Author Archives: Sadashiv Kamatkar

यशस्वी लोकांची मनोगते


मागच्या लेखांत विविध क्षेत्रातील काही नामवंत काय वाचतात , त्यांच्या आवडीची पुस्तके ह्या संबंधी वाचले. टिमोथी फेरिसने शंभराच्यावर नामवंताना बरेच प्रश्न विचारले होते. त्यामध्ये त्यांची आवडीची पुस्तके व ती का आवडली, तसेच त्यांना जर त्यांच्यासाठी स्वतंत्र मोठा जाहिरात फलक दिला तर त्यावर काय लिहाल ? त्यांची उत्तम गुंतवणूक कोणती? नव्या पदवीधारकांना, तरुणांना काय सांगाल? असेही काही प्रश्न विचारले होते. त्यावर ह्या मोठ्या यशस्वी लोकांनी काय सांगितले तेही आपण आज वाचणार आहोत.


नवल रविकांत हे मूळचे हिंदुस्थानचे पण ते बऱ्याच काळापासून अमेरिकेतच आहेत. तेही यशस्वी गुंतवणुकदार आहेत. त्यांनी सुमारे दोनशेच्यावर कंपन्यांत, त्या अगदी बाल्यावस्थेत असल्यापासून,गुंतवणुक केली आहे. त्यापैकी काही कंपन्यांची नावे सांगायची तर Opendoor, Postmates , Uber, FourSquare , Twitter, Snapchat अशी सांगावी लागतील.


नवल रविकांत ह्यांची उत्तम गुंतवणूक म्हणजे पुस्तके !पुस्तकांचे, वाचनाचे महत्व सांगताना ते म्हणतात की, , “ वाचनाची आवड असणे आणि ती जोपासणे म्हणजेच वाचन हे मोठी शक्ती आहे. वाचन तुम्हाला सामर्थ्यवान बनवते. मी शाळेत असल्यापासून “ आवश्यक वाचन” (Required Reading) पुस्तकेच नाही तर इतरही अनेक पुस्तके वाचत असे.कधी काही एक उद्देशाने तर बरीच सहजगत्याही वाचली. आज आपल्या हाताशी पुस्तकांचा महासागर आहे. पण ती वाचण्याची इच्छा, उर्मी हवी. वाचनामुळे आपण निश्चित शिकत असतो. त्या साठी इच्छा तळमळ हवी. ती तुमच्यामध्ये येऊ द्या. वाचनामुळे तुम्हाला काय हवे, काय करावे, कोण व्हावे ह्याची जाणीव होते. तशी ती होऊ द्या. वाचा.”


कॅालेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या तरुणांना काय सांगाल ह्यावर ते म्हणाले,” तुम्हाला जे करावेसे वाटते , मनापासून तीव्रतेने वाटते ते करा. पण ते करताना एक गोष्ट सतत ध्यानात ठेवा. कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. वाट पाहाण्याची शक्ती असू द्या.जे करायचे ते करताना चिडचिड , चिंतेने अस्वस्थ होऊन करू नका.” “ बातम्या , कुरकुर करणारे, संतापी प्रक्षुब्ध लोकांकडे दुर्लक्ष करा, दूर राहा” असेही ते सांगतात. हे सांगत असतानाच कोणतीही अनैतिक, अनीतीची गोष्ट कधीच करू नका, तसे वागूही नका.” असेही ते बजावतात.


ह्याच प्रश्नाला उत्तर देताना प्रख्यात पाकशास्त्रातील तज्ञ आणि तिच्या पाककृतींच्या पुस्तकांमुळे नावारुपास आलेली सेमीन नुसरत सल्ला देते की,” प्रसंगी गोंधळून जाल , शंका,संशयांत पडाल तेव्हा तुमच्यामधील दयाळूपणा, करूणा आणि चांगुलपणाचा आधार घ्या. त्यांनाच प्राधान्य द्या.”


Floodgates चा संस्थापक माईक मेपल्सला सांगितले की तुम्हाला तुमचा स्वतंत्र मोठा जाहिरात फलक दिला तर तियावर काय लिहाल? त्यावर त्याने दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे “ सचोटीच्या मार्गाने जा. तुम्ही कधीच रस्ता चुकणार नाहीत!”


तर ह्याच प्रश्नाला उत्तर देताना SalesForce ह्या प्रख्यात कंपनीचा अध्यक्ष आणि मुख्य कार्याधिकारी मार्क बेन्यॅाफ Marc Benioff म्हणतो , “बालवाडी ते १२ वी एक शाळा दत्तक घ्या” अर्थात हे ज्यांना सहज शक्य आहे अशा धनवंतांना तो सांगत असावा. पण उदात्त, आणि समाजाला उपयोगी असा सल्ला आहे ह्यात शंका नाही. विशेष म्हणजे ‘ आधी केले मग सांगितले’ असा तो माणूस आहे.


जिचा MarieTV कार्यक्रम हा खूप लोकप्रिय आहे, तसेच प्रख्यात B-School ची संस्थापिका मेरी फर्लियोने सांगितले की तिची आई नेहमी सांगत असे तेच वाक्य मी वचन म्हणून माझ्या जाहिरात फलकावर लिहिन. “कोणत्याही अडी अडचणीच्या वेळी , बिकट न सुटणारा प्रश्न, संकट आले की आई म्हणायची ,” Everything is ‘figure-out-able’ ! “ ती पुढे म्हणते घरांतील आम्हा सर्वांसाठी तिचे हे सांगणे मार्गदर्शक झाले आहे. कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतोच! साधे, रोजचे वाटणारे हे बोल किती आश्वासक धीर देणारे आहेत. तिच्या आईचा ‘फिगरआऊटेबल’ शब्द वाचला तेव्हा मला आपण गमतीने किंवा सहजही ‘ परवडेबल’ म्हणतो त्याची आठवण झाली.


मागील लेखात काईल मेनर्डविषयी(Kyle Maynard) विषयी वाचले. खास त्याच्यासाठीच जर मोठा जाहिरात फलक मिळाला तर तो म्हणतो की त्यावर त्याचा नौदलातील श्रेष्ठ वीरपदक मिळवणारा मित्र Richard Machowicz म्हणत असे तेच, कुणातही वीरश्री निर्माण करणारे, वचन मी लिहिन. ” Not Dead, Can’t Quit !” “मारता मारता मरेतों लढेन “ किंवा मराठी वीर सरदार दत्ताजी शिंदें ह्यांनी पानिपतच्या रणभूमीवर अखेरच्या क्षणी सुद्धा जे उत्तर दिले त्या “ बचेंगे तो और भी लढेंगे” ह्या वीरवचनाची आठवण करून देणारे हे स्फूर्तिदायक वचन आहे !


काही नामवंतांनी ते मोठ्या फलकावर काय ते लिहितील हे सांगितले. पण आपल्याला बरेच वेळा मोठमोठ्या फलकांचा त्रास वाटतो; उबगही येतो. हे दोन्ही बाजूंचा देखावा , दृश्य, पाह्यला अडथळा आणणारे, बटबटीत, वाहन चालवणाऱ्यांचे लक्ष विचलित करणारे फलक नको वाटतात. काढून टाकावेत असे वाटते. अगदी असेच, लेखक,व चित्रपट कथा पटकथा लेखक, जाहिराती उत्तम लिहिणाऱ्या Steve Pressfield ह्यालाही वाटते. तो म्हणतो,” अगोदर मला असा फलक कुणी देणार नाही. दिला तरी तो मी घेणार नाही.उलट तो मी ओढून खाली पाडून टाकेन. दुसरे ही असे फलक मी पाडून टाकेन.”


पण ह्यापेक्षाही आणखी काही प्रेरक विचार वाचायला मिळतील. “ मैदान सोडून पळून न जाणे हाच यश आणि अपयश ह्यातील फरक आहे” किंवा प्रसिद्ध टेनिसपटू विजेती मारिया शारापोहव्हा जेव्हा ,” पराभवानंतर जितका विचार करते तेव्हा तितका विजयानंतर होत नाही.” हे सुभाषितासारखे बोलून जाते तेव्हा आपणही त्यावर विचार करू लागतो. निदान,” खरे आहे.” इतके तरी म्हणतोच..


टिमोथी फेरिसच्या The Tribe of Mentors मध्ये Affirm ह्या कंपनीचा सह संस्थापक मॅक्स लेव्हशिन Max Levchin , ; न्यूयॅार्क टाईम्सचा सतत आठ वेळा सर्वाधिक खप Best Seller असलेला लेखक Neil Strauss; हॅालिवुडमधील नट व एकपात्री विनोद वीर, Joel Mettale ; नट दिग्दर्शक Ben Stiller ; आणि आणखीही बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींनी आपले विचार मांडले आहेत. सर्वांचा परामर्श घेणे शक्य नाही.


“ तुमची सर्वांत उत्तम गुंतवणुक कोणती?” ह्या प्रश्नाला Mike Maples ह्याने दिलेल्या, सर्वांना पुन्हा अंतर्मुख करणाऱ्या, उत्तराने ह्या लेखाचा समारोप करतो. तो सांगतो,” मी माझ्या मुलांवर ठेवलेला विश्वास !” “Believing in my Kids”

वेगळ्या जमातीची आवडीची पुस्तके

आयुष्याची वाटचाल कशी करावी, “जगावे कसे ? तर उत्तम” , हे शिकवणारे मार्गदर्शक, धडपडणाऱ्यांना हात देऊन उभे करणारे शिक्षक किंवा अनुभवी उद्योजक; ‘तान्ह्या’ कंपन्यांत भांडवल गुंतवून त्यांना वाढवणारे गुंतवणुकदार; किंवा समाजातील गुणी मुलांमुलींसाठी मदत करणारे जगप्रसिद्ध खेळाडू, गायक, नट, संस्था; किंवा कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे तर ‘पाठीवर थाप मारून फक्त ‘लढ’ म्हणत निश्चय बळकट करणारे, अशा विविध रुपाने अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक मददगारांची ही विशेष जमात आहे. हे इतक्या तऱ्हेने सांगण्याचे कारण म्हणजे मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात टिमोथी फेरिसचे The Tribe of Mentors हे पुस्तक वाचनात आले.


पुस्तकाविषयी तर जमेल तेव्हढे सांगावेसे वाटते. पण त्या अगोदर हा लेखक कोण आहे तेही समजून घेणे प्राप्त आहे.
टिमोथी फेरिस हा कंपन्या बाल्यावस्थेत असताना त्यांच्यात पैसा गुंतवणारा कुशल गुंतवणुकदार आहे. कितीही चांगले, वेगळे,व भविष्यकाळ असलेले उत्पादन असो; त्याची संकल्पना ज्यांना सुचली ते बुद्धिमान प्रतिभाशाली असोत, पुरेसे भांडवल नसेल तर गाडे अडते. अशावेळी, कंपनी आणि उत्पादनाविषयी थोडीफार खात्री असणारे गुंतवणुकदार पुढे येतात. आपला पैसा त्यात गुंतवतात. अशा angel investor (पोषणकर्त्यां) पैकी टिमोथी फेरिस आहे. त्याशिवाय तो लेखकही आहे. तो पुढे आला 4-Hour Week ह्या पुस्तकामुळे. त्यानंतर त्याची अशीच 4-Hour Body आणि 4-Hour Chef ही पुस्तके प्रकाशित झाली.


फेरिसने StumbleUpon, Evernote आणि कितीतरी अनेक तंत्रज्ञान कंपन्यांत त्यांच्या प्राथमिक अवस्थेपासून गुंतवणुक केलेली आहे. उबेर कंपनीचा तो सल्लागारही आहे. लोकांना तो माहित आहे ते त्याच्या पॅाडकास्टमुळे. त्यातअनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींच्या मुलाखती असतात. या बरोबरच त्याने ‘ऐकण्याची’ Audio (श्रवण)पुस्तकेही प्रकाशित केली आहेत.


ह्या टिमोथी फेरीसने सुमारे शंभराच्यावर नामवंतांना अकरा प्रश्न पाठवले व त्यांची उत्तरे देण्याची विनंती केली. बहुतेक नामवंत हे तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. तसेच काही गायक, वादक,लेखक, प्रख्यात बल्लवाचार्य, खेळाडू, अपंगही आहेत.
ह्या ख्यातनामांनी दिलेली उत्तरे बारावी आणि कॅालेज आटपून नुकतेच बाहेरच्या वास्तव जगात प्रवेश करणाऱ्या तरुणांना, उद्योजक व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्या धाडसी व्यक्तींना आणि इतरांनाही उपयुक्त ठरतील. म्हणूनही हे पुस्तक वाचनीय आहे.


माझ्यासारख्या सामान्य वाचकाला ही मोठी माणसे कोणती पुस्तके वाचतात, आपण वाचलेली किंवा वाचू अशी काही पुस्तके आहेत का ही माहिती मिळते. निदान नविन किंवा वेगळ्या पुस्तकांची माहिती होते. हा लाभ मोठा आहे. कारण फेरिसने त्या सगळ्यांना “ तुम्ही आतापर्यंत सर्वात जास्त कोणते पुस्तक /पुस्तके भेट दिली आहेत? आणि का? किंवा कोणत्या एका किंवा तीन पुस्तकांचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव पडला आहे? “ हा पहिला प्रश्न विचारलाय. “तुमची सर्वात महत्वाची गुंतवणुक कोणती?” सर्वांत आवडते किंवा संस्मरणीय अपयश कोणते?”किंवा आपण कधी कुठे कमी पडलो असे वाटले का?” “ ताण तणाव घालवण्यासाठी तुम्ही काय करता?” “ तुम्हाला एक मोठा प्रसिद्धी-फलक दिला व त्यावर लिहिण्याचे स्वातंत्र्य दिले तर काय लिहाल?” ह्या आशयाचे व इतरही दुसरे काही प्रश्न त्याने विचारले आहेत.


सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे नाही. ज्या प्रश्नांची उत्तरे द्यावी वाटतील ती द्यावी हा खुलासाही त्याने केला होता.
सर्वांनी दिलेल्या सर्व उत्तरांचा परामर्श घेता येणे शक्य नाही. काही प्रश्न, त्यांची काही व्यक्तींनी दिलेली उत्तरे ह्यांचा उल्लेख करावा असे ठरवले आहे. बघू या , कितपत जमते ते.


स्टीव्हन प्रेसफिल्ड Steven Pressfield ह्याने लेखनाच्या- ‘जाहिराती, पटकथा, कथा-कादंबऱ्या ,ललितेतर , आणि प्रेरक पुस्तके – पंचक्रोशीत’ आपला चांगला ठसा उमटवला आहे.


त्याची The Legend of Bagger Vance ( ह्यावर ह्याच नावाचा पाहण्याजोगा उत्तम सिनेमाही निघाला आहे.ह् सिनेमात विल्स स्मिथ, मॅट डॅमन सारखे नामवंत नट आहेत.), Gates of Fire , The Virtues of War ही त्याची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्याच्या कथा पटकथा असलेले चित्रपट सांगायचे तर Above theLaw, King Kong Lives, Joshua Tree ( Army of One) ही काही नावे सांगता येतील. Pressfield त्याच्या आवडत्या पुस्तकाविषयी म्हणतो की,” त्याच्यावर खरा आणि अत्यंत प्रभाव पाडणारे पुस्तक फार जाडजूड आणि प्रचंड आहे. रक्तरंजित घडामोडींनी ते भरलेले आहे. पुस्तकाचे नाव “ Thucydides’s History of Peloponnesian War “ प्रेसफिल्ड पुढे सांगतो की स्वतः लेखकच पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचकांना सावध करतो “ गंमतीसाठी, करमणुक करणारे हे पुस्तक नाही.आणि वाचायलाही सोपे जाणारे नाही.” पण प्रेसफिल्ड सांगतो की पुस्तक कालातीत, त्रिकालाबाधित सत्यांनी भरलेले आहे. लोकशाहीतील सर्वांनी हे पुस्तक वाचायला हवे असेही तो आवर्जुन सांगतो. तोही म्हणतो की मनोरंजनासाठी हे पुस्तक नाही. पण उत्तुंग तितकेच सखोल वैचारिक असे काही वाचायचे असेल तर हे पुस्तक वाचायला हवे.


War of Art, A Man at Arms, Gates of Fire, Tides of War( अथेन्स आणि स्पार्टनस् मध्ये २७ वर्षे चाललेल्या युद्धाविषयी) ही त्याने लिहिलेली काही पुस्तके. त्याच्या बहुतेक पुस्तकांच्या नावात ‘युद्ध’ आहेच. युद्धाविषयी व त्या संकल्पनेविषयी त्याला आकर्षण दिसते!


Marie Forleo मरी फर्लियो ही सुरुवातीला “ रेस्टॅार्ंट, पब मध्ये ड्रिंक्स देणे, वेटर , जॅनिटर अशी कामे करत करत , नंतर व्यवसाय विद्येची पदवीधर झाली. तिने आपले on line बी- स्कूल सुरू केले. लघु उद्योग करू इच्छिणाऱ्या व लघु उद्योजक असलेल्यांनाही तिच्या बी- स्कूल मध्ये त्यासंबंधी मार्गदर्शन व शिक्षण दिले जाते. लघुउद्योग वाढवावा कसा ह्याचेही प्रशिक्षण तिच्या संस्थेत दिले जाते. १४८ देशातील ७०,००० लघु उद्योजक तिच्या बी- स्कूल मधून प्रशिक्षित होऊन उद्योग व्यवसायिक झाले आहेत.


मरी फर्लियो लेखिका आहेच त्या शिवाय ती हिप हॅाप नृत्यातही पारंगत आहे. MTV वर तिने बसविलेली बरीच नृत्ये सादर झाली आहेत. तिची स्वतःची मरी फर्लिओ इंटरनॅशनल कंपनीही आहे. १०० झपाट्याने उत्कर्ष होणाऱ्या कंपन्यांच्या यादीत तसेच आघाडीच्या पन्नास महिला उद्योजकांच्या कंपन्यातही तिच्या कंपन्यांचा समावेश आहे. हार्पर्स बझार मासिकाने तिचा “स्वतःच्या बळावर झालेली कोट्याधीश” असा उल्लेख केला आहे. फोर्ब्ज मासिकाने “ उद्योग-व्यावसायिकांसाठी असलेल्या सर्वोत्कृष्ठ १०० websites “मध्ये मरी फर्लियोच्या वेबसाईटची गणना केली आहे. आपण आताच ज्याच्या विषयी वाचले त्या स्टिव्ह प्रेसफिल्डचे “War of Art हे तिचे आवडते पुस्तक आहे . “ ती म्हणते, “हे पुस्तक वाचकाला आपल्या न्यूनगंडातून किंवा भयगंडातून बाहेर काढते. त्याच्यात आत्मविश्वास देणारे आणि वाढवणारे पुस्तक आहे.त्याच्या मनातली मरगळ दूर करणारे ते पुस्तक आहे.शिवाय पुस्तक कुठल्याही पानापासून वाचले तरी चालते.वाचकाला प्रत्येक पानातून उत्साहाची उभारी येते.”


कायल मेनर्ड जन्मापासून दोन्ही हातांनी आणि पायांनी अपंग आहे. हात कोपरापर्यंतही नव्हते. पायही अर्धेच होते. गुडघेही दिसू नयेत इतकेच. चौरंगी अपंग म्हणतात तसा तो आहे. तो कृत्रिम हात आणि पाय वापरत नाही. आहेत त्या हाता पायांनी तो सर्व व्यवहार, हालचाली करतो. इतकेच काय कुणाचीही मदत न घेता त्याने टॅन्झानियातील किलिमॅंन्जॅरो पर्वत आणि अर्जेन्टिनातील Aconcagua अकॅांनकाग्वा पर्वत तो चढून गेला आहे. ह्या ठिकाणी किलिमॅंन्जॅरो १९३४१ फूट तर अकॅांनकाग्वा हा २२८४१ फूट उंच आहे हे अवश्य लक्षात घ्यावे. खऱ्या अर्थाने कायल मेनर्ड स्वावलंबी आहे. तो म्हणतो ,” कुणाचीही मदत घ्यायची नाही हे मी आणि घरातल्या सगळ्यांनी पहिल्यापासून ठरवले होते .” त्याच्या आवडत्या पुस्तकाविषयी तो सांगतो ,” फ्रॅन्क ह्युबर्टचे Dune ; अल्बेर केम्यु Albert Camus चे The Stranger ( अल्बेर केम्यु किंवा जॅान पॅाल सार्ट्रा ह्यांची पुस्तके वाचणे आणि ती आवडणे हे विशेष वाचकांची ओळख मानली जाते- हे मेनर्ड म्हणत नाही😀.) ) आणि The Hero With a Thousand Faces हे जोसेफ कॅम्पबेलचे ही तीन पुस्तके माझ्या खास आवडीची आहेत.” Dunes च्या पुस्तकांची -बहुधा सहा- मालिकाच आहे. Dune,Dune Messiah, Children of Dune ,Heretics of Dune वगैरे. Dune चा सिनेमाही निघाला. पुस्तकांसारखा तोही गाजला. त्याने एक व्यायामशाळा काढली आहे. तिचे नाव वाचल्यावर खूष होऊन तुम्ही “ व्वा! व्वा!” म्हणाल. नाव आहे “ No Excuse” तुम्ही ‘वा वा’ का म्हणाला ते मलाही माहित आहे .


दोन्ही हातापायांनी अपंग असलेल्या कायल मेनर्ड कधीही कोणतीही सबब न सांगता तो स्वावलंबी राहिला!
गायक, गीतकार, गिटार वादक , नट आणि रेकॅार्डसचा निर्माता. अनेक प्रतिष्ठेची सन्मानाची पारितोषिके, पदके मिळवलेल्या आणि विविध रुपाने ख्यातनाम असलेल्या टिम मॅकग्राथ चे आवडते पुस्तक आहे -Jayber Crowe . वेन्डल बेरी लेखक आहे. “पुस्तक वाचल्यावर मनाला शांति लाभते. आपण शांत स्थिर होतो. पण त्याच बरोबर पुस्तक विचारही करायला लावते . जी श्रेष्ठ कलाकृती असते ती तुम्हाला अंतर्मुख करते. स्वतःचाही पुनर्विचार करायला लावते. आपण आपल्या विचारांचे,मग ते स्वतःविषयीचे, आपण प्राधान्य देत असलेल्या गोष्टींचे, आपल्या अवती भोवतीचे, आपलेच पुनर्मुल्यांकन करू लागलो तर ती श्रेष्ठ कलाकृती समजावी. असे करत नसू तर आपण एककल्ली, एकांगी बनत जाण्याची शक्यता असते; “ असे टिम मॅकग्रा ह्या पुस्तकाविषयी म्हणतो.


अमेरिकेतील आरंभीच्या काळातील अग्रेसर आंतरजाल कंपनी AOL चे संस्थापक स्टीव्ह केस ह्यांना आवडलेल्या पुस्तकाने तत्यांना ते कॅालेजमध्ये असल्यापासूनच भुरळ घातली होती. त्यावेळेपासूनच त्यांनी ह्याच क्षेत्रात उतरायचे ठरवले होते. ते म्हणतात,” ह्या पुस्तकाचा माझ्यावर एव्हढा प्रभाव होता की ह्या पुस्तकाचे नाव, मी काही वर्षानंतर लिहिलेल्या माझ्या पुस्तकासाठी वापरले !” त्यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाते नाव आहे “ The Third Wave” . ह्या पुस्तकाचे लेखक आहेत अल्व्हिन टॅाफलर. “ ह्या पुस्तकातील ( जग जवळ आणणाऱ्या) Global Electronic Village विषयी वाचल्यामुळे मला AOL सुरू करण्याचा विचार आला. निश्चय झाला.लोक एकमेकांशी Digital माध्यमातून संबंध ठेवतील, संपर्कात राहतील ह्याची मला जाणीव झाली.” “अल्व्हिन टॅाफलरने शेतकी , औद्योगिक , आणि तंत्रज्ञान ह्या तीन क्षेत्रात होणाऱ्या क्रांती विषयी लिहिले. तेच नाव वापरून मी नंतरच्या काळात येणाऱ्या तंत्रज्ञानात होणाऱ्या तीन मोठ्या बदलांविषयी, तिसऱ्या लाटेसंबंधी पुस्तक लिहिले आणि मी त्याचे Third Wave : An Entrepreneur’s Vision of Future असे बारसे केले.”


जेसी विल्यमस हा टीव्ही वरील अतिशय लोकप्रिय मालिका Grey’S Anatomy मध्ये डॅा. जॅकसन एव्हरीची भूमिका करणारा नट; आणि The Butler, The Cabin in The woods आणि आणखीही काही सिनेमातील नट म्हणूनही ख्यात आहे. तो सामाजिक कार्यकर्ताही आहे. विशेषतः त्याच्या २०१६ सालच्या कृष्णवर्णीय लोकांवर आणि विशेषतः तरुणांवर राजकीय,सामाजिक दृष्ट्या होणाऱ्या अन्याय तसेच पोलिसी अत्याचारांसंबंधीच्या भाषणामुळे तो जगापुढे आला. त्याची आवडत्या पुस्तकांची नावे सांगायची तर — Confederacy of Dunces हे जॅान केनेडी टूलचे , टोनि मॅारिसनचे Song of Solomon , Black Folk हे W.E.B. DuBois चे आणि वाचकांपैकी अनेकांना माहित असलेले क्लासिक गणले जाईल असे Ayan Rand चे Fountainhead , हे पुस्तक.


माईक मेपल्स हा भांडवल गुंतवणुक करणारी कंपनी Floodgate चा सहसंस्थापक आहे . फोर्बसच्या परिसस्पर्श कंपन्यांच्या यादीत सतत १२ वर्षे ही कंपनी मानाने टिकून आहे.


मेपल्सवर प्रभाव टाकणारी बहुतेक पुस्तके नेतृत्वगुणांची वाढ कशी करावी, त्यासाठी रोजचे आयुष्य एखाद्या उद्दीष्टपूर्ती साठी तर असावेच, स्वतःला जे योग्य वाटेल ते – मग ते स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी किंवा जी कंपनी चालवतो किंवा नोकरी करतो- ते ते काम उत्कृष्ठच झाले पाहिजे ह्या भावनेने करावे. चित्रकला, गायन शिल्पकला, जाहिरात तयार करणे कोणतेही असो ते अशा उंचीवर न्यावे की ते करतांना आपल्यालाही आकाशात झेप घेऊन विहरणाऱ्या पक्षासारखा आनंद व स्वातंत्र्य लाभावे. अशी झेप प्रत्येकालाच घ्यावी वाटते. का वाटू नये? अशा किंवा ह्यासम विचारांची पुस्तके त्याला आवडतात असे वाटते. Top Five Regrets of Dying – हे Brownie Ware चे तसेच प्रेरणादायी पुस्तकांचे भीष्म समजले जाणारे Jonathan Livingstone Seagull हे रिचर्ड ब्राख चे आजही मागणी असलेले पुस्तक. हार्वर्ड बिझिनेस स्कूल च्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना, लेखकाने स्वतः आयुष्य कसे व्यतित करावे ह्यावर विचार केला व ठरवले,त्या अनुभवावर आधारित भाषण दिले. त्याचे नंतर त्यानते पुस्तक झाले. तेच हे हार्वर्डचा प्राध्यापक Clayton Christensen चे पुस्तक How will You Measure Your Life .


पुस्तकांचा प्रभाव, परिणाम किती होतो ह्याचे मोजमाप करणे अवघड आहे. ह्या पुस्तकांत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शंभर सव्वाशे नामवंतांच्या लेखी मुलाखती आहेत. किती पुस्तके, किती नावे,किती लेखक आपल्या समोर येतील ! . त्यांना आवडलेली सर्व पुस्तके आपणा सगळ्यांना आवडतील असे मुळीच नाही. आपले ते आवडीचे विषयही नसतील. त्यातील विषयांशी बऱ्याच वाचकांचा संबंधही येत नसेल. तरीही निदान ही मोठी माणसे काय वाचतात; काही नाही तरी पुस्तकांची व लेखकांची थोडी माहिती होईल. काही पुस्तकांची नावे समोर आल्यावर ,” अरे! ही पुस्तके मी सुद्धा वाचली आहे!” त्या क्षणापुरते तरी आपण नामवंतांच्या पंक्तीत जातो. ह्याचेही एक वेगळेच समाधान असते.


नंतर, माझ्या हातून लिहिले गेलेच, तर टिमोथी फेरिसने प्रसिद्ध व्यक्तींना विचारलेल्या इतर काही प्रश्नांना त्यांचा प्रतिसाद पाहू या.

इच्छाकांक्षाची बदलती क्षितिजे

मॅरिएटा

Laughter is timeless Imagination is ageless Dreams are forever. -Walt Disney


माझ्या इच्छांची सुरुवात केव्हा व कशापासून झाली ते सांगता येणार नाही. पण…..


आमच्या शाळेत इतर सर्व शाळेप्रमाणे काही चांगले व काही मारकुटे मास्तर होते. दोन्ही प्रकारचे मास्तर पाहून – खरं सांगायचं तर मारकुटे मास्तर पाहून– ‘मी मास्तर होणार असे ठरवले. सडपातळ असूनही मास्तर म्हटले की मुलांना बदडता येते. छडी नसली तर फुटपट्टीने मारताही येते हे लक्षात आल्यामुळे मास्तर होण्य्याच्या इच्छेला महत्वाकांक्षेचे रूप येऊ लागले. बहुधा इथपासूनच माझ्या इच्छाकांक्षेची थैली भरायला सुरुवात झाली असावी.


पण हे काही महिने टिकले असेल. कारण ….


आमच्या घराससमोरच पोलिस लाईन होती. त्यामुळे दिवसातून बरेच वेळा पोलिसांची ये जा चालूच असे. त्यांचा खळीचा खाकी ड्रेस, बिल्ल्याचे बकल पासून , पॅालिशने कमरेचा पट्टा, डोक्यावरची निळी व तिच्या बाजूने गेलेली पिवळ्या पट्टीची लकेर , साखळीला अडकवलेली पितळी शिट्टी आणि पायातल्या जाड जूड चपल किंवा बुटापर्यंत सर्व काही चकाचक इतमाम पाहून मलाच काय आमच्या वर्गातल्या सर्वच मुलांची पोलिस व्हावे ती इच्छाकांक्षा होती. ह्यातली मोठी गंमत अशी की चोर-शिपायाचा खेळ खेळताना मात्र मी आणि सर्व मुलं चोर होण्यासाठी धडपडत असू !


घरी कोणी बाहेरचे आले व मुलांशी काय बोलायचे असा नेहमीच प्रश्न पडलेल्या पाहुण्यांनी, “ बाळ ! – बहुतेक सर्व पाहुणे लहान मुलांना ह्या एकाच नावाने ओळखत – तू मोठा झाल्यावर कोण होणार “ असे विचारल्यावर, मी अटेंन्शन पवित्र्यात छाती पुढे काढून उभा राहात असे. पाहुण्यांकडे न पाहता सरळ भिंतीकडे पाहात “ मी पोलिस होणार” असे मोठ्या आवाजात उत्तर देत असे.


मागे एकदा आलेल्या ह्याच पाहुण्यांना “ मी मास्तर होणार” असे सांगितले असणार. पाहुण्यांची स्मरणशक्ती चांगली असावी . “ मी पोलिस होणार “ हे ऐकून त्यांनी हसत विचारले,” बाळ तू तर मागच्या खेपेला मास्तर होणार म्हणाला होतास. त्याचे काय झाले? ” मी म्हणालो, “आता उन्हाळ्याची भरपूर सुट्टी आहे. .” हे ऐकून पाहुणे मोठ्याने हसले. पण गोष्टींतील पाहुण्यांप्रमाणे त्यांनी बक्षिस दिले नाही.


पोलिस व्हायचे तर सराव म्हणून, येणाऱ्या जाणाऱ्या पोलिसांना मी पवित्र्यात उभा राहून ,” पोलिस सलाम” म्हणत सलाम ठोकत असे. गंमत बघा, ‘मोठेपणी पोलिस होणार’ म्हणणारा मी आणि माझ्याबरोबरीची मुले, चोर-शिपाई खेळताना मात्रअगदी खटपट करून चोर होत असू!


पोलिसही काही महिनेच इच्छाकांक्षेच्या “चौकीच्या खजिन्यात” होते. कारणही तसेच घडले. सुट्टीत आलेल्या मावशीला व भावाबहिणीला पोचवायला स्टेशनवर गेलो होतो. गाडी यायला अजून थोडा अवकाश होता. फलाटावरची निरनिराळ्या लोकांची गडबड पाहात मी व भाऊ फिरत होतो. किती प्रवासी! त्यांना सोडायला आलेले, चहाच्या स्टॅाल पाशी असलेले. प्रत्येक खांबा वरची जाहिरात वाचून पाहात फिरत होतो. हे पाहणे संपेपर्यंत गाडी येण्याची घंटा झाली. धडधड करत येणारी गाडी इंजिनाच्या दिव्यामुळे दिसत नसे. पण वेग कमी करत फलाटात शिरु लागली; इंजिनाच्या दरवाजात दांडीला धरून पिकॅप घातलेला ड्रायव्हर दिसला की त्याची ऐट अधिकार पाहून ठरवले की आपण इंजिन ड्रायव्हरच व्हायचे. त्याने इंजिनाची शिट्टी वाजवली की फलाटावर रेंगाळणारे सगळे प्रवासी डब्यात जाऊन बसतात हे पाहिल्यावर त्याच्या अधिकाराची व मोठेपणाची खात्रीच पटायची. आगगाडीचा इंजिन ड्रायव्हरच व्हायचे. नक्की झाले.


इच्छाआकांक्षेचे इंजिन चालूच होते. ते दिवस दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीच्या वर्षादोन वर्षांचे असतील. आमच्या पाच नंबर शाळे समोरच्या.रस्त्यावरून मिलिटरीचे रणगाडे मोटारी जात. ते पाहात बराच वेळ ऊभे राहात असू. मोटारीच्या मागच्या बाजूला उभे असलेले किंवा रणगाड्याच्या टपातून बाहेर पाहणारा लालबुंद टॅामी आणि आपले सैनिक दिसले की ओळीत उभे असलेले सगळी पोरं त्यांना कडक सलाम ठोकत असू. लालगोरा टॅामी आमच्याकडे हसत पाहून हात हलवत. ते पाहून आम्हा सर्वांची मान ताठ होत असे. मास्तर, पोलिस, इंजिन ड्रायव्हर मागे पडले. ठरले ! मी सैनिक होणार. युद्धात लढणार. रणगाड्याच्या टपातून शत्रूवर पाळत ठेवून, धडाऽऽडधूम्मऽ तोफा उडवणार. बंदुक घेऊन पुढे सरकतो आहे हीच स्वप्ने पडू लागली. चला ! चला, थैलीत नवी भर पडली. ……


गावात सर्कस आली. शाळकरी मुलांत उत्साह आला. सर्कसचा अवाढव्य तंबू बांधायला सुरुवात झाली. त्या दिवसापासून सर्कशीच्या मैदानावर आम्ही दोस्त मंडळी रोज मैदानात जात असू. (अवाढव्य तंबू, त्याचे तितकेच जाड दोर. ते ताणत चारी दिशेने कामगार मोठ्याने होईऽऽ य्या खैचो हुईंऽऽय्या खैंचो ओरडून जोश भरत मागे मागे जाऊ लागले. त्याच बरोबर मधले दोन मोठे खांब बरेच कामगार एकाच वेळी वरती नेत उभे करू लागले. जसे जसे दोर ओढले जात आणि ते दोन खांब सरळ ताठ होत गेले तेव्हा तंबूचे जाड जूड कापड फुगत फुगत आकाशभर पसरले) सर्कशीचा शिकारखाना पाहायला फार थोडे पैसे पडत. त्यामुळे सकाळी बरीच मुले वाघ सिंह, उत्तम घोडे, प्रचंड हत्ती पाहायला जात. सर्कशीतील खेळाडूंच्या वेगवेळ्या कसरती पाहताना , जोकरच्या गंमती पाहून हसताना,सर्कसचा खेळ संपू नये असे वाटायचे. सर्कसच्या बॅन्डमुळे तर ह्या आनंदाला आणखी बहर येई!


सर्कसचा बॅन्ड सुरु झाला. दोरीच्या शिडीवरून सरसर चढत कसरतपटू सर्कसच्या छता पासून लोंबते झोके पाच सहा वेळा हलवत. मग एका क्षणी ते पकडून त्यावरून झोके घेत घेत दोन्ही बाजूचे कसरतपटू मध्यभागी जवळ येत. त्याच क्षणी ‘हाय हुपला’म्हणत टाळी वाजवून आपला झोका सोडून दुसऱ्याचा पकडत. आणि नेमक्या त्याच क्षणी बॅन्डची मोठी झांज दणक्यात वादायची. ह्यावेळी प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके थांबत. आमची छाती धडधडत असे. तरीही बॅन्डच्या ठोक्या क्षणी तंबूत टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. कसरतपटू आपला खेळ झाल्यावर खालच्या जाळ्यांत उलट्या सुलट्या कोलांट्या घेत रडत. क्षणार्धात मांजराीसारखे पायावर उभे राहत. पन्हा टाळ्या!


जोकरही हसवून सोडत. त्यांना कसे विसरू? आम्ही किती वेळ श्वास रोखून सर्कस पाहात होतो. तुमच्या लक्षात आले असेलच की मोठा झाल्यावर मी कोण होणार ते!


सिनेमाच्या पडद्यावरची गंमत पाहात असतानाच पाठीमागून येणाऱ्या प्रकाश झोताकडेही लक्ष जायचेच. प्रकाशाचे झोत पडद्यावरील माणसांना हातवारे करायला लावतात.पळायला लावते , गाणे म्हणायला लावतात.नाचायला, हसायला लावतात. प्रकाश झोत खाली वर एका बाजूला, दोन्ही बाजूला हलत उडत असताना सिनेमा दिसत असे. कोण हे करत असेल? हा प्रश्न पडायचा. मध्यंतरात उभा राहून पाठीमागे असलेल्या त्या चार सहा अगदी लहान जादुई चौकोन खिडक्यांकडे पाहात असे. ह्यातील रहस्य शोधलेच पाहिजे.


एके दिवशी तो रहस्यभेद झाला. त्या दिवसांत सिनेमा चालू असताना थिएटरची फाटके बंद करत नसत. एकदा सहज पुढच्या सिनेमाची पोस्टर्स फोटो पहायला चित्रा टॅाकीजमध्ये गेलो होतो. आणि ती रहस्यमय खोली दिसली !
दोन मोठी मशिन्स होती. मशीनच्या पाठीच्या उंचवट्यांवर फिल्म गुंडाळलेले मोठे रीळ होते. एक माणूस कधी दुसऱ्या खिडकीतून पडद्याकडे पाही. मशिनच्या काही खटक्यांची, बटनांची हालचाल करे. दोन पायऱ्या खाली उतरून एका टेबलावर एक रिकामे मोठे रीळ व दुसरे भरलेले रीळ होते. तो एक बटण दाबून ती रिळे चालू करी. भरलेले रिळ दुसरे रिकामे रीळ भरून टाके. पटकन ते रिळ घेऊन एका मऱ्शिनच्या रिकाम्या उंचवट्यावर खटकन बसवे. मग दुसऱ्या मशिनच्या लहान खिडकीतून सिनेमा पाहात आरामात बसे.


अरे! पडद्यावरील माणसांना खेळवणारा हा जादुगार ! इतका मोठा महत्वाचा माणूस किती साधा! त्याला ॲापरेटर म्हणतात हे वरच्या वर्गातील मुलांनी सांगून माझ्या ज्ञानात भर घातली. केव्हढी मोठी जबाबदारी तो पेलत होता ! उगीच नाही त्याला रोज सिनेमा पाहायला मिळत! तेही फुकटात. मला त्याचा का हेवा वाटू नये? त्या क्षणी माझ्या आकांक्षेतील मागील पानावरच्या सर्व इच्छा पुसल्या गेल्या. दुसरे काही ठरवण्यासारखे, होण्यासारखे नव्हतेच. माझ्या आकांक्षे पुढे गगनही ठेंगणे झाले होते. मोठा झाल्यावर सिनेमाचा ॲापरेटर मी होणार ! मी नसलो तर लोकांना सिनेमा कसा दिसणार?


माझ्या माझ्या इच्छकांक्षेच्या थैलीत सिनेमाचा ॲापरेटर जाऊन बसला!


जादू कोणत्या लहान मुलाला आवडत नाही? शाळेत जादूचे प्रयोग झाले. प्रत्येक जादू आश्चर्याने तोंडात बोट घालूनच पाहात होतो. मग काय जादूशिवाय दुसरे काही सुचेना. नंतर कुणी वडीलधाऱ्या माणसाने सांगितले की जादू म्हणजे ‘हात की सफाई’ , हातचलाखी असते. कोणत्याही चलाखीशी माझा कधी संबंध आला नव्हता त्यामुळे आणि त्यासाठी रोज सराव करावा लागतो हे समजल्यावर, जादुगाराचे स्वप्न माझ्या थैलीतून कधी खाली पडले ते समजलेही नाही.

सर्वजण लहानपणापासून क्रिकेट खेळतात. मी व माझ्या बरोबरीची मुले जे काही हाताला बॅट सारखे मिळेल आणि चेंडूसारखे दिसेल त्यानिशी क्रिकेट खेळत असू. आमचे क्रिकेट गल्ली बोळात, किंवा कुणाच्या घराच्या अंणात चाले. जेव्हा पार्कवर मोठ्या संघांचे सामने पाहायला जात असे तेव्हा पांढरे शुभ्र सदरे आणि विजारी , कुणाच्या टीमची तांबडी,निळी,किंवा हिरव्या रंगाची काऊंटी कॅप पाहिल्यावर आणि फलंदाज जेव्हा पायाला पॅडस् बांधून,हातातले ग्लोव्हज् घालत, चहूबाजूला पाहात रुबाबात येई तेव्हा; आणि जर पहिल्याच बॅालला बॅाऊन्ड्री मारली किंवा त्याची दांडी उडाली तर दोन्ही वेळा टाळ्या वाजवतानाच मोठेपणी काय व्हायचे ते निश्चित झाले.


उत्तम क्रिकेटपटूच व्हायचे. मग आपण पार्क मैदानावरील मध्यवर्ती पिचच्या मॅटवर बॅटिंग करू, किंवा गोलंदाजीही करत हॅटट्रिकही करू अशी स्वप्ने पाहायला लागलो. तशी [शेखमहंमदी] स्वप्नेही पडू लागली.प्रत्येक मॅचमध्ये माझे शतक झळकू लागले. विकेटसही घेऊ लागलो. आकांक्षा रंगीत होण्यासाठी स्वप्नाइतकी दुसरी अदभूत दुनिया नाही !
इच्छाकांक्षेच्या थैलीत मी पहिल्या दर्जाचा क्रिकेटर होऊनही गेलो.


हायस्कूलच्या टीममध्ये मला घेतले नाही. निवड करणारे सर चांगले होते. त्यांनी तीन चार वेळा संधी दिली. एकाही संधीचे मी सोने करू शकलो नाही. सोन्याचे लोखंड करणारा परिस ठरलो मी.


कॅालेजमध्ये मात्र तिसऱ्या चौथ्या वर्षी क्रिकेट टीममध्ये मी होतो. आंतरमहाविद्यालयीन सामन्यातील पहिले तीन चार सामने संघातून रीतसर खेळाडू ह्या दर्जाने खेळलो. पण हे सोडल्यास नंतरच्या सामन्यात नेहमी राखीव खेळाडूची सन्माननीय लोकलमधली चौथी सीटच मिळायची !


काही असो, कॅालेजच्या टीममध्ये होतो, त्यामुळे पार्क मैदानातील मुख्य खेळपट्टीवर खेळायला मिळाले.लहानपणी पार्कवर होणारे सामने पाहूनच क्रिकेटर होण्याची तीव्र इच्छा कॅालेजमध्ये पुरी झाली.


हायस्कूलच्या अखेरच्या दोन वर्षांपासून आणि त्यानंतर पुढेही किती तरी वर्षे सिनेमातला हिरो होण्याचे मनांत होते. हिरो होण्याचे स्वप्न, किंचित का होईना,नंतर काही वर्षांनी पुरे झाले असे म्हणता येईल.


प्रथा-परंपरेतील ‘कॅालेज संपल्यावर नोकरी ‘ हे सरळ साधे वाक्य नियम – सायन्समध्ये ज्याला लॅा म्हणतात- आहे. तो नियम माझ्याकडून पाळला गेला.

नोकरीच्या गावातील जिमखान्याच्या दोन तीन नाटकात नायकाची भूमिका मिळाली. पण गंमत अशी की नाटके नायिका प्रधान होती. त्यामुळे खमंग,तिखट, चिमटे काढणारे उपहासात्मक, टाळ्या घेणारे संवाद तिच्या वाट्याला. आणि मी सतत बचावात्मक बोलणारा ! नायक!


संवाद किंवा रंगमंचावर नाट्यपूर्ण प्रवेश -(एन्ट्री)- नसली तरी आता हिरो म्हटल्यावर नायिकेच्या जवळ जाणे, तितक्याच जवळकीने तिच्याशी बोलणे ह्याला वाव नाटककाराने दिला होता. पण त्या वेळी सरकारी वटहुकुम नसतानाही दिग्दर्शकाने आम्हा दोघांना ‘सोशल डिस्टन्स’ पाळायला लावले होते! हिरोसाठी किंवा नायिकेसाठी असलेले कोणतेही सवलतीचे हक्क नव्हते ! त्यामुळे माझ्यासाठी ती नाटके म्हणजे पोथीचे पारायण झाले!
काही का असेना नंतर दोन एकांकिका केल्या. त्यातही नायक होतो. एकांकिका विनोदी होत्या. त्यात बऱ्यापैकी चमकलो. पण त्यामध्ये नायिका नव्हती!


रंगमंचावर आलो. वावरलो. पडदा पडल्यावर का होईना टाळ्या मिळाल्या. तोही प्रथेचा भाग होता हे उशीरा लक्षात येत असे. . इतके असूनही नाटकात काम करण्याचा, प्रेक्षक आपल्याकडे पाहताहेत, बाहेर ओळख देतात ह्याचा आनंद लुटला.
लहानपणी, शाळा कॅालेजात असताना, नंतर नोकरी, व्यवसायाच्या काळातही अशा इच्छा आकांक्षा सर्वांच्या असतात. त्यातील अनेकांच्या काही इच्छा आकांक्षा पूर्णही होत असतील.


वयानुसार बदलत जाणारी ही स्वप्ने गोष्टीतील शेखमहंमदच्या हवेतील मनोऱ्यांप्रमाणे असतात. वयाचा तो तो काळ सोनेरी करत असतात. अलिबाबा सारखे, त्या प्रचंड गुहेपाशी जाऊन ‘तिळा दार उघड’ म्हटल्यावर प्रचंड आवाज करीत उघडणारी ती शिळा, गुहा, त्यातला खजिना वगैरे रोमांचक, रंजक गोष्ट ऐकल्यावर किंवा कथेवरचे सिनेमे पाहिल्यावर कोणाला अलिबाबा व्हावेसे वाटणार नाही?


मला आणि दोस्तांना मारुती व्हावेसे वाटे. राम किंवा लव-कुशा सारखी बाणांतून अग्नी अस्त्र, त्याला उत्तर म्हणून पाण्याचा वर्षाव करणारे वरुणास्त्र तर त्यालाही प्रत्युत्तर वायु अस्त्र सोडावे अशी इच्छा आकांक्षाच नव्हे तर ती झाडाच्या फांदीचे किंवा बांबूच्या कांडीचे धनुष्य व खराट्याच्या काडीचे बाण करून खेळत प्रत्यक्षात आणत असू. फरक इतकाच की फक्त अस्त्रांची नावे मोठ्याने म्हणत आवेशाने बाण सोडत असू. आजही मुलांना सुपरमॅन स्पायडरमॅन व्हावे असे वाटत असणारच.


स्टंटपट पाहताना त्यातील धडाकेबाज ‘ काम करनार’ जॅान कॅावस व्हावे असे वाटायचे. त्यानंतर राजकपूर देव आनंद दिलीप कुमार आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सौदर्यवतींना पाहून हिरो व्हावे असे वाटणे ओघानेच आले. ‘गन्स ॲाफ नव्हरोन’, ग्रेट इस्केप, ‘पॅटन’ असे इंग्रजी सिनेमा पाहून वैमानिक, शूर योद्धा व्हावे असे का वाटणार नाही. प्रत्येकात अशा प्रकट म्हणा, सुप्त म्हणा इच्छाकांक्षेची स्वप्ने असतातच….. …. एका उत्तम कवींची इच्छाकांक्षा म्हणते ‘वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे ‘ ! तर कविश्रेष्ठांच्या प्रतिभेतील, रामाला पाहण्यासाठी आतुर झालेली सीताही आपली इच्छाकांक्षा, “ मनोरथा चल त्या नगरीला। भूलोकीच्या अमरावतीला“ ह्या ओळीतून व्यक्त करते! मग लहानपणी सर्वांनाच मोठेपणी आपण कोणी ना कोणी व्हावे असे वाटते ह्यात काहीच आश्चर्य नाही ….. …… त्याशिवाय का जेम्स थर्बर ह्या प्रख्यात लेखकाचा ‘वॅाल्टर मिट्टी’ वाचला किंवा त्याच कथेचा झालेला सिनेमा (प्र.भूमिकेत डॅनी के) पाहिल्यावर; त्याचा ‘ सब कुछ पु. ल. देशपांडे’ अशी सार्थ जाहिरात केलेला, पुलंनी केलेल्या अस्सल मराठी रुपांतरातील ‘गुळाचा गणपती’ (त्यातील मुख्य भूमिका नारबा-पुल.) पाहिल्यावर, स्वप्नाळू डॅा.वॅाल्टर मिटी किंवा पुलंचा नारबा ही सर्व थोर माणसेही आपल्याच कुळातली आहेत हे समजले तेव्हा किती आनंद होतो! आपणही त्यांच्या इतके मोठे होतो !


पन्नाशी आणि त्यापुढील वाटचालीत, बदलत्या काळामुळे, करीत असलेल्या व्यवसायात, लहान मोठ्या व्यापारात टिकून राहणे, नोकरीत बढती मिळवणे, किंवा आतापर्यंत करीत असलेले काम सोडून निराळेच काही करण्याचा प्रसंग आला तर त्यासाठी करावा लागणारा खटाटोप महत्वाकांक्षेचे रूप घेतो. नवे ज्ञान, नवे तंत्र, नवे मंत्र, नवा कॅम्प्युटर आत्मसात करण्यासाठी ‘हा सर्टिफिकेटचा’, ‘त्या डिप्लोमाचा’ अभ्यास करणे; त्यासाठी क्लासेस लावणे; पास झालेच पाहिजे ही सुद्धा हळू हळू महत्वाकांक्षा होत जाते. आजचा कॅाम्प्युटर शिक्षित होण्याची महत्वाकांक्षा धरून आपली योग्यता आणि आवश्यकता वाढवू लागतो. दृढनिश्चयाला तीव्र इच्छेची जोड देऊन त्याला ध्येय गाठल्याचे समाधान मिळते. काळानुरुप बदलले पाहिजे हे समजल्यावर स्पर्धेत टिकून राहण्यापासून ते अव्वल नंबर गाठण्या पर्यंत महत्वकांक्षेची दालने विस्तारत जातात.


मोठे झाल्यावर आपल्याला “ मी हा होणार,तो होणार, ते करणार” ह्या लहानपणाच्या इच्छा फुलपाखरी स्वप्ने वाटू लागतात. जगाच्या व्यावहारिक स्पर्धेत टिकून राहणे किंवा असलेल्या स्थानावर पाय रोवून उभे राहणेहीच एक महत्वाकांक्षा बनते. येव्हढ्यासाठीच लुई कॅरोल म्हणतो : Remember we have to run fast to stay where we are. असे जरी असले तरीही बालपणीची, तारुण्यातली स्वप्ने ही महत्वाकांक्षेची बाळरुपेच असतात. इच्छाकांक्षा बदलत गेल्या तरी कित्येकांची स्वप्ने, त्यांनी त्यात रस घेऊन ‘आवडीचे काम’ ह्या भावनेने केलेल्या सतत प्रयत्नांमुळे ती प्रत्यक्षांत येतात !


केवळ बहिणीचे बूट आपल्या हातून हरवले ह्याची फक्त खंत न बाळगता निरनिराळे मार्ग शोधत, काही झाले तरी बहिणीला मी बूट देणारच ह्या तीव्र इच्छेपोटी, तो शाळकरी भाऊ किती धडपतो ह्याचे उत्तम चित्रण Children of Heaven ह्या अप्रतिम इराणी चित्रपटात रंगवले आहे. ते पाहण्यासारखेआहे.


आंतर शालेय स्पर्धेत भाऊ धावण्याच्या शर्यतीत भाग घेतो. कारण? तिसऱ्या नंबर येणाऱ्याला बुटाचा जोड बक्षिस मिळणार असतो. भाऊ तिसरा नंबरच मिळवायचा ह्या जिद्दीने शर्यतीत पळतो. विजयी क्रमांकाची नावे जाहीर होतात. तिसऱ्या क्रमांकावर दुसराच आलेला असतो. निकाल जाहीर झाल्यावर त्याची शाळा मैदान डोक्यावर घेते. भाऊ पहिल्या क्रमांकाने विजयी झाला असतो. पण भाऊ खिन्न, निराश होऊन घरी येतो. बहिण वाट पाहात असते. पण ऱ्भावाचा चेहरा पाहिल्यावर तीही काही बोलत नाही.


पहिला क्रमांक पटकावूनही बहिणीला बूट देऊ शकलो नाही हीच खंत. भावाने उच्च यश मिळवूनही त्याला इच्छा पूर्तीचा आनंद नाही! पण नंतर दोघानांही बूट मिळतात हे पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होतो. इच्छाकांक्षेची झालेली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते भाऊ बहिण किती कष्ट सोसतात ते पाहिल्यावर आपणही मनात त्यांना यश मिळो हीच प्रार्थना करत राहतो.


इच्छाकांक्षा माणसाला काय असावे, काय व्हावे,हे सांगत असतात. आणि तो त्यात स्वत:ला पाहू लागतो. त्याला आपण जो व्हावे असे वाटत असते तसे आपण झालोच आहोत ह्या कल्पनेत तो वावरत असतो. महत्वाकांक्षा, ती पूर्ण होण्यासाठी माणसाला सर्व ते प्रयत्न करण्याची उर्मी उर्जा व प्रेरणा देत असते. एक प्रकारे ते त्याचे ध्येय होते. ते गाठण्यासाठी ध्यास घेऊन ते गाठतोच. सुरुवातीला स्वप्न असले तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो.

आतापर्यंतच्या वाटचालीत, रोज बदलणाऱ्या आणि न गवसणाऱ्या इच्छा आकाक्षांची क्षितीजे लांबून का असेना पण मी सुद्धा पाहिली. ह्यापेक्षा दुसरे मोठे समाधान ते काय?


नाही क्षितिज गवसले पण वाटचाल कशी सोनेरी स्वप्नांची झाली.


मुक्कामाला पोचण्याच्या आनंदापेक्षा, झालेला प्रवास हा नेहमीच रोमांचक असतो !

जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे

स्वातंत्र्यवीर सावरकर हे कवि लेखक साहित्यिक होते. विज्ञानवादी होते. उत्कृष्ट वक्ते होते.मात्र लोकांच्या मनांत ते जाज्वल्य देशभक्त रुपानेच विराजमान आहेत. मराठी वाचकांना सावरकरांची ‘ ने मजसी ने परत मातृभुमीला। सागरा प्राण तळमळला” ही कविता माहित आहे. ह्याचे कारण ती शाळेच्या क्रमिक पुस्तकातही होती. त्यांची


जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे


ही देशाला स्वातंत्र्य मिळावे ह्या तळमळीतून स्वतंत्रतेलाच दैवी रूप देऊन तिची स्तुति गाणारी कविता आहे. बहुधा १९५९-६० साली ही कविता आकाशवाणीचे संगीतकार मधुकर गोळवलकर ह्यांनी ‘महिन्याचे गीत’ ह्या कार्यक्रमातून सादर केली. तेव्हापासून वीर सावरकरांची ही कविता प्रकाशात आली. त्यामुळे ती हजारो लोकांपर्यंत पोचली.अलिकडच्या शालेय पुस्तकात ही कविता घेतली आहे.


कवितेची सुरुवात ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे।। ह्या संस्कृत श्लोकाने होते. सावरकरांनी बाजी प्रभु देशपांडे ह्या पराक्रमी वीराच्या पोवाड्याची सुरुवातही ह्याच श्लोकाने केली आहे.


स्वातंत्र्य, स्वतंत्रता ह्या अमूर्त संकल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिले. आपला देश परकीयांच्या ताब्यात आहे. परके लोक आपल्यावर राज्य करतात. त्यांच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी; स्वातंत्र्यासाठी चाललेल्या लढ्यात यश मिळावे ह्यासाठी स्वतंत्रतेलाच देवी मानून कवि तिची स्तुति करतो. स्वराज्यदेवतेचे हे स्तोत्र देशभक्त कवि गात आहे.


प्रारंभीच्या श्लोकात स्वातंत्र्यदेवीचे वर्णन करताना, कवि म्हणतो,” हे महान मंगलकारी,पवित्र, आणि सर्वांचे कल्याण करणाऱ्या आणि आम्हाला यश मिळवून देणाऱ्या स्वतंत्रते भगवतिदेवी तुझा जयजयकार असो. स्वातंत्र्याची देवी भगवति, तू राष्ट्राचे मुर्तिमंत चैतन्य आहेस.तेच स्वातंत्र्य्याचे चैतन्य आमच्यातही सळसळते राहो. सर्व सदगुण आणि नीतिमत्ता तुझ्यात एकवटली असल्यामुळे तू त्यांची सम्राज्ञी आहेस. पारतंत्र्याच्या काळोख्या अंधाऱ्या रा्त्री आकाशात तू तेजस्वी ताऱ्याप्रमाणे लखलखत आहेस.


अथवा (भगवति ! स्वातंत्र्याचा तेजस्वी तारा पारतंत्र्याचा काळोख दूर करो. किंवा तुझा लखलखता तारा चमकू लागला की देशावर पसरलेला गुलामीचा अंधार नाहीसा होईल.)


पुढे नाजुक शब्दांचा सुंदर खेळ करीत कवि स्वातंत्रयदेवीचा गौरव करताना म्हणतो, फुलांचे सौदर्य आणि कोमलता तूच आहेसआणि सूर्याचे तेज आणि समुद्राची गंभीरताही तूच आहेस. त्या पुढच्या ‘अन्यथा ग्रहण नष्ट तेचि’ ह्या शब्दांतून ते स्वातंत्र्याचे सामर्थ्य व महत्व स्पष्ट करताना म्हणतात तू नसताीस तर (पारतंत्र्याच्या) ग्रहणाने ते सौदर्य, तेज आणि सखोल गंभीरता सर्व फिके पडले असते.


विद्वान योगी मुनी ज्याला मुक्ति मोक्ष श्रेष्ठ परब्रम्ह म्हणतात तीही, हे स्वतंत्रते, तुझीच रूपे आहेत. जे काही सर्वश्रेष्ठ, उदार थोर आणि सर्वोच्च आहे ते सर्व तुझे साथी सोबती आहेत. (तेही नेहमी तुझ्या बरोबरच असतात.)


शत्रंचा संहार करताना, त्याच्या रक्ताने रंगलेल्या चेहऱ्याने अधिकच सुशोभित दिसणाऱ्या स्वातंत्र्यदेवते, सर्व चांगले सज्जन लोक तुझीच पूजा करतात; तुझ्यासाठी लढता लढता आलेले मरण हेच खरे जगणे; जन्माला आल्याचे ते सार्थक आहे. हे स्वतंत्रते तू नसलीस ( देश स्वतंत्र नसला तर) तर ते कसले जिणे? ते मरणाहून मरणे होय ! स्वातंत्र्य हेच जीवन, पारतंत्र्य हेच मरण! निर्माण झालेले सर्व काही, सकल प्राणीमात्र तुलाच शरण येते. ह्या भावनेतूनच कवि तळमळीने विचारतो,”तू आमच्या देशाला कधी जवळ करशील? आम्हा देशवासीयांना हे स्वतंत्रते, ममतेने कधी हृदयाशी धरशील? “
पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकलेल्या हिमालयाच्या मोहातून शंकरही सुटला नाही. हिमालयाला त्याने आपले घरच मानले. मग तू इथे का रमत नाहीस? अप्सराही इथल्याच गंगेच्या, चंद्रप्रकाशा सारख्या रुपेरी पाण्याच्या आरशात पाहून स्वत:ला नीट नेटके करतात.मग स्वातंत्र्यदेवी तुला आमच्या देशात का करमत नाही? आमच्या देशाचा तू का त्याग केलास? पाहिजे असेल तर तुझ्या वेणीत घालायला तुला इथे रोज ‘कोहिनूर’ चे ताजे फुलही आहे. ह्या सुवर्णभूमीत तुला कशाचीही कमतरता पडणार नाही.


आमची भारतमाता सर्व समृद्धीने भरली असता,तू तिला का दूर लोटलेस? कुठे गेली तुझी पुर्वीची माया ममता ? तू तिला परक्यांची दासी केलेस. माझा जीव तळमळतो आहे. यशाने युक्त असलेल्या स्वातंत्र्यदेवते! तुला वंदन करून मी हेच विचारतो की तू आमचा त्याग का केलास? आमच्या देशाला तुझ्यापासून का दूर लोटलेस? हे स्वतंत्रते! ह्याचे उत्तर दे.

वाचनालय विद्यापीठाचा पीएचडी

दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. युरोपमध्ये कित्येक इमारतींतून कोंदलेल्या धुराचे लोटअद्यापही बाहेर येत होते. शहरे उध्वस्त झाली होती. ग्रंथालयांच्या इमारतीसुद्धा अपवाद नव्हत्या. त्यांचीही पडधड झाली होती. आगी आतल्या आत धुमसत होत्या. जळालेल्या पुस्तकांची राख पसरली होती. ह्याच सुमारास …..


…..ह्याच सुमारास लॅास एन्जलिस मध्ये रे ब्रॅडबरीच्या डोक्यात एक पुस्तक घोळत होते. त्याचे नावही त्याने ठरवले होते. The Fireman. हा फायरमन आग विझवणारा नाही. ज्याला आगवाला आपण म्हणतो तसा Fireman. आगगाडीच्या इंजिनमध्ये कोळसे टाकणारा, किंवा कारखान्यात भट्टी पेटती ठेवणारा तशा प्रकारचा. . .. एका अर्थी आगलाव्याच !


रे ब्रॅडबरी लॅास एन्जलिस मध्ये वाढला होता. १९३८ मध्ये तो बारावी पास झाला. काळ फार मोठ्या मंदीचा होता. त्यामुळे व घरच्या परिस्थितीमुळे कॅालेजमध्ये जाणे त्याला शक्यच नव्हते. त्याला वाचनाची आवड होती. तो चांगल्या गोष्टीही लिहायचा. विशेषत: विज्ञान कथा. त्याही विज्ञानातील अदभुत गूढरम्य कथा. त्याच्या गोष्टी Amazing Stories, Imagination, Super Science Stories ह्या सारख्या मासिकांत प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या.


ह्यामागे त्याची प्रतिभा आणि वाचनाची आवड व ती भागवणारी लायब्ररी ह्यांचाही मोठा सहभाग होता. कॅालेजमध्ये जाणे शक्य नाही ही खात्री असल्यामुळे तो लायब्ररीत जाऊ लागला. त्याचे सर्वात आवडते ग्रंथालय म्हणजे ‘ लॅास एन्जलिस पब्लिक सेन्ट्रल लायब्ररी’. सतत तेरा वर्षे ह्या ग्रंथालयात जात होता. प्रत्येक विभागात त्याचा संचार होता. त्या प्रत्येक विभागातली सर्व पुस्तके वाचून काढली. त्या लायब्ररीचा एकूण एक काना कोपरा त्याला माहित होता. रे ब्रॅडबरी म्हणतो की,” ह्या लायब्ररीतल्या प्रत्येक खोलीत मी बसलो. प्रत्येक खोलीतली सर्व पुस्तके मी वाचली.” त्याने काय वाचले नाही? जगातल्या सर्व कविता वाचल्या. नाटके वाचली.रहस्यकथा, भयकथा, सर्व निबंध संग्रह वाचले. तत्वज्ञान,इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, कादंबऱ्या,चरित्रे आत्मचरित्रे सगळी पुस्तके वाचून काढली. सुरवातीला गरज म्हणून ग्रंथालयात जात असे. पण नंतर ग्रंथालय हे त्याचे प्रेम प्रकरण झाले ! पक्ष्याला जसे घरटे; तसे ब्रॅडबरीला ग्रंथालय हे त्याचे घर,महाल, राजवाडा होता. तो म्हणतो, “मी तिथेच जन्मलो,तिथेच वाढलो.” उगीच तो स्वत:ला अभिमानाने ‘ Library Educated ‘ म्हणवून घेत नसे!


लॅास एन्जलिसची ही मुख्य लायब्ररी १९८६ साली प्रचंड आगीच्या भक्षस्थानी पडली तेव्हा रे ब्रॅडबरीला—सच्च्या पुस्तकप्रेमी वाचकाला—काय झाले असेल! Fiction विभागातील A to L पर्यंतची सर्व पुस्तके जळून गेली. ही सर्व पुस्तके ब्रॅडबरीने वाचून काढली होती!


रे ब्रॅडबरीने आपले पुस्तक The Fireman लिहिण्याचे मध्येच थांबवले. कारण माहित नाही. चार पाच वर्षांनी सिनेटर जोसेफ मॅकार्थीने जेव्हा,”परराष्ट्र खात्यात कम्युनिष्टांची भरती आहे. त्यांची अमेरिकेविषयी निष्ठा संशयास्पद आहे.” म्हणत त्या खात्यातील व इतरही क्षेत्रातील अशा अनेक संशयितांची शोध घेण्याची मोहिम उघडली तेव्हा त्याला ,” हे काही चांगले चिन्ह नाही. परिस्थिती कसे वळण घेईल नेम नाही !” असे वाटल्याने त्याने आपली The Fireman कादंबरी पूर्ण करायची ठरवले.


रे ब्रॅडबरीचे घर लहान. घरात दोन मुले होती. बाहेर खोली भाड्याने घेणेसुद्धा परवडत नव्हते. पण त्याला लॅास एन्जल्सची बहुतेक वाचनालये माहित होती. एलए विद्यापीठाच्या पॅावेल लायब्ररीच्या तळघरात टाईपरायटर्स होते. अर्ध्या तासाला दहा सेंट भाडे होते. तिथे बसून त्याने फायरमन पुस्तक लिहून पूर्ण केले. ९ डॅालर्स ८० सेंट खर्चून नऊ दिवसात त्याने ते पूर्ण केले! पुस्तकांनी भरलेल्या ग्रंथालयात बसून पुस्तके जाळण्यासंबंधीचे पुस्तक लिहावे हा चमत्कारिक योगायोग म्हणावा लागेल !


पुस्तक लिहून झाले पण रे ब्रॅडबरीला ‘फायरमन’हे नाव योग्य वाटेना. त्याला दुसरे नावही सुचत नव्हते. एके दिवशी जणू झटका आल्याप्रमाणे त्याने लॅास एन्जलिसच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखालाच फोन करून ,” कोणत्या तापमानाला पुस्तके जळून खाक होतात?” विचारले. त्यावर त्या मुख्याधिकाऱ्याने सांगितले तेच ब्रॅडबरीने आपल्या पुस्तकाचे नाव ठेवले, Fahrenheit 451.


रे ब्रॅडबरीचा जन्म १९२० साली झाला. ९१ वर्षाचे दीर्घायुष्य अनुभवुन व जगून तो २०१२ साली वारला. आयुष्यभर तो लेखन करत होता. त्याला आपण लेखक व्हावे ही स्फूर्ती कशी झाली ती घटनाही मोठी गमतीची आहे. १९३२ साली घडलेला हा प्रसंग आहे. त्यावेळी गावात मोठा उत्सव होत असे. त्या उत्सवी जत्रेत अनेक करमणुकीचे कार्यक्रम, खेळ, संगीत ह्या नेहमीच्या रंजक गोष्टी असत.


त्यावर्षी प्रख्यात Mr. Electrico नावाचा विद्युत शक्तीचा वापर करून जादूचे व इतर खेळ करणारा जादुगारही आला होता. प्रयोगातील अखेरीच्या खेळात Mr. Elctrico ने त्याच्या खेळात ‘जम्बुरे ऽऽ’ झालेल्या बारा वर्षाच्या लहान रे ब्रॅडबरीच्या डोक्यावर निळ्या प्रकाशाची तलवार ठेवून जणू भाकित केल्याप्रमाणे तो मोठ्याने , “Live Forever!” असे ओरडून म्हणाला! मि. इलेक्ट्रिकोच्या ह्या वरदानाने रे खूष झाला. “ त्या दिवसापासून मी नेमाने लिहू लागलो.” असे ब्रॅडबरी म्हणतो. त्याने ठरवले की आपण लिहायचे,लेखक व्हायचे. आयुष्यभर त्याने लेखन केले. त्याने पाचशेच्यावर कथा लिहिल्या. त्यातील जास्त विज्ञान-अदभुत कथा आहेत. कविता लिहिल्या. कादंबऱ्या,नाटके, नाटिका, सिनेमाच्या कथा पटकथा लिहिल्या. TV मालिकाही लिहिल्या. त्यात Alfred Hitchcock Presents मालिकेतील बरेच भाग त्याने सादर केले होते.


साहित्याच्या सर्व प्रकारात त्याची प्रतिभा व लेखणी सहजतेने संचार करत होती. पण वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी, आपण लेखक होऊन आपल्या पुस्तक रूपाने अजरामर होऊ असे वाटणे हे किती कौतुकाचे आणि तितकेच विस्मयकारक आहे!
रे ब्रॅडबरीने काय लिहिले नाही? त्याने विज्ञान-कल्पनारम्य कथा लिहिल्या. अदभुत कथा, भयकथा, रहस्यकथा लिहिल्या. कल्पना आणि वास्तव ह्यांचे बेमालूम मिश्रंण असलेल्या -ज्याला जादुई वास्तव म्हणले जाते- कथाही लिहिल्या. नाटके, पटकथा लिहिल्या. वाड•मयातील सर्व प्रकारांचे लेखन केले. पण तो प्रामुख्याने ओळखला जातो ते त्याच्या दोन तीन पुस्तकांमुळे. ती म्हणजे Fahrenheit 451, Martian Chronicles आणि The illustrated Man ह्या पुस्तकांमुळे. Fahrenheit 451 विषयी लिहायचे तर तो स्वतंत्र लेख होईल.


वरील पुस्तकांबरोबर त्याच्या निबंधांच्या पुस्तकांचाही उल्लेख करावा लागेल. त्या पुस्तकात त्याने वाचलेल्या पुस्तकांसंबंधी, त्याच्या आवडत्या लेखकांविषयीही लिहिले आहे. तसेच लिहावे कसे हेसुद्धा सांगितले आहे. पण बहुतेक निबंधातून त्याचा लिहिण्याविषयीचा दृष्टिकोन आढळतो. मुख्य सुत्र हेच की,” लिहिणे हा आनंदोत्सव आहे!” त्याने लिहायचे म्हणून कधी लिहिले नाही. त्याने कधीही ‘कर्तव्य’ भावनेने लिहिले नाही.


रे ब्रॅडबरीला भविष्याची वेध घेण्याची प्रतिभा होती. दृष्टी होती. आगामी काळात बॅंकेत टेलर येतील. ते इलेकट्रॅानिक असतील. म्हणजे आजच्या एटीमचे पुर्वरूप त्याच्या कथातून आले आहे. तसेच त्याच्या फॅरनहाईट ४५१ मध्ये प्रा. फेबर्स कानात लपणारे radio telephone वापरतो. त्याला तो ear thimble म्हणतो. हेच आज Bluetooth headphones, EarPods म्हणून ओळखले जातात. ब्रॅडबरीने त्याचे १९४९-५० मध्ये भविष्य केले होते. त्याने त्याचे कधी Cacophonus असेही वर्णन केले आहे.


इतक्या विज्ञान कथा लिहिणाऱ्या रे ब्रॅडबरीने आयुष्यात कम्प्युटर कधी वापरला नाही. त्याने आपले लिखाण टाईपरायटरवरच केले. तसेच त्याने कधी मोटारही चालवली नाही. लायसन्स काढण्याचा प्रश्नच नव्हता. ह्याचे कारण तो दृष्टीने अधू होता. बरेच वेळा प्रख्यात नटी कॅथरीन हेपबर्नने त्याला आपल्या मोटारीतून नेले व परत त्याच्या ॲाफिसमध्ये आणून सोडले आहे. तो सायकल किंवा टॅक्सीने ये जा करायचा. तो सायकलवरून जात असताना दुसरी प्रसिद्ध नटी डोरिस डे सायकलवरून जात असली तर ती हसत हसत त्याला हात करून मगच पुढे जाई.


रे ब्रॅडबरीच्या पुस्तकाने अक्षरश: अंतराळ प्रवास केला आहे. नासाचे मंगळावर जाणाऱ्या फिनिक्स यानातून रे ब्रॅडबरीचे Martian Chronicles हे पुस्तक मंगळावर पोचवले. तसेच नासाने मंगळावरील एका विवराला त्याच्या एका कादंबरीचे Dandelion Wines नाव दिले आहे. रे ब्रॅडबरीच्या मृत्युनंतर दोन अडीच महिन्यांनी नासाचे Curiosity Rover मंगळावर जिथे उतरले त्या तळाला Bradbury Landing हे नाव त्याच्या स्मरणार्थ देऊन त्याचे नाव व आठवण जतन केली आहे.


भविष्याचा वेध घेणाऱ्या, विज्ञानाची जाण असणाऱ्या त्याच बरोबर वाड•मयीन प्रतिभा असणाऱ्या रे ब्रॅडबरीविषयी सध्या इतकेच पुरे.

Social Media Fad

प्रत्येक काळात काही गोष्टींचा सुकाळ येत असतो. पन्नास ते साठ सत्तरच्या दशकांत स्टेनलेसच्या भांड्यांचा, वस्तूंचा सुकाळ आला होता. कोणत्याही प्रसंगी एकमेकांना स्टेनलेसची भांडी देण्याचा सपाटा चालू होता. प्रत्येकाची घरे स्टेनलेसच्या भांड्यांची दुकाने झाली होती. नंतरचा काळ कॅसेटसचा आला. कॅसेटसनी कहर केला होता. प्रत्येक घरात हॅालमधले एक कपाट शोकेस कॅसेट्सनी गच्च भरलेली असे. त्यातच काही घरांत जर व्हिडिए कॅसेटस किंवा नंतर डीव्हीडी कॅसेटस् असल्या तर त्यांच्या आरत्या ऐकाव्या लागत. अशांची प्रतिष्ठा वेगळीच असे. एकूणात काय तर कॅसेटच्या ढिगाऱ्यावर माणसाची पत प्रतिष्ठा मोजली जायची.


बायकांच्या साड्यांमध्ये तर वॅायलच्या साड्यांनी तर वेड लागायची पाळी आली होती. पुरुषांवर. त्यातही खटावचीच वॅायलची साडी सर्वोत्तम हाही एक अस्मितेचा भाग झाला होता.तशा कॅलिको,अरविंद, नंतर बॅाम्बे डायिंग व आमच्या लक्ष्मी विष्णु मिलच्या ( माधव आपटे यांची) ह्यांच्या वॅायल्स गाजू लागल्या. मग मी का मागे म्हणून नंतर वेगळ्या स्वरूपात रिलायन्सही त्यांची गार्डन वरेली साड्या घेऊन स्वतंत्र दुकानेच काढू लागले! सर्वांचा सुकाळ झाला.

पुरुषांतही ह्या लाटा येत पण त्या लहान लहरींसारख्या येत. विजारींच्या कापडांत समर सुटिंग, तर कधी शार्कस्किनच्या चमकदार सुटिंगच्या मग रेमंडमुळे टेरुल ह्यांची लहर विहरत होती. तयार शर्टांच्या बाबतीत क्रांतीची सुरुवात सॅमसन ब्रॅन्डने केली. पण पुढे लिबर्टी मिल्टन सेरिफ हे अधिराज्य गाजवू लागले. ही मंडळी नामशेष झाल्यावर झोडियाक, रेमन्डचे पार्क ॲव्हेन्यू आले ते आज परदेशी ॲरो, पीटर इंग्लॅन्ड व्हॅन ह्युजन इत्यादी परदेशी ब्रॅन्डमध्ये टिकून आहेत . ह्यांचाही सुकाळ होती म्हणायचा.

तसाच सध्या सुविचार,सुसंस्कार, प्रेरणादायी वचना-उदघृतांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातही कुणालाही झेपणारा म्हणजे एकमेकांना फेकून मारण्याचा प्रकार म्हणजे गुड मॅार्निंग शुभप्रभातींचा सतत मारा.


जिथे ज्ञानेश्वरही ह्या ‘सुकाळु करी’ मधून सुटले नाहीत ( त्यांनी ‘ब्रम्हविद्येचा सुकाळु करी’ हा निश्चय केला होता हे लक्षात नसेल म्हणून सांगतो) तिथे माझ्यासारखा त्यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे ‘ जीवजंतू’ कसा मागे राहील? तर जमल्यास मीही काही सकाळी एक सकाळचे वचन पाठवून तुमच्या दिवसाची सुरुवात हसण्याने करावी म्हणतो.

साऽऽवधाऽऽन!

देवाची डबा पार्टी !

काय लहर आली कुणास ठाउक ! पण एका लहान मुलाच्या मनात आपण देवाला भेटून यावे असे आले.
मुलाने आपल्या बॅकपॅकमध्ये दोन दिवसाचे कपडे भरले. आणि मधल्या सुट्टीतल्या खाण्याचा डबा भरून घेतला. पाण्याची बाटलीही घेतली. सवयीप्रमाणे कॅप उलटी घालून, “आई जाऊन येतो “ म्हणत दरवाजा धाडकन ओढून निघालाही.

खूप चालून झाले. मुलगा दमला. एका पार्कमध्ये बसला. घोटभर पाणी प्याला. माथ्यावरचा सुर्य थोडा ढळला होता . त्याने आपला डबा काढला. आईने दिलेल्या पोळीच्या भरलेल्या सुरळ्या खायला लागला. तितक्यात त्याला जवळच बसलेली एक बाई दिसली. त्याच्या आईपेक्षा मोठी होती. ती मुलाकडे ‘हा छोटासा मुलगा काय करतोय्’ हे हसून पाहात होती. मुलाला तिचे हसणे इतके आवडले की त्याने तिला जवळ जाऊन आपल्या पोळीचा घास दिला. तो तिने न खळखळ करता सहज घेतला. खाल्ला. आणि ती मुलाकडे पाहात हसली. मुलाला आनंद झाला. त्याने तिला आणखी एक पोळी दिली. तीही तिने न बोलता घेतली, खाल्ली आणि ती पुन्हा हसली. तिचे हसणे पुन्हा पुन्हा पाहायला मिळावे म्हणून तो मुलगा एक घास खाऊन दुसरा घास तिला देई . प्रत्येक घासाला तिचे हसणे त्याला पाहायला मिळे. दोघांचे बोलणे मात्र काही झाले नाही. मुलगा आणि ती बाई आपल्यातच जणू दंग होती.

बराच वेळ झाला. सुर्य मावळतीला आला. उशीर झाला असे मनाशीच म्हणत मुलगा उठला. डबा बॅगेत टाकला. निघाला. दह पंधरा पावले पुढे गेला असेल. त्याने मागे वळून पाहिले. बाई तिथेच होती. मुलगा पळत तिच्याकडे गेला. तिला त्याने आनंदाने मिठी मारली. बाईसुध्दा त्याच्याकडे हसत पाहात त्याचा मुका घेत हसत पाहू लागली.

मुलगा घरी पोहचेपर्यंत अंधार होऊ लागला होता. मुलाने बेल वाजवली. दरवाजा आईनेच उघडला. इतके दूरवर चालत जाऊनही मुलाच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून तिने विचारले,” अरे ! काय झाले आज तुला? इतका मजेत दिसतोस ते!

“आई आज मला एक बाई भेटली. तिचे हसणे इतके सुंदर आणि गोड होते म्हणून सांगू! काय सांगू! मी इतके सुरेख छान हसणे कधी पाहिलेच नव्हते. हो, खरंच सांगतो आई!” आणि ते हसणे व तो हसरा चेहरा पाहाण्यात पुन्हा रमला.

बाईने दरवाजा उघडल्यावर सर्वात मोठा मुलगा म्हणाला,” आई आज काही विशेष झाले का? नेहमीच्या पार्कमध्येच गेली होतीस ना? किती प्रसन्न दिसतोय तुझा चेहरा आज! फिरून आल्यावर इतकी आनंदी पाहिली नव्हती तुला!

“अरे आज फार मोठी गंमत झाली. आज मला देव भेटला! खरेच! देव भेटला मला. पण देव इतका लहान असेल अशी माझी कल्पना नव्हती ! अरे त्याच्या बरोबर डबा पार्टीही केली मी!” सोफ्यावर बसत ती म्हणाली. पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर तिला तो मुलगा दिसू लागला.

१९ मार्च २०२१ युट्युबवरील एका स्थळावर वाचलेल्या अति लघु बोधकथेवर आधारित.अशाच किंवा ह्याच कथेवर एक short film ही आहे असे वाचले.

रिकामा पाट

चक्रदेव मंगल कार्यालय आम्ही चालवायला घेतले. तेव्हा पासून पंगतीत इतर ताटांसारखेच तेही ताट वाढले जायचे. पंगतीत सगळे लोक जेवायला बसले तरी तो पाट रिकामा ठेवावा लागे. असे का करायचे आम्हाला माहित नव्हते. चक्रदेवांनी सांगितल्यामुळे तो एक पाट रिकामा ठेवत असू. थोडा वेळ वाट पाहून मगच वाढपी तूप वाढायला घेत.

काही महिने पंगतीत तो पाट रिकामाच राहिला होता. नेहमीप्रमाणे आजही पंगत बसली होती. एकाने मला रिकाम्या पाटाविषयी विचारले. “ कार्यालयाच्या मालकांनी ह्या कार्यालयातली ही पद्धत आहे व ती आम्हीही पाळावी असे सांगितल्यावरून आम्ही तो पाट रिकामा ठेवतो. पंगतीच्या एका टोकाला उभी राहून मी हे सांगत होते. ते ऐकून जवळच बसलेल्या एका विशीतल्या मुलाने मला त्या मागची हकीकत सांगितली…..

… तो सांगू लागला,” ही पद्धत आम्हीच सुरू केली. तुमच्या आधी आम्ही हे कार्यालय चालवत होतो. एकदा सर्व लोक जेवायला बसले असता, एक गृहस्थ आला व वडिलांना विचारू लागला ह्या पंगतीत जेवायला बसू का?” वडील म्हणाले, “तुम्ही जेवायला जरूर बसा. पण आता पंगत सुरु झालीय्. एकही पाट रिकामा नाही. नंतर आमच्या घरच्यांबरोबर व इथे काम करतात त्यांची पंगत असते. तुम्ही आमच्या बरोबर बसा.” तो माणूस थोड्या अजिजीने म्हणाला,” अहो अशा पंगतीत बसून जेवायची माझी खूप इच्छा आहे. बघा कुठे कोपऱ्यात पाट मांडता आला तर.” वडिलांनी सगळीकडे पाहिले पण जागा दिसेना. वडील आमच्या घरच्यांच्या बरोबर बसा असे त्याला पुन्हा सांगू लागले. पण तो माणूस काही न बोलता निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा कधी आला नाही. दिसला नाही. आम्हाला एक दीड वर्षांनी हे कार्यालय ….”

त्या मुलाचे बोलणे अर्धवट सोडून मी प्रवेदाराकडे पाहू लागले. नेहमीप्रमाणे वाट पाहून आजची पंगत सुरु झाली. थोड्याच वेळात एक पंचवीस- तिशीतला माणूस ह्यांना काही विचारु लागला. माझ्या मिस्टरांनी बोट दाखवून त्याला त्या रिकाम्या पाटावर बसायला सांगितले.

मला काय वाटले कुणास ठाऊक मी भाजी आमटी कोशिंबिरीचे पंचपात्र घेऊन पंगतीत आले. आज स्वत: आपल्या मालकीणबाई वाढताहेत पाहून आमचे वाढपी बुचकळ्यात पडले. त्यांना, मीच ह्यांना वाढणार आहे हे हळूच सांगितले. मी त्याला सगळे पदार्थ वाढायला सुरू केली. वाढताना माझ्या न कळत उत्स्फूर्ततेने मी त्याला वाढू लागले. “ सावकाश होऊ द्या. कसलीही घाई नाही.” “ कोशिंबीर कशी झालीय्?” “ ही भाजी आवडत नाही वाटते, मग ही बघा म्हणत दुसरी भाजी वाढे. जिलब्या प्रत्येक वेळी , “ अहो घ्या, संकोच करू नका. आमची जिलबी आवडेल तुम्हाला!” असे म्हणत एक जास्तच वाढे.

पंगतीचे जेवण आटोपले.सगळी मंडळी हात धुवायला जाऊ लागली. तो माणूस बसूनच होता. मग उठला, ते पाहून मी लगेच त्याला वाकून नमस्कार केला. ते पाहून तर त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले.तो मला म्हणत होता,” तुम्ही वाढत असताना मला सारखी आईची आठवण येत होती.” मी त्याची समजुत घातल्यासारखे सांगत होते, “अहो मीही तीन मुलामुलींची आई आहे. वाढतांना मलाही खूप बरे वाटत होते. पण आज अचानक तुम्ही कसे आलात?”

त्यावर तो गृहस्थ गहिवरून सांगू लागला, “आमच्या सोसायटीत काम करणारा माणूस मला नेहमी सांगे की लग्नाच्या अशा पंगतीत मला जेवायची खूप इच्छा होती. मी लग्नामुंजींच्या दिवसात कार्यालयांत जात असे. पण कुठे दाद लागली नाही. पाट रिकामा नाही म्हणून सांगायचे.नशिब म्हणत ती एक इच्छा सोडल्यास दिवस चांगले काढले.” काल पर्यंत तो मला त्याची ही इच्छा सांगत होता. काल सकाळी मी त्त्याची ही इच्छा पूर्ण करेन असा शब्द दिला. काल संध्याकाळीच तो वारला. आज मी इथे आलो. तुम्ही मला मायेने वाढले.”

हे ऐकल्यावर मी त्याला पुन्हा नमस्कार केला. हात धुवायला जाताना त्याने समाधानाने ढेकर दिली. ती तृप्तीची ढेकर आम्हाला आशीर्वाद होता.

मी मागे वळून पाहिले तर तो विशीतला तरूण बसूनच होता.मी जवळ गेले तर त्याचे डोळेही भरून आले होते. त्याला रडायला काय झाले असे हळूच विचारल्यावर तो कुठेतरी पाहात असल्यासारखा बोलू लागला,”त्यानंतर तो माणूस आला नाही की दिसला नाही. पाट मांडलेला, ताट वाढलेले तसेच राही. आमचे कंत्राट गेले. कारण आमचे कार्यालय तितके चालेना. दिवस वाईट आले. आई वडील अकाली थकले. मला कॅालेजात जाता आले नाही. एका छापखान्यात साधे काम लागले आहे. कसेतरी चालले आहे. डोळ्यांत का पाणी आले सांगता येत नाही. तुमच्या पंगतीतला पाट रिकामा राहिला नाही ह्याचा आनंद झाला की तुम्हाला त्या ‘अवचित अतिथीला’जेवायला घालता आले; आम्हाला ती संधी मिळाली नाही; ह्याचे वैषम्य म्हणून, का तुम्हाला बरकत येईल ह्याचा हेवा किंवा द्वेष वाटला, काही सांगता येत नाही. पदवी मिळाल्यावर मलाही आमच्या आई-वडीलांचा हा व्यवसाय करायचा होता. पण तसे जमेल असे वाटत नाही.” इतके झाल्यावर तो पुन्हा डोळे पुसत हात धुवायला गेला.

इकडे मी कोठीघरात गेले. परत आले. तो मुलगा दिसला. त्याला हाक मारली. “ हे बघ हे शकुनाचे पैसे घे. ह्याने तुला व्यवसाय सुरू करता येणार नाही हे माहित आहे. पण तुझी हिंमत टिंकून राहील. तुझ्या स्वप्नातील पंखातले हे लहानसे पिस आहे.” असे म्हणत त्याच्या हातात शंभराच्या चार पाच नोटा ठेवल्या. तो मुलगा पाहात राहिला. त्यानेही मला नमस्कार केला. द्यायचा तो आशिर्वाद मी दिला.

तो मुलगा म्हणाल्या प्रमाणे आमची बरकत होत गेली. खरं म्हणजे हे कार्यालय तसे गैरसोयीचे होते. का कुणास ठाऊक पण ते लग्ना मुंजीच्या दिवसात एकही दिवस रिकामे नसे. मालकांनाही त्यामुळे चांगले उत्पन्न होऊ लागले. त्यांनी कार्यलयाचे पूर्ण नूतनीकरण करायची योजना आखली. त्यामुळे आमचा एक मोसम रिकामा जाणार होता. पण आम्ही चक्रदेवांना विचारले की ,”नविन कार्यालयाचे काम आम्हाला मिळेल नां?” त्यावर ते म्हणाले, “अहो तुमच्यामुळेच हे मी करू शकतोय्. तुम्हाला मी कसा विसरेन?”…..

….. काळ पुढेच जात असतो. “आमचे आई वडील गेले. आमच्या सासूबाई गेल्या. पाटांच्या पंगतीही गेल्या. टेबल खुर्च्यांच्या पंगती झाल्या. आजही आम्ही एक खुर्ची रिकामी ठेवतो. कोणी अवचित पाहुणा येतो. सासरहून कधी आमच्या बहिणी त्या पाहुण्याला वाढायला येतात.” “ आम्ही दोधीही त्या रिकाम्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थाला किंवा बाईंना वाढतो.” मुले व सुना सांगत होत्या. स्वत:ला विसरून मी त्यांचे बोलणे ऐकत होतो.

वैद्य

एक बिगारी कामगार होता. परिस्थितीमुळे रोज काम मिळणे मुष्किल झाले. सरकारच्या रोजगार हमी योजनेचीही कामे हल्ली निघत नव्हती.काय करावे ह्या विचारात पडला.
गावातल्या वैद्याचे काम मात्र कमी होत नाही. त्याची रोजची कमाई जोरात आहे हे लक्षात आल्यावर त्याने वैद्यकी करायचे ठरवले.

घरातल्या बाहेरची खोली चुन्याने रंगवली. बऱ्यापैकी सतरंजी पसरली. स्वत:साठी घरातली उशीच टेकायला घेतली. पाच सहा लहान मोठ्या बाटल्या भोवती ठेवल्या. स्वत: डोक्याला पांढरा पटका बांधून कपाळाला गंध लावून व खांद्यावर उपरणे गुंडाळून बसू लागला. बाहेर पाटी लिहिली. “तब्येत दाखवा. शंभर रुपयात उपाय! गुण नाही आला तर दोनशे रुपये घेऊन जा!” हळू हळू एक दोघे येऊ लागले.

दोन चार दिवसांनी गावातल्या वैद्याने आपली प्रॅक्टिस खलास होऊ नये म्हणून वेळीच ह्याचे पितळ उघडे करायचे ठरवले. वेष बदलून रुग्ण म्हणून वैद्यराज बिगाऱी वैद्याकडे गेले.

खरा वैद्य बिगारी वैद्याला म्हणाला, ”वैद्यबुवा माझ्या तोंडाची जिभेची चवच गेली बघा..” बिगारी बुवा आपल्या जवळच्या बाटल्यांची उगीच जागा बदलत, घरात पाहात म्हणाला, “हरी ४१ नंबरची बाटली आण बाळ.” बाळ्या हऱ्याने बाटली बिगारी बुवाच्या हातात दिली. बुवांनी खऱ्या वैद्याला ‘आऽऽ’ करायला सांगितले. त्याच्या जिभेवर तीन थेंब टाकले. खरे वैद्यराज लगेच थूथू: करत ओरडून म्हणाले,” अरे हा तर कार्ल्याचा रस आहे!” बिगारी वैद्यबुवा म्हणाले,” बघा अचूक उपाय झाला की नाही? चव आली की नाही तुमच्या तोंडाला! शंभर रुपये द्या. खऱ्या वैद्यबुवाने तोंड वेडेवाकडे करत शंभर रुपये दिले.

दोन दिवसांनी पुन्हा वैद्यराज रुग्णाच्या वेषात आले आणि म्हणाले,” वैद्यबुवा माझी स्मरणशक्तीच गेली हो!” बुवानी घरात डोकावत हाक दिली,” हरीबाळा, ती एकेचाळीस नंबरची बाटली घेऊन ये बाबा.” हऱ्याने ती बाटली बुवांना दिली. ती बाटली पाहिल्यावर वैद्यराज जवळ जवळ किंचाळलेच, ४१ नंबरची बाटली? “बुवा ही बाटली तर कडू कारल्याच्या रसाची आहे!” ते ऐकून बुवा म्हणाले,” बघा तुमची स्मरणशक्ती तात्काळ जागी झाली. काढा शंभर रुपये.” वैद्यराजांनी नाईलाजाने शंभर रुपये काढून दिले.

आठ दहा दिवस होऊन गेले. बिगारी वैद्यबुवाकडची गर्दी वाढू लागली.

वैद्यराज आज त्या बोगस बिगाऱी वैद्याची चांगलीच फजिती करायची ह्या निश्चयाने गेले. हातात पंढरी काठी घेऊन निघाले. बिगारी वैद्यबुवाच्या घराशी आले. पायऱ्या चढतांना एकदोनदा त्यांचा तोल गेला. हातातली पांढरी काठी सावरत असताना पायरी चुकली.पडता पडता वाचले. बिगाऱ्याने हे पाहिल्यावर त्यांचा हात धरून त्यांना आत आणले. वैद्यराज बुवांला म्हणाले,” बुवा, गेल्या महिन्यापासून माझी दृष्टी फार कमी झालीय. दिसतच नाही म्हणालात तरी चालेल. उपाय करा काही तरी.”

वैद्यराजांची ही अवस्था ऐकून बिगारी बुवा हात जोडून म्हणाले,” ह्याच्यावर माझ्याकडे उपाय नाही. हे घ्या तुमचे दोनशे रुपये.” हे ऐकल्यावर वैद्यराजाला आत आनंदाच्या उकळ्याच फुटल्या. त्याने पैसे घेतले आणि म्हणाले, “बुवा पण हे दीडशे रुपयेच आहेत की!“ बिगारी वैद्यबुवा, वैद्यराजांच्या हातातील नोटा पटकन काढून घेत म्हणाले,” बघा तुमची दृष्टी आली की नाही परत? माझ्या फीचे शंभर रुपये द्या!”

वैद्यराज पांढरी काठी टाकून ताड ताड पावले टाकीत गेले.

[‘भांडी व्याली भांडी मेली’ ह्यासारखी ही पण एक जुनी ‘पिढीजात’ गोष्ट;माझ्या शब्दांत.]

चांगभले! सगळ्यांचेच चांगभले!

बेलमॅान्ट

एक तरुण मुलगा होता. तो अगदी पोरका होता. एका शेठजी कडे पडेल ते काम करायचा. काम संपल्यावर घरी जाताना शेठजी त्याला पीठ मीठ द्यायचा.

घरी आल्यावर तो मुलगा पिठाच्या चार भाकऱ्या करायचा. मीठा बरोबर किंवा कधी शेठजीनी चटणी दिली असेल तर चटणी बरोबर खायचा. दोन रात्री खायचा आणि उरलेल्या दोन, सकाळी कामाला जाताना खायचा. एकदा सकाळी जेवायला बसला तर दुरडीत एकच भाकरी! एक भाकरी काय झाली असा विचार करत त्याने जेवण संपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच प्रकार; एकच भाकऱी शिल्लक. हे रोज होऊ लागले तेव्हा एका रात्री झोपेचे सोंग घेउन पडून राहिला. एक मोठा गलेलठ्ठ उंदीर येऊन भाकरी घेऊन पळून गेला.

दुसऱ्या रात्री त्याने उंदराला भाकरी पळवतानाच पकडले. उंदराला म्हणाला,” अरे तू माझी भाकरी पळवतोस. रोज माझी भूक मारावी लागते. अगोदरच चार भाकऱ्या त्यातलीही तू एक पळवतोस! मी करू काय?” “ एऽ बघ , मी माझ्या नशिबाने खातोय. तुझं तू पाहा.” उंदीर असे म्हणाल्यावर तरूण मुलगा म्हणाला,” अरे कसले नशीब आणि फिशिब. मी गरीबीने व्यंगून गेलोय. काय करावे सुचत नाही.” असे म्हणून कपाळाला हात लावून उंदराकडे पाहू लागला. मुलाचे बोलणे ऐकून उंदीरही आपले डोळे मिचकावित म्हणाला, “ तुझ्या प्रश्नाचे उत्तर एकच माणूस देईल. तू गौतम बुद्धाला जाऊन भेट. तो सांगेल.”

तरूण मुलगा मालकाची रजा घेऊन निघाला. प्रवास लांबचा. मुलाच्या अडचणीत आणखी अडचणींची भर घालणारा तो प्रवास! एका रात्री त्याला जंगलातून जाताना दूरवर दिवा दिसला. त्या दिव्याच्या रोखाने निघाला. ते मोठे घर होते. मुलाने दार ठोठावले. एका बाईने दार उघडले. मुलाने त्या बाईला आजची रात्र इथे काढू का असे विचारल्यावर बाई हो म्हणाली. तिने मुलाला खायला दिले पाणी दिले. जेवण झाल्यावर तो कुठे चालला ते विचारले. तरुण मुलगा म्हणाला,” माझा प्रश्न विचारायला मी बुध्दांकडे निघालो आहे.” ते ऐकून बाई म्हणाली,” अरे माझाही एक प्रश्न आहे तोही विचार. माझी वीस वर्षाची मुलगी बोलत नाही. मुकी आहे. ती कधी बोलू लागेल ते विचार गौतम बुद्धाला.” मुलगा हो म्हणाला.

दुसरे दिवशी मुलाचा प्रवास सुरु झाला. जाता जाता वाटेत एक प्रचंड बर्फाने झाकलेला उंच पर्वत दिसला. आणि त्याला शिखरावर माणसासारखा एक ठिपका दिसला. तरूणाला प्रश्न पडला हा पर्वत ओलांडून कसा पार करायचा. शिखरावरच्या माणसाने त्याला पाहिले असावे. तो तिथूनच ओरडला,” मुला वर चढायला सुरुवात कर.” हे ऐकून चढावे की नाही असा विचार करत असतानाच तो माणूस पुन्हा म्हणाला, “ घाबरू नको. वर ये.” मुलगा पर्वत चढू लागला आणि एका क्षणात तो शिखरावर आला. मुलगा थक्क झाला. इतका थक्क झाला की आश्चर्याने तो बोट तोंडात घालायचेही विसरला. बोटात तोंड घालताना, दोन्ही कानात बोटे घालून तोंड आऽऽऽ करून त्या माणसाकडे पाहात राहिला. माणसाने विचारले,” अरे इकडे कुणी येत नाही. तू कसा आलास?” तरुण मुलगा म्हणाला, “ ते नंतर. आधी मी इथे एका क्षणात वर कसा आलो ते सांगा.” त्यावर तो माणूस आपल्या हातातली सुंदर छडी दाखवत म्हणाला,” अरे मला ही जादूची शक्ती मिळाली आहे. तू कुठे चाललास ?” त्यावर मुलगा म्हणाला, मी माझा प्रश्न विचारायला गौतम बुद्धाकडे निघालोय्.” ते ऐकल्यावर तो माणूस म्हणाला,” अरे मी इथे हजार वर्षे तप करत बसलो आहे. जादूच्या शक्तीशिवाय मला काही मिळाले नाही.मला स्वर्गात जायला केव्हा मिळेल ते बुद्धांना विचार.” तरूण हो म्हणाला. शिखरावरच्या माणसाने त्याला पर्वत पार करून दिला.

मुलगा निघाला. विचार करू लागला, माझा प्रश्न घेऊन निघालो आणि आता ह्या दोघांच्या प्रश्नांची आणखी भर पडली.चला. असे स्वत:शी म्हणत पुढचा प्रवास करू लागला. तर एक नवीनच संकट पुढे वाहात असताना दिसले. भल्या रुंद पात्राची महानदी समोरून वाहात होती. काय करावे. पोहता येत होते तरी आडा विहिरीतले पोहणे त्याचे. इतकी अफाट रुंदीची नदी पार करणे अशक्यच होते त्याला. अधेमध्येच गटांगळ्या खाऊन बुद्धाला न भेटताही चौघांचेही प्रश्न सुटले असते!

तेव्हढ्यात एक फार मोठे कासव पोहत येत असलेले दिसले. कासव जवळ आले. मुलगा म्हणाला,” कासवराव मला नदी पार करून देता का? “ “ का नाही? चल माझ्या पाठीवर बस. तरुण मुलगा कासवाच्या महाप्रचंड पाठीवर बसला. जाताना कासवाने मुलाला तो कुठे , कशासाठी चालला विचारले. मुलाने तो बुद्धाकडे स्वत:ची समस्या सोडवण्यासाठी चालल्याचे सांगितले. त्यावर कासव म्हणाले,” बाळा माझाही एक प्रश्न तथागतांना विचार.. मला डायनासोर व्हायचं आहे. मी काय करू?” मुलगा म्हणाला नक्की विचारेन. पण मनात म्हणत होता माझा एक म्हणता म्हणता आता चार प्रश्न झाले! चला.

तरूण मुलगा गौतमबुद्धांच्याकडे पोचला. पुष्कळ लोक होते. गौतम बुद्धाने प्रथमच सांगितले की प्रत्येकाला फक्त तीनच प्रश्न विचारता येतील!”
हे ऐकून मुलगा निराश झाला. विचारात पडला. त्याची पाळी येईपर्यंत तो मनाशी बोलत होता. फक्त तीनच प्रश्न विचारायचे. मला तर चार प्रश्न विचारायचे आहेत. तो तिघांचे प्रश्न घोळू लागला. तिघेही त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागले. कुणाचा प्रश्न बाजूला ठेवायचा हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडू लागला.
त्याने विचार केला मुलगी मुकी. त्यामुळे बाई व मुलगी वीस वर्षे त्या एकमेकींशी बोलू शकत नाहीत. तसेच तो जादूगार कित्येक वर्षे तप करतोय; आणि कासवदादा किती वर्षे पाण्यातच पोहतोय. माझा प्रश्न काय फक्त पोटापाण्याचा आहे. आज कोरडीसुकी का होईना पोटाला भाकरी मिळतेच आहे नां?

मुलाची पाळी आली. त्याने कासव डायनासोर केव्हा होईल ते विचारले. त्यावर बुद्ध म्हणाले,” त्याला म्हणावं ते पाठीवरचे अगडबंब कवच फेकून दे!” नंतर त्याने जादुगाराला स्वर्गात जायला केव्हा मिळेल हे विचारले. त्यावर बुद्ध म्हणाले,” त्याला अगोदर त्याच्या त्या शक्तीचा त्याग कर म्हणावे.” त्यानंतर मुलाने वीस वर्षे मुकी असलेली मुलगी केव्हा बोलेल हा प्रश्न विचारला. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, “ तिचे लग्न झाल्यावर ती बोलेल.”

मुलगा परत निघाला. कासवाने त्याला पाठीवर घेऊन पैलतीराला सोडताना विचारले,” विसरलास ना तू माझा प्रश्न विचारायला?” मुलगा म्हणाला,” मी तुला कसा विसरेन ? बुद्धाने तुला कवच काढून टाकायला सांगितले आहे!” हे ऐकताक्षणीच कासवाने सर्व शक्ती पणाला लावून आपले कवच तोडून फाडून टाकले. प्रचंड आवाज होत कासवाचा महाकाय डायनासोर झाले! ते होत असतानाच कवचातून रत्नामोत्यांचा वर्षाव झाला. पूर्वीचे कासव म्हणाले. “ तरूण मित्रा ही सर्व रत्ने मोती तुझी!”

मुलगा ती रत्नं मोती मिळाल्याने मालामाल झाला. प्रवास करत पर्वतापाशी आला. पर्वतावरच्या माणसाने वरूनच विचारले,” पोरा माझा प्रश्न विचारलास नां ? का गडबडीत विसरलास?” विचारला असलास तरच तुला वर घेईन.” हे ऐकल्यावर मुलगा हो म्हणाल्याबरोबर त्याच क्षणी तो शिखरावर आलाही! “ बुद्धांनी तू तुझ्या शक्तीचा जेव्हा त्याग करशील तेव्हाच तू स्वर्गात जाशील असे सांगितले आहे.” हे ऐकल्यावर तो जादूई शक्तीचा माणूस म्हणाला, “ आताच मी माझ्या शक्तीचा त्याग करतो.” तो पुढे म्हणाला,” हे मुला ही माझी शक्ती मी तुलाच देतो !” असे म्हणून त्याने जादूची सुंदर कांडी त्या मुलाला दिली. क्षणार्धात त्या तपस्व्यासाठी “उघडले स्वर्गाचे दार!”

रत्नं मोती आणि जादुची ती छडी घेऊन एका क्षणात तो तरुण त्या बाईंच्या घरी पोचला. बाईंनी बुद्धाने काय सांगितले असे विचारल्यावर मुलाने बुद्धाचा निरोप बाईंना सांगितला. ते ऐकून बाईला फार आनंद झाला. आपल्या वीस वर्षाच्या तरूण सुंदर मुलीला घेऊन आल्या. त्या म्हणाल्या,” अरे तुझ्यासारखा तरुण समोर असताना माझ्या मुलीसाठी दुसरा नवरा का शोधायचा?”

त्सा तरुण मुलाचे व मुक्या मुलीचे लग्न झाले. मुलीने आनंदाने ,” आई! आई! मला बोलता येऊ लागले”म्हणत आईला मिठी मारली.
कासवाची, तप करणाऱ्याची व मुक्या मुलीच्या आईची – तिघांच्याही मनातल्या इतक्या वर्षांच्या इच्छा पूर्ण होऊन त्यांच्या चिंता मिटल्या. प्रश्न सुटले. आणि त्या तरुण मुलाने गौतम बुद्धांना आपली चिंता प्रश्न न विचारता तोही धनवान शक्तिमान आणि चांगली बायको मिळाल्याने भाग्यवानही झाला.

एकाच्या भलेपणाने इतर सगळ्यांचेही चांगभले झाले.


आपण पंढरपूर, तुळजापूर किंवा कोल्हापूरला किंवा एखाद्या सत्पुरुषाच्या दर्शनाला जाणार हे कळल्यावर काहीजण “आमचाही नमस्कार सांगा” असे सांगतात. तिथे गेल्यावर कितीजण लक्षात ठेवून त्यांचे नावे नमस्कार करतात हे माहित नाही.

(युट्युबवरील एका व्हिडिओत काही जण गप्पा मारत असता त्यातील एकजण ही लहानशी गोष्ट सांगतो. त्यावरून अखेरच्या परिच्छेदाची भर घालून मी ही लिहिली.)