academy of Dijon ने निबंध स्पर्धा जाहीर केली होती. विषय होता Has the Progress of the Arts and Sciences Contributed more to the Corruption or Purification of Morals? त्यात भाग घेऊन आपल्या लेखात,रूसाॅंने त्यावेळी स्फोटक वाटणारा आपला विचार निबंधातून मांडला. त्याने संस्कृतीनेच- सुधारणेनेच नैसर्गिक चांगुलपणाचा नाश केला असा थेट हल्ला चढवला. रूसाॅंनेच स्पर्धा जिंकली हे निराळे सांगायला नको.त्याने बक्षिस व नाव दोन्ही मिळवले! ह्या निबंधामुळे L’ Encyclopedie चा संपादक तत्वज्ञानी व लेखक डाइडेराॅचे Diderot चे लक्ष वेधून घेतले. त्याने रूसाॅंकडे आपल्या एनसायक्लोपिडियेसाठी लेख मागितला.रूसाॅंने आपला Discourse on Political Economy हा राजकीय अर्थशास्त्रावर लेख लिहून पाठवला. हा लेख १७५५ साली प्रसिद्ध झाला.ह्या लेखामुळे रूसाॅं आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात आला! ह्या यशानंतर त्याने आपली पहिली कादंबरी La Nouvelle लिहून प्रसिद्ध केली. कादंबरीत एका सामान्य परिस्थितीत वाढलेल्या मुलीची कथा आहे. ही कादंबरी वाचकांना आवडली. ह्या कादंबरी पाठोपाठ त्याची दुसरी कादंबरी Emile आणि त्याच बरोबर त्याचा आजही महत्वाचा मानला जातो तो The Social Contract हा वैचारिक तत्वज्ञानाचा ग्रंथ १७६२ मध्ये प्रकाशित झाला.

एमिल ही कादंबरीचे रूप घेऊन आलेली रूसाॅंच्या, निसर्गाशी जवळीक साधून त्याचे ज्ञान करून देणारी शिक्षण पद्धती असावी, ह्या विचारांची कथा आहे. रूसाॅचे शिक्षणपद्धतीविषयीचा आणखी एक महत्वाचा विचार आजही मानला जातो. लहान मुलांना शिक्षणाची सुरवात करतांना ते मूल हेच मध्यवर्ति केंद्र मानून अभ्यासक्रम असावा हे त्याचे मत होते. ते आजही आपल्याला माॅंन्टेसरी पद्धतीत पाहायला मिळते. त्याचे Confessions हे अति धक्कादायक आत्मचरित्रात्मक पुस्तक मात्र त्याच्या मृत्युनंतर प्रसिद्ध झाले. धक्कादायक अशासाठी की आतापावेतो कोणत्याही मान्यवर लेखकाने स्वत:च्या वैयक्तिक बाबी, घटना, प्रसंग इतके उघड व स्पष्ट करून लिहिले नव्हते. पुस्तकातून रुसाॅंच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाज कळतात. ह्या अगोदर, १७४९मध्ये झालेल्या निबंध स्पर्धेनंतर १७५५ साली Dijon Academy ने आणखी एक स्पर्धा जाहीर केली. विषय होता How has a Condition Of Inequality among come about? ह्या प्रश्नाचे जे उत्तर रूसाॅंने आपल्या प्रबंधातून दिले ते रूसाॅंच देऊ शकेल असे आहे. त्याच्या पहिल्या प्रबंधात मांडलेल्या विचारांचाच विस्तार ह्या दुसऱ्या विचारपरिपूर्ण निबंधात आहे. रूसाॅं ह्यामध्ये प्रश्नाचे स्वरूप थोडेसे बदलून म्हणतो, माणसाच्या दु:खाचा,निराशेचा उद्भव, उगम कसा झाला हा मूळ प्रश्न आहे. माणूस मुळात स्वाभाविकरीत्या दु:खी होता की त्याच्या प्राथमिक अवस्थेतून सुधारणेच्या क्रियेतून जात असता (सुसंस्कृत होण्याच्या क्रियेतून)तो दु:खी होत गेला? प्राथमिक अवस्थेतला माणूस ज्या वेगवेगळ्या स्थित्यंतरांतून गेला त्यातच माणसाच्या दु:खाचा उगम आहे असे रूसाॅंचे म्हणणे आहे. पुढे त्याचे विश्लेषणही तो करतो.

माणसाच्या स्वभाववृत्तीविषयी रूसाॅंसारखेच विवेचन हाॅब्स आणि जाॅन लाॅक या दुसऱ्या राजकीय तत्वज्ञांनीही केले. पण त्यांच्या मतात व रूसाॅंच्या मतात फरक आहे. हाॅब्सच्या “ प्रारंभी माणूस एकटा,गरीब,आोंगळ असभ्य, पशूसारखा रानवट व अपूर्ण होता”, किंवा लाॅकच्या “ प्रारंभी माणूस त्याच्या सभोवताी असणाऱ्या प्रत्येक गोष्टींना घाबरत होता.” ह्या मतांशी सहमत नव्हता.तो उलट विचारतो,” माणूस त्याच्या त्या अवस्थेतही सुखी आनंदी होता असे का म्हणू नये? तो आनंदी समाधानी असण्यासाठी जरूर त्या सर्व गोष्टी त्याच्या जवळ होत्या. अन्न, स्त्री, आणि निद्रा, सर्व काही त्याला प्राप्त होते. शिवाय त्याची प्रगती आणि तो परिपूर्ण होण्याच्या क्रियांतून पुढे मिळणाऱ्या सोयींचे वा सुखाचे त्याला ज्ञानही नव्हते. त्यामुळे ती आता नाहीत ह्याचे दु:ख व निराश होण्याचे त्याला कारणही नव्हते. बरे दुसऱ्या कुणाशी तुलना करता तो असमाधानी होता म्हणायला त्याच्या सारखा दुसराही त्याच स्थितीत होता. फरक असेल तर उंची वजन, देहयष्टी, चालण्या पळण्याचा वेग ह्यामध्ये असेल!”

माणसात हा बदल कसा घडून आला, म्हणजेच माणूस दु:खी निराश कसा झाला? तर त्याचे खापर रूसाॅं सुसंस्कृततेच्या क्रिया प्रक्रिया ह्यावर फोडतो. तो आपल्याला परखड शब्दांत सांगतो,” ज्या क्षणी माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज वाटू लागली, ज्या क्षणी कुणाही एकाला दोघांसाठी तरतूद करावी वाटू लागले, त्या क्षणी समानता संपली व मालकी,मालमत्ता आली. काम करणे, राबणे आवश्यक झाले. विशाल जंगले तोडली जाऊ लागली. त्या ठिकाणी वाऱ्यावर डोलणारी हिरवी पिवळी पिकांची शेती दिसू लागली. शेतीत राबणे आले. आपला घाम गाळून पिकाला पाणी देणे भाग पडले. त्यातूनच पुढे शेतातल्या पिकांबरोबरच गुलामगिरी आणि वेठबिगारीही वाढू लागली! “ धातुशास्त्र आणि शेती ह्या दोन्हींमुळे माणसाच्या जीवनात क्रांति झाली. साहित्यिक,कवि सांगतात सोन्या चांदीमुळे क्रांति झाली.पण तत्वज्ञानी म्हणतात धातु म्हणजेच लोखंड आणि मका( तांदूळ गहू इ. कोणत्याही धान्याचे नाव चालेल) ह्या दोन वस्तूंनी प्रथम माणसात सुधारणा आणली.त्याला सुसंस्कृत केले आणि मानवाची मोठी हानि केली.रूसाॅंच्या मते प्रगतीने माणसात विषमता आणली व त्याला दु:खी केले. प्रगति,विकास हा माणसाला उध्वस्त करण्यास कारणीभूत आहे असे जाॅन डनला वाटते तसेच रूसाॅंलाही. नुकतीच औद्योगिक क्रांतीला सुरवात झाली होती. समाजव्यवस्थेत मोठी उलथापालथ घडून येत होती. त्याचाही परिणाम रुसाॅंसारख्या संवेदनाशील बुद्धिमान व प्रतिभाशाली विचारवंतावर होणे अपरिहार्य आहे. असे असले तरी आपल्या ह्या उदास किंवा नकारात्मक निष्कर्षांनाही त्यानेच आपल्या The Social Contract ह्या वैचारिक प्रबंधात उत्तर दिले आहे.

माणूस प्राथमिक अवस्थेतच असावा असे त्याचे म्हणणे नव्हते.तरीही त्याच्या ह्या प्रबंधाला मोठा विरोध झाला. व्हाॅल्टेअरनेही केला. पण त्याही पेक्षा फ्रान्सच्या मंत्रिमंडळाने रूसॅांच्या निबंधावर टीकेचा भडिमार केला. त्यामुळे तो बरीच वर्षे फ्रान्सबाहेरच राहिला. रूसाॅं आपले विचार स्पष्ट थोडक्या आणि नेमक्या शब्दांत मांडणारा लेखक होता. त्याचे हे The Social Contract हे पुस्तक छोटे खानी फक्त पन्नास पानांचे आहे. रूसाॅंने पन्नास पानात जेव्हढे परिणामकारक लिहिले आहे तसे लिहायला दुसऱ्या कोणा लेखकाला पानेच्या पाने खर्चावी लागली असती! त्याची ही वाक्येच पहा-Man is born free; and everywhere he is in chains. One thinks himself the master of others,and still remains a greater slave than they. How did this come about? I don’t know. What can can that make it legitimate ? That question I think I can answer. स्पष्ट, चांगल्या लिखाणाचा हा एक सुंदर नमुना आहे. पण वाचक रुसाॅंच्या केवळ शैलीसाठी त्याचे प्रबंध वाचत नसतो.तो विचारतो ते प्रश्न व त्यांची जी उत्तरे तो देतो त्यासाठी तो रुसाॅंच नव्हे तर जाॅन लाॅक, व्हाॅल्टेअर, जाॅन स्टुअर्ट मिल सारख्यांचे विचार वाचतो.अर्थात शैली आणि विचारांतील व लेखनातील स्पष्टता हे सुद्धा वाचकाला आकर्षित करतात.पण विचार महत्वाचे. लो. टिळकांची प्रसिद्ध गर्जना “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ह्याचे मूळ रूसाॅंच्या पहिल्याच “Man is born free’ मध्ये आहे. रूसाॅंला माणसाने प्रगती केली आहे, करत आहे हे मान्य आहे.पण त्यामुळे होणारे समाजाला घातक ठरणारे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी काही केले पाहिजे ह्याचेही भान त्याला आहे.

माणूस एकट्याने जे करील त्यापेक्षा सर्व एकत्रित होऊन जे काम करतील त्याचे फळही तितकेच मोठे असणार. आपल्या “गाव करेल ते राव काय करेल” ह्या म्हणीची आठवण होईल. ह्या बरोबरच काही प्रश्न निर्माण होतात. त्या साठी सर्वांनी एकत्र येणे,प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार श्रम, कौशल्य, धन हे समुहासाठी देणे हा मार्ग तो सुचवतो. पण हातभार लावण्यात कुणाचाही अपवाद असणार नाही(ह्या अटीत समानतेचे तत्व अध्याहृत आहे). प्रत्येकाच्या सहभागातून सामूहिक उत्पादन व त्याचे मोठे फळ समुहाला मिळेल. प्रत्येकाला त्याच्या सहभागापेक्षा जास्त फळ मिळेल.सुह व सामूहिक प्रयत्नांचे फळ हे, ‘ते ते सगळ्या गावाचे’असे कविवर्य बोरकर म्हणतात. सामुहिक सहभागाच्या विचारांचा कार्ल मार्क्स व एन्गल्स वर प्रभाव पडला असणार. त्यामधूनच मार्क्सला शेतकरी, कामगारांचे, मजुरांचे श्रम कष्ट हे सुद्धा त्यांनी गुंतवलेले भांडवलच आहे हा विचार सुचला असावा. रशिया, चीन मधील ‘कम्युन’ चा उगमही रुसाॅंच्या विचारांत आहे. आपल्या महाराष्ट्रातील अर्थतज्ञ डाॅ.धनंजयराव गाडगीळांनी व औपचारिक शिक्षण फार न झालेल्या विखे पाटलांनी ती ‘सहकार’, ‘सहकारी संस्था’ ह्या रूपाने प्रत्यक्षात आणली. यशवंतराव चव्हाणांनी सहकारी चळवळीला सरकारचे धोरण म्हणून आणखी वाढवले. एकत्रित आलेल्या समुहाचे संघटनेत रूपांतर होते. मग त्या संघटना, संस्था ह्यांचे स्वरूप वेगवेगळेही असेल. सामुहिक कार्याचे फळ प्रत्येक घटकाला जास्तच मिळेल. पण प्रत्येक घटकांने (व्यक्तीने) त्यासाठी आपले पूर्ण बळ दिले तरी आपले -स्व -स्वातंत्र्य गमावता कामा नये. कोणत्याही संघटनेतील, संस्थेतील एकाच्या अथवा इतर दुसऱ्या काही जणांच्या म्हणण्यास संस्था, संघटना, त्यातील काही व्यक्ती किंवा गटाविषयीच्या श्रद्धेमुळे किंवा आस्थेमुळे, हो ला हो करू नये. आपण होयबा होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. त्यासाठी स्वत:ही विचार करून मत ठरवणे आवश्यक आहे.,रूसाॅंची ही सूचना महत्वाची आहे. तो धोक्याची घंटा वाजवतोय.

राजकीय तत्वज्ञानी रूसाॅंवर प्लेटो, हाॅब्स, जाॅन लाॅक Diderot , व्हाॅल्टेअर ह्यांच्या विचारांचा प्रभाव होता. तर रूसाॅंचा प्रभाव हा पाश्चात्य जगातील प्रबोधन काळावर पडला. हा ज्ञानप्रकाशाच्या काळत रूसाॅंचा मोठा वाटा आहे. रूसाॅंचा ज्यांच्यावर प्रभाव पडला त्यात तत्वज्ञ कान्ट, फ्रेंच राज्यक्रांति, अमेरिकन राज्यक्रांति, फ्रान्सचा राॅब्सपियेर, डेव्डिड ह्यूम, कार्ल मार्क्स, एन्गल्स, लिओ टाॅलस्टाॅय, बाल शिक्षणतज्ञ माॅन्टेसरी अशा अनेक मोठ्या व्यक्तीं व त्याच्या विचारसरणीवर पडला आहे. आज हे विचार आपल्याला विशेष वेगळे स्फोटक वाटत नाहीत. कारण आपण त्यांचीच फळे चाखत आहोत हे माहित नसते. पण आपल्याला ते विचार माहित आहेत असे वाटते. पण रूसाॅं, व्हाॅल्टेअर,लाॅक,मिल, चाणक्य, कणाद, चार्वाक अशा सारख्या तत्वज्ञानी विचारवंतांनी असे कितीतरी वेगळे विचार अनेक शतकांपूर्वी सांगितले आहेत. मधल्या काळातील विद्वानांनी, विचारवंतांनी त्यात काळानुरूप बदल करत त्यामध्ये भर घातली. ते सुविचार काळाच्या प्रवाहातून झिरपत आपल्यापर्यंत आले. त्यांची फळे आज आपल्याला चाखायला मिळतात.

रूसाॅंवरही त्याच्या काळात टीका झाली. विशेषत: रूसाॅं ज्याचा नेहमी आदरपूर्वक मान ठेवायचा त्या व्हाॅल्टेअरने तर रूसाॅंच्या कादंबऱ्यांवर उपरोधातून कडक टीका केली. रूसाॅं व व्हाॅल्टेअर हे दोघेही मोठे बुद्धिमान व थोर विचारी होते.फ्रान्सच्या राज्यक्रांतीवर ह्या दोघांचा प्रभाव होता. दोघांनाही क्रांतीतील सर्व पुढारी मानत होते. पण त्यांच्या काळांत ते दोघे एकमेकांचे विरोधक होते असे वाटते. विरोधक असूनही, रूसाॅं व्हाॅल्टेअरविरूद्ध कोणी वावगे बोलले किंवा काही लिहून दाखवायला अाला तर तो त्यांना कठोर शब्दांत सुनवत असे व व्हाॅल्टेअर हा फार मोठा माणूस आहे ह्याची जाणीव करून देत असे. रुसाॅं वारला. त्यानंतर, फ्रान्मधील सर्व थोरामोठ्या श्रेष्ठ लोकांच्या समाध्यांच्यारूपाने जिथे स्मारक उभे बअसते, त्या Pantheion मध्ये व्हाॅल्टेअरच्या शेजारी, स्वत:ला नेहमी Citizen of Geneva असे अभिमानाने म्हणवून घेणाऱ्या रूसाॅंचे,अवशेष सुंदर समाधीच्या रूपात जतन केले आहेत. त्यांच्या काळात विरोधक असलेले विद्वान शेजारी शेजारी चिरनिद्रा घेत आहेत. रूसाॅंवर बरेच वेळा अन्याय झाले. मित्र,विरोधक, चाहते ह्यांच्या वैयक्तिक टीकेला तोंड द्यावे लागले.व्हाल्टेअरला लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो,” माझ्या मनात तुमच्या अनेक चांगल्या गोष्टीविषयी प्रेम व आदर होता. पण आता आणि अजूनही फक्त तुमच्या बुद्धिमत्तेविषयी आणि तुमच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या लिखाणाविषयी प्रेम आहे.”

अखेरच्या दिवसांत रूसाॅंला एक माणूस भेटायला आला होता. तो लोकांविषयी काही बोलत असता रूसाॅं जे म्हणाला ते विसरता येण्यासारखे नाही. रूसाॅं म्हणाला,”हो, माणसे वाईट आहेत पण माणूस चांगला आहे!” Yes, Men are bad, but Man is good !” असा हा चतुरस्त्र प्रतिभेचा विचारवंत अलिकडच्या आधुनक राजकीय तत्वज्ञानाची कोनशिला रचणारा राजकीय त्त्वज्ञानी,, बुद्धिमान लेखक, संगीतकार, विज्ञानप्रेमी वनस्पतिशास्त्राचा अभ्यासक शिक्षणतज्ञ,व । अनेक मोठ्यांचेही पाय मातीचेच असतात हे दाखवणारा, व सामान्यांतील एखादा असामान्य गुण पुढे आणून त्यांचा गौरव करणारा,स्वत:ची बाजू स्पष्ट करण्यासाठी आत्मचरित्रात्मक ग्रंथ Confessions लिहून त्या काळी खळबळ उडवणारा रूसाॅं, त्याच्या बरोबरीचा व तोडीचा विचारवंत तत्वज्ञानी व्हाॅल्टेअरच्या मृत्युनंतर दोन महिन्यांनीच वारला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *