पंढरपुरपासून मंगळवेढा १४-१५ मैलावर आहे. म्हणजे जवळच आहे. आपल्याला मंगळवेढे, दुष्काळात उपासमारीने गांजलेल्यांसाठी बादशहाचे धान्याचे गोदाम ज्यानी स्वत:च्या जबाबदारीवर खुले केले; अनेकांचे प्राण वाचवले त्या भक्त दामाजीमुळे माहित आहे. दामाजीचे मंगळवेढे अशी त्याची ओळख झाली.
त्याच मंगळवेढ्यात श्यामा नावाची सुंदर वेश्या राहात होती.तिला एक मुलगी होती. ती आपल्या आईपेक्षाच नव्हे तर अप्सरेपेक्षाही लावण्यवती होती. तिचे नाव कान्होपात्रा होते.
व्यवसायासाठी श्यामाने आपल्या ह्या सौदर्यखनी कान्होपात्रेला गाणे आणि नाचणे दोन्ही कला शिकवल्या. नृत्यकलेत आणि गायनातही ती चांगली तयार झाली. सौदर्यवती असली तरी समाजात गणिकेला काही स्थान नव्हते.
पण श्यामाला मात्र आपली मुलगी राजवाड्यात राहण्याच्याच योग्यतेची आहे असे वाटायचे. राजाची राणी होणे कान्होपात्रेला अशक्य नाही ह्याची तिला खात्री होती. तिला राजदरबारी घेऊन जाण्याचे तिने ठरवले. कान्होपात्रेला ती म्हणाली, “ अगं लाखात देखणी अशी तू माझी लेक आहेस. तुला राजाची राणी करण्यासाठी आपण राजदरबारात जाणार आहोत. तयारी कर.” त्यावर कान्होपात्रा म्हणाली, “ आई, माझ्याहून राजबिंडा आणि तितकाच गुणवान असणाऱ्या पुरुषालाच मी वरेन. पण मला तर माझ्या योग्यतेचा तसा पुरुष कोणी दिसत नाही.” थोडक्यात कान्होपात्रेने आईच्या विचारांना विरोध केला.
काही दिवस गेले. एके दिवशी कान्होपात्रेच्या घरावरून वारकऱ्यांची दिंडी, आपली निशाणे पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या तालावर, विठ्ठलाचे भजन करीत चालले होते. तीही त्या तालावर ठेका धरून डोलत होती.तिने वारकऱ्यांना विचारले, “ तुम्ही कुठे निधाले आहात? इतक्या आनंदाने आणि तल्लीन होऊन कुणाचे भजन करताहात?”
“ माय! पुंडलिकाच्या भेटी जो पंढरीला आला, आणि इथलाच
झाला त्या सावळ्या सुंदर, राजीव मनोहर अशा रूपसुंदर वैकुंठीचा राणा त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी चाललो आहोत!”
वारकरी कान्होपात्रेला सांगत होते. त्यांनी केलेल्या विठ्ठ्लाचे रूपगुणांचे वर्णन ऐकून कान्होपात्रेने त्यांना काहीशा संकोचानेच विचारले,” अहो,तुम्ही वर्णन केलेला हृषिकेषी माझ्यासारखीचा अंगिकार करेल का?” हे ऐकल्यावर वारकी तिला मोठ्या उत्साहाने सांगू लागले,” का नाही? कंसाची कुरूप विरूप दासी कुब्जेला ज्याने आपले म्हटले तो तुझ्यासारख्या शालीन आणि उत्सुक सुंदरीला दूर का लोटेल? आमचा विठोबा तुझाही अंगिकार निश्चित करेल ! तू कसलीही शंका मनी आणू नकोस. तू एकदा का त्याला पाहिलेस की तू स्वत:ला विसरून जाशील. तू त्याचीच होशील !”
वारकऱ्यांचे हे विश्वासाचे बोलणे ऐकल्यावर कान्होपात्रा घरात गेली. आईला म्हणाली,” आई! आई! मी पंढरपुराला जाते.”
हिने हे काय खूळ काढले आता? अशा विचारात श्यामा पडली. कान्होपात्रेला ती समजावून सांगू लागली.पण कान्होपात्रा आता कुणाचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. केव्हा एकदा पंढरपूरला पोचते आणि पांडुरंगाला पाहते असे तिला झाले.
कान्होपात्रा धावत पळत निघाली. दिंडी गाठली. आणि रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।। म्हणत आणि वारकऱ्यांच्या पाठोपाठ ते म्हणत असलेले अभंग भजने आपल्या गोड आवाजात म्हणू लागली.तिचा गोड आवाज ऐकल्यावर एकाने आपली वीणाच तिच्या हातात दिली !
वारकऱ्य्ंबरोबर कान्होपात्रा पंढरीला आली. विठठ्लाच्या देवळाकडे निघाली.महाद्वारापशी आल्याबरोबर हरिपांडुरंगाला लोटांगण घातले.राऊळात गेल्यावर तिला जे विठोबाचे दर्शन झाले तेव्हा ती स्वत:ला पूर्णपणे विसरली.तिच्यात काय बदल झाला ते तिला समजले नाही. पण ती पंढरपुरातच राहिली.
कान्होपात्रा रोज पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर महाद्वारापाशी कीर्तन करू लागली.दिवस असे जात असताना एका दुर्बिद्धीने बेदरच्या बागशाहाला कान्होपात्रेच्या अप्रतिम लावण्याचे मीठ मसाला घालून वर्णन केले. बादशहाने दूत पाठवून तिला घेऊन यायला सांगितले.
बादशहाचे शिपाई पंढरपुरात आले तेव्हा कान्होपात्रा कीर्तन करत होती. तिच्या सौदर्याला आता भक्तीचा उजाळा आला होता.बादशहाचे शिपाई तिला पाहिल्यावर आपण कशासाठी आलो हे विसरून कान्होपात्रेकडे पाहातच राहिले.नंतर भानावर येऊन तिला जोरात म्हणाले,” बादशहाने तुला बोलावले आहे.चल आमच्या बरोबर. कान्होपात्रा घाबरली.शिराई तिला पुढे म्हणाले,” निमुटपणे चल नाहीतर तुला जबरदस्तीने न्यावे लागेल.” ती दरडावणी ऐकल्यावर कान्होपात्रेला तिच्या विठोबाशिवाय कुणाची आठवण येणार? ती शिपायांना काकुळतीने म्हणाली,” थोडा वेळ थांबा. मी माझ्या विठ्ठ्लाचे दर्शन घेऊन येते.” कान्होपात्रा तडक राऊळात गेली आणि विठोबाच्या चरणी डोके टेकवून त्याचा धावा करू लागली.भक्त दुसरे काय करू ऱ्शकणार?
“पांडुरंगा, तू चोखा मेळ्याचे रक्षण केलेस मग माझे रक्षण तू का करत नाहीस? एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून तू गोपींचे गोपाळांचे, गायी वासरांचे संपूर्ण गावाचे प्रलयकारी पावसापासून रक्षण केलेस आणि मला का तू मोकलतो आहेस? विठ्ठ्ला, माझ्या मायबापा! अरे मी तुला एकदा वरले, तुझी झाले आणि आता मला दुसऱ्या कुणी हात लावला तर कुणाला कमीपणा येईल? विठ्ठला तुलाच कमीपणा येईल. बादशहाने मला पळवून नेले तर सर्व साधुसंत तर तुला हसतीलच पण सामान्यांचा तुझ्यावरच निश्वास उडेल. ती धावा करू लागली. “नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे।। तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी। धाव हे जननी विठाबाई।। पांडुरंगा, माी सर्व आशा,वासना कधीच सोडल्या आहेत. आता तरी “घेई कान्होपात्रेस हृदयात” ही कान्होपात्रेची तळमळून केलेली विनवणी फळाला आली. कान्होपात्रेचे चैतन्य हरपले. विठ्ठलाच्या पायावर ठेवलेले डोके तिने वर उचललेच नाही. विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला !
देवळातल्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर त्यांनी लगेच देवळाच्या आवारात दक्षिणदारी कान्होपात्रेला घाईगडबडीने पुरले.आणि काय चमत्कार! लगेच तिथे तरटीचे झाड उगवले.
बाहेर बादशहाचे शिपाई कान्होपात्रेची वाट पाहात ताटकळले.त्यांनी पुजाऱ्यांना आवाज दिला. भेदरलेले पुजारी धावत आले.त्यांनी शिपायांना कान्होपात्रा गेली. आम्ही तिचे प्रेत पुरले. लगेच तिथे झाडही उगवले!” हे ऐकल्यावर शिपाई संतापाने ओरडले, “ हरामजादों ! तुम्हीच तिला लपवून ठेवले. आणि मेली काय, लगोलग पुरली काय आणि वर झाड उगवले म्हणता? सरासर झूट.” असे म्हणत त्यांनी पुजाऱ्यांना पकडून बादशहाकडे निघाले. तेव्हढ्यात एक पुजारी सटकला. देवळाकडे जाऊ लागला. त्याच्या मागे शिपाई धावले.कुठे पळतोस म्हणत त्याच्या पाठीवर दोन कोरडे ओढले. पुजारी म्हणाला,” बादशहासाठी प्रसाद आणायला चाललो होतो” हे ऐकल्यावर शिपाई ओरडले,” तू भी अंदर जाके मर जायेगा! आणि तिथेच बाभळीचे झाड उगवले म्हणून तुझेच हे ऱ्भाईबंद सांगतील.” पण शेवटी गयावया करून तो पुजारी आत गेला. नारळ बुक्का फुले घेऊन आला.
पुजाऱ्यांना राजापुढे उभे केले.पुजाऱ्यानी आदबीने बादशहापुढे प्रसाद ठेवला. शिपायांनी घडलेली हकीकत सांगितली. ती ऐकून बादशहा जास्तच भडकला. “ काय भाकडकथा सांगताय तुम्ही. कान्होपात्रा अशी कोण आहे? एक नाचीज् तवायफ! आणि तुम्ही सांगता तुमच्या देवाच्या पायावर डोके ठेवले और मर गयी?” वर तरटीका पेड भी आया बोलता?” असे म्हणत त्याने प्रसादाचा नारळ हातात घेतला. त्याला त्यावर कुरळ्या केसांची एक सुंदर बट दिसली. “ये क्या है? किसका इतना हसीन बाल है?” म्हणूनओरडला; पण शेवटच्या तीन चार शब्दांवर त्याचा आवाज हळू झाला होता. पुजारी गडबडले. काय सांगायचे सुचेना. कान्होपात्रेचा तर नसेल? असला तरी सांगायचे कसे? शेवटी विठोबाच त्यांच्या कामी आला. ते चाचरत म्हणू लागले,” खा-खाविंद! वो वो तो आमच्या पांडुरंगाची बट है !” शाहा संतापला.” अरे अकलमंदो! दगडी देवाला कुठले आले केस? क्या बकवाज करते हो?!” पुजारी पुन्हा तेच सांगू लागल्यावर बादशहाने फर्मान सोडले.ताबडतोब पंढरपुरला जायचे. केसाच्या बटेची शहानिशा करायची. पुजाऱ्यांच्या पोटात गोळाच उठला.पण करतात काय!
बादशहाचा लवाजमा निघाला.दोरखंड बाधलेले पुजारी भीतीने थरथर कापत चालले होते. जस जसे पंढरपुर जवळ आले तशी पुजाऱ्यांनी विठ्ठलाची जास्तच आळवणी विनवणी सुरू केली.देऊळ आले.पुजाऱ्यांचे प्राण कंठाशी आले होते. राजा सभामंडपातून थेट मूर्तीपाशी गेला.आता काय होईल ह्या भीतीने पुजारी मटकन खालीच बसले.
राजाने ती सावळी सुंदर हसरी मुर्ती पाहिली.विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकुट प्रकाशाने झळाळू लागला. त्यातूनच विठ्ठलाच्या केसांचा रूळत असलेला संभार दिसू लागला! पांडुरंगाचे दर्शन इतके विलोभनीय आणि मोहक होते की बादशहाच्या तोंडून,” या खुदा! कमाल है! बहोत खूब! बहोत खूब! “ असे खुषीत येऊन बादशहा म्हणाल्यावर पुजारीही विस्फारलेल्या डोळ्यांनी पंढरीनाथमहाराजांकडे पाहू लागले. त्यांचा विश्वास बसेना.डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.
बादशहाने कान्होपात्रेचे तरटीचे झाड पाहिले.ते पाहिल्यावर कान्होपात्रेची योग्यता त्याच्या लक्षात आली. त्याच बरोबर त्याने प्रत्यक्ष जे पाहिले त्यामुळे त्याला मोठे समाधान आणि आनंदही झाला होता.
अतिशय सुंदर असली तरी कान्होपात्रा समाजातील खालच्या थरातली होती.सौदर्य हाच तिचा मानसन्मान होता.प्रतिष्ठा राहू द्या पण समाजात तसे काही स्थान नव्हते.सौदर्य हीच काय ती तिची प्रतिष्ठा होती! अशी ही सामान्य थरातली कान्होपात्रा अनन्यभक्तीमुळे विठ्ठलमय झाली होती. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात तसे तिच्या ‘ध्यानी मनी पांडुरंग होता तर ‘हरि दिसे जनी वनी’ अशी तिची अवस्था होती.
कान्होपात्रेच्या आईला तिची कान्होपात्रा राजाची राणी व्हावी अशी इच्छा होती. पण आमची सामान्य, साधी कान्होपात्रा वारकरी हरिभक्तांची सम्राज्ञी झाली. संत कान्होपात्रा झाली!
पंढरपुरच्या विठोबाच्या देवळाच्या परिसरात आजही तिथे तरटीचे झाड आहे.प्रत्यक्ष विठ्ठलाच्या सान्निध्यात, देवळाच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकाच संताची समाधी आहे— ती आहे संत कान्होपात्रेची !