Category Archives: My Life

दसरा

शिलंगणाचे सोने लुटूनी…

आपल्याकडे बहुतेक सर्व सणावारांच्या प्रथा परंपरा वेगवेळ्या असतात. दसऱ्याचेच बघा ना. आपल्याकडे रामाचा दसऱ्याशी संबंध नाही.

महाराष्ट्रात बहुतेक गावांत गावाबाहेर असलेल्या शमीच्या झाडाला प्रदक्षणा घालतात.त्यावेळी बरेच जणांच्या हातात उजळलेले पोत असतात. लोक आsईराजाs उदे उदेचा गजर करत असतात. हे मर्यादित अर्थाने सीमोल्लंघन आहे. आमच्या दसऱ्याला सीमोल्लंघनाची परंपरा आहे.

आपल्या मराठी साम्राज्याच्या वाढीत ह्या सीमोल्लंघनाच्या प्रथेचाही मोठा भाग आहे. मराठे शत्रूला आपल्या मुलखात येऊ न देण्यासाठी त्याच्याच मुलखात जाऊन लढण्यासाठी मोहिमेवर निघत. बऱ्याच मोहिमा दसऱ्याचा मुहुर्त गाठून होत असत किंवा मोहिम फत्ते करून विजयाचे सोने आणून दसऱ्याच्या सुमारास परत येत. शिलंगणाचे सोने लुटण्याला लाक्षणिक अर्थाबरोबरच अशी प्रत्यक्षातील पराक्रमाची ऐतिहासिक परंपराही आहे. आपल्या राज्याचा दरारा वाढवून व शत्रूला जरब बसवून राज्याच्या सीमा वाढवणारे व संपत्तीत वाढ करणारे हे सीमोल्लंघन होते. शिलंगणाचे सोने लुटून दसरा साजरा होई. शिलंगण हे सीमोल्लंघनाचे मराठमोळी बोली रूप आहे.

गावात शमीचे झाड असेल तिथे दसरा “आई राजा उदे उदे”च्या गजरात होतो. शमीचे झाड का तर महाभारतात पांडवांनी, एक वर्ष अज्ञातवासात काढायचे होते म्हणून,आपली शस्त्रे शमीच्या झाडावर दडवून ठेवली होती. (बहुतेक) विराटाच्या बाजूने लढायचे होते. त्यासाठी त्यांनी ह्या दिवशी आपली शस्त्रे बाहेर काढली. त्याच दिवशी अज्ञातवासही संपला होता. त्याची आठवण म्हणून आपल्याकडे दसऱ्याला शमीच्या झाडाची पूजा करून दसरा साजरा होतो.त्यात शस्त्रपूजा आहे. आपले मराठी संस्थानिक आजही दसऱ्याला शस्त्रपूजा करतात.आपला दसरा रामायणाशी संबंधित नसून महाभारतील समरप्रसंगाशी आहे.

म्हैसुरचा दसरा मोठ्या थाटाचा! थाटामाटाने,दागदागिने, रेशमी भरजरी झुली,सोनेरी अंबाऱ्यांनी सजवलेले हत्ती व राजवैभवसंपन्न असतो हे ऐकत होतो. पण आमच्या गावचा दसरा लोकसंपन्न होता. आजही असेल. उन्हं उतरू लागली की हलगी ताशांच्या, जोश वाढवणाऱ्या,कडकडाटात,घामेघुम झालेल्या तगड्या,जाड,कांबीसारखे कडक लोकांनी आळीपाळीने पेललेली, अफाट गर्दीतून वाट काढत, झळ्ळम झळ्ळम करत उंचच्या उंच म्हणजे फारच उंच हब्बूची काठी येत असे. त्यावेळी मधून मधून मोठमोठ्या आवाजात आईराजा उदे उदेच्या गजराचे वाढत्या गर्दीत “आssई राssजा उधेssउधेssय” कधी झाले हे लक्षातही येत नसे. पण शुद्ध उदय उदय किंवा उदे उदे पेक्षा हा उssधेssउधेssय चा गजर जोरदार आणि जास्त परिणामकारक होत असे, हे खरे. आमच्या मध्यमवर्गीय मंद आवाजातले आई राजा उदे उदे चे मोठ्या आवाजातले उधेssउधेssय कधी झाले ते आम्हालाही समजत नसे. मग आबासाहेबांचे, अण्णांचे व बाबांचे( आजोबा) पुटपुटणेही थोडे मोठ्याने होई!

नवरात्रातल्या अष्टमीच्या दिवशी आमच्या घरी पोत उजळला जात असे. म्हणजे काय तर पत्रावळीवर तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवर पेला ठेवलेला असायचा. पत्रावळी भोवती आईने किंवा बहिणींनी साधी म्हणजे अगदी साधी रांगोळी काढलेली असे. मग आम्ही भाऊ कापसाच्या झाडाच्या बारिक फांद्या किंवा काटक्यांना कापड गुंडाळून व तेलात भिजवून आम्हीच लगोलग केलेले ते पोत घेऊन त्या पत्रावळी भोवती आई राजा उदे उदे म्हणत प्रदक्षणा घालत असू. प्रदक्षणा तरी किती लहान, स्वत:भोवती फेरी मारल्यासारखी! कारण मधल्या घरात तिथेच मोठा पलंग,एक गोदरेजचे कपाट आणि दुसरे लहान कपाट असायचे. पृथ्वी प्रदक्षणा करण्याइतकी जागा नसे. प्रदक्षणा झाली की ते लहान पोत बाजूलाच असलेल्या दुधाच्यी वाटीत विझवायचे. सगळ्यांनी मिळून ती पत्रावळ उंचावून ती कपाळाला लावून नमस्कार व्हायचा. ह्याला तळी उचलणे म्हणत. एखाद्याची तळी उचलणे ह्या वाक्प्रचाराचा हा प्रत्यक्ष कार्यानुभवच की! दसऱ्याला संध्याकाळी शिलंगणाला निघताना नवरात्रात मंडपीच्या बाजूलाच मोठ्या पेल्यात वाढवलेल्या धान्याचे पाते, लहानसे झाड टोपीत खोवून निघत असू.

निम्म्यापेक्षा जास्त गाव नविन कपडेघालून ,फेटे-रुमाल-टोप्यात आपल्या घरातील धान्याची तृणपाती खोवून पार्कच्या दिशेने निघालेच असे. सामान्यांच्या मुकुटांतील ते शिरपेच असत! हब्बूच्या काठीने केलेली शमीची पूजा आणि पार्कमधील,भोवती पार असलेल्या शमीच्या झाडाभोवतीची फेरी चालूच असे. त्याच वेळी लोकांचेही एकामागून एक येणारे लोंढे शमीच्या झाडाला प्रदक्षणा घालू लागत. काही जणांच्या हातातील पोत तो परिसर आपल्यापरीने उजळून टाकत.

आता इतकी प्रचंड गर्दी म्हटली तरी आसपास भेळेच्या , शेंगादाणे फुटाण्यांच्या रेवड्यांच्या गाड्या दिसत नसत. असतीलही कुठे पार्कच्या लोकांनी फुलून गेलेल्या मैदानात.पण त्या असल्या काय आणि नसल्या काय तिकडे लक्षही नसे.कारण दुपारीच दसऱ्याचे पक्वान्नाचे रेsट जेवण झालेलेआणि शेजारी पाजारी नातेवाईंकांकडे सोने द्यायला गेल्यावर प्रत्येक ठिकाणी तोंड पुन्हा पुन्हा गोड होणारच असते.आणि होतच असे. लोक एकमेकांना सोने देऊन काहीजण उराभेटी घेत मैदानात पसरलेल्या व बाहेर पडत असलेल्या लोकांबरोबर बाहेर चाललेले असत. ती पांढरी, पिवळसर,रंगीत सतत हलणारी गर्दीही पाहण्यासारखी असे.

मग रात्री घरीआमचे चुलत भाऊ मुकुंद आणि शशी आतेभाऊ अरूण मधू दुसरे अगदी जवळचे नातेवाईक दत्ता काकडे वगैरे आले की झकास गप्पाटप्पा होत; हसण्या खिदळण्यात वेळ जाई. पण उद्या शाळा ही आठवण झाली की दसरा- सणाचा मोठा आनंद लहान लहान होत जाई!

आमचा सिनेमाचा गाव

रेडवुड सिटी

डबड्यातले काम करनार, कपटी आणि चक्रम!

“ हंटरवाली’ डबड्यात आलाय बे! येतो का,चल” “तुफान मेल” ही येनार हाहे डबड्यात” डबड्यात
म्हणजे त्या थिएटरचे नेमके वर्णन करणारा शब्द. लोक एखाद्या गोष्टीचे बारसे बरोबर करतात. पूर्वाश्रमीचे मेकाॅनकी थिएटर. इथे नाटके होत असत. मराठी रंगभूमीवरील अनेक नामांकित कंपन्या आपली नाटके इथे करत असत. पण नाटकांचे दिवस संपले. एके काळचे वैभवशालीयुग संपले.


तिथे सिनेमा दाखवू लागले. मला माहित आहे तेव्हापासून त्याला डबडा थेटरच म्हणत असत. मेक्यॅनिकि, मेक्यान्कि, मेक्यॅनिक, इंग्रजी बोलतोय असे वाटावे म्हणून मेकाॅन्कि असे निरनिराळे पाठभेद होते. त्या चौकालाही हेच नाव होते. चौकाचा पत्ता सांगतानाही असेच वेगवेगळे नामभेदाचे पाठ वापरले जात. नंतर त्या टाॅकीजचे नाव छानसे दिलखुष झाले. पण सगळ्यांची पहिली पसंती ‘डबडा थेटर’ ‘डबड्यात’ ह्या नावालाच होती. बरं नावं काही लोक उगीच देत नाहीत. ह्या थेटरात पडद्यापासून ते सिनेमा दाखवण्याच्या मशिनीपर्यंत एकही खुर्ची राहू द्या पण बाकडे, स्टूल काहीही नव्हते. मोठ्या बंदिस्त मैदानातील जाहीर सभेला किंवा मैदानात फिरायला आल्यासारखे वाटायचे थेटरात आल्यावर.
वरच्या मजल्यासारखा वाटणारा उतार असो की खालची सपाट जागा, बहुतांश भाग पान तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला असे.त्यातून कोरडी जागा शोधणे हे सिनेमा पाहण्यापेक्षा महत्वाचे काम असे. बरे बाजूच्या भिंतीही काही उंचीपर्यंत अशाच रंगलेल्या!


बसण्याची जमीन सिमेंटच्या कोब्याची. कधी काळी ती तांबड्या रंगाची असावी. कुठे कुठे रंगाच्या खुणा दिसत. जागो जागी नसली तरी बऱ्याच ठिकाणी कोबा उखडलेला. सिमेंट वाळूचे खळगे पडलेले. ह्या खळग्यांमुळेच कोणीही सिनेमाला उशीरा येत नसे. जे नवखे चुकुन माकून उशीरा येत व तिथे बसले की आजूबाजूचे प्रेक्षक “बरबटला की बे बाब्या” म्हणत हसून पिंक टाकायचे. ते खळगे ह्या पिकदाण्या झालेल्या असत!


सिनेमाचे तिकीट सर्वांना परवडण्यासारखे. सर्वांसाठी एकच दर. प्रथम एक आणा दर होता असे बारोमास येणारे प्रेक्षक सांगत. नंतर तो दोन आणे झाला. प्रेक्षक शाळकरी वयाची हाॅटेलात फडके मारणारी, ‘अलिमिन’ च्या ग्लासात बोटे बुचकळून पाणी देणारी; ‘बारक्या’ ह्या एकाच नावाने ओळखली जाणारी मुले; कामगार, रोजंदारीचे मजूर असेच हातावर पोट भरणारे सगळे.


थिएटरमध्ये एकच मशीन त्यामुळे मध्यंतर दोन चार वेळा व्हायची. ही झाली अधिकृत मध्यंतरांची संख्या. पण फिल्म तुटणे,मध्येच ‘लाइटी’जाणे ह्यामुळे सोसावी लागणारी मध्यंतरे निराळी. ह्यांची संख्या रोज बदलायची. कारण आज फिल्म किती वेळा तुटेल कोण सांगू शकणार?आवाज गेला किंवा फिल्म तुटली की पहिल्यांदा “अबे आवाऽऽऽऽज” “अब्ये तोडला की बे साल्यानं पुना तिच्या … पुढे आ किवा मा आपापल्या आवडीप्रमाणे घालून… वाक्य फुलवायचे. “ कुठ्यं ग्येला तो बे… “ इथे दोन फुल्यांपासून पाच फुल्यांच्या शिव्यांची टाकसाळ सुरु व्हायची.फिल्म तुटल्यावर भऽक्कन एक दिवा पेटायचा. त्यामुळे कुठे थुंकायचे कुणीकडे पिचकारी मारायची ह्याचे लोकांना मार्गदर्शन होत असे. पण रंगकर्म्यांचे हे कलादर्शन चालू असता शिव्यांची वीणा दुसरे घेत. ही वीणा कधी खाली ठेवली जात नसे.आॅपरेटरला व डोअर कीपरनांही ह्याची सवय झाली होती. ते उलट जबऱ्या आवाजात वाक्याच्या सुरवातीला दोन ते तीन अक्षरी ‘फुलवाती’लावून किंवा अखेरीला चार किंवा पंचाक्षरी ‘फुलवाती’ हासडून , “काय तिकीटाला बंदा रुपया मोजला का रे ….? “ त्यांच्यातला सुसंस्कृत ओरडायचा,” काय झाले बे बोंबलायला? फिलमच तुटली ना? का तुझी विजारीची नाडी तुटली?का धोतर फिटलं? आं? उगं गप बसाकी बे!” पण ह्या शिवराळ आवाजी युद्धात बहुसंख्येमुळे आमच्या गावचे नंबरी सिनेरसिकच जिंकायचे. तेव्हढ्यात झाली इतकी करमणूक पुरे म्हणत ‘आपरेटर’ अंधार करून फिल्म पुन्हा चालू करायचा.

रोज नेमाने डबड्यात येणाऱ्यांना हे नाट्यमय प्रवेश माहित असायचे. त्यामुळे ते आजूबाजूची मोकळी जागा, भिंत एकाग्रतेने पिचकाऱ्या मारत किंवा झकास खाकरून थुंकत रंगवत असायचे. आमच्यासारखे नवशे काही म्हणू लागले तर,” शिनेमा पाह्यला आलताना मग पाहा ना बे! गिन्नी चवलीत काय साबूने धुतलेले, चार मिशिनीचे थेटर मिळनार का तुला, आं?” असे तत्वज्ञान ऐकवत.

आम्ही एकदाच गेलो असू. पण संपूर्ण सिनेमा कधीच पाहिला नाही. सतत आपले कपडे कुणी रंगवत नाही ना ह्याच काळजीत असायचो! त्या चिंतेतच हिराॅईन नादिया दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून ‘कपटी’ किंवा ‘डाकू’च्या अंगावर झेप घेऊन त्याला ठोसा मारून उडवायची! तर कधी आमचा ‘ काम करनार’ जाॅन कावस असाच टेकडी उतरून त्याच्या पांढऱ्या घोड्यावरून टकडक् टकड्क करत नादियाला ‘कपटीच्या’ तावडीतून सोडवायला यायला लागला की सगळे ‘ डबडा’ टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमायचे! किंवा ‘चक्रमने किंवा जोकरने’ कपटीला किंवा त्याच्या टोळीतल्या लोकांना काम करनारने पळवून लावले किंवा ठोसा ठोशी सुरु झाली की हा फक्त हवेत ठोसे मारल्याच्या अॅक्शन करत एखाद्या ‘कपटीला’ पाय घालून किंवा त्याच्या मागे ओणवे होऊन पाडले की प्रेक्षक हसायचे.त्यावेळचे म्युझिकही निरनिराळे आवाज काढत त्यात सामील व्हायचे.

हे ‘कपटी, डाकू’ आणि ‘काम करणार’, चक्रम किंवा जोकर काय प्रकरण आहे? तर डबड्याच्या अनुभवी समीक्षक-प्रेक्षकांच्या शब्दकोषांत व्हिलन व हिरो आणि विनोदी नट! कुणाला माहित खलनायक व नायक! काम करणार किंवा करनार हेच त्या कर्तबगार हिरोचे खरे वर्णन. कपटी आणि डाकू हे व्हिलनपेक्षाही त्याची वृत्ती व पेशा दाखवणारे सोपे यथार्थ शब्द होते. जुन्या गिरणीच्या चाळीतील किंवा हजरतखानच्या किंवा बाजूच्या मरीस्वामी चाळीतील आमच्या बरोबरीची,अगोदर सिनेमा पाहून आलेली,पोरे त्याची ष्टोरी मनापासून सांगताना कपटीच्या, काम करनारच्या सगळ्या अॅक्शन्स करीत “मग तिकडून काम करनार जाॅन कावस कसा दबकत दबत हळूच पाठीमागून येतंय आणि एकदम कपटीच्या टोळीतील एकाचे तोंड दाबून त्याला एका फाईटीत झोपवतो बे” ; कधी हंटरवाली नादियाची धाडसी कामेही करून दाखवत! पन कपटी सुद्धा बेरकी आहे त्यात.” हे सर्व प्रत्यक्ष अॅक्शनसह करून ष्टोरी सांगायचे. सर्व प्रेक्षक पोरे मोठ्या उत्सुकतेने भुवया उंच करत, कोणी तोंडाचा चंबू करत किती एकाग्रतेने ती गोष्ट ऐकत! त्या काळात आम्हा सर्वांसाठी ह्या बोध कथा संस्कारकथा व स्फूर्तीदायक गोष्टी होत्या. आम्ही डबड्यांत एकदाच जायची हिंमत दाखवली. ती सुद्धा तिथे अंग चोरून बसण्यातच जास्त दाखवली!


पुढे हेच दिलखुष डबडा टाॅकीज मीना टाॅकीज झाले!


अनेक वर्षे आपल्या स्टंटपटांनी व स्वत: केलेल्या धाडसी स्टंटसनी लोकांची करमणूक करणारी नादिया आणि जाॅन कावस ही लोकप्रिय जोडी मागे पडली. नंतरच्या काळात मा. भगवान व बाबुराव यांचे स्टंटपट आले. ह्यांचा बाज निराळाच होता.डबडा राहिले नव्हते तरी तिथले प्रेक्षक ह्यांच्यासाठीही होतेच. बरीच वर्षे ह्या ‘काम करनार’ जोडीने व चक्रमनेही त्यांची करमणूक केली.

सदाशिव पं. कामतकर

चार दिवस गॅदरिंगचे – २

रेडवुड सिटी

आमच्या शाळेच्य गॅदरिंगच्या जेवणाचे व अल्पोपहाराचे वर्णन करताना गॅदरिंगचे आणखी एक वैशिष्ट्य ध्यानीं आले. गॅदरिंगला शाळा आम्हाला सिनेमा दाखवत असे. कुठे मैदानात किंवा शाळेच्या सभागृहात, त्या १६मिमि पडद्यावर नाही. चांगल्या सिनेमा-थेटरात दाखवत असे! भागवतमध्ये असला तर चित्र मंदिर,कलाआणि छाया ह्या त्यांच्या तिन्ही टाॅकीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी तो पहायला मिळे. (त्यांचे उमा चित्र मंदिर बांधून झाले नव्हते.) प्रभात मध्ये असला तर मात्र दोन खेळ करावे लागत. ही झाली रुक्ष आकडेवारीसारखी माहिती. खरी गंमत होती ती आमची गर्दी पाहण्याची आणि वाहत्या वाऱ्यासारख्या एकामागून एक ऐकू येणाऱ्या गप्पांच्या त्याबरोबरच्या हसण्याच्या अनेक तऱ्हांच्या,आरोळ्या,व एकमेकांना पाहिल्यावर मारलेल्या असली हाकांच्या लहरी कानांवर झेलण्याची ! पाखरांच्या शाळेतही एव्हढा उल्हास असणारी व आनंद देणारी कलकल निनादत नसेल.

भागवत थिएटरचे आवार त्यामानाने मोठे. ते तर फुलून जायचेच पण कला व चित्रमंदिराच्या मधल्या बागेजवळची बेताची मोकळी जागाही रिकामी राहात नसे. तीच गोष्ट प्रभातची. प्रभातची लाॅबी आणि समोरची आयताकार प्रशस्त मोकळी जागा मुलांनी तुडुंब भरून जाई. दाटीवाटी-खेटाखेटी,रेटारेटीचे कुणाला काही वाटत नसे. तरी गप्पात रंगलेल्याला धक्का लागला तर एखादाच कुणी,”अब्ये लई ताकद आली का बे?” ए सुकड्या,दिसत नाही का तुला?”त्यावर हा सुक्कड लगेच,” दिसायचं काय त्यात बे? तू कुणाला नाही दिसणार बे ढब्ब्या !” हा संवादऐकल्यावर भोवतालची सात आठ पोरं मोठ्यांदा हसली की इतरही काही कारण नसता मोठ्यांदा हसायची की लगेच सगळी गर्दी हसत सुटायची ! पण तोपर्यंत “सुक्कड हाॅकीस्टिक ”आणि “तो फुटबाॅल”हसत खेळायलाही लागलेले असत!

आत गेल्यावर मग जागा धरून ठेवलेली पोरे दोस्तांच्या नावाने हाकारा सुरू करत.सिनेमा सुरू झाला तरच शांतता होईल ह्या भरवशावर मास्तर सिनेमा सुरु कारायला सांगत. ही शांतता काही वेळ प्रस्थापित होत असे. पण गाजलेले गाणे सुरु झाले की कुठून तरी ,” अरे जाधव मस्त म्हणतो हे गाणं.” असा आवाज आला की जाधव आणखी आग्रहाची वाट न पाहता लगेच सुरु करायचा म्हणायला. लगेच दुसऱ्या वर्गांचा अभिमान उसळून यायचा की एकदम चार पाच जाधव ते गाणं म्हणू लागायचे . बाकीची आम्ही ‘वगैरे” पोरं ठेका धरायला होतोच की! तीन मिनटाचे गाणे सहा मिनिटांची LPव्हायची! गंभीर किंवा करूण ‘सीन’ आला की वरच्या मजल्यावरील एखादा प्रोजेक्टरच्या झोतात, हातांनी बोटांनी’पक्षी उडतोय, हरिण,किंवा मासासळसळसतोय’ ‘ हा खेळ सावल्यांचा’ करत असे.शिक्षकांनी पाठीत रट्टा घातला की हा खेळ बंद व्हायचा.

सिनेमा काही जणांनी अगोदर पाहिला असला तर पुढचे डायलाॅग अगोदरच ऐकायला लागायचे! गाणे आले की कुणी जाधव-देशपांडे-इनामदार असे बरेच सवाई रफी,फर्माईशीची वाट न पाहता गाणे म्हणायलाही लागत. तर “चूल आणि मूल” असला तर अगोदरच सर्वतोमुखी झालेले दामुअण्णा मालवणकरांचे “अगं माया आवर,आवर” आले की प्रोजेक्टरच्या प्रकाश-झोतात तेच वाक्य ‘माया’च्या जागी निरनिराळे पाठभेद घालून भिरभिरत विहरत असत!

एरव्ही चार मुलांसमोर, घाबरून धड नीट न बोलणारेही सिनेमाच्या अंधारात मात्र आपापले विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम साजरे करीत ! सिनेमा संपल्या नंतरही मजा पुढे चालूच असे.सिनेमातले संवाद म्हणताहेत, तर कुणी गाण्यांच्या ओळी गुणगुणताहेत;,बरेच जण हसत खिदळत गप्पाटप्पा करत घोळक्या टोळक्यांनी,कुणाच्या खांद्यावर हात टाकून, काही एकमेकांना ढकलत चालले आहेत; काही जवळच्या घरी ठेवलेल्या सायकली आणून टांग मारत “जातो बे” म्हणत निघालेही असतात! अशा तऱ्हेने रमत गमत सगळे घरी परतायचो आम्ही.

गॅदरिंगचा सिनेमा ही सर्वांनाच एका शुद्ध,निर्भेळआनंदाची आणि करमणुकीची मेजवानी असे.

गॅदरिंगच्या अल्पोपहारासारखा सिनेमाही अल्पकालीनच ठरला. फार तर दोन तीन वर्षेच टिकला. पण कधीच flop झाला नाही; तो hit च ठरला!

चार दिवस गॅदरिंगचे – १

रेडवुड सिटी

आमच्या ऱ्शाळेने काही अतिशय चांगल्या गोष्टी आमच्या आठवणींसाठी दिल्या; त्यात गॅदरिंगमध्ये होणारी विद्यार्थ्यांनी कामे केलेली व वा.शि.आपटे , आमचे पद्माकर देव व गो.रा. कामतकर यासारख्या उत्तम दिग्दर्शकांनी बसवलेली आजी आणि माजी विद्यार्थी विद्यर्थ्यांनीवेगवेगळी बसवलेली त्या काळची उत्तमोत्तम नाटके, संगीतिका ह्यांची मेजवानी दिली. संशयकल्लोळ. आचार्य अत्र्यांची साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी उद्याचा संसार, कवडी चुंबक तर मो.ग. रांगणेकरांचे कुलवधु व त्यांच्या तुझं नि माझं जमेना ह्या सारख्या तीन एकांकिका तर झुंझारराव सारखे शेक्सपिअरचे जबरदस्त पण देवलांनीही त्याच ताकदीने केलेले हे रुपांतर तितकेच प्रभावीपणे बसवून सादर करणारे आमचे शिक्षक-दिग्दर्शक व विद्यार्थी -नटांची नाटके पाहणे हा अवर्णनीय आनंद होता.

त्याच बरोबर पं.जगन्नाथबुवा पंढरपुरकर, मा. कृष्णराव, पं.नारायणराव व्यास, पं विनायकबुवा पटवर्धन यांच्यासारख्या नावाजलेल्या गवयांच्या मैफिली ऐकण्याचे भाग्य लाभत होते. तेही फक्त चार आण्यांच्या वर्गणीत! भाग्य भाग्य म्हणजे ह्यापेक्षा काय निराळे असते?!

मी हरिभाईमध्ये जाण्या अगोदर काही वर्षे शाळेच्या गॅदरिंगची सांगता अतिशय उत्कृष्ट जेवणाने होत असे. जेवणातील बेत, काही पदार्थांची वर्णने दोन चार दिवस ऐकायला मिळत असत. पण मी त्या प्रख्यात शाळेत गेलो त्यामागे गॅदरिंग व त्यातले हे जेवण मुख्य कारणे होती. पण काय ! आमची बॅच शाळेत आली ती दुसरे महायुद्ध संपत येण्याच्या काळात. कुठले जेवण असणार. खराच हिरमुसला झालो. तरीही पहिली एक दोन वर्षे तरी शाळेने अल्पोपहार नावाचा भरगच्च असा फराळ दिला. मस्त असायचे सगळे पदार्थ.

दीड-पाउणे दोन हजार विद्यार्थी पन्नास पंचावन्न शिक्षक गडी-शिपाईअशी भरपूर लोकसंख्या असे.
हा कार्यक्रम आमच्या शाळेच्या भव्य मैदानावर होत असे.विद्यार्थ्यांच्या दोन रांगा पीटी ला बसल्यासारख्या समोरासमोर तोंडे करून त्यांच्याच पाठीला पाठ लावून समोरासमोर बसलेल्या दोन रांगा. अशा पद्धतीने किती रांगा! काही वर्ग आणि शिक्षक वर्तुळाकारात बसलेले. काही विद्यार्थिनी व शिक्षक वाढायला असत. मुली वाढायला साव्यात असे सर्वच रांगांना वाटत असे. पण आमच्यासारख्या भिकार c-grade सिनेमाच्या टुकार हिरोंच्या वाट्याला गणिताचे, सायन्सचे आणि भूगोलाचे ‘सेकंड रन’ सिनेमाचे मास्तर येत. त्यामुळे पदार्थ कठिण आणि अवघड जाऊ लागले. पण त्यावर आमचा उपाय काढला. आम्ही पलीकडच्या मुली वाढणाऱ्या रांगांकडे पाहात प्रत्येक पदार्थ मग तो कसाही,अगदी गोड असला, तरी गोड मानून खात असू. पण दडपून खात असू!

अल्पोपहाराचे हे दृश्य खरोखर प्रेक्षणीय असे. कर्व मैदानात नाही पण एक दोन बाजू पतंगीच्या रंगीत त्रिकोणी कागदांच्या फडफडणाऱ्या पताकांच्या माळा, ठसठशीत अक्षरातील शब्दांच्या ओळी प्रमाणे बसलेले विद्यार्थी, त्यात मधूनच एक दोन गोलाकारात बसलेली विद्यार्थी, शिक्षक आणि त्या ओळीतून होत असणाऱ्या लगबगीच्या हालचाली हा पाहण्यासारखा देखावा असे. कॅमेरे फोटो ह्या देवदुर्लभ वाटणाऱ्या गोष्टी. मग हवाई चित्रिकरण कुठले! पण कुणी तसे ते टिपले असते तर आजही गुगलला किंवा गेट्टीला आपल्या मुकुटातले मानाचे शिरपेच वाटावे असे ते फोटो असते!

पण कितीही असले तरी सुखाचे दिवस थोडेच तसा हा अल्पोपहाराचा कार्यक्रमही दोन वर्षेच टिकला. गॅदरिंगचा अल्पोपहार बंद झाल्यावर ते भव्य मैदान आणखीच मोठे वाटू लागले!

अमेरिकन मी होणार ! झालोच!

रेडवुड सिटी

१९५६ साली बी.एस्सीची परिक्षा दिली. पास होईन का नाही हीच धागधुग होती. मला आणि माझ्या प्रोफेसरांनाही. काहींना तर खात्री होती; मी पास होणार नाही ह्याची. पण अखेर पास झालो. त्यानंतर कानाला खडा लावला की झाली-दिली ही परीक्षा शेवटची.

नोकरीसाठी अर्ज करायला सुरवात केली. काळ बेकारीचा होता. सर्वच अर्जांना होकार आले नाहीत. पत्रिका पाहूनच मुलगी नापसंत ठरावी तसे अर्जाच्या पहिल्या फेरीतच मी गारद व्हायचो. पण दोन तीन ठिकाणी माझ्यासाठी मुलाखतीतूनच नोकरीच्या पायघड्या घातल्या होत्या. पण मी त्यांना नकार देत होतो.हे झाले. पण माझा निश्चय मी पाळला होता. ज्या नोकऱ्यांसाठी अगोदर लेखी परीक्षा असे तिथे मी कधी गेलो नाही. पण नंतरचे कलेक्टर,परराष्ट्र अधिकारी,वन अधिकारी (कांन्झरव्हेटर) , मुख्याधिकारी पाहिल्यावर आपणही ह्या परीक्षा द्यायला हरकत नव्हती असे वाटले. आता निवृत्त होऊनही किती तरी-पंचवीस-वर्ष झाली.
पण परवा मात्र मला तोंडी व अंशात्मक लेखी परीक्षा माझा नियम मोडून द्यावी लागली. तरी बरं लेखी परीक्षा एका ओळीची होती.

इतर वाचन चालू असले तरी परीक्षेच्या पुस्तकांचे म्हणजे गाईड्सचे माझे वाचन कधीच बंद पडले होते. त्यामुळे अमेरिकन नागरिकत्वासाठी पूर्व तयारीसाठी एक पुस्तक होते ते वाचायला सुरवात केली. बरं हे पाठ्यपुस्तक माझ्यासाठीच तयार केले असावे. कारण प्रश्नांची उत्तरे लगेच त्या खालीच दिली होती. मग मी का ते वाचणार नाही? हे इतके चांगले गाईड परिक्षकानेच दिल्याच्या आनंदात त्यातली शंभर प्रश्नोत्तरे मी दिवसातून एकदा रोज वाचू लागलो. देवाचा नित्यनेम इतक्या मनापासून केला असता तर रोज दहा वेळा,देवाने प्रत्यक्ष दर्शन दिले असते!

बरं नुसते मी स्वत: वाचून स्वस्थ बसणाऱा विद्यार्थी नव्हतो. रोज मी घरातील कुणाला तरी पकडायचो व त्या पुस्तकातील प्रश्न मला विचारून त्यांना मी माझी परीक्षा घेणे भाग पाडू लागलो. प्रथम सगळेजण सौजन्य म्हणून बळी पडले माझ्या विनंतीवजा हट्टाला. पण नंतर प्रत्येक जण मी त्या पुस्तकात बोट घालून हाका मारत येताना दिसलो की काही तरी निमित्त काढून कुठेतरी गायब होत. मला टाळण्यासाठी सर्वांनी तीन तीनदा आंघोळी करायला सुरवात केली. जणू जुलाब होताहेत म्हणून पटापट संडासात जाऊन दडून बसू लागले. घरात सगळ्या वस्तु असल्या तरी दिवसातून चार पाच वेळा बाजारात जात. काही नाही तरी दातकोरणीच्या काड्यासाठी जाऊ लागले. तास न् तास बाहेरच असत. कामाला गेलेले तर तीन तीन चार चार दिवस आॅफिसातच राहात. शाळा काॅलेजात जाणारे सुद्धा आज हा क्लास आहे,त्याचा तो क्लास आहे हे निमित्त सांगून हाॅस्टेलात कुणाच्या तरी खोलीत पडून राहात. टेनिसच्या क्लासचे, आज आमची स्पर्धा आहे, अंतिम सामना आहे असे सांगून बारा बारा तास तो सामना खेळत! विम्बल्डन वगैरेच्या अनेक खेळाडूंचे वेळेचे विक्रम त्यांनी मोडीत काढले. अशावेळी माझा मीच प्रश्न वाचून पुस्तक बंद करून उत्तरे देऊ लागलो. कुणी सापडलाच चुकुन माकून तर मी त्याच्याकडून माझी शंभर प्रश्नांची तीन वेळा उजळणी करून घ्यायला लावत असे ! कुणाशी बोलणे म्हणजे ती प्रश्नोत्तरेच मी म्हणत असे. त्यामुळे माझ्या वाऱ्यालाही कोणी उभे राहिनासे झाले. बरं इथे अमेरिकेतच असल्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्याला अशी काही विनंती करण्याचीही सोय नाही. स्वावलंबन हाच उपाय मी चालू ठेवला. तरीही दया येऊन, अखेरच्या काही दिवसात माझ्या तिन्ही नातींनी व मुलाने मला पुष्कळच मदत केली.

परीक्षेचा दिवस आला. पहिले आश्चर्य घडले.नातीने लावलेला गजर होण्या आत मी पहाटे पाच वाजता उठलो. कित्येक वर्षांनी,पहाट कशाला म्हणतात आणि ती कशी असते ह्या प्रश्नांच्या उत्तरानेच दिवस सुरु झाला!
“नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तासच आधी येणे” अशी तंबी परीक्षेच्या आमंत्रण-पत्रातच दिली होती. पण सावधगिरी म्हणून आम्ही बरेच आधी पोचलो होतो. त्यामुळे धावपट्टीवरील गर्दीमुळे नेमके आपलेच विमान त्या तळा भोवती दिवसभर घिरट्या घालते त्याप्रमाणे आम्हीही रस्ते ओलांडत एका हाॅटेलात काॅफी पित वेळ काढत बसलो. योग्य वेळी दरवाजापाशी दोन तीन जणांच्या रांगेत उभे राहिलो. चेहरा हसतमुख ठेवा ही सगळ्यांची सूचना मी काटेकोरपणे पाळत होतो. द्वारपालाकडे तो शतजन्मीचा दोस्त आहे ह्या भावनेने मी त्याच्याकडे पाहून हसत होतो. तो एकदा माझ्या कडे व पासपोर्टमधील फोटोकडे वारंवार पाहून ‘ तो हाच का कोण येडपट आहे’ ह्या नजरेने माझ्याकडे पाहात होता. काय झाले कुणास ठाऊक! तो”कामाटकार “ Isn’t it? “म्हणत हसू लागला. मी तर हसतच होतोआता सतीशही हसत हसत हो म्हणाल्यावर त्याने आनंदाने दार उघडून आम्हाला आत सोडले.
अमेरिकेत सर्व तपशील एकदम अचूक ठेवतात व कळवतात, त्याचा प्रत्यय येत होता. माझ्यापत्रात A काउंटर सांगितलेच होते. तिथे ठळकपणे तो काउंटर दिसत होता. माझे नाव गाव विचारले. फोटो काढला. पुढे वळून Aवेटिंग हाॅल मध्ये थांबायला सांगितले.

आता परिक्षेच्या हाॅलमध्ये आल्यासारखे वाटायला लागले. माझ्यासह आणखी दोघे तिघे होते. फक्त मीच ताणतणावात होतो. हातात पासपोर्ट आणि एकदोन पुरावे धरून होतो. हात पाय बोटे काहीही थरथरत नव्हती. पण शंभर अधिक उठल्याबरोबरचे पहाट म्हणजे काय? ती कशी असते ह्या दोन अशा एकूण एकऱ्शे दोन उत्तरांचा जप चालू होता. पूर्वी उजळणी म्हणत होतो. पण वयामुळे आपोआप आध्यात्मिक झाल्यामुळे ‘जप’ म्हणालो. अध्यात्म संपले व आतून माझी परीक्षा घेणारी बाईच ओठ,तोंड वेडे वाकडे करत ‘शॅढॅसिव’? म्हणत माझ्याकडे पाहात आली!
आत जाऊ लागलो. सतीश “काही टेन्शन घेऊ नका बाबा,all the best”वगैरे म्हणाला. मी मान हलवून आत गेलो.
बोलवायला आलेली बाईच परीक्षक होती. माझी जन्म तारीख,मी राहतो तो घरचा पत्ता विचारला. सांगितला. अगोदर इंग्रजी वाचनाची परीक्षा घेतली. माझी! तुम्हालाही प्रश्न पडला असणार इतका वाचणारा मी,माझी वाचनाची परिक्षा?माझी? काय करणार मी तरी. डोळ्यांच्या डाॅक्टरांकडे तक्त्यात असतात तेव्हढ्या ढब्बू अक्षरांतील तीन वाक्ये पुढे ठेवली.मी माझ्या स्पष्ट शब्दोच्चारात पहिले वाक्य खणखणीतआवाजात वाचून दाखवले. सिनेटर किती असतात असे ते प्रश्नार्थक वाक्य होते. ते मी त्याच प्रश्नार्थक भावाने,प्रश्नार्थक आवाजात त्या बाईंकडे पाहात वाचले. तेही टेबलावर पुढे झुकून. बाई गांगरल्या. आणि घाबरत त्यांनीच ,”One Hundred” असे बरोब्बर उत्तर दिले! मी सुद्धा बावरलो. बरोबर या अर्थी मी फक्त मान हलवली!आता पुढचा प्रश्न मी काय विचारणार म्हणून बाईच सावरून बसल्या! माझी वाचनाची परीक्षा संपली,एका वाक्यात!
नंतर मला इंग्रजी लिहिता येते का ह्याची चाचणी झाली.

बाईं सांगतील ते मी लिहायचे अशी ती चाचणी होती. बाईंनी There are one hundred senators हे मगाचे उत्तरच मला लिहायला सांगितले.सोप्पे !असे म्हणत मी ते सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहिले. झाली लिहिण्याची परीक्षा. अरे ही तर एका वाक्यांचीच परीक्षा दिसतेय असे वाटलें. बाईं मला इंग्रजी समजते का ह्याचीपरीक्षा दहा प्रश्नांच्या उत्तरांवरून ठरवणार होत्या. त्यातही त्यांनी विचारलेल्या पहिल्या सहा प्रश्नांची उत्तरे मी जर बरोबर दिली तर ती परीक्षा तिथेच संपणार होती. म्हणजे मी इंग्रजीत हुषार हे नक्की होणार होते. मनात म्हणालो मी तर शंभर उत्तरांचा अभ्यास पक्का करून आलोय. विचारा कसेही उलट सुलट, कोणत्याही क्रमाने. माझ्या इथल्या दोन आणि पुण्याच्या एका नातीने ‘सारेग रेगम गरेमग गरमा गरम’ अशा प्रचंड उलथापालथी करून माझी तयारी करवून घेतली आहे. पहिलाच प्रश्न,” राष्ट्रगीताचे बोल काय आहेत?” हा होता. तिघींनीही हा प्रश्न मला नेहमी शेवटी विचारला होता. माझ्या अभ्यासाची सांगता त्या राष्ट्रगीताच्या प्रश्नाने करीत. त्यामुळे पहिला प्रश्न हा असणारच नाही या खात्रीने क्षणभर वाचा बंद पडून गप्प होतो. पण जाऊ द्या बाईंनी परीक्षेची सुरवात राष्ट्रगीताने केली अशी मीच माझी समजूत घालून उत्तर बरोबर दिले. चला,”कोन बनेगा नागरिक?”स्पर्धेतील पहिला एक हजाराचा प्रश्न मी सोडवला.

मग ‘झेंड्यावर तेराच पट्टे का आहेत’ हा प्रश्न विचारला. त्याचे खरे उत्तर ‘ कारण झेंड्यावर तेव्हढीच जागा होती’ हे आहे.पण मी मात्र अभ्यास केलेले उत्तरच दिले.त्यानंतर दोन तीन प्रश्नांचीही उत्तरे बरोबर दिल्यावर What is the rule of the law ? ह्या प्रश्नाला तर मी शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेतील भाषणाच्या स्टाईलने बुबळे वर करून छताकडे पाहात उत्तर देऊ लागलो. उत्तर सविस्तर देत होतो. बुबळे अजूनही छताकडेच लागलेली. माझी ती खेचर मुद्रा पाहून रामदेवबाबाही खुष होऊन त्यांचा तो प्रख्यात कायम मिटलेलाच एक डोळा पुन्हा मारत,दाढीतून कौतुकाने माझ्याकडे हसत पाहात राहिले असते. पण ह्या बाई मात्र माझे ते भेसूर रूप पाहून ‘नऊशे अकराला’फोन करताना जी स्थिती होते तशी होऊन धडधडत्या छातीवर हात ठेवून पुढचा प्रश्न विचारु लागल्या. पण अनुभवाने त्या शाहाण्या न होता गडबडीत त्यांनी नको तो पुढचा प्रश्न विचारला. तो होता “११ सप्टेंबर २००१ रोजी काय घडले? “ अमेरिकन नागरिक होण्याअगोदरच देशभक्तीचाही मी सराव करत असल्यामुळे मी त्या भयंकर घटनेचे नाट्यपूर्ण आवाजात साभिनय उत्तर देऊ लागलो. डोळे मोठे करत,संपूर्ण देशाला धक्का बसल्याचा अभिनय करत, टेबलावर पुढे झुकून प्रत्येक शब्दावर कमी जास्त जोर देत गंभीर आवाजात चढ उतार करत, बाईंकडे पाहात, “ Terrorists attacked United States of America!” असे सांगू लागलो.तशा प्रत्येक शब्दानिशी बाई बसल्या जागीच आपली फिरती खुर्ची एकदम मागे लोटत भिंतीवर आ-द-ळ-णा—र होत्या.पण तेव्हढ्यात माझे ते ऐतिहासिक नाट्यपूर्ण उत्तर संपल्यामुळे त्या आदळल्या नाहीत! खैर माझी. नाही तर माझी त्याच दिवशी अमेरिकेतून हकालपट्टी झाली असती!

अशा रीतीने पहिली साही उत्तरे बरोबर दिल्यामुळे परीक्षक बाईंचे पुढचे श्रम व भीतीही नाहीशी झाली.
त्यानंतर मी भरलेल्या अर्जाची, त्यातली माहिती व माझ्याकडून येणाऱ्या उत्तरात तफावत नाही याची पडताळणी सुरु झाली. तीही बरोबर ठरली. मग, तुम्हाला शपविधीला हजर राहण्याचे पत्र येईल तेव्हा ग्रीन कार्ड न विसरता घेऊन या. ते नसेल तर परत पाठवले जाईल किंवा तशा अर्थाचे काही तरी सांगितले. माझे तिकडे लक्ष नव्हते.आणि एक छापील पत्र मला काही खुणा करून दिले. आपल्याकडील म्हणजे माझ्या पद्धतीप्रमाणे मी त्या Pinjalinan बाईंना मला नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहेना? तुम्हाला काय वाटते? वगैरे प्रश्न विचारले. त्यावर त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्या म्हणाल्या,”ते पत्र दिले ना तुम्हाला आता,ते वाचा.त्यात Congratulations म्हटलेय की.”

कागदपत्रे व ते पत्र सावरत बाहेर आलो. सतीशने दोन तीनदा “बाबा कसा झाला इंटरव्ह्यू” म्हणून विचारले,पण मी अजूनही अध्यात्माच्याच गुंगीत असल्यामुळे उरलेल्या ९४ उत्तरांचाच जप करीत होतो! तेव्हढ्यात सुधीरचा फोन आला.त्याने माझे अभिनंदन केले. सतीशने त्याला त्या आॅफिसातूनच कळवले असावे. मी सतीशला काही सांगणार तोपर्यंत आम्ही घरापाशी आलोही होतो!

वारीच्या सुरवातीचा अभंग

वारीला पुन्हा एकदा जायचे असे गेली दहा वर्षे म्हणत असतो. पण जमत नाही. तशी मागच्या दोन तीन वर्षात एक-दोन तुकड्या तुकड्यांच्या वाऱ्या झाल्या तेव्हढ्याच.

काल पुण्यात पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठोबा देवळात ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज मुक्कामाला होते. निदान त्याच्या पादुकांचे तरी दर्शन घ्यावे म्हणून जुन्या पु्ण्यात गेलो.

बस मधून जातानांच वारकरी दिसत होते. काही बंद दुकानांच्या पायऱ्यांवर बसलेले. तर दुकानांच्या समोरील मोकळ्या जागेत जशी जागा मिळेल तिथे अनेकजण दाटीवाटीने आरामात होते. पुण्याच्या मुक्कामात घेऊ असे ठरवून आलेले वारकरी घोळक्याने चालले होते.

प्लास्टिकची इरली, चपला, बूट,बांगड्या,कानातले डूल, माळा,करदोडे, गोफ, नाड्या, टोप्या, सदरे,कपडे, खजूर राजगिऱ्याचे लाडू, वड्या, आलेपाक,डाळे चुरमुरे, माळा, टाळ, फुगे,खेळणी, आणि काय काय आणि किती सांगावे! इतकेच काय शहरात कधी रस्त्यावर न दिसणारी न्हावी मंडळीही आपल्या आयुधानिशी वारकऱ्यांना टवटवीत करीत होती, ह्या गडबडीतच लोकांनी पादुकांच्या दर्शनासाठी लावलेल्या रांगा वळणे घेत वाढतच होत्या.ही रांग इथे संपली म्हणून उभा राहिलो तर “माऊली मागं मागं” ऐकत ऐकत मी मागे जाऊ लागलो तर माझ्या मागचे हे “मागे मागेचे”पालुपद संपेचना! मी जिथून निघालो होतो त्या बस स्टाॅपपाशीच परत आलो!

अनुभवी लोकांनी ह्याचे कारण सांगितले. आदल्या रात्री जोरदार पाऊस झाला होता. तेव्हा पालख्व्या गावात आल्या आल्या दर्शनाला येणारी ती सगळी गर्दी आज आली होती. दिंड्यांबरोबरच आता जवळपासच्या उपनगरातून वारीला जाणारे हजारो वारकरीही येतच होते.

टाळ मृदुंगाचे दणदणीतआवाज नव्हते. पण आपल्या वाद्यांची वारकरी देखभाल करत होते. टाळांचा आवाज मधून मधून यायचा. मृदुंगावर बोटेही अधून मधून टण टण् उमटत होती. हे सर्व बेतानेच चालले होते.पण कोपऱ्या कोपऱ्या वरची तरुण युवा मंडळं लाऊडस्पीकरवरून भाविकांचे स्वागत करत होते. काही तरुण मंडळी भक्तांना वारकरी बंधू-भगिनींना प्रसाद घेण्याचा आग्रह करत होते. त्या जोडीनेच “रांगेने या, रांगेने या असे ओरडतही होते.

गंध लावणारे तर बरेच म्हणजे बरेच होते. मलाच तीन चार वेळातरी गंधखुणांचे शिक्के लावून घ्यायला लागले! डोक्यावर काॅऊंटी कॅप आणि कपाळावर हे वारीचे रजिस्टर्ड पोष्टाच्या गंधाचे शिक्के! बरेच जण येता जाता माझ्याकडे “ काय सुंदर त्ये ध्येनं” पुटपुटत बघत जात. बरं ते पुसण्याची सोय नाही. कपाळ रिकामे दिसले की ती
‘U-ट्युब’ उमटलीच भाळी!मी भाविक झालो तरी चिल्लर-मोड किती बाळगणार!

वारीला जायला मिळणार नाही हे नक्की असले तरी जुन्या पुण्यात निवडुंग्या विठोबा आणि पालखी/ पासोड्या विठोबाच्या राज्यात आल्यावर वारीच्या कपडेपटात,रंगपटात, ग्रीनरुममध्ये आल्यासारखे वाटत होते. नाही वारी तरी,तीन चार तास वारीच्या प्रत्यक्ष प्रयोगाची संपूर्ण रंगीत तालीम जुन्या पुण्याच्या भव्य स्टेजवर पाहिल्याचे समाधान मिळाले.

ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि तुकोबारायाच्या दोन्ही पादुकांचे दर्शन काही झाले नाही. पंढरपुरला जाऊनही लाखो वारकरी कळसालाच हात जोडून परत येतात तसे बाहेर ठेवलेल्या रिकाम्या पालख्यांनाच हात लावून रिकाम्या हाताने परत निघालो. मंडईत दगडूशेठ-दत्ताच्या देवळाच्या बाजूला लहान मोठी हलवायांची दुकानं आहेत.जिलबीचे ‘खंबीर’ (भिजवलेले तयार पीठ-Readymix),चहा,मिठाई मिळणाऱ्या दुकानात बसलो.@एक प्लेट गरम जिलबी खाल्ली. मस्त आणि स्वस्तही. चहासुद्धा प्यालो. तोही अप्रतिम! लक्ष्मीरोडवर गेलो.तिथे वारकऱ्यांप्रमाणे मीही खरेदी करु लागलो.

शनिपारावर बस पकडली. कारण बाजीराव रोडचा काही भाग आणि मंडईकडे येणारे रस्ते तुडुंब रहदारीमुळे वाहनांसाठी बंद केले होते काही वेळ. बसेस येत नव्हत्या. डेक्कनवर आलो आणि कोथरुड डेपोची बस पकडून घरी आलो. बराच वेळ गेला होता.पादुकांच्या दर्शनला जाऊन आल्याच्या गंधाच्या खुणा पुसट झाल्या होत्या. त्यामुळे माझ्याकडे संशयास्पद भाविक म्हणूनही कुणी पाहिले नाही.

आषाढी वारी संपतच आली. आणि मी वारीच्या सुरवातीच्या दिवसाच्या फेरफटक्याचे वर्णन अगदी ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ च्या थाटात लिहितोय!

वर्षभराच्या साठवणी!

आजकाल कोणी वर्षभरासाठीच्या कोणत्याच वस्तु करीत नाहीत. एप्रिल लागणार म्हणले की वर्षाचा गहू भरण्यासाठी मोंढ्यात जाऊन गव्हाच्या राशींच्या टेकड्यांमघून वाट काढत, मी ढिगाऱ्यात हात घालून गहू पारखण्याचा अभिनय करायचो.कुणाला समजतय की हा बन्सी, हा सरबती, हा बुटका तो जोड गहू ! व्यापारी सांगतील ती नावे मीही घोकायचो. आज त्यांची नावे सिहोर, लोकवन, गुजरात लोकवन अशी झाली आहेत. तांदळालाही एचएमटी,इंद्रायणी, सुरती कोलम, बासमती नावाने ओळखतात. आंबेमोहोर,सोन्याची तार,जिरेसाळ ही नावे फारशी घेतली जात नाहीत. नाशकात अजून कमोद, काळा कमोद मिळतही असेल.किंवा अकोल्यालाही काली मूंछ तांदूळ मिळत असेल.

तुरीची डाळ घ्यायची तर बार्शीचीच व तीही हरिण छाप अशी ख्याती होती. आता तिची जागा प्रेसिडेंट,प्रेसिडेंट गोल्डने घेतली आहे.

परपंचाच्या प्रगतीप्रमाणे गव्हाची एक पोते, दोन पोती होत होत गेली- ही शंभर किलोची असत- , तांदळाची पन्नास किलोची! ते दिवस सर्व काही देशस्थी प्रमाणाचे होते! ती पोती हातगाडीवर टाकून तो हमाल मोंढ्यापासून ढकलत ओढत घरी आणायचा. बरं, अंतर काही थोडे थोडके नसायचे. मी स्कूटरवर बसून काही अंतर त्याच्या बरोबर पुढे-मागे करत यायचो.पण असं किती वेळ करणार मी तरी ? त्याला पुन्हा पत्ता देऊन पुढे घरी यायचो. तो म्हणण्यापेक्षा, ती पोती घरी येईपर्यंत आमची मध्यम वर्गीय बत्तीस-चौतीस इंची छाती सारखी धडधडत असायची. पाठीवर ती वजनदार पोती पेलून, दोन जिने चढत चढत घामेघुम झालेला तो हातगाडीवाला घरात आणून व्यवस्थित ठेवायचा, तेव्हा हुश्श वाटायचे.

त्या अगोदर मार्चमध्ये तुरीची डाळ घेऊन झालेली असे. तांदुळ नेहमी जुनाच घ्यायचा असे काही संकेतही पाळले जात होते.

उन्हाळ्यातच तांबड्या मिरच्या येत.अहो,त्या तांबड्याचेही किती छटा आणि प्रकार! बरं मिरची ती मिरची असे म्हणून चालत नसे. आपले अडाणीपण दाखवणेच झाले की ते. काही चपट्या, काही भरल्या अंगाच्या, जाड पण तुकतुकीत; लालसर पण जास्त काळपटच, काही शेलाट्या अंगाच्या, काही पिवळट काटकुळ्या, काही आताच सुरकुतलेल्या पण जहाल, काही बांधेसूद, कोणी ‘लाSSल बावटेS की’, नुसते जवळून काय,दुरून पाहिले तरी ठसका आणणारी, तशाच काही छद्मी आणि कावेबाजपणे हसणाऱ्या केशरी मिरच्या तर काही जवळही येऊ न देणाऱ्या, त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनीच पहावे लागत असे. मिरच्याच्या लाल प्रदेशातून हिंडताना मी मी करणारेसुद्धा नाक डोळे पुसत मध्येच शिंकत खोकत फिरायचे. प्रत्येकाचे हातरुमाल मोंढ्याच्या किंवा मार्केटच्या बाहेर पडेपर्यंत- हृदय पिळवटणारे “बाळा जो जो रे,”स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी,”चिमणी पाखरं”,माहेरची साडी”हे सिनेमे पाहून आल्यासारखे- भिजून चिंब झालेले! बरे येव्हढे “शोककारी दु:खकारी” होऊन पाच किलोचे पोते घेऊन घरी आल्यावर, “अहो नुसत्या लाल म्हणजे काही मिरच्या होत नाहीत.

त्या तिखट पाहिजेत. ह्या कसल्या ! मिळमिळीत तांबड्या भेंड्या आहेत.” मग त्या तसल्या किंवा ह्या तशा आणायच्या” हे ऐकायला लागायचे. आम्ही काय! संत चोखोबाच्या “ काय भुललासी वरलीया रंगा”जातीचे. त्यामुळे दिसली लाल,आणली मड्डम ! अशा मिरच्या आणणार! ती तिखट, झणझणीत, पातळ सालीची, व्यवस्थित भरलेली, अगदी छय्यम छय्यम नको, किंचित कुरळ्या,काहीशी बाकदार, नख न लावता देठ तटकन तुटणारी, अबबSS इतके छत्तीस गुण जमणारी कुठून आणणार? “आणली तीच तिखट मानून घ्या” म्हणत नाक डोळे पुसत,मुसमुसत आणि जोरदार शिंक देत निघून जायचो.

जसे वर्षाचे धान्य, डाळी भरणे, तिखट, मीठ करणे , शिकेकई कुटणे, करणे गेले तसे ते टिकवण्यासाठी कडुलिंबाचा पाला,बोरिक पावडर, पाऱ्याच्या गोळ्या ह्या गोष्टीही दिसेनाशा झाल्या. अलिबाबाचे चाळीस चोर आरामात बसतील अशी ती पिपेही बंद पडलेल्या थेटरमधील रिकाम्या खुर्च्या प्रमाणे, रिकामी पडून आहेत. त्या पिपांवर रंगीत चादरीच्या घड्या पसरुन त्यावर वळकट्या, उशा, पांघरूणे ठेवलीत!

हे सर्व का लिहिले तर एकाने व्हाॅट्सअपवर स्वैपाकघरातील काही गोष्टींसाठी सूचनांची भली मोठी यादी पाठवली होती. त्यातील, “ वर्षाचे तिखट टिकवण्यासाठी ते बरणीत/ डब्यात भरण्यापुर्वी तळाशी हिंगाची पावडर टाका” ही युक्ति वाचल्यावर हा लेखन ‘प्रपंच’ केला.
असोSS, आक्छीSS !!

सायकलचे दिवस

Redwood City

सॅनफ्रान्सिस्को,रेडवुड सिटीमध्ये काही वर्षांपासून share the bike उपक्रम सुरु झाला. ठराविक रक्कम दिली की दिवसभर, अर्धा दिवस अथवा काही तास सायकल वापरायची. आताच समजले की पुण्यातही ही योजना सुरु झालीय.
फॅशनच्या बाबतीत -कपड्याची किंवा दागिन्यांची किंवा सदऱ्याच्या काॅलरची असो- पुन्हा त्याच जुन्या फॅशन नव्याने येतात असे म्हटले जाते. ते खरेही आहे. त्याची आठवण share the bike ऐकल्यावर झाली. मी शाळा काॅलेजात असतानाच नव्हे तर नोकरीच्या काळातही ही योजना होती.त्यावेळी योजना, उपक्रम , नाविन्यपूर्ण कल्पना किंवा ‘किती कल्पक असतात लोक ‘असले भारदस्त किंवा गौरवाचे शब्द नव्हते ह्यासाठी. साध्या बाळबोध,स्पष्ट शब्दांत, ‘ भाड्याच्या सायकली मिळण्याचे दुकान’ म्हणत. दुकानदार,”चौंडे सायकल मार्ट’ किंवा ” गोन्यल बंधू सायकल मार्ट” नाव लावून धंदा करत. चौंडेअण्णांच्या सायकली नव्या कोऱ्या दिसत. सायकलीचे भाडे दोन आणे तास किंवा स्पर्धेत एक आणा तास असे. क्वचित कोणी दिवसाचे भाडे ठरवून सायकल नेत. जितके तास तितक्या तासाचे ऱ्भाडे द्यायचे. सरळ व्यवहार.

हां, गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या आणि नसतातही! असत्या तर रामराज्याची कुणाला आठवण तरी झाली असती का? आम्हाला पहिला झटका बसायचा तो दहा पंधरा मिनिटे जास्त झाली तरी किमान अर्ध्या तासाचे भाडे भरावे लागे. ” पण मालक मी पावणे तीन वाजता नेली होती. तुमच्या दशरथला विचारा!” त्यावेळी दशरथ नेमका पंप घेऊन बाहेर कुणाच्या तरी सायकलीत हवा भरायला पळायचा! दशरथच तो, मालकापुढे तो धैर्यधर थोडाच होणार ! मग मुकाटपणे पैसे भरायचे पण ते देताना “मी तर ३:५०लाच सायकल आणली” असे पुटपुटलो तर “घड्याळ हाये का तुझ्याकडं?दुकानातल्या घडाळ्याकडे पाहात मालक विचारणार! “नाही. पण तुमचं घड्याळ पुढं आहे.” मालक म्हणणार, “अब्ये सायकल नेताना ह्येच होतं की.” चला जाऊ दे असे मनात म्हणत घाम पुसत बाहेर पडायचो.

नंतर त्या दुकानात न जाता रस्यासमोरच्या साळुंखेच्या दुकानातून घ्यायची. निघताना आठवण ठेवून,” किती वाजले?” विचारून घ्यायची. हापिंग करत चार चाकं पुढे गेल्यावर समजायचे की अरे मागच्या चाकात हवाच नाही! दुकानात जाऊन सांगितले हवा नाही म्हणून. ” पंम्च्यर केला काय तू, आं?” दोन नोकरांकडे बघून मालक तेच त्यांनाही पुन्हा सांगणार. एक नोकर लगेच म्हणणार “अरे! मी तर आताच पंप मारून ठेवलो की!” दुसरा नोकर लगेच ,” आणि हा बाद्दर हंपिंग करत करत मस्त गेला होता की!” मी गोरामोरा होऊन,”अहो मी इथुनच परत आलो की. हापिंग करत करत काय मी बाळ्याच्या ओढ्याला गेलोतो का? बाळ्याच्या ओढ्याला आमच्या गावचे स्मशान आहे! मग कुरकरत म्हंम्हद का ज्यालिंदर हवा भरून द्यायचे. सायकल परत द्यायला आलो.

सायकलचा प्रत्येक पार्ट तपासून त्यांनी ती घेतली. आणि नोकर मालकाकडे पाहून म्हणाला,” मालक पुढचा ब्र्येक नाही. माझ्या पोटात गोळा आला. दोन आणे तासाचे आणि दोन आणे ब्रेकच्या रबराचे. “चार आणे झाले.” मालकाने जाहीर केले. कुठले चार आणे देणार मी. तासाच्या वर होऊ नये म्हणून सगळ्या चढांवर जीव खाऊन खाऊन पायडल मारत मारत घामेघुम होऊन आलो होतो. टाॅलस्टाॅयच्या निघण्याच्या ठिकाणी सूर्य मावळायच्या आत पोचले पाहिजे म्हणून जणू रक्त ओकत पळत येणाऱ्या, शेतकऱ्याप्रमाणे मीही एक तास व्हायच्या आत धापा टातक आलो होतो. मालकाला म्हणालो,” मी ब्रेक कुठेही लावला नाही. पुढचा तर नाहीच नाही. तो तर कुणी लावतच नाही.” ” नाही, मीच तो पाडला हिथं दुकानात बसून.”मालक तिरके बोलत होता.बरीच बौद्धिक चर्चा आणि परिसंवाद व्हायचे. “लहान हायेस म्हणून सोडला. पण पुना न्येताना सगळी सायकल तपासून न्येत जा, काय?” हे ऐकून घरी यावे लागे.
त्यानंतर पुन्हा दुकान बदलायचे. आता गोन्यल कडून घ्यायची.

सायकली जुन्या असायच्या पण ही सर्व माणसे राजा आदमी वाटायची. शिवाय एक गोन्यल आमच्या भावाच्या वर्गात होता. तरीही किती वाजता घेतली, ब्रेक ची सगळी रबरं आहेत ना, सायकलची साखळी आहे ना पाहून घेतले. चाकं दिसत होती म्हणून ती पाहिली नाहीत! दोन्ही पायडलची एकेक रबर नव्हते. पण पायडल होती. जाऊ दे,असू दे म्हणत हापिंग करत सायकल वर टांग मारून निघालो. आज लांब जायचे होते. तरी पण अर्ध्या तासात परतायचेच ह्या निश्चयाने I can do, I can doघोकत निघालो. काय झाले कुणास ठाऊक. पायडल छान फिरू लागले पण सायकल पुढे जाईना. सायकलची साखळी घसरली होती. “अर्धा तास, अर्धा तास” स्वत:लाच बजावत साखळी बसवायला लागलो. पण मला काय जमते. पुढच्या चक्रावर बसवली की मागच्या लहान चक्रावरून घसरायची. दोन तीन वेळा प्रयत्नांती परमेश्वर म्हणत प्रयत्न करत राहिलो.पण ते फक्त प्रयत्नच झाले. माझ्याच बरोबरीच्या एका पोराने माझी खटपट पाहिली. काय केलं कुणास ठाऊक त्याने. पण दोन्ही चक्रांवर हात ठेवून बोटे सफाईदार फिरवून चेन बसवली. फार आनंद झाला. तरी पण तो आनंद त्याने फार काळ टिकू दिला नाही.” चेन बशिवता न्हाही येत; सायकल चालवतो म्हणे.” असे म्हणत माझी किडा-मुंगी करत तो माझ्यातली हवा काढून गेला.

मी निघालो. अर्धा तास, अर्धा तास असे बजावत चालवत होतो सायकल. थोड्याच वेळात एक चाक फुसफुसू लागले. पुन्हा धसका. पंक्चर नक्की. घाम पुसायचेही सुचत नव्हते. तशीच ढकलत रस्त्यावर,एका खोक्यावर पंक्चरवरील औषधोपचाराची सर्व औषधे नीट ठेवून, शेजारी मळकट पाणी भरलेली पाटी असलेला साधारणत: माझ्याच वयाचा छोटा शिलेदार होता. त्याला काय झाले ते सांगितले. त्याने चाक वगैरे काही न काढता फक्त हवा भरतात ते नाकाडे आट्या फिरवुन काढले. लाल रबराची लहानशी गुंडाळी पाहिली. ती गेल्याचे सांगितले. पंक्चर नाही ? पंक्चर नाही? ह्या आनंदात बेहोश होऊन, दोन तीन वेळा हेच विचारून त्याला सतावल्यावर तो म्हणाला, “ते माहित नाही. ही व्हालटूब गेलीय.” त्याने ती बसवली. हवा भरली. मी निघणार तेव्हा म्हणाला, “थोडं थांब.” त्याने दोन तीन ठिकाणी कान लावून हात वरून फिरवून हवा भरतात त्या नाकाड्यावर थुंकी लावून पाहिले. आणि मला जायला परवानगी दिली. एक आणा घेतला त्याने पण मला नामोहरम केले नाही.

पुन्हा दात ओठ खात सायकल दामटत निघालो. दुकानात आल्यावर इकडे न पाहता घड्याळाकडे पाहिले. आता माझी हवा पूर्ण गेली ! दोन आणे होते.एक आणा दुरुस्तीला गेला. अर्धा तासच काय त्याहून पंधरा वीस मिनिटे जास्तच झाली होती. पण गोन्यल बंधू दिलदार होते. मी एक आणा दिल्यावर,” हरकत नाही म्हणाले;पुढे बघू “.

सायकल दुरुस्तीचीही अशी लहान-मोठी, टपऱ्या, रस्त्यावर केवळ एक पंप घेऊन हवाभरून देणारी मुलेही असत. तर लहानसहान दुरुस्त्या पंक्चर काढून देणारी,खोक्यासह बसलेलीही मुले असत. त्यामुळे रस्त्यावर सायकल बिघडली तरी चिंता नसे. बरे दुरुस्त्या करणारे सर्व वयाचे होते. पण त्यातही दहाबारा वर्षांपासूनची मुलेही बरीच असत. दुरुस्ती म्हणजे पंक्चर काढणे, हीच जास्त असे. त्यामुळे ” पंम्चर काढून मिळेल” ही पाटी सगळीकडे दिसत असे.

पंक्चर काढताना पाहणे हा एक कार्यक्रमच असायचा आमच्यासाठी. पण आता माझ्यावरच बेतल्यामुळे धसका होता. एक जाडसर पाना, टायर आणि चाकाच्या खाचेत घालून दुसरीकडे कानशीसारखे पसरट हत्यार घालून आलटून पालटून ती हलवत, टायर चाका पासून थोडे सैल करून दोन्ही हातांनी आतली ट्यूब बाहेर यायची.ती निघाली की आमच्या चेहऱ्यावर अरे व्वा! असे भाव दिसायचे. मग तो मुलगा संपूर्ण टायरच्या आतून डाॅक्टर इतक्याच काळजीने हाताची बोटे फिरवायचा. चुक, तारेचा तुकडा,खडा वगैरे नाही ह्याची खात्री झाली की मग तो ट्यूबकडे वळायचा. दुसऱ्या घराण्याचा कलावंत ही क्रिया पंक्चर वगैरे काढून पुन्हा ट्यूब आत बसवण्यापूर्वी करायचा. पण हात की सफाई तशीच ! आता मुख्य कारवाईची सुरवात. प्रथम ट्यूब मध्ये हवा भरायची. की लगेच ती ट्यूब थोडीशी हवेत फिरवल्यासारऱ्खी करत पाण्याच्या पाटीत दोन्ही हातानी तिचा प्रत्येक भाग दाबत दाबत पाहत जायची.

आम्ही त्यावेळे पासून जे मान पुढे करून त्या पाटीमध्ये पाहायचो की अर्जुनानेही मस्त्यवेध करताना इतक्या एकाग्रतेने, पाण्यात दिसणाऱ्या फिरत्या माशाकडे पाहिले नसेल!
आणि पंक्चर सापडले की तो आम्हाला ती ट्यूब पु्न्हा पुन्हा दाबून त्या ट्यूबमधून वेगाने येणारे बुडबुडे दाखवायचा. लगेच तिथे मास्तरांप्रमाणे कार्बनच्या पेन्सिलीने सुरेख जांभळा गोल करायचा. पण तो कसबी कारागिर तिथेच थांबत नसे. सर्व ट्यूब त्या पाण्यात पोहल्याशिवाय आणि दुसरे पंक्चर नाही समजल्यावर तो निराशेने पाणी झटकायचा. आम्ही मात्र एकच पंक्चर म्हणत सुटकेचा निश्वास सोडायचो.ह्यानंतर तो cosmetic शल्यचिकित्सक व्हायचा. कानस काढून त्या गोलावर घासायला लागायचा.जोर अति नाही की वरवरचा नाही. ती ट्यूब पुरेशी खरखरीत झाली की ते छिद्र पुरेसे झाकले जाईल येव्हढा रबराचा तुकडा कापायला लागायचा.

ही कलाकारी पाहण्यासारखी असते. काही पंक्चरवाले- सर्जन चौकोनी कापतात तर काही गोल.पण तो चौकोनही अगदी काटकोन चौकोन नसायचा. त्याच्या चारी कोपऱ्यांना तो इतक्या सहजतेने गोलाई द्यायचा. कात्री एकदाही न थांबवता! सिनेमाच्या पडद्यासारखा दिसणारा तो तुकडा पाहात राहावा. आणखी दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याची कात्री. काय तिची धार असेल. ना मध्ये तिचे अडखळणे की दबकत बिचकत जाणे. हा कारागिर ती फिरवतोय का ती कात्री त्याचा हात धरून फिरवतेय समजत नसे! तसाच गोलाकार कापताना, तो तुकडा पहिल्याच प्रयत्नात गोल व्हायचा.पाहातच राहत असू आम्ही. तो तुकडा त्या ट्युबवर चिकटवणे म्हणजे पोस्टाचे तिकीट चिकटवण्याइतके गद्य काम नव्हते. बरेचसे पारदर्शक असणारे ते द्रव तो बोटाने त्या रबराच्या त्वचेला लावायचा. आणि त्यावर फुंकर घालून त्या छिद्रावर पटकन चिकटावयाचा. एकदा दोनदा बोटाने दाबायचा. पण ते grafting इकडे तिकडे सरकू न देता! अजून शस्त्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता cosmetic सर्जनचे काम संपले. आता orthopedic सर्जनची भूमिका तो वठवायचा.

वईसाचे ते हॅंडल एका फिरकीत तो वर न्यायचा; मधल्या ऐरणीवर तो त्या ट्युबचा भाग ठेवून वईसाच्या हॅंडलला अशी शैलीदार गिरकी द्यायचा की वईसाने त्या ट्युबला आपल्या तावडीत कधी घट्ट धरून ठेवले ते तिलाही समजायचे नाही. लगेच दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या सायकलकडे वळायचा. पुन्हा तो मोठा पाना व लोखंडी पट्टी आत बाहेर करत त्या टायरचे आतडे तो मोकळे करायचा. तोपर्यंत आमच्या ट्युबची सौदर्यशस्त्रक्रिया संपलेली असे. पुन्हा ट्युबचे आतडे जागी जायचे. हवा भरण्यासाठी दुसऱ्या कुणाला सांगितलेले असायचे.

हवा भरणारा कसरतपटू असे. साधा पंप तो काय आणि हवा भरणे असे किती तांत्रिक असते! पण नाही, हा त्यात आपले अभिनय कौशल्य, नृत्यकलेची ओझरती झलकही दाखवायचा. पंप मोठा. हा त्या पंपापेक्षा थोडा जाड!

पंपाच्या पायावर आपला पाय दाबून हा त्या पंपाचे हॅंडल धरून पंप पुढे मागे हलवत एक पाय मागे थोडा उंचावून दट्या दाबायचा. त्यावेळी मान खाली करून पुन्हा पटकन वर झटकवत, पदट्ट्यावर रेलून, तो वरचे हॅंडलसह पंप मागे पुढे करत दट्ट्या दाबणार. पाय मागे किंचित लंगडी घातल्या सारखा करत पुढे झुकणार आणि मागे येताना म्हंमद असेल तर केसाला झटका देणार; ज्यालिंदर असेल तर मान इकडे तिकडे फिरवत हसणार. पण हे दहा बारा वेळा इतके शिस्तीत चालायचे की पहात राहावे. मग आमच्यापैकी कुणीतरी मी मारु का पंप म्हटल्यावर हां म्हणायची ती पोरे. आम्हाला काय जमते त्यांचे भरतनाट्यम! ते नाट्य तर नाहीच पण पंपाचा तो दट्ट्याही खाली जायला दहा मिनिटे लागायची! थांबत थांबत तो खाली नेत असू. पंपातली हवाही हलायची नाही! ती मुले हसायची. ही विद्या तरी त्यांचीच,असे त्यांना वाटत असावे.

सायकली म्हणजे त्यावेळचे सर्वांचे वाहन होते. रिक्षा अजून आल्या नव्हत्या. बसचेही काही खरे नव्हते. बराच काळ त्या नव्हत्याही. त्यामुळे सायकल भूषण होते. ही सायकली भाड्याने देणारी दुकाने होती म्हणून अनेकांची मोठी सोय होती. लहान पोरांसाठीही एखाद्या दुकानात कमी उंचीच्या एक दोन सायकली दिसत.

नविन सायकल घ्यायची ठरले तर घरात कितीतरी अगोदर दिवस-रात्र चर्चा,वादविवाद,चिडाचिड, चालत असे. कुठल्या कंपनीची घ्यायची ह्यावर दोन तीन दिवस गुऱ्हाळ चालायचे. पण सायकल काही एक दोन वर्षे यायची नाही. तरी तिच्या गप्पा मात्र चवीने व्हायच्या!

रॅले, फिलिप्स आणि त्यानंतर हर्क्युलिस. तीन ब्रॅंड जोरात होते. रॅले नंबर एक. त्यातही तिच्यातील हिरव्या रंगाची सर्वांची आवडती. पण त्या फारशा मिळत नव्हत्या लवकर. बरं नुसती सायकल घेऊन चालायची नाही. त्याला दिवा पाहिजे. कायद्याने रात्री दिवा लावणे भागच होते. लहान कंदिलासारखे दिवे बहुतेकांचे असत. कायद्यापुरता प्रकाश पडे. पुढच्या चाकाच्या मर्डगार्डवर मिणमिणता पडला तरी “लै पावरफुल्ल” म्हणायला लागायचे. त्यानंतर आली चौकोनी लहान डब्याची बॅटरी. हॅंडलच्या खालच्या बाजूला हुकासारखी पट्टी असते त्यात ती अडकवायची. त्याचा उजेड बरा पडायचा. पण बॅटरी संपत आली तरी लोक वापरायचे. सिगरेटचे ऱ्थोटूक किंवा उदबत्तीचा विस्तव जास्त प्रकाशमान असेल. पण पोलिसाला दाखवायला पुरेसा वाटे. “आता बॅटरीचाच मसाला आणायला चाललोय” इतके सांगून सटकायला तो निखारा कामाला यायचा. काही खमके पोलिस मात्र,” अब्ये कुणाला ववाळाला निघाला तू ह्ये अगरबत्ती घ्येवूनआं? कानफटात हानल्यावर मग लाईटी चमकेल तुझा.” म्हणत पावती पुस्तक काढायचा.लगेच आमची खरी तत पप,तत पप ची भाषा सुरु व्हायची.

मागच्या चाकापाशी लावलेला डायनामो आणि पुढचा हेडलाईट ही खरी शान असायची. आणि त्यातही हिरवी रॅले! मग काय! हायस्कूल काॅलेजात तो सायकलवाला सगळ्याजणींचा स्वप्नातील राजकुमारच असायचा. सायकलची निगा राखणारे शौकिनही होते.त्यांची ती ‘जीवाची सखी’च असे. तिला रोज पिवळ्या मऊ फडक्याने(च) पुसायची. पण किती! चाकातली प्रत्येक तार चमचम करीपर्यंत. डोळे दिपून अपघात व्हायचे! इतकेच काय मागचे लोंबते रबरही साबणाने धुवून टाॅवेलने पुसून ठेवायचे. दर रविवारी,पिटपिट आवाज करणाऱ्या डबीच्या नळीतून तेल पाजायचे. त्या जागांची तांत्रिक नावे घेऊन गप्पा मारायच्या. “पायडल, हॅंडवेल सीट बिरेक” येव्हढा शब्दसंग्रह असला की सायकल चालवता येत असे. विशेष म्हणजे हेच शब्द वापरणारे सायकल चालवण्यात तरबेज होते.

दोन्ही हात सोडून भर गर्दीत शिटी वाजवत सायकल दडपून नेणे, किंवा मधल्या दांडीवरून ‘हॅंडवेलवर’ पाय टाकून आरामात उतारावरून जाणे,एकाच वेळी तिघांना घेऊन जाणे असले कसरतीचे प्रयोग हीच मंडळी करत. बाकी आम्ही फक्त सायकल या विषयावर दिवसभर बोलू शकत असू. फार हुषार असेल तर सायकलीत कुत्रे कशाला म्हणतात असा रहस्यमय प्रश्न विचारून कुणी तोंडी परीक्षा घ्यायचा. आम्ही त्याला हड् हड् करत टाळत असू. पण सीटला ‘सॅडल’ किंवा मध्येच ‘हब’ वापरून इंप्रेशन मारणारेही असत! बरे दिवा असूनही तेव्हढा रुबाब येत नसे.तो डायनॅमोचाच हवा. साखळीला गार्डची खोळ पाहिजे. तिही फक्त एका झाकणासारखी असली तरी लक्ष देत नसत मुले. पूर्ण दोन्ही बाजूनी चमकदार, चकचकीत, आणि चेनला पूर्ण झाकणाऱ्या,तिला कुलवंत घराण्यातली करणारे गार्ड असले की लोक सायकलकडे जरा दबून आदराने पाहायचे.

आता डोळ्यापुढे ती कायम नवी दिसणारी हिरवी रॅले, खटका दाबला की मागच्या टायरला डायनॅमो चिकटून चाक फिरले की मोठा लांब झोत टाकणारा मोटरच्या हेडलाईटसारखा दिवा, ते अंगभरूनआणि डोईवरून चेनने पदर घेतलेले शाही गार्ड, मागच्या चाकावर बसवलेले कॅरिअर, चिखल उडू नये म्हणून लावलेले मागच्या बाजूचे रबराचे झुलते पदक, टेल लॅम्प च्या तांबड्या चकतीचा कुंकवाचा टिळा लावलेले मागचे बाकदार मडगार्डआणि इतरांच्या घंटीपेक्षा वेगळाच आवाज काढणारी घंटी, सायकल उभी करायची तीही शैलीदार पद्धतीनेच आणि त्यासाठी तिला एक मुडपुन ठेवता येईल असा पाय जोडलेला; बेफिकिरपणे पण सहज,दिला न दिला,अशा झटक्याने तो खाली आणून त्यावर, पुढचे चाक मान वेळावून पाहते अशी ठेवलेली सायकल असल्यावर जगाचे राज्यही त्यापुढे तुच्छ असायचे.पण अशी सकलगुणमंडित,सालंकृत सायकल पहायला मिळण्यासाठी सुद्धा कुंडलीत योग लागत. दैवयोगाने आम्हाला शाळेत व काॅलेजात मोजून तशा दोन तीन दिसायच्या. बाकी बहुसंख्य सायकली चारचौघी सारख्याच; घंटी सोडून सगळे पार्टस् वाजणाऱ्याच !

माझा मित्र बंडूने चौडेअण्णांच्या दुकानातून नवी कोरी सायकल घेतली. तेव्हा त्याचे हॅंडल एकदम नव्या पद्धतीचे. त्याच्या दोन्ही मुठी मधल्या दांड्यापेक्षा वर आणि बाकदार होत्या. बसणाऱ्या स्वाराच्या दोन्ही हातांची महिरपी सारखी नक्षी व्हायची. रुबाबदार दिसायचा! सर्व मुले,सायकल नवीन आणि हॅंडल त्याहूनही नवीन म्हणून आणि सायकलवर बसलेला बंडूही स्टायलिश दिसायचा;त्यामुळे दोघांकडेही टकमक पाहायचे. प्रत्येक जण त्याला ‘एक चक्कर मारु दे रे’ म्हणत विनवणी करायचे. बंडूने सगळ्यांना ती फिरवायला दिलीही. नव्या सायकलमुळे एक दोन दिवस बंडूकडेच सगळ्यांची वर्दळ असायची!

गावात अजून मोटारी दिसत नव्हत्या. संपूर्ण गावात चार पाच असतील. त्याही सारख्या फिरत नसत. म्युनसिपालिटीचे दोन चार ट्रक असतील. पण त्या काही मोटारी नव्हेत. ते सायकलचे दिवस होते. त्याही अति झाल्या नव्हत्या. तसे म्हणायचे तर दोनच प्रकारचे लोक.चालणारे आणि सायकलवाले. नोकरीत असतानाही मी सायकल भाड्याने घेउन काम करीत असे. जळगावला आमच्या घराजवळ असलेल्या नाईकांच्या दुकानातून सायकल घेत असे. मी त्यांच्याच गल्लीतला आणि टाय बूट वगैरे घातलेला त्यामुळे नाईक बंधू मला नवी सायकल देत. ती देण्याअगोदर चांगली स्वच्छ पुसून, हवापाणी तपासून देत. आणि खरंच तशी कसलीही कुकरकु न करणारी सायकल चालवताना एक निराळेच सुख उपभोगतोय असे वाटत होते. कधीतरी माझ्यातला शाळकरी जागा व्हायचा. नाईकांना विचारायचा, “हिरवी सायकल नाही ठेवत तुम्ही?” त्या सज्जन भावांनी, ” नाही; पण आणणार आहोत आम्ही,” असे सांगितले. महिना दीड महिना उलटून गेल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितले. दहा पंधरा मिनिटांनी त्यांच्यातील एकजण,एक डौलदार वळण घेत हिरव्या सायकलवरून आला.पुन्हा एकदा फडक्याने पुसत ती मला दिली. त्या तरूण मुलांचा एव्हढा चांगुलपणा पाहून मन खरेच भरून आले होते त्या दिवशी.

चाळीसगावलासुद्धा मी सायकलवरून काम करत असे. स्टेशनच्या समोरच सायकलींची दुकाने होती. तो सिंधीही चांगली सायकल काढून द्यायचा. बामणोदहून भालोदला जायला त्या दिवसांत फार एसटी नव्हत्या. पण त्याबदली सायकलीचे दुकान होते. विशेष म्हणजे त्याकाळचे सायकलींचे ते u-Haul किंवा Enterprise, Herstz होते. बामणोद ची सायकल भालोदला देता येत होती! चार पाच मैल अंतर होते. तो दुकानदारही मला त्यातली बरी सायकल काढून द्यायचा. म्हणजे दोन्ही मडगार्ड थडथड करण्या ऐवजी एकच मडगार्ड आवाज करायचे. तसाच एक तरी ब्रेक लागत असे. रस्ता बरा होता. पण पावसाळ्यात उखडला जायचा. त्यामुळे घोड्यावर बसून चालल्यासारखे वाटायचे. मध्ये मध्ये सीटवर न बसता उंच होऊन चालवावी लागे. परतताना भालोदहून पन्हा सायकल घ्यायची आणि बामणोदला परत करायची. किती सोय होती!

आजही अनेक गावात त्यांची त्यांची चौडे सायकल मार्ट, गोन्यल बंधू,नाईक सायकल्स, इंडिया सायकल डेपो सारखी लोकोपयोगी दुकाने आहेत.

ते सायकलचे दिवस होते. दोनच प्रकारचे लोक होते. चालणारे आणि सायकलवाले.सायकलवाल्यांमधीलही बहुसंख्यांसाठी, Share the bike चे मूळ रूप “सायकली भाड्याने मिळतील” ही दुकाने केव्हढी सोय होती!

झाले मेरु -मंदार धाकुटे!

तारखा, वार , दिवस रोजच येतात आणि जातात . पण एखादीच तारीख , तो वार , तो दिवस कायमचा लक्षात राह्तो. दुपारचे दोनही रोजच वाजतात . पण २३ जुलै २०१३ आणि त्या दिवशीचे दुपारचे दोन ह्यांना अनन्य महत्व आहे . हा दिवस आपल्या सर्वांच्याच लक्षात राहणार आहे . कौतुक आपल्या डोळ्यांतून ओसंडेल आणि ऊर अभिमानाने भरून येईल . आपल्या कल्याणीचे किती कौतूक करावे असे होईल . कारण याच दिवशी–२३ जुलै २०१३ दुपारी २. ०० वाजता कल्याणीने हिमालयाचे २२०००फूट उंचीवरचे छामसेर(समशेर) कांगडा शिखर सर केले , जिंकले!

हिमालय, २२००० फूट, छामसेर शिखर, प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्यक्ष पराक्रमालाच आव्हान आहे. कल्याणीने ते शांतपणे स्वीकारले. चिकाटी, दृढ निश्चय, मनाचा शांतपणा आणि अंगभूत उत्साहाच्या जोरावर तिने हिमालय चढून ती छामसेर (समशेर) कांगडा शिखरावर गेली. कल्याणी ”समशेर’ बहाद्दर झाली .

कल्याणीच्या या धाडसी, साहसी मोहिमेचे थोडक्यात वर्णन आपण तिच्याच शब्दांत . ऐकू या…।

“पुण्याहून आम्ही अकराजण दिल्ली-मनाली-लेहला जाण्यासाठी निघालो. दिल्लीला पोचलो . दिल्लीहून मनालीला आम्ही बसने आलो . मनालीहून लेहला जाण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले. कारण वाटेत एक रात्र मुक्काम केला होता ”

“लेहला आल्यापासून श्वासोश्वास घेणे अवघड होऊ लागले . कारण तिथली उंची! तिथून २४०किमीचा प्रवास करून कारझोकला आलो . इथे आमच्यापैकी एकाला श्वासोश्वास घेणे फारच अवघड, जड होऊ लागले. त्याला आम्ही लगेच लेहला माघारी पाठवले . तिथे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले . तो बरा झाला . पण मोहिमेत काही परत येऊ शकला नाही ”

“कारझोकला तिथल्या वातावरणाची, विरळ हवेशी जुळवून घेण्याची सवय होण्यासाठी आम्ही रोज दोन-तीन तास चढ-उतर करत असू . हे झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या बाजूने हिमालय चढून जाणार होतो त्या वाटेकडे निघालो. ते १५ किमीचे अंतर चालून जायला आम्हाला ७ तास लागले !”

” तिथेच त्या क्युरूच या ठिकाणी आमचा दुसरा तळ आम्ही ठोकला . इथेही आम्ही तिथल्या हवेची सवय होण्यासाठी तीन-चार तास चढ-उतार केली .”

“पर्वतावर इतरत्र बर्फ होता पण आम्ही ज्या बाजूने चढून जाणार होतो तिकडे बर्फ नव्हता . ठिसूळ, खडकाळ घसरडी अशी ती बाजू होती .बर्फ असता तर बरे झाले असते . कारण बर्फातून चढून जाण्यासाठी बूट असतात त्यांच्या spikesमुळे पायाची पकड तरी घट्ट होते. आमच्या बाजूच्या पर्वताचा भाग ठिसूळ,खडकाळ आणि घसरडा . त्यामुळे घसरतच पुन्हा चढायचे . दोन फुट वर गेले की एक फुट खाली . गणितातल्या त्या पालीसारखे!”

“चढण वाढत जाऊ लागली तसे श्वास घेणेही अवघड होऊ लागले . तो घेणेही एक ‘चढण’च वाटायचे . तरीही २१ जुलैला आम्ही दहाजण १८,००० फूटावर जाऊन पोहचलो . इथे आम्ही आमचा Base-Camp तळ ठोकला . त्या दिवशी हवा फार ढगाळ झाली होती . सगळीकडे अगदी ढगाळ झाले होते .. उद्या शेवटची चढाई करायची असे ठरले होते. पण हवा अशीच राहिली तर काय करायचे अशी सगळ्याना काळजी लागली . कारण मग पाऊस पडणार . पुन्हा जास्तच निसरडे होणार . बर्फही पडण्याची शक्यता . अशा विचारात आम्ही सगळे होतो . पण सुदैवाने हवा निवळली . आम्ही२३ जुलैला पहाटे ३.३० वाजता शिखरावर चढायला सुरुवात केली . पंधरा पावले चढून गेल्यावर थांबावे लागत असे . इतका दम लागत होता . त्यामुळे आमच्यातील पाचजण पहिल्या काही १५-२० पावलातच परत मागे तळावर गेले.”

“आता आम्ही पाचजणच चढत होतो . दम लागायचाच . थांबल्यावर थोडे बरे वाटायचे . पुन्हा चढायला सुरुवात करायची . चढ होताच . अगदी काटकोनी नव्हता पण ७०-७५ अंशाचा तरी होताच. अखेर चढत-थांबत आम्ही पाचजण दुपारी दोन वाजता छामसेर शिखरावर पोहचलो . शिखर गाठले! उभे राहिलो . फोटो काढले . तिथे आम्ही फार तर अर्धा तास होतो . Base-Campसोडल्यापासून १०तासांनी आम्ही शिखरावर पोहचलो होतो.”

“आता उतरायचे वेध लगले. उतरताना घसरायची भिती तशी जास्तच . आम्ही आमच्या Base-campला रात्री ८. ३० वाजता पोह्चलो. . Summitवरून Base-Campपर्यंत यायला आम्हाला ७ तास लागले . म्हणजे एकूण १७ तास झाले . मी फक्त कॅडबरी खाल्ली असेल तेव्हढीच . पण Base-Campला येईपर्यंत खाण्याची जेवण्याची आठवणही झाली नाही . पाणीही जास्त जात नव्हते .”

“शेवटपर्यंत, शिखरावर आम्ही फक्त पाचजणच होतो. त्यापैकी मी एकटीच मुलगी . आणि आमच्या अकराजणात सर्वात लहान मीच . एकोणीस वर्षांची . आमचे ग्रुप-लीडर माझ्या बाबांच्या वयाचे, पन्नाशीचे .दुसरी एक मुलगी ती चोवीस वर्षांची; एक आजोबा ते ६०-६५ वर्षांचे . बाकीचे तिशीतले . वर आम्ही जे पाचजण शिखरावर पोचलो त्यात आमचे Group-leader, मी , आणि बाकीचे तिशीतले असावेत .”

आपल्यापैकी हिमालयात एखाद्या शिखरावर चढून जाणारी , अशा साहसी मोहिमेत भाग घेणारी कल्याणी हि पहिलीच . माझे भाग्य असे की , आकाशात स्वत: विमन-उड्डाण करून आकाशी झेप घेणारी कल्याणीची थोरली बहिण मृण्मयी आणि हिमालयातील २२,००० फूट उंचीवरचे शिखर जिंकणारी ही कल्याणी या दोघींचेही पराक्रम मला प्रत्यक्ष पहायला, ऐकायला मिळाले . मलाही बरोबर घेऊन मृण्मयीने आकाशात झेप घेतली आणि विमानातून सृष्टी दाखवली . कुणी सांगावे! कल्याणीही तिच्याबरोबर मलाही एव्हरेस्टवर घेऊन जाईल! ह्या परते माझे दुसरे भाग्य ते काय?

कल्याणीच्या यशात तिच्या आई – बाबांचा, त्यानी तिला दिलेल्या उत्तेजनाचा, पाठिंब्याचा फार फार मोठा वाटा आहे हे विसरता येणार नाही .

रेशनकार्ड ते ग्रीन कार्ड

सध्या कार्ड-संस्क्रुतीचे युग आहे. ओळख-पत्रापासून ते क्रेडिटकार्डपर्यंत नुसती कार्डेच कार्डे! मला माहित आहेत ती फक्त रेशन कार्ड आणि पोस्टकार्ड. ह्या दोन्हीशीच जास्त संबंध आला माझा.

रेशन कार्डानेही आपले रंगरूप बदलले. पूर्वी फक्त पोटापाण्याच्या वस्तूंसाठीच ते होते. आता तो एक महत्वाचा दस्त ऐवज झालाय. इतर अनेक अर्जांसोबत रहिवाशी असल्याचा पुरावा, घराच्या पत्त्याचा पुरावा,बॅंकेत खाते उघडताना अशा अनेक कारणासाठी ते आता वापरले जाते. त्यामुळे ते मिळवण्यासाठीही कचेरीत लांब रांगा लागलेल्या असतात. बरं ते आता निरनिराळ्या रंगातही मिळू लागलय. केशरी, तांबडे, पांढरे वगैरे वगैरे!

मध्यम वर्गात अलिकडे अमेरिकेचा उदय झाला. अमेरिकेत जाणाऱ्यांची जशी वर्दळ वाढू लागली तसे व्हिसा, जेट लॅग हे शब्द ऐकू येऊ लागले.मी ओळखत असलेल्या कार्डांबरोबर ग्रीन कार्डाचाही बोलबाला कानावर येऊ लागला.कुणाला व्हिसा मिळाला की त्या घरात जल्लोष होई, सत्यनारायणाची जंगी पूजा व्हायची. अमेरिकेचा विसा मिळायला पूर्वजन्मीचे पुण्य लागते,कुंडलीत तसे योग असावे लागतात, एखाद्याच्या(च) ते भाग्यात असते अशा दैवी गोष्टींना उत आला.एखाद्याला व्हिसा नाही मिळाला तर त्याला दुखवट्याची पत्रे येत!

व्हिसाबरोबर ओघाने ग्रीन कार्डाचेही महात्म्य वाढले. पण अनेकांना ह्या ग्रीन कार्डासाठी काय करावे लागते, आपल्या देशातूनच प्रयत्न करावा लागतो की अमेरिकेत जाऊनच केलेले बरे, कोण कोणती कागदपत्रे लागतात याची नेमकी माहिती नसते. बरं ज्यांना ग्रीन कार्ड मिळाले आहे त्यांना विचारले तर ’ते माझ्या मुलाला/मुलीला माहित आहे’, ’रोज नियम बदलतात’, ’काही खरं नाही हो’ अशी गूढ, रहस्यमय माहिती देतात. त्यामुळे ग्रीन कार्डाभोवतीचे वलय आणखीच गडद होते. पण ते मिळालेल्या माणसाभोवती मात्र एक तेजोवलय निर्माण होते!

नुकताच मीही ग्रीन कार्डाच्या भोवऱ्यातून बाहेर आलो. मी पुण्याला असतानाच सतीशने कोण कोणती कागदपत्रे आणायला लागतील त्याची यादी सांगितली होती. त्यापैकी जी मिळणार नाहीत, दप्तरात नोंदच नाही असे काही असेल तर तशा अर्थाचे प्रमाणपत्र त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून आणायचे. नातेवाईकांचे त्याकरता प्रतिद्न्यापत्र नोटरीकडून प्रमाणित करून घ्यायचे ते सांगितलेच, शिवाय ही सर्टिफिकिटे, प्रतिद्न्यापत्रे यांचा मजकूरही सांगितला. अमेरिकेतील त्या खात्यांना ज्या पद्धतीचा आणि स्पष्ट अर्थबोध होईल अशा साध्या भाषेतील होता तो मजकूर. वास्तव काय आहे हे नेहमीच्या सोप्या आणि खरे काय आहे ते सांगणारा मजकूर असतो. मी तयारीला लागलो. एप्रिल महिन्याच्या मध्यापासून माझा जन्म दाखला, माझ्या लग्नाचे प्रमाणपत्र, ते नसल्यास संबधित अधिकाऱ्याकडून तशा अर्थाचे पत्र, माझ्या ज्येष्ठ नातेवाईकांचे माझे लग्न अमुक तारखेला झाले ते आम्ही त्याचे काका, मामा, मावशी…भाऊ, बहीण ..आहोत म्हणून आम्हाला माहित आहे आणि हे आम्ही शपथेवर सांगतो… असे प्रतिद्न्यापत्र, सतीशचा जन्मदाखला, बस्स, इतकीच कागदपत्रे लागणार होती.

सतीशचा जन्म दाखला मिळवण्यासाठी, माझे शेजारी अकोल्याचेच म्हणुन त्यांना भेटलो. त्यांनी माझ्याकडून सर्व नावे, तारीख मागितली. मी ती ठळक इंग्रजी अक्षरात, पासपोर्टमध्ये जशी स्पेलिंग आहेत तशीच लिहून दिली. सर्व काळजी घेऊन. “होईल काका हे काम दोन तीन दिवसात”, असे त्यांनी सांगितल्यावर,इतक्या लवकर काम होईल हे ऐकल्यावर माझा कंठ दाटून आला यात नवल ते काय!.

आता मी माझ्या कागदपत्रांसाठी सोलापूरला गेलो. माझंच गाव, सर्व कार्यालये कुठे आहेत त्याची सगळी माहिती मला होती. एक दोन दिवसात होतील कामे असा माझा अंदाज. गेलो सोलापूरला. जन्म दाखल्यासाठी फी भरून अर्ज दिला. “आठ दिवस लागतील, नंतर या” असा पहिलाच झटका मिळाला. मी कामाची तातडी सांगितली. पण फारसा उपयोग झाला नाही.मग ओळखी-पाळखीने कामं लवकर होतील या अनुभवाने त्याच्या शोधात लागलो. सुनीलच्या ओळखी भरपूर. आपल्यापैकी एकाचा एक मामा आहे त्याला भेटू असे म्हणून आम्ही त्या दुय्यम अधिकाऱ्याकडे गेलो. त्याने मला एक अर्ज द्यायला सांगितला. मी लिहून दिला. “अहो असा नाही, असे म्हणत एक मोठा ताव घेतला आणि लिहा असे म्हणाला. त्यांना पाहिजे तसे लिहून दिले. “नावं, त्याची स्पेलिंग बरोबर लिहून द्या. नंतर काही बदल करता येणार नाही. मी सर्व काही माझ्या पासपोर्टमध्ये लिहिली होती तशी लिहून दिली. “बरं झालं, आजच आलात. मी पुण्याला वरच्या ऑफिसात चाललोय. तिथून उद्या परवा मंजूर करून तसा जन्म दाखला तुम्हाला देतो”. इतके ठामपणे सांगितल्यावर कुणाला धन्य धन्य वाटणार नाही?

मी आता माझ्या लग्नाच्या प्रमाणपत्राच्या पाठीमागे लागलो. “त्याची त्या ऑफिसात झाडून सगळ्यांशी घसट आहे. त्याला सांगा तुमचं काम.झालच म्हणून समजा.” “त्याला गाठले. “उद्या ११.४५ वाजता डाक बंगल्यापाशी या. मग आपण त्या निबंधकांच्या ऑफिसात जाऊ.” मी ११.३० वाजता डाक बंगल्यापाशी पोहोचलो. साडे बारा वाजले, १.३० वाजला, २.४५ वाजले आणि फटफटीवरून ते ग्रहस्थ एका माण्साला घेऊन आले. इतका उशीर झाला वगैरे त्याचे काही वाटत असल्याचे एकही चिन्ह त्या ग्रहस्थाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते.. “यांचं छोटसं काम आहे मिनिस्टरांकडे. ते करून आलोच पंधरा वीस मिनिटात असे सांगून डाक बंगल्यात गेले ते दोघे जण. मी पुन्हा डाक बंगल्याचा पहारा करत उभा राहिलो. चार वाजता ग्रहस्थ आला आणि म्हणाला,” मिनिस्टरने जेवायलाच थांबवून घेतले. चला निघू या आता” असे म्हणत आम्ही निघालो. दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात आलो. ह्यांच्या सर्वांशी गप्पा सुरू झाल्या. काही वेळाने कुणाचे तरी माझ्याकडे लक्ष गेले. काय काम आहे असे म्हटल्यावर मी माझा अर्ज दिला. आमचे ग्रहस्थ साहेबाला सांगू लागले. साहेबांनी माझा अर्ज टेबलावर कागदाच्या ढिगाऱ्यात कुठे तरी ठेवून दिला. थोड्या वेळाने आम्ही बाहेर आलो. ते ऑफिसात “वटट” असणारे ग्रहस्थ म्हणाले दोन दिवसात काम होईल.

चला. दोन्ही कामे दोन दिवसात होणार या आनंदात मी बुडून गेलो. म्हटलं आता विजय अण्णांचे ऍफिडेविट करून घेऊ या.

प्रतिद्न्यापत्राचा मजकूर एका कागदावर छापून घेतला. तो सुनीलकडे दिला. त्याच्या ओळखीचा एकजण ह्या कामात अनुभवी होता.

वाचकहो आता माझ्या जन्म दाखल्याच्या कामाचे काय झाले तिकडे वळू. (ह.ना.आपटे, नाथ माधव यांच्या कादंबऱ्यांची आठवण आली ना?) चला आता आपण त्या “आपल्यापैकी एकाच्या ओळखीच्या माणसाच्या मामांनी” पुण्याला जाऊन जन्मदाखला आणलाही असेल. त्यांना फोन करू. “अहो, हे काय मी पुण्याच्या साहेबांच्या ऑफिसातच आहे. काम होणार. उद्या मी येतोच आहे”. उद्याचे आठ दिवस झाले. इकडे त्या सगळीकडे वट असणाऱ्या ग्रहस्थांनी काय केले ते पाहू. कारण त्यालाही आता आठ दिवस होऊन गेले होते. “मी उद्या जातोय त्यांच्याकडे. उद्या फोन करा.” चला आपली दोन्ही कामे उद्या होणार. दहा बारा दिवस राहिल्याचे सार्थक होणार. उद्या दोन्हीकडे फोन केले. पुन्हा चार दिवसांचे वायदे मिळाले. सुनीलला सांगितले मी आता जातो. तू पाठपुरावा कर. तो बिचारा आपला नोकरी व्यवसाय सांभाळून माझ्या कामाचाही पाठपुरावा करत होता.

मी पुण्याला आलो.जवळपास एक महिना उलतून गेला होता. दोन तीन दिवसात मिळणारा सतीशचा जन्म दाखला पुण्याला येऊन जुना झाला असेल अशा विचाराने माझ्या अकोल्याच्या शेजाऱ्यांकडे गेलो. त्यांच्या कडून सतीशचा जन्म दाखला आणावा म्हणून गेलो. काय कसं काय झाल्यावर त्यांना दाखला मागितला. त्यावर ते म्हणाले.” हा घ्या फोन, विजूभाऊंशी तुम्हीच बोला.” ही आणखी काय नवी भानगड असे पुटपुटत फोन घेतला. त्या विजूभाउंशी बोललो. त्यानी पुन्हा सगळी माहिती विचारून घेतली. स्पेलिंग, प्रत्येक नावाचे एकेक अक्षर उच्चारून लिहून घेतले.त्यांनी सांगितलेली फी शेजाऱ्यांकडे दिली. चार दिवसांनी फोन करा म्हणाले.

हे सगळे होईपर्यंत मे संपला, जून कधी उलटून गेला ते समजले नाही. जूलैही निघून गेला. फक्त अकोल्याहून विजूभाऊनी मात्र आठ दिवसात सतीशचा जन्म दाखला पाठवला. पण त्यात संजीवनीचे स्पेलिंग चुकले होते. पुन्हा फोन. पण त्यावर विजूभाऊंचे उत्तर,”स्पेलिंग चुकले तरी उच्चार तोच होतोय ना?” काय म्हणणार यावर आपण? चार महिन्यात एक कागद हाती आला. दरम्यान माझ्या जन्म दाखल्याचे. लग्नाच्या सर्टिफिकेटचे आणि विजय अण्णांच्या प्रतिद्न्यापत्राचे काय झाले त्याची वाचकांना उत्कंठा लागली असणार. पण आता मला अमेरिकेला निघणे भागच होते. त्यामूळे वाचकहो माझ्याबरोबर तुम्हीही अमेरिकेला चला!

मिळाली तेव्हढी कागदपत्रे घेऊन अमेरिकेत पोचलो.

अमेरिकेत येऊन तीन महिने मुक्काम झाल्यावर ग्रीन कार्डासाठी अर्ज दाखल करता येतो. पण त्या अगोदर तिथल्या पोलिस खात्याकडून माझ्यावर कोणतीही पोलिसी कारवाई झाली नाही, मी कोणताही गुन्हा केला नाही, अशा अर्थाचे एक प्रमाणपत्र लागते. डिसेंबर महिन्यात सतीशने माझ्यासाठी तसा अर्ज दिला. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही रेडवूड सिटी पोलिस मुख्यालयात गेलो. आवश्यक ती फी भरलीच होती. अर्ज होताच. मला पाहिले, पासपोर्ट पाहिला. लगेच माझ्या नावावर कसलाही गुन्हा, बेकायदेशीर गोष्ट केल्याची कसलीही नोंद नाही, मी गुन्हेगार नाही असे सर्टिफिकेट त्यांनी एकही प्रश्न न विचारता ताबडतोब दिलेही!

सतीशने कागदपत्रांची यादी पाहिली. माझा जन्म दाखला मिळेल तसाच दाखल करायचा ठरले. कारण त्याबाबतीत जनामावशीचे तसे प्रतिद्न्यापत्र होते. सतीशचा जन्मदाखलाही मिळाला तसाच दाखल करायचा असे ठरले. सतीश माझा पुरस्कर्ता असल्यामुळे त्याला जी कागदपत्रे दाखल करायची होती ती त्याने जमवली. एका दिवसात. आता राहता राहिले माझ्या लग्नासंबंधीची कागदपत्रे. ती अजूनही सोलापूरहून आली नव्हती. त्या निबंधकाच्या ऑफिसात “वट्ट्ट्ट” असणाऱ्या माणसाचे कोणी ऐकले नाही. “असे प्रमाणपत्र आजपर्यंत कुणी मागितले नाही आणि आम्ही तसे ते देतही नाही” हे ठाम उत्तर निबंधकांनी दिल्याचे कळले.(कायद्याच्या कोणत्या कलमाखाली असे सर्टिफिकेट देता येते हे नमूद केले असूनही!) मग जगदिशने सुचविलेल्या एका वकीलाला हे काम दिले. त्या वकिलालाही तेच उत्तर निबंधकाने दिले.(वकीलानेही अशा अशा कलमाखाली,साहेब, तुम्ही असे सर्टिफिकेट देऊ शकता असे सांगितले नसणार). उलट वकीलालाच त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्याकडे एक शॊध अर्ज करा, शॊध घ्या आणि प्रतिद्न्यापत्र करून द्या. वकीलाने तसे केले. पण त्यानेही एक चूक केलीच. काहीही आवश्यकता, गरज नसताना, आम्ही सांगितले नसतानाही, संजीवनीच्या पाठीमागे “लेट” असे लिहिले. विनाकारण नसते फाटे फोडायचे सगळ्यांनी ठरवले की काय वाटायला लागले. पुन्हा मुंबई, सोलापूरला फोनाफोनी. दुरुस्ती झाली. आता माझे लग्न झाले याचे प्रतिद्न्यापत्र विजय अण्णांकडून यायचे होतेच. श्याम आणि शैलाकडून घ्यायचे ठरले. सोलापूराहून एकही कागदपत्र आले नव्हते. दरम्यान फोनाफोनी चालूच होती.

माझ्या जन्मदाखल्यात अनेक चुका होत्या. त्यातील दोन चुका फक्त दुरुस्त होतील, आईचे नाव माझ्या पासपोर्टात आहे तसे(तेच बरोबर नाव होते तरीही) करून मिळणार नाही असे बरेच वेळा संगितले होते. पुन्हा खटपट, आपली बाजू मांडून सुनीलने पहिली. पण काही उपयोग झाला नाही. विजय अण्णांच्या प्रतिद्न्यापत्रात जणू काही दर वेळी नवी चूक करण्याचा निश्चयच केला होता की काय त्या तज्न्य माणसाने असे वाटायला लागले. आतापर्यंतच्या चुकांवर सर्वात मोठी कडी त्याने केली म्हणजे नवीन प्रतिद्न्यापत्रात वर्तमानपत्रात हेड्लाईन शोभावी एव्हढ्या ठळक अक्षरात “देअर इज टॉयलेट इन माय हाऊस” असे शीर्षक छापून मग पुढचा (तोही स्पेलिंगच्या चुका करून ) मजकूर लिहिला होता. निर्मळ ग्राम योजनेच्या नियमाप्रमाणे ते कुठल्याही प्रतिद्न्यापत्रावर आवश्यक केले होते म्हणे! तेही फक्त सोलापुरातच की काय! कारण पुण्या मुंबईत जी दुसरी दोन तीन ऍफिडेव्हिट करून घेतली होती तिथे कुणी असा “विधी” केला नव्हता. मग सोलापूरचा नाद सोडून दिला. मिळाला तसा माझा जन्म दाखला मागवून घेतला. तो आहे तसाच दाखल करायचे ठरवले होतेच. माझ्या ल्ग्नासंबंधीची दोन प्रतिद्न्यापत्रे श्याम आणि शैलाकडून करून घ्यायचे नक्की केले. यासाठी श्रीकांतने आणि स्मिताने खटपट केली. अखेर पाहिजे होती ती कागदपत्रे आली. आली पण केव्हा? मार्च महिन्यात! तीन चार दिवसात माझी वैद्यकीय तपासणी(म्हणजे रक्ताच्या चाचण्या, तीन चार लशी टोचून घेणे इ.) होऊन त्याचे रिपोर्टही हातात आले. आता सगळी कागदपत्रे, यादी करून सोबत माझी आणि सतीशची पूर्ण माहिती भरलेले अर्ज जोडून आणि आवश्यक त्या रकमेचा चेक लावून ते बाड सतीशने पाठवून दिले. तीन दिवसांनी ते मिळाल्याचे पोच-पत्र त्यांच्याक्डून आले. आठ दहा दिवसात ३ मे रोजी बोटाचे ठसे देण्यासाठी १२.१५ वाजता या असे पत्रही आले. बोटाचे ठसे दिले. लागलीच, तिथल्या तिथेच, तुमचे बोटाचे ठसे घेतले, पुढच्या कार्यालयात पाठवले अशा अर्थाचे पत्रही दिलेही! त्यानंतर आठ दहा दिवसांनी ग्रीन कार्ड मिळण्यासंबंधात तुम्ही मुलाखतीसाठी ३ जून रोजी सकाळी ८.२५ वाजता या ऑफिसात यावे असे पत्रही आले.त्यामूळे आता अजून पंधरा दिवस आहेत, यशचे बरेच फोनही आले,”तू केव्हा येणार? माझ्या कॉन्सर्टला यायला पाहिजेस “असे त्याचे फोन येत होते. सतीशकडे येऊनही बरेच महिने झाले होते. यदाकदाचित ग्रीन कार्ड मिळालेच(!) तर मग लगेच निघावे लागेल. असा सर्व विचार करून मी सुधीरकडे पंधरा दिवसांसाठी आलो. तिथला मुक्काम आटोपून सतीशकडे पुन्हा एक जूनला आलो. त्या दिवसापासूनच नव्हे मुलाखतीचे पत्र आल्यापासून काळजी, चिंता, धाकधुक वाढली होतीच. इंटरव्ह्यू कसा होईल याची काळजी, ताण आला होता, वाढतही होता.

सुधीर सतीश सारखे सांगत होते. साधा असतो हा इंटरव्ह्यू. जुजबी माहिती विचारतात, काळजी करू नका; असे सारखे सांगत होते. पण माझे मन ते माझे मन. “चिंतनात” मग्न! असो. आदल्या रात्री सतीशने सकाळी सात वाजता निघायचे असे सांगितले. सॅनफ्रॅन्सिस्कोला जायचे होते. सकाळी रहदारी फार. गर्दी असते. तेजश्रीने सांगितले, “विरळ म्हणत होता इंटरव्ह्यू अर्धा तास तरी चालतो”. पुन्हा माझ्या पोटात गोळा आला. इतका वेळ तोंड कसे काय द्यायचे! मी म्हटले, अरे, बराच वेळ असतो की हा प्रकार! सतीश शांतपणे म्हणाला, ” बाबा, तुमचा इंटरव्ह्यू एक तास चालेल,दहा मिनिटे चालेल.प्रत्येकाचे प्रकरण निराळे असते.” तीन जून उजाडला. मी पाच वाजताचा गजर लावला होता. उठलो. सगळे आटोपले. सतीश आणि मी निघालो. आणि त्या कचेरीत आठला पाच मिनिटे कमी असताना पोचलो. बाहेरच्या प्रवेशद्वारापासूनच सुरक्षिततेची तपासणी, ओळखपत्रांची तपासणी, सुरू झाली. आत गेलो तिथे तर याहूनही थोडी जास्तच तपासणी. पण हे सर्व साध्या नेहमीच्या आवाजात सौम्यपणे सांगत चालले होते. मग दुसऱ्या मजल्यावरील एका कर्मचाऱ्याला भेटलो. त्याने माझ्या अर्जावर काहीतरी लिहिल्यासारखे केले आणि तिसऱ्या मजल्यावर जाऊन थांबायला सांगितले. गेलो आणि वाट पहात बसलो. बरोबर ८.२०-२२ मिनिटांनी एक हसतमुख अधिकारी आला. “सडॅ, सडा..शिव्ह कॅमॅ..ट म्हणत आला. इतके नागमोडी उच्चार करायला लावणाऱ्या नावाचा दुसरा तिथे कुणीही(तामिळ, तेलगू) नव्हता. त्यामुळे आम्ही दोघे लगेच उठलो. त्याने आम्हाला त्याच्या पाठोपाठ यायला सांगितले. एक दोनदा डावीकडे, उजवीकडे करत त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. त्याने पुन्हा आमचे हसतमुखाने स्वागत केले. आणि वरदहस्त करत मी खरे सांगेन, खोटे सांगणार नाही खरे तेच सांगेन अशी शपथ घ्यायला लावली.(सांगू तेच खरे-मी). मग त्याने आमची ओळख पत्रे(माझा पासपोर्ट) पाहून आम्ही तेच आहोत याची खात्री करून घेतली. मी अर्जात माझी जी माहिती– जन्म तारीख, सतीशचा पत्ता, वय, वगैरे दिली होती तीच पुन्हा विचारून घेतली.लगेच किती मुले(सन्स) विचारले.

मी दोन मुलं(मुलगे) म्हणून सांगितले. नंतर एखादा प्रश्न विचारला. आणि पुन्हा विचारले किती मुले? मी दोन म्हणालो. चूक लक्षात आली. तो अर्जात पाहू लागल्यावर मी लगेच म्हणालो ऍन्ड वन डॉटर”. तो हसला आणि यस यस म्हणत अर्जावर बरोबर अशी खूण केली. सतीशलाही त्याने एखादाच प्रश्न विचारला असेल. लगेच त्याने तुम्हाला ग्रीन कार्ड मंजूर झाल्याचे सांगितले आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का असे विचारले. मी तर इतका मोकळा मोकळा, हलकाफुल्ल झालो होतो, ताण तणाव कुठे पळून गेले होते ते लक्षातही आले नाही. मला कसले प्रश्न असणार? सतीशने अखेर विचारायचे म्हणून विचारले की मग आता माझे बाबा परत जाऊ शकतील का? तो अधिकारी म्हणाला,” नाही. कार्ड प्रत्यक्ष हातात पडल्याशिवाय जाता येणार नाही.”आणि ते कार्ड दोन-तीन आठवड्यात येईल तुमच्या पत्त्यावर हेही सांगितले. लगेच त्याने एक छापील पत्रही दिले. माझे अभिनंदन आणि ग्रीन कार्ड तुम्हाला मिळाले असे सांगणारे ते पत्र दिले. ते घेतले आणि आम्ही थॅन्क्यू थॅन्क्यू म्हणत बाहेर आलो. सहज घड्याळाकडे पाहिले -फक्त दहा मिनिटे झाली होती!

चला, ग्रीन कार्डाच्या या प्रवासाला ंमी पुण्याहून निघण्या अगोदर फार पूर्वीपासूनच सुधीरने बाबा आता ग्रीन कार्डाच्या तयारीनेच या, मी आणि सतीश तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील आणि काय करावे लागेल ते सांगू, अशी सुरवात करून कामाला लावले. सतीशने मग सगळे तपशीलवार क्ळवले त्यापासून सुरवात झाली होती.. सतीशच्या धडपडीला,सुधीरच्या सुचनांना जगदीशच्या,सुनीलच्या, श्रीकांत आणि स्मिताच्या मेहनतीला, तसेच जनामावशी, श्याम आणि शैला यांनी केलेल्या सहाय्याला, मदतीला यश आले. माझ्यासारख्या ” सदंभटाचे तट्ट्टूटू अमेरिकेच्या गंगेत न्हाले”.

ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. त्यामुळे कागदपत्रांची जमवा जमव करताना आलेले अनुभव आता मोठे विनोदी वाटतात! हसू येते.

पण सतीश म्हणतो त्याप्रमाणे, बाबा आपले सगळे रेकॉर्ड इतके सरळ, आणि कसल्याही गुंतागुंतीचे, बेकायदेशीर, वेडेवाकडे काही नसते. आपल्याला काय विचारायचे हा त्यानांच प्रश्न असतो!”त्यांनी आपल्यालाच ग्रीन कार्ड तुम्ही छापून घ्या असे सांगितले असते.” हेच खरे.