संत सेना न्हावी

विठ्ठलाने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी निरनिराळ्या रूपाने मदत केली. ते पाहिले म्हणजे तो खरा ‘बहुरूपी’ होता हे पटते.दामाजीसाठी महाराचे रूप घेऊन विठ्ठलाने सरकारी रकमेचा भरणा केला.त्याने संत जनाबाईसाठी लुगडी धुतली.संत सखूसाठी दळण कांडण केले. संत तुकारामाच्या कीर्तीला बट्टा लागू नये म्हणून हजारो शिवाजींच्या रूपाने यवनी सैन्यात मोठा गोंधळ उडवून दिला. चोखोबाच्या घरी झोपडी बाहेर जेवत असता पुजाऱ्यांनी थोबाडीत मारली चोखोबाला, पण गाल सुजून काळा निळा पडला विठोबाचा!
नामदेव लहान असल्यापासून विठोबा त्याने दिलेला नैवेद्य हा आपल्या ‘भक्ताचाच कृपाप्रसाद’ या भावनेने रोज खात असे. पण देव इथेच थांबला नाही. त्याने नामदेवाचा सगुण भक्तीमार्ग हा ज्ञान आणि योगमार्गा इतकाच श्रेष्ठ आहे हे
तीर्थयात्रेत खुद्द ज्ञानेश्वरांना सिद्ध करून दाखवले !

अनेक रूपे घेऊन आपल्या भक्तांना संकटातून सोडवणाऱ्या विठ्ठलाच्या आणखी एका रूपाची गोष्ट ऐकण्यासारखी आहे.

सेना न्हावी यवनी बादशहाच्या नगरात राहात होता.तो बादशहाचा न्हावी होता. बादशहाचे बोलावणे आले की समोरचे काम सोडून त्याला पळत जावे लागे. विशेषत: सेना पूजेला बसला की नेमके बादशहाचा निरोप यायचा.

आता हे फारच झाले हे जाणून, बादशहाचा निरोप आला की ,” सेना घरी नाही; बाहेर गेला” म्हणून सांगत जा असे बायकोला बजावून ठेवले. असे तीन चार वेळा घडले. आपण बोलावले की सेना बाहेर कसा गेलेला असतो? असा प्रश्न बादशहाला पडला असता एकदा शेजारीपाजाऱ्यांनी,” “खाविंद ! सेना खोटे बोलता है. वो घरीच देवपूजा करते बैठा असतो!” हे समजल्यावर बादशहाने सेनाला पकडून आणण्यासाठी शिपाई पाठवले.

पांडुरंगाला ही खबर न लागली तरच नवल ! तो लगोलग उठला. क्षणार्धात त्याने आपले किरीट,कुंडले, कौस्तुभमणि उतरून ठेवले. सेनासारखाच वेष केला.सेनासारखेच बिनगुंड्याचे बिन बाह्यांचे काळे तोकडे जाकीट घातले. गुडघ्या पर्यंत येणारे धुतलेले स्वच्छ धोतर नेसला. पांढरा रूमाल डोक्याला बांधला. सेनाच्या घरी आला. खुंटीवरची सेनाची धोपटी खांद्याला अडकवली. आणि ‘ झाला नाभिक पंढरीनाथ’ बादशहाचे शिपाई निघण्या आधीच राजाकडे आलाही !

सेना आलेला पाहून बादशहाचा राग निवळला. सेनाने आपले कसबी काम सुरू केले.बादशहाने मध्येच एखादे वेळी “स्स्स” केले की तिथे गुलाबपाणी लावायचा.वस्तरा पिंडरीवर चटपट चटपट करून धार लावायचा. बादशहाची हजामत करून झाली.

अभ्यंगस्नानासाठी राजेशाही हमामखान्या जवळच बादशहासाठी चांदीचे चांदतारे बसवलेला चंदनाचा मोठा चौरंग मांडला. रत्नजडीत भांड्यात सुगंधी मोगरेल ओतले. राजाच्या पाठीमागे उभा राहून सेनारूपी जगजेठी बादशहाच्या डोक्याला मोगरेलाने मालिश करू लागला. सेनाचा हात फिरू लागला तसा बादशहा सुखावला.त्याचे डोळे अर्धवट मिटू लागले. सेनाजगदीशने मस्तकावरून हात नेत त्याची वरच्यावर टाळी वाजली की राजा डोळे उघडे. त्याने मोगरेल तेलाच्या भांड्यात पाहिले आणि त्याला देदीप्यमान अशा विठ्ठलाचे मनोहर रूप दिसले. विस्मयचकित होऊन बादशहा मागे पाहायचा तर त्याला आपला नेहमीचाच सेना दिसे. असे दोन तीनदा झाले. ते दिव्य रूप पाहून बादशहा चकित झाला.सेना डोक्याला पाठीला मालिश करे त्याने तो सुखावला. सेना न्हाव्यावर खूष होऊन बादशहाने त्याला ओंजळभर सोन्याच्या मोहरा दिल्या.
सेनाजगन्नायक बादशहाला कुर्निसात करून निरोप घेऊन जाऊ लागला. पण बादशहा त्याला सोडेचना. इथेच राहा असा आग्रह करू लागला. पण “ मी घरी जातो; आणि लगेच येतो”
असे सांगून तो भक्तवत्सल, सर्वव्यापी पांडुरंग, सोन्याची नाणी धोपटीत टाकून निघाला.

सेनाच्या घरी जागच्या जागी धोपटी खुंटीला अडकवून पांडुरंग वैकुंठी गेलाही! दोन दिवस झाले आता येतो असे सांगून गेलेला सेना हजाम अभीतक आया नही ? असं स्वत:लाच विचारत बादशहाने सेनाला आणण्यासाठी शिपाई पाठवले. एकदम पाच सहा शिपाई आल्याचे बायकोकडून समजल्यावर सेना मुंडासे बांधत बाहेर आला.धोपटी अडकवण्या अगोदर वस्तरा आरसा वगैरे आहे ना हे पाहण्यासाठी धोपटीत हात घातला तर हातात सोन्याच्या मोहरा आल्या. सेना मनात दचकला. चमकला! आपल्याला अडकवण्यासाठी हा कसला डाव तर नाही ना ? अशी शंका त्याला आली. इकडे शिपाई दरडावून घाई करू लागले.

सेना बादशहाकडे पोचला. परवापासून बादशहा सेनावर खूष होताच. आजही त्याने सेनाचे हसून स्वागत केले. सेनाने कामाला सुरुवात केली. तेल मालिशची वेळ आली. चौरंगावर बसल्यावर राजा म्हणाला, “सेना, दो दिन पहले जैसा मालिश किया वैसाही करना.” “ आज भी हम तुझे सोनेकी अशर्फी देंगे.” सेना पुन्हा बुचकळ्यात पडला. पण त्याने आपले काम सुरू केले. थोडा वेळ गेल्यावर बादशहाने विचारले, “ सेना आज तुझे क्या हुआ है? परसों जैसा तुम्हारा हात नही चल रहा. क्या बात है?” हे विचारत असताना राजा रत्नजडीत पात्रात पाहात होता.

हळू हळू सेनाच्या डोक्यात प्रकाश पडू लागला. त्याचा गळा दाटून आला. “ अरे त्या परम दयाळू विठोबाने माझ्यासाठी रूप घेऊन हजामाचे काम केले. बादशहाच्या रोषातून मला वाचवले .” ह्या विचाराने त्याला रडू आले. हात जोडून तो म्हणाला,” जहाॅंपन्हाॅं! त्या दिवशी मी आलो नव्हतो. मुझे बचाने माझा विठोबा आया. तुमची सेवा करून गेला ! माझ्या पांडुरंगाने माझी लाज राखली, बादशाहा !” असे म्हणत खाली बसून गुडघ्यात मान घालून रडू लागला. गदगदून रडू लागला.

बादशहाने पुन्हा त्या मोगरेल तेलात पाहिले; आणि त्याला पुन्हा परवाचे “ सुंदर साजिरे रूप सावळे “ असा जगजेठी पांडुरंग दिसला! काय झाले असावे ते बादशहाच्या लक्षात आले. शिपायांना खुणेनेच सेनाच्या पाठीवर हात फिरवून त्याला उठवायला सांगितले.

सेना उठला पण विठ्ठलाची कृपा आठवून आठवून पुन्हा पुन्हा सदगदित होऊन स्फुंदत होताच. बादशहाला मुजरा करून परत जाण्यासाठी त्याची इजाजत मागू लागला. बादशहाने परवानगी दिली. सेना निघाला तेव्हा तो म्हणाला, “ सेना मेने भी तुम्हारे विठोबाको परसों देखा. मनमें कुछ अजीबसा होता था. बहोतही प्यारा और खुबसुरत है वो !” “ और देखो, कभी भी अपने भगवान को इतनी तकलीफ मत देना.उससे दुॲा मांगो. हमारे लिये भी !” हमारे लिये भी!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *