साहित्यिक सम्राट

रोमन साम्राज्याच्या सम्राटांची , त्यांचे पराक्रम , त्यांची
प्रेम-प्रकरणे किंवा त्यांचा विक्षिप्तपणा इतकीच ओळख आपल्याला ज्युलियस,
ऑगस्टस , निरो किंवा क्लोडियस या सीझर राजांची आहे.

शेक्स्पिअर पासून ते अलीकडच्या अल्बर्ट कामू या आधुनिक नाटककारापार्यंत
अनेक नाटककारांनी रोमन सम्राटांवर नाटके लिहिली.

साहित्याचे विषय हे राजे झाले पण खुद्द ह्यांच्यापैकी बरीच सीझर मंडळी
साहित्यिक होती याची आपल्याला फारशी माहिती नाही.
अनेक वर्षे , पिढ्यान पिढ्या, पाश्चिमात्य विद्यार्थ्यांना लाटिनची ओळख
रोमन सम्राट ज्युलियस सीझरची आणि त्याच्या Conquest of Gaul या
पुस्तकापासूनच व्हायची!

ज्युलियस सीझरची (इ.स. पूर्व १०० ते इ.स पूर्व ४४ ) एवढ्यावरच लेखक
म्हणून ओळख संपत नाही. त्याने नाटके लिहिली आणि कविताही केल्या. आपल्या
रोम आणि स्पेनच्या चोवीस दिवसांच्या सफरीची The Journey या दीर्घ काव्यात
वर्णने केली . पण हा काव्य खंड हरवला ! आल्पस पर्वत ओलांडून केलेल्या
प्रवासाचेही ज्युलियस सीझरने काव्यातच वर्णन केले आहे . ज्युलियस
सीझरच्या भाषाशैलीची त्याच्या समकालीन लेखकांनीही वाखाणणी केली आहे.

सिसेरोने तर (सिसेरो हा इ.स.पूर्व १०६ ते इ.स. पूर्व ४३ या काळातला रोमन
तत्वज्ञानी , उत्तम वक्ता, कायदेपंडित आणि घटनाकार होऊन गेला.)सीझरच्या
शब्दसंपत्तीची आणि एकूणच त्याच्या राजेशाही भाषाशैलीची उदात्त या शब्दात
गौरव केला आहे . ज्युलियस सीझरनंतर झालेल्या ऑगस्टस सीझरच्या काळात (इ.स.
पूर्व ६३-इ.स.पूर्व १४ ) साहित्य वांग्मयाला चांगलाच बहर आला होता.

ऑगस्टसच्या दरबारी वर्जिल , होरेस आणि ऑविद सारखे चतुरस्त्र साहित्यिक
होते . ऑगस्टसला साहित्याची उत्तम जाण होती . वरील सर्व साहित्यिकांनी
आपापापल्या ग्रंथातून ऑगस्टसची स्तुतीच केलेई आहे. अशा प्रतिभावान
साहित्यिकांच्या प्रभावळीत. ऑगस्टस सीझरने आपले लिखाण फाडून नष्ट केले
किंवा आपले सीसिली काव्य हरवले याची खंतही बाळगली नाही यात नवल काय? पण
ह्या सम्राटाने १३ खंडात लिहिलेले आपले आत्मचरित्र आणि आपल्या
कार्याविषयी लिहिलेला ग्रंथ टिकून राहिला. पण त्याचे उत्तम म्हणून गणले
जाणारे Encouragement to Study of Philosophy हे मात्र काळाच्या ओघात
नाहीसे झाले!

टायबेरियस सीझर नंतर केलीग्युला या टोपण नावानेच जास्त माहित असलेला सीझर
झाला (इ.स. पू १२-इ.स. पू ४१ ) ह्याला साहित्याची काही फारशी जाण
नव्हती पण इतर विद्वान, साहित्यिक यांच्याविषयी अत्यंत कोती मते आणि
वृत्ती होती. त्याने Atellan या विनोदी लेखक-कलावंताचे नुसते लिखाणच
नव्हे तर त्या विनोदी लेखकालाही जाळून टाकले ! इतकी (च) त्याची “ज्वलंत
साहित्य सेवा !”

ह्या केलीग्युला नंतर त्याचा काका क्लोडियस हा गादीवर आला. ह्याचीही एक
वेगळीच तऱ्हा ! तिला स्वतंत्र वृत्ती म्हणायचे का नाही ते आपण ठरवायचे .
क्लोडियस सीझरच्या मनात लाटिन भाषेत नवीन मुळाक्षरांची भर घालण्याचे मनात
आले. त्याने तीन नवीन वर्णाक्षरांची भर घातली . आपल्या सम्राटाने संशोधन
करून काढलेली मुळाक्षरे म्हटल्यावर राजा बोले दळ हाले या न्यायाने
राजपत्रात आणि सरकारी खात्यात वापरायला सुरवात झाली . तुघलकी हुकमाने
संपूर्ण राजधानी हलवली गेली तसाच हा प्रकार. पण Claudius मेल्यानंतर
त्याची हीं तीन मुळाक्षरेही त्याच्याबरोबरच गेली!

पण ह्या क्लोडियस सीझरचे लिखाण फार प्रचंड होते . ह्यामध्येही त्याचा
स्वतंत्र बाणा दिसून येतो . त्याने Etruscan ह्या इतिहासाचे वीस खंड आणि
Carthaginian इतिहासाचे आठ खंड आपल्या लाटिन भाषेत न लिहिता ग्रीक भाषेत
लिहिले!

त्याने आणखी लिहिलेल्या पुस्तकांची गर्दी इतकी अफाट झाली म्हणता की
अलेक्स्झांड्रिया लायब्ररीची इमारत वाढवावी लागली . Claudiyan नावाची
नवीन इमारत मूळ इमारतीला जोडून बांधावी लागली!

रोमन सम्राट नीरो तर त्याच्या स्वत:विषयीच्या अवास्तव कल्पना, विक्षिप्त
आणि विचित्र वागणूक यामुळे कुप्रसिद्ध झाला. त्याचे क्लोडियस पॉलियो वरील
जहरी टीकेने भरलेले The One Eyed Man हे पुस्तक नीरोबरोबरच नष्ट झाले.

आपल्याकडेही काळाच्या प्रवाहात साहित्यिक राजे महाराजे होऊन गेले.
काहींचा भविष्य पुराणासारख्या इतर पुराणांत उल्लेख आढळतो . काहींच्या
बाबतीत तो राजा होता की कवी? किंवा एकाच नावाचे दोन असू शकतील असे वाद
आढळतात ; उदा . भर्तृहरीच्या बाबतीत असे वाद झाले. पण तो राजाही होता
आणि कवीही होता असेच आता मानले जाते .पण जे राजे निर्विवाद लेखक आणि
राजेहि होते त्यापैकी दोन ठळक नावे समोर येतात ती म्हणजे राजा शूद्रक आणि
राजा हर्षवर्धन!

राजा शुद्रकाचा काळ इ.स. पूर्वी २ रे शतक ते इ.सनाचे ५वे शतक यामधील
असावा असे समजले जाते . शुद्रकाचे सर्वांना माहित असलेले सदाबहार नाटक
‘म्रुच्छकटिक ‘ . चारुदत्त आणि वसंतसेना यांचे प्रेम आणि त्यातील वेगळाच
असा खलनायक शकार , आणि नाटकातील नाट्यमय घटना यांना कोण विसरेल? नाटककार
देवल यांनी याचे मराठीत सुरेख नाट्यपूर्ण रुपांतर केले आहे .

इ.स. ते ६४७ मध्ये नर्मदेच्या उत्तरेकडील बहुतेक सर्व भूप्रदेश ज्याच्या
ताब्यात होता तो पराक्रमी तितकाच सुसंस्कृत , रसिक, साहित्यिक राजा
हर्षवर्धन ! याने रत्नावली आणि प्रियदर्शी अशी दोन सुखान्त नाटके
लिहिली. ह्याच्या दरबारी त्याकाळचे प्रख्यात तत्वज्ञानी, कवी ,नाटककार
होते. हर्षचरितम लिहिणारा आणि ‘कादंबरी’ लिहिणारा कवि बाण उर्फ बाणभट्ट
हा त्याच्या दरबारी कवि होता.

इ.स. १६व्या शतकाच्या आगे-मागे बरेच जगन्नाथ पंडित होउन गेले. त्यापैकी
एक जगन्नाथ पंडित राजा होता. तो साहित्यिक होता की नाही याचा उल्लेख
आदळत नाही. पण तो कुशाग्र बुद्धीचा गणिती होता.त्याने भूमितीवर ग्रंथ
लिहिला आहे .

सीझरच्या सम्राटांची साहित्यिक संपदा पाहिल्यावर आपल्या तंजावरच्या
मराठी राजे सरफोजी भोसले या राजांच्या मराठी नाटकांची, संस्कृत
साहित्याची आठवण होते . या भोसले घराण्यातील राजांनी यक्षगान पद्धतीत
सुधारणा करून लिहिलेली स्वतंत्र अशी बावीस मराठी नाटके तसेच त्यांचे इतर
वांग्मयही आजही तंजावर येथे शाबूत आहे , उपलब्ध आहे . राजा शुद्रकाची
नाटके , भर्तृहरीच्या शतकत्रयीतील नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक हे
तीनीही काव्ये आजही आपल्याला वाचायला मिळतात. तुलनेने ही सर्व पुस्तके
रोमन काळाच्या मानाने अलीकडची आहेत हे खरे . पण तरीही ती फार जुन्या
काळातील आहेत हे नि:संशय. ह्या बाबतीत आपण आतापर्यंत तरी भाग्यवान आहोत
हे काय कमी समाधान आहे?

ऱोमन सम्राट ज्युलियस, ऑगस्टस आणि क्लॉडियस सीझर हे साहित्यिक होते .
ज्युलियस सीझर तर शैलीदार लेखक म्हणून नावाजला गेला . पण दुर्दैव असे की
त्यांची ही सर्व ग्रंथ संपत्ती त्यांच्या रोमन साम्राज्या बरोबरच लयास
गेली!

कालाय तस्मै नम: ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *