Monthly Archives: August 2017

माणसांच्या गोष्टी – प्रास्तविक

रेडवुड सिटी

चार चौघांसारखीच ही माणसे आहेत. त्यांच्या गोष्टीही तशाच असणार. ह्या गोष्टी वाचल्यावर, माणसाचे विचार, अनुभव, घटना, मते, मुलाबाळांचे हित, समाजाची प्रकृती-विकृती सगळीकडे सारखी आहे असे वाटते. साध्या माणसांच्या या साध्या गोष्टीत ‘आशय मोठा कितीआढळे’ असे वाटते की, ह्या अगदी साध्या सरधोपट आहेत अशा निष्कर्षाकडे आपण येतो हे प्रत्येक वाचकाच्या मतानुसारच असणार हे तर स्पष्ट आहे. अनेक कथा कविता लेख पुस्तके यानांही हा नियम लागू असतो.

ब्रॅंडन स्टॅटनला ही माणसे न्यूयाॅर्कमध्ये भेटली म्हणण्यापेक्षा त्याला ती सहज तिथे दिसली. तो त्यांच्याशी बोलला. त्याने त्यांना कॅमेऱ्यावर टिपूनही ठेवले. त्याचे त्याने त्या फोटोंसह पुस्तक केले. पुस्तकात त्याने विचारलेले एक दोन प्रश्न असतील. काही फोटोंची तळटीप, शीर्षकीय वाक्य त्याचे असेल. बाकी सर्व ह्या माणसांचे.

ही सर्व मते, विचार, अनुभव यांना कथा म्हणता येतील का हीसुद्धा एक शंका आहेच. पण पुस्तक कर्त्याने यांना कथा म्हटल्यामुळे मीही गोष्टी म्हटले.  ंछायाचित्रवृत्तकथांमध्ये हा प्रकार येईल असे मला वाटते.

शब्दार्थानेही ह्या खऱ्या लघुकथा आहेत. काही तर अति लघुकथा आहेत.

ब्रॅंडन स्टॅंटन हा जाॅर्जिया विद्यापीठाचा (UGA) पदवीधर आहे. मॅरिएटामध्ये याचा जन्म झाला आहे. त्याचा एक photo journalistic blogआहे. त्याचे १७ लाख ८००००followersआहेत! प्रख्यात Time मासिकाच्या 30 under 30 अशा व्यक्ति ज्यांच्यामुळे जगात बदल होईल त्यांत त्याची निवड झाली आहे. त्याचे Humans of NewYork  हे पुस्तक तडाखेबंद विक्रीच्या १० पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे. त्याच पुस्तकासंबंधी मी लिहितो आहे.

ब्रॅंडन स्टॅटन हा आपल्या मॅरिएटाचा आहे  म्हटल्यावर मला जास्त जवळचा वाटला. लायब्ररीत पुस्तक दिसले. त्यातून हे सर्व लेखन घडले.

ही माझी प्रस्तावना झाली.  १३ आॅक्टोबर २०१६ साली मी लिहिलेल्या, साध्या माणसांच्या या काही साध्या गोष्टी आपण आता, वाचू या.

माणसांच्या गोष्टी – १

माणसांच्या गोष्टी – २

माणसांच्या गोष्टी -३

दे दान सुटे गिरान!

Redwood City, CA

चार पाच दिवसापासून मी ग्रहणाच्या वातावरणात आहे. सुरवात टेड-टाॅक्सवर डेव्हिड बेराॅननेसांगितलेला, खग्रास ग्रहणा संबंधातील त्याचा अद्वितीय अनुभव ऐकत होतो. त्याने अखेरीस सगळ्यांनाच कळकळीने सांगितले की खग्रास ग्रहण पाहण्याची संधी चुकवू नका. आयुष्यात एकदा तरी पाहाच.

योगोयोग असा की ह्या २१ तारखेलाच इथे सूर्याचे खग्रास ग्रहण मोठ्या टापूच्या प्रदेशात दिसणार वअसल्याचे
जाहीर झाले होते.  पण येथील  बे-एरियात मात्र खग्रास दिसणार नाही हे आधीच जाहीर झाले होते.तरीही लहान थोर, सर्व लोकांमध्ये उत्साह संचारला होता. ग्रहण पाहण्याचे चष्मेही कधी संपले ते अनेकांना कळले नाही. तरीही आम्ही डगमगलो नाही. पाहायचे. म्हणजे पाहायचे.संन्याशाच्या लग्नाची शेंडीपासून तयारी सुरु झाली. अर्थात काचा काळ्या करण्यापासून! नेहमीप्रमाणे मी एक काच चांगली पाहून धुरकट करताना फोडली! असो. काचा काळ्या झाल्या.

मी,सोनिया, अनुजा आणि तेजश्रीने घरातून,  त्यांच्या खोलीतून, मागच्या अंगणातून, ग्रहण पाहिले. पूर्वी बनवत होतो तसेच घरी धुराने काळ्या केलेल्या काचांतून ग्रहण पाहिले.

खंडग्रासच दिसणार होते. माझ्या ढोबळ गणिती दृष्टीतून चांगले ७५/. टक्के होते!  छान स्पष्ट दिसले.

मी घरातून, बाहेर जाऊनही पाहिले. बाहेर थांबलोही. एकही पक्षी दिसत नव्हता. ग्रहणाच्या काळात आणि नंतरही काही क्षण, एकही म्हणजे एकही पान हलत नव्हते. संध्याकाळचा भास होता. पण अंधारून आलेले वाटत नव्हते. पण जेव्हढे काही किंचित ऊन पडले होते, तेही अगदी मलूल होऊन पडले होते! सगळा भाग पिवळसर काळसर गाॅगलमधून दिसावा तसा दिसत होता. मी डोळे चोळून पुन्हा पुन्हा पाहिले तरी तसेच दिसत होते.

लहानपणी सोलापूरला काहीग्रहणे, अशा काचेतून पाहिली. औरंगाबादलाही ग्रहण पाहिले. ग्रहण दिसले दिसले असे फक्त म्हणत होतो, इतकेच. बरेच वेळा तर दिसणार नाही हे माहितही असायचे. पण त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे ग्रहणाच्या आधी, पर्वकाळात,काहीही करायचे नाही हा नियम सगळे पाळत. जुन्या पठडींच्या घरात मोठी माणसे जप वगैरे करत.आमच्याघरी तो प्रकार फारसा नव्हता. ग्रहणाच्याआधी आणि ग्रहण सुटल्यानंतर आंघोळी करीत. आम्ही मुले मात्र ग्रहण सुटल्यावरच  करत असू. काय ती गडबड ! ग्रहण काळातले घरातील सर्व म्हणजे सर्व पाणी ओतून द्यायचे! ‘मुन्शिपालटी’ लगेच ताजे पाणी सोडायची! आम्हाला आश्चर्य वाटायचे. येव्हढा अवाढव्य हिप्परग्याचा सर्व तलाव ह्यांनी कधी रिकामा केला ? त्याहीपेक्षा तो प्रचंड तलाव लगेच कोणत्या ताज्या पाण्यांनी भरलाही! अजूनही हे कोडे सुटत नाही.

पाणी ओतून देण्याची जेव्हढी गडबड त्यापेक्षा आंघोळी आटपून ताजे पाणी भरण्याची त्याहून मोठी धडपड!
ग्रहण सुटल्याबरोबर “द्यें दाSSन य्यैं सुट्ये/सुट्ट्यैं गिराSSsन ” अशा निरनिराळ्या आवाजातील आणि निरनिराळ्या घराण्याच्या सुरातील आवाजांचा एकच गदारोळ सुरू व्हायचा! ती गरीब माणसे एकामागून एक अशी घरोघरी यायची. त्यांना कपडे, जुने पत्र्याचे डबे,लोखंडी खिळे,मोडलेले लोखंडी चिमटे, कुठे हिरवी काळी पडलेली, चेपलेली तांब्याच्या लहान सहान वस्तु , धान्य, पैसे देण्याची सगळ्या गल्लीत लगबग सुरू व्हायची.पण जास्त करून कपडे, धान्य पैसे दिले जायचे. पण हे सर्व घेत असतानाही त्यांचे य्यैं द्यैं दाSSन चालूच असायचे. पण खूष व्हायची मंडळी!

हे होईतो चहाचे आधणही शेगड्या स्टोव्ह वर ठेवायची प्रत्येक घरांत धांदल उडायची! ती एक आवडती गडबड असे सगळ्या घरांत.

शाळा आहे की नाही हे आम्ही पोरंच नव्हे तर घरांतले आई-वडीलही विसरले असायचे! ती सगळ्यात मोठी मजा असायची आम्हाला ग्रहणाची! त्यातही ‘दिसणारे’ ग्रहण असले तर जास्तच विसरणे व्हायचे!
मोठे झालो आणि आमच्या ह्या आनंदाला मात्र ग्रहण लागले! खग्रास!

आजचे ग्रहण पाहिले. फार समाधान वाटले. ७५/. टक्के म्हणजे जवळ जवळ खग्रासच पाहिले !

पण लहानपणच्या ग्रहणाची गोष्टच निराळी. ग्रहणाला महत्व कमी.न कळत शाळेला सुट्टी मिळायची हा ग्रहणाचा महत्वाचा भाग होता आमच्या साठी!

ते लागण्यापूर्वीची आदल्या दिवसापासूनची ‘हे नाही ते नाही करायचे’ ची यादी गेली ते बरे झाले. ग्रहण म्हणजे काजळीने रंगवलेल्या काचा हीच खरी ओळख-ती गंमतही नाही; घराघरातील सगळ्यांची आपणही ‘सुटल्याच्या’समाधानाची ती धांदल,गडबड,नाही. ते हंडे, पातेली,बादल्यांचे आवाजही गेले. त्यातच लगोलग देS दाSन सुटे गिराSSन  असे मोठमोठ्याने ओरडत गल्ली बोळातून हातातील कपडे, कापडाची चिरगुटी सावरत, खाकेतली गाठोडी संभाळत जोरात धावत सुटणारी माणसे गेली;  त्या खणखणीत आरोळ्या ऐकल्या की का कुणास ठाऊक पण कुठून तरी, “गोंद्या आलाSरेSs”या गणेश खिंडीतल्या क्रांतिकारी आरोळीची आठवण क्षणापुरती तरी जागी व्हायची. ग्रहण म्हटले की त्याचा हा सगळा धमामाच डोळ्यासमोर येतो. ऐकूही येतो!

अशी सफर पुन्हा न होणे कधीही…

रेडवुड सिटी

अशी सफर पुन्हा न होणे कधीही….

आताच मी Ted Talkवर David Baronने खग्रास ग्रहणाचा त्याचा एक अलौकिक – त्याने हाच out of this world हा शब्दप्रयोग केला – अनुभव सांगितला, तोऐकत होतो. चंद्र, सूर्याला काही क्षणात पूर्णपणे झाकणार त्या आधीच्या थोड्याच क्षणांत वातावरण कसे एकदम बदलते, सावल्याही वेगळ्या विचित्र दिसूलागतात, क्षणात अंधारुन दिवसाची रात्र कशी होते ते सांगत असताना, त्याच्यासारखाच विज्ञान वार्ताहर असलेल्या David (अरेच्या! दोघांच्या नावातही साम्य! ) Perlman ने १९६० साली सूर्य ग्रहणाच्या वृत्तांतकथेत व आताच त्याने लिहलेल्या परवाच्या लेखातील काही ओळी डोळ्यांसमोर आल्या.

David Perlman काय म्हणतो त्या अगोदर तो कोण, काय करतो,  कुठे असतो हे सांगायला हवे. डेव्ह (David Perlman)हा नुकताच ११आॅगस्टलाSanFrancisco Chronicleमधून निवृत्त झाला. तिथे तो विज्ञान-विभागाचा संपादक होता. पण तो स्वत:लाआजही साधा विज्ञान-वार्ताहरच म्हणवून घेतो!

तसे पाहिले तर अनेक लहान मोठ्या,  नामांकित, जागतिक दर्जाच्या ते महानगरीतल्या, मोठ्या शहरातल्या वर्तमानपत्रांत निरनिराळ्या विभागाचे, जसे, वृत्तसंपादक, रविवार आवृत्तीचे, तसेच उपसंपादकही असतात.मग डेव्हिड पर्लमनचे असे वैशिष्ठ्य काय?….

….डेव्ह हा तिथे सुमारे  ८० वर्षे काम करतोय! काॅपी-बाॅय ह्या सर्वात खालच्या जागेपासून त्याची कारकीर्द सुरू झाली ! आणि त्या नंतर मात्र आपल्या अंगच्यागुणांवर चढत चढत संपादक या मानाच्या पदावरून निवृत्त होत आहे. वयाच्या ९८व्या वर्षी! आज अमेरिकेतील तो एकमेव, सर्वात ज्येष्ठ, पूर्णवेळ काम करणारा, पत्रकार आहे. अमेरिकेतील या ज्येष्ठ पत्रकाराला निरोप देण्यासाठी त्याचे सध्याचे सहकारी आणि त्याच्याबरोबर पूर्वी काम केलेले अनेकजण, कंपनीचे सर्ववरिष्ठ जमले होतेच पण सॅनफ्रॅन्सिस्कोचे महापौर, खासदार, आमदार,प्रतिष्ठित सगळे हजर होते.

या निरोप समारंभात महापौरांनी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये अाजचा दिवस हा David Perlman Day  म्हणून ओळखला जाईल असे जाहीर करून पर्लमनचा मोठाचगौरव केला! ते पुढे म्हणाले,” ह्या शहरात पहिल्या महायु्द्धानंतर होत असलेल्या प्रत्येक घडामोडीचे, शहराच्या अंतर्बाह्य होणाऱ्या सर्व स्थित्यंतराचे साक्षीदारअसलेले पर्लमन आपल्या बरोबरीने आपल्या शहरात आहेत हीच एक आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे!” बोलण्याच्या ओघात ते पुढे म्हणाले, “इतक्या वर्षांच्यावृत्तपत्रीय अनुभवाने पर्लमन यांना कोणती बातमी बनावट, खोटी आहे ते सहज ओळखता येते.” ह्यावर हजरजबाबी पर्लमन ताबडतोब म्हणाला, ” येवढेच नाही, मीतशी बातमी लिहूही शकतो!” लोक जोरात हसले हे सांगायला नको.  त्याच्या सहकाऱ्यांनी लिहिलेल्या गाण्यावर ९८वर्षाचा हा उत्साही, भीष्माचार्य पत्रकारथोडावेळ नाचलाही!

पर्लमनने, माणूस चंद्रावर उतरला, तो चालला तेही पाहिले, त्यांचे वृत्तांत लिहिले. त्यामागच्या विज्ञानावर लिहिले; अंतराळवीरांच्या मुलाखती घेतल्या; लहान-मोठी, खंड, खग्रास ग्रहणांविषयी लिहिले, ती पाहिली, पाहात असतानाचे अनुभव लिहिलेच, त्यांचा इतिहास आणि शास्त्रही लिहिले. किती तरी अशी चंद्र-सूर्यग्रहणे पाहिली. भुकंपाचे धक्के सोसले, त्यानंतर काय घडले त्याचीही कथा लिहिली. पुढे काय काळजी  घ्यावी त्याचेही शास्त्रीय विवेचन लिहिले. डायनोसारआणि  त्यांच्या अंड्यासाठी, सांगाड्यांसाठी प्रदेश पालथे घालणाऱ्या संशोधकांना त्यांच्या कामाच्याठिकाणी युटाहला जाऊन मुलाखती घेतल्या. उत्क्रांतीचेसंशोधन चालूच आहे. Galápagos Islands इथे जाऊन त्या संशोधकांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. अगदी परवाच्या खग्रास सूर्य ग्रहणाविषयीलिहिलेला त्याचा अखेरचा लेखही छापून आला आहे.

” खग्रास ग्रहण दिसणाऱ्या सगळ्या टापूत संशोधक त्या अतिदुर्लभ अशा २-३ मिनिटाच्या काळात घडणार असलेल्या स्थित्यंतरातून, निसर्गाच्या अत्यंत वेगळ्यादर्शनातून, किती वैज्ञानिक माहिती गोळा करता येईल ह्याच ध्यासात असतात.” हे १९६५ साली त्याने लिहिले होते. “दिवस मध्यरात्रीत बदलून जाईल… दिवसाचीरात्र कधी होईल ते कळणारही नाही. उन्हाळ्यातील झळा  क्षणभरात थंडीचा गार बोचरा वारा होऊन वाहू लागेल… अचानकझालेल्या अंधाऱ्या रात्रीमुळे पक्षीबावचळून विचित्र कलकल करू लागतीलआणि आकाशात तारे प्रकट झालेले दिसतील! ” … हे त्याने २१ तारखेला होणाऱ्या सूर्य ग्रहणाविषयी लिहिलेल्यापरवाच्या लेखात म्हटले आहे

Ted-Talk वरील David Baron संबंधी वर लिहिताना मी ह्याच ओळीं आठवल्या म्हणालो होतो .

इतकी वर्षे एका ठिकाणी काम केले त्याविषयी डेव्ह पर्लमन म्हणाला, ” काय सांगावे? काय सांगणार! तुमच्या आणि माझ्या, लहान सहान सहली बऱ्याच झाल्याअसतील. पण अशी७८-८० वर्षांच्या सफरीसारखी दुसरी सफर होणार नाही! ”

कंपनीने पर्लमनला आणि सगळ्यांना खूष करणारी खबर देऊन आपल्या मनाचा मोठेपणाही दाखवला. डेव्ह पर्लमन आपल्या वर्तमानपत्राचा पहिलाच, सन्माननीय(Emeritus) विज्ञानाचा संपादक राहील असे जाहीर केले. तो आता केव्हाही येऊन एखादा वृत्तांत, वृत्तकथा किंवा पुस्तकही लिहू शकतो. त्याची खुर्ची आणि टेबलत्याच्यासाठी असेच राहिल. हे ऐकल्यावर ९८ वर्षाचा पर्लमन पटकन म्हणाला  “एक वृत्तकथा माझ्या खिशात आता तयारही आहे!”

 

‘रुचिरा’ आणि ज्युडिथ जोन्स

‘रुचिरा’ पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून अनेक घरातील स्वयंपाक जास्त चांगले होऊ लागले. निदान नवविवाहितांच्या घरात तरी. तसेच दुपारच्या खाण्याच्या वेळी नवनविन पदार्थ होऊ लागले. हे तिशी-पस्तीशीच्या गृहिणींच्या घरीही घडू लागले. दिवाळीत आपल्या घरातले फराळाचे पदार्थही पुरुषमंडळी कसलाही विनोद न करता खाऊ लागले. चकल्या कुरकुरीत होऊ लागल्या, अनारशांची दामटी न होता तेही खुसखुशीत झाले. कोणताही लाडू फोडायला हातोडी किंवा बत्त्याची गरज पडेनाशी झालीं.

‘रुचिरा’मुळे घरातली वाटी हे ‘प्रमाण’ झाले. किती घेऊ या प्रश्नाला, ” घ्या मुठभर किंवा थोडे कमी” किंवा,”अहो थोडीशी चिमूटभर” याऐवजी ” २वाट्या कणिक आणि एक वाटी डाळीचे पीठ असे प्रमाणबद्ध उत्तर मिळू लागले. रुचिराचा खपही प्रचंड होऊ लागला. त्यामुळे अशा प्रकारची अनेक पुस्तके बाजारात आली. आजही येतच आहेत. अशा पुस्तकांची प्रचंड बाजारपेठ आहे. ती ओळखण्याचे श्रेय रुचिराचे पहिले प्रकाशक किर्लोस्करांना जाते!


रुचिराची अशी अचानक आठवण कशी झाली? ज्युडिथ जोन्स या पुस्तकांच्या संपादिकेवरून ही आठवण झाली. जुडिथ जोन्स ही प्रख्यात संपादक होती. होती असेच म्हटले पाहिजे. परवाच तिचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले.

प्रख्यात प्रकाशक Alfred Knopf या प्रकाशन संथेत थोडी थोडकी नाही चांगली ५० वर्षे संपादक म्हणून काम करून ती निवृत्त झाली. सुरवातीला ती Dobuldayह्या तितक्याच तोलामोलाच्या प्रकाशनात काम करत होती. तिच्या कारकिर्दीतील पहिला मानाचा तुरा म्हणजे The Diary of Anne Frank चे प्रकाशन. अनेक नाकारल्या गेलेल्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात पडलेले हे पुस्तक तिने वाचले;आणि आपल्या कंपनीला ते प्रसिद्ध करण्यास भाग पाडले. पुढचा इतिहास आणि ह्या पुस्तकांच्या आवृत्त्त्या निघाल्या, निघताहेत हे सर्वांना माहित आहे . ज्युडिथ जोन्समुळे हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळाले!


पुस्तकांचे संपादक म्हणजे पडद्यामागील कलाकार. सिनेमातील नट नटी माहित असतात. फार तर दिग्दर्शक. पण तेही बिमल राॅय. व्ही शांताराम, राज कपूर, हृषिकेश मुखर्जी, भालजी पेंढारकर, अनंत माने,राजा परांजपे असे नामवंत माहित असतात. पण सिनेमाचे संपादक/ संकलक? फारसे माहित नसतात.


व्ही. एन. मयेकर, वामन भोसले, अरविंद कोकाटे, माधव शिंदे महेश मांजरेकर आणि वर उल्लेख केलेले सर्व दिग्दर्शक हे नामवंत Editor आहेत. तसेच काही मासिके वर्तमानपत्रांचे संपादक. केवळ त्यांच्या नावांनी मासिके आणि वर्तमानपत्रे चालत! अशी यादी लांबत जाईल. ह्यांच्यावर स्वतंत्र लेख लिहिण्याच्या ते योग्यतेचे होते व तसे काही आजही आहेत. मराठी पु्स्तक प्रकाशकांकडे संपादक असतात की नाही मला कल्पना नाही. पण इंग्रजी व इतर पाश्चात्य देशात प्रकाशन संस्थांत संपादक असतातच. प्रख्यात लेखक प्रस्तावनेत आपल्या संपादकांचा मोठ्या गौरवाने उल्लेख करतात.


ज्युडिथ जोन्सने अनेक नामवंत लेखकांबरोबर सातत्याने काम केले आहे. John Updike, Anne Taylor ही त्यापैकी काही नावे.


बरं मग ह्यात ‘रुचिरा’ कुठे बसते? ज्युडिथ जोन्समुळे. कोण कुठली, कुणाला माहित नसलेल्या Julia Child चे पाककलेवरचे पुस्तक प्रसिद्ध झाले ते Judith Jonesमुळे! प्रचंड खप झाला. आणि ती प्रसिद्धिच्या झोतात आली! त्यानंतर अनेकांची अशी पुस्तके आली. प्रख्यात Chef बल्लवाचार्यही लिहू लागले. TV वर खाद्यपदार्थ आणि त्तत्सम गोष्टींचे कार्यक्रमच नाही तर स्वतंत्र वाहिन्या सुरु झाल्या! प्रचंड आर्थिक उलाढाल या क्षेत्रात होऊ लागली. ह्याला अप्रत्यक्षरीत्या ज्युडिथ जोन्स ही कारणीभूत झाली असे म्हणावे लागेल. ती स्वत: पाककलेत प्रविण होती.तिनेही अशी काही प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत.


६०च्या दशकात ज्युलिया चाईल्ड आणि ज्युडिथ जोन्स यांच्यावर सिनेमा निघाला. ज्युलियाच्या पुस्तकाचा खप पुन्हा वाढला. लोकांना ज्युडिथही माहित झाली.

संपादकाला साहित्यिक अभिरुचि, चोखंदळ दृष्टी आणि उत्तम काय आहे हे ओळखण्याची नजर हवी. थोडक्यात तो रत्नपारखी हवा. ज्युडिथ तशी होती.

असे म्हणतात की अध्यात्मात खरा गुरु भेटणे अवघड आहे. तसेच मी म्हणेन की लेखकाला रत्नपारखी संपादक- प्रकाशक मिळणेही तितकेच अवघड आहे.

माझेच उदाहरण बघा ना!