Category Archives: Stories

सुखाचा सदरा

शीव

“ही सगळी चित्रे मी घेऊन जातो. तुम्हाला चार पाच दिवसांत परत पाठवतो.” येव्हढे बोलून त्या माणसाने माझी सगळी चित्रे घेतली.एका चांगल्या कागदात घेऊन आपल्या गाडीत काळजीपूर्वक ठेवली. माझ्याकडे पाहात हात हलवून गेला.

मी काही फुटपाथवर माझी चित्रे मांडून बसलो नव्हतो. आमच्या काॅलेजातील एका झाडाखाली मी व माझे मित्र बोलत होतो. मधून मधून माझी चित्रे दाखवत होतो. आणि हा बूट टाय घातलेला तीस-बत्तीस वर्षाचा तरूण मागे येऊन कधी उभा राहिला ते आमच्या लक्षातही आले नाही. मग चित्रे पाहात, बोलताना त्याने माझे नाव गाव पत्ता सहज विचारूनही घेतला होता! मला हो नाही म्हणू न देता थोडेसे हसत माझी चित्रे घेऊनही गेला. मित्रांनी तर मला धारेवर धरले. “ अरे तू गप्प काय बसला होतास? कोण कुठला आणि एक नाही सगळी चित्रं घेऊन गेला की तुझी ! नुसता बघत काय होतास?” “ तुम्हीही काही बोलला नाहीत! अरे तुम्ही माझे दोस्त ना? तुम्ही का बोलला नाहीत त्याला? आणि मलाच विचारता? जाऊ देऽ! मी काही आचरेकर, सातवळेकरांसारखा मोठा किंवा भोसले आणि यल्ला-चदासी इतका प्रसिद्ध सिने होरडि्ंग्जचा चित्रकारही नाही म्हणा!”

घरी आलो. आई बाबांना काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता. बहिणीला मात्र रात्री सांगितले. ती बराच वेळ काही बोलली नाही. नंतर म्हणाली, उद्या काॅलेजच्या आॅफिसात विचार तो कोण होता ते. दुसऱ्या मुलांनाही विचार. नाहीतर शेवटी प्रिन्सिपाॅलचे पी. ए. आहेत ना डीआरडी, त्यांना विचार तो कोण,होता ते” मी व माझ्या मित्रांनी दुसरे दिवशी काॅलेजातील बहुतेक सगळ्यांना विचारले पण कुणालाच त्याची माहिती नव्हती.मात्र बऱ्याच मुलांनी त्याला पाहिला होता.पीएनां तो भेटला,”पण त्याने कार्ड वगैरे दिले नाही. सर्व एचओडी,मी आणि प्रिन्सिपाॅल मिटींगमध्ये होतो म्हणून तो निघून गेला,” इतकेच ते म्हणाले.

मी त्या आठ दिवसांत एकही चित्र काढले नाही की रेघही ओढली नाही. माझ्या गेलेल्या चित्राच्या चिंतेतच होतो. काल कुरियरचा माणूस एक सुंदर लांब पाकीट “मी इथेच राहतो का,हेच कोटम नगर का” विचारत घरी आला. पाकिटावरचा तो मीच हे समजल्यावर तो चिडचिड करत इथे सही करा.म्हणाला. मी पाकिट घेतले. जातानाही तो आठ्या घालून रस्त्यातले अडथळे उड्या मारत, लांब ढांगा टाकत, पार करत होता. काय करणार मी तरी. आम्ही कोणीच इथे हौसेने राहात नव्हतो!

पाकीट फोडून पत्र वाचले. माझ्या तोंडाचा जो आऽऽ झाला तो मिटेचना. डोळ्यांवर विश्वास बसेना. ते पत्र हातात घेऊन मी तिथल्या तिथेच किती पळालो असेन, दोन्ही हात वर करून किती उड्या मारल्या असतील ते सांगताच येणार नाही. ते पत्र किती तरी वेळा वाचले असेल. बहिणीची वाट पाहात बसलो. पण धीर धरवत नव्हता. मोठ्याने ओरडावेही वाटत होते. घरातल्या घरात फेऱ्या मारत होतो. आईने अरे काय करतो आहेस? काही झालेय का? विचारल्यावर काही नाही म्हणत मान हलवत होतो.

बहिण आल्यावर तिला “इकडे ये” असे हात करून बोलवत होतो. पण ती लगेच आली नाही. तरी बरे एक वर्षाने का होईना लहान आहे माझ्यापेक्षा. ती आली. मी तिला पत्र दाखवले. तिनेही डोळे विस्फारले! पत्रात माझी चार चित्रे कंपनी विकत घेणार आहे. त्या चार चित्रांच्या पुढे त्यांनी किंमत लिहिली होती. हजारोंच्या आकड्यांची ती रक्कम पाहून मला हर्षवायु व्हायचेच बाकी राहिले होते.पत्रात शेवटी लिहिले होते की किंमती मान्य असतील तर कळवावे व परवा आॅफिसमध्ये यावे असेही
लिहिले होते.

बहिणीने मला विचारले काय करायचे? मी म्हणालो,” हो म्हणून कळवणार! “ बहिण म्हणाली,” नाही अजिबात नाही. दोन चित्रांच्या किंमती वाढवून कळव.” ज्या दोन चित्रांच्या किंमती त्यांनी जास्त देऊ केल्या होत्या त्यापैकी एका चित्राची व ज्या चित्रांचे त्यांनी पैसे कमी देऊ केले होते त्यापैकी एका चित्राची अशा दोन चित्रांसाठी मी जास्त रक्कम मागितली. बहिणीने नंतर सांगितले की परवा तुला जमणार नाही असेही कळव. मी तेही लिहून टाकले. आणि तिला विचारले ,” असं का? मग जायचं केव्हा? “ “पुढच्या आठवड्यात मंगळवारी येईन म्हणावे.” मी तेही लिहिले. दुसरे दिवशी पत्र पोष्टात टाकले.

चार दिवसांत त्यांचे त्यांना आम्ही कळवलेल्या किंमती मान्य आहेत व पुढच्या आठवड्यात बुधवारी येण्यास सांगितले. आम्ही पत्र वाचले. मी बहिणीला पुन्हा विचारले,” किंमती का वाढवल्या! वेळ नाही असे का कळवले आपण? अगं,इतके पैसे बघितले तरी होते का? मोजता तरी येतील का? त्यांनी दिलेलेच खूप होते!” ती मला वेड्यात काढत म्हणाली,” म्हणूनच! अरे दादा, तू साधा आहेस. तुझे महत्व वाढवून घेण्यासाठी तसे लिहायला सांगितले.”

माझे महत्व वाढले की नाही ते मला अजूनही माहित नाही. पण माझी बहिण व्यवहारचतुर आहे हे नक्की. मी तिला घेऊनच कंपनीच्या आॅफिसमध्ये पोचलो. बाहेरून ती इमारत पाहताना छाती दडपून गेली. चकचकीत काचांची आणि किती उंच! इमारतीच्या काचेत आकाश, समोरची झाडे, पक्षी, थोडी रहदारी ह्यांची खऱ्या पेक्षा चांगली दिसणारी प्रतिबिंबे पाहात मी थोडा वेळ उभा होतो. दरवाजा लोटण्याची गरजच नव्हती. जवळ जाताच आपोआप उघडला. आत गेल्यावर आतील उंचावरचे छत, आणि गुळगुळीत फरशी. फरशी कशी म्हणायची त्या डोळ्यांना शांत करणाऱ्या मखमली जमीनीला! पाय न ठेवता अलगद जावे वाटणारी अशी ती शोभा होती. आणि झालेही तसेच. लिफ्टमध्ये कसे जायचे हे कोडे सुटण्या आधीच अलगदपणे आम्ही वरच्या मजल्यावरील एका गुबगुबीत कोचात बसलो होतो! समोरा समोरच्या भिंतीवर चित्रे होती. माझीच! जवळ जाऊन पाहिली. काय सुंदर दिसत होती! कोंदणामुळे रत्नालाही अधिकच तेज येते म्हणतात.कधी नव्हे ती माझी बहिणही माझी चित्रे पाहात होती. मी त्याच खुषीत होतो.

समोरून टक्कल पडायला लागेल असे एक चष्मा घातलेले गृहस्थ हसत आले. मला व बहिणीला चला म्हणत ते एका प्रशस्त खोलीत घेऊन गेले.स्वत: खुर्च्या मागे घेत आम्हाला त्यांनी खुर्च्यांत बसवले. आपल्या खुर्चीवर बसल्यावर त्यांनी आमची नावे पुन्हा विचारून ते बोलू लागले. चित्रे केव्हा पासून काढतोस, कोणी शिकवले, वेगळ्या क्लासमध्ये जात होतास का, आवडते चित्रकार कोण असे विचारल्यावर मी दोन चार नामांकित चित्रकारांची नावे सांगितली. पण पुढे जाऊन सिनेमाची मोठमोठी होर्डिंग्ज करणारे, नट-नट्यांना त्यातून मूर्तिमंत उभे करणारे, कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबांना मोत्याचे पाणी देणारे मनोहर,जी.भोसले, यल्ला-दासी ह्यांची नावे मुद्दाम सांगितली! ते ऐकून भुवया उंच करून हसत ते माझ्याकडे पाहू लागले.

आपले काही चुकले असावे वाटून मी बहिणीकडे पाहिले.तिने डोळ्यांनीच व माझ्या हातावर थापटत काही चुकले नाही सांगितले. धीर आला. मग ते उठत आम्ही कुठे राहतो विचारल्यावर मी कोटम नगर म्हणालो.ते गंभीर झाले असावेत. पण लांब पाहावे तसे पाहात उभे होते.आम्हाला वाटले की कोटम नगर खूप दूर आहे की काय! हो का येव्हढेच म्हणत ते आम्हाला घेऊन बाहेर आले.

माझ्या चित्राच्या भिंतीजवळ एका बाजूने आम्ही गेलो. तिथे दरवाजा होता. आम्ही येतोय हे पाहून दरवाजा स्वत:च आपोआप उघडला. आत गेलो तर समोर आरशाची भिंत होती. पण त्यात आम्ही कोणी दिसलो नाही. आमच्या डाव्या उजव्या बाजूला सुंदर झाडे होती! साहेब एका फांदीला धरून होते. लगेच त्या आरशाची चांदण्याची वाट झाली, त्या वाटेवरून मी व बहिण तोंडात बोटे घालूनच चालत होतो! मध्ये एक वरून येणारा धबधबा दिसला. साहेबांनी आम्हाला तिकडे नेले.आम्ही कंपनी,आॅफिस सगळे विसरून पाण्याखाली हात धरले. आजूबाजूला थेंब उडाले.पाणी पिऊन तोंडावरून गार पाण्याचा हात फिरवावा म्हणून ओंजळ तोंडाजवळ नेली पण ओंजळ रिकामी होती! साहेब तो पर्यंत पुढे जाऊन थांबले होते. त्यांनी आम्हाला काय झाले वगैरे काही विचारले नाही. आम्ही पहिल्या साहेबांच्या दालना पेक्षा दुसऱ्या मोठ्या खोलीत आलो.बहुतेक हे आणखी मोठ्या साहेबांचे आॅफिस असावे. साहेब मोठे असतील. पण आमच्या बरोबर आलेल्या साहेबांपेक्षा तरूण होते. ते तोंडभर हसून हाय हॅलो करत पुढे आले.

ते म्हणाले, “ तू पेन्सिल,चारकोल, ब्रशने चित्रे काढतोस. तू काढलेली पोरट्रेट्स पाहिली. अजून सराव चालू ठेव.आणि आमचे आर्ट डिपार्टमेंटचा स्टाफ म्हणत होता की तू आॅईल पेंट तर करच पण आवड असल्यास शिल्पकामही कर.” माझे लहान काम ही मोठी माणसे इतके बारकाईने पाहतात तेच पुष्कळ होते!

मी गप्प बसलेला पाहून पहिल्या साहेबांनी चहा आणायला सांगितला. कुणाला ते समजले नाही. पण रुबाबदार पोषाखातल्या एकाने चहा बिस्किटे आणली. मी व बहिणीने कपात बोट बुडवुन कपात चहा आहे ह्याची खात्री करून घेतली. दोघे साहेबही हसले. मोठ्या साहेबांनी ,” बिस्किटेही खरी आहेत” म्हणत बिस्किट खायला सुरवात केली!

चहा झाल्यावर मोठे साहेब उठलेले पाहून आम्हीही उठलो.”चला” म्हणत बाजूच्या भिंतीकडे गेले. आम्ही तिघेही तिकडे गेलो.भिंतीची लिफ्ट कशी झाली समजले नाही.खाली जातोय की वर हे न समजल्यामुळे मी व बहिण आतून घाबरून गेलो. पण काही क्षणात आम्ही अर्ध चंद्राकार स्टुडिओत होतो.हे आमचे आर्ट,ॲनिमेशन डिपार्टमेंट. पार पलिकडे दिसते ते रोबोटिक्स लॅब आहे साहेब सांगत होते. पण मला ती आपली नेहमीच्या माणसांसारखी वाटली.काही स्त्रिया, पुरूष निरनिराळ्या वयांची मुले; असे पाहात होतो. निरनिराळ्या जागेत बरेच जण काम करत होते. त्यातही तिघे वरिष्ठ असावेत. दोन मोठ्या साहेबांना पाहिल्यावर ते तिघे सामोरे आले. त्यांचे काही बोलणे झाले. ते चालू असता एका वरिष्ठाने मला चित्रकारांच्या घोडीकडे,(फळ्याकडे)नेले. त्यावर कॅनव्हास होते. ते म्हणाले,” तुला वाटेल ते रंगव.” मी म्हणालो,” मला कॅनव्हसवर काढण्याची सवय नाही.” ते हसले. त्यांनी ते कॅनव्हस काढले.खाली दर्जेदार ड्राॅईंग पेपर होता. मी समोरच्या भव्य चंद्राकार काचेत दिसणारे प्रतिबिंबच काढू लागलो. ते पाहून वरिष्ठांना आश्चर्य व माझ्या उत्स्फूर्ततेचे कौतुक वाटले. ते हसले. इतरांनाही त्यांनी खुणेने मी काय रंगवतोय ते पहायला सांगितले.

त्या प्रचंड अर्ध गोलाकार सभागृहात -हो सभागृहा येव्हढा- विशाल हाॅल होता. तिथे काय नव्हते. सर्व कला व कलाकार होते. वादन, गायन, नृत्य, अभिनय सगळे कला प्रकार दिसत होते.शिल्पकला ही चालू होती.कुणी भाषणही करत असावेत. हे सर्व दिसत होते. पण अधल्या मधल्या अदृश्य काचांमुळे काहीही ऐकू येत नव्हते.

मोठे साहेब निघाले म्हटल्यावर आम्ही तिघेही निघालो. पुढे गेल्यावर केसाच्या सुंदर बटे प्रमाणे वळणदार जिन्याची पायरीच पायाखाली आली. समोरचा व मागचा जिना गुंडाळला गेला का नाहीसा झाला ते समजण्या आत दुसऱ्या आॅफिसमध्ये कांचेच्या खुर्च्यावर विराजमान झालो होतो! विराजमानच म्हणायला हवे. सिंहासनासारख्या त्या खुर्च्या होत्या. एका माणसाने मोठ्या साहेबांच्या समोर एक देखणा ट्रे ठेवला. त्यावरचे पाकिट साहेबांनी माझ्या हातात दिले. ते म्हणाले,” हा तुमचा चेक.”. चेक न पाहताच मी तो परत देत म्हणालो,” सर, आमचे बॅंकेत कुठले खाते असणार? मला रोख दिले तर बरे होईल .” साहेबांनी सर्व रक्कम रोख देता येणार नाही म्हटल्यावर बहिण म्हणाली,” सर पाच हजार तरी द्या. आणि बाकीच्या पैशाचा चेक द्या.” तो माणूस पुन्हा आत जाऊन एक पाकिट घेऊन आला. दोन्ही पाकिटे मला दिली. एका पाकिटात चेक व दुसऱ्या पाकिटात पैसे. पाकिटातले पैसे मी मोजायला काढणार इतक्यात बहिणीने कपाळाला आठ्या घालत माझ्या हातून दोन्ही पाकिटे घेतली. पर्समध्ये ठेवली. पहिले साहेब हसले वाटते!

पहिले साहेब म्हणाले,” निघायचे ना?” मोठे साहेबही हो हो म्हणत उठले. आम्ही सगळे पुन्हा माझी चित्रे होती त्या उंच छताच्या शांत आणि प्रसन्न दालनात आलो. येताना मोठ्या साहेबांनी कसे काय वाटले तुम्हाला असे विचारल्यावर मी उत्साहाने सांगितले,” सर, हॅरी पाॅटरच्या जगात,अल्लाउद्दीनच्या गालिचावरून आलो असे वाटले.” साहेब हिरमुसले. विचारात पडून ते ,” खरं?” इतकेच म्हणाले. पहिल्या साहेबांकडे वळून ते काही तरी इंग्रजीत बोलत होते. मला हाॅगवर्ट, मॅजिक, अदभुत व नो नो! We aren’t yet there; असे काही तरी पुटपुटल्यासारखे वाटले. माझ्याकडे पाहात पहिले साहेब मला म्हणाले,” तुला AI, VR, रोबाॅट माहित असेल ना?” मी म्हणालो,” हो,फक्त ऐकून माहित आहे. ‘भास-आभास का हे खरेच आहे’ असे वाटावे असे काही आहे ते. व “Yes; मोठे साहेब म्हणाले. पण आम्ही त्याच्या पुढे जाऊन आभासही प्रत्यक्षात खराच करणार आहोत.” त्यावर माझी बहिण म्हणाली, मग ते तर आता आहेच की.!” “ वास्तव, दिसणारे आणि जाणवणारे त्याच जगात तर आपण आताही आहोतच की सर! तुम्ही आणखीन काय वेगळे करणार?” मीही भर घालत म्हणालो,” आता पलीकडे माणसांसारखे रोबाॅट्स पाहिले. तुम्ही रोबाॅट्सचे जग करणार का? “ त्यावर दोघेही साहेब घाईघाईने ,” नाही! नाही!, तसले काही करणार नाही. ती प्रयोग शाळा आहे. त्यासाठी आम्ही माणसांऐवजी रोबॅट्सचा वापर करतो.” “रोबाॅट्स वाटत होते हालचालींवरून पण सर ती माणसेच दिसत होती” माझी बहिण म्हणाली. त्यावर दोघेही साहेब सांगू लागले नाही ती दिसत असली तरी माणसेही नाहीत. आहे त्या पेक्षा चांगले जग करणार आहोत आम्ही.” “आहे त्यापेक्षा जग चांगले करायचे तर आधी माणूसच चांगला करायला हवा; हो ना? बाकीचे जग तर चांगलेच आहे! आपण काऽय म्हणतोऽ बघा तेऽऽ,” मोठे साहेब पहिल्या साहेबाकडे पाहात विचारत होते. “ Utopia , रामराज्य.”
“Yes, Utopia रामराज्य!”
ते ऐकल्यावर मी अडखळत म्हणालो,” सर मी फार लहान आहे. माझे आजोबा त्यांच्या वेळच्या गोष्टी सांगतांना ते फार उत्साहात आनंदात असतात. त्यांचा काळ ते म्हणतात रामराज्यच होते! माझे वडीलही त्यांच्या शाळा काॅलेजच्या दिवसांच्या आठवणी सांगतात तेव्हाही त्यांना किती बरे वाटते,आनंद होतो ते आम्हाला समजते. ते त्यांचे युटोपिया होते. लागलीच बहिण म्हणाली,” गतकाळ रामराज्यच असते; काल रामराज्य!”
जणू आम्ही दोघेच बोलतो आहोत समजून मी भर घातली,” आजही उद्या कालच होणार! कालचा दिवस युटोपिया असतो.”jj
हे ऐकून दोघे साहेब म्हणाले,” आम्ही आज आणि उद्यालाही युटोपिया, रामराज्यच करणार आहोत!”
मी थोडा वेळ गप्प होतो. नंतर हळूच म्हणालो,” सर! रामराज्य आणि सुखी माणसाचा सदरा दोन्हीही virtual पेक्षाही पुढे पळणाऱ्या, पुसल्या जाणाऱ्या कjल्पना आहेत ना ? सर,तुमची ही कंपनी, आॅफिस पाहताना कल्पनेच्या पलिकडले काही पाहतो आहे असे वाटत होते. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नव्हता. सर, सुखी माणूस दिसला असे वाटले पण इथेही त्याचा सदरा नाही सापडला!” मी थोडे निराशेने म्हणालो असेन. लगेच बहिणीने विचारले ,”तुला मृगजळ म्हणायचेय का?”
मी म्हणालो,”नाही; मृगजळ हा ‘खरा’भास आहे. मला कल्पना किंवा कल्पनेसारखे काही म्हणायचे आहे. कारण कल्पना केव्हा का होईना त्या प्रत्यक्षात येतात! आणि दोघेही साहेब म्हणतात तसे त्यांचेही प्रयत्न वास्तवात येतील.” इतके सगळे बोलत असताना, मी येव्हढा तत्वज्ञानी कधी झालो ह्याचे मलाच आश्चर्य वाटत होते.

दोघेही साहेब उत्साहाने एकसुरात म्हणाले,” YES! YES! लवकरच आम्ही तो सदरा देणार आहोत तुम्हा सर्वांना!” त्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह पाहून कुणालाही उमेद आली असती. मग आम्हालाही का नाही येणार?

मी आणि बहिण निघताना ते म्हणाले,” तुझे शिक्षण पूर्ण झाल्यावर तू आमच्याकडे केव्हाही येऊ शकतोस. तुझी चित्रे घेऊन केव्हाही येत जा. तुझ्या चित्रकलेसाठी आणि कल्पनेसाठीही आमचे दरवाजे नेहमी खुले आहेत!”च

त्यांचा निरोप घेऊन मी आणि बहिण आनंदात हातातल्या पाकिटातील आमचा ‘सुखाचा सदरा’पाहात घरी आलो!

हाके राव

शीव

“दोन इसम पाच रुपये! ते मागचे मामा त्यांचे अडीच घ्या! साहेबांचे साडे चार! “ हाक्के हाॅटेल मधल्या वेटरचे आवाज चालू होते.वडा,वडापाव, मिसळीच्या प्लेटी भराभर ठेवल्या जात होत्या हाक्केभाऊ टेबला मधून फेरी मारत बारकाईने पाहात होते. “अरे, सुभ्या, तीन नंबरला पाणी दे ना”असे थोड्या जरबेनेच सांगत होते. नेहमीच्या गिऱ्हाईकांशी दोन शब्द बोलून परत गल्ल्याकडेल येत होते.
आमच्या गावचा हाक्के वडा प्रख्यात होता.
नगरपालिकेचे गाव होते. महापालिका होण्याला अजून काही वर्षे लागणार होती.
शहर म्हटले की हाॅटेले, ऱेस्टाॅरंट आलीच. रेस्टाॅरंट बरोबरीने आमच्या शहरातही चहाच्या गाड्या, टपऱ्या होत्या. प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकलेली पत्र्याची हाॅटेले होती. हाकेचे रेस्टाॅरंटही बेताचेच आणि बेताच्या मध्यम भागात होते.
हाक्केला शहरातले अनेकजण ओळखत होते. पण निरनिराळ्या नावाने ओळखत होते. काहीजण हाकेराव म्हणत. काही हाके भाऊ,हाक्के दादा म्हणून आवाज देत. काही हाक्केभाय् म्हणत हसून मान झुकवत. हाके हाक्के एकच होता. पण सगळे त्याला त्यांच्या त्यांच्या नावानेओळखत होते.
हाकेच्या बेतशीर हाॅटेलात नेहमीचे पदार्थही मिळत असत. चहा फुल-हाप, स्पेशलही होता. पण तिन्ही चहासाठी काचेचा ग्लास एकच होता. काना एव्हढा लहान नव्हता, पंजा एव्हढा उंच नव्हता, मुठी इतका मध्यम होता. ताटल्या चमचे स्टेनलेसचे होते. हाक्केचा राव-दादा, भाऊ -भाय् होण्यापूर्वी, ‘ए हाक्के’म्हणणाऱ्या गिऱ्हाईकांना मात्र त्याच्या हाॅटेलातल्या ताटल्या चमचे जर्मलचे होते तेही आजआठवत असते.

हाकेचा प्रसिद्ध वडा इतर हाॅटेलांसारखाच होता तरी तो त्याचाच वडा म्हणून का ओळखला जातो ते शहरातल्या अनेक लोकांना समजत नसे. तसे पाहिले तर स्वत: हाक्के भाई,भाऊ-दादा-रावांला सुद्धा लगेच लक्षात येत नाही.

मी,एकदा हाक्केच्या वाॅर्डाचे आजी माजी नगरसेवक आणि नगराध्यक्ष नगरपालिकेच्या प्रकरणांसाठी कोर्टात वकीलांना भेटायला गेलो होतो. वाटेत हाक्केचे हाॅटेल दिसले. नगरसेवक म्हणाले, चला आलोच आहोत तर तुमची हाक्केभाऊंशी ओळख करून देतो.

आम्ही हाॅटेलात आलो नसू तेव्हढ्यात स्वत: हाक्केराव पुढे येऊन नगरसेवकाला व आम्हाला नमस्कार करत आला. त्याच्या गल्ल्याच्या कांऊंटर जवळचे टेबल- खुर्च्या मुलगा साफ करेपर्यंत रेंगाळलो आणि हाक्केने आम्हाला टेबलाकडे नेले. टेबला भोवती गल्ल्यावर विझून गेलेल्या उदबत्तीचा सुवास रेंगाळत होता. आमच्यासाठी वडा पाव आला. आम्ही सगळेच नको म्हणालो. पण नगरसेवकाने घेतला आणि हळूच नगराध्यक्षांना म्हणाला,” घ्या साहेब. हाक्केभाऊला वाईट वाटेल.” हाक्केने हे काहीच ऐकले नव्हते. मग मलाही तो खावा लागला. त्याच्या सुरवातीच्या वड्यासारखाच होता. गरम होता, तेलावर वाफवलेल्या मिरच्यांबरोबर तो चांगला लागला. चहा झाल्यावर आम्ही सर्व निघालो. “तुमच्या वड्याचे एव्हढे स्पेशल काय आहे हो ?” असे नगराध्यक्षांनी विचारल्यावर हाके म्हणाले, “ मी काय सांगणार ? बरीच वर्षे करतोय तसाच अजूनही होतोय.इतकंच साहेब.” असे हाक्केभाऊ म्हणाला.

आम्हाला गाडीपर्यंत पोचवायला हाकेभाऊ आला होता. माझ्याकडे पाहात म्हणाला,” काय रे..काय ..हो, बरेच दिवसात आला नाहीस— आला नाहीत?” “काम वाढलंय. राहायलाही जरा लांब गेलो आहे. पण येत जाईन मधून मधून.” हे मी जरा अडखळतच म्हणत होतो.

गाडीत बसल्यावर नगरसेवकांनी हाक्केभाऊ तुम्हाला कसे ओळखतो असे विचारलेच. लोक म्हणजे मतदार व ते नगरसेवकाला जास्त ओळखतात हे गणित जाणणाऱ्या नगरसेवकांनी विचारल्यावर मी त्यांना जे सांगितले तेच तुम्हालाही सांगतो-
काॅलेजपासून मी त्याला ओळखतो. अगोदर लहान गाडी, मग टपरी आणि आता हे बेताचे का असेना हाॅटेल. काॅलेजला जाता येता मी हक्केच्या टपरीवर येत असे. थोडक्यात वारंवार येत असे.मी येत असे तेव्हा कोणी ना कोणी एक दोघे गरीब माणसे वडापाव खाऊन पाणी पिऊन जाताना,”हाकेदादा येतो. लै बरं वाटलं बघं, पोट कसं गार झालं”म्हणत जात असत. पैशे हाक्के मागत नसे,ती माणसे देत नसत. एकदा विचारु का नको असे ठरवत मी त्याला विचारले,”ही अशी माणसं रोज येतात का?” “ हां येतात.” हे केव्हा पासून चाललं आहे?” “अरे माझी हातगाडी होती तेव्हापासून.” तो सहज नेहमीच्या आवाजातच बोलत होता. काही वेळा मी चहा वडा काही घेत नसे. थोडावेळ गप्पा मारून जात असे. त्यातच जून जुलै महिन्यात त्याच्या टपरीत थोड्या पाटी पेन्सिली वह्या दिसल्या. मी काही विचारले नाही. पण सात आठ दिवसांत ते सामान सगळे संपले होते. मी समजलो.

हे ऐकल्यावर नगरसेवक आणि नगराध्यक्ष गप्प बसले होते. विचारात पडलेले दिसले. आठ दिवसांनी त्यांनी मला त्यांच्या दालनात बोलावून घेतले. नगरसेवकही होते. अध्यक्ष म्हणाले , “ तुम्ही सांगितल्यावर लक्षात आलं की हाक्के हे काम बरीच वर्षे करतोय. आपण त्याच्या करता काही करावे असे वाटतंय.” मी म्हणालो,” नगरपालिकेने काही करायचे म्हटले तर सभा, ठराव,पैसा, मंजुरी आणि शिवाय एकट्या हाक्केलाच का दुसऱ्यांनाही का नको असे फाटे फुटणार.हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.” त्यावर ते गप्प बसले. थोड्या वेळाने म्हणाले,”मीही विचार करतोय त्यावर. पण तुम्ही त्याच्याशी बोला ह्यावर; एकदम काही सांगू नका. त्याला काय वाटते ते महत्वाचे आहे.” “ मी म्हणालो, “ बरोबर आहे तुमचे. पण थोडा वेळ लागेल.” ते म्हणाले, “हरकत नाही.”
काही दिवसांनी मी हाक्केच्या हाॅटेलात गेलो. मी एकटा हे पाहून त्याला बरे वाटलेले दिसले. नेहमी प्रमाणे पूर्वीच्या दिवसांची भराभर उजळणी झाली.,मी सहज इतकेच विचारले,”हाक्केराव, अजून चालू आहे का?” “ ते कसं बंद पडेल? गरीबी चालूच असते!” आता महागाई वाढत चाललीय. जास्त लोक गरीब होत आहेत असं वाटतेय.”मी म्हणालो,”तू एकटा पुरा पडशील?” छ्या:काय बोलतोस! “ अरे तुला माहित आहे तेव्हाही माझ्या डोक्यात कधी हे आलं नाही. अरे मी केव्हढा आणि गरीबी केव्हढीऽ!”
पुन्हा आठ दिवसांनी गेलो. त्याला म्हणालो की,”आम्ही तुला त्या वडापावाचे पैसे दिले तर चालतील का?”
हाके विचारात पडला. “माझ्या हाॅटेलात बिल तिकिटावर लिहून देत नाही आम्ही. पोरं ओरडून सांगतेत.तुम्हाला पावती बिलं लागणार. कुठून देणार? तुम्ही स्वत: देणार का म्युनसिपालटी देणार आहे? रोजचे रोज देणार का महिन्याला ?” हाकेला मी तिथेच सर्व सांगू शकलो असतो. पण म्हटले थोडा वेळ घ्यावा.
आमच्या तिघा चौघांत बरीच भवति न भवति होऊन तूर्तास रोजचे रोज द्यावेत म्हणजे किरकोळ खर्चात रक्कम टाकता येईल. हाकेच्या माणसाने मला किंवा नगरसेवकाला भेटावे. व हाकेचा कागद दाखवून पैसे घेऊन जावेत ठरले. मी हाक्केभाऊला तसे सांगितले. तो म्हणाला, “मुलगा दुसरे दिवशी सकाळी येईल. कारण रात्री अकरा पर्यंत हाॅटेल बंद होते.”

सुरळीत सुरु झाले.माझ्या आणि हिशेबनीसाच्या एक गोष्ट लक्षात आली. सर्वसाधारणपणे रोज पाच सहा वडापावचे बिल येई. कधी बिलच नसे.तर आठदहा दिवसांतून एकदम दहा बारा वडापावचे पैसे द्यावे लागत. महिन्यानी हाक्केदादाला बोलावले. तो आला. नगराध्यक्षाचे दालन, गुबगुबीत खुर्च्या काचेखाली हिरव्या फ्लॅनलचा टेबल क्लाॅथ असलेले मोठे टेबल वगैरे पाहून सुरवातीला तो बिचकला असणार. पण थोडे हवापाण्याचे बोलणे झाल्यावर त्याला नगरसेवकांनी, आम्हाला पडलेला प्रश्न विचारला.त्यावर हाकेभाऊ म्हणाला, “साहेब, गरीब झाला तरी त्याला रोज फुकट खायला गोड वाटत नाही. दोन वेळचे पोट अर्धवट भरले आणि दुसरे दिवशीचा सकाळच्या चहा बटेर पुरते मिळाले तरी ते येत नाहीत. तुमची गरीबीची रेघ का काय म्हणता ती मला समजत नाही. पण मी पाच सात रुपयापासूनचे दिवस पाहातोय; आता वीस पंचवीस मिळाले की माणसे येत नाहीत. म्हणून कधी दोन चार तर कधी सहासात तर मध्येच एखादा दिवस आठ- दहा जण येतात.”
ह्या अधिकृत अनधिकृत योजनेला सहा महिने झाले. पुन्हा आम्ही हिशेबनीस आणि हिशेब तपासनीसासह सगळे हाक्केदादाकडे गेलो. मुद्दामच रात्री गेलो. काही तरी उपाय करावा लागणारच होता. सर्वांच्या सरळपणा आणि प्रामाणिकपणावर चाललेली ही हाकेभाऊच्या धर्मार्थ कामाला आमची निम्मी मदत चालली होती. मदत निम्मीच करा हेसुद्धा हाकेभाऊनेच सांगितले होते. पण काही चांगले ठोस व्हायला पाहिजे असे आम्हाला वाटत होते. त्यातूनच बोलता बोलता ‘वडा पाव, पाव-मिसळ’ योजना का काढू नये? हा विचार पुढे आला. आमच्यापैकी बहुतेकांचे म्हणणे असे की हे नगरपालिकेचे काम नाही. हाक्केभायने सुचवले,” अहो सब्शिडी म्हणा की ग्रॅन्ट द्या कुणाला. चालव म्हणावे.” लगेच आम्ही सर्वजण एकसुरात म्हणालो, दादा, तुम्हीच चालू करा. आम्ही देऊ ! बघा! केव्हा करता सुरू?” “साहेबांनो, जागा पाहण्यापासून सुरुवात आहे. रोजचे पोट हातावर असणाऱ्यांच्या सोयीचे ठिकाण पाहिजे.” पण नक्की झाले.
एकदिड महिन्यात हाकेदादाचा निरोप आला. जागा ठरली. तुम्ही पाहायला इथे इथे या. आम्ही गेलो. आम्ही कोण हो नाही म्हणणार? पाण्याचा नळ द्या साहेब तेव्हढा.” इतकेच तो म्हणाला. तेही काम झाले. चांगल्या पत्र्याच्या मंडपात वडा वडापाव आणि मिसळ पाव केंद्र सुरु झाले. सर्व साधारण गिऱ्हाईकालाही प्रवेश होता. पण त्यांना नेहमीच्या दराने पदार्थ मिळत.पहिल्या दिवशी सर्वांनाच कोणताही पदार्थ मोफत होता. नगराध्यक्ष म्हणाले, “हे ठिकाण गरीबाच्या उपयोगी पडावे ह्यासाठी आहे. त्यांनी यावे. पण केंद्राची भरभराट होवो असे मात्र मी म्हणणार नाही. अडीअडचणी वेळी काही तरी आधार असावा ह्या साठी हे केंद्र हाक्केदादांनी काढले आहे.”
दोन महिन्यात आणखी केंद्र दुसऱ्या भागात काढले. हाकेची दोन्ही मुले ती सांभाळू लागली. हाकेदादा दर दिवशी एकदा एका केंद्रावर जाऊन यायचा.

दिवस जात होते. केंद्रावर आता सर्वसाधारण गिऱ्हाईकांचीही ये जा वाढू लागली. गल्ल्यात भर पडू लागली.केंद्रावर तसेच पहिल्या हाॅटेलमध्ये अजूनही गरीब मजूर कामगार येत असत. हाकेदादाला तोंडभरून आशिर्वाद देऊन, कोणी शुक्रिया जी करून जात असत.

नगरपालिकेची महापालिका झाली. आजूबाजूची गावे सामील झाली. शहर वाढू लागले. हाकेदादांनी आपल्याच हाॅटेलातील चार पोरांना दोन हातगाड्या आणि थोडे पैसे देऊन वाढलेल्या वस्तीत गाड्या चालवायला दिल्या. त्यांना स्वतंत्र व्यवसाय दिला. तेच मालक! एक म्हणाला, दादा, मी चायनीजची गाडी काढणार तर दुसरा म्हणाला,आम्ही सॅन्डविचची! हाकेराव म्हणाला,” बरोब्बर! काही तरी नवीन करा.”
हाकेरावच्या मदतीला त्याची बीकाॅम शिकलेली काॅन्प्युटरचा कोर्स केलेली मुलगी अर्धा दिवस हाॅटेल चालवू लागली. हाकेरावला दोन्ही केंद्राकडे जायला मिळू लागले. मुलगी अर्धा दिवस टॅलीचे शिक्षण घेत होती. यथावकाश तेही पूर्ण झाले. केंद्रावर दोन्ही मुलांनी माणसे चांगली तयार केली होती. महापालिका झाल्यामुळे आजूबाजूच्या सरहद्दीवरचे गरीबही येऊ लागले. आधीच्या गरीबांच्या गर्दीत नविन गरीब आले.

महापालिकेने गरीबांच्या उपयोगाची आणखी दोन केंद्रे काढली. शिकलेली पण बेकार दोन चार तरुण मुले ती चालवू लागली. महापालिकेने हाकेरावला चारी केंद्रावर मानधनावर देखरेख करून चांगली घडी बसवण्याचे काम दिले. ते काम पाहू लागला.पहिल्या हाॅटेलवर तोंडभर आशिर्वाद देणाऱ्यांचीही वाढ होऊ लागली. हाकेभाऊंनी पूर्वी प्रमाणेच आपली प्रथा चालू ठेवली होती.मुलीला पूर्णवेळ नोकरी लागली. हाकेदादाची तारांबळ होऊ लागली. पण विश्वासू नोकर व दोन्ही मुलांची मदत ह्यामुळे सर्व निर्धास्त चालले होते.

दिवस वर्षे सरत होती. हाके थकला होता. महापालिकेत मला किंचित बढती मिळाली होती. मी कधी मुद्दाम वेळ काढून हाकेभाऊंना भेटत असे. आठवणींना उजाळा देऊन झाले की म्हणायचा,” बघ तुझ्या समोर किती घडून गेले. आपल्याला चांगले दिवस लवकर आले.”

हाकेराव थकले होते. मुला मुलींचे संसारही चांगले चालले होते. आलेला माणूस जाणार ह्या न्यायाने कुणाचा हाके भाऊ-हाकेदादा-हाकेराव- हाक्केभाई गेले. अंत्यात्रेला अनेक लोक होते. हार जाड जूड नव्हते. माळा म्हणाव्या तसे होते. वर वर जात चाललेल्या गरीब रेषे खालची हाकेभाऊ-दादाची मंडळी खूप होती. ते लोक आपले डोळे पुशीत चालत होते. अंत्ययात्रा वेगळी होती.

काही विद्यार्थी विद्यार्थिनी वही पुस्तके कंपास पेट्या छातीशी धरून चालले होते.कुणी क्रिकेटची बॅट, हाॅकीची स्टिक बंदुकी सारखी खांद्यावर घेऊन चालत होती; काही पोरं पेन्सिली, बाॅलपेन फूटपट्ट्या घेऊन आली होती. बऱ्याच आयाबापड्याच्या कडेवरच्या आणि बोट धरलेल्या मुलांच्या हातात खेळणी होती.थोड्या मुली नविन ड्रेस घालून आल्या होत्या. शाळेतली काही पोरं दोन पुड्यांचे मधल्या सुट्टीचे डबे मधूनच कपाळाला लावून हुमसत होती. पदवीचे झगे घातलेले दोन तीन तरूण आपले ओघळणारे डोळे,चेहरे लपवत होते. ही गर्दी वेगळी होती.

चिरायु होवो, अमर रहे असे कापडी फलक नव्हते. बॅन्ड नव्हता, टाळ मृदुंगही नव्हते. तीन हलगीवाले वाजवण्याचा प्रयत्न करीत होते. पण आवाज निघत नव्हता. अंत्ययात्रेत कृतज्ञतेचे हुंदके होते.ही गर्दी तशी वेगळीच होती!
हाकेभाऊची अंत्ययात्रा पाहिली आणि आम्हा सर्वांचे, ‘हाक्केरावसाठी आपण कितीऽ केल्याचे’ अहंकाराचे तरंगते फुगे हवेतच फुटले.

स्मशानभूमीत कोणी भाषणे करू शकले नाहीत. जमलेल्यांच्या मनात संभाषणे चालू होती
स्मशानातून परतताना हिशेबनीस व हिशेब तपासनीसांनी हाकेरावची एक गोष्ट सांगितल्यावर तर आमच्या सर्वांचा उरला सुरला गर्वही गायब झाला. ते म्हणाले,
“ हाक्केदादांनी मानधनही कधी घेतले नाही!”

अखेरीच्या दिवसात मी जेव्हा हाकेभाऊला अजूनही त्याच्याकडे गरीब बऱ्याच संख्येने येतात; तुम्ही त्यांच्यासाठी कायमचे करत आलात, असे म्हटल्यावर हाकेराव थोडा वेळ गप्पच होते. मग म्हणाले, “ करता येईल तेव्हढं करायचे. काही करायचे असे ठरवून कधी केले नाही. ती माणसे दोन तीन तास तरी त्यांची भूक विसरत होते.दुसरं काय !”

पद्मश्री,नगरभूषण सारख्या पदव्या हाकेसारख्या माणसाच्या वाटेला जात नाहीत. त्या पदव्यांपेक्षा फार मोठ्या ‘हाकेराव, भाऊ, दादा, हाकेभाय’ ह्या पदकांच्या माळा त्याला जास्त शोभत होत्या.

हाकेभाऊ गेल्यानंतर काही दिवसांनी मी,माजी नगराध्यक्ष,आणि ते नगरसेवक बोलत होतो. मी नगराध्यक्षांना म्हणालो, “ पहिल्या भेटीत तुम्ही हाकेरावना त्यांच्या बटाटे वड्याचे वैशिष्ठ्य काय विचारले होते, आठवतेय ना?” ते लगेच उत्तरले,” हो हो आणि त्यांचे उत्तरही आठवते! “ हाकेराव म्हणाले होते की ते पूर्वी जसा करत तसाच आजही तो बनतो, इतकेच.”
आम्ही सगळे थोडा वेळ गप्पच होतो. हळू हळू आमच्या लक्षात आले की हाक्के वड्याची प्रसिद्धी त्याच्या चवीमुळे नव्हती; ते बनवणाऱ्या माणसामुळे होती! ‘सामान्यांसाठी सामान्यांचा’ हाकेराव सामान्य होता!
‘सामान्यांच्या सामान्य’ हाक्केभाऊनी गावाने देऊ केलेले मानधनही घेतले नव्हते!

समुद्र

मॅरिएटा

महाभारतातील समुद्राचे नाट्यमय वर्णन

महाभारताची थोरवी नुकतीच तुम्ही वाचली. आज महाभारताच्या सोन्याच्या लगडीसम वजनदार भाषेचा प्रभावी आविष्कार व्यासांनी केलेल्या समुद्राच्या वर्णनातून दिसतो तो भाग वाचण्यासारखा आहे. त्या वर्णन वाचण्या अगोदर त्यामागची पार्श्वभूमी एकदोन वाक्यात सांगतो:


विनता व कद्रू ह्या दोघी बहिणी बहिणी. त्या दोघीही कश्यप मुनीच्या बायका. बहिणी एकमेकींच्या सवती झाल्या. त्या दोघींमध्ये समुद्रमंथनातून निघालेल्या उच्चै:श्रवा ह्या रत्नाचा (घोड्याचा) रंग कोणता ह्यावर पैज लागली होती. विनतेचे म्हणणे तो संपूर्ण पांढरा आहे तर कद्रू म्हणत होती की उच्चै:श्रवा पूर्णपणे पांढरा नाही. जी पैज हरेल ती दुसरीची(आपल्या सवतीची) दासी होईल असेही ठरले होते.


उचै:श्रवाला प्रत्यक्ष पाहून खात्री करून घेण्यासाठी त्या दोघी समुद्र दर्शनाला निघाल्या. त्यांना समुद्र दिसतो. त्यावेळी समोर पसरलेल्या समुद्राचे वर्णन व्यासमुनी करतात. समुद्राचे त्याच्या गुणांसह, त्याचे स्वरूप, त्याच्या वृत्ती, समुद्राची गंभीरता, त्याच्या पोटातील प्राणी ह्याचे विशेष सुंदर शब्दांनी अलंकृत केलेले अप्रतिम वर्णन मोठे विलोभनीय आहे. वाचनाचा आनंद म्हणून जो असतो तो देणारा हे वर्णन आहे असा माझा अनुभव आहे. कोणत्याही नटाला आव्हान देणारे जणू ते स्वगत भाषणच आहे! मी ते थोडा फेरफार व काही काटछाट करून लिहित आहे. पण तसे करतांना व्यास आणि भाषांतरकारांवर कोणताही अन्याय किंवा त्यांना उणेपणा येईल असे मी काहीही केले नाही.


रात्र संपली. पहाट झाली. सूर्यही उगवला.तेव्हा पैज हरली तर दासी होण्याचे मान्य केलेल्या कद्रू आणि विनता ह्या दोघी बहिणी मोठ्या उत्सुकतेने उचै:श्रवा नेमका कसा आहे व कोणत्या रंगाचा आहे ते निश्चित करण्यासाठी निघाल्या. विनताचे म्हणणे तो पूर्ण पांढरा तर कद्रूचे म्हणणे त्याची शेपटी काळी आहे.


“ त्या दोघी सागरतीरी आल्या. समोर समुद्र अथांग पसरला होता. अथांग पाण्याने भरलेला, उसळत्या लाटांनी तांडव करणारा; प्रचंड गर्जना करीत लाटांनी पुढे सरकणारा, तिमिंगल, झष, मकर, आणि त्यांच्यापेक्षाही किती तरी अधिक भयानक, विचित्र व घोर जलचरांमुळे कोणासही भीतीमुळे आपल्या जवळपास येऊ न देणारा; रत्नांचा खजिना, वरूणाचे निवासस्थान, सर्व सरितांचा पती, भीषण असूनही पाहात राहावासा वाटणारा, वडवानलाचे माहेर,असुरांचा पाठीराखा, सर्व प्राणीमात्रांचा भयाने थरकाप उडवणारा, पाण्याचे विशाल आश्रयस्थान, कल्पनेच्या कल्पनेलाही अगम्य, विचारांच्याही पलीकडे, अदभुत, आणि भयंकर; भीतिदायक जलचरांच्या निनादामुळे अधिकच रौद्रभीषण, भयानक ध्वनींनी दुमदुमणारा,असंख्य भोवऱ्यांनी भरलेला, सर्व प्राण्यांना भयभीत करणारा, भरतीच्या उंच उसळणाऱ्या लाटा आणि वेगवान वाऱ्यांनी खवळलेला, क्षणाक्षणात खूप उंच उसळणारा, उचंबळून येणाऱ्या आपल्या उंच लाटांच्या प्रेक्षणीय नृत्याने मन मोहून टाकणारा, त्याच्या गर्जना ऐकत एकटक नजरेने पाहातच राहावसा वाटणारा, चंद्रकलांच्या वृद्धीबरोबर आणि त्यांच्या क्षयाबरोबर होणाऱ्या भरती ओहोटीच्या लाटांनी उफाळून येणाऱ्या लाटांनी प्रक्षुब्घ होणारा, अज्ञानी-ज्ञानी, सामान्य-असामान्य लोकांनाही आपला थांग लागू न देणारा, युगारंभी महातेजस्वी पद्भनाभ विष्णुला अध्यात्मयोगनिद्रेसाठी उपयोगी पडलेले शयनस्थान, आपल्यावर वज्रसंकट कोसळेल ह्या भीतीने काळजीत पडलेल्या मैनाक पर्वताचा आहार, आपल्या उदकाच्या आहुतीने वडवानलाला शांत करणारा, अगाध, अपार, अचिंन्त्य आणि विस्तीर्ण असा, परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या अनेक महानद्यांच्या प्रवाहामुळे मागे रेटला जातोय असे वाटणारा, देवमाशांनी, सुसरी मगरींनी गजबजलेला आकाशाप्रमाणे अतिविस्तीर्ण, आकाशाला चंद्र सूर्य ताऱ्यांसह प्रतिबिंबानी सामावून घेणारा, जळाचा अक्षय साठा असा जलनिधान”

– असा महासागर त्या दोघी बहिणींच्या दृष्टीस पडला!


उपमन्यु

मॅरिएटा

धौम्य ऋषींचे आरुणी, उपमन्यु आणि वेद हे तीन शिष्य होते. प्रत्येकाविषयी लहानमोठी कथा आहे. आज उपमन्युची कथा वाचू या:

धौम्य ऋषींनी उपमन्युला गायीची राखण करण्याचे काम सोपवले. गायी राखण्यासाठी उपमन्यु रानात जाऊ लागला. त्यांचे चरणे, पाणी पिणे विश्रांती झाली की सुर्यास्ताच्या वेळी गायींसह उपमन्यु गुरूच्या घरी येत असे.

थोड्या दिवसांनी उपाध्यायांच्या लक्षात आले की रानात जाऊन गायी राखण्याचे कष्टाचे कंटाळवाणे काम करूनही उपमन्यु गुटगुटीत झालाय. त्यांनी उपमन्युला विचारले, रानात तू काय खातो पितोस? चांगला धष्टपुष्ट झाला आहेस की?” त्यावर तो म्हणाला, “ मी भिक्षेवर उदरविर्वाह करतो.” त्यावर उपाध्याय म्हणाले, “ मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय ती तू खाणे बरे नाही.” त्यावर “ ठीक आहे ,” असे म्हणून दुसऱ्यादिवसापासून मिळालेली सगळी भिक्षा गुरूपुढे ठेवत जाऊ लागला. असे काही दिवस गेल्यावर, एकदा गुरूपुढे सगळी भिक्षा ठेवल्यावर त्यांना तो पूर्वीसारखाच धष्टपुष्ट दिसला. त्याच्याकडे खालीवर बारकाईने पाहून ते उपमन्युला म्हणाले, “ अरे उपमन्यु! तू आणलेली सर्व भिक्षा मी ठेवून घेतो. मग तुझे पोट कसे भरते?” त्यावर उपमन्यु म्हणाला, “ प्रथम मिळालेली भिक्षा मी तुम्हाला देतो. मग मी पुन्हाजाऊन भिक्षा मागतोो. त्या भिक्षेवर माझे पोट भागते.” “ अरे, असे कपटाने वागणे तुला शोभत नाही. दुसरी गोष्ट अशी की, अरे, तुझ्यासारखे इतरही कोणी भिक्षा मागून पोट भरत असतील त्यांच्या तोंडातला घास तू काढून घेतोस. त्यांची तू उपासमार करत नाहीस का? असे वागणे लोभीपणाचे तर आहेच पण बेपर्वाईचेही आहे.” “ ठीक आहे गुरुजी मी आता तसे करणार नाही.” खाली मान घातलेला उपमन्यु म्हणाला.

दुसऱ्या दिवसापासून तो एकदाच भिक्षा मागून धौम्य ऋषींजवळ देऊ लागला. रानात गुरे घेऊन जाऊ लागला. संध्याकाळी परत आल्यावर नेहमीप्रमाणे गुरूंना नमस्कार करून अभ्यास करायला बसायचा. हा क्रम चालू असता एका संध्याकाळी उपमन्यु गुरुंना नमस्कार करून जात असता गुरूंना उपमन्यु अजूनही तसाच टुणटुणीत आहे हे लक्षात आले. त्यांनी त्याला आजही विचारले, “ बाळा उपमन्यु! तू सगळी भिक्षा मला देतोस. पुन्हा दुसऱ्यांदा भिक्षाही मागत नाहीस तरी तू अजुनही गुबगुबीत कसा? तुझी भूक तू कशी भागवतोस?” “ गुरुजी, मी गायींचे दूध पिऊन राहतो.” त्यावर उपाध्याय धौम्य म्हणाले, “ गायीचे दूध पिण्याची मी परवानगी दिली होती का? माझी परवानगी न घेता गायीचे दूध पिणे योग्य आहे का?” “ नाही गुरूजी”, नम्रपणे उपमन्यु उत्तरला. “ तेव्हा आता तू गायींचे दूध पिणे थांबव,” आचार्य म्हणाले. त्यावर होय अशा अर्थी मान डोलवून उपमन्यु गेला.

उपमन्युचा रोजचा कार्यक्रम सुरू झाला. “उपमन्यु सगळी भिक्षा मला देतो; दुसऱ्यांदा पुन्हा भिक्षा मागून खात नाही; गायीचे दूधही पीत नाही. तरी सुद्धा उपमन्यु होता तसाच गट्टम गोल आहे “ हे धौम्य ऋषींच्या लवकरच लक्षात आले. तसे त्यांनी उपमन्युला विचारले. उपमन्यु म्हणाला, “ गायीच्या आचळांतू वासरे दूध पीत असताना त्यांच्या तोंडातून जे थोडे फेसासारखे दूध पडते तो फेस पिऊन दिवस भागवतो.”


“ उपमन्युचे उत्तर ऐकल्यावर , “ अरे ही गुणी वासरे तुझी कीव करून मुद्दामच भरपूर फेस बाहेर टाकीत असली पाहिजेत. त्यांच्या तोंडचा फेस पिऊन तू त्यांचे दूध तोडतोस. ते अर्धपोटी राहतात. तु आता दुधी फेसही पिऊ नकोस.” ह्यावर उपमन्यु हो शिवाय काय म्हणणार! तो हो म्हणाला.

उपमन्युचा रोजचा कार्यक्रम सुरू झाला. “उपमन्यु सगळी भिक्षा मला देतो; दुसऱ्यांदा पुन्हा भिक्षा मागून खात नाही; गायीचे दूधही पीत नाही. तरी सुद्धा उपमन्यु होता तसाच गट्टम गोल आहे “ हे धौम्य ऋषींच्या लवकरच लक्षात आले. तसे त्यांनी उपमन्युला विचारले. उपमन्यु म्हणाला, “ गायीच्या आचळांतू वासरे दूध पीत असताना त्यांच्या तोंडातून जे थोडे फेसासारखे दूध पडते तो फेस पिऊन दिवस भागवतो.”


“ उपमन्युचे उत्तर ऐकल्यावर , “ अरे ही गुणी वासरे तुझी कीव करून मुद्दामच भरपूर फेस बाहेर टाकीत असली पाहिजेत. त्यांच्या तोंडचा फेस पिऊन तू त्यांचे दूध तोडतोस. ते अर्धपोटी राहतात. तु आता दुधी फेसही पिऊ नकोस.” ह्यावर उपमन्यु हो शिवाय काय म्हणणार! तो हो म्हणाला.

उपाध्याय धौम्य ऋषींच्या आज्ञेनुसार उपमन्युने एकदा भिक्षा गुरुला अर्पण केल्यावर पुन्हा भिक्षा मागणे थांबवले होते. गायीचे दूध पिणे सोडले. आणि आता तर वासराच्या तोंडचा दुधाचा फेसही पिणे बंद केले. एकदा रानात उपमन्यु तहान भुकेने व्याकूळ झाला. भुकेल्या उपमन्युने रुईची पाने खाल्ली. ती झोंबणाऱ्या चवीची कडवट,नीरस आणि घातक रूईची पाने खाल्ल्यावर उपमन्युचे डोळे गेले. तो आंधळा झाला. तशाच स्थितीत तो रानात चाचपडत राहिला आणि शेवटी एका कोरड्या विहिरीत पडला.

संध्याकाळ झाली. सूर्य मावळूनही बराच वेळ गेला. तरी उपमन्यु रानातून परत आला नव्हता. धौम्य ऋषींना काळजी वाटून ते शिष्यांना म्हणाले, “ त्याच्या जेवणाच्या बाबतीत त्याची मी सर्व बाजूंनी कोंडी केली. तो माझ्यावर चिडला असला पाहिजे. म्हणूनच तो आज परत आला नसेल,” चला आपण त्याला शोधायला जाऊ.” धौम्य ऋषी शिष्यांना घेऊन रानात गेले. काही शिष्यांना दुसऱ्या बाजूने जाऊन शोध घ्यायला सांगितले. आणि काही शिष्यांना घेऊन तेही एका बाजूने उपमन्युला हाका मारत त्याचा शोध घेऊ लागले. गुरुजींचा आवाज ऐकल्यावर उपमन्यु मोठ्याने ओरडून, “ गुरुजी मी ह्या विहिरीत पडलो आहे असे म्हणू लागला. त्याचा आवाज ऐकून धौम्य ऋषींनी तो विहिरीत कसा पडला हे विचारल्यावर उपमन्यु सांगू लागला; “ गुरुजी मी भुकेने व्याकूळ झालो होतो. मी रुईची (रुचकीची) पाने खाल्ली. आणि आंधळा झालो. काही दिसेना. आणि मी विहिरीत पडलो.” हे ऐकून धौम्य ऋषींनी त्याला देवांचे वैद्य आश्विनीकुमारांची प्रार्थना करायला सांगितले. “ते तुला पुन्हा दृष्टी देतील.” असे म्हणाले.

उपमन्युने आश्विनी कुमारांची निरनिराळ्या प्रकारे स्तुती करून, त्यांचे मोठेपण वर्णन करीत त्यांची प्रार्थना केली.


आश्विनीकुमार प्रसन्न झाले. उपमन्युला ते म्हणाले, “ हा मांडा तू खा. तुझ्यासाठीच तो आणला आहे आम्ही.” पण उपमन्यु, आचार्यांना तो मांडा अर्पण केल्याशिवाय खाणार नाही असे वारंवार निक्षून सांगतो. त्यावर आश्विनीकुमार उपमन्युला सांगतात की एकदा फार पूर्वी असाच मांडा त्यांनी उपमन्युच्या गुरूनांही दिला होता. धौम्य ऋषींनी आपल्या गुरूंना न विचारता तो खाल्ला होता, असे उपमन्युला सांगितले. हा इतिहास सांगून ते उपमन्युला मांडा खाण्याचा पुन्हा आग्रह करतात. पण आपल्या गुरूनी परवानगी दिल्यावरच मांडा खाईन असे उपमन्यु पुन्हा सांगतो.

उपमन्युची गुरुभक्ती पाहून आश्विनीकुमार जास्तच आनंदित होऊन त्याला ते दृष्टी देतात. आणि विहिरीतून बाहेर काढतात. उपमन्युला पूर्ण ज्ञान प्राप्त होईल असा आशिर्वादही देतात.

उपमन्यु उपाध्यायांकडे येतो. घडलेला सर्व वृत्तांत सांगतो.धौम्य ऋषीही उपमन्युला,आश्विनी कुमारांनी वर दिल्याप्रमाणे, त्याला वेदशास्त्रांचे संपूर्ण ज्ञान होईल असे सांगतात व त्याला स्वगृही परत जाण्याची परवानगी देतात.

संत चोखामेळा

बेलमाॅन्ट

भक्तांच्या कथा ऐकताना फार बरे वाटते. अनेक वेळा त्या कथांमध्ये तर्कसंगती नसते, तर्कशुद्धताही नसते. पण माणसाच्या मनाला त्या वेगळ्याप्रकारे सुखावत जातात. त्यामागे, आपल्याला नेहमीच्या धबडग्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि तेही अद्भुत घडावे असे वाटत असते. रोजच्या जगण्यात तसे काही होत नसते आणि होणारही नाही हे माहित असते. आणि म्हणूनच ते घडावे अशी आपण अपेक्षा, कल्पना करीत राहतो. नेमके भक्तांच्या, संतांच्या कथा आपली ही साधी इच्छा पुरी करतात.

पण संतकवि महिपतिबुवा आपल्याला त्या कथा ऐकताना सांगतात की “ भक्तकथा ऐकता सुख । अंतरी विवेक ठसावे।। त्या कथांचे सुख अनुभवत असता आपण योग्य-अयोग्य, हित-अहित, चांगले आणि वाईट ह्यातील भेद ओळखण्याची बुद्धी ठेवावी. आणि त्याच बरोबर महिपतिबुवांनी भक्तकथेला अत्यंत गोड शब्दांत दिलेली नेमकी आणि समर्पक उपमाही लक्षात राहण्यासारखी आहे. ते भक्तकथेला “ शांतीवृक्षाचे अमृतफळ” म्हणतात! दोन अतिशय हव्याश्या अनुभवांचा संगम त्यांनी घडवला आहे!

आपण आज ‘उस डोंगा परि रस नव्हे डोंगा’हे सांगणाऱ्या संत चोखा मेळ्याच्या आयुष्यात त्याच्यावर गुदरलेल्या काही प्रसंगांच्या गोष्टी ऐकूया.

एकादशीसाठी सकळ संतांबरोबर चोखामेळाही आपल्या कुटुंबासह भूलोकीच्या वैकुंठाला निघाला. पंढरपुराला आल्यावर पांडुरंगाचे देवळाबाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले तरी चोखा त्या सावळ्या परब्रम्हाच्या प्रेमात अडकून पडला. बायकोला म्हणाला आपण आता इथेच पंढरपुरीच राहायचे.

कुणाचे बोल नकोत ऐकायला म्हणून चंद्रभागेतच पण दूर लांब जाऊन आंघोळ करून तो रोज महाद्वाराशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून व हृदयात साठवून लोटांगण घालीत असे.

शूद्राला त्या काळी कोण देवळात जाऊ देत असेल! पण चोखामेळ्याने विठ्ठलाचे महाद्वाराच्या बाहेर उभा राहून दर्शन घेणेही ढुढ्ढाचार्यांच्या डोळ्यांत खुपत होते. ते त्याला हिणवून टोमणा मारत “ अरे पांडुरंगाला तुला दर्शन द्यायचे असते तर तुला त्यानेच आत राऊळात नेले नसते का? उगीच रोज उगीच शिणतोस? आणि आमच्या वाटेत मधी मधी येतोस?” हां. शेवटचा प्रश्नच त्यांना सतावत होता! पुढे उपमा दृष्टांतांतून तत्वज्ञान सांगत त्याच्यावर छाप पडावी म्हणून बोलत. “अरे अल्पायुषी, आयुष्यहीन रानोरानी मारे भटकला तरी त्याला कल्पतरु भेटेल का? तसाच देवळात असूनही तुझ्यासार…तुला हा जगजेठी दिसणार नाही. व्यर्थ का दुरून श्रीमुख न दिसणाऱ्या विठ्ठलाला दंडवत घालतोस चोख्या?” ह्यावर आमचा अडाणी चोखा मेळा त्या कर्मठ बडव्यांना, आचार्यांना लीनतेने म्हणायचा,” माझे मायबाप हो, पांडुरंगाने मला देवळात नेऊन दर्शन द्यावे एव्हढे मोठे भूषण कशा करता पाहिजे ! अहो लक्षावधी कोसावरून सूर्य इथल्या तळ्यातील कमळाला फुलवतो; तसा दुरूनही पांडुरंग माझं रक्षण करतो. चोखा ढुढ्ढचार्यांच्याच शब्दांत माप घालतांना म्हणतो,” दोन लक्ष गावे निशापती। चकोरावरी अत्यंत प्रीती। तेवी अनाथनाथ कृपामूर्ती । माझा सांभाळ करीतसे।। इथेच न थांबता चोखोबा पुढे आणखी एका मात्रेचा वळसा त्यांना चाटवत सांगतो, कासवी कशी दुरून केवळ प्रेमळ नजरेने पाहात आपल्या पिलांना वाढवत सांभाळ करते तसे, मायबाप हो! विठोबाही माझ्याकडे इतक्या दुरून कृपादृष्टीने पाहतो!” चोखा मेळा त्यांना आता शेवटच्या मात्रेचे चाटण चाखवत विचारतो,” महाराज हो! चोवीस तास त्याच्याजवळ असले आणि मनात पांडुरंगाविषयी प्रेम भक्ती नसली इतकेच काय त्याचा विचारही मनात नसला तर त्याच्या जवळ राहण्याचा काय फायदा? चोख्याचे हा नम्र टोला खाऊन लाजलेली ती सर्व पंडीत मंडळी चला चला, लवकर निघा म्हणत लगबगीने काढता पाय घेत.

एके रात्री चोख्याच्या घरी अचानक पंढरीनाथ आले. ते गडबडून गेलेल्या चोखामेळ्याला म्हणाले,”चोखा चल; मी आताच तुला माझ्या राऊळात नेतो.” आणि क्षणार्धात चोखोबा आणि विठ्ठल गाभाऱ्यात आले. विठोबाने चोखोबाला आपुल्या ‘जीवीचे निजगुज’ बोलून दाखवले. “ अरे चोखा! रोज सकाळी मी तुला महाद्वारा बाहेर उभा असलेला पाहात असतो.,तुझी आठवण येत नाही असा क्षणही जात नाही. नाम्याचा नैवेद्य खाताना, पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचकी येते; ठसका लागतो! तुझ्या आवणीनेच हे होते.” हे ऐकून चोखा काय बोलणार? त्याचे डोळे भरून आले! विठोबाचे पाय धरत तो इतकेच बोलू शकला,” विठ्ठ्ला मायबापा, तूच खरा आम्हा अनाथांचा नाथ आहेस!”

बाहेरच बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू आला. त्याने पांडुरंगाचा आवाज ओळखला नाही(त्यात आश्चर्य कसले?) पण चोखामेळ्याचा आवाज नात्र ओळखला. दाराला कडी कोयंडा कुलुप घातलेले असतानाही हा चोखोबा गाभाऱ्यात शिरला ही बातमी त्याने धावत पळत जाऊन इतर बडवे मंडळींना सांगितली. सगळे जमले.कलुप काढून आत गेले तर खरंच तिथे विठ्ठल मूर्तीपाशी हात जोडून चोखामेळा पुटपुटत असलेला दिसला. मग काय विचारता! “ कुलुप कसे काढलेस? आत कसा शिरलास? दरवाजे बंद करतानाच तू आत होतास का? अनेक प्रश्न धडाधड विचारत होते सर्वजण.

चोखा मेळा हात जोडून दीनवाणे सारखे इतकेच म्हणत होता,” अहो माझा काही गुन्हा नाही. मला स्वता पांडुरंगानीच हात धरून आत आणले. खरं त्येच सांगतोय मी. मला जाऊ द्या. दया करा माझ्यावर” असे म्हणत चोखामेळा जाऊ लागला. पण त्याला सगळ्या वरिष्ठांनी दरडावून सांगितले,”चोख्या आता जा. पण इथे पंढरपुरात राहायचे नाही. तू राहिलास इथे तर तू सांगतोस तसे पांडुरंग तुला देवळात घेऊन येईल रोज. विठ्ठ्लाला तुझा विटाळ नको. काय? पुन्हा इकडे यायचे नाही, लक्षात ठेव!” अशी त्याला तंबी दिली.

विठ्ठलाला तुझा विटाळ नको हे ऐकल्यावर मात्र चोखा थबकला; आणि म्हणाला,” महाराज मी पंढरीनाथाला बाटवले असे म्हणू नका हो.अहो शूद्राने आणि ब्राम्हणाने दोघांनीही गंगेत स्नान केले तर गंगेला कसे काय दूषण येते? गंगा कशी अपवित्र होईल? अहो दुर्जनाच्या अंगाला वारा लागला तर वारा दुष्ट होतो का? त्याला कसला दोष लागेल? पांडुरंगालाही सर्व जाती सारख्याच आहेत!तो आहे तसाच आहे!”

चोख्याचे हे बिनतोड विचार ऐकल्यावर तर पुजारी मंडळी अधिकच खवळली. आणि म्हणाले,” चोख्या,आम्हाला ब्रम्हज्ञान शिकवू नकोस. चल निघ इथून.” चोखा हिरमुसला आणि घरी परतला.विठ्ठलालाच आपला उबग आला की काय असे मनाला विचारत घरी परतला.

दुसरे दिवशी आपला प्रपंच पसारा होता तेव्हढा घेऊन नदीपल्याड राहायला लागला. कुठेही असला, राहिला तरी ऱ्भक्त हरिभजनाशिवाय कसा राहील? रोज पांडुरंगाची आठवण काढत तो हरिनामसंकीर्तनात राहू लागला. नंतर काही दिवसांनी विठोबाच्या देवळाला सन्मुख होईल अशी एक दीपमाळ त्याने बांधली.

एके दिवशी दुपारी लिंबाच्या झाडाखाली चोखोबा जेवायला बसला असता अचानक पांडुरंग आले! चोखोबाचा आनंद काय वर्णावा! बायकोला हे सांगितले. तिचीही धांदल उडाली. विठ्ठल आपल्याइथं जेवणार म्हणल्यावर दिवाळीही फिकी झाली की! चिवडा लाडू कुठुन असणार पण भाकरी आमटी दह्याचे गाडगे आणू ठेवू लागली. दोघे जेवायला बसले. देवा भक्ताच्या गोष्टी चालू होत्या. आणि जेवणही. तिकडून पंढरीचा पुजारी तिथे आला. आणि चोखोबा जेवतोय बायको वाढतेय हे तो पाहात होता. वाढताना चोखामेळ्याच्या बायकोच्या हातून दही सांडले असावे. कारण चोखा म्हणाला ,” अगं सावकाश. आज पंढरीनाथ महाराज जेवताहेत आपल्याकडे. आणि तू त्यांच्या भरजरी पितांबरावर दही सांडलेस की! जरा बेताने!” चोखा म्हणत होता. काही वेळाने झाडाकडे पाहात वर बसलेल्या कावळ्याला चोखोबा म्हणतो,” काकबा, हे काय करता? लिंबोळ्या नीट खा. खाली भगवंताच्या पानात टाकू नका.” म्हणत त्याने जवळ पडलेली निंबोळी उचलून फेकून दिली. हे ऐकून पुजारी कातावला. पितांबरावर दही सांडले काय म्हणतोय? कावळ्याला लिंबोळ्या अर्घवट खाऊन टाकू नको काय म्हणतोय! काय चाललेय काय हे सगळे त्याचे थेर? मला पाहून हा मुद्दाम मला खिजवण्यासाठीच करतोय.दुसरं काय?! “ असे स्वत:शी म्हणत तो पुढे झाला आणि चोखामेळ्याच्या अंगावर ओरडून म्हणाला,” काय रे चोख्या, हे काय पाखंडाचे थोतांड चालवले आहेस? कुठला विठोबाआणि त्याचा पितांबर? कावळ्याशीही काय बोलतोस!” असे म्हणत संतापाने पुढे होऊन चोखामेळ्याला एक सणसणीत मुस्काडात ठेवून दिली! चोख्याचा गाल चांगलाच फुगला होता. चोखा गालावर हात ठेवून कळवळत मागे कलंडला. त्याच्यावर आणखीनच दरडावत, “ ही नाटकं बंद कर.” असा दम देत पुजारी नदी पार करून विठ्ठल मंदिरात आला. गाभाऱ्यात गेला. तो हतबुद्धच झाला. दुसरे दोन तीन पुजारी होते तेही गप्प गप्प होते!

विठोबाच्या मूर्तीचा दगडी गाल सुजून चांगलाच फुगला होता. आणि विठोबाच्या पितांबरावर दही सांडलेलेही दिसले! ते पाहून पुजारी घाबरला. उलट पावली चोखामेळ्याकडे गेला. इतर ब्राम्हण व मजारी बडवेही त्याच्या मागोमाग निघाली. चोखामेळ्यासमोर तो पुजारी साष्टांग नमस्कार घालत म्हणाला,” चोखोबा (आता चोख्या म्हणाला नाही!) मला क्षमा करा. तुमच्या भक्तीभावाची मी कुचेष्टा केली. तुम्ही माझ्याबरोबर देवळात चला. विठोबाची समजुत घाला. मला वाचवा!”

चोखा म्हणाला, “ ममाझी जागा देवळाबाहेर ! आता तर तुम्ही गावाबाहेर काढले मला. विठोबा माझं काय ऐकणार! तुम्ही ब्रम्हज्ञानी माणसं. मी साधा शुद्रातला शूद्र. विठोबा माझं काय ऐकणार? “
पुजारी आणि आता इतर ब्रम्हवृंदही गयावया करू लागले. चोखोबा तयार झाला.

गाभाऱ्यात गेल्यावर विठोबाचा तो इतका सुजलेला गाल, की एक डोळाही दिसेना असा बारीक झाला होता. आपल्या पांडुरंगाचे असे श्रीमुख पाहून चोखोबा विठोबाच्या पायावर डोके ठेवून मुसमुसून रडू लागला. मनात सारखे घोकत होता,” पांडुरंगा, विठ्ठला मायबापा! अरे मी कोण कुठला.क्षुल्लक क्षुद्र माणूस.माझे घाव तुम्ही झेलले. माझ्यावरचे तडाखे तुम्ही खाल्ले, सोसले!
करूणाकरा, विठ्ला म्हणत त्याने पांडुरंगाच्या गालावरून आपला हात हळुवारपणे फिरवला. विठ्ठ्लाचा सुजलेला गाल पूर्ववत झाला. त्याचे सावळे सुंदर रूप पुन्हा नेहमीसारखे साजिरे गोजिरे मनोहर झाले!

चोखोबा बरोबर इतर सर्व मंडळी जय जय रामकृष्ण हरी ह्या भजनाचा घोष तल्लीनतेने करू लागले व नंतर त्यांच्या सुरांत आपलेही सूर मिसळून आपणही ‘पुंडलिक वरदाऽ हाऽऽरी विठ्ठल ! श्रीपंढरीनाऽऽथ महाराऽऽज की जय।। चा जय जयकार करू या!

म्हैपत, विठोबा आणि विठोबाचा विठोबा

म्हैपतचे किराणा मालाचे लहानसे दुकान होते. दुकान लहान आणि झोपडपट्टीच्या भागातले. त्याच्याकडे येणारी गिऱ्हाइके सुद्धा त्याच्यासारखीच! म्हैपत रोज घंटी सोडून दोन्ही मडगार्ड खडखडऽ वाजणाऱ्या, चारी दिशेने गरकन् फिरणाऱ्या हॅंडवेल व चेनचे चाक कुंईंऽकुईंऽखटक् खटक् करणाऱ्या खडार्डम स्टाप सायकलवरून यायचा.

त्याची गिऱ्हाईकेही चालत चालतच यायची. कोणी दोन्ही पायांनी लंगडा असला तरी बूट पाॅलिशमधल्या डेव्हिड सारखा एकच कुबडी घेत पण दुप्पट लंगडत येई, तर लहान पोरं चड्डी नसल्यामुळे बापाचा किंवा थोरल्याचा मोठा सदरा घालून, पोरी डोक्याला सटी सा महिन्यात तेल लागलेले आपले झिंज्यापकाडीचे केस मिरवत, तर बायाबापड्या रोजच तेच दंड घातलेले लुगडे किंवा पातळ लेवून येत, बोळक्या तोंडाचे म्हातारे दाढी करणे परवडत नसल्यामुळे अनायासे वाढलेल्या दाढीने गालाचे खड्डे बुजवून येत, तर रशीद मामू धेलेका गूड उधार घ्यायला यायचा ते मात्र दाढीला मेंदी लावून!

गंगव्वा आजी छातीच्या फासळ्यावर गळ्यातले चांदीचे काळपट लिंग आदळत, तर बाबूची भारदस्त आई आपलेच वजन कसे बसे उचलत तीन महिन्याच्या उधारीतील फक्त एक आणा देऊन तांबड्या मिरच्या,मीठ आणि दोन कांद्याची तीन आण्याची नविन उधारी करून जाई, बौद्धवाड्यातले लोक येत,सुताइतकी जाड मेणबत्ती, नीळीची पूड घेऊन जात. ही गिऱ्हाइकं. स्कोडा जाऊ द्या मोडीत गेलेल्या मारुती ८०० मधून येणारे गिऱ्हाइक कुठून येणार? हां! आला तर झोपडपट्टीच्या व लहान लहान टपरींच्या वसुलीसाठी फटफटीवरून गाॅगल लावलेला रम्या यायचा. पण त्याला दिलेल्या सिगरेटच्या पाकिटाचे पैसे मागायला म्हैपतची काय छाती होती!

आता सांगा ह्याच्याकडे स्कोडात बसून येणारे कुणी गिऱ्हाइक कसे येईल? आणि म्हैपतीला त्याची गरजही नसे.

तो सकाळी आपली ‘खड खड खडा्र्ड’ प्रख्यात सायकल बाजूच्या बोळात ठेवत असे. दुकान उघडून करायची तेव्हढी झाडलोट करून विठोबाच्या तसबिरीला उदबत्ती दाखवून नमस्कार करून गिऱ्हाइकाची वाट बघत बसे. थोड्या वेळाने रस्ता झाडणारी,खराट्यापेक्षाही बारीक असलेली अक्की येई. कधीमधी खोकत, अर्धशिशीच्या डोकेदुखीमुळे बिब्याच्या फुल्यांनी रंगवलेल्या भुवया कपाळ दाबत रस्ता झाडायची. म्हैपत तिला हाक मारून कधी ज्येष्ठमधीच्या तुकड्या बरोबर काथाचा लहान खडा चघळायला देई. कधी लवंग तर कधी खडीसाखरेचा तुकडा देई. अक्की ते तुकडेकपाळाला लावून मानेनेच नमस्कार करून तोंडात टाकायची. काम चालू करायची. आलाच कधी ह्या वस्तीत तर कुणाची मनिआॅर्डर घेऊन पोस्टमन येत असे.

तो पत्ता विचारायला म्हैपत शिवाय कुणाकडे जाणार? त्याच्याच फळीवर बसणार. मग म्हैपत समोरून जाणाऱ्या पोराला अरे,” त्या लिंबेराव पोतराजाला पाठव रे दुकानात. पोस्टमनभाऊ आलेत म्हणावं; आन हां चाबूक नको आणू म्हणावं. काय? जा सांग.” तो यायचा. अंगठा द्यायचा. म्हैपत साक्षीदार म्हणून सही करायचा. दहा रुपये पाहून हरखलेला पोतराजा निघाला की म्हैपत त्याला,” अरे माझी उधारी कधी देणार? द्यायची विसरू नको बाबा.” इतकंच म्हणायचा. पोस्टमनला सुपारीचे लहान पाकिट द्यायचा.

पोस्टमनही ती लहान पुडी तिथेच फाडून त्यातले चार सुगंधी तुकडे चघळत कागद फेकून निघून जायचा. म्हैपतचे मग च्याची पत्ती, साखर, काडी पेटी, एक बिडी बंडल हिरवा दोरा, निरमाची लहान वडी, लाईफबाॅय, शेंगादाणे, मसुरची लाल डाळ,गोडबोले सातारी जर्द्याचा तोटा, कुणाला गाय छाप जर्दाच पाहिजे तर कुणाला अंमळनेरचा पटेल जर्दाच चालत असे पण हे सगळे पटापटा देणे सुरु होई. दिलेल्याचे पैसे घ्यायचे उरलेली चिल्लर मोड द्यायची;उधाऱ्याची उधारी लिहायची; लिहिताना “आता उधारी मिळणार नाय बघ.ही शेवटची!” असा रोजचा दम द्यायचा. म्हैपतचा दम फुसका हे गिऱ्हाइकालाही माहित असते. तो फक्त मान हलवत जायचा. ह्याचा अर्थ म्हैपतचा दिवस सुरू झाला.

पण म्हैपतचा एक कायदा होता. तो जर्दा तंबाखू सिगारेट कुणालाही कधीही उधार देत नसे. असं का विचारले तर म्हणायचा तेव्हढीच कमी खातात हो; कमी ओढतात रोख द्यायचे म्हटल्यावर! मग बिडी बंडल का देतो उधार? ह्यावर तो सांगेल,” अवो, बिडी ती केव्हढी! तिच्यात तंबाखू निम्मीच असते. आन बिडी ओढणारा किंवा ओढणारी बी जास्त करून गरीबच असतात.कितेकदा अर्धीच ओढून बंडलात ठेवतात!” म्हैपतचे हे इतकेच आर्थिक,नैतिक व सामाजिक तत्वज्ञान!

थोड्या वेळाने वेळाने झोपडपट्टीतून कोणी दोन माणसे साधु बनून शहरात फेरी मारायला निघायचे. त्यांना म्हैपती,” ए चंगू मंगू! माझे पैसे केव्वा देणार?” निघाले चिमटा वाजवत!”ते दोघे हसत पण केविलवाणे तोंड करत,काय म्हैपतभाऊ असली पैली भोनी करतो कायरे ? आधीच आम्हाला लोक हडत हुडुत करतात. मोटारवाले तर आमाला पाहिले की काचा वर करतात.,एक दोघे ट्रकवाले, रिक्षावाले काही द्येतात.पन काऽय रया नाही राहिली. सगळी नावं घेतो ज्या त्या वस्तीत, सोसायटीत. अलख निरंजन! बम् भोले नाथ!गुरूद्येव द्त्त! अवधूत चिंतन… ! घसा दुखतो. अान तू हे उधारीचे काढले.” असे म्हणत सटकतात.


म्हैपत दुपारी आपला डबा खायला बसणार ह्याचा सुगावा कोपऱ्यावरच्या एका पायावर उभे राहून काही न बोलता भिक मागणाऱ्या ‘ हटयोगी’ मौनी भिकाऱ्याला आणि पलिकडच्या मोरपिसाच्या झाडूवाल्या फकिराला कसा काय लागतो ते म्हैपतलाही समजले नाही. अर्धा डबा झाला की हटयोगी दोन्ही ढांगा भराभर टाकत आणि फकीर झाडू खाकोटीला मारत, क्या म्हैपतबाबा म्हणत आलाच. म्हैपतही डोळ्यांनीच या म्हणत डब्यातले जितके देता येईल तेव्हढे दोघांना देत असे. दिस संपला. रात्रीचे अकरा वाजता दुकान बंद करून गल्ला रेक्सिनच्या पाकिटात, पाकीट हिरव्या रेक्सिनच्या पिशवीत, पिशवी सायकलच्या गर्रकन चारी दिशेला फिरणाऱ्या हॅन्डवेललाअडकवत म्हैपत सायकलवर टांग मारून मडगार्ड खड खड खाडार्ड खड वाजवत,चेन व चाक कुईं कुईं खटक् करत घरी जाई.बायका पोरांची चौकशी करून अंथरूणाला पाठ टेकायच्या आधी ‘देवाचिया दारी’ हा अभंग व सुंदर ते ध्यान’ भजन झाले की ‘पांडुरंगा विठ्ठला मायबापा’ म्हणत हात जोडत झोपी जायचा.

एके रात्री म्हैपतीच्या स्वप्नांत विठोबा आला. आला तो डोक्यावर किरीट, तुळशी हार घातलेला, कानात मकर कुंडले, कंठी कौस्तुभ मणि विराजत असलेला मुक्तफळांचा कंठा घातलेला, झळाळता पिवळा पितांबर नेसलेला, अशा भरजरी रूपातच! विठोबाचे ते रूप पाहून म्हैपत इतर सर्व काही विसरला. विठोबा म्हणाला, “म्हैपत तुला भेटायला मी उद्या येणार आहे.” “म्हणजे मला दर्शन देणार?” माहित असलेले मोठे शब्द वापरून म्हैपत विठोबावर इम्प्रेशन मारत होता. विठोबा फक्त त्यालाच जमेल आणि शोभणारे मधुर हसत, न बोलता फक्त मानेने हो म्हणाला आणि गायब झाला. सकाळ झाली म्हैपत उठला पण विठोबाला आपण नमस्कारही करायचा विसरलो ह्या चुटपुटीने सारखा हळहळत होता.

म्हैपत आज त्याच खड खड खडार्ड आणि कुंईं कुंईं खटक् करणाऱ्या सायकल वरून येत होता. पण विठोबा भेटणार त्यामुळे त्याला आज ते आवाज ऐकूच आले नाहीत. हिरव्या रॅलेवरून येतोय ह्या थाटात दुकानापाशी आला. सायकल बाजूच्या बोळात ठेवली. रोजचा दिवस सुरू झाला.

पण आज रस्ता झाडायला अक्की आली नव्हती. तिच्या ऐवजी दुसरीच कुणी बदली आली होती. थोडा वेळ म्हैपत विचारांत होता. पण पांडुरंगाला उदबत्ती ओवाळण्यात त्याचा वेळ गेला. मग रस्याकडे पाहात असता ती बदलीबाई आली. विचारू लागली, “म्हैपतशेठ तुमीच का?” म्हैपतचा शेठ झाल्याने तो कोड्यात पडला. पण तो हो म्हणाल्यावर ती बाई म्हणाली, “शेठ अक्की लै बिमार हाये फार. डाॅक्टरकडे नेले पायजे तिला. पर… “ म्हैपतला समजले.त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याला मेंदीबाबा रशिदमामू दिसला. “ओ मामू जरा दुकानाकडे ध्यान दे. मी आलोच.” अरे मै क्या ध्यान देणार? कुणी आलं गिऱ्हाईक तर?” “काडी पेटी बिडी बंडल साबुन अस दे . दुसरं काही देऊ नको.”इतके सांगून तो त्या बाई बरोबर अक्कीच्या झोपडीकडे गेला.

तिथलं चित्र पाहिल्यावर म्हैपतला आपण कुठं आलो ते समजेना. पण गटारी, ओघळ,शेवाळ, घाण चुकवत टपरीजवळ आला. अक्की शुद्ध नसल्यासारखी बोलत होती. म्हैपत दुसऱ्या बाई बरोबर डाॅक्टरकडे गेला. दादा बाबा करून डाॅक्टरला आणला. त्याने अक्कीला तपासले. दोन इंजेक्शने दिली. गोळ्या लिहून दिल्या. म्हैपत झपाट्याने दुकानाकडे गेला.औषधे आणली. दोन फळं घेतली. सर्व त्या बाईजवळ दिले. आणि म्हणाला. बाई आज तुम्ही तिच्याजवळ थांबा.मी तुमच्या मुकादमाला सांगतो.” म्हैपत दुकानात आला. मेंदीवाल्या मामूने विकलेल्या वस्तुचे पैसे त्याला दिले. आणि रशिद मामू गेला.


दिवस सुरू झाला होताच. रोखीची कमी,उधारी जास्तीची अशी रोजची विक्री सुरू झाली. तेव्हढ्यांत नरसू तेलगी एक पाय खुरडत खुरडत पोराला घेऊन आला. “ म्हैपतबाबा, हे माझा नातू. तेन्ला कारखान्यात बोलावलंय. पैसे नाहीत. कारखान्यात जायाला. रिक्षा लागंल, लांब हाये म्हनतो फार. आणि बघ, चहा पाव खायलाही काही लागतील. आज येव्ढी वेळ भागव. नोकरी लागली तर तुझे पैसे दुपटीने देईन”. म्हैपतने पैसे काढून त्या पोराला दिले. नरसू तेलगी आणि नातू म्हैपतला हात जोडून गेले. म्हैपतचे हात चालत होते. वस्तु देत होता. उधारी लिहित होता. कुणी रोख दिले ते घेत होता. पण आज काही झाले तरी एक आण्याचा आवळा देऊन चार आणे उधारीचा कोहळा घेऊन जाणाऱी बाबुची आई आली तर तिला उधारी द्यायचीच नाही असं तिला येताना पाहूनच त्याने ठरवले.

बाबुची आई आली. नेहमीच्या हळू आवाजात बोलून तिने दोन आणे दिले.आणि नविन वस्तु मागितल्या.म्हैपत ढिम्म बसला. पण तिने गयावया केल्यावर उधारी दिलीच! म्हैपत स्वप्न, विठोबा विसरला होता. पण आता लक्षात आले. अरे इतका वेळ झाला. पण विठोबा काही आला नाही. चुटपुट लागली. “नमस्कार करायचा विसरलो. विठोबा रागावला असेल. पण त्याला समजू ने का मी गांगरून गेलतो.” असे पुटपुटत गिऱ्हाइकी करत होता. मध्येच मोठ्या रस्त्याकडे पाहायचा, विठोबा तिकडून येईल म्हणून! मोठ्या रस्त्यावरून रोजची ट्रक बस रिक्षा मोटारी जातच होत्या. ती रहदारी तेव्हढी दिसली!

दुपार झाली. डबा खायची वेळ झाली. अर्धा डबा खाऊन झाला.तेव्हढ्यात एक कुत्रा आला. काटकुळा. मागचा एक पाय न टेकता चालत होता. कुत्रा रोज कधी दिसत नव्हता. पण म्हैपत खात होता, कुत्रा पाहात होता. म्हैपतने एक पोळी त्याला दिली. कुत्र्याने शेपटी हलवली. पोळी घेऊन गेला. ‘हटयोगी’ दोन्ही ढांगा टाकत व फकीर पंखा खाकोटीला मारत दोघेही आले. म्हैपतीने त्यांना रोजच्या प्रमाणे आपल्या डब्यातले खायला दिले. फकीर दुवा देत आणि ‘हटयोगी’ एक हात उचलून नमस्कार करत गेला. दुकान सुरू झाले. लिंगायत गंगव्वा आली ती रडतच. काय झालं असे विचारताच ती जास्तच रडू लागली.मग पुन्हा विचारल्यावर,” काय सांगायचं म्हैपतभाऊ!” म्हणत गावाकडे तिचे वडील वारल्याचे तिने सांगितले. म्हैपतने न बोलता पेटीतल्या थोड्या नोटा काढून दिल्यावर ती आपले हाडं आणि शिराच राहिलेले दोन्ही हात जोडून म्हैपतच्या पेटीवर डोके टेकून स्फुंदत स्फुंदत रडत काही तरी बोलली. पुन्हा पुन्हा हात जोडून ती माघारी गेली. दिवस संपत आला. रात्र झाली. अकरा वाजले. आज काही गल्ला नव्हताच. काय जो होता तो रेक्सिनच्या पाकिटात, पाकिट हिरव्या रेक्सिनच्या पिशवीत, पिशवी चारी दिशेला गरकन् फिरणाऱ्या हॅंडवेलला अडकवून सायकलवर टांग मारून खड खड खाडार्ड खड वाजवत, कुंईं कुंईं खटक् करत घरी आला.

बायका पोराची चौकशी केली.अंथरूणाला पाठ टेकायच्या आधी ‘देवाचिये दारी’ हा अभंग आणि ‘सुंदर ते ध्यान’ हे भजन म्हणून ‘पांडुरंगा विठ्ठला मायबापा’ म्हणत पडला. आणि आज विठ्ठलाने फसवले. भेटायला येतो,दर्शन देतो असे मधाचे बोट लावून गेला पण आला नाही! जाऊ द्या. तो देव आहे. आपण काही देव नाही. असं म्हणत झोपी गेला. स्वप्नात पुन्हा विठोबा आला. त्याला काही बोलू न देता म्हैपत एकदम बोलू लागला, “विठ्ठला,पांडुरंगा मला फशिवलस आज. येतो म्हणालास पण तू काही आला नाहीस. काल तुला नमस्कार करायचा विसरलो म्हणून आला नसशील. आता आधी मी नमस्कार करतो तुला”असे एका दमात म्हणत म्हैपतने पांडुरंगाला दंडवत घातले.पांडुरंग नेहमीप्रमाणे त्यालाच जमणारे व शोभून दिसणारे मधुर हसला. म्हणाला, “म्हैपत,मी तीन चार वेळा येऊन गेलो.” “ तीन चार वेळा? अरे एकदाही दिसला नाहीस तू मला विठ्ठला!आणि तीन चार वेळा काय म्हणतोस तू?” “ म्हैपतबाबा, अरे अरे अक्की आजारी आहे हे सांगणारी बाई आणि अक्कीच्या रूपाने, नरसू तेलगी आणि त्याचा नातू, रोज न दिसणारा कुत्रा, लिंगायत गंगव्वा आणि आणखी किती किती रूपानी मी तुला दर्शन देणार? “ हे ऐकल्यावर म्हैपतचा गळा दाटून आला. आपोआप हात जोडले गेले. विठोबा पुढे म्हणाला, “ खरं सांगू म्हैपत ! अरे त्या सगळ्यांच्या डोळ्यांनी मीही तुलाच पाहात असतो! अरे तूही माझा विठोबाच ! पांडुरंगच असे म्हणाल्यावर म्हैपतच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागले. त्याबरोबर त्याच्याही तोंडावर विठ्ठलालाच जमणारे आणि शोभून दिसणारे मधुर हसू उमटू लागले! म्हैपत आणि स्वत: पांडुरंग “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ‘ भजन केव्हा म्हणू लागले ते दोघांच्याही लक्षात आले नाही!

जय जय रामकृष्ण हरी।जय जय जय रामकृष्ण हरी!

रिकामा डबा, डबा भरलेला!

गाडीला आज गर्दी नव्हती.डब्यात येऊन बसण्यापूर्वी सगळी गाडी पाहातच आलो होतो. तुरळक गर्दी असेल नसेल. माझ्या डब्यात तर मी एकटाच होतो. कुणी तरी यावे असे मनात बरेच वेळा घोकून झाले. शेवटी मुंबईत दुकानांच्या समोर,” या साहेब चांगला कपडा आलाय; बघायला काय हरकत आहे;”या ताई एकदम नव्या फॅशनच्या साड्या आल्यात, कांजिवरम मधुबनी प्रिंट बघातर ताई!” असे गिऱ्हाईकांना हिंदीत बोलत बोलवतात तसा डब्याबाहेर जाऊन,” या या, डबा खराच आपलाच आहे! मोकळा, एकदम रिकामा; झोपा, पसरा, वरचा बर्थ घ्या,खालती बाकावर झोपा,सगळा डबा तुमचा,या या ! पटकन गर्दी होईल बसून घ्या बसून घ्या भाऊसाहेब!” असे ओरडून बोलवावे वाटू लागले. आणि खरंच उतरलो डब्यातून. उभा राहिलो. थोडे खाकरून घेतले. पण तो विक्रेत्याचा आवाज आणि स्टायलीत ओरडणे जमणार नाही हे समजायला अर्धा क्षणही लागला नाही. त्या गायकीचे ‘घराणे’च निराळे! तरी नोकरीत असताना आमचे एक जनतेसाठी असलेले “प्राॅडक्ट” विकण्यासाठी, दुकानांत माल सजवून रस्त्यात उभारून लोकांना हाकारून आणणाऱ्या विक्रेत्याच्या कामासाठी तरूण मुलांच्या मुलाखतीत अगोदर मी त्याचे प्रात्यक्षिक स्टाइलीने करून दाखवत असे. शिक्षणाची अट नव्हती. १०-२२वी ची मुलेही चालली असती. पण फारशी हाताला लागत नव्हती. दोन चार मिळायची. हे असू दे.

कोणी येतेय का आपल्या डब्याकडे हे मी जो दिसेल त्याच्याकडे आशाळभूतपणे पाहात विचार करत होतो. कोणी येत नाही पाहून आज रेल्वेवर बहिष्कार तर नाही घातला कुणी अ.भा. संघटनने ही शंकाही मनात आणली. डब्यात येऊन खिडकीजवळच्या जागेवर बसलो. समोरच्या बाकावर पाय पसरून बसलो.पुन्हा असा योग केव्हा येईल ते कुणाला माहित.? मग वरच्या बर्थवर, ह्या वयात,कुणी नाही पहायला तोपर्यंत, कसाबसा चढून पसरलो.पुन्हा खाली आलो.डब्यात प्रत्येक सीटवरचे नंबर वाचत संपूर्ण डबा फिरून आलो. दूरच्या दरवाजाजवळच्या बाकावर एक माणूस पेंगत होता. पुन्हा ते नंबर उलट्या क्रमाने वाचत जागेवर येऊन बसलो. रामरक्षा म्हणावी का असा उगीच एक विचार आला.उगीच का म्हणायचे तर ती येत नव्हती मला. पण अशावेळी म्हणतात हे वाचल्याचे, सांगितल्याचे आठवले इतकेच.

गार्डाने शिट्टी वाजवली. अरे वा गार्ड तरी आलाय. त्याने एकदा शिट्टी वाजवली की गाडी लगेच सुटत नाही. प्रत्येकाला आत्मसन्मान असतो. तसा इंजिनच्या ड्रायव्हरलाही असणारच की.त्याने शिट्टी वाजवली की इंजिनड्रायव्हर कधीच लागलीच गाडी चालू करत नाही. तो आपला राग फक्त इंजिनाची वाफ फस्स करत थोडावेळ सोडतो. गार्ड शिट्टी न वाजवता उगीचच दिवसासुद्धा दिवा हलवतो.ड्रायव्हर फक्त एक लघु शिट्टी कुक् करून वाजवतो. व वाफेचा जोरदार फवारा सोडून खदाखदा हसतो! हे सगळे आता माहित झाले होते. एएसएम एक वहीसारखी गुंडाळी हातात घेऊन गार्डापाशी जाऊन दमात घेतल्यासारखे फक्त दाखवत पण अजिजीने गार्डाला व त्याच्या शेजारी फर्स्ट सेकंडच्या स्लीपरच्या कंडक्टरला काही तरी सांगतो. हे इंजिनड्रायव्हरला सहन होत नाही. तो लगेच सगळ्या स्टेशनला हादरा बसेल अशी शिट्टी तर वाजवतोच पण चाकेही तिथल्या तिथेच वरच्यावर फिरवतो न फिरवतो तेव्हढ्यात माझ्या डब्यात दहा बारा तरुण मुलांचा घोळका मोठ्याने बोलत हसत ओरडत शिरतो. मला बरे वाटते. पण तितक्यात संपूर्ण डबा रिकामा असूनही, “ ओ आजोबा तुमच्या पादुका खाली घ्या ना!” “ दुसऱ्यांनाही बसायचं असतं.” मी म्हणतो, “अरे सगळी बाकं रिकामी आहेत तिथे बस.”रिकामी आहेत ना?” मग तुम्ही बसता का तिकडे?” तो मला खोट्या नम्रतेने सांगतो. मी पाय खाली घेतो. इतरांची आपापसांत काही तरी बोलणे,गप्पा चालू असतात. गाडी सुरू होऊन बराच वेळ झाला, हे मी आतल्या आत मुलावरच्या रागाने धुमसत होतो त्यात,लक्षातच आले नव्हते.

मुलांच्या गप्पा हसण्या खिदळणे गाणी ह्यातून त्यांचा विषय गाडीची साखळी ओढण्यापर्यंत येऊन पोचला होता. “ अरे व्हिकी, साखळी खेचायची का?” “का काय करणार खेचून? दंड कोण भरणार? तुझा होणारा सासरा?” “ तो कशाला भरेल? तूच भरायचा. नाहीतरी तुझं तिकीट शशानेच काढलंय की!” “ अबे तिकिट कितीचं आणि दंड केव्हढा माहित आहे ना? त्याला पाचशे रूपये म्हणतात. काय समजला का? किती शून्य असतात माहित तरी आहे का?” सगळं कुणाच्या ना कुणाच्या खिशात हात घालून चालतंय म्हणून बरं आहे.” हो ना करता सगळ्यांनी वर्गणी करून पैसे गोळा करायचे ठरले त्यांचे. दंड आणि तुरुंगाची हवा दोन्ही खायला लागती म्हणे कधी. त्या गार्डाच्या मनावर आहे ते: थोडे जास्तच टाका बे सगळ्यानो.” असं बोलत एकजण पैसे गोळा करू लागला.”अरे वा! १२००रुपये जमलेत!” एकूण १२०० रू. जमले. ते एका मुलाने खिशात कोंबले. मी हे सर्व पाहात होतो. आता साखळी कुणी ओढायची ठरले. तेव्हढ्यात एकाला शुद्ध हवा लागली असावी. तो म्हणाला, “अबे साखळी कुणी ओढली तर कुणाकडे बोट करणार?” अरे जो साखळी खेचेल त्याच्याकडे! ते ऐकल्यावर मग तू ओढ,तू खेच”सुरु झाले.

एक खरा हुषार होता. मला पाय खाली ठेवायला लावणारा तो. तो म्हणाला, अरे आपले आजोबा आहेत ना! ते येतील मदतीला!” “ हो रे हो” हो की, आपले आजोबा आहेतच मदतीला!” म्हणजे दंडही भरायला नको आपल्याला. काय?”त्यांच्या मोठ्या आरड्या आोरड्यात मी गयावया करून म्हणालो, “अरे साखळी ओढू नका रे. काय करणार साखळी ओढून? हा कसला खेळ चाललाय?”. नका ओढू रे.” मी असे म्हणाल्यावर तर ते जास्तच चेकाळले. “ अहो आजोबा आम्ही काही कुण्या बाईच्या गळ्यातली साखळी ओढत नाही! साध्या आगगाडीची ओढतोय. गंमत असते ती.” “अरे आजोबा घाबरले रे!” म्हणायला लागले. मी केविलवाणा होऊन म्हणालो, “अरे बाळांनो माझ्याकडे पैसेही नाहीत. म्हणजे मला तुरुंगातच पडावे लागणार.” माझ्या गयावया करण्याकडे लक्ष न देता मुलांनी साखळी जोर लावून खेचली. गाडी थांबली. पोरं खुषीत होती. पराक्रमाची पावतीही मिळाली. गाडी थांबली. गार्ड पोलिस तिकीट इन्स्पेक्टर आले.

साखळी कुणी ओढली चौकशी सुरू झाली. मुलांनी कुणी हसणे दाबत गंभीर चेहरे करून माझ्याकडे बोट दाखवले. पोलिस गार्ड सगळे माझ्यावर चालून आले.” येव्हढे म्हातारे झाला आणि साखळी ओढता!? अहो ह्या पोरांनी ओढली तर समजू शकतो. पण तुम्ही? येव्हढं वय झालं तरी खेळ सुचतात असले?” आणिही बराच संस्कार वर्ग घेतला माझा त्यांनी. ते ऐकल्यावर दोघे तिघे एकदम म्हणू लागले,” साहेब आम्ही सांगत होतो त्यांना आजोबा! साखळी ओढू नका नका म्हणून; पण त्यांनी ऐकले नाही.”हे ऐकल्यावर तर ती सगळी अधिकारी मंडळी आणखीच खवळली. मी त्यांना हात जोडून चेहरा केविलवाणा करत म्हणालो,” साहेब, मला साखळी ओढलीच पाहिजे होती हो. मला दमदाटी करून माझ्या म्हाताऱ्याचे बाराशे रुपये ह्या मुलांनी काढून घेतले की हो! काय सांगू! ते पहा त्या मुलाजवळ आहेत. तपासा त्याचे खिसे!” ते दोन पोलिस लगेच सरसावून त्यांनी त्या पोराला घेरून पकडले. त्याच्या खिशांत सापडले बाराशे रुपये. पोलिसांनी ते मला परत दिले. त्या पोरालाच नाही तर सगळ्यांना घेऊन ते निघाले. खाली उतरल्यावर ती मुलं माझ्याकडे खाऊ का गिळू नजरेने पाहात होते. माझ्या डोक्यावरील पांढऱ्या केसात हात फिरवत मी पैसे खिशात ठेवत,न हसता इतकेच म्हणालो,”अरे उगीच नाही चार पावसाळे जास्त पाहिले!”

(स्वामित्व नसलेल्या डाव उलटवण्याच्या एका चुटक्याची ही गोष्ट केली आहे.)

भक्त जोगा परमानंद

बेलमाॅन्ट

भक्त जसा परिपक्व होत जातो तशी त्याच्यामध्ये शांती क्षमा येऊनि पाही। अखंड वसती त्याचे हृदयी।हे गुण वास करू लागतात. हे सत्वगुणच आहेत पण बरेच वेळा भक्त त्याचबरोबर आपल्या भगवंतावरच्या प्रेमाला, शरीराला पराकोटीचे क्लेश देऊन त्याची भक्ती निष्ठा सिद्ध करण्याचेहीप्रयत्न करतो. पण तसे करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे भक्त आपल्यातील विवेक ह्या गुणाला विसरला का असा विठ्ठलालाही प्रश्न पडतो. पांडुरंग, स्वत:लाच विचारल्यासारखे,भक्ताला म्हणतो,” एव्हढे का मांडिले निर्वाण। काहीच नसता अन्याय जाण। केले देहासी दंडण।।” पण तरीही भक्त स्वत:ला बजावत असतो की माझी दैवतावरील निष्ठा ही केव्हाही शंभर टक्के असली पाहिजे. नव्हे ही त्याची नेहमीच तीव्र इच्छा असते. ह्यासाठी प्रसंगी स्वत:च्या जीवाचीही तो पर्वा करत नाही. कारण माझा विठोबा मला ‘कसा मोकलील’हा त्याचा ठाम विश्वास असतो.

भक्तांच्या कथा ऐकण्यातही पुष्कळ पुण्य आहे.तीही भक्तीच आहे.श्रवण,भजन, कीर्तनआणि पठण हे भक्तीमध्ये अंतर्भूत आहेत. सामान्याप्रमाणेच साधकालाही हरीकथा ऐकणे जितके लाभदायक आहे तितकेच पुण्यवान भक्तांच्या कथा ऐकण्यातही आहे असे शंकर पार्वतीला सांगतात. ते काय म्हणतात ते आपण संतकवि महिपती बुवांच्या शब्दांतून ऐकू या.

शुद्ध सत्वगुण तोही।येत लवलाही निजप्रति।।……।सकळ दु:खांचे होय दहन।…….. वर्णिता गुण हरि कीर्तनी।। ऐसा अंतरी देखोनि नेम। मग प्रसन्न होईल पुरुषोत्तम। आपुले भजनी देऊनि प्रेम।। ऐसी भक्तकथेची गोडी थोरी। पार्वतीस सांगे त्रिपुरारी।।

भक्तकथा ऐकण्याने किंवा हरिकथा ऐकण्याने थोड्याच दिवसांत किंवा थोडक्या काळातच काही रोकडा (प्रत्यक्ष)फायदा होतो असे नाही. पण हळू हळू सद्भावनेचा उदय होऊन वाढ होते.असा हा अल्प सत्वगुण थोडा फार मुरला तरी त्याची जोपासना होऊ लागते. हया अप्रत्यक्ष फायद्यातून रोजच्या जीवनात कळत न कळत जे सुखाचे आनंदाचे क्षण येतात ते जास्त काळ टिकू लागतात.
भगवंताची एकनिष्ठेने उपासना करणारा असाच एक भक्त सोलापुर जिल्ह्यातील बार्शी गावात राहात होता. त्याचे नाव जोगा परमानंद.

जोगा गावात घरोघरी भिक्षाटनास जात असे. मिळेल त्या भिक्षेत कुटुंबाचे पोषण करीत असे. आंधोळ करून घरातल्या देवाची यथासांग पूजा करून तो गावातल्या प्रसिद्ध भगवंताच्या दर्शनाला जात असे. पण चालत जात नसे. गीतेचा एक श्लोक म्हणून जमिनीवर दंडवत घालायचा. दुसरा श्लोक म्हणायचा दुसरे दंडवत घालून पुढे सरकायचा. उठून तिसरा श्लोक म्हणून झाला की पुन्हा दंडवत……अशा रीतीने गीतेचे सातशे श्लोक म्हणत सात शते दंडवत घालून भगवंताचे दर्शन घ्यायचा. हे झाले की घरी चालत आल्यावर मगच जेवण करायचा. हा नित्यनेम पाहून गावातले लोक तर जोगा परमानंदाला मोठा मानीतच पण परगावातून बाजारहाटासाठी आलेले लोक आणि लहान मोठे व्यापारीही थक्क होत.

त्या रात्री खूप पाऊस पडला. रस्ता चिखल पाण्याचा झाला होता. गेले दोन तीन दिवस जोगाची ही दंडवत भक्ती पाहून एका व्यापाऱ्याच्या मनात आले की ह्या भक्ताला आपल्या मालातील एक पितांबर द्यावा. चिखलातूनही साष्टांग दंडवत घालत येणाऱ्या जोगाला पाहिल्यावर तर तो व्यापारी अचंबित झाला. निष्ठानेम म्हणावा तर हीच व निष्ठावान भक्त पाहावा तर जोगा परमानंदासारखा असे मनात म्हणत तो व्यापारी जोग्याजवळ जाऊन नम्रतेने म्हणाला,” जोगा महाराज! तुम्ही हा पितांबर घ्यावा व तो नेसावा. मला फार फार संतोष होईल.” जोगा म्हणाला,” शेठजी, हा पितांबर माझ्या काय कामाचा? मला स्वत:ला व घरालाही तो अति विशोभित दिसेल. जुन्यापान्या धोतरावर माझे भिक्षा मागून पोट भरते. आणि शेठजी ह्या पावसापाण्यात पितांबर काय कामाचा? राहू द्या तुमच्यापाशी. त्यापेक्षा हा तुम्ही पांडुरंगाला नेसवावा.” जोगाच्या बोलण्यावर शेठजी आदरपूर्वक म्हणाला,” जोगा परमानंद, तुमचे ह्यामुळे पोट भरावे किंवा घरासाठी ह्याचा काही उपयोग व्हावा ह्या विचाराने मी पितांबर दिला नाही. तुमची भक्ती पाहून माझे मन भरून आले म्हणून ही फुल ना फुलाची पाकळी देतोय. पांडुरंगालाही मी दुसरा देईन. चिखल- पाण्याने पितांबर खराब होईल तर त्याचीही चिंता नको. मी आणखी एक पितांबर आपल्याला देईन! आपण हा पितांबर नेसूनच पुढे जावे. माझ्या मनाला बरे वाटेल.”

तरीही जोगी परमानंदाने आढेवेढे घेतले. पण व्यापाऱ्याने मनापासून केलेल्या आग्रहापुढे व देणाऱ्याचे मन मोडू नये ह्या विचाराने जोगा नमला. त्याने तो पितांबर परिधान केला.

गीतेचा श्लोक म्हणत जोगा दंडवत घालणार पण पितांबर पायघोळ होतोय हे त्याच्या लक्षात आले. पितांबर वर खोचला. दंडवत घालायला वाकला पण हा भारी पितांबर चिखलाने घाण होईल ह्या विचाराने तो कुठे कोरडी जागा दिसतेय का पाहू लागला. चिखल तर सगळीकडेच झाला होता. ते पाहिल्यावर जोगाने दंडवत घातले. पुढचा श्लोक तो म्हणाला पण घसरलेले पितांबर पुन्हा वर खोचले. आणि दंडवत घातले. असे होता करता किती प्रहर उलटले ते जोगा परमानंदाच्या आज लक्षात आले नाही. कोणता श्लोक म्हणून झाला हेही त्याच्या बरेच वेळा लक्षात येईना. शरीर थकले होते पण त्यापेक्षाही मन फार ठेचकाळले होते. देवळा बाहेरच बसून राहिला.

हे काय झाले आज! कालपर्यंत रोजच्या धोतराकडे ते जुने का पुराणे, स्वच्छ का मळलेले, ते धुळीने भरते का वाऱ्याने उडते हे विचारही मनात येत नव्हते. भगवंताशिवाय दुसरीकडे अर्धा क्षणही लक्ष गेले नाही. आणि आज दंडवतापेक्षा, पांडुरंगापेक्षा पितांबरातच मन गुंतले होते.मनातच पांडुरंग नव्हता तर तो ध्यानांतही कसा असेल?  जोगा खिन्न झाला. त्याहीपेक्षा त्याला स्वत:चा संताप आला. तो आपलीच निर्भत्सना करू लागला. “अरे कुठे गेला तुझा नेम? मन थाऱ्यावर नव्हते. ते पितांबराच्या भरजरीत होते.ते चिखलाने माखेल ह्याची तुला चिंता होती. पितांबराच्या मोहाने मन बरबटले ह्याची तुला फिकीर नव्हती. अरे जोगड्या, काल पर्यंत काय पितांबर नेसलेल्या पांडुरंगाशिवाय तुला कशाचेही भान नव्हते. दंडवताने कष्ट होतात म्हणजे काय हे तुझ्या खिजगणतीतही नव्हते! एकाग्रता काय असते,ती वेगळी काही असते हे माहित असण्याचीही तुला आवश्यकता पडली नाही. कारण तुझे चित्त पांडुरंगाच्या पायीच रंगले होते.तल्लीनता एकाग्रता अनन्यता हे शब्द तुझ्यासाठी वेगवेगळे नव्हते.कारण तो तुझा सहज भाव होता.पण आज पितांबर नेसलास काय आणि त्याच्याच विवंचनेत गुंगलास काय! अरे जोगी होतास तो चार हात पितांबरामुळे भोगी झालास! लाज वाटली पाहिजे तुझी तुलाच. उठ प्रायश्चित्त घे.शिक्षा भोग. त्यामुळे तरी तुझी भगवंतापाशी थोडीफार पत राहिल. उठ!”

जोगा परमानंद असा विचार करत असतानाच समोरून धष्टपुष्ट बैलांची जोडी घेऊन एक शेतकरी चाललेला दिसला. शेतकऱ्याला आपला हा भरजरी पितांबर घेऊन त्या बदली त्याचे बैल काही वेळासाठी परमानंदाने घेतले. शेतकरीही थोड्या वेळासाठी इतका भारी पितांबर मिळाला ह्या आनंदात होता. परमानंदाने शेतकऱ्याकडून चऱ्हाटाने आपले पाय बैलाच्या जोखडाला घट्ट बांधून घेतले. आणि तो शेतकऱ्याला म्हणाला बैलाना जोरात चाबूक हाणून पळव. भाड्यापोटी भारी पितांबर मिळाल्याच्या आनंदात शेतकऱ्याने जोगा सांगेल तसे केले.

चाबकाचा फटकारा बसल्यावर बैल चौखुर उधळत निघाले. आणि जोगा परमानंद फरफटत चालला. काटेकुटे-सराटे, दगड-गोटेआणि खड्यां-मातीतून जोगा अंग खरचटत फरपटत होता.नंतर कातडे सोलून निघू लागले. रक्त वाहू लागले. बैल वारा प्याल्यासारखे, शेपट्या वर करून पळतच होते. बैलांना आवरणारा कुणी शास्ता नव्हता. त्याही सिथितीत पश्चात्तापाने पोळलेला जोगा तोंडाने,” जय रूक्मिणीमानसरंजना। पयोब्धिवासा शेषनयना । भक्त कैवारिया गुणनिधाना। जगज्जीवना पांडुरंगा।। असा धावा करीत, मध्ये रामकृष्ण हरि हा नाममंत्र जपत, अंगाची कातडी सोलून निघालेल्या,मांसपेशी लळत लोंबत खाली पडत चाललेल्या अवस्थेत फरफटतच होता. बैल थांबण्याचे चिन्ह नव्हते. जोगाचे हाल संपणार नव्हते. आता तर रक्ताने माखलेला हाडाचा सांगाडा तोंडाने जय जय जय रामकृष्ण हरि हे भजन करीत फरफटत होता. तो सांगाडा कोणी पाहिला असता तर तो कुणाचा असा प्रश्न त्याला पडला असता.

अखेर भक्ताची दया देवालाच येणार ह्या न्यायाने चक्रधारी पांडुरंग जोगा परमानंदासाठी धावून आला. बैलांसमोर उभा राहून त्यांची शिंगे धरून त्यांना थांबवले. जोगाच्या पायाचे चऱ्हाट सोडून त्याचे पाय मोकळे केले.मुखाने हरिनाम घेणाऱ्या सांगाड्याकडे अत्यंत प्रेमळ दृष्टीने पाहात पांडुरंगाने आपला कृपेचा वरदहस्त हळुवारपणे जोगाच्या सांगाड्यावरून फिरवला.भक्त जोगा पुन्हा पहिल्यासारखा झाला.

आपल्यासाठी निर्गुण भाव सोडून सगुण साकार रुपात प्रत्यक्ष प्रकट झालेल्या दयाघन विठ्ठलाकडे जोगा डोळे भरून नुसता पाहातच राहिला. मग थोड्या वेळाने भानावर आलेल्या परमानंदाने आपले रोजचे दंडवत भगवंतापुढे घातले! परमेश्वरापुढे शरण होऊन तसाच पडून राहिला. पांडुरंगाने त्याला उठवले. जवळ घेतले. विठ्ठलाने त्यानंतर जोगा परमानंदाला सांगितले ते सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे.

“रोज रस्त्यावरून दंडवत घालत शरीराला इतके कष्ट देऊन माझ्या दर्शनाला येण्याचे कारण नाही. नित्यनेमात मन काही काळ विचलित झाले तरी त्याचे इतक्या निर्वाणीला येऊन असे पराकोटीचे प्रायश्चित्त घेण्याचे मनातही आणू नये. मी भाव भक्तीचा भुकेला आहे. मला भक्तांचे इतके कौतुक असते की त्याने जेवताना घेतलेला घासही माझ्याच मुखात जातो. भक्त सहज चालत येतो जातो ती माझी प्रदक्षिणाच मानतो.आणि माझा भक्त समाधानाने झोपला तरी तेच त्याने मला घातलेले दंडवत मानतो.”
दमहिपतीबुवांनी देवाचेच शब्द आपल्या रसाळ ओव्यांतून सांगितले ते म्हणत भक्त जोगा परमानंदाची कथा संपवू या,
“ जोग्यासी म्हणे रुक्मिणीरमण। एव्हढे का मांडिले निर्वाण । काहीच नसता अन्याय जाण। केले दंडण देहासी । तुम्ही करता अन्नपान । ते माझे मुखी पडता जाण। सहज करीता गमना गमन। तेचि प्रदक्षिणा आमुची। नातरी कोणासी बोलाल वचन। तेचि होतसे माझे स्तवन। की सुख संतोषे करीता शयन। ते साष्टांग नमन मज पावे। ऐसे असता निजभक्त राया। एव्हढे निर्वाण केले कासया।

भगवंताचे हे अमृताचे शब्द ऐकून परमानंदाने देवाच्या पायांवर मस्तक ठेवले व त्याची कृपाछाया आपल्यावर सदैव असो द्यावी ही प्रार्थना केली. जोगा परमानंदाप्रमाणेच भगवंताची आपणा सर्वांवरही अशीच कृपा असू द्यावी ही प्रार्थना करून ही भक्तकथा संपवतो.

जगमित्र नागा

बेलमाॅन्ट

परळी वैजनाथ गावात नागा नावाचा ब्राम्हण आपल्या कुटुंबासह राहात होता. गावाबाहेरच तो एका झोपडीत राहात असे.पुढची मागची मोकळी जागा रोज शेणाने सारवली जायची. शेणसड्यांनी शिंपली जायची. झोपडी आतून बाहेरून स्वच्छ असायची. सदाफुली,गुलबक्षी कोरांटीची तीन चार फुलझाडे त्या झोपडीला शोभा आणीत. गावात आणि आजूबाजूच्या दोन तीन वस्त्यांमध्ये भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा. रोज रात्री गावातल्या देवळात हरिरसगुण गात कीर्तन करायचा. नागाच्या रसाळ कीर्तनाला लोकही गर्दी करीत. झोपण्या अगोदर घरातील सगळे मिळून थोडा वेळ भजन करून झोपी जायचे.
सगळ्यांशी मिळून मिसळून आणि कोणाच्याही ना अध्यात ना मध्यात असे त्याचे वागणे होते. सर्वांशी नेहमी शांतपणे गोड बोलायचा. इतकेच नव्हे तर गायी वासरेही नागा चालला की त्याला खेटून चालत. तो दिसला की धावत येत. मान हलवून गळ्यातली घंटा वाजवत आम्ही आलो आहोत सांगत. मध्येच हलकीशी ढुशी देत. काही नाही तर त्याला खेटून शांत उभी राहायची. नागाही गायी बैलांच्या वासरांच्या पाठीवर हात फिरवत किंवा त्यांच्या मानेचे पोळ हाताने घासून पुढे जाई. नागा जसा जगाचा मित्रच होता. सगळेजण त्याला जगमित्र नागा म्हणत. थोडक्यात, गावात नागा ब्राम्हणाला कोणीही वाईट म्हणत नसे.

एखाद्याचा चांगुलपणा हाच काहीजणांसाठी त्याचा हेवा द्वेष करण्याचे कारण ठरते. गावातले लोक नागाचा आदर करतात त्याच्याविषयी चार चांगले शब्द काढतात ह्याचाच दुस्वास करणारे, त्यावरून नागाचा विनाकारण द्वेष करणारे तीन चार लोक होतेच. असे लोक सर्व ठिकाणी असतात म्हणा.

एकदा रात्री नामा कीर्तन आटोपून गावा बाहेरच्या आपल्या झोपडीत आला. सगळेजण रोजचे भजन करून झोपले. त्या रात्री नागाच्या वाईटावर असलेल्या लोकांनी नागाच्या झोपडीवर पेटते बोळे फेकून झोपडी पेटवून दिली. ज्वाळा वर जाऊ लागल्या तसे ते दुष्ट गावात निघून गेले. दुरून झोपडी पेटल्याचे पाहात झोपून गेली. इकडे नागाला आणि त्याच्या बायकोला जाग आली. मुलांना पांघरूणात गुंडाळून जवळ घेऊन बसली. नागाने विठोबाचा धावा सुरु केला. सामान्य नागाला देवाशिवाय कोण आधार असणार?

म्हणे धाव आता रुक्मिणीकांता। दीनबंधो अनाथनाथा। तुजवाचोनि आम्हाल रक्षिता। कोण असे ये समयी।।

भक्ताने केलेल्या तळमळीच्या हाकेला आपले सुदर्शन चक्र हाती घेऊन देव धावून आला. च्क्रपाणीने कमाल केली. आगीचे लोळ वरच्यावर उठून हवेतच विझून जात. खाली त्याची ठिणगी नाही. निखाराही नाही,कोळसाही नाही! मग राख तरी कुठे असणार? गावातल्या लोकांना दुरून आगीच्या ज्वाळा दिसल्या. गावात गडबड उडाली. “ जगमित्र नागाच्या खोपटाला आग लागली.” “ लागली का लावली?” “ हे त्यांचेच काम असणार!” अशा चर्चा चालू होत्या. लोक हळहळत होते. तशा पहाटे पहाटेच नागाच्या झोपडीकडे आले. नागा आणि त्याची बायको बसलेली. मुलं पांघरुणात गुंडाळून झोपवलेली होती. नागाचे भजन चालूच होते. बायकोच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते.

नागा आणि त्याचे कुटुंब जिवंत आहे हे पाहून लोकांना आनंद झाला. आश्चर्यही वाटले. वर वर उठत चाललेल्या भडकलेल्या आगीचे लोळच्या लोळ त्यांनी पाहिले होते. पण इथे झोपडीत अंगणात धुमसती राख नाही, निखारे नाहीत की कोळसे नाहीत;जळलेले काटे कुटक्या काही नाही! नागाच्या विठ्ठ्लाच्या तीव्र भक्तीची प्रचिती त्यांना प्रत्यक्षच पाहायला मिळाली. विठोबाने आग वरच्यावर झेलली. एकही लोळ खाली येऊ दिलाच नाही. आग वरच्यावर विरघळून गेली.

हे आश्चर्य पाहून नागाच आपला विठोबा ह्या साध्या भोळ्या भावनेने ते नागाला नमस्कार करू लागले.जमलेल्या सगळ्या लोकांनी जगमित्र नागाबरोबरीने “ पुंडलिक वरदाSS हाSSरी विठ्ठल ! पंढरीनाथ महाराज की जSSय!” अशी हरिनामाची गर्जना केली.

गावकऱ्यांनी नंतर विचार केला की आपण नागाला थोडी शेतजमीन द्यावी. तसे ठरवूनच ते नागाकडे जमले. त्यांनी आपला विचार त्याला सांगितला. त्याच्या नावे कागदपत्र तयार करून आणले होते. ते त्याला दाखवून पुढे म्हणाले की ह्याचे सर्व उत्पन्न तुझे. सगळे ऐकून नागा म्हणाला,” मला भिक्षुकाला जमीनजुमला कशाला हवा? गावातल्या
घरांतून उदार भिक्षा मिळते. त्यात आमचं भागते.

शेतीभातीच्या भानगडीत मला पाडू नका. अहो,पांडुरंग आपले रक्षण करतो. परवा झोपडी जळाली. तुम्ही पाहिलेच की आम्हाला पांडुरंगाने एव्हढीशीही झळ लागू दिली का? पांडुरंग आपल्याला सांभाळतो ह्याची ह्यापेक्षा दुसरी खात्री काय पाहिजे?” नागाने इतके सांगूनही गावकरी ऐकेनात. त्यावर गावकरी म्हणाले,” आम्ही जमीन तुझ्या नावाने करणार. गाव कसेल जमीन. जे पिकेल त्यातले तुला पाहिजे तितके घेत जा.बाकी राहिल ते आम्ही गावाच्या उत्सवा-गावजेवणाच्या खर्चासाठी लावू. कागदपत्रावर गावकऱ्यांच्या सह्या झाल्या. जगमित्र नामा हे सगळे तटस्थपणे पाहात होता. गावकऱ्यांचा शब्द पडू द्यायचा नाही म्हणून तो कुटुंबाच्या पोटापाण्याला लागेल तेव्हढेच दरवर्षी घेई. दिवस असे नेहमीसारखेच चालले होते.

गावात एक यवन नविन हवालदार बदलून आला.हेही काही दिवस चांगले जात होते. पण गावात नव्या साहेबापुढे गोंडा घोळणारे लोक असतात. जगमित्राचा विनाकारण दुस्वास करणारे लोकही तेच करू लागले. एके दिवशी हवालदाराच्या काय मनात आले ते कळेना. त्याने नागाला आपल्या कचेरीत बोलावले. नागाला कचेरीत बोलावले हे कळल्यावर गावचे लोक काही वजनदार लोकांना बरोबर घेऊन कचेरीत आले.

“ नागा तू दुसऱ्या काही लोकांची जमीन हडपून उत्पन्न खातोस असे हुजुराच्या कानावर गेले. त्यांनी तुझी जमीन जप्त करण्याचा हुकुम मला दिलाय. इतकी वर्षे खाल्लंस उत्पन्न आता काही मिळणार नाही.” त्यावर गावातल्या लोकांनी सगळी खरी परिस्थिती हवालदाराला सांगितली.” अहो गावकऱ्यांनीच सह्या-अंगठे करून नागाच्या नावावर खुषीने करून दिलीय. हे कागदपत्र पाहा.” म्हणत कागदही काढले. इतकेच काय त्यांनी नागाचे चांगले गुणही सांगितले. नागा सज्जन आहे. तो कुणाची दिडकी घेणार नाही तिथे तो दुसऱ्याची जमीन कशाला हडप करेल? सगळे सांगून झाले; पण तिकडे दुर्लक्ष करून तो हवालदार घुश्शाने म्हणाला,” ते काही मला सांगू नका, काही दाखवू नका.जमीन जप्त झाली आहे. तिथे आता कुणीच जायचे नाही” हे ऐकल्यावर नागा जगमित्र आहे हेच सहन न होणारे ते चार दोन लोक हातावर टाळी देत एकमेकांत बोलू लागले,” नागाची दिवाळी संपली की रे!”
सुनावणी नाही काही कुणाची बाजू ऐकली नाही आणि नागाची जमीन लगेच जप्तही झली! नामा गप्पच होता इतका वेळ. पण तो आता म्हणाला,” हवालदार मित्रा, जमीन माझी नव्हती आणि नाहीच.पण गावकऱ्यांनी आपल्याच जमीनीतला तुकडा वाटा काढून ती फक्त माझ्या नावावर केली. जप्त केलेली तुम्ही जमीन माझी नाही,गावाची केली. हा अन्याय गावावर का? अहो गावच्या लोकांचे मित्र व्हा. त्यांची जमीन परत करा.” नागाचे बोलणे ऐकून त्या यवन हवालदाराचा घुस्सा आणखीच वाढला. तो कातावून म्हणाला, “ओ नागा, हे काय मित्रा मित्रा चालवलंय मघापासून? तुला लोक जगमित्र म्हणतात म्हणून तू मलाही मित्रा मित्रा कराय लागलास का? तमीजसे बोल, काय?” हवालदाराच्या मनात, नागाला लोक प्रेमादराने जगमित्र म्हणतात त्याचा हेवा वाटत होता! ती मळमळ बाहेर आली! नागा काही बोलला नाही हवालदाराला. त्याच्याकडे तो शांतपणे पाहात उभा होता.गावकरीच पुन्हा पुन्हा त्याची व आपली बाजू मांडू लागले.

अखेर हवालदाराला काय वाटले कुणास ठाऊक? तो नागाकडे आणि गाववाल्यांकडे पाहून नागाला म्हणाला,”नागा,माझ्या मुलीचे लगीन है. तिच्या देवकासाठी आमच्या घरात वाघ लागतो. तो घेऊन ये. नाही तरी तू जगमित्र म्हणवून घेतोस. अरे गावची गाईगुरं वासरं कुणाचेही अंग चाटतील; नजदिक येऊन राहतील. त्यात काय विशेष मोठे आहे. जगमित्र असशीलच तर वाघ घेऊन ये. मला मित्र मित्र म्हणत होतास. मी तुला एक सवलत देतो. बघ,मित्रासाठी वाघ घेऊन ये. हां पण आज संध्याकाळ पर्यंत आणला पाहिजे वाघ! वाघ आण जमीन घेऊन जा. !”

ही जगावेगळी,जीव घेणारी सवलत ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. मनातून सर्वच घाबरून गेले. नागा शांत होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, “हवालदार तुला मी चांगल्या भावनेनेच मित्रा म्हणालो होतो. आता तुझ्या लेकीच्या लग्नात देवदेवकासाठी पाहिजे म्हणतोस तर प्रयत्न करतो. पण मला आता माझं काही खरं नाही असे वाटायला लागले आहे.. पण पुन्हा सांगतो ती जमीन माझी नाही. गावकऱ्यांनी प्रेमाने ती माझ्या नावे करून दिली. पण वाघ तर मलाच आणला पाहिजे. बघतो.”
नंतर तो आपल्याशी मनात बोलू लागला, जमीन मी मागितली नव्हती. ह्या उपाधीत मला गुंतवू नका अशी गावाची विनवणी करत होतो. पण गावाच्या प्रेमापुढे माझे काही चालेना. माझ्या जवळ पांडुरंगाची आळवणी करत त्याच्याकडे भीक मागण्या शिवाय आता दुसरे काय आहे. विठ्लाच्या भरवशावर आल्या प्रसंगाला तोंड दिलेच पाहिजे. इतका विचार केल्यावर तो हवालदाराला व गावकऱ्यांना नमस्कार करून तिथूनच तडक रानाकडे निघाला.

आगीचे संकट झोपल्यावर आले होते. हे तर जागेपणी डोळे पांढरे करणारे संकट नागा ब्राम्हणावर आले होते. नागा जंगलात आला. विठोबाची मनापासून तळमळीने, अतिशय तीव्रतेने आळवणी करू लागला. “जय जय अनाथबंधो करूणाकरा। भक्तवत्सला कृपासागरा। पतितपावना विश्वंभरा। दीनोद्धारा रुक्मिणीवरा,पांडुरंगा, माझी तुला करुणा येऊ दे रे दयाघना! कृपा कर ! आता उशीर नको मायबापा! धाव पाव विठाई माऊली, लवकर ये. हवालदार माझा मित्र जाण। त्याच्या कन्येचे आहे लग्न । वाघाचे दैवत प्रतिष्ठे कारण । पाहिजे सत्य तयासि।।त्याच्या कार्यास ह्या समयी पांडुरंगा विठ्ठला तू धावून ये. तू नाही आलास तर तुझ्या पायाशी माझा हा देह लगेच ठेवीन. विठठ्ला गोविंदा अशावेळी तू नाही आलास तर मी जगून तरी काय उपयोग? “
नागाची ती अार्ततेने अनन्यभावाने केलेली विनवणी ऐकून एका मोठ्या वाघाचे रूप घेऊन चक्रपाणी पंढरीनाथ तात्काळ प्रकट झाले.

एक मोठी डरकाळी फोडून वाघरूपी विठ्ठलाने नागास विचारले,” अरे नागा, तुला कोण त्रास दतोय? दाखव तो मला.एका घासात त्याला खाऊन टाकीन!” हे ऐकल्यावर नागा वाघापुढे हात जोडून म्हणाला ,” महाराज! हवालदार माझा मित्र झालाय. त्याच्याकडे मंगल कार्य आहे. म्हणून तुम्हाला मी प्रार्थना करून बोलावले केशवराजा,इथे आज हिरण्यकश्यपु नाही. आणि मी प्रल्हादा एव्हढा महान भक्त नाही. तरी नरहरी श्यामराजाच्या उग्र संतापाची आवश्यकता नाही. पांडुरंगा तुमचे रोजचे सौम्य रूप पाहिजे. अहो त्या यवन हवालदाराच्या मुलीच्या लग्नासाठी आपण चालले आहोत.” त्यावर महाव्याघ्ररूप पुंडलिकवरदायी हरिनारायण नागाला बोलले, “ते ठीक आहे. हरकत नाही. मला घरून ठेवू आणि तू चल. पण जे दुष्ट असतील त्यांना गमजा दाखवतोच ते तू पाहा.”

नागाने आपले उपरणे वाघोबा झालेल्या विठोबाच्या गळ्यात बांधले. एक टोक धरून तो गावाकडे आला. नागाबरोबर मोठा वाघही येतोय हे पाहून गावचे लोक घाबरून आोरडत घराकडे पळत सुटले. घाबरून पळत सुटलेल्या एकेकांची विशेषत: नागाचा अकारण द्वेष करणारी मंडळींची तर भलतीच फजिती होऊ लागली. पळता पळता धोतरात पाय अडकून पडले, तर वाघ कुठे आहे हे मागे वळून पाहताना पुढच्या खाचखळग्यात काही धडपडले. तर काहींची भीतीने गाळण उडून पळताना धोतरे फिटू लागली. वाघाला पाहून घाबरलेली पोरे पळताना तशाही अवस्थेत, मोठ्या माणसांची पळता भुई थोडी झाली हे पाहून, एकमेकांत ओरडून बोलू लागली. “ अरे शिरप्या! त्या गणपतरावाचं मुंडासं उडून चाललय बघ!” “ अरे मुंडाशाचं काय बघतोस त्या जालिंदरमामाचं धोतर गळून पडतेय त्ये बघ!” “ पळ, पळ,पळा “ ओरडत गावातले लोक ऱ्घरात जाऊन कवाडे बंद करून बसली. तेव्हढ्यात “ नागा झाला तरी त्याने वाघाला घेऊन येणे ठीक केले नाही म्हणत वेशीचा प्रचंड दरवाजा बंद करून टाकला.
केशवराज महाव्याघ्र वेशीपाशी आले. आणि त्याने आपली फक्त शेपटी जमीनीवर अशी आपटली की मोठ्या आसुडाचा फाट ऱ्फटाक्क् असा कडाडून आवाज आला! तसा एक धुळीचा मोठा लोट गावावर पसरला! वेशी आतले लोक दचकले. पाठोपाठ ‘प्रलयजलधिनादंकल्पकृत वन्हिवक्त्रम’ अशी नरहरी शामराज, नरसिंहासारखी डरकाळी फोडली. त्या गगनभेदी आवाजानेच वेशीचा दरवाजा तीन ठिकाणी तुटून फळ्या चिरफळ्या होऊन धाडकन खाली पडला. त्या फळ्या चिरफळ्या तुडवत राजेशाही थाटात महाव्याघ्र केशवराज एकेका पावलाने दहा दहा भूकंपाचे हादरे देत आत शिरला!

तो आवाज ऐकून अनेक गर्भगळित होऊन जिथे होते तिथेच मटकन बसले. मोठे बाप्येही दारा आडून फटीतून खिडक्या किलकिल्या करून त्या महाव्याघ्राचे रूप न्याहळीत बसले. बायांनी तर ‘राम राम’ ‘ रामकृष्ण हरीचा’ जप थांबवलाच नव्हता.
“ अरे हे नागाच आहे आपला?” कसला भारी वाघ घेऊन आलाय? भ्रम आहे सगळा!” “ अहो हा जादूटोणा आहे!” “जादूटोणा आहे ना मग घरात का लपून राहिले सकाळचा लोटा घेवून तुमी?” आं? बाहिर जाऊन वाघाच्या नको नागाच्या पाठीवर हात फिरवून ये, जा की.” हे सवाल जवाब चालूच होते. जाणती म्हणवणारी माणसे,”जगमित्राने भक्तीच्या बळावर देवालाच आणले आहे.अहो नाहीतर कोणता वाघ गळ्यात पंचा बांधू देईल?” पण हे सांगताना ह्या सर्व सज्जनांच्या कवळ्या थाड थाड आपटत होत्या.भीतीने सर्वात जास्त तेच काकडले होते. खिडक्यांची अर्धीच फळी किलकिली करून तोतरं बोलू लागले होते! दुसरा एक सांगत होता, “ अहो पंडीत, तो वाघच आहे. नागाने हवालदाराला खाऊन टाकण्यासाठीच आणलाय.” वाघ असो की विठोबा लोकांचे तर्क कुतर्क थांबत नसतात.

नागा मात्र लोकांना ओरडून सांगत होता,” लोकांनो घाबरू नका. हा वाघ कोणालाही काही करणार नाही. मी ह्याला कबूल केल्याप्रमाणे हवालदाराला द्यायला चाललोय.” इतके ऐकल्यावर लोकांनी आपली दारे खिडक्या थोड्या जास्त उघडल्या. इतकेच केले!

नागा वाघाला घेऊन पुढे गेला ह्याची खात्री झाल्यावर बरेच लोक तिकडे निघाले. एरव्ही घरात गावात वाघिणी असलेल्या बाया, राम राम म्हणत, पोराबाळांना छातीशी पोटाशी, मिठीत जवळ घेऊन स्वत:च्या तोंडात पदराचा चुरगळ घेऊन बसल्या होत्या त्या ‘वाघिणी’ही पाठोपाठ निघाल्या.

हवालदाराच्या गल्लीत, नागा वाघ घेऊन आलाय हे पोराटोरांच्या मोठ्या कालव्यावरून सगळ्यांना समजले. घरांची दारे कवाडे पटापट बंद झाली. हवालदारही घाबरून घरात लपून बसला. नागाला आपण जगमित्रावरून म्हणालो काय, त्याची हेटाळणी काय केली,आपण त्याला वाघ आणण्याची अट घालून मोठी ‘सवलत’ दिल्याचे नाटक काय केले ते आठवून हवालदाराने हंबरडा फोडायचेच बाकी राहिले होते. पण गळा काढून रडण्याचे काम त्याच्या बायकामुलांनी अगोदरच जोरजोरात सुरु केले होते!
“ हवालदार मित्रा म्हणू का हुजुर म्हणू! तू सांगितल्याप्रमाणे वाघ आणलाय. बाहेर येऊन पाहा.” नागा इतके म्हणतोय तोच वाघविठोबा नागाला हिसडा मारून हवालदाराच्या अंगणात मोठी डरकाळी फोडून उभा राहिला. फाड् फाट्ट् शेपटी आपटली आणि गुरगुरत एक फेरी मारून उभा राहिला. हे ऐकून घराघरातला गोंधळ आणखीच वाढला. काही जणांची दातखीळ बसली. हवालदाराच्या घरात पुन्हा एकच आकांत झाला. नागा पुन्हा हवालदाराला म्हणाला,” तुझ्या मुलीचे देवक बसवायचे त्यासाठी वाघ आलाय. ये बाहेर ये तो आता तुझाच आहे. “ नागा बोलला की लगेच वाघाने धडकी भरवणारी डरकाळी फोडली. नागाचे बोलणे ऐकून जागचा उठलेला हवालदार डरकाळी ऐकून खालीच कोसळला! गारठून गप्प झालेली गल्लीही आता रडू ओरडू लागली.

नागा वाघाजवळ जाऊन म्हणाला,” तुम्ही मला वाचवलेत. माझे रक्षण केले. मुख्य म्हणजे माझी गरीबाची पत राखलीत. हा हवालदार त्याच्या मुलीच्या मंगलासाठी तुम्हाला घेऊन या म्हणाला. शांत व्हा. तुमचा मूळ प्रेमळ कृपाळूपणा धरा.” इतके विठोबाला सांगून त्याच्या पाठीवर नागा हात फिरवित थांबला.
हवालदाराच्या घरातून बायको त्याला सांगत होती ते बाहेर ऐकू येत होते. “ अहो आपल्या बालबच्चांसाठी तरी बाहेर जा. तुमचे काय वय झालं आहे, होणारच आहे. बिमार पडून तरी तुम्ही जाणारच.पोरांची सब जिंदगी पडलीय अजून. आपल्या बेटीसाठीच आणलाय म्हणतो तो वाघ.जा, बाहेर जा. आम्हाला तरी वाचवा.” ते ऐकून नागाही म्हणाला,” हवालदार तू एकटाच नाही तुम्ही सगळे या. तुम्ही सगळे आबाद राहाल. या, हा वाघदेव तुम्हाला काही करणार नाही. असा वाघ कुणालाच पाहायला मिळत नसतो. हेच महिपतीबुवांच्या शब्दांत नागा म्हणतो,” जे चंद्राहूनि शीतळ बहुत। जे अमृतासीही जीववित। ते दृष्टीसी देखोनि दैवत ।भयभीत मनी का होता। नाना योग याग करिता ऋषी। लवकरी प्राप्त नव्हे तयांसी। प्राप्त नव्हते ज्याचे चरण । ते दैवत दृष्टीसी देखोन । तुम्ही का लपून बैसावे।। “

हवालदार दरवाजा हळूच उघडून भीत भीत बाहेर आला. नागाला हात जोडून करूणा भाकित बोलता झाला,” आता कृपा करूनि मजवर। वाचवी सत्वर दयाळा।” मी तुझ्याशी आकसाने वागलो. त्याचे आज मला तात्काळ फळ मिळाले. तुला जगमित्र का म्हणतात त्या मागचे सत्यही कळले. ह्या वाघाने ते समजावून दिले.तू वाघ आणून दाखवलास. आम्हा घरातल्या सगळ्यांना तुझ्यामुळे दैवताचे दर्शन घडले. माझ्या मुलीचे देवक जगमित्र नागा तुझ्यामुळेच साक्षात “देवप्रतिष्ठे”ने आज झाले.”
हवालदार आणि त्याच्या घरातील सगळी मंडळी जगमित्र नागा आणि वाघासमोर हात जोडून होती!

वाघाला घेऊन जाताना नागा हवालदाराला म्हणाला, “मी जगमित्र आहे की नाही मला ठाऊक नाही. पण तुझ्यामुळे माझे दैवत मला भेटले. तू मात्र माझा मित्र झालास. वाघ आणून दे जमीन परत करतोस म्हणाला होतास.ती जमीन माझी नाही. गावकऱ्यांना परत दे.” नागाच्या प्रत्येक बोलाला हवालदार हात जोडून मान खाली घालून हो हो म्हणत होता.
जमलेले सर्व लोकआमचा नागा खरा जगमित्र आहे असे पुन्हा पुन्हा म्हणू लागले.

नागा आपल्या जीवीच्या जीवाला, विठूरायाला घेऊन पुन्हा अरण्यात गेला. तिथे दाट झाडीत पंढरीच्या परब्रम्हाने, संतांच्या सावळ्या विठूरायाने, शंख चक्र गदाधारी चतुर्भुज रुपात आपल्या भक्ताला दर्शन दिले. नागा त्या अभूतपूर्व, अद्भुताहूनि अद्भूत,आणि डोळ्यांनाही अमृताहूनी गोड अशा सगुण साकार भगवंताकडे डोळे भरून पाहात असतानाच पांडुरंगाने त्याला प्रेमाने आलिंगन देऊन ‘आपणासरिखे केले तात्काळ!”

परिसा भागवत

बेलमाॅन्ट

संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, एकनाथ तुकाराम ही नावे त्यांची चरित्रकथा, त्यांच्या जीवनातील काही घटना कुणाला माहित नाहीत? बहुतेकांना माहित आहेत. पण बरीच संत मंडळी अशी आहेत की त्यापैकी काहींची आपणास नावे किंवा प्रसंग घटना बहुतेकांना माहित नसण्याची शक्यता आहे. तर अशा काही संतांच्या मांदियाळीतील, गर्दीतील काही संतांच्या गोष्टी आपण ऐकू या. अशा गर्दीतल्या किती संतांविषयी सांगणे मला जमेल ते मला आज सांगता येणार नाही. पण सुरुवात तरी करायला काय हरकत आहे? खरंय की नाही?

आपले बहुतेक सर्व मराठी संत हे विठ्ठलाचे भक्त आहेत. वारकरी पंथाचे म्हणजेच भागवत आहेत. पण असाही एक भक्त पंढरपुरातच,तेही संत नामदेवांच्या काळातच,होऊन गेला ; तो रुक्मिणीचा भक्त होता. त्याचे नाव भागवत होते पण तो परिसा भागवत म्हणूनच ओळखला जातो.

भागवत रुक्मिणी देवीचा मोठा एकनिष्ठ भक्त होता. रोज पांडुरंगाच्या देवळात जाऊन तेथील देवी रुक्मिणीची तो मनापासून पूजाअर्चा करीत असे. त्यानंतर ध्यानस्थ होऊन तिचेच तो ध्यानचिंतन करत बसे. मग भजन करून नैवेद्य दाखवून घरी येई. घरी आले की संसारप्रपंचातील रोजचे व्यवहार चालू होत असत. भागवत मनापासून दिवसभर ‘उठता बसता खाता पिता’ रुक्मिणी मातेचे स्मरण करण्याचा प्रयत्न करत असे. ते चालूही असेल पण प्रपंचाच्या रहाटगाडग्यात अडकल्याने ते एकचित्ताने होत नाही ह्याची त्याला जाणीव होती. म्हणून तो मनात खंत करीत असे.

असाच एकदा भागवत रुक्मिणीपुढे तल्लीन होऊन ध्यानस्मरण करत बसला असता रुक्मिणीने त्याला दर्शन देऊन त्याच्यबावर कृपा केली. इथेच न थांबता ती भागवताला म्हणाली, “ भागवता बाळा तुझी काही इच्छा असेल तर सांग. आपल्याला आई रुक्मिणीचे प्रत्यक्ष दर्शन झाले ह्या परमानंदात असलेला भक्त भागवत म्हणाला,”आई! तुझी भक्ति अखंडित करता यावी ह्या शिवाय माझं तुझ्यापाशी दुसरे काय मागणे असणार? “ रुक्मिणीने ते ऐकून घेतले. पण भक्ताच्या मनातले त्याच्या दैवताशिवाय कोण चांगले जाणू शकते? शिवाय रुक्मिणीकांत पांडुरंगापेक्षा जगाचे व्यवहार कशावर चालतात ह्याचे तिला पूर्ण ज्ञान होते. तिथल्या वास्तवाची तिला चांगली माहिती होती. तिने भागवताला एक परिस दिला. “ आता तुझ्या भक्तीआराधनेत, भजन-पूजनात व्यत्यय नाही ना येणार?असे हसत हसत म्हणाली.

आई रुक्मिणीने आपल्याला प्रत्यक्ष दर्शन दिले ह्या परमानंदात असलेल्या भागवताला देवीने परीसही दिला ह्याचा व्यावहारिक आनंदही दुप्पट झाला!

भागवताने घरी आल्यावर हर्षभरित होऊन देवळात घडलेली हकीकत आपली बायको कमळजेला सांगितली. परिस दाखवला.एका सुईला तो लावून तिचे सोने झाल्याचे पाहून दोघांचाही आनंद पोटात मावेना! भागवत निष्ठावान भक्त होता तरी त्याचे पाय जमिनीवर होते. तो बायकोला आणि स्वत:लाही सावध करत म्हणाला,”आपल्या जवळ परिस आहे हे कुणालाही कळता कामा नये. कुणापाशीही बोलू नकोस. आपण पंढरपुरी राहतो आहोत हे विसरु नकोस. इथे आणि आसपास संतसज्जनांची वस्ती आहे. त्यांना जर समजले की भागवताने रखुमाईला मागून काय मागितले तर परिस! बरं मी न मागता देवीने दिला म्हटले तरी देवी रखुमाईने सुद्धा देऊन दिले काय तर परिस! असे ते माझ्या आईलाही बोल लावतील. त्यापेक्षा गरीबासारखे गप्प बसलेले किती बरे! “

भागवताचा दिनक्रम चालू होता. नेहमीपेक्षा दुप्पट उत्साहाने जास्त निश्चिंततेने चालला होता.त्याने परिस एकदम पहारीला लावला नाही. टाचणीलाच लावला. बाहेर वावरताना भागवताचा वेष पूर्वीचाच पण मुद्रा जरा दीनवाणी आणि वागण्यातील वृत्तीही उदास दिसू लागली. घरात सुग्रास जेवण पण बाहेर आपण कदान्न खातो असा चेहरा घेऊन वावर. तरीही, घरात रोज चांगले चुंगले, गोडा धोडाचे, दुधा तुपाचे भोजन होत असे. त्याची देहावर येणारी कांती कशी लपवली जाईल! तरी अनेक पंढरपुरकर त्या कांतीला भक्तीचे तेज मानीत. तेही खरे असणार. पण चांगल्या अन्नाचाही तो परिणाम असणारच.
भागवत हा विरक्ती दाखवत होता. काही प्रमाणात त्याच्या भक्तीचे ते फळ असेलही. पण समाजातले सज्ञान परीक्षक जन होते त्यांना भागवताला काही तरी घबाड लाभले असावे हे त्यांना जाणवत होते. जसे वक्त्याला श्रोत्यांच्या चेहऱ्यावरून आपले व्याख्यान त्यांना समजले, आवडले का ते कंटाळवाणे रटाळ होतेय हे लक्षात येते; दिव्यात तेल आणि वात आहे का नाही हे प्रकाशच सांगतो तसे चतुर, जाणत्या जनांना भागवताची विरक्ति, उदासीन वृत्ती खरी नाही असे वाटत होते.

भागवताची बायको नेहमी प्रमाणे एकदा चंद्रभागेवरून पाणी घेऊन निघाली असता तिला संत नामदेवाची पत्नी राजाई भेटली. कमळजाला पाहताच राजाई म्हणाली,” ही मी आलेच घागर भरून. मी येईतो थांब.दोघी मिळून जाऊ.” राजाई पाणी घेऊन आली. दोघी चालू लागल्या. बोलू लागल्या. मध्येच थांबायच्या. राजाईचे लुगडे साधेच. तसेच खाणेपिणेही बेताचेच. ती रोड झाली होती.अशक्त दिसत होती. राजाईकडे निरखून पाहात कमळजा म्हणाली,” राजाई कसं चाललंय तुझं? बरं आहे ना?खरं सांग. शेजारीण मैत्रिणीपाशी काही लपवायला नको. लपतही नाही.” “अगं लपवायचं काय आहे? सांगण्यासारखं वेगळं काही नाही. आमचे हे पांडुरंगाच्या भजनभक्तीतच रंगलेले. त्यातच गुंगलेले. धंदा व्यवसायाकडे पाहिजे तेव्हढे लक्ष नाही. चाललंय आमचं रुटुखुटू!”नामदेवाची राजाई म्हणाली तशी कमळजा जरा उत्साहानेच सांगू लागली,” “ ह्यांनी रुक्मिणीची भक्ति केली. आमचं बरे चाललेय बघ.”दोघी पुढे निघाल्या. चालता चालता कमळजा सांगू लागली,” अगं भावजींना म्हणावे ज्या झाडाला ना फूल ना फळ लागत नाही त्याला पाणी घालून व्यर्थ का शिणावे? विहिरीसी न लागता जीवन। व्यर्थच उकरायाचा शीण। तेवी प्रसन्न न होता रुक्मिणीरमण। कासया करावे आराधन।। अगं जो सोयरा लग्नमुंजीतही आहेर देत नाही त्याला कोणी कधी बोलावते का? पंढरीनाथाचे इतके भजन करूनही जो आपल्या भक्ताची साधी रोजची पोटापाण्याची चिंता सोडवत नाही त्याची भक्ती का करावी? ती काय कामाची? “इतके कमळजा राजाईला बोलली तरी तिला राजाईबद्दल प्रेम होते.,कमळजाचे घर आले. ती राजाईला म्हणाली, “आत ये, जरा थांब.” कमळजा आत जाऊन परिस घेऊन आली. “माझ्या नवऱ्याने रखुमाईची अनन्यभावाने भक्ती केली. ती माऊली प्रसन्न झाली. तिने आम्हाला हा परिस दिला”हा परिस घे. तुझी गरज भागव. लागलीच मला परत आणून दे. काहीही झाले तरी परिस मला द्यायला विसरू नकोस. माझी तुला विनवणी आहे ही. येव्हढे चुकवु नकोस. आपल्या दोघींच्याही नवऱ्यांना यातले काही समजू न देता सगळे लवकरझाले पाहिजे. कसेही कर पण परिस आणून दे.”
राजाई हरखून गेली होती. घरी आली. घरातल्या सुया कातऱ्या किल्ल्याना परिस लावून सोन्याच्या केल्या. त्यातलेच किडुक मिडुक सोनं घेऊन सोनाराकडे गेली. सोने देऊन द्रव्य घेतले. राजाई, गोणाई, कमळजा काय सर्व बायकाच. राजाई पहिल्यांदा वाण्याकडे गेली. संसाराला लागणारे धान्यधुन्य. पिठ मिठ, तेल तिखट, गूळ पोहे, खारिक खोबरे, हिंग जिरे खडीसाखर बत्तासे सर्व काही घेतले.

नामदेवासाठी धोतर अंगरखा, मोठे पागोटे; मुलांसाठी कापड चोपड, जनीसाठी लुगडे खण आणि सर्वात शेवटी स्वत:साठी अगदी बेताची जरीच्या काठा पदराचे साधेच लुगडे आणि खण घेऊन घरी आली. चारी ठाव स्वैपाक केला. भांडी कुंडी रचून मांडणीवर ठेवली. केरवारे आटपुन नवे लुगडे नेसून नामदेवाची वाट पाहू लागली.

दोन प्रहरी नामदेव आले. जेवायला बसण्यापूर्वी स्वैपाक, धान्य,गूळ खारका खोबऱ्यांनी भरलेले डबे वगैरे पाहून आणि सर्व नवऱ्यांप्रमाणे सगळ्यात शेवटी राजाई आणि तिच्या नव्या लुगड्याकडे पाहून त्यानी विचारले,” ही सगळी इतकी सामुग्री कशी आली घरात?” राजाई काही बोलेना ना काही सांगेना. मग इकडून तिकडे वळणे घेत बोलू लागली. नामदेव म्हणाले,” खरे काय ते स्पष्ट सांग.नाहीतर मी जेवणार नाही.” राजाई रडवा चेहरा करून रुक्मिणीने आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन भागवताला परिस दिला. कमळजाने मैत्रिण म्हणून आपल्याला गरज भागवण्यापुरता तो दिला.कुणालाही, तुम्हालाही आणि भागवतभाऊंनाही ह्यातले काही कळू न देता झाले पाहिजे अशी सर्व हकीकत सुगतवार सांगितली. हे इतके सांगूनही फारसे बिघडणार नव्हते. पण आधीच रडवेला झालेला चेहरा आता केव्हाही रडू कोसळेस असा होतसा ती नामदेवाला म्णाली,”तुम्ही विठ्ठलाची लहानपणापासून इतकी भक्ती करता; त्याचे दिवसरात्र भजन कीर्तन करता पण घरात खायला ल्यायला पुरेसे नसते; मग त्या पांडुरंगाची भक्ती काय कामाची? असे तिने जेव्हा विचारले तेव्हा सगळे गाडे बिघडले आणि घसरले!

नामदेव शांत खरे पण आता थोडे रागानेच उत्तरले,” विठा नारायणाची आई,आपल्याला विठ्ठलाची भक्ती पुरेशी आहे. त्याची भक्ती करता येणे,करणे हीच त्याची आपल्यावर कृपा आहे.ही असली किमया काय कामाची? मला तो परिस बघू दे.”राजाईने भीत भीत तो परिस नामदेवा हाती सोपवला. नामदेव तसाच उठला आणि चंद्रभागेकडे निघाला. तिथे जाऊन त्याने तो परिस नदीत भिरकावून दिला!

नामदेवाच्या मागोमाग राजाई रडत ओरडत,” अहो तो परिस मला कमळजेला दिला पाहिजे. मला द्या तो. नाहीतर तिला शिक्षा भोगायला लागेल. माझ्यामुळे कमळजेला किती त्रास भोगायला लागेल हो! अशी रडत भेकत विनवणी करीत चालली होती.पण नामदेव पार पुढे गेले होते.

नदीकाठी नामदेव पांडुरंगापुढे आपल्याला दोष देत बसले होते. नामदेवांच्या लहानपणापासूनच्या सवयीप्रमाणे आताही ते विठ्ठलाशी बोलत होते. “पांडुरंगा !विठ्ठला,मायबापा!अरे तू मला ह्या मोहा्च्या उपाधीत कसे पाडलेस रे! राजाई झाली तरी ती म्हणजे मीच ना? आम्ही दोघे वेगळे नाहीत पांडुरंगा.तिला मोह झाला असे कसे म्हणू विठ्ठला ! पाणी आणि त्यावरच्या लाटा वेगळ्या असतात का? सूर्य, प्रकाश,आणि किरणे ही वेगळी कशी विठ्ठला? मोह मलाच झाला. ह्या उपाधीत मीच सापडलो ह्यातून मला बाहेर काढ.” असे म्हणत ्सताना तो येई हो विठ्ठले माझे माऊली ये असा धावा करत, उन्हाची तिरिप चुकवण्यासाठी, ‘निढळावरती ठेवूनी कर’, ‘झळकतो का गगनी पितांबर’ हे मोठ्या आशेने पाहू लागला. नामदेवाचे पांडुरंगाशी संभाषण चालू होते.

कमळजेच्या घरी दुसरेच रामायण घडत होते. परिसा भागवतही घरी आला होता. आल्यावर देवपूजेला बसला. अलिकडे लागलेल्या सवयीमुळे देव संबळीतून काढताना त्याला आपला’प्राण’परीस हाताला लागला नाही; डोळ्यांना दिसला नाही.”बाहेर काढला होता का? कशासाठी काढला? कुठे ठेवला?” असे एकापाठोपाठ एक प्रश्न कमळजेला विचारू लागला.कमळजा गोंधळली.पण अखेर तिने आपण तो परिस नामदेवाच्या राजाईला दिला. ती आता लगेच येईलच. आणून देईल.असेसांगितले. ते ऐकून परिसा भागवत कमळजेवर चिडूनम्हणू लागले ,”अगं तो परिस आहे परिस! चिलिम पेटवायची गारगोटी नाही ती. काय समजलीस? रोज चूल पेटती ठेवून गोड खाऊ घालणारी अन्नपूर्णाआहे ती? , “माझे आई! ती राजाई येण्याची वाट पहात बसणार का? तूच ताबडतोब जा आणि घेऊन ये आपला परिस.”

कमळजा धावत पळत राजाईकडे आली. राजाई रडत असलेली पाहून तिच्यापोटात धस्स झाले. राजाईला तिने का रडतेस असे विचारल्यावर तिने नामदेव परिस घेऊन चंद्रभागे तीरी गेला असे म्हटल्यावर कमळजाही छाती पिटीत रडू लागली.
दोघीही रडत रडत नदीकडे निघाल्या. दोन भक्तांच्या बायका रडत भेकत निघाल्या हे पाहून आजूबाजूचे, शेजारी पाजारीसगळे त्यांच्या मागू नदीकडे निघाले. हा हां म्हणता “ परिसा भागवताचा परिस नामदेव घेऊन नदीकडे गेलाय!” नामदेवाने परिसा भागवताचा परिस हाडपला!” “नामदेव परिस कमरेला बाधून चंद्रभागेवर भजन करतोय.” ह्याच्याही पुढे “नामदेव भागवताचा परिस घेऊन पंढरपुरांतून पळून गेला!” अशा नाना तऱ्हेच्या बातम्या अफवा पसरल्या.हे ऐकून परिसा भागवतही लगोलग चंद्रभागेच्या तीरी आला.

काठावर नामदेव शांतपणे विठ्ठल भावात दंग होऊन बसले होते. त्यांना पाहिल्या बरोबर नामदेवाकडे बोट रोखून, मधून लोकांकडे पाहात भागवत म्हणाला,” नामदेवा! हे बरे नाही केलेस.माझा परिस चोरून घेतोस आणि इथे येऊन विठ्ठल भक्ती करतोस.अरे बगळाही इतक्या ढोंगीपणाने ध्यान करणार नाही. मुकाट्याने माझा परिस मला दे.” पहिल्यांदा नामदेव काहीच बोलला नाही. पण रीतीप्रमाणे लोक आपल्याला वाटते ते बोलू लागली.

काही जण,” बघा बघा! संत म्हणवणारे कसे भोंदू असतात !त्या परिसा भागवताचा परिस हाडपलाय आणि आता भजनाचे नाटक चाललेय!” तर दुसरे काही,” अरे हा भागवत तरी कसला! हा स्वत:ला हीन दीन दाखवत
पडलेला चेहरा घेऊन वागत होता. पण बघा आता! परिस असल्यामुळे सोने करून रोज पंचपक्वान्नांचे जेवण हदडित होता. अहो पाहा पाहा! त्याच्या चेहऱ्यावरची तुकतुकी चमक पाहा.” “ नुसते फाटके धोतर आणि अंगावर मळका पंचा पांघरला की माणूस गरीब दिसेल पण गरीब होत नाही. आता परिस गेल्यावर नामदेवावर चोरीचा आळ घेतोय.व्वाह!” तर काही नामदेवाला दोष देऊ लागले. दुसरे आणखी काही जन,” अहो आपण सामान्य माणसं. भक्ती परमार्थ काय समजतो आपल्याला? ही स्वत:ला संत म्हणवून मिरवणाऱ्यांची कामे.आपल्याला नक्की काय माहित असणार आहे? पण एक विठ्ठलाचा लाडका भक्त म्हणवणारा आणि दुसरा रुक्मिणीचा नि:सीम सेवक म्हणवणारी ही देवाची दोन माणसे चार चौघात आरोप प्रत्यारोप करताहेतह्याचा अर्थ दोघांतही काही तरी बरेवाईट असणार !”

नामदेव शांत पण ठामपणे म्हणाला,”परिस माझ्या काय कामाचा? मी तो नदीत फेकून दिला!”त्यावर परिसा पटकन म्हणाला,” तुमच्या कामाचा नव्हता तर माझा मला परत करायचा!”लोक हो हो म्हणू लागले. नामदेव त्यावर उत्तरला, “ भागवता, तुम्ही स्वत:ला विरक्त, संसारात उदास म्हणून दाखवत,व्यवहार करीत होता. तुम्हाला तरी तो कशाला हवा? मी चोरून माझ्यापाशी ठेवला नाही. नदीत फेकून दिला.पाहा नदीत;शोधा. “ “अरे वा! फेकणार तुम्ही आणि शोधायचा आम्ही? तोही ह्या चंद्रभागेच्या तळातल्या वाळूरेतीत? नामदेवा तू टाकलास तूच शोधून काढ.”

हे ऐकून नामदेवांनी चंद्रभागेत मोठी बुडी घेतली. काही वेळाने ते वर आले ते ओंजळभर वाळू घेऊन. ते परिसाला म्हणाले,” परिसा भागवता, ह्यातला तुझा परिस कोणता तो घे!” भागवत कपाळाला हात लावून बोलला,” नामदेवा चंद्रभागेच्या ह्या वाळू गोट्यात कुठे माझा परिस असणार?” पण आता उत्साह संचारलेल्या एकदोघांनी लगेच जाऊन सुया टाचण्या आडकित्ते आणले. नामदेवाच्या ओंजळीतल्या वाळूरेतीला लावून पाहू लागले तर कशालाही ती वस्तु लावा सोन्याची झाली. सगळ्या वस्तु सोन्याच्या झाल्या! वाळूचे सोने झाले! लोकांमधून ओSSSह असा मोठा उदगार उमटला!

नामदेव आपली वाळूने भरलेली ओंजळ पुढे करीत प्रेमळपणे म्हणाले, “परिसा हेघे तुझे परिस!” परिसा भागवत ओशाळला. खाली मान घालून गप्प झाला. नामदेवांना हात जोडून म्हणाला, “नामदेवमहाराजा, रुक्मिणीमातेने दिलेल्या एका परिसाने फुगलो होतो. आज तुमचा हातच परिस आहे हे मलाच काय सर्वांनाच पटले आहे. तुमचा हा कृपेचा हात ज्याला लागेल त्याच्या आयुष्याचे सोने होईल! आपल्या कृपेचा हा वरदहस्त माझ्या मस्तकी असू द्या म्हणजे सर्व काही भरून पावलो!”

संतकवि महिपतीबुवांचा परिसा म्हणतो, “तुमचे चरण लागती जेथे। सकळ ऐश्वर्य ओळंगे तेथे। आता परिस नलगे माते।अभय हस्ताते चिंतितो।।”

( महिपतीबुवांनी ओव्यांतून सांगितलेल्या कथेतील मध्यवर्ती कल्पनेवर आधारित)